टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
राजकारण
मिपा संपादकीय...! जाहीर आवाहन..
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, ०६/२७/२००८ - ००:५६) .सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...!
राम राम मंडळी,
मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील. वर म्हटल्याप्रमाणे हा अग्रलेख भारतातील अथवा भारताबाहेरील सामजिक अथव राजकीय विषयावर, ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असेल. प्रसंगानुरूप किंवा क्वचित प्रसंगी अर्थ, क्रीडा किंवा अन्य एखाद्या विशेष गाजत असलेल्या विषयावरही असेल.
मला खात्री आहे, दर सप्ताहाअंती किंवा पंधरवड्याअंती (जसे ठरेल तसे),
'या वेळी पाहुणा संपादक कोण आहे बरं? बघुया तरी त्याचा अग्रलेख वाचून!' अशी उत्सुकता तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना नक्कीच असेल अशी मला खात्री आहे. खूप मज येईल. काही चांगले वाचायला मिळेल! 
अर्थातच, दरवेळी संपादक बदलेल. म्हणजेच दरवेळी अग्रलेख लिहिणारी व्यक्ति ही त्या आठवड्यापुरती/पंधरवड्यापुरती मिपाची 'पाहुणा संपादक' असेल! 
अनवधानाने काही नांवे राहू शकतात परंतु,
चरुरंग, प्रियाली, चित्रा, मुक्तसुनीत, विकास, धनंजय, डॉ बिरुटे, देवकाका, विजूभाऊ, कोलबेर, नीलकांत, प्रकाश घाटपांडे, पिवळा डांबिस, इत्यादी...
या माझ्या मित्रमंडळींकडून मला खूप अपेक्षा आहेत. ताज्या सामाजिक व राजकीय विषयांवर याचं खूप चांगलं वाचन-चिंतन-मनन आहे असे माझे निरिक्षण आहे आणि म्हणूनच मी मुद्दामून या मंडळींची नांवे उद्घृत केली आहेत! यापैकी कुणालाही याबाबत व्यक्तिश: न लिहिता मी हा प्रस्ताव जाहीरपणे मांडत आहे. वरील नांवे आत्ता चटकन आठवली म्हणून मी लिहिली आहेत परंतु या मंडळींव्यतिरिक्तही जर कुणी एका सप्ताहाकरता अथवा पंधरवड्याकरता मिपाचा 'पाहुणा संपादक' होऊन छानसा अग्रलेख लिहायला तयार असेल तर त्याचेही स्वागतच आहे.
असो...
तर मंडळी, या प्रस्तावामागे मिपाकरता काहीतरी चांगलं करायचं मनात आहे, मिपा अधिकाधिक सर्वांगसुंदर बनवण्याचा विचार आहे. परंतु, हे काम अर्थातच माझ्या एकट्याचे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी व्यक्तिश: व्यक्तिचित्र, खादाडी, संगीत, टवाळक्या, माफक इष्कबाजी या विषयात रंगणारा मनुष्य आहे. माझ्या सामाजिक व राजकीय जाणिवा अग्रलेख लिहिण्याइतक्या समृद्ध नाहीत. तरीदेखील दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला एखाद्या पाहुणा संपादकाने छानसा अग्रलेख लिहून मिपा या संकेतस्थळाचे सौंदर्य वाढवावे असे मनापासून वाटते म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव!
बोला, करणार का मला या कामात मदत? स्वत:हून आळीपाळीने घेणार का अग्रलेख लिहिणार्या पाहुण्या संपादकाची जबाबदारी?
ज्या मंडळींची नांवे मी उद्घृत केली आहेत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत हे इथे खुल्या दिलाने नमूद करतो....
आपला,
(काही एक चांगलं काम करू पाहणारा) तात्या.
--
Not failure, but low aim is a crime..! 
आणिबाणी
प्रेषक विकास ( बुध, ०६/२५/२००८ - १०:०७) .२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. तेव्हढ्यात जेपींबद्द्लच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या मग अचानक निवडणूका जाहीर झाल्या आणि ठाण्यात अनेक सभा होऊ लागल्या. त्या सभांना लहान असून देखील घरच्यांबरोबर हजेरी लावलेली आठवते - ठळकपणे आठवतात त्या मॄणाल गोरे, सुब्रम्हण्यम स्वामी आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या सभा. त्यात सांगीतले गेलेले अत्याचार आणि दिसला कुठेतरी त्याविरुद्ध किमान मताच्या बळावर उभा राहीलेला सामान्य माणूस.
बघता बघता "गाय वासरू नका विसरू" म्हणणारी काँग्रेस काही काळ पडद्याआड गेली. अनेक ठिकाणी दिग्गज पडले त्यात राजनारायण समोर इंदिरा गांधी पडल्या तर संजय गांधी आणि चांडाळ चौकडी पण काही काळ नामशेष झाली... अर्थात दैव देते आणि कर्म नेते या उक्तिप्रमाणे जनता पार्टी आणि त्यातील सभासद उपपक्षांना लोकशाहीतील सत्ता झेपली नाही आणि बघता बघता खेळ खल्लास झाला!
नंतर परत आणिबाणी आली नाही आणि कुठेतरी दिसलेले सामान्यांचे बळ पण परत दिसले नाही. परीणामी राजकारण खराब होत गेले आणि सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला... एकीकडे पंजाब, एलटीटीइ , काश्मिर दहशतवाद तर दुसरीकडे इंदीरा गांधी, राजीव गांधी, यांच्या हत्येचे धक्के पचवले, नाणेनिधीचे संकट दूर केले, उपग्रह उडवले आणि अणूबाँब उडवले पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे...
थोडक्यात तत्कालीन आणिबाणी ही एका नेतॄत्वाला सत्ता टिकवण्यासाठी जाहीर करावी लागली. पण आज देश टिकवणे अथवा बळकट करण्यासाठी लागणारा सामाजीक क्षमतेचा किमान वरकरणी दिसणारा अभाव पाहीला तर आजची परीस्थिती ही खरी आणिबाणीची वाटते, असे म्हणले तर ते १००% बरोबर ठरणार नाही (निदान तशी आशा करतो) पण १००% चूक पण नाही अशी भिती वाटल्यास ती खोटी आहे का?
सैतानाची बाळे
प्रेषक हेरंब ( रवी, ०६/२२/२००८ - १०:११) .स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम.
एका भव्य ,गोलाकार ,सुसज्ज ,बंदिस्त जागेमधे सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स्' वा तत्सम नांवाचे गेम्स् खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते. दर वर्षी 'देश' बदलून मिळतो. तशी सगळ्याच खेळांत मजा येते. पण 'भारत' हा देश कधी हातांत येईल याची सगळे आतुरतेने वाट पहातात. कारण तिथल्या 'लोड' केलेल्या खेळांत जे वैविध्य आहे ते इतर कुठेच नाही यावर सर्व बाळांचे एकमत आहे. काम चालू असताना हळु आवाजांत एकमेकांशी बोलण्याची मुभा आहे. तिथे चाललेले हे कांही 'संवाद'!
बाळ १ : काय रे इतका कसला आनंद झालाय् ?, फारच आरोळ्या ठोकतो आहेस मगापासून .
बाळ २ : अरे या भारतावर खेळायला फारच मजा येतीये रे! मला तर एक कधी न संपणारा खेळ मिळाला आहे.
बाळ १ : कुठला रे ?
बाळ २ : हे बघ, आपल्या पूर्वजांच्या वेळी एवढी प्रगती झाली नव्हती. इथे बसून असं कांही करता यायचं नाही. तिथे जाऊन काम करावं लागायचं. वेळ बराच जायचा. त्यांत तेंव्हा तिथे 'देवाची माणसं फार होती, त्यामुळे सगळ्यांची मनं काबीज नाही करता यायची. हिंसाचार, दंगली चालू केल्या तरी फार काळ टिकवता यायच्या नाहीत. ती दुष्ट देवाची माणसं आपला खेळ बंद पाडायची. आता कित्ती सोपं झालंय, इथे बसून या कठपुतळ्या हलवता येतात आणि त्यांची मनं काबीज करणं किती सोप्पं झालाय्!
बाळ १ : पण ते सगळीकडेच करता येताय्, बघ नं, मला अमेरिकेत पण खूप मजा येतीये.
बाळ २ : अरे, मला तर एक न संपणारी ' गोष्टच मिळालीये! तिथे आता माणसांची इतकी गर्दी झालीये की त्या रिकामटेकड्यांच्या धार्मिक, प्रादेशिक भावनांना हात घालणं आगदीच सोपं झालाय्.
बाळ १ : ते कसं ?
बाळ २ : हे बघ, मी तो जुना दोन धर्मांचा खेळ खेळून बोअर झालो होतो, त्यापेक्षा हा नवीन जातींवरचा खेळ फारच छान आहे. एका वेळेला एका जातीला पेटवायचं, नुसतं त्यांच्या नेत्यावर 'टिचकी' मारली की ती सगळी 'कौम' स्वयंचलित' होते. मग ते आपोआप रेल्वेचे रुळ उखडतात, तोडफोड करतात, नंग्या तलवारी घेऊन फिरतात. साहेबांना मानायला पाहिजे हं, काय जबरदस्त रचलाय हा खेळ त्यांनी, आपलं कसब दाखवायला भरपूर वाव आहे. शिवाय वैविध्य किती! एका जातीला महिनाभर खेळवलं की दुसरी! महिने बारा पण जाती अगणित.
बाळ १ : पण काय रे, ते सरकारी लोक काय नुसते बघत रहातात? त्यांत पण 'देवाची माणसं असतीलच की.
बाळ २ : छे रे, तोच तर हल्ली आपल्या साहेबांना फायदा आहे. तिथे पण सगळी आपलीच 'प्यादी' आहेत, ती आपल्या साहेबांशी एकनिष्ठ आहेत. आणि त्यातून त्यांनी कांही उपाय केले की आपण इकडे नवीन 'कौम' वर टिचकी मारायची.
बाळ १ : पण तरी देवाची खूप माणसं खाली आहेत ना ?
बाळ २ : हो, पण ती आता फारसं काही करु शकत नाहीत. ती कधी ही सत्तेवर येणार नाहीत याची तजवीज आपल्या साहेबांनी आधीच करुन ठेवलीये.
बाळ १ : अरे वा, मग आपला विजय आणि देवांचा दणदणीत पराभव आता नक्कीच की!
बाळ ३ : ए, गपा रे, मला या 'पाकिस्तानात' पण तेवढीच मजा येतीये.
बाळ ४ : हं, बघू या , यावर्षीचा 'महाविध्वंसक' चा कप कोणाला मिळतोय ते !
बाळ ५ : शू s s s s, शांतता , सैतानसाहेब येताहेत !!!
**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****
प्रेषक छोटा डॉन ( गुरू, ०६/१२/२००८ - ०२:३१) .ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....
आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत. पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?
यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!
मिपावरच्या मान्यवर व अभ्यासु जनांचे "इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता" याबद्दल काय मत आहे जाणून घ्यायला मला आवडेल ...
गुज्जर आंदोलन
प्रेषक हेरंब ( शनी, ०५/३१/२००८ - २०:०६) .आपण सर्व गेले ९-१० दिवस या आंदोलनाबद्दल वाचतो आहोत. एक समाज सगळ्या देशाला वेठीवर धरुन आहे, कोणी कांही करु शकत नाही. आज आठ दिवस दिल्ली -मुंबई रस्ता व रेल्वे विस्कळीत झाली आहे. अनेक लोक उत्तरेकडे अडकले आहेत. लोकांच्या हालांना पारावार राहिला नाही.
मतांसाठी सर्व लाचार पक्ष मूग गिळून बसले आहेत.
या आणि अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा नुसता निषेध करुन चालणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्या प्रत्येक व्यक्तिला सरकारने 'अतिरेकी' मानून त्यानुसार कारवाई केली पाहिजे.
निर्लज्ज गृहमंत्री
प्रेषक अन्या दातार ( गुरू, ०५/२९/२००८ - ०२:३३) .आपल्या माननीय गृहमंत्र्यांनी काय अकलेचे तारे तोडले आहेत ते बघाच. हा नक्की कुठल्या देशाचा गृहमंत्री आहे तेच कळत नाही. खालील दुवा वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3078229.cms
हे राजनेते सत्तेने इतके लाचार झाले आहेत की ते ज्यांच्यासाठी राबणे अपेक्षित आहे ते काम करतच नाहीएत असे दिसते.
भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...
प्रेषक ॐकार ( बुध, ०५/२८/२००८ - १४:३७) .शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'
उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.
अनादि मी अनंत मी...
प्रेषक विकास ( बुध, ०५/२८/२००८ - ०७:३१) .अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारील रिपू जगती असा कवण जन्मला...
असे म्हणणार्या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.
त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे: (ती वाचताना एकच गोष्ट खटकली, ती म्हणजे म.टा./बातमीदाराने त्या प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अथवा समानार्थी दिलेला प्रतिशब्द/अर्थ)
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
प्राध्यापक (प्रोफेसर)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
परीक्षक (एक्झामिनर)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
रंगपंचमी (उत्तरार्ध)
प्रेषक बट्ट्याबोळ ( मंगळ, ०५/१३/२००८ - ०२:३४) .(पात्र व घटना काल्पनीक)
रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच.
इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून. आज कसेरंग खेळयचे हे त्याने आधीच ठरवलेल होत. तसे खीशात ३०-३५ रुपयांचे रंग आणले होते.२ दिवसापुर्वीच त्याने कटींग केली होती. केसं कलर पण केली होती थोडी. २ महिन्यांपुर्वी इशल्या बरोबर जिम स्टार्ट करून थोडी बॉडीबिल्डिंग केली होती. गेल्या वेळी पोरांनी उचलून हौदात टाकला होता त्याला ... य धूतला होता !! यंदा तो सावध होता. आजचे कपडे पन आधीच ठरवलेले होते.बॉडी दिसेल याची काळजी त्याने घेतली होती. फ़ुल्ल आवरून आला होता तो.(पावडर पण लावली होती थोडी).
तेवढ्यात मागून त्याची आई आली आणि आपल्या निरमा आणि नारळाच्या काथ्यांनी भांडी घासून खरखरीत झालेल्या हाताने र्हावल्याला फाडदिशी ओढली. त्याचे कान गरम झाले.
"पयला घरी चल ह्यंद्र्या .... इचकट कार्ट .... सणावारी भांडण करतय"
"हात्तीच्यायला कसली वोढली ... लय बेक्कार .. ह्यॆ ह्यॆ ह्यॆ" .. कोणीतरी आपले reflexes दाखवले.आणखी ४-५ पोट्टी हसली. र्हावल्या ला आयशी चा लय राग आला.
"दद्या ला सांग ... आईवरून शिवी दिली त्याने मला" .... दादा .. सख्खा भाऊ !!
इतक्यात इकडे रंगपंचमीचा एकच गलका उडाला. धडाक्यात सगळ्यांनी एकमेकांना रंगवायला सुरुवातकेली. सर्वांच्या मनात "मी पन आन्नाला लावनार ... आ !" अशी प्रेमभावना दाटली. प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढनार" .. अस तर त्या मायेला वाटल नसेलना !! सत्या ने रंग लावल्यावर अन्ना ने त्याला मिठी मारली. सत्या पुन्हा लाडात. पिच्या ला खुपलं हे, पण त्यानेदु:ख गिळून टाकल. आन्ना नंतर दोन काची ची दोन बोट त्याने Mercedes (बरं एस्टीम ... खूश ??)ला पण लावली. इशल्या-गन्या गॆंग ने नेहेमी प्रमाणे अक्रस्ताळेपणा आणि अगाचोरपणा सुरू केला. शेट्टी रंगल्यावर फ़ार ओंगळ दिसत होता (च्ययला आपण बरे दिऊन काय दिवे लावले ... किमान त्याची .. असो.)
... तर रंगपंचमी थाटात साजरी झाली.
(समाप्त)
मी जर हा असतो तर : भाग २
प्रेषक छोटा डॉन ( शनी, ०५/१०/२००८ - १५:३८) .ह्यावेळी मी मिपा कुटुंबियांवर लिहणार नसून एकंदरीत सामाजीक परिस्थीतीवर आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींवर लिहणार आहे...
मी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,
मी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.
महात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.
राहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.
सत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो ....
मी जर राहुल गांधी असतो तर,
पहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.
गांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता.
झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.
दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
स्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.
स्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते.
मी जर भाजपा नेता असतो तर,
मी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.
उठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.
विरोधी पक्षाची भुमीका नुसती "विरोधासाठी विरोध " अशी नसते हे समजावून घेतले असते.
पुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना सामोरे गेलो असतो.
पराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...
मी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,
महाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.
पक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.
गडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.
मिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी "जातीच्या आधारे पक्ष" काढण्याबद्दल हालचाल केली नसती.
मी जर लालू प्रसाद यादव असतो तर,
उठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा "जोकर" कशामुळे झाली याचा विचार केला असता.
"राज ठाकरे" यांच्या घरासमोर "छटपुजा" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेता येईल यांसंबंधी विचार केला असता.
येवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची "गोपालनशाळा" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.
राज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर "ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात ?" याचा विचार केला असता ....
मी जर अबु आझमी असतो तर,
राज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते.
आपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.
परिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते.
मी जर अमरसिंग असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.
त्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.
उत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता. कधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून "मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो " ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.
थोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.
मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
वर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.
शिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता येईल हे पाहिले असते.
शक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते.
मी जर देवेगौडा असतो तर,
कोलांट्याउड्या मारण्यामध्ये आपला एक नवा जागतीक विक्रम झाला आहे असे गिनीस बूक वाल्यांना कळवले असते व त्याची सगळीकडे जहिरात केली असती.
सध्या होणाऱ्या निवडणूकात पण ह्या विक्रमाच्या आधारे मते मागितली असती.
आम्हाला स्थिर सरकार द्या म्हणणाऱ्या लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या "विधानसौधेवरून" फेकून दिले असते.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात "राईस सांबार" विकण्याचे दुकान काढले असते व शेजारी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामीला कॉफी व सिगारेट विकायची टपरी काधून दिली असती व दिवसभर गल्ल्यावर "फक्त कन्नड गाणी " ऐकत झोपा काढल्या असत्या.
मी जर कुमार केतकर असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीच्या चापलूस गटाचे कायदेशीर सदस्यत्व घेतले आस्ते.
आपण जे मुर्खासारखी विधाने करतो अथवा लेख लिहतो त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला लागलेला "म्हातारचळ" आहे का याचा विचार केला असता.
आपण खरेच निरपेक्षपणे लिहू शकत नाही हे ओळखून वर्तमानपत्राच्या सम्पादकपदाचा राजीनामा दिला असता.
कुठल्या संभेलना बोलावल्यास तेथे जाउन, आयोजकांबरोबर भांडणे काढून, कुढल्या जातीवर टीका करुन स्वताला पळून जायची वेळ येउ दिली नसती ...
लोक आपल्याला सुमार केतकर का म्हणतात याचाही अभ्यास केला असता.
मी जर संजय राउत असतो तर,
सामना हे फक्त शिवसेनेच्या बातम्याला वाहून घेतलेले वृत्तपत्र नव्हे हे दाखवून दिले असते.
ह्या गोष्तीमुळे आपल्या वर्तमानपत्राची प्रतिमा संध्यानंदसारखी होत आहे याची काळजी केली असती.
मराठी माणसाचे हित लक्षात घेउन राजच्या सभेचा पानभर वृत्तांत दिला असता.
दररोज शिवसेनेच्या विजयाबद्दल व विरोधकांच्या पराभवाबद्दल देमार बातम्या देउन स्वताचे हसे करून घेतले नसते.
एकेकाळी सामना हा मराठी माणसाचा मानबिंदु होता याची आठवण ठेवली असती ....
मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ. ] असतो तर,
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ...
