विरंगुळा
अढळपद
प्रेषक JAGOMOHANPYARE ( शुक्र, 03/12/2010 - 19:04) .************* अढळपद ************
'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?'
हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं.
पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?'
'गोष्टी वाचत बसले होते. रात्री सायली जेवणापूर्वी गोष्टीचा हट्ट धरणारच. तिचे आई वडील दिवसभराच्या लगबगीने दमलेले असणार. तुम्ही इथे कॉटवर आडवे. मग गोष्ट सांगणार कोण माझ्याशिवाय? सांगते बापडी- येईल तशी- वेडीवाकडी.'
'वेडीवाकडी?' शामराव हसत म्हणाले, 'तुमची गोष्ट, आणि वेडीवाकडी?' अहो, सायलीच काय आम्हीसुद्धा सगळे ऐकत असतो. तुम्ही खरंच गोष्ट छान सांगता. रामाची असू दे- कृष्णाची असू दे- टिळकांची किंवा इंदिरा गांधींची असू दे- मला जर आधीच माहीत असतं, तुम्ही गोष्ट एवढी छान सांगता, तर मीसुद्धा रोज रात्री हट्ट केला असता- गोष्ट ऐकण्यासाठी..'
'इश्श! काहीतरीच तुमचं आपलं!'
'नाही हो. खरंच सांगतोय. तुम्ही गोष्ट सांगता ना तेंव्हा सगळं विसरायला होतं. हा दमा -घरच्या कटकटी-हे परावलंबी जीणं... सगळंसगळं विसरायला होतं बघा.... ' खोकल्याची उबळ पुन्हा आल्यामुळे शामराव बोलायचे थांबले. शांताबाईंनी त्याना पाणी प्यायला दिलं. खोकला थांबल्याचं दिसताच त्या उठल्या.
'चहा आणते तुमच्यासाठी,' त्या उठल्या.
'आणा थोडासा. पण दूध मात्र जपून वापरा बरं. संध्याकाळ आता होईलच. ते दोघे आल्यावर परत काही गोंधळ नको व्हायला.'
शांताबाई किचनकडे वळल्या. गेल्या आठवड्यातील ती घटना आठवून त्या थोड्या अस्वस्थ झाल्या. गेल्या आठवड्यात एक दिवस संध्याकाळी त्यांनी शामरावांना असाच चहा करुन दिला होता. नेमकं त्याच दिवशी सुरेश ऑफिसमधून येताना चार मित्राना घेऊन आला. थोड्या वेळाने सुनितापण आली. कॉफी करायला म्हणून किचनमध्ये गेली , तर दूध कुठे होतं? आयत्यावेळी शांताबाईनाच पळापळ करुन खालून बेकरीमधून दूध आणावं लागलं. एवढ्याश्या दुधाचं प्रकरण- पण नंतर घरात गोंधळ व्हायचा तो झालाच.
'किती परावलंबी जीणं झालंय आपलं. छोट्या छोट्या गोष्टींवरसुद्धा आपली सत्ता राहिलेली नाही. ' शांताबाई चहा करता करता विचार करत होत्या. त्यानी चहा केला. शामरावाना दिला. चहा घेताच त्यना जरा बरं वाटलं. 'अहो, किती करताय माझ्यासाठी.' ते शांताबाईना म्हणाले. ' माझं आजारपण, मुलाचा अलिप्तपणा, सुनेची धुसफूस कसं सोसता हे सगळं?' शांताबाई गप्पच होत्या. पण मनात खोल्वर ढवळाढवळ व्हायला सुरुवात झालेली होती...
'तुम्ही आहात म्हणून मी....'
'आता काही बोलू नका. शांतपणाने विश्रांती घ्या.' शांताबाई शामरावाना म्हणाल्या,'संध्याकाळ होईलच इतक्यात. मी जरा बाहेर जाऊन येते. देवळात जायचं आहे. तुमची औषधेपण आणायची आहेत.'
सगळं आवरून शांताबाई बाहेर पडल्या. संध्याकाळी पाय मोकळे केले की त्यांना थोडं बरं वाटायचं. पण आज मात्र त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. मनात काहीतरी सलत होतं. पण नेमकं काय सलतय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.
कॉर्नरवरच्या फोनबूथजवळ त्या पोहोचल्या आणि थबकल्याच. बूथशेजारचा गाळा गेले कित्येक दिवस बंदच होता. पण आज तो उघडलेला दिसत होता. आत नवं कोरं काउंटर होतं. त्याच्या आत मोठ्ठाली कपाटं. दारासमोर थोडी गर्दी होती. समोरच्या बाजूला तोरणं आणि फुलांच्या माळा लटकलेल्या होत्या.
नवीनच निघालं वाटतं हे! चष्मा सावरत शांताबाई दुकानावरचा बोर्ड वाचू लागल्या. 'अभिनव मेडिकल्स'
'बरं झालं. घराजवळ नवीन मेडिकल निघालं ते..'
'ओ आज्जीबाई! मध्येच कुठे उभ्या राहिलात? सरका बाजूला. तिथं खुर्च्या मांडायच्या आहेत.' एक मुलगा शांताबाईंवर खेकसला. शांताबाई ओशाळत बाजूला झाल्या. तो मुलगा त्यांच्याजवळ आला. तिथं मध्येच एक मोठा दगड पडलेला होता. पायाने ढकलत तो मुलगा तो दगड बाजूला करु लागला. पायानं ढकलला जाणारा दगड शांताबाईनी पाहिला आणि त्यांच्या मनात कच्चकन काटा रुतला.
रस्त्यावर धुळीत पडलेला दगड- सर्वांच्याकडून लाथाडला जातो. त्याला ना स्वतंचं स्वतंत्र आस्तित्व असतं- ना स्वतःची एक जागा. आपलं तरी कुठं वेगळं आहे? मुलगा-सून्-परिस्थिती-सगळ्यांच्याकडून लाथा खाणं सुरु आहे... मनातला नेमका सल त्यांच्या लक्षात आला आणि त्या अधिकच अस्वस्थ झाल्या.
ना घरामध्ये आपल्याला स्वतंत्र आस्तित्व.. ना समाजामध्ये एक स्थान...
उदघाटनासाठी सजवलेलं नवं कोरं दुकान्-नटून थटून आलेले निमंत्रित.. या भाऊगर्दीत त्यांना एकदम परक्यासारखं वाटू लागलं आणि त्या झपाझप देवळाच्या दिशेने चालू लागल्या. चालत चालत त्या देवळापर्यंत पोहोचल्या. बागेतल्या कृष्णाचं देऊळ्-हे त्यांचं नेहमीचं ठिकाण होतं. देऊळ तसं फार मोठ्ठं नव्हतं. लहानसं पण सुबक होतं- नव्या पद्धतीचं. एक छोटासा मंडप. -त्याच्यासमोर बंदिस्त गाभारा. गाभार्यात मुरलीधर श्रीकृष्णाची काळ्या पाषाणाची मूर्ती होती. मूर्तीच्या पायाजवळ भाविकानी टाकलेल्या फुलांचा ढीग असायचा. मूर्तीच्या सौंदर्यासमोर आपली हार मानून फुलानीच मूर्तीच्या पायाजवळ रहाणं मान्य केलं असावं- असंच प्रत्येकाला वाटायचं.
शांताबाई देवासमोर उभ्या राहिल्या. डोळे मिटले. मनोभावे हात जोडले. क्षणभर मनात विचारांचा उद्रेक झाला. अशांत अस्वस्थ विचार मनाच्या खोल डोहातून वर येऊन उसळी मारू लागले. दु:ख वेदनांचे आवेग गरगरू लागले. हृदय धडधडू लागलं. कृष्णा... केशवा.. नारायणा... अंतर्मन आर्तपणे साद घालू लागलं आणि गढूळ पाण्यात तुरटीचा स्फटिक फिरावा तसा चमत्कार झाला. विचारांचा एकेक कण तळाशी बसू लागला. अंतर्मनाचं पाणी स्वच्छ आणि नितळ होऊ लागलं. आनंदमय लहरींचा मनोहारी नृत्यखेळ सुरु झाला.
ठण्ण!
घंटचा नाद कानात घुमला आणि शांताबाई भानावर आल्या. त्यांनी मागं पाहिलं. कुणीतरी एक भाविक उभा होता. शांताबाई मंडपाच्या बाहेर आल्या. देवळासमोर एक छोटीशी बाग होती. सभोवती हिरवंगार गवत. लहानमोठी झुडपं आणि फुलझाडं. बागेतल्या एका बाकावर शांताबाई विसावल्या. संध्याकाळी देवळात भक्तीगीतं लागायची. एखाददुसरं गाणं ऐकलं की त्याना बरं वाटायचं. रात्र पडू लागली की गाणी बंद व्हायची. आरती व्हायची. पण आरतीसाठी शांताबाई बहुधा थांबत नसायच्या. एखादं भक्तीगीत ऐकून त्या नेहमी उठायच्या. पण आज त्यांचं कशाकडेच लक्ष लागत नव्हतं. मधाशी-क्षणभरासाठी अनुभवलं, ते काय होतं? त्या विचार करत होत्या. स्वच्छ निळाशार समुद्र- त्या आनंदलहरी - हे सगळं कुठं आहे? आपल्या डोळ्यात?
अं हं. मग आपल्या मनात?
मग इतके दिवस हे का दिसलं नाही? तो निळाशार रंग त्यांना आठवला आणि त्या भावविभोर झाल्या. वार्याची एक मंद झुळुक आली आणि अंगावरती मोरपीस फिरावं तसं त्यांना वाटलं. नजरेमध्ये पंचप्राण आणि पंचेन्द्रिये गोळा झाली. शरीराचं धुकंधुकं होऊ लागलं. केशवा.. नारायणा.. एक साद मनामध्ये घुमली . ज्योतीनं तेजाकडे आकर्षित व्हावं, निर्झरानं समुद्रात समर्पित व्हावं-तशी दिव्य भावना त्यांच्या मनात जागी होऊ लागली. निर्झर आणि समुद्र यांचा संवाद सुरु झाला, संवाद्-पण नि:शब्द.
शब्देविण संवादु/दुजेवीण अनुवादू//
हे तव कैसे निगमे/परेही परते//
बोलणे खुंटले/विखरी कैसेनी सांगे//
शब्द मुके झाले. उरल्या फक्त आनंदलहरी. निळ्याशार पाण्यामधून तेजाचा एक प्रचंड लोळ बाहेर आला. सूर्यासारखा तेजस्वी तरीही चंद्रासारखा शीतल. शांताबाई भान हरपून पहात होत्या. चंदनाचा मंद गंध सगळीकडे दरवळला . मुरलीचे स्वर कानात घुमले आणि शांताबाईंचं भान हरपलं. अतीव आनंदाने त्यानी डोळे मिटले.
डोळे उघडले. समोर पाहिलं. आणि त्याना आश्चर्याचा धक्का बसला. समोर साक्षात विष्णु भगवान्-नारायण उभे होते. शांताबाईंच्या तोंडून क्षणभर शब्द फुटले नाहीत. मग अस्फुटपणे त्या म्हणाल्या..'देवा, तुम्ही!' नारायण मंदपणे हसले. 'होय, तुमची आर्त हाक ऐकली आणि राहवलं नाही. बोला, काय हवंय?' शांताबाई गोंधळल्या. काय मागायचं? दीर्घायुष्य्-संपत्ती-अपार वैभव.... काय मागायचं? त्याना प्रश्न पडला. घरातलं परावलंबी जीणं-लाथा खाणारा दगड्-सगळं गर्रकन त्यांच्या नजरेसमोर फिरलं. भांबावलेल्या नजरेनं त्यांनी वर पाहिलं. अढळ-निश्चळ ध्रुवतारा-त्यानी पाहिला आणि त्या उद्गारल्या. 'देवा, मला अढळपद दे. अशी जागा - जिथून मला कुणीही हलवू शकणार नाही. तिथं वर ...आकाशात.'
वर पहात नारायण प्रश्नार्थक मुद्रेनं म्हणाले..'तिथं? वर? आकाशात?'
'होय. सगळ्या विवंचनेतून, जाचातून सुटका तरी होईल.'
'जाच विवंचना या तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. त्याला क्म्टाळून प्रत्येकजण जर आभाळात तारा होऊन बसायला लागला तर सगळं आभाळ चांदण्यांनीच गच्च भरून जाईल आणि सगळी पृथ्वी ओस पडेल.'
'मग-धृवाला कसं अढळपद दिलं..आकाशात?' शांताबाईंनी विचारलं. नारायण मंदपणे हसले आणि म्हणाले,'मी धृवाला अढळपद दिलंय ते माझ्या मनात..लोकांच्या मनात . इथं आकाशात नव्हे. आपली निरागसता-जिद्द्-तपश्चर्या यांच्या बळावर धृवानं अढळपद मिळवलय ते आपल्या सर्वांच्या मनात. तेच खरं अढळपद.' शांताबाईंना ते पटलं. पण तरीही ते स्वीकारणं त्यांना जड जात होतं. निराश स्वरात त्या म्हणाल्या,' मग माझं अढळपद कुठं आहे?' त्यांचा प्रश्न तसाच राहिला. भगवंतांच्या चेहर्यावर मंद स्मित तरळत होतं. रामाचं गूढ , पावक हास्य आणि कृष्णाचं खट्याळ हसणं या दोघांचं मिश्रण त्या हास्यात होतं. शांताबाई त्या हसण्याचा अर्थ लावू पहात होत्या आणि अचानक सगळं धूसर झालं. भगवंतांचा निळा रंग-निळंशार पाणी-आकाशाची निळाई सगळं एकरूप होऊन गेलं.
आता कोठे धावे मन/
तुज चरण देखिलिया//
देवळातून अभंगवाणीचे स्वर कानात पडले आणि शांताबाई भानावर आल्या. भगवंतांचं दर्शन झालं- या आननंदात पं. भीमसेन स्वर आळवत होते. पण शांताबाई बेचैन झाल्या होत्या. आयुष्याचं सार हातात येता येता अचानक हातून निसटून जावं, तसं त्याना वाटत होतं. संध्याकाळ काजळू लागलेली होती. शांताबाई अस्वस्थपणे घरी निघाल्या.
चालत्चालत कॉर्नरच्या बूथपर्यंत त्या आल्या. नवीन दुकान प्रकाशानं उजळून निघालेलं होतं. मघासचा प्रसंग त्याना आठवला आणि त्या दुर्लक्ष करुन घराकडे निघाल्या. तेवढ्यात फोनबूथवाल्या माणसानं त्याना हाक मारली,' आज्जी, पलीकडच्या दुकानाचं आताच उद्घाटन झालंय. तीर्थप्रसाद घेऊन जा.'
मनार थोडं दडपण घेऊनच शांताबाई दुकानात गेल्या. त्यांनी देवदर्शन घेतलं. तीर्थप्रसाद घेतला. जवळच्या कोपर्यात त्यांचं लक्ष गेलं आणि त्या क्षणभर हसल्या. तोच दगड. शूचिर्भूत होऊन, हळद कुंकवाचे टिळे लेवून तो दगड कोपर्यात विसावलेला होता. बहुधा नारळ फोडण्यासाठी त्याचा वापर झाला असावा. त्याच-संध्याकाळच्या मुलानं- त्यांना सरबत दिलं. सरबत पिऊन झाल्यावर शांताबाईंनी पर्स उघडली. एक चिठ्ठी बाहेर काढली आणि मालकाला दाखवत त्या म्हणाल्या,' ही औषधं हवी होती. द्याल काय?' त्यानं चिठ्ठी पाहिली. त्याप्रमाणे औषधे काउंटरवर ठेवली. शांताबाईंना नाव विचारलं आणि बिल करताना तो म्हणाला,'दुकानाचं औपचारिक उद्घाटन मघाशी झालं. पण तुम्ही 'खर्या' उद्घाटक. पहिल्या ग्राहक.' आजूबाजूची माणसं शांताबाईंकडे कौतुकाने बघत होती. त्यांनी बिल दिलं, कॅरीबॅग घेतली आणि औषधं घेऊन त्या बाहेर पडल्या.
घराकडे निघाल्या. अंधार पडायला लागला. जायला हवं. याना औषधं द्यायला हवीत. सायलीला गोष्टपण सांगायची आहे.. आज्जीची गोष्ट ऐकल्याशिवाय पोर जेवणार नाही... आणि, अचानक त्या थबकल्या.
'तुम्ही आहात म्हणून मी आहे.' शामरावांचा चेहरा त्यांच्या कानात गुणगुणला. 'गोष्ट सांगायची तर आज्जीनंच!' सायलीचे चिमणे पण हट्टी बोल त्यांच्या कानात शिरले आणि शांताबाईंना गहिवरून आलं.
;ह्यांच्या' मनात असलेलं आपलं स्थान... सायलीच्या चिमुकल्या मनात असणारं गोष्ट सांगणार्या आज्जीचं स्थान... हे काय? अढळपदच की! शांताबाईंच्या मनात लख्ख उजेड पडला. भराभरा चालत त्या अपार्टमेंटच्याजवळ आल्या. खाली जिन्याजवळ जोश्यांचा अमित खेळत बसलेला होता. त्यांच्याकडे बघून तो हसला. त्याचं गोड हसणं....
कुठं बरं हे गोड हसणं पाहिलं आपण? शांताबाई विचार करत होत्या, तेवढ्यात तो म्हणाला... 'सायलीच्या आज्जी , उद्या संध्याकाळी आमच्या घरी याल काय? उद्या माझा वाढदिवस आहे. माझे सगळे मित्र येणार आहेत आणि आम्हाला तुमची गोष्ट ऐकायची आहे.. सायली सारखी ऐकत असते तुमच्याबद्दल... याल ना?'
शांताबाईंनी मानेनेचं होय म्हणून सांगितलं. अमित पुन्हा हसला. तेच निरागस हास्य.. आपण कुठं पाहिलं होतं, ते शांताबाईंना आठवलं आणि त्या एकेक पायरी चढू लागल्या.
त्यांच्या मनावर अतीव सुखाचं प्रचंड ओझं होतं. पण तरीसुद्धा त्यांना मोरपिसासारखं हलकंहलकं वाटत होतं. आनंदसोपानाच्या एकेक पायर्या चढत त्या वरवर जात होत्या. आज त्या खूपच आनंदात होत्या. कारण सायलीला आज त्या धृवबाळाची गोष्ट सांगणार होत्या!
**********************************************
उत्तमकथा, २००३ मधील एका अंकात पूर्वप्रसिद्धी.
सव्यसाचि
प्रेषक परिकथेतील राजकुमार ( शुक्र, 03/12/2010 - 11:27) .डॉन का इंतजार तो ११ मुल्को की पोलिस कर रही है, पर डॉन को पकडना मुष्कील हि नही नामुंकीन है !!
पडद्यावर शाहरुख खान घसा ताणुन बोलत होता आणी मी इकडे खदखदुन हसत होतो. च्यायला हसु नको तर काय करु ? निदान ११ मुल्कोकी पुलिसला आपण शाहरुखच्या मागे आहोत हे तरी माहिती होते .... इथे सी आय ए पासुन एफ बी आय आणी मोसाद पर्यंतच्या माणसांना 'लिट (l33t)' नक्की कोण आहे ह्याचा थांगपत्ता देखील न लागु देणारा मी, मस्तपैक्की शेरिफ रॉजर बरोबर शाहरुखच्या डब चित्रपटाचा अनंद घेत होतो.
येस... आय एम l33t. महाराष्ट्र बॅंकेच्या सर्वर हॅकींग पासून सुरुवात करुन फेडरल बॅंकेच्या सर्वर पर्यंत पोचलेला. एफ बि आय च्या स्पाय कॅमेर्यांना १८० डिग्रीमध्ये वळवुन बंद पाडणारा, नासाच्या लॅब मध्ये इमर्जन्सी सायरन वाजवणारा आणी कधीही केंव्हाही कुठेही बसुन कोणाच्या खात्यातले पैसे जादुने गायब करणारा सध्याचा बहुचर्चित हॅकर आणी डिस्ट्रॉयर. पापांची यादी करावी तेवढी कमी, लुटमारीचा हिशोब लावावा तेवढा थोडा. खरच गंमत वाटते सगळ्याची, अगदी "कोण होतास तु काय झालास तु.." अशीच कहाणी आहे माझी. एका साध्या मध्यमवर्गीय घरात माझा जन्म झाला. घरात आई-वडील दोघेही सुशिक्षीत, त्यांच्या काळत त्यांना जे जे मिळु शकले नाही ते ते मला द्यायचा त्यांनी प्रामाणीकपणे प्रयत्न केला. पुस्तक, वही, सायकल ह्या सारख्या गोष्टींसाठी कधिच हट्ट करावा लागला नाही, न मागताच (पण योग्य वेळी) सर्व काही मिळत गेले.
साधारण अकरावीला असतानाच मला संगणकाने झपाटुन टाकले. २ दिवसातुन एकदा तरी सायबर कॅफेत गेल्याशिवाय जीवाला चैन पडेनासे झाले. पॉर्न साईट्स आणी गेमस साठी कॅफेच्या वार्या करणारी पावले बारावीच्या मध्यापर्यंत इ-मेल, ट्युटोरीयल्स आणी कोडींग साठी कॅफे वार्या करायला लागली. बारावीच्या सुट्टीमध्ये जगात अनेक उपयोगी सॉफ्टवेअर्स उपल्ब्ध आहेत पण ती सर्व विकत घ्यावी लागतात ह्या माहितीची भर माझ्या ज्ञानात पडली. बारावीचा निकाल लागेपर्यंत हि विकतची सॉफ्टवेअर्स थोडे परिश्रम घेउन फुकटची बनवता येतात ह्या अमुल्य ज्ञानाची देखील भर पडली. बरोब्बर, मी सॉफ्टवेअर क्रॅकिंगबद्दलच बोलत आहे.
बारावीचा निकाल लागला आणी आमच्या इच्छेनुसार तिर्थरुपांनी इंजिनिअरींगला प्रवेश घ्यायचे परवानगी दिली. 'आंधळा मागतो एक' अशी अगदी अवस्था झाली माझी. अलिबाबाची गुहा आता ऑफिशियली माझ्यासाठी उघडी झाली होती. दिवसाचे १२/१२ तास आता मी अभ्यासाच्या नावाखाली संगणकावर घालवु लागलो. जावा, सी, सी प्लस प्लस च्या जोडीला हॅकींग , स्पॅमींग आणी कोडींगनी मला खुळावुन सोडले.
साधारण इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाच्या मध्यापर्यंत प्रिन्स, अल्लादीन सारख्या गेमसचे कोडींग बदलणे, न खेळताच लेव्हल अप करणे आणी थोड्या वाढीव कष्टानी मेल फ्लड करण्यापर्यंत माझी प्रगती झाली. ह्याच काळात माझी IRC CHAT शी ओळख झाली आणी माझ्यासाठी डी-डॉस, बॉट नेट, सर्व्हर पिंगींग, प्रॉक्सी, प्रॉक्सी-फ्लड सारखी दालने खुली झाली. काय करु आणी काय नको असे होउन गेले होते. टप्प्याटप्प्यानी ह्या एकेका गोष्टीवर मी माझे प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. काम येवढे सोपे न्हवते पण मी जिद्दीला पेटलो होतो. हि जिद्द मी वाईट मार्गासाठी खर्च केली असे मला आजही वाटत नाही.
इंजिनिअरींगचे दुसरे वर्ष संपेतो मी एक फ्लडर म्हणुन बरीच प्रगती केली होती. चांगले चांगले चाट सर्वर झोपवण्यापर्यंत आता मजल जाउ लागली होती. ह्याच काळात मी माझा स्वत:चा पहिला याहु चाट बॉट बनवला. काही काळ ह्या माझ्या बॉटनी याहु रुम्स मध्ये चांगलाच हाहाकार माजवला होता. यथावकाश ह्या बॉटला बॅनचे तोंड पहावे लागले. पण ह्या सगळ्या काळात माझ्या बॉटला मिळालेली प्रसिद्धी, बॉटच्या निर्मात्या विषयी उठलेल्या अफवा माझी मस्त करमणुक करुन गेल्या. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी आता वेबसाइट क्रॅश करणे, इ-मेल हॅकींग ह्याकडे आकृष्ट झालो.
१ एप्रिल २००३, हा दिवस मला आजही चांगला आठवतो. ह्याच दिवसानी माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण लावले. याहु रुम मध्ये 'एप्रिल व्हायरस' स्प्रेड करत असतानाच माझ्या संगणकावरचे नोटपॅड आपोआप ओपन झाले, आणी छान पैकी लिहुन आले "Stop Playing ARound KID". KING.
(क्रमशः)
बतावणी!
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 03/12/2010 - 00:54) .(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल.
एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय!
टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.)
(आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!!
लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता?
(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे?
अं...आँ....कोण कुठे?
अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी?
हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते!
मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले?
मला काय माहीत? मी नेऊ का विचारलं तर फक्त हातानेच नको अशी खूण केली!
(कानाशी आयफोन लावत) लक्ष्मी : छ्या..मोबाईलही ऑफ करुन ठेवलाय!! मेसेजवर जातोय!!! कसं शोधायचं आता कोण जाणे? काही शिस्तच राहिली नाहीये! जाऊ दे मेलं, मी आता नाष्टा करुन घेते नाहीतर आणखीन कलकलतं मग!! (आत जाते)
नारद (महालात प्रवेश करत) : नारायण! नाऽरायण!!
गरुड : या या मुनिवर! आज सकाळीच येणं?
लक्ष्मी लगबगीनं बाहेर येत (हातात धिरड्याची प्लेट) : यावं मुनिवर. आसन ग्रहण करा आणि मग हे धिरडंही!
नारद (काऊचवर बसत) : वा वा! देवी, आपण भलत्याच सुग्रण आहात, काय खमंग वास सुटलाय धिरड्याचा! वा!!
(धिरडं खात) नारद : कुठे आहेत तुमचे हे?
लक्ष्मी : अहो काय सांगू मुनिवर? सकाळपासूनच गायब झालेत! हा गरुड म्हणतोय की 'मानससरोवर' असं काहीतरी म्हणत गेले म्हणे!
नारद : हंम्म्म्. हे अंमळ भलतंच काहीतरी! आत्ता यावेळी तिकडे?
(नारद अजून एक धिरडं चापतात आणि वरती फक्कड चहाही हाणतात!)
आहा! आता कसं पोट छान भरलं बघा देवी. काल भूलोकावर फारच चालणं झालं होतं, आणि भूकही अंमळ जास्तच लागते आजकाल!
चला आता निघावे म्हणतो. हे घरी आले की कळवा.
लक्ष्मी : हो हो नक्कीच कळवेन. फोनवर भेटला नाहीत तर व्यनि तरी नक्कीच टाकेन!
नारद : हो हो व्यनिच करा. खरडींचा काय भरोसा, त्या 'बिका'ट वाटेने 'परा'गंदा होतात लगेच!
(एवढ्यात विष्णू महालात प्रवेश करतात)
लक्ष्मी (पुढे होत) : अग्गोबाई!! आलात? या, तुमचीच वाट बघत होते हो सगळे!! कुठे नाहीसे झाला होतात?
विष्णू : सांगतो, सांगतो!! आधी मला एक चहा आण आणि थोडं खायला सुद्धा!!
(लक्ष्मी आणते म्हणत आत जाते.)
विष्णू : हुश्य्.....दमलो बुवा! हं .....बोला मुनिवर कसं काय येणं केलंत?
नारद : काही नाही सहजच आलो होतो बरेच दिवसात आपलं दर्शन नव्हतं!
(लक्ष्मी बाहेर येत धिरडं आणि चहा टीपॉयवर ठेवते. विष्णू सगळं झटपट संपवतात आणि उपरण्याला हात, तोंड पुसतात!)
विष्णू (लोडाला टेकत): तर मी सकाळीच कुठे गेलो असा तुमचा प्रश्न आहे! ती एक समस्याच होती.
??
विष्णू : त्याचं काय झालं काल मी भूलोकावर हिंडत असताना अचानक दुर्वास ऋषी सामोरे आले. त्यांच्या चरख्यावर त्यांनी एक दोन इंची मिळमिळीत धागा काढला होता!
मी विचारता झालो की "तुम्ही इतके सुंदर धागे ह्यापूर्वी कातलेले असताना असला धागा कातण्याचे प्रयोजन काय?"
तर माझ्यावर कोपिष्ट होत गरजले "देवा, तुमच्यासारख्यानंही पक्षपाती व्हावं ना? इकडे स्पष्टवक्तेपणाचा आव आणताय तिकडे लोक प्रक्षोभक धाग्यामागून धागे उसवताहेत, तुमचं लक्ष नाही आणि माझ्या निरुपद्रवी धाग्यावर तुमचा आक्षेप??"
मी म्हणालो "समजलं नाही मुनिवर! काही उदाहरण देऊ शकाल का? चूक झाली असेल तर अवश्य दुरुस्त करेन!"
तेव्हा छद्मी हसत गरजले "आत्मपरीक्षण करा देवा! तुमचं तुम्हालाच सापडेल!"
तेव्हापासून जो भंजाळलोय मी तो आत्तापर्यंत!
अहो तुम्हाला सांगतो देवर्षी, रात्रभर तळमळतोय, डोळ्याला डोळा नाही!
ही, ही बघा, ही सगळी पुस्तकं दिसताहेत ना? सगळी चाळली हो, पण शिंचं कोणी आत्मपरीक्षण कसं करावं त्याबद्दल बोलतंच नाही.
गूगलवर 'आत्मपरीक्षण' असा सर्च दिला तर भलभलत्याच साईट्स उघडल्या! 
शेवटी वैतागून सक्काळी मानससरोवराच्या काठी जाण्यासाठी निघालो, म्हटलं त्या शांततेत तरी काही सुचेल पण नाही जातानाच एवढा ट्रॅफिक जाम की काही विचारु नका!
आणि तिथे सरोवराकाठी सुद्धा एक चमत्कारिक दृश्य दिसलं हो माझ्यासारखेच साताठजण विमनस्क चेहेर्याने तिथे हिंडत होते एकाला विचारलं तर म्हणाला "दुर्वास भेटले होते आणि आत्मपरीक्षणाबद्दलच सांगितलं!" तिथे झाडावरही काही मंडळी दबा धरुन बसली होती मज्जा बघायला बसल्यासारखी (त्यातला एकजण जाम उचकवत होता बाकीच्यांना, स्वर्गाच्या पश्चिम भागातला असावा असा संशय आहे.)
तिथे बराच वेळ डोळे बंद करुन बसलो तळ्याकाठी पण मग काही अप्सरा जलक्रीडेसाठी उतरल्या पाण्यात मग लक्ष लागेना, सारखे डोळे किलकिले व्हायला लागले!!
मग आलो परत बापडा.
(लक्ष्मी डोळे मोठे करुन) : हंम्म्म्म्म (एवढंच करते)
नारद (मोठ्यानेहसत) : हा हा हा हा!! अहो इतकंच ना मला एक एसेमेस केला असतात तर चुटकीसरशी सोडवला असता प्रॉब्लेम तुमचा!!!
विष्णू : आँ काय सांगताय काय?
नारद : मग! चला आत्ता लगेच निघूया.
विष्णू : कुठे?
नारद : आत्मपरीक्षणाला! दुसरीकडे कुठे?
(चला दोघेही निघतात)
लक्ष्मी : अहो पण मुनिवर येणार कधी तुम्ही?
नारद : आमची वाट नका बघू देवी अंमळ वेळ लागेल!
(महालातून बाहेर पडतात)
विष्णू : अहो पण मुनिवर निघालोय कुठे आपण!
नारद : देवा, अहो कसलं डोंबलाचं आत्मपरीक्षण हो! बशीभर काजू, एक तळलेल्या पापलेटने भरलेली डिश आणि फक्कडसा सोमरसाचा प्याला, बास सुरु आत्मपरीक्षण!!
विष्णू : आँ!!!!! मुनिवर ??!!...
नारद (डोळे मिचकावत) : चला, चला, लवकर चला! 'पूनम' झिंदाबाद!! आत्मपरीक्षण झिंदाबाद!!!
-चतुरंग
मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 20:02) .या (2010) वर्षीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात ४-6 दिवसांचा मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई असा धार्मिक प्रवास योजिला आहे.
रेल्वेचे confirm आरक्षण झालेले आहे, मात्र अजून राहण्याच्या व फिरण्याच्या ठिकाणांबद्दल काही संशोधन केलेले नाही. सन्माननीय मिपाकरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी, तिरुपती, चेन्नई येथे प्रवास करत असतानाच्या घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दयावी.
अजून एक गोष्ट अशी की, जातानाचा प्रवास जरी ६ जणांना जरी समूहाने करायचा असला तरी वैयक्तिक कारणांमुळे माझा येतानाचा प्रवास एकट्यानेच आहे. त्यामुळे Two Tier AC ने एकट्याने रात्री २.०० ते दुसर्या दिवशी सकाळी ६.०० पर्यंत असा [रेनीगुंटा (तिरुपतीचे सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक) - दादर] प्रवास करताना सुरक्षेची कोणती खबरदारी घ्यावी याचीही माहिती द्यावी.
'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 19:29) .नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
गुलाबाचा महिमा
प्रेषक राजेश घासकडवी ( गुरू, 03/11/2010 - 13:44) .गुलाब हा फुलांचा राजा. याच्या शेकडो जाती असतात, व दरवर्षी नव्या निघत असतात. म्हणजे नाव एकच पण प्रत्यक्ष फुलं अनेक. (आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, आम्हाला आयडी अनेक पण व्यक्ती एक हा प्रकार माहीत आहे. तर त्यावर आधीच उत्तर म्हणूनच तात्यांनी आयडी एकच (जवळपास) आणि व्यक्ती अनेक (जवळपास) हे उदाहरण दाखवलं असावं.) हा नावावरनं गुलाबी रंगाचा असतो असं वाटेल, पण तसं झालं तर तुम्ही कोत्या चक्रीय व्याख्येला बळी पडलात असंच म्हणावं लागेल. हा अनेक रंगात, अनेक वासांत व अनेक प्रकारे उगवतो - झु़डूप, कलम, वेल इत्यादी. पण शेवटी सगळ्यांना एकाच गुलाब या नावानेच ओळखलं जातं, कारण कोणी कवी म्हणूनच गेलेला आहे - नावात काय आहे, गुलाबाला कुठचंही नाव दिलं तरी शेवटी तो गुलाबच. आता त्या आंग्ल कवीला गुलाब मधलं एक अक्षर थोडं भदललं तर किती गलिच्छ अर्थ होतो याची कल्पना करता आली असती तर त्याने मराठीत तरी आपलं बाषांतर होऊ दिलं नसतं.
गुलाब हा संस्कृत काव्यात सापडत नाही. म्हणून त्या फुलाला असंस्कृत कदाचित म्हणता येईल. पण संस्कृत भाषेप्रमाणेच केवळ तग धरून असलेले व तिने एके काळी शिरोधारी चढवलेले कमळ (त्याचबरोबर कमळ-भुंगा जोडीही - शमा परवान्याच्या पर्शियन काव्य क्लिशेला संस्कृतचा सडेतोड जबाब) आजकाल गुलाबाच्या लोकप्रियतेचा बळी ठरले आहेत. हीन मानल्या गेलेल्या आयपीएल मधल्या हीन मानल्या गेलेल्या उत्तान आनंद-नर्तकी जशा आजकालच्या असंस्कृत जगात (त्यांच्या अर्धवट कपड्यांतून) पुढे येत आहेत व दंडावर ठेवलेला रुपया कलात्मक रीतीने ओठाने उचलणाऱ्या मराठमोळ्या सुसंस्कृत लावणी नर्तकी कशा मागे पडत आहेत त्याचेच हे पुष्पजगतातले पडसाद आहेत.
हा मदनाला किंवा रतीला विशिष्ट दिवशी अर्पण करावा असं त्यांचे ब्रह्मचारी भक्त श्री. संत. व्हॅलेंटाईन (की व्हॅलेतिनो? की व्हॅलेंटिनस?) यांचं म्हणणं होतं असा प्रवाद आहे. या प्रवादापायी अब्जावधी रुपयांची गुलाबाची फुलं १४ फेब्रुवारीला विकली जातात. ती तशी अर्पण केली जाऊ नयेत (किंवा कदाचित त्या विक्रीवर काही 'कर' रामाच्या चरणी अर्पण व्हावा) यासाठी मुतालिक यांसारखे हिंदु संस्कृतीचे (पाहिजे तो अर्थ काढावा) रक्षक (पुन्हा पाहिजे तो अर्थ काढावा) नि:शस्त्र (काठ्या लाठ्या न घेता - केवळ मुद्दे व गुद्दे यांचा वापर करून व अनेक स्त्रियांना महत्कर्तृत्वाने जमीनदोस्त करून [यांना आतंकवादी म्हणावे काय?]) सेना घेऊन जन आंदोलन करतात. त्याच आंदोलनाविरुद्ध काही नवी, जवळपास तितकीच नि:शस्त्र आंदोलनं (काळी शाई घेऊन, पण पेनातली नव्हे बरं का - ती कसली नि:शस्त्र? ती तर नीर्जीव...) निर्माण होतात. मग काही उच्चभ्रू संस्थळांवर यापैकी कुठचे कमी नि:शस्त्र यावर बरीच अधिक नि:शस्त्र चर्चा होते. त्या चर्चेचं फलित दोन्ही आंदोलनांपर्यंत पोचतं व ती दोन्ही पुन्हा डोकं वर काढत नाहीत. आधी असलीच जन आंदोलनं करणाऱ्या काही सेना मात्र त्यांचे धोत्र्याला शिव-गुलाब नाव देऊन १४ फेब्रुवारीला शिव-दिन म्हणवून घेण्याचे जुने आंदोलन पुन्हा उगाळत बसत नाहीत. मराठीच्या प्रश्नाप्रमाणेच त्यांनी हाही प्रश्न नवीन सेनेला आउटसोर्स केला असावा असे काही विचारवंतांचे म्हणणे आहे. अर्थात विचारवंत कोण व खरे विचार कोणाचे हे सेनेच्या सामर्थ्यावर ठरते हा वाक्प्रचार माहीत नसल्याने ते विचारवंतच नाही, असं इतरांचं म्हणणं आहे. काही काळांनी ते इतर लोक विचारवंत ठरतील बहुतेक. पण ते सेनेच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे.
गुलाब हे प्रीतीचं प्रतीक आहे. विशेषत: लाल गुलाब. काही मुक्त स्त्रियांच्या हातचे ते लाल मात्र काहींना मॅटेडोर बैलांना आकर्षित करण्यासाठी वापरत असलेल्या लाल कापडांप्रमाणे धोकादायक वाटतात. व ते स्त्रियांनी शोषण केलेल्या पुरुषजमातीचं रक्षण करण्यासाठी मारक्या रेड्याप्रमाणे त्यावर तुटून पडतात. ही युद्धं बघण्यासाठी खूप प्रेक्षक जमत असल्यामुळे एखाद्या सेकंदाच्या साथीदाराने असेच लाल रुमाल काढून दाखवणे, त्यावर लोकांनी मॅटे़डोरप्रमाणे तुटून पडणे, त्यात कोणी प्रेक्षकांतल्या व्यक्तींना शेफारलेलं म्हणणे, कोणी झाडांवर चढून बसून तिकिटाचे पैसे वाचवणे, तर कोणी इतरांना 'उचकू नको ग' म्हणताना कुणा बाबामहाराजांच्या आव्हानाने स्वत:च उचकणे, असे अनेक मनोरंजक उपखेळ सुरू होतात, व त्याने प्रेक्षक आणखीनच वाढतात. जरा भरकटलो, तर मी गुलाबाविषयी बोलत होतो...
गुलाब हे शांततेचं प्रतीक म्हणून सुद्धा वापरलं जाऊ शकतं. त्यासाठी विशेषत: पांढरे (फटक) गुलाब वापरले जातात. उदाहरणार्थ एखादा नवीन आलेला (वाटणारा) सदस्य हाटेलच्या मालकास काही वेडेवाकडे बोलला तर लोकांसमोरचं भांडण (कोण म्हणालं लुटुपुटूचं? जोडे तयार आहेत) खेळ खूप झाला म्हणून घाईघाईत मिटवण्यासाठी हे खाजगीत (वयाचा मान राखून वगैरे) दिले जातात असं मानलं जातं. मग सदस्याकडे ऑर्कुटवर वाटण्यासाठी लाल गुलाब शिल्लक राहातातच. पण तेही लवकरच सुकतात...
कवितांविषयी लिहिल्याशिवाय लेख कसा पूर्ण होईल? गुलाब या फुलाने अनेक (असंस्कृत) काव्यांना जन्म दिलेला आहे.
तेरा मुंह तो ऐसा है के जैसे मेहेका हो कोई गुलाब
दे साकी, जल्द ही दे साकी, मुझे एक गिलास जुलाब
(हा फार फार जुन्या काळी सापडलेला शेर आहे, पोट सुटलंय, टक्कल पडलंय.... कोणाचा तरुणपणी एखादा शेर हरवला होता का?)
जैसे गुलाबाचे काटे| टोचती वास घेत्याटे
तैसे रद्दड काव्याचे काटे| टोच्विन वाच्कास
(बरेच नवोदित कवी)
गुलाब म्हणजे गुलाब म्हणजे प्रेम असतं,
रोज हे एक त्याचं 'नेहेमीचंच' नेम असतं, (किंवा)
गुलाब हे 'रोज'चंच एक नेम असतं. (पापड कंपनीने कुठची ओळ चांगली ते ठरवावं)
(मंगेश पाऊसपा(प)डगावकर - नावातलं साधर्म्य पूर्णपणे वाचकाच्या मनात)
तर असे हे गुलाब महात्म्य - साठा उत्तराची कहाणी, पाच उत्तरी सफळ संपूर्ण.
वीजेची गायब-जादू!
प्रेषक अरुंधती ( बुध, 03/10/2010 - 21:45) .त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे.
आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. फक्त लहानपणीच्या कथांमधील जादूने गोष्टी गायब करणार्या जादूगाराची जागा आश्वासनं देणारे मंत्री, सरकार, प्रशासन यांनी घेतली आहे. लोक काहीही म्हणोत! मात्र मी त्यांच्यावर आणि त्यांनी गायब केलेल्या वस्तूंवर विश्वास ठेवायचं सोडलं नाही हां!
आमच्याकडे बाजारात बर्याच गोष्टी गायब होत असतात. पण आम्ही स्वतःला सवय लावली आहे. एखादी गोष्ट गायब झाली म्हणून स्वतःचे फारसे अडू द्यायचे नाही. त्या वस्तूशिवाय जगायला शिकायचे. मग पुन्हा ती वस्तू बाजारात नव्या किमतीने अवतीर्ण होते तेव्हा ठरवायचे की त्या वस्तूला पुन्हा घ्यावे की नाही? न जाणो, उद्या पुन्हा गायब झाली तर अडायला नको हो! असं आपलं आमचं साधं सोपं मानसशास्त्र!
गेली दोन-तीन वर्षे आमच्याकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की वीज आणि पाणी हुतुतू, खो खो, लपंडाव सुरू करतात. आधी वीज गायब, मग पाणी गायब!! आह्हे ना ज्जादू?!! पाऊस पडो अगर न पडो, जलाशय - धरणे भरोत अगर न भरोत... गरजेपेक्षा पाण्याचा साठा कायम कमीच भरतो. पण तरीही आमचे सर्व मंत्री आश्वासने द्यायचं सोडत नाहीत बरं का!! कसले खेळकर आहेत ना आपले सर्व मंत्री?!!
वर्षभर भारनियमनमुक्तीच्या चर्चा, आश्वासने आम्ही श्रद्धेने ऐकतो. ह्याही वर्षी ऐकली. भक्तिभावाने इतरांनाही ऐकवली. पण सगळे थोडेच आमच्यासारखे सश्रद्ध! आमच्या भोळ्या भाबड्या चर्येकडे तुच्छ कटाक्ष टाकून, नाकपुड्या फेंदारून ते आमच्या भारनियमनमुक्तीच्या भावस्वप्नांना वास्तववादाची डूब देऊन भंग करण्यास आसुसलेले असतात. आमचे दादा, ताई निवडणुकांपूर्वी आणि नंतरही, आम्हाला ठासून सांगतात की ह्या वर्षापासून ते आमच्या भागाला भारनियमनमुक्त करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच!!! आम्हीपण लग्गेच वर्तमानपत्रांत बातम्या छापून आणून कौतुकाचे पेढे सर्वांना भरवतो. हो, उगाच कुणाचं तोंड गोड करायचं राहिलं म्हणून त्यांनी नंतर कडूजहर मनाने आमच्या तोंडाचे पाणी (शब्दशः) पळवलं असं नको व्हायला! ह्या वर्षीचा उन्हाळा गारगार बरं का.... डोक्यावर फॅन गरगरणार, नळाला पाणी येणार, फ्रीज चालू राहणार, ए. सी. ची हवा झुळूझुळू वाहणार.... अहो, कसलं ते थंड हवेच्या ठिकाणांचं कौतुक करून राहिलात!! आमचं घर हेच आमचं थंड हवेचं ठिकाण होणार, बरं का!
उन्हाळ्याची सुरुवात तर चांगली होते. आश्वासनांच्या सुखस्वप्नांत आम्ही नेहमीप्रमाणेच गाफील असतो. वर्तमानपत्रांत कलिंगड, काकड्या, लिंबू सरबत, ऊसाच्या रसाची विक्री करणार्यांचे फोटो 'उन्हाळ्याची चाहूल' देत छापून यायला लागले की आम्हालाही उन्हाळ्याची चाहूल लागते. सालाबादप्रमाणे घरात ए. सी. घ्यावा की नाही ह्यावर चर्चा झडते. गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे सर्व ए. सी. कांक्षी गृहसदस्यांच्या योजनांना अडसर बनण्याचे सोडून आम्हीही उत्साहाने ए. सी. घ्यायलाच पाहिजे इत्यादी इत्यादी चर्चेत समरसून भाग घेतो.
दुसर्याच दिवशी घरात सकाळपासूनच विजेने पोबारा केलेला असतो. पण आम्ही मनाची समजूत घालतो.... केबलमध्ये बिघाड असेल.... ट्रान्स्फॉर्मर उडाला असेल..... दुरुस्ती चालली असेल.... नाहीतर अशी पूर्वसूचना न देता ऐन परीक्षेच्या मोसमात वीजकपात मायबाप सरकार नक्कीच करणार नाही!
दुपारी घराजवळच्या भव्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनाकडे आमची पदकमले वळतात. बघतो तो काय, सारे दुकान अंधारात, दुकानातले नोकर हवा खात दुकानाच्या पायर्यांवर चकाट्या पिटत बसलेले आणि दुकानात मालक इमर्जन्सी दिव्याच्या प्रकाशात लुकलुकताना दिसतात.
"अहो, काय हो हे? " अस्मादिकांचा मूर्ख प्रश्न!
दुकानाचा एक आगाऊ नोकर दात विचकतो, "ह्यँ ह्यँ ह्यँ.... तुम्हाला माहीत न्हाय का ताई..... पावरकट हाय आजपासून.... आता रोज दुप्पारच्याला आसंच बसायचं.... " अस्मादिकांच्या फुग्यातली हवाच फुस्स गुल होते! अस्मादिक दाणकन भूतलावर आपटतात!
हाय रे माझ्या ए. सी. विरोधी दैवा! असा कसा तू अवसानघात केलास!! आता मी गारव्याच्या आशेने कोणाकडे पाहू? भर दुपारच्या उकाड्यात जर ए. सी. नाही चालला तर मग त्याला विकत घेऊन काय करणार कप्पाळ??!!
निराशेने घेरलेल्या मनाने मी दुसर्या दुकानी जाते. तिथेही तीच तर्हा!!! एवढ्या सुंदर, भव्य दालनात कितीतरी कंपन्यांचे ए. सी. मांडलेले असताना सर्व दुकान व दुकानमालक मात्र उकाडा व अंधाराच्या खाईत! काय हा विरोधाभास!! हा हन्त.... हा हन्त.... तेथून वीजमंडळाच्या कार्यालयात धडक मोर्चा..... तिथे तर कर्मचारी जांभया देत, हातातल्या वर्तमानपत्राने स्वतःला वारा घालत आणि आजूबाजूच्या माशा उडवत समस्त जगताकडे तुच्छ कटाक्ष टाकत बसून असतात. "वीज कधी येणार? भारनियमनाचे टाईमटेबल तरी द्या... " अशा सवालांना टेबलवर बसलेल्या माशीच्या सहजतेने उडविले जाते. मम पदरी/ ओढणीत घोर निराशा.....
वृत्तपत्राच्या कार्यालयात तरी आपल्या दु:खाला कोणीतरी वाचा फोडेल ह्या अंधुक आशेने आम्ही एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये डोकावतो. संपादकांसकट सर्व वार्ताहर, कर्मचारी...कोणालाच आमच्या दु:खाची कदर वाटत नाही.
"अहो ताई, तुमच्याकडे दुपारचे चार-पाच तास वीज जाते म्हणून तुम्ही डोकं धरून बसलात, मग ग्रामीण भागातील शेतकर्यानं काय करायचं? तिथे तर बारा - बारा तास वीज जाते.... सगळं शेतीचं काम खोळंबतं....किती नुकसान होतं माहीत आहे?" वर्तमानपत्राच्या ग्रामीण पुरवणीचे संपादक गरजतात. अस्मादिकांना उगीचच अपराधी वाटू लागतं. आम्ही वीजबिल नियमित भरतो, खाडे करत नाही, वीजचोरी करत नाही....याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनांना आपला हक्क समजावा....
घरचे लोक ह्याही वर्षी ए.सी. खरेदीचे बेत कॅन्सल करतात. शेवटी ए.सी. चालायला वीज तर हवी ना!
पण अजूनही मी आस सोडलेली नाही.... घरच्या, दारच्या अंधाराला व उकाड्याला कंटाळून जनरेटर बॅक-अप असलेल्या वातानुकूलित मॉल्स व मल्टिप्लेक्सची वाट धरलेली नाही! रोज वर्तमानपत्रांत 'आज तरी भारनियमनाची बातमी देणार का' असे पुटपुटत सर्व निवेदने, जाहिराती, श्रद्धांजल्या नीट कसून वाचणे सोडलेले नाही. न जाणो, कोठे ती बातमी छोट्या प्रिंटमध्ये छापली असली तर......!!!! मन्त्रीबोवांनी कोणत्या तरी भाषणात भारनियमनमुक्तीच्या नव्या आश्वासनांची हवा आमच्या जनतेच्या मनांत भरली असली तर?
तर अशा ह्या वीजलपंडावामुळे हैराण झालेल्या जीवांनो, असे गप्प बसू नका. खेळकर बना! आजच थंड हवेच्या स्थळांच्या सहलीचे बुकिंग करून (बे)जबाबदार अधिकार्यांना खो द्या. [मोर्चे, घेराव, धरणी, आंदोलने करून काहीही साध्य होत नाही... म्हणून! ] किंवा माझ्यासारखे लेखनाचे माध्यम स्वीकारून आपल्या घोर आशावादाला साजरे करा!
-- अरुंधती
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
(मिपादिन?: नवेच आहे शत्रू नव्यांचे!! प्रस्थापित नाहीत.)
प्रेषक ३_१४ विक्षिप्त अदिती ( मंगळ, 03/09/2010 - 14:20) .डिस्क्लेमर्सः
१. कृपया ह. घेणे नाहितर जोडे तयार आहेत.
१.अ. कुणाचे जोडे तयार आहेत हे विचारू नये, अपमान होईल.
२. सदर विडंबन हे विरंगुळा म्हणून लिहीले आहे. वरचे दोन शब्द काही लोकांच्या नजरेआड जाण्याची शक्यता आहे म्हणून हे ही लिहीले आहे.
२.अ. प्रेरणा ... लिहायलाच हवी का? बरं, वाङ्मयचौर्याचा आळ नको, ही घ्या.
३. नीरजाकडून एक कल्पना (न विचारता) उधारीवर आणली आहे, तिचे आभार.
४. सदर विडंबन आम्हाला आव्हान देणार्या श्री.श्री. राजेशबाबा पूजावाले घासकडवी यांना सादर समर्पण!
साल २११०
गणेशचतुर्थी हा जागतिक मिपा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातोय.
विविध फतव्यांच्या चर्चा होताहेत. प्रस्थापितांविरुद्ध जास्तीत जास्त बोलले म्हणजे मिपा दिन खऱ्या साजरा झाला असे समजले जात आहे. पण, प्रस्थापित हे नव्यांचे कधीच शत्रू नव्हते, नाहीत आणि यापुढेही नसणार आहेत.
नव्यांचे खरे शत्रू नवे(पण)च असते.
नव्यांचे एकमेकांतील नातेसंबंध बघितल्यास असे दिसून येते की, नवे-नवे, नवे-संपादक, नवे-मालक... याप्रकारची नाती सगळ्यात बदनाम नाती आहेत. टोकाच्या शत्रूत्त्वाची नाती आहेत.
धागे लिहून संपादन सांभाळणाऱ्या संपादकाला "समजून न घेणारा" हा नवाच असतो. प्रस्थापित किंवा टारझन नाही.
हा जर प्रस्थापित-नव्या सदस्यांचा वाद मानला, तर मग मालक-प्रस्थापितांचे ही एकमेकांशी का पटत नाही? ते तर एकाच काळातले आहेत.
तसेच प्रस्थापित हे नव्यांकडे टार्गेट म्हणून बघतात अशी ओरड केली जाते. ते खरे नाही. नवेच बऱ्याच अंशी याला जबाबदार आहे. धागा क्षेत्रात लेख लिहीताना नवेपणाच्या आधारे नवे आपले एकोळी धागे पाडून टाकतात, प्रतिसाद पदरी पाडून घेतात. खरडफळ्यावरचे प्रस्थापितसुद्धा लाजतील अशा खरडी नवे एकमेकांना आणि धागे मुख्य पानावर लिहीत असतात.
नवेच स्वत:ला अशा पद्धतीने पेश करत आहेत की प्रस्थापितांचा दृष्टीकोन हा टवाळीचाच राहील!!
प्रतिसाद मिळतात म्हणून नवेच एकोळी धागे टाकतात, निरर्थक खरडी टाकतात. त्यांना नको असेल तर ते असे टवाळखोर धागे नाकारू शकतात. असे टवाळ्खोर प्रतिसाद थांबवायचे असतील तर कोणत्याच नव्या-जुन्याने अशी प्रलोभने/धागे/खरडी नाकारल्या पाहिजेत. नाहितर याला दुटप्पीपणा किंवा दांभिकपणा म्हणावे लागेल. कारण आपल्याला वाटेल तसे स्वैर वागायचे आणि काही झाले की प्रस्थापित आणि कंपूबाजीला दोष देवून मोकळे.
आणि प्रत्येक क्षेत्रात प्रस्थापितांच्या बरोबरीने समानता पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. समानता पाहिजे असेल तर मग नवे आहेत हे बोलायला कशाला हवे? कारण फतव्यांबाबतही असमानता आहे. सगळे फतवे आवडीच्यांच बाजूने आहेत.
फतव्यांमुळे आजकाल असे झाले आहे की, एखादा कंपूत विचारी आणि टवाळ सगळेच लिहीणारे, तर एखाद्या कंपूबाहेरच्या एखाद्याचे बरेच प्रतिसाद गायब. प्रतिसाद उडवताना संपादकांनी हा विचार जरूर करावा.
मिपादिनानिमित्त नव्यांनी प्रस्थापितांचा विचार करावा आणि प्रस्थापितांवरचा अन्याय दूर करावा.
इमर्जन्सी - २
प्रेषक प्राजु ( मंगळ, 03/09/2010 - 09:44) .तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.
-------------------------
आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि पट्टेरी (मुंबईचा जावई सिनेमामध्ये शरद तळवळकर ज्या प्रकारच्या अर्ध्या पँटीत हिंडत असतो तसल्या )कापडाचा गाऊन म्हणून काहीतरी घालायला दिलं. "प्लिज टेक ऑफ योर क्लोथ्स अण्ड वेअर दिस गाऊन" अशी विनंती वजा आज्ञा करून ती चालती झाली. तो सो कॉल्ड गाऊन मी उघडला. त्याला फक्त बाराबंदीसारखे बंद होते बांधायला, ते ही फक्त दोनच.. दोनबंदीच होती ती. झालं.. !! मी जमेल तिकडून झाकत झाकत ती दोन बंदी घातली. ती घातल्यानंतर, शक्य तितकं 'मी कम्फर्टेबल आहे..' असं दाखवत मी त्या व्हील वाल्या बेड वर जाऊन बसले. नवरा शेजारच्या खुर्चित अर्धवट झोपलेल्या लेकाला सावरत्-सांभाळत बसायचा प्रयत्न करत होता. मी एकदा कसंनुसं त्याच्याकडे बघून हसून घेतलं. इतक्यात आणखी एक नर्स आली मात्र यावेळी तिचा झगा निळा होता. तिने पुन्हा एकदा बीपी बघितलं. (दोन्-अडीच तास वेटिंगमध्ये बसून बसून वाढलं असेल की काय अशी शंका आली असावी) हातातल्या पॅडला लावलेल्या पेपरवर जास्तीतजास्त गचाळ अक्षरात काहीतरी लिहून , पुन्हा एकदा माझं नाव, माझ्या नवर्याचं नाव, विचारलं. माझ्या नावाचं पार कडबोळं करून तो निळा झगा निघून गेला. मग आणखी पाच मिनिटं गेली.. आणि मग पुन्हा एक निळा झगा घातलेला नर्स आला. त्याने सोबत आणलेल्या ट्रे मधून बरंच काय काय काढलं, आणि मग माझ्या छातीवर, पोटावर आणि कमरेवर स्टीलची प्रेस बटणं असलेली स्टिकर्स चिकटवली आणि त्या प्रत्येक बटणावर एकेक वायर लावून माझ्या मागे असलेल्या मॉनिटरला त्या सगळ्या वायरी जोडल्या. उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर एक स्टीकर लावून त्यातून एक वायर कुठेतरी जोडली. आणि जोरात बीऽऽऽऽप असा आवाज करून तो मॉनिटर चालू झाल्यावर माझ्याकडे एकदा निर्विकारपणे हसून तो निघून गेला. नवरा वरती चालू झालेल्या मॉनिटरकडे बघत होता. पण त्याच्या चेहर्यावर काही भितीदायक भाव दिसले नाहीत्..(त्याला बहुतेक काही कळत नव्हतं त्या ढीगभर वेड्यावाकड्या हलणार्या रेषांमध्ये.). इतक्यात डॉक्टर आले. त्यांचा झगा मात्र शुभ्र पांढरा होता. त्यांनी, त्या मशिनमधून इ सी जी ची प्रिंट काढली आणि.. "योर हार्ट इज गुड, आय डोन्ट सी एनी प्रोब्लेम हीअर.." असं म्हणत ती प्रिंट माझ्या नवर्याच्या हातात दिली. काय??? हार्ट इज गुड??? असं कसं होइल? मला तर अजूनही दुखत होतं. डॉक्टरना तरी काही कळतंय की नाही याची शंका यायला लागली. मग डॉक्टर म्हणाले,"आपण ब्लड टेस्ट आणि एक्स्-रे काढून बघू. " डॉक्टर निघून गेले. एकूण हा प्रकार आणखी किमान २-३ तासांचा होणार असं दिसत होतं. मी नवर्याला , लेकाला माझ्या मैत्रीणीच्या घरी घेऊन जायला सांगितलं. तिथे त्या अडगळीतल्या खुर्चित कितीवेळ तो बसून राहणार त्याला घेऊन!! नवरा लेकाला घेऊन गेला. आता त्या पडद्या-पडद्याच्या खोलीत मी, तो मध्येच बिपबिपणारा मॉनिटर आणि अंगावर लावलेल्या छपन्न वायरी इतकेच उरलो.
इतक्यात पडदा हलल्यासारखा झाला आणि पुन्हा एक निळा झगा आत आला. यावेळी झग्याचा घेर बराच मोठा होता. तिने ब्लड सँपल घ्यायला आले असल्याचं सांगून ट्रे मधल्या ४-५ टेस्ट ट्यूब्स दाखवल्या. एका पॅकेटमधून सुई काढली . माझ्या दंडाला घट्ट एक रबर बांधून माझी शीर शोधायचा प्रयत्न करू लागली. अंगावर एकूनच टोचाटोची करायला मला आवडत नाही . लहानपणी कधीतरी कान टोचले असतील तेव्हढेच, त्यापुढे मी कधीही काहीही टोचून घ्यायच्या भानगडीत पडले नाही. त्यामुळे मी तिच्या भल्या मोठ्या पण गोर्या मुखड्याकडे आणि तिच्या हातातल्या त्या सुईकडे पद्धतशीर पणे न पाहण्याचे ठरवले आणि दुसरीकडेच पाहू लागले. तिला माझी शीर लवकर सापडली असावी कारण तीने हात हातात घेतल्यानंतरच्या पाचव्या सेकंदाला "आईऽऽऽगं!" अशी जोरदार किंचाळी माझ्या तोंडून बाहेर पडली, डोळ्यांत पाणी आलं, आणि मनामध्ये त्या झग्याच्या पुढच्या आणि मागच्या बर्याच पिढ्यांचा उद्धार करून झाला. ती अजून काहीतरी खेळ करत असतानाच एक अतिशय गंभिर चेहर्याचा, गडद निळ्या रंगाचा झगा आत आला. या बाईसाहेब बर्याच अनुभवी असाव्यात. कारण या आत आल्यावर माझ्या शेजारी बसलेला आधीचा निळा झगा एकदम आदबशीरपणे या गडद निळ्या झग्याशी बोलू लागला. गडदनिळ्या चष्मेवाल्या झग्याने एका प्लास्टिकच्या कप मधे स्ट्रॉ घालून काहितरी प्यायला दिले. देण्या आधी ,"इट टेस्ट्स विअर्ड, बट यू हॅव टू ड्रिंक इट , हनी!!" असा मधाळ इशारा देऊन तीने ती स्ट्रॉ माझ्या तोंडात कोंबली. एकीकडे तो घेराचा झगा माझं रक्त शोषतच होता. ते कसलंस औषध प्याल्यावर .. माझ्या घशापासून आंतड्यापर्यंत सगळा भाग बधिर झाल्यासारखे वाटू लागले. आणि एकदम उलटीची भावना झाली.. त्या नादात मी त्या निळ्या झग्याच्या हातात असलेला हात हलवला आणि तो झगा एकदम चिडला. "आय नीड टू ड्रॉ फ्रॉम द अदर हँड, आय कॅनॉट टेक दिस सँपल.." शक्य तितका चेहरा शांत ठेवायचा प्रयत्न करत ती म्हणाली. इतक्यात चष्मेवाल्या झग्याने "आय वील डू दॅट.. डोन्ट वरी." असं सांगितलं. तो निळा झगा दात्-ओठ खात निघून गेला. मग पुन्हा एकदा दुसर्या हाताची शीर शोधून पुन्हा एकदा "आईऽऽऽऽगं!", पुन्हा एकदा डोळ्यांत पाणी आणि पुन्हा एकदा पुढच्या आणि मागच्या बर्याच पिढ्यांचा उद्धार असं होत पुन्हा एकदा माझं रक्त त्या ४-५ टेस्ट ट्यूब्स मध्ये घेतलं. मग त्याच सुईमध्ये सलाईन लावून, त्या सलाईन मधून कसलंस इंजेक्शन देऊन तो चष्मेवाला झगा निघून गेला. एका ट्रॉलीवर संगणक घेऊन येऊन पुन्हा एकदा माझं नाव, पुन्हा एकदा नवर्याचं नाव, पुन्हा एकदा इन्शुरन्स कार्ड, पुन्हा एकदा माझ्या नावाचं कडबोळं करून तो झगा निघून गेला. सलाईन संपलं तसं, सुई तशीच ठेऊन फक्त सलाईनचा स्टॅण्ड काढून टाकण्यात आला.
यानंतर मी जरा निवांत होत होते इतक्यात, एक चिमणीसारखा इवलुस्सा चष्मेवाला चेहरा, पडदा बाजूला सारून आत बघू लागला. माझं लक्ष जाताच, तोंड भरून हसून्.."हाऽऽऽय! यू आर प्रजॅक्टा??" असं विचारण्यात आलं मला. (प्रजॅक्टा..!! कप्पाळ माझं!!) झोपाळलेल्या मी, मानेनेच 'हो' म्हंटले.. तसा पडदा बाजूला सारून चिमणी आत आली. आणखी एक झगा ..पांढराच, फक्त फुलाफुलाचा!!! "आय एम हिअर टू टेक यू टू द एक्स्-रे रूम. " असं म्हणत म्हणत बेड्चा माझ्या मागचा भाग थोडासा वरती घेत बेडच्या दोन्ही बाजूंचं रेलिंग वरती सरकवत , मला दोन्ही हात आतमध्येच ठेवण्याची सूचना देत चिमणीने तो बेड ढकलायला सुरूवात केली. चिमणी बरीच स्ट्राँग होती, माझ्यासकट बेड ढकलू शकत होती.
एक्स्-रे रूम मध्ये गेल्यावर माझ्या पायावर चिमणीने मोजे चढवले. मोजे चढवता चढवता.."ओऽऽह गॉड! यू हॅव अ व्हेरी टायनी फीट.. वॉट्स योर साईज?" अशी हलकट कॉमेंटही पास केली. जरा रागच आला मला. मग अशी उभी रहा, तशी उभी रहा.. असं करत चिमणीने एक्स्-रे चं काम पूर्ण केलं आणि पुन्हा तो बेड, ते साईड रेलिंग, पुन्हा माझ्यासकट ढकलगाडी...! माझ्या त्या पडद्या पडद्याच्या रूम मध्ये मला आणून ठेवलं. चिमणीने मगाशी काढलेल्या त्या सगळ्या वायरी पुन्हा सगळीकडे जोडल्या, मॉनिटर चालू झाला आणि चिमणी गोऽऽड हसून निघून गेली.
आता मात्र मला सॉल्लिड झोप यायला लागली. एव्हाना २ वाजत आले होते. नवरा आला होता लेकाला माझ्या मैत्रीणीकडे ठेवून. त्या सांद्रीतल्या खुर्चित बसल्या बसल्या डुलक्या काढू लागला. आता हे ब्लड रिपोर्ट येणार, एक्स्-रे रिपोर्ट येणार आणि मग मला माइल्ड हार्ट अॅटॅक येणार होता असं निदान होणार.. अशी स्वप्नं रंगवत मी अर्धवट झोपी गेले. मध्येच कधीतरी हॉस्पिट्ल मधून कसले कसले आवाज होत होते. शेवटी ३ वाजले आणि माझे पेशन्स संपले. नवरा जाऊन त्या चष्मेवाल्या झग्याला भेटून आला. झग्याने रिपोर्ट तयार होतो आहे असे सांगितले. आणि मग बरोबर २० मिनिटांनी येऊन, माझ्या हातावरची ती सलाइन ची सुई काढून तिथे कापूस आणि पट्टी लावून, तिने रिपोर्ट्स नवर्याकडे दिले आणि "यू आर ऑल सेट.." असं सांगितलं. रिपोर्टमध्ये नक्की कशामुळे दुखलं छातीत याचं निदान न झाल्याचं लिहिलं होतं. मात्र पुन्हा दुखायला लागल्यावर ताबडतोब येण्याची सूचना होती. म्हणतात ना, न्हाव्याच्या हातात एकदा डोकं दिलं की, तो पूर्ण भादरूनच सोडतो.. त्यातला प्रकार. घरी आलो आणि झोपी गेलो.
मार्च २, २०१०. सकाळपासून बरी होते. दुखत होतंच छातीत. पण पुन्हा इमर्जन्सी ला जायचं धाडस नाही झालं. तो दिवस आणि पुढ्चा ३ तारखेचा दिवस तसाच काढला. मात्र ४ तारखेला खूप दुखायला लागलं. वाटलं, आता मात्र नक्कीच हार्ट अॅटॅक येणार. नवरा ऑफिसमध्ये होता. पुन्हा एकदा हार्ट्फर्ड मेडिकल सेंटर ला फोन लावून , हार्ट स्पेशालिस्टची अपॉइंट्मेंट घेतली. डॉ. आयज्ली नाव होतं त्यांचं. हे मात्र वयस्कर होते. कुठेही काहीही टोचाटोची न करता, केवळ हाताने तपासून त्यांनी निदान केलं, "दोन्ही बरगड्या जिथे जुळतात त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन सूज आली आहे.." उपाय?? साधाच, थोडी हाय पॉवरची पेन किलर!
सगळे सोपस्कार पूर्ण करून ती पेन किलर विकत घेऊन घरी आले. डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. इमानदारीत त्या गोळ्या घ्यायला सुरूवात केली. मात्र..!!! त्या इतक्या हेवी डोस गोळ्यांनी पोटात ढचमळायला सुरूवात झालीये. आता याचं काय करू??
- प्राजु
(पुन्हा एकदा.. वरील छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे या घटना सत्य आहेत, मात्र विनोद निर्मितीसाठी थोडाफार कल्पना विस्तार केला आहे.)
(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)
प्रेषक चेतन ( सोम, 03/08/2010 - 11:27) .रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा)
असो...
इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:
१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही. भारतीय खेळाडुला पाश्चात्य देशातिल अंपायर मुद्दामुन दंड करतात / आउट देतात असे ब्रेनवॉशिंग बीसीसीआयने केले, पण प्रत्यक्षात भारतीय खेळाडुंना पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही बीसीसीआयने, आणि विशेषतः सचिन तेंडुलकरनी केले नाही. ज्या आयपीएल मध्ये बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना उचलून धरल्याचा दावा केला, त्या स्पर्धेत अभारतीय खेळाडूंची आजची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या वीस वर्षात भारतातील खेळांच्या र्हासाचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ स्लेजींगचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट्मध्ये आणला. 'आयपीएल' मधील कित्येक चीअर गर्ल्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण सचिन तेंडुलकरला बाहेर करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी बीसीसीआयने भारतात प्रथम सुरु केली.
३. बीसीसीआयचे भारतीय कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. भारतात भारतीय माध्यमातून सुरु झालेल्या काही क्रिकेट स्पर्धांना (आयसीएल) पहिला विरोध बीसीसीआयचा होता.
४. सौरव गांगुली बीसीसीआयची ताकद ओळखण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयला ताब्यात ठेवणे त्यांला शक्य असूनही त्यानी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्याच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक लढाउ संघनायक' ही सौरव गांगुलीची ओळख फारशी खरी नाही. इतर क्रिकेट संघनायकांच्या मानाने त्यातल्या त्यात आक्रमक भाषा व काही स्पर्धांमध्ये उठबस एवढा फरक सोडला तर सौरव गांगुली आणि इतर क्रिकेट खेळाडु यांच्यात काही फरक नाही. 'अजित वाडेकर नंतरचा भारताचा उत्तम कर्णधार' हे सौरव गांगुलीचे वर्णन निरर्थक आहे.
६. धोनीला मिळणारा प्रतिसाद ही वीस वर्षे क्रिकेट पाहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. धोनी देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच उथळ आणि सवंग खेळ या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता वीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
बीसीसीआयने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. जडेजा, अझरुद्दीनपासुन स्टीव बकनरपर्यंतची उदाहरणे आहेत. मायकेल कॅस्प्रोविच हा तर फार पूर्वीपासून बीसीसीआयच्या हिटलिस्टवर असणार्या. त्यांला सचिन तेंडुलकरनी ज्याला 'खास स्ट्रेट ड्राईव्ह' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'झोडपुन' घेतले आहे. मायकेल कॅस्प्रोविचच्या या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
डिस्क्लेमिअरः हे लिखाण काल्पनिक आहे. (पण फोर्थ अंपायर आणि निखील बगळे बघुन डोक फिरतं हे नक्की)



