विनोद
बतावणी!
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 03/12/2010 - 00:54) .(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल.
एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय!
टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.)
(आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!!
लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता?
(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे?
अं...आँ....कोण कुठे?
अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी?
हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते!
मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले?
मला काय माहीत? मी नेऊ का विचारलं तर फक्त हातानेच नको अशी खूण केली!
(कानाशी आयफोन लावत) लक्ष्मी : छ्या..मोबाईलही ऑफ करुन ठेवलाय!! मेसेजवर जातोय!!! कसं शोधायचं आता कोण जाणे? काही शिस्तच राहिली नाहीये! जाऊ दे मेलं, मी आता नाष्टा करुन घेते नाहीतर आणखीन कलकलतं मग!! (आत जाते)
नारद (महालात प्रवेश करत) : नारायण! नाऽरायण!!
गरुड : या या मुनिवर! आज सकाळीच येणं?
लक्ष्मी लगबगीनं बाहेर येत (हातात धिरड्याची प्लेट) : यावं मुनिवर. आसन ग्रहण करा आणि मग हे धिरडंही!
नारद (काऊचवर बसत) : वा वा! देवी, आपण भलत्याच सुग्रण आहात, काय खमंग वास सुटलाय धिरड्याचा! वा!!
(धिरडं खात) नारद : कुठे आहेत तुमचे हे?
लक्ष्मी : अहो काय सांगू मुनिवर? सकाळपासूनच गायब झालेत! हा गरुड म्हणतोय की 'मानससरोवर' असं काहीतरी म्हणत गेले म्हणे!
नारद : हंम्म्म्. हे अंमळ भलतंच काहीतरी! आत्ता यावेळी तिकडे?
(नारद अजून एक धिरडं चापतात आणि वरती फक्कड चहाही हाणतात!)
आहा! आता कसं पोट छान भरलं बघा देवी. काल भूलोकावर फारच चालणं झालं होतं, आणि भूकही अंमळ जास्तच लागते आजकाल!
चला आता निघावे म्हणतो. हे घरी आले की कळवा.
लक्ष्मी : हो हो नक्कीच कळवेन. फोनवर भेटला नाहीत तर व्यनि तरी नक्कीच टाकेन!
नारद : हो हो व्यनिच करा. खरडींचा काय भरोसा, त्या 'बिका'ट वाटेने 'परा'गंदा होतात लगेच!
(एवढ्यात विष्णू महालात प्रवेश करतात)
लक्ष्मी (पुढे होत) : अग्गोबाई!! आलात? या, तुमचीच वाट बघत होते हो सगळे!! कुठे नाहीसे झाला होतात?
विष्णू : सांगतो, सांगतो!! आधी मला एक चहा आण आणि थोडं खायला सुद्धा!!
(लक्ष्मी आणते म्हणत आत जाते.)
विष्णू : हुश्य्.....दमलो बुवा! हं .....बोला मुनिवर कसं काय येणं केलंत?
नारद : काही नाही सहजच आलो होतो बरेच दिवसात आपलं दर्शन नव्हतं!
(लक्ष्मी बाहेर येत धिरडं आणि चहा टीपॉयवर ठेवते. विष्णू सगळं झटपट संपवतात आणि उपरण्याला हात, तोंड पुसतात!)
विष्णू (लोडाला टेकत): तर मी सकाळीच कुठे गेलो असा तुमचा प्रश्न आहे! ती एक समस्याच होती.
??
विष्णू : त्याचं काय झालं काल मी भूलोकावर हिंडत असताना अचानक दुर्वास ऋषी सामोरे आले. त्यांच्या चरख्यावर त्यांनी एक दोन इंची मिळमिळीत धागा काढला होता!
मी विचारता झालो की "तुम्ही इतके सुंदर धागे ह्यापूर्वी कातलेले असताना असला धागा कातण्याचे प्रयोजन काय?"
तर माझ्यावर कोपिष्ट होत गरजले "देवा, तुमच्यासारख्यानंही पक्षपाती व्हावं ना? इकडे स्पष्टवक्तेपणाचा आव आणताय तिकडे लोक प्रक्षोभक धाग्यामागून धागे उसवताहेत, तुमचं लक्ष नाही आणि माझ्या निरुपद्रवी धाग्यावर तुमचा आक्षेप??"
मी म्हणालो "समजलं नाही मुनिवर! काही उदाहरण देऊ शकाल का? चूक झाली असेल तर अवश्य दुरुस्त करेन!"
तेव्हा छद्मी हसत गरजले "आत्मपरीक्षण करा देवा! तुमचं तुम्हालाच सापडेल!"
तेव्हापासून जो भंजाळलोय मी तो आत्तापर्यंत!
अहो तुम्हाला सांगतो देवर्षी, रात्रभर तळमळतोय, डोळ्याला डोळा नाही!
ही, ही बघा, ही सगळी पुस्तकं दिसताहेत ना? सगळी चाळली हो, पण शिंचं कोणी आत्मपरीक्षण कसं करावं त्याबद्दल बोलतंच नाही.
गूगलवर 'आत्मपरीक्षण' असा सर्च दिला तर भलभलत्याच साईट्स उघडल्या! 
शेवटी वैतागून सक्काळी मानससरोवराच्या काठी जाण्यासाठी निघालो, म्हटलं त्या शांततेत तरी काही सुचेल पण नाही जातानाच एवढा ट्रॅफिक जाम की काही विचारु नका!
आणि तिथे सरोवराकाठी सुद्धा एक चमत्कारिक दृश्य दिसलं हो माझ्यासारखेच साताठजण विमनस्क चेहेर्याने तिथे हिंडत होते एकाला विचारलं तर म्हणाला "दुर्वास भेटले होते आणि आत्मपरीक्षणाबद्दलच सांगितलं!" तिथे झाडावरही काही मंडळी दबा धरुन बसली होती मज्जा बघायला बसल्यासारखी (त्यातला एकजण जाम उचकवत होता बाकीच्यांना, स्वर्गाच्या पश्चिम भागातला असावा असा संशय आहे.)
तिथे बराच वेळ डोळे बंद करुन बसलो तळ्याकाठी पण मग काही अप्सरा जलक्रीडेसाठी उतरल्या पाण्यात मग लक्ष लागेना, सारखे डोळे किलकिले व्हायला लागले!!
मग आलो परत बापडा.
(लक्ष्मी डोळे मोठे करुन) : हंम्म्म्म्म (एवढंच करते)
नारद (मोठ्यानेहसत) : हा हा हा हा!! अहो इतकंच ना मला एक एसेमेस केला असतात तर चुटकीसरशी सोडवला असता प्रॉब्लेम तुमचा!!!
विष्णू : आँ काय सांगताय काय?
नारद : मग! चला आत्ता लगेच निघूया.
विष्णू : कुठे?
नारद : आत्मपरीक्षणाला! दुसरीकडे कुठे?
(चला दोघेही निघतात)
लक्ष्मी : अहो पण मुनिवर येणार कधी तुम्ही?
नारद : आमची वाट नका बघू देवी अंमळ वेळ लागेल!
(महालातून बाहेर पडतात)
विष्णू : अहो पण मुनिवर निघालोय कुठे आपण!
नारद : देवा, अहो कसलं डोंबलाचं आत्मपरीक्षण हो! बशीभर काजू, एक तळलेल्या पापलेटने भरलेली डिश आणि फक्कडसा सोमरसाचा प्याला, बास सुरु आत्मपरीक्षण!!
विष्णू : आँ!!!!! मुनिवर ??!!...
नारद (डोळे मिचकावत) : चला, चला, लवकर चला! 'पूनम' झिंदाबाद!! आत्मपरीक्षण झिंदाबाद!!!
-चतुरंग
गुलाबाचा महिमा
प्रेषक राजेश घासकडवी ( गुरू, 03/11/2010 - 13:44) .गुलाब हा फुलांचा राजा. याच्या शेकडो जाती असतात, व दरवर्षी नव्या निघत असतात. म्हणजे नाव एकच पण प्रत्यक्ष फुलं अनेक. (आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, आम्हाला आयडी अनेक पण व्यक्ती एक हा प्रकार माहीत आहे. तर त्यावर आधीच उत्तर म्हणूनच तात्यांनी आयडी एकच (जवळपास) आणि व्यक्ती अनेक (जवळपास) हे उदाहरण दाखवलं असावं.) हा नावावरनं गुलाबी रंगाचा असतो असं वाटेल, पण तसं झालं तर तुम्ही कोत्या चक्रीय व्याख्येला बळी पडलात असंच म्हणावं लागेल. हा अनेक रंगात, अनेक वासांत व अनेक प्रकारे उगवतो - झु़डूप, कलम, वेल इत्यादी. पण शेवटी सगळ्यांना एकाच गुलाब या नावानेच ओळखलं जातं, कारण कोणी कवी म्हणूनच गेलेला आहे - नावात काय आहे, गुलाबाला कुठचंही नाव दिलं तरी शेवटी तो गुलाबच. आता त्या आंग्ल कवीला गुलाब मधलं एक अक्षर थोडं भदललं तर किती गलिच्छ अर्थ होतो याची कल्पना करता आली असती तर त्याने मराठीत तरी आपलं बाषांतर होऊ दिलं नसतं.
गुलाब हा संस्कृत काव्यात सापडत नाही. म्हणून त्या फुलाला असंस्कृत कदाचित म्हणता येईल. पण संस्कृत भाषेप्रमाणेच केवळ तग धरून असलेले व तिने एके काळी शिरोधारी चढवलेले कमळ (त्याचबरोबर कमळ-भुंगा जोडीही - शमा परवान्याच्या पर्शियन काव्य क्लिशेला संस्कृतचा सडेतोड जबाब) आजकाल गुलाबाच्या लोकप्रियतेचा बळी ठरले आहेत. हीन मानल्या गेलेल्या आयपीएल मधल्या हीन मानल्या गेलेल्या उत्तान आनंद-नर्तकी जशा आजकालच्या असंस्कृत जगात (त्यांच्या अर्धवट कपड्यांतून) पुढे येत आहेत व दंडावर ठेवलेला रुपया कलात्मक रीतीने ओठाने उचलणाऱ्या मराठमोळ्या सुसंस्कृत लावणी नर्तकी कशा मागे पडत आहेत त्याचेच हे पुष्पजगतातले पडसाद आहेत.
हा मदनाला किंवा रतीला विशिष्ट दिवशी अर्पण करावा असं त्यांचे ब्रह्मचारी भक्त श्री. संत. व्हॅलेंटाईन (की व्हॅलेतिनो? की व्हॅलेंटिनस?) यांचं म्हणणं होतं असा प्रवाद आहे. या प्रवादापायी अब्जावधी रुपयांची गुलाबाची फुलं १४ फेब्रुवारीला विकली जातात. ती तशी अर्पण केली जाऊ नयेत (किंवा कदाचित त्या विक्रीवर काही 'कर' रामाच्या चरणी अर्पण व्हावा) यासाठी मुतालिक यांसारखे हिंदु संस्कृतीचे (पाहिजे तो अर्थ काढावा) रक्षक (पुन्हा पाहिजे तो अर्थ काढावा) नि:शस्त्र (काठ्या लाठ्या न घेता - केवळ मुद्दे व गुद्दे यांचा वापर करून व अनेक स्त्रियांना महत्कर्तृत्वाने जमीनदोस्त करून [यांना आतंकवादी म्हणावे काय?]) सेना घेऊन जन आंदोलन करतात. त्याच आंदोलनाविरुद्ध काही नवी, जवळपास तितकीच नि:शस्त्र आंदोलनं (काळी शाई घेऊन, पण पेनातली नव्हे बरं का - ती कसली नि:शस्त्र? ती तर नीर्जीव...) निर्माण होतात. मग काही उच्चभ्रू संस्थळांवर यापैकी कुठचे कमी नि:शस्त्र यावर बरीच अधिक नि:शस्त्र चर्चा होते. त्या चर्चेचं फलित दोन्ही आंदोलनांपर्यंत पोचतं व ती दोन्ही पुन्हा डोकं वर काढत नाहीत. आधी असलीच जन आंदोलनं करणाऱ्या काही सेना मात्र त्यांचे धोत्र्याला शिव-गुलाब नाव देऊन १४ फेब्रुवारीला शिव-दिन म्हणवून घेण्याचे जुने आंदोलन पुन्हा उगाळत बसत नाहीत. मराठीच्या प्रश्नाप्रमाणेच त्यांनी हाही प्रश्न नवीन सेनेला आउटसोर्स केला असावा असे काही विचारवंतांचे म्हणणे आहे. अर्थात विचारवंत कोण व खरे विचार कोणाचे हे सेनेच्या सामर्थ्यावर ठरते हा वाक्प्रचार माहीत नसल्याने ते विचारवंतच नाही, असं इतरांचं म्हणणं आहे. काही काळांनी ते इतर लोक विचारवंत ठरतील बहुतेक. पण ते सेनेच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे.
गुलाब हे प्रीतीचं प्रतीक आहे. विशेषत: लाल गुलाब. काही मुक्त स्त्रियांच्या हातचे ते लाल मात्र काहींना मॅटेडोर बैलांना आकर्षित करण्यासाठी वापरत असलेल्या लाल कापडांप्रमाणे धोकादायक वाटतात. व ते स्त्रियांनी शोषण केलेल्या पुरुषजमातीचं रक्षण करण्यासाठी मारक्या रेड्याप्रमाणे त्यावर तुटून पडतात. ही युद्धं बघण्यासाठी खूप प्रेक्षक जमत असल्यामुळे एखाद्या सेकंदाच्या साथीदाराने असेच लाल रुमाल काढून दाखवणे, त्यावर लोकांनी मॅटे़डोरप्रमाणे तुटून पडणे, त्यात कोणी प्रेक्षकांतल्या व्यक्तींना शेफारलेलं म्हणणे, कोणी झाडांवर चढून बसून तिकिटाचे पैसे वाचवणे, तर कोणी इतरांना 'उचकू नको ग' म्हणताना कुणा बाबामहाराजांच्या आव्हानाने स्वत:च उचकणे, असे अनेक मनोरंजक उपखेळ सुरू होतात, व त्याने प्रेक्षक आणखीनच वाढतात. जरा भरकटलो, तर मी गुलाबाविषयी बोलत होतो...
गुलाब हे शांततेचं प्रतीक म्हणून सुद्धा वापरलं जाऊ शकतं. त्यासाठी विशेषत: पांढरे (फटक) गुलाब वापरले जातात. उदाहरणार्थ एखादा नवीन आलेला (वाटणारा) सदस्य हाटेलच्या मालकास काही वेडेवाकडे बोलला तर लोकांसमोरचं भांडण (कोण म्हणालं लुटुपुटूचं? जोडे तयार आहेत) खेळ खूप झाला म्हणून घाईघाईत मिटवण्यासाठी हे खाजगीत (वयाचा मान राखून वगैरे) दिले जातात असं मानलं जातं. मग सदस्याकडे ऑर्कुटवर वाटण्यासाठी लाल गुलाब शिल्लक राहातातच. पण तेही लवकरच सुकतात...
कवितांविषयी लिहिल्याशिवाय लेख कसा पूर्ण होईल? गुलाब या फुलाने अनेक (असंस्कृत) काव्यांना जन्म दिलेला आहे.
तेरा मुंह तो ऐसा है के जैसे मेहेका हो कोई गुलाब
दे साकी, जल्द ही दे साकी, मुझे एक गिलास जुलाब
(हा फार फार जुन्या काळी सापडलेला शेर आहे, पोट सुटलंय, टक्कल पडलंय.... कोणाचा तरुणपणी एखादा शेर हरवला होता का?)
जैसे गुलाबाचे काटे| टोचती वास घेत्याटे
तैसे रद्दड काव्याचे काटे| टोच्विन वाच्कास
(बरेच नवोदित कवी)
गुलाब म्हणजे गुलाब म्हणजे प्रेम असतं,
रोज हे एक त्याचं 'नेहेमीचंच' नेम असतं, (किंवा)
गुलाब हे 'रोज'चंच एक नेम असतं. (पापड कंपनीने कुठची ओळ चांगली ते ठरवावं)
(मंगेश पाऊसपा(प)डगावकर - नावातलं साधर्म्य पूर्णपणे वाचकाच्या मनात)
तर असे हे गुलाब महात्म्य - साठा उत्तराची कहाणी, पाच उत्तरी सफळ संपूर्ण.
इमर्जन्सी - २
प्रेषक प्राजु ( मंगळ, 03/09/2010 - 09:44) .तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.
-------------------------
आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि पट्टेरी (मुंबईचा जावई सिनेमामध्ये शरद तळवळकर ज्या प्रकारच्या अर्ध्या पँटीत हिंडत असतो तसल्या )कापडाचा गाऊन म्हणून काहीतरी घालायला दिलं. "प्लिज टेक ऑफ योर क्लोथ्स अण्ड वेअर दिस गाऊन" अशी विनंती वजा आज्ञा करून ती चालती झाली. तो सो कॉल्ड गाऊन मी उघडला. त्याला फक्त बाराबंदीसारखे बंद होते बांधायला, ते ही फक्त दोनच.. दोनबंदीच होती ती. झालं.. !! मी जमेल तिकडून झाकत झाकत ती दोन बंदी घातली. ती घातल्यानंतर, शक्य तितकं 'मी कम्फर्टेबल आहे..' असं दाखवत मी त्या व्हील वाल्या बेड वर जाऊन बसले. नवरा शेजारच्या खुर्चित अर्धवट झोपलेल्या लेकाला सावरत्-सांभाळत बसायचा प्रयत्न करत होता. मी एकदा कसंनुसं त्याच्याकडे बघून हसून घेतलं. इतक्यात आणखी एक नर्स आली मात्र यावेळी तिचा झगा निळा होता. तिने पुन्हा एकदा बीपी बघितलं. (दोन्-अडीच तास वेटिंगमध्ये बसून बसून वाढलं असेल की काय अशी शंका आली असावी) हातातल्या पॅडला लावलेल्या पेपरवर जास्तीतजास्त गचाळ अक्षरात काहीतरी लिहून , पुन्हा एकदा माझं नाव, माझ्या नवर्याचं नाव, विचारलं. माझ्या नावाचं पार कडबोळं करून तो निळा झगा निघून गेला. मग आणखी पाच मिनिटं गेली.. आणि मग पुन्हा एक निळा झगा घातलेला नर्स आला. त्याने सोबत आणलेल्या ट्रे मधून बरंच काय काय काढलं, आणि मग माझ्या छातीवर, पोटावर आणि कमरेवर स्टीलची प्रेस बटणं असलेली स्टिकर्स चिकटवली आणि त्या प्रत्येक बटणावर एकेक वायर लावून माझ्या मागे असलेल्या मॉनिटरला त्या सगळ्या वायरी जोडल्या. उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर एक स्टीकर लावून त्यातून एक वायर कुठेतरी जोडली. आणि जोरात बीऽऽऽऽप असा आवाज करून तो मॉनिटर चालू झाल्यावर माझ्याकडे एकदा निर्विकारपणे हसून तो निघून गेला. नवरा वरती चालू झालेल्या मॉनिटरकडे बघत होता. पण त्याच्या चेहर्यावर काही भितीदायक भाव दिसले नाहीत्..(त्याला बहुतेक काही कळत नव्हतं त्या ढीगभर वेड्यावाकड्या हलणार्या रेषांमध्ये.). इतक्यात डॉक्टर आले. त्यांचा झगा मात्र शुभ्र पांढरा होता. त्यांनी, त्या मशिनमधून इ सी जी ची प्रिंट काढली आणि.. "योर हार्ट इज गुड, आय डोन्ट सी एनी प्रोब्लेम हीअर.." असं म्हणत ती प्रिंट माझ्या नवर्याच्या हातात दिली. काय??? हार्ट इज गुड??? असं कसं होइल? मला तर अजूनही दुखत होतं. डॉक्टरना तरी काही कळतंय की नाही याची शंका यायला लागली. मग डॉक्टर म्हणाले,"आपण ब्लड टेस्ट आणि एक्स्-रे काढून बघू. " डॉक्टर निघून गेले. एकूण हा प्रकार आणखी किमान २-३ तासांचा होणार असं दिसत होतं. मी नवर्याला , लेकाला माझ्या मैत्रीणीच्या घरी घेऊन जायला सांगितलं. तिथे त्या अडगळीतल्या खुर्चित कितीवेळ तो बसून राहणार त्याला घेऊन!! नवरा लेकाला घेऊन गेला. आता त्या पडद्या-पडद्याच्या खोलीत मी, तो मध्येच बिपबिपणारा मॉनिटर आणि अंगावर लावलेल्या छपन्न वायरी इतकेच उरलो.
इतक्यात पडदा हलल्यासारखा झाला आणि पुन्हा एक निळा झगा आत आला. यावेळी झग्याचा घेर बराच मोठा होता. तिने ब्लड सँपल घ्यायला आले असल्याचं सांगून ट्रे मधल्या ४-५ टेस्ट ट्यूब्स दाखवल्या. एका पॅकेटमधून सुई काढली . माझ्या दंडाला घट्ट एक रबर बांधून माझी शीर शोधायचा प्रयत्न करू लागली. अंगावर एकूनच टोचाटोची करायला मला आवडत नाही . लहानपणी कधीतरी कान टोचले असतील तेव्हढेच, त्यापुढे मी कधीही काहीही टोचून घ्यायच्या भानगडीत पडले नाही. त्यामुळे मी तिच्या भल्या मोठ्या पण गोर्या मुखड्याकडे आणि तिच्या हातातल्या त्या सुईकडे पद्धतशीर पणे न पाहण्याचे ठरवले आणि दुसरीकडेच पाहू लागले. तिला माझी शीर लवकर सापडली असावी कारण तीने हात हातात घेतल्यानंतरच्या पाचव्या सेकंदाला "आईऽऽऽगं!" अशी जोरदार किंचाळी माझ्या तोंडून बाहेर पडली, डोळ्यांत पाणी आलं, आणि मनामध्ये त्या झग्याच्या पुढच्या आणि मागच्या बर्याच पिढ्यांचा उद्धार करून झाला. ती अजून काहीतरी खेळ करत असतानाच एक अतिशय गंभिर चेहर्याचा, गडद निळ्या रंगाचा झगा आत आला. या बाईसाहेब बर्याच अनुभवी असाव्यात. कारण या आत आल्यावर माझ्या शेजारी बसलेला आधीचा निळा झगा एकदम आदबशीरपणे या गडद निळ्या झग्याशी बोलू लागला. गडदनिळ्या चष्मेवाल्या झग्याने एका प्लास्टिकच्या कप मधे स्ट्रॉ घालून काहितरी प्यायला दिले. देण्या आधी ,"इट टेस्ट्स विअर्ड, बट यू हॅव टू ड्रिंक इट , हनी!!" असा मधाळ इशारा देऊन तीने ती स्ट्रॉ माझ्या तोंडात कोंबली. एकीकडे तो घेराचा झगा माझं रक्त शोषतच होता. ते कसलंस औषध प्याल्यावर .. माझ्या घशापासून आंतड्यापर्यंत सगळा भाग बधिर झाल्यासारखे वाटू लागले. आणि एकदम उलटीची भावना झाली.. त्या नादात मी त्या निळ्या झग्याच्या हातात असलेला हात हलवला आणि तो झगा एकदम चिडला. "आय नीड टू ड्रॉ फ्रॉम द अदर हँड, आय कॅनॉट टेक दिस सँपल.." शक्य तितका चेहरा शांत ठेवायचा प्रयत्न करत ती म्हणाली. इतक्यात चष्मेवाल्या झग्याने "आय वील डू दॅट.. डोन्ट वरी." असं सांगितलं. तो निळा झगा दात्-ओठ खात निघून गेला. मग पुन्हा एकदा दुसर्या हाताची शीर शोधून पुन्हा एकदा "आईऽऽऽऽगं!", पुन्हा एकदा डोळ्यांत पाणी आणि पुन्हा एकदा पुढच्या आणि मागच्या बर्याच पिढ्यांचा उद्धार असं होत पुन्हा एकदा माझं रक्त त्या ४-५ टेस्ट ट्यूब्स मध्ये घेतलं. मग त्याच सुईमध्ये सलाईन लावून, त्या सलाईन मधून कसलंस इंजेक्शन देऊन तो चष्मेवाला झगा निघून गेला. एका ट्रॉलीवर संगणक घेऊन येऊन पुन्हा एकदा माझं नाव, पुन्हा एकदा नवर्याचं नाव, पुन्हा एकदा इन्शुरन्स कार्ड, पुन्हा एकदा माझ्या नावाचं कडबोळं करून तो झगा निघून गेला. सलाईन संपलं तसं, सुई तशीच ठेऊन फक्त सलाईनचा स्टॅण्ड काढून टाकण्यात आला.
यानंतर मी जरा निवांत होत होते इतक्यात, एक चिमणीसारखा इवलुस्सा चष्मेवाला चेहरा, पडदा बाजूला सारून आत बघू लागला. माझं लक्ष जाताच, तोंड भरून हसून्.."हाऽऽऽय! यू आर प्रजॅक्टा??" असं विचारण्यात आलं मला. (प्रजॅक्टा..!! कप्पाळ माझं!!) झोपाळलेल्या मी, मानेनेच 'हो' म्हंटले.. तसा पडदा बाजूला सारून चिमणी आत आली. आणखी एक झगा ..पांढराच, फक्त फुलाफुलाचा!!! "आय एम हिअर टू टेक यू टू द एक्स्-रे रूम. " असं म्हणत म्हणत बेड्चा माझ्या मागचा भाग थोडासा वरती घेत बेडच्या दोन्ही बाजूंचं रेलिंग वरती सरकवत , मला दोन्ही हात आतमध्येच ठेवण्याची सूचना देत चिमणीने तो बेड ढकलायला सुरूवात केली. चिमणी बरीच स्ट्राँग होती, माझ्यासकट बेड ढकलू शकत होती.
एक्स्-रे रूम मध्ये गेल्यावर माझ्या पायावर चिमणीने मोजे चढवले. मोजे चढवता चढवता.."ओऽऽह गॉड! यू हॅव अ व्हेरी टायनी फीट.. वॉट्स योर साईज?" अशी हलकट कॉमेंटही पास केली. जरा रागच आला मला. मग अशी उभी रहा, तशी उभी रहा.. असं करत चिमणीने एक्स्-रे चं काम पूर्ण केलं आणि पुन्हा तो बेड, ते साईड रेलिंग, पुन्हा माझ्यासकट ढकलगाडी...! माझ्या त्या पडद्या पडद्याच्या रूम मध्ये मला आणून ठेवलं. चिमणीने मगाशी काढलेल्या त्या सगळ्या वायरी पुन्हा सगळीकडे जोडल्या, मॉनिटर चालू झाला आणि चिमणी गोऽऽड हसून निघून गेली.
आता मात्र मला सॉल्लिड झोप यायला लागली. एव्हाना २ वाजत आले होते. नवरा आला होता लेकाला माझ्या मैत्रीणीकडे ठेवून. त्या सांद्रीतल्या खुर्चित बसल्या बसल्या डुलक्या काढू लागला. आता हे ब्लड रिपोर्ट येणार, एक्स्-रे रिपोर्ट येणार आणि मग मला माइल्ड हार्ट अॅटॅक येणार होता असं निदान होणार.. अशी स्वप्नं रंगवत मी अर्धवट झोपी गेले. मध्येच कधीतरी हॉस्पिट्ल मधून कसले कसले आवाज होत होते. शेवटी ३ वाजले आणि माझे पेशन्स संपले. नवरा जाऊन त्या चष्मेवाल्या झग्याला भेटून आला. झग्याने रिपोर्ट तयार होतो आहे असे सांगितले. आणि मग बरोबर २० मिनिटांनी येऊन, माझ्या हातावरची ती सलाइन ची सुई काढून तिथे कापूस आणि पट्टी लावून, तिने रिपोर्ट्स नवर्याकडे दिले आणि "यू आर ऑल सेट.." असं सांगितलं. रिपोर्टमध्ये नक्की कशामुळे दुखलं छातीत याचं निदान न झाल्याचं लिहिलं होतं. मात्र पुन्हा दुखायला लागल्यावर ताबडतोब येण्याची सूचना होती. म्हणतात ना, न्हाव्याच्या हातात एकदा डोकं दिलं की, तो पूर्ण भादरूनच सोडतो.. त्यातला प्रकार. घरी आलो आणि झोपी गेलो.
मार्च २, २०१०. सकाळपासून बरी होते. दुखत होतंच छातीत. पण पुन्हा इमर्जन्सी ला जायचं धाडस नाही झालं. तो दिवस आणि पुढ्चा ३ तारखेचा दिवस तसाच काढला. मात्र ४ तारखेला खूप दुखायला लागलं. वाटलं, आता मात्र नक्कीच हार्ट अॅटॅक येणार. नवरा ऑफिसमध्ये होता. पुन्हा एकदा हार्ट्फर्ड मेडिकल सेंटर ला फोन लावून , हार्ट स्पेशालिस्टची अपॉइंट्मेंट घेतली. डॉ. आयज्ली नाव होतं त्यांचं. हे मात्र वयस्कर होते. कुठेही काहीही टोचाटोची न करता, केवळ हाताने तपासून त्यांनी निदान केलं, "दोन्ही बरगड्या जिथे जुळतात त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन सूज आली आहे.." उपाय?? साधाच, थोडी हाय पॉवरची पेन किलर!
सगळे सोपस्कार पूर्ण करून ती पेन किलर विकत घेऊन घरी आले. डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. इमानदारीत त्या गोळ्या घ्यायला सुरूवात केली. मात्र..!!! त्या इतक्या हेवी डोस गोळ्यांनी पोटात ढचमळायला सुरूवात झालीये. आता याचं काय करू??
- प्राजु
(पुन्हा एकदा.. वरील छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे या घटना सत्य आहेत, मात्र विनोद निर्मितीसाठी थोडाफार कल्पना विस्तार केला आहे.)
(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)
प्रेषक चेतन ( सोम, 03/08/2010 - 11:27) .रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा)
असो...
इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:
१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही. भारतीय खेळाडुला पाश्चात्य देशातिल अंपायर मुद्दामुन दंड करतात / आउट देतात असे ब्रेनवॉशिंग बीसीसीआयने केले, पण प्रत्यक्षात भारतीय खेळाडुंना पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही बीसीसीआयने, आणि विशेषतः सचिन तेंडुलकरनी केले नाही. ज्या आयपीएल मध्ये बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना उचलून धरल्याचा दावा केला, त्या स्पर्धेत अभारतीय खेळाडूंची आजची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या वीस वर्षात भारतातील खेळांच्या र्हासाचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ स्लेजींगचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट्मध्ये आणला. 'आयपीएल' मधील कित्येक चीअर गर्ल्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण सचिन तेंडुलकरला बाहेर करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी बीसीसीआयने भारतात प्रथम सुरु केली.
३. बीसीसीआयचे भारतीय कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. भारतात भारतीय माध्यमातून सुरु झालेल्या काही क्रिकेट स्पर्धांना (आयसीएल) पहिला विरोध बीसीसीआयचा होता.
४. सौरव गांगुली बीसीसीआयची ताकद ओळखण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयला ताब्यात ठेवणे त्यांला शक्य असूनही त्यानी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्याच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक लढाउ संघनायक' ही सौरव गांगुलीची ओळख फारशी खरी नाही. इतर क्रिकेट संघनायकांच्या मानाने त्यातल्या त्यात आक्रमक भाषा व काही स्पर्धांमध्ये उठबस एवढा फरक सोडला तर सौरव गांगुली आणि इतर क्रिकेट खेळाडु यांच्यात काही फरक नाही. 'अजित वाडेकर नंतरचा भारताचा उत्तम कर्णधार' हे सौरव गांगुलीचे वर्णन निरर्थक आहे.
६. धोनीला मिळणारा प्रतिसाद ही वीस वर्षे क्रिकेट पाहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. धोनी देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच उथळ आणि सवंग खेळ या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता वीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
बीसीसीआयने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. जडेजा, अझरुद्दीनपासुन स्टीव बकनरपर्यंतची उदाहरणे आहेत. मायकेल कॅस्प्रोविच हा तर फार पूर्वीपासून बीसीसीआयच्या हिटलिस्टवर असणार्या. त्यांला सचिन तेंडुलकरनी ज्याला 'खास स्ट्रेट ड्राईव्ह' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'झोडपुन' घेतले आहे. मायकेल कॅस्प्रोविचच्या या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
डिस्क्लेमिअरः हे लिखाण काल्पनिक आहे. (पण फोर्थ अंपायर आणि निखील बगळे बघुन डोक फिरतं हे नक्की)
(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)
प्रेषक राजेश घासकडवी ( सोम, 03/08/2010 - 01:42) .नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग
मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली. मी पोलिसांकडे या अन्यायाविरुद्ध तक्रार केली तर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.
माझ्या मागील अर्जावर हि प्रतिक्रिया दिली ---
पण मला वाटत कि काही माणस विशेषत: आपले पोलिस अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.
"वाहतुकीचे नियम पाळणे हा इथला कायदा आहे"
असे बजावण्यात आले.
अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..
हि यांची भाषा !!
हीच भाषा यापुढेही राहील!
मला क्षमा असावी पण पोलिसांनी माझी माफी मागितल्या खेरीज
शहराचे पोलिस/नगरसेवक/मंत्री कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत!
मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.
इथे काय चालवायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!
व माझ्यावरचा अन्याय मोठ्ठ्याने कर्ण्यावर ओरडून जनतेला सांगेन.
पोलिस/नगरसेवक/मंत्री यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया योग्य मार्गाने मांडावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!
जर अजून दंगामस्ती करून लोकांना आवाज करून उपद्रव केलात तर, आवश्यक वाटल्यास तुमचे लायसन्स जप्त होईल अगर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल याची नोंद घ्यावी..
फौजदार
»
असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
हा देश म्हणजे माझी आई आहे, आणि तो देश, त्यातील शहरं व रस्ते यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.
तरीही माननीय श्री मनमोहन सिंग साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
ड्रंकेश गाडीचालनकर
इमर्जन्सी! -१
प्रेषक प्राजु ( रवी, 03/07/2010 - 23:10) .इमर्जन्सी..
दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं. एकूण काय "पोटाला विश्रांतीची गरज नसते" असा समज करून घेऊन पोटाची व्यवस्थित काळजी घेतली जात होती.
आणि अचानक दुपारनंतर लक्षात आलं, की आपल्याला छातीमध्ये दुखते आहे. छातीमध्ये थोडंसं डाव्याबाजूला सतत दुखते आहे. कशामुळे असेल असा अंदाज बांधायचा प्रयत्न केला.. तर समोर फ़क्त माझ्या पुरणपोळ्याच आल्या.
गॅसेस!! हम्म!. संध्याकाळपर्यंत हे दुखणं जरा जास्तीच दुणावलं. (कशाला खाव्यात इतक्या पुरणपोळ्या!!) असो. हे जेव्हा असह्य झालं तेव्हा मात्र मी, आमच्या इथल्या हार्टफ़र्ड मेडिकल सेंटरला फोन केला आणि अपॉइंट्मेंट मागितली. पण ७ वाजून गेले असल्याने अपॉइंटमेंट ची वेळ निघून गेली होती. त्या अटेंडंटने काय होतंय असं विचारल्यावर , "आय हॅव अ चेस्ट पेन" असं दाबात उत्तर दिलं मी. घाबरून तिने नर्सला निरोप दिला. आणी थोड्याच वेळात नर्सचा फ़ोन आला. तिने काही लक्षणे फ़ोन वर विचारली. "छातीत डाव्या बाजूला दुखते आहे, ते कोणीतरी छातीवर बसून राहिल्यासारखे दुखते आहे का?" मी,"हो." ती," पाठीमध्येही दुखते आहे का? " मी, "हो". ती," श्वास घ्यायला त्रास होतो आहे का? मी, "नाही." ती,"दीज आर द सिम्पट्म्स ऑफ़ अर्ली हार्ट अॅटॅक. आणि तू ३० प्लस आहेस ना?" मी (जरा रागातच) "हो." मनातंतल्या मनांत "तुला काय करायचंय माझ्या वयाशी??" ती," तू एकदा तुझा इ सी जी करून घे. आजच्या आज इमर्जन्सी ला जाऊन सगळे चेकप करून घे." झालं!! माझं धाबं दणाणलं. मला हार्ट अॅटॅक!! माझ्या मुलाचं काय होईल?? माझ्या नवर्याचं काय होईल??
आता इ सी जी करायला इमर्जन्सी मध्ये जायचं म्हणजे काय होइल काही सांगता नाही येत. म्हणून अतिशय जड अंत:करणाने मुलाला, नवर्याला जेवायला वाढलं. मनात म्हंटलं,"खाउन घ्या आज भरपूर, उद्यापासून माझ्याहातचं खायला मिळेल कि नाही माहिती नाही." डोळे भरून आले माझे. नवरा म्हणाला "तू ही जेवून घे." पुन्हा मनांत म्हंटलं,"हो रे.. आता पुन्हा तुम्हा दोघांबरोबर जेवायला मिळेल की नाही माहिती नाही." आणि डोळे टिपत जेवायला बसले. माझ्या डोळ्यांत पाणी बघून नवरा म्हणाला ,"खूप दुखते आहे का? थांबेल , तू जेवून घे." त्याला बिचार्याला काय माहिती माझ्या डोळ्यांत पाणी कशामुळे आले ते!!
जेवणं आटोपली आणि आम्ही एमर्जन्सीला जायला निघालो. मुलाला मैत्रीणीकडे ठेवूया असा विचार आला मनांत, पण नको!! राहुदे, तो माझ्या नजरेसमोर असलेला बरा. काय माहिती मी आलेच नाही हॉस्पिटलमधून घरी तर!!... मी माझ्या पर्स मध्ये मला लागणार्या वस्तू घेतल्या. इन्शुरन्सच कार्ड घेतलं. पाण्याची बाटली घेतली (शेवटच्या वेळी उपयोगी पडेल कदाचित!! जाता जाता हॉस्पिटलचं पाणी नको तोंडात पडायला). शेवटी कपडे भरायला लागले तेव्हा मात्र नवर्याचे पेशंस संपले. त्याचा चेहरा बघून मी कपडे भरायचा विचार रद्द केला. इमर्जन्सी ला गेलो. तिथे गेल्या गेल्या मला जाणवलं आपला डावा हातही दुखतो आहे... म्हणजे हे नक्कीच हार्ट अॅटॅकचे लक्षण आहे. तिथे प्रायमरी चेकप मध्ये माझं बीपी पाहिलं गेलं आणि नाव नोंदवून घेऊन आम्हाला वेटिंग रूम मध्ये बसवलं. वाटलं, साधारण अर्ध्या तासात आत घेऊन जातील. घड्याळात पाहिलं ८.३० वाजले होते रात्रीचे. आमच्या सारखेच तातडीची सेवा हवे असलेले खूप लोक त्या वेटिंग रूम मध्ये होते.
समोर टिव्हीवर एकापाठोपाठ एक विनोदी मालिका सुरू होत्या. एक बाई व्हिलचेअर बसून पोट धरून कण्ह्त होती. हम्म.. अपचन झालं असणार हिला. एक सधारण २४-२५ वर्षाची मुलगी तिच्या तान्ह्या मुलीला घेऊन आली होती. तिच्यासोबत साधारण एक ४५ वर्षाची बाई होती , तिची आई असावी. नक्की कोणासाठी आले असावेत? मी विचार करत होते.. कारण त्या तिघिंपैकी कोणीही आजारी दिसत नव्हतं. आणि मग बघता बघता ४-५ बायका आलटून पालटून त्या तिघिंना तिथे येऊन भेटून गेल्या.. नक्की काय चालं होतं कहीच कळलं नाही. पण प्रत्येकीच्या अतिप्रचंड घेरामुळे जागा व्यापली गेली तिथली आणि अचानक फ़ारच गर्दि झाल्यासारखे वाटू लागले. असेच आजूबाजूचे निरिक्षण करण्यात तास भर निघून गेला. आता छातीतले दुखणे वाढू लागले आहे असे जाणवले. पाठितही ठणका वाढला. मी रिसेप्शन ला जाऊन विचारले ती म्हणाली "तुझ्या आधी अजून ३ नंबर आहेत.. मग तुला आत बोलावतील." अरेच्च्या!! मला इथे हार्ट अॅटॅक होऊ घातलाय आणि ही मला माझ्या आधी ३ नंबर आहेत असे सांगते आहे!! रागच आला. पण काहीही न बोलता पुन्हा जागेवर येऊन बसले. दरम्यान नवर्याच्या मांडिवर लेक झोपी गेला. पुन्हा आजूबाजूचे परिक्षण निरिक्षण करण्यात दिड तास निघून गेला. मनांत आलं, "आता इथे बसल्या बसल्या मला हार्ट अॅटॅक येईल मग कळेल या इथल्या रिसेप्शनवालीला.." शेवटी रात्री १२ वाजता मला आत बोलावले. आणि अतिशय जड आंत:करणाने आजूबाजूच्या लोकांकडे मी पाहून घेतलं. लेकाच्या डोक्यावरून मायेने हत फ़िरवला.. त्याला जवळ घेतलं आणि नवर्याकडे असहाय्य पण दु:खी मनाने पाहिलं. तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.
क्रमश:
(वरील 'छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे' ही घटना जरी सत्य असली तरी बाकी माझा कल्पना विस्तार आहे. )
(मनुष्य विरुद्ध प्राणी !!!)
प्रेषक प्रशांत उदय मनोहर ( रवी, 03/07/2010 - 13:21) .माणसांचा प्रश्न दिवसेंदिवस भारत, अमेरिकेत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर देशांतसुद्धा असेलच. रात्रीसुद्धा आणि विशेषकरून दिवसा उजेड पडल्यावर या माणसांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या दिवसाच्या मोठमोठ्या महत्त्वाकांक्षामुळे जंगलतोडसुद्धा होते.
झाडे, पशु-पक्षी, सगळ्यांनाच या माणसांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने अपघात होऊन प्राण्यांचा मृत्यू होण्याचा संभव असतो. मनुष्यप्राणी सोडून सर्वांनाच माणसांचा त्रास होतो. माणूस (वाहन) चालवून/लचका तोडून प्राण्याला मरण देवू शकतो. माणसांमुळे इकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते.
काही कथित मनुष्यप्रेमी कुत्रे या माणसांच्या घरांचं संरक्षण का करतात हे आकलनापलिकडचे आहे. त्यांना घाबरणे उचित नसेल तर मनुष्यप्रेमी प्राण्यांनी जंगली किंवा प्राणीसंघटनेच्या किंवा स्वत:च्या कल्पकतेतून त्या माणसांसाठी एक जरब/त्रास निर्मून त्यात त्यांना कोसावे आणि २४ तासांनी चावावे. नसबंदी वगैरे करून त्यांची पैदास नियंत्रीत करण्याचे मागे कुठेतरी ऐकले ते प्रत्यक्ष होते की नाही देव जाणे! मनुष्यप्रेमी कुत्रे-मांजरी मंडळींनी एकदा तरी रात्री हमरस्ता सहीसलामत ओलांडून दाखवावे. म्हणजे या गोष्टींची तीव्रता व त्रास त्यांना समजेल.एकदा तरी माणसांना प्राण्यांच्या मर्जीने आयुष्य जगणं भाग पडावं, त्यांच्या पिल्लांऐवजी इतर प्राण्यांनी दुधावर हक्क गाजवावा, एकदा तरी प्राण्यांच्या "स्वच्छता-मोहिमे"मुळे माणूस बेघर व्हावा, एकदा तरी प्राण्यांनी निर्माण केलेल्या विषारी वायूत गुद्मरून मरावा, एकदा तरी माणूस प्राण्यांचं वाहन बनावा, अशा माझ्यासारख्य असंख्य प्राण्यांच्या अनेक इच्छा आहेत.
तसेच माणसांकडे राहणार्या पाळीव मनींनी (मांजर म्हणू नका बरं! त्या चिडतील आणि त्यांच्या 'मालकिणी'ही !) आमच्यासारख्या रस्त्यावरील मांजरींचे बिनधास्त चालणे मुश्कील करून टाकले आहे. (त्यांनी पट्टा बांधून स्वत:ला सुरक्षित ठेवलंय आणि म्युनिसिपालटीची "माणसं" आम्हाला उचलून नेतात
) एवढे बरे की, निदान जंगली प्राण्यांना, विशेषत: बिबट्यांना आणि पिसाळलेल्या हत्तींना माणूस घाबरतो आहे. नाहीतर माणसापासून सगळंच भीत भीत करण्याची पाळी येईल.
याबाबत काय करता येईल?
पाळीव श्वान व मन्या "माणूस"मंडळींच्या दबावाखाली एवढं का झुकतात?
मनुष्यप्रेमी श्वान, मनी, गोमाता, ढवळ्या-पवळ्या, अश्व, या माणसांना अद्दल का नाही घडवत?
माणसांबाबत कुठे तक्रार करायची?
हत्ती पिसाळून, बिबट्या घरात घुसूनही माणूस शहाणा का होत ननाही? प्राणीप्रेमी माणसे प्राणीहक्कांची राखण करतात, पर्यावरणसंतुलनास त्याचा उपयोग होतो, ही एक वेगळी गोष्ट झाली, पण म्हणून सामान्य माणसांना प्राण्यांना त्रास देण्याची/मारून टाकण्याची परवानगी द्यावी, असे नाही.
भारतीय महिलांविषयीचे विनोद
प्रेषक चिंतातुरजंतू ( शनी, 03/06/2010 - 11:50) .आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
- आपल्या मते विनोद चांगला असावा.
- विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
- विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
- विशुध्द ज्ञानार्जनात भावना भडकणे अभिप्रेत नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक संवेदनशील व सुजाण स्त्री असूनही त्यांना सर्व प्रकारच्या जातीय, प्रांतिक, लैंगिक, धार्मिक आणि इतरही अस्मितांचे दर्शन घडवणार्या विनोदांचेही वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
एखाद्या समाजात एखाद्या समाजघटकाविषयी उत्पन्न होणारे विनोद हा समाजशास्त्रीय संशोधनाचा एक भाग असतो, याविषयी काही शंका असल्यास विनोदांवरील हा निबंध वाचावा. त्याउप्पर काही शंका असल्यास त्या आम्हांस विचाराव्या.
धन्यवाद,
चिंतातुर जंतू
कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते
प्रेषक राजेश घासकडवी ( शनी, 03/06/2010 - 08:10) .कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते
कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते
कथा कशा असतात? महाभारतासारख्या सगळंच भरताड असलेल्या, भरकटलेल्या कथा सोडल्या तर मुळात त्या अगदी सोप्या असतात. (कवितक प्रमाणे कथक लिहिण्याची सुद्धा आमची मनीषा आहे...) एक तरुण एका तरुणीच्या प्रेमात पडतो. मग पागल होऊन प्यार मुहब्बतची गाणी म्हणतो. ती सुरूवातीला त्याला प्रतिसाद देत नाही, किंवा नकार देते. (मुलं लाईन मारतात व मुली लाईन देतात - फार क्वचित... अशी कोणीतरी 'टाकलेली लाईन' एका 'प्रतिसादात' वाचली होती.) मग तो पुन्हा पागल होऊन प्रेमभंगाची दर्दभरी गाणी म्हणतो. मग अचानक काहीतरी शौर्याचं काम करून तिचं आर.पी (हृदय परिवर्तन - ते एच.पी. असलं तरी तसं म्हणण्याची परंपरा आहे) करतो. मग ते दोघं मिळून मुहब्बतीची गाणी म्हणतात. पुन्हा काहीतरी मध्येच त्या मुहब्बतवर संकटं येतात. त्यांचं निवारण करून ते सुखाने शेवटपर्यंत जगतात. गोष्ट संपल्यासारखे.
पण खर्या गोष्टी इथे संपत नाहीत हे आपल्या सर्वांना माहीत असतं. राजाराणीच्या जीवनात ते एकत्र आले की त्या दोघांपेक्षाही मोठं काहीतरी तयार होतं - ते म्हणजे नातं. खरं तर आधीचे सर्व प्रसंग हे देखील त्या एकाच नात्याचे वेगवेगळ्या वेळचे वयाचे आविष्कारच आहेत असं म्हणायला हरकत नाही. अल्लड वयातली नाती ही लहानग्या - नवजात बालकाच्या कुल्ल्याप्रमाणे मऊ, कोमल, निरागस... तारुण्यात, ऐन बहरात आकर्षक भरीव नितंब होतात तर नंतर फार वाढून थोराड झालेल्या ढुंगणांसारखे. अशा या विविध रूपांवर केव्हा ना केव्हा आपल्याला एखाद्या कवितेचं सुंदर वस्त्र चढवावंसं वाटतंच. ते वस्त्र म्हणजे कधी गोंडस गुबगुबीत प्राण्यांची चित्रं असलेला, डायपर कधी असतो. किंवा कधी लेसची नक्षी घट्ट रुतवून अंग अंग शृंगारीत करणारी व्हिक्टोरिया सीक्रेटमधली पॅंटीसारखी सटीनदार कविता चढवावीशी (आणि मग हलकेच उतरवावीशी) वाटत असेल. अगदीच काही नाहीतर सगळं झाकून दिसेनासं करणारी, नात्याच्या गहन चर्चेची - जुन्यापुराण्या वादांच्या नाड्यांच्या गाठी असलेली - चट्टेरीपट्टेरी लांब कुलकर्णी बर्मुडा कविता घालायची सर्वांवरच पाळी येते. प्रेमभंगाची लाथ बसून त्याचं शेकलेलं स्वरूप पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मलमासारखी किंवा जळफळाटाची आग बाहेर टाकणारी (फारच ताणली बुवा प्रतिमा, आता लवकर आवरा) कवितासुद्धा खूप डीमांडमध्ये आहे. इतकं असलं तरी मागच्या लेखात मांडलेल्या गृहिणी-गृहस्थांच्या अल्पोपाहाराच्या प्रश्नांइतकेच नव्या तरुणाईचे आणि मध्यमवयीनाईचे हे नात्याचे प्रश्न तितकेच गहन आणि तितकेच अनुत्तरीत आहेत.
पहिल्या भागात दिलेल्या मेदूवड्याच्या, झटपट डोशाच्या कृती या सार्वजनिक वाटपासाठी होत्या. कोणालाही सहज भिडावेत, आणि डोळ्यात पाणी टचकन आणून चटकन दोन मीटिंग्जच्या मधल्या पाच मिनिटात वाचतावाचता फाड फाड फेकाटे स्टाईल जीवनाविषयी अर्थबोध देऊन जावेत अशा. आज काय केलं, तर प्लास्टीक सर्जरी दाखवून बॉसला मनात शिव्या घातल्या (दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करता आलं नाहीतर अकरा अक्षरी शिवी हाणता आली असती...) आणि काय केलं - सहकाऱ्यांची अगम्य भाषा ऐकून कानाचा खडखडाट करून घेतला व त्यांच्यातला कोण मॅनेजर होण्यासाठी दादागिरी करतोय, बॉसपुढे पुढेपुढे करतोय याचं विश्लेषण केलं. आणि हो, जाता जाता जीवनविषयक मूल्यं सुद्धा शिकले(लो) असं कोणालाही म्हणता यावं अशा. नात्याच्या कविता थोड्या वेगळ्या असतात. त्यांची मूळं वेगळी असतात. त्यांचा लक्ष्य दर्शक (टार्गेट आडयन्स) वेगळा असतो. त्यांचे उपयोग वेगळे असतात. एका अर्थाने तो जीवन वगैरेचा पोटभाग आहे, त्यामुळे त्यावर नातं म्हणजे काय असतं टाईप कविता करता येतात हे आपण गेल्या भागात बघितलंच. नात्याची व्याप्ती अजून जास्त असते. त्यांच्यासाठी हृदयाचा एक वेगळाच कोपरा ठेवलेला असतो. काही चतुर व्यक्ती दोन तीन वेगळे कप्पे करतात व त्यात वेगवेगळ्या व्यक्तींना ठेवतात. (कोलटकरांच्या 'तक्ता' या कवितेचा अर्थ या अंगानेही घेता येईल का? 'जोपर्यंत त्या कप्प्यांच्या चौकटी तुटत नाहीत तोपर्यंत मांजरीला लांडोरीवर झेप घेऊन तिला बोचकारायची व नंतर दोघींनी मिळून क्षत्रियाला उखळीत घालून कांडण्याची काहीच गरज नाही.' अधिक माहितीसाठी पाहा मूळ कविता, व तीखालील प्रतिसादात लावलेला कोता अर्थ). पण मुख्य फरक म्हणजे तो दोन व्यक्तींमधला संवाद असतो.
जग आता अधिकाधिक क्लिष्ट होत चाललेलं आहे. नव्या जाणीवा, नवी स्वातंत्र्यं, नवे आयडीज यामुळे नात्यांच्या प्रतिमा बदललेल्या आहेत. अपेक्षा बदललेल्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीच्या नाकावर टिच्चून मनू वगैरेला न जुमानता स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवलं. 'न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति' - ला 'अनलेस शी पगारं अर्नति' ची पळवाट लावून प्रधान-पुरुषांनीही आपल्या नाकांवर टिच्चून घेतलं. त्यात मुतालिक वगैरेंच्या नाकावर टिच्चून संत व्हॅलेटाईनचा दिवस पाळणं सुद्धा आल. त्यामुळे कलाक्षेत्रात इतका आमूलाग्र बदल झाला की विचारता सोय नाही. एके काळी ही सगळी काव्यं म्हणजे स्त्रियांचं, पुरुषांनी, पुरुषांसाठी केलेलं वर्णन या स्वरूपाची असायची. उत्तम शरीरयष्टी असलेल्या पुरुषांचं वर्णन बायकांना ऐकायला मिळायचं ते हनुमान वगैरेंचंच. (म्हणूनच बहुधा त्याला वानर केला, आणि तितकं पुरेनासं झालं म्हणून की काय ब्रह्मचारीही केला. मग मगरीच्या पोटात घामाचे थेंब वगैरे त्यातूनच आलं.) पुढे जसजसा स्वातंत्र्याचा परीघ विस्तारला तसतसे ह्या तीन भूमिकांमध्ये सरमिसळ व्हायला लागली - पण बराच काळ पहिली आणि तिसरी ही विरुद्धच राहिली. मग गेल्या दशकांत खूपच विस्तारला तेव्हा शेवटी आठही पर्म्युटेशनं शक्य झाली. ही चावट, वात्रट वर्णनं लोकं मोठ्या चवीने एकांतात वगैरे वाचायचे. 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का, लाजता?' हे गाणं आता लहान मुलांनासुद्धा पोरकट वाटेल. असो, खूप बदल झालाय वगैरे वगैरे. आम्ही आमच्या लेखनिक प्रणालीने सांगितलेला सगळा मसाला लेखात टाकून झाला. आता कवितक प्रणालीमध्ये वापरात असलेल्या प्रेमगीतांच्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूया.
प्रेमकाव्य १: मी तुझ्या प्रेमात आहे मला लाईन दे.
प्रेमकाव्य २: मी पण तुझ्या प्रेमात आहे, ही घे लाईन. (जवळपास नाहीच...)
प्रेमकाव्य ३: मी/आपण दोघं प्रेमात आहोत, कित्ती कित्ती छान.
विरही/प्रेमभंगी काव्य : (मालक चुकीचा शब्द तर वापरला नाही ना?) तू नाहीस/ माझ्या भावनांचा चुराडा झाला/तू केलास, आता जीवन व्यर्थ आहे.
याचा फार्म्युला असा येतो : मी/आपण - तू/आपण - प्रेम आहे/नाही. त्यामुळे/तेव्हापासून जग/आयुष्य सुंदर/असह्य आहे.
बस्. इतका सोपा आहे. गेल्यावेळी आपण क्ष हे य असतं, त्यामुळे ते व सारखं क करायचं असतं असं सूत्र बघितलं. या कवितेचं सूत्रदेखील तसंच आहे, थोडंसं वेगळं.
क्ष१ जेव्हा व१ क१ झालं तेव्हा क्ष२ व२ क२ झालं. [झालंच्या ऐवजी होतं, असतं; जेव्हा-तेव्हाच्या जागा बदलणं, वेगवेगळी पादपूरकं वापरणे हे एव्हाना तुम्हाला माहीतच असेल]
क्ष१ बहुतेक वेळा तू, मी, आपण, हृदय घ्यावे लागतात. ते दोघांमधल्या संवादाचे, संबंधांचे शब्दही (स्पर्श, प्रेमाची नजर, भावना) असू शकतात. क१ हे वाट पहाणं, दिसणं, भेटणं, हसणं, प्रेमात पडणं, एकत्र असणं, अव्हेरणं, नाकारणं, झिडकारणं अशा नात्यांमध्ये करण्याच्या गोष्टी असतात. क्ष आणि क मध्ये कधीकधी सरमिसळ होऊ शकते, कारण क्रियापद हे नाम म्हणून येऊ शकतं. व१ हे अर्थातच या दोनशी मिळतंजुळतं विशेषण, किंवा जोडणारा शब्द.
क्ष२ साधारणपणे निसर्गातल्या (चंद्र पाऊस, सकाळ, पानं), कलेतल्या (स्वर, नाद, गीत, संगीत, शब्द, अर्थ वगैरे) सुंदर गोष्टी किंवा मन, अंग, मी. क२ हे खूप महत्त्वाचं असतं. त्यात सगळ्या काव्याचा अर्क आहे. हे नादचित्रमय क्रियापद असलं पाहिजे. झंकारणे, मोहरणे, लाजणे, रोमांचणे, उजळणे हे नेहेमीचेच यशस्वी शब्द आहेत. व२ हे अर्थातच तसंच महत्त्वाचं होतं. खूप वेळा धुंद, गोजिरे, भावूक, गहिरे, असे शब्द वापरून निभतं. जर विरहिणी, प्रेमभंगी कविता करायची असतील तर झाकोळणे, विझणे, अंधारणे वगैरे क्रियापदं आणि उजाड, वैराण, कोमजलेले वगैरे शुष्क शब्द घ्यावे.
आता तुम्ही म्हणाल की याच्यात यमकी शब्द कुठे आहेत? एव्हाना तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल की क्ष, व, क हेच य च्या जागी येऊ शकतात. क्रियापदं विशेषत: यमक साधायला खूपच उपयुक्त पडतात. किंवा एकच पादपूरक जेव्हा, तेव्हा हेही यच्या जागी वापरता येतात. या सर्व गोष्टींचा सराव करा. मी दोन कडवी लिहून दाखवतो...
क्ष१, व१, क१ = तू, मनात, येणे, क्ष२, व२, क२ = स्वप्न, गोजिरे, खुलणे
क्ष१, व१, क१ = तू, समोर, दिसणे, क्ष२, व२, क२ = फूल, धुंद, बहरणे
शिरतेस मन्मनी तू जेव्हा
जणु स्वप्न गोजिरे खुलते
दिसतेस समोरी तू जेव्हा
मनि फूल धुंद बहरते
क्ष१, व१, क१ = स्पर्श, तन, भिरभिरणे, क्ष२, व२, क२ = घन, शरीरी, ओथंबणे
क्ष१, व१, क१ = आलिंगन, वेड, लावणे, क्ष२, व२, क२ = पाऊस, जमिनीवर, पडणे
यापासून
स्पर्श तुझा तनि भिरभिरतो
घन ओथंबुन ये मज शरिरी
आलिंगन तव वेड भरी
जणु पाउस पडतो उष्ण धरी
काही पादपूरकं बदलली आहेत हे लक्षात आलं असेलच. यातसुद्धा दोन गोष्टी नोंदण्यासारख्या आहेत. एक म्हणजे यमक फक्त प्रत्येक कडव्याच्या दुसऱ्या ओळीशी साधलं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या कडव्यात स्पर्श आहे, दुसऱ्या कडव्यात मिठी आहे. जर आधीच्या कडव्यांमध्ये आठवण, दृष्टी, हास्य असे क्ष वापरत गेलेले असले तर कवितेला एक खोली येते. घन ओथंबणं व सर पडणं हे एकामागोमाग आल्यानेही एक सहजता, अनिवार्यता येते. ते नुसतं तांत्रिक काव्य राहात नाही. हे दुर्दैवाने अजून तरी कवितक मध्ये घेता आलेलं नाही. प्रयत्न चालू आहेत. कविता आणखी चांगली करण्यासाठी चौथी ओळ - 'जणु सर वळवाची तप्त धरी' अशी केली तर जास्त खुलते.
कविता जास्त गहन अर्थाची करायची असेल तर हे काव्य प्रियाला उद्देशून म्हटलंय की देवाला यात थोडीशी संदिग्धता ठेवावी. त्यासाठी मी तुझ्या मीलनाची वाट बघते. तू कधी बरं येशील? आपल्या आत्म्याचं मीलन कधी होईल? तू मला केव्हा जवळ घेशील? असे प्रश्न टाकावे. मीरेने हेच केलेलं होतं.
आता जरा एक कठीण तंत्र दाखवतो. (तंत्र दाखवण्यासाठी मी आत्ता यमकाकडे दुर्लक्ष करतो आहे)
आपण एकत्र असताना
चंद्र आकाशी उजळतो
रात्र काळी झळकते
स्वप्न डोळ्यात उगवते
जगण्यात धुंदी भरते
एकच पहिलं वाक्य घेऊन दुसरी चार वाक्यं घेतली आहेत. याच्यातून विरहिणी करायची तर सरळसरळ विरुद्ध करावं.
तू जेव्हा नसतेस
चंद्रही उजाड दिसतो
रात्र अंधारी एकाकी
स्वप्न मावळून जाते
जगण्यातली धुंदी संपते
खऱ्या कवीची प्रतिभा अशी की विरह नसताना, बाकी सर्व असताना नातं मेलेलं असू शकतं हे जाणणं. या मरण्यात जी शोकांतिका आहे ती शमा-परवाना स्टाईल विरहात नाही. हे तंत्राच्या पलिकडचं आहे. त्यामुळे कवितक मधून त्याची अपेक्षा करू नका. हा विचार एकदा सुचला की व्यक्त करण्यासाठी तंत्र वापरता येतं.
चंद्र आकाशी उजळतो आहे
रात्र काळी झळकते आहे
तू माझ्याबरोबर आहेस
पण ते स्वप्न कुठे गेलं?
ती धुंदी कुठे गेली?
ओळखीचं वाटतंय?
असो. एकदम कठीण तंत्रांची ओळख करून देऊन तुम्हाला दडपून टाकायचं हा हेतू नाही. हा लेख आधीच खूप मोठा झाला त्यामुळे नात्यांच्या घनगंभीर कवितांसाठी बिनतरुणाईला व मध्यमवयीनाईला पुढच्या लेखाची वाट पहायला लागेल. पण तोपर्यंत कविता लिहायची वाट बघू नका. प्रेमकाव्य म्हणजे काय फक्त व्हॅलेंटाईनच्या दिवशीच करायचं का? तुमचे क्ष, य, व, क निवडा आणि एक सुंदर प्रेमगीत बनवा. डकवा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीला दाखवा... तंत्राची चर्चा करण्याची गरज पडणारच नाही असं वाटतं.
आभार/उल्लेख : प्लास्टीक सर्जरी - टारझन; सहकारी - शुचि; अकरा अक्षरी शिवी - बिपिन कार्यकर्ते; कुलकर्णी बर्मुडा, लाईन टाकणे - कोणीतरी माहीत/लक्षात नसलेला मिपाकर
कवितेची पाककृती १ : जीवदर्शी आशासूक्ते
प्रेषक राजेश घासकडवी ( बुध, 03/03/2010 - 09:14) .कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते
(सरस्वतीदेवीला व ती नसल्यास तिच्या आईला अर्पण. तुम्ही या दोहोंपैकी कोणी नसल्यास हे तुम्हाला अर्पण नाही.)
आयुष्य म्हणजे एक विडा असतो
प्रेमाने लाल लाल रंगवायचा असतो
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो
फार कठीण, पण तो सोडवायचा असतो
अशी कविता करायला कोणाला आवडणार नाही? आपल्या प्रियकराला त्याच त्याच साजणगहिऱ्या हाका नवीन शब्दांनी मारायला कोणाला नाही भावणार? जिवाच्या काहिलीनंतर त्या उकळत्या तेलात एका सुंदर खुसखुशीत कवितेचा मेदूवडा तळता आला तर एखादं चर्चेचं वर्तमानपत्र वाचत, किंवा कलादालनातले निसर्गी फोटो बघत, विडंबनाच्या कुरकुरीत पेपरडोश्याबरोबर, आणि एखाद्या लावणीच्या झणझणीत सांबारात बुडवून तो कोण मिटक्या मारत खाणार नाही? अशी खुमासदार प्लेट जर एखाद्या हाटेलात किंवा घरी मित्रांना सर्व्ह केलीत, तर त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव का होणार नाही? खूप नवशिके कवी प्रयत्न करतात, पण पदार्थ जमला नाही म्हणून निराश होऊन जातात. त्यात त्यांची काव्याच्या अन्नपूर्णेवर - सरस्वतीवर श्रद्धा नसते, साधना कमी पडते, पूजेची सामग्री कमी पडते असं नसतं. (खबरदार कोणी गैर अर्थ काढला तर!). त्यांना मंत्रांचं ज्ञान नसतं एवढंच.
पूर्वी जग सोपं होतं, सुंदर होतं. त्याकाळी हे प्रश्न उद्भवतच नसत. कविताही आय.पी.एल. मधे नाचणाऱ्यांसारखी उठवळ झगझगीत नव्हती. ती साधीभोळी, मराठमोळी होती. आणि ती करण्यासाठी त्या काळी जाती असायची. त्यावर बसले की आपोआप ओव्या सर्वांनाच सुचायच्या. आजकाल नवीन तंत्रज्ञान आलं, त्यात ती जातीही गेली आणि त्या ओव्याही. जातं घेणं, आणि दळत बसणं हे कष्ट आहेत. ते कष्ट टाळण्यासाठी चक्क्या आल्या. गृहस्थाबरोबरच नोकरीला बाहेर पडणाऱ्या गृहिणीला मदत करायला घराघरात फूड प्रोसेसर आले (गृहस्थ अजूनही मदत करत नाहीत ही गोष्ट अलाहिदा). अन्नपदार्थ वाटण्यासाठी (म्हणजे देऊन टाकण्यासाठी किंवा भास होण्यासाठी नव्हे) जसे फूड प्रोसेसर वापरले जातात तसे ज्ञान वाटून त्याचा सहज खाता येईल, पचायला सोपा असा भुगा करण्यासाठी आपण वर्ड प्रोसेसर वापरतो. एकंदरीतच आजकाल संगणकाचा जमाना असल्यामुळे संगणक प्रणालीचा वापर जीवन सुकर करण्यासाठी झालेलं आहे. मग तीच प्रणाली वापरून कविता का करता येऊ नयेत? त्यासाठी रंगबावरं व्हा, उन्मुक्त व्हा, आणि ध्येयवेड्या रूपरेषा शोधत भिरभिरा - हे सगळं झंझट कोणी सांगितलंय? हे तर जातं घेऊन दळत बसण्यापेक्षाही वाईट. म्हणजे आपल्याच विश्वशोधी हुरहुरीपायी काट्यांशी झुंज देऊन निगरगट्ट झालेल्या टाचांखाली एक एक अनुभूतींचा दाणा घेऊन तो चिरडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. कोणी सांगितल्येत एवढे कष्ट?
आता वरचे काही शब्द वाचून तुम्हाला वाटलं असेल, वा, घासकडव्यांची भाषा म्हणजे अशी मोरपंखी आहे, अशी मोरपंखी आहे म्हणून सांगू - की अगदी नीलगर्भच. पण खरं सांगतो, सगळेच शब्द आपले असण्याची गरज नसते. शब्दांवर कोणाचीच मालकी नसते. कवितांवर असू शकते, पण त्या तुम्ही तुमच्या फूड प्रोसेसरवर पुरेशा दळून बारीक तुकडे केले की कुठचे कुणाचे हे सांगता येत नाही. अशा मयूरसिंहासनांमधून उखडून काढलेली शब्दरत्नं काजूसारखी अॅपेटायजर म्हणून किंवा पुलावामधे कशी मिसळायची ही आणखीन एक समस्या नवीन कवी-गृहिणी कवी-गृहस्थासमोर असते. साध्या पाकक़ती करण्यासाठी पुस्तकं असतात, मिपावरती व इतर अनेक स्थळांवरती सदरं असतात. पण कवीसाठी मात्र काही नाही. आजकाल सगळं काही ग्लोबल झालेलंय - ग्लोबल वार्मिंग, ग्लोबल मार्केट, ग्लोबल संस्कृती सपाटीकरण वगैरे वगैरे. पण हा कवींचा प्रश्नही ग्लोबलच आहे. तो किमान लोकली तरी सोडवायला हवा. ग्लोबल संपन्नतेमुळे बऱ्याच लोकांची पोटं आता भरलेली असतात. तेव्हा चंद्र बघितल्यावर त्यांनाही कोणाची याद येते, नुसत्या भाकरीचीच नाही. आणि ती याद संव्यक्त (सं आधी लावला की जरा वजन येतं, बाकी काही नाही...पण कवींना असल्या गोष्टी माहीत पाहिजेत) करण्यासाठी कविता करणं ही एक सामायिक, सामाजिक, आणि मूलभूत गरज होऊन ऱ्हायलीया. त्येच्या बाबतीत आपून समद्यांना काईतरी कराया हावंय. (आरारारारारारारा... चुकीच्या बोलीत शिरलो.... आणि त्यात तीन चार ग्रामीण बोलींचं महाराष्ट्रीय एकात्मकीकरण पण झालं. आसो.) तर एकंदरीत काय की ही एक गरज आहे. आणि गरज ही तर शोधाची जननी असते.
या जननीनेच आमच्या मनात जन्म दिला (थोड्या पूजेनंतर, अर्थातच) कवितक या प्रणालीचा (अर्थ: कविता करणारा; जसे वाहक - वाहणारा, भोचक - भोच करणारा, करकटक - करकट करणारा इत्यादी). ती मी लोकांना तूर्तास तरी फुकट सादर करत आहे. निदान तिची हलकी आवृत्ती तरी. आता तुम्ही विचाराल, की यामागचे आमचे बिझनेस मॉडेल काय आहे? तर लोकांना आकर्षित करणे व त्यांच्या मनात आमच्या उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण करून कधीतरी ते खिशातनं पैशे बाहेर काढतील अशी आशा करणे. तूर्तास तरी ते मॉडेल गंडलेले आहे असे कोणी म्हणेल. पण मी हे मिसळपाववर सादर करत असल्यामुळे तसे असणारा मी पहिलाच नाही, हे सूज्ञांना कळले असेलच.
प्रथम काही मौल्यवान शब्द घ्यावेत. हे मौलिक असले तरी खूप स्वस्तात मिळतात, त्यामुळे ते मुक्त हस्ताने वापरावेत. शिरा करताना त्यात मोजके बेदाणे घालतात कारण बेदाणे महाग असतात व रवा स्वस्त असतो. शब्दांच्या बाबतीत तसं नसतं. त्यामुळे बेदाण्यांचाच शिरा व त्यात थोडासा रवा असे असल्याने काही बिघडत नाही. आम्ही चारोळ्यांचेच बनवलेले श्रीखंड खाल्लेले आहे.
असो, तर मौलिक शब्द घ्या. सुरूवात एकानेच करा.
जसे : आयुष्य, मैत्री, प्रेम, नातं, अस्तित्व इत्यादी. आयुष्य वापरण्याचा कंटाळा आला असल्यास जीवन किंवा जगणं वापरलं तरी चालेल.
या मौलिक शब्दाला आपण क्ष म्हणू
नंतर यमक साधणारे काही शब्द घ्यावेत जसे
विडा - तिढा - किडा - पिडा - सोडा - ओढा यांना य१, य२ असं म्हणू. घरगुती उपाहारासाठी पाच-सहा पुरतात. पण फारच पिळून जनसामान्यांत मानवतावादी कवी म्हणून मान्यता करून घ्यायची असेल तर किमान दहा वापरावीत. ही शक्यतो नामं असावीत. पण जसजशी तुम्ही प्रगती कराल, तसतशी तुम्हाला क्रियाविशेषणं देखील वापरता येतील. (काही अॅडव्हान्स्ड कवी क्ष आणि य सारखेच वापरतात...पण तो पुढचा धडा)
मग प्रत्येक य शब्दाला लागू असणारी क्रियापदं घ्यावीत.
उदा. विडा - रंगणे, तिढा - सोडवणे, पिडा - सहन करणे यांना आपण क१, क२, क३ म्हणू
त्या प्रत्येक जोडीसाठी एक विशेषण घ्यावं. उदाहरणार्थ
विडा - रंगणे - लाल लाल
तिडा - सोडवणे - फार कठीण
त्याला आपण व१, व२, असं म्हणू
आता आपली कविता तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे जुळवावे
क्ष ठरवलेला आहे.
प्रत्येक य, व, क साठी
लिहा
---------क्ष म्हणजे एक य असतं
---------व सारखं ते क करायचं असतं
जर (य,व,क संपले हे सत्य)
तर (कविता संपली, बाहेर पडा)
(सत्य) नसल्यास,
एक ओळ रिकामी सोडा
पुढचे य, व, क घ्या, "लिहा" वर परत जा.
आता सूत्रप्रणालीतले तज्ञ मला या प्रणालीतल्या चुका सांगतील, व अधिक परिणामकारक प्रणाली आहेत हेही सांगतील. विशेषत: "अमुक विधानावर जा" असा प्रयोग जाणते करत नाहीत. त्यांना मी एवढेच म्हणेन की तूर्तास नवख्यांना असल्या तांत्रिक बाबींनी गोंधळवून टाकण्याऐवजी त्या अधिपद्धतीची (अल्गोची - (अल् गोची {कंस सोडवण्यासाठी अक्षय पूर्णपात्रेंना [ते प्रस्तुत <हा शब्द फेटीश<दुवा> असल्याचेही सांगतात > परिस्थितीत खूप कंस |दुवा| वापरत असतात] बोलवावे} असं वाचू नये)) माहिती सोप्या भाषेत द्यावी यासाठी ते आलेलं आहे. कवितक च्या प्रो आवृत्तीत हे दोष नाहीत. (अगदीच गंडलेलं नाही बरं का आमचं बिझनेस मॉडेल!)
ही प्रणाली चालवली की खालील कविता तयार होते.
आयुष्य म्हणजे एक विडा असतं
लाल लाल सारखं ते रंगणं करायचं असतं
आता ही वाक्यं अगदी कवितेतलं काही कळत नाही अशा वाचकांनाही भावत नाहीत. सुदैवाने कवितेतलं काही कळत नाही अशा साध्या कवींनासुद्धा ती सुधारता येतात. थोडीशी डागडुजी केली की झालं. असतं च्या ऐवजी असतो, सारखं रंगणं करायचं च्या ऐवजी रंगवणं, रंगवायचा वगैरे केलं की मी मूळ उद्धृत केलेली कविता मिळते.
आयुष्य म्हणजे एक विडा असतो
प्रेमाने लाल लाल रंगवायचा असतो
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो
फार कठीण पण तो सोडवायचा असतो
आहे की नाही सोपी? कवितक मध्ये अशा सर्व मौलिक शब्दांच्या याद्या तयार आहेत. सुमारे दोन लाखांवर यमकांच्या बांधलेल्या पुड्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे क्ष निवडायचे, योग्य ती यमकं निवडायची, त्याला सूचित केलेली विशेषणं निवडायची - की एक गरमागरम कविता तयार! वरच्या उदाहरणात मी थोडा अभिनव प्रयोग केला आहे हे सूज्ञांच्या लक्षात आलं असेलच. पहिल्या दोन ओळीत मी दोन वेगवेगळे क्ष - आयुष्य आणि प्रेम वापरले आहेत. आता त्यांची अदलाबदल सहज शक्य आहे.
प्रेम म्हणजे एक विडा असतो
आयुष्याने लाल लाल रंगवायचा असतो
थोडा अधिक उत्साह असलेल्यांसाठी कवितक मधली नवीन तंत्रं सांगतो. द्विरुक्ती, आणि प्रश्निकरण. याने सध्याच्याच शिळ्या पदार्थाला नवीन फोडणी दिली जाते. खाणाऱ्याला तो शिळा आहे हे कळतही नाही. उदाहरणार्थ. तिढ्यापासून
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो तिढा ------------याने एक वेगळंच वजन येतं.
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो का? --------किंवा---- आयुष्य म्हणजे एक तिढाच का असतो?
इतका कठीण तो सोडवायचा असतो का?-------किंवा--- इतका कठीण तो सोडवायचाच का असतो?
याने सगळ्या कवितेला एक वेगळं व्यक्तिमत्व येतं. किंवा आणखीन एक वेगळी पद्धत म्हणजे यमकी शब्द हे सगळे तुमच्या मौल्यवान शब्दाशी यमक साधणारे ठेवावे. म्हणजे आयुष्य, धनुष्य, मनुष्य वगैरे. त्याला द्विरुक्तीची ट्रीक वापरून मी एकदोन ओळी लिहून दाखवतो
आयुष्य म्हणजे आयुष्य म्हणजे धनुष्य असतं...
जड असलं तरी ते पेलायचं असतं
पण यमक साधणारा शब्द हा स्वतशीच यमक साधतो. तेव्हा जर क्ष = य = मन घेतलं तर आपल्याला खालच्या ओळी मिळतात.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
सगळ्यांचंच ते सेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
ईश्वर आणि अल्ला यांचं ते नेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
बहुतेकांचं ते खूप लेम असतं
इथे मी पहिल्या ओळीत क्ष आणि य एकच वापरले...आता काही वेळा पहिली ओळ तीच ठेवून धृपद म्हणून वापरता येते, मधल्या ओळी आणखीन कठीण प्रणालीने बनवता येतात. पण ते फार अॅडव्हान्स्ड झालं. त्याआधी प्रथम तुम्ही पावसावर वगैरे कविता लिहून थोडी प्रॅक्टीस करा. सध्याच्या ज्या कविता दिसतात त्यातले बरेच लोक असले प्रयोग करून बघताना दिसतात. कवितकमुळे मानवी कष्ट कमी होतात. लवकरच येणारे आय फोन अॅप तुम्ही घेतले तर तुम्ही मुलीला डे केअरमधून घरी घेऊन येताना रिक्षात बसल्याबसल्या एखादी कविता करू शकाल. मग काय स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. हे प्रयोग करून करून कंटाळा आलेला आहे (मला तसे फारसे दिसलेले नाहीत, तरीही) त्यांच्यासाठी अधिक क्लिष्ट प्रणाली आहेत. पण त्यांविषयी पुढच्या लेखात.
या पाककृतीने हजारो पदार्थ तयार होतात. ते एकाच चवीचे असले तरी दिसायला खूपच वेगळे असल्यामुळे तुम्ही खूप कमी कष्टात सुगरण/बल्लवाचार्य म्हणून मान्यता पावता. हा पदार्थ खूप गोड गोड, खुसखुशीत व हलकाफुलका लागतो. त्यात कोलेस्टरॉल वगैरे हृदयाला त्रास देणारे घटक नसल्याने तो कितीही वेळा खाता येतो. पोटात आगही होत नाही (तसे तिखटजाळ पदार्थ आवडणाऱ्यांसाठी आम्ही लवकरच जळजळीत गजला कशा लिहाव्यात यावर लिहू.) त्यावर "वा: छान गं", "मस्तच गं", "पाणी आलं गं", "सुंदर कल्पना गं", "कसं सुचतं गं", "किती सहज शब्दात सांगितलंय" अशा प्रतिक्रिया हमखास आपल्या आप्त-मित्रांकडून येतात. एकदोन कडवी उद्धृत होणंही येतंच. जर तुम्ही तरुण असाल, व याला चाली लावून लोकांपुढे सादर केले तर तुम्हाला आधुनिक पिढीचा आवाज म्हणून मान्यता मिळते व तुमच्या कविता प्रचंड पॉप्युलर होतात.
या लेखमालेतल्या पुढल्या लेखांत आम्ही सदाबहार प्रेमकाव्ये, तू व मी (किंवा तो व ती) चे पद्य संवाद, हिरवीकंच रानओली निसर्गचित्रं या सोप्या पदार्थांची कवितक प्रणालीद्वारे निर्मिती कशी करावी यावर मार्गदर्शन करू. नंतर थोडे कठीण पदार्थ - जहाल गजला, सामाजिक कविता, रूपकात्मत भाष्ये कशी करावी याचाही अभ्यास करू. जमल्यास कुठच्याही कवितेला छप्परतोड प्रतिसाद कसा द्यावा याची प्रणाली सापडते का याचाही शोध घेऊ. त्यानंतरच्या पायऱ्यात प्रतिबिंबांचा जादूटोणा करणे, वगैरेसारखे अधिक क्लिष्ट विषय हाताळू. या प्रत्येकासाठी अधिपद्धती वेगळी असते. ती काय असते हे जाणून घेतले की एकंदरीतच काव्य म्हणजे काय हे समजण्यास मदत होते. निदान तुमचा व तुमचे काव्य वाचणाऱ्यांचा तरी तसा समज होतो. समजणे आणि समज होणे यात तसा फारसा फरक नाहीच शेवटी.
मी वाचकांना अशी विनंती करतो की प्रेम हा क्ष घेऊन व तुम्हाला सुचणारे विशिष्ट व्यवसायातले य घ्या. यमकांची अट थोडी ढिली झाली तरी चालेल. तयार होणारी कविता खाली प्रतिसादात डकवा. तुम्हाला किती चांगली कविता होईल याचं आश्चर्य वाटेल. (हिंट इतर क्षची पेरणी अधूनमधून करावी)
तर मंडळी, तुमचे स्वत चे क्ष, य, क, व, घ्या आणि क्षणात यशस्वी कवी व्हा! (आणि कविता डकवा)
कवितकची आवृत्ती इथे मिळेल (कदाचित). त्यात सध्या काही कीडे असल्यामुळे तुम्हाला भिंतीवर डोकं आपटल्याचा भास होईल. पण नाहीतर ती प्रणाली हातीच चालवूनसुद्धा कविता करता येतील.
मी वापरलेलं मयूरसिंहासन.



