टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
विनोद
जाने तु या जाने ना....
प्रेषक सौरभ वैशंपायन ( रवी, ०८/२४/२००८ - २२:०८) .एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि.
----------------------------------------------------------------------------------------------
१.
Hi Dear!!!!!!
कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना? आणि मग जॉब पण चांगला मिळायला हवा! बाकी काय चाललय नविन? मुंबईला कधी येते आहेस? कळव मग फोन करुन.
Actually, सुरुवात काय करावी हे कळत नव्हंत म्हणुन ही वरची सगळी प्रस्तावना. असं हे पत्र मधेच आणि ’विनाकारण’ लिहायला २ कारणं आहेत. म्हंटलं फोन पेक्षा पत्र लिहिण एकदम मजेदार होईल. शिवाय या दोन-तीन दिवसात कॉलेजची बरीच आठवण येते आहे.
आज संध्याकाळी ऑफिस मधुन परत आलो आणि सोसायटीचे मेन-गेट उघडणार तोच पारीजाताचा सुगंध आला. पहिल्यांदा तुझीच आठवण आली. आठवतं? तुला फुलं आवडतात म्हणुन एके दिवशी तुझ्या ओंजळीत भरपुर पारीजाताची फुलं ठेवली होती. केव्हढी खुश झाली होतीस तु? खांदे उडवुन चार-चारदा मला Thanx म्हणत होतीस. त्यानंतर बराचवेळ आपण कट्ट्यावर बसुन होतो, तेव्हाही फुले ओंजळीत घेऊन बसली होतीस. म्हंटल "अगं टाक पिशवीत!" तर म्हणलीस "नको! कोमेजुन जातील!"
किती मजा केली ना आपण कॉलेज मध्ये? कॉलेजची शेवटची २ वर्षे तर आपल्या ग्रुपने मनापासुन एन्जॉय केली. कॉलेज इव्हेंटमध्ये आपल्या ग्रुपनेच खरी ’जान’ आणली होती. कॉलेजमध्ये मी सगळे उद्योग केले फक्त आपल्याला Dance काहि जमला नाहि. कॉलेज इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी सगळं कॉलेज नाचत होतं. आपला ग्रुप अर्थात स्टेज वर जाउन धमाल करत होता. तु सुध्दा तीन-तीनदा मला ’अरे ये!’ म्हणुन बोलावलसही, पण साले आपले पायच उचलत नाहित ना. गणपती विसर्जनाच्या दिवशी चौपाटीकडच्या रस्त्यावर आम्ही ’जे काहि’ करतो त्यालाच आम्ही नाच म्हणतो. आता तसा नाच इथे कसा करणार?
आणि हो! कॉलेज मध्ये मारामारी सुध्दा केली. त्या माकडाने तुला मुद्दामहुन धक्का मारला होता म्हणुन कसा वाजवला होता त्याला त्यावेळी? पण तू उगाच मधे पडलीस, नाहितर त्याच्या गुढघ्याच्या वाट्या त्याला भीक मागण्यासाठी काढुन देणार होतो.
मात्र त्या नंतर अर्ध्या तासात सगळं कॉलेज आपलं "काहितरी" आहे असं कुजबुजत होतं. सगळ्यांना तेव्हा सांगुन थकलो कि बाबांनो खरंच तसं काहि नाहिये! काय लोकं असतात? मैत्रीचं नात त्यांना पटतच नाहि.
अरे हो! आता मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा किस्सा! खंरतर पत्र लिहायचं दुसरं कारण. - कालच दुपारी चहा पिण्यासाठी आईने हाक मारली. मला चहा देऊन शेजारच्या खुर्चीवर भाजी निवडत होती. मधेच आईने तुझ्या बद्दल विचारलं -
आई:काय करते रे ती सध्या?
मी:M.B.A.
आई:आहे कुठे मग सध्या ती?
मी:पुण्याला सिंबॉयसिस मध्ये.
आई:अच्छा तरीच म्हंटलं बरेच दिवस आली नाहि!(मला चहाचा चटका लागला यावेळी) उंची किती आहे रे तीची? काहि अंदाज?(मला हसु फुटलं)
मी:आई! अगं असं पुस्तकाचं मधलं पान सुटल्या सारखे का प्रश्न विचारते आहेस? तिच्या घरी न येण्याचा आणि तिच्या उंचीचा काय संबध?
आई:वेड पांघरुन पेड गावला जाऊ नकोस! तुला चांगलच कळतय मी का विचारते आहे ते!(मला उगीच ’अपघाती वळण’ अशी पाटी दिसली, आणि मी परत मान हलवुन हसलो! तर आई उखडलीच!). दात काढायला काय झालं? काहि चुकलं का माझं ते सांग!
मी:अगं आई! मी अजुन २५चाच आहे, काय घाई आहे? बघु २-३ वर्षांनी. आणि तिच्याबाबत म्हणशील तर आमचं तस काहि नाहिये!
(पण त्या भाजीच्या देठा बरोबरच, तीने माझे मुद्दे सुध्दा खुडुन काढले)
आई:अरे मग काय म्हातारा झालास कि मग लग्न करणार आहेस का? अश्शी निघुन जातील २ वर्षं. तुला चांगली ३०-३५ हजाराची नोकरी आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि हो! ती सुद्धा तुझ्याच वयाची ना? फार-फार तर चार-सहा महिने इकडे तिकडे. तिचे आई-वडिल तिच्यासाठी मुलगा बघायला देखिल लागले असतील! अरे २५ म्हंटजे मुलीसाठी खुपच झालं!
(मी विषय बदलायचा म्हणुन घड्याळाकडे बघुन म्हणालो -)
मी:अगं ती सिरीयल नाहि बघायची का तुला?
आई:विषय बदलु नकोस! मला उत्तर दे!
(मला कळ्लं, आई दुपारची सिरीअल चुकवतेय म्हणजे ती जरा जास्तच सिरीअस आहे!)
मी: आऽऽऽऽऽई! अगं का माझ्या आणि तिच्या मागे लागली आहेस?
आई: आई काय आई? मुलगी चांगली आहे! सुंदर आहे! चांगले संस्कार आहेत, शिवाय म्हणशील तर आपल्याच जातीतील आहे. सांग ना काय वाईट आहे?(तीने तुला इव्हेंटमध्ये नाचताना बघितलं नव्हतं म्हणुन हे सगळं म्हणत होती!! ही!ही!just kidding!)
मी:मातामाय(आई अशी चिवित्र वागायला लागली की कि मी "मातामाय! ल्येकराचं काय बी चुकलं-माकलं असेल तर पोटात घे! येत्या आवसेला गावच्या वेशीवर कोंबड उतरविन!!!!" या चालित सुरवात करतो)अगं खरच आमचं तस काहि नाहिये! काहितरी डोक्यात घेऊ नकोस!
आई:हं! मला नको सांगुस! आई आहे मी तुझी! अरे मांजराने डोळे मिटुन दुध प्यायलं तरी बाकीचे बघत असतात(मी त्या चहात बुडवलेल्या बिस्कीटा सारखा मऊ झालो होतो!)
मी:तुला कशा वरुन वाटंल असं? तु कितीवेळा भेटली आहेस तिला? ८वेऽऽळा १० वेळा? आणि माझ्या वाढदिवसानंतर कुठे आलिये ती? त्यालाहि ६-७ महिने झाले!तेव्हा सुट्टित आली होती ती!)
(पण ऐकेल ती आई कसली?)
आई:हांऽऽऽ!!! तेव्हांचच म्हणतेय मी! ती स्वत:हुन आत येउन मला मदत करत होती. आज काय मेनु? कसा करायचा? तुला अजुन काय काय आवडंत? सगळं विचारत होती!! बाकीच्या तिघी, बाहेर बसल्या होत्या नुसत्या खिदळत नी दात काढत!
(तिला सांगुन काहिच फायदा नव्हता, चटकन चहा संपवला आणि उठलो, तर म्हणाली - )
आई:अरे, तुमचं लग्न झालं, तुम्हाला मुलं-बाळं झाली की आम्ही सुटलो!!!(आईने आता "Body-line" बॉलिंग करायला सुरुवात केली होती!) नाहितरी आम्हा म्हातारा-म्हातारीला दुसरा काय उद्योग आहे?
मी:म्हंटजे?? तुम्हाला काहितरी काम मिळावं म्हणुन आम्ही लग्न करायचं?? या हिशोबाने तर भारतातील बेकारी केव्हाच संपायला हवी होती!!(आणि परत मोठ्ठ्ठ्याने हसलो)
आई:हं! कराऽऽ!थट्टा करा! पण सांगुन ठेवत्येय, पुढल्या वर्षभरात तुझं लग्न झालचं पाहिजे! तिच्याशी झालं तर आनंदच आहे! नहितर दुसरी बघु!!(मी चटकन t-Shirt बदलुन घरा बाहेर निघालो.)
तसा रात्री जेवायलाच उगवलो. आत पाणी पिण्यासाठी गेलो, तर मला बघुन आईने जोरात भांडे आपटले. त्या दिवशी अनेक भांड्यांवर बरेच ’कोचे’ आले होते. हॉल मध्ये आलो तर बाबांनी विचारलं - "काय रे? काय झालयं? दुपारपासुन असेच आवाज येत आहेत, आणि आज T.V. चक्क बंद आहे!" मी म्हणलो "माहित नाहि बुआ! भाजीवाल्याशी हुज्जत घालुन आली असेल!!" बाबांनाहि ते खरं वाटलं असावं त्यांनी परत पेपर मध्य तोंड खुपसलं.
रात्री जेवताना सुद्धा पोळी, भाजी, भात, आमटी, लोणचं या शब्दांमागचे प्रश्नचिन्ह कोणते आणि उद्गारचिन्ह कोणते हे ओळखुन हो-नाहि म्हणावे लागत होते. शक्यतो नाहिच म्हणत होतो, नाहितर म्हणायची - "तू जेवताना लग्नाला हो म्हणलास!" म्हणुन.
कश्श्या असतात ना या "आया". मुला-मुलीत फक्त मैत्री होऊ शकते यावर विश्वासच नसतो यांचा. असो, पुढले ७-८ दिवस तरी जेवताना ’नाहि’ म्हणणेच योग्य राहिल असं दिसतय. या आयांचं काहि खरं नाहि.
हे सगळं मी तुला मोकळेपणाने सांगु शकतो कारण तु हे समजुन घेऊ शकतेस. आणि तसं तुलाहि हे नविन नाहि.
बर, तर हे सोडुन बाकी सगळं उत्तम. सध्या ’गधा-मझदुरी’ करतोय. ऑफिसमध्येच रात्री ११:०० वाजतात. गेल्या २ आठवड्यात आज पहिल्यांदा ९-९:१५ ला घरी आलोय(आणि तेहि चक्क सोमवारी). म्हंटलं झोपण्या आधी पत्र लिहुया - फोन पेक्षा जास्त चांगलं!
असो, तु इथे कधी येते आहेस? पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तुझा, तेव्हा जमणार आहे का? आणि हो तब्येतीची काळजी घे. उगीच अबर-चबर खाउ नकोस, आणि आपल्याला जागरणं झेपत नाहित हे जग जाहिर आहे, so please जागरण करुन अभ्यास करु नका.
तुझा,
बुद्धुराम उर्फ जोकर.
ता.क. - आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. वागते ती अशी कधी कधी!
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
२
Hiiiiiiii!!!!!!
खुप बरं वाटलं तुझ पत्र बघुन. बरं झालं पत्र लिहिलस ते. इथे सगळंच इंग्लिशमध्ये वाचांव लागतं-बोलावं लागतं. जाम कंटाळा आलाय! खुप दिवसांनी असं मराठी वाचतेय, त्यातहि तुझं पत्र मिळालं म्हणुन बरं वाटलं.
माझा अभ्यास चालु आहे. सध्या प्रोजेक्ट चालु आहे. त्या गडबडितुन वेळ काढुन तुला उत्तर पाठवते आहे.
खरचं कित्ती धमाल केली आपण कॉलेज मध्ये? ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलो तर कोणालाच माहित नव्हतं कोण कुठे जाणार? काय करणार? आता प्रत्येक जण कुठेतरी जॉब करतोय किंवा शिकतोय. तुला चांगली नोकरी लागली, मी M.B.A. करतेय. सगळे कसे पांगलो ना आठहि दिशांना? तरी एकमेकांच्या contact मध्ये असतो आपण.
कित्ती आठवणी आहेत कॉलेजच्या. बरं झालं तुच आठवण करुन दिलीस. तु दिलेली ती ओंजळभर पारीजाताची फुलं आजही आठवतात मला. खरच खुप आनंद झाला होता मला तेव्हा. आपण कट्ट्यावर जाऊन बसलो होतो. आपण खुप tension मध्ये किंवा खुप आनंदात असलो कि तिथे न बोलतच बसुन रहायचो तसे! बराच वेळ बसलो होतो. मी खुष झाले म्हणुन तू आनंदात होतास आणि मी माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी माझ्याजवळ होत्या म्हणुन खुष होते, ती पारीजाताची नाजुक फुल आणि...........’तू’. होय, तु मला आवडतोस. त्या दिवशी सुद्धा त्या फुलांना हुंगत असताना अनावधानानं तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं, तुला वाटलं मी नेहमीप्रमाणे अल्लड्पणा करतेय. मग मी स्वत:ला आवरलं तुझ्यापासुन थोडी दुर सरकुन बसले. त्यावेळी ३-४ फुल खाली पडली, अजुन पडु नयेत म्हणुन मी अलगद ओंजळ मिटली. तु म्हणालास "अगं टाक पिशवीत!" मी म्हणाले "नको! कोमेजतील!" पण मी परत ओंजळ उघडली, खरचं ती फुलं कोमेजली होती. पण ते तुला समजलचं नाहि.
त्या दिवशी कॉलेज इव्हेंटमध्ये मी तुला नाचायला बोलावलं वाटलं तु येशील, जमेल तसा नाचशील, किमान..२ स्टेप नाचशील माझ्या बरोबर. पण तु तिथेच उभा राहिलास, तुझा एक बुट मात्र ठेका धरुन हलत होता हे मी पाहिलं. पण त्या गर्दित "दोघांनीच" नाचण्याची मजा आणी कारण तुला समजलचं नाहि.
आणि हो! माझी छेड काढणार्याला तु मारत होतास, मारत कसला ’तुडवत’ होतास. तेव्हा मी मध्ये पडले, मुद्दामच. कारण तु त्याचे हात-पाय तोडणार हे समजत होतंच पण मला तुझी काळजी वाटत होती. तुला काहि झालं असतं तर? म्हणुन मी तुला सोडवुन दुर घेउन गेले. त्या गडबडित मलाहि तुझे २-४ फटके लागले, पण तुला ते कळलच नाहि. आणि खरंच अर्ध्या तासात सगळ्या कॉलेजमध्ये पसरलं की आपलं ’काहितरी’ आहे. तू सगळ्यांना रागाने-लोभाने तसं काहिहि नाहि हे समजावत होतास, मी मात्र गप्पच होते. पण माझ्या गप्प बसण्याचे कारण तुला समजलेच नाहि.
अरे हो, कॉलेज इव्हेंटमध्ये नाचताना माझा पाय मुरगळला होता, आठवतयं तुला? तुच घरी सोडायला आला होतास. वाटलं कॉलेज तसं जवळच आहे माझा हात धरुन चालत नेशील पण तु टॅक्सी बोलावलीस. एरवी हे टॅक्सीवाले दुरचं भाडं सांगितलं तरी येत नाहित आणी तो मेला ’एका चाकावर’ तयार झाला. आत बसवुन तु मला क्रिकेट खेळताना पाय मुरगळला की काय करतोस ते सांगत होतास! माझी अश्श्शी चिड-चिड झाली होती. शेवटी मला रडु फुटलं, तुला वाटलं माझा पाय दुखतोय म्हणुन मी रडतेय. मला म्हणालास "खुप दुखतयं का? पाय टेकवत नाहिये का? चल नाहितर घरी जाण्या आधी डॉक्टरकडे जाउन x-ray काढायचा का?" या - या तुझ्या या अश्या प्रश्नांनी माझं रडणं वाढलं. वाटलं की तुझेच ८-१० x-ray काढावेत आणि तुला हृदय नावाची गोष्ट आहे की नाहि ते बघावं. पण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.
एके दिवशी बाबांना हॉस्पिटलमध्ये Admit केलं. त्यांच्या छातीत दुखतं होतं म्हणुन. तुला कॉल केल्यावर धावत आलास. डॉक्टरनी ज्या गोळ्या-औषधे सांगितली होती ती लगेच आणुन दिलीस. दादासुध्दा २ तासांनी आला त्यानंतर. तु आलास तसा खुप धीर वाटला. तु आलास म्हणुन किमान मी माझं रडु दाबुन ठेवु शकले. दुसर्या बाजुला आईला धीर देत होते. दोन दिवसातच बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच संध्याकाळी आपण भेटलो. तु विचारलस - "बाबांना बरं वाटतय ना आता?" यावर मी तुला मीठी मारुन रडले होते, कारण बाबांना बरं वाट्लं या बरोबर ’तू’ त्यावेळी ’माझ्यासाठी’ तिथे होतास या कारणामुळे. ते आनंदाश्रु होतेच, पण तुझ्यावरचा विश्वास आणि प्रेम देखिल होते. तुला वाटलं मी ’बाबांना काहि झालं असतं तर?’ या कारणासाठी रडतेय. तु नंतर उगीच मला समजवत राहिलास, कारण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.
असेच एकदा आपण रस्त्याने जात होतो. पावसाळा होता, दोघेही छत्री विसरलो होतो. आणि आलाच...पाऊस आलाच. तू चटकन समोरच्या झाडाच्या आडोश्याला गेलास. मी मात्र भिजत राहिले. मला तु म्हणालास "इथे ये!" पण मीच तुला पावसात भिजायला बोलवत होते. मला वाट्त होतं कि तु असचं पुढे यावस, आणि त्या कोसळणार्या पावसात मला अलगद मीठित घ्यावस. आणि..... तु जवळ आलासहि, माझा हात घट्ट्ट्ट पकडलास. उगीच माझे श्वास दुणावले. पण तु मला जवळपास फरपटत त्या झाडाखाली नेलं आणि वर वस्सकन माझ्यावर ओरडलास - "ताप येऊन आडवी होशील ना!". पाऊसहि पुढल्या क्षणी थांबला. कदाचित तोही हिरमुसला असावा. मला तुझा इतका राग आला होता कि नकळत डोळ्यातुन २ थेंब गालांवर ओघळले. तुला वाटलं ते पावसाचं पाणी असावं. आपण परत चालायला सुरुवात केली. माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते का? हे समजलच नाहि.
तुला आवडतात म्हणुन मी स्वत: घाट घालुन मागे एकदा ’तळणीचे मोदक’ करुन आणले होते. डबा उघडल्यावर तु आनंदाने ओरडलास "आयला!!!पॅटिस?" माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तुझी आयुष्य रेषा मोठी होती म्हणुन चव घेउन म्हणालास "ओह! सॉरी! मोदक आहेत!! अरे वा!! छान झालेत!" दुसराहि मोदक उचलुन म्हणालस - "तुझ्या आईने केले वाटतं! काकुंच्या हाताला चवच छान आहे!!" त्यावर मी फक्त हसले. पण माझ्या हसण्याचे कारणच तुला समजले नाहि.
तु एकदा क्रिकेट खेळत होतास. मी पण ग्राउंड बाहेर उभे होते ’तुला’ बघत. अचानक catch पकडायला धावलास आणि अडखळुन पडलास. दोन्ही कोपरं आणि गुढघे सोलवटुन निघाले होते. उजव्या कोपराचं तर भजच झालं होतं. मी धावत येउन माझा रुमाल त्या जखमेवर दाबुन धरला. रक्त थांबल्यावर म्हणालास "अरे-अरे! तुझा रुमाल उगीच खराब झाला.!" पण तो रुमाल आजहि आहे माझ्याकडे. का? ते तुला कदाचित समजणार नाहि.
६ महिन्यांपूर्वी तुझ्या वाढदिवसाला घरी आले होते. तुला gift म्हणुन मी छोटासा ताजमहाल दिला. म्हणालास "छान आहे! पण इतका खर्च कशाला केलास?" मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. मी तशीच स्वयंपाकघरात गेले आणि तुझ्या आईला मदत करायला लागले. तुला काय आवडतं, काय आवडत नाहि हे वळसे घालुन घालुन विचारत होते. पण हो!!! तुझ्या आईला मात्र ते लगेच समजलं.
आता please इतके वाचुन "म्हणजे काय?" असे विचारु नकोस. मला तु आवडतोस. त्या घरात सुन म्हणुन यायला मला आवडेल. तुझा निर्णय काय ते सांग. आणि हो! घाई करु नकोस. पुढच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला मी तिथे येते आहे २ दिवस. तेव्हा सांग. अजुन १५-२० दिवस आहेत.
हे पत्र मुद्दाम तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवते आहे. म्हणजे थेट तुझ्याकडे येईल. घरी कोणाच्या हातात पडावं हे मला नकोय. का ते तरी समज!
’फक्त तुझीच’
रडुबाई.
ता.क. - मी नेहमी म्हणते तसा तु खरचं बुध्दुराम आहेस. वर लिहायला विसरले होते!!!
-------------------------------------------------------------
-सौरभ वैशंपायन(मुंबई).
काही पुणेरी पाट्या
प्रेषक अमेय ( गुरू, ०८/२१/२००८ - १४:१५) .छान छान पुणेरी पाट्या पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
पुणेरी पाट्या
सिन्थॉल साबणाच्या पत्राला निरमाताईचं उत्तर
प्रेषक श्रीकृष्ण सामंत ( मंगळ, ०८/१२/२००८ - २१:२९) .
प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला.भारतात परत आल्यावर त्याचं नाव बदलल्याचं पाहून "लाईफ बॉयला"
वाईट वाटणं सहाजीक आहे.परंतु त्याने,
"फेअरग्लोला "
मधे घेण्याचे कारण नव्हतं.डॉ.डेटॉलचे आभार मानणं आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.यावरून एक सिद्ध होतं की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.
बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरं वाटलं.
"सर्फ"
मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी.
मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या,
"साबण जमातीची"
दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे. हे काही बऱ्याचं लक्षण नाही.तसंच बुळबुळीतपणा आणि फेस हे गूण पण लोपत चालले आहेत.याबद्दल मी कुणाला दोष देऊं? महागाईला की सरकारच्या "टॅक्स पॉलीसीला?
असो.
"सिंथॉल दादा",
तुला ऐकून नवल वाटेल की आज जो, तो उठ बस अमेरिकेला जात आहे.आणि येताना ते त्यांच्या अमेरिकेतल्या मित्र मंडळीना पण ईकडे घेऊन येत आहेत.परवा सहज,
"सर्फ"
मावशीला भेटायला म्हणून गेलो होतो.तिचा मुलगा
"मोती"
याने येताना त्याच्या मित्र मैत्रीणीना आणलं आहे.माझी त्याने ओळख करून दिली.कोण तर म्हणे,
"डोव्ह",’शिल्ड" "सेफगार्ड"
आणि दादा, तुला मी सांगीतलं तर आश्चर्य वाटेल,अरे, ती
"आयव्हरी"
नावाची मुलगी इतकी नटली थटली होती की माझी जेव्हां सर्फमावशीने तिची ओळख करून दिली
"ही आमची "निरमाताई"
तर ती माझ्याकडे बघायला पण तयार नाही.
आणि त्या
"आयव्हरीने"
काय पर्फ्युम लावलं होतं,अरे, सगळ्या घरात सुवास दरवळला होता.माझी खात्री आहे की ही जर आपल्या
"शिकेकाई" "संतूर" "रेक्सोना"
वगैऱ्याना भेटली तर नक्कीच ती सर्व तिच्या समोर त्यांची स्वत:ची नाकं मुरडल्याशिवाय रहाणार नाहीत.
आणखीन तुला एक मी पाहिली ती गम्मत सांगते अरे,
"लिक्वीड सोप"
म्हणून एक जरा लठ्ठशी बाई सर्फमावशीजवळ बसली होती.ती म्हणे खूपच अमेरिकेत पॉप्युलर झाली आहे. हल्ली तिकडे आपल्या सारख्याना चोळत बसत नाहीत तर हिलाच डोक्यावर,
"स्क्वीझ"
करतात,आणि गम्मत म्हणजे डोळे चमचमत नाहीत डोळ्यातून पाणी पण येत नाही.लहान मुलांत ही
"बेबी म्याजीक बाई"
खूपच पॉप्युलर आहे.तिनेच मला सांगितलं की
"हवाईन जिंजर रूट कंडीशनर"
नावाची तिची दुसरी एक मैत्रीण आहे तिला पण काही इकडची
"टिन एजर"
वापरतात,हे तुला माहित नसेल. ह्या अमेरिकन लोकांवर देवाने
"ओरीजन्यालीटीसाठी "
वरदहस्त ठेवलेला आहे हे मात्र सत्य आहे.
आणखी काय लिहूं? सध्या एव्हडं पुरे.
तुझी
निरमाताई.
श्रीकृष्ण सामंत
तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर
प्रेषक १_६ विक्षिप्त अदिती ( मंगळ, ०८/१२/२००८ - ११:०८) .बय्राच खरडींना उत्तरं देण्यापेक्षा मी जाहीर करून टाकते की आज झी २४ तास वर माझी मुलाखत दाखवणार आहेत. पण संध्याकाळी ४:३० (भारतीय वेळेनुसार)! शक्य झालं तर रेकॉर्डींग कुठेतरी उपलब्ध करून देईन, त्या वेळी हापिसातून मिपा वाचणाय्रांसाठी!
यमी /अदिती / यमी आज्जी वगैरे वगैरे वगैरे!
अवांतर (पण महत्त्वाचं): माझं खरं नाव संहिता जोशी आहे (आणखी एक जोसपड मिपावरची)! 
माझा विनोद वाचणार का?
प्रेषक विपुल वर्तक ( शुक्र, ०८/०८/२००८ - २०:५१) .महाराष्ट्रातील वीस dam पाहीलेल्या माणसाला काय म्हणाल?
उत्तर :- तुम्ही द्या
पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)
प्रेषक टारझन ( शुक्र, ०८/०१/२००८ - १५:०४) .नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत ..
त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ
तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ...
हाही फळा तुंबेल अशी आशा करतो ..
केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन ....
राजे शिकारीला चाललेत .. घोड्यावर बसलेत ...
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
राजे शिकारी हून परत आले... घोडा पार्क केला आणि सरळ शौचकंपू (हेच ना ? सर्किट सर प्लिज करेक्ट मी) मधे पळाले...
असो .. आपले डोके दुखले असेलच .. घ्या बदला मग !! असाच एक बकवास जोक टाकून
कार्यालय
प्रेषक विनोद इन्गळे ( शुक्र, ०७/२५/२००८ - १२:३९) .कार्यालय
इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी
कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय
- विनोद इंगळे
बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?
प्रेषक श्रीकृष्ण सामंत ( सोम, ०७/०७/२००८ - २३:३४) .
अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो.
बाबारे,
कुणी तरी म्हटला हा,
"सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां."
तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा. माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा. पु.ल.नी म्हणजे आमच्या पु.ल.देशपांड्यानी रे, नाय काय सांगितला,सकाळी उठल्यावर गुढगे दुखणत नाय असां झाला की समजुचा आपण खंवाचलो( म्हणजे मेलो रे!) तशीच आणखी एक खूण कोणी तरी सांगितली आसा.
जर कोण तुमच्याकडून उपदेश घेवचो बंद झालो की समजुचा म्हातारपण इला.आणि जर कां कोणी म्हणालो हो उपदेश अमक्या अमक्याकडून मिळालो असतो! की समजुचां तो म्हातारो आतां हयात नाय.
तू माझो शेजारी.जुहु चौपाटीवर सकाळीच फिरांक जाताना तुझ्या बंगल्यावरून जावचा लागा.तुका बागेत काम करताना हज्जारवेळां बघीतलंय.झाले आतां तेका खूप दिवस म्हणा.आता तूं माका ओळखूचस नाय.
बाबारे,(अशी सुरवात केल्यावर समजुक होयां,काय तरी उपदेश ऐकूचो लागतलो.)
"आयुष्य कमी किंवा जास्त ह्या काय नशिबावर अवलंबून नसता,आपल्या लाईफ स्टाईलवर असतां अशी माझी धारणा आसा.
तू हल्ली ज्यावेळी ६३ वर्षाचो होतस त्यावेळी तुका कसलो तरी आजार इलो होतो.६३ वयावर ३६ वर्षाचो असल्यासारख्या करून कामा करीत रव्हल्यास कसा चलताला बाबा?समजा, एखादी बाई ४१ वर्षाची आसा तिनां १४ वर्षाची स्वतःक समजून जर का बॉलीवूड डान्स केलो तर तेचे काय परिणाम होतले?.(तू बॉलिवूडचो राजो, तेव्हां तुका तां समजूक कठीण नाय म्हणा) असो प्रश्न मी माझ्या एका डॉक्टर मित्राक विचारलंय.तो काय म्हणालो माहित आसां?
तो हंसत हंसत म्हणालो,
"जास्त काही होणार नाही फक्त गुढगे,युट्रस,किंवा आंतडे डीसलोकेट होईल.ताबडतोब त्याचे परिणाम दिसतीलही,न दिसल्यास कांही काळजी नाही उतार वयावर ते सर्व निमुटपणे दिसायला लागतील एव्हडंच."
४२ वर्षावर तुका नाय काय, जीवघेणो अपघात झालेलो,तेचे परिणाम आता तुका भोवतत.२४ वर्षाच्या तरुण मुलासारखो तूं फायटींग करूचो शॉट करताना, पुनीत नावाच्या नटान तुका शुटींगमधे बुक्को मारण्याचो सीन केलो आणि तू तो टाळण्यासाठी उडी मारलंस आणि मग टेबलाचो कोपरो तुझ्या पोटांत गेलो आणि तुझां आंतडा आतुन दुखावला वगैरे वगैरे.आठवतां मां, तुका? त्यावेळां त्यामानान, तूं तरुण होतंस लवकर बरो झालंस आणि कामांक पण लागलंस.
खूप कचोऱ्यो खाल्लंस म्हणून तुझ्या पोटांत दुखतां म्हणून हल्लीच्या आजारात डॉक्टरास सांगून तू बघलंय,पण माझ्या मनात पाल चुकचुकली.तुझो तो जुनो आजार आतां तुका ह्या वयात त्रास देवूक लागलो असतोलो असां माझ्या मनात इला.आणि तांच तुकां डॉक्टरान सांगलां नाय रे?
"देवा असां नको होवू देत रे" असां आम्ही मनात म्हटलां विचार पायजेतर कुंदाक माझ्या बायलेक रे!
अरे राजा,तुका लिलावतीत नेल्यावर तां इतक्या अपसेट झालां कि रात्री तेच्या स्वपनात तुझी जया आयली आणि म्हणता कशी, "त्या आजारात आणि ह्या आजारात मी ह्याला बरं वाटावं म्हणून ह्याच्यासाठी किती व्रते केली, ह्याच्यावर ओवाळून दानधर्म केले,सिद्धीविनायक मंदिरात जावून किती एकादक्षीणा केल्या.मी त्याला सांगत असते "अरे,प्रकृती सांभाळून काम कर,पण माझा त्याला राग येतो"
मी जां काय ऐकला तां आता तुका सांगतंय.
तू म्हणे शंभर कोटी रुपये खंय तरी गुंतवलंस आणि एक कंपनी काढलंस,आणि हातोहात तुका लोकांनी फसवलां म्हणून मी ऐकलां.आपल्यासारख्याच सगळां जग आसां, असा समजून तू तेंच्यावर विश्वास ठेवून वागलंस,लोकांचो पैसो तो, मग तेंचो पैसो फेडूक नको काय? ते फेडून टाकण्यासाठी तू झटून मेहनत घेतलंस.
जया सांगी होती,"फिजा,दिदार आणि कल हो न हो मधे माका ह्या वयात काम करुक लागला.फिजात तर माका बुरखो घालून काम करुक लागला."
बाबारे, सगळां देणां तू फेडलंस,त्यानंतर पैशाची तुझ्याकडे रीघ लागली.तू पब्लीक फीगर ना, मग तुका लोकांचा ऐकूक लागतलाच. पण लोक म्हणतत म्हणून भुरावून जावू नको बाबा.
"अमिताभजी तुम ऍक्टींग करो हम तुम्हारे सांथ है " असा लोक तुका सांगतत असा मी ऐकलां.पण तू तेंच्या नादाक लागू नको.काळजी घे तुझ्या प्रकृतीची.
बाबारे, म्हटहा ना "जग हे दिल्या घेतल्याचे,नाही कोण कुणाचे" तां काय खोटां नाय.शेवटी नुकसान कोणाचा तुझाच मां?अभिषेकचा आता लगीन झाला.नक्षत्रासारखी तुका सुन मिळाली. तू आजोबा पण होशीत.तुका काय कमी आसा रे?पैसो म्हटलो तर दाबून पैसो तुझ्याकडे आसा.आणि ह्या वयात पैशाची कितीशी गरज आसा.मनः शांती मिळाली म्हणजे झाला. तुका नाय असा वाटणां?
हे सगळे लोक तुझ्या मागे लागतत आणि तुका काय काय आयडीया देतत.पण तुझ्या आंगातले गुण ह्या लोकानी घेवूक नको काय?
आतां ह्याच बघ,माका आपलां दिसला तां सांगतय.तू हल्लीच्या आजारात लिलावती हॉस्प्रिट्लात होतंस.किती लोक घोळको करून तुझ्यासाठी बाहेर उभे असत.एकदाचो तू बरो झालंस. त्यावेळी हॉस्पिटलाच्या बाहेर किती तुफान गर्दी होती.तू दिशसीस म्हणून ताटकळंत उभे होते येव्हडे लोक.
तुझी जया तुझ्या नविन "जलसा" बंगल्यांत वाट बघत होती.लोकानी तू तिकडे जाशीस म्हणून तुझ्या दर्शनासाठी तिकडे धांव घेतली.काही लोकानी तु सिद्धीविनायक मंदिरात पहिल्यानदां जाशीस म्हणून तिकडे धांव घेतली.तू शिरडीक जाझीस म्हणून तिकडे धांव घेतली.पण तू काय केलंस,तू सरळ तुझ्या "प्रतिक्षा" बंगल्याकडे गेलंस.कारण तुका तुझ्या आवशीची आठवण आयली.ती तुझी वाट बघत असतली तू मातृभक्त किती आसस ह्या, ह्यां लोकांक काय माहीत रे?पण आचरणात कोण आणताहा या दिवसात? त्या बंगल्याकडे तुझ्या रखवालदारा शिवाय कोण चिटपांखरू पण नव्हता.बरो झालंस म्हणून सुरवातीक आवशीच्या पायावर डोक्या ठेवूक गेलस मां?पायावर डोक्या ठेवून नंतर तिना तुका जवळ घेतलां.त्या तुझ्या माऊलीक तुझ्या स्पर्शान निराळाच वाटलां.तुझ्या डोळ्यातली आंसवा तिना तिच्या कृश हातानी फुसत, तिना तुका आणखी जवळ घेतलां आणि तुझ्या कानात पुट्पुटून ती म्हणाली, "देवा माझा उरलेलां आयुष्य हेकांच दी" तां ऐकून तू किती सद्नदीत झालंस,आठवतां ना तुका?
एका खयंच्या तरी सिनेमात तू त्या शशी कपुराक विचारतंस ना?
"काय आसां तुझ्याकडे?
माझ्याकडे आसां तसो, बंगलो,गाडी,नोकर चाकर आसत?"
त्यावर तो तुका सांगता मां,
"माझी आओस आसा माझ्याकडे."
आणि तां ऐकून तू कसो त्या सिनमधे गप्प बसतंस.पण खरां सागू तुझ्या खऱ्या आयुष्यात तुका त्या प्रश्नाचां उत्तर असा देवूक होयां,
"बंगलो,गाडी,नोकर चाकर माझ्याकडे आसंतंच शिवाय माझी आओस पण माझ्याक्डे आसां."
असां म्हणून किती धन्य वाटत असताला तुका?.
आता तुझी आवस गेली,आमकां पण खूप वायट वाटलां.
एखादो माका म्हणतलो, तुका काय करूंचा आसा.तो आपलां काय तां बघून घ्येत.पण खरां सांगू तुका मालवणी आम्ही असेच आसो.जरा फटकळ दिसलो ना तरी रसाळ फणसा सारखे.बाहेरून कांटेरी पण आतून रसाळ गऱ्या सारखे.तेव्हा तू काय मनांक लावून घेवू नकोस.
माझा मात्र काम सांगूचा.आणि तुझा ऐकूचा.
हेंचो अर्थ तू काहीच काम करु नकोस असा नाय.अरे,तुझ्यो काही तरी आयुष्यातल्यो आठवणी लिही,तुझा आत्मचरित्र लिही,उगवत्या कलाकारासाठी काही शिकण्यासारख्या लिही,आईवडीलांक तू किती आदर ठेवून वागतंस, त्याचे काही इतरांवर चांगले संस्कार होतीत असां काही तरी लिही, तुझ्या वडिलांसारख्यो काही कविता कर .तुका जरी अलोट पैसो तुझ्या मेहनतीन मिळालो तरी तो लोकांकडूनच मिळालो मां? त्यातलो थोडो पैसो तरी लोकांक ह्या ना त्या निमीत्तान परत केलंस तर गोरगरीब तुका नक्कीच मानतलो,आशिर्वाद देतलो,असा तुका नाय का वाटणां? थोडीशी गांधीगीरीपण करूची लागता.
तू तसा करुचंस नाय म्हणा, कारण पैसो कोणाक नको झालोसा?. पण एक सांगतंय राजकारणांत मात्र अजिबात पडूं नको बाबा! मोठ्यां मोठ्याक पश्चाताप झालेलो मी बघितलंय.तुकापण पुर्वीचो अनुभव आसां म्हणा.राजीव गांधीच्या वेळी रे!
ह्या वयांत "हेल्थ इज वेल्थ " असा काय म्हणतत नां तांच खरा.तू काय इतको म्हातारो झालंस नाय रे.पण बघ ज्या वयावर जां शोभतां तां करुक होयां नाय काय?ह्या वयावर आता लहान मुलांसारख्यो उडक्यो मारलंस तर तुका तां शोभताला काय? माकां सांग.
हल्लीच तुझ्या घरावर कोणी म्हणे बाटल्यो फेकल्यो,दगड मारले म्हणून ऐकलां,माकां काय राजकारण समजणां नाय बघ.जां समजणां नाय मां तेच्यावर विचारला नाय तरी सांगुचा असा आमका मालवणी लोकांक मुळचीच संवय आसा.आता एखादो मालवणी ह्या वाचून माझ्यावर चिडतोलो नक्की,पण मी तेची पर्वा करणंय नाय.खरां सांगूक हरकत कसली रे?
राजकारण बरां नांय.मोठ्या मोठ्यानी हात टेकलेत बघ.होताचा नाय आणि नायचा होता करूंक येवंक होयां.गेंड्याचा कातडां आंगावर होया.ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करूक येवूक होयी.तां तुकां माकां जमुचा नाय.आपलो पिंड तसलो नाय.आणि बघ प्रत्येक काडीक दोन टोकां असतत.ह्या तुका सागूंक नको.तसाच प्रत्येक वादाक दोन बाजू असतत.दुसऱ्याचां म्हणणां पण बरोबर असू शकतां.
तुका माहीत आसां मा, मराठी लोकांक नाटकां खूप आवडतत,आणि त्यातल्यात्यात आमका मालवण्यांक तर खूपच आवडतत,मालवणीत धयकालो तर नाटकाचो उस्फुर्त प्रकार आसा. थोडा रामायण महाभारत माहित असलां म्हणजे झालां.मग अर्जुन रामायणात की राम महाभारतात होतो ही खरी माहिती असण्याची इतकी जरुरी नाय.फक्त नाटकाच्या मंचावर डायलॉग म्हटले म्हणजे झालां.तुका माहीत आसां त्यामुळे विनोद सुद्धा उत्पन्न होता तो.मछ्चींद्र कांबळी तुका म्हायत असतोलच.आता तो गेलो म्हणां नायतर तेना तुझ्या ह्या बाटल्या प्रकरणावर एक मालवणीत नाटक लिवला असतां
" बहरला पारीजात दारी,फुले कां पडती शेजारी?"
रुक्मिणी,भामिनोचो वाद तुका म्हायत आसां मां?श्रीकृष्णाक किती त्याच्या बाईलानी डोक्याक काणेर केलो तो?
आता जाता जाता एक शेवटचा सांगतय.आयुष्य एकदांच मिळतां ह्या काय तुकां सांगुक नको.तुझे जे जवळचे आसत ना त्यांच्या बरोबर जास्त वेळ घालंव.आणि तुका जोपर्यंत लोकां हवो हवोसो म्हणतत नां, तो पर्यंत तेंच्यातून आंग काढून घेतलेलां बरां असा माका वाटतां.आमच्या सुनील गावस्करान कसा केला.वेळीच बाजूक झालो. क्रिकेट मधून रे!.आमचो सुनील म्हणण्याचा कारण तो आमच्या वेंगुर्ल्याचो.उभ्यादाड्यांचो रे!
दुसरा म्हणजे अट्ट्ल बिहारीचा बघ.नावासारखे बाजपायजी आपल्या पणाशी अट्ट्ल आसत.आता परत पंतप्रधान होवूक मागणत नाय.अशी किती दाखले देवू मी तुका?
कुणी तरी म्हटलां बघ." सूर्यनारायणा कडून एक शिकूक होयां,संध्याकाळ झाली रे झाली, का आपला अस्ताक गेलेला बंरा"
होय नायतर, आपलां नांव रात्रीच्या भानगडीत नको बाबा!.
माझ्या अक्कलेप्रमाणे मी तुका सल्लो दिलंय.आता निर्णय का घेवचो तां तू बघ.
श्रीकृष्ण सामंत
पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पाटी
प्रेषक उदय सप्रे ( सोम, ०७/०७/२००८ - १२:५०) .परवाच पुण्यात जाऊन आलो आणि वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला लागून एक पाटी लिहिली होती :
वहातुकीचे नियम पाळा
(स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली 
इकडे यायचे टाळा !
---------------पुणे वहातुक नियामक मंडळ----------
भन्नाट "डोकॅलिटी" पुणेकरांची !
अध्यक्षपदाची फिल्डिंग!
प्रेषक दिनेश५७ ( गुरू, ०७/०३/२००८ - ००:०४) .मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले.
संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता. सान्फ्रान्सिस्कोत संमेलन भरले, तर कदाचित आता त्यांना बरे वाटेल. पण हे विषयांतर झाले. संमेलनाच्या निमित्ताने आपली बाजू कुठेतरी झुकती हवी, म्हणून आम्ही आतापासूनच कानोसा घ्यायला सुरुवात केलीये. सान्फ्रान्सिस्को संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणीच उभे राहू नये, असाही एक नवा सूर ऐकू येतोय. परवा, अमेरीकन एम्बसीच्या बाहेरच्या रांगेत पहाटेपहाटेपास्नं थांबलेल्यांकडे मी संशयानं पाहात होतो. काहीजण अगदी साळसूद्पणानं हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्या सांभाळत आपल्याला कुणी पाहात तर नाही ना, अशा भीतीनं माना वळवून ताटकळत उभे होते. एका अनिरुद्धबापूंसारख्या मिश्या असलेल्या कवीनं मला बघून मान फिरवली, तेव्हा सान्फ्रान्सिस्कोला जाण्यासाठीची पूर्वतयारी का,असं मी ओरडून विचारल्यावर कसचंकसचं म्हणत त्यानं विषय बदलला आणि तुम्ही इकडं कुठं म्हणत मलाच गुगली टाकल्यावर मलाही काही सुचेच ना. कुणीच अध्यक्षपदाला उभं राहात नसेल, तर आपला फॊर्म भरून टाकायला काय हरकत आहे, असा विचार आल्यावर मी पण आधी व्हिसाची तयारी करू या म्हणून धावाधाव सुरु केली होती. हो, नाहीतर, अध्यक्षपदावर बीनविरोध निवड झाली, तरी व्हिसा नाकारला गेला, तर खाली मान घालून रत्नांग्रीला जायची पाळी यायची. तसे नको म्हणून, आधी व्हिसाची तयारी करा, असं बायकोनं सांगितल्यावर मी तिच्यावर भलाताच खूश झालो होतो. पण अध्यक्ष व्हायचं तर काहीतरी साहित्यिक कामगिरी नको का, असं तिनं विचारल्यावर जरासा हिरमुसलो, तोवर तिनच माझ्यापुढं मुलीची गेल्या वर्शीची वही धरली आणि डोळ्यांनीच, `वाचा' म्हणून खुणावलं. तर मी वही हातात घेउन पहिलच पान उघडलं तर मुलीच्या टीचरांनी मारलेला लालभडक शेरा डोळ्यापुढे नाचायला लगल्यानं जराशी अंधारी आल्यासारखं होऊन मी आंगठा ओठाशी नेत खुणेनंच पाणी आणायला सांगितल्यांवर बायको फणकारत आतच गेली. मग मात्र मी ओर्डून पाणी मागितल, तेव्हा हसत पुढे येउन तिनं वहीचं शेवटचं पान उघडल, तर एकेक ओळ मोकळी सोडून चारचार ओळींवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. मी खुणेनंच `काय', म्हणून बायकोला विचारल, तर, तुमच्या अध्यक्शपदाची तयारी, असं सांगत ती खदाखदा हसायलाच लागली. या चारोळ्या आहेत असं तिनं सांगितल्यावर मी भलताच खुश झालो, आणि कवतिकानं तिच्याकडं बघितल्यावर ती लाजून स्वैपाकघरातच पळाली. पण संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तुझ्या चारोळ्या चालतील का, असं विचारल्यावर, महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी चालतात ना बायकोच्या चारोळ्या, असा बिनतोड सवाल तिनंच मला केल्यावर मी गप्प बसलो, आणि व्हिसाच्या तयारीला लागलो. पण अजूनही, वाटतंय की, यंदा नकोच तसं. बायकोच्या चारोळ्यांच्या भांडवलावर आपण पुढच्या वर्शी महामंडळाच्या अध्यक्षपदाला उभं राहू, यंदा फक्त व्हिसा असला, तरी अध्यक्षपद मिळेल,..
सान्फ्रासिस्कोचं जमलं नाही, तर यंदा कुठल्या तरी संमेलनात आपली हजेरी लावायचीच असं मी पक्कं ठरवलंय. रत्नाग्रीत काय आपली डाळ शिजायची नाही. एवढ्या वादानंतर, बायकोच्या कवितांवर तिथे अढ्यक्षपद मिळेल, असं वाटत नसल्यामुळे, विद्वेषी संमेलनाचापण मी मागोवा घेतोय. यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय. महामंडळाची पुढची संमेलनंपण आता जगाच्या पाठीवर कुठेही होणार, हे नक्की झालंय. विंदांच्या सूचनेचा आदर राखण्यासाठी, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर संमेलन भरवता येईल किंवा कसे, याची पाहाणी करण्याकरता महामंडळाचा एक प्रतिनिधी तिकडे जाणार आहे, असंही कानावर आलंय.
पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे. अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे...

