user

माहिती

फर्डिनांड मॅगेलान - जगाचा प्रवासी!

प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करणारा महावीर कोण? या प्रश्नाचा शोध 'फर्डिनांड मॅगेलान'पाशी येऊन संपतो. कारण हाच तो सुपरहिरो ज्याने पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. ती सुद्धा आपण शंकराला प्रदक्षिणा घालतो ना, तशी!
या मॅगेलानबद्दल मी पहिल्यांदा वाचलं जेव्हा मी हौशी खगोलनिरीक्षकाचं काम करायचो. दक्षिण गोलार्धातून दिसणारा एक खगोलीय अविष्कार म्हणजे मॅगेलानचे ढग. प्रत्यक्षात ह्या अवकाशातील छोट्या आकाराच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) असून आपल्या आकाशगंगेच्या भोवती फिरणाऱ्या उप-आकाशगंगा (किंवा लघु-दीर्घिका) आहेत. ही आणि याबद्दलची माहिती गोळा करताना अजून थोडी शोधाशोध केली आणि कळलं की या आकाशगंगांचं नाव हे 'फर्डिनांड मॅगेलान' या जग-प्रसिद्ध नाविकाच्या नावावरून दिलंय, ज्याने यांचा शोध (डिस्कव्हरी) लावला. मॅगेलानचं नाव अजूनही अनेक जागांना, वस्तूंना, पदार्थांना, प्राण्यांना दिलं गेलंय कारण या गोष्टी त्यानंच पहिल्यांदा जगासमोर आणल्या. असा हा मॅगेलान आणि त्याची ही परिचयात्मक माहिती.त्याची अजून थोडी ओळख करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!
मॅगेलानचा जन्म झाला १५व्या शतकाच्या उत्तरार्धात एका पोर्तुगीज कुटुंबात. लहान वयातच मॅगेलान पोर्तुगीज राजाच्या दरबारी हुजर्‍या म्हणून नोकरीस लागला, अर्थातच ही नोकरी म्हणजे त्याच्या कुटुंबाचा पिढीजात पेशा होता. पण बहुधा मॅगेलानचं मन यात रमलं नसावं. कारण काही वर्षातच एकदम शांत आणि सरळसोट नोकरी सोडून तो एका जहाजावर खलाशाची अतिशय सामान्य नोकरी करू लागला आणि तिथेच त्याची समुद्राशी ओळख झाली. दक्षिण-पूर्वेतील पोर्तुगीज वसाहतींवर काम करताना अक्कलहुशारी, मेहेनत आणि थोडंफार नशीब यांच्यामुळे मॅगेलान वरिष्ठांच्या जसा पटकन नजरेत भरला, तशीच थोड्याच वर्षांत त्याचावर खप्पामर्जीही झाली. त्यातच अवैध व्यापाराचा शिक्का माथ्यावर लागल्याने पोर्तुगाल आणि पोर्तुगीज वसाहतींमध्ये त्याला काम मिळेनासे झाले. पोर्तुगीज राजानेही त्याची पश्चिमेकडील मसाल्याच्या बेटांवर मोहीम आर्थिक कारणे पुढे करून आणि मॅगेलानच्या मागण्या नाकारून रद्द केली. पोर्तुगालमध्ये करण्यासारखे मॅगेलानकडे काहीच उरले नाही. निराश मॅगेलान पोर्तुगाल सोडून स्पेनमध्ये निघून गेला.
१५वं शतक संपत आलं होतं. जगाचे नकाशे बनवायचं काम नुकतंच सुरु झालं होतं त्या काळातली ही गोष्ट. संशोधक आणि धर्मसंस्था यात 'पृथ्वी गोल आहे की सपाट आहे ' या प्रश्नावरून वादंग माजला होता. पोर्तुगीजांतर्फे वास्को-द-गामा भारतात पोहोचला होता. पोर्तुगाल आणि स्पेन ही दोन्ही राष्ट्रं तेव्हा अनिर्बंध राज्यकर्ते आणि परस्परांचा द्वेष यात गुंतून पडली होती. त्यातून मान्य कराव्या लागलेल्या एका तहानुसार 'आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे जाणारा मार्ग' पोर्तुगीजांच्या ताब्यात आला होता. पोर्तुगीज भारतात पोहोचले आणि भारत नावाचा खजिना त्यांच्या हाती लागला ही गोष्ट स्पेनच्या राजाला सहन होणारी नव्हती. खुष्कीचा (जमिनीवरील) मार्ग हा कठीण तर होताच, त्यातच तुर्क, मूर आणि अफगाण टोळ्यांमुळे धोक्याचा होता. समुद्री चाचेगिरी आणि होणारी लुटालूट लक्षात घेऊनही हा मार्ग सोयीचा असल्याने स्पेनचे राज्यकर्ते लवकरात लवकर भारतात पोहोचण्यास उत्सुक होते. स्पेनच्या राजाने 'कोलंबस'ला भारतात जायचा नवा समुद्रामार्ग शोधायला संपूर्ण अर्थसहाय्य केलं. पण हाय रे कर्मा! कोलंबसाने भारताऐवजी अमेरिकेचा शोध लावला. अमेरिका कसली, त्याने तर अमेरिकेच्या आधी लागणाऱ्या वेस्ट इंडीज बेटांचा शोध लावला होता. कोलंबसला किंवा इतर स्पेनला आपण कसला शोध लावलाय याची सुतराम कल्पना नव्हती, आणि ते भारताला पोहोचायच्या ऐवजी कुठेतरी भलतीकडेच पोहोचल्याबद्दल कोलंबसावर नाराज होते. बिचाऱ्याने भारतात पोहोचण्यासाठी खूप खटपट केली पण तो गेला भलत्याच दिशेला त्याला तो तरी काय करणार.
अतिपूर्वेकडील मसाल्याची बेटे शोधण्यासाठी मॅगेलानला आर्थिक पाठबळ हवं होतं, आणि स्पेनच्या राजाला एक जाणकार मनुष्य. दोघांची भट्टी जमली आणि मॅगेलान त्याच्या पूर्वेच्या बेटांच्या मोहिमेला निघाला. स्पेनच्या राजाने त्याला आर्थिक मदत तर केलीच, शिवाय ५ जहाजांचा ताफा, सुमारे २०० खलाशी आणि एका जहाजाच्या कप्तानाला कधीही मिळणार नाहीत इतके अधिकार देऊन त्याची रवानगी केली. वेस्ट इंडीज बेटांचा ताबा जरी स्पेनकडे असला तरी ब्राझीलच्या भूभागाचा आणि किनारपट्टीचा ताबा पोर्तुगीजांकडे होता. पोर्तुगीज जहाजे आणि गस्त चुकवीत मॅगेलान आर्जेन्टिनापर्यंत येऊन पोहोचला. अतिशय खवळलेला अटलांटिक समुद्र आणि बेक्कार हवामान यामुळे त्याला तिथे काही काळ थांबून राहावे लागले. त्यानंतर संपूर्ण दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जायच्याऐवजी मॅगेलानने आपला मोर्चा एका अरुंद अशा सामुद्रधुनीकडे वळवला. (सामुद्रधुनी: दोन भूभागामधील चिंचोळा समुद्राचा पट्टा. उदाहरणार्थ, भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेली पाल्कची सामुद्रधुनी).
इथून जात असताना मॅगेलानच्या २ जहाजांवर बंडखोरी झाली आणि मॅगेलानवर विश्वास नसणारे त्याचे २ कप्तान आणि काही खलाशी ही जहाजे घेऊन गुपचूप स्पेनला परत गेले. थोड्या दिवसांनी जेव्हा मॅगेलान सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला तेव्हा त्याला दिसला एक अतिविशाल महासागर. अटलांटिक महासागर आणि सामुद्रधुनीमधील वादळी वारे आणि खराब हवामान यांच्या मानाने हा सामुद्र अगदीच शांत होता. मॅगेलानने याला नाव दिलं 'शांत' समुद्र. हाच आजचा प्रशांत महासागर (pacific ocean)!
पडेल वारे, आणि समुद्राचा शांतपणा यामुळे मॅगेलानच्या खलाशांची प्रशांत महासागर पार करताना चांगलीच दमछाक झाली. ३-४ महिने महासागरात कसेबसे जिवंत राहून मॅगेलान अतिपूर्वेकडील देशात येऊन पोहोचला. मसाल्याच्या बेटांकडे यायचा एक संपूर्ण नवा मार्ग त्याने शोधून काढला होता. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
सध्याच्या फिलिपिन्समध्ये दोन स्थानिक शासन-कर्त्यांच्या भांडणात एकाला मदत (अर्थात राजकीय फायदा उठवण्यासाठीच) करताना झालेल्या हल्ल्यात मॅगेलान जबर जखमी झाला. स्थानिक आदिवासी त्याला घेऊन गेले. मॅगेलान त्यानंतर तो कधीही कुणालाही दिसला नाही. त्याला झालेल्या जखमांमुळे तो जागीच मरण पावला असावा असे प्रत्यक्षदर्शी लोकांनी लिहून ठेवलेले आढळते. मॅगेलानच्या पार्थिवासाठी अनेक वाटाघाटी (आणि सौदेबाजीसुद्धा) झाली, पण सर्व व्यर्थ. जगाच्या या संशोधकाची अशी अखेर झाली की त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. पण त्याचा हा प्रवास व्यर्थ गेला नाही. या सगळ्या दिव्यातून वाचलेले खलाशी (फक्त १८ जण) रडत-खडत स्पेनला पोहोचले.
आता प्रश्न असा आहे की मॅगेलान जर मध्येच मरण पावला, तर असं का म्हणतात की त्याने जग-प्रदक्षिणा पूर्ण केली?
कारण जेव्हा तो पोर्तुगीजांच्या नोकरीत होता, तेव्हा तो फिलिपिन्सला येऊन काही काळ राहून गेला होता. त्यामुळे त्याने पहिली जग-प्रदिक्षिणा केली असे मानले जाते. त्या काळी समुद्र-प्रवासात जिवंत राहून सहीसलामत प्रवास पूर्ण करणे हीच सर्वात मोठी गोष्ट होती तिथे मॅगेलान आणि त्याचे मुठभर सहकारी जगाची सफर करून आले.
मॅगेलानने या सफरीदरम्यान बनवलेले नकाशे त्याच्या मृत्युनंतरही सुमारे ३०० वर्ष वापरात राहिले. गरजेप्रमाणे त्यात सुधारणाही झाल्या, पण पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मॅगेलानने सर्वप्रथम 'पुराव्यानिशी शाबित' करून दाखवला. पृथ्वीचे आणि समुद्रामार्गांचे नकाशे 'पृथ्वी गोल आहे' हे ध्यानात ठेवून बनवले महिजेत ही दूरदृष्टी सर्वप्रथम मॅगेलानने दाखवली. त्यासाठी काहीकाळ त्याला स्पेन मधील धर्मासंस्थांच्या रोषाला बळी पडावे लागले होतेच. पण त्याने त्याचा आग्रह सोडला नाही, आणि नंतर घडला तो सर्व इतिहास वर संक्षेपाने आला आहेच!
असा हा जगाचा संशोधक, मॅगेलान! स्वत:च्या कार्याने आणि चिकाटीने अजरामर होता येतं हे दाखवून देणारा एक असामान्य सुपरहिरो!

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा


नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा


प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.

दि ६ जून २०१०.

जास्त वेळ न दवडता अधिवेशनाचे पहिले सत्र माझ्या भाषणाने सुरू झाले. त्यात मी नाडी ग्रंथात सुचवलेले शांती दीक्षेचे उपाय करायची गरज व ज्यांनी ते केले त्यांच्या अनुभवांची कथने सादर केली.
त्यानंतर शिवषण्मुगमना पाचारण केले गेले. त्यांनी त्यांच्या बद्दल व नाडी वाचनाच्या अनुभवांबद्दल कथन केले. बालपणापासून त्यांनी कसे शिक्षण घेतले. कसून अभ्यास केल्यानंतर गेली २५ वर्षांत त्यांनी हजारोंच्या संखेने नाडी ग्रंथांचे वाचन कले आहे. त्यांनी सर्वात जास्त जपानहून येणाऱ्या दहा हजाराच्यावर लोकांची नाडी ग्रंथ कथने केल्याचे ऐकून श्रोते थक्क झाले. त्यांचा पलनी ह्या शिष्याने गेल्या १५वर्षात अनेक नाडी केंद्रातून काम करु नाव कमावल्याचे सांगितले. भाषांतरकार रवीने नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने करायची हातोटी कशी मिळवली ते कथन केले. आपली नाडी ग्रंथांची सेवा दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याचे विनम्रपणे सांगितले.
शिवाने नंतरच्या आपल्या कथनाची सुरवात ओमकाराने केली. आम्ही त्याला म्हणून साथ दिल्यावर उपस्थित सर्वांनी ओमकार म्हणून सभागृहात एक गूढ गंभीर नाद विलक्षण प्रभाव पसरला. शिवाने पॉवेलची मैत्रिण मारियांच्या “धेनका” नावाच्या मातेचा अगस्त्यमहर्षींनी आपल्या नाडीग्रंथांत मदरमेरीच्या अंशाचा जन्म असल्याचे कथन, त्यांच्या प्रेमळ नजरेचा “दिव्यदृष्टी” म्हणून महर्षींनी केलेला गौरव ऐकून उपस्थितांपैकी धेनकांच्या कृपादृष्टीची जाण व महत्व आधीच माहित असणाऱ्यांनी टाळ्यांचा गजर करून आपली संमती दर्शवली.
दुपारच्या भोजनाच्या विश्रामात व नंतर लोकांचा गराडा व प्रत्येकाला आमच्याशी बोलायची उत्सुकता जाणवत होती. मात्र योग्य रुपांतरकार नसल्याने जे त्यातल्या त्यात इंग्रजीत बोलत होते त्यांच्यापाशी गर्दी होत होती. मधल्या काळात लोकांनी आपल्या शंका एका बॉक्समधे लिहून पाठवाव्यात असे सुचवल्याप्रमाणे अनेक विचारणा आल्या होत्या. त्याला वेळ देऊन नव्या सत्राची सुरवात झाली. बहुतेकांचा सुर काहीच माहिती वा अनुभव नसल्याने आमच्या कथनातील थक्क करणाऱ्या गोष्टींच्याबद्दल आणखी जाणून घेण्याचा होता.
त्यानंतर शिवषण्मुगमनी नटराजाच्या मुर्तींच्या गौरवचिन्हांनी जोसेफ, मेरिया, धेनकांना “होली मदर” असे गौरवून सत्कार केला. मी शालीं पाठींवर घालून त्यांना गौरवले. पॉवेलला मी एक गणेशाची एबस्ट्रॅक्ट रुपातील सुंदर फ्रेम देऊन सन्मान गेला. नंतर पॉवलनी माईक हातात घेऊन आपले निवेदन केले. शेवटी मुख्य नाडी वाचक शिवानी अगस्त्य, वसिष्ठ, काकभुजंदर, शुक, कौशिक, भृगु आदि अनेक महर्षींच्या केलेल्या स्तुतीगायनाने पुन्हा सभागृह भारले गेले. त्यानंतर आमचे रीतसर आभार मानून अधिवेशनाची सांगता झाल्याचे जोसेफ श्रोटरनी जाहीर केले. असे हे पहिले आंतरराष्ट्रीय नाडी ग्रंथ अधिवेशन संपन्न झाले.

पाप्यांचा कहर !

विदेशात एकमेकांना भेटायच्या व अभिवादन करायच्या विशिष्ठ पद्धती आहेत. कधी हस्तांदोलन तर कधी एकमेकांजवळ अलगद येऊन गालाला हलकेच पुसट स्पर्ष गालाने वा ओठांनी करून भेटीचा आनंद व्यक्त करायची प्रथा आहे. आम्हाला याची सवय नसल्याने प्रत्येक जण मिठीत घेऊन दोन्ही गालांवर देणाऱ्या हलक्या चुंबनाची सवय करून घेता घेता आमची तारांबळ उडत होती. विशेषतः स्त्रियांच्याकडून मिळणाऱ्या तशा जोरदार प्रतिसादाला!
पलनी न राहवून म्हणाला, “ सामी, हमने अबतक अपने वाईफका भी इतनी बार लिया नही होगा इतना यहां एक दिन में हुवा!“
मी त्याला कौतुकाने मान डोलवून होकार भरला. नंतरच्या सहवासात नाडीवाचक अशा प्रतिसादाला समरसून उत्तर देऊ लागल्याने ते या प्रथेला रुळल्याचे जाणवले. असो.

त्यानंतर पुढील तीन आठवड्यात १००पेक्षा जास्त लोकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले. त्या प्रत्येकाची नाडी पट्टी मिळुन एक प्रकारे विक्रम झाला, असे खुदुद नाडी शास्त्रींचे मत होते. त्या प्रत्येकाला आपले नाव वअन्य माहिती कुठे व कशी पट्टीत लिहिलेली आहे ते त्यांना आवर्जून दाखवण्यात दोघे नाडी शास्त्री तत्पर होते. त्याचे सर्वांसाठी व्हीडीओ शूटिंग होत होते. काहींना अगदी पहिली नाडीपट्टी उघडल्यापासून रेकॉर्डिंग हवे होते तसे त्यांना वेगळे पैसे भरुन मिळवायची सोय होती. प्रत्येकाने इंग्रजीतून झेक भाषेसाठी भाषांतरकाराची आपापली सोय करायची होती.
शेवटच्या दिवसात या अधिवेशनाचा थोडक्यात अहवाल व फोटो रेजेनेरेस नावाच्या मासिकात छापुन आल्याचे कळले. फोटो खाली पहा. ते नीट करून लावायला कृपया मदत हवी आहे.
अनेक ठिकाणी आम्हाला झेक लोकांचे काही उच्चार व इंग्रजीतील कथन नीटसे समजत नसे. त्यामुळे या व पुढील कथनात थोडी सरमिसळ होण्याची शक्यता आहे.
प्राग कॉलिंग लेख मालिका पुढे चालू...

कापुसकोंड्याची गोष्ट....... म्हणजे नक्की कोणती गोष्ट

.... लहानपणी आपल्यातल्या बहुतेक सगळ्यांनीच हि गोष्ट ऐकली असेल....
... जेंव्हा गोष्ट ऐकायची इच्छा व्हायची आणि घरातल्या कोणत्या तरी मामा कडे (कारण असल्या गोष्टी सांगण्यात मामा लोकांचाच उत्साह जास्त असतो) गोष्टीची फर्माईश व्हायची...तेंव्हा मामा सुरू व्हायचा...
....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.....मग ते पुढलं कधिही न संपणारं गुर्‍हाळ चालु व्हायचं...
मामा : कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?....
मी : सांग...
मामा : सांग काय म्हणतीस्....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
मी : सांग ना रे मामा...
मामा : मी : सांग ना रे मामा...काय म्हणतीस? .कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
...........
.........
......
.. हे संपायचच नाही....
.....मला खरच जाणुन घ्यायची इच्छा आहे...कि कोण आहे हा कापुसकोंड्या...आणि...काय आहे त्याची ती गोष्ट?
......मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर..
.....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....!

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस पहिला

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन


दि ५ जून २०१०
प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.

दि. ५जून २०१०, शनिवारी सकाळी दहा वाजता जुन्या टाऊन हॉलच्या एका मोठ्या हॉलमधे अधिवेशनाची सुरवात झाली. त्याआधी नऊ वाजल्यापासून बाहेर ज्यांनी आपली नावे नोंदवली होती त्याचे व नविन लोकांचे नावनोंदणीचे काम करायला गर्दी जमा झाली होती. पण कुठेच धक्काबुक्की नव्हती. शांतपणे लोक क्यूला उभे होते. असो.

जोसेफ श्रोटर यांनी अधिवेशनाची सुरवात झाल्याचे जाहीर केले. मात्र स्टेजवर नेहमी प्रमाणे टेबलखुर्च्यांची मांडामांड नव्हती की समईच्या दीपप्रज्वलनाची सोय. मात्र मी आणलेल्या अगस्त्य व भृगु महर्षींचे फोटो आवर्जून ठेवले गेले होते.
पॉवेलने अगोदर सांगून ठेवले होते. त्याच्या भाषेत, "आय दोंत लाईक आरेंजमेत ऑफ स्तुपीद कम्युनिस्ट. नोथिंग ऑन स्टेज." त्याप्रमाणे स्टेजवर मांडामांड होणार नाही. साधेपणाने प्रत्येकाने उभे राहून बोलायचे आहे. माईक हातात घरून.
आम्हाला पुढील रांगेत बसायची सोय होती. चीफ नाडी ग्रंथ वाचक शिवषणमुगम, दुसरे नाडी वाचक पलनी त्यानंतर भाषांतरकार रवी, स्वतः पॉवेल, नाडी ग्रंथ प्रेमी मेरीया, तिची वृद्ध आई धेनका व अन्य काही पहिल्या रांगेत होते. स्टेजच्या एका बाजूला माईक व व्हीडिओ शूटिंगच्या टीममधे काम करणारे जॉन, मीशा, येरी तत्परतेने उभे होते. आम्हा भारतातून आलेल्या निमंत्रितांचा सत्कार रुबाबदार पुष्पगुछ्यांनी झाला.
जोसेफ श्रोटर प्रागमधील एक मान्यवर सायकिक अनॅलेलिस करणारे एक्सपर्ट म्हणून गणले जातात. त्यांनी प्रथम सत्रात सिक्स्थ सेंन्स व नाडी ग्रंथ यावर आपले भाषण केले. त्यांच्या भाषणाचा गोषवारा त्यांचा मुलगा रोडिक मला दबक्या आवाजात सांगत होता. त्यांचे संपुर्ण (पॉवर पॉईटवरून केलेले) भाषण वेगळे येथे वाचायला मिळेल. त्यांच्या भाषणाला टाळ्याचा कडकडाट होऊन उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. नंतर माझी वेळ आली. मी आधीच्या श्रोटरांच्या भाषणातील धागा पकडून नाडी ग्रंथांतील कथन हे मानवी बुद्धीच्या पलिकडील वैश्विक ज्ञानाच्या साठ्यातून मिळवलेले असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी महर्षींचीच कथने त्याला पुरक आहेत असा खुलासा केला. त्याआधी मी थोडक्यात या अधिवेशनाचा माझ्या दृष्टीने उद्देश व महत्व कथन करणारे निवेदन व स्वागत भाषण केले. माझ्या भाषणाचा अनुवाद रोडिक तत्परतेने करत होता. वेळोवेळी ऐकू येणाऱ्या टाळ्यांमुळे माझे म्हणणे श्रोत्यांपर्यंत पोचत असल्याचे जाणवत होते.
मी नजरेने केलेल्या मोजणी प्रमाणे सर्व खुर्च्या भरलेल्या दिसत होत्या. त्यानुसार सुरवातीला १२० श्रोते होते नंतर वाढून १४० जमले असावेत. माझ्या नंतर मेरीयाने तिचा नाडी ग्रंथांचा भारतातील अनुभव थोडक्यात कथन केला. मग जेवायला सर्व पांगले. भोजन आपापले सोईने करायचे होते. त्यामुळे भारतात हटकून दिसणारी भोजन भाऊंची लगबग इथे नव्हती.
आम्हाला जवळच्या एका रेस्तोरॉंमधे नेले गेले. नेहमी प्रमाणे बीरची ऑर्डर झाली. “पटा पटा आटपा” असा खाक्या नव्हता. तरीही आम्ही तासाभरात हॉलवर वेळेवर परतून पुढील कार्यक्रमात सामील झालो. नंबर माझ्याच होता. यावेळी मला आलेल्या विविध अनुभवांचे कथन करायला सांगण्यात आले होते. योगी रामसुरत कुमारांचा व पॉन्डेचरीतील अरविंदाश्रमाचा भाग सांगताना वेळ संपली. कारण मला रोडिकच्या झेकमधील रुपांतरासाठी वेळ द्यायला लागत होता. असो.
त्या नंतर शिवषण्मुगना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या खड्या आवाजात तमिळ गायनाने अनेक महर्षींची आळवणी करणारे गायन केले. त्यावर श्रोत्यांच्या आनंदाच्या टाळ्या आल्या. त्यांनी व पलनीने शिवस्तुतीही म्हटली. पुन्हा मला बोलायला आमंत्रित केले गेले. यावेळी मी नाडी ग्रंथांतील विविध कांडांची रचना व त्यातील मजेशीर माहिती दिली.
त्यानंतरच्या सत्रात मानवीशरीरातील सात आंतरअंगांची कल्पना मी सांगितली व चौथ्याशरीरातील विविध शक्ती प्राप्त महर्षींनी संपुर्ण मानवाला देश, धर्म, जाती वा भाषा आदिंची बंधने झुगारून केलेली ही अनन्य साधारण मानवतेची सेवा आहे असे ठासून सांगितले. असा अधिवेशनाचा पहिला दिवस संपन्न झाला.

बायकांचा सुळसुळाट!!

अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता! काही विविध तंग पोषाखातील तरुणी, काही उच्च विचारांच्या गर्भश्रीमंत वाटल्या, तर काही पन्नाशी नंतरच्या! काहींशी बोलताना भारताबद्दल खुप माहिती असलेल्या तर काहींना योगा, प्राणायाम, मंत्र, आस्त्रालोगी(जी), एनर्गी(र्जी) लेवल वर अभ्यास केल्याची जाण असलेल्या विदुशी होत्या. उरलेले पुरुष मारुन मुटकून आल्यासारखे चेहरे करून बसलेले वाटत होते. काही पुरुषांनी मात्र खुप प्रश्न विचारून आपली जागरूकता दर्शवली.

दुसऱ्या दिवसाचे कथन आणि प्राग कॉलिंग लेखमालिका क्रमशः

मराठा लाईट इनफंट्री - भाग - ३

भाग -३
दुसर्‍या महायुध्दात तेलाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ब्रिटीश सेनांनींनी दूरदृष्टी ने तेल उत्पादक देशांवर आक्रमण करायचे ठरवले आणि त्या योजनेत १ ल्या बटॅलियन ने बगदाद काबीज करून तेथून पॅलेस्टाईनला जाणारी तेलाच्या पाईपलाईनच्या संरक्षणाचे अती महत्वाची कामगिरी बजावली.

दोन वर्षातच या दोन बटॅलियन्सची रवानगी एका महत्वाच्या कामगिरीवर करण्यात आली. ते काम होते इजिप्तचे रोमेलच्या रणगाड्यांपासून संरक्षण. काळ होता १९४१चा उन्हाळा. या लढायांमधे सुभेदार मेजर शिंदे यांना LOM व सखाराम शिंदे यांना एक पदक मरणोत्तर देण्यात आले. याच दरम्यान २री बटॅलियनची गाठ बीर-अल्‍-गोबी येथे एका जर्मन रणगाड्यांच्य़ा तुकडीशी पडली. यात या बटॅलियन्सचे भारी नुकसान झाले. ८ अधिकारी त्यात ५ भारतीय होते, आणि २४० सैनिक मृत्यूमुखी पडले.

यावेळी बाबाजी देसाई नावाच्या साध्या सैनिकाने जे धैर्य दाखवले त्यासाठी त्याला मरणोत्तर LOM देण्यात आले. याला साधे तरी कसे म्हणावे ? या १८ वर्षाच्या सैनिकाने त्याच्या सेक्शन कमांडरला गोळी लागल्यावर त्या सेक्शनचा ताबा घेतला आणि आक्रमण जारी ठेवले. एवढेच नाही तर जेव्हा माघार घेताना त्याला त्याच्या कंपनीला कव्हरींग फायर देण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा त्याने ते काम मरेतोपर्यंत केले आणि इतर सैनिकांना सुरक्षितपणे माघार घेता आली. यातच त्याचा मृत्यू झाला.

Medal babu desai

त्याच्या पराक्रमाची ही नोंद बघा –
Sepoy Babu Desai of the Mahrattas , only eighteen years old , took command of his section when it's commander was wounded. When the company was held up, he picked up his Bren gun , rushed across the open under heavy fire, and brought the gun into action from the flank, enabling the company to move on again. Then he was wounded in the leg and his platoon commander told him to go back to the Regimental Aid Post to have the wound dressed. But Babu Desai had other views. He rushed the gun that wounded him , killing the gunner and making the others run. Then his leg gave way under him , but still he had to be forcibly placed on a stretcher before he would even consider his own troubles.

babudesai

बाबू देसाई खेरीज खालील सैनिकांना पण पदे बहाल करण्यात आली.
सुभेदार पांडूरंग चव्हाण
नाईक बाळा खराडे
नाईक सिताराम म्हस्के
नाईक बाबासाहेब इंगळे
लकू जाधव

१९४२ च्या जूनमधे रोमेलच्या आफ्रिका कोअरने अल्‍ अलमीनवर धडक मारली आणि नाझी सैन्य इजिप्तच्या दरवाज्यावर धडका मारू लागले. त्याचे आक्रमण रोखण्यासाठी ११वी इनफंट्री ब्रिगेडला दक्षिण आफ्रिका डिव्हीजनला जोडण्यात आले आणि यांना घाईघाईने टोब्रूकला पाठवण्यात आले.
Tobruk2

या ब्रिगेड्मधे ५वी मराठालाईट इनफंट्री होती हे आपल्याला माहितीच आहे. २०जून च्या पहाटे रोमेलच्या रणगाड्यांनी आश्चर्याचा धक्का देऊन टोब्रूकच्या अवती भोवती संरक्षणासाठी विखुरलेल्या मराठा लाईट्वर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या सोबतीला जर्मन हवाईदलाची विमाने होती. या डाईव्ह बॉंबर विमानांच्या हल्यामुळे रोमेलच्या रणगाड्यांना आणि चिलखती गाड्यांना या संरक्षण फळीत जोरदार मुसंडी मारता आली. थोड्याच वेळात टोब्रूकची संरक्षक फळी मोडून पडली आणि दोस्त राष्टांना एका मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. यात ११व्या इंडियन इंनफंट्री ब्रिगेडचा मात्र पूर्ण सफाया झाला. २ बटॅलियनचा अंत हा असा झाला. पण त्यांच्या शौर्याच्या हकिकती मात्र अजूनही सांगितल्या जातात. या बटॅलियनबद्दल ४ थ्या इन्डियन डिव्हीजनचे कमांडरांनी (मे. जनरल टूकर) यांनी या युध्दानंतर या बटॅलियनच्या रेजीमेंट सेंटरच्या (बेळगाव) कमांडन्ट्ला एक पत्र लिहीले –

प्रिय कमडांट,
मी आपल्याला हे पत्र पूर्वीच लिहीणार होतो पण आपल्या २ बटॅलियनची काही खबरबात मिळेल मग लिहू असे म्हणत थांबलो होतो. पण दुर्दैवाने आजपर्यंत तरी या बटॅलियन बद्दल माझ्याकड्र कुठलिही माहीती नाही. मी तुम्हाला फक्त काय झाले हे सांगू शकतो.

२/५ व्या मराठा लाईटच्या बटॅलियन्स वर २० जूनच्या पहाटे हल्ला झाला. हल्यात शत्रूने धूर ओकणारे बॉंब, अत्यंत विध्वंसक शक्ती असलेली स्फोटके आणि विमानांचा मारा वापरला. जे भूसुरुंग पेरलेले होते त्यांना यशस्वीरित्या टाळून शत्रूसैन्याच्या रणगाड्यांना पुढे मुसंडी मारण्यात यश मिळाले. ते बघितल्यावर आपल्या रणगाडा दलाची तातडीने मदत मागण्यात आली. दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. त्य रणगाड्यांच्या समोर या पायदळाचा निभाव लागला नाही त्यामुळे ती ब्रिगेड जागेवरच गारद झाली. त्यानंतर शत्रूचे ७० रणगाड्यांनी ज्या ठिकाणी २/५ आघाडी संभाळत होती तेथे जोरदार हल्ला चढवला. या बटॅलियनने या हल्याला नेहमीप्रमाणेच मोठ्या शौर्याने प्रत्युत्तर दिले पण रणगाड्यांसमोर त्यांचाही निभाव लागला नाही व त्यांचीही वाताहात झाली.

कळवायला वाइट वाटते की या क्षणी तुमच्या कुठल्याही ऑफिसर अथवा सैनिकांची काहीही खबरबात नाही.

टोब्रूक मेजर जनरल क्लॉपर यांच्या कमांडखाली होते, आणि २/५ मराठा लाईट मधली फळी संभाळत होती. ११ वी ब्रिगेड टोब्रूकच्या शरणागती नंतर १२ तास लढत होती ज्यात मराठा लाईट इनफंट्रीचा मोठा सहभाग होता. तसेच २५ फिल्ड रेजिमेंट त्यांच्या १६ पैकी १४ तोफा नष्ट होइपर्यंत लढत होती. शेवटच्या २ तोफा शेवटी त्यांनीच नष्ट केल्या.

११व्या ब्रिगेड चा नाश हे आमचे कधीही न भरून येणारे नुकसान समजतो. या ब्रिगेड्मधे तुमची बटॅलियन ही नेहमीच शौर्याच्या बाबतीत पुढे राहीली होती आणि त्यांचे नाव यासाठी इतिहासात नेहमीसाठी घेतले जाईल याबद्दल खात्री बाळगा.

टोब्रूकचा परभवाची कारणे हे लढणारे सैनिक हे नसून, संभाळण्याच्या पलिकडे असलेली युध्द्सीमा, रणगाडाविरोधी शस्त्रांचा अभाव आणि मुख्य म्हणजे जी मदत (counter attack of tanks) मागितली गेली होती ती वेळेवर न मिळणे हीच कारणे आहेत.

आपल्या रेजिमेंटच्या कर्नल यांना कृपया ही माहीती द्यावी.

आपला,.......

tobrukMix

या युध्दाच्या अनुभवानंतर मराठा लाईट मधून काही बटॅलियन्स मराठा रणगाडाविरोधी रेजिमेंट तयार करण्यात आल्या. त्यातली एक ४ थी मराठा एंटी टॅंक रेजीमेंट इटलीला गेली आणि ५वी मराठा एंटी टॅंक रेजीमेंट भारतात परत गेली.

त्यांचा इटली मधला पराक्रम पुढच्या भागात.... या भागात जो सर्वात जास्त मानाचा असा व्हिक्टोरीया क्रॉस ज्यांनी मिळवला, तो कोणाला मिळतो या विषयी.....

भाग -३ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
पुढे चालू......

औषध उतारे आणि आशिर्वाद

ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशिर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॊ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॊ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच." हे पुस्तक वाचताना आपल्या अंतर्मनातील खोल दडलेल्या विचारांना भावनांना समजुतींना हाका मारणारे विचार वाचत,ऐकत आहोत असे वाचकांना वाटेल. लेखकाचा पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा मानसिक आरोग्य आणि मनोविकार यांच्याशी संबंधित अशा पारंपारिक भारतीय प्रथा आणी उपचार पद्धती यांचा अभ्यास करणे हा आहे. लेखक कुठल्याही वादात पडु इच्छित नाही. तीन वर्षे भारतात हिंडत या गोष्टीचा अभ्यास करीत असताना भेटलेले गुढ संप्रदायाचे गुरु, शामान, मांत्रिक,भगत,वैद्य आणि इतर पारंपारिक औषधोपचार करणारे हकीम, बाबा वगैरे लोकांच्या भेटी गाठी व चर्चेतुन तयार झालेला हा दस्त ऐवज आहे. पुस्तक वाचताना अनिल अवचटांच्या धार्मिक पुस्तकाची हमखास आठवण येते.

बाहेरची बाधा म्हणजे काय? भुते कशी झपाटतात! ती कशी उतरवली जातात! मंत्र तंत्र यात तथ्य आहे का हे सर्व झूट? महाराज, माता, स्वामी यांच्य शिकवणीतुन आपणास मनाची शांतता खरच लाभु शकते का? हजारो वर्ष चालत आलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेचा निश्चित अर्थ काय? मांत्रिक,स्वामी,महाराज, माता यांच्याकडे हजारो भारतीय का धाव घेतात? या व अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने घेतलेला एक धांडोळा म्हणजे हे पुस्तक.

पहिल्या भागात पत्तेशाह दर्ग्यातील पीरबाबा व त्यांची उपचार पद्धती. यात भुताखेताशी सामना करण्याची बाबाची पद्धत. बाबांचे रुग्ण याबाबत किश्श्यांसह माहिती व त्याचे मनोवेश्लेषण दिले आहे. जिन, सैतान, बला, फरिश्ता या भोवती बाबांचे तत्त्वज्ञान फिरते. बाबांच्या रुग्ण संवादात स्वप्नांना फार महत्व आहे.

भुतप्रेतांचे स्वामी ( बालाजीचे मंदिर) या प्रकरणात मंदिरात भरणारा पिडितांचा दरबाराचे वर्णन आहे.राजस्थान मधील भरतपुर जवळ हनुमानाचे बालाजी हे रुप आहे. इथे भुतांचा बंदोबस्त एखाद्या कोर्ट कचेरी सारखा असतो, प्रथम अर्ज करायचा म्हणजे डाळ तांदुळ लाडु याचा नैवेद्य पुजार्‍यामार्फत देवाला दाखवायचा पुजारी एक लाडु म्रुतीला स्पर्श करुन रुग्णाला खायला देतो. त्या लाडवातुन बालाजीची शक्ती रुग्णात प्रवेश करते व भुताला दरबारात प्रकट व्हायला भाग पाडते. याला पेशी म्हणतात. ही पेशी यशस्वी झाली नाही तर जरा वरच्या लेव्हलचा अर्ज. अर्थात याचा खर्च जास्त. यात अजुन काही देवतांना आवाहन केले जाते. मंत्र म्हणले जातात. मंतरलेले पाणी त्याला प्यायला दिले जाते. रुग्णाच्या अंगात आले कि पेशी यशस्वी झाली. मग पुढे देवदेवतांचा व भुतांचा सामना चालू होतो. यात शिव्या आक्रोश व फटके यांचा सामावेश असतो. एरवी शालीन वाटणार्‍या स्त्रिया घाणेरड्या शिव्या देवदेवतांना व नातेवाईकांना देतात. शेवटी अंगातले भुत वठणीवर येते व कबुली जबाब या शेवटच्या नाट्यांक चालू होतो. मग ते भुत स्वत:ची ओळख सांगत माफी मागत रुग्णाला म्हणजे झाडाला सोडत. रुग्ण मग वारंवार देवाच्या पाय पडतो. अगदी आपल्याकडच्या दत्तसंप्रदायाच्या गाणगापुरची आठवण येते.

लेखकाने बालाजी मंदिरात अठ्ठावीस जणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. त्यातील पंधरा हिस्टेरिक केसेस होत्या. पुर्वभारतातील आदिवासी भगत व तिबेटी परंपरा यावर देखील लेखकाने लिहिले आहे.

दुसर्‍या भागात राधास्वामी सत्संग निर्मला माता व तांत्रिक पंथा बाबत लिहिल आहे. गुरु-शिष्य या परंपरेतील द्वैत नात्याचे पैलू यात उलगडले आहेत.सत्संगा सारखी सामूहिक प्रार्थना, प्रवचने, तत्वज्ञानाचा प्रसार, पारायणे गुरुभक्ती या सर्वातुन काय साध्य करायचे? गुरुची प्रार्थना करुन त्याच्याशी एकरुप होउन शिष्य संसाराच्या चिंतेतुन मुक्त होउ पहात असतात. माताजींच्या कुंडलीनि जागृती बाबत लेखकाने स्वत: घेतलेला अनुभव फार मजेशीर आहे.'ओम सक्षत मोक्षदायिनी सक्षत निर्मलादेवी' या मंत्राचा उतारा अंगातील फ्रॊईड उतरवण्यासाठी उपयोगी होता. निर्मला मातेच्या मते फ्रॊईडियन लोकांची डावी बाजु कमकुवत असते.

तंत्रशास्त्रात अघोरी वा अनाचारी वाटणा‍र्‍या लैंगिक वर्तनाच्या/ मानसतिकतेचा विचार इथे केला आहे. स्वत:च्या शरीरातले पौरुषत्व व स्त्रीत्व अशा दोन्हींना जागृत करुन त्याचा आनंद लुटणे, लिंग भेदापलिकडे पोहोचणे असे काहीसे ध्येय यात असते. तांत्रिक ग्रंथात इश्वर आणि लिंग, संभोग आणि मुक्ती असे शब्द ऐकमेका ऐवजी सहज वापरले जातात. आपल्या तांत्रिक अनुभवामध्ये त्वचेवरील प्रत्येक घर्मछिद्र हे योनि प्रमाणे वाटते व संपुर्णे शरिर भर संभोगाचा आभास होतो असे रामकृष्णांनी लिहिले आहे असा उल्लेख यात आढळतो.

तिसर्‍या भागात आयुर्वेद व वैद्यांच्या उपचार पद्धतीबाबत उहापोह आहे. लेखक म्हणतो," पाश्चात्य सोडून इतर सर्व उपचार पद्धती ह्या जुनाट छा छु करणार्‍या युगातील आहेत असे मला वाटे. एखाद्या विषयाच्या शास्त्र शुद्ध अभ्यासासाठी त्या विषया बद्दल एकीकडे आदर आणि दुसरी कडे शंकेखोर चिकित्सा असा दुहेरी दृष्टीकोण आवश्यक असतो. हे मला आतापर्यंत जमले नसावे." धर्म संस्कृती, आयुर्वेद, , पाश्चात्य वैद्यक,मानसशास्त्र, आधुनिक उपचार पद्धती, त्यांच्या मर्यादा अशी निरिक्षणे मांडत झारसेटली या हरियाणातील वैद्य गुरुजींचे रुग्णांच्या केसेस दिल्या आहेत.

पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लेखकाला केवळ सैध्तांतिक चर्चा करायची नसुन अनुभवात्मक पातळीवर त्याचे विश्लेषण करायचे आहे. हे सर्व करताना भारतीय परंपरा औषध उतारे आणि आशिर्वाद या बद्दल मनात एक मउ कोपरा आहे. तो जपायचा आहे. समंजस सायकियाट्रिस्ट व समंजस भगत मांत्रिक यांच्यातील अलिखित कराराची निरिक्षण लेखकाला यात दिसते. वाचकांना हे पुस्तक काही ठिकाणी जड व दुर्बोध वाटले तरी ती लेखकाची अपरिहार्यता आहे. ड्र्ग व मॆजिक रेमिडि ऎक्ट चा विचार करताना पुस्तक एका अनोख्या पैलूचे दर्शन घडवते. एका मनोविश्लेषण तज्ञाचे मनोगत म्हणुन पुस्तकाची दखल नक्कीच घ्यावीशी वाटते.

पुस्तकाचे नांव- औषध उतारे आणि आशीर्वाद

लेखक- डॊ सुधीर कक्कर

अनुवाद- डॊ श्रीकांत जोशी

प्रकाशक - मॆजेस्टिक प्रकाशन

प्रथमावृत्ती मार्च १९९३

पृष्ठे-२०३

मुल्य- १००/-

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०३)

मागील दुवा http://www.misalpav.com/node/7835
रात्री जेवणात सामीश असल्यास तळलेली अंडी , खीमा , तंदूरी चिकन , हे पदार्थ असावेत. सोबत तोंडी लावायला बोटीकबाब खीमा कबाब असे कबाब असावेत.
भात वर्गीय पदार्थात बिर्याणी/ पुलाव असे रुचकर पदार्थ असावेत. सोबत मिर्चीचे सालन असावे.
निरामीश असल्यास
लग्नात हमखास करतात ती बटाट्याची लगदा भाजी. पावट्याची उसळ.
भरल्या वांग्याची भाजी , बिरड्यावालाची रस्शाची उसळ. पुरी सारखे हलके पदार्थ
गोडाच्या पदार्थामध्ये आमरस सोबत तळलेले पापड कुरडया व तत्सम हलके पदार्थ.
भात वर्गीय पदार्थात काश्मिरी पुलाव.
जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून ३.१४२ कप बटरस्कॉच आइसक्रीम खावे
..............................................................................
ही झाली आपल्या "एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा" या निश्चयाची पूर्व तयारी.
पुढच्या भागात प्रत्यक्ष कोर्स बद्दल .......
(क्रमशः)

आता तुमचे वजन करा.
झोपताना झोपायच्या अगोदर साधारणतः ३ ते ४ चमचे कायमचूर्ण अर्ध्या ग्लासात टाकून प्या.
सकाळचे सर्व कार्यक्रम उरकल्यानन्तर तुमचे वजन करा. वजन हमखास रात्री केलेल्या वजना पेक्षा दोन ते अडीच किलोनी कमी झालेले असेल.
दिवसभरानन्तर पुन्हा वजन करुन पहा ते आणखी अर्ध्या किलोने कमी झालेले असेल
डिस्क्लेमर
***** टीपः वरील लेखात सांगितलेले उपाय ज्याने त्याने आपपल्या जबाबदारी वर करावयाचा आहे. लेखकाची कोणतिही जबाबदारी रहाणार नाही .
***** वरील लेख गम्मत म्हणून लिहिला आहे.तो वैद्यकीय सल्ला समजू नये

स्त्रियांचे वर्चस्व

आमच्या नदीकाठाला लागून एक झोपडपट्टी आहे. आडवी तिडवी वाढलेली, कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी. याच वस्तीत एक 'अफलातून' जमात राहते. ह्या जमातीत पूर्णपणे स्त्रियांचं राज्य आहे, त्यांचीच हुकूमत चालते, त्या म्हणतील ती पूर्वदिशा मानली जाते. पुरुषाला दुय्यम लेखलं जातं. त्याच्यावर अधिकार गाजवला जातो!
घरातली म्हणजे झोपडीतली छोटी मोठी कामे तोच करतो. पोरं सांभाळणे, धान्य निवडणे, दळून आणणे, धुणी धुणे, भांडी घासणे, पोरांचं आवरणे (त्यात शी शू आलेच.) इ. इ. (स्वयंपाक तेवढाच काय तो स्त्रिया करतात.)
बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच. त्या जर मध्यमवयीन किंवा वयस्कर असतील तर त्यांच्या कमरेला पैशांची हातभर लांबीची चंची असते. जर तरुण स्त्रिया असतील तर त्यांच्या कंचुकीत नोटांची तिजोरी असते. बिडीकाडीचं व्यसन सहसा पुरुषांना नसतं. चुकून असेल तर लाचारासारखे बायलीकडे व्यसनपूर्तिसाठी पैसे मागावे लागतात. त्याची बायको त्याला दुसऱ्‍या दिवसापर्यंत तंगवते. ज्यावेळी तो तिला हवं तसं वागेल, तिला पाहिजे ते पूर्ण करील तेव्हाच तो बक्षिसीचा हकदार बनू शकतो. त्या अक्षरशः नवऱ्‍याला राबवून घेतात. मटण मच्छीचा स्वयंपाक करायला लावतात. ते सामिषान्न पोटभर खाऊन आत्मा थंड झाला की त्या त्यांच्या तिजोरीतून नोटांची बंडले बाहेर काढतात. त्यातील दहा वीसची नोट नवऱ्‍याच्या अंगावर भिरकावतात.
इतकेच काय त्यांच्या हुकूमाची तामिली वेळेत झाली नाही तर प्रसंगी त्याला एखाद्या जाडसर सोट्याने यथेच्छ बदडून काढतात!
तुम्ही म्हणाल हे काय भलतंच सांगताय? परंतु हे सत्य आहे. कित्येक नवरोबांच्या डोक्यातील फाटलेल्या जखमा मी स्वतः रात्री उठून शिवलेल्या आहेत. असे पेशंट 'रात्रीच' का येतात या बद्दल माझी जिज्ञासा चाळवली. अनेक पेशंट्सकडून, जाणकारांकडून मोठ्या 'खुबीने' कारणांचा शोध घेतला असता वेगळेच विश्व समोर उभे ठाकले...
या जमातीच्या बायका विलक्षण बेफिकीर वृत्तीच्या, हुकूमशाही गाजवणाऱ्‍या, तितक्याच धष्टपुष्ट अशा. गुंड मवाली ज्याप्रमाणे वागतात अगदी तश्शाच या स्त्रियांच्या चालीरिती. ह्यांचा धंदाच दोन नंबरचा. म्हणजे गावठी दारू, गांजा, ताडी विकणे वगैरे. त्यामुळे गुंडाड लोकांचा झोपडीत सदासर्वकाळ वावर, नशेबाजांचा अविरत राबता. कधी कधी पोलिसांची अचानक रेड पडते तेव्हा माल लपविण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागते. खूपच अंगावर बेतू लागलं की बायका पोरासोरांना घेऊन पळून जातात, पोलिसांच्या हाती लागतो तिचा बिचारा नवरा. महिना पंधरा दिवसांनी तो सुटतोही. परंतु बाईला त्याचं काही सोयरसूतक नसतं. एकूण काय तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी नवऱ्‍याला केवळ शय्यासोबतीसाठी जवळ ठेवलेलं असतं. हे फार भयानक वाटणार वास्तव आहे. नवऱ्‍याच्या बायकोवरील अत्याचाराच्या अनेक बातम्या राकानेच्या रकाने भरून येत असतात. परंतु येथील पुरुष कोणाकडे दाद मागणार?
आपल्या भोवतीचे मवाली जसे शर्टची बटणे खुल्ली ठेऊन मग्रुरीत चालतात, त्याप्रमाणे ह्या बायकांचे पदर कधीच छाती झाकण्याकामी उपयोगी येत नाहीत. पदराची गुंडाळी करून ती टंच उरोजांच्या घळईतून खांद्यावर टाकण्यातच त्या धन्यता मानतात. अशी छाती पुढे काढून चालणे त्यांना कसे पटते कोणास ठाऊक?
काही बायका इतक्या व्यसनी की पहिल्या धारेचा माल चाखल्याशिवाय त्यांना गल्ल्यावर बसता येत नाही. काही बायका ताडीही पितात, काही अफू चरस गांजा यांच्या आहारी गेलेल्या आहेत. गांजाची सिगार ओढणे ही तर सर्रास आढळणारे व्यसन. सिगारीतली निम्मी अधिक तंबाखू काढून घेऊन त्यात गांजा भरून ओढला जातो. त्या धूराच्या दाट दमट दर्पानेच तो गांजा असल्याचे लक्षात येते. अशी नशा बायकांच्या डोक्याबाहेर गेली की त्यांचं टाळकं सरकतं अन् नवऱ्‍याचं रक्ताळतं. जणू काय ते त्यांचे गुलाम आहेत, अशी वागणूक नवरोबांना मिळत असते.
काही बाया जितक्या नखरेल तितक्याच चवचालही असतात. दारावर अनेक प्रकारची गिऱ्‍हाईकं 'रुंजी' घालत राहतात. त्यातील एखाद्याशी तिची यारी होते. दिवसाढवळ्या त्यांचे जमत जाते आणि त्यावेळी त्यांचे चाललेले ते खेळ उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं दुर्भाग्य नवरा नामक प्राण्याच्या भाळी लिहिलेलं असतं...
( 'मिश्किली' मधून)

छोटे छोटे प्रश्न...!

एका वृत्तपत्रातले कात्रण ई-मेल मधुन आले. त्यातील प्रश्न मलापण नेहमी पडतात.
उत्तरे मात्र मिळत नाहीत....
खालील काही मजेशीर प्रश्न तुमच्यासाठी:
१) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.)
२) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित?
३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात?
४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? :?
५) आपण हॉटेलात बसल्याबरोबर तिथला पोरगा नेमका आपल्या बाकाखालची फरशी साफ करायला कसा काय येतो?
६) 'तुम्ही हा प्रश्न चांगला विचारलात' 8> असं मुलाखत देणारा प्रत्येक माणूस प्रश्नकर्त्याला का म्हणतो?
७) सिनेमा पहायला गेल्यावर, जर तिथे एखादा मित्र भेटला तर 'अरे सिनेमा पहायला आलास वाटतं?' असं का विचारतो?
८) हॉटेलात इडलीसांबराती शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची?
९) 'गॅसवर दूध ठेवलयं, जरा लक्ष द्या' म्हणून बायकोनं सांगितल्यावर आपली नजर चूकवून दूध उतू कसं जातं?
१०) दो शेजारणी 'खुप काम पडलीत बाई' असं म्हणत दारात उभं राहून अर्धा अर्धा तास का बोलतं असतात?
११) 'अज्ञानात सुख असतं' असं म्हणत असताना माणूस ज्ञान मिळवण्यासाठी कां धडपडतो?

या व्यतरिक्त तुम्हाला माहीती असलेले प्रश्न येउद्यात...............

मराठा लाईट इनफंट्री - भाग - २

दुसर्‍या महायुध्दातील मराठ्यांचा पराक्रम/शौर्य. भाग- २

या अगोदर या रेजिमेंटची अजून थोडिशी माहिती घेऊयात. अर्थात ही आपल्याला माहीती आहेच कारण महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मुलगा वा मुलगी लहानपणी खेळताना ही घोषणा देतेच.

या रेजिमेंटची युध्दघोषणा आहे -
“छत्रपती शिवाजी महाराज / की जय !
हर हर / महादेव”.
प्रमूख पहिला जयजयकार करतो आणि बाकीचे त्याला जय ! आणि महादेव म्हणून साथ देतात.
असो.

जर्मनी आणि इंग्लंडपासून भारत बराच दूर असला तरी जशी जशी युध्दाची धग वाढू लागली तसे तसे हे अंतर कमी होऊ लागले. सर्वच जगाला या युध्दाने ग्रासले आणि जवळ जवळ सगळ्याच देशांना कुठली ना कुठली तरी बाजू घेणे भाग पडू लागले. भारत तर इंग्लंडचाच भाग असल्यामुळे भारतीय सैन्याला या युध्दात भाग घ्यायलाच लागला. त्यामुळे या नवीन प्रकारच्या युध्दाची भारतीयांना माहीती झाली आणि अर्थातच त्याचा फायदा आपण अजूनही बघतोच आहोत.

भारतीय फौजांना पहिली कामगिरी मिळाली ती इजिप्तचे इटलीच्या सैन्यापासून संरक्षण करणे आणि सुदानच्या पट्यात संरक्षक फळी मजबूत करणे. मुसोलीनीच्या पूर्व आफ्रिकेच्या साम्राज्याला जो सुरूंग लागला त्यात मराठा लाईट इनफन्ट्रीचा मोठा सहभाग होता.

२ बटॅलियन जी एडनमधेच होती तिच्या सोबतीला भारतातून ३री बटॅलियन पाठवण्यात आली. या दोन्ही बटॅलियन्सचे लक्ष होते इटलीची एरिट्रियाची वसाहत. या युध्दात आपली शौर्याच्या परंपरेला जागून या सैन्याने केरेनचा डोंगरी किल्ला काबीज करताना अतुलनीय शौर्य गाजवून आपले नाव इतिहासात नोंदवले. या रक्तरंजीत युध्दाची हकिकत आपण आता बघू.
साल होते १९४० –
हा किल्ला एका डोंगरावर होता आणी त्या डोंगराच्या उतारावर दोन चांगली मोठी टेकाडे होती. एकाचे नाव होते पिनॅकल आणि दुसर्‍याचे पिंपल. हा सगळा डोंगर मोठमोठ्या दगडांनी भरलेला होता आणि त्याच्या आडोश्याने शत्रूला येणार्‍या दोस्तराष्ट्रांच्या सैन्यावर अचूक हल्ला करता येत होता. इटालियन सैन्याकडे भरपूर तोफा आणि त्याचा दारूगोळ्याचा साठा होताच. केरेन काबीज करण्यासाठी ४ थ्या इंडियन डिव्हिजनची नेमणूक करण्यात आली होती. पण आपण ही जी दोन टेकाडे काबीज करण्यासाठी झालेल्या युध्दात, मराठा लाईट इनफंट्रीने भाग घेतला त्याचकडे प्रामुख्याने बघणार आहोत, कारण नाहीतर हा लेख फार मोठा होईल.

300px-Keren_Battlefield_023

१५ मार्च रोजी हायलॅंड लाईट इनफंट्रीने ले. कर्नल पर्सीवल यांच्या आधिपत्याखाली डोलोगोरोडॉक किल्यावरच्या पहिल्या टेकाडावर हल्ला करण्यासाठी कूच केले. त्यांच्या वर लगेचच मशीनगनचा तिखट मारा करण्यात आला. गोळ्यांच्या वर्षावात हे सैनिक त्या टेकाडाच्या पायथ्याला पोहोचले. हा आख्खा दिवस वरून होणार्‍या गोळीबारामुळे या सैनिकांना वर तोंड काढता आले नाही. वरून तळपता सुर्य आणि गोळ्यांचा व तोफगोळ्यांचा वर्षाव यामुळे या सैनिकांची दिवसभर फारच दमछाक झाली. श्वास घेणे सुध्दा अवघड झाले होते. प्यायचे पाणी संपल्यामुळे त्यांच्या हालात अजूनच भर पडली. इटालियन सैनिकांना वरून यांची बारिकशी हालचाल सुध्दा टिपता येत होती. जराशी हालचाल झाली की वरून गोळीबार होत होता. हे बघता दिवसा ढवळ्या पिनॅकल वर हल्ला करणे अशक्य आहे असे ठरवण्यात आले. खरे तर पुढे गेलेल्या सैन्यालाच मागे कसे आणावे हाच मोठा प्रश्न होऊन बसला होता. शेवटी अंधार पडल्यावर HLI ने यशस्वी माघार घेतली.

तो पर्यंत जनरल हिथ आणि मेसर्व्ही यांनी एक दुसरीच योजना आखली. अंधाराचा फायदा घेऊन मधली छोटीशी दरी पार करून पिनॅकलवर हल्ला करायची ती योजना होती आणि या करता आक्रमक ३/५मराठा लाईट इनफंट्रीची निवड करण्यात आली. कमांडर होते कर्नल रीड. कव्हरींग फायर देण्यासाठी तोफखाना होताच पण तो काही काळच चालू ठेवता येतो – आपली स्वत:ची हानी टाळण्यासाठी. हल्ला चालू झाला पण त्या अगोदर एक इंग्लीश आधिकारी जो पहिल्यांदीच मराठ्यांबरोबर लढाईत भाग घेत होता तो काय म्हणाला ते बघूया, त्याच्या शब्दात –
“हे मराठे हिरव्या रंगाची बेरेट घालतात. जेंव्हा ते हेल्मेट घालत नाहीत तेव्हा त्या टोपीवर एक हिरव्या आणि लाल रंगाचा तुरा फडकत असतो. पहिल्यांदा बघितल्यावर हे कसे लढणार असे वाटते खरे, पण यांनी कपडे काढल्यावर त्यांचे पिळदार शरीर आपल्या नजरेस पडते आणि ही शंका दूर होते. हे भारतातल्या दख्खन नावाच्या प्रांतातले सैनिक असून उत्तम कुस्ती करतात. हे अत्यंत शांत वृत्तीचे सैनिक कोणाच्याही वाटे जात नाहीत पण राग आल्यावर यांच्या डोळ्यात रक्त उतरते. डोळे लालबूंद होतात आणि मग आसपासचे सगळे चित्रच बदलू लागते. कितीही थंडी असो किंवा उष्णता असो, हे कुठल्याही हिंदीसेनेपेक्षा जास्त तडफेने युध्द करू शकतात.”

अंधार पडल्यावर मराठा लाईट्ने आपला हल्ला चालू केला. ज्या खडबडीत व दगडाधोंड्यांनी भरलेल्या, मोठमोठे दगड पडलेल्या डोंगराच्या उतारावर जेथे दिवसा ढवळ्यासुध्दा दोन्ही हाताचा आधार ने घेता चढणे मुष्कील होत, तेथे जिद्दीने हे सैनिक चढत होते, केवळ युध्दात शत्रुला पाणी पाजण्यासाठी. हे शब्द माझे नाहीत. वरील आधिकायाचे आहेत. सगळ्यात पुढे होते B कंपनीचे प्रमूख सुभेदार श्रीरंग लावंड. मागे कष्टाने C आणि D कंपन्या मार्ग आक्रमत होत्या. त्यांचे प्रमूख होते – बूमगार्ड्ट आणि सेमूर. इटालियन सैन्याने यांना कडवा प्रतिकार केला. लाल रंगाच्या बॉंबचा अखंड वर्षाव ते खालून येत असलेल्या मराठ्यांवर करत होते. त्या बॉंबच्या आणि मशीनगनच्या आवाजात मराठ्यांच्या युध्दघोषणांचा “शिवाजी महाराज की जय ! हर हर महादेव” आवाज वरच्या टिपेला पोहोचला होता आणि खाली जेथे त्यांचे कर्नल रीड बसले होते त्यांना त्या स्पष्ट ऐकू येत होत्या. मेजर मून, जे त्या वेळी कर्नल रीड बरोबर बसले होते त्यांनी अशी आठवण लिहून ठेवली आहे की कर्नल रीड्ची छाती त्यांच्या फौजेच्या या पराक्रमाने फुगली होती आणि ते मराठ्यांविषयी अखंड बोलत होते. रात्रीतल्या घनघोर युध्दानंतर मराठा लाईटने पिनॅकलच्या पायथ्यापाशी जो छोटीशी सपाट जागा होती ती काबीज केली व तिथे मोर्चे बांधणी केली. सकाळी जेव्हा या मोर्च्यावर मेसर्व्ही गेला तेंव्हा त्याने तोंडात बोटे घातली. त्याच्या सहाय्यकाने लिहून ठेवले आहे की “ज्या रस्त्यावरून मला कुठलेही सामान न घेता चढता येत नव्हते त्या रस्त्याने अंधारात एवढे अवजड सामान घेऊन तोफांच्या मार्‍यात हे रीडचे मराठे कसे चढले असतील ? याची कल्पना करूनच मेसर्व्हीच्या निळ्याशार डोळ्यात पाणी आले.”

पिनॅकल सर झाल्यावर इटालियन सैन्य काही गप्प बसले नव्हते. त्यांनी त्या टेकाडावर प्रतिहल्ले चढवण्यास सुरवात केली. त्यांच्या विरूध्द आता संरंक्षणाचे काम करावे लागले. सगळ्या सैनिकांना एकत्र जमवून कामे वाटून देत पर्यंत पहाटेचे चार वाजले व इटालीयन सैन्याचे हल्ले चालू झाले. त्यांना मागे रेटेतोपर्यंत सकाळ उजाडली आणि काही इटालीयन सैनिकांना मराठ्य़ांनी पकडले. कर्नल रीडला एका युध्दज्वर चढलेल्या मराठी जवानाला धक्का मारून जमिनीवर पाडावे लागले. त्याच्या हातून मशीनगनच सुटत नव्हती.

दुसर्‍या दिवशी हे युध्द संपले आणि मराठा लाईट्ची तेथून सुटका झाली. या युध्दात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता, तोफगोळ्यांच्या व मशीनगनच्या गोळ्यांच्या वर्षावात सुभेदार लावंड यांनी जे न डगमगता आपल्या कंपनीच्या पुढे राहून मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांना मिलीटरी क्रॉस बहाल करण्यात आला.

default

पुढच्याच एका दिवसात मुख्य किल्लापण सर करण्यात आला. हा किल्ला हातातून गेल्यामुळे व तो परत न जिंकता आल्यामुळे इटलीची आफ्रिकेमधली सत्ता मोडकळीस आली आणि लवकरच नष्ट झाली. या सगळ्यात मराठा लाईट इनफंट्रीचा फार मोठा सहभाग होता असे तज्ञांचे मत आहे.

जेव्हा युध्द चालू असते, तेव्हा अशा पराक्रमांना तोटा नसतो व कोणालाही त्या बद्दल विशेष वाटत नाही. पण केरेनेच्या युध्दाबद्दल ले. कर्नल करसे यांना ११व्या इंडियन इंनफंट्री ब्रिगेडच्या कमांडर कडून एक पत्र आले

“I wish in particular to thank your Battalion for the great dash it displayed in capturing and holding Flat Top Hill, in spite of very severe casualties. It has been a magnificent effort. Will you please tell your officers and men that I am now more proud than ever to have them in my Brigade.”..............

जयंत कुलकर्णी
भाग दोन समाप्त.
पुढे चालू......

Syndicate content
Scroll to Top