लेख

मराठी नाटक बंगालीत ..

मराठी नाटक देश पातळीवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी नाटकांचे अनुवाद, पुनर्प्रयोग इतर भाषांमधे ही होताना दिसतात.शिरिष आठवल्यांचे एक नाटक नुकतेच बंगाली रंगमंचावर सादर झाले. देश नामक एका आघाडीच्या बंगाली मासिकाने यावर नुकताच परिक्षणात्मक लेखही छापला.मि.पा. च्या वाचकांसाठी त्याचा गोषवारा
मुळ लेखक: सुब्रतो घोष .

मानुषेर समान मानुष
बंगाली नाट्यविश्वात असे कित्येक 'दल' आहेत जे भलेही डामडौलात नसले तरी मोठ्या कष्टाने बंगाली नाटक जोपासताहेत. गांधार असेच एक दल.गेल्या शेहचाळिस वर्षात त्यंनी तेवीस एक नाटके मंचस्थ केलीत.अर्थात ते केवळ नाटकांच्या संख्येलाच नव्हे तर दर्जालाही महत्व देतात हे जाणवते.यंदाचे नाटक आहे शिरिष आठवल्यांच्ये मराठी नाटक 'मित्र'; ज्याचा विजयालक्ष्मी बर्मन यांच्या सहयोगाने काछेर मानुष' ( जवळचा माणूस) या नावाने बंगाली अनुवाद केलाय कमल सान्याल यांनी.

वर्ण वा जातीच्या आधारावरची विभागणी माणसाला माणसापासुन तोडू शकत नाही हि गोष्ट हे नाटक पुन्हा सांगु पाहते. ज्या बाबी समाजाला मागे रेटु बघतात त्यात मुख्य असते ही जातीपातीची मानसिकता.याचा उत्तर व पश्चिम भारतातला चेहरा इतका भेसुर की सहज ओळखला जावा. पण या तथाकथित पुरोगामी राज्यात - प. बंगाल मधे - हा चेहरा इतका भिन्न की ओळखु येण्यास उशिर व्हावा.नाटकात शिरिष आठवल्यांचे मराठी वातावरण जरी कायम असले तरी नाटकच्या शेवटी वाटते की नाटककाराला जे सांगायचेय ते ह्या राज्याच्या राजकीय/सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीसही पुरेपुर लागु आहे.

दादासाहेब पुरोहित संस्कारांमुळे कट्टर दलितविरोधी परंतु घटनाचक्रामुळे या विधुर गृहस्थाच्या
शारिरीक पंगु अवस्थेतून सोडवणुक करण्यासाठी येते सावित्रीबाई रुपवते नावाची दलित वर्गातील बाई.ददासाहेबांची मुलेबाळे आपापल्या नोकरीधंद्याच्या जागी असतात आणि तेथुनच पित्याची विचारपुस करत असतात. प्रारम्भी जात्याभिमानी दादासाहेब सावित्रीबाईंस काही एक दाद देत नाहीत. दुसरीकडे कामावर निष्ठा असलेली ही स्वाभिमानी बाई - जी स्वत:ला मिसेस रुपवते म्हणूनच ओळखु इच्छिते - कर्तव्यात काडीमात्र कसुर न करता रोग्यास बरे करण्याच्या मागे लागते. दादासाहेब जसजसे ठीक होऊ लागतात मि. रुपवतेंवरचे त्यांचे अवलम्बन वाढत जाते.मुलगी मैत्रेयी जेव्हा दादासाहेबांच्या इच्छेविरुद्ध स्वत:जवळ परदेशी नेऊ बघते तेव्हा दादासाहेब तिला स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मि. रुपवतेंच्या सुश्रुषेच्या बळावर खडखडीत बरे होऊन सिद्ध करतात की मुलीपाशी जायचे आता कोणतेही कारण नाही. दादासाहेबांना केवळ शारिरिक जोखडातुनच नव्हे तर जातीच्या खोट्या अभिमानातुनही मुक्ती मिळते
ही कहाणी सरळ सोप्या पद्धतीने सांगितली आहे. नाटककार कोणताही आडपडदा न ठेवता मुळ विषय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. सारे नाटक घडते ते दादासाहेबांच्या दिवाणखान्यात व स्वयंपाकघरात. दादासाहेबांचे एकाकीपण यामुळे प्रेक्षकांपर्यन्त पोहचते.

लेखाच्या उर्वरित भागात नेपथ्य / अभिनय वगैरे अंगांवर टीकाटिप्पणी आहे. भाषांतर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अनुवाद कृत्रिम वाटल्यास जरुर सांगावे.

आमची पन्नासावी लग्नगांठ

आमची पन्नासावी लग्नगांठ

"एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं."

"गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो" असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी. एखाद्दया तरूण जोडप्याला प्रेम करताना पहाणं हे डोळ्यांना नक्कीच आनंददायी वाटतं, पण एखाद्दया वृद्ध जोडप्याला तसं पहाणं हे एक खरोखरचं भाग्य म्हटलं पाहिजे.
पन्नास वर्ष एकमेकाशी नातं ठेवून रहाणं हेच जणू सन्मानाचं कारण आहे.पन्नास वर्षाच्या लग्नगांठीची-म्हणजे ऍनिव्हर्सरीची-आठवण म्हणजेच प्रेमाची आठवण, एकमेकावरच्या विश्चासाची आठवण, एकमेकाच्या सहभागाची आठवण,सहनशक्तिची आठवण, चिकाटीची आठवण आहे.
आणि ह्या सर्व आठवणी जीवनाच्या प्रत्येक वर्षाला मागे पुढे होवू शकतात.
इतके वर्ष रहाणं म्हणजेच एकमेकाच्या स्वभावाचं परिवर्तन होत असताना, एकात दुसरं मिसळून जाणं आणि त्यामुळे एक-दुसऱ्याला आणखी चांगलं करणं असं म्हणता येईल.

एखादं अपक्व-म्हणजेच इममॅच्यूर-प्रेम म्हणतं,
"मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी जरूरी आहे म्हणून."
परंतु पक्व प्रेम म्हणतं,"
मला तुझी जरूरी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो."
एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.

१२ जून १९५८ साली माझी पत्नी माझ्या घरी आपलं रहातं घर सोडून आली.किती कठीण आहे हे असं करणं. किती विश्वास होता तिचा. आपल्या आईवडीलाना मागेवळून पहाताना क्षणभर दुःखाने डोळे भरून यावेत आणि मान फिरवून समोर दुसऱ्या क्षणी पहाताना त्याच डोळ्यात भविष्यातल्य़ा सुखाचं तेज भरून यावं.
काय हा विपर्यास!

"माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का"

ह्या गाण्याची आठवण एव्हड्या साठीच झाली की पन्नास वर्षापुर्वी आम्ही पण तरूण होतो ना!.
मी पंचविस वर्षाचा होतो आणि पत्नी एकविस वर्षाची होती.ती आणि मी त्यावेळी कशी दिसायचो हे फक्त ह्यावेळी आमची स्मरणशक्तिच सांगू शकते.त्यावेळी "माझा होशिल का" हे गाणं पण प्रसिद्ध होतं. त्याची आठवण आज प्रकर्षाने आली.

निसर्गातल्या अनेक गोष्टीमधे मला समुद्राने खूपच आकर्षित केलं.अशा ह्या समुद्र्रुपी संसारात मी आणि माझ्या पत्नीने पन्नास वर्षापुर्वी होडी टाकली आणि प्रवासाला निघालो.तो अथांग सागर समोर पाहून मोठ्या विश्वासाने मोठ्या जिद्दीने दोघानी हातात वल्हं घेतली आणि मागे न पहाता होडी वल्हवायला लागलो. प्रवासात बरोबर आईवडिलांच्या आणि थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची,आमच्या भविष्या बद्दलच्या विश्वासाची, वाटेत येऊ घातलेल्या वादळांच्या शक्यतेची, आनंदी क्षणांच्या आशेची,पडले तरी कष्ट झेलण्याची, आणि समोर दिसणाऱ्या भव्य क्षितीजाकडे झेप घेण्याची मोठी पुरचुंडी घेवून प्रवासाला निघालो. आमच्या बरोबर अनेकांच्या अशाच होड्या होत्या.हसत खेळत,चर्चा करत जो तो क्षितीजाचाच वेध घेवून वल्हवत होता.
कधी समुद्र शांत असायचा,कधी खवळायचा,कधी लाटा यायच्या,कधी वारा बेफाम व्हायचा,कधी छोटी छोटी वादळं यायची,कधी कधी वाऱ्याच्या दिशेने शिडाची दिशा बदलावी लागायची.पण तरी सुद्धा समुद्र खुषीत दिसायचा.त्याला धीर नसायचा.आमच्या होडीला तो ठरू देत नव्हता.तो होडीला धरू बघायचा.समुद्राचं पाणी हिरवं हिरवं पांचू सारखं दिसायचं.आणि सफेद फेसाची त्याच्यावर खळबळ असायची.मास्यांसारखीच आमच्या काळजांची तळमळ व्हायची.आमची होडी हा समुद्र खाली-वर ओढायचा.

"आला खुषीत समिंदर
त्याला नाही धीर
होडीला बघतो ग धरू
ग!सजणी होडीला देई ना ठरू"

ह्या गाण्याची प्रकर्षाने आठवण यायची.
प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.
ते वसंत ऋतुचे दिवस होते.
"जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे."
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.
" भातुकलेच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी "

बिचारी गेली सतरा वर्ष तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
"मी कुणाचं वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?"
असं ती मला म्हणते.
"पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने "आशा" नावाची एक माणसाला क्षमता दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया"
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.

हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला विचारतो,
"उद्दया कसं होणार?"
आणि ती पण कधी कधी मला सहाजिकच म्हणते
"उद्दया कसं होणार?"

तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां,
"आता कशाला उद्दयाची बात
बघ उडून चालली रात
आता कशाला कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात
आता कशाला उद्दयाची बात"
तेव्हां सर्वांच्या शुभेच्छावर आता आमचा उद्या आहे.

श्रीकृष्ण सामंत

डॉ.विद्याधर ओक

डॉ.विद्याधर ओक हे नांव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुपरिचित आहे. स्व.गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेच, शिवाय प्राचीन शास्त्रीय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा संशोधक, या क्षेत्रात नव्या दिशा चोखाळणारा आणि दाखवणारा द्रष्टा, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणारा उद्योजक अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख करून द्यावी लागेल. हंसतमुख प्रसन्न चेहेरा, हजरजबाबीपणा, नेमक्या शब्दात आपल्या मनातला आशय बोलून व्यक्त करण्याची कला, श्रोत्यांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची हातोटी वगैरे अनेक पैलू त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वात आहेत. त्यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या खास हार्मोनियमसंबंधी सादर केलेल्या लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनला हजर राहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी जे पहायला आणि ऐकायला मिळाले त्याचा गोषवारा देण्याचा हा प्रयत्न आहे.

अणुशक्तीनगरमधील 'संवाद' तर्फे हा कार्यक्रम तिथल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ही मुख्यतः वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची वसाहत असल्याकारणाने बहुतेक श्रोते मंडळींकडे वैज्ञानिक चिकित्सक पध्दतीने विचार करण्याची वृत्ती होती. त्याचप्रमाणे रविवार संध्याकाळच्या अमूल्य वेळेचा सदुपयोग हिंडणे फिरणे, बाजारहाट, खाणेपिणे, नाटक सिनेमा यासारख्या लोकप्रिय गोष्टीत न करता किंवा घरबसल्या टीव्हीवरील खास कार्यक्रम पहाण्यात तो न घालवता हे लोक या कार्यक्रमाला आले होते यावरून त्यांना संगीताची आवड, जुजबी माहिती किंवा निदान श्रोत्याचा कान तरी निश्चितच होता. ही बाब श्री. ओकांच्या लगेच लक्षात आली आणि त्यांनी आपल्या संभाषणाची सुरुवात तिथूनच केली.

आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये शालेय शिक्षणाच्या अखेरीस कला आणि विज्ञान यांची फारकत केली जाते. किंबहुना आर्टस आणि सायन्स एकमेकांच्या विरोधात असल्यासारखे दाखवले जाते. संगीताचा समावेश कलाविषयात होत असल्यामुळे त्याचा विज्ञानाशी कसलाही संबंध नाही असेच समजले जाते. गायन किंवा वादन शिकण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी विज्ञानाची गरज पडतही नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आजपर्यंतच्या कोणा महान कलाकाराला सुध्दा त्या विषयाच्या मागच्या विज्ञानाचा अभ्यास करावा असे वाटले नसेल. परंपरागत भारतीय संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांना विज्ञानाची पार्श्वभूमीच नव्हती असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की ध्वनिशास्त्रानुसार कोठलाही नाद किंवा ध्वनी याला विवक्षित कंपनसंख्या असते. या कंपनसंख्येच्या आधारानेच आपले श्रवणयंत्र तो नाद ओळखते आणि तो नाद स्मरणात साठवला जातो. एकामागोमाग कानावर पडणा-या नादांच्या कंपनसंख्यांमध्ये सुसूत्रता असेल तर त्यातून संगीत निर्माण होते आणि ती नसेल तर तो गोंगाट होतो. बोलण्यातून किंवा गाण्यातून जे ध्वनी निर्माण होतात त्याची कंपनसंख्या किती असते ते कांही आपल्याला आंकड्यात समजत नाही, पण चांगला गवई सुरात गातो आहे हे आपल्या कानाला जाणवते त्याचे कारण त्याच्या सुरांच्या कंपनसंखांमध्ये सुसंगती असते. कसून रियाज करून त्याने ते साध्य केलेले असते.

समोर बसलेल्या श्रोत्यांना विज्ञान आणि कला या दोन्ही विषयात गती आहे हे ओळखून त्यांना समजेल अशा पध्दतीने श्री. ओकांनी आपले विवेचन केले. त्यांनी स्वतः विज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना ध्वनिशास्त्राची चांगली माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी संगीतावर विचार केला. सा रे ग म प ध नी हे स्वर एकमेकांपासून कसे वेगळे आहेत आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे एकादा गवई ते स्वर गाऊन किंवा वादक वाजवून दाखवतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता त्यांच्या कंपनसंख्याचे अंक समजून घेऊन त्यांच्या समूहांकडे पाहिले तर त्यातील आंकड्यांना जोडणारी सूत्रे शोधता येतात. विद्याधररावांनी संशोधकाला लागणा-या चिकाटीने हे जिकीरीचे काम केले. पाश्चात्य जगात सुरुवातीपासूनच विज्ञान आणि गणिताचा थोडा संबंध होता असे दिसते. त्याचाही त्यांनी अभ्यास केला.

हार्मोनियम या वाद्याचे शिक्षण त्यांनी लहानपणापासूनच घेऊन त्यांनी त्यात प्राविण्य मिळवले होते. त्याचबरोबर हार्मोनियम हे 'टेंपर्ड स्केल' प्रमाणे ध्वनी निर्माण करणारे वाद्य असल्यामुळे विशुध्द शास्त्रीय संगीताला ते योग्य नाही अशी टीका ते सतत ऐकत होते. नेमके हे कसते वैगुण्य आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला. त्यात त्यांना यश आले एवढेच नव्हे तर ती उणीव भरून काढण्याचा मार्गसुध्दा त्यांनी शोधून काढला.

आपल्या भाषणात डॉ.ओक यांनी आधी थोडक्यात हार्मोनियमचा इतिहास सांगितला. इसवी सन १८४० साली रीडवर वाजणारे जगातले पहिले यंत्र फ्रान्समध्ये तयार केले गेले. म्हणजे हे वाद्य १६८ वर्षे जुने आहे. पण संगीत तर हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि तानपुरा, सतार, सारंगी यासारखी वाद्ये सुध्दा निदान कित्येक शतकांपासून प्रचारात आहेत. त्या मानाने हार्मोनियम फक्त १६८ वर्षांच्या बाल्यावस्थेत आहे असेही म्हणता येईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या जर्मनीतल्या कुशल कारागीरांनीसुध्दा हे वाद्य बनवण्याचे कसब आत्मसात केले आणि पेट्या तयार करून विकायला सुरुवात केली. अल्पावधीत त्या
युरोपभर पसरल्या. त्या काळात त्या पायपेट्या असायच्या. संगीतप्रेमी ब्रिटीश अधिका-यांनी त्या भारतात आणल्या आणि त्यांचे पाहून एतद्देशीय धनिक वर्ग, संस्थानिक वगैरेंनीसुध्दा त्या फ्रान्स किंवा जर्मनीतून आयात केल्या. हा सन १८६० ते १८८० चा कालखंड होता. बाजाची पेटी भारतातसुध्दा फार लोकप्रिय झाली.

याचे मुख्य कारण म्हणजे तंतुवाद्यांच्या मानाने हे वाद्य शिकायला आणि वाजवायला सोपे आणि त्याचा जबरदस्त आवाज. शास्त्रीय संगीतापासून ते तमाशा, नौटंकी यासारख्या सर्व प्रकारच्या लोकसंगीतात तिचा वापर धडाक्याने होऊ लागला. सन १८८२ साली संगीत सौभद्र या नाटकात हार्मोनियमचा वापर सर्वात पहिल्यांदा झाला असा उल्लेख सांपडतो.

१८४० सालापासून ते आजतागायत बाजारात मिळत असलेले सर्व हार्मोनियम आणि त्या प्रकारची इतर वाद्ये ही टेंपर्ड स्केलवरच आधारलेली आहेत. याचा आवाज कसा निघतो हे सोदाहरण दाखवण्यासाठी डॉक्टर ओकांनी एक परंपरागत पेटी घेऊन वाजवायला सुरुवात केली. समाधीसाधन संजीवन नाम, धुंदी कळ्यांना, मौसम है आशिकाना, शुक्रतारा मंदवारा, प्रथम तुला वंदितो, सुखकर्ता दुखहर्ता, तीन्ही सांजा सखे मिळाल्या, जेथे सागरा धरणी मिळते, तोच चंद्रमा नभात, एहेसान तेरा होगा मुझपर, इथेच आणि या बांधावर, निगाहे मिलाने को जी चाहता है, पान खाये सैंया हमार .... एकाहून एक गोड गाणे ते अप्रतिम वाजवत होते. त्यातले
स्वरच काय पण व्यंजने आणि शब्द सुध्दा ऐकू येत असल्याचा भास होत होता आणि टाळ्यांच्या कडकडाटाने श्रोते त्यांना दाद देत होते. वीस पंचवीस मिनिटे यमन राग अशा प्रकारे खुलवल्यावर त्यांनी विचारले, " कसे वाटले?" आता हा काय प्रश्न झाला? मग त्यांनी लगेच विचारले, " चांगलं वाटलं ना, मग यांत प्रॉब्लेम कुठे आहे?" टेम्पर्ड स्केलच्या पेटीवरील वादन ऐकून श्रोत्यांना त्यातून इतका आनंद मिळत असेल तर तिला नांवे ठेवण्याची आणि तिच्यात सुधारणा करण्याचा विचार करण्याची गरजच काय हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा होता.

क्षणभर थांबून त्यांनीच या प्रश्नाचे उत्तर देण्याला सुरुवात केली. पुन्हा एकदा सरगम आणि त्यातील स्वरांची कंपनसंख्या याकडे वळून त्यांनी सांगितले की वरच्या पट्टीमधील षड्जाची कंपनसंख्या खालील पट्टीमधील षड्जाच्या कंपनसंख्येच्या बरोबर दुपटीने असते. म्हणजे मुख्य सा जर १०० हर्टझ ( दर सेकंदाला १०० कंपने) असेल तर वरचा सा २०० इतका असतो आणि पंचम १५० असतो. सा आणि प मध्ये प्रत्येकी दोन दोन रे, ग आणि म असतात तसेच प आणि वरचा सा यांच्यामध्ये दोन दोन ध आणि नी असतात. त्यांतील रे, ग, ध आणि नी कोमल आणि शुध्द असतात तर दोन मध्यमांना शुध्द आणि तीव्र म्हणतात. अशा प्रकारे पहिल्या सा पासून वरच्या सा पर्यंत बारा नोट्स असतात. त्यातील प्रत्येक नोटची कंपनसंख्या तिच्या आधीच्या स्वराच्या १.०५९४६३१ इतक्या पटीने मोठी
असते. १०० या आंकड्याला या पटीने बारा वेळा गुणल्यास २०० हा आंकडा येईल. यालाच टेम्पर्ड स्केल असे नांव दिले आहे. हार्मोनियमच्या डाव्या बाजूच्या पहिल्या पट्टीपासून प्रत्येक स्वर वाजवत गेल्यास तो इतक्या पटीने चढत जातो. त्यातला समजा काळी चार हा षड्ज धरला तर कोमल ऋषभ, शुध्द ऋषभ, कोमल गंधार, शुध्द गंधार वगैरे स्वर त्यानंतर क्रमाने येतात. आपल्याला पहिल्यापासून अशाच प्रकारचे स्वर ऐकण्याची संवय झाली असते त्यामुळे कानाला ते चांगले वाटतातही.

पण तरबेज गवयांना मात्र ते स्वर खटकतात, कारण आपल्या शास्त्रीय संगीतात जे गंधार, मध्यम, धैवत वगैरे स्वर येतात ते किंचित भिन्न असतात. खालच्या सा पासून वरच्या सा पर्यंत मधल्या स्वरांच्या कंपनसंख्यांचे प्रमाण १६/१५, १०/९, ९/८, ६/५, ४/३, ३/२ वगैरे साध्या अपूर्णांकाने वाढत वाढत ते २/१ पर्यंत जाऊन तसेच पुढे जाते. या अनुसार वाजणारे मधले स्वर हार्मोनियममधून निधणा-या स्वरांहून १-२ टक्क्याने हटके असतात. त्यामुळे तज्ञांना ते बेसुरे वाटतात. आपले कान एवढे तीक्ष्ण नसल्यामुळे त्यांना ते जाणवत नाही एवढेच. त्यातसुध्दा आपल्याला नेहमी ते स्वर एक गेल्यानंतर दुसरा असे ऐकू येतात त्यामुळे त्यांच्या प्रमाणबध्दतेतला हा सूक्ष्म फरक आपल्याला समजत नाही. पण एकाच वेळी पेटीचे तीन चार स्वर एकदम वाजवले तर मात्र थोडा गोंगाट वाटतो हे डॉक्टर ओक
यांनी प्रत्यक्ष वाजवून दाखवले. त्यांनी जी खास श्रुतींची पेटी बनवली आहे त्यातले स्वर भारतीय शास्त्रीय संगीतातील पध्दतीप्रमाणे ट्यून केले होते. त्यातले वेगवेगळे स्वर एकदम वाजवल्यावरसुध्दा ते सुसंवादी वाटत होते. या दोन्हीतला फरक ज्या लोकांच्या कानांना जाणवत नाही त्यांनी संगीत हा आपला प्रांत नाही हे वेळीच ओळखून क्रिकेट किंवा टेनिस असा दुसरा छंद धरून त्यात आपले मन रमवावे असे ते गंमतीने म्हणाले.

हा फरक एवढ्यावर थांबत नाही. मुळात सात मुख्य स्वर आणि पांच उपस्वर ही सप्तकांची संकल्पनाच हार्मोनियमचे सोबतीने पश्चिमेकडून आपल्याकडे आली आहे. भारतीय संगीत श्रुतींवर आधारलेले आहे. त्याचे वैज्ञानिक पध्दतीने विश्लेषण केले गेले नसल्यामुळे श्रुती म्हणजे नेमके काय याची सर्वमान्य अशी व्याख्या उपलब्ध नव्हती. डॉक्टरसाहेबांनी यासंबंधी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीतातील स्वर कशा प्रकाराने लावले जातात हे पाहिले, अनेक प्रसिध्द संगीतकारांचे गायन व वादनाच्या ध्वनिफिती मिळवून त्यांचा अभ्यास केला. मल्टिचॅनेल एनेलायजरसारख्या आधुनिक उपकरणांचा उपयोग करून स्वरांच्या कंपनसंख्या मोजून त्याचा अभ्यास केला.

या सर्व संशोधनानंतर प्रत्येक सप्तकामध्ये बावीस श्रुती असतात असा निष्कर्ष त्यांनी काढला. षड्ज आणि पंचम हे दोन पक्के स्वर आहेत आणि ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत व निषाद हे प्रत्येकी चार निश्चित अशा स्थानांवर श्रवण करता येतात अशा प्रकाराने एकूण बावीस हा
आंकडा येतो. कोठल्याही एका रागात यातले सातच स्वर असतात. कांही रागात तर पांच किंवा सहाच असतात. पण ते अतिकोमल, कोमल, शुध्द किंवा तीव्र असू शकतात. या प्रत्येक प्रकाराला श्रुति म्ङणतात. त्या त्या रागातील इतर वादी, संवादी स्वर ज्या प्रकारचे असतात त्यांना प्रमाणबध्द अशा श्रुती आल्या तर ते संगीत अधिक श्रवणीय वाटते. अशा प्रकारे प्रत्येक स्वरातील योग्य ती श्रुति घेऊन त्या सात सुरांमधून रागाची गुंफण केली जाते.

संशोधनाअंती डॉक्टर ओक यांनी या श्रुतींच्या प्रमाणांचा तक्ता तयार केला आणि त्यानुसार वाजणा-या रीड्स बनवल्या. एवढेच नव्हे तर त्यांतून निघणा-या नादाचा अचूकपणा मोजणारे इलेक्ट्रॉनिक यंत्रसुध्दा बनवले आहे. वाजवणा-याला सोयीचे व्हावे या दृष्टीने सध्याच्या हार्मोनियम एवढ्याच आकाराची ही पेटी आहे. त्यात नेहमीच्या आकाराच्या तेवढ्याच पट्ट्या आहेत आणि प्रत्येक पट्टीच्या खाली दिलेली खुंटी बाहेर ओढून श्रुति बदलण्याची सोय आहे. जो राग वाजवायचा असेल त्यातल्या श्रुति आधी सेट केल्या की नेहमीप्रमाणेच तो हार्मोनियम वाजवायचा. याशिवाय त्यांनी मेटलोफोन नांवाचे एक वाद्य बनवले आहे. त्यात विशिष्ट धातूच्या पट्ट्बा बसवायच्या आणि वाजवायला सुरुवात करायची. याचे उदाहरण दाखवण्यासाठी त्यांनी प्रेक्षकांमधून एका माणसाला स्टेजवर बोलावून घेतले. या गृहस्थाने आयुष्यात कधीही कोणतेही वाद्य़ वाजवलेले नव्हते. मारवा रागाचे सूर फिट केलेला मेटलोफोन त्याच्यापुढे ठेऊन हातातील बारक्या हातोड्याने त्यातल्या कोठल्यही पट्टीवर कोणत्याही क्रमाने प्रहार करायला सांगितले. सारे स्वर बरोबर जुळलेले असल्यामुळे कसेही वाजवले तरी कानाला ते गोडच लागत होते. असेच हंसतखेळत तुम्ही शास्त्रीय संगीताचा थोडा आनंद स्वतः घेऊ शकता आमि त्य़ातून प्रयोग करीत शिकूही शकता असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंका त्यांनी दूर केल्या. हे एवढे रंगत चालले होते की आणखी हार्मोनियम वादन ऐकायला मिळणार आहे की नाही असे लोकांना वाटू लागल्यामुळे ती चर्चा आटोपती घ्यावी लागली. अखेरीस डॉ.ओक यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या वाद्यावर त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालिका असलेले चलत पिया बिन छिन बिसुराये हे पद वाजवले आणि परदेमें रहने दो, प्रभु अजि गमला, बनाओ बतियां वगैरे गाण्यातून भैरवी वाजवून या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता केली.

पानी तेरा रंग कैसा?

"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा
पण त्यातलाच प्रकार असावा."

मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता.
ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
"माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते"
मी म्हणालो,
" आपण अवश्य ऐकू या"

"देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?
हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
"माझा देवावर विश्वास आहे" असं एखाद्याचं म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की "मला वाटतं देव नाही" अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.

देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.

"माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्या श्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही."
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, "गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही."
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.

देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मी बरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं."
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
" हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स."
मी त्याला म्हणालो,
"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिच तर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा
पण त्यातलाच प्रकार असावा."
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत

"लाला! मी पास की नापास? "

लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली,चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे.

वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि सतत पानाचा तोबरा लालाच्या तोंडात असल्याने,त्याचे कपडे वर पासून खाली पर्यंत लाल झालेले असायचे.तोंडातून ओघळणारी थुंकी अधून मधून कपड्याला फुसायच्या संवयीमुळेपण, त्याचे कपडे लाल दिसायला भर पडायची.
" जुम्मेके जुम्मे " न्हाण्याची संवय असल्याने पुढल्या शनिवारी तेव्हडे ते त्याचे कपडे पांढरे शुभ्र दिसायचे.

वेंगुर्ल्याच्या बंदराच्या दिशेने मार्केटच्या अगोदर उजव्या बाजूला डोंगराकडे चढत जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने अगदी वर गेल्यावर रस्ता संपतो,त्याच्या उजव्या बाजूच्या डोंगराच्या सपाटीवर तांबळेश्वराचं मंदीर आहे. त्याच्या उजव्या बाजूला उतरणीवर गांवाचं स्मशान
आहे.ह्या स्मशाना जवळ एका पडक्या झोपडीत लालाचा,
रात्रीचा झोपण्यासाठी मुक्काम असायचा. त्या स्मशानशांततेच्या एकांताच्या परिसरात लाला कसा राहायचा हे, गावातल्या लोकांचे भयभयीत आश्चर्य असायचं.त्यावेळच्या आमच्या लहान वयांत तर लालाला
दिवसा रस्त्यावर पाहून देवचार भुताटकीचा प्रतिनिधी असावा असंच वाटायचं.दिवसा प्रेतं जाळायला येणाऱ्या लोकाना लालाची झोपडी रिकामीच दिसायची,आत डोकावून पाहिल्यावर ईतःस्था पडलेली ऍल्युमिनीयमची
कळकटलेली भांडी पातेल्या,लोटा आणि सुंभाच्या दांडीवर लटकणारी एकदोन लक्तरं दिसायची.मात्र रात्रीची प्रेतं घेवून येणाऱ्याना रात्री बारा नंतर लाला आत घोरत पडलेला दिसायचा.तो स्मशानाकडे ढुंकूनसुद्धा पहात नसे,असं नियमीत स्मशानयात्रेला जाणारे लोक म्हणायचे.तसंच प्रेत-संस्कार झाल्यावर लोकं निघून गेल्यावर ईकडे तिकडे पडलेले सामानसुमान, कपडेलत्ते पाहून लाला कशालाही हात लावत नसे.तो निरपेक्ष,निराधार,निस्पृह असावा असं लोकाच मत, त्याच्या विषयी पक्कं झालं होतं.कधी तरी तापाने फणफणला असेल तर " अल्ला,अल्ला " असं ओरडल्याचं कुणी तरी ऐकणारे सांगतात ह्या एकाच शब्दावरून लाला मुसलमान असावा अश्या निर्णयाला लोक आले होते.रस्त्यावरून फिरत असताना तसा तो अल्पभाषीच होता.एखाददुसरा शब्द कुणी ऐकला तर तो मराठीत,मालवणीत किंवा "अच्छा " असा उर्दूत असायचा त्यामुळे रस्त्यावर पहाणारे लोक लालाला मुसलमान संमजायचं की काय समजायचं ह्याच्या संभ्रमात असायंचे.त्याच्या धर्माचा विषय ओघाओघाने पुढे येणारच आहे.

सकाळी खाली गावात आल्यावर थेट तुळसुली गावापर्यंत जवळ जवळ तिन मैल चालत जायचा.मधे एका चहाच्या दुकानात बाहेरच त्याला रतीबाने एक कप चहा आणि बेकरीतला पाव खायाला मिळायचा. खांद्दयावरच्या झोळीत त्याचा एक कप असायचा तसंच एक ऍल्युमिनियमची थाळी आणि एक पांढऱ्या पोरसिलीनची तबकडी,त्यावर निळ्या गर्द रंगाची किनार असायची.दुपारचा मार्केट मधे आल्यावर सांळगावकरांच्या खानावळीच्या बाहेर बसल्यावर डाळ,भात एखादा माशाचा तुकडा आणि आमटी फुकट जेवायला मिळायची,तसंच बुधवारी आणि रविवारी मयेकरांच्या हॉटेलातून बशीभर मटण आणि दोन पाव दुपारचे मिळायचे.मटण लाला पोरसीलीनच्या तबकडीत न चुकता घ्यायचा लाला कुणाकडे काही मागायचा नाही.दुकानात बाहेर बसल्यावर हॉटेलचा पोऱ्या त्याला पाहून खाणं आणून द्दयायचा.
लालाने कधीच भीक मागीतली नाही.कुणी त्याच्या कमंडलूत एखादं केळं,आंबा,चीकू सारखं फळ दान करायचा आणि लाला ती कधी खायचा किंवा एखाद्दया लहान मुलाला देवून टाकायचा.

मार्केटच्या आवारात असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बांधलेल्या चौथुऱ्यावर दुपारची वामकुक्षी घ्यायचा.कधी कधी बाबल्याच्या पानाच्या गादी जवळ जावून उभा राह्यचा.दोन चार हिरवी खायची पाने,थोडी कुटलेली सुपारी,थोडा तंबाखू आणि एका पानावर चुना लावून त्याची पुरकंडी त्याच्या झोळीत बाबल्या टाकायचा.लालाला असं दान केल्यावर त्याच्या धंद्दयाला
बरकत येईल अशी त्याची भाबडी समजूत असायची.

बाजूच्या दुकानाच्या उंबरठ्यावर दोन चार उपट्सुंभ गांवठी जुगार खेळत बसायचे.चार आण्याच्या (पावलीच्या) नाण्यावर माशी बसेल त्याला जुगार लागला असा नियम करून ईतरानी ठेवलेली नाणी त्याची व्हायची.उंबरठ्यावर रांगेत ठेवून दिलेल्या
कुणाच्या नाण्यावर माशी बसेल हे ज्याचे त्याचे नशिब असायचे.कधी कधी पंधरा पंधरा मिनीटं माशी फिरकायची पण नसायची. लालाला ह्या जुगारात कसलीच उमेद नसायची.
उभं राहायचं म्हणून तो उभा राहायचा.मात्र अन्वर खेळत असेल तर मात्र तो लालाला रोखून धरायचा.लालाच्या पायावर डोके टेकल्याशिवाय त्याला जुगारात लाभ होत नाही असा त्याचा अनुभव होता.आणि खरंच लालाच्या पायावर डोके ठेवून पावली त्याच्या पायावर घासल्याशिवाय त्याला लाभ होत नव्हता,पण ईतर म्हणजे गुरुनाथ,दाजी,दत्या वगैरे हिंदू मंडळी लाला मुसलमान असल्याने त्याच्या पायावर डोकं ठवणं त्यांना पसंत नव्हतं.धर्म बुडतो असा त्यांचा समज असायचा.अन्वर आणि लाला असताना ते जुगारातून काढता पाय घ्यायचे.लाला नसताना मात्र अन्वर कधी कधी हरायचा.

असं कां होतं?, म्हणजे लाला असताना अन्वर का जिंकतो हे चलाख पंढरीच्या लक्षात आलं.अन्वर नक्की काय करतो ते त्याने नीट लक्ष देवून हेरलं.आणि लालालाच्या पायावर डोकं न ठेवता,फक्त पावली लालाच्या पायावर पंढरी घासायचा.नंतर हटकून माशी पंढरीच्या पावलीवर बसायची.पंढरी जुगार जिंकायचा.

त्याचं गुपीत असं होतं की लालाचे मळलेले आणि कधी न धुतलेले पाय एव्हडे अस्वच्छ असायचे की त्याच्या पायावर घोंघावणाऱ्या माशा त्या घासलेल्या पावलीला आकर्षीत व्हायच्या. हे पंढरीच्या चलाख डोक्यात आलं.

अशातऱ्हेने दिवस चालले होते.आम्ही शाळेतून घरी येताना लाला दिसला की "लाला! मी पास की नापास? " असा प्रश्न केल्यावर, खाली मुंडी ठेवून चालत असलेला लाला हळू आवाजात फक्त म्हणायचा " पास ". हे ऐकून आम्हा सर्वांना बरं वाटायचं.असंच एकदां दाजी पराडकरने त्याला विचारलं,आणि तो परिक्षेत खरंच नापास झाला.त्याला खूप वाईट वाटलं.परिक्षेसाठी
नीट अभ्यास न केल्याने नापास झाल्याचं दुःख दाजीला नव्हतं,तर लालाचं भाकित खोटं ठरलं याच त्याला जास्त दुःख झालं.
पुढल्या खेपेला लाला दिसल्यावर दाजी त्याला म्हणाला
"लाला तू झूट बोलतोस,मी नापास झालो."
लाला पहिल्यांदाच रसत्यावर थांबून म्हणाला कसा, " बेटा मैने तुमको ’तुमना, पास’ असं बोललो होतो.मै झूट कभी नाही बोलत.अल्ला की कसम" दाजीच्या लक्षात आलं लाला "तुम, नापास" असं बोलला असावा.

लाला अलिकडे रोज रसत्यावर दिसत नव्हता.कधीतरी दिसायचा.साळगावकरच्या खानावळीतला पोऱ्या पण म्हणाला लाला थाळीत दिलेले नीट जेवत नाही.मयेकर हॉटेलवाले पण म्हणाले "लालाने अलिकडे मटण सोडलं थाळीत घेतो पण खात नाही". करता,करता लाला आता
खाली उतरून यायचा बंदच झाला.

असंच एकदा तांबळेश्वराला गेलेल्या काही लोकानी सांगतलं की लाला "पैगंबरवासी" झाला.तो अल्लाला प्यारा झाला. कुणी तरी म्युनसिपालीटीला कळवलं.गाडी आली होती,पण लोकानी लालाला बेवार्शी न्यायला दिलं नाही.प्रश्न पडला लालाला पुरायचं की जाळायचं.त्या गर्दीतून अन्वर पुढे आला आणि म्हणाला " लाला मुसलमानच आहे.तांबळेश्वराच्या देवळाच्या बाजूला मी त्याला बरेच वेळा नमाज पाडताना पाहिलं आहे.आणि नेहमी ’अल्लाकी कसम’असंच म्हणायचा. आणि अगदी खाजगीत म्हणजे लघूशंका करताना मी त्याला पाहिलं आहे त्याचा सुंथा झाला आहे." एव्हडं सगळं ऐकल्यावर लोकानी त्याला तांबळेश्वरच्या पठारावरच एकेठिकाणी पुरला.

तांबळेश्वराच्या स्मशानात आल्यावर लोक न चुकता ईतर सामुग्री बरोबर एक फुलाचा हार आणायला विसरत नाहीत.सर्व संस्कार झाल्यावर बाहेर येवून लालाच्या कबरीवर आस्थापुर्वक हार घालतात आणि कबरीला हात जोडतात.आणि मुसलमान कबरीला हात लावून मग आपल्याच केसावरून हात फिरवतात.

कधी कधी शाळेतून येताना रसत्यावर लालाचा भास व्हायचा."लाला! मी पास की नापास? "असं विचारल्यावर आता उत्तर द्दयायला लाला नव्हता.

श्रीकृष्ण सामंत

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार

आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

" नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? "
" काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? "
अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो... मग तिथून प्रेरणा घेत घेत आंतरजालावरती बरंच लेखनतंत्राविषयी वाचलं... पटकथा लेखन शिक्षण आणि नाट्यलेखन शिक्षण या विषयावर आंतरजालावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं काही वाचून समजून घेतलं, मजा आली...स्वत:च्या लेखनासाठी याचा उपयोग झालाच आणि समीक्षणात्मक लेखनासाठीही नेहमी उपयोग होतो. सरावासाठी घरचा अभ्यास दिलेला आहे काही संस्थळांवरती...तोही भलताच मजेदार आहे...हॊलीवूड मधल्या काही पटकथा,संवाद संस्थळावर उपलब्ध आहेत..त्यांचं या निमित्तानं वाचन झालं..

दरम्यान काही स्क्रीनरायटिंगचा कोर्स केलेली / करणारी काही मंडळी दोस्त झाली... यांनी लेखनतंत्रासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरलेली काही पुस्तके सांगितली, त्यांचा अभ्यास झाला.या सार्‍या अभ्यासातलंच काही इथे थोडक्यात क्रमश: देण्याची इच्छा आहे....

इथे एक स्पष्टीकरण आवश्यक आहे की इथे दिलेले सगळे नियम किंवा ठोकताळे तारतम्याने घ्यायचे आहेत.... प्रत्येक ठिकाणी ते लागू पडणारच असा माझा कोणताही दावा नाही आणि कोणीही करू नये...कुठेकुठे कदाचित काही विसंगतीही सापडण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या आवडत्या कथा / नाटक / चित्रपट अशा कलाकृतींना यातले बरेचसे ठोकताळे फ़िट्ट बसतात असे समजत जाते तेव्हा झकास वाटते.
अजून एक म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मला प्रतिशब्द सापडला नाहीये, तिथेतिथे मी त्यासाठी थोडासा प्रयत्न केला पण त्यातच अडकलो नाही, पुढे लिहीत गेलो आहे.

terminology...यातल्या प्रत्येकावर पुढे काही भागांत लिहिणार आहे.
1.premise.
2.plot
3.dramatic structure
4.protagonist
5.conflict
6.rhythm
7.genre
8.dialogue
9.progression of play...

१. premise...प्रिमाइस याला चपखल मराठी शब्द मला सुचला नाही.. कथासार, कथाबीज, किंवा तात्पर्य वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत पण प्रिमाईस ला ते अचूक वाटत नाहीत. असो..ते फ़ारसे महत्त्वाचे नाही.मी सध्या याला प्रिमाईसच म्हणेन. (काही लोक यालाच वन लाईन स्टोरी असे म्हणतानाही ऐकले आहे .ते असो.)
लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपला प्रिमाईस तयार असणे उत्तम.... आपल्याला नक्की काय सांगायचंय? तेच का सांगायचंय? आणि कुठवर कसं सांगायचंय? अशा प्रश्नांची उत्तरे माहित असायलाच हवीत... प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद, प्रत्येक नवीन व्यक्तीरेखा तुमच्या मूळ प्रिमाईसशी सुसंगत आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक असते.प्रिमाईस साधारणपणे गोष्टीतल्या मूलभूत मानवी भावनेबद्दल सांगतो.

उदा. समजा आपली गोष्ट मत्सराबद्दलची आहे. मग मत्सराबद्दल आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते ठरलं पाहिजे.
म्हणजे मत्सरामुळे सर्वनाश होतो
मत्सरामुळे मानहानी होते.
मत्सर माणसाला एकटा पाडतो.
मत्सरामुळे माणूस प्रेमाला पारखा होतो.
आता यातलं काहीतरी एक नक्की केलं की आपलं कथासार तयार होणार.

प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना २.संघर्ष ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय.
उदा. रोमिओ आणि जुलिएट चा प्रिमाईस असा होईल... सच्चं प्रेम मृत्यूवरही मात करतं.

कोणत्याही नाटकाला / गोष्टीला सुस्पष्ट प्रिमाईस नसला की बरेच गोंधळ निर्माण होतात.थातुरमातुर प्रसंग, नको त्या व्यक्तिरेखा वाढत जातात ...खुद्द लेखक गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोंधळून जातो. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते वाचकाला / प्रेक्षकाला कळेनासं होतं...

कधीकधी एखादा साधासा विचार, कल्पना किंवा प्रसंग यापासून गोष्ट सुरू होऊ शकते परंतु लिहिता लिहिता लवकरात लवकर प्रिमाईस तयार होणे आवश्यक असते.

प्रिमाईस जसाच्या तसा संवादात येऊ नये... प्रेक्षकांना तो गोष्ट संपताना आपोआप कळायला हवा... आणि प्रिमाईस काहीही असला तरी लेखकाला तो शेवटी सिद्ध करता यायला हवा.

आणखी एक सांगायचं म्हणजे आपल्या अत्यंत आवडत्या नाटकाचा / सिनेमाचा प्रिमाईस तयार करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते पण तो एक मजेदार खेळ होऊ शकतो. ... या धाग्यात असा खेळ खेळून पाहूयात काय?

प्लॉट ( कथानक ?)
प्लॉट म्हणजे विशिष्ट प्रसंगांची, ठराविक क्रमाने केलेली, भावना उद्दिपीत करणारी अर्थपूर्ण मांडणी..
कथानकाशेवटी व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडला पाहिजे.योगायोग नको.( उदा. गरीब कष्टाळू माणसाला शेवटी यश मिळते असा संदेश देत