जीवनमान

प्रो.देसाई म्हणतात........

"लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या लोकानां?"
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.

मला म्हणाले,
" जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.सोशीक लोक जास्त तरूण राहणार.
काही वर्षापुर्वी सेल फोन,किंवा मोबाईल फोन म्हणजे एक श्रीमंती काम होतं.आणि त्यावेळी लोकांच्या घरी लॅन्ड फोन पण होते.पण आता लोक घरच्या फोनचा नंबर कधी मागतच नाहीत.काय आपण एव्हडे बिझी असतो कां? बरेच वेळां लोक घरीच नसतात.
का असं समजायचं की बिझीनेस इतका महत्वाचा झाला आहे की कुणालाही कुणीही मनात आल्याबरोबर हवा असावा. का लोकांना बॉसचा फोन आला नाही तर जेवण घशा खाली जात नसावं.
आणि इंटर्नेट बाबत बोलायचं झाल्यास कुठल्याही जेवण घेण्याच्या जागी जावं तर बरेच जण मांडीवर लॅपटॉप घेवून जेवण करतानासुद्धा काम करताना पाहून एखाद्दया इलेक्ट्रॉनीकच्या दुकानात गेल्या सारखं वाटतं.

मी मात्र शांत असतो.कसं म्हणाल तर मला रात्री शांत झोप लागते.आणि ज्याना माझ्याशी काम करायचं असेल त्यांचीशी मी काम करीत असतो.
खरं सांगू का, माझ्याकडून पण असाच कधी तरी पुर्वी कामाच्या टेन्शनमुळे प्रमाद झाला होता.माझ्या बरोबर काम करणारा माणूस फारच आळशीपणा करून कामात कुचराई करताना पाहून मी त्याच्यावर खूपच गरम झालो होतो.मला तसं करायला नको होतं. शांतपणे मी तो प्रसंग हाताळू शकलो असतो.पण त्यामधून शिकलो आणि तसा प्रसंग पुन्हा होवू नये म्हणून खूप काळजी घेतो.

दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून नेहमीच "होयगावडा" होण्याची जरुरी नसते.कधी कधी उलट पण सांगावं लागतं,पण ते सन्मान ठेवून सांगता येतं.शांत असणं म्हणजे काय सांगायचं किंवा काय करायचं असं नसून कसं सांगायचं आणि कसं करून घ्यायचं
हे असतं.
म्हणून म्हणतो शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.

श्रीकृष्ण सामंत

बालपणीचा काळ सुखाचा! १४

माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.

हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्‍यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्‍याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्‍या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.

एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्‍या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."

हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्‍यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्‍या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.

मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.

"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"

मी कोर्टात नोकरीला असताना मला समाजाच्या असा स्तरातील गुन्हेगारी जवळुन पहायला मिळाली ते पाहुन कोणत्या ही सहदय माणसाच्या डोळ्यातुन आश्रु नक्कीच येतील.
गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात. पोटाच्या भुके पुढे काही गोष्टी हतबल होतात.
मी कोर्टात जजची पी.ए. म्हणुन होते त्यामुळे सतत डायसवर असायचे त्यामुळे गुन्हेगार आणि त्याने केलेला गुन्हा कोणत्या परिस्थित झाला त्याची पार्श्वभुमी जाणुन घेण्याची सधी जवळुन मिळाली.
एकदा एका मजुराला एका चोरीच्या गुन्ह्यात समोर आणले. त्याच्याकडे पाहुन त्याच्या परिस्थितीची जाणीव होत होती आणि चोरीचा आरोप तरी कसला असेल तर साखर, तादुळ आणि तुरडाळ त्याने दुकानातुन चोरली होती. आता चोरी ही चोरीच ती छोटी असो वा मोठी प्रत्येक गुन्हयाला शिक्षा ही हवीच हा भाग वेगळा, पण जेव्हा आमच्या जज साहेबानी त्याला बोलते केले तेव्हा त्याने जी गोष्ट सागितली त्यामुळे डोळे पाणावले.
अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही. त्याचा लहानगा रडुन रडुन बेशुध्द व्हायचा बाकी होता, हा गुन्हेगार हतबल होता पैसा नसल्याने विकत काही घेता ही येत नव्हते, त्याच्याकडे पाहुन उधार ही कोणी देत नव्हते मग त्याच्यातील पिता त्याला स्वस्थ बसु देईना, म्हणुन त्याने साखर, तादळ आणि तुरडाळ चोरली होती. आणि तो त्यामध्ये सापडला होता, त्याला जामिन ही कोणी नव्हते त्यामुळे त्याची रवानगी जेल मध्ये झाली. त्याची बायको आणि लहानगा कोर्टाच्या बाहेर बसुन होते, आम्ही सगळ्या स्टाफने काही पैसे काढुन त्या बाईला दिले आणि आमच्यातील एका शिपायाने त्या बाळाला एक ग्लुकोज बिस्कीतचा पुडा आणुन दिला. तेव्हा तीच्या चेह-यावर झालेला आनद अजुन माझ्या चेह-या समोर आहे तीला पैसे दिल्या पेक्षा आपल्या मुलाला कोणी तरी खाऊ आणुन दिला हे समाधान दिसत होते आणि त्यामुळे तीचे अश्रु वाहत होते.
आमचे जज साहेब ही माणुसकी राखुन होते त्यानी मला त्याच्या केबिन मध्ये बोलावले आणि म्हणाले मला अन्नासाठी केलेली चोरी मनाला दुखावते, मी ह्या जजच्या नात्याने एका चोराच्या फेमिलीला मदत करू शकत नाही त्यावेळी त्याना थाबवत मी त्याना सागितले की आम्ही स्टाफने काही रक्कम आणि त्याच्या लहानग्याला खाऊ दिला आहे. तेव्हा त्याच्या चेह-यावर आपला स्टाफ बद्दल अभिमान वाटला हे लगेच दिसुन आले.

मी कोर्टात असताना अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत की पोट्याच्या भुकेसाठी आणि अधश्रध्दा ह्या गोष्टी साठी माणुस कोणत्या ही थराला जातो.
अशीच एक अधश्रध्दे मुळे एका काकाने आपल्या पुतण्याचा खुन केला होता एका मात्रिकाच्या सागण्यावरून.
त्या गुन्हेगाराला समोर आणले तेव्हा त्याच्या चेह-यावरील भाव इतके विचित्र होते कीत्याला ह्या गोष्टी बद्दल काहीच पश्चतावा झालेला दिसत नव्हता.
त्याला कोणत्या तरी मात्रिकाने सागितले नरबळी दिलास तर तुला गुप्त धन मिळेल ह्या गुन्हेगाराने मग आपल्याच घरातल्या मोठ्या भावाच्या मुलगा जो शाळेत इ. ४ होता त्याला सायकल वरून शाळेतुन मधुनच घेऊन आला आणि काकाच आला आहे न्यायला म्हटल्यावर हा मुलगा ही त्याच्या बरोबर गेला तर काकाने असे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. ज्याची एफ.आय.आर. वाचतनाही तळ पायाची आग मस्तकाला जात होती. पुढे त्या केस मध्ये त्यालाही कदाचित जन्मठेपची का फाशीची शिक्षा झाली हे आता आठवत नाही कारण असल्या केसचे निकाल डिस्ट्रीक, हाय कोर्ट ते सुप्रीम कोर्टा पर्यत फे-या मारून मग लागतात. त्यामुळे समाजात ह्या गोष्टीची भिती उरत नाही कारण लोकाच्या डोक्यातुन अनेक वर्षाने ही गोष्ट पुसट झालेली असते त्यामुळे त्याचे गाभिर्य रहात नाही आणि त्याला झालेली शिक्षा ही जसा गुन्हा पसरतो तशी पसरत नाही.

मिसळ

ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
misal

जातीधर्माविषयक लेखन - मिपाचे धोरण!

मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे.

या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्‍याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते!

बर्‍याच सभासदांच्या तक्रारींवरून मिपा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलेला आहे.

मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!

तरी कृपया या पुढे कुणीही येथे या संदर्भात लेखन/चर्चा करू नये अशी मिपाच्या सर्व सन्माननीय सभासदांना कळकळीची विनंती. असे लेखन येथे आढळल्यास ते येथून काढून टाकले जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी!

सदर बंदी हा मिपाच्या धोरणाचा एक भाग समजावा व सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती!

-- जनरल डायर.

बदल तर घडतोय...

टीक-टॉक
टीक-टॉक
टीक-टॉक
ठांग!

लोलक,
जागच्या जागी फिरतोय!

लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
ठक्काक!

मानव,
जागच्या जागीच चालतोय!

ठांग!.
ठांग!!..
ठांग!!!...
तरी ..बदल तर घडतोय...

मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं!
अखंड,
अविरत...
अथक!!
बदल तर घडतोच आहे...

क्षणा क्षणाला..कणा कणाने,
वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे!
क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने,
वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे!

एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे,
दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे!
एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे...

पुढे..
मागे..
जिथल्या तिथे!
जिथल्या तिथे..
मागे..
पुढे!!!
काळ कधीचा चालतोय!

पुढे.
पुढे..
पुढे...
इथे असा, तिथे तसा!!
बदल तर घडतोय..

एकाच वेळी..
मागे-पुढे..करत-सरत,
कधी थांबल्या सारखा वाटतोय!
तरी..बदल तर घडतोय...

उच्चतम उधाण बिंदूला स्पर्शून,
समुद्र पुन्हा पुन्हा आहोटतोय!
तरी रेषे रेषेने जलधी वाढतोय!!
बदल तर घडतोय...

डंपर डंपर गारबेज खाली,
सागर तळ झाकला जातोय!
पर्यावरण वादाचा आवाजही गुंजतोय!!
बदल तर घडतोय...

कधी मखरात,
कधी मक्त्यात!
आई
बाई
ताई
सई
म्हणत
रुपा रूपाला बघतोय...

दोन हात
दोन पाय
एक डोकं असलेला..
माणसा सारखा प्राणी,
कधी माणूसही वाटतोय!

बदल तर घडतोय...
बदल तर घडतोय...

======================
स्वाती फडणीस .............. १६-०६-२००८

अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखडा

ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन. तसेच या योजनेत सहभागी होण्याबद्दल स्वारस्य दाखवल्याबद्दल आणि सतत पाठपुरावा करून हा मुद्दा आज येथे टंकित स्वरूपात आणल्याबद्दल इनोबा व ऋषिकेश यांचे अनेक आभार.

अपत्य दत्तक योजना


योजनेचे उद्दिष्ट -

  1. सध्या अनाथालयांमध्ये वाढत असलेल्या अधिकधिक मुलांना पालक मिळवून देणे,त्यायोगे त्यांची सामाजिक व शैक्षणिक वाढ,भावनिक स्थिरता आणि कौटुंबिक अनुभव,त्यांचे न्यूनगंडनिवारण
  2. येनकेनप्रकारेण स्वापत्यसुखापासून वंचित राहिलेल्या,कुटुंब नियोजनासाठी तयारी करीत असलेल्या किंवा उत्सुक असलेल्या दांपत्यांस अपत्यसुखाचा आजीवन अनुभव मिळवून देणे

मिपाकरांचे जे कट्टे वेळोवेळी भरतात,तेथे होणार्‍या मौजमजेबरोबरच त्या वेळेचा आणि सदस्यांच्या उपस्थितीचा विधायक,समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग झाल्यास उत्तम या मूळ कल्पनेतून मी ही योजना जन्माला घातली.असे कार्य करण्यासाठीची ही एकमेव योजना नसून एक पर्याय व एक सुरुवात आहे,असे समजूया.

योजना कशी राबवावी,याबाबतच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे -

  1. यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्‍या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे.
  2. अशा व्याख्यानात दत्तक दिलेघेतले जाण्यामागची सामाजिक गरज,दत्तक प्रक्रिया,आर्थिक बाजू,कायदेशीर बाबी यांबाबत समुपदेशन व्हावे.
  3. ही माहिती संग्रहित स्वरूपात रचून मिपावर संदर्भासाठी प्रसिद्ध केली जावी. मिपाच्या सदस्यांनी या माहितीचा मौखिक प्रसार करावा.
  4. विवाहोत्सुक उपवर तरुण-तरुणी तसेच नवविवाहित जोडपी आणि मूल दत्तक घेण्यास उत्सुक असणार्‍या जोडप्यांस या योजनेबद्दल माहिती द्यावी.संग्रहित माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल,हे पहावे.
  5. स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव,मुलाचे पालनपोषण - खाणेपिणे,दैनंदिन व्यवहार,शिक्षण,मौजमजा इ. - करतानाचे अनुभव म्हणजे आलेल्या अडचणी,त्यांच्या निवारणासाठी त्यांनी अनुसरलेले मार्ग इ. बाबत मुलाखतवजा कार्यक्रम कट्ट्याच्या वेळी करता येईल.त्यातून मिळालेल्या माहितीचा प्रसार वर सांगितल्याप्रमाणे करता येईल.

मी स्वतः सद्यस्थितीत या योजनेसाठी काय करू शकतो -

  1. जमेल तितक्या माहितीचा संग्रह आणि पुरवठा
  2. संबंधित संस्था व पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे संपर्क पत्ते पुरविणे;गरज पडल्यास त्यांच्याशी स्वतः थेट संपर्क साधणे
  3. जी दांपत्ये दत्तकप्रक्रियेतून गेली आहेत,त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी व माहिती देण्यासाठी आमंत्रित करणे - त्यांचे संपर्क पत्ते पुरविणे
  4. शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत
  5. या (अति)कच्च्या मसुद्यात वेळोवेळी,गरज पडेल तशी सुधारणा आणि तो राबवण्याबद्दलच्या अधिकाधिक उपयुक्त कल्पना व त्यांची अंमलबजावणी

या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून मुंबईतील एका संस्थेचा व तिच्या संबंधित कार्यकर्त्याचा/पदाधिकार्‍याचा पत्ता येथे देत आहे -
वात्सल्य ट्रस्ट,मुंबई
प्लॉट क्र. १२८५,कांजुरमार्ग पोलीस स्थानकाजवळ
कांजुरमार्ग(पूर्व),मुंबई ४०००४२
फोन.: +९१ २२ २५७८ २९५८
+९१ २२ २५७९ ४७९८
संपर्कः श्री. ए. जी. दामले

श्री.दामलेंचा खाजगी संपर्क पत्ता - जसे त्यांचा भ्रमणध्वनी क्र.,विरोप पत्ता मिळवून येथे द्यायचा प्रयत्न यथावकाश करेनच.

या संस्थेतून दत्तक घेतले गेलेल्या एका मुलीला मी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवले आहे.त्यामुळे दत्तक घेतले गेल्यानंतर अशी मुले,पालक,त्यांच्यातले रुजू लागलेले नाते,येणार्‍या समस्या इ. बद्दल स्वानुभव आहे.त्यावरून हा प्रकल्प अधिक यशस्वी करण्यासाठी काय काय करावे लागेल,याचा अंदाज येतो आहे आणि त्यासंबंधी प्रकल्पाच्या माध्यमातून काय करता येईल,याचाही विचार चालू आहे. माझी स्वतःची मावसमावसबहीण या क्षेत्रात स्वयंसेवा करते व ती या संस्थेशी संबंधित आहे.तिचा संपर्क पत्ता दुर्दैवाने सध्या माझ्याकडे नसला तरी यथावकाश तोही मिळवायचा प्रयत्न करीन,जेणेकरून जमेल तसे तिच्याशी एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतरही वेळी शक्य असेल तेव्हा बोलता येईल.

ऋषिकेश यांनी पुण्यातील 'अपना घर' या अशाच एका संस्थेबद्दल माझ्याशी बोलणी केली होती.तसेच लहान मुलांची दत्तकप्रक्रिया तुलनेने सुलभ असते;पण कळू लागलेल्या वयातील मुले दत्तक दिलीघेतली जाण्यात प्रामुख्याने काठिण्य असते,असे सांगितले होते.ऋषिकेश,तुम्ही व इनोबांनी मिळून अपना घर बद्दल अधिक माहिती,संपर्क मिळवल्यास व तिच्याशी संबंधित पदधिकारी व कार्यकर्त्यांचे वर नमूद केल्याप्रमाणे आटोपशीर व्याख्यान एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतर वेळी अनौपचारीकपणे आयोजित केल्यास मदत होऊ शकेल.

हा मसुदा परिपूर्ण तसेच अंतिम नाही,याची नम्र जाणीव आहे.तेव्हा त्यात मोलाची भर घालण्यासाठी व सूचना आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्याही मदतीतून मिपाच्या सौजन्यातून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी,प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी सर्व मिपाकरांचे स्वागतच आहे.

धन्यवाद.

(उपक्रमी)बेसनलाडू

नोटापुराण

"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना."

मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते Smile काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी. ती नोट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्यासोबत आपल्या नावाचा कागद ठेवायचे व झाल्या चलनी नोटा वापरण्यालायक.

ह्यावरूनच एक मार्मिक विनोद आठवला. एक कागद एका नोटेला म्हणाला, "तुझ्या आणि माझ्यात फरक काय? तू आणि मी दोघेही कागदाचेच तर आहोत." त्यावर नोट म्हणाली, "हो, पण मी आयुष्यात कधी कचर्‍याचा डबा नाही बघितला."
काय गंमत आहे ना? चलनी नोटांची किंमत कमी होत नाही ते असे.

बाकी नोटांचे काय हो, ते ही एक वचनपत्र असते ना? धनादेशाप्रमाणे. "मैं धारक को xx रूपये अदा करने का वचन देता हूं.", असे लिहून रिजर्व बँकेचे गव्हर्नर ग्वाही देतात की ह्या कागदाची ही किंमत आहे. अर्थात हे १ रू.च्या वरील नोटांकरीता असते. एक रुपयाच्या नोटेवर तशी ग्वाही नसते. खरे तर एक रुपयाच्या नोटेवर भारत सरकार लिहिले असून त्यावर अर्थखात्याच्या सचिवांची सही असते. इतर सर्व नोटांवर रिझर्व बँकेचे नाव असून त्यावर बँकेच्या गव्हर्नरची सही असते आणि त्याची हमी देते केंद्र सरकार (केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत/Guaranteed by the Central Government). आणि म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते.

भारतात नोटा किती प्रकारच्या छापतात? त्याची माहिती येथे मिळेल. सध्या आपण १०, २०, ५०, १००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा वापरतो. १, २ व ५ रू. च्या नोटांची छपाई बंद झाली असली तरी त्या नोटा चलनातून बाद नाही झाल्यात अजून.
अरेच्च्या, काय हो? सरकारने/बँकानी सर्व जुन्या नोटा घेणे बंद केले नाही ना अजून. काही सांगता येत नाही बुवा. कधी काळी सरकारने १००० ते १०००० (५००० व १०००० च्या ही नोटा चलनात होत्या हे मला माहितच नव्हते)च्या नोटा काळाबाजार रोखण्यासाठी बंद केल्या होत्या. त्याप्रमाणे आताही बंद करू शकतात. तर, ह्या सर्व जुन्या नोटा बंद होण्याच्या आधी चलनात काढून, किंवा कमीत कमी बँकेत परत करून आपण आपले(आणि सरकारचेही) नुकसान कमी करू शकतो. बहुधा माझ्याकडे आहेत थोड्या जमविलेल्या नोटा. पाहतो, त्यात किती जुन्या नोटा आहेत ते.

आता मुद्दा निघालाच आहे तर सुरूवातीला थोडे मोठ्या नोटांविषयी.
सध्याच्या काळात मोठ्या म्हणजे ५०० व १००० च्या नोटा. फार पुर्वी ५०, १०० ची नोटही मोठी मानली जात होती. तर त्यांचा फायदा हा की कमी नोटांमध्ये जास्त पैसे खिशात/बॅगेत/कपाटात राहू शकतात. पँटच्या खिशातील चोरकप्प्यातही. तसे आजकाल तर ५०० व १००० च्या नोटा सहज मिळतात. पण आधी तसे नव्हते. कॉलेज मध्ये असताना माझ्या मित्राने त्याच्या एका नातेवाईकांचा अनुभव सांगितला होता. त्यावेळी ५०० च्या नोटा एवढ्या प्रचलित नव्हत्या. त्यांना दीड लाख रूपये घेऊन मोटारसायकलवर एका गावातून दुसर्‍या गावात जायचे होते. त्यांना तशी धास्ती वाटत होतीच. त्यामुळे एका बँकेत जाऊन त्यांनी मॅनेजरला आपली अडचण सांगितली व ५०० च्या नोटांची ३ बंडले घेऊन एक खिशात व दोन पायांच्या मोजात दोन अशी बंडले ठेऊन थोड्या कमी भीतीत प्रवास केला.
काही वर्षांपुर्वी हर्षद मेहतानी सांगितल्याप्रमाणे त्याने नरसिंह रावांना जे १ करोड रुपये एका सूटकेस मध्ये दिले ते ५० आणि १०० च्या नोटांमध्ये होते. त्यावेळी ५०० व १००० च्या नोटा असत्या तर ती बॅग किती लहान झाली असती नाही? Wink
खरे तर सर्व नोटांवर जुन्या नोटांवर अशोकस्तंभाच्या खाली ’सत्यमेव जयते’ लिहिलेले असायचे. पण मी पाहिलेल्या काही ५० व बहुधा १०० च्या नोटांवर फक्त अशोकस्तंभ होते, सत्यमेव जयते नाही. ह्याच ५० व १०० च्या नोटा हर्षद मेहतानी वापरल्या होत्या का?
आता सर्व नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असते. मला नेहमी प्रश्न पडायचा फक्त महात्मा गांधीच का हो? बाकी नेते का नाहीत? पण आता वाटते ते ही बरे आहे नाहीतर पुन्हा आमच्या नेत्याचे चित्र ठेवा म्हणून लोक आंदोलन करतील. आणि पुन्हा आपले नुकसान. पण एक वाईट वाटते, की मग एक ५०० किंवा १००० रूपयांच्या नोटेचा उल्लेख 'एक गांधी खर्चावा लागेल' असा लोक करतात. निदान आधी १०० रू.च्या नोटेला हरी पत्ती किंवा हिरवी नोट म्हणायचे. त्यावरून खर्च जास्त आहे हा अंदाज यायचा.

बरं, ह्या मोठ्या नोटा वापरायचे म्हणजे ज्या अडचणी येतात त्या पहा.
मोठ्या नोटा असल्या तर त्यांचे आकारमान लहान होते. म्हणून मोठी रक्कम बाळगताना असतानाची धास्ती वगळून इतर पाहूया.
सर्वात पहिली अडचण म्हणजे.. आठवा, तबू व ॠषी कपूरचा 'पहला पहला प्यार' सिनेमा. तबू नेहमी ५०० ची नोट समोर करत असते. त्यामुळे नेहमी ॠषी कपूरलाच पैसे भरावे लागतात. तसेच संजीव कुमारचा कुठलासा सिनेमा होता, त्यातही त्याच्याकडे सुट्टे नसल्याने नायिकेला प्रत्येक ठिकाणी पैसे भरावे लागतात. हाच प्रसंग मग फिर हेराफेरी ह्या सिनेमातही उचलला होता.
हं, तर पहिली अडचण सुट्टे पैसे मिळण्याची. त्यामुळे मी आपला बाजारात जाताना बहुतेक वेळा सुट्टे किंवा वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर १० ते १०० रू.च्या नोटा ठेवतो. ५०० किंवा १००० ची नोट दिसली की लोक विचारतात, "सुट्टे नाहीत का हो?". आधी हीच गत १०० च्या नोटेची होती. रिक्षा वाल्यांना ५० किंवा १०० ची नोट दिली तर हीच अडचण. मग त्या नोटेचे सुट्टे करण्याकरीता खटपट. कोणीच सुट्टे नाही देत म्हटले तर मग नाइलाजाने काहीतरी खरेदी करावे लागते. पण काही लोकांना जास्त खटपट करावी लागत नाही. मी बहुधा अकरावीत असेन तेव्हाची गोष्ट. एका किराणा मालाच्या दुकानात मी काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. तसे ते आमचे नेहमीचे दुकान. आमच्या कॉलनीत बहुतेकांच्या घरी त्याच दुकानातून सामान यायचे. पण मी जास्त कधी अशा मोठ्या नोटांचा प्रश्न त्यांना पडू दिला नाही. तर, तिथे माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा आला. त्याने २ रुपयाची काही वस्तू घेतली. दुकानदाराला ५०० ची नोट देऊ का विचारले आणि त्या दुकानदाराने त्याला ४९८ रूपये परत केले. त्यावेळी मला त्याचे आश्चर्य वाटले होते. तरीही मी कधी तेवढा प्रयत्न नाही केला. असो, मी तर बहुतेक वेळा रिक्षा मध्ये बसल्यावर लगेच विचारतो, की बाबारे तुझ्याकडे १०० रू.चे सुट्टे असतील ना? उगाच नंतर मला (व काही वेळा त्यालाही अडचण) नको.
तसे म्हणायला गेलो तर लहान नोटा वापरताना उलट परिस्थिती ही असते. खिशात सुट्टे असले की लवकर संपतात, आणि त्यांचा हिशोबही लागत नाही. हॉस्टेलमध्ये असताना ह्याची पहिल्यांदा प्रचिती आली. १०० ची नोट असली की आपण विचार करतो की ही नोट मोडायची गरज नाही. जेवढे पैसे आहेत त्यात भागवून घेऊ. त्यामुळे पैसेही जास्त खर्च होत नाहीत. एकदा का ही नोट मोडली की मग उरलेले पैसे ही लवकर संपतील. म्हणून बँकेतून, किंवा इतरांकडून पैसे घेताना सांगायचो की, 'मला १० च्या नोटा देऊ नका. ५०/१०० च्या द्या.'

(माझी) दुसरी अडचण. खिशातील पाकिटात ह्या नोटा ठेवायचे म्हणजे तेवढे मोठे पाकिट पाहिजे. त्यामुळे नवीन पाकिट घेताना ५०० (व आता १०००) ची नोट ठेवून बघतो. आधी नाणी ठेवायला जागा (कप्पा) आहे का तेही बघायचो. पण नंतर नाण्यांमुळे पाकिटही जाड आणि जड वाटायला लागले तर तो नाद सोडून दिला. आजकाल तर पाकिट घेताना हे ही बघतो की ह्यात क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड ठेवायलाही किती जागा आहे.
तुम्ही म्हणाल की "नेहमी नोट मावेल असे पाकिट का घ्यायचे? नोट घडी करून ठेवायची ना मग?" अहो, पण जर नोट न दुमडताच चांगली ठेवता येत असेल तर का नाही? खरे तर आधी आम्हाला एक सवय होती, बाजारात जाताना आईने पैसे दिले की त्या नोटेची मस्त घडी पाडायचो. का ते माहित नाही. पण हळू हळू पण तेव्हा लवकरच ती सवय सुटली. बरे झाले सुटली ते. नाही तर उगाच आता अपराध्यासारखे वाटायचे की सरकार एवढे सांगते आहे की नोटा खराब नका करू आणि आपण सर्रास त्या कशाही वापरतो.

तिसरी आणि मोठी अडचण आहे ती फक्त माझी किंवा तुमची अशी एकट्या दुकट्याची नाही तर सर्वांचीच म्हणजे जनतेची,बँकांची तसेच सरकारची ही आहे. ती म्हणजे नकली नोटा. नुसते देशाबाहेरील काही लोक नाही तर भारतातील अंतर्गत शत्रूही नकली नोटा बाजारात आणून गोंधळ घालण्याच्या व स्वत:च्या फायद्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे मोठ्या नोटा घेताना लोक पडताळून पाहतात.
भरपूर लोक तर ती नोट कोणी दिली त्याचा फोन नंबर नोटेवर लिहून ठेवतात. तरी बरे, आता नोटा लवकर गहाळ होऊ नयेत म्हणून रिझर्व बँकेनेच नोटांवर लिहिणे, स्टॅपलरच्या पिना वापरणे ह्यावर बंदी घातली आहे. नाहीतर बहुतेक नोटांवर टेलिफोन डायरी झाली असती Smile ठाण्याला पासपोर्ट कार्यालयाजवळ जे महाराष्ट्र वीज वितरणाचे कार्यालय आहे तिथे तळ मजल्यावर बिल वसूली केंद्र आहे. तिथे मी सूचना वाचली होती की "५०० च्या नोटेवर ग्राहकाने आपला दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवावा". स्वत: सरकारचीच खाती ह्याचे पालन करत नसेल तर काय म्हणावे.

आणि एक आहे हो, बहुतेक लोक ही नोट दिसली की पडताळून पाहण्याकरीता प्रकाशात धरून पाहतात. सर्वांनाच त्यात किती कळते ही शंका आहे. मला एवढे माहित होते की जुन्या नोटांमध्ये एक चांदीची तार असायची, ती नोटेत आहे की नाही हे लोक पहायचे. तसे ती तार काढण्याचे प्रकार बहुतेक लोक करायचे. मी ही १ २ वेळा तसा सफल प्रयत्न केला आहे (लहानपणी. उगाच आता माझ्यावर संशय नको). शासनाला किंवा लोकांना फसविण्याकरीता नाही, तर असे करता येते का ते पाहण्यासाठी. ती नोट व तार मी सांभाळून ठेवली होती, आता नाही मिळत Sad. पण आता तेही नाही. सरकारने तशी तार ठेवलीच नाही. पण एक ’RBI भारत’ लिहिलेली चांदीची वेगळीच चपटी तार गूंफून ठेवली आहे.

हं, तर ही खरी नोट कशी ओळखायची? त्याकरीताही सरकारने माहितीपत्रके काढली आहेत. आता एवढे सर्व आपण नेहमीच पडताळून पाहत नाही. मला माहित असलेल्या गोष्टी म्हणजे ती चांदीची तार, नोटेच्या डाव्या बाजूला असलेले त्रिकोण, चौकोन. त्या भूमीतीय आकृत्या थोड्याशा उंच राहतील अशा छापल्या असतात. जेणेकरून दृष्टीने अधू असलेल्या लोकांना त्या आकारांच्या स्पर्शाने ती नोट कोणती आहे ते ओळखता येईल. मी दादर-ठाणे लोकल मध्ये एका अंध पुस्तक विक्रेत्याची नोट कोणती आहे ते ओळखण्याची वेगळीच कला पाहिली. त्याने ह्या आकारांचा उपयोग केला की नाही माहित नाही पण त्याने नोटेची लांबी-रूंदी मोजून ती नोट १० ची आहे की २० ची ते पडताळले होते.
माझ्या एका मित्राने नकली नोट ओळखायची एक शक्कल लढविली. खरे तर तसे काही नव्हते पण उगाच गंमत म्हणून. काय तर, ती नोट गोळा केल्यासारखी केली व टेबलावर आपटली. उचलून म्हणाला "चष्मा फुटला असेल तर ही नकली नोट आहे, नाहीतर असली नोट."
गंमती करायला तर तशा भरपूर आहेत. ते नाही का, एखादी नोट दोरा बांधून ठेवून रस्त्यावर ठेवायची. कोणी ती उचलायला गेले तर तो दोर्‍याने ती नोट ओढायची वगैरे वगैरे.

आता नोट नेमकी कशी छापतात ते मला माहित नाही. पण सिनेमात तर हे लोक नकली नोटा छापण्याकरीता उसाचा रस काढायच्या यंत्रासारखे यंत्र किंवा मग लोखंडी ठसा वापरतात. आपला हिरो मग त्या ठशाची विल्हेवाट लावण्याकरीता मारामारीही करतो.
ह्यावरून आठवले. एक माणूस नकली नोटा छापत असतो. तो एकदा १५ रू. नोट छापतो. पण नंतर त्याला कळते की १५ रू. ची नोट काही चलनात नाही. तरीही तो प्रयत्न करतो. एका पानवाल्याकडे जातो. त्याला म्हणतो ’मला १५ रू.नोटेचे सुट्टे पाहिजे आहे.’ पानवाला म्हणतो, ’सुट्टे मिळतील पण मी एक रूपया कमी देईन.’ हा माणूस विचार करतो, '१४ तर १४ रू. नोट तर चालते आहे.' तो म्हणतो ’दे मला १४ रू.’ तर पानवाला त्याला ७ रू च्या दोन नोटा परत करतो.

बरं, नोटा सांभाळून ठेवणे हे ही एक वेगळेच काम. आधी तर मला सवय होती की नोटा वरच्या खिशात ठेवायचो. अर्थात १०० च्या वगैरे नाही पण ५, १० , २० च्या. खरं तर दहावी/ बारावी पर्यंत तेव्हा एवढ्या मोठ्या नोटा जवळ बाळगायचोच नाही Wink जर नेमके माहित असेल ह्यांची गरज आहे तरच. एकदा लोकलमधून कॉलेजला जात होतो. तेव्हा दरवाज्यात लटकून उभा होतो. पाहतो तर बाजूच्या माणसाने अलगदपणे बोटांनी माझ्या खिशातील नोटा काढायचा प्रयत्न केला होता. माझ्या नेमके लक्षात आले आणि मी त्याच्यावर रागावलो.
तसेच काही वेळा खिशात नोटा राहिल्या तर त्या शर्ट पँट सोबत धुवायलाही जातात. आधी हाताने कपडे धुतले तर त्या नोटेची पार वाट लागून जायची. आता तसे नाही. धुलाई यंत्रामध्ये कपडे धुताना जर नोट राहीलीच तर ती फक्त ओली होते, थोडीशी खराब होते. मग बाहेर काढून ती सुकवायची. किंवा मग इस्त्री करायची. नोटेला इस्त्री केली की किती मस्त कडक होते ना ती Smile. अर्थात त्याला नवीन कोर्‍या नोटेची सर नसते तो भाग वेगळा.
आणखी थोडे वेगळे प्रकार म्हणजे, नोट पुस्तकात ठेवायची सवय. त्यामुळे भरपूर वेळा एखाद्याला पुस्तक दिले तर त्या नोटा सोबत जाण्याची भीती. माझ्या एका मैत्रीणीने तर एकदा घरातील रद्दी कागदे फाडताना एका वहीतील दहा रूपयांची नोटही चूकून फाडली होती. Sad त्यामुळे मग मी नोटा फक्त खिशातील पाकीटात ठेवणे सुरू केले. तरी आता पुन्हा खिशात पैसे ठेवायला लागलोय. बदलायला पाहिजे ती सवय. Plain Face

तुम्ही नोटा घेतल्यावर कशा प्रकारे मोजता हो? डाव्या हातात बंडल पकडून उजव्या हाताच्या अंगठा व मधल्या बोटाने एक एक नोट वेगळी करून डाव्या हाताच्या अंगठा व तर्जनीने डाव्या हातात घेत मोजायची की डाव्या हातात पूर्ण बंडल पकडून एक एक नोट उजव्या हातात हस्तांतरीत करायची? की आणि काही? काहीही असो, सर्वच पद्धतीत नेमक्या नोटा मोजताना दमछाक होतेच. काही वेळा नोटा चिकटलेल्या असल्यामुळे गोंधळ होऊन जास्त नोट जाण्याची भीती. अशा परिस्थितीत आपल्याला एखादी नोट जास्त आली की खूष व्हायचे आणि आपल्या हातून एखादी नोट जास्त गेली की दु:खी व्हायचे. आपण नेहमी बँकेतून नोटा घेताना नीट मोजून घेतोच. एकदा आम्हाला दहाच्या नोटांच्या बंडलात २ नोटा जास्त आल्या. आम्ही लगेच त्या रोखपालाला सांगितले. नाहीतर काय हो? आपल्याला एखादी नोट कमी आली की आपण लगेच तक्रार करतो, मग त्यांनी चुकून जास्त नोटा दिल्या तर सांगायला नको? आता तरी बँकांकडे नोटा मोजायचे यंत्र आले आहे. त्यामुळे ह्यातील चुका नगण्य झाल्या आहेत. नगण्य ह्याकरीता म्हणालो कारण मी स्वत: ह्या यंत्रांनीही एखादी नोट कमी मोजल्याचे पाहिले आहे. त्यामुळे एटीएम मशीनमधून एखादी नोट जास्त मिळाल्याचे (५०० किंवा १००० हं, कारण आजकाल ह्याच नोटा जास्त मिळतात एटीएम मधून) स्वप्नही आपण पाहू शकतो.

असो, माझे नोटापुराण एवढेच. पण पुन्हा कोणी समारंभात नोटांचा हार बनवून किंवा दहीहंडी वगैरे ठिकाणी नोटा लटकावून ठेवत असेल तर तक्रार करण्यासोबत हे नोटापुराण त्याला ऐकवायचे ही विसरू नका. Wink

तसेच आमचे नाणेपुराण येथे वाचता येईल.

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)

एक वादळ ..

एक वादळ..

एक वादळ..थोडंसं अंधारात पडलेलं
माहीत नाही कुणाला पण प्रत्येकात दडलेलं..

उठ शोध घे, तुझ्यामधल्या वादळाचा..
विसरून जा सारं मनाविरूद्ध घडलेलं..

अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास
कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं..

अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे
नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं

निर्झर हो वाहून जा, झर-झर सारं पाहून जा
खुळ्या हळव्या डोळ्यातून, कुठे पाणी होतोस अडलेलं..

आनंदा

लोकशाहीत कायद्याचं महत्व.

"हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल."

"लोकशाहित कायद्याचे महत्व" अशा शिर्षकाचं एक पुस्तक घेवून प्रो.देसाई आज तळ्यावर आले होते.
त्यांचं ते पुस्तक अजून पुर्ण वाचून झालं नव्हतं.
मी त्याना म्हणालो.
"भाऊसाहेब,पुस्तकाच्या शिर्षकावरून मला दिसतंय सध्या जे जगात "हम करे सो कायदा" चाललं आहे
त्यावर तुम्ही कुठेतरी अपसेट झालेले दिसताय."
माझं हे बोलणं ऐकून ते म्हणाले,
"अगदी बरोबर.हे सगळे जगातले लोकशाही देश आहेत त्या देशात एक तर त्या त्या देशातले लोक तरी, नाहीतर त्या देशाचं सरकार, कायदा मोडून आपलं म्हणणं सिद्ध करायला सरसावतात.हे काही खरं नाही."
हे ऐकून मी विचारलं,
"मग भाऊसाहेब काय खरं आहे ते तर थोडक्यात सांगा."
प्रो.देसायाना माझ्याकडून ट्रिगरच हवी होती.
मला म्हणाले,

"हे बघा,अमूक अमूक गोष्टीवर माझा विश्वास असावा हे काही माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही.देवाचं अस्थित्व आहे ह्यावर माझा विश्वास असणं किंवा नसणं किंवा कदाचित तुमच्या समजुती नुसार अस्थित्व नसणं, हे पण माझा विश्वास असणं,नसणं ह्याच्या व्यतिरीक्त आहे असं म्हटलं पाहिजे.
ह्या खोलीच्या चार भिंतींच अस्थित्व आहे हे माझा त्यावर विश्वास असण्या नसण्यावर अवलंबून नाही.
ह्या भिंती जिथे आहेत त्या जागी मी जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मी नक्कीच आपटून टक्कर देणार आणि मी कितीही पोटतिडकीने त्यांच अस्थित्व नाही असं म्हणालो तरी त्यांच अस्थित्व नाकारू शकत नाही.

उलटपक्षी,माझं असं मत झालं आहे की काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यावर माझा विश्वास असुनही त्यात फरक होऊ शकतो.काही गोष्टीचं अस्थित्व असतं जोपर्यंत त्याच्या अस्थित्वावर आपल्या मनात विश्वास असतो तोपर्यंत.ह्या माझ्या म्हणण्याला उदाहरण म्हणून साम्य दाखवायला कायद्याच्या अस्थित्वाबद्दल बोलता येईल. कायदा अस्थित्वात असतो जो पर्यंत आपण सर्व मानतो की हो! कायदा आहे. आणि तो असला पाहिजे असं आपण निश्चयाने म्हणतो तोपर्यंत.
तो कायदा अस्थित्वात असतो जोपर्यंत आपण तो तसा असला पाहिजे याचा आग्रह करतो तो पर्यंत.आणि सर्वच- किंबहूना त्याच्या अस्थित्वावर विश्वास नसणारेसुद्धा- तो अस्थित्वात आहे असं समजून वागतात हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.ज्या क्षणी आपल्यातले बरेच, आग्रह धरून म्हणतील की कायदा आपल्यावर नाही, किंवा कायदा आपलं काहीही करू शकत नाही, त्या क्षणी कायद्याचं अस्थित्व संपतं. जणू एखादा साबणाचा बुडबुडा हवेत तरंगत जातो आणि मग अदृश्य होतो तसं.
कायद्याच्या अस्थित्वाचं महत्व समजूनच मी कायदा मानतो.आपल्या समाजात त्याचं अस्थित्व असणं ही आपल्या समाजाची फारच मोठी कमाई आहे.समाजात त्यामुळे शिस्त येते.
कायदा आपलं रक्षण करतो.मत-भिन्नता असली तरी कायद्यामुळे समाज चालतो.जगायला भिती वाटत नाही.

कठीण परिस्थितीत किंवा आपल्या अस्थित्वाला शह निर्माण झाला असता आपण कधी कधी समजून चालतो की कायदा आपलं संरक्षण करण्या ऐवजी आपल्याला धोका आणतोय.बऱ्याच वेळेला समाजात असे प्रसंग येतात.आणि कायदा मोडण्यापर्यंत आपली मजल जाते.पण ज्यांचा कायद्याच्या अस्थित्वावर विश्वास आहे ते कदापिही विचलीत होणार नाहित.

जो कोण कायदा मोडून दुसऱ्यावर अत्याचार करायला पहातो,तो यशस्वी होईल म्हणून, त्याला शह देण्यासाठी आपण कायदा मोडून चालणार नाही.कारण कायद्याच्या अस्थित्वावरच समाज शेवट पर्यंत टिकून राहणार आहे हे निश्चीत."
माझ्या म्हणण्याला उत्तर देवून झाल्यावर प्रो.म्हणाले,
"हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल."
नंतर आम्ही घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत