विचार

"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)

राम राम मंडळी,

माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत. तालात लयीनुसार काही खंड निश्चित केलेले असतात त्याला मात्रा म्हणतात. ७ मात्रा, ४ मात्रा, १२ मात्रा, १६ मात्रा असलेले तालाचे विविध प्रकार आहेत. धा, धीं, तीन, कत्, त्रक, गे, ना, ही तबल्यातील विविध अक्षरं आहेत, ज्याच्या साहय्याने तबलावादन आणि पर्यायाने तालवादन होते. तालाच वजन तेच राखून, मात्रांची संख्या तीच ठेवून काही वेळेला एकच ताल विविध प्रकारच्या बोलांनी, अक्षरांनी वाजवला जातो त्या ठेका असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर अशी अनेक गाणी आहेत की ज्यात केरवा हा ताल वापरला गेला आहे परंतु त्याचे ठेके मात्र वेगवेगळे आहेत! विविध ठेक्यांमुळे गाण्याच्या सौंदर्यात भर पडते.

असो, ही झाली तालासंबंधी अगदीच ढोबळ व प्रथमिक चर्चा. ताल, तबल्यातील घराणी, विविध बंदिशी, कायदे, रेले ही सर्व तालाची शास्त्रीय अंगं आहेत, त्यात आपण सध्या शिरणार नाही आहोत. तो खूपच मोठा विषय आहे व त्या बाबत सवडीने कधितरी एखादी लेखमालाच लिहायचा माझा विचार आहे. अर्थात, माझाही अजून त्यात अभ्यास सुरू आहे व तो जन्मभर सुरूच ठेवावा लागेल इतका अफाट तबला आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतात आहे! आपलं तालशास्त्र अतिशय समृद्ध आहे!

या लेखात मी संगीतातल्या 'लय' या अत्यंत अवघड अश्या विषयावर प्राथमिक भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. लय ही जरी अत्यंत सूक्ष्म गोष्ट असली तरी तिचा आवाका प्रचंड आहे. लयविचार हा संबंध संगीतालाच व्यापून टाकणारा प्रकार आहे!

संगीतातली लय आपण नंतर पाहू. पण मुळात लय म्हणजे काय हो?

बरं आधी मला एक सांगा, की हे कुठलं चित्र आहे? Smile

हे ईसिजीचं चित्र आहे हे आपण ओळखलं असेलच! डॉक्टर कशाला काढतात हो एखाद्याचा ईसीजी? तर त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची क्रिया नियमीत आहे किंवा नाही हे बघायला! म्हणजेच त्या माणसाची 'लय' कशी आहे, तो लयीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी! हृदयाची 'लय' बिघडली की जीवन बिघडलं आणि गाण्यातली लय बिघडली की गाणं बिघडलं असं समजावं! Smile

प्रत्येक माणसाची अशी एक स्वतंत्र लय असते. हा लेख वाचताना एखाद्याच्या नाडीचे ठोके हे मिनिटाला ७५ असू शकतील, तर एखाद्याच्या ८० असू शकतील. परंतु प्रत्येकाचं हृदय एका लयीत सुरू असतं. सांगायचा मुद्दा हा की 'लय' हा जीवनाचा प्राण आहे. वास्तविक हा अगदी छोटा शब्द! दोनच अक्षरी - लय! परंतु त्याची व्याप्ती अफाट आहे. डॉक्टर मंडळी हृदयाला स्टेथोस्कोप लावून हे हृदयाचं संगीत ऐकतात. 'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'! आहाहा, काय सुंदर नाद असतो हा? आपण ऐकला आहे का कधी? नसेल ऐकला तर केव्हातरी आपल्या फ्यॅमिली डॉक्टरांकडे त्यांचा जाऊन त्यांचा स्टेथो घेऊन अवश्य ऐका! Smile

'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'!

हृदयाचं काम एका छान नादमय लयीत सुरू असतं. जीवन सुरू असल्याची ती खूण आहे! हृदयाचे हे लयदार ठोके आईच्या पोटात असल्यापासून जे सुरू होतात ते अगदी शेवटचा श्वास सुरू असेपर्यंत! आमच्या गाण्याच्या भाषेत बोलायचं तर लयीची शेवटची तिहाई पडते आणि जीवनगाणं थांबतं! लय संपली, जीवन संपलं! बरं ही लय बिघडूनही चालत नाही. वर इसिजीचं जे चित्र लावलेलं आहे तो ईसीजी तेच तपसण्याकरता काढतात! पाहा मंडळी, आयुष्याचा आणि गाण्याचा किती जवळचा संबंध आहे तो. हृदयाची लय बिघडली की जगणं मुश्किल होतं आणि गाण्याची लय बिघडली की गाणं बिघडतं!

किती महत्व सांगावं हो लयीच? मला सांगा लय कशात नसते? इथे आपल्या मिपावर अनेक चित्रकार मंडळी आहेत. त्यांना विचारा की एखादं चित्र काढताना त्या चित्रातली लय किती सांभाळावी लागते ते! चित्रातही एक अदृष्य लय असते, अस्सल चित्रकार ती सांभाळूनच उत्तम चित्र साकार करत असतो. अर्थात, मी या विषयात काही जास्त बोलू शकत नाही कारण मला त्या कलेतलं काही कळत नाही, फक्त आस्वाद घेता येतो. परंतु इथे उत्तमोत्तम कवी आहेत, त्यांना विचारा की कवितेतली एखादी ओळ बांधताना लयीचं महत्व काय अन् ती किती सांभाळावी लागते! लय ही प्रत्येक कलेत असतेच, मी फक्त संगीतातल्या लयीविषयी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करणार आहे!

कुठलीही कला ही लयीशिवाय जन्मूच शकत नाही. लय ही स्वयंभू असते, कलेत अंतभूतच असते. कलेच्या अविष्कारात ती कलेपासून वेगळी काढताच येत नाही!

अहो, कलेचं एक वेळ राहू द्या, तुम्हीआम्ही तिची आपापल्या वकुबानुसार निर्मिती करतो, आस्वाद घेऊ शकतो. पण एखाद्या तान्ह्या बाळाचं काय? त्याला कळते का हो लय? Smile

एखादं अगदी तान्हं मूल जेव्हा धाय मोकलून रडत असतं तेव्हा आसपासची बरीच मंडळी त्या मुलाला जवळ घेत असतात, त्याची समजूत घालत असतात, तरीही ते गप्प होत नाही. पण जेव्हा त्या तान्हुल्याची आई त्याला हृदयाशी धरते तेव्हा ते पटकन रडायचं थांबतं, खुदकन हसतं! सांगा पाहू का बरं असं? त्या तान्ह्याला हीच आपली आई आहे, हे कसं कळतं बरं? Smile

९ महिन्यांपासून ते आईच्या पोटात असतं त्या कालावधीत ते अक्षरश: सतत म्हणजे सतत आईच्या हृदयाची ती 'लब-ढब', 'लब-ढब' ऐकत असतं! तेवढी एकच खूण असते त्याच्याजवळ. ना त्याला काही दिसत असतं, ना काही कळत असतं, ना कुणी समजून सांगायला असतं! त्याची साथ असते ती फक्त त्याच्या माउलीच्या हृदयाची एका ठराविक लयीतली नादमयता! पण तसं प्रत्येकच माणसाच्या हृदयाची धडधड सुरू असते मग ते मूल आपल्या आईच्याच हृदयाचा आवाज कसं ओळखतं? तर त्याला कारण हे की वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची लय वेगळी, प्रत्येकाच्या लयीत सूक्ष्म फरक असतो आणि मंडळी आपल्याला कदाचित अतिशोयोक्ति वाटेल, परंतु विश्वास ठेवा, ते मूल एका क्षणात लयीतला तो सूक्ष्म फरक ओळखून फक्त त्याच्या आईने जवळ घेतल्यावरच एका क्षणात रडायचं थांबतं. आईच्या हृदयाजवळची ती जागा त्याच्या ओळखीची असते आणि आपल्याकरता हीच जागा सर्वात सुरक्षित आहे हा विश्वास त्या लहानग्याकडे असतो! ती ओळख असते ती त्या ठराविक लयीची, त्या माउलीच्या हृदयाच्या 'लब-ढब', 'लब-ढब' या लयदार नादमयतेची!

एक तान्हं मूल आपल्या आईचं हृदयसंगीत ओळखू शकतं, त्यातली नादमयता ओळखू शकतं! अर्थात, हे माझे विचार नव्हेत. ते मी माझ्या गुरुजींकडून शिकलो आहे. बघा बुवा तुम्हाला पटताहेत का ते! आमचे बाबूजी नेहमी म्हणायचे की कवी हा कविता लिहितांनाच त्याची लय निश्चित करत असतो. आपण फक्त ती लय ओळखाची आणि आपल्या आवडीच्या सुरात, आवडीच्या रागात, आवडीच्या धुनेमध्ये, कवितेतल्या भावानुसार ते गाणं बांधायचं! मूळ कविताच जर लयीत नसेल तर गाणं जन्माला येणं मुश्किल आहे! असो..

खरंच मंडळी, लयीचा शोध हा अनंत आहे. आपण तिचा जितका अभ्यास करू तेवढी ती अधिक सूक्ष्म होत जाते आणि पुन्हा अभ्यास करण्याकरता मुश्किल होऊन बसते. परंतु तिचा अभ्यास, तिचा शोध कधीच संपत नाही!

असो, तर मंडळी वरील विवेचन म्हणजे लयीबद्दलचे ढोबळमानाने काही जनरल विचार आहेत. मग आता संगीतातली, गाण्यातली लय म्हणजे काय हो? तिचा अनुभव कसा घ्यायचा? तिचं सौदर्य कसं अनुभवायचं? हे आपण पुढल्या भागात पाहू!

आमचे पक्याराव, 'तात्या, लय म्हणजे काय हो?' हा प्रश्न किती सहज विचारून गेले! परंतु हा प्रश्न विचारून त्यांनी माझी किती पंचाईत करून ठेवली आहे, नक्की कुठल्या परिक्षेला मला बसवलं आहे याची त्यांना तरी कल्पना आहे की नाही, देवच जाणे! Smile

-- तात्या अभ्यंकर.

विठू सांगे...

आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।

साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।

खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।

भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।

काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।

नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।

घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।

तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।

काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।

श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।

प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।

जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।

प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।

- प्राजु.

वरील काव्य वाचून प्राजुला विरक्ती आली आहे असा गैर समज करून घेऊ नये. काही ओव्या वाचता वाचता मला या ओळी सुचल्या.. म्हणून इथे लिहिल्या.

गुरु- एक मार्गदर्षक

आज गुरुपौर्णिमा........... तेव्हा प्रथम माझ्या गुरुंना आणि श्रध्दा स्थनांना मी नमन करते.
प्रत्येक झण आपल्या जिवनात कोणाला तरी आदर्श मानुन पुढे चालत असतो. कोणी देवाला, कोणी गुरुला, कोणी एखद्या महान व्यक्तिला तर कोणि स्वतालाच. पण जीवनात सगळ्यांनाच मार्गदर्शनाची गरज असतेच. माझे आई-वडिलच माझे खरे गुरु आहेत . ज्यांनी मला या जगात 'जगण ' शिकवला. पण एकदा माझ्या एका गुरुनी मला एक गोष्ट शिकवली जी मझ्यावर खुप परिणाम करुन गेली ती मी तुमाला सांगते...........
मी शाळेत असतांना वर्गात एकदा 'सकाळी उठल्यावर प्रथम काय कराव....???' यावर चर्चा रंगली. प्रत्येक जण आपले मत मांडत होतं.
' प्रथम देवाच दर्शन (देवघरात जाउन)घ्याव' .
'कराग्रे वसते लक्ष्मी म्हणाव'.
'आईचा चेहेरा बघावा'.
'सरळ बथरुम मधे जाउन चेहेरा धुवावा'.
असे एक ना अनेक विचार मांडले जात होते. आमचा हा गों धळ ऐकुन आमच्या शिक्षिका वर्गात आल्या. आमचा चर्चेचा विषय ऐकुन त्या हसल्या व म्हणाल्या ,'आता मी माझ मत सांगु.' आम्ही सगळे त्यांच्या कडे बघु लागलो. त्या म्हणाल्या,
''सकाळी उठुन प्रथम आरशा समोर उभ रहाव, आपला 'अवतार' नीट करावा' , स्वताला नीत बघुन घ्याव न मग तुम्ही देवाच नाव घ्याव.''
आम्ही विचारल अस का....????? देवाचा किंवा आईचा चेहरा सोडुन स्वताचा चेहरा का बघावा.....??
तर त्या म्हणाल्या,'' आपला एखादा दिवस वाइट गेला ना की आपण सर्वप्रथम नकळ्त त्या व्यक्तिला दोष देतो ज्याचा चेहरा आपण सकाळी उठुन बघतो. बिचार्‍या त्या व्यक्तिचा काय दोष तुमचा दिवस वाईट गेल्यास. तेव्हा सकाळी उठुन स्वताचाच चेहेरा बघणे चांगले ना कारण आपल्या कर्माला आपणच जबाब्दार असतो. दुसरा कारण म्हणजे आपण जर आपला चेहेरा नीट करुन गेलो तर दुसर्‍यांना 'एक प्रसन्न चेहेरा' बघीतल्याचा आनंद होतो. आणि तिसरा म्हणजे तुमचा व्यस्थितपणा दिसतो'.
एवढा सांगुन त्याअ वर्गातुन निघुन गेल्या. पण त्यांचे वाक्य माझ्या मनातुन कधीच निघणार नाहीत. एका छोट्याश्या उदाहरणात त्या मला जगण्याचा एक नविन पैलु शिकवुन गेल्या.

बैल

आपण सगळेच बैल असतो
कोणीतरी फटके टाकत असतो आणि आपण पळत असतो
फक्त दोनवेळा अन्न आणिउतम निवार्‍यावर खुष असतो
मालकाच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो.
आपण सगळेच बैल असतो
मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी
त्यानी आपली पाठ झाकावी
कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो
आपण सगळेच बैल असतो
आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते
ती जाणीवच थिजलेली असते
उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते
वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो
आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो

खाली-वर, खाली-वर

.

उसळणार्‍या लाटांत
सोडून दिली एक बोट
अलगद
सोडवून घेतले बोट
वर-खाली, वर-खाली
हेंदकाळतंय पाणी
बोट...............
आता दिसतही नाही
:
मी
तिथेच.............
बोटाकडे बघत
खाली-वर, खाली-वर

====================
स्वाती फडणीस............२९-०१-२००८

मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास - भाग ३

(भाग एकः http://www.misalpav.com/node/2462

भाग दोनः http://www.misalpav.com/node/2557)

मंडळी, याआधीच्या भागात आपण पोहोचलो आहोत, इसवी सन १६०० च्या आसपास. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य ह्या संकेतस्थळाची स्थापना केली. इतर पाचही शाही स्थळांनी स्वराज्यस्थळांत अफझलडॉन, शाहिस्तेडॉन नावाचे डॉन सदस्य पाठवून वाहतूक मुरंबा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजीने एका कुशल संकेतस्थळचालकाच्या भूमिकेतून ह्या सर्व डॉन लोकांची वाट लावली. हे संकेतस्थळ सुरू व्हावे ह्यासाठी अपार मेहनत घेणारे दादोजी कोंडदेव काही कार्यबाहुल्यामुळे सदर स्थळाच्या दैनंदिन कारभारात लक्ष देईनासे झाले, तेव्हा शिवाजीने ह्या स्वराज्य स्थळासाठी नवीन अष्टप्रधान नावाचे सल्लागार मंडळ नेमले. शिवाजीचे चातुर्य बघा, ह्या अष्टप्रधान मंडळात नेमक्या आठच सदस्यांचा समावेश करण्यात आला.

परंतु सदर मंडळ स्वराज्यस्थळावर वारंवार लेखन करत नाही, अशी सदस्यांची तक्रार राहिलीच. (नव्हे, त्यातील फक्त तीनच प्रधान सदस्यांच्या रोजच्या गरजा भागवतात, अशीही तक्रार होती. परंतु महाराजांनी, "सदर अष्टप्रधानमंडळ नेमताना, आम्ही तुम्हाला विचारले नव्हते" असे जाहीर करून ह्या सामान्य - की क्षुद्र - सदस्यांची तक्रार रद्दबातल ठरवली.) ह्यातील एक प्रतापराव नावाचा प्रधान तर त्यांच्या कंपूतील फक्त सहा सदस्यांसह इतर संकेतस्थळांच्या सदस्यांवर तुटून पडतो, आणि स्वराज्य स्थळाची जी स्थैर्याची गरज आहे, ती पूर्ण करत नाही, ही तक्राररूपी खरड तर महाराजांनी स्वत:च केलेली आढळते. पण त्या खरडी आधीच, "त्या दुसऱ्या स्थळावरचे सदस्य येथे येवून काहीच्या बाही प्रतिसाद देवून जातात, त्यांची नीट तजवीज करावी" अशी खरडही महाराजांनी आपल्याला प्रतापरावांच्या खरडवहीत केलेली दिसते. आता, विरोधी स्थळाच्या धुमश्चक्रीत आपल्या प्रधानास गुंतवून घेण्यास भाग पाडल्याने महाराजांना दोष द्यावा, की पुरेशी सदस्यसंख्या स्वत:सोबत न घेऊन गेल्याने पाडाव झालेल्या ह्या प्रधान सदस्यास दोष द्यावा, हे कळणे कठीण. मंडळी, इतिहास एका सरळ रेषेत जात नाही. इतिहासाचा मागोवा असा तिरपा-तिरपाच घ्यावा लागतो. आजच्या इतिहाससंशोधकांसाठी संकेतस्थळावरील तिरप्या-तिरप्या प्रतिसादशृंखलेचा मागोवा घेणे हे यासाठीच आवश्यक ठरते.

असो. दादोजींचे नेटवर्क कनेक्षन बंद पडले. स्वराज्यस्थळाच्या चालकांना नवीन उपदेशकाची चणचण भासू लागली. ती पोकळी "रामदास" ह्या सदस्याने भरून काढली. हे सदस्य तसे यऽयऽयऽयऽ सीनीयर. म्हणजे सदर स्थळाचे ऑफिशियल उपदेशक म्हणून नियुक्त होण्याआधी, त्यांनी "मन्याचे श्लोक" नावाची काव्यरचना आपल्या "मन्या" नावाच्या बोक्यासाठी रचली होती. (सदर सदस्य लग्नाच्या वेदीवरून पळून गेले अशी त्यांची ख्याती असल्याने, सर्व स्त्रीजातीप्रती त्यांची नाराजगी आधीच व्यक्त झाली होती. कुठल्याही मांजरीसाठी त्यांनी "मनीचे श्लोक" लिहिल्याची इतिहासात नोंद नाही. ह्यावरून स्त्रीजातीप्रती त्यांच्या घृणेची खात्री पटावी.) हे मन्याचे श्लोक त्यांनी सर्व भुजंगप्रयात नावाच्या वृत्तात रचले. त्यावरून त्यांची यऽयऽयऽयऽ सीनियॉरिटी लक्षात यावी.

हे सदस्य स्वराज्यस्थळावर नियमीत लिखाण करीत नव्हते. ह्याचे कारण "भांडारकर हुच्चविद्या संशोधक मंडळ" नावाच्या इतिहास संशोधकांच्या कंपूला कळते, ते असे. एक तर रामदास हे सदस्य "शिवथर घळ" नावाच्या ठिकाणी राहायचे. तिथे नेटवर्क कनेक्टिव्हिटी तशीही कमीच. त्यामुळे अधून मधून सज्जनगड नावाच्या ब्रॉडबॅण्ड हबला जायचे तेव्हा काही खरडी स्थळचालकांच्या खरडवहीत टाकायचे, आणि पुन्हा कनेक्षनविहीन व्हायचे. पण जाहीरपणे खाजगी विचार लिहिण्यास युक्त अशा खरडवहीचा वापर गुप्त संदेश पाठवण्यासाठी करण्यात रामदास खूपच माहीर झाले होते. ह्या ऐतिहासिक खरडवह्यांतून संशोधित एकच खरड बघितली की आपल्याला सदर सदस्याची माहिरी लक्षात येईल. ही खरड स्वराज्य स्थळावरच्या एका आगामी संकटाची नांदी म्हणून समर्थांनी (हे ह्या सदस्यांचे दुसरे टोपणनाव. अनेक टोपणनावांनी संकेतस्थळांवर वावरण्याची पुरातन प्रथा अशी आपल्या इतिहासात वारंवार दिसून येते) स्वराज्यस्थळाच्या चालकांना लिहिलेली होती.

संकटातुन दूर व्हावे
जो जे वांछील ते करावे
पद्याला प्राधान्य द्यावे
राजमार्गी पद ठरावे
वारूणीमाजी रमावे
नेणत्यामागून जावे
दिन असे जरि जात जावे
लेउनी वस्त्रे जरी ती
ली घराण्यास शरण जावे ।।

चंगळी तव विलीन व्हावे
चीन मध्ये लीन ऱ्हावे
परखुनी सगळे असावे
रतिछायाचित्र द्यावे
तरिही ना मीन व्हावे
कधिही न मागे सरावे
रागिणी आलापून अपुली
वीण जपुनी धुंद व्हावे ।।

मंडळी, कुठल्याही संकेतस्थळचालकाला त्याच्या उपदेशकाने दिलेला पद्य उपदेश म्हणून आपण सर्वसाधारण सदस्य ही खरड वाचू. परंतु, रामदास ह्या सदस्याला अनन्यसाधारण कविश्रेष्ठता तर होतीच, परंतु आपल्या कविगुणांचा (दहा पैकी दहा गुण, नेहमीच) वापर जाहीर माध्यमांतून करूनही खाजगी (म्हणजे प्रायव्हेट) संदेश पोहोचवण्यात हा सदस्य अत्यंत कुशल होता. अजूनही आपल्याला वरील खरडीतून रामदासांनी स्वराज्यस्थळाच्या चालकाला दिलेला गुप्त संदेश लक्षात आला नसेल, ह्याची आम्हाला खात्री आहे. (एक हिंट देतो: सदर खरडीतील ज्या काव्यपंक्ती आहेत, त्यातील प्रत्येक पंक्तीतील पहिले अक्षर एका वाक्यात जुळवावे, संदेश लक्षात येईल.)

परंतु सदर उपदेशक मौजूद असतानादेखील स्वराज्यस्थळावर संकट आले ते आलेच. दिलेरडॉन आणि मिर्झाडॉन ह्या नावाचे दोन सदस्य स्वराज्यस्थळावर येऊन सदस्यांना त्रास देऊ लागले. सर्व सदस्य पुन्हा एकदा चालकांना खरडीमागून खरडी लिहू लागले. महाराजांनी पुरंदरकंपूतील मुरारबाजी ह्या सदस्याला सदर डॉनांची खबर घेण्यास धाडले. पण कळफलकावरचे दोन्ही हात निकामी झाल्यामुळे दिलेरडॉनाने त्याचा पाडाव केला. (हस्तविहीन सदस्य शिरविहीन सदस्यापेक्षाही अनुपयुक्त.) महाराजांनी शेवटी हार पत्करली, आणि पदपातशाही ह्या स्थळावर आम्ही दिवसाला दोनदा रागमालिकेविषयी लेखन करू, असा तह केला. परंतु त्यांच्या लेखनाला पदपातशाहीतील सदस्यांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेना. (रागमालिकेविषयी साक्षात औरंग्याडॉन मख्ख. त्याच्या स्थळाचे सदस्य सदर रागमालिकेला काय प्रतिसाद देणार?) "आमचे स्वतंत्र स्थळ असोन, आम्ही तुमच्या स्थळावर लेखन करण्यास तयार जाहलो असोन, तुमची एवढी मोठी सदस्य संख्या असोन, आम्हास योग्य तो प्रतिसाद मिळत नाही" अशा खरडी पदपातशाहीच्या चालकाला, म्हणजे अौरंग्याडॉनला महाराजांनी लिहिल्या, परंतु त्या खरडींचे काहीही उत्तर नाही, असे पाहून महाराजांनी काहीतरी गेम करायचे ठरवले. आपल्या टोपणनावाखालून हिरोजी नावाच्या आपल्या फर्जंदाला प्रतिसाद द्यायला लावून महाराज त्या स्थळावरून सटकले, ते कायमचेच. मंडळी, आपल्या टोपणनावावरोन आपल्या फर्जंदांना आपल्या नावडत्या संकेतस्थळावर प्रतिसाद द्यायला लावोन आपण तेथोन पळते होणे, हीदेखील आपली थोर परंपरा महाराजांनी सतराव्या शतकात सुरू केली, हे आपल्यासारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना विसरोन चालणार नाही.

आम्ही वर्णन केल्याप्रमाणे सदर स्वराज्यस्थळ अनेक घटिका-पळे चालले. परंतु, ह्या चालकांना मात्र सदर स्थळाने उत्तरेतल्या गुरगाव येथील निर्मित स्थळाचा स्वत: स्थापन केलेल्या स्थळाने केलेला पाडाव बघण्याइतके आयुष्य लाभले नाही. उत्तरेतील संकेतस्थळांचा पाडाव झाला, ते पुढच्या शतकात. त्याचा आढावा आपण पुढच्या भागात घेऊया.

महाराज स्वत:चे स्थळ उत्कृष्टपणे चालवण्यात इतके मग्न झालेत, की त्यांचे स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. सदर स्थळ त्यांच्यामागे कुणी चालवावे, ह्याचे नियोजन करण्यात ते कमी पडले. मंडळी, ह्या इतिहासाचे अवजड ओझे बाळगून आपल्याला शिकायला मिळते, ते हेच, की स्वत:चे संकेतस्थळ बहरीला येऊन तेथील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल, तर आपले नेटवर्क कनेक्षन पुढेमागे गुढगी ह्या डिनायल-ऑफ-सर्विसने बंद पडल्यास ह्या संकेतस्थळाचे बिझिनेस-कंट्युनिटी-प्लॅनिंग आपण आपले नेटवर्क व्यवस्थित असतानाच करणे आवश्यक असते.

महाराजांनी हे केले नाही, आणि मग पुढे स्वराज्य ह्या स्थळावरील संभाजी आणि राजाराम ह्या दोन कनिष्ठ सदस्यांमध्ये हे स्थळ कुणी चालवावे, ह्याबद्दल मतभेद निर्माण झाले. आणि हे सदस्यलेखनाधारित संकेतस्थळ पुढे श्रीवर्धनातून आलेल्या एकमेव संपादकाच्या एकाधिकारशाहीत परिवर्तित झाले. ते पुढे येईलच.

(अर्थात सदस्यांची मर्जी असेल तर: क्रमश:)

फुकटची फौजदारी

मागील दोन लेखांना मिळालेले प्रतिसाद वाचल्यानंतर फक्त एक प्रतिसाद लिहिण्यापेक्षा एक नविन प्रकटन लिहावे असे मनात आले. म्हणून हा लेखन प्रपंच.
------------------------------------------------------------------प्रोफेशनल कोर्सेसच्या ऍडमिशन पिसीबी किंवा पिसीएम च्या बारावीच्या मार्कांवर होत नाहीत.सीइटी नावाच्या अत्यंत स्पर्धात्मक परिक्षेच्या मार्कांवर होतात..बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सुमारे तीस पुस्तके अक्षरशहा पिंजून काढल्यावरच १८०+(/२००)मार्क मिळतात.मागच्या वर्षी राजीव गांधी मेडीकल कॉलेज (क़ळवा )चा कट ऑफ१८५/२०० होता.दहावीत ९०% सरासरी मिळवलेल्या शंभर मुलांपैकी सरासरी दोनच मुले हे करू शकतात.
माझा रोख ६०%मिळवणार्‍या विद्यार्थ्यांवर नाही. आपल्या गत आयुष्यातील असंख्य कारणानी चुकलेल्या आणि हुकलेल्या संधींचा आणि त्या अपेक्षापूर्तीचा डोंगर , मनोवृत्ती,कुवत व कल न बघता आपल्या पाल्यावर टाकणार्‍या पालकावर होता.
प्रोफेशनल कोर्सेस म्हणजेच सब कुछ आणि बाकी सब झूठ हा गैरसमज कारणीभूत आहे.यातूनच डोनेशनचा दैत्य उभा राहतो आणि घरदार धुवून काढतो.
गेली आठ वर्षे दरवर्षी सुमारे दिडशे शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवासखर्च , बिदागी, फूल किंवा फूलाची पाकळी ,शाल , नारळ न घेता पदर मोड करून माझा एक कार्यक्रम मी करतो. त्याचा सारांश असा ९०%मिळाले तर माजू नका६०%मिळाले तर लाजू नका. हा कार्यक्रम मरेपर्यंत करणार हा निर्धार. माझ्या बायकोच्या भाषेत ही फुक्कटची फौजदारी करायला कुणिही साथीदार मला मिळाला नाही. मिपा च्या सर्व सदस्यांचे ह्या उपक्रमात स्वागत आहे.रामदास येण्याची दाट श़क्यता आहे.
माझ्याच एका विद्यार्थीनीला दहावीत फक्त ६५% आणि एमएससी पार्ट वन मध्ये८१% .
फक्त शनीवर आणि रविवार च्या कामाचे सुमारे पंधरा हजार रुपये ऑफर करताना मला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा.प्रोफेशनल कोर्सेस म्हण्जेच सगळं काही ही समजूत दूर करण्यासाठी हे उदाहरण मी इथे दिलंय.
त्रिकालाबाधीत सत्य फक्त जीवन आणि मरण , बाकी सर्व ठिकाणी काहीना काहीतरी खोट राहतेच,माझ्या मनोगतातील सर्व विधानांना कुठे ना कुठे तरी अपवाद मिळणारच यात शंका नाही. बघा ना पुरुषाला पण मूल झालेच असं नुक्तच पेपरात वाचलं.
हे सगळं सत्य एका किंवा दोन परीच्छेदात सांगणं कठीणच आहे.मराठी साहित्यातील महानायक असलेल्या पुलंना त्यांच्या एका विधानात बंदिस्त करणे धार्ष्ट्याचे ठरेल.विदारक सत्य आपणच मांडायच आणि नंतर आपणच त्याची चेष्टा करायची हे फक्त पुलंनाच जमायच.
दहावीला साधे गणित ही कल्पना पुलंनी डोक्यावर घेतली असती. त्यांच्या कवि मनाने बालपणी गणित विषयाचा किती छळ सहन केला असेल. कुणास ठाऊक? आणि ह्या अत्यंत सुंदर कल्पनेला हिरीरीने विरोध करणारी असंख्य मंडळी पण मिळतील.
अभ्यासात केवळ गणितामुळे मागे पडणार्‍यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे एक नविन चांगले पाऊल.

दहावीचे मार्क आणि करीयरचे पुढील पर्याय ह्या बाबतीत पालकांचे गैरसमज रोज पाहतो मग ९०% असोत वा ६०%.
हे गैरसमज दूर करण्याच्या मोहिमेत सामील होण्यासाठी मिपाच्या सर्व सदस्यांना हार्दीक आमंत्रण.
जाताजाता दहावीनंतरच्या करीयरच्या काउंसीलींगला ताशी बावीस हजार पाचशे मोजणार्‍या पालकांना लवून कुर्नीसात.
तिसरीतल्या गोजीरवाण्याची ऍप्टीट्युड टेस्ट घेणार्‍या पालकांना साष्टांग दंडवत घालून आज इथेच थांबतो.
http://www.misalpav.com/node/2475
http://www.misalpav.com/node/2536
http://www.misalpav.com/node/2536#comment-34743
या लेखासोबत आधीचे लिखाण आणि प्रतिसाद पण वाचा. धन्यवाद.

पांडेकर आजी..

लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.

"वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै. गणपत पाटील यांच्यासारख्या आवाजात हाक ऐकू आली की आई म्हणते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. अतिशय प्रेमळ. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्‍याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्‍यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. त्यामुळे कोल्हापूरतील राजारामपुरी पोलिस स्टेशन मध्ये ओळख आहे बाईची. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्‍याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. झाडांवर अतिशय माया. तिच्या सोबतीला म्हणजे ती बॉबी कुत्री आणि माय-लेकरं असलेली वेगवेगळ्या डोळ्यांची मांजरं..
हे प्राणीही जणू आजी एकटी आहे तिला आपल्याशिवाय कोणी नाही हे जाणूनच असल्यासारखे...
आंब्याच्या सिझन मध्ये मोठाले येणारे पायरी आंबे राखायला बाई, दिवसरात्र बागेत बसून असते. २ खोल्यांमध्ये बिर्‍हाड ठेवल्याने सोबतही होते आणि मामांच्या तुटपुंज्या पेन्शन शिवाय मिळकतही होते थोडिफार.
गॅस ला नंबर नोंदवायचा असेल किंवा काही बँकेची कागदपत्र समजावून घ्यायची असतील तर हळू हळू धिम्या गतीने चालत चालत आजी येते आणि आईकडून किंवा घरी जे कोणी असेल त्याच्याकडून वाचून किंवा फोन लावून घेते. एक मात्र, तिची ही जी काहि कामं आम्ही करतो त्याच्या बदल्यात ती झाडाचे आंबे, लिंबं, शेवग्याच्या शेंगा आणून देते. सगळ्या जगाला ती तिच्या बागेत येणारी फळ विकते पण आमच्याकडून एक पैसाही नाही घेत. मी कधी गेले कोल्हापूरला तर मला आवडते म्हणून शेवग्याच्या शेंगांची तिखट, खमंग भाजीही करून आणून देते. यामध्ये कोणताही दिखाऊपणा नाही . पण झाडांबद्दलचं प्रेम आणि अभिमान अपार.
"आजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्तच झाली आहे .."
" मग! हुनारचं की, माझ्या झाडाच्या शेंगा हैत.. लई दळदार.. त्या बाजारच्या नव्हत, चवळीवानी!!" असं चिरक्या आवाजत पण ठसक्यात उत्तर मिळेल .
या बाईचं उत्पन्नाचं साधन म्हणजे, मामांची पेन्शन, येणारं घरभाडं आणि आंबे, लिंबं, शेंगा, पेरू... श्रावणात जाई-जुई, मोगर्‍याची फुलं विकून मिळणारि रक्कम. कॉलनीतली लोकं सुद्धा त्या बाईला जपतात.. बाजरातून शेवगा, पेरू आणून खाण्यापेक्षा आजीकडूनच घेतात. भलेही स्वत:च्या बंगल्यातल्या बागेतून टोपलीभर फुले निघू देत पण सत्यनारायण, मंगळागौरी, आणि गणपतीच्या पूजेला घरोघरि फुलं येतात ती आजीच्या बागेतली. त्यामुळे तिचा तिच्या झाडांबद्दलचा अभिमानही द्विगुणीत होतो आणि मग म्हणते..
"माझ्या मोगर्‍या वानी मोगरा कुट्टं मिळायचा न्हाई. परवा, शेजारची सुजा आल्ती.. ५० रूप्पयची फुलं घ्यून गेली बगा.." त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात असतो.
मध्येच एकदा आजी अशीच आली घरी.. " वयनी...... हैसा काय??"
"या आजी.. आई नाहिये.. या ना बसा जरा" .. मी
"ताई, कुटं गेली आई, येनार हायका लवकर??" .. आजी
"येईल १० मिनीटात. बसा तरी." .. मी
हा संवाद होईपर्यंत आजी जेमतेम बंगल्याचं गेट उघडून आत आलेलि असते. तिला चालायला खूप वेळ लागतो.. वयोमाना प्रमाणे येते तिच्या गतीने. मग ती आत येईपर्यंत मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते. आजी आत येते, नेहमीच्या ठरलेल्या दाराजवळच असणार्‍या खुर्चीजवळ बसते. याचं कारण, दाराजवळच्या खुर्चीतून तिला तिच्या घराकडे लक्ष ठेवता येतं खास करून आंब्याच्या किंवा पेरूच्या सिझनमध्ये. कारण घराच्या मागे असणार्‍या झोपडपट्टितली मुलं ताबडतोब येतात दगडं मारायला. आणि एखादा दिसलाच आंब्यावर किंव पेरूवर दगड मारणारा.. तर.. टिपेच्या चिरक्या स्वरातून ती त्याला शिवी हाणते.. बिचार्‍याला आजी कुठून ओरडते आहे ते दिसतही नाही, आवाज मात्र ऐकू येत असतो. बिचारा इकडं तिकडं बघत निघून जातो.
आजी बसते, काठी ठवते.. मग एकदम म्हणते.."इवडी इवडी झालित आता.. ३-४ दिवसांत पिकली की, आनून देतो हां"
"काय इवडी इवडी झालित आजी? काय आणून देताय??" मी.
"अगं बाई माजे, पिरू गं... इवडी झाल्येत.. आता पिकतील छान.. देतो आनून".. 'इवडी' असं अंगठा आणि इंडेक्स (मराठी??) बोट दाखवत आजी म्हणते.
"हो, पण आजी मी विकत घेणार पेरू.. असेच नकोत मला" मी..
" न्हाइ गं बाई.. माजी प्वोर हायस.. म्हायेरी आलियास.. विकत नक गं बाई.." आवाजात जास्तीत जास्त मार्दव आणून आणि व्याकुळ होत आजी म्हणते.
मला तिचं मन मोडवत नाही. मी 'बर' म्हणते.
तिला कधीतरी औषधं, बिस्किट आणून हवी असली तर येऊन सांगते "ताई, तू भाइर गेलिस तर माजी इवडी औषदं आनि ती मारिची मिळत्यात तसली बिस्किटं बी आनशील ??" पैसे पुढे करते. मी घेत नाही. "आजी, अहो आहेत पैसे.."
"नगं.. हे घ्यून जा. " हातात कोंबते पैसे. मिही फारशी खसखस न करता ते घेते कारण त्यातून तिचा मला स्वाभिमान दिसतो. माझ्या पैशानी औषधं आणायची.. बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना.
या बाईचं मला आश्चर्य वाटतं.. काहीही होऊदे... पण तिचं कुत्र, तिची मांजरं.. आणि तिची बाग... या बद्दलचा तिचा अभिमान हा सतत असतो बोलण्यातून. दुसरा विषय म्हणून नाही.
या आजीची एक लकब आहे. ती खुर्चित बसली ना तरी डाविकडे उजवीकडे अशी डुलत असते. बहुदा तिच्या उतरत्या वयामुळे होत असावं.. जशी डॉ. श्रीराम लागूंची मान हलते तशी आजी खांद्याच्या रेषेत डुलत असते.
"बरं.. मी यू का आता?" आजी
" का हो बसा ना.." मी
" नगं.. राधा आणि सखी ( मांजरी आणि तिचं ते पिलू) येतील हितं हुडकत.. जातो आता" आजी. खरंच बरं का मंडळी, एकदा हि राधा आणि सखी आल्या होत्या आजीच्या मागोमग आणि आजी उठेपर्यंत कंपाऊंड वॉलवर बसून होत्या.
आजी उठते तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, काठी घेते आणि निघते. मी उठून आत येते आणि जवळ जवळ १० मिनिटांनी फाटकाचा आवाज होतो.. आजी आता कुठे गेटच्या बाहेर पडलेली असते हळूहळू तिच्या चालीने..
दुसरे दिवशी पुन्हा चिरक्या आवाजात हाक ऐकू येते.. "वयनी.. हैसा काय??"

- प्राजु

मिसळपाव - एक व्यक्तिगत इतिहास - भाग २

(पहिल्या भागात: आपण ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुळकर्णी ह्यांनी स्थापन केलेल्या मराठी संकेतस्थळापासून पुढे सुरुवात करूया. ज्ञानेश्वरंाचे स्थळ "क्रमश:" लिखाणांसाठी प्रसिद्ध होते. दर एपिसोडला भगवद्गीतेच्या एका अध्यायाचे मराठीकरण करण्याचा संकल्प सोडलेल्या ज्ञानेश्वरांचे दर लेखाशेवटी "क्रमश:" असे वाचून वाचकवर्ग कंटाळलेला होताच, पण तरीही, सदर स्थळचालकांचा हिरमोड होऊ नये, आणि फुकट वाचायला मिळते आहे, ते मिळावे, वर्गणी द्यायला लागू नये, म्हणून प्रतिसाद देतच होता. शेवटी ही "ग्यानबाची मेख" ज्ञानेश्वरांच्या लक्षात आली, आणि सदर संकेतस्थळावरील लेखन स्वत:च बंद करून त्यांनी समाधी घेतली. अशा समाधीला सध्या "वाचनमात्र होणे" असे म्हणतात. अशा समाधीतून परत येणे शक्य आहे, परंतु त्यासाठी स्थळाच्या सदस्यांनी आग्रह करणे आवश्यक आहे. असा आग्रह ज्ञानेश्वरांना कुणी केला नाही, ही तत्कालीन संकेतस्थळसदस्यांची घोडचूक आपल्याला नजरेआड करून चालणार नाही.)

इसवी सन १२०० ते १६०० : फारसे काही घडलेच नाही. नाही म्हणायला, ज्ञानेश्वराचे संकेतस्थळ विस्मृतीत गेले. मंडळी, फक्त एकाच्या लिखाणासाठी चौघांनी चालवलेले स्थळ कितीसे चालणार ? संकेतस्थळ चालायला फक्त एकाचे लिखाण चालत नाही, तर एकापेक्षा अधिक लेखक आणि अनेक वाचक आणि प्रतिसादक असावे लागतात. ज्ञानेश्वराच्या संकेतस्थळावरचे अनेक वाचक प्रतिसाद द्यावा की नाही, ह्या दुविधेत. दुसरे, सदर लेखक हा, तत्वज्ञान आणि कविता एकाच क्याटेगरीखाली लिहायचा. त्यामुळे वाचकांना समजून घेणे कठीण व्हायचे. ही परिस्थिती आपल्याला अजूनही हैराण करते, नाही का? कुणी एखादी कविता "जे ना देखे रसिक" च्या ऐवजी "गुरांतलं, ढोरातलं" ह्या क्याटेगरीत टाकलं, की साहित्यप्रेमींना काय करावं ते अजीबात सुचत नाही. आणखी एक म्हणजे, हा लेखक कुण्या "बापरखुमादेवीवरू" चे नाव प्रत्येक लेखनाच्या शेवटी सिग्नेचर म्हणून टाकायचा. सर्वसामान्य वाचकांना हे कळायचेच नाही. अजूनही, "स्वरभास्कराय नम:" म्हटले, की काही सदस्यांचा "हे स्वरभास्कर कोण? ते मिले सुर मेरा तुम्हारा वाले? ते गायक आहेत होय?" असा घोळ होतोच.

पण ह्या काळात मराठी संकेतस्थळांची दुर्दशा झाली, हे नाकारून चालणार नाही. सर्व स्थळांच्या चालकांनी संपादनाच्या बाबतीत प्यासिव्ह भूमिका घेतली. स्वत: नेमणूक केलेल्या संपादकांवर स्थळ सोपवून स्वत: बुधवार - शनिवार संध्यादि कर्मकांडात मग्न झाले. आणि हळूहळू सर्व मराठी संकेतस्थळे फारशी नियंत्रणाखाली गेली. (फारशी काय, चालकांनी नेमलेल्या ह्या संपादकांच्या नियंत्रणात पूर्णपणे गेली म्हणाना!) "मराठीतले फारशी शब्द - भाग २५६७" अशा प्रकारचे लेख येऊ लागलेत, तेव्हा वेळ गेलेली होती. सर्व मराठी स्थळे अमराठी झाली होती.

ह्या कालावधीच्या अंतास एकनाथ, तुकाराम नावाचे विडंबनकार होऊन गेले. ज्ञानेश्वराच्या साहित्याची विडंबने त्यांनी स्वत:च्या स्थळावर प्रकाशित केलीही. पण ती तेव्हा फारशी लोकप्रिय झाली नाहीत. मूळ कविताच समजून घ्यायला वाचकवर्ग तयार नव्हता (दरवेळी दुवे देऊन देखील.) मग ही विडंबने वाचायला वेळ कुणाला ? सगळे वाचक तत्कालीन चालकवर्गाच्या मर्जीत राहण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत होते. त्यावरही कडी म्हणजे एकनाथ हे विडंबनकार गाढवांना पाणी पाजणे वगैरे तथाकथित लोकोपयुक्त कामे करायचे. मंडळी, विडंबनकाराला हे शोभत नाही. मराठवाड्यातील लोकांनी त्यांना वाळीत टाकले नसते, तरच नवल! ज्ञानेश्वरांचे साहित्य लोकाभिमुख व्हावे वगैरे म्हणून त्यांतील संकल्पनांची भारुडे नामक विडंबने करणे वगैरे एकीकडे, पण सदर स्थळांवर गाढवांना देखील इतर सदस्यांसारखे वागवून त्यांना पाणी देण्याइतपत ह्या काळातील विडंबनकारांची बेतखल्लुफी वाढली होती. ला हौल बिलाकुवत !

तुकारामाचीही हीच गत ! स्वत:चे संकेतस्थळ स्थापावे, त्यावर तत्कालीन गूगलचे ऍडसेन्स टाकून अर्थप्राप्ती करवून घ्यावी असा आवली (ह्या सदस्येचे "तुकापाव" ह्या स्थळावरचे टोपणनाव सुभाषिणी असे होते, असे मंबाजींच्या लेखनातून कळते) नावाच्या सल्लागाराचा सल्ला सदर स्थळचालकाने उधळून लावला. उलट मंबाजी ह्या क्रिटिकाला स्वत:च्याच स्थळावर सदस्यत्व उपलब्ध करवून देऊन त्याने स्वत:चे घर असे निंदकाच्या शेजारी बंाधले. दुसरे म्हणजे सदर चालक, तत्कालीन लोकप्रिय संकेतस्थळाच्या विठ्ठल ह्या चालकाकडून विमान येईल, आणि आपल्याला त्या स्थळावर सदस्यत्व मिळेल, ह्या आशेतच जगत आलेला. स्वत:चे संकेतस्थळ सांभाळणे त्याला कठीण गेले, ह्यात काय नवल ? मंबाजी ह्या क्रिटिकाने शेवटी स्वत:चे रंग दाखवले. "तुकापाव"चे अख्खे विदागार पाण्यात टाकून "विदागाराचा अपघात" अशी वर मल्लीनाथी केली. पण विठ्ठलानेच त्याच्या विदागारातील कालातीत विडंबनांचे गूगलवर संचित करून त्याची लाज राखली. आणि वर विदागार तरंगल्याचा आभासही निर्माण केला. तेव्हा मंबाजीचा कात्रज होऊन, तोही "तुकापावा"वरचा आजन्म सदस्य झाला. असे असूनही, तुकारामाचे संकेतस्थळ चालले, ते नंतर स्वराज्य ह्या संकेतस्थळावरील दुवे तेथील सदस्यांनी टिचकावले, तेव्हा. (ते पुढे येईलच.)

एकच समाधानाची बाब अशी, की ह्या फारशी संकेतस्थळचालकांतच पाच कंपू निर्माण झाले. नंतर प्रत्येकांनी आपापली वेगवेगळी संकेतस्थळे उभारली. त्यांना "शाही" असे नामकरणही ह्याच काळात झाले. प्रत्येक मराठी लेखकाने आपापली "शाही" स्वीकारली. एका लेखकाने, दोन शाह्यंामध्ये मनसबदारी स्वीकारणे चुकीचे समजले जाऊ लागले. "निजामशाहीत पूर्वप्रकाशित साहित्य आदिलशाहीत प्रकाशित केलेले चालणार नाही" अशी ह्या स्थळांच्या चालकांनी भूमिका घेतली. असे पूर्वप्रकाशित साहित्य सदस्यांनी दोन अगर त्यापेक्षा अधिक स्थळांवर प्रकाशित केल्यास सरळ "डिलीट" ही कळ वापरण्यात येईल, अशा नवसाहित्यिकांना धमक्या मिळू लागल्या. त्यामुळे प्रत्येक मराठी नवसाहित्यिकाने आपापले "शाही" स्थळ निवडले. वरवर कारण देताना "निजामशाहीतील प्रशासकीय अनुमतीच्या जाचामुळे आम्ही हल्ली कुतुबशाही स्वीकारली आहे" असे जाहीर प्रतिसाद येऊ लागले. ह्या दोन्ही शाह्या एकमेकाच्या मावसभगिनी आहेत असे विचार जाहीरपणे मांडणे शक्यच नव्हते. कारण "खरडवही" हे जाहीरपणे खाजगी लिखाण करण्याचे माध्यम तेव्हा उपलब्ध झालेले नव्हते. खाजगी मतभेदांचा जाहीर कोथळा काढणे, हे "स्वराज्य" ह्या स्थळावर पहिल्यांदा शक्य झाले. (ते पुढे येईलच.)

इसवी सन १६०० (च्या आसपास): छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. मराठीचे खास असे एखादे संकेतस्थळ असावे, ह्या विचाराने उचल खाल्ली. ह्यापूर्वीच्या स्थळांमध्ये मराठी वाचकवर्ग भरपूर होता, परंतु चालकवर्ग मात्र सगळा फारशी. मराठी संकेतस्थळ एखाद्या मराठी चालकाने चालवावे, असा विचार इसवी सन बाराशेनंतर पहिल्यांदा झाला. हे संकेतस्थळ व्हावे हे तो श्रींची इच्छा, असे जाहीर करूनही बरेच दिवस "स्वराज्य" हे संकेतस्थळ अनेक वर्षे एका फारसी चालकाच्या स्थळावरील (निजामशाही ह्या स्थळावरील) कंपू म्हणून चालले. ह्या कंपूचे नायक शिवाजी भोसले ह्यांना दादोजी कोंडदेवंासारख्या जुन्या-जाणत्या सदस्यांचे सहकार्य लाभले (हे संकेतस्थळ सुरू होण्याआधी दादोजींनी "एक्स-निजामशाही" नावाचा याहू-ग्रुप सुरू केला होता, असे इतिहास सांगतो.) सदर फारशी स्थळचालकाचे लक्ष नाही, असे पाहून तोरण्याला सदर कंपूचा कट्टा झाला. आणि तेथे "स्वराज्य" ह्या नवीन मराठी संकेतस्थळाची स्थापना झाली. ह्या कट्ट्याचा वृत्तांत गोपनीय राहावा, लगेच प्रकाशित होऊ नये, ह्याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे निजाम ह्या फारशी स्थळचालकाला आपल्याच स्थळावरचे सदस्य व्यनिंच्या माध्यमाने आपल्यापासून फोडण्यात आले आहेत, ह्याची काही म्हणजे काहीच जाणीव झाली नाही. (भविष्यात ह्यातून संकेतस्थळचालकांनी शिकण्यासारखे म्हणजे, स्वत:च्या स्थळावरील सदस्यंाचे व्यनि चोरून वाचत राहावे. असली बंडे लगेच लक्षात येतात.)

सदर स्थळ बरेच दिवस चालले. मध्यंतरी ह्या स्थळाच्या कारभारात खंड घालण्याचा इतर प्रस्थापित स्थळांनी बराच प्रयत्न केला. आदिलशाही ह्या स्थळाच्या चालिका बडी बेगम, ह्यांनी तर अफजलखान नावाचा एक महाभयंकर "डॉन" शिवाजीचे स्थळ मोडून काढण्यास धाडला. त्याने ह्या स्थळाच्या सदस्यांचे श्रद्धास्थान असलेल्या एका तुळजाभवानी नावाच्या सदस्येवर आपल्या घाणेरड्या प्रतिसादांतून हल्ला करून इतर सदस्यांस चिथावणी दिली. परंतु, स्वराज्य स्थळाचे चालक शिवाजी भोसले, ह्यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. पुढे सदर स्थळचालकही ह्या डॉन ला घाबरून आहेत अशी बातमी त्यंानी पसरवली. शिवाजी भोसल्यांच्या खरडवहीत अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली. पण ते गप्पच राहिले. शेवटी, अफजलखानाने "काव्य शास्त्र विनोद" अशा सर्व साहित्यावर आपले विखारी आणि जळजळीत प्रतिसाद टाकून स्वराज्यस्थळ मोडकळीला आणले असताना, चालकांनी त्यांना व्यनि टाकून खरडवहीत भेटूया, असे लिहिले. अफजलखानाने काही खरडी लिहिल्या, शिवाजीने काही. शेवटी, एका खरडीतच खानाचा कोथळा बाहेर पडला. सर्व सदस्यंानी तो वाचला, आणि "हरहर महादेव" असे सगळीकडून प्रतिसाद आले. काही मावळ्यंानी "हरहर महादेव" असे न म्हणता, फक्त "असेच म्हणतो" किंवा "+१" असे प्रतिसाद दिलेत. त्यांची योग्य ती खरड महाराजांनी काढलीच. सदर मावळे सध्या कुठल्याच स्थळावर नाहीत. फक्त वाचनमात्र आहेत.

ह्या स्थळांच्या स्पर्धेत सदस्यसंख्या जास्त म्हणून अधिक अग्रगण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या पदपातशाही, ह्या स्थळावरून आलेल्या एका बलाढ्य सदस्याने स्वराज्यस्थळावरच्या सर्वाधिक लोकप्रिय अशा पुण्यनगरीतील एका कट्ट्यावरच आपले बस्तान जमवले. कुणीही "आहिस्ता आहिस्ता" अशा गजला केल्या, की "शाहिस्ता, शाहिस्ता" अशी त्याची विडंबने केलीत. महाराज हे सर्व बराच काळ फक्त बघत होते. शाहिस्ताच्या लेखनाचे संपादन होत नाही, ह्या सदस्यंाच्या तक्रारीकडेही त्यांनी बरेच दिवस दुर्लक्ष केले. एकदा शाहिस्त्याने आपल्या कंपूसह स्वराज्यस्थळावरच कट्टा केला. त्याची छायाचित्रे तो स्वराज्याच्या संकेतस्थळावर चढविता झाला. पण रात्रीतून बघतो काय, तर कुणीतरी प्रत्येक छायाचित्र तीन बोटे कापलेले. इतिहासप्रेमींनो, ही कारागिरी आपल्या स्थळचालकांची, बरे का ? आपली चढवलेली छायाचित्रे अशी कापलेली पाहून शाहिस्ता स्वराज्य स्थळावरून नाहीसा झाला, तो कायमचाच!

(सदर स्थळचालकांची मर्जी असेल, तर: क्रमश:)

काय करु

8> मला एक मुलगा आहे
आणी माझी अशी इच्छा आहे कि मी एक मुलगी अडॉपट करवी
क्रुपया मला सल्ला द्यावा