प्रतिक्रिया
माया की माया
प्रेषक मराठे ( मंगळ, 03/16/2010 - 00:27) .निर्लज्जपणाची हद्द!
"पुतळा उभारणीवर टीका करणार्यांना मी विचारते की, जिवंत माणसांचे पुतळे उभारू नयेत असं कुठल्या पुस्तकात लिहिलेय?" - इती (जिवंतपणी स्वतःचा पुतळा स्वतःच उभारणारी) मायावती
आपल्या देशात करदात्याच्या पैशाचा अपव्यय कधी आणि कसा होतो ह्याचं आणखी एक उदाहरण. मायावतीचा २०० कोटींचा हार .नुसता राग राग होतोय. तिकडे कुठल्यातरी गावात जेवण आणि कपडे मिळणार म्हणून चेंगराचेंगरीत लहान मुलं मरतात आणी इथे हे !!!
जाता जाता: जर युपीवाल्यांकडे इतका पैसा आहे तर मुंबईत कशाला येतात? का हा पैसा मुंबईतूनच तिकडे गेला आहे?? असं असेल तर आणखीनच तळतळाट!
विंदांकडून काय घ्यावे?
प्रेषक चिंतातुरजंतू ( सोम, 03/15/2010 - 13:54) .वक्रतुंड महाकाय गणपतीच्या
सोंडेकडे पाहून (अश्लील वाङ्मय
चोरून वाचणार्या) एका प्रमदेला
कामेच्छा झाली
तिचे दोन्ही मोदक स्तन
चट्टदिशी घट्ट धरून
वक्रतुंड महाकाय गणपतीने
तिला एकवीस वेळा आकाशात गरगर
फिरवली
आणि जेहेत्तेकालाचेठायी
श्लील नामक घोर नरकामध्ये
फेकून दिली.
दचकलात? संपादित करायला हात शिवशिवू लागले? दुखावण्यास भावना सरसावल्या? थोडे थांबा. ज्यांना श्रध्दांजली वाहायला गेल्या चोवीस तासांत शेकडो धावले असे गूगल सांगते, त्या विंदांच्या लेखणीतून ही विरुपिका उतरली आहे. विरुपाचे रूप दाखवणार्या या विरुपिकेस १९७३ साली प्रसिध्दी मिळाली आणि त्याविषयी वादही झाले. तेव्हा खुद्द विंदांनी त्याविषयी जे निरुपण केले, ते असे (अधोरेखिते आमची):
‘सत्यकथे’च्या ऑगस्ट १९७३च्या अंकात माझ्या पंधरा कविता प्रसिद्ध झाल्या. त्यातल्या काही ‘विरूपिका’ होत्या. त्यातील ‘वक्रतुंड महाकाय’ या शब्दांनी सुरू होणार्या विरूपिकेसंबंधी आपल्या समाजातील काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आढळल्या. प्रथम पुण्याच्या वर्तमानपत्रांत तिच्याविरुद्ध पत्रे व लेख येऊ लागले. नंतर काही जिल्हापत्रांनी तिच्याविरुद्ध अग्रलेख लिहिले. पाठोपाठ सांगली व बार्शीसारख्या शहरांतून कवीचा व संपादकांचा निषेध करणार्या सभा व मोर्चे झाले. एका नगरपालिकेने व काही महिला मंडळांनी निर्भर्त्सना करणारे ठराव पाठवले. भावे-माडगूळकरांनी अध्यक्षस्थानावरून प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वैयक्तिक धमकावण्या आल्या.
माझ्या पुस्तकांची होळी करण्यात आली. हे सर्व इतके जलद व पद्धतशीरपणे होत गेले की, त्या माझ्या दहा ओळींच्या कवितेतील विशिष्ट मजकुरामुळेच हे घडत आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण वाटावे. या सर्व प्रकारांत प्रतिगामी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतलेला आढळला. या संधीचा फायदा उठवून जनतेपासून अलग पडलेल्या प्रतिगाम्यांचा भक्तिभावनेच्या आधाराने पुन्हा एकदा जनतेशी जवळीक साधण्याचा हा एक प्रयत्न तर नव्हे?
काही असले तरी त्या कवितेच्या रूपाविषयी, तिच्यातील आशयाविषयी व तिच्या लेखामागील माझ्या हेतूविषयी काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे किंवा तो करून दिला जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या कवितेसंबंधी माझी भूमिका संबंधित लोकांनी शांतपणे समजून घेतली तर हा सर्व विरोध अनाठायी आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईल.
पहिली गोष्ट म्हणजे ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका आहे; रूढ चाकोरीतील कविता नव्हे. अभिव्यक्तीचा एक नवा प्रकार शोधण्याचा हा प्रयत्न आहे. अर्वाचीन चित्रकलेत प्ररूपीकरण (अॅब्स्ट्रॅक्शन), प्रवाहीकरण (सर्रिअॅलिझम) व प्रकल्प (फँटसी) या प्रक्रिया वेगवेगळय़ा पद्धतीने प्रकट होताना आढळतात. तशाच स्वरूपाच्या बंदिश शब्दांच्या साहाय्याने निर्माण करता आली तर पाहावी, ही त्या अंगातील अनेक विरूपिका लिहिण्यामागील माझी प्रमुख प्रेरणा होती. प्रस्तुत विरूपिका ही अल्प प्रमाणात प्ररूपीकरणावर व मुख्यत: प्रकल्पावर आधारलेली आहे. वास्तवाच्या अंगाने- म्हणजे गणपती प्रत्यक्षात जसा दिसतो तशा अंगाने- तिच्याकडे पाहणे चुकीचे आहे. माझा हेतू गणपती किंवा प्रमदा यांचे यथातथ्य चित्रण करणे हा नसून, विशिष्ट प्रकारच्या प्रकल्पनातून एका व्यापक आशयाला भिडण्याचा, निदान त्या व्यापक आशयाकडे झेपावण्याचा आहे.
तो व्यापक आशय असा : जीवनाचे अंशदर्शन घेऊन त्यात रमणे हीच खरी विकृती आहे. अश्लील आणि श्लील असे द्वैत कल्पिणे म्हणजे जीवनाच्या व्यापक व एकात्म साक्षात्काराला पारखे होणे, शरीराचे अवयव सुटे-सुटे पाहिले की अभद्रता जाणवते, पण एकात्मतेने पाहिले की सौंदर्याचा प्रत्यय येतो; तसेच
जीवनाचे व कलेचेही आहे. जीवनाच्या एकात्म साक्षात्कारात अश्लील व श्लील या सुट्या कल्पनांचा कायाकल्प होतो. ही साकल्यवादी दृष्टी निकोप प्रकृतीच्या माणसामध्ये व पर्यायाने श्रेष्ठ कलाकृतीमध्ये
अभिप्रेत असते. या विरूपिकेतील ‘प्रमदा’ ही ‘अश्लील वाङ्मय चोरून वाचणारी’ आहे; त्यामुळे तिचे मन विकृत झाले आहे आणि तिचे मन विकृत आहे म्हणूनच मंगलाचे दर्शन घेत असताना ती अमंगल वासनेच्या आहारी जाते. अश्लील वाङ्मयाचा चोरटा आस्वाद घेणार्या सर्वच विकृत स्त्री-पुरुषांची ती
प्रतिनिधी आहे. अशा लोकांचे स्थित्यंतर झाले तरी अश्लीलाच्या नरकातून निघून श्लीलाच्या नरकात जाऊन
पोहोचतात : एका प्रकारच्या अंशदर्शनातून दुसर्या प्रकारच्या अंशदर्शनाकडे. फक्त निकोप वृत्तीची माणसेच
जीवनाचा व कलेचा साकल्याने व एकात्मवृत्तीने वेध घेऊ शकतात. मंगलाच्या दर्शनात अमंगल वासनेच्या आहारी जाणार्या त्या प्रमदेला गणपती शिक्षा करतो. तिला श्लीलाच्या नरकात फेकतो. ते करीत असताना त्याच्या मनात तिच्या स्तनांविषयी कोणतीही अमंगल भावना नसते. हे सूचित करण्यासाठीच ‘मोदक’ हा शब्द स्तनांच्या उल्लेखामागे आहे. या मोदकाशी संबंधित असलेली भावनेची छटा पावित्र्याची आहे, नैवेद्याची आहे. हे सूचित व्हावे, यासाठी पुढे वेगळ्या संबंधांत ‘एकवीस’ हा शब्द
मुद्दाम योजलेला आहे. कारण नैवेद्य एकवीस मोदकांचा असतो. ‘जेहेत्तेकालाचेठायी’ या शब्दांनी हे सर्व चित्रण प्रकल्पनाच्या पातळीवरचे आहे, वास्तवाच्या पातळीवरचे नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सूचित केली आहे. कारण हरदासी कथेमध्ये अशक्यप्राय घटनांना त्या शब्दांनी उठाव दिलेला असतो. सारांश, या विरूपिकेचा आशय विकृतीचे खंडन करणारा आहे; विकृतीचे मंडन करणारा नाही व तिच्या लेखनामागील हेतू कोणत्याही प्रकारे गणपतीची (अप्रतिष्ठा करणे नसून - आमचा अंदाज; मूळ शब्द उपलब्ध नाहीत) नेमका उलट आहे : गणपतीचे मंगल स्वरूप गृहीत धरल्यामुळे कवीने त्याला अमंगलाचा निखंदक म्हणून उभा केला आहे.
पण मी गणपतीच का निवडला? गणपतीची बीजकथा (मिथ) ही विरूपिकेतील आशयाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण वाटली म्हणून. या विशिष्ट काव्यप्रकाराला मी विरूपिका म्हणत होतो आणि गणपतीला आपल्या परंपरेत कुठे तरी ‘विरूपांचा विरूप’ म्हटले गेल्याचे स्मरत होते. शिवाय या लिखाणात अर्थाचे उलटसुलट पलटे होते; म्हणून परस्परविरुद्ध अर्थाच्या कक्षा सूचित करील अशी बीजकथा मला हवी होती. गणपतीची बीजकथा त्या अर्थाने संदर्भ-श्रीमंत होती. गणपती हा आर्यांचा होता, तसाच अनार्यांचा होता; वैदिकांचा होता, तसाच व्रात्यांचा होता. ऋग्वेदातील अभ्युदयेच्छू ऋषी त्याला ‘गणनांत्त्र गणपती’ व ‘कवि कवींनां’ म्हणत होते, तर यजुर्वेदातील गमेंच्छु स्त्रिया त्याला ‘आत्वं अजासि गर्भधं’ असे आवाहन करीत होत्या. एका बाजूने तो कुलप्रतिकाशी (टोटम) संबंधित, तर दुस-या बाजूने आदिम साम्यवादी गणराज्याशी, स्मृतिकारांचा गणपती बुद्धिहर्ता व विघ्नकर्ता तर पुराणांचा गणपती बुद्धिदाता व विघ्नहर्ता. तांत्रिकांचा वामाचारी, तर संतांचा मूर्तिमंत मांगल्य. पार्वतीने आपल्या अंगावरील मळातून या मंगलमूर्तीची निर्मिती केली. या एका आख्यायिकेतच जणू काय गणपतीच्या आयुष्यातील सर्व संक्रमणे सूचित होऊन जातात. शिवाय गणपतीची बीजकथा अजून पूर्णपणे गोठलेली नाही; सार्वजनिक गणपती अजूनही वाटल्यास गांधी टोपी घालू शकतो! म्हणूनच या गणपतीच्या आधारे काव्यात्म प्रकल्पनाचे आवश्यक ते स्वातंत्र्य व श्लील-अश्लीलाला छेद देणारे मांगल्याचे तत्त्वसूचन ही दोन्हीही मला साधता आली. शिवाय, अशी गोष्ट मी या कवितेत प्रथमच केली असेही नव्हे. विनोदी अंगाने माझ्या काही बालगीतांत व गंभीर अंगाने
‘हिमयोग’सारख्या माझ्या कवितेत हा गणपती पूर्वीही आलेला आहे. नवकाव्याला समृद्ध करणार्या अनेक मार्गांपैकी प्राचीन बीजकथांचा व प्रतीकांचा सृजनशील उपयोग हा एक प्रभावी मार्ग आहे, असे मी नेहमीच मानीत आलो आहे. या बीजकथांतील शब्दांचा वेध रूढ चाकोरीतून घेतल्यास ज्या गफलती होतात, त्याचेच हे प्रकरण म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
काव्याचा सूक्ष्म विचार करण्याची सवय व सवड नसलेल्या सामान्य नागरिकाला या वेगळ्या रीतीने शब्दवेध घेणे थोडेफार कठीण जात असेल, याची मला कल्पना आहे. त्यामुळेच प्रतिगाम्यांना माझ्याविषयी, संपादकांविषयी व त्या कवितेविषयी गैरसमज पसरविणे शक्य झाले असावे. ते गैरसमज दूर व्हावेत, या हेतूनेच हे सर्व लिहीत आहे. गणपती हा माझ्याही सांस्कृतिक वारशाचा एक अभिन्न भाग आहे; गणपतीच्या परंपराप्राप्त कथा, अष्टविनायकांच्या व इतर शिल्पांमधून त्याचा आढळणारा रूपविलास व त्याच्या वास्तव रूपाशी संबंध असलेली प्रतीकात्मकता, ही सर्व मलाही इतर भारतीयांइतकीच प्रिय आहेत. ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका लिहिताना माझ्या मनात गणपतीची अप्रतिष्ठा करावी किंवा सश्रद्ध माणसांच्या भावना दुखवाव्या, असा पोरकट हेतू बिलकूल नव्हता; माझा हेतू, व्यापक व एकात्म अशा गंभीर जीवनदृष्टीकडे अंगुलिनिर्देश करणारा एक गमतीचा व वेगळा आकृतिबंध निर्माण करावा, एवढाच होता.
विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्यप्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही; ते एक स्फुरण असते. विकसनाच्या व बहुरूपत्वाच्या अनेक शक्यता त्यात सामावलेल्या असतात. हळूहळू त्या प्रगट होत जातात आणि त्यानंतर समीक्षेच्या दृष्टीने सोयीची वाटणारी अशी त्याची व्याख्याही घडविली जाऊ लागते; पण ती व्याख्यासुद्धा कामचलावू, कार्यकारी व्याख्याच असते, हे विसरता कामा नये. ती अपरिवर्तनीय नसते. कोणत्याही काव्यप्रकाराची तर्कशुद्ध व्याख्या ही गोष्ट तर्कदृष्ट्याच असंभवनीय आहे. कारण स्वत:ची ओळख पटविण्याइतपत साकल्याधिष्ठित स्वत्व (आयडेंटिटी) त्याच्याजवळ कमी-जास्त प्रमाणात असले, तरी एखदा प्राणभूत गुणधर्म अथवा सत्त्व (इसेन्स) किंवा फक्त त्याचे असे व्यवच्छेदक लक्षण (डिफट्रिया) त्याच्याजवळ नसते.
(गो. वि. ऊर्फ विंदा करंदीकर यांच्या, ‘परंपरा आणि नवता’ या ग्रंथातून साभार)
आता वाचकांनी यातून काय बोध घ्यावा? अनेक शक्यता आहेत, जसे:
- थोडे आधी सांगायचे; यांनाही कतारला पाठवले असते.
- शेवटी यांचेही पाय (कोंकणांतल्या फोकलिच्यांनी कुले असे वाचावे) मातीचेच निघाले. (कडवे डावे) विचारवंत कडू ते कडूच, ज्ञानपीठात तळा किंवा लोकप्रियतेत घोळवा.
- ते हिंदू आहेत; त्यांना असे म्हणण्याचा हक्क आहे. (नास्तिक असले म्हणून काय झाले?)
- आम्हांस ऋषितुल्य असलेल्या विंदांविषयी ते मेल्यावर असे वाईटसाईट पसरवणार्यासच चोपला पाहिजे. सूचना: आम्ही हे प्रहारमधून उचलले, त्यामुळे आधी नारायण राण्यांस चोपा. आम्हांस आनंदच होईल
- विंदा काय बोलले काही कळत नाही ब्वॉ. जाऊदेत आपण आपले मेलेल्यास नमस्कार करून मोकळे व्हावे, हे बरे.
जगजीत सिंग मला काही खास वाटत नाही
प्रेषक शुचि ( शनी, 03/13/2010 - 19:19) .चराग आफताब गुम
बडी हसीन रात थी
शबाबकी नकाब गुम (नकाब=बुरखा)
बडी हसीन रात थी (ध्रु)
मुझे पिला रहे थे वो
कि खुदही शम्मा बुझ गयी
गिलास गुम शराब गुम
बडी हसीन रात थी (१)
लिखा था जिस किताबमें
कि इश्क तो हराम है
हुई वही किताब गुम
बडी हसीन रात थी (२)
लबसे लब जो मिल गये (लब=ओठ)
लबसे लब जो सिल गये
सवाल गुम जवाब गुम
बडी हसीन रात थी (३)
गाणं ऐकलं पुढील दुव्यावर - http://www.youtube.com/watch?v=dyRYqXCBBvs
इतकं सुंदर आणि रोमँटीक गाणं पण जगजीत सिंग च्या आवाजाने न्याय दिलायसं मला तरी वाटलं नाही. जगजीत सिंग नी "वोह कागझ की कश्ती" गाणी च गावीत असं वाटतं.
अजून एक उदाहरण -
"बाझीचा - ए-अत्फाल गझल ऐका जगजीत सिंग ची - http://www.youtube.com/watch?v=fIxsi7BmjgE
"बाझीचा - ए-अत्फाल गझल ऐका शुजात हुसेइन खान ची - http://www.youtube.com/watch?v=9RuIKZef8-g
शुजात हुसेइन खान च किती तरी पटीनी सुश्राव्य आहे जगजीत सिंग च्या पेक्षा.
आपलं मत ऐकायला आवडेल.
बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो,
प्रेषक शशिकांत ओक ( शनी, 03/13/2010 - 11:20) .आधीच्या नाडीग्रंथांवरील अदभूत कथनाच्या धाग्यावरील माझा प्रतिसाद इतका खोल गेला की त्या मुळे दुर्लक्ष होऊन मी प्रतिसादाला उत्तर दिले नाही असा संशय येऊ नये. म्हणून येथे नवा धागा टाकत आहे. राग नसावा.
ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत. तरी त्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे.
पुण्यात कुठे जावे लागेल?
किती खर्च येईल?
नाडी बघण्याआधी स्वतःची काय आणि किती वैयक्तिक माहिती द्यावी लागेल?
नाडी वाचनाला किती दिवस लागतील?
फक्त भूतकाळच सांगितला जातो की भविष्यकाळही सांगितला जाईल?
किती तपशीलात जाऊन सांगितले जाईल?
नाडीवाचन खरे ठरले नाही तर पैसे परत मिळतील का?कृपया, कळवणे. वाट बघत आहोत.
बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो,
आपणाला नाडी केंद्रांचे पत्ते द्यायला मला शक्य आहे पण ते या ठिकाणी दिले तर जाहिरात बाजीचा आरोप होईल असे वाटून मी असे सुचवतो की आपण नाडी ग्रंथ भविष्य पुस्तक वाचावे. नितीन प्रकाशन, अप्पा बळवंत चौक, पुणे. किं ५०.
त्यात पुण्याच्या केंद्रांचे पत्ते व अन्य माहिती आहे.
आपण पुण्यात आहात तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे. मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे.
फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे. ती तशी का वा अन्य आपल्या विचारणा आपण त्यांच्या कडून समजून घेतलेल्या बऱ्या. तमिळजाणकाराला बरोबर न्यावे. म्हणजे नाडी पट्टीतील नावे शोधायला मदत होईल. केंद्राला फोटो काढून देण्यास विनंती करावी. त्याची कॉपी नंतर उपयोगाला येईल.वही देणार का विचारावे. काही कारणांनी ते देत नसतील तर देणाऱ्या केंद्रात जावे. काही कारणानी पट्टी सापडत नसेल तर दुसऱ्या केंद्रात जाऊन सापडेपर्यंत शोध घ्यावा.
आपणांस आणखी एक विनंती आहे की नाडी केंद्रात पट्टीचा शोध होण्या आधी महर्षींना प्रार्थना करावी आम्ही आपली परीक्षा घ्यायला आलेलो नाही. आपले आशीर्वाद मिळावेत यासाठी व पुढील आयुष्यासाठी काही मार्गदर्शन मिळावे म्हणून आलो आहे. कृपा करावी.
हार व फुले घालता आली व दीप दर्शवता आला तर चांगले. आपला अनुभव कळवावा. आपण केंद्रात असताना प्रत्यक्ष भेटता आले तर आवडेल.
अभिनंदन आणि हाबिनंदण
प्रेषक प्रदीप ( शुक्र, 03/12/2010 - 17:30) .अभिनंदन--- निर्धाराने पाठपुरावा करून २००२ सालच्या 'बाली बाँबिंग'मागील प्रमुख सूत्रधार दुलामतिन ह्या दहशतवाद्याचा शेवट केल्याबद्दद्ल इंडोनेशियन सरकारचे. गेल्या काही वर्षात हे सरकार दहशतवादाविरूद्ध अत्यंत निर्धाराने खंबीर पाऊले उचलत आलेले आहे.
हाबिनंदण-- आपल्या खंबीर सरकारचे. अलिकडे नक्शलवाद्यांनी केलेल्या (आणखी) एका हल्ल्यानंतर त्यांना टक्कर देण्याचा आपला निर्धार अजून बळावला आहे, असे त्याने जाहीर केले आहे, म्हणून. ह्यानिमीत्त, 'बच्चे लोग, ताली बजाओ!'
लग्नाचा वाढदिवस..कसा साजरा कराल...???
प्रेषक मोकाट वळू ( गुरू, 03/11/2010 - 23:41) .राम राम मन्डळी,
लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करन्यासाठि आपल्या भन्नाट कल्पना सुचवा...!!!
'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 19:29) .नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
चंद्रगड आणि ऑर्थरसीट
प्रेषक बज्जु ( गुरू, 03/11/2010 - 17:22) .चंद्रगड आणि ऑर्थरसीट
चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच.
थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला. महाराजांना ही माहिती समजताच त्यानी मोर्यांना माफ करुन स्वराज्यात येण्याची विनंती केली. पण मग्रुर मोर्यांनी महाराजांनाच उलट निरोप पाठ्वला तुम्ही उद्या येणार असाल तर आजच या, आमचा प्रदेश महाभयंकर जंगलानी वेढ्लेला आहे. जावळीला येताच तुम्ही आमच्या मुठित याल, आम्ही तुमचा सपशेल पराभव करु वगैरे वगैरे. अखेर महाराजांनी मोर्यांच पूर्ण पारिपत्य केलं आणि जावळी व आजुबाजूचा परिसर स्वराज्यात सामील करुन घेतला. मुळचे "येता जावली, जाता गोवली" हे वाक्य बखरीत चंद्रराव मोरे यांच्या तोंडी आहे. असो हा झाला थोडक्यात इतिहास. आता इतिहासातुन थोडे बाहेर येउ.
शनिवारी सकाळी ६.३० ला आम्ही चौघे जण मारुती ८०० घेऊन निघालो. साधारण १०.३० पर्यंत महाड्ला आलो. तिथे यथेच्छ मिसळपाव, चहा हाद्डून पुढे पोलाद्पूर - कापडा फाटा मार्गे, ऊमरठ या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्म ठिकाणी आलो. ऊमरठला येईपर्यत ११.३० वाजुन गेले.
ऊमरठ
![]()
नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीचे प्रवेश्द्वार
![]()
नरवीर तानाजी आणि शेलारमामा यांची समाधी
![]()
तानाजी आणि शेलारमामा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे ढवळे गावात जाण्यासाठी निघालो. ढवळे गावातुनच पुढे चंद्रगड आणि ऑर्थरसीटला जायचे होते. ढवळे गावात यायाला दुपारचे १२.३० झाले. गावातील एका घरात जेवणासाठी व रहाण्यासाठी चौकशी केली. जेवून साधारण ३.०० च्या सुमारास चंद्रगडावर जाण्यासाठी निघालो. ५-१० मिनीटातच चंद्रगडाचे पहिले दर्शन झालं.
ढवळे गावातुन जवळच असलेल्या धनगरवाड्यात पुढची वाट विचारुन घेतली आणि १५ मिनीटातच गडाच्या मुख्य चढणीला लागलो. पुढ्ची वाट दाट झाडीतून जाणारी होती. पण वाटेवर "हरी ओम" चे बोर्ड झाडाला लावलेत असं धनगरवाड्यातील लोकांनी सांगुन ठेवलं होत, त्यामुळे वाट शोधायला लागली नाही.
वाटेत एके ठीकाणी चंद्रगड दर्शन अशी पाटी दिसली. या पाटीपासुन चंद्रगडाच्या माथ्यापर्यंत सगळा अंगावरचा चढ आहे. वाटेत घसाराही भरपुर आहे.
साधारण अर्ध्यातासात चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर ऊघड्यावर पडलेले देव, पाण्याचे टाके व कड्याच्या पोटात लपलेली छोटीशी गुहा या व्यतिरिक्त काही नाही. माथ्यावरुन ढवळे गाव, ढवळी नदी, आजुबाजूचा रायरेश्वर पर्यंतचा परिसर आणि आमचे दुसर्या दिवशीचे टार्गेट ऑर्थरसीट फार सुरेख दिसत होते.
मागील रांगेत महाबळेश्वरचे ऑर्थरसीट
![]()
संध्याकाळी पाचच्या सुमारास चंद्रगडाहून निघालो ते पुन्हा ढवळे गावात यायला ६.३० झाले.
दुसर्या दिवशी सकाळी चहा प्यायला, पाणी भरुन घेतलं आणि मामांचा निरोप घेऊन आम्ही तिघेजणं ऑर्थरसीटकडे रवाना झालो. आमच्यापैकी एक, संदीप, गाडी घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला ऑर्थरसीटला घ्यायला येणार होता.
चालायला सुरवात केली आणि साधारण एक तासाने लक्षात आलं कि आपण वाट चुकलो आहोत
, पुन्हा गावाच्या दिशेने मागे फिरलो, अर्ध्या वाटेत आलो तेव्हा कुठे शेतात काम करणारा एक माणूस भेटला, त्याला म्हंट्ल जरा वाटेला लावून द्या पण शेतातलं काम सोडून यायला तो तयार होईना, अगदीच हातापाया पड्लो तेव्हा तो तयार झाला पण अर्ध्या वाटेत असलेल्या सापळखिंडीपर्यंतच आपण येऊ असे त्याने सांगितले. सापळखिंडीपर्यंत त्या मामाने कुठ्ल्या वाटेने आणले ते आजपर्यंत काही लक्षात येत नाही. पण वाटेला लागलो हे नक्की. मामाला निरोप दिला, जाता जाता पुढ्ची वाट विचारुन घेतली. तोपर्यंत भरपुर वेळ निघुन गेली होती. सापळखिंडीचा चढ काही संपता संपत नव्ह्ता.
सापळखिंड - केव्हा संपणार हा चढ ?? 
![]()
दुपारी दोन वाजून गेले तेव्हा कुठे आम्ही सापळखिंडीचा चढ चढुन बहिरीच्या देवांपाशी आलो. येथून एक ते दिड तासात ऑर्थरसीटला पोहोचू असा अंदाज होता. जवळ्चे पाणी संपत आले होते पण बहिरीच्या देवांपाशी पाण्याची टाकी आहेत हे माहीत होते. पण ती टाकी काही आम्हाला कुठे दिसली नाहीत. ऑर्थरसीटला जाणारी वाट त्या टाक्यांच्या मागुनच जाते त्यामुळे पाण्यासाठि जास्त वेळ न घालवता लगेच निघायचे ठरले. पुन्हा एक दिड तास चालल्यावर लक्षात आले कि आपण चुकत आहोत, बराच वेळ निघून गेला होता. आत्ता जवळ पाणीही अगदी कमी होते आणि वाटही मिळ्त नव्ह्ती. शेवटी चारही दिशेला वाटा शोधून दमलो आणि लक्षात आलं कि आज काही आपण ऑर्थरसीटला पोहोचू शकत नाही. आज जंगलातच झोपाव लागणार, ऊद्या सकाळी ऊठून काय ते बघू. रात्र झाली, जंगलातून वेग्-वेगळे आवाज यायला सुरुवात झाली (बहुदा पक्षी आणि रातकिडे) पण त्याचे विशेष काही वाट्ले नाही. तसेच उघड्यावर झोपलो. तशी उघड्यावर झोपायची सवय होती म्हणा. पण नुकताच मलेरियातुन ऊठ्लो होतो म्हणुन जरा काळजी.
पहाटे ऊठून नव्या ऊत्साहाने पाण्याची टाकी शोधायला सुरुवात केली आणि १० व्या मिनीटाला आम्ही टाक्याला पोचलो जी आद्ल्या दिवशी २ तास प्रयत्न करुनही मिळाली नव्हती.
भरपुर पाणी पिऊन, बाट्ल्या भरुन निघालो. १५ मिनीटात पहिला चढ चढला आणि समोर एकदम दरीच आली. हेच ते सावित्रीचं खोर.
ईथून २५-३० मिनीटात ऑर्थरसीटला पोहोचणार होतो.
![]()
आता ऑर्थरसीटच्या अगदी जवळ आलो, नजरेच्या टप्प्यात. ऑर्थरसीटला ऊभे असलेले लोक कौतुक मिश्रीत आश्चर्याने आमच्याक्डे बघत होते. हे इक्डुन कुठून आले ? असेच भाव त्यांच्या चेहर्यावर होते.
![]()
आम्हाला घ्यायला आलेला संदिप रात्री ऊशिरा पर्यंत आमची वाट बघून शेवटी क्षेत्र महाबळेश्वरला जाऊन झोपला, तो दुसर्यादिवशी सकाळी पुन्हा आम्हाला घ्यायला आला. धन्य त्याची
अशातर्हेने "येता जावली, जाता गोवली" हे वाक्य वाट चुकल्यामुळे आमच्या बाबतीत खरे ठरले.
गडप्रेमी बज्जु
ता.क.: कॅमेरातील लेन्समध्ये काहीतरी तांत्रीक बिघाड झाल्याने फोटो धुरकट आलेले आहेत.
शब्दबंध २०१०
प्रेषक बेसनलाडू ( बुध, 03/10/2010 - 10:21) .२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================
२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.
मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.
शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)
लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.
- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ
२२ जून १८९७
प्रेषक मराठे ( मंगळ, 03/09/2010 - 20:15) .काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रीमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती.
ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.)
पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला. चित्रपटाच्या शेवटी अपेक्षित परिणाम साधला गेला नाही असं मला वाटतं. त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं. कदाचित त्यामुळेच आपल्या मनातील चाफेकर बंधूंची आणि लो. टिळकांची प्रतिमा आणि सिनेमात दाखवलेली प्रतिमा ह्यांचं समीकरण फारसं जुळलं नाही.
तुमच्या पैकी कोणी हा चित्रपट पाहिलंय का? तुमची मतं ऐकायला आवडतील.


