संगीत

डॉ.विद्याधर ओक

डॉ.विद्याधर ओक हे नांव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुपरिचित आहे. स्व.गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेच, शिवाय प्राचीन शास्त्रीय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा संशोधक, या क्षेत्रात नव्या दिशा चोखाळणारा आणि दाखवणारा द्रष्टा, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणारा उद्योजक अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख करून द्यावी लागेल. हंसतमुख प्रसन्न चेहेरा, हजरजबाबीपणा, नेमक्या शब्दात आपल्या मनातला आशय बोलून व्यक्त करण्याची कला, श्रोत्यांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची हातोटी वगैरे अनेक पैलू त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वात आहेत. त्यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या खास हार्मोनियमसंबंधी सादर केलेल्या लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनला हजर राहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी जे पहायला आणि ऐकायला मिळाले त्याचा गोषवारा देण्याचा हा प्रयत्न आहे.

अणुशक्तीनगरमधील 'संवाद' तर्फे हा कार्यक्रम तिथल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ही मुख्यतः वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची वसाहत असल्याकारणाने बहुतेक श्रोते मंडळींकडे वैज्ञानिक चिकित्सक पध्दतीने विचार करण्याची वृत्ती होती. त्याचप्रमाणे रविवार संध्याकाळच्या अमूल्य वेळेचा सदुपयोग हिंडणे फिरणे, बाजारहाट, खाणेपिणे, नाटक सिनेमा यासारख्या लोकप्रिय गोष्टीत न करता किंवा घरबसल्या टीव्हीवरील खास कार्यक्रम पहाण्यात तो न घालवता हे लोक या कार्यक्रमाला आले होते यावरून त्यांना संगीताची आवड, जुजबी माहिती किंवा निदान श्रोत्याचा कान तरी निश्चितच होता. ही बाब श्री. ओकांच्या लगेच लक्षात आली आणि त्यांनी आपल्या संभाषणाची सुरुवात तिथूनच केली.

आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये शालेय शिक्षणाच्या अखेरीस कला आणि विज्ञान यांची फारकत केली जाते. किंबहुना आर्टस आणि सायन्स एकमेकांच्या विरोधात असल्यासारखे दाखवले जाते. संगीताचा समावेश कलाविषयात होत असल्यामुळे त्याचा विज्ञानाशी कसलाही संबंध नाही असेच समजले जाते. गायन किंवा वादन शिकण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी विज्ञानाची गरज पडतही नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आजपर्यंतच्या कोणा महान कलाकाराला सुध्दा त्या विषयाच्या मागच्या विज्ञानाचा अभ्यास करावा असे वाटले नसेल. परंपरागत भारतीय संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांना विज्ञानाची पार्श्वभूमीच नव्हती असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की ध्वनिशास्त्रानुसार कोठलाही नाद किंवा ध्वनी याला विवक्षित कंपनसंख्या असते. या कंपनसंख्येच्या आधारानेच आपले श्रवणयंत्र तो नाद ओळखते आणि तो नाद स्मरणात साठवला जातो. एकामागोमाग कानावर पडणा-या नादांच्या कंपनसंख्यांमध्ये सुसूत्रता असेल तर त्यातून संगीत निर्माण होते आणि ती नसेल तर तो गोंगाट होतो. बोलण्यातून किंवा गाण्यातून जे ध्वनी निर्माण होतात त्याची कंपनसंख्या किती असते ते कांही आपल्याला आंकड्यात समजत नाही, पण चांगला गवई सुरात गातो आहे हे आपल्या कानाला जाणवते त्याचे कारण त्याच्या सुरांच्या कंपनसंखांमध्ये सुसंगती असते. कसून रियाज करून त्याने ते साध्य केलेले असते.

समोर बसलेल्या श्रोत्यांना विज्ञान आणि कला या दोन्ही विषयात गती आहे हे ओळखून त्यांना समजेल अशा पध्दतीने श्री. ओकांनी आपले विवेचन केले. त्यांनी स्वतः विज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना ध्वनिशास्त्राची चांगली माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी संगीतावर विचार केला. सा रे ग म प ध नी हे स्वर एकमेकांपासून कसे वेगळे आहेत आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे एकादा गवई ते स्वर गाऊन किंवा वादक वाजवून दाखवतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता त्यांच्या कंपनसंख्याचे अंक समजून घेऊन त्यांच्या समूहांकडे पाहिले तर त्यातील आंकड्यांना जोडणारी सूत्रे शोधता येतात. विद्याधररावांनी संशोधकाला लागणा-या चिकाटीने हे जिकीरीचे काम केले. पाश्चात्य जगात सुरुवातीपासूनच विज्ञान आणि गणिताचा थोडा संबंध होता असे दिसते. त्याचाही त्यांनी अभ्यास केला.

हार्मोनियम या वाद्याचे शिक्षण त्यांनी लहानपणापासूनच घेऊन त्यांनी त्यात प्राविण्य मिळवले होते. त्याचबरोबर हार्मोनियम हे 'टेंपर्ड स्केल' प्रमाणे ध्वनी निर्माण करणारे वाद्य असल्यामुळे विशुध्द शास्त्रीय संगीताला ते योग्य नाही अशी टीका ते सतत ऐकत होते. नेमके हे कसते वैगुण्य आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला. त्यात त्यांना यश आले एवढेच नव्हे तर ती उणीव भरून काढण्याचा मार्गसुध्दा त्यांनी शोधून काढला.

आपल्या भाषणात डॉ.ओक यांनी आधी थोडक्यात हार्मोनियमचा इतिहास सांगितला. इसवी सन १८४० साली रीडवर वाजणारे जगातले पहिले यंत्र फ्रान्समध्ये तयार केले गेले. म्हणजे हे वाद्य १६८ वर्षे जुने आहे. पण संगीत तर हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि तानपुरा, सतार, सारंगी यासारखी वाद्ये सुध्दा निदान कित्येक शतकांपासून प्रचारात आहेत. त्या मानाने हार्मोनियम फक्त १६८ वर्षांच्या बाल्यावस्थेत आहे असेही म्हणता येईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या जर्मनीतल्या कुशल कारागीरांनीसुध्दा हे वाद्य बनवण्याचे कसब आत्मसात केले आणि पेट्या तयार करून विकायला सुरुवात केली. अल्पावधीत त्या
युरोपभर पसरल्या. त्या काळात त्या पायपेट्या असायच्या. संगीतप्रेमी ब्रिटीश अधिका-यांनी त्या भारतात आणल्या आणि त्यांचे पाहून एतद्देशीय धनिक वर्ग, संस्थानिक वगैरेंनीसुध्दा त्या फ्रान्स किंवा जर्मनीतून आयात केल्या. हा सन १८६० ते १८८० चा कालखंड होता. बाजाची पेटी भारतातसुध्दा फार लोकप्रिय झाली.

याचे मुख्य कारण म्हणजे तंतुवाद्यांच्या मानाने हे वाद्य शिकायला आणि वाजवायला सोपे आणि त्याचा जबरदस्त आवाज. शास्त्रीय संगीतापासून ते तमाशा, नौटंकी यासारख्या सर्व प्रकारच्या लोकसंगीतात तिचा वापर धडाक्याने होऊ लागला. सन १८८२ साली संगीत सौभद्र या नाटकात हार्मोनियमचा वापर सर्वात पहिल्यांदा झाला असा उल्लेख सांपडतो.

१८४० सालापासून ते आजतागायत बाजारात मिळत असलेले सर्व हार्मोनियम आणि त्या प्रकारची इतर वाद्ये ही टेंपर्ड स्केलवरच आधारलेली आहेत. याचा आवाज कसा निघतो हे सोदाहरण दाखवण्यासाठी डॉक्टर ओकांनी एक परंपरागत पेटी घेऊन वाजवायला सुरुवात केली. समाधीसाधन संजीवन नाम, धुंदी कळ्यांना, मौसम है आशिकाना, शुक्रतारा मंदवारा, प्रथम तुला वंदितो, सुखकर्ता दुखहर्ता, तीन्ही सांजा सखे मिळाल्या, जेथे सागरा धरणी मिळते, तोच चंद्रमा नभात, एहेसान तेरा होगा मुझपर, इथेच आणि या बांधावर, निगाहे मिलाने को जी चाहता है, पान खाये सैंया हमार .... एकाहून एक गोड गाणे ते अप्रतिम वाजवत होते. त्यातले
स्वरच काय पण व्यंजने आणि शब्द सुध्दा ऐकू येत असल्याचा भास होत होता आणि टाळ्यांच्या कडकडाटाने श्रोते त्यांना दाद देत होते. वीस पंचवीस मिनिटे यमन राग अशा प्रकारे खुलवल्यावर त्यांनी विचारले, " कसे वाटले?" आता हा काय प्रश्न झाला? मग त्यांनी लगेच विचारले, " चांगलं वाटलं ना, मग यांत प्रॉब्लेम कुठे आहे?" टेम्पर्ड स्केलच्या पेटीवरील वादन ऐकून श्रोत्यांना त्यातून इतका आनंद मिळत असेल तर तिला नांवे ठेवण्याची आणि तिच्यात सुधारणा करण्याचा विचार करण्याची गरजच काय हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा होता.

क्षणभर थांबून त्यांनीच या प्रश्नाचे उत्तर देण्याला सुरुवात केली. पुन्हा एकदा सरगम आणि त्यातील स्वरांची कंपनसंख्या याकडे वळून त्यांनी सांगितले की वरच्या पट्टीमधील षड्जाची कंपनसंख्या खालील पट्टीमधील षड्जाच्या कंपनसंख्येच्या बरोबर दुपटीने असते. म्हणजे मुख्य सा जर १०० हर्टझ ( दर सेकंदाला १०० कंपने) असेल तर वरचा सा २०० इतका असतो आणि पंचम १५० असतो. सा आणि प मध्ये प्रत्येकी दोन दोन रे, ग आणि म असतात तसेच प आणि वरचा सा यांच्यामध्ये दोन दोन ध आणि नी असतात. त्यांतील रे, ग, ध आणि नी कोमल आणि शुध्द असतात तर दोन मध्यमांना शुध्द आणि तीव्र म्हणतात. अशा प्रकारे पहिल्या सा पासून वरच्या सा पर्यंत बारा नोट्स असतात. त्यातील प्रत्येक नोटची कंपनसंख्या तिच्या आधीच्या स्वराच्या १.०५९४६३१ इतक्या पटीने मोठी
असते. १०० या आंकड्याला या पटीने बारा वेळा गुणल्यास २०० हा आंकडा येईल. यालाच टेम्पर्ड स्केल असे नांव दिले आहे. हार्मोनियमच्या डाव्या बाजूच्या पहिल्या पट्टीपासून प्रत्येक स्वर वाजवत गेल्यास तो इतक्या पटीने चढत जातो. त्यातला समजा काळी चार हा षड्ज धरला तर कोमल ऋषभ, शुध्द ऋषभ, कोमल गंधार, शुध्द गंधार वगैरे स्वर त्यानंतर क्रमाने येतात. आपल्याला पहिल्यापासून अशाच प्रकारचे स्वर ऐकण्याची संवय झाली असते त्यामुळे कानाला ते चांगले वाटतातही.

पण तरबेज गवयांना मात्र ते स्वर खटकतात, कारण आपल्या शास्त्रीय संगीतात जे गंधार, मध्यम, धैवत वगैरे स्वर येतात ते किंचित भिन्न असतात. खालच्या सा पासून वरच्या सा पर्यंत मधल्या स्वरांच्या कंपनसंख्यांचे प्रमाण १६/१५, १०/९, ९/८, ६/५, ४/३, ३/२ वगैरे साध्या अपूर्णांकाने वाढत वाढत ते २/१ पर्यंत जाऊन तसेच पुढे जाते. या अनुसार वाजणारे मधले स्वर हार्मोनियममधून निधणा-या स्वरांहून १-२ टक्क्याने हटके असतात. त्यामुळे तज्ञांना ते बेसुरे वाटतात. आपले कान एवढे तीक्ष्ण नसल्यामुळे त्यांना ते जाणवत नाही एवढेच. त्यातसुध्दा आपल्याला नेहमी ते स्वर एक गेल्यानंतर दुसरा असे ऐकू येतात त्यामुळे त्यांच्या प्रमाणबध्दतेतला हा सूक्ष्म फरक आपल्याला समजत नाही. पण एकाच वेळी पेटीचे तीन चार स्वर एकदम वाजवले तर मात्र थोडा गोंगाट वाटतो हे डॉक्टर ओक
यांनी प्रत्यक्ष वाजवून दाखवले. त्यांनी जी खास श्रुतींची पेटी बनवली आहे त्यातले स्वर भारतीय शास्त्रीय संगीतातील पध्दतीप्रमाणे ट्यून केले होते. त्यातले वेगवेगळे स्वर एकदम वाजवल्यावरसुध्दा ते सुसंवादी वाटत होते. या दोन्हीतला फरक ज्या लोकांच्या कानांना जाणवत नाही त्यांनी संगीत हा आपला प्रांत नाही हे वेळीच ओळखून क्रिकेट किंवा टेनिस असा दुसरा छंद धरून त्यात आपले मन रमवावे असे ते गंमतीने म्हणाले.

हा फरक एवढ्यावर थांबत नाही. मुळात सात मुख्य स्वर आणि पांच उपस्वर ही सप्तकांची संकल्पनाच हार्मोनियमचे सोबतीने पश्चिमेकडून आपल्याकडे आली आहे. भारतीय संगीत श्रुतींवर आधारलेले आहे. त्याचे वैज्ञानिक पध्दतीने विश्लेषण केले गेले नसल्यामुळे श्रुती म्हणजे नेमके काय याची सर्वमान्य अशी व्याख्या उपलब्ध नव्हती. डॉक्टरसाहेबांनी यासंबंधी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीतातील स्वर कशा प्रकाराने लावले जातात हे पाहिले, अनेक प्रसिध्द संगीतकारांचे गायन व वादनाच्या ध्वनिफिती मिळवून त्यांचा अभ्यास केला. मल्टिचॅनेल एनेलायजरसारख्या आधुनिक उपकरणांचा उपयोग करून स्वरांच्या कंपनसंख्या मोजून त्याचा अभ्यास केला.

या सर्व संशोधनानंतर प्रत्येक सप्तकामध्ये बावीस श्रुती असतात असा निष्कर्ष त्यांनी काढला. षड्ज आणि पंचम हे दोन पक्के स्वर आहेत आणि ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत व निषाद हे प्रत्येकी चार निश्चित अशा स्थानांवर श्रवण करता येतात अशा प्रकाराने एकूण बावीस हा
आंकडा येतो. कोठल्याही एका रागात यातले सातच स्वर असतात. कांही रागात तर पांच किंवा सहाच असतात. पण ते अतिकोमल, कोमल, शुध्द किंवा तीव्र असू शकतात. या प्रत्येक प्रकाराला श्रुति म्ङणतात. त्या त्या रागातील इतर वादी, संवादी स्वर ज्या प्रकारचे असतात त्यांना प्रमाणबध्द अशा श्रुती आल्या तर ते संगीत अधिक श्रवणीय वाटते. अशा प्रकारे प्रत्येक स्वरातील योग्य ती श्रुति घेऊन त्या सात सुरांमधून रागाची गुंफण केली जाते.

संशोधनाअंती डॉक्टर ओक यांनी या श्रुतींच्या प्रमाणांचा तक्ता तयार केला आणि त्यानुसार वाजणा-या रीड्स बनवल्या. एवढेच नव्हे तर त्यांतून निघणा-या नादाचा अचूकपणा मोजणारे इलेक्ट्रॉनिक यंत्रसुध्दा बनवले आहे. वाजवणा-याला सोयीचे व्हावे या दृष्टीने सध्याच्या हार्मोनियम एवढ्याच आकाराची ही पेटी आहे. त्यात नेहमीच्या आकाराच्या तेवढ्याच पट्ट्या आहेत आणि प्रत्येक पट्टीच्या खाली दिलेली खुंटी बाहेर ओढून श्रुति बदलण्याची सोय आहे. जो राग वाजवायचा असेल त्यातल्या श्रुति आधी सेट केल्या की नेहमीप्रमाणेच तो हार्मोनियम वाजवायचा. याशिवाय त्यांनी मेटलोफोन नांवाचे एक वाद्य बनवले आहे. त्यात विशिष्ट धातूच्या पट्ट्बा बसवायच्या आणि वाजवायला सुरुवात करायची. याचे उदाहरण दाखवण्यासाठी त्यांनी प्रेक्षकांमधून एका माणसाला स्टेजवर बोलावून घेतले. या गृहस्थाने आयुष्यात कधीही कोणतेही वाद्य़ वाजवलेले नव्हते. मारवा रागाचे सूर फिट केलेला मेटलोफोन त्याच्यापुढे ठेऊन हातातील बारक्या हातोड्याने त्यातल्या कोठल्यही पट्टीवर कोणत्याही क्रमाने प्रहार करायला सांगितले. सारे स्वर बरोबर जुळलेले असल्यामुळे कसेही वाजवले तरी कानाला ते गोडच लागत होते. असेच हंसतखेळत तुम्ही शास्त्रीय संगीताचा थोडा आनंद स्वतः घेऊ शकता आमि त्य़ातून प्रयोग करीत शिकूही शकता असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंका त्यांनी दूर केल्या. हे एवढे रंगत चालले होते की आणखी हार्मोनियम वादन ऐकायला मिळणार आहे की नाही असे लोकांना वाटू लागल्यामुळे ती चर्चा आटोपती घ्यावी लागली. अखेरीस डॉ.ओक यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या वाद्यावर त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालिका असलेले चलत पिया बिन छिन बिसुराये हे पद वाजवले आणि परदेमें रहने दो, प्रभु अजि गमला, बनाओ बतियां वगैरे गाण्यातून भैरवी वाजवून या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता केली.

तुका म्हणे बरवे जाण...!

Get this widget | Track details | eSnips Social DNA

"लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा...!"

चिपळ्या-एकतारीच्या साथीने तुकोबा गात बसले आहेत. 'जगत्गुरू संत तुकाराम महाराज!' या पदवीला पोहोचलेले तुकोबा. ज्यांच्या ओव्या म्हणजे केवळ अमृतसंचय! ज्यांची एकेक ओवी अभ्यासताना आयुष्य कमी पडावं असे तुकोबा. ज्यांच्या ओव्यांवर भल्याभल्यांनी बी ए, एम ए, डॉक्टरेट करावी असे तुकोबा. पण एवढं होऊनदेखील शेवटी तुकोबा देवाकडे मागतात काय? तर लहानपण, बालपण!

आहाहा.. कुमारांनी किती हळवेपणाने हे गाणं गायलं आहे! कुमारांसारखा एक दिग्गज गवई, भल्याभल्यांनी ज्यांच्याकडून सूर शिकावा, लय शिकावी असे कुमार! कबीर-मिराबाई-सूरदासाची भजनं-विराण्या गाऊन लोकांना गाण्याच्या निर्गुणतेचे दर्शन घडवणारे कुमार! धनबसंती, सहेली तोडी, सोहनी-भटियार यासारख्या सकस निर्मिती करून श्रोत्यांना स्वत:च्या विलक्षण प्रतिभेने थक्क करून सोडणारे कुमार! परंतु हेच कुमार 'लहानपण देगा देवा..' किती हळवेपणाने गाताहेत पाहा. त्यांचा तो स्वर ऐकून असं वाटतं की कुमारांची गाण्यातली सगळी विद्वत्ता गळून पडली आहे आणि तेही तुकोबांसारखेच देवाकडे लहानपण मागताहेत. अगदी लहान होऊन! ही जादू आहे तुकोबांच्या शब्दांची!

वास्तविक देवाने तुकोबांना काय, कुमारांना काय, किंवा तुम्हाआम्हाला काय, बरंच काही दिलं आहे. यपुढेही देईल. नांव देईल, पैसा देईल, विद्वत्ता देईल, मानसन्मान देईल. पण बालपणीच्या त्या निरागसतेची सर कशालाच नाही. उद्या मी भले भारतभर, जगभर प्रवास करून एकापेक्षा एक अश्या उत्तमोत्तम पाकृ खाईन पण आईने ताटात कालवलेल्या वरणभाताच्या काऊच्या अन् चिऊच्या घासाची सर कशालाच नाही!

"ऐरावती रत्ब थोर
त्यासी अंकुशाचा मार!"

बोला, तुम्हाला काय परवडणार आहे? इंद्राच्या ऐरावतासारखा थाटमाट हवा आहे का तुम्हाला? Smile

अहो काय तो ऐरावत अन् काय त्याच्या त्या अंबारीचा थाट! तुमचेआमचे तर डोळेच दिपतात. एखादा सार्वभौम राजा अंबारीत बसून रस्त्याच्या दुतर्फा माणिकमोती उधळीत चालला आहे हे वाक्य कसं वाटतं वाचायला? Smile

हो, पण त्या ऐरावताच्या अंकुश्याच्या टोचणीचं काय? 'ती सहन करायची तयारी आहे का तुमची?' असंच तुकोबा विचारताहेत!

'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण!'

अंकुशाच्या टोचणीच्या त्या यातना किती समर्थ शब्दात तुकोबांनी मांडल्या आहेत!

आणि ऐरावताच्या अंकुशाचं रुपक वाचताना दुसराही एक अवांतर विचार मनात येतो की त्यांच्या नजरेला ऐरावताची ती झगमगती अंबारी दिसली नाही, तो अंकुश मात्र बरोब्बर दिसला. अहो साहजिकच आहे, साक्षात तुकोबांची दृष्टी ती! थोरल्या आबासाहेबांनी सोन्यानाण्याची अन् माणिकमोत्याची भरभरून ताटं पाठवली होती तेव्हादेखील माणिकमोत्यांचा तो चमचमाट त्यांना भुरळ घालू शकला नाही. 'हे आम्हास मृत्तिकेसमान..' असं म्हणून सगळा माल महाराजांकडे साभार परत!

तुम्हीआम्ही असतो तर 'हा सगळा माल कुठे लपवू', 'ह्यातलं कुणाला किती देऊ', सालं वील करून ठेवलंय ते आता बदललं पाहिजे!', 'ह्यातले काही दागिने बँकेच्या लॉकरात ठेवावेत की काय?', 'आयटीवाल्यांची धाड पडली तर कशी काय मांडवली करायची?' हाच सगळा विचार करत बसलो असतो. पण तुकोबांनी 'हे सर्व आम्हा विषसमान!' असं म्हणून पुढच्या सर्व संभावित प्रश्नांची क्षणात बोळवण केली होती! हां हां मंडळी, थांबा जरा, लगेच मनातल्या मनात मांडे रचायला लागू नका. महाराजांची सोन्यानाण्याच्या ताटांची ती ऑफर तुकोबांना होती, तुम्हाआम्हाला नाही! Smile

असो, हे जरा काही अवांतर विचार झाले, फारसे सिरियसली घेऊ नका बरं! सोन्याचांदीचा भाव खाली येणारे म्हणे, खरेदी करायचा विचार करून ठेवा! Smile

"तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानाहून लहान"

आहाहा! या ओळी ऐकतांना काय वाटतात हो! मन भरून येतं अगदी! 'बरवे जाण' मधील शुद्ध गंधारावरचा न्यास किती हळवा आहे! आणि हो, तसाही आमचा शुद्ध गंधार म्हणजे देखील अगदी बरवा सूर बरं का! अत्यंत शहाणा, चौकस परंतु तेवढाच हळवादेखील! Smile

'जाण' या शब्दावरची कुमारांनी घेतलेली जागा ऐका. जीव एवढासा होतो!

'व्हावे ल्हानाहून ल्हान!'

खल्लास ओळ! तुकोबांना ल्हानाहून ल्हान व्हायची इच्छा आहे! हा थोर संतकवी किती साधं परंतु जिवाला चटका लावणारं लिहून गेला आहे! त्यांना नको आहे तो मोठेपणा, नको आहे ते जाणतेपण, काही काही नको आहे त्यांना! अहो तुकोबांनी देवाकडे तुमच्याआमच्या मनातलंच मागणं मागितलं आहे. अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं हे बडबडगीत, तो मऊ गुरगुट्या वरणभात, आज्जीने हातावर ठेवलेली बेसनाची वडी, सर्दीपडसं झाल्यावर सुंठ उगाळून त्याचा अंमळ कढत लेप नाका-कपाळावर थापणारी ती प्रेमळ आई!, आज्जी, आत्या, काकू, मावशी, आईने घेतलेला तो गोड पापा! हेच सगळं हवं आहे ना आपल्याला?

मंडळी, एखाद्या वरवर अगदी साध्या वाटणार्‍या गाण्यातदेखील काय विलक्षण ताकद असू शकते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. भलामोठ्ठा वाद्यवृंद नाही, रॉप-झाझ-पॉपचा थाट नाही, आयटम नंबरचा नागवेपणा नाही, की आमच्या दरबारी-मुलतानीचा रुबाब नाही! परंतु तरीही हे गाणं ऐकताना मन बेचैन होतं, हातातली सगळी कामं टाकून अगदी ऐकत रहावसं वाटतं, आणि मन पुन्हा एकदा आज्जीने दुधाच्या पातेल्यातील काढलेल्या सायसाखरेच्या खरवडीत बुडतं!

आणि आपण पुन्हा पुन्हा गुणगुणू लागतो,

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा!

-- तात्या अभ्यंकर.

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ३ स्नेहल भाटकर!


स्नेहल भाटकर,भाटकर बुवा,व्ही.जी.भाटकर,वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक नावे. ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले स्नेहल भाटकर.त्यांचे पूर्ण नाव आहे वासुदेव गंगाराम भाटकर .आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. ह्यातील स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव.त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले.अतिशय साध्या सरळ आणि सुश्राव्य अशा चाली देण्यात त्यांचा हातखंडा होता.

भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे.

भाटकरांचा जन्म १७ जुलै १९१९ मध्ये मुंबईच्या प्रभादेवी येथे झाला.गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. आईलाच ते आपला पहिला गुरु मानतात. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि "ह्यातूनही आपण बरेच शिकलो" असे ते प्रांजळपणे नमूद करतात.ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते.

१९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.

केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.

नीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय.

सी. रामचंद्र उर्फ रामचंद्र तथा अण्णा चितळकर हे बुवांचे खास मित्र होते. एकदा अण्णांनी बुवांना आयत्या वेळी बोलवून घेतले आणि त्यांच्या बरोबरीने एका कव्वालीचे ध्वनिमुद्रण केले. खरे तर ही कव्वाली अण्णा महंमद रफीच्या साथीने गाणार होते पण ऐन वेळी रफीसाहेब येऊ न शकल्यामुळे त्यांनी ती बुवांच्या साथीने गायली.ही कव्वाली संगीता चित्रपटातील आहे ज्याचे संगीत सी. रामचंद्र ह्यांचे होते. सी. रामचंद्र ह्यांच्याबरोबरच्या गमती जमती आणि अजूनही काही खास गोष्टी इथे वाचा.

भाटकर बुवांच्या संगीताने नटलेली आणि विशेष गाजलेली मराठी गाणी अशी आहेत.
१) झोंबती अंगा जललहरी,आमुची वसने दे श्रीहरी
२)तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती
३)दहा वीस असती त्या रे, मने उद्धवा !
एक मात्र होते ते मी दिले माधवा
४)एक एक पाउल उचली, चाल निश्चयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !
५) मज नकोत अश्रू घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा ! गायिका: सुमन कल्याणपुर; चित्रपट : अन्नपुर्णा

६)तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले, धुंडित तूज आले. गायिका: लता मंगेशकर; चित्रपट: चिमुकला पाहुणा
७)प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बागदिलाचा दरवळला. गायिका:लता आणि आशा भोसले; चित्रपट: या मालक

८)खेळेल का देव माझिया अंगणी ?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी ? गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक: राधामाई

९)मानसी राजहंस पोहतो
दल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो ।

१०)सुखद या सौख्याहुनि वनवास
राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥ गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक : भूमिकन्या सीता

स्वत: भाटकरबुवांनी गायलेले असंख्य अभंग आहेत.त्यातले काही चटकन आठवणारे....
१)आपुल्या माहेरा जाईन मी आता
२)काट्याच्या आणिवर वसले तीन गाव
३)जववरी रे जववरी,जंबूक करी गर्जना
४)वारियाने कुंडल हाले,डोळे मोडित राधा चाले
५)काय सांगु देवा ज्ञानोबाची ख्याती
अशा ह्या असामान्य कलाकाराचे वयाच्या ८८ व्या वर्षी २९मे २००७ रोजी निधन झाले. आज भाटकर साहेब आपल्यात नसले तरी त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्यातले शब्द उसने घेऊन म्हणता येईल....
"कभी तनहाईमें तुमको हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली कौंध जायेगी!"

(सर्व माहिती आणि छायाचित्रं महाजालावरून साभार.)

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! २ श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे! एक प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्व! त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं!
जन्म १०जून १९२५. मुळचे बडोद्याचे. तिथल्याच सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसुदन जोशी ह्यांच्याकडे गाण्याचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर तिथेच आतांहुसेनखाँ,निस्सारहुसेनखाँ आणि फैयाजहुसेनखाँ सारख्या दिग्गजांकडूनही तालीम मिळाली. पुढे काही वर्षे त्यांनी बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून नोकरी केली.
त्यानंतर काही घरगुती अडचणीमुळे खळेसाहेब मुंबईत आले पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरुप बाहेर काढले.

'गोरी गोरी पान'च्या ध्वनीमुद्रणप्रसंगी खळे साहेब,आशा भोसले आणि वाद्यवृंद

१९५२ साली त्यांची पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. त्याच्या एका बाजुला होते गोरी गोरी पान,फुलासारखी छान आणि दुसर्‍या बाजुला होते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख . ह्या दोन्ही रचना ग.दि माडगुळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या.पण ऐन वेळी हा चित्रपट मुळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही.पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्ही कडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.

१मे १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीतं लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत..जे गायलंय शाहीर साबळे ह्यांनी आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधलीय. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला,शाहीरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीताला देखिल आहे हे निश्चित. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय,महाराष्ट्र जय,जय जय राष्ट्र महान, हे देखिल खूपच गाजले.

खळे साहेबांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलंय..त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत.
यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली १)सांग मला रे सांग मला,आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला,२)देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, जिव्हाळातले १)लळा जिव्हाळा शब्दच खोटे,२)प्रिया तुज काय दिसे स्वप्नात आणि ३)या चिमण्यांनो परत फिरा रे ४)चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?

खळे साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलेलं असलं तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेत.
खळेसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळ जवळ ८०हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.पंडित भीमसेनजी,बाबुजी,वसंतराव,लतादीदी,आशाताई,सुमनताई,माणिक वर्मा,सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासून ते हृदयनाथ,उषा मंगेशकर, अरूण दाते,सुधा मल्होत्रा,सुरेश वाडकर,देवकी पंडीत,कविता कृष्णमुर्ती,शंकर महादेवन पर्यंत कैक नामवंतांनी खळे साहेबांची गाणी गायलेली आहेत.ह्या गायक-गायिकांनी गायलेल्या गीतांचा नुसता उल्लेख करायचा म्हटला तरी पानेच्या पाने भरतील.
लतादीदींनी गायलेले १)भेटी लागी जीवा २)वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे सारखे तुकारामाचे अभंग असोत अथवा १)नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननीळा बरसला सारखी पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनी गायलेले १)सावळे सुंदर रूप मनोहर २)राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत अथवा बाबूजींनी गायलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे असो; वसंतरावांनी गायलेले १)बगळ्यांची माळफुले २)राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेली १)कंठातच रुतल्या ताना २)टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय असोत; अशी शेकडोंनी गाणी आपण सहज आठवू शकतो.
सहज आठवणारी आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १)वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २)हात तुझा हातातून धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १)धरिला वृथा छंद २)जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १)उतरली सांज ही धरेवरी २)बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच.

१९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी संत तुकारामाचे अभंग लतादीदींकडून गाऊन घेतले. पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. राम-श्याम गुणगान नावाने काही भक्तिगीतांची तबकडी काढली... त्यात लतादीदी आणि पंडित भीमसेनजी ह्यांच्याकडून गाऊन घेतले.सुरेश वाडकर,कविता कृष्णमुर्ती,वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊन घेतलेल्या गाण्यांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.


राम-श्याम गुणगानच्या वेळी पंडित भीमसेन आणि लतादीदींना चाल गाऊन दाखवताना खळेसाहेब.


खळे साहेबांनी दिलेल्या चाली वरवर जरी सोप्या वाटल्या तरी त्या गाताना विशेष श्रम घ्यावे लगतात.स्वर आणि लय सांभाळताना भल्याभल्यांना कठीण जातं. त्याबद्दल बाबुजी म्हणतात की खळे साहेबांच्या काही गाण्यातल्या जागा आपल्याला कधीच जमणार नाहीत.बाबुजींसारख्या सिद्धहस्त गायक-संगीतकाराने असे म्हटल्यावर अजून कोणते वेगळे शिफारसपत्र हवे?

आयुष्यभर केलेल्या खडतर वाटचालीमुळे आणि वेळोवेळी आलेल्या आजारपणांमुळे आज वयाच्या ८३व्या वर्षी खळे साहेब शरीराने खूपच थकलेत. हात थरथर कापतात म्हणून लिहिता येत नाही अशी परिस्थिती आहे;पण पेटी समोर येताच सगळी थरथर थांबते आणि आपले आजारपण विसरून खळे साहेब संगीताच्या विश्वात रंगून जातात.आजही त्यांची संगीतसाधना अव्याहतपणे सुरु आहे.अशा ह्या महान संगीतसाधकाला आपण दीर्घायुरोग्य चिंतुया!

सर्व माहिती आणि छायाचित्रे महाजालावरून साभार!

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...
आजची संध्याकाळ बेळगावकरांच्या आयुष्यातील एक अनोखी, अविस्मरणीय संध्याकाळ ठरली आहे. रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध
निवेदिका पद्मिनी परेरा यांनी आज बेळगावमध्ये एक कार्यक्रम सादर केला. बेळगावात सध्या वास्तव्यास असलेले जुन्या चित्रपट
गीतांचे रसिक संग्राहक विजय नाफडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी निवडलेली तीस जुनी गाणी पद्मिनी परेरा यांच्या अप्रतिम
निवेदनासह रसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिली. "ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन का विदेश विभाग है..." हे वाक्य परेरांनी उच्चारले आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. वर्षानुवर्षे जो आवाज रेडिओवरून ऐकला तो साक्षात आपल्यासमोर आहे याचा आनंद काही वेगळाच होता. नुकत्याच निवृत्त झालेल्या परेरा यांनी इतक्या लोकांसमोर निवेदन करण्याची किंवा बोलण्याची आपली पहिलीच वेळ आहे असे सांगत कार्यक्रम रंगवला. हा कार्यक्रम शहापूर बेळगावमधील सरस्वती वाचनालयाने आयोजित केला होता. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग याच ठिकाणी झाला होता. (म्हणजे ही इमारत बांधण्यापूर्वीच्या मोकळ्या बखळीत.) एक विलक्षण अनुभव...

कृपया ह्या गाण्या बद्दल माहिती द्या..

मित्रहो!

कृपया दुव्यातील ह्या नितांत सुंदर गाण्याचे संगीतकार कोण व चित्रपट कोणता?

http://www.dishant.com/sharemailsong.php?songid=52381

संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !

नमस्कार मंडळी,

काथ्याकूट करण्यासाठी नवीन विषय हाजीर आहे.
कोणत्याही संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !
सुरवात नवीन संगीतकारांपासुन करुयात. नंतर ओघात जुने संगीतकाराही येतीलच.

१. हिमेश - तेरे नाम - ( तुमसे मिलना, तेरे नाम, लगन लगी , ओ जाना ही गाणी श्रवणीय होती. आपण अभिनेता आणि गायक आहोत हा साक्षात्कार होण्याआधी हिमेश तसा बरा होता)
२. विशाल शेखर - मुसाफिर - (कोणि काही म्हणो, मुसाफिरची गाणी ट्रेंड सेटर होती. ईलेक्ट्रॉनिक संगित आणि क्लब मिक्स ताजे होते. एकाच गाण्याचे २ /३ वर्जन हा प्रकारही बराच चांगला वठला होता. सु सु सुनियो ऐकयला (आणि पहायलाही ) मस्त !
३. प्रितम - चॉकलेट - ( हल्का हल्कासे ये नशा, मम्मीसे ना कहना ठेका धरायला लावणारी. पण रॉक - खलीशसी है अप्रतिमच.
४. शंकर, एहसान, लॉय - दिल चाहता है
५. अनु मलिक - जानम - ( राहुल रॉय, महेश भट्टच्या या पडिक चित्रपटातली गाणी मात्र जमली होती. एकाच चित्रपटातली सगळी गाणी जमून येणं ही तशी दुर्मीळ गोष्ट. पण जानमच्या सगळ्या गाण्यावर एक अलग अशी छाप होती.)
६. जतीन ललित - खामोशि द म्युझिकल - ( संजय लीला भंसाली बिघडण्याच्या आधीचा, म्हणजेच त्याचा पहीला चित्रपट. ये दिल सुन रहा है सारखी अनेक श्रवणीय गाणी यात आहेत.
७. बप्पि लाहिरी - जिंदगी एक जुवा - ( प्रकाश मेहराचा महत्वकांक्षी पडेल सिनेमा. आशा़जींच्या मधाळ आवाजातले ये जिंदगी है एक जुवा आणि दिल तो दिल है एकदम क्लास.)

चला तर मग मंडळी, अजून बरीच नावं बाकी आहेत. पंचमदा, ए. आर. तुमच्या साठी सोडलेत.
प्रचंड मारामारी होणार आहे, हे मला माहीती आहे.

हिंदी चित्रपटांचा पंखा,
सचीन जी

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! १...सुधीर फडके!

मराठी सुगम संगीताचा विषय निघाला की सर्वप्रथम जे नाव ओठावर येते ते म्हणजे सुधीर फडके ह्यांचे! गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द विलक्षण गाजली. संगीत जगतात ते बाबुजी ह्या टोपण नावाने ओळखले जातात. तेव्हा बाबूजींच्या संगीत प्रवासाचा थोडक्यात परिचय करून घेऊ या.

२५ जुलै १९१९ रोजी कोल्हापुरात जन्म झाला. सुधीर फडके ह्यांचे मूळ नाव रामचंद्र विनायक फडके. वयाच्या सातव्या वर्षापासून वामनराव पाध्ये ह्यांच्याकडून संगीत शिकायला सुरुवात केली. साधारण १९२९ मध्ये शालेय शिक्षण आणि पुढील संगीत शिक्षणासाठी बाबुजी मुंबईत आले. त्याच वेळी मुंबईतल्या सरस्वती संगीत विद्यालयातर्फे झालेल्या अभिजात संगीत स्पर्धेत बाबूजींनी पहिला क्रमांक पटकावला.

१९३४ मध्ये बाबुजी पुन्हा कोल्हापुरला गेले आणि तिथे त्यांनी श्रीकृष्ण संगीत विद्यालयात गायन-शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. ह्या संगीत विद्यालयाचे प्रमुख होते श्री. न. ना. देशपांडे. ह्या विद्यालयातर्फे दरवर्षी एक मेळा आयोजित केला जायचा. त्यात सादर होणार्‍या गाण्यांचे संगीत दिग्दर्शन करण्याची जबाबदारी बाबूजींवर पडली. न. ना. देशपांड्यांनी बाबूजींचे रामचंद्र नाव बदलून सुधीर असे नामकरण केले. इथूनच पुढे ते संगीतकार आणि गायक सुधीर फडके म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. संघाचा एक प्रचारक म्हणून बाबुजीं बर्‍याच ठिकाणी हिंडले.मधल्या काळात त्यांचे वडिल निवर्तले. त्यामुळे कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांना अर्थप्राप्ती करणे भाग पडले. ह्या काळात त्यांची झालेली जेवणा-खाणाची परवड, प्रकृतीची आबाळ, त्यातून उद्भवलेली क्षयरोगासारखी आजारपणं हा त्यांच्या जीवनातला अक्षरश: खडतर काळ होता. पुढे गावोगाव वणवण फिरत गायनाचे कार्यक्रम करत, मिळेल ती बिदागी स्वीकारून बाबूजींनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, कलकत्ता, दिल्ली, राजस्थान, पंजाब पर्यंत धडक मारली. ठिकठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करत असतानाच तिथल्या स्थानिक गायक-गायिकांचे गाणेही ते आवर्जून ऐकत. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गाण्यातही तो ढंग आणण्याचा ते प्रयत्न करत. ह्या अशा ठिकाणी फिरत असताना गया येथल्या एका मंदिरात बाबूजींनी सादर केलेल्या गायनाने प्रभावित होऊन तिथल्या मुख्य पुजार्‍याने देवीच्या गळ्यातला हार बाबूजींना घालून त्यांचे कौतुक केले आणि इथून मग बाबूजींनी कधीच मागे फिरून पाहिले नाही. त्यांचा संगीताच्या अश्वमेधाचा वारू चौखूर उधळला आणि त्याने अवघा भारत आपलासा केला.

त्यानंतर बाबूजींना प्रभात कंपनीकडून संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि बाबूजींनी तिचे सोने केले. १९४६ साली गोकुल ह्या चित्रपटाचे संगीत त्यांनी केले. त्यानंतर मग एका पाठोपाठ रुक्मिणी स्वयंवर, आगे बढो, सीता स्वयंवर, अपराधी इत्यादी चित्रपटांना सुमधुर संगीत देऊन प्रभातच्या गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर इत्यादी नामांकित संगीतकाराची परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे चालवली.

बालगंधर्व आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे गायनातील आदर्श होते. ह्या दोघांच्या गाण्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून बाबूजींनी त्यांचे गुण एकलव्याच्या निष्ठेने आत्मसात केले.त्याचाच परिणाम म्हणून कोमल तरीही सुस्पष्ट शब्दोच्चार, सूर आणि तालावरील हुकमत आणि शब्दांना न्याय देणार्‍या चाली ही बाबूजींची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला त्यांच्या गाण्यात आणि संगीत दिग्दर्शनात दिसून येतात.

गीत-रामायण आणि गदिमा-बाबुजी हे एक अतूट असे समीकरण होऊन बसलेय. आधुनिक वाल्मिकी असे आपण ज्यांना म्हणतो त्या कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकरांनी गीतांतून रामायण कथन केले आणि बाबूजींनी त्या गीतांना उत्तमोत्तम चाली लावून श्रोत्यांसमोर ते साक्षात उभारले. नुसती ही कामगिरी जरी जमेस धरली तरी बाबूजींचे संगीत अजरामर आहे हे आपल्या लक्षात येईल.

बाबूजींनी चित्रपटसंगीत, भावगीत, भक्तिगीत, लावणी, लोकगीतं, भारूड असे कितीतरी गायनप्रकार एक गायक आणि संगीतकार म्हणून समर्थपणे हाताळलेले आहेत. वंदे मातरम्, हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, प्रपंच, मुंबईचा जावई, झाला महार पंढरीनाथ, चंद्र होता साक्षीला ह्या आणि अशा कैक चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत गाजलंय.
ज्योतीकलश छलके ह्या लतादीदींनी गायलेल्या हिंदी गीताचे संगीतकार होते बाबुजी आणि त्यासाठी त्यांना सुरसिंगारचा पुरस्कार प्राप्त झाला होता. अशाच तर्‍हेचे अनेक मानसन्मान त्यांना वेळोवेळी प्राप्त झाले होते त्यापैकी एक होता.. संगीत नाटक अकादमी पुरस्कार.

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, अशी पाखरे येती, अंतरीच्या गुढगर्भी, कधी बहर कधी शिशिर, दिसलीस तू फुलले ऋतू.... अशी कितीऽऽतरी भावगीते आपल्या सुमधुर आवाजाने बाबूजींनी अजरामर करून ठेवलेत.

बाबुजी जसे उत्तम संगीतकार होते तसेच ते एक उत्तम गायकही होते. बाबूजींनी इतर संगीतकारांचीही गाणी गायलेत. त्यात यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, राम फाटक, राम कदम ह्यांच्यासारख्या अनेक जुन्या-जाणत्या संगीतकारांपासून ते हल्लीच्या संगीतकारांपैकी त्यांचेच चिरंजीव श्रीधर फडके, अनिल-अरुण अशांचीही गाणी तितक्याच तन्मयतेने गायलेली आहेत.
बाबूजींचा एक विलक्षण गुण असा आहे की ते जेव्हा इतरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गातात तेव्हा त्या संगीतकाराला अपेक्षित असलेल्या अगदी बारीक सारीक जागादेखील आपल्या गळ्यांतून निघत नाहीत तोवर समाधान मानत नाहीत. त्यासाठी लागेल तितका वेळ देण्याची आणि मेहनत करण्याची त्यांची तयारी असते.

बाबुजी जसे थोर गायक आणि संगीतकार होते तसेच कट्टर हिंदुत्ववादी आणि देशभक्त होते. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सशस्त्र भाग घेतलेला होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्यावरचा चित्रपट बनवण्यासाठी बाबूजींनी गीतरामायणाच्या कार्यक्रमांचा धडाका लावून लोकवर्गणी जमवली आणि निष्ठेने स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पूर्ण केला. ह्या दरम्यान बाबुजी खूप आजारी पडले होते; पण त्यांनी प्रतिज्ञा केली होती की हा चित्रपट पूर्ण केल्याशिवाय मी मरण पत्करणार नाही आणि ती त्यांनी जिद्दीने खरी करून दाखवली. ह्या चित्रपटाच्या प्रकाशनानंतर काही दिवसातच म्हणजे २९जुलै २००२ रोजी त्यांचे देहावसान झाले.

आज बाबुजी जरी देहाने आपल्यात नसले तरी त्यांचे सूर आपल्या सोबत अखंड राहणार आहेत. त्यांनीच गायलेल्या एका गीताचा आधार घेऊन म्हणता येईल.....

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती ॥

सर्व माहिती आणि छायाचित्र महाजालावरून साभार!
मिपावरील काही मित्र-मैत्रिणींच्या आग्रहास्तव हा नवा प्रकार हाताळत आहे.

काह्ही केल्या आवडतच नाही! :)

राम राम मंडळी,

नाट्य व चित्रपट कलावंतांसंदर्भात हा काथ्याकूट आहे हे सर्वप्रथम नमूद करतो आणि या काथ्याकुटाचा प्रवास याच मंडळींसंदर्भात चालावा अशी विनंतीवजा अपेक्षा करतो!

तर मंडळी, काही काही नाट्य व चित्र कलावंत हे त्यांच्या त्यांच्या जागी गुणीच असतात. त्यांनी आपलं काहीच बिघडवलेलं नसतं. एक कलाकार म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल उचित आदरही असतो.

पण...

यापैकी काही कलावंत हे आपल्याला काह्ही म्हणजे काह्ही केल्या आवडतच नाहीत/नसतात. काय असेल ते असो पण त्यांना पडद्यावर पाहिलं की अगदी नक्को वाटतं! Smile

हा कथ्याकूट हा याच मंडळींची नांवे लिहिण्याकरता मी सुरू करत आहे. आपण नेहमी आपल्या आवडीबद्दल/आवडणार्‍या कलावंतांबद्दल लिहीत असतो, या निमित्ताने एकदा आपल्या नावडीबद्दलही इथे लिहू या. बघुया तरी, कुणाला कोण आवडत नाही ते! Smile

चला, तर माझ्यापासूनच सुरवात करतो. तूर्तास जी नांवं चटकन आठवत आहेत ती इथे लिहीत आहे. आपणही भाग घेऊन आपापल्या नावडी कळवा! Smile

खालील मंडळी मला कधीच सहन होत नाहीत -

अनिलकपूरचे दोन्ही भाऊ,
संध्या,
प्रदिपकुमार,
आशिकीफेम राहूल रॉय,
जॉय मुखर्जी,
सचिन(अपवाद 'हा माझा मार्ग एकला, पण त्यानंतर कधीही आणि केव्व्हाच आवडला नाही!),
चित्रपटात काम करणारी शांतारामबापूंची अजून एक बायको (तिचं नाव आता आठवत नाही!),
इत्यादी इत्यादी इत्यादी...

बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो. बरीचशी मंडळी मिपाचा दिवाळी अंक काढा म्हणून मागे लागली आहेत. त्या संदर्भात नीलकांत, डॉ बिरुटे, चतुरंग, मुक्तराव, प्रियाली, प्राजू, नीलकांत इत्यादी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी विचारविनिमय करायचा आहे! Smile

"वीस रुपये रोजी, रोजी दोन टाईम चाय अन् रोजी एक शिग्रेट" या बोलीवर काही संपादक मिळतात का तेही पाहिलं पाहिजे! Smile

आपला,
(नावडता) तात्या.

पंडित जितेंद्र अभिषेकी!

पंडित जितेंद्र अभिषेकी! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक प्रमुख व्यक्तीमत्व. आवाजाची उपजत देणगी नसली तरी परिश्रमाने त्यावर मात करून ग्वाल्हेर,आग्रा आणि जयपूर अशा तीन विविध घराण्याची गायकी पचवलेल्या पंडितजींनी त्यातून स्वत:ची अशी एक वेगळी गायकी परंपरा निर्माण केली. अभिषेकी बुवा म्हणूनच ते जास्त प्रसिद्ध आहेत! गोव्यातल्या मंगेशी इथला जन्म. वडिल कीर्तनकार.इथेच,वडिलांकडेच त्यांचे संगीताचे आद्य शिक्षण झाले. त्यांनतर उस्ताद अझमत हुसेन खाँ,गिरिजाबाई केळकर,जगन्नाथबुवा पुरोहित आणि गुलुभाई जसदनवाला अशा विविध घराण्याच्या दिग्गजांकडे पुढचे धडे गिरवले. तसेच काही अनवट रागांची दिक्षा खुद्द बडे गुलाम अली खाँ ह्यांच्याकडूनही मिळाली.
आपण सामान्य रसिक अभिषेकींना एक शास्त्रीय गायक म्हणून ओळखण्याऐवजी ऐवजी एक समर्थ संगीतकार म्हणून जास्त ओळखतो.मत्स्यगंधा,ययाति आणि देवयानी,कट्यार काळजात घुसली वगैरे नाटकातल्या पदांना त्यांनी दिलेल्या चाली विलक्षण गाजल्या. काटा रुते कुणाला,सर्वात्मका-सर्वेश्वरा वगैरे सारखी त्यांनी गायलेली कैक गीतेही ज्याच्या त्याच्या ओठी आजही आहेत.

तंबोरा जुळवण्यात तल्लीन.


गानमग्न अवस्थेतील काही भावमुद्रा!




मैफिलीतले अभिषेकी बुवा!
सर्वात्मका सर्वेश्वरा ऐका आणि पाहा.

सर्व छायाचित्रं जितेंद्र अभिषेकी.कॉम वरून साभार.