टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
संस्कृती
आपल्याला तर बुवा नाही पटत....तुम्हाला काय वाटतं?
प्रेषक ऐका दाजीबा ( शनी, ०७/१९/२००८ - १९:५६) .काय पटत नाही विचारताय?? साहाजिकच आहे तुमचा प्रश्न! अहो मी बोलतोय आपल्या माय-मराठीवरच्या आक्रमणाबद्दल. हे आक्रमणकर्ते कोण? अहो बघा आजूबाजूला.. दिसले का? हे आक्रमणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. नाही पटत? चला तर प्रत्यक्ष उदाहरणंच पाहू...
दृश्य १ - स्थळ- बाजार. एक मराठी आई आपल्या मराठी मुलांना इंग्रजीत बोलते आहे. काय हवं आहे, काय नको आहे, सर्व काही इंग्रजीतून. दुकानदाराशी मात्र इंग्रजाळलेल्या मराठीतून.
दृश्य २ - स्थळ - स्थानिक बस. ऐन गर्दीत चुकून वाहकाचा हात मुलीच्या खांद्याला लागतो. मराठी मुलगी इंग्रजीतून बिचार्या वाहकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करते. इतक्या वाईट शिव्या इंग्रजीतून देते, की इंग्रजी कळत असतं तर वाहकानं तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असता.
दृश्य ३ - स्थळ - पाचगणी. दोन लहान मुलांना घेऊन एक जोडपं येतं. मराठी पालक आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची माहिती इंग्रजीतून देतात. सांगतात, "दीज आर दि फूटप्रिन्ट्स ऑफ दि पाण्डवाज्...." मुलगा - "हू पाण्डवाज्????"
आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याच मुलांना इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून द्यावी लागावी, हे खरंच दुर्दैवी आहे. हे लहान मुलांशी इंग्रजीतून बोलायचं काय प्रकरण आहे ते नाही बुवा समजलं.
मान्य आहे की इंग्रजी जागतिक भाषा आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल तर चांगलं भवितव्य आहे वगैरे. पण आपली मराठी जपत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही का??? मी देखील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. मला दिवसभर इंग्रजीतच संवाद साधावा लगतो. पण मी ती इंग्रजी ऑफिसपुरतीच मर्यादित ठेवतो.
मला इतकंच म्हणायचं आहे, की मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. मावशी श्रीमंत आहे म्हणून आईला विसरू नये. तुम्हाला काय वाटतं?
मिसळ
प्रेषक अनिकेत केदारी ( मंगळ, ०७/१५/२००८ - ०९:५१) .ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
पांडेकर आजी..
प्रेषक प्राजु ( मंगळ, ०७/१५/२००८ - ०९:१७) .लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.
"वयनी..... " अशी किनर्या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै. गणपत पाटील यांच्यासारख्या आवाजात हाक ऐकू आली की आई म्हणते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. अतिशय प्रेमळ. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. त्यामुळे कोल्हापूरतील राजारामपुरी पोलिस स्टेशन मध्ये ओळख आहे बाईची. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. झाडांवर अतिशय माया. तिच्या सोबतीला म्हणजे ती बॉबी कुत्री आणि माय-लेकरं असलेली वेगवेगळ्या डोळ्यांची मांजरं..
हे प्राणीही जणू आजी एकटी आहे तिला आपल्याशिवाय कोणी नाही हे जाणूनच असल्यासारखे...
आंब्याच्या सिझन मध्ये मोठाले येणारे पायरी आंबे राखायला बाई, दिवसरात्र बागेत बसून असते. २ खोल्यांमध्ये बिर्हाड ठेवल्याने सोबतही होते आणि मामांच्या तुटपुंज्या पेन्शन शिवाय मिळकतही होते थोडिफार.
गॅस ला नंबर नोंदवायचा असेल किंवा काही बँकेची कागदपत्र समजावून घ्यायची असतील तर हळू हळू धिम्या गतीने चालत चालत आजी येते आणि आईकडून किंवा घरी जे कोणी असेल त्याच्याकडून वाचून किंवा फोन लावून घेते. एक मात्र, तिची ही जी काहि कामं आम्ही करतो त्याच्या बदल्यात ती झाडाचे आंबे, लिंबं, शेवग्याच्या शेंगा आणून देते. सगळ्या जगाला ती तिच्या बागेत येणारी फळ विकते पण आमच्याकडून एक पैसाही नाही घेत. मी कधी गेले कोल्हापूरला तर मला आवडते म्हणून शेवग्याच्या शेंगांची तिखट, खमंग भाजीही करून आणून देते. यामध्ये कोणताही दिखाऊपणा नाही . पण झाडांबद्दलचं प्रेम आणि अभिमान अपार.
"आजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्तच झाली आहे .."
" मग! हुनारचं की, माझ्या झाडाच्या शेंगा हैत.. लई दळदार.. त्या बाजारच्या नव्हत, चवळीवानी!!" असं चिरक्या आवाजत पण ठसक्यात उत्तर मिळेल .
या बाईचं उत्पन्नाचं साधन म्हणजे, मामांची पेन्शन, येणारं घरभाडं आणि आंबे, लिंबं, शेंगा, पेरू... श्रावणात जाई-जुई, मोगर्याची फुलं विकून मिळणारि रक्कम. कॉलनीतली लोकं सुद्धा त्या बाईला जपतात.. बाजरातून शेवगा, पेरू आणून खाण्यापेक्षा आजीकडूनच घेतात. भलेही स्वत:च्या बंगल्यातल्या बागेतून टोपलीभर फुले निघू देत पण सत्यनारायण, मंगळागौरी, आणि गणपतीच्या पूजेला घरोघरि फुलं येतात ती आजीच्या बागेतली. त्यामुळे तिचा तिच्या झाडांबद्दलचा अभिमानही द्विगुणीत होतो आणि मग म्हणते..
"माझ्या मोगर्या वानी मोगरा कुट्टं मिळायचा न्हाई. परवा, शेजारची सुजा आल्ती.. ५० रूप्पयची फुलं घ्यून गेली बगा.." त्यावेळी तिच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वहात असतो.
मध्येच एकदा आजी अशीच आली घरी.. " वयनी...... हैसा काय??"
"या आजी.. आई नाहिये.. या ना बसा जरा" .. मी
"ताई, कुटं गेली आई, येनार हायका लवकर??" .. आजी
"येईल १० मिनीटात. बसा तरी." .. मी
हा संवाद होईपर्यंत आजी जेमतेम बंगल्याचं गेट उघडून आत आलेलि असते. तिला चालायला खूप वेळ लागतो.. वयोमाना प्रमाणे येते तिच्या गतीने. मग ती आत येईपर्यंत मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते. आजी आत येते, नेहमीच्या ठरलेल्या दाराजवळच असणार्या खुर्चीजवळ बसते. याचं कारण, दाराजवळच्या खुर्चीतून तिला तिच्या घराकडे लक्ष ठेवता येतं खास करून आंब्याच्या किंवा पेरूच्या सिझनमध्ये. कारण घराच्या मागे असणार्या झोपडपट्टितली मुलं ताबडतोब येतात दगडं मारायला. आणि एखादा दिसलाच आंब्यावर किंव पेरूवर दगड मारणारा.. तर.. टिपेच्या चिरक्या स्वरातून ती त्याला शिवी हाणते.. बिचार्याला आजी कुठून ओरडते आहे ते दिसतही नाही, आवाज मात्र ऐकू येत असतो. बिचारा इकडं तिकडं बघत निघून जातो.
आजी बसते, काठी ठवते.. मग एकदम म्हणते.."इवडी इवडी झालित आता.. ३-४ दिवसांत पिकली की, आनून देतो हां"
"काय इवडी इवडी झालित आजी? काय आणून देताय??" मी.
"अगं बाई माजे, पिरू गं... इवडी झाल्येत.. आता पिकतील छान.. देतो आनून".. 'इवडी' असं अंगठा आणि इंडेक्स (मराठी??) बोट दाखवत आजी म्हणते.
"हो, पण आजी मी विकत घेणार पेरू.. असेच नकोत मला" मी..
" न्हाइ गं बाई.. माजी प्वोर हायस.. म्हायेरी आलियास.. विकत नक गं बाई.." आवाजात जास्तीत जास्त मार्दव आणून आणि व्याकुळ होत आजी म्हणते.
मला तिचं मन मोडवत नाही. मी 'बर' म्हणते.
तिला कधीतरी औषधं, बिस्किट आणून हवी असली तर येऊन सांगते "ताई, तू भाइर गेलिस तर माजी इवडी औषदं आनि ती मारिची मिळत्यात तसली बिस्किटं बी आनशील ??" पैसे पुढे करते. मी घेत नाही. "आजी, अहो आहेत पैसे.."
"नगं.. हे घ्यून जा. " हातात कोंबते पैसे. मिही फारशी खसखस न करता ते घेते कारण त्यातून तिचा मला स्वाभिमान दिसतो. माझ्या पैशानी औषधं आणायची.. बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना.
या बाईचं मला आश्चर्य वाटतं.. काहीही होऊदे... पण तिचं कुत्र, तिची मांजरं.. आणि तिची बाग... या बद्दलचा तिचा अभिमान हा सतत असतो बोलण्यातून. दुसरा विषय म्हणून नाही.
या आजीची एक लकब आहे. ती खुर्चित बसली ना तरी डाविकडे उजवीकडे अशी डुलत असते. बहुदा तिच्या उतरत्या वयामुळे होत असावं.. जशी डॉ. श्रीराम लागूंची मान हलते तशी आजी खांद्याच्या रेषेत डुलत असते.
"बरं.. मी यू का आता?" आजी
" का हो बसा ना.." मी
" नगं.. राधा आणि सखी ( मांजरी आणि तिचं ते पिलू) येतील हितं हुडकत.. जातो आता" आजी. खरंच बरं का मंडळी, एकदा हि राधा आणि सखी आल्या होत्या आजीच्या मागोमग आणि आजी उठेपर्यंत कंपाऊंड वॉलवर बसून होत्या.
आजी उठते तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, काठी घेते आणि निघते. मी उठून आत येते आणि जवळ जवळ १० मिनिटांनी फाटकाचा आवाज होतो.. आजी आता कुठे गेटच्या बाहेर पडलेली असते हळूहळू तिच्या चालीने..
दुसरे दिवशी पुन्हा चिरक्या आवाजात हाक ऐकू येते.. "वयनी.. हैसा काय??"
- प्राजु
एप्रिल फळ (९)
प्रेषक विजुभाऊ ( सोम, ०७/१४/२००८ - ०९:२७) .या पूर्वीचे दुवे
http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)
http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८)
मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..
(क्रमश:)
आपल्या लहानपणच्या ब-याचशा आठवणी फ़ळांशी निगडीत असतात.लिची पेर पीच चेरी या पेक्षाही फ़णस चिक्कु पेरु आंबा बोरे चिंचा ही नेहमी दिसणारी आणि आपल्य इथल्या झाडांवर आढळणारी फ़ळे ती झाडे त्यावर खेळलेले खेळ हे सगळे आपले लहानपण घडवतात. जून सरता सरता फ़णसाचे आगमन होते. फ़णस म्हंटले की पटकन आठवतो तो पुलंचा अन्तू बर्वा.
कोकणातील माणसे फ़णसा सारखी असतात खूप पिकल्याशिवाय त्यांच्या गोडवा येत नाही म्हणतात. फ़णस आणि कोकण हे वेगळे करताताच येत नाही. पटकन सहजासहजी काही कोणाला मिळु द्यायचे नाही आणि दिले की भरभरुन द्यायचे हा कोकणीबाणा सुपारी;नारळा फ़णसाने कोकणी माणसाला दिला की कोकणी माणासाने त्याना दिला हे ठरवणे अवघड.राजकारण असो इतिहास असो किंवा अर्थकारण असो हा गुण सर्वत्र दिसतो.
दारातच स्वागताला उभे असणारे डेरेदार हिरवे; पानानी गच्च भरलेले फ़णसाचे झाड ही कोकणी कौलारू घरांची ओळखीची खूण. घरासमोर असणारा आड त्यावर कुर्र...की...च वाजणारा रहाट
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते. आणि घराच्या दारातच एखादी सुरुकतलेली आजीबाई गालावर तळहात दुमडुन बोटे मोडत "पुता तू होड जातलो रे" म्हणत प्रेमाने आपले मस्त गूळ पाणी देउन स्वागत करणार असे हमखास वाटते. कोकणची खरी ओळख म्हणजे फ़णस. स्वत:च्या अंगाखांद्यावर फ़णसाची बाळे वागवणारे फ़णासाचे झाड मला नेहमीच जिवती मातेची आठवण करुन देते. मूल व्हावे म्हणुन आंगाखांद्यावर दहाबारे लहान बाळे वागवणा-या जिवती मातेला नवस बोलला जातो. त्या देवीचे चित्र मी कुठल्याशा पोथीत जेंव्हा पहिल्यांदा पाहिले तेंव्हा मला फ़णसाच्या झाडाचीच आठवण झाली होती. मी माझ्या आजीला तसे सांगितलेही होते त्यावर आजी माझ्या पाठेत एक चापटी मारुन "चल पळ" म्हणुन फ़िस्सकन हसली होती.
पण फ़णसाचे झाड जेंव्हा केंव्हा पहातो तेंव्हा मला हीच आठवण होते.
फ़णसाचे प्रेमी कट्टर असतात.त्यावरुन माणसांचे विभाजन करायचे झाले तर फ़णस मनापासुन आवडणारे आणि अजिबात न आवडणारे अशा दोनच प्रकारचे लोक असतात. अधलामधला प्रकार माझ्या पहाण्यात तरी नाही.फ़णस न आवडणा-या माणसाला फ़णसा वास सहन सुद्धा होत नाही आणि फ़णसप्रेमी माणसाला तो दरवळ जागेवरुन हलुसुद्धा देत नाही.
परवा पार्ल्याच्या बाजारातुन सहज जात होतो तेथे काचेच्या पेटीआड ठेवलेल्या तो ग-याचा खजीना पाहुन मी मंत्रमुग्ध झालो. अगोदरच त्या फ़णसाच्या दरवळाने मला जागेवर थोपवुन धरले होते. गरे पाहिल्यावर मी कोठे निघालो होतो तेच विसरलो आणि ग-यांच्या दिशेने आपोआप चालु लागलो. माझ्याबरोबरचा मित्र ; त्याला फ़णसाचा दरवळ म्हणजे वास वाटतो. तो त्याने हैराण झाला होता आणि मी मिटक्या मारत त्या करकरीत ग-यांचा आस्वाद घेत होतो.
माझ्या लहानपणी असे फ़णसाचे गरे बाजारात मिळायचे नाहीत. त्यासाठी आख्खा फ़णस आणावा लागायचा. फ़णस आणला म्हणजे तो मग दोन तीन दिवस ठेवायचा किनतानात झाकुन ठेवायचा आणि पिकल्यावर त्याचा दरवळ सगळ्या घरभर सुटायचा.फ़णस घरात आणला म्हणजे त्याला टेकुन बसणे ; त्यावर हात दाबुन तळहातावर काट्यांमुळे उमटणारे खड्डे मोजणे हे आम्हा मुलांचे उद्योग. त्यासाठी आम्ही अभ्यास देखील त्या फ़णसाच्या सान्निध्यात करायला तयार असू.
फ़णस पिकुन त्याचा दरवळ घरभर झाला की मग त्यानन्तर तो फ़णस कापण्याचा सोहळा सुरु व्हायचा. सोहळाच म्हणायचा तो. खोबरेल तेलाची वाटी तर्हेतर्हेच्या सू-या आणि दोन पराती पाअतेली घेउन माझे धाकटे काका फ़णस कापायला बसायचे. पूजेला जसे सोवळे नेसावे लागते तसे फ़णस कापण्यासाठी सुद्धा त्यांचा एक खास पायजमा असायचा. त्यावर किनतान टाकुन ते फ़णस कापायला बसत. शस्त्रास्त्रांना धार लावताना अगोदर पाणी लावतात तसे सूरीला खोबरेल तेल लावले जायचे. आणि मग ती सूरी फ़णसातून आरपार जायची. अर्ध्या कापलेल्या फ़णसाला मग ते काका नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट हातानी फ़ाडले असेल त्या श्टाईल मधे दोन हातानी फ़णस उकलायचे. आम्हा मुलाम्चे सगळे लक्श्य त्यातून डोकावणा-या त्या सोनेरी चंदेरी खजिन्याच्या मोहोरांच्या तुकड्यांकडे असायचे.फ़णस उकलल्यानन्तर त्यातुन गरे वेगळे काढले जात. घरातल्या देवाला दोनचार गरे दाखवुन मग ते सगळ्यानी खायचे हा शिरस्ता.फ़णसाचे गरे एका पातेल्यात ठेवले जायचे सुरवाती सुरवातीला तर गरे पतेल्यात पडायच्या आतच ते पोटात पडायचे. दुस-या पातेल्यात नुस्त्या बीयाच असायच्या.नन्तर नन्तर तर आख्खे गरे संपल्यावर अगदी गरे असलेल्या रेशा सुद्धा शोधुन खाल्या जायच्या
आई; थोरली काकु; आत्या वगैरे महिला मंडळ " अरे गरे खाऊ नका पोट फ़ुगेल"वगैरे पोकळ सल्ले द्यायच्या पण आम्ही त्याला अजिबात दाद द्यायचो नाही.उलट "शाळेत कालच ;गरे खा गरे पोटाला बरे" हे बडबडगीत शिकलो आहोत ते काय उगाच" असे म्हणुन दाखवायचो. " शिवाजी महराजानी अफ़्जलखानाचे पोट फ़ाडुन त्याचा कोथळा बाहेर काढला" हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे.
फ़णसात दोन प्रकार काप्या आणि बरक्या.यातले कोणत्या झाडाला कोणते फ़ळ लागेल ते कोणीच सागु शकायचे नाही. आमच्या गावात भोरकर वाडा म्हणुन एक जुना वाडा होता तेथे फ़णसाची दोनतीन मोठी झाडे होती. मोसमात नेहमीच या झाडाना फ़णस लगडलेले असायचे.घरी फ़णस आणायचा तर त्या झाडावरचा एखादा फ़णस बूक करावा लागायचा त्या फ़णसावर अक्षरश: ज्याने तो फ़णस बूक केलेला आहे त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या डकवल्या जात. मला फ़णसानी लगडलेले ते झाड बघायला खूप आवडायचे झाडावर लगडलेला फ़णस हातानी चाचपडुन बघण्यातली गम्मत काही वेगळीच.एव्हढे मोठे फ़ळ झाडावर पहायल काहितेरी वेगळेच वाटायचे."अबबबबबबब केवढा फ़णस आई; आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोट्ठे नाही " या पाडगावकरांच्या गाण्या ची खरी गम्मत तो मोठा फ़णस पाहिल्यावर कळायची.
फ़णसावर थापट्या मारुन तो काप्या की बरका ते ठरवले जायचे.त्यावर थाप मारुन येणार्या ठप्प ठप्प किंवा थब्ब थब्ब आवाजावरुन ते कळायचे. देशावरच्या माणसाला काप्या फ़णस आवडतो तर अस्सल कोकणी माणसाला बरक्या.
काप्या फ़णसाचे गरे देशावरच्या घाटी माणसासारखेच फ़ारसे अंगाला लावुन न घेणारे; सुट्टे सुट्टे, करकरीत, थोडे कमी गोड असतात तर बरक्या फ़णसाचे गरे कोकणी माणसा सारखेच गोडीत अवीट ; पण हातात धरु म्हणता सुळ्ळकन हातातुन निसटुन खाणाराची फ़जीती करणारे.
फ़णासाचे गरे आयुर्वेदात रुचकर ; पौष्टीक असे काहीसे वर्णीले आहेत. पण खाणारा माणुस फ़णसाचे गरा तोंडात टाकतो तेंव्हा अजानतेपनी डोळे मिटतो. वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. अंतरात्मा तृप्त होतो.आणि हतिम बीन ताई च्या गोष्टीत सांगितलेल्या प्रमाणे "एकबार देखा है दूसरी बार देखने की चाहत है" या उक्तीनुसार आणखी एकदा ती तृप्ती अनुभवावी म्हणुन दुसरा गरा उचलण्यासाठी त्याचा हात दुस-या कोणाचेतरी नियंत्रण असावे त्याप्रमाणे हात गरे ठेवलेल्या भांड्याकडे आपोआप वळतो..
(क्रमशः )

चित्र सौजन्य : मदनबाण
यशवंत
प्रेषक विष्णुसूत ( रवी, ०७/१३/२००८ - १३:४३) ." साहब आपके वो दोस्त बहुत दिनों से दिखाइ नहि दिये ? "
"कौन ? "
"वो जो चाय और पकोडे मंगाया करते थे ?"
" ओ... वो... वो इंडिया चले गये .."
"क्यूँ ... रीसेशन के कारण ? ले ऑफ ? "
"नहि नहि... अपनी मर्जी से गये हैं ... उनका मन नहि लगा यहाँ "
"अच्छि बात है.. बडा जिन्दा दिल आदमी था.... उनके जैसा दुसरा आदमी जिन्दगी में नहि देखा हमने.. एक दिन इंडिया का नाम जरुर ऊंचा करेंगे.. "
"सहि बात कि आपने बलबीर जी "
भारतीय रेस्टॉरन्ट मधील वेटर बरोबर चा संवाद तिथेच संपला पण मनात विचारांचे एक चक्र सुरु झालं. तसा मी यशा ला विसरलो नव्हतो पण त्याच्याशी बरेच दिवसात फोन, पत्र, एमेल... काहि काहि नाहि ह्या जाणिवेने मन व्याकुळ झालं...
अमेरीकेतल्या वास्तव्यात भारतीय (इंडियन) रेस्टॉरन्ट हे भारतीय जेवण आवडणारया लोकांचे एक प्रकारचे घरच असते.. समविचारी लोकं अशा ठिकाणी आठवडा-दोन आठवड्यात भेट होत असे.. असाच आमचा कट्टा भरायचा.... अगदी मुंबईत शिवाजी पार्क वर किंवा पुण्यात "वैशाली" वर भरतो तसा... सर्व मित्र मंडळींना एकत्र जोडणारी कडि म्हणजे... यशा.. यशवंत.
ह्याने येथिल इंडियन रेस्टॉरन्ट च्या पंजाबी माणसाला सुध्दा कांदा भजी, बटाटे वडे, मिसळ ची तर्री, मिसळ, थालिपीठ असले पदार्थ शिकवले होते... कांदा तर हा इसम इतका सुंदर, समान आणि बारीक कापायचा कि एखाद्या फाईव स्टार च्या शेफ ला सुध्दा लाजवेल....
ह्या माणसाला काय म्हणुन येत नाहि असे नाहि... मराठि, इन्ग्रजी, साहित्य, संगित, फिलॉसॉफि, सायन्सेस.. सर्व विषयांचा भरपुर अभ्यास आणि जोडिला आधुनिक कॉम्पुटर विषयात पदवी...त्यामुळे कुठल्या हि विषया वर बोलताना एक प्रकार च वजन जाणवायचं .. ह्या माणसाने मला अगदी पहिल्या भेटित खिशात टाकलं होतं ..
चार पाच वर्षा पुर्वी ची त्याची पहिली भेट आठवली... विमान तळावर त्याला उतरवायला म्हणुन मी गेलो होतो.. आधि आम्हि कधिहि एका-मेकां ना पाहिले-ऐकले नव्हते..माझ्या मावस भावाचा यशवंत चुलत मित्र !! मी अमेरीकेत ज्या शहरात रहात होतो तेथिल विद्दापीठात यशा उच्च शिक्षण घेण्या साठि आला आणि आमच्या तारा जुळल्या ..भेटी होत राहिल्या.. अगदी गट्टी जमली... विकएन्ड ला त्याची भेट झाली नाहि कि चुकल्या-चुकल्या सारख वाटत रहायचं.
अमेरीकेत "भारतीय" म्हणुन बरीच लोकं एकत्र येतात .. भेटतात.. नंतर विसरतात हि पटकन.. पण यशवंत त्यामधील नव्हता. आमची "वेवलेंक्न्थ" चांगलिच जुळली होती.. वैचारीक संस्कृती, शाकाहारी खाद्द संस्कृती , संगित आणि स्पोर्ट्स हे आमचे समान धर्म ... यशा तसा माझ्याहुन वयाने लहान .. माज्या मावस भावाच्या वयाचा.. वर्गात सर्वात हुशार आणि कॉलेज मधे सर्वांचा आवडता.. माझ्या मावस भावा कडुन मी हा त्याचा मित्र "हायजाक" केला असं त्याच नेहमी म्हणणं असायचं !
भारतातुन अमेरीकेत येणारया लोकांन मधे तसे दोन प्रमुख वर्ग असतात... काहि विद्दार्थी म्हणुन येतात तर काहि नोकरी च निमित्त करुन ... तसे दोन्हिहि वर्गाचे व्यवहार "बजेट" वर चालतात पण विद्दार्थि वर्गा चे "बजेट" कडक असल्याने ते अपार्टमेन्ट वैगरे सहसा "शेयर" करुन काटकसरीने राहतात. यशा अमेरीकेला आला तो विद्दार्थि म्हणुन पण तो स्वतंत्र एका छानशा "एफिशन्सी" अपार्टमेंट मधे एकटा रहायचा. अर्थात त्याला पुर्ण स्कॉलरशिप होती हे जरी खरं असलं तरी तो खर्च करताना हात आवरता घेत नव्हता हे जाणवलं ..
यशवंत होताच तसा वेगळा... बाकिच्या विद्दार्थि वर्गा पेक्षा हा फारच शांत संयमी , विचारवंत, आणि ज्याला इंग्रजी मधे "हंबल" म्हणतात असा..इतका तडफदार, प्रसन्न आणि बहुश्रुत दुसरा माणुस माझ्या पहाण्यात नाहि. त्यांचं बोलणं ऐकत राहावसं वाटायचं. अशा लोकांना भेटलं कि मला नेहमी आपण खुप लहान आहोत ह्याची जाणिव होते.. हवी हवी शी सुखद जाणिव.. त्याचं बोलणं आणि सहवास अगदी हवाहवासा वाटायचा..आमचं सूत चांगल जमलं .. शनिवार रविवार एका मेकां च्या भेटी शिवाय जाणं अशक्य होतं !
वयाने लहान असली तरी अशी गुणवान माणसं लगेच आसपास च्या सगळ्या लोकांचा आदर प्राप्त करुन घेतात.. आणि तसंच झालं. मास्टर डिग्री दिड-दोन वर्षात मिळवुन कॉम्पुटर सायन्स मधील आपले प्रभुत्व सिध्द करताच एका मोठ्या कॉम्पुटर कम्पनी ने यशा ला चांगली नोकरी बहाल केली... त्या नंतर आमच्या भेटि गाठि बरयाच कमी झाल्या... यशवंत "सिएटल" ला गेल्यावर तर कधी महिन्यात एखादा फोन किंवा ईमेल वरच "कॉन्टॅक्ट" राहिला !
सहा महिन्या पुर्वी अचानक यशा चा फोन आला होता.. " मी भारतात चाललो आहे .. माझं अमेरीकेतलं काम संपल आहे"
मी म्हणालो.. संपलं आहे ?? काय झालं एकदम ?
" अरे तसं काहि नाहि... मला कोणी हाकलत वैगरे नाहिये... तुला आठवतं का मी तुला सांगितलं होतं ? "
काय ?
" मला आयुष्यात फक्त दोन लोकांना भेटायचं आहे..."
हो.. हो ..आठवत ना .. बिल गेटस आणि झानेश्वर !!!
" हो बरोबर .... बिल गेटस बरोबर वैयक्तिक रित्या एका प्रोजेक्ट वर काम केलं मी.. धन्य झालो.. आता परत जातो "
मी अवाक झालो... काय म्हणणार ?
स्वत: ला सावरत म्हणालो.. "यशा टेक केयर ऍन्ड गुड लक... बट डु किप इन टच.."
" शुअर... योग आला तर नक्कि भेटु... भारतात गेल्यावर टाकिन तुला फोन "
बाकि काहिच बोलता आलं नाहि.
देवावरचा विश्वास उडालेल्या काळात.. यशा नी मला सावरलं होतं.. धीर दिला होता.. मी त्याला काय उपदेश देणार?
ज्ञानेश्वरी, दासबोध, तुका, चोखामेळा सगळे अगदी ओठावर खेळवणारा यशवंता.. त्याच्या कडुन "पसायदान" , "अवचिता परीमळु", "अरे अरे ज्ञाना झालासी आणि " पांडुरंग कांती" ह्यावरचं निरुपण ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आहे... त्या दिवशी.. रात्री त्याने "विश्वाचे आर्त" खरंच माझ्या मनी प्रकाशले असं मला वाटलं !!
मी त्याला एकदा "ज्युनियर राम शेवाळकर" म्हणल्यावर तो जो लाजला होता तो चेहरा मला अजुन आठवतो. यशवंता मधे एक "स्पार्क" होता.
कुठे असेल आत्ता यशा ? मला काहि सुचेना.. थोडाफार स्वतःवरच राग आला.. मी तरी असा कसा ? इतके दिवसात मी का नाहि केला त्याला फोन... ? पण माझ्या कडे त्याचा फोन नंबर तरी कुठे आहे ? हो खरच... इमेल पाठवला होता मी त्याला वाढदिवसाला.. पण काहिच उत्तर नाहि.. थँक्यु सुध्दा नाहि ! बहुतेक पर्सनल ईमेल बघायला वेळ झाला नसेल त्याला..
तडक मावस भावाला फोन लावला.. त्याला रात्री झोपेतुन उठवलं .. आणि विचारलं
तो म्हणाला " कोण यशा ? " .. भारतात ... अरे माझा तर त्याच्याशी जवळ जवळ वर्षभरात कॉन्टॅक्ट नाहिये...
"असं कसं म्हणतोस? तो तर सहा महिन्यापुर्वीच भारतात गेला की... बघ जरा चौकशी करुन... "
दुसरयाच दिवशी मावस भावाचा फोन... अरे यशा बद्दल माहिती समजली....
" तो सहा महिन्या पुर्वी भारतात आला ते त्याच्या आइ च्या आजारपणा मुळे.. कॅन्सर.. महिनाभर त्याने आईची सुश्रुषा केली... एकुल ता एक मुलगा.. लहान पणीच वडिल गेल्या मुळे आइनेच सर्व केले होते त्याचे... "
" काहि महिन्या पुर्वी आई गेली.. अगदि सुखात... मुलाच्या मांडिवर डोकं ठेवुन प्राण सोडले "
"यशवंता नी सर्व घर, दार, शेती विकुन टाकली आणि सन्यास घेतला आहे.. त्याचा कोणाला हि पत्ता माहित नाहि"
फोन च्या दुसरया बाजुला मी अवाक होउन ऐकत होतो.. ... फोनवरच अशा गोष्टि ऐकणं सोपं असतं.. म्हणजे फोन म्युट करुन ढसा-ढसा रडणं कोणाला ऐकु येत नाहि ..
देव देव म्हणतात ते तरी नक्कि काय हो ? असाच यशवंता सारखा कोणी आपल्या आयुष्यात यावा... भाजुन जर-जर झालेल्या अंगावर चंदनाचा लेप लावुन.. नव चैतन्य आल्यावर .. एक लहानसा चटका लावुन ..पत्ता न सांगता परत निघुन जावा...तो असल्याची जाणिव करुन देत !!!
आषाढी एकादशी च्या दिवशी मला यशवंताची आठवण यावी ह्यात काहि नवल नाहि!
भारतातील प्रत्येक तिर्थक्षेत्राच्या दर्शनाच्या वेळी माझी नजर यशवंता ला शोधत होती..कोणाला यशवंत भेटला तर नक्की कळवा... तसा तो चार चौघात ओळखायला अवघड नाहि... त्याला म्हणावं पत्ता कळव.. मी त्याची वाट पहातो आहे.
होय म्हाराज्या!
प्रेषक श्रीकृष्ण सामंत ( शनी, ०७/१२/२००८ - २२:५८) .कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजार्याकडून (भटजीकडून) गार्हाणं
घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते.पुजार्याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते.
ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गार्हाणं घातलं,आणि ते मालवणीतून.
आमची दोन नातवंडं या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना
यश,समाधान,आणि चांगली बुद्धि दे हि बाप्पामोर्याला विशेष विनंती होती.
बाप्पा मोर्याला गार्हाणं ......
हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर-पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गार्हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.
"होय म्हाराज्या"
हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊ दे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.
"होय म्हाराज्या"
हे देवा,आज, आमच्या जांवंयबापूचो, जन्मदिवस आसां.तेंका उदंड आयुष्य दी.
"होय म्हाराज्या"
हे गणनायका,लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत,तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे,तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे.
"होय म्हाराज्या"
हे गौरीपति, पुढची सगळी, चार वर्षां, त्या दोघांक, सुखाची जावूं दे,असा तुका आमचा सांगणा.
"होय म्हाराज्या"
शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा, तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास, आमका सगळ्याक, क्षमा कर.
"होय म्हाराज्या"
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या, पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.
"होय म्हाराज्या"
गणपती बाप्पा मोर्या.पुढ्च्या वर्षी लवकर या.
श्रीकृष्ण सामंत
एप्रिल फळ (८)
प्रेषक विजुभाऊ ( शुक्र, ०७/११/२००८ - ०९:५५) .या पूर्वीचे दुवे
http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)
आंबा खाण्याची माझी सर्वात आवडती पद्धत सांगतो.
मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा. त्याच्या तलम सालीचा स्पर्श अनुभवावा. त्याचा घमघमाट नाकापासुन फूटभर अन्तरावरुनही येत असतो .टोकाकडुन आंब्याचे साल दाताने सोलावी. आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी. खाण्या अगोदर डोळे बन्द करुन तो गुळगुळीत स्पर्श ओठानी अनुभवावा.आणि आता कशाचीही वाट न पहात बसता आंबा एकेक तुकडा तोंडात घोळवत सम्पवुन टाकावा. आहाहा त्या स्पर्शाने , राजेशाही वासाने , तलम स्पर्शाने ,राजवर्खी केशरी दर्शनाने आणि ताँडात घोळवत खालेल्ल्या स्वर्गीय चवीने मन एकदम तृप्त होते . मनात कोठेतरी स्वर्गीय संगीत ऐकु येउ लागते.अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो.
नाक कान डोळे स्पर्श आणि जीभ या पन्चेन्द्रीयना तृप्तीचा अनुभव देउन खाणार्याला श्रीमन्त करणारा आंबा हा खराखुर्रा सम्राट शोभतो..
मे संपता संपता पावसाची चाहुल लागते.आकाशात वारंवार नजरा जाऊ लागतात. आई वहिनी आत्या वगैरे महिला वर्ग लोणचे करणे आम्बोळ्या कुरडया, पापड सालपापडाचे वाळवण इत्यादी बेगमीच्या कामात मग्न असतात. मुलानाही शाळेचे वेध लागलेले असतात. सूट्टी संपता संपत नसते लोळत पडण्याचाही कंटाळा आलेला असतो. पत्ते , बुद्धीबळे , कॆरम अस्ताव्यस्त विखुरलेले असतात.
काय करावे हा मोठाच प्रश्न असतो. आईला वाळवण घालायच्या कामात मदत करायला परवानगी नसते. ती करताना काम कमी आणि खादाडी जास्त असते हे आईही ओळखुन असते.
अशात एकदम दूरून एक मस्त आरोळी ऐकु येते...........आssssssssssल्फ़ीये कुल्फ़ी मलाsssssssय. कुल्फ़ी मलैssssssय.
पाउल जागच्या जागी थबकते. कंटाळ्यामुळे बधीर झालेले डोके एकदम चालु लागते.खीडकीतुन कुल्फ़ीवाला कुठे दिसतो याचा अंदाज घेत प्यान्टचे खिसे , टेबलाचे ड्रॊवर , पेन स्टेन्ड , गादीखाली , उशीच्या अभ्र्यात असे ठेवणीच्या गुप्त जागेत लपवलेले चिल्लर धन बाहेर येउ लागते. डोक्यावर माठ ठेवलेला कुल्फ़ीवाला दिसला की अक्षरश: भक्ताला देव भेटल्याचा आनन्द होतो.
आसपासच्या दोनचार खिडक्यातुन ओ कुल्फ़ी......थांबा अशा हाका ऐकु येतात.आणि मुले घराबाहेर पळ काधतात. घराच्या दारात्च कुल्फ़ीवाला त्याची ती माठ असलेले बाम्बुची टोपली अलगद उतरवुन ठेवतो तेंव्हा त्याचा थाट पहाण्यासारखा असतो. त्या्चा तो मिठाच्या बर्फ़ाने भरले्ला माठ. एखाद्या खालसा संस्थानाच्या कारभा-याने संस्थानचा खजी्ना दाखवावा तसा तो अलगद माठावरचे कापड बाजुला करतो त्यात बर्फ़ाच्या पाण्यात तरंगणा-या कुल्फ़ीच्या लोखंडे साचाच्या डब्या मुले अगदी अधाशासारखी पहात असतात.कुल्फ़ीचा साचा धरण्याची ती ढब . साचाच्या डबीवरील ते कणकेचे सील नखाने बाजुला काढले जाते.मुलांची इत्सुकता शीगेला पोहचलेली असते. साच्याचे डबीचे झाकण मोकळे होते . ती शंकु च्या आकाराची काळपट डबी तिरकी धरुन गुढग्यावर मूठ आपटत त्यातुन पांढरी शुभ्र कुलफ़ी बाहेर काढली जाते. बाहेर येणा-या कुल्फ़ीबरोबर पहाणाराचे डोळे विस्फ़ारत जातात.
अखेर शेवटी ती कुल्फ़ी वडाच्या पानावर आडवी ठेवुन चाकुने तीचे काप होऊन जेंव्हा ते वडाचे पान कुल्फ़ी सहीत हातात पडते तेंव्हा मनात कुल्फ़ीशिवाय दुसरा कोणताही विचार येत नाही.
इतकी एकाग्रता जर कोणी देवधर्मात प्रार्थनेत दाखवली तर देव ती प्रार्थना संपायच्या आतच प्रसन्न होऊन दर्शन देईल. वडच्या हिरव्यागार पानावर ठेवलेले ते कुल्फ़ीचे पांढरे शुभ्र काप पहात रहावे असे वाटत असतानाच जीभ डोळ्यांवर आक्रमण करते आणि बघताबघता कुल्फ़ी तोंडात विरघळुन जाते.कुल्फ़ी एकच खाउन थांबला असे जर कुणाच्या बबतीत झाले असेल तर तो मनुष्य हा जितेंद्रिय पदाला पोहोचलेलाच असला पाहिजे. हळुहळु त्या कुल्फ़ीवाल्या जवळ गर्दी जमते. मघाशी त्या पापडकुरडया जवळ फ़िरकु न देणा-या आयाबाया ती कामे सोडुन कुल्फ़ीच्या खजिन्या भोवती गोळा होतात. कुल्फ़ीवाल्याच्या माठातुन शेवटीशेवटी शोधुन्शोधुन कुल्फ़्या काढल्या जातात. माठातल्या कुल्फ़्या संपल्या की मगच कुल्फ़ीवल्याला जाऊ दिले जाते.
कुल्फ़ीवाला जातो ना जातो तोच दुसरा एक आवाज येतो..........हे काळी मैना काळी मैना डोंगरची काळी मैना......
मुली याची वाटच बघत असतात. काळीशार करवंदे....निरागस पण अवखळ लहान मुलाच्या खट्याळ डोळ्यांची आठवण व्हावी असेच ती पाटीत ठेवलेली मण्यांसारखी करवंदे पाहुन वाटते.
किंचित आम्बट आणि गोड अशी चव...नुसती सांगुन कलणार नाही ती चाखायलाच हवीत. करवंदे चाखताना ती लाल की पांढरी आहेत त्या वरुन चिमणी आहेत की कावळा आहेत हे ठरवायचो. ज्याला जास्त कावळे तो त्या दिवशी जिंकला असे आम्हाला वाटायचे.
करवंदे खाताना एक गम्मत असते...करवंदे खावीत तर गच्चीत बसुन नाहीतर घराच्या कट्ट्यावर बसुन....करवंद हे फ़ळ सोफ़्यावर बसुन सगळे शिष्ठाचार पाळुन खाण्याचे नव्हेच. ते चाखत माखतच खायचे असते. करवंदांच्या फ़्यामिलीत जमा होईल असा चन्यामन्या नावाचा बोरांचा एक प्रकार असतो. नुसते नाव काढले तरी जिभेला पाणी सुटते. लालसर केशरी बारीक मोत्या सारखी दिसणारी किंचीत सुरकुतलेली ती फ़ळे इतकी आम्बट असतात की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. त्याला मिठाची जोड असेल तर काय विचारु नका.
पण ती सुद्धा खायची एक पद्धत आहे. कागदाचा त्रिकोनी द्रोण करुन त्यात अंदाज लागणार नाहीत इतकी चन्यामन्या बोरे त्यात भरायची आणि रस्त्याने रमतगमत जात खायची. आंबटपणामुळे जीभ जास्त वेळा टॊक्क करते की डोळे जास्त वेळा मिचकावले जातात आशी स्पर्धा सुरु असते.
करवंदे इतकी आंबट नसतात. पण ती त्यांच्या जादूई चवीमुळे वेड लावतात हे मात्र नक्की.
करवंदे एकेक करुन चाखत माखत खाणे आणि एकदम त्यांचा बकणा भरणे ...हे दोन्ही प्रकार अजबच आनन्द देतात. एकेक करवंद जिभेवर घोळवत खायचे.आणि दहाबारा करवंदे एकदम चावायची मजा वेगळीच. करवंदांच्या बिया चावताना च्युईंगम खाल्ल्याचेही सूख मिळते.
करवंदांबरोबरच येतात ती जांभळे.आमच्या गावात जवळच एक जाम्भळाचे जंगल आहे. बघावे तिकडे जांभळाचेच झाड. अक्षरश: झोपुन तोडता येतील इतक्या खाली वाकलेल्या फ़ांद्याम्वर असतात जांभळे तेथे ही छोटी जाम्भळे मिळतात. साल आणि बी यात अंतर फ़ारसे नसते. गर वगैरे चैन नसते.
पण ही जांभळे चवीत मात्र लाखात एक. खाताना असेच हवे तसेच हवे अशी उगाच मिजास नसते. जे मिळेल त्या भांड्यात घेउन खावी. न मिळाल्यास ओंजळीत घेउन खावी. हां पण एक आहे जेथे रस्ता जवळ असेल अशाच जागेवर बसुन / उभे राहुन खावी. लहानपणी आम्ही भावंडे ही जाम्भळे घराच्या खीडकीत उभे राहुन खायचो.आणि बीया जोरात रस्त्यावर उडवायचो. तोंडाने उडवुन कोणाची बी जास्त लाम्ब जाईल ते पहायचो.
दुसरी जांभळे असतात ती जरा जाड खात्यापित्या घरची. त्याना गर असतो. आम्बटपणा कमी असतो पन गोडवाही कमी असतो. ही जाम्भळे खाताना साल दातानी सोलुन आतला पांढरा नीळा गर उगाचच टिनोपालच्या जहिरातीची आठवण करुन देतात.
जाम्भळे करवंदे डहाणु घोलवडकडे मिळणारे पाण्याच्या चवीचे जाम. ही सारे असतात कोकणचा मेवा त्याना आंब्याइतके कोणी फ़ारसे ओळखत ही नाही. पण ज्याना ती माहित आहेत त्याना ते कोठेही असो प्रत्येक मोसमात या मेव्याची हटकुन आठवण होतेच.
मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..
(क्रमशः)
ताजमहाल कसा बांधला
प्रेषक निलेश आबा ( गुरू, ०७/१०/२००८ - १६:२६) .ताजमहाल कसा बांधला, ?
तो वेदकालीन आहे काय ?
गेली दोनशे वर्षे ताजमहालविषयी अनेक दंतकथा पसरल्या आहेत. त्या सर्वांत एक ब्रह्मवाक्य मात्र कायम असते, ते म्हणजे `बांधकामासाठी २० हजार माणसे २२ वर्षे सतत काम करत होती.' आज ही गोष्ट जगातील सगळया अबालवृद्धांना ठाऊक आहे. साहजिकच प्रश्न पडतो की, हे आकडे आले कोठून
ब-याच दिवसापूर्वी मला एक इ-मेल आला होता, त्यात ताजमहालाबद्दल बरेच काही लिहिले होते, त्याला छायाचित्रांची जोड होतीच. असेच इ-मेल्स ब-याच जणांना गेली असतील, त्यात पुरातत्व खात्यातील लोकसुद्धा असतील... मलासुद्धा असा प्रश्न पडतो की जर इतके सबळ पुरावे असतीलच तर मग ते प्रकाशात का येत नाहीत? कोणी संशोधक यात का लक्ष घालत नाहीत?? हिन्दुत्ववादी संघटना कुठे गेल्या????
बसंतचं लग्न..१४
प्रेषक विसोबा खेचर ( बुध, ०७/०९/२००८ - १८:५७) .
बसंतचं लग्न..१ (ओळख)
बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)
बसंतचं लग्न..३ (भूप)
बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)
बसंतचं लग्न..५ (बिहाग)
बसंतचं लग्न..६ (मालकंस)
बसंतचं लग्न..७ (हमीर)
बसंतचं लग्न..८ (भीमपलास)
बसंतचं लग्न..९ (मुलतानी)
बसंतचं लग्न..१० (तोडी)
बसंतचं लग्न..११ (शुद्धसारंग, गौडसारंग)
बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)
बसंतचं लग्न..१३ (केदार)
राम राम मंडळी,
आमच्या बसंतचं लग्न अगदी दृष्ट लागेल असं सुरू आहे बरं का! एकापेक्षा एक दिग्गज असे राग स्थानापन्न झाले आहेत. वेगळ्यावेगळ्या भरजरी स्वरांनी, सुरावटींनी, राग-रागिण्यांच्या सौंदर्यानी आता तो मंडप नटला आहे. मोठमोठ्या रागांची गळाभेट होते आहे. मुलतानी, मल्हार सारखे दिग्गज राग मालकंसासारख्या योग्याची आदबीने विचारपूस करत आहेत. तर कुठे नट, हमीर, केदारासारखी जवान मंडळी बुजुर्ग अशा आमच्या दरबारीला काय हवं नको ते विचारत आहेत! यमन सगळ्यांना हळवेपणाने भेटतो आहे तर तोडीच्या चेहेर्यावरूनही उगाचंच थोडीशी स्मितहास्याची रेषा उमटते आहे! अहो आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताची श्रीमंती वर्णावी तरी किती?
पण, त्या रागदारीच्या मांदियाळीमध्ये एक 'देस' नावाचा पाहुणाही आहे बरं का! बसंतच्या लग्नाचा आनंद, रागदारीतली इतर भावंडं भेटल्याचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय त्याच्या चेहेर्यावरून!
राग देस! कसं आहे हो या देसचं व्यक्तिमत्व?
आपला देस तसा हळवा आहे, प्रेमळ आहे, वृत्तीने अगदी रसिक आहे, अन् मोठ्या मनाचा आहे! परंतु स्वभावाने मात्र तसा प्रवाही आहे. एके ठिकाणी फार वेळ थांबणं, गुंतून राहणं त्याच्या स्वभावात नाही. याच्यात सतत पुढे जाण्याची अत्यंत उत्साही वृत्ती आहे.
देस रागाचं स्वरूप पटकन लक्षात येण्यासाठी हे क्लिपिंग ऐका. आग्रा गायकीतल्या माझ्या आवडत्या गायिका शुभ्रा गुहा यांचं हे किल्पिंग आहे. खूप छान आहे ही बंदिश!
देवगंधर्व भास्करबुवा बखले! ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर या घराण्यांवर अनन्यसाधारण हुकुमत असलेला एक दिग्गज गवई, त्याचसोबत मराठी संगीतरंगभूमीवरचा एक दिग्गज संगीतदिग्दर्शक. शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली,
"पिया कर धर देखो धडकत है मोरी छतिया!"
ही एक अतिशय लोकप्रिय बंदिश इथे ऐका. आहाहा, काय सुरेख बंदिश आहे! भास्करबुवांच्याच शिष्य परंपरेतले मास्तर व त्यांचे शिष्योत्तम संगीतभूषण पं राम मराठेदेखील ही बंदिश फार अप्रतीम गायचे. पण भास्करबुवा एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी याच बंदिशीवर आधारीत संगीत स्वयंवरात काय सुंदर नाट्यपद बांधलं पाहा -
"मधुकर वन वन फिरत करी गुंजारबाला"
आणि अहो साक्षात नारायणराव बालगंधर्वांच्या स्वरांचा परिसस्पर्श झाला या पदाला! आणखी काय पाहिजे?! सुजन कसा मन चोरी, नाथ हा माझा, मधुकर वन वन अशी एकापेक्षा एक सरस पदं भास्करबुवांनी बांधावीत आणि नारायणराव बालगंधर्व या त्यांच्या शिष्योत्तमाने आपल्या स्वर्गीय स्वरांनी ती अजरामर करावीत! भास्करबुवा-बालगंधर्वांची किती थोर शिष्यपरंपरा आहे ही! मन भरून येतं!
मंडळी, आपली सर्वांचीच पूर्वपुणाई म्हणून या देस रागात अजून एक अप्रतीम गीत जन्माला आलं आणि तुमचेआमचे कान अगदी तृप्त झाले!
उदास का तू, आवर वेडे नयनातील पाणी
लाडके कौसल्ये राणी!
वसंत आला तरुतरूवर, आली नवपालवी
मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी
कानी माझ्या घुमू लागली सादावीण वाणी, लाडके कौसल्ये राणी...
ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी,
चार बोबडे वेद रांगतील तुझ्या धर्मरत घरी
विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानी, लाडके कौसल्ये राणी....
महाराष्ट्रवाल्मिकी गदिमांच्या सिद्ध लेखणीतून हे शब्द उतरले आणि ते वाचतावाचताच स्वरगंधर्व बाबूजींच्या मनात देस रुंजी घालू लागला आणि एक अप्रतीम गाणं जन्माला आलं. मंडळी, या गाण्याला दाद देतांना गदिमांबाबूजींइतकीच आमच्या देसलाही दाद द्यायला विसरू नका बरं का! 
खरंच मंडळी, अहो ह्या देसमुळे मन प्रसन्न होतं अगदी! मनातले सगळे विकार नाहीसे करण्याची ताकद आहे याच्यात!
वसंत पवारांसरखा संगीत दिग्दर्शक आणि आशाताई-बाबुजींसरखे गायक एकत्र येतात आणि देस रागातलं एक केवळ अन् केवळ अप्रतीम गीत जन्माला येतं! कोणतं गीत?
रुपास भाळलो मी,
भुललो तुझ्या गुणांना
मज वेड लाविले तू
सांगू नको कुणाला!
एकान्त पाहुनिया,
जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी
सांगू नको कुणाला!
क्या बात है! प्रेम करणार्या दोन जिवांतलं हे गूज देसमध्ये ऐकायला किती सुंदर वाटतं, तरल वाटतं! क्या बात है वसंत पवारसाहेब! जियो...!
"सुखदां वरदां मातरम्, वन्दे मातरम् !"
काय ओळखलंत का मंडळी? अहो हा पण देसच की! अहो हा तर हा आपल्या देशाचा देस!
उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अखंड भारताला एका सूत्रात बांधून ठेवायची अजब किमया साधली आहे देस मधल्या या राष्ट्रगीताने! या गीतातील देसच्या स्वरात आपल्या भारतीयांच्या संस्कृतीची, परंपरांची अन् सभ्यतेची, उत्सवप्रियतेची एक छानशी सावली दिसते! आणि म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यवर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आमच्या अण्णांसारख्या दिग्गज गवयाचे 'वन्दे मातरम्'चे सूर संसदेत उमटतात, मनात देसप्रेम आणि देशप्रेम दोन्हीही जागृत होतं आणि जीव धन्य होतो!
आत्ताही माझ्या कानात काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर अण्णांनी गायलेल्या,
"बजे, सरगम बजे,
हर तरफसे सरगम बजे, गुंज बनके देस राग!"
ह्या गाण्याचे स्वर रुंजी घालत आहेत....!
-- तात्या अभ्यंकर.
माझ्या साहित्यिक मैत्रांनो (आमच्या आगामी अध्यक्षीय भाषणातून साभार)
प्रेषक सर्किट ( मंगळ, ०७/०८/२००८ - ०८:५२) .(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बे एरियात होणार ही बातमी मिळाल्यापासून आम्ही सदर संमेलनाच्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत. मधु मंगेश कर्णिक आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी सदर संमेलनाला दाखवलेला विरोध आम्हाला अधिकच सुखकर वाटला, कारण त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची आमची लहानपणापासूनची महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार, हे नक्की. आमच्या ह्या महत्वाकांक्षेला आजवर एकमेव आव्हान होते, ते येथील, म्हणजे बे एरियातील स्वघोषित साहित्यिकांचे. पण "कला" ह्या मराठी साहित्यप्रेमीच्या जगातील एकमेव संस्थेने सदर साहित्य संमेलनाला दर्शवलेला विरोध लक्षात घेता, आमचा अध्यक्षपदाचा मार्ग खुला झाला, आणि आम्ही भाषण लिहायला घेतले. त्यातील काही अंश आगाऊपणे - म्हणजे ऍडव्हान्स ह्या अर्थाने - आम्ही येथे मांडतो आहोत.)
मैत्रहो,
बे एरियातील वादग्रस्त ठरलेल्या ह्या साहित्य संमेलनात आपले स्वागत आहे. आणि का नसावे ? संमेलनापूर्वीच्या चर्चांतून असे वाटले होते, की एकूण फक्त १५३ साहित्य प्रेमी ह्या संमेलनाला हजेरी लावतील. पण दोन साहित्यप्रेमींनी आपापल्या बायकांना पण सोबत आणले आहे, त्यामुळे १५५ रसिकांची उपस्थिती लाभून ह्या साहित्यसंमेलनाला घवीघवीत यशच प्राप्त झाले आहे. लॉस एन्जेलिस आणि सॅन डियेगो भागातून फक्त ८ जण येतील असे वाटले होते. पण नंदन आणि डांबीसकाका ह्यांनी नंदिनी आणि डांबिसकाकूंना (अनुक्रमे, उगाच घोळ नको) येथे आणले त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करू या, असा ठराव मी मंाडतो.
(ठाले पाटील अवतरेंच्या कानात: फुडच्या वर्षी ड्यांबीसला अद्यक्ष करनार, म्हनून तू म्येल पाटवली, त्ये येक ब्येस केलं.)
मैत्रहो, आपल्या लक्षात आलेच असेल, की मी आपल्याला मैत्र म्हणून संबोधतो आहे. नेहमीप्रमाणे "मित्र-मैत्रिणींनो" असे नाही. ह्याचे मूळ कारण की आपण बे एरियात आला आहात. इथे मित्र आणि मैत्रिणी हा भेदभाव आम्ही करत नाही. संत फ्रान्सेश्वराच्या ह्या नगरीत ह्या क्षुल्लक लिंगभेदाला स्थान नाही. बाया-बायांची आणि बाप्या-बाप्यांची यथासांग लग्ने लावून देण्यात ही नगरी प्रसिद्ध आहे. इथे आजकाल लग्नाच्या सरकारी अर्जावर नवरा आणि बायको अशी नोंद नसते, तर अशील क्र. १ आणि अशील क्र. २, असे लिहून जागा सोडलेली असते. (स्वत:चे शील न सांभाळणारे, ते अशील ही कोटी आपल्यातले काही गंभीर असे विनोदी साहित्यिक करतीलच. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही दुसरे काय ?)
मैत्रहो, आपले साहित्यक्षेत्र ही नवीन सामाजिक परंपरा कधी आणि कशी जवळ करणार, हा आम्हाला सध्या छळणारा मुख्य प्रश्न आहे. आजवर आपल्या मराठी ह्या प्रगल्भ भाषेत समलिंगी संबंधांना स्वीकारणारे एकही लिखाण झालेले नाही. दिवसाला एक, ह्या दराने प्रेमकविता पाडणाऱ्या आपला कविवर्ग (विशेषत: कवयित्रीवर्ग, ह्यांना अशा कविता पाडायला बराच वेळ मिळतो) ह्या दुसऱ्या नाजुक नात्याविषयी काहीच कसे लिहीत नाही ? मैत्रहो, आज ह्या वाटमोड्या (पाथब्रेकिंगला कुणी मराठी शब्द सुचवा हो) साहित्यसंमेलनात आपण प्रतिज्ञा करूया, की आजपासून आपले कुठलेही मराठी साहित्य लिंगभेद करणार नाही. जुने जाऊ द्या तिकडे (जिकडे सगळे जुने जाते, तिकडे.. त्या प्राण्याच्या पार्श्वभागातील त्या विशिष्ट अवयवाचा जाहीर उल्लेख करणे फक्त विद्रोही साहित्य संमेलनातच शक्य आहे.) आजपासून आपण माझ्या लिंगसमतेच्या चळवळीला हातभार लावावा, ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे.
ह्यासाठी जुन्या साहित्याचे संशोधन करणे आवश्यक आहे. आता तांब्यांचीच कविता घेऊ या, आणि तिला लिंगसमतेच्या चळवळीत आणू या. म्हणा तर माझ्या मागून.
व्यक्ति व्यक्तिची सलज्ज कुजबुज
झाडाझुडपांचे हेच मधुर गुज...
("वृक्षलता" हे भिन्नलिंगत्वाचा पुरस्कार करणारे असल्याने मुद्दाम बदललेले आहे. साहित्यिकांनी लिंगसमतेवर छुपेपणे केलेल्या अशा प्रहारांविषयी जागृत असावे.)
भटांच्या गझलांना लिंगसम करणे खूप सोपे आहे.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
हे पुरुषाने म्हटले, की झाले. किंवा
पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली..
हेदेखील ह्या थोर नगरीतील एखाद्या पुरुषाने गायले, तरी पर्फेक्ट!
(विशेषत: ह्यातील "रेशमाची" हा उल्लेख आमच्या बे एरियातील निसर्गोत्पादित वस्तूंविषयीचे प्रेम व्यक्त करणारा आहे, त्यामुळे आमचे त्याला अनुमोदन आहे. पुढचा मुद्दा बघा.)
मैत्रहो, आमच्या बे एरियातील संवेदनशील मनामनाला भिडणारा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कृत्रिम वस्तूंविषयी असणारा द्वेष. येथे कुणी झाडे तोडणार, असे म्हटले, की आम्ही त्या झाडांवरच ठाण मांडून बसतो. "कला"च्या पत्रकामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या बर्कली ह्या विद्यापीठात आम्ही असेच केलेले आहे. तेथील क्रीडावास्तूसाठी १०-१५ झाडे तोडणार असे ऐकल्याबरोबर आम्ही संवेदनशील मंडळी त्या झाडांनाच आमचे घर केले. निसर्गाशी सान्निध्य साधून वैश्विक तापवृद्धी टाळण्याचा ध्यास घेतलेले श्री. ऍलराव गोरे पाटील हे आडनावाने मराठी आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
आज आपण दुसरी एक प्रतिज्ञा करू या, की आपले सर्व लिखाण हे निसर्गाशी एकात्मता साधणारे हवे. आपण आजवर आपल्या लेखनातून नैसर्गिक एकात्मतेला फाटाच दिलेला आहे. नायिकेने घातलेला शिफॉनच्या सूटचे वर्णन करताना, त्यात नैसर्गिक कापसाचे प्रमाण किती आणि प्रयोगशाळेत घडवलेल्या रसायनांचे प्रमाण किती, हे आपण लिहायचे टाळतो. अगदी हेच बघा ना, एकेकाळी साहित्यिक म्हणून गणले जाणारे पुलंदेशपांडे ह्यांनी देखील (सुनीताबाईंचा धाक, आणि बाबा आमट्यांशी ओळख असूनही) कधीही ही नैसर्गिक एकात्मता त्यांच्या लिखाणात दाखवलेली नाही. मी फक्त एक उदाहरण देतो. त्यांनी स्वत: खाल्लेल्या विविध पदार्थांचे वर्णन करून (इतर लोकंाना जळवावे ह्या दृष्टिकोनातून) "माझे खाद्यजीवन" असा लेख िलहिला होता. पण त्यांनी खाल्लेल्या पदार्थांत नैसर्गिक घटक (ऑर्गॅनिक) किती, मेदजनक, कर्बजनक घटक किती, ह्याचा उल्लेख न करणे ही अक्षम्य हेळसांड केली. मैत्रहो, बे एरियातील ह्या नवीन युगात आपल्याला हे करून चालणार नाही. अगदी कुणा साहित्यिक मित्राकडे (तो पुणेरी नसल्यास) "चहा घेतला", असे लिहिले, तरी लगेच त्यात दूध किती (२% मेद, की १%, ऑर्गॅनिक की नाही) साखर आणि कर्बघटक किती, हे लिहिणे आवश्यक ठरते.
मंडळी, मागे उल्लेख केल्याप्रमाणे ऍल गोरे पाटील हे आमच्या बे एरियाचे वाग्दत्त जावईच आहेत. त्यांनी आम्हाला दिलेली दुसरी शिकवण म्हणजे पेट्रोल वाचवणे. शक्य असल्यास पेट्रोलचा वापरच न करणे. मैत्रहो, आपल्या आदरणीय ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी वारंवार स्कूटर ह्या वाहनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केलेला आहे. (कारचा उल्लेख मराठी साहित्यात केला की ते अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण ठरते.) सदर वाहन पेट्रोल पिते, ह्यामुळे भविष्यातील साहित्यात (म्हणजे आमच्या बे एरियातील तीन साहित्य रसिकांनी आपले साहित्य वाचावे असा आपला आग्रह असेल, तर) अशा पेट्रोल पिणाऱ्या वाहनांचा उल्लेख टाळावा. आपल्या नायक-नायिकांना (किंवा नायक-नायकांना, किंवा नायिका-नायिकांना) चालत किंवा दुचाकी सायकलवर प्रणयक्रीडा करण्यास पाठवावे. ह्या पात्रांतील कुणीही एक जर धूम्रपान करीत असेल, तर दुसऱ्या पात्राने ते हाणून पाडावे. ह्यातील कुणी जर कर्बवायू सोडत असेल (कदाचित दोघेही) तर त्यांना दिवसा झाडाखाली बसवावे,
