समाज
स्त्री - पुरुष यांच्या मूळ लैंगिक प्रेरणांमधे भेद आहे ? ते समजून वाद कसे टाळता येतील ?
प्रेषक चक्रमवेताळ ( शनी, 03/20/2010 - 21:57) .काही महिन्यांपूर्वी डिस्कव्हरी वर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती.. त्यामधे दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी इत्यादीच्या नर मादी सहजीवनातील वैशिष्ट्ये दाखविताना तुलना अशी होती की -
१. सामान्यतः कीटकांमधे .. उदा. मधमाशी, मुंगी इ. मधे मादी चे प्राबल्य असून नर मात्र प्रजोत्पादना पुरतेच असतात .. वंश सातत्याची प्रेरणा राखून मादी प्रजोत्पादन व पुढील कार्ये पार पाडते ..
२. दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी तसेच सिंह , हत्ती , गवे इ. मधे एक नर अनेक माद्यांचा सहवास करतो आणी स्वतः चा वंश पुढे चालवतो.... यामु़ळेच कळपातील मु़ख्य नराची जागा जेव्हा दुसरा तरुण घेतो तेव्हा तो पहिल्या नराची लहान मुले मारुन टाकतो (विशेषतः सिंह)... व "मोकळ्या" झालेल्या माद्यांशी सहवास करुन स्वत:ची प्रजोत्पत्ती करवुन घेतो..
यापुढे निवेदकाने मानवांच्या बाबतीत असे भाष्य केले की
जेव्हा एखादी मानव स्त्री योग्य वयात वंशसातत्यासाठी नराची निवड करते तेव्हा तिच्या मूळ प्रेरणा ह्या बाळाला व तिला सुरक्षितता व स्थैर्य कोण देईल अशा मानव पुरुषास निवडण्या कडे असेल तसेच दीर्घ कालीन स्थिर संबंधांची अपेक्षा ती करेल...
या उलट मानवी पुरुषामधे .. (अर्थातच) मर्कटाचे काही अंश असल्याने (Can't Help it !)
पुरुष जास्तीत जास्त ठिकाणी आपले "बीज" कसे पेरले जाईल असा प्रयत्न करेल... (एकोहम बहुस्याम | )
हे पाहिल्या वर साहजिकच पेपर मधील वाचनात येणा-या व समाजात नित्य ऐकायला मिळण्या-या सांसारिक विसंवादाच्या व त्यातून घडणा-या दुर्दैवी घटना.. घटस्फोट .. इत्यादी चे स्मरण झाले....
की वर सांगितलेल्या या स्त्री पुरुषांच्या मूलभूत लैंगिक प्रेरणांच्या भिन्नते मुळे अनेक विसंवाद होत असावेत का ?
आणी जर हे समजून घेतले तर "केवळ शारिरीक संबंधाच्या बाबती मधील हक्काच्या भावने पोटी व त्यास अवास्तव रित्त्या निष्ठा व प्रेम यांच्याशी जोडल्यामुळे विनाकारण वादंग वाढवणे कमी केले तर अनेक संसार सुखी होतील..." असे वाटते ..
अर्थात हे आताच्या आधुनिक काळानुसार . स्त्रियांच्या बाहेर वावरण्यामुळे आता असा समजुतदार पणा पुरुषांनाही दाखवणे भाग पडेल
यावर मिपाकरांची मते जाणण्यास उत्सुक आहे...
ड्रॅगनच्या देशात.
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 03/19/2010 - 07:36) .दोन मांजरं एकमेकात किंचित गुरगुरून भांडल्यासारखा आवाज डोक्यावरच्या स्पीकरमधून आला, दिवे लागलेले जाणवलं, खिडक्या उघडल्या जाऊन भस्सकन उजेड आत आला आणि मला जाग आली. पांघरुण सरकवून सीट सरळ केली. हवाईसुंदर्या (युनायटेड एअरलाईन्सच्या बाबतीत 'हवाईसुंदरी' ह्या शब्दाबद्दल तीव्र आक्षेप असू शकतात हे मान्य, पण एक पद्धत आहे म्हणून म्हणावे लागतेय!
)रांगातून हिंडत लँडिंगची तयारी करत होत्या. शिकागोहून निघालेली सलग साडेतेरा तासाची, पाय आणि पाठीचा बुकणा पाडणारी, युनायटेड एअरलाईन्सची फ्लाईट 'पू डाँग' विमानतळावर चाकं टेकती झाली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला!
अनेक फाट्यांच्या चिनी अक्षरांसोबतच ठळक दिसणारी 'शांघाय वेलकम्स यू' अशी चक्क इंग्रजीमधली पाटी वाचतच मी इमिग्रेशनच्या रांगेत उभा होतो. कडक इस्त्रीच्या यूनिफॉर्ममधल्या चिनी युवतीनं सोनेरी काड्यांच्या चष्म्याआडून बघत "हेलो!" असं स्वागत केलं मी "नी हाव!" म्हणताच तिला बरं वाटलं असावं. तिनं माझ्याकडे आणि एकदा पासपोर्टातल्या फोटोवर निरखून पाहत स्टँपिंग केलं आणि माझा ड्रॅगनच्या देशात पहिला प्रवेश झाला.
सगळे सोपस्कार आटोपून माझ्या नावाची पाटी हातात असलेला ड्रायवर शोधून काढला. मंदारिन मध्ये हॉटेलचं नाव छापलेला ईमेल त्याच्या हातात ठेवला, त्यावर नजर फिरवून त्यानं समजलं अशा अर्थाचं हास्य केलं आणि मी निश्चिंत झालो. त्याच्यावर नजर ठेवतच मला त्याच्यामागे पळावं लागत होतं कारण सगळे सारखेच दिसत होते, उगाच मी 'इकडे तिकडे' कुठेतरी पहायचो आणि दुसर्याच बाबाच्या गाडीत जाऊन बसायचो! 
बाहेर पडल्यावर गार वार्याचा झोत सप्पकन आंगावर आला. लेदर कोट आणल्याचं मला बरं वाटलं. फेब्रुवारीत शांघायला जवळपास २-३ डिग्री सें. तपमान असतं.
गाडीत बसंतच मी पृच्छा केली "हाउ फार इज होटेल?"
"?" त्याला काही सुधरले नव्हते!
"हाउ मच टाइम टु रीच?"
"वाँ आव!" (म्हणजे वन अवर. हे चिनी उच्चार आता मला कित्येक टेलीकॉन्फरन्सवर बोलून ठाऊक झाले होते.)
एका बाकदार चढावर फस्क्लासपैकी वळण घेऊन गाडी रस्त्याला लागली. चार पदरी रस्ते, "80 KM" चे बोर्डस सगळं अगदी पाश्चात्य देशांशी स्पर्धा करायची म्हणूनच जणू उभारलेलं वाटत होतं. दूरवर कुठल्याशा पॉवर प्लँटची अजस्त्र धुराडी करड्या रंगाचा धूर काढत होती. कित्येक हजार वोल्टच्या पॉवरलाईन्सचे अफाट उंच मनोरे लांबवर जात दिसेनासे झाले होते. हे मनोरे मला नेहेमी त्या 'एंपाअर स्ट्राईक्स बॅक' मधल्या अजस्त्र रोबोंची आठवण करुन देतात!
आकाश मात्र जाम धुरकट वाटत होतं. प्रदूषण प्रचंड होतं. जपानी, अमेरिकन, यूरोपिअन, कोरिअन सगळ्या देशांच्या सगळ्या ब्रँड्सच्या गाड्या धावत होत्या.
एवढ्यात झुऽऽऽप्~असा आवाज करुन माझ्या उजवीकडून काहीतरी प्रचंड वेगात गेलं! रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर एक ट्रॅक होता त्यावरुन गेलेली ही हायस्पीड ट्रेन!
ताशी २५०-३०० किमि असला अचाट वेग होता तिचा! चक्रधर महाशयांना इंग्लिशचा जेमतेम गंध आणि माझं मंदारिन "नी हाव!" पाशी संपणारं त्यामुळे बोलण्याचा प्रश्न नव्हता. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला.
अचानक हॉर्नने दचकून जागा झालो (क्षणभर पुण्या-मुंबईत आलो की काय असं वाटून गेलं). एका भल्यामोठ्या चौकातल्या सिग्नलला गाडी थांबली होती.
बाजूला बघितले आणि अनेक दुचाकीधारी दिसल्यावर फार म्हणजे फार बरं वाटलं!
पुढल्या पाच मिनिटात गर्दीतून वाट काढत 'हॉटेल रमाडा प्लाझा'वर गाडी आली. माझं सामान हॉटेलच्या ट्रॉलीवर लादून, माझी सही घेऊन ड्रायवर निघून गेला!
खोलीवर येऊन पोर्यानं सामान टाकलं आणि काढता पाय घेतला.
थंडगार पाण्याच्या दोन बाटल्या तहानेनं सुकलेल्या घशाखाली लोटल्या. लॅपटॉप चालू केला. एकीकडे टबात गरम पाणी सोडून ठेवले होते.
इंटरनेट कनेक्शन मिळताच घरी बायकोला फोन करुन सांगितलं की मी सुखरुप पोचलो.
आणि लगोलग वाफाळत्या गरमा गरम पाण्याच्या टबात शिरलो!!
लांबच्या प्रवासानंतर हे असलं स्नान म्हणजे स्वर्गसुखच असतं. शांघायमधला माझा पहिला दिवस सुरु झाला होता!!
(क्रमशः)
-चतुरंग
आस एक जगण्याची!
प्रेषक अरुंधती ( गुरू, 03/18/2010 - 18:08) .काल सकाळी पारुबाई कामावर आल्या तेव्हा त्यांचा उजवा गाल टम्म सुजला होता, डोळ्याजवळचा भाग सुजून काळानिळा झालेला! माझ्या छातीत चर्रर्र झालं. "काय हो पारुबाई, कुठं पडलात वगैरे की काय?"
माझ्या प्रश्नावर खिन्न हसून पारुबाई चेहरा वाकडा करत म्हणाल्या, "कसलं काय ताई! काल रातच्याला ह्ये लई पिऊन गोंधळ घालीत व्हते म्हनून त्यास्नी बोल्ले तर मार मार मारलन मला! समद्या लोकांसमोर तमाशा केला वर माज्याकडचं पन्नास रुपयं घ्येतलं बळजबरीनं! आता तुमीच सांगा मी पोरांच्या प्वाटात काय घालायचं?"
नवर्यानं दारु पिऊन आपल्याला बेदम मारले, शिवीगाळ केली ह्यापेक्षा त्या माऊलीला पोरांच्या पोटाची चिंता लागली होती. "अहो, डॉक्टरकडे तरी गेलात का? केवढं लागलंय तुम्हाला! तो डोळा उघडता तरी येतोय का नीट?" माझ्या प्रश्नावर पारुबाईंनी नकारार्थी मुंडी हलवली. शेवटी आईने त्यांना घरातली जुजबी औषधे दिली व आठवणीने डॉक्टरकडे जायला सांगितले.
गेली दोन वर्षे पारुबाई आमच्याकडे कामाला आहेत. त्या दरम्यान अनेक वेळा त्यांनी त्यांच्या नवर्याच्या व्यसनाधीनतेविषयी, बेकारीविषयी, हात उगारण्याविषयी मनातली मळमळ बोलून दाखवली असेल. त्याच्या व्यसनापायी त्यांना स्वतःच्या घरात दहा रुपयेही ठेवण्याची चोरी झाली आहे. कारण नवरा लपवलेले पैसे हुडकून काढतो आणि थेट गुत्ता गाठतो. पण त्यावर उपाय सुचवला, सांगितला तरी पारुबाईंना तो ऐकायचा नसतो. आपल्या नवर्याच्या व्यसनावर इलाज आहे हे कळूनही त्या उत्तरतात, "काय करायचंय ताई ह्यांचं व्यसन सोडवून! काय पाप्याचं पितर झालंया बगा त्यांचं त्या दारुपायी. प्वाटात अन्न नसंल येक वेळ, पन रोजच्याला दारु लागतीया! तुमी म्हनताय ह्यावर औषद आसतंया, पन त्ये औषद पचवन्याची तरी ताकद आसाया पाह्यजे नव्हं! रोज रोज पिऊन गटारात लोळत पडत्याती, ना अन्नाची शुध आसते, ना कपड्याची. कोनीतरी घरला घेऊन येतो त्यास्नी, न्हायतर सांगावा धाडतो. आता आसा मानूस सुदरनार तरी का ह्ये तुमीच सांगा!"
पारुबाई त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. नवरा दारुशिवाय पण फारसा कामाचा नाही, त्याला काम करण्याची इच्छा नाही, हे वास्तव त्यांनी स्वीकारलंय. त्याच्या औषधपाण्यावर खर्च करायला त्या नाखूष आहेत. त्या ऐवजी त्याच पैशात आपल्या कच्च्याबच्च्यांची गुजराण, त्यांचे शिक्षण करून त्यांना मोठं करायचं स्वप्न त्या पहातात. नवर्याला बरं करुनदेखील आपल्या आयुष्यात, कष्टांमध्ये असा कोणता फरक पडणार आहे ह्या त्यांच्या बिनतोड सवालावर आपल्याकडे उत्तर नसते. त्यांच्या लेखी त्यांची मुलेच त्यांचे भविष्य आहेत. त्यांच्या शालेय यशात त्या समाधान मानतात. पण पारुबाईंच्या स्वत:च्या आयुष्याचे काय? भल्या पहाटे उठून घरातली चार कामे आटपायची, जुनेरं नेसून कामावर हजर व्हायचे, सकाळपासून दहा घरी राब राब राबायचे, लोकांनी दिलेल्या शिळ्या अन्नावर स्वतःची भूक भागवायची, दुपारी उशीरा दमलेले पाय ओढत ओढत अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले आपले झोपडे गाठायचे... तिथेही कोठला आला आहे आराम? धुणी, भांडी, स्वयंपाक, सार्वजनिक नळावरून पाणी भरणे, मुलांना अभ्यास करत नाहीत म्हणून बदडणे यातच पारुबाईचा दिवस संपतो. दिवसभर पाण्यात, साबणात काम करून आग होणारे हात-पाय, दुखणारी पाठ-कंबर आणि दारु पिऊन हैदोस घालणारा नवरा त्यांना सुखाची झोपही घेऊ देत नाहीत.
जोडउत्पनासाठी करायला लागणार्या कष्टासाठी त्यांच्या शरीरात ताकदच नसते. नात्यातल्यांनी नवर्याच्या व्यसनापायी नाव टाकलेलं... मदत करणार तरी कोण? ज्या कामांवर जातात तिथले शिकलेले लोक अडीअडचणीला करतात मदत तशी... कोणी मुलांच्या शाळेच्या फी ची व्यवस्था करतं तर कोणी महिनाअखेरीस ज्वारी-बाजरीचं पीठ देतं... पण हे काही कायमस्वरूपी उपाय नव्हेत.
"पारुबाई, ही पुस्तकं घ्या, जुनीच आहेत, पण तुमच्या मुलांना आवडतील वाचायला," माझ्या हातातली काही जुनी पुस्तकं, मासिकं मी पारुबाईंच्या हातात ठेवते... पारुबाईंच्या चेहर्यावर पुस्तकं पाहून आनंद दिसू लागतो. एरवी कोणी साड्या, कपडे, धान्य, पैसे दिले तर ते पारुबाई गरजेपायी घेतात; पण कोणी त्यांच्या मुलांसाठी पुस्तके, शाळेचे सामान दिले की त्यांच्या तोंडात त्याखेरीज दुसरा कौतुकाचा विषय नसतो.
इतर बायांच्या गप्पा-टप्पांमध्ये पारुबाईंचं मन रमत नाही. त्यांना सतत घराची चिंता असते. कधी त्यासाठी झेपत नसतानाही त्या उरापोटावर जास्तीची कामे घेतात, वणवण पायपीट करतात. तात्पुरती नड भागते. पण पुढचे काय?
आज त्यांच्या दोन पोरी आठवीत आणि सहावीत आहेत. अभ्यासाला बर्या आहेत. त्यांना किमान दहावीपर्यंत तरी शिकवायचे त्यांचे स्वप्न आहे. मुलगा तसा लहान आहे, चौथीत बसलाय यंदा... अभ्यासात जरा नाठाळच आहे आणि हूडही! मुलींचा समजूतदारपणा त्याच्यात नाही. सारखा हट्ट करतो आणि पारुबाईंच्या हातचा खरपूस मारही खातो. पण पारुबाईंना मुलांविषयी खूप आशा आहे. अजून दोन-चार वर्षांत पोरी हाताशी येतील, घरी-बाहेर कामामध्ये मदत करतील, मुलगा कळता झाला की कमावू लागेल आणि मग आपल्याला चार सुखाचे दिवस येतील हे स्वप्न उराशी बाळगून त्या दिवस काढत आहेत. स्वतःला चौथीपेक्षा जास्त शिकता आले नाही, फारशी मौजमजा करता आली नाही, संसाराचे सुख फार काळ लाभले नाही याचे त्यांना शल्य आहे. पण त्या खचून न जाता, जिद्दीने आज मुलांसाठी, आपल्या संसारासाठी खस्ता काढत आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये भोगलेल्या वेदनांच्या जखमा आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त, चांगले दिवस येणार ही एक वेडी आशा आहे. बहुधा हीच आशा त्यांना बळ आणि जगण्याची उभारी देत असावी!
--- अरुंधती कुलकर्णी.
गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( मंगळ, 03/16/2010 - 02:26) .गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी
आपण सर्व गुढीपाडवा, दिवाळी, होळी अशा एक ना अनेक सणांच्या वेळांना शुभेच्छापर पत्र, एस.एम.एस. पाठवीत असतो.
माझ्या मते, अशा संदेश सोबतच, आपला संदेश्याच्या शेवटी एक तळटीप म्हणून आपण:
१. 'विजेचा काटकसरीने वापर करा.',
२. 'वाहन चालविताना फोनचा वापर करू नका.',
३. 'अंधविश्वासाला बळी पडू नका.'
४. 'हुंड्याची मागणी करणे बेकायदा आहे.'
अश स्वरूपाचे सामाजिक संदेश टाकल्यास, दीर्घ कालावधीने का होईना, निदान काही लोकांच्या वागण्यात अंशतः तरी फरक पडेल.
माझ्या आशावादाला समर्थन मिळते कारण, बहुतांश लोक असे शुभेच्छापर संदेश आल्यावर तेच पुढे पाठवत असतात. त्यामुळे आपण जरी असे संदेश मर्यादित लोकांना पाठविले तरी त्याचा प्रसार वेगाने होईल.
मी स्वतः असे करतो व असे संधेश वारंवार पाठविल्या मुले निदान काही लोकांच्या मानसिकतेत तरी फरक पडेल असे वाटते.
कृपया याबाबतीत सर्वांनी मते मांडावीत.
--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, महाराष्ट्र.
माया की माया
प्रेषक मराठे ( मंगळ, 03/16/2010 - 00:27) .निर्लज्जपणाची हद्द!
"पुतळा उभारणीवर टीका करणार्यांना मी विचारते की, जिवंत माणसांचे पुतळे उभारू नयेत असं कुठल्या पुस्तकात लिहिलेय?" - इती (जिवंतपणी स्वतःचा पुतळा स्वतःच उभारणारी) मायावती
आपल्या देशात करदात्याच्या पैशाचा अपव्यय कधी आणि कसा होतो ह्याचं आणखी एक उदाहरण. मायावतीचा २०० कोटींचा हार .नुसता राग राग होतोय. तिकडे कुठल्यातरी गावात जेवण आणि कपडे मिळणार म्हणून चेंगराचेंगरीत लहान मुलं मरतात आणी इथे हे !!!
जाता जाता: जर युपीवाल्यांकडे इतका पैसा आहे तर मुंबईत कशाला येतात? का हा पैसा मुंबईतूनच तिकडे गेला आहे?? असं असेल तर आणखीनच तळतळाट!
प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव
प्रेषक अरुंधती ( सोम, 03/15/2010 - 23:00) .वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात.
पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र! रूप व सौंदर्याचा साक्षात आविष्कार असलेल्या कामदेवाच्या घरी पुत्रजन्म झाल्यावर सारा निसर्ग बहरून येतो. वृक्ष त्याच्यासाठी नव्या पालवीचा पाळणा बांधतात, पुष्प-कुसुमे त्याचेसाठी नव्या वस्त्रांची भेट घेऊन येतात, शीतल-सुगंधित वारा त्याला झोका देतो आणि कोकिळ पक्षी आपल्या सुमधुर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो. असा हा सृजनोत्सव! म्हणूनच बहुधा वसंताला ऋतुराज म्हणत असावेत! त्याच्यावर आधारित संगीत राग 'बसंत बहार' ह्या नवचैतन्याचीच प्रचीती देतो.
प्राचीन साहित्यात वसंत ऋतूमध्ये 'वनविहार', 'डोलोत्सव', 'पुष्पशृंगार' व 'मदनोत्सव' मोठ्या प्रमाणावर नागरजनांमध्ये साजरा केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.संस्कृत साहित्यात माघ शुक्ल पंचमीला मदनोत्सव साजरा केला जात असल्याची सुरेख वर्णने आहेत. सुगंधित केशर व कुंकवाच्या सड्यांनी सर्व नगर, रस्ते सुगंधित केले जात असत. त्या पीत-आरक्त वर्णाने सारे नगर जणू सुवर्णमयी भासत असे. सर्व जाती, लिंग, वय, श्रेणीचे लोक आपापसातले भेद विसरून ह्या वसंतोत्सवात सामील होत असत. नृत्य, गायन, वाद्यसंगीत, नाट्य इत्यादींचा आस्वाद घेत असत. केसांमध्ये फुले माळून हळद, कुंकू व तांदळाचे चूर्ण विखरून रंगांचा खेळ खेळत असत. वसंत विहारात स्त्रिया फुले, पाने गोळा करत; त्यांच्या आकर्षक माळा गुंफत; आम्रमंजिरी तोडत, केशर-कुंकुमाचे तिलक लावून कधी आपल्या प्रियतमाच्या कानावर फूल खोचून त्याला दृढालिंगन देत. उद्यानयात्रांत, वन-विहारांत स्त्री-पुरुष एकत्रितपणे मद्यपान करीत असत. सर्व स्तरांचे नागरिक वसंतोत्सवात सामील होत असत. रमणी, सुंदर स्त्रियांनी अशोक वृक्षाला लत्ताप्रहार करून त्याला 'फुलविण्या'चाही खास सोहळा असे. हिंदोळ्यांवर झुलणे हा ही वसंत ऋतूतील एक अविभाज्य भाग! त्यावेळी म्हणे 'हिंदोल' राग गायला जाई.
वसंतात व ग्रीष्मात पाण्यात वाळा, नागरमोथा, सुगंधी पुष्पे घालून तसे सुगंधित पाणी प्यायले जात असे. दुपारीही सर्वांगाला चंदनाची उटी लावून, अंगावर तलम वस्त्रे लेऊन, पंख्याचा वारा घेत रमणी विश्राम करीत असत. एका वर्णनात वसंत ऋतूतील सायंकाळी अभिजन आपला वेळ कसा व्यतीत करत ह्याचे फार मनोहर चित्र रंगविले आहे. सायंकाळी सौधावर सुगंधित जलाचे सडे घालून पांढर्या शुभ्र बैठकी मांडल्या जात. तिथे किंवा नगराबाहेरच्या उपवनांत, आम्रवाटिकेत सर्व अभिजन गायन, नृत्य, वादन, काव्य-श्रवण इत्यादी कलांचा आस्वाद घेत, मधुर फळांचे थंड रस अथवा सुरा नक्षीदार रजतपात्रांमधून प्राशन करत असत. त्याअगोदर सायंकाळी शीतल, सुगंधित पाण्याने स्नान करून, तलम मलमलीची वस्त्रे परिधान करून, गळ्यात मोगरा - जाई-जुई सारख्या शीतलता प्रदान करणार्या पुष्पांच्या माळा घालून, अंगाला चंदन-केशराची उटी, तिलक लावून ते ह्या सायंकालीन कार्यक्रमास सज्ज होत. मनोरंजन, तांबूलसेवन, शुकसारिका यांद्वारे रंजन अशा विविध मार्गांनी वसंत ऋतूमधील सायंकाळी व्यतीत होत असत.
आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशी वर्णने वाचूनही मन उल्हसित होते. मदनोत्सव, दोलोत्सव, रंगोत्सव एवढ्या रसिकतेने साजरे करणारे हे लोक आपल्यापेक्षा एका परीने विचारांनी व आचरणाने प्रगत व अभिरुचीसंपन्नच म्हणावे लागतील ह्यात शंकाच नाही!
-- अरुंधती कुलकर्णी
विंदांकडून काय घ्यावे?
प्रेषक चिंतातुरजंतू ( सोम, 03/15/2010 - 13:54) .वक्रतुंड महाकाय गणपतीच्या
सोंडेकडे पाहून (अश्लील वाङ्मय
चोरून वाचणार्या) एका प्रमदेला
कामेच्छा झाली
तिचे दोन्ही मोदक स्तन
चट्टदिशी घट्ट धरून
वक्रतुंड महाकाय गणपतीने
तिला एकवीस वेळा आकाशात गरगर
फिरवली
आणि जेहेत्तेकालाचेठायी
श्लील नामक घोर नरकामध्ये
फेकून दिली.
दचकलात? संपादित करायला हात शिवशिवू लागले? दुखावण्यास भावना सरसावल्या? थोडे थांबा. ज्यांना श्रध्दांजली वाहायला गेल्या चोवीस तासांत शेकडो धावले असे गूगल सांगते, त्या विंदांच्या लेखणीतून ही विरुपिका उतरली आहे. विरुपाचे रूप दाखवणार्या या विरुपिकेस १९७३ साली प्रसिध्दी मिळाली आणि त्याविषयी वादही झाले. तेव्हा खुद्द विंदांनी त्याविषयी जे निरुपण केले, ते असे (अधोरेखिते आमची):
‘सत्यकथे’च्या ऑगस्ट १९७३च्या अंकात माझ्या पंधरा कविता प्रसिद्ध झाल्या. त्यातल्या काही ‘विरूपिका’ होत्या. त्यातील ‘वक्रतुंड महाकाय’ या शब्दांनी सुरू होणार्या विरूपिकेसंबंधी आपल्या समाजातील काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आढळल्या. प्रथम पुण्याच्या वर्तमानपत्रांत तिच्याविरुद्ध पत्रे व लेख येऊ लागले. नंतर काही जिल्हापत्रांनी तिच्याविरुद्ध अग्रलेख लिहिले. पाठोपाठ सांगली व बार्शीसारख्या शहरांतून कवीचा व संपादकांचा निषेध करणार्या सभा व मोर्चे झाले. एका नगरपालिकेने व काही महिला मंडळांनी निर्भर्त्सना करणारे ठराव पाठवले. भावे-माडगूळकरांनी अध्यक्षस्थानावरून प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वैयक्तिक धमकावण्या आल्या.
माझ्या पुस्तकांची होळी करण्यात आली. हे सर्व इतके जलद व पद्धतशीरपणे होत गेले की, त्या माझ्या दहा ओळींच्या कवितेतील विशिष्ट मजकुरामुळेच हे घडत आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण वाटावे. या सर्व प्रकारांत प्रतिगामी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतलेला आढळला. या संधीचा फायदा उठवून जनतेपासून अलग पडलेल्या प्रतिगाम्यांचा भक्तिभावनेच्या आधाराने पुन्हा एकदा जनतेशी जवळीक साधण्याचा हा एक प्रयत्न तर नव्हे?
काही असले तरी त्या कवितेच्या रूपाविषयी, तिच्यातील आशयाविषयी व तिच्या लेखामागील माझ्या हेतूविषयी काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे किंवा तो करून दिला जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या कवितेसंबंधी माझी भूमिका संबंधित लोकांनी शांतपणे समजून घेतली तर हा सर्व विरोध अनाठायी आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईल.
पहिली गोष्ट म्हणजे ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका आहे; रूढ चाकोरीतील कविता नव्हे. अभिव्यक्तीचा एक नवा प्रकार शोधण्याचा हा प्रयत्न आहे. अर्वाचीन चित्रकलेत प्ररूपीकरण (अॅब्स्ट्रॅक्शन), प्रवाहीकरण (सर्रिअॅलिझम) व प्रकल्प (फँटसी) या प्रक्रिया वेगवेगळय़ा पद्धतीने प्रकट होताना आढळतात. तशाच स्वरूपाच्या बंदिश शब्दांच्या साहाय्याने निर्माण करता आली तर पाहावी, ही त्या अंगातील अनेक विरूपिका लिहिण्यामागील माझी प्रमुख प्रेरणा होती. प्रस्तुत विरूपिका ही अल्प प्रमाणात प्ररूपीकरणावर व मुख्यत: प्रकल्पावर आधारलेली आहे. वास्तवाच्या अंगाने- म्हणजे गणपती प्रत्यक्षात जसा दिसतो तशा अंगाने- तिच्याकडे पाहणे चुकीचे आहे. माझा हेतू गणपती किंवा प्रमदा यांचे यथातथ्य चित्रण करणे हा नसून, विशिष्ट प्रकारच्या प्रकल्पनातून एका व्यापक आशयाला भिडण्याचा, निदान त्या व्यापक आशयाकडे झेपावण्याचा आहे.
तो व्यापक आशय असा : जीवनाचे अंशदर्शन घेऊन त्यात रमणे हीच खरी विकृती आहे. अश्लील आणि श्लील असे द्वैत कल्पिणे म्हणजे जीवनाच्या व्यापक व एकात्म साक्षात्काराला पारखे होणे, शरीराचे अवयव सुटे-सुटे पाहिले की अभद्रता जाणवते, पण एकात्मतेने पाहिले की सौंदर्याचा प्रत्यय येतो; तसेच
जीवनाचे व कलेचेही आहे. जीवनाच्या एकात्म साक्षात्कारात अश्लील व श्लील या सुट्या कल्पनांचा कायाकल्प होतो. ही साकल्यवादी दृष्टी निकोप प्रकृतीच्या माणसामध्ये व पर्यायाने श्रेष्ठ कलाकृतीमध्ये
अभिप्रेत असते. या विरूपिकेतील ‘प्रमदा’ ही ‘अश्लील वाङ्मय चोरून वाचणारी’ आहे; त्यामुळे तिचे मन विकृत झाले आहे आणि तिचे मन विकृत आहे म्हणूनच मंगलाचे दर्शन घेत असताना ती अमंगल वासनेच्या आहारी जाते. अश्लील वाङ्मयाचा चोरटा आस्वाद घेणार्या सर्वच विकृत स्त्री-पुरुषांची ती
प्रतिनिधी आहे. अशा लोकांचे स्थित्यंतर झाले तरी अश्लीलाच्या नरकातून निघून श्लीलाच्या नरकात जाऊन
पोहोचतात : एका प्रकारच्या अंशदर्शनातून दुसर्या प्रकारच्या अंशदर्शनाकडे. फक्त निकोप वृत्तीची माणसेच
जीवनाचा व कलेचा साकल्याने व एकात्मवृत्तीने वेध घेऊ शकतात. मंगलाच्या दर्शनात अमंगल वासनेच्या आहारी जाणार्या त्या प्रमदेला गणपती शिक्षा करतो. तिला श्लीलाच्या नरकात फेकतो. ते करीत असताना त्याच्या मनात तिच्या स्तनांविषयी कोणतीही अमंगल भावना नसते. हे सूचित करण्यासाठीच ‘मोदक’ हा शब्द स्तनांच्या उल्लेखामागे आहे. या मोदकाशी संबंधित असलेली भावनेची छटा पावित्र्याची आहे, नैवेद्याची आहे. हे सूचित व्हावे, यासाठी पुढे वेगळ्या संबंधांत ‘एकवीस’ हा शब्द
मुद्दाम योजलेला आहे. कारण नैवेद्य एकवीस मोदकांचा असतो. ‘जेहेत्तेकालाचेठायी’ या शब्दांनी हे सर्व चित्रण प्रकल्पनाच्या पातळीवरचे आहे, वास्तवाच्या पातळीवरचे नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सूचित केली आहे. कारण हरदासी कथेमध्ये अशक्यप्राय घटनांना त्या शब्दांनी उठाव दिलेला असतो. सारांश, या विरूपिकेचा आशय विकृतीचे खंडन करणारा आहे; विकृतीचे मंडन करणारा नाही व तिच्या लेखनामागील हेतू कोणत्याही प्रकारे गणपतीची (अप्रतिष्ठा करणे नसून - आमचा अंदाज; मूळ शब्द उपलब्ध नाहीत) नेमका उलट आहे : गणपतीचे मंगल स्वरूप गृहीत धरल्यामुळे कवीने त्याला अमंगलाचा निखंदक म्हणून उभा केला आहे.
पण मी गणपतीच का निवडला? गणपतीची बीजकथा (मिथ) ही विरूपिकेतील आशयाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण वाटली म्हणून. या विशिष्ट काव्यप्रकाराला मी विरूपिका म्हणत होतो आणि गणपतीला आपल्या परंपरेत कुठे तरी ‘विरूपांचा विरूप’ म्हटले गेल्याचे स्मरत होते. शिवाय या लिखाणात अर्थाचे उलटसुलट पलटे होते; म्हणून परस्परविरुद्ध अर्थाच्या कक्षा सूचित करील अशी बीजकथा मला हवी होती. गणपतीची बीजकथा त्या अर्थाने संदर्भ-श्रीमंत होती. गणपती हा आर्यांचा होता, तसाच अनार्यांचा होता; वैदिकांचा होता, तसाच व्रात्यांचा होता. ऋग्वेदातील अभ्युदयेच्छू ऋषी त्याला ‘गणनांत्त्र गणपती’ व ‘कवि कवींनां’ म्हणत होते, तर यजुर्वेदातील गमेंच्छु स्त्रिया त्याला ‘आत्वं अजासि गर्भधं’ असे आवाहन करीत होत्या. एका बाजूने तो कुलप्रतिकाशी (टोटम) संबंधित, तर दुस-या बाजूने आदिम साम्यवादी गणराज्याशी, स्मृतिकारांचा गणपती बुद्धिहर्ता व विघ्नकर्ता तर पुराणांचा गणपती बुद्धिदाता व विघ्नहर्ता. तांत्रिकांचा वामाचारी, तर संतांचा मूर्तिमंत मांगल्य. पार्वतीने आपल्या अंगावरील मळातून या मंगलमूर्तीची निर्मिती केली. या एका आख्यायिकेतच जणू काय गणपतीच्या आयुष्यातील सर्व संक्रमणे सूचित होऊन जातात. शिवाय गणपतीची बीजकथा अजून पूर्णपणे गोठलेली नाही; सार्वजनिक गणपती अजूनही वाटल्यास गांधी टोपी घालू शकतो! म्हणूनच या गणपतीच्या आधारे काव्यात्म प्रकल्पनाचे आवश्यक ते स्वातंत्र्य व श्लील-अश्लीलाला छेद देणारे मांगल्याचे तत्त्वसूचन ही दोन्हीही मला साधता आली. शिवाय, अशी गोष्ट मी या कवितेत प्रथमच केली असेही नव्हे. विनोदी अंगाने माझ्या काही बालगीतांत व गंभीर अंगाने
‘हिमयोग’सारख्या माझ्या कवितेत हा गणपती पूर्वीही आलेला आहे. नवकाव्याला समृद्ध करणार्या अनेक मार्गांपैकी प्राचीन बीजकथांचा व प्रतीकांचा सृजनशील उपयोग हा एक प्रभावी मार्ग आहे, असे मी नेहमीच मानीत आलो आहे. या बीजकथांतील शब्दांचा वेध रूढ चाकोरीतून घेतल्यास ज्या गफलती होतात, त्याचेच हे प्रकरण म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
काव्याचा सूक्ष्म विचार करण्याची सवय व सवड नसलेल्या सामान्य नागरिकाला या वेगळ्या रीतीने शब्दवेध घेणे थोडेफार कठीण जात असेल, याची मला कल्पना आहे. त्यामुळेच प्रतिगाम्यांना माझ्याविषयी, संपादकांविषयी व त्या कवितेविषयी गैरसमज पसरविणे शक्य झाले असावे. ते गैरसमज दूर व्हावेत, या हेतूनेच हे सर्व लिहीत आहे. गणपती हा माझ्याही सांस्कृतिक वारशाचा एक अभिन्न भाग आहे; गणपतीच्या परंपराप्राप्त कथा, अष्टविनायकांच्या व इतर शिल्पांमधून त्याचा आढळणारा रूपविलास व त्याच्या वास्तव रूपाशी संबंध असलेली प्रतीकात्मकता, ही सर्व मलाही इतर भारतीयांइतकीच प्रिय आहेत. ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका लिहिताना माझ्या मनात गणपतीची अप्रतिष्ठा करावी किंवा सश्रद्ध माणसांच्या भावना दुखवाव्या, असा पोरकट हेतू बिलकूल नव्हता; माझा हेतू, व्यापक व एकात्म अशा गंभीर जीवनदृष्टीकडे अंगुलिनिर्देश करणारा एक गमतीचा व वेगळा आकृतिबंध निर्माण करावा, एवढाच होता.
विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्यप्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही; ते एक स्फुरण असते. विकसनाच्या व बहुरूपत्वाच्या अनेक शक्यता त्यात सामावलेल्या असतात. हळूहळू त्या प्रगट होत जातात आणि त्यानंतर समीक्षेच्या दृष्टीने सोयीची वाटणारी अशी त्याची व्याख्याही घडविली जाऊ लागते; पण ती व्याख्यासुद्धा कामचलावू, कार्यकारी व्याख्याच असते, हे विसरता कामा नये. ती अपरिवर्तनीय नसते. कोणत्याही काव्यप्रकाराची तर्कशुद्ध व्याख्या ही गोष्ट तर्कदृष्ट्याच असंभवनीय आहे. कारण स्वत:ची ओळख पटविण्याइतपत साकल्याधिष्ठित स्वत्व (आयडेंटिटी) त्याच्याजवळ कमी-जास्त प्रमाणात असले, तरी एखदा प्राणभूत गुणधर्म अथवा सत्त्व (इसेन्स) किंवा फक्त त्याचे असे व्यवच्छेदक लक्षण (डिफट्रिया) त्याच्याजवळ नसते.
(गो. वि. ऊर्फ विंदा करंदीकर यांच्या, ‘परंपरा आणि नवता’ या ग्रंथातून साभार)
आता वाचकांनी यातून काय बोध घ्यावा? अनेक शक्यता आहेत, जसे:
- थोडे आधी सांगायचे; यांनाही कतारला पाठवले असते.
- शेवटी यांचेही पाय (कोंकणांतल्या फोकलिच्यांनी कुले असे वाचावे) मातीचेच निघाले. (कडवे डावे) विचारवंत कडू ते कडूच, ज्ञानपीठात तळा किंवा लोकप्रियतेत घोळवा.
- ते हिंदू आहेत; त्यांना असे म्हणण्याचा हक्क आहे. (नास्तिक असले म्हणून काय झाले?)
- आम्हांस ऋषितुल्य असलेल्या विंदांविषयी ते मेल्यावर असे वाईटसाईट पसरवणार्यासच चोपला पाहिजे. सूचना: आम्ही हे प्रहारमधून उचलले, त्यामुळे आधी नारायण राण्यांस चोपा. आम्हांस आनंदच होईल
- विंदा काय बोलले काही कळत नाही ब्वॉ. जाऊदेत आपण आपले मेलेल्यास नमस्कार करून मोकळे व्हावे, हे बरे.
न येती उत्तरे
प्रेषक प्रकाश घाटपांडे ( रवी, 03/14/2010 - 16:01) .लेखन व दिग्दर्शन:- प्रमोद काळे
संगीत:- अक्षय कुलकर्णी
नेपथ्य: - सचिन भिलारे
प्रकाश योजना:- अपुर्व साठे
कलाकार:- हर्षद राजपाठक, मंदार कुलकर्णी
निर्मिती: महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे
मागच्या टायमाला हे नाटक बघायचं हुकलं. आज अचाकनक ठरवले कि जायच आन संमोहित झाल्यासारखा नाटकाला गेलो. सुदर्शन रंगमंच च्या प्रथेप्रमाणे चप्पल काढुन स्टँडवर लावली. मी हातात धरुन वरती ठेवतो म्हणजे तेवढच सेफ. नाहीतर निम्माजीव चपलेत अडकायचा. आतमधे गेल्यावर फॅन पाहुन खुर्ची पकडली. नेहमीच्या प्रथेप्रमाणे मोबाईल्स वापराबाबत प्रथम सविस्तर सुचना करुन नाटकाबाबत थोडी माहिती दिली
आशुतोष (हर्षद राजपाठक) आणि रणजीत (मंदार कुलकर्णी) हे वीस व चोवीस वर्षाचे तरुण एकाच कॊलेज मध्ये पण वेगवेगळ्या वर्गात शिकणारे . रणजीत सगळ्यांच्यात मिसळणारा मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात असणारा उमदा तरुण. तर आशुतोष एकलकोंडा स्वत:च्या कोषात अडखळलेला.रणजीत एक्कलकोंड्या आशुतोषची ओळख करुन घेतो.नंतर हळू हळू त्यांची ओळख होते. रणजीतचे वडिल मुंबईला उद्योजक, श्रीमंत घरातले तर आशुतोष नाशिकचा मध्यमवर्गीय घरातला. ओळखीतुन एक भावनिक नात तयार होत. एकमेकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करीत त्यांच्यातील "वेगळेपण" नाटकात फुलत जात. दिवाळीच्या सुटीत घरी परत जाण्यासाठी पर्याय हा दोघांसाठी वेगळा असतो. रणजीत घर सोडून आलेला असतो तर आशुतोषने घर हे फक्त शिक्षणासाठि तात्पुरत सोडलेल असत. त्याला दिवाळीत घरी जाणे भाग असत. आशुतोष त्याला घरी चल म्हणतो तर रणजीत त्याला तुच इथे थांब असे म्हणतो. शेवटी आशुतोष आईला दिवाळीला मित्राच्या घरी जातो असल्याचे सांगुन रणजीतच्या फ्लॅटवर येतो. इथेच त्यांच्यात एक मोकळेपणा निर्माण होतो. आपापल्या पुर्वायुष्यातल्या घटनांकडे पहातात. सुरवातीला स्वत:च्या वेगळेपणाबद्द्ल भांबावलेला; लैंगिकतेबद्दल घुसमटलेला, प्रश्नचिन्हांकित असा आशुतोष 'गे' या संकल्पने बद्दल मोकळा व्हायला लागतो. 'अनुभुती' च्या टप्पातुन गेल्यावर तो दिवाळीच्या शेवटी घरी जातो तो आत्मविश्वासाने. त्याच्यातला हा बदल स्वत:ला व इतराना ही जाणवतो.घरुन परत रणजीतच्या फ्लॅटवर आल्यावर तो हे सार आत्मविश्वासाने सांगतो. अरे आम्हीच आहोत खरे पुर्ण पुरुष कारण आमच्या मनात तुमच्यासारखा स्त्रीचा विचार नसतो असे त्याच्या आतेभावाला सुनवतो ज्याच्या घृणा व तिरस्काराचा तो बळी असतो.
जेंडर इक्वॅलिटी मधे अडकलेल्या या ह्युमन प्रश्नावर नाटक अनुत्तरीतच संपत.
कार्यक्रमानंतर प्रमोद काळेंनी प्रेक्षकांना प्रश्न विचारायची मुभा दिली.ही बाब आम्हाला अधिक मह्त्वाची वाटली. नाटकाचा शेवट आश्वासक हवा, शिर्षक निगेटीव्ह वाटत,गे संबंधातुन येणार्या एड्स विषयी नाटकात काही भाष्य नाही. असे काही मुद्दे पुढे आले. अर्थात नाटककार प्रमोद काळेंना याचा अंदाज होताच. त्यांनी गेली अडीच वर्षे याच विषयाच्या निर्मितीसाठी घालवली. सपोर्ट ग्रुप मधे संवाद साधले.नाटकाला वादाच्या भोवर्यात न अडकवता फक्त वस्तुस्थिती मांडण्याचे काम त्यांनी केल होत. वर्तमान काळात तरी या प्रश्नाला सर्वसमावेशक असे उतर नाही म्हणुनच ने येती उत्तरे.
अवांतर एक- प्रमोद काळेंनी मोबाईल मॅनर्स बाबत कळवळीने सुचना करुनही एकाचा मोबाईल बोंबललाच. सुदर्शनचा प्रेक्षक वर्ग सुसंकृत असल्याने सहसा अस होत नाही. आम्हाला सुरुवातीला हा नाटकातलाच प्रसंग आहे असे वाटले. असो
बाकी नाटकानंतर प्रमोद काळेंना भेटुन धाडसी विषय हाताळल्याबद्दल आम्ही अभिनंदन केल व हळुच मराठी ब्लॉगिंगची टिमकी वाजवलीच बर्का!
अवांतर दोन - २० मार्च ला या नाटकाचा प्रयोग मयुर कॉलनी ,कोथरुड ,पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन रंगमंचावर आहे.
अभिनंदन आणि हाबिनंदण
प्रेषक प्रदीप ( शुक्र, 03/12/2010 - 17:30) .अभिनंदन--- निर्धाराने पाठपुरावा करून २००२ सालच्या 'बाली बाँबिंग'मागील प्रमुख सूत्रधार दुलामतिन ह्या दहशतवाद्याचा शेवट केल्याबद्दद्ल इंडोनेशियन सरकारचे. गेल्या काही वर्षात हे सरकार दहशतवादाविरूद्ध अत्यंत निर्धाराने खंबीर पाऊले उचलत आलेले आहे.
हाबिनंदण-- आपल्या खंबीर सरकारचे. अलिकडे नक्शलवाद्यांनी केलेल्या (आणखी) एका हल्ल्यानंतर त्यांना टक्कर देण्याचा आपला निर्धार अजून बळावला आहे, असे त्याने जाहीर केले आहे, म्हणून. ह्यानिमीत्त, 'बच्चे लोग, ताली बजाओ!'
महदाश्चर्यम्!
प्रेषक सुधीर काळे ( गुरू, 03/11/2010 - 10:41) .महदाश्चर्यम्!
मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत! (मी मनमोहन सिंग-जीं व प्रतिभाताईंना 'अरुणाचल'बद्दल लिहिलेले निरोप मी श्री विकास यांच्या "अरुणाचल" या धाग्याखाली लिहिले होते.) हा निरोप लिहिताना त्यांच्या वेबवर असलेल्या ५०० 'characters'च्या मर्यादेमुळे अडचण आली म्हणून मी काल PM साहेबांच्या ऑफीसला (PMO) लिहिले होते कीं "५०० 'characters' च्या मर्यादेमुळे कांहींच meaningful लिहिता येत नाहीं, तरी ही मर्यादा वाढवून ५०० शब्द करावी!"
महदाश्चर्यम्! मला PMO कडून कांहीं तासांतच खालील उत्तर आले.....
From:
"Web PMO"
To:
kbkale@yahoo.com
Dear Mr. Kale,
The mail ID is pmosb@pmo.nic.in
regards
Communications Incharge
म्हणजे आपली पत्रे (कधी-कधी तरी) वाचली जातात असे म्हणायला हरकत नाही! एका क्षणात माझा आपल्या लोकशाहीबद्दलचा आदर द्विगुणित झाला!
आपणा सर्वांना ही विनंती कीं आपली लोकशाही गुंडांच्या हातून सुशिक्षितांच्या हातात जावी असे ज्यांना-ज्यांना वाटत असेल तर अशा सर्वांनी आपापले मतप्रदर्शन करण्यात आढेवेढे घेऊ नयेत व 'बिनधास' लिहीत जावे!
(मूळ 'अरुणाचल'वरील मतप्रदर्शनाला अद्याप उत्तर आलेले नाहीं!)
सुधीर काळे


