सुचलेले विषय पण हुकलेले लेखन
नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे.