टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
नोकरी
कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!
प्रेषक छोटा डॉन ( शनी, 09/27/2008 - 23:53) .नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " ....
फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता.
असो. त्याबद्दल पुन्हा सवडीने, आज मुख्य मुद्दा आहे ते "ऑफीस कल्चरचा" !!!
आता तसे पहायला गेले तर "बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयात" काम करण्याचा अनुभव हा आयुष्यात प्रथमच असा काही भाग नव्ह्ता, तिकडेही करतच होतोच की.
पण इकडे सर्व वेगळे आहे, ह्याला मी म्हणेन "बहुराष्ट्रीय कंपनीचे परफेक्ट कार्यालय" ....
मस्त वाटले इथले वातावरण, या एकदम झकपक व चकचकीत वातावरणात राहताना आपला आपलीच ऐट बघुन आतुन आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत. आल्यावर पहिल्या दिवशी जी "फॉर्मल वेलकम सेरेमनी" होती ती झाल्यावर ५ मिनीटे काहीच सुचेना, अरे एवढी कसली "फॉर्मॅलिटी व डिसेन्सी ", आम्हाला नाही बाबा सवय असल्या गोष्टींची.
स्वाभावीकच मग मन प्रत्यक्षात अनुभवलेल्या व काहीच्या बोलण्या, लिहण्यातुन ओळख झालेल्या "देशी कचेरी उर्फ़ भाऊसाहेबांचे हापीस" यांचा विचार करु लागले ...
[ काळजी नका करु, कंपनीच्या कार्यालयीन वेळात नाही, अशाच निवांत वेळात हो. नाहीतर लगेच आम्हाला "नानु सारंजामे" ठरवुन मोकळे व्हाल. ]
मग माझ्या डोळ्यासमोर आपल्या "जुन्या देशी कचेरी" चे कल्पनाचित्र आले. आता "कचेरी" ह्याचा अर्थ येथे साधारणता "सरकारी कचेरी वा एखाद्या देशी कंपनीची कार्यालये" ह्या अर्थाने घ्यावा. म्हणजे तेथील वातावरण, काम करण्याची पद्धत, त्याची भाषा, तेथील काम करणारी मंडळी, त्यांचे वागणे, पेहराव व बोलचाल आठवले. नकळतच मी त्याची तुलना जराशी सध्याच्या "कॉर्पोरेट ऑफीस" शी करुन बघीतली. मला स्वत:शीच प्रचंड हसु आले एवढा प्रचंड फरक आहे त्यांच्यात.
नक्की काय फ़रक आहे ते एकामागे एक पाहु....
जुन्या कचेरीत प्रवेश करायच्या आधीच त्या इमारतीकडे एकदा पहा, ती जर अगदी जुन्या छापाची इमारत अगदी लाल कौलासह, बाहेर सायकली व मोटारींची ही गर्दी यातुन वाट काढत आत प्रवेश केल्याकेल्या समोर काही दिसु नये याची काळजी घेणारा अंधार, जागोजागी केलेले तंबाखु व पानाच्या पिचकाऱ्यांची नक्षी, दिशाभुल करणाऱ्या पाट्या
[ असतील तर ], जिन्याच्या मोडलेल्या पायऱ्या, मोडलेल्या फरश्या, बगलेत फ़ायले मारुन कुणाकडेही ढुंकुनही न पाहता पळापळ करणारे कारकुन, जिन्यात साहेब्याच्या पट्टेवाल्यापाशी वशिला लावण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळे केलेली सर्वसामान्य जनता असा जर सारंजाम असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात हे समजायला हरकत नाही. ही झाली टिपीकल जुन्या कचेऱ्यांची मांडणी....
आता तसे नाही, आतांची ऑफीसे फार लांबुन ओळखु येतात कारण त्याच्या अलिकडे ५ किमी. पासुन " अबक ५ किमी पुढे" अशा पाट्या लावतात. त्यामुळे ती जुनी "ओ पाव्हनं, ते येमीशीबी हापीस कुठशीक येतं हो?" या प्रश्नाची व त्याला "जावा की डाव्या अंगानं फर्लांगभर, चौकातनं मारा राईट टर्न, फुड गेल्यावर २० पावलात आलच की हापीस" अशा उत्तरांची मजा नाही. नव्या "ऑफीसची " ती डोळे दिपावणारी उंच इमारत, ती काचांची रेलचेल, ते गालीचे, बाहेर बाग व अनेक फुलांची झाडे हे पाहुन एखाद्या जुन्या "कचेरी कारकुना" ला भडभडुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत गेल्यावर [ म्हणजे तुमच्याकडे परवानगी असेल तर, अन्यथा शक्यच नाही ] ते मार्बलचे फ़्लोअर, ते अख्खी टाच रुतेल एवढा गालीचा, ती भिंतीवर लावलेली अगम्य चित्रे व कसे वागावे याचे आदेश देणाऱ्या पाट्या व त्या ही ६-६ भाषेत, छोटे छोटे फुलांचे गुच्छ, शिस्तीत लाऊन ठेवलेली वर्तमानपत्रे, टापटीप पोषाखात वावरणारे एंप्लोयी, सळसळ करीत पळणाऱ्या काचेच्या लिफ्ट्स, आलेल्या अभ्यांगतासाठी मांडलेल्या खुर्च्या [ हे एक आश्चर्यच, नाहीतर जुन्या कचेऱ्यात असले लाड नव्हते.] असा जर नजारा दिसला तर तुम्ही एका "आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट ऑफ़ीसात" आला आहात हे नक्की.
जुन्या कचेरीत प्रवेश करतानाच तुमच्या चेहऱ्यावर एका आगंतुकाची भावना आपसुकच येते, कारण ते वातावरण व आत्तापर्यंत न्य़ात असालेली ऐकीव माहिती. शिवाय आत गेल्या गेल्या "काय पाहिजे ? कोण पाहिजे ? काय काम आहे ? कुणी पाठवले ? परवाना हाय का ? ओ तिकडे नका जाऊ ? आधी बाहेर व्हा. " असा प्रश्नांची सरबत्ती झाली नाही [ कुणी जर तुमच्याकडे लक्ष दिले तर ] तर तुम्ही नशिबवान आहात असे समजायला हरकत नाही . आत गेल्यागेल्या आलेला माणुस गोंधळुन, घाबरुन, बावरुन गेला पाहिजे हा ह्या कचेऱ्यांचा "अलिखीत कायदा" व बाकीचे कायदे नाही पाळले तरी ह्याचे पालन मात्र एकदम इमानाने होते. आता असे नाही, गेल्यागेल्या [ बहुतेकठिकाणी ] तुमचे स्वागत होते, जर तुम्ही आमंत्रित असाल तर तुम्हाला "वेलकम" करायला कोणीतरी गेटवरच हजर असते. जर तुम्ही नवे असाल तर त्या रिसेप्शनवर बसलेली सुंदर, मनमोहक कन्यका "Yes Sir, What can i do for you ? May I help you " अशा प्रश्नोत्तरे होऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. थोडक्यात तुमचा "कार्यालयाच्या अंतर्भागापर्यंत" चा प्रवास सुखकर होतो. आधीच्या काळात म्हणे लोक या गोष्टींसाठी नवस वगैरे बोलत, व्रतवैकल्य करत आणि ती कचेरी जर पुण्यातील असेल तर मात्र तुमच्या मागे मागच्या "शतजन्माचे पुण्य" पाहिजे, नाहीतर मामला बिकट आहे.
बाकीच्या गोष्टी जाउ दे, आता आपण कार्यालयाच्या आत व्यवहार कसा होतो हे पाहु. मी शक्यतो आतल्या कर्मचारी वर्गाच्या कामाशी संमंधीत संभाषणाबद्दल लिहतो आहे. आता "साहेब व त्याचा पट्टेवाला" ह्या दोन्ही गोष्टी कालबाह्य झाल्याने त्यांच्याशी संमंधीत गोष्टीच्या मजेला आपण मुकलो आहोत.
पुर्वीच्या काळी जर काही कारणामुळे कुणाला कचेरीत पोहचायला उशीर झाला व ते "हजेरी रजिस्टर" साहेबाच्या टेबलावर गेले असेल तर बिचाऱ्याचा जीव अर्धा होऊन जायचा.
सामान्यत: हे कर्मचारी मध्यमवर्गीय व बहुसंख्य चाळीत राहणारे असल्याने त्यांना "पाणी उशीरा आले, दुध नासले, गॅस संपला, ट्राम निघुन गेली, पोराला शाळेत सोडायला गेले, सकाळी देवळात गेल्यावर तेथील गर्दी" अशा कारणामुळे उशीर होत. यामुळे कचेरीत उशीरा पोहचल्यावर व साहेबाने ते पाहिल्यावर त्या बिचाऱ्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकत, एक तर ठरलेला "हाफ डे" व वरुन साहेबाची "कंपनी काय घरची समजलात का ? मी किती वेळा गप्प बसायचं ? पुढच्यावेळी मेमो देईन" वगैरे बोलणी....
आता तसे नाही, मुळात एंप्लॉयी आता "फ्लॅट" मध्ये रहात असल्याने त्यांचे प्रॉब्लेम्स जरा वेगळे असतात, म्हणजे "ट्रॅफ़ीक जाम, कार पंक्चर, कालचा ओव्हरहॅंग, वाईफबरोबर सकाळ सकाळ भांडण" वगैरे वगैरे. पण फरक असा की तो ह्या उशीराची मुळीच काळजी करत नाही. तो आपल्या मुडप्रमाणे ऑफ़ीसात पोहचतो. जर साहेबाने पाहिले व त्याने विचारले तरी ह्याला त्याचे काहीच "भ्या" नसते. उलट साहेबाकडुनच एखादी "हॅंगओव्हर लवकर कसा उतरवावा" याबद्दल टीप मि्ळण्याचे चान्सेस असतात.
आता "लेटमार्क / हाफ़ डे" अशा गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.
आधी जर काही काम जास्त पेंडिंग पडले तर साहेब त्या कारकुनाला सगळ्या जनतेसमोर "काय रे, काम कोण तुझा बाप करणार का ? चल पटपट उरक, नुसते नाचुन दाखवुन दाखवुन नकोस. माजलेत साले, काम करायला नको, नुसत्या पाट्या टाकायला येतात भाडे" अशा शब्दात "झाडत". आता मुळात कल्चरच बदलल्याने तो "कडकपणा" गेला. आता फ़क्त एक "Urgency Mail" येतो व परिस्थीती हाताबाहेर चालली तर बॉस त्याला "केबीनमध्ये" बोलावुन "See, we are already running out of deadline. You have to work hard.You know meeting deadlines is very important for our corporate image. We don't have any other option than to work for overnights" असे साध्या शब्दात समजावतो.
जुन्या काळी असा प्रसंग घडल्यावर तो अभागी कारकुन आपला साहेब निघुन गेल्याची खात्री करुन जमलेल्या बघ्या सहकाऱ्यांसमोर उसन्या आवसानाने " साला आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, समजलात काय ? साहेब असेल तो त्याच्या घरी, इथं आमच्याशी गाठ आहे म्हणावं. कायस्थाचं रक्त आहे, एकवेळ शीर तोडुन देऊ पण इमानाला बोल लावलेला ऐकुन घेणार नाही" अशी सफ़ाई देत पण हे बोलताना साहेब कुठे जवळपास नाही ना याची खात्री आपल्या तिरक्या नजरेने करुन घेत. बाकीचे सहकारी पण मग " जाउ दे वसंतराव, ८ दिवसाचा पाव्हणा आहे. आपल्याला सायबाचेसगळे छक्केपंजे माहित आहेत. चला, चहा घेऊ, थोडे डोके शांत होईल" अशी मांडवली करत. आताच्या वातावरणात असे प्रसंग घडणेच शक्य नाही. जर असा प्रसंग घडलाच तर तो "एंप्लॉयी" जागेवर त्या साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकेल वा उलट साहेबालाच डोस देईल "You are crossing limits. This is not way to behave." वगैरे वगैरे.
पुर्वी कचेऱ्यांना सध्याच्या काळासारखे "Client" वगैरे असा प्रकार नसायचा त्यामुळे तिथला "साहेबच" तिथला सर्वेसर्वा. तो म्हणेल ती पुर्व दिशा. अशा परिस्थीत जर कोणी त्याच्याकडे कामाच्या "अर्जंट" असण्याची व ते लवकर करण्याची बोलणी करायला गेले तर संवाद असा घडायचा, " अरे लवकर करा म्हणजे, आम्ही काय इथे माश्या मारतोय का ? मला सांगणारा तो कोण टिकोजीराव लागुन गेला ? मला काय त्याच्या बापाचा नौकर समजला काय ? चल हकाल गाडी, जेव्हा होईल तेव्हा सांगु.". मग तो बिचारा आपला मान खाली घालुन निघुन जायचा. हा किस्सा कचेरीतल्या बाकीच्यांना ८ दिवस पुरे, मग साहेबाने त्याची कशी "बिनपाण्याने केली" ह्यावर अनेक परिसंवाद घडत....
आज परिस्थीती अशी नाही, आज "Client" म्हणजे भगवान, तोच सर्वेसर्वा, आपला मायबाप. त्याचा "मेल" आला रे आला, आपला बॉस एकदम गडबडुन जातो, मग टीम मिटिम्ग काय, डिस्कशन काय, प्रोजेक्ट प्लानिंग काय नाही नाही ते चालते. तिकडे तो एकदा मेल टाकुन पुन्हा आपल्या विश्वात गुंग, इकडे काय रण पेटले आहे ह्याची त्याला काही खबर नसते. मग इथुन त्याला एक अर्जवीचा व आपल्या कामसुपणाची खात्री देणारा एक मेल पाठवला की आपल्या बॉसचा जीव भांड्यात पडतो, तोवर त्याला जेवायची शुद्ध नसते. त्या मेलचा मसुदा साधरणता असा असतो "We are working overnights to meet your deadline. Our most efficient resourses are working on this project. We will come back to you very soon with positive result. We really appreciate your patience.". बघा काळ कसा बदलला आहे ते, जुन्या काळच्या "मी काय त्याच्या बापाचा नौकर नाही" ह्या दमदार वाक्याची जागा "We really appreciate your patience" सारख्या पुचाट वाक्याने घेतली आहे.
आता एखाद्याला जर त्याच्या सध्याच्या कामाचे स्वरुप, त्याचा मोबदला, त्याची पोसीशन पसंत पडले नाही वा त्याच्या कंपनीकडुन अजुन काही अपेक्षा असतील तर तो डायरेक्ट बॉसशी बोलु शकतो. किंबहुना त्याच्यासाठी खास " H R Department" बनवले आहे. तिथे तो बिनधास्त आपले म्हणणे मांडु शकतो. त्यातुनही काही मार्ग निघाला नाही तर तो "पेपर टाकुन" लगेच निघुन जाऊ शकतो कारण सध्या उपलब्ध असलेल्या अनेक संधी. पुर्वी असे नसायचे, मुळात संधीच कमी त्यामुळे माणसे एकदा चिकटली की मग त्यापुढे "ठेविले तैसेची रहावे" ह्या तत्वानुसार वागत, फ़ार त्यांची तक्रार नसे....
त्यातुन कुणी तक्रार घेऊन साहेबाकडे [ हो, त्या काळी HR वगैरे असे लाड नव्हते ] गेलेच तर मग "जंगी खडाजंगी" ठरलेलीच. त्यावेळाच संवाद साधारणता असा ...
" साहेब एक विनंती आहे, २ मिनीटे बोलु का ?"
" बोल लवकर, मला वेळ नाही. काम सोडुन हे नस्ते धंदे ?"
" साहेब, ते जरा मला थोडी ......"
" हे बघ, रजा वगैरे काही मिळणार नाही. इथं कामाचा ढीग पडला आहे आणि तुम्ही हिंडा लेको सुट्ट्या घेऊन चैनी करत"
" रजा नाही साहेब, ते जरा पगारवाढीचे बोलायचे होते"
" कशासाठी रे पगारवाढ ? असे काय दिवे लावले आहेत ? नुसत्या पाट्या टाकता लेको आणि म्हणे पगारवाढ पाहिजे"
" साहेब घरखर्च परवडत नाही, महागाई ....."
" नसती कारणे देऊ नकोस, काही पगारवाढ नाही आणि काही नाही, पळ कामे कर"
" साहेब, पोरगा झालाय, त्याच्या दुधा-औषधाचा खर्चाचा मेळ बसत नाही"
" बरं बरं, मी बोलतो हेड-डिपार्टमेंटशी, जा आता काम कर"
" धन्यवाद साहेब, तेवढे बघा नक्की, फ़ार ओढाताण होत आहे सध्या ..."
"........."
"........."
"........."
एवढ्यावर संवाद संपुन हिरमुसल्या चेहऱ्याने तो कारकुन परत जागी येऊन कामाला लागत असे व "पगारवाढीची व घरखर्चाची चिंता" करीत असे. मधल्या सुट्टीत साहेब स्वत: त्याच्या टेबलजवळ येऊन आपुलकीने खांद्यावर हात ठेऊन " हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे. त्यावर तो गेल्यावर "बंडोपंत" आपले डोळे बाहीने पुसत " साला बोलतो फ़डाफ़ड पण माणुसकी आहे त्याच्यात अजुन" म्हणुन सहकाऱ्यांना आपल्या साहेबाच्या "चांगुलपणाचा दाखला" देत. आत्ताच्या कॉर्पोरेट विश्वास ह्या "माणुसकी व चांगुलपणाच्या पर्सनल रिलेशन्सला" स्थान नाही, तेथे फक्त आहेत "फॉर्मल रिलेशन्स".
जास्त पाल्हाळ जाऊ दे, थोडक्यात पाहु....
लोक पुर्वीही कामं करायची, आताही करतात पण कामाची एक "Effiecient Work Policy" आली आहे. त्यामुळे कामाचा जास्त बाऊ होत नाही. पुर्वी सर्व गोष्टी ह्या आपपसातील संबंध व जुळवुन घेण्याच्या पद्ध्तीने चालत असल्याने एखाद्या चुकीचे खापर हे एखाद्या "गरिब कारकुनावर" फुटायचे व त्या बिचा-याची २ वर्षे वगैरे इंक्रीमेंट्स थांबायची, तिकडे साहेब मात्र नामानिराळा.
आज तसे नाही, इथे प्रत्येक गोष्टीचे एक कायमस्वरुपी रेकॉर्ड ठेवले जाते, जे काय आहे ते लिखीत स्वरुपात " ई-मेल" मधुन पाठवले जाते त्यामुळे जबाबदारी ढकलता येत नाही.
एखाद्या मोठ्ठ्या चुकीबद्दल जशी इंजीनीअरवर आफत येते तसा डायरेक्ट " सी ई ओ" सुद्धा फायर होऊ शकतो, यामुळे कामात एक "सुसुत्रता व परफेक्शन" आले आहे.
आजकाल कंपनी कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याची काळजी घेते, पुर्वीही हे असायचे पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे आयुष्य नाही म्हटले तरी ब-यापैकी सुखाचे झाले आहे.
पुर्वी मुळात कमी पगार असल्याने कर्मचा-याची कुटुंब चालवताना खुप ओढाताण वगैरे व्हायची, त्यात बाहेर दुस-या संधीही उपलब्ध नसायच्या त्यामुळे आजची आमच्या वडीलांच्या वयाची पिढी एकाच ठिकाणी मरमर काम करुन पिचुन गेलेली दिसते. आज तसे नाही, जागतीकीकरणामुळे कर्मचा-यांचे उत्पन्न वाढले आहे, तशा गरजाही वाढल्या आहेत म्हणा पण बाहेर अनेक संधी उपलब्ध असल्याने म्हणावे अशी "लागत नाही". जीवनपद्धती सुधारली, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळतील व ती ही शिकुन चांगल्या पदाला पोहचतील. पुर्वी ह्या गोष्टीसाठी अतोनात कष्ट व्हायचे, आज ह्या गोष्टी खुपच नसल्या तरी ब-यापैकी सुकर आहेत.
हे सर्व झाले फ़ायदे, परंतु काही अनिष्ट गोष्टीही आल्या ....
सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ...
पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो.
आपल्या मुलाबाळांबरोबर २ दिवस निवांत घालवायला त्याला ६ महिने आधीच प्लानिंग सुरु करावे लागते, प्रमुख तोटा म्हणजे ह्या लाईफ ने त्यांच्या वयोवॄद्ध आईवडीलांना ह्यांच्यापासुन दुर केले.
आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही. थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ...
त्याच्या "सामाजीक जीवनाची" तर ऑलरेडी वाजलीच असते पण वेळ न मिळाल्याने नातेवाईकांच्या, आप्तांच्या समारंभाला न जाउ शकल्याने ती ही नाराज. याला सर्व कळते हो, अगदी तो काही अंध किंवा निष्ठुर नाही पण सध्यातरी ह्या प्रश्नांचे त्याच्याकडे उत्तर नाही. हे असेच चालायचे. मग कधीतरी त्याला ह्या सर्व दु:खाचां ताण असह्य होऊन तो एकटाच बेडरुममध्ये "हसमसुन रडुन" घेतो कारण तो ही एक माणुसच ना. पण ही गोष्ट त्याला उघडपणे बोलता येत नाही कारण त्याच्या असलेल्या "वरिष्ठ पदाचा व इमेज" चा बोजा, मग तो आतुनच जळत राहतो. आण असह्य झाल्याने लहान वयातच "हॄदयविकार व रक्तदाबाची" उदाहरणे कमी नाहीत, इनफ़ॅक्ट आता पेपरातुन "तिशीच्या यशस्वी युवकांच्या आत्महत्येच्या बातम्या" ही वाचायला मिळु लागल्या आहेत. फक्त ह्या बाबतीत अजुन सुधारणा हवी असे मनापासुन वाटते.
बाकी ह्या "कॉर्पोरेट लाईफ़ने" खुप काही दिले आम्हाला, अजुनही देतेच आहे फक्त आमच्या कुटुंबियांबरोबर मनोसोक्त वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य जर मिळाले तर " जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मी मोठ्ठ्याने ओरडुन मनापासुन " मी आहे !!! " असे देईन.
असे म्हणातात की काही मार्ग तुम्हाला खुप काही देतील, सुख व दु:ख दोन्हीही, पण त्या मार्गावर जायचा "एक दरवाजा" असेल पण परत यायला "दरवाजाच नसेल" तर ???
तो मार्ग ह्या "कॉर्पोरेट लाईफचा" तर नाही ना ????
मुलींचा अनुशेष
प्रेषक भास्कर केन्डे ( बुध, 09/17/2008 - 22:18) .मागच्या आठवड्यात आमच्या पुतणीला (वर्ग सहावी) राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत तिला व आमच्या बंधुंना (जे तिच्या सोबत अंतिम फेर्यांसाठी दिल्लीला स्पर्धेसाठी गेले होते) आलेले अनुभव ऐकून व्यथित होऊन आम्ही चाटच पडलो. कारण राष्ट्रीय स्पर्धा म्हटल्यावर चुरशीने होणार्या स्पर्धा तसेच स्पर्धकांव्यतिरिक्त आयोजक, पालक, स्नेही यांचा स्पर्धेतील उत्साह, उक्तंठा याची अपेक्षा होती. पण जे ऐकले ते असे...
१. महाराष्ट्रातून शालेय गटात केवळ एका मुलीसोबत तिचे पालक स्पर्धेला आले होते (अर्थात आमचे बंधु). बाकी मुलींच्या पालकांना एकतर या स्पर्धांचे महत्व नव्हते वा असूनही त्यांच्या अर्थिक परिस्थितीमुळे ते येऊ शकले नव्हते.
२. जवळपास सर्वच सहभागी मुली मध्यम वा गरीब घरातल्या होत्या. ... कदाचित सर्व श्रीमंत घरातील मुलींना डॉक्टर-इंजिनिअर बनायचे असेल??
३. बर्याच फेर्या खेळाडू अनुपस्थित राहिल्याने उपस्थित खेळाडूंना विजेते घोषित करून आटोपण्यात आल्या. एका सूवर्णपदक विजेत्या मुलीला शेवटच्या चार फेर्या खेळव्याच लागल्या नाहीत... तिच्या गटात स्पर्धकच नव्हते!
४. बहुतांश विजेत्या मुली "चला शासनाची नोकरी पक्की" या विचारानेच सुखावल्या होत्या.
आमच्या पुतणीला गेल्या वर्षी सुद्धा बर्याच स्पर्धांमध्ये हा अनुभव आला होता. कब्बडी, कुस्ती, लांब उडी, उंच उडी, मल्लखांब, दोर्यांवरच्या कसरती अशा अनेक खेळात जिल्हा पातळीवर एकदोन स्पर्ध येतात व विजयी होतात असे विदारक चित्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पहायला मिळते.
काय चालले आहे हे? अशा पद्दतीने निवडल्या गेलेल्या खेळाडूंकडून आपण ऑलम्पिकमध्ये पदक आणण्याची आशा कशी करणार? आपण एक सुजान नागरीक म्हणून आपल्या आजूबाजूच्या मुलींना खेळांमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी काय करु शकतो? खेळाने मुलांचा सर्वांगिण विकास होतो व अभ्यासाठी आवश्यक असणारे मनोबल, शारिरिक क्षमता निर्माण होते हे आपण पालकांना कसे पटवून देऊ शकतो?
मला वाटते मुलांच्या स्पर्धांमध्ये सुद्धा कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असावे. मुलांमध्ये खेळाची आवड असणार्या व पालकांचा पाठिंबा असणार्यांचा कल सुद्धा जास्त करून क्रिकेट वा टेनिस, फुटबॉल अशा आजकाल पैसा/प्रसिद्धि देणार्या खेळांकडे असतो.
शासन दरबारी तर सगळा आनंदी आनंदच आहे. ऑलम्पिक समितीकडून कसलीही मदत न झालेल्या सूवर्णबिंद्राने स्वकष्टाने/स्वखर्चाने यशशिखर गाठले आणी आपल्या पुण्यात "भव्य" सत्कार झाला तो कलमाडींचा! का, तर कमिटीचे अध्यक्ष म्हणून!! यश मिळवलेल्या त्रिमुर्तींनी दोन्-तीन आठवडे प्रसारमाध्यमे गाजवली. त्यांच्यावर बक्षिसांची खैरात पण झाली. पण केवळ एक्-दोन महिन्यात आपली ही प्रसार माध्यमे, समाज व सरकार हे कदाचित या त्रिमुर्तींना विसरूनही गेले. येत्या काही वर्षात व पुढील पिढीत असे शेकडो अभिनव कसे तयार होतील याच्यावर कोणी काही केल्याचे ऐकीवात नाही. तेव्हा अशा या नाकर्त्या शासनाकडून काही अपेक्षा न ठेवलेल्याच बर्या.
पण मग खेळातला हा मुलींचाच नव्हे तर मुलांचा तसेच आपल्या देशाचा अनुशेष कसा भरून काढता येईल??
शर्यत
प्रेषक अरुण मनोहर ( बुध, 07/09/2008 - 05:37) .डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ...
कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो
कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो
कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार
कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार
काही चिकटवत, काही झटकत,
अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत.
धावणारे, धापा टाकणारे,
पाय ओढीत चालणारे,
विजयोन्माद करीत सुसाटणारे,
धक्काबुक्की करीत माजणारे,
स्वत: पडून रस्ता अडवणारे,
दुसर्याला पाडून रस्ता मिळवणारे,
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत
कोणाकडेच वेळ नाही
ना पडलेल्याला सावरायला
ना कोणाकडे बघायला
समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही
वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही
सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर
थांबला, संपला
पडला, तुडवला
धीमा, मागे टाकला
सुसाटला, चमकला
धक्का मारला, पुढे गेला
धक्का खाल्ला, चरफडला
आंधळ्या शर्यतीतले मुसाफीर
जाडे रोडे मोठाड लहानगे ऊंच ठेंगणे उंदीर
काळे गोरे भुरे लाल पिवळे हिरवे उंदीर
हिंस्त्र हळवे भुरटे फसवे दयाळू लाजाळू घाबरट बावळट शहाणे वेडे उंदीर
लंगडे आंधळे बिनपायांचे दहा पायांचे कुबडीवाले सायकलवाले मोटरवाले पॅरॅशूटवाले
सूट्वाले धोतरवाले लुंगीवाले साडीवाले नागडे उघडे
पुष्ट तुष्ट रोगी योगी धोंगी भोगी
इतःस्ततः आणि पुढेपुढे धावणारे उंदीर
सगळ्यांचे एकच कर्म.
डोंगराला वळसे घेत चढ उतार करणारा रस्ता कापीत पळायचे
समोरच्याच्या आणखी समोर जायचे
मागच्याला आणखी मागे टाकायचे
ह्या भाउगर्दीत कधी चुकूनमाकून
एखादा उंदीर थबकतो.
दरीच्या पायथ्याशी झुळझुळ वहाणारा निर्झर,
डोळे भरून बघतो.
पाण्यात पोहणारे बदकांचे कुटूंब त्याला बोलावते.
आणि अचानक.............
उंदीर एकला वेडा, तोडूनी बेडी,
मारली उडी अशी वेडी.....

सहज आठवलं म्हणून...
प्रेषक वेदश्री ( मंगळ, 07/01/2008 - 14:26) ."मौम, मैं जरा फटाकसे जाके ये डॉक्युमेंटसकी फोटोकॉपी करके आती हूं। मिनव्हाईल अगर प्रसाद मुझे ढुंढता है तो उसे बोल देना की ऑफिसका झेरॉक्समशीन ठीक करवाए। इंकमटॅक्स सबमिशनके लिये वो फायनान्सवाले सिरपे बैठे है और ये नामाकुल मशीनभी अभी बंद पडना था। उसे बोल देना.. ठीक है? "
मौमिता माझी प्रोजेक्टमधली खासंखास दोस्त. दोघी एकमेकींना विश्वासात घेऊन मदत करत पुढे जाणाऱ्या. प्रसाद माझा पीएल !
"ठीक है। लेकीन तू जल्दी आ। हमेशा देर होती है खाना खानेको तेरीवजहसे.. "
"हां हां.. " करत मी हापिसातून बाहेर सटकले आणि पळत जाऊन सीप्झच्या बाहेर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानासमोर असलेल्या गर्दीत मिसळले.
"भैया, ये डॉक्युमेंटस जल्दीसे फोटोकॉपी करके दो। २ सेट बनाना। ठीक है? "
"मॅडम, १५ मिनिट थांबावे लागेल. " दुकानदार मराठीत सुरू झाला.
"१५ मिनिट???!!!! मौम जीव खाईल माझा.. तसेही तिला नॉनव्हेजच लागते जेवायला. प्लिज.. जरा पटकन करा ना हो.. "
मी अगदीच आटापिटा करतेय म्हणता तो माझ्याकडे पाहून हसायला लागला. तेवढ्यात त्याचे लक्ष माझ्या कंपनीच्या मंगळसूत्राकडे गेले. ( मंगळसूत्र म्हणजे लग्नवाले नाही.. नोकरीवाले ! कोणी कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा म्हणतात तर कोणी मंगळसूत्र.. असो. ) त्याने लगेच एक दुसरे मंगळसूत्र ( जे आमच्याच कंपनीतल्या कोणाचेतरी दिसत होते ) काढले आणि विचारले, "तुम्ही यांना ओळखता का? "
मी हातात घेऊन पाहिले तर काय आश्चर्य.. ते मुफिजचे मंगळसूत्र होते. मुफिजनेच मला या नोकरीच्या मुलाखतीला बोलावले होते आणि मग तिथून ऑफर लेटर देण्याचे सत्कार्य करण्यापर्यंत तीच होती माझ्याशी वाटाघाटींमध्ये. एकदम जिंदादील आणि त्यामुळेच माझी दोस्त झालेली.
"हो.. अगदीच छान ओळखते की पण हे तुमच्याकडे कसे काय आले? "
"त्या माणसाने आणून दिले. त्याला सीप्झ गेटबाहेर मिळाले म्हणाला. त्याला आत जायची परवानगी नसल्याने त्याने माझ्याकडे आणून दिले."
दुकानदाराने बोट दाखवले तिकडे पाहिले तर एक अगदी खंगलेला, म्हातारपणाकडे झुकलेला अगदीच गरीब माणूस दिसला. आम्हा दोघांचे बोलणे ऐकून तो माझ्याकडे आला. माझ्या पोटात धस्स झाले. सामान्यपणे अशी मौलिक ( मौलिकच म्हणायला हवी की... नवीन मंगळसूत्र घ्यायचे म्हणजे खूप झोलदार, लांबलचक काम आणि महागडेही ) वस्तू परत देताना देणाऱ्याच्या आर्थिक अपेक्षा चांगल्याच भारी असतात. त्यात आणिक तो माणूस असा फाटका म्हटला म्हणजे....
"म्याडम.. " इतकेच म्हणून त्याने माझ्यासमोर हात जोडले.
सीप्झच्या गेटबाहेरील दृश्य कोणाला बघून माहिती असेल तर माझी स्थिती किती चमत्कारीक झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकाल. सगळे लोकं आम्हां दोघांकडे बघायला लागले होते. असं कोणी उगाचच मला सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन असल्यासारखं केलं की मला अगदी अवघडल्यासारखं होऊन जातं. एकदम गायब होऊ शकलो तर किती बरे होईल असे वाटते. माझ्याकडे फक्त फोटोकॉपीला लागतील इतकेच पैसे होते पण तरीही मुफिजचे मंगळसूत्र म्हणजे...
"हे बघा, हात वगैरे काही जोडू नका. हात खरेतर मी जोडायला हवेत तुम्ही केलेल्या या चांगल्या कामाबद्दल." एक आवंढा गिळून मी, "किती पैसे हवे तुम्हाला?"
ते होते त्याहून जास्त व्यथित दिसायला लागले.
"माफ करा पण असे कोणाचे स्वाईप कार्ड हरवण्याचा आणि ते परत देणाऱ्याला बक्षिसी देऊ करण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे मला मार्केट रेट माहिती नाही. तुम्ही जितके सांगाल तितके देईन मी. " हुश्श.. एव्हाना लोकांच्या नजरांनी मला अगदी दडपल्यागत झालं होतं. माझे फोटोकॉपीचे कागदही माझ्या हातात आले होते. दुकानदाराचे पैसेही देऊन झाले होते.
"म्याडम, मुझे आपसे पैसे नहीं चाहिये। मुझे अगर दिला सकते हो तो बस्स एक नौकरी दिला दो। मेरे बच्चे भुखे नहीं देखे जाते अब मुझसे। कोईभी काम करूंगा मैं। मुझे बस्स नौकरी दिला दो। "
ओह नो ! मी खूपच खजील झाले. मी किती चुकीचं समजले होते त्यांना. आता या मागणीला मी काय करू? कोणाला रेफर करणे किंवा कोणाकडून स्वतःला रेफर करवून घेणे हे तसे माझ्या तत्त्वात बसत नाही, त्यामुळे मी ते कधीच करत नाही. आता हा पेच कसा सोडवावा. तो माणूस तसे म्हटले तर काहीच अवाजवी मागत नव्हता मला. का माहिती नाही पण कोरडी तत्त्वे बाजुला ठेवून या माणसाला मदत करायचे मनाने घेतले.
"आपका नाम क्या है? " तो माणूस हिंदी आहे कळताच माझा गाडा परत हिंदीकडे.
"जी, शिवप्रसाद। सब लोग मुझे शिवा बुलाते है।"
"अच्छा शिवाजी, आप क्या क्या काम कर सकते है? " असं रस्त्यावर उभं राहून असे प्रश्न विचारायचे म्हणजे जरा अवघडच वाटत होते पण इलाज नव्हता. अनाहूतपणे शिवाचा शिवाजी केल्याबद्दल बोलून गेल्यावर विचारात पडणाऱ्या मला मौज वाटली.
"साफसफाईका काम कर सकता हूं। या फिर हापिसमे अगर दूसरा कुछ काम है तो वो भी मैं जल्दी सीख जाउंगा। मुझे बस्स महिने की २-३हजार तनखा मिले ऐसा काम चाहिए।"
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला.
"अच्छा. आप चिंता मत करो। मैं देखती हू की आपको जल्दीही नौकरी मिल जाए। लेकीन आपका पुरा नाम, पता और फोन नंबर मुझे दीजिए।" काय बोलावे ते खरेतर सुचत नव्हतेच मला पण तरीही..
"म्याडम, मेरा नाम शिवप्रसाद है। पता ऐसे तो कुछ नहीं है अभीतक और फोन भी नहीं है।"
हे राम ! आता काय करणार मी?
"लेकीन फिर आपको कैसे काँटॅक्ट करेंगे? मेरा मतलब है आपको बुलाना हो तो.."
"जी.. आप इस दुकानपे मेरेलिए बुलावा रख दिजिएगा। वो मुझे बता देगा।"
!!!!!!!
"जी। ठीक है। मैं देखती हूं मैं क्या कर सकती हूं।" असे म्हणून मी गेटकडे वळायला लागले. तेवढ्यात तो माणूस चक्क माझ्या पाया पडला.
"जरूर दिलवाइएगा नौकरी, म्याडमजी।"
आता मात्र हद्द झाली होती. सगळे लोकं माझ्याकडे पाहून हसत होते.
"आप ऐसे मत किजिए प्लिज। मैने बोला ना मैं देखती हूं.. " असे म्हणून मी ऑफिसकडे धूम ठोकली.
~~~
"हॅलो.. "
"हॅलो मुफिज, तू तर साफ विसरलीस ना मला?"
"नाही रे वेदा, असं होऊ शकते का? पण मी तुला नंतर फोन करते कारण आत्ता मी जरा टेन्शनमध्ये आहे. ओके?"
"नाही. मला तुला आत्ताच भेटायचं आहे. एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी."
"अब्बे मेरा स्वाईप कार्ड गुम हो गया है !!! तू अभी मेरा दिमाग मत खा.. प्लिज।"
"तू जास्त खिटपिट करू नकोस. मी इथे रिसेप्शनच्या तिथे आहे.. तू लगेच ये."
ती मुकाट्याने आली आणि माझे सरप्राईज म्हणजे तिचे स्वाईप कार्ड असेल याची सुतराम शक्यता तिला वाटलेली नसल्याने तसे ते असल्याचे कळल्यावर हरखून गेली ती एकदम.
"थँक्स, वेदा. यू आर ब्युटीफूल ! " तिची ही नेहमीचीच पद्धत थँक्स म्हणण्याची.
"ब्युटीफूल-फ्युटीफूल राहू दे बाजुला पण तुझ्या या मंगळसूत्राच्या बदल्यात मी एक प्रॉमिस करून आले आहे ते परत देणाराला. ते पूर्ण करण्यात तुला माझी मदत करता येईल का सांग. " खरेतर मी फक्त एक पोस्टमन होते एकूण व्यवहारात पण का कोण जाणे आता मला माझी जबाबदारी त्याहून अधिक वाटायला लागली होती.
"बोल ना.. काय प्रॉमिस केले आहेस?"
"नोकरी मिळवून देईन म्हणून ! "
"हॅ ! इतकेच ना? किती वर्षाचा एक्स्पिरियन्स आहे? बीई आहे की एमसीए की बिएस्सी? रिझ्युमे फॉर्वर्ड कर आणि काम झालं समज. तू आजवर एकालाही सजेस्ट केलेले नाहीस, त्यामुळे हे करायला मला खूपच आनंद होईल."
"मुफी, ही इज नॉट लिटरेट. "
"हाय दैया !!! मग कशी काय देणार नोकरी? तू पण ना वेडीच आहेस.. पैसे द्यायचेस आणि काम तमाम करायचेस मग. उगीच प्रॉमिसबिमिस करत बसतेस.. "
"मला तुझे उत्तर मिळाले, मुफी. थँक्स." असे म्हणून मी उतरल्या चेहऱ्याने वळायला लागले.
"अब्बे रुक तो। अशी काय जातेस मध्येच निघून? तो क्लिनिंगचे काम करू शकेल का? क्लिनिंग स्टाफमध्ये? "
माझा चेहरा उजळला. "हो. चालेल. "
"ह्म्म.. क्लिनिंग स्टाफची जबाबदारी आपल्याकडे नाही. ती एका एजन्सीकडे आहे. मला त्या माणसाचे डिटेल्स दे, मी पाठवते त्या एजन्सीवाल्यांना. बघुया काय करता येतं ते. ओके? "
मी माझ्या एका फोटोकॉपीतला एक कागद फाडून त्यावर शिवप्रसाद असे लिहून केअर ऑफ म्हणून झेऱोक्सवाल्याचा पत्ता आणि फोन नंबर लिहून तिला दिला. ते पाहून ती माझ्याकडे पाहतच राहिली.
"मुफी, तू हे करू शकत नसशील तर तसे सांग क्लिअरकट.. मी दुसरीकडे काही व्यवस्था होते का पाहीन. बाय हुक ऑर कुक हे मला करायचेच आहे."
"तू कशाला मध्ये पडतेयस? माझ्या स्वाईपकार्डसाठीचं रिपेमेंट मीच करायला हवेय. आय विल गेट इट डन. डोंट यू वरी. "
"थॅंक्स, मुफी ! यू आर रिअली ब्यूटीफुल.. " आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. त्या हसण्यातला अर्थ इतर कोणालाही समजता येणार नव्हता. तेवढ्यात मौमचा ५व्यांदा फोन आला. तिने आता माझीही ऑर्डर देऊन ठेवली होती आणि डायरेक्ट कँटीनमध्ये पधारायचा हुकुम जारी केला होता.
~~~
"वेदू, तूने ऐसी क्या जादूकी छडी घुमाई है की तेरे डेस्ककी सफाईके लिए एक स्पेशल बंदा आने लगा है? "
मौमचा हा प्रश्न ऐकून मी बुचकळ्यात पडले. वाशीहून येत असल्याने बस नेहमीच उशिरा आणायची माझी मला हापिसापर्यंत त्यामुळे हा शोध मला लागणे शक्यच नव्हते.
"स्पेशल बंदा? "
"हां.. क्या तो शिवा नाम बताया उसने. "
मौमच्या या उत्तराने मला इत्तका आनंद झाला की मी अगदी चेकाळून गेले. आता सगळे जगच माझ्यासाठी ब्यूटीफुल झाल्यासारखे वाटले मला. हापिसातल्या कोणालाच मी कधी एसेमेस पाठवत नाही पण त्यादिवशी मात्र आवर्जून पाठवला मुफीला..
हम सोचते थे की सिर्फ हम मानते है आपको
लेकीन आपको माननेवालोंका काफिला निकला
दिलने कहा की शिकायत कर खुदासे
मगर वोभी आपको माननेवालोमेसे निकला !
~~~
कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.. ते असेच काही असावे का?
मी आणि माझी नोकरी
प्रेषक सखाराम_गटणे™ ( रवी, 06/22/2008 - 12:31) .सकाळ्च्या सात वाजता मोबाईल गजरमुळे जाग आली. पहील्यांदा तो गजर बंद केला. सवयी प्रमाणे आंघोळ व ईतर गोष्टी झाल्या. चहा पित पित वर्तमानपत्र वाचु लागलो.
मुख्य बातमी पाहुन चहा ची चव कडवट भासु लागली.
डोळ्यासमोरुन ती कॉलेज ची दुष्ये जात होती.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

स्वयंपाकी देता का हो कोणी ??
प्रेषक अभिरत भिरभि-या ( गुरू, 06/19/2008 - 12:55) .स्वयंपाकी देता का हो कोणी ??
।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।।
बंग़ळूर
ज्येष्ठ कृष्ण १
पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही
बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली.
आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो.
नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती.
तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स
अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती. पण आता बंगळुर मधे मराठी
(किमान उत्तर हिन्दुस्तानी) पद्धतीचे जेवण कुठे मिळणार? इथल्या सर्व हाटेलात उ भा. खाणे म्हणजे मैद्याच्या रोट्या हेच समिकरण आहे.(बरे याला पर्याय म्हणुन घरगुती खानावळी सारखी सोय आमच्या भागात तरी उपलब्ध नव्ह्ती. शिवाय आम्हा चौघा रुममेट्सचे पाक कलेतली गती यथायथाच)
यत्र तत्र सर्वत्र पसरलेल्या बिहार्ंयाच्या रुपाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसला. आणि आमच्या घरी जेवणाचा डब्बा येऊ लागला. फ़ुलके, भात, भाजी असे ब-यापैकी घरचे वाटणारे जेवण मिळु लागले. डब्ब्याची कंटाळवाणी गोष्ट म्हणजे त्याच त्याच भाज्या. समस्त मेसवाल्यांना "बटाटा" हा प्रकार इतका प्यारा का आहे याचे गुढ मला अजुनही उमगले नाही.
आणखी लिमिटेड क्वांटिटीमुळे पोट भरले आहे असे वाटायचे च नाही.
हपिसातल्या एका सहका-याच्या डब्ब्यातुन तेव्हा दररोज सुग्रास पदार्थ निघु लागले
आणि या सा-या समस्येवरचा रामबाण तोडगा सापडला .. कुक अर्थात आचारी !!
तुम्हाला हवे ते हवे तितके बनविणारा बल्लवाचार्य म्हणजे देवदुत च जणु !
आणि आचारी शोधण्याची आमची मोहीम सुरु झाली.
उपाय जरी सापडला तरी बेन्गळुरसारख्या दक्षिणी शहरात उ. हि. आचारी सापडणे तितके सोप्पे नव्हते.आता मुम्बई वा दिल्लीत राहणारा कोणी मुत्थुस्वामी सुब्र्हमण्ण्यम अय्यरही हेच उलट्या पद्धतीने म्हणेल हे मी समजु शकतो.
नशिबाने एक पोरगेलासा तरूण आम्हाला मिळाला. या वल्ली चे नाव - चंदन . चंदनच्या हाताला भन्नाट चव होती. शिवाय जेवण बनविण्याचा त्याचा वेग ही लाजवाब होता.
या लाजवाब वेगाचे प्रतिबिम्ब ओट्यावर पोळ्या लाटताना पसरलेल्या पिठीतुन वा हिंदकळलेल्या वरणातुन हि दिसायचे. 'जादा पढाई करके का होगा ? ' या practicle विचारामुळे चंदन शाळा फ़ारशी शिकली नव्हता आणि पैसा कमावायचा म्हणुन
बेंगळुरची वाट धरली होती. आम्ही दिलेले पैसे कमीवाटतात म्हणून की काय किंवा आमचे घर दूर पडते म्हणून की काय चंदनने एका महिन्यानंतर घरी येणे बंद केले आणि आम्ही एका चांगल्या कुकला मुकलो 
पंधरवड्याच्या भटकंती नन्तर एक ओडिसीबाबुंचा शोध लागला व आम्ही पंढरपुरच्या पांडुरंगाला व पुरीच्या जगन्नाथाला एकसाथ thank you म्हटले." होम पंद्रा शालसे खाना बनाता ह्या" असे experince certificate या ओडिसीबाबुंकडे होते.जेवण महत्वाचे असल्याने आम्ही ही पैशांसाठी फ़ारसे ताणुन धरणार नव्हतो. उडियाबाबु जवळ राहणारे असल्याने ते या कामाने खुष वाटले अर्थात आम्ही ही खुष होतो. पहिल्याच दिवशी या महाशयांनी ३ जणांचे साधे जेवण बनविण्यास तीन तास घेतले वर चव यथा यथा. १५ वर्षांचा अनुभव दाखवुन सिस्टिम अनालिस्ट म्हणुन मिरविणारे लोक आय.टी. मधे पाहिले होते. यांचे भाउबंद सर्व क्षेत्रात होते म्हणायचे. 
या नंतरही बरेच दिवस गेले. शेवटी आम्हीही कंटाळुन परत डब्बाच लावला. एक दिवस योगयोगाने अबिदाबाईंचा शोध लागला.कर्नाटकातल्या सत्तरुढ धर्मनिरपेक्ष जनता दलाप्रमाणे आम्ही ही धर्मनिरपेक्ष असल्याने आमच्या रांधाघरावर आता अबिदाबाईंची वर्णी लागली . बाईचा हात घराला लागला म्हणजे सारे रुप पालटते म्हणतात.
अगदी त्याप्रमाणे च आमचे किचनही आता चकाचक राहु लागले. अबिदाबाई सांबार सुन्दर बनवायच्या. अबिदाबाईंची एक गम्मत लौकरच ध्यानी आली. भाजी कुठलीही असो , अबिदाबाईंची बनविण्याची पद्धत एकच होती. तेल गरम करायचे, त्यात चिरलेली भाजी टाकायची, मसाला व पाणी टाकुन वर झाकण ठेवायचे.यामुळे एक लगदा तयार होत असे. शेवटी काय तर पुन:श्च हरिओम
ताजा कलम:
मध्यंतरी राज साहेबांनी आन्दोलन करुन ब-याच बिहा-यांना उत्तरेत पाठवल्याचे कळते.त्यांनी थोडे बिहारी बेन्गळुरी धाडावेत. बहुतांश बिहरी उत्तम कुक असतात. याने आमच्या सारख्या भुकेल्या जनतेचे कल्याण होईल.
धंद्यात पडण्याची (!) इच्छा असणा-यांना एक मौलिक टीप:
बेन्गळुरात मराठी पदार्थांच्या हाटेलास तुफ़ान वाव आहे. (मागेपुढे हाटेल काढण्याचा आमचाही विचार आहे). दरम्यान पाक कलेच्या प्रान्तावर चढाई करण्याचे काही यशस्वी व काही अयशस्वी प्रयत्न आम्ही ही केले आहेत त्याबद्दल सविस्तर पुन्हा केव्हा तरी. पूर्वी ज्याला मी नाके मुरडायचो ती मेथीची भाजी, भाकरी आता कधी गेल्यावर कौतुकाने खातो हे पाहुन मासाहेबांना घरी नवल वाटते.
तुर्तास एका सरदारजीची मेस आम्हास गावली आहे.बटाट्याचे तुकडे आम्ही तिकडे जाऊन तोडत आहोत.तरिही "बचेन्गे तो और लडे.ग़े" बाण्याने आमची "आचारी शोध मोहिम" जारी आहे.
तळटीप:
(अजुनही) हवे आहेत: स्वैपाकी
पदसंख्या: १
अर्हता : .......
अरून सवास! भाग १
प्रेषक ॐकार ( शुक्र, 05/30/2008 - 12:12) ."अरून सवास!" - थाई भाषेतलं सकाळचं अभिवादन कानी पडलं आणि कुठेतरी शब्दांची जत्रा लागल्याची चाहूल लागली. थायलंडच्या एका महिन्याच्या वास्तव्यात थाई लोक, काही ठिकाणे, थाई खाणे-पिणे, थाई संस्कृती आणि थाई भाषा यांची थोडीशी ओळख झाली आणि भारताबाहेर पहिल्यांदा घरोब्याचा अनुभव आला. थायलंडला जायच्य आधीच काही नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग शिकलो होतो आणि भाषासाधर्म्याचे कुतूहल जागे झाले. थायलंडच्या विमानतळाचे नाव - सुवर्णभूमी ! पहिले पाऊल जिथे टाकणार त्या अनोळखी प्रदेशाचे नाव इतके ओळखीचे असेल असा अंदाजच नव्हता. थायलंडला उतरल्यावर मात्र कुतूहल आणि अंदाजाची जागा उत्साह आणि आनंदाने घेतली. थायलंड बद्दल माझे काही अनुभव इथे मांडावेत असे कधीपासून मनात होते , आज योग आला.
ग्रँड पॅलेस

थायलंडमधले पर्यटनासाठी विषेश प्रसिद्ध असलेले हे ठिकाण. बँकॉक - राजधानीपासून जवळ आहे. डोळ्यांसाठी वैभवाची मेजवानीच!

सुवर्णकळस

सोनेरी खांब

गरूड

शेषनाग

भिंतीवर चितारलेला रामायणातील एक प्रसंग

भालदार चोपदार (?)
अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या)
बँकॉकपासून गाडीने तासाभराच्या अंतरावर असलेले हे ऐतिहासिक स्थळ. हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते. इथे ठिकाणी बुद्धाचे अनेक सोनेरी कळसाचे स्तूप, प्रार्थना/निवास स्थळे होती. बर्मातील टोळ्यांनी जेव्हा थायलंडवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी इथले सगळे सोने लुटून नेले.




आज केवळ अवषेश उरले आहेत. तरी त्यांच्यावरून गतकाळातील वैभवाची कल्पना करता येते. त्यानंतर चक्री राजघराण्यातील राजा राम (प्रथम) याने राजधानी बँकॉकला हलवली.
जुने थाई लाकडी घर.


हे घर जमिनीपासून थोडे उंचावर बांधले जाते. यामुळे घरात हवा खेळती राहते. घराची रचना सर्वसाधारणपणे अशी - मध्ये मोकळी जागा, चार बाजूंनी स्वयंपाकघर, पाहुण्यांकरता खोल्या, अभ्यासिका, शयनकक्ष. प्रत्येक बाजूंना उतरती छपरे. मध्ये मोठे छप्पर.
थायलंडमध्ये जिथे जिथे फिरलो तिथे आदरातिथ्याने भारावून गेलो. प्रगतीशील अशा या देशात आधुनिकतेबरोबरच लोकांची आपुलकीही तग धरून आहे. सवात्दी खा /क्रब (खा - स्त्री म्हणते तेव्हा, क्रब - पुरूष म्हणतो तेव्हा) असे म्हणत थाई व्यक्ती तुमचं स्वागत करेल. कॉब खुन् खा/क्रब म्हणून तुम्ही धन्यवाद द्याल आणि ह्यापुढे तुम्हाला थाई येत नसेल तर मात्र पंचाईत! थाई भाषेतील पाली-संस्कृत मधून आलेले शब्द जरी ओळखीचे वाटले तरी आज वापरात असलेले थाई शब्द मात्र तितकेसे पटकन कळतीलच असे नाही. त्यासोबतच ख्मेर मधूनही थाई भाषेत शब्द आले आहेत. थायलंडमध्ये सगळ्यांना इंग्रजी येतेच असं नाही आणि येत असली तरी आपली इंग्रजी आणि थाई इंग्रजी यांतून कोण काय बोलतो ते समजणे आपल्याला आणि थाई माणसालाही कठीणच! थाई टोनल भाषा आहे त्यामुळे शब्दांच्या उच्चारांतील बारकावे शिकायला, समजून घ्यायला मेहनत घ्यावी लागते. पण बरेचदा थाई व्यक्ती स्मितहास्यानेच तुम्हाला अर्धेअधिक जिंकून घेतात.
काही ठिकाणांची नावे पहा -
समुत् संख्रोम (समुद्र संग्राम)
रचतापिसेक (रजताभिषेक)
कांचनबुरी (कांचनपूरी)
राचाबुरी (राजापूरी)
सुवर्नापिसेक (सुवर्णाभिषेक)
अयुत्थया (अयोद्ध्या)
काही साधारण नावे -
तलेय (तळे ) थाई भाषेतला सद्ध्याचा अर्थ डबके , गरूड, शेषनाग
असेच काही संदर्भ सण, कालगणना याबाबतही मिळतात -
मकबुचा - (मकपूर्निमाबुचा) - माघी पौर्णिमा (बुचा - पूजा )
विसाखाबुचा - वैशाखपूजा - वैशाख पौर्णिमा - बुद्धपौर्णिमा
भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे काही धागेदोरे जुळतात. पण ह्या फंदात जास्त न पडता तुम्ही जर थायलंडमध्ये लोकांत मिसळलात तर तो आनंद काही निराळाच.
पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच...
थोडे असे, थोडे तसे
प्रेषक देवदत्त ( शुक्र, 04/11/2008 - 21:29) .गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला.
एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार."
खरोखरच चांगला विचार.
तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला,
एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा
) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या. आम्ही तुम्हाला वर ओढतो."
तो माणूस काही केल्या हात समोर करत नाही. लोक म्हणतात "काय झाले ह्याला?"
तेवढ्यात दुसरा एक माणूस पुढे येतो आणि म्हणतो," अरे हा माणूस एकदम कंजूस आहे. कोणाला काही देत नाही." आणि मग त्या माणसाकडे पाहून बोलतो,"अहो, माझा हात घ्या. त्याला धरून वर या".
लगेच तो (कंजूस) माणूस पुढे होऊन ह्याचा हात पकडतो.
वाटले, हात धरण्यावर थोडे लिहू. पण खूप विचार करूनही ते शब्दात बाहेर आले नाही. मग विचार केला, एकाच गोष्टीवरून दोन वेगळे विचार मनात येतात ते लिहूया. म्हणून हा प्रयत्न...
थोडे असे, थोडे तसे.
महाविद्यालयात असताना एका मित्राने पुढील सांगितले होते. आता कुत्र्या-मांजरांचे विचार त्याला कोणी सांगितले हे मी त्याला नाही विचारले, तुम्ही मला नका विचारू 
कुत्र्याला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा तो विचार करतो, "हा माणूस मला खायला देतोय. हा नक्कीच महान/देव आहे."
मांजरीला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा ती विचार करते, "हा माणूस मला खायला देतोय. म्हणजे मी नक्कीच कोणीतरी महान/देव आहे."
२/३ दिवसांपूर्वी 'स्टार माझा' पाहताना हे मनात आले.
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. आपण मॉल मध्येच जाऊन घेतले पाहिजे. आपले पैसे वाचतील.(सर्वसामान्यांचा विचार)
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. त्यांनी नक्कीच साठा करून ठेवला असेल. त्यांची चौकशी करायला पाहिजे. (सरकार आणि वृत्तवाहिन्यांचा विचार)
बघूया, आणखी काही असे विचार आठवतात का?
(हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)
व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?
प्रेषक इनोबा म्हणे ( शनी, 02/16/2008 - 01:45) .लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत.
राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही
(कट्टर मराठी) -इनोबा
घरवाले...बाहरवाले
प्रेषक इनोबा म्हणे ( बुध, 02/06/2008 - 11:56) .इच्छुकांनी या विषयावर आपापली मते नोंदवावीत व चर्चा करावी असा मानस आहे...
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

