मुक्तक

चिंचोली : मोरांची आणि थोरांची

मोराच्या चिंचोलीबद्दल बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एखाद्या गावात जाऊन मोर पाहण्याचं प्रचंड आकर्षण वगैरे नव्हतं. पण मुळात भटकायला, नवीनवी गावं नि रस्ते शोधायला आवडत असल्यानं कधीतरी एकदा तिकडे जाण्याचं डोक्‍यात होतं. परवाच्या रविवारी हा योग जुळून आला.

गेल्या महिन्यात एका छोट्या ग्रुपला घेऊन मोराच्या चिंचोलीला एक सहल काढायचा बेत केला होता. तो काही कारणांनी साध्य झाला नाही. म्हटलं, वेळ आहे, तर आपणच जाऊन यावं आधी. कार हाताशी होतीच. आनंदराव थोपटे यांच्या वेबसाइटवर जरा टेहळणी केली होती. त्यांच्याशी संपर्क साधून सर्व आलबेल आहे ना, याची चौकशी केली. सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7 ही मोर दिसण्यासाठी उत्तम वेळ. आम्हाला सकाळी लवकर उठून जाणं शक्‍य नव्हतं, म्हणून दुपारी निघायचं ठरवलं. एक वाजता निघणार होतो, पण सव्वादोनपर्यंत ढकलाढकली सुरू राहिली. मग चिडचीड, वैताग, भांडणांनंतर मनस्वीला काखोटीला मारून कसेबसे पुण्याबाहेर पडलो!

मोराच्या चिंचोलीचा रस्ता शोधायला फारसा अवघड नव्हता. नगर रस्त्यावरून शिक्रापूरपर्यंत जाऊन पुढे पाबळ फाट्याला वळायचं होतं. शिक्रापूरपासून चिंचोली 18 कि.मी. आहे. पुण्यापाहून शिक्रापूर साधारण 48 किमी. पुढचा रस्ता थोडा खराब होता. त्यातून एका अरुंद वळणावर एका टेम्पोमध्ये कोंबून कोंबून भरलेल्या उसाच्या कांड्यांनी आमच्या गाडीच्या अगदी जवळून ठिकठिकाणी पप्प्याही घेतल्या!

दुपारी चारच्या सुमारास मोराच्या चिंचोलीत पोचलो. आनंदराव थोपटेंचा मुलगा आम्हाला न्यायला जरा पुढे आला होता. चिंचोलीत दोन-तीन कृषी पर्यटन केंद्र आहेत. जय मल्हार, माऊली वगैरे नावांची. या थोपटे मंडळींचं कृषी पर्यटन अगदीच घरगुती, पण छान, आकर्षक आणि नीटनेटकं आहे. बाहेर पाटी, बोर्ड वगैरे काही नाही. आम्ही थेट थोपट्यांच्या अंगणातच दाखल झालो. ज्येष्ठ आनंदरावांनी हसतमुखानं स्वागत केलं. नातेवाइकच घरी आल्यासारखी "प्रवासाचा त्रास वगैरे नाही ना झाला,' अशी चौकशी केली. मग चहापान झालं. नंतर आम्ही त्यांच्यासह त्यांचा मळा बघायला निघालो. ज्वारी, वांगी, मका, गवार, गहू, कसली कसली शेती करतात ते! चाळीसेक एकर जमीन नि खाणारी चार माणसं! गावात माणसं मिळत नाहीत म्हणून बरीचशी जमीन तशीच पडीक!

शेतात आम्ही पाऊल टाकलं नि दुसऱ्याच क्षणाला तीन-चार मोर शेतात बागडताना दिसते. आमची चाहूल लागताच पळून गेले. पुढच्याही शेतात कुठेकुठे दडून उभे होते. थोडाफार फेरफटका मारून, चिंचा वगैरे खाऊन आम्ही पुन्हा घराकडे परतलो. तोपर्यंत घराच्या जवळ सत्तरेक फुटांवर झाडांखाली काही मोर दिसत होते. कॅमेरा शक्‍य तितका झूम करून त्यांची छबी टिपली.

नंतर आनंदराव आम्हाला त्यांच्या हिल-स्टेशनवर म्हणजे चिंचिणीखाली घेऊन जायला निघाले. घराच्या आवारातून बाहेर पडलो आणि शेजारच्याच माळावर चार-पाच मोर मस्त बागडताना अगदी जवळून दिसले. एक मोर आणि लांडोरीचा खेळही (!) चालला होता. त्याचा व्हिडिओ टिपता आला. काही फोटो मिळाले. तिथून मग त्या "हिल स्टेशन'वर पोचलो. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या चिंचेच्या झाडांखाली त्यांनी खाटाबिटा टाकून बसायची झकास व्यवस्था केली होती. मोठा ग्रुप असेल तेव्हा ही थोपटे मंडळी तिथे सडारांगोळी वगैरे घालून स्वागताचा कार्यक्रम करतात.
संध्याकाळी कृषी पर्यटनच्या बससेवेच्या माध्यमातून एक महिला मंडळ येणार होतं. आनंदरावांची त्यासाठी लगबग चालली होती. आम्ही घरी परत आलो आणि ते तयारीला लागले. दोन किलो पोहे करून ठेवले होते. पण ती पुणेकर सुसंस्कृत मंडळी आल्यावर काय बिनसलं कुणास ठाऊक! अचानक काही मिनिटांत निघून गेली. अन्न-पाण्यावर बहिष्कार घालून! त्यांना म्हणे घरात, दारात, अंगाखांद्यांवर खेळणारे, बागडणारे मोर अपेक्षित होते. "तुमच्या गावातल्या प्रत्येक घरी पाच-पाच मोर पाळलेत, असं ऐकलंय आम्ही. काढा ते बाहेर!' असं सुद्धा दरडावून विचारायला त्यांनी कमी केलं नाही!!

मंडळी पोहे न खाता निघून गेली, तरी आनंदराव मात्र शांत होते. "दोन किलो पोह्यांचं आता करायचं काय? माझं नुकसान कोण भरून देणार?' असा एखाद्या व्यावसायिकाला साजेसा थयथयाट त्यांनी अजिबात केला नाही. "राहू दे. खातील गावातील पोरं. जाऊ देत त्यांना. माणसाचं समाधान महत्त्वाचं,' असं ते पत्नीला आणि मुलाला समजावत होते. मुलाला राहवलं नाही. शेजारच्या दुसऱ्या व्यावसायिक पर्यटन केंद्रात ही मंडळी गेली. पण तिथली 100 रुपये प्रवेश फी ऐकूनच परत फिरली. पुन्हा थोपट्यांकडेच आली आणि पोह्यांवर तुटून पडली.

त्यांच्या निमित्तानं आम्हीही पोहे खाऊन घेतले. रात्री आम्हाला लवकर निघायचं होतं. मोर पोटभर पाहून झाले होते आणि अंधारतल्या अपरिचित रस्त्यावरून फार उशीरा जायला नको, असंही वाटत होतं. थोपटे मंडळींनी ज्वारीची भाकरी, पिठलं, चटण्या, लोणचं, पापड, आमटीभात, असा फर्मास बेत केला होता. आनंदराव स्वतः भाकरीवर बदाबदा तूपही ओतत होते. (मला पुण्यातल्या खाणावळी नि भोजनालयांतल्या "तुपाच्या वाटीचे पैसे वेगळे पडतील,' अशा पाट्यांची आठवण झाली!) "रात्री कमी जेवावे' वगैरे आरोग्यदायी बोधामृताला बासनात गुंडाळून आम्ही त्या जेवणावर यथेच्छ ताव मारला.

जेवल्यानंतर तर "लक्ष्मीनारायणा'चा जोडा म्हणून आनंदरावांनी आणि त्यांच्या अर्धांगिनीनं आमचं औक्षण वगैरे केलं. रीतसर ओटी भरणं, श्रीफळ देणं वगैरे कार्यक्रम झाले. या भल्या मंडळींनी आमच्याकडून थेट पैसेही घेतले नाहीत. "तुम्हाला काय द्यायचे ते देवापुढे ठेवा' म्हणाले. पावणेआठला गावातून निघालो. मुख्य फाट्यापर्यंत सोडायला स्वतः आनंदराव त्यांच्या मोटरसायकलवरून आले होते. तिथून दीड तासांत घरी पोचलो.
"आनंद कृषी पर्यटन केंद्र' नावाने वेबसाइटही चालविणाऱ्या या थोपट्यांच्या पाहुणचाराचा अनुभव अगदी अनपेक्षित होता. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून त्यांचा साधेपणा दिसत होता, पण प्रत्यक्ष गेल्यावर तो अनुभवायलाही मिळाला.

काही टिप्स ः
अंतर ः मोराची चिंचोली पुण्यापासून 66 कि.मी. अंतरावर आहे. जाण्यासाठी पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरहून पाबळ फाट्याला वळावं लागतं. शिक्रापूर अंतर 50 कि.मी आणि पुढे चिंचोली 18 कि.मी.
वेळ ः मोर दिसण्याची वेळ सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7. सकाळी जास्त मोर दिसतात आणि भाग्यात असेल, तर नाचतानाही पाहायला मिळतात. जास्त जवळून. संध्याकाळी मोर तुलनेनं कमी दिसतात.
जायचं कधी? ः कुठल्याही मोसमात. एक-दोन पाऊस पडून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत असतात. त्या वेळी त्यांचा नाच आणि पिसारा पाहण्याची सुवर्णसंधी असते. शिरूर तालुक्‍यात पाऊसही फार नसतो. त्यामुळे त्याचा त्रास होण्याची शक्‍यता कमी.
पथ्यं कोणती पाळाल? ः कुठलाही वन्य प्राणी त्याच्या मर्जीप्रमाणेच वागत असतो. "माणसं आल्येत, चला त्यांच्यासमोर फोटो काढून घेऊ,' म्हणून आपल्या अंगचटीला येण्याची शक्‍यता नसते. मोराचंही तसंच. चिंचोलीत मोर भरपूर असले, तरी ते ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी आणि जवळून दिसतीलच, असं सांगता येत नाही. शेवटी त्यांची मर्जी आहे! जास्त जवळ गेलं, तर ते पळून जाण्याची शक्‍यताच जास्त. झूमची सुविधा असलेला कॅमेराही फोटोसाठी अधिक चांगला. नाहीतर आपल्या डोळ्यांचा कॅमेरा आहेच! ग्रुपनं जायला हे जास्त चांगलं ठिकाण आहे. रात्रीचा मुक्कामही करता येणं शक्‍य आहे.
----
छायाचित्रे इथे पाहा

सुटका

दमट ओल्या चिकण मातीचे अंथरुण
खडबडीत ढेकळांनी ओली भळभळ दाबली गेलेली
वरुन भसाभसा ढकललेले दगडमातीचे पांघरुण
उरला सुरला श्वास चिखलात बुडबुडून फ़ुटलेला

डोळ्यात माती गेल्यावर मिटलेले डोळे तसेच वजनाने गच्च
छातीचा भाता वरच्या प्रचंड भारासकट हलायला असमर्थ
क्षणापुर्वी गात्रा गात्रांत खेळणाऱ्या रक्ताचा चिकट लगदा झालेला
एकेकाळी श्वासावर चालणारे शरीर हाडामासांचे बाहुले बनलेले

मेंदूच्या आत नुसते करडे पांढरे लिबलिबीत गोळे उरलेले
एकेकाळी मनसोक्त विहरणारे विचारांचे दूत थिजून विरलेले
रक्तावर चालणाऱ्या मेंदूतील कणांपासून मन बनले नसावे
कारण त्याच्या संवेदना अजूनही माझ्या पर्यंत पोहचत आहेत

पण जरा थांब. हा “मी” आहे तरी कोण?
क्षुल्लक हेव्यादाव्यांवरुन मारल्या गेलेला एक कमनशिबी?
वाट पहाणाऱ्या एकाकी कुटुंबाचा अन्नदाता?
की मळक्या कागदांसाठी निर्दयतेने मारून खड्ड्यात फ़ेकलेले एक शरीर?

मग ह्या घुसमटलेल्या अचेतन शरीराच्या वेदनाही न जाणवणारा हा मी कोण?
आणि मोडलेल्या हाडामांसाच्या बाहुल्याच्या आसपास घोटाळणारा मी कोण?
हे सगळे विचार माझ्या क्षणाक्षणाने कुजणाऱ्या मेंदूत कसे काय येत आहेत?
ह्या ढिगाऱ्यातून निघून मी माझ्या कुटुंबाकडे जात का नाही?

तो जो कोणी होता, त्य़ाला ह्या एकाही प्रश्नांचे उत्तर मिळालेच नाही. एक टळटळीत सत्य मात्र त्याच्या एकदम लक्षात आले. ओला मातकट लोळागोळा होऊन पडलेले ते मोडके शरीर, त्यापासून मात्र दूर तो होऊच शकत नव्हता. त्याने खूप तडफ़ड करून पाहिली. पण कुठलासा बंध त्याला मोकळे होऊ देत नव्हता. तो कुजलेला रक्तामासाचा गोळा म्हणजे त्याचा तुरुंग होता. पहाता पहाता किड्या मुंग्यांनी त्य़ा तुरुंगाच्या भिंतीही खाऊन टाकल्या. त्याला ना कुजलेला वास जाणवला ना कसला आवाज. हाडांच्या पिंजऱ्याभोवती तो अजुनही लपेटलेला होता. नंतर केव्हातरी एकत्र बांधलेली हाडे देखील सुटी झाली. काहींची पांढरी माती बनली, काही चिवट तुकडे जुना आकार धरून राहिले. त्याच्यासारखेच जागच्या जागी.

आपले आयुष्य आठवणीत पुन्हा पुन्हा जगत त्याने हा सगळा काळ घालवला. त्याची हत्या करणारे ते खुनी. त्यांच्या विषयी वाटणारा तीव्र द्वेष. पत्नी, मुले, त्यांचे प्रेम, रुसवे फ़ुगवे. जगण्यासाठी केलेली धडपड, मिळा्लेले छोटे मोठे यश-अपयश. सगळ्या संवेदना आधी तीव्र होत्या, त्या हळुहळु बोथट झाल्या. केव्हातरी त्या संवेदनाही झिजून गेल्या. उरले फ़क्त विचार. नंतर हळुहळु विचार देखील येईनासे झाले. केवळ काही शब्द उरले. पत्नी, मुले, रान, मारेकरी...........
त्या शब्दांचे नाद देखील मग ऐकु येईनासे झाले. तो मात्र तिथेच कुठेतरी उरला असावा. निराकार, निर्विकार, निरापाश.
निरामय जिवनात वावरायला निर्बंध झालेला तो मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर झिरपला...........
पुढच्या प्रवासासाठी .........................

बीटी पोर!

आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय.

आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले.
त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद!

"तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? "

"का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!"

"अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?"

"म्हणजे? मी नाही समजलो... "

"अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय... त्येला दवा-औषध काय लागत न्हाय असं आमचे दादा म्हनून राह्यले...म्हंजे त्ये आसं त्यांच्या भाषनात म्हनाले आसं तुमीच सांगितलं! "

"बरं... मग? "

"तर आता आमची 'ही' म्हनतिया की फुडचं प्वार बीटी प्वारच पायजेल! "

"आँ? "

"आरं भाऊ, तिचं म्हननं जर बीटी वांग्याला कीड, रोग लागत नसंल, दवापानी कराया लागत नसंल तर तसंच मानसाच्या पोराला का नको? मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! "

"अरे बाबा, पण त्याला कायद्यानं मान्यता हवी ना! आणि तेवढं तंत्रज्ञानही विकसित व्हायला हवं! "

" पर कायदा का म्हनून नाकारेल अशी बात? जर त्यानं समद्यांचा फायदा होत आसंल, भलं होत आसंल तर मग कायदा त्या बाजूनंच हवा की हो राव! आन तुमी ते तंत्रज्ञानाचं काय पन सांगू नकासा! फारीनला ते गोरे लोक जर डुप्लिक्येट मानूस बनवून राह्यले तर ह्ये तर येकदम सोप्पं काम हाय! मस्त चार-पाच पोरं झाली की कारभारनी माझं टकुरं खानं बंद करंल!"

"अरे, पण एवढ्या पोरांना तू खायला काय घालणार? त्यांचा कसा सांभाळ करणार? "

"आवं आसं काय बोल्तासा, हायेत की मंग आपली बीटी वांगी, बीटी धान्य आमच्या बीटी पोरास्नी पोसाया....जास्त पोरं म्हंजे शेतात कामास्नी येत्याल, आन आजारी पन पडणार न्हाय.... "

आता आमच्या ह्या शेतकरी भाऊना काय बरे उत्तर द्यावे?

त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय?

अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

नंदाच्याई

नंदाच्याई...
आम्ही लहानपणापासून त्यांना "नंदाच्याई'च म्हणत आलो.
त्यांच्या मुलीचं नाव "नंदा', म्हणून त्यांना "नंदाच्या आई' असं नाव पडलं, हे आम्हाला खूप उशीरा कळलं.
आमच्या शेजारीच राहायच्या त्या. अगदी घरासमोरच. आमच्या आवाराच्या मालकांनी दोन खोल्यांची जागा या आखाडे कुटुंबाला राहायला दिली होती. नंदाचे बाबा- म्हणजे नंदाच्याईंचे पती- हमाली करायचे. त्यांची स्वतःची हातगाडी होती. (हातगाडी म्हणजे दोन चाकांची, एका बाजूने ओढायची लांबलचक लाकडी गाडी. त्यावर माल ठेवून ओढून नेतात. हल्ली भेळेच्या गाडीलाही "हातगाडी' म्हणतात!) लहानपणी आमचं घर आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत चिकूच्या झाडाखाली त्यांची हातगाडी लावलेली असायची. त्यावर बसून खेळण्यात आमचा कितीतरी वेळ जायचा. आमचा खेळ असलेली ही वस्तू कुणाच्या तरी आयुष्याची शिदोरी आहे, आयुष्यभराचं ओझं आहे, हे(ही) खूप उशीरा कळलं!
नंदाच्याईंचं मूळ नाव रजनी आखाडे असावं बहुधा. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. नंदाच्याई अधूनमधून कुणाकुणाकडे धुणीभांडी करायच्या. आमच्याकडेही होत्या काही काळ. पण त्यांना मी ओळखतो ते आमच्या शेजारची एक प्रामाणिक, निःस्वार्थ माऊली म्हणून! आमची पर्यायी आजीच होती ती! हलक्‍या कानाच्या असणं, सारासार विवेक नसणं, हे काही दुर्गुण असतीलही त्यांच्यात (कदाचित, "अडाणी'पणातून आलेले) पण त्यांचा प्रेमळ आणि लाघवी स्वभाव त्यावर मात करायचा.
लहानपणी आजी-आजोबा जवळ नसताना आणि असतानाही, आम्हाला त्यांचा मोठा आधार असायचा. बामणाच्या घरातला मुलगा म्हणून माझ्या हुशारीचं (!), धिटाईचं त्यांना आधीपासूनच कौतुक होतं. त्यातून आमच्या आवारातला एकमेव सरळमार्गी, आज्ञाधारक (तेव्हा होतो!) मुलगा म्हणूनही माझ्यावर विशेष प्रेम होतं. आजी-आजोबांच्या कौतुकासोबत मी त्यांच्याही मायेला त्यामुळे पात्र ठरलो होतो. माझ्याकडून त्यांनाही बऱ्याच अपेक्षा होत्या. (त्या पूर्ण न झाल्याचे पाहण्याआधीच सुटल्या बिचाऱ्या!) चांगल्या घरातल्या मुलांनी डॉक्‍टर किंवा इंजीनिअर व्हायचं, एवढीच अपेक्षा पालकांनी ठेवलेली असायची. नंदाच्याईही मग त्यात कधी कधी सामील व्हायच्या.
लहानपणी मी खूप धडपड्या होतो. कायम कोणती ना कोणती जखम किंवा व्रण अंगावर दागिन्यासारखा बाळगलाच पाहिजे, हा नेम. एकदा चिडवण्यावरून धावाधावी सुरू असताना स्वयंपाकघरात उघड्या ठेवलेल्या विळीवर पडलो. लगेच उठून घराबाहेर पळत गेलो. नंदाच्या आईंच्या घरापाशी पोचलो, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, माझ्या पायातून रक्त येतंय. दीडेक इंच खोल जखम झाली होती. (अजूनही तिचा व्रण अश्‍वत्थाम्यासारखा पायावर बाळगतोय!) मग त्यांनीच हळद वगैरे चेपली आणि माझे पराक्रम दाखवायला घरी घेऊन आल्या.
माझ्या भावाला घरात एकटा ठेवून आईवडील बाहेर गेले असताना, वडिलांच्या बॅगेतले फंडाचे पैसे त्याने खिडकीतून बाहेर फेकले होते. बाहेरच्या मोकळ्या जागेत नोटांचा पाऊस पडला होता. नंदाच्या आईंच्या घरासमोरच ही खिडकी असल्याने त्यांच्या चटकन ते लक्षात आलं आणि त्यांनी सगळे पैसे गोळा करून संध्याकाळी परत दिले.
टीव्हीनं नुकताच लोकांच्या आयुष्यात शिरकाव करायला सुरुवात केली होती आणि रामायण-महाभारत वगैरे कार्यक्रमांची भलतीच क्रेझ होती. नंदाच्या आई त्या वेळी आमच्या घरी ठाण मांडून बसायच्या. (तेव्हा टीव्ही पाहण्यासह अनेक निमित्तांनी एकमेकांकडे जाण्याची प्रथा होती. "प्रायव्हसी' जपण्याच्या नावाखाली घरांची दारं बंद होण्याचं भूत मानगुटीवर बसायचं बाकी होतं!) आजोबा तर संध्याकाळच्या "ज्ञानदीप'पासून "आमची माती आमची माणसं'पर्यंत सर्व कार्यक्रमांचे चाहते. एखादे वेळी "क्रीडांगण'मध्ये जिन्मॅस्टिक्‍स प्रकारात स्विमिंग कॉस्च्यूम वगैरे घातलेल्या मुली दिसल्या, की आजोबा आणि नंदाच्या आई यांची जी चर्चा रंगायची, की ऐकणाऱ्याची हसूनहसून पुरेवाट व्हावी!
त्यांचा मोठा मुलगा शशी टेम्पो चालवायचा. दुसरा रवी आमच्यापेक्षा थोडासा मोठा. घरी संवादापेक्षा भांडणंच जास्त. शशी दारू प्यायचा. त्याचं लग्न झालं, तोपर्यंत ही मंडळी आमच्याच आवारात एका स्वतंत्र जागी राहायला गेली होती. आवाराच्या मालकांनी एका कोपऱ्यात ऑफिस व राहण्यासाठी एक इमारत बांधली. त्यात आंब्याच्या झाडाखाली यांनाही दोन खोल्यांचं घर बांधून दिलं होतं. शशीची बायको मोठी जहांबाज आणि भांडकुदळ होती. नंदाच्याईंशी तिची रोज हमरीतुमरी व्हायची. एकमेकींच्या सात पिढ्यांचा दोघी उद्धार करायच्या. सर्व थराच्या शिव्यांचा, सर्व अवयवांचा यथेच्छ उल्लेख व्हायचा. दारूनं शशीचा अकाली घोट घेतल्यानंतर त्याच्या बायकोला रानच मोकळं मिळालं. उदरनिर्वाहासाठी तिनं अन्य सोपे मार्ग शोधले. त्यावरूनही दोघी सासवा-सुना रोज एकमेकींच्या उरावर बसू लागल्या. गंमत म्हणजे कुणी बाहेरच्या माणसांनी नंदाच्या आईंशी भांडण काढलं, की या सासवा-सुना एक व्हायच्या आणि त्याला धोबीपछाड घालायच्या.
म्हातारपणी नंदाच्या आईंना दुसऱ्या मुलाचा संसार व्यवस्थित पाहण्याचं भाग्य मिळालं. त्याला चांगली नोकरी लागल्यानं त्यांचे हलाखीचे दिवसही संपले. सुनेची कटकट आधीच मिटली होती. तिनं स्वतःची दुसरी व्यवस्था पाहिली होती. मी पुण्याला आल्यानंतर नंदाच्या आईंची खबरबात फक्त फोनवरून अध्येमध्ये मिळायची. नंदाचे बाबा आधी गेले आणि त्या पाठोपाठ त्याही गेल्या.
नंदाच्या आई आणि बाबांसाठी ते घर मालकांनी बांधून दिलं होतं. मालक गेले. नंदाच्या आई आणि बाबाही गेले. सध्या त्यांचा मुलगा व त्याचे कुटुंबीय राहत असलेलं ते घर मालकाच्या मुलानं नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला सुपारी देऊन पाडलं. एक वर्तुळ पूर्ण झालं...

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

वाचकमित्रहो,

नमस्कार! वणक्कम! वन्दनम! "असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १" ह्या स्फुटास मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे दुसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे.

तमिळ - जागतिक पातळीवर ’अभिजातभाषा’ म्हणून गौरविली गेलेली ही भाषा. मराठीभाषिकांच्या दृष्टीतून पाहावयाचे झाल्यास; मराठीभाषकांच्या समोर तमिऴभाषा ही संपूर्णत: अनाकलनीय आणि काहीशी चमत्कारिक अशी अवतीर्ण होते. तौलनिक भाषाभ्यास हा दोन्हीही भाषकांसाठी साहित्याचा परमानंद लुटता येण्याचे एक साधन होय. मराठीभाषकास ह्या भाषेच्या व्याकरणनियमांची / काव्यशास्त्रीय नियमांची थोडी तोंडओळख करून दिल्यास, ह्यातील चमत्कृती संपुष्टात येवून ती शिकण्यात गोडी वाटू लागू शकेल असे वाटते.

---

’उपक्रम दिवाळी अंक २००९ मध्ये लेख लिहाल काय’ अशी विचारणा करणारा व्यनि जेंव्हा आला, साधारण त्याचवेळी येथे मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर दिल हैं छोटासा ह्या गीताबद्दल लिहिले होते. ते असे -

अर्थपूर्ण आशय असलेलं एका वेगळ्याच परंतु तेवढ्याच फ्रेश ढंगातलं गाणं. एखाद्या फुलपाखरासारखं सुंदर आणि तेवढंच हलकंफुलकं! गाण्याचे शब्द, चाल आणि गायकी तर उत्तमच परंतु या गाण्याला १०० पैकी १०० मार्क जर कुठे द्यायचे झाले तर ते चित्रीकरणाला आणि वाद्यवृंद संयोजनाला. वाद्यवृंद संयोजन आणि त्यातले फिलर्स तर केवळ अफलातून! एरवी गाणं शुद्ध गंधाराधिष्ठित, कानांना शुद्ध गंधाराचं अगदी भरपूर सुख देणारं परंतु 'चांद-तारोको छुनेकी आशा' नंतरच्या 'आसमानोमे उडनेकी आशा..' या ओळीतला शुद्ध मध्यम केवळ आश्चर्यकारक, अद्भूत परंतु तेवढाच आनंददायी! गायलंयही अगदी अल्लडपणे. म्हटलं तर स्वच्छंदपणे स्वत:शीच संवाद साधणारं आणि म्हटलं तर एखाद्याला एखादी गोष्ट अगदी छान समजून सांगावी तसं!

बादलोकी मै ओढू चुनरिया, अपनी चोटी मे बांध लूं दुनीया!

क्या केहेने! सुंदरच लिहिलं आहे गाणं. आणि बांधलंयही तेवढंच छान. चांदतार्‍यांना छुणार्‍या आणि आसमानात स्वच्छंद उडणार्‍या या गाण्याबद्दल रेहमानला सलाम..!

कदाचित वाचकांस ही माहिती नसेल; की हे गीत हे मूळ काव्यरूपांत असून ते ७० च्या दशकात लिहिले गेले होते. श्री. एम एस विश्वनाथन ह्यांनी ते तमिळ दूरदर्शनसाठी संगीतबद्धही केले होते. श्री. मणिरत्नम ह्यांस त्यांच्या नायिकेच्या भावनांचे प्रकटीकरण करण्यास ही कविता उत्कृष्ट वाटली आणि ह्या कारणाने ह्या कवितेचे चित्रपटगीतांत रूपांतर झाले. असो! एका बाजूस ’उपक्रम दिवाळी अंक २००९ चा व्यनि वाचतांना दुसर्‍या बाजूस मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर सुंदरच लिहिलं आहे गाणं असे लिहिल्याचे पाहिले, आणि हिंदीत डब्ब केलेल्या रोजा चित्रपटातील चिन्न चिन्न आसै ह्या तमिळ गीताचा मराठी अर्थ आणि त्याचे काव्यात्मक रसग्रहण ह्या सार्‍यासंबंधी एकत्रितरीत्या लिहावे असा काहीसा विचार करून ह्याविषयी आतां लिहितो आहे...!

---

मूळ तमिऴ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत मराठीभाषेमध्ये भावार्थ
சின்ன சின்ன ஆசை चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै छोटी छोटी इच्छा
சிறகடிக்கும் ஆசை सिऱगडिक्कुम् आसै पंख फडफडविण्याची इच्छा
முத்து முத்து ஆசை मुत्तु मुत्तु आसै (मोत्यासारखी) छोटी छोटी इच्छा
முடிந்துவைத்த ஆசை मुडिन्दुवैत्त आसै (शिंपल्यात बंद मोत्यासारखी - आजवर) बंद करून ठेवलेली इच्छा
வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै शुभ्र चंद्रम्यास स्पर्शून त्याचा मुका घेण्याची इच्छा
என்னையிந்த பூமி சுற்றிவர ஆசை ऎऩ्ऩै इन्द बूमि चुऱ्ऱिवर आसै सारे हे विश्व फिरून पाहाण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
மல்லிகைப்பூவாய் மாறிவிட ஆசை मल्लिगैप्पूवाय् माऱिविड आसै मोगर्‍याच्या फुलामध्ये परावर्तित होण्याची इच्छा
தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै हवेच्या झुळुकीस पाहून, (तिच्या गळ्यात) माळा घालण्याची इच्छा
மேகங்களை எல்லாம் தொட்டு விட ஆசை मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै सार्‍या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा
சோகங்களை எல்லாம் விட்டு விட ஆசை सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै सार्‍या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा
கார்குழலில் உலகைக் கட்டி விட ஆசை कार्गुऴलिल् उलहैक् कट्टि विड आसै केशरचनेमध्ये सार्‍या जगतास बांधून घेण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]] [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
சேற்று வயலாடி நாற்று நட ஆசை सेऱ्ऱु वयलाडि नाऱ्ऱु नड आसै चिखलामध्ये पायांचे ठसे उमटवित सोडत चालण्याची इच्छा
மீன் பிடித்து மீன்டும் ஆற்றில் விட ஆசை मीऩ् पिडित्तु मीण्डुम् आऱ्ऱिल् विड आसै मासोळीस पकडून पुन्हा पाण्यात सोडून देण्याची इच्छा
வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக்கொள்ள ஆசை वाऩविल्लैक् कॊञ्चम् उडुत्तिक्कॊळ्ळ आसै इंद्रधनु परिधान करण्याची इच्छा
பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக்கொள்ள ஆசை पनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक्कॊळ्ळ आसै दवबिंदुंच्या आतमध्ये निजण्याची इच्छा
சித்திரத்தின் மேலே சேலை கட்ட ஆசை सित्तिरत्तिऩ् मेले सेलै कट्ट आसै भित्तिचित्रास साडी नेसविण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...

---

तमिळभाषेमध्ये एक नियम. जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते.

उदा.

१. एन पेयर हैयो. - माझे नांव हैयो.
२. इदु तमिळमोळियिन नियमम. - हा तमिळभाषेचा नियम.
३. चिन्न चिन्न आसै. - छोटी छोटी इच्छा.

वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत, जोपर्यंत एन पेयर हैयो ’इल्लै’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ’आहे’ असेच समजले जाते. दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’नाही’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’आहे’ असेच समजले जाते.

थोडक्यात कसे, की ’आहे’ असे निराळे सांगण्याची आवश्यकता शिल्लक नाही. हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. काही पाश्चिमात्य भाषाभ्यासकांनी ह्या वैशिष्ट्यास तमिळ समाजाच्या ’दुर्दम्य आशावादाचे मूळ’ असे म्हटले आहे. हे गीत चित्रपटाची नायिका रोजा हिच्या दुर्दम्य आशावादाचे एक काव्यात्मक चित्रण ह्या रूपांत येते. तिला हव्या असलेल्या जवळजवळ सार्‍याच गोष्टी तिला मिळणे केवळ अशक्यप्राय असूनही ती इच्छा करते. काहीशी स्वप्नाळू मागणी असली तरीही एका विलक्षण आत्मविश्वासाने ती त्या गोष्टी मागते. इच्छा म्हटले की मार्ग येणारच!

---

कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते. सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते. तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच, परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे. वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल, की प्रत्येक ओळीची दुसर्‍या ओळीशी यमकपूर्ति होते आहे. काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे, तो म्हणजे ’आसै’. ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा, की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे. तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत, ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल. खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची, परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री. तात्या म्हणतांत तसा एक ’फ्रेश ढंग’ येथे अनुभवण्यास मिळतो. एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात. चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्‍यास परत मिळवितेच नां? असो.

---

तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?

---

कर्मण्येवाधिकारस्ते . . .

छोटेखानी जुना बंगला अन्
त्यातला म्हातारा मालक . .
आपल्या परदेशस्थित मुलाच्या
चार दिवसाच्या वास्तव्याच्या तयारीत . .

अंगणभर विखुरलेल्या पानांचा पसारा
झाडताना बघतो फाटकाला बिलगलेल्या
मधुमालतीच्या वठलेल्या वेलीच्या खोडाकडे . .
आणि विषादाने हसत परत झाडू लागतो
फाटकापासून बंगल्यापर्यंत नेणारी, खचलेल्या सुट्ट्या फरश्यांची
कर्मयोगी पायवाट . . .
पानांचे मळभ हटल्यावर मोकळी .

शुष्क पानगळ सुरुच राहते.
गोळा केलेली ढिगाराभर पाने,
पेटवून देऊन थांबतो म्हातारा धगीपाशी
लवलवणार्‍या ज्वाळा बघून
विषादाने हसतो आणि स्वतःलाच म्हणतो
गतिमान काळाच्या चक्रात
अगतिकपणे बांधून घेतलेला तुझा मुलगा,
कधीतरी . . .नंतर . . .
शेवटपर्यंततरी थांबेल कां,
फुटेपर्यंत ?

ती....

भगवंताने दिली आहे ती माझ्यासाठी, माझी आहे ती.. नक्कीच तुमच्या कडेही असेलच ती.. प्रत्येकाकडे असतेच ती; तिचे अस्तित्व ती नसली तरी असते, सतत अवती भोवती जाणवत असते... मनाच्या गाभार्‍यात, खोल कुठेतरी काळजात ती आहे हा विश्वास असतो.. एक अनामिक ओढ असते! एक अनाकलनिय हुरहुर, एक न सांगता येणारी उर्मी.. भर उन्हात एक झुळुक गारव्याची

ही म्हणजे जणु देव्हार्‍यातली समई, स्वतः जळुन प्रकाश वाटणारी, नमस्कार करणार्‍याला दिशा दाखवुन नामानिराळी राहणारी.. भक्ताची नाळ देवाशी जोडुन देणारी!!

किती रुपे तिची, प्रत्येक रुपात नविन असते ती!
कधी अवखळ निर्झराप्रमाणे निरागस, कधी मिलनासाठी आतुर झालेली, एखाद्या वावटळी सारखी बेभान, कधी खोल डोहाप्रमाणे समजंस आतमध्येही भलेही वादळ असेल पण वर निखळ शांतता, कधी जीवनदायिनी!! हीचे रौद्ररुप सुध्दा प्रलोभनीय, अविस्मरणीय... तीचे वर्णन करायला शब्द्कोष अपुरे पडतात.

ही राधा ही असते आणि मीरा ही..
ही जिजा आणि हिरकणी पण असते, हिला कोणीच थोपवु शकत नाही, अंधार भिववु शकत नाही, दरीची खोली हिच्यासाठी किरकोळ असते.. पोटचा पोर लोक-कल्याणासाठी, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात झोकुन देऊन आयुष्यभर त्या आगीत कण कण जळण्याची किमया हिलाच साधु शकते..

ही आनंदीबाई असते आणि फुल्यांची सावित्रीसुध्दा असते
ही निवेदिता पण असते आणि टेरेसा पण.. परदेशात जाऊन तिथल्या माणसांनी झिडकारलेल्यांना आपले म्हणुन "आईपण" निभावणे "मदर" लाच जमते!

कुठुन येते हे देवपण, कुठुन पाझरते तीच्या मनात सार्‍या जगाला सामावुन घेणारी माया??
शांत, तेजस्वी, ओजस्वी, मनस्वी, बुध्दीजीवी तरी काळजीपोटी दारामागे भांडे उपडे घालणारी, सतत लेकरा-मुलांसाठी झटणारी.... काय आहे हे न ऊलगडाणारे कोडे, कधी परमेश्वरालातरी कळेल का ही??

सहकारी

नवीन प्रोजेक्ट म्हटल की आजकाल पहील्यांदा गुलट्यांची आठवण होते. जिकडेतिकडे यांचा सुळसुळाट झाला आहे.१० पैकी ८ सहकारी गुलटेच असतात. बरं एटीकेटस नावालाही नसतात. आपल्यापुढे बिनधास्त यांची गुडगुड भाषा चाललेली असते.
नवीन प्रोजेक्टवर गेल्यागेल्या एकेका सहकार्‍याचे स्वभाव हळूहळू कळायला लागतात. आता इतक्या वर्षांनी आपल्याही काहीच अपेक्षा नसतात म्हणा. पण तरीही लिव्ह अँड लेट लिव्ह एवढी माफक अपेक्षा असते. तिथेच चुकतं.
नवीन सहकारी प्रथम एकमेकांकडे साशंक नजरेने पहात असतात, दबकत , सावकाश वावर होत असतो. एकमेकांचा अदमासा घेतला जातो. नशीबनी फार वैयक्तीक प्रश्नांमध्ये कोणी पडतही नसतं. काही दिवसांतच एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज येऊ लागतो. या प्रक्रियेमध्ये संवाद्कौशल्य, चेहेर्‍यावरचे हावभाव याला अतोनात महत्व असतं. इथे कुठे आपण बावळटासारखे घसरलो, चुकलो की खलास, प्रोजेक्ट संपेपर्यंत अंडरडॉग!
सहकार्‍यांचे जे वर्तन आपल्याबरोबर बॉस नसताना असतं तेच जर बॉस असताना असेल तर त्यांना सहकारी कशाला म्हणायचं? जी माहीती बॉसच्या अपरोक्ष सहज सांगता येऊ शकली असती ती बॉसपुढे मुद्दाम पुरविण्यात यांना भूषण म्हणा अभिमान वाटतो. आपल्यालाही पर्याय नसतो मुकाट्पणे ऐकून घेण्याखेरीज.
काही सहकारी हे अति-महत्त्वाकांक्षी असतात. पुढे मॅनेजर होण्याची तयारी ते अत्तापासून करत असतात. यांचे गिनी-पिग्स कोण? इतर सहकारी! गटामधील दुबळ्या व्यक्तीवर वाचा-वर्चस्व गाजवून मुर्दुमकी गाजविणे, आपले काम दुसर्‍याच्या गळ्यात टाकणे, सहकारी कोणताही मुद्दा मांडो तो मुद्दा खोडून काढणे. का तर यांना स्वतःच्या संवाद्कौशल्यास धार लावायची असते. अशा दीड-शहाण्या लोकांना तोंड द्यायचं माझं तंत्र म्हणजे - त्यांना टाळणे. नसेल करता येत तर? ह्म्म्म!!! खरं आहे. असे नमुने बहुतेक वेळा टाळता येतच नाहीत. वेळ मारून न्यावी लागते.
अनेकदा "चांगले" म्हणावे असे सहकारी क्रॉस्-फंक्शनल गटामध्ये सापडतात कारण त्यांचे इंटरेस्ट आपल्या इंटरेस्ट बरोबर टक्कर होत नसतात. उलट्पक्षी आपण परस्पर्-पूरक असतो. जशी मी टेस्टर आहे तर डॉक मॅनेजमेंट आणि डेव्हलप्मेंट मधील लोक माझे मस्त मित्र-मैत्रीणी होतात. याउलट टेस्टर गटात शत्रू जास्त. प्रोजेक्ट संपल्यानंतर हेच दोस्त आपल्या कामी येतात, रेफरन्स करता तर कुठे नोकरी शोधण्याकरता.
सहकार्‍यांबरोबरची स्नेह(?)संमेलने, बेबी-शॉवर्स, वाढ-दिवस हाही एक मनोरंजनाचा विषय आहे.आपण असं गृहीत धरतो की अशा आनंदाच्या प्रसंगी माणूस मुखवटा न घालता आनंद घेत असेल पण सगळे कचेरीतील लोक असल्याने प्रत्येकजण मुखवटा घालूनच वावरत असतो. त्याच त्याच गप्पा , तेच विषय - कचेरीतील राजकारण, बढती, काळजी, एक्मेकांवर कुरघोडी, एकमेकांच्या धोतराला हात घालणं (हा वाक्प्रचार साभार - मिपा वरील एक धागा) इ. इ. मला तरी लवकर पळावसं वाटतं तिथून.
"धोतराला हात घालणं " वरून आठवलं - एक उदाहरण दयायचं तर मी मस्त नटून कचेरीत आल्यानंतर माझी एक स्त्री सहकारी नेहेमी मला सकाळी सकाळी विचारायची "का गं अशी का दिसतेयस? बरं नाही का?" झालं म्हणजे खडखडीत बरी असलेल्या मला सकाळी सकाळी ती मुक्ताफळं ऐकून बरं वाटेनासं व्हायचं. असो.
तर असे हे सहकारी. यांच्याखेरीज कचेरी चालत नाही आणि यांच्याबरोबर एकेक क्षण कठीण असतो बाई!!

एक शेर

फार वर्षांपूर्वी वाचलेला जावेद अख्तर यांचा शेर काल परत वाचनात आला -

कभी जो ख्वाब था ...... वोह पा लिया है
मगर जो खो गई ....... वोह चीज क्या थी

आणि मनाला परत एकदा चटका बसला. अर्धा पेला रिकामा की भरलेला यचे द्वंद्व मनात परत एकदा सुरु झाले. स्वतः घेतलेल्या निर्णयांचा मन परत आढावा घेऊ लागलं, जाब विचारू लागलं.
माझंच असं होतं की सगळ्यांच की मिळालेली गोष्ट नगण्य वाटते अणि हरवलेली मोलाची?

रॉबर्ट फ्रॉस्ट देखील असच काहीसं तर नाही म्हणत ना पुढील ओळींत -
टू रोड्स दायव्हर्जड इन अ यलो वुड
अ‍ॅड सॉरी आय कूड नॉट ट्रॅव्हल बोथ
.
आय टुक द वन लेस ट्रॅव्हलड बाय
अ‍ॅड दॅट हॅस मेड ऑल द डिफरन्स

हा "डिफरन्स" प्रत्येकाच्या मनात उचल खातो का? जर मी तो दुसरा रस्ता घेतला असता तर कदाचित आज .......हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो का? कसं समजवायचं मनाला?

मगर जो खो गई ....... वोह चीज क्या थी ... किती समर्पक वर्णन आहे त्या हरवलेल्या गोष्टीचं.

मग ते करीअरच्या मागे लागून मुलीचं बालपण हरवलेल्या आईची खंत असेल कदाचित, कदाचित आपल्या प्रेमिकेपुढे भावना व्यक्त न करू शकल्याने प्रेम अव्यक्तच राहीलेल्या प्रेमीचे दु:ख असेल तर कधी परदेशातून वेळेवर घरी जऊ न शकल्याने वडीलांना शेवटच्या क्षणी नभेटू शकलेल्या मुलीचे अश्रू असतील.
शेवटीम्हणतात ना सुखाला एक चेहेरा असतो तर दु:खाला अनेक.

माझे बाबा...........

माझे बाबा...........

आज जरी हे लिहिताना इथे नसलात तरी

नेहमीच माझ्या भोवती आहात

वडील म्हणून माझ्यासाठी

माझे मित्र बनून सोबती आहात

तुमच्या समोर तुम्हाला कधी सांगू शकत नाही

माझ्यासाठी तुम्ही काय काय केले त्याचा पाढा वाचू शकत नाही

भाग्य लागत अश्या वडिलाचा मुलगा बनायला

खांद्या वर हात टाकून मित्रासारखे चालायला

तुमच्याच रक्तातला स्वाभिमान

भरभरुन आहे माझ्या नसानसात

म्हणुनच मान ताठ ठेवूनच

वावरतो मी कुठेही जगात

नसेल दिला कदाचित लहानपणी

भरपूर खाऊ आणि रासभर खेळणी

पण तेव्हा तुम्ही शिकवलेलं थोड्यातलं समाधान

पुरुन उरेल जन्मभर तुमची तीच गोड वाणी

तुम्ही पुरुष म्हणून कदाचित

जमलं नसेल आईसारख कुशीत घ्यायला

तरीही तुमच्या मूक प्रेमाची

नेहमी जाणीव नक्कीच असते मला

स्वतःहून कधीही न घडवता

आम्हाला नजरेवर घडू दिलंत

धाकाच्या पिंज-यात कधी न कोंडता

मोकळ्या हवेत मला स्वच्छंद ऊडू दिलंत

जितका अभिमान तुम्हाला वाटतो

हा माझा मुलगा आहे असं सांगतांना

त्याही पेक्षाहि जास्त मला आहे

तुम्हाला माझे बाबा म्हणताना

तुमच्या गुण दोषांसहित

तुम्ही मला प्रिय आहात

लहानपणापासून तुम्ही म्हणून माझ्यासाठी

तोच कहाणीतील जंगलातील राजा सिंह आहात

मंगेश कुश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com