user

मुक्तक

CE मार्कची वांगी!!!!?????

शिर्षक वाचूनच दचकलात ना!! अहो मी तर ही वांगी पाहूनच गार झालो. वांगी तीही CE मार्कची आणी माझ्या पिशवीत? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला पण नाही हो मी जागाही होतो (आणी भारतातच होतो)
सीई मार्कचे वांगे १
सीई मार्कचे वांगे २
त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो. बहिणीने तिच्या छोट्याशा बागेतली वांगी दिली भरीत करायला. पण मग या वांग्यावर CE मार्क कसा आला? हे तपासण्याकरीता मी माझी पिशवीही तपासली. मग या मागचे कोडे उलगडले. बहिणीच्या डेस्कटॉपच्या किबोर्डचा प्रॉब्लेम होता. तो किबोर्ड बदलण्यासाठी मी पुण्यात आणला येताना निघण्याची घाई झाल्याने तो वांगी असलेल्या पिशवीतच भरला. त्यावरचा CE मार्क मग वांग्यांनी प्रवासादरम्यानच उचलला असावा. असो भाव खाऊन गेली हो ही वांगी. पण नंतर त्याचं भरीत करुन उट्ट काढलं.

व्यसनेषु सख्यम!

आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो.

अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही. काही सिनेमे तर अर्धवट बघितले, पण इंटरव्हलनंतर बघायचे राहिले, ते राहिलेच. अनेक जुने, अर्धजुने सिनेमेही मी पाहिलेले नाहीत. पूर्वी घरून परवानगी नव्हती, कुठले सिनेमे बघायची त्याची अक्कल नव्हती, रत्नागिरीत फार काही बघण्याची संधी नव्हती...बरीच कारणं. बॅकलॉग बराच राहिलाय, एवढंच खरं.

हाच बॅकलॉग भरून काढण्याचे आता प्रयत्न चाललेत. त्यामुळे आज वेळ होता म्हणून थोड्या सीडी खरेदी कराव्यात, असा विचार करून दुकानात शिरलो होतो. दहा-पंधरा मिनिटांत खरेदी उरकून निघायचं होतं, पण सीडींचा खजिना पाहून रमायलाच झालं. मोझर बेअरच्या अलिकडे आलेल्या स्वस्तातल्या सीडी हे माझं पहिलं लक्ष्य होतं. पण डीव्हीडी पाहिल्या आणि त्यांच्या प्रेमात पडलो.

नव्या, जुन्या सिनेमांच्या अनेक डीव्हीडी खुणावत होत्या. माझे अलिकडच्या काळात चुकलेले अनेक सिनेमे एकत्रित उपलब्ध होते. त्यातही सर्वांत चांगल्या पॅकेजसाठी बरीच शोधाशोध केली. कमिने, वेन्सडे, देव डी, अशा एकूण सहा चित्रपटांची डीव्हीडी अवघ्या 55 रुपयांना पाहून मी थक्क झालो. अलिकडे पायरसी बोकाळल्यापासून 50 रुपयांत पाच, सहा चित्रपट की गोष्ट काही नवी नव्हती. पण ती बनावट सीडींच्या बाबतीत होती. अधिकृत, चांगल्या दर्जाच्या आणि कंपनीच्या सीडीसुद्धा एवढ्या स्वस्तात उपलब्ध असल्याची मला कल्पनाच नव्हती.
अवघ्य 55 रुपयांत सहा सिनेमे खरेदी करताना मला रत्नागिरीचे सिनेमा पाहण्यासाठीचे संघर्षाचे दिवस आठवले. तेव्हा थिएटरला तिकीट दहा रुपयांच्या आतच होते, पण तरीही घरून सिनेमा पाहायला जायला परवानगी मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा. "टीव्हीवर येईल तेव्हा बघ सिनेमा!' हे उत्तर ठरलेलं असायचं. मग काहीतरी कारण सांगून, बाबापुता करून परवानगी मिळवायला लागायची. नववीत असताना आईनं "थरथराट' बघायला परवानगी दिली नाही, तेव्हा तेवढा "थयथयाट' केला होता मी! दहावीच्या अख्ख्या वर्षात मी एकच चित्रपट पाहिला होता. मोठं झाल्यावर मी यंव करीन नि त्यंव करीन अशी स्वप्नं पाहायचं वय होतं ते. मी त्यावेळी मोठं झाल्यावर आपण तिन्ही थिएटरला लागलेले सगळेच्या सगळे सिनेमे दर आठवड्याला पाहायचे, असली स्वप्नं रंगवायचो. आमच्या महत्त्वाकांक्षेची झेप तेवढीच!

अनेकदा उन्हाळ्यात सार्वजनिक पूजेच्या निमित्तानं मळ्यात, मैदानात सिनेमे प्रोजेक्‍टरवर दाखवले जायचे. शेजारपाजारचा कुणीतरी जोडीदार शोधून मी ते पाहायला जायचो. टिपिकल मिथून, अमिताभ, नाहीतर जीतेंद्रचे सिनेमे असायचे. पण तरीही कुठेतरी शेणार, चिखलात, काट्यात, गडग्यावर बसून डोळे तारवटून ते सिनेमे पाहायचो. रस्त्यात बसलेलो असताना बस आली म्हणून चंबूगबाळं आवरून मध्येच उठावं लागायचं. पडद्याच्या समोरच्या बाजूला जागा मिळाली नाही, तर मागच्या बाजूनं उजव्या हातानं फायटिंग करणारा अमिताभ पाहावा लागायचा. मध्येच कुठून तरी सापबिप निघाला, तर पळापळ व्हायची. धुरळा, मातीनं कपडे खराब व्हायचं. पण "की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने' या निर्धारानं आम्ही टिकून राहायचो.
"राम तेरी गंगा मैली' पाहायला असाच कुठेतरी रस्ता तुडवत गेलो होतो. तिथे व्हिडिओवर सिनेमा होता आणि आम्ही सुमारे वीस-पंचवीस फुटांवर होतो. मंदाकिनीचं नखसुद्धा दिसणं शक्‍य नव्हतं! मग हिरमुसून परत फिरलो होतो.
मजा होती त्या दिवसांत!

आज 55 रुपयांत 6 सिनेमे, म्हणजे नऊ रुपयांना एक सिनेमा कायमस्वरूपी विकत घेताना हे सगळं आठवलं आणि फार वाईट वाटलं. आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती.
आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

कधी कधी मात्र मोबाईलच्या अतिरेकाने आपले नुकसान संभवते - हे नुकसान परस्पर संबंधातील गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे तणाव, मोबाईलच्या अतिवापराने विनाकारण आर्थिक नुकसान आदी प्रकारचे असते, तर कधी केवळ मोबाईल असल्यामुळेच तातडीने संपर्क साधता येतो आणि कोणाचा जीव बचावतो तर कोणाची मालमत्ता संकटातून बाहेर काढता येते.

आपल्या मिपाकरांना या बाबतीत काय अनुभव आहेत? मोबाईल फोन मुळे कधी खूप नुकसान झाले तर कधी अचानक आलेल्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मोबाईल चा उपयोग झाला का?

मोबाईल फोन संदर्भातले आपले अनुभव, अविस्मरणीय घटना शेअर करा...

--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, इंडिया.

"७ इयर्स इच"

"७ इयर्स इच" दचकलात ना ऐकून?
आहेच हा प्रकार भन्नाट. म्हटला तर गंभीर, म्हटला तर गमतीशीर.
लग्नानंतर साधारण ७ वर्षांनी माणसाला अनावर हुक्की येते, अगदी खाज यावी तशी कंपल्सिव्ह. कशाची म्हणता?
ह्म्म तर विवाहबाह्य प्रकरण करण्याची.
थोडं अ‍ॅडव्हेन्चरस होण्याची. याला म्हणतात "७ इयर्स इच" :)

या विषयावर मर्लीन मन्रोचा एक मस्त विनोदी चित्रपट्देखील निघाला आहे.
तिच्याखेरीज कोण न्याय देऊ शकणार अशा इरसाल विषयाला? त्या चित्रपटाचं नावच मुळी "७ इयर्स इच".

चांगला सुखासुखी संसार सोडून अशी "सो कॉल्ड" अवदसा का बरं आठवत असावी माणसाला?
मला तरी वाटतं याचं उत्तर दड्लय मानसशास्त्रात.
टू मच ऑफ एनीथिंग इज बॅड.
७ वर्षांनंतर सकाळी उठून तोचतोचपणाचा मला वाटतं माणसाला कुठेतरी कंटाळा येत असावा.
त्याच्यातील आदिम साहसी वृत्ती उफाळून येत असावी.
कोण्या कवीने म्हटले आहे ना -
"केला जरी पोत बळेची खाली
ज्वाळा तरी ते ते वरी उफाळी"

तर अशा या 'इच" ला वाहीलेलं हे सु-रे-ख गाणं -

सप्तपर्णी


सप्तपर्णी

सप्तपर्णीच्या झाडाकडे पाहावे तो अचंबा वाटतो. बुंधा तर इतका मोठा, की दोन हात पसरून कवेत घ्यावे तरी शक्य नाही. जुन्या देवरायांमधले हे वृक्ष शाश्वततेची प्रतिके असल्यासारखी पाय रोवून उभी. प्राचीन देवराई, त्यात असा प्रचंड वृक्ष. सप्तपर्णीच्या बुंध्याशी बसून राहावे. अश्या भल्या वृक्षांखाली बोध होत असतो.

उंच झाडांखाली वाढलेल्या गडद पानांच्या वनस्पती आणि बराचसा पाचोळा. पाचोळ्यावर एखादे पान पडावे आणि तळ्यावरल्या संथ पाण्यावर तरंग उमटावे तसे आपल्या मनावर उमटावेत. जमीन मात्र सर्वकाही धारण करते. स्तब्ध असते. अगदी झालेच तर नव्या अंकूरांना थोडे अवकाश मो़कळे करून देते.पण तो तर नियमच आहे.

मनाकडे पाहताना सप्तपर्णीसारखे कुणीतरी स्तब्धपणे, साक्षीत्वाने पाहणारे भासते. विचारांची पार्श्वभूमी असते जमिनीसारखी स्तब्ध पण विचारांच्या हालचालींना, त्यांच्या वाढीला आधार देणारी. जमिनीमधून लवलवणारी वेल वाढावी आणि सप्तपर्णीच्या बुंध्यावरच चढू लागावी अशी विचारांची गती. साक्षित्वाने पाहणाराही कधी गुंतून जाईल कळत नाही. त्या वेलींचे अवकाश वेळीच सीमित केले नाही तर त्यांचीच महती जास्त. मग सुटका नाही.

सर्वसाक्षी वृक्षाच्याही मागे असणारा आणि या सर्वांना अन्न देणारा सूर्य कोण? त्याचाच प्रकाश सर्वत्र पसरला आहे. लख्ख दिसत आहे.

-- लिखाळ

..... बाकी सगळं ठीक आहे !

आज माझ्या देशात देवा - सारं काही ठीक आहे ...
काही गरीब, कंगाल काही - काही मात्र श्रीमंत आहेत |

जगण्याच्या लढाई मधे , जनता सारी व्यस्त आहे
महागाई, भ्रष्टाचाराने , थोडी फार त्रस्त आहे |

रस्त्यांवर चारचाकी, रोज रोज वाढत आहेत
त्या खाली चिरडून सुद्धा , रोज काही मरत आहेत |

पावसाच्या काही सरी, नेतात रस्ते पाण्याखाली
नागरिकांचे सेवक मात्र, मागतात थोडी चिरीमिरी |

बॉम्बस्फोट आणि गँगवॉर - सारं काही सुरळीत आहे
चौका चौकात सिग्नलला - भिकारी देखील खूप आहेत |

अणू स्फोट करुन काही - भारत शक्तीशाली होतो
समुद्रातून येउन मृत्यु, रस्त्यांवर थैमान घालतो |

लोकांनाही त्याचे भय, आता फारसे वाटत नाही
मोठ्या मोठ्या शहरांसाठी, अशा घटना विशेष नाहीत |

धर्मांधतेची जीत सदा - सहिष्णुता पराजीत आहे
थोडे फार भांडण, तंटे ....
पण बाकी सगळं ठीक आहे |

आज माझ्या देशात देवा
सारं काही ठीक आहे ...

कुठे पूर , कुठे दुष्काळ - शेतकर्‍याच्या गळा फास
भेगाळलेल्या जमिनी मधे - माय-लेकराची अश्रुधार |

धान्य कुठे सडते अन् - तळमळते कुठे उपाशी पोर
मिजासी मधे धनदांडगे अन् सामान्याच्या जीवा घोर |

चोरांचीच इथे शिरजोरी - सामान्याला मात्र काठी
बळी तोच कान पिळी - मग कायदे कानून कोणासाठी? |

औषध नाही, डॉक्टर नाहीत - साथीचे सारे रोग आहेत
संशोधन अन् प्रयोंगांसाठी - गिनीपिग्ज् इथे खूप आहेत |

रस्ते नाहीत, शाळा नाहीत - वीज आणि पाणि नाही
कोणाला तू साकडे घालतोस? - नशीब तुझे सरळ नाही |

उन, थंडी, वारा, पाऊस - लेकरा, नको रे जेवण मागूस |
लाल दिव्याच्या गाडीला - उगीच नको बोल लावूस |

विठ्ठलाच्या भेटी साठी - वारकरी आसूसलेला
चंद्रभागेचा पान्हा - पण एकदशीला आटलेला |

शिर्डीच्या फकीराला बघ , रेशमाची शाल आहे
सामान्याला वस्त्र नाही ...
पण बाकी सगळं ठीक आहे |

दारिद्र्याने गांजलेल्या , लोकांचा थोडा क्षोभ आहे
सुख थोडे , दु:ख फार ....
पण बाकी सगळं ठीक आहे |

आज माझ्या देशात देवा
सारं काही ठीक आहे ...

मी पहात होतो दूर...

तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे.

मी पहात होतो दूर,
तू दिलास मजला सूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..

मीच होतो मूढ,
की तूच होती शूर,
तू केलस मला चूर,
मी पहात होतो दूर..

तुझा होता वेगळाच नूर,
माझ्या भावनांना आला पूर,
तू छेडलास माझा सूर,
मी पहात होतो दूर..

तू आलीस जवळ पुरेपूर,
सांग माझा काय कसूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..

तू पलटविलास तूझा नूर,
केलस मला भेसूर,
मी पहात होतो दूर....
तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....

फिनिक्स

फिनिक्स

इश्क जरी दाहक आग ही
खेळ विस्तवाशी मांडला,
राख जाहलो तरीहि
डाव अर्ध्यावर ना सोडला.

मिसळूनी राखेत जो
संपतो ते आम्ही नव्हे,
फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा
डाव खेळू नवा तुजसवे.

निरंजन वहाळेकर

बाहावा !!

.....शेकडो छटांनी खुललेली हिरवाई, ... एक हिरवाकंच बाहावा, आणि पोपटी, झुलता गुलमोहोर...
बाहाव्यावर पिवळ्याजर्द फुलांची चादर चढते, अन उन्हाच्या झळांनी सोन्याची झळाळी येते...
डोकावणारी शर्मिली हिरवाई, मागे फुललेला लालकेशरी, पिवळ्या ठिपक्यांचा झुबकेदार गुलमोहोर...
------- -- --
आज पाऊस कधीचा कोसळतोय...
हिरवा बाहावा ओलाव्यानं जडावलाय...
भारावलेल्या फांद्या, आळसावल्यागत सुस्तावल्यात...
एखादी झुळूक येते, नकोनकोसं होत त्या इकडेतिकडे करतात,
...आधीच पावसाचा मारा, त्यात तो लंपट वारा...
नकोनकोसं होऊन ती फांदी जमिनीकडं झुकते...
हिरव्यागार पानांच्या जडावलेल्या झुबक्यांवरल्या झुलत्या पाण्याच्या थेंबात घुसळणारी
काळोख्या उजेडाची तिरीप तोल सावरता सावरता घरंगळते...
एक चमकता मोतिया जमिनीवर टपकून वाहत्या पाण्यात विरघळतो,
आणि दिसेनासा होतो...
शोधूशोधू करत फांद्या उगीचच झुलतात... चारदोन पातळशी पानंही, पाठोपाठ जमिनीकडं झेपावतात,
थेंब कधीच हरवून गेलेला असतो... पानं, पाण्यावर झुलत, विरघळलेल्या थेंबाला शोधत भरकटतात...
जडावललेला बहावा, हरवलेली पानं शोधत बसतो...
उदास उदास होतो...
फांदीवरली चिंब पाखरं चिडीचूप्प होतात,
पंखात चोच खुपसून अंगाला झटका देतात...
पंखात मुरलेला इवलासा पाऊस पुन्हा पानांवर ठिबकतो...
वार्‍यानं पळवलेला तो मोती परत पानावर येतो...
पानं पुन्हा मोहोरतात, झुलतात... झुल्यावरल्या झोक्यातला मोती पुन्हा झरंगळतो,
... आणि बाहावा उदास होतो...
--------------------------------------------

टारूशेठ कुठे गेले?

तशी मी मिपावर वाचनमात्र च!!

पण ठराविक १०-१२ लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचायला इथे दिवसातून एकदा तरी हमखास फेरी असतेच!!!!

७-८ महिने हे चालूच आहे.....

टारू शेठ चे लेख आणि त्यांच्या प्रतिक्रिया हे माझे असेच आवडते....

तीन चार दिवस त्यांचा ना काही लेख वाचला... ना कुठल्या लेखावर प्रतिक्रिया... म्हणून त्यांच्या ब्लॉग वर गेले... तर कळले... त्यांचा आयडी ब्लॉक झालाय.....

मान्य ते लोकांना जरा जास्त चिमटे घेतात... खिल्ली उडवतात.... पण तुम्ही आंतर्जालावर लिहिताय तर कोणी प्रशंसा करणार, कोणीतरी टिका करणार.. कोणी खिल्ली ऊडवणार हे साहजिकच आहे. हे ज्यांना झेपत नाही त्यांनी लेखन करू नये हे माझे स्पष्ट मत आहे....

मिपावर फक्त वाचनमात्र असणारे किती लोक... टारू, अवालिया,परा ,विक्षिप्त आदिती, चतुरंग, सहज,पंगा ... अन अशा काही लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यासाठीच येतात....

जरा खोडी काढली ...की कर आयडी ब्लॉक.... हे काही बरोबर नाही....

असं आपलं मला वाटतं.

-सविता.

Syndicate content
Scroll to Top