आस्वाद

"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)

राम राम मंडळी,

माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत. तालात लयीनुसार काही खंड निश्चित केलेले असतात त्याला मात्रा म्हणतात. ७ मात्रा, ४ मात्रा, १२ मात्रा, १६ मात्रा असलेले तालाचे विविध प्रकार आहेत. धा, धीं, तीन, कत्, त्रक, गे, ना, ही तबल्यातील विविध अक्षरं आहेत, ज्याच्या साहय्याने तबलावादन आणि पर्यायाने तालवादन होते. तालाच वजन तेच राखून, मात्रांची संख्या तीच ठेवून काही वेळेला एकच ताल विविध प्रकारच्या बोलांनी, अक्षरांनी वाजवला जातो त्या ठेका असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर अशी अनेक गाणी आहेत की ज्यात केरवा हा ताल वापरला गेला आहे परंतु त्याचे ठेके मात्र वेगवेगळे आहेत! विविध ठेक्यांमुळे गाण्याच्या सौंदर्यात भर पडते.

असो, ही झाली तालासंबंधी अगदीच ढोबळ व प्रथमिक चर्चा. ताल, तबल्यातील घराणी, विविध बंदिशी, कायदे, रेले ही सर्व तालाची शास्त्रीय अंगं आहेत, त्यात आपण सध्या शिरणार नाही आहोत. तो खूपच मोठा विषय आहे व त्या बाबत सवडीने कधितरी एखादी लेखमालाच लिहायचा माझा विचार आहे. अर्थात, माझाही अजून त्यात अभ्यास सुरू आहे व तो जन्मभर सुरूच ठेवावा लागेल इतका अफाट तबला आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतात आहे! आपलं तालशास्त्र अतिशय समृद्ध आहे!

या लेखात मी संगीतातल्या 'लय' या अत्यंत अवघड अश्या विषयावर प्राथमिक भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. लय ही जरी अत्यंत सूक्ष्म गोष्ट असली तरी तिचा आवाका प्रचंड आहे. लयविचार हा संबंध संगीतालाच व्यापून टाकणारा प्रकार आहे!

संगीतातली लय आपण नंतर पाहू. पण मुळात लय म्हणजे काय हो?

बरं आधी मला एक सांगा, की हे कुठलं चित्र आहे? Smile

हे ईसिजीचं चित्र आहे हे आपण ओळखलं असेलच! डॉक्टर कशाला काढतात हो एखाद्याचा ईसीजी? तर त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची क्रिया नियमीत आहे किंवा नाही हे बघायला! म्हणजेच त्या माणसाची 'लय' कशी आहे, तो लयीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी! हृदयाची 'लय' बिघडली की जीवन बिघडलं आणि गाण्यातली लय बिघडली की गाणं बिघडलं असं समजावं! Smile

प्रत्येक माणसाची अशी एक स्वतंत्र लय असते. हा लेख वाचताना एखाद्याच्या नाडीचे ठोके हे मिनिटाला ७५ असू शकतील, तर एखाद्याच्या ८० असू शकतील. परंतु प्रत्येकाचं हृदय एका लयीत सुरू असतं. सांगायचा मुद्दा हा की 'लय' हा जीवनाचा प्राण आहे. वास्तविक हा अगदी छोटा शब्द! दोनच अक्षरी - लय! परंतु त्याची व्याप्ती अफाट आहे. डॉक्टर मंडळी हृदयाला स्टेथोस्कोप लावून हे हृदयाचं संगीत ऐकतात. 'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'! आहाहा, काय सुंदर नाद असतो हा? आपण ऐकला आहे का कधी? नसेल ऐकला तर केव्हातरी आपल्या फ्यॅमिली डॉक्टरांकडे त्यांचा जाऊन त्यांचा स्टेथो घेऊन अवश्य ऐका! Smile

'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'!

हृदयाचं काम एका छान नादमय लयीत सुरू असतं. जीवन सुरू असल्याची ती खूण आहे! हृदयाचे हे लयदार ठोके आईच्या पोटात असल्यापासून जे सुरू होतात ते अगदी शेवटचा श्वास सुरू असेपर्यंत! आमच्या गाण्याच्या भाषेत बोलायचं तर लयीची शेवटची तिहाई पडते आणि जीवनगाणं थांबतं! लय संपली, जीवन संपलं! बरं ही लय बिघडूनही चालत नाही. वर इसिजीचं जे चित्र लावलेलं आहे तो ईसीजी तेच तपसण्याकरता काढतात! पाहा मंडळी, आयुष्याचा आणि गाण्याचा किती जवळचा संबंध आहे तो. हृदयाची लय बिघडली की जगणं मुश्किल होतं आणि गाण्याची लय बिघडली की गाणं बिघडतं!

किती महत्व सांगावं हो लयीच? मला सांगा लय कशात नसते? इथे आपल्या मिपावर अनेक चित्रकार मंडळी आहेत. त्यांना विचारा की एखादं चित्र काढताना त्या चित्रातली लय किती सांभाळावी लागते ते! चित्रातही एक अदृष्य लय असते, अस्सल चित्रकार ती सांभाळूनच उत्तम चित्र साकार करत असतो. अर्थात, मी या विषयात काही जास्त बोलू शकत नाही कारण मला त्या कलेतलं काही कळत नाही, फक्त आस्वाद घेता येतो. परंतु इथे उत्तमोत्तम कवी आहेत, त्यांना विचारा की कवितेतली एखादी ओळ बांधताना लयीचं महत्व काय अन् ती किती सांभाळावी लागते! लय ही प्रत्येक कलेत असतेच, मी फक्त संगीतातल्या लयीविषयी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करणार आहे!

कुठलीही कला ही लयीशिवाय जन्मूच शकत नाही. लय ही स्वयंभू असते, कलेत अंतभूतच असते. कलेच्या अविष्कारात ती कलेपासून वेगळी काढताच येत नाही!

अहो, कलेचं एक वेळ राहू द्या, तुम्हीआम्ही तिची आपापल्या वकुबानुसार निर्मिती करतो, आस्वाद घेऊ शकतो. पण एखाद्या तान्ह्या बाळाचं काय? त्याला कळते का हो लय? Smile

एखादं अगदी तान्हं मूल जेव्हा धाय मोकलून रडत असतं तेव्हा आसपासची बरीच मंडळी त्या मुलाला जवळ घेत असतात, त्याची समजूत घालत असतात, तरीही ते गप्प होत नाही. पण जेव्हा त्या तान्हुल्याची आई त्याला हृदयाशी धरते तेव्हा ते पटकन रडायचं थांबतं, खुदकन हसतं! सांगा पाहू का बरं असं? त्या तान्ह्याला हीच आपली आई आहे, हे कसं कळतं बरं? Smile

९ महिन्यांपासून ते आईच्या पोटात असतं त्या कालावधीत ते अक्षरश: सतत म्हणजे सतत आईच्या हृदयाची ती 'लब-ढब', 'लब-ढब' ऐकत असतं! तेवढी एकच खूण असते त्याच्याजवळ. ना त्याला काही दिसत असतं, ना काही कळत असतं, ना कुणी समजून सांगायला असतं! त्याची साथ असते ती फक्त त्याच्या माउलीच्या हृदयाची एका ठराविक लयीतली नादमयता! पण तसं प्रत्येकच माणसाच्या हृदयाची धडधड सुरू असते मग ते मूल आपल्या आईच्याच हृदयाचा आवाज कसं ओळखतं? तर त्याला कारण हे की वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची लय वेगळी, प्रत्येकाच्या लयीत सूक्ष्म फरक असतो आणि मंडळी आपल्याला कदाचित अतिशोयोक्ति वाटेल, परंतु विश्वास ठेवा, ते मूल एका क्षणात लयीतला तो सूक्ष्म फरक ओळखून फक्त त्याच्या आईने जवळ घेतल्यावरच एका क्षणात रडायचं थांबतं. आईच्या हृदयाजवळची ती जागा त्याच्या ओळखीची असते आणि आपल्याकरता हीच जागा सर्वात सुरक्षित आहे हा विश्वास त्या लहानग्याकडे असतो! ती ओळख असते ती त्या ठराविक लयीची, त्या माउलीच्या हृदयाच्या 'लब-ढब', 'लब-ढब' या लयदार नादमयतेची!

एक तान्हं मूल आपल्या आईचं हृदयसंगीत ओळखू शकतं, त्यातली नादमयता ओळखू शकतं! अर्थात, हे माझे विचार नव्हेत. ते मी माझ्या गुरुजींकडून शिकलो आहे. बघा बुवा तुम्हाला पटताहेत का ते! आमचे बाबूजी नेहमी म्हणायचे की कवी हा कविता लिहितांनाच त्याची लय निश्चित करत असतो. आपण फक्त ती लय ओळखाची आणि आपल्या आवडीच्या सुरात, आवडीच्या रागात, आवडीच्या धुनेमध्ये, कवितेतल्या भावानुसार ते गाणं बांधायचं! मूळ कविताच जर लयीत नसेल तर गाणं जन्माला येणं मुश्किल आहे! असो..

खरंच मंडळी, लयीचा शोध हा अनंत आहे. आपण तिचा जितका अभ्यास करू तेवढी ती अधिक सूक्ष्म होत जाते आणि पुन्हा अभ्यास करण्याकरता मुश्किल होऊन बसते. परंतु तिचा अभ्यास, तिचा शोध कधीच संपत नाही!

असो, तर मंडळी वरील विवेचन म्हणजे लयीबद्दलचे ढोबळमानाने काही जनरल विचार आहेत. मग आता संगीतातली, गाण्यातली लय म्हणजे काय हो? तिचा अनुभव कसा घ्यायचा? तिचं सौदर्य कसं अनुभवायचं? हे आपण पुढल्या भागात पाहू!

आमचे पक्याराव, 'तात्या, लय म्हणजे काय हो?' हा प्रश्न किती सहज विचारून गेले! परंतु हा प्रश्न विचारून त्यांनी माझी किती पंचाईत करून ठेवली आहे, नक्की कुठल्या परिक्षेला मला बसवलं आहे याची त्यांना तरी कल्पना आहे की नाही, देवच जाणे! Smile

-- तात्या अभ्यंकर.

बाप्पा

(डिस्क्लेमरः सदर मुक्तकात कुठल्याही श्रद्धास्थानाची खिल्ली उडवण्याचा हेतू नाही. ड्यांबीसकाकांचे "नास्तिक" वाचल्यावर एक कल्पना मनात खेळत होती. त्याचे हे प्रकटन. दुसरे काहीही नाही. मिसळपावावरील विडंबनकारांना, अर्थातच, खुले आमंत्रण आहे. सदर "कविता" अद्याप रॉ आहे, ह्याची जाणीव आहे. तेव्हा येथील सिद्धहस्त कवींनी सुधारणा सुचवाव्या, ही विनंती.)

लहानपणी देवळात, सतत पाहिला तुला
मोदक-करंज्या खात होतास नुस्ता बसलेला
पायापाशी उंदिर, मोबिलिटीसाठी
आईशप्पत, तुझ्या चंगळीचा हेवा वाटला

झालो मोठा थोडा, तेव्हा बघितलं एकदाच
रिद्धी-सिद्धींमधली निवड, तीदेखील पहिल्यांदाच
हे डिसिजन तुला, नाही करावे लागले मित्रा
कुछ भी कहो, लेकिन थोडा जळजळ हुवाच

पुन्हा एकदा दिसलास, आईच्या बायपासला
क्वाड्रुपल आहे, सांभाळून घे, विनंती मानायला
थ्यांकु व्हेरी मच, कसचं कसचं म्हणालास
तुझं जातीनं हजर राहाणं, खूपच आवडलं मला.

आता तर काय, तू नेहमीच फसवतोस
डोळ्यातल्या मोत्यांतून, तू सारखाच दिसतोस
पुढे येतात ते सगळे, वक्रतुंड महाकाय,
त्यांच्यात तुझा निवास, तिथेच का रे असतोस ?

हिच्या कर्करोगासाठी, घालू का तुला गाऱ्हाणे?
सध्या तुझे वर्कलोड, वाढले आहे म्हणे
तुझा बाप माझा पार्टनर, ब्रिजची पाने पीस
जाताना दिसावा हाच दीस, आता एकच मागणे

- सर्किट (१८ जुलॅ २००८)

विठू सांगे...

आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।

साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।

खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।

भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।

काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।

नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।

घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।

तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।

काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।

श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।

प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।

जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।

प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।

- प्राजु.

वरील काव्य वाचून प्राजुला विरक्ती आली आहे असा गैर समज करून घेऊ नये. काही ओव्या वाचता वाचता मला या ओळी सुचल्या.. म्हणून इथे लिहिल्या.

भुक लागली आहे का? मग बघा तर आत काय आहे ते !!!!


चला पटकन वाट कसली बघता !!


यातल कुठल निवडू बरं ??


पेटव नीट निखारे पेटव,,मस्त भाजली गेली पाहिजेत..


आत्ता कस...चला सोय बरोबर झालीय...


आहाहा लय मस्त.. भाजण्याचा आवाज पण यायला लागला बरं का मंडळी..


ही अशी रचुन ठेवली काय्,,पण माझा वाला कणस किधर को गया ?


अच्छा भाजतोय तर...या टोकाने भाजतोयस ठीक आता जरा दुसर्‍या बाजुने भाज पाहु...


आत्ता कसं दोन्ही बाजुने नीट भाजल जातय..


चला लिंबु-तिखटमीठ लावुन तयार होणार तर..लिंबाची चव मस्तच लागते..दाताला..ओठाला....


खाने के वास्ते एकदम रेडी..
काय तोंडाला पाणी सुटल का ??

(दाने दाने पे लिखा हे खाने वाले का नाम) असे म्हणणारा..
मदनबाण.....

कार्यालय

इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी

कुणालाही राहिल नाही कुणाचही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय

मिसळ

ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
misal

एप्रिल फळ (९)

या पूर्वीचे दुवे

http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)
http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८)
मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..
(क्रमश:)
आपल्या लहानपणच्या ब-याचशा आठवणी फ़ळांशी निगडीत असतात.लिची पेर पीच चेरी या पेक्षाही फ़णस चिक्कु पेरु आंबा बोरे चिंचा ही नेहमी दिसणारी आणि आपल्य इथल्या झाडांवर आढळणारी फ़ळे ती झाडे त्यावर खेळलेले खेळ हे सगळे आपले लहानपण घडवतात. जून सरता सरता फ़णसाचे आगमन होते. फ़णस म्हंटले की पटकन आठवतो तो पुलंचा अन्तू बर्वा.
कोकणातील माणसे फ़णसा सारखी असतात खूप पिकल्याशिवाय त्यांच्या गोडवा येत नाही म्हणतात. फ़णस आणि कोकण हे वेगळे करताताच येत नाही. पटकन सहजासहजी काही कोणाला मिळु द्यायचे नाही आणि दिले की भरभरुन द्यायचे हा कोकणीबाणा सुपारी;नारळा फ़णसाने कोकणी माणसाला दिला की कोकणी माणासाने त्याना दिला हे ठरवणे अवघड.राजकारण असो इतिहास असो किंवा अर्थकारण असो हा गुण सर्वत्र दिसतो.
दारातच स्वागताला उभे असणारे डेरेदार हिरवे; पानानी गच्च भरलेले फ़णसाचे झाड ही कोकणी कौलारू घरांची ओळखीची खूण. घरासमोर असणारा आड त्यावर कुर्र...की...च वाजणारा रहाट
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते. आणि घराच्या दारातच एखादी सुरुकतलेली आजीबाई गालावर तळहात दुमडुन बोटे मोडत "पुता तू होड जातलो रे" म्हणत प्रेमाने आपले मस्त गूळ पाणी देउन स्वागत करणार असे हमखास वाटते. कोकणची खरी ओळख म्हणजे फ़णस. स्वत:च्या अंगाखांद्यावर फ़णसाची बाळे वागवणारे फ़णासाचे झाड मला नेहमीच जिवती मातेची आठवण करुन देते. मूल व्हावे म्हणुन आंगाखांद्यावर दहाबारे लहान बाळे वागवणा-या जिवती मातेला नवस बोलला जातो. त्या देवीचे चित्र मी कुठल्याशा पोथीत जेंव्हा पहिल्यांदा पाहिले तेंव्हा मला फ़णसाच्या झाडाचीच आठवण झाली होती. मी माझ्या आजीला तसे सांगितलेही होते त्यावर आजी माझ्या पाठेत एक चापटी मारुन "चल पळ" म्हणुन फ़िस्सकन हसली होती.
पण फ़णसाचे झाड जेंव्हा केंव्हा पहातो तेंव्हा मला हीच आठवण होते.
फ़णसाचे प्रेमी कट्टर असतात.त्यावरुन माणसांचे विभाजन करायचे झाले तर फ़णस मनापासुन आवडणारे आणि अजिबात न आवडणारे अशा दोनच प्रकारचे लोक असतात. अधलामधला प्रकार माझ्या पहाण्यात तरी नाही.फ़णस न आवडणा-या माणसाला फ़णसा वास सहन सुद्धा होत नाही आणि फ़णसप्रेमी माणसाला तो दरवळ जागेवरुन हलुसुद्धा देत नाही.
परवा पार्ल्याच्या बाजारातुन सहज जात होतो तेथे काचेच्या पेटीआड ठेवलेल्या तो ग-याचा खजीना पाहुन मी मंत्रमुग्ध झालो. अगोदरच त्या फ़णसाच्या दरवळाने मला जागेवर थोपवुन धरले होते. गरे पाहिल्यावर मी कोठे निघालो होतो तेच विसरलो आणि ग-यांच्या दिशेने आपोआप चालु लागलो. माझ्याबरोबरचा मित्र ; त्याला फ़णसाचा दरवळ म्हणजे वास वाटतो. तो त्याने हैराण झाला होता आणि मी मिटक्या मारत त्या करकरीत ग-यांचा आस्वाद घेत होतो.
माझ्या लहानपणी असे फ़णसाचे गरे बाजारात मिळायचे नाहीत. त्यासाठी आख्खा फ़णस आणावा लागायचा. फ़णस आणला म्हणजे तो मग दोन तीन दिवस ठेवायचा किनतानात झाकुन ठेवायचा आणि पिकल्यावर त्याचा दरवळ सगळ्या घरभर सुटायचा.फ़णस घरात आणला म्हणजे त्याला टेकुन बसणे ; त्यावर हात दाबुन तळहातावर काट्यांमुळे उमटणारे खड्डे मोजणे हे आम्हा मुलांचे उद्योग. त्यासाठी आम्ही अभ्यास देखील त्या फ़णसाच्या सान्निध्यात करायला तयार असू.
फ़णस पिकुन त्याचा दरवळ घरभर झाला की मग त्यानन्तर तो फ़णस कापण्याचा सोहळा सुरु व्हायचा. सोहळाच म्हणायचा तो. खोबरेल तेलाची वाटी तर्हेतर्हेच्या सू-या आणि दोन पराती पाअतेली घेउन माझे धाकटे काका फ़णस कापायला बसायचे. पूजेला जसे सोवळे नेसावे लागते तसे फ़णस कापण्यासाठी सुद्धा त्यांचा एक खास पायजमा असायचा. त्यावर किनतान टाकुन ते फ़णस कापायला बसत. शस्त्रास्त्रांना धार लावताना अगोदर पाणी लावतात तसे सूरीला खोबरेल तेल लावले जायचे. आणि मग ती सूरी फ़णसातून आरपार जायची. अर्ध्या कापलेल्या फ़णसाला मग ते काका नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट हातानी फ़ाडले असेल त्या श्टाईल मधे दोन हातानी फ़णस उकलायचे. आम्हा मुलाम्चे सगळे लक्श्य त्यातून डोकावणा-या त्या सोनेरी चंदेरी खजिन्याच्या मोहोरांच्या तुकड्यांकडे असायचे.फ़णस उकलल्यानन्तर त्यातुन गरे वेगळे काढले जात. घरातल्या देवाला दोनचार गरे दाखवुन मग ते सगळ्यानी खायचे हा शिरस्ता.फ़णसाचे गरे एका पातेल्यात ठेवले जायचे सुरवाती सुरवातीला तर गरे पतेल्यात पडायच्या आतच ते पोटात पडायचे. दुस-या पातेल्यात नुस्त्या बीयाच असायच्या.नन्तर नन्तर तर आख्खे गरे संपल्यावर अगदी गरे असलेल्या रेशा सुद्धा शोधुन खाल्या जायच्या
आई; थोरली काकु; आत्या वगैरे महिला मंडळ " अरे गरे खाऊ नका पोट फ़ुगेल"वगैरे पोकळ सल्ले द्यायच्या पण आम्ही त्याला अजिबात दाद द्यायचो नाही.उलट "शाळेत कालच ;गरे खा गरे पोटाला बरे" हे बडबडगीत शिकलो आहोत ते काय उगाच" असे म्हणुन दाखवायचो. " शिवाजी महराजानी अफ़्जलखानाचे पोट फ़ाडुन त्याचा कोथळा बाहेर काढला" हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे.
फ़णसात दोन प्रकार काप्या आणि बरक्या.यातले कोणत्या झाडाला कोणते फ़ळ लागेल ते कोणीच सागु शकायचे नाही. आमच्या गावात भोरकर वाडा म्हणुन एक जुना वाडा होता तेथे फ़णसाची दोनतीन मोठी झाडे होती. मोसमात नेहमीच या झाडाना फ़णस लगडलेले असायचे.घरी फ़णस आणायचा तर त्या झाडावरचा एखादा फ़णस बूक करावा लागायचा त्या फ़णसावर अक्षरश: ज्याने तो फ़णस बूक केलेला आहे त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या डकवल्या जात. मला फ़णसानी लगडलेले ते झाड बघायला खूप आवडायचे झाडावर लगडलेला फ़णस हातानी चाचपडुन बघण्यातली गम्मत काही वेगळीच.एव्हढे मोठे फ़ळ झाडावर पहायल काहितेरी वेगळेच वाटायचे."अबबबबबबब केवढा फ़णस आई; आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोट्ठे नाही " या पाडगावकरांच्या गाण्या ची खरी गम्मत तो मोठा फ़णस पाहिल्यावर कळायची.
फ़णसावर थापट्या मारुन तो काप्या की बरका ते ठरवले जायचे.त्यावर थाप मारुन येणार्या ठप्प ठप्प किंवा थब्ब थब्ब आवाजावरुन ते कळायचे. देशावरच्या माणसाला काप्या फ़णस आवडतो तर अस्सल कोकणी माणसाला बरक्या.
काप्या फ़णसाचे गरे देशावरच्या घाटी माणसासारखेच फ़ारसे अंगाला लावुन न घेणारे; सुट्टे सुट्टे, करकरीत, थोडे कमी गोड असतात तर बरक्या फ़णसाचे गरे कोकणी माणसा सारखेच गोडीत अवीट ; पण हातात धरु म्हणता सुळ्ळकन हातातुन निसटुन खाणाराची फ़जीती करणारे.
फ़णासाचे गरे आयुर्वेदात रुचकर ; पौष्टीक असे काहीसे वर्णीले आहेत. पण खाणारा माणुस फ़णसाचे गरा तोंडात टाकतो तेंव्हा अजानतेपनी डोळे मिटतो. वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. अंतरात्मा तृप्त होतो.आणि हतिम बीन ताई च्या गोष्टीत सांगितलेल्या प्रमाणे "एकबार देखा है दूसरी बार देखने की चाहत है" या उक्तीनुसार आणखी एकदा ती तृप्ती अनुभवावी म्हणुन दुसरा गरा उचलण्यासाठी त्याचा हात दुस-या कोणाचेतरी नियंत्रण असावे त्याप्रमाणे हात गरे ठेवलेल्या भांड्याकडे आपोआप वळतो..
(क्रमशः )

चित्र सौजन्य : मदनबाण

शिलालेख : अर्थ लावण्यास मदत ...

मला आमच्या गावात असलेल्या एका "गोपाळकॄष्णाच्या मंदिराच्या भिंतीवर" व त्याखाली असलेल्या एका पुलाच्या भिंतीवर काही "शिलालेख" दिसले.
त्याचा अर्थ जाणुन घेण्याची उत्सुकता असल्याने आम्ही तेथेच काही ठिकाणी चौकशी केली पण ती "लिपी वाचण्यास व त्याचा अर्थ" सांगण्यास समर्थ अशी व्यक्ती मला सापडली नाही.
मिपाच्या टॅलेंटचा वापर करुन घेण्यासाठी मी व माझ्या मित्राने त्याचे काही "फोटो" काढले आहेत.
ते आता खाली "चिटकवतो " आहे.
कॄपया त्याचा अभ्यास करुन मला त्याचा अर्थ लावण्यास मदत करावी ....

कॄपया पहा आणि बघा काही उमजते का ?

आपल्या इथल्या "प्रियालीताई, विजुभाऊ, मुक्तसुनीत, चतुरंग, तात्या, विकासराव " सारख्या जाणकार लोकांची मदत हवी आहे ....

शिलालेख : १
Shilaalekh : 1
शिलालेख : २
Shilaalekh : 2

शिलालेख : ३
Shilaalekh : 3
सौजन्य : गजानन गुरव, पंढरपुर

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ५ दत्ता डावजेकर!

वैधानिक इशारा: ह्या अशा संकलीत लेखामुळे कुणाच्या प्रतिभासाधनेत व्यत्यय येणार असेल तर कृपया त्यांनी पुढे वाचण्याची तसदी घेऊ नये.


दत्ता डावजेकर! संगीतातले डाव जे सहज करतात.. ते डावजेकर ! सिनेमा क्षेत्रात ते डीडी ह्या नावाने ओळखले जातात. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून सर्वात प्रथम गानकोकिळा लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी देणारा संगीतकार! हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागुं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ . डीडींनी त्यानंतर आशा मंगेशकर(भोसले), उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली.

डीडींचे वडील बाबुराव, तमाशात आणि उर्दु नाटकात तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्‍या डीडींनी तबला तर शिकून घेतलाच पण पेटी वादनही आत्मसात करून घेतले. इथनं मग सुरु झाली त्यांची संगीत यात्रा. तबला-पेटी वादना बरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डीडींना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तर हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे डीडींना मासिक २०रूपये पगार मिळत असे.

त्यानंतर डीडींनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डीडींचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें ज्यात लता दीदींनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे डीडींच्या संगीत दिग्दर्शनात झाले हा एक मणिकांचन योग समजला जातो.

त्यानंतर आपकी अदालत हा वसंत जोगळेकरांचा चित्रपट आणि कैदी गोवलकोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथचा हिंदी-इंग्लीश चित्रपट केला. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली.

दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. राजा परांजपे, गजानन जागिरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादि निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादि चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले.

डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थॅंक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम गीतकारही होते. त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते अशी आहेत.
१)आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी- गायिका : लता मंगेशकर
२)कुणि बाई, गुणगुणले। गीत माझिया ह्रुदयी ठसले॥ -गायिका: आशा भोसले
३)गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना। गेला कुठे माझा राजा, राजा येईना॥ - गायिका: लता मंगेशकर
४)थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी । बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती ॥ - गायिका: आशा भोसले
५)तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला ! गायिका: लता मंगेशकर

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.
डीडींची अजून काही गाजलेली गाणी अशी आहेत.
१)ऊठ शंकरा सोड समाधी-चित्रपट: पडछाया-गायिका : रेखा डावजेकर
२) अंगणी गुलमोहर फुलला- गायिका : माणिक वर्मा
३)आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही- चित्रपट: वैशाख वणवा- गायिका: सुमन कल्याणपूर
४)गोमू माहेरला जाते हो नाखवा-चित्रपट: वैशाख वणवा. गायक: पं.जितेंद्र अभिषेकी
५)गंगा आली रे अंगणी- चित्रपट:संथ वाहते कृष्णामाई
६)या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती- चित्रपट पाठलाग- गायिका: आशा भोसले
७)तुझे नि माझे इवले गोकुळ - चित्रपट: सुखाची सावली. गायक-गायिका: लता आणि हृदयनाथ मंगेशकर
८)संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट: संथ वाहते कृष्णामाई- गायक: सुधीर फडके
९)रामा रघुनंदना,रामा रघुनंदना - चित्रपट: सुखाची सावली - गायिका: आशा भोसले
१०)बाई माझी करंगळी मोडली- चित्रपट: पडछाया- गायिका:आशा भोसले
डीडींची अजून कितीतरी श्रवणीय गाणी आहेत की ज्यांचा नुसता उल्लेख करायला गेलो तर पूर्ण पान भरून जाईल.
चित्रपटांच्या बरोबरीनेच डीडींनी बर्‍याच अनुबोधपटांचेही(डॉक्युमेंटरीज) संगीत,पार्श्वसंगीतही तयार केलेले आहे.

१९९२ साली डीडींनी शेवटचा चित्रपट केला. त्यानंतर ते जवळजवळ विजनवासातच गेले
वार्धक्याने डीडींच्या स्मरणशक्तीवर बराच परिणाम केलेला होता त्यामुळे शेवटच्या काळात मात्र डीडींचा चित्रपट सृष्टीशी म्हणावा तितका संबंध राहिला नाही. वयाच्या नव्वदाव्या वर्षी डीडींचे १९ सप्टेंबर २००७ रोजी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

आज डीडी आपल्यात त्यांच्या अजरामर चालींच्या स्वरुपात जीवंत आहेत.

सर्व माहिती,दुवे आणि छायाचित्र महाजालावरून साभार!

"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १

राम राम मंडळी,

शीर्षक वाचून दचकलात ना? Smile

पण घाबरू नका, मी काही इथे आपल्याला गाणं शिकवण्याकरता आलेलो नाहीये कारण मी स्वत:च अजून एक विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखाचं शीर्षक मी, 'चला गाणं शिकवतो, समजावतो!' असं न देता 'चला, गाणं शिकुया, समजून घेऊया!' असं दिलं आहे! Smile

असो..!

एक गोष्ट नमूद करू इच्छितो ती अशी की इथे मी गाण्यातल्या काव्याविषयी, त्याच्या चाली/संगीताविषयी न बोलता ते गाणं कश्या रितीने गायलं गेलं आहे या विषयावर बहुत करून बोलणार आहे. प्रत्येक गाण्याला एक गायकी असते. मी त्या गायकीविषयी बोलणार आहे. मला ती गायकी कशी दिसली, कुठे आवडली याबाबत माझं म्हणणं मी आपल्याशी शेयर करणार आहे. त्यामुळे कदाचित येथील काही वाचक मंडळींचा एखाद्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूही शकेल, ती मंडळी ते गाणं अधिक चांगल्या प्रकारे, डोळसपणे एन्जॉय करू शकतील असं मला वाटतं म्हणून हा लेखनप्रपंच! एखाद्या गाण्याच्या गायकीविषयी काही गोष्टी समजून घेतल्या तर आपल्यालाच ते गाणं अधिक चांगल्या रितीने गाता येईल, ते ऐकतांना अधिक चांगल्या रितीने ऐकल्याचा आनंद मिळेल. कारण प्रत्येक मनुष्य जेव्हा गाणं ऐकत असतो तेव्हा तोही ते गाणं मनातल्या मनात गातच असतो. त्याकरता कुठे जाहीर गायलं पाहिजे असं नाही, ष्टेजशो वगैरे केले पाहिजेत असंही नाही. गाण्यासारखा दुसरा सोबती नाही, त्यामुळे एखादं गाणं समजून घेऊन स्वत:पुरतं गातांनाही मजा येते. त्यातला स्वानंद सर्वात महत्वाचा! सबब, गाण्यातली काही सौंदर्यस्थळे समजून घेऊन, जाणीवपूर्वक ते गाणं मनातल्या मनात का होईना, परंतु अधिक चांगल्या रितीने गाता यावं, गुणगुणता यावं असं वाटणार्‍यांकरता हा लेखनप्रपंच! Smile

एखादं गाणं आपल्याला का आवडतं? याची ढोबळमानाने उत्तरं द्यायची झाली तर त्या गाण्याची चाल/संगीत खूप छान असतं, संबंधित गायक/गायिकेचा आवाज खूप छान असतो, त्या गायक/गयिकेने ते गाणं खूप चांगल्या रितीने गायलेलं असतं, इत्यादी काही उत्तरे मिळतील. यापैकी आपण 'गायक/गायिकेने ते गाणं खूप चांगल्या तर्‍हेने गायलेलं असतं' या मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत.

बाबूजी, दिदी, आशाताई इत्यादी मंडळी एखादं गाणं खूप छान गातात तसं मला गाता येत नाही. असं का बरं होतं? फक्त त्यांचा आवाज माझ्यापेक्षा कितीतरी अधिक छान असतो म्हणून? नाही, एवढं एकच कारण नक्कीच नाही. इतरही अनेक कारणं आहेत. ह्या मंडळींनी गायलेलं एखादं गाणं ऐकायला खूप छान वाटतं यामागे ह्या मंडळींचा आवाज, त्याचा पोत हे मुख्य क्वालिफिकेशन आहे/असतं हे मान्य! परंतु 'आवाज' हे एवढं एकच कारण नसतं! मुख्य मुद्दा असतो तो त्यांच्या गायकीचा. स्वर ठेवण्याच्या, स्वर लावण्याच्या पद्धतीचा. गाण्यातली अदृष्य लय अतिशय लीलया सांभाळण्याचा, संगीतकाराने त्या गाण्यात ठेवलेल्या खास खास जागांचा, शब्दांच्या उच्चारांचा!

आता पहिलं उदाहरण म्हणून आपण खूबसूरत सिनेमातलं पंचमदांनी संगीत दिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'पिया बावरी' हे गाणं पाहू. हे माझ अतिशय आवडतं गाणं आहे. हे गाणं आपल्याला येथे ऐकता येईल व येथे पाहताही येईल. आज पहिलाच भाग आहे म्हणून आज आपण फक्त या गाण्याच्या अस्थाईबद्दल बोलू, त्यातली गायकी समजून घ्यायचा प्रयत्न करू. आज आपल्या सगळ्यांच्या गुरू आहेत या गाण्याच्या गायिका आशाताई! चला तर मंडळी. आशाताईंना मनोमन वंदन करून व्हा तैय्यार! गाणं समजून घेण्याचा हा पहिला धडा गिरवायचा आपण सगळेच प्रयत्न करू! आधी म्हटल्याप्रमाणे मीही एक विद्यार्थीच आहे तेव्हा माझंही काही चुकू शकतं. तसं काही चुकलं तर अवश्य सांगा, मला ती चूक कबूल करायला जराही संकोच वा कमीपणा वाटणार नाही! Smile

'निसागम निधप' या सरगमने या गाण्याची सुरवात होते. यात 'निसागम' हा आरोह आहे व 'निधप' हा अवरोह आहे. 'निसागम' या आरोहानंतर 'निधप' हा अवरोह आशाताईंनी किती सुरेख गायला आहे पाहा! 'नि' वरून किती सुरेख वळण घेऊन त्या 'धप' या अवरोहावर येतात ही माझ्या मते शिकण्यासारखी गोष्ट आहे!

हा सरगम पूर्ण करून लागलीच त्या 'पिया बावरी..' ही अध्ध्या त्रितालातली चीज गाऊ लागतात व अतिशय सुरेलतेने 'बावरी' शब्दातल्या 'री' वर सम घेतात. एका क्षणात त्यांची स्वर-ताल-लय यांच्यावरची हुकुमत दिसून येते व आशाताईंनी या गाण्याचा संपूर्ण ताबा घेतल्याचे आपल्या लक्षात येते!

पिया बावरी, पिया बावरी, पी कहा, पी कहा, पिया पिया बोले रे, पिया बावरी!

'पी कहा, पी कहा' हे शब्द कसे टाकले आहेत पाहा व त्यानंतर लगेच 'पिया पिया बोले रे' या शब्दांतलं लयीला धरून असलेलं चापल्य किती सुरेख आहे पाहा! चापल्य हा शब्द मी अश्याकरता वापरला की पुढे लगेच 'पिया बावरी' हे शब्द घेऊन सम गाठणं महत्वाचं आहे! 'पिया पिया बोले रे' या शब्दांनंतर 'पिया बावरी' हे शब्द घेऊन आशाताई इतक्या सुंदर रितीने समेवर येतात की अगदी ऐकत रहावसं वाटतं. तालास्वरालयीवर घट्ट पकड, कुठेही शब्दांची खेचाखेच नाही की मोडतोड नाही! इथे आपल्याला आशाताईंच्या गायकीचा आनंद मिळतो अन् मन प्रसन्न होतं! लगेच पुढच्या आवर्तनात त्यांनी 'बावरी' शब्दातल्या 'बा' वर इतकी जीवघेणी जागा घेतली आहे की की क्या केहेने! साला, दिल एकदम खुश होऊन जातो! Smile

असो,

तर मंडळी, आज प्रस्तावनेचा हा पहिलाच भाग आहे तेव्हा आपल्याला जास्त त्रास न देता इथेच थांबतो. पुढील प्रत्येक भागात आपण एखाद्या गाण्यातलं धृवपद व एखादा अंतरा यातलं सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते मी माझ्या परिने शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन. बसंतच लग्न या मालिकेत मी मला आवडणार्‍या काही रागांचं सौंदर्य उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे. तशी मला आवडणार्‍या काही गाण्यांबद्दल लिहिण्यासाठी मी ही लेखमाला सुरू करत आहे. आपल्याला आवडली, त्यातून काही चांगले विचार मिळाले तर चांगलंच आहे, नाय आवडली तर द्या सोडून...! Smile

-- तात्या अभ्यंकर.