समीक्षा
कुंग फु पांडा
प्रेषक परिकथेतील राजकुमार ( सोम, 03/22/2010 - 17:00) .आज विमुक्तचा हा धागा बघताना कुंग फु पांडाची आठवण झाली आणी मी लिहिता झालो.

बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी.
'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो. पुढे जाउन पो ने आपले न्युडल्स शॉप समर्थपणे सांभाळावे हि त्याच्या वडिलांची अपेक्षा असते तर ह्याच्या अगदी उलट म्हणजे एक विख्यात कुंग फु मास्टर बनण्याचे पो चे स्वप्न असते. गंमत म्हणजे तो झोपेत देखील तो एक कुंग फु मास्टर बनल्याची स्वप्ने पाहात असतो.
पिस व्हॅलीचे संरक्षक आणी मास्टर शिफुचे पाच शिष्य 'मंकी, टायग्रेस, मांटीस, व्हायपर आणी क्रेन हे पो चे आदर्श असतात. त्यांच्यासारखेच मास्टर बनायचे हा पो चा ध्यास असतो.

टोर्टोइज मास्टर उग्वे ह्याला कधीकाळी मास्टर शिफुचा शिष्य असलेला पण आपल्या गुंड आणी विनाशक प्रवृत्तीमुळे सध्या बंदीवासात असलेला लिओपार्ड मास्टर 'ताय लंग' हा कधितरी स्वत:ची सुटका करुन घेउन पुन्हा एकदा पिस व्हॅलीची शांतता भंग करणार ह्याची खात्री असते, त्यामुळे त्याला रोकण्यासाठी तो ड्रॅगन वॉरीअर' ह्या सर्वोच्च मास्टरची निवड करण्याचे ठरवतो. 'फ्युरियस फाईव्ह' पैकी कोणीतरी एकजण ह्या पदाचा मानकरी ठरणार हे निश्चीतच असते. अशावेळी हि स्पर्धा आणी त्यात लढणार्या आपल्या आदर्शांना पाहण्याच्या प्रयत्नात पो स्वत: त्या आखाड्यात येउन पडतो. गंमतीचा भाग म्हणजे अचानक आकाशातुन पडलेल्या ह्या पो ला टोर्टोइज मास्टर नवा 'ड्रॅगन वॉरिअर' म्हणून घोषीत देखिल करुन टाकतो.

आता मात्र पो ची चांगलीच गंमत उडते. एका बाजुला खडतर प्रशिक्षण आणी दुसर्या बाजुला 'फ्युरिअस फाइव्ह' समोर आपण काहिच नसल्याची सतत होणारी जाणीव पो ला हताश करुन टाकते. एके रात्री टॉर्टोइज मास्टरची चार वाक्यातली शिकवणी पो ला बरेच मानसिक बळ देउन जाते. त्याचवेळी बातमी येते ती 'ताय लंग' तुरुंगातुन पळाल्याची आणी त्या बरोबरीने टोर्टोइज मास्टरनी' आपला अवतार संपवल्याची.

'ताय लंग' ला रोकण्यासाठी 'फ्युरीअस फाइव्ह' त्याच्यावर एकत्र चाल करुन जातात, मात्र ह्या सर्वांना निष्प्रभ ठरवत 'ताय लंग' पिस व्हॅली मध्ये येउन पोचतो. पो त्याच्या समोर धैर्याने उभा राहु शकतो ? मास्टर शिफुची शिकवणी पो ला खराखुरा 'ड्रॅगन वॉरियर' बनवु शकलेली असते? ज्या पवित्र ड्रॅगन स्क्रॉलसाठी हा लढा चालु असतो, त्यात नक्की असते काय ? पो आपल्या सर्वात मोठ्या कमकुवतापणाचे सर्वात मोठ्या ताकादित रुपांतर करण्यात यशस्वी होतो का? ह्या सगळ्याची उत्तरे प्रत्यक्ष हा चित्रपट पाहुन मिळवण्यातच जास्ती आनंद आहे.

'ताय लंग'ने स्वत:ची करुन घेतलेली सुटका, 'फ्युरीअस फाइव्ह' बरोबर त्याची झालेली लढत अथवा शिफुने अगदी सोप्या पद्धतीने पो ला दिलेले ट्रेनींग हि सर्व दृष्ये खरोखरच दाद देण्याजोगी. २००८ साली निर्माण झालेला ह चित्रपट तंत्रज्ञान आणी सफाईत कुठेही कमी पडलेला नाही. ह्या चित्रपटाचे संगीत देखील चित्रपटाच्या वातावरणाला अगदी साजेसे. पो आणी त्याच्या 'फ्युरीअस फाइव्ह' मित्रांच्या ह्या पिस व्हॅलीला भेट देणे प्रत्येक चित्रपट रसिकासाठी अत्यंत आवश्यकच म्हणाना.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 19:29) .नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)
प्रेषक चेतन ( सोम, 03/08/2010 - 11:27) .रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा)
असो...
इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:
१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही. भारतीय खेळाडुला पाश्चात्य देशातिल अंपायर मुद्दामुन दंड करतात / आउट देतात असे ब्रेनवॉशिंग बीसीसीआयने केले, पण प्रत्यक्षात भारतीय खेळाडुंना पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही बीसीसीआयने, आणि विशेषतः सचिन तेंडुलकरनी केले नाही. ज्या आयपीएल मध्ये बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना उचलून धरल्याचा दावा केला, त्या स्पर्धेत अभारतीय खेळाडूंची आजची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या वीस वर्षात भारतातील खेळांच्या र्हासाचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ स्लेजींगचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट्मध्ये आणला. 'आयपीएल' मधील कित्येक चीअर गर्ल्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण सचिन तेंडुलकरला बाहेर करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी बीसीसीआयने भारतात प्रथम सुरु केली.
३. बीसीसीआयचे भारतीय कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. भारतात भारतीय माध्यमातून सुरु झालेल्या काही क्रिकेट स्पर्धांना (आयसीएल) पहिला विरोध बीसीसीआयचा होता.
४. सौरव गांगुली बीसीसीआयची ताकद ओळखण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयला ताब्यात ठेवणे त्यांला शक्य असूनही त्यानी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्याच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक लढाउ संघनायक' ही सौरव गांगुलीची ओळख फारशी खरी नाही. इतर क्रिकेट संघनायकांच्या मानाने त्यातल्या त्यात आक्रमक भाषा व काही स्पर्धांमध्ये उठबस एवढा फरक सोडला तर सौरव गांगुली आणि इतर क्रिकेट खेळाडु यांच्यात काही फरक नाही. 'अजित वाडेकर नंतरचा भारताचा उत्तम कर्णधार' हे सौरव गांगुलीचे वर्णन निरर्थक आहे.
६. धोनीला मिळणारा प्रतिसाद ही वीस वर्षे क्रिकेट पाहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. धोनी देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच उथळ आणि सवंग खेळ या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता वीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
बीसीसीआयने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. जडेजा, अझरुद्दीनपासुन स्टीव बकनरपर्यंतची उदाहरणे आहेत. मायकेल कॅस्प्रोविच हा तर फार पूर्वीपासून बीसीसीआयच्या हिटलिस्टवर असणार्या. त्यांला सचिन तेंडुलकरनी ज्याला 'खास स्ट्रेट ड्राईव्ह' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'झोडपुन' घेतले आहे. मायकेल कॅस्प्रोविचच्या या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
डिस्क्लेमिअरः हे लिखाण काल्पनिक आहे. (पण फोर्थ अंपायर आणि निखील बगळे बघुन डोक फिरतं हे नक्की)
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २
प्रेषक हैयो हैयैयो ( शनी, 03/06/2010 - 16:23) .असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २
वाचकमित्रहो,
नमस्कार! वणक्कम! वन्दनम! "असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १" ह्या स्फुटास मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे दुसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे.
तमिळ - जागतिक पातळीवर ’अभिजातभाषा’ म्हणून गौरविली गेलेली ही भाषा. मराठीभाषिकांच्या दृष्टीतून पाहावयाचे झाल्यास; मराठीभाषकांच्या समोर तमिऴभाषा ही संपूर्णत: अनाकलनीय आणि काहीशी चमत्कारिक अशी अवतीर्ण होते. तौलनिक भाषाभ्यास हा दोन्हीही भाषकांसाठी साहित्याचा परमानंद लुटता येण्याचे एक साधन होय. मराठीभाषकास ह्या भाषेच्या व्याकरणनियमांची / काव्यशास्त्रीय नियमांची थोडी तोंडओळख करून दिल्यास, ह्यातील चमत्कृती संपुष्टात येवून ती शिकण्यात गोडी वाटू लागू शकेल असे वाटते.
---
’उपक्रम दिवाळी अंक २००९ मध्ये लेख लिहाल काय’ अशी विचारणा करणारा व्यनि जेंव्हा आला, साधारण त्याचवेळी येथे मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर दिल हैं छोटासा ह्या गीताबद्दल लिहिले होते. ते असे -
अर्थपूर्ण आशय असलेलं एका वेगळ्याच परंतु तेवढ्याच फ्रेश ढंगातलं गाणं. एखाद्या फुलपाखरासारखं सुंदर आणि तेवढंच हलकंफुलकं! गाण्याचे शब्द, चाल आणि गायकी तर उत्तमच परंतु या गाण्याला १०० पैकी १०० मार्क जर कुठे द्यायचे झाले तर ते चित्रीकरणाला आणि वाद्यवृंद संयोजनाला. वाद्यवृंद संयोजन आणि त्यातले फिलर्स तर केवळ अफलातून! एरवी गाणं शुद्ध गंधाराधिष्ठित, कानांना शुद्ध गंधाराचं अगदी भरपूर सुख देणारं परंतु 'चांद-तारोको छुनेकी आशा' नंतरच्या 'आसमानोमे उडनेकी आशा..' या ओळीतला शुद्ध मध्यम केवळ आश्चर्यकारक, अद्भूत परंतु तेवढाच आनंददायी! गायलंयही अगदी अल्लडपणे. म्हटलं तर स्वच्छंदपणे स्वत:शीच संवाद साधणारं आणि म्हटलं तर एखाद्याला एखादी गोष्ट अगदी छान समजून सांगावी तसं!
बादलोकी मै ओढू चुनरिया, अपनी चोटी मे बांध लूं दुनीया!
क्या केहेने! सुंदरच लिहिलं आहे गाणं. आणि बांधलंयही तेवढंच छान. चांदतार्यांना छुणार्या आणि आसमानात स्वच्छंद उडणार्या या गाण्याबद्दल रेहमानला सलाम..!
कदाचित वाचकांस ही माहिती नसेल; की हे गीत हे मूळ काव्यरूपांत असून ते ७० च्या दशकात लिहिले गेले होते. श्री. एम एस विश्वनाथन ह्यांनी ते तमिळ दूरदर्शनसाठी संगीतबद्धही केले होते. श्री. मणिरत्नम ह्यांस त्यांच्या नायिकेच्या भावनांचे प्रकटीकरण करण्यास ही कविता उत्कृष्ट वाटली आणि ह्या कारणाने ह्या कवितेचे चित्रपटगीतांत रूपांतर झाले. असो! एका बाजूस ’उपक्रम दिवाळी अंक २००९ चा व्यनि वाचतांना दुसर्या बाजूस मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर सुंदरच लिहिलं आहे गाणं असे लिहिल्याचे पाहिले, आणि हिंदीत डब्ब केलेल्या रोजा चित्रपटातील चिन्न चिन्न आसै ह्या तमिळ गीताचा मराठी अर्थ आणि त्याचे काव्यात्मक रसग्रहण ह्या सार्यासंबंधी एकत्रितरीत्या लिहावे असा काहीसा विचार करून ह्याविषयी आतां लिहितो आहे...!
---
| मूळ तमिऴ लिपीमध्ये | देवनागरीमध्ये लिप्यंतरीत | मराठीभाषेमध्ये भावार्थ |
|---|---|---|
| சின்ன சின்ன ஆசை | चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै | छोटी छोटी इच्छा |
| சிறகடிக்கும் ஆசை | सिऱगडिक्कुम् आसै | पंख फडफडविण्याची इच्छा |
| முத்து முத்து ஆசை | मुत्तु मुत्तु आसै | (मोत्यासारखी) छोटी छोटी इच्छा |
| முடிந்துவைத்த ஆசை | मुडिन्दुवैत्त आसै | (शिंपल्यात बंद मोत्यासारखी - आजवर) बंद करून ठेवलेली इच्छा |
| வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை | वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै | शुभ्र चंद्रम्यास स्पर्शून त्याचा मुका घेण्याची इच्छा |
| என்னையிந்த பூமி சுற்றிவர ஆசை | ऎऩ्ऩै इन्द बूमि चुऱ्ऱिवर आसै | सारे हे विश्व फिरून पाहाण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]]... | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
| மல்லிகைப்பூவாய் மாறிவிட ஆசை | मल्लिगैप्पूवाय् माऱिविड आसै | मोगर्याच्या फुलामध्ये परावर्तित होण्याची इच्छा |
| தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை | तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै | हवेच्या झुळुकीस पाहून, (तिच्या गळ्यात) माळा घालण्याची इच्छा |
| மேகங்களை எல்லாம் தொட்டு விட ஆசை | मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै | सार्या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा |
| சோகங்களை எல்லாம் விட்டு விட ஆசை | सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै | सार्या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा |
| கார்குழலில் உலகைக் கட்டி விட ஆசை | कार्गुऴलिल् उलहैक् कट्टि विड आसै | केशरचनेमध्ये सार्या जगतास बांधून घेण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]] | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
| சேற்று வயலாடி நாற்று நட ஆசை | सेऱ्ऱु वयलाडि नाऱ्ऱु नड आसै | चिखलामध्ये पायांचे ठसे उमटवित सोडत चालण्याची इच्छा |
| மீன் பிடித்து மீன்டும் ஆற்றில் விட ஆசை | मीऩ् पिडित्तु मीण्डुम् आऱ्ऱिल् विड आसै | मासोळीस पकडून पुन्हा पाण्यात सोडून देण्याची इच्छा |
| வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக்கொள்ள ஆசை | वाऩविल्लैक् कॊञ्चम् उडुत्तिक्कॊळ्ळ आसै | इंद्रधनु परिधान करण्याची इच्छा |
| பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக்கொள்ள ஆசை | पनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक्कॊळ्ळ आसै | दवबिंदुंच्या आतमध्ये निजण्याची इच्छा |
| சித்திரத்தின் மேலே சேலை கட்ட ஆசை | सित्तिरत्तिऩ् मेले सेलै कट्ट आसै | भित्तिचित्रास साडी नेसविण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]]... | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
---
तमिळभाषेमध्ये एक नियम. जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते.
उदा.
१. एन पेयर हैयो. - माझे नांव हैयो.
२. इदु तमिळमोळियिन नियमम. - हा तमिळभाषेचा नियम.
३. चिन्न चिन्न आसै. - छोटी छोटी इच्छा.
वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत, जोपर्यंत एन पेयर हैयो ’इल्लै’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ’आहे’ असेच समजले जाते. दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’नाही’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’आहे’ असेच समजले जाते.
थोडक्यात कसे, की ’आहे’ असे निराळे सांगण्याची आवश्यकता शिल्लक नाही. हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. काही पाश्चिमात्य भाषाभ्यासकांनी ह्या वैशिष्ट्यास तमिळ समाजाच्या ’दुर्दम्य आशावादाचे मूळ’ असे म्हटले आहे. हे गीत चित्रपटाची नायिका रोजा हिच्या दुर्दम्य आशावादाचे एक काव्यात्मक चित्रण ह्या रूपांत येते. तिला हव्या असलेल्या जवळजवळ सार्याच गोष्टी तिला मिळणे केवळ अशक्यप्राय असूनही ती इच्छा करते. काहीशी स्वप्नाळू मागणी असली तरीही एका विलक्षण आत्मविश्वासाने ती त्या गोष्टी मागते. इच्छा म्हटले की मार्ग येणारच!
---
कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते. सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते. तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच, परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे. वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल, की प्रत्येक ओळीची दुसर्या ओळीशी यमकपूर्ति होते आहे. काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे, तो म्हणजे ’आसै’. ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा, की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे. तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत, ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल. खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची, परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री. तात्या म्हणतांत तसा एक ’फ्रेश ढंग’ येथे अनुभवण्यास मिळतो. एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात. चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्यास परत मिळवितेच नां? असो.
---
तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
---
एम एफ हुसेनांचे कतार नागरिकत्व
प्रेषक भास्कर केन्डे ( शुक्र, 02/26/2010 - 02:34) .एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत. अशातच या वादग्रस्त हुसेनांना कतारने नागरिकत्व देऊ केल्याच्या बातम्या द हिंदू सह टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात झळकत आहेत.
भारतीय नागरिकाने इतर देशांचे वा परदेशी लोकांनी भारताचे नागरिकत्व घेण्याच्या शेकडो घटना दररोज घडत असतात. मात्र एखाद्या इसमावर त्याच्या मायदेशात जर काही खटले चालू असतील तर त्या देशाचा आदर म्हणून इतर देश त्या इसमाला नागरिकत्व न देण्याचा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हणजे दुसर्या देशाला दिलेला एक संदेश समजला जातो.
अरबी देशांत भारतीयांना सहसा नागरिकत्व दिले जात नाही. या समजा बाहेर जाऊन व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलला डावलून कतारने ज्या इसमावर समाजाचा अपमान करणे, दंगल भडकवण्यासदृश साहित्य (चित्रे) प्रसिद्ध करणे, धार्मिक तेढ वाढवणे, सामाजिक तणाव वाढवणे अशा गंभीर अरोपांखाली अनेक खटले सुरु आहेत अशा इसमाला नागरिकत्व का दिले असावे?...
१. भारताला आम्ही जुमानत नाही. तसेच आमच्या अरब लॉबी मुळे भारत आमचे काही वाकडे करु शकत नाही असा माज.
२. भारतीय राज्यकर्त्यांकडे कणा नाही याची पूर्ण जाणीव.
३. आम्ही "सर्वच" भारतीयांना कनिष्ठ मानतो. पण काफिरांचा सर्व पातळीवर आपमान करणार्या भारतीय मुसलमानांना अरब देश भारताच्या कायद्यापासून वाचवतील असा संदेश देण्यासाठी.
४. 'भारतात अल्पसंख्यांकांच्या जीवाला धोका आहे' या पाकिस्तानी तसेच तथाकथित मानवतावाद्यांच्या लॉबींगला आकड्यांची मदत करण्यासाठी.
द हिंदूचे संपादक राम यांनी या घटनेवर टिपण्णी करताना असे म्हटले आहे की या महान चित्रकाराला आयुष्याच्या अंतिम कालखंडात मरण्यासाठी सुद्धा भारतात यायला जमत नसल्याने त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून कतारचे नागरिकत्व घ्यावे. का?
१. संपादक महोदयांना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलची वा त्यायोगे भारताच्या होणार्या नाचक्कीची माहिती नसावी.
२. संपादक महाशयांना भारताच्या इभ्रतीपेक्षा आपल्या स्नेह्यावरील खटल्यांची जास्त काळजी असावी.
वा आणखी काही?
अशा प्रकरणांत आपल्या देशाच्या विदेश मंत्रालयाकडून आपण काही अपेक्षा करु शकतो काय?
ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली
प्रेषक नितीनमहाजन ( गुरू, 02/25/2010 - 18:56) .स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही.
सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले:
तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची? मी मुक्ततेचे प्रतिक आहे.
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी||
माझ्यावर गरूडासारखे आकाशाचे राजे राज्य करतात आणि तू तर एक कैदी आहेस, तू माझ्यापर्यंत कविता लिहिण्यासाठी कसा पोहोचणार?
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||
आभाळाने सावरकरांना हिणवले, "तुझ्या पायात तर जड साखळदंड आहेत. मला विचारण्यापेक्षा तुझ्याजवळ असलेल्या जमिनीलाच का नाही विचारत? ती कदाचित तयार होईल तुझ्यासाठी कागद होण्यास."
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||
पण ती अंदमानातील कालकोठडीची जमीनही कदाचित इंग्रजांची बटिक झाली होती. तिनेही या स्वातंत्र्यसूर्याच्या विनंतीस मान दिला नाही.
यानंतर सावरकरांनी त्यांच्या बाण्यानुसार त्यांच्याकडे मदतीची याचना केली नाही.
अश्या वेळी या प्रतिभावान स्वातंत्र्यसूर्याची अवस्था कशी झाली असेल? सर्व जगावर संताप झाला. आकाश व जमीन यांचा प्रचंड राग आला. यामुळे डोळ्यात अश्रू आले, पण संतापामुळे त्यांच्या ठिणग्या झाल्या. हनुमानाने लंका जाळली तद्वत सर्व जग जळेल इतका संताप त्या डोळ्यातून व्यक्त झाला.
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||
मनात विचारांचे काहूर उठले. माझ्या कवितेचा हा प्रपात झेलालयला कोण तयार आहे? स्वर्गातून पृथ्वीवर गंगौघ येत आहे. कोण तयार आहे हा भार झेलायला? जर हिमालयासारखा कणखर व बलदंड आधार तयार नसेल तर ही गंगा या पृथ्वीवर येईल का?
तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रक्तन जसे इंद्रायणीच्या डोहात बुडणे होते, तसे तर माझ्या काव्याचे नाही ना?
पण अश्या वेळी अचानक एक चमत्कार झाला. त्या कालकोठडीच्या दगडाच्या भिंती पुढे सरसावल्या आणि म्हणाल्या:
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||
यापुढील इतिहास आपणास ठावूक आहेच.
--------------------------------------------------------------------------------
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ही अप्रतिम कविता लोककवी मनमोहन नातू यांची आहे.
कवी मनमोहन नातू यांनी ही कविता "सुनित" (SONET) या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अत्यंत आवडत्या काव्यप्रकारात बांधली आहे. सुनित हे १४ ओळींचे काव्य असते. कवितेच्या पहिल्या भागात एक कल्पना विस्तार असतो व पुढच्या भागात त्या कल्पनेला एकदम कलाटणी देवून शेवट केलेला असतो. याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात ही मांडणी ८ + ६ अशी असते तर दुसर्या प्रकारात १२ + २. सदर काव्य १२ + २ या प्रकारातील आहे.
वाचकांच्या सोईसाठी संपूर्ण कविता सलग परत देत आहे.
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||
माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||
पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||
दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||
-- लोककवी मनमोहन नातू.
--------------------------------------------------------------------------------
टीपः ही कविता आम्हाला इयत्ता ९वी च्या बालभारतीमध्ये अभ्यासाला होती. कविता मला खूपच आवडली म्हणून मी ती लिहून ठेवली. पण त्यात कडवे क्रमांक ६ नव्हते. अनेक वर्षांनंतर एका वर्तमानपत्रात ठाणे येथील श्री. भागवत यांच्यावर एक लेख आला होता (त्या लेखात त्यांचा दूरध्वनी क्रमांकही होता. पण आज माझ्याकडे नाही. मला मिळाला की लगेच मि. पा. वर देईन.). त्यांनी अंदमानातील सावरकरांच्या कोठडीत ही कविता कायमस्वरूपी लिहिण्याबाबत केंद्रसरकारशी बराच पत्रव्यवहार केला होता व त्याचे फलित म्हणजे आज ही कविता त्या कोठडीत लिहिली आहे. सदर लेखात ही सर्व कविता दिलेली होती. मी माझ्याकडील कवितेत नसलेले कडवे लिहून घेतले. कदाचित या ओळी वेगळ्या असू शकतील. जाणकारांनी सुधारणा करावी. या कवितेचे मूळ शीर्षक "ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली" असे आहे.
मनमोहन नातू यांची इतर काव्यसंपदा येथे वाचायला मिळेल. पण यात वरील कविता नाही. मनमोहन नातू हे त्यांच्या 'ती पहा बापूजींची प्राणज्योत', 'हळू हळू बोल कृष्णा' व 'राधे तुझा सैल अंबाडा' या कवितांच्यामुळे प्रसिध्द आहेत. ही कविता काहिशी अप्रसिध्द आहे.
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात.
नितीन
एक कप च्या - परीक्षण
प्रेषक फारएन्ड ( शुक्र, 02/12/2010 - 13:45) .'कला' या संस्थेने ६ फेब्रुवारी ला बे एरियात याचा खेळ ठेवला होता. त्याच बरोबर 'एक साधा प्रश्न' ही एक आणि डॉ जगन्नाथ वाणी यांच्या सामाजिक कार्याबद्दल एक अशा दोन छोट्या फिल्म्स ही बघायला मिळाल्या. दोन्ही छान आहेत.
'एक कप च्या' मला अतिशय आवडला. ज्यांना थिएटर मधे मिळणार नाही त्यांनी डीव्हीडी आणून जरूर पाहा. एकदम हलका फुलका, साधी कथा, सहज सोपे विनोद असलेला चित्रपट आहे.
चित्रपटाच्या सुरूवातीलाच वातावरण निर्मिती सुरेख केलेली आहे. किशोर कदम च्या कुटुंबातील वातावरण फारच मस्त घेतले आहे. कसलेही स्टीरीओटाईप न दाखवता, कसलीही अतिशयोक्ती न दाखवता आप आपल्या वयाप्रमाणे वागणारे या कुटुंबातील सर्वजण आपल्याला एका मिनीटात आवडतात. इतके प्रातिनिधिक कुटुंब मराठी चित्रपटात क्वचित दिसते, त्यामुळे पुढे दाखवले जाणारे प्रश्न आणि ते ते कसे सोडवतात या कथेला एकदम 'मास अपील' मिळतो. हा चित्रपट नेहमीसारखा रिलीज होउन चालला नाहीतर खूप आश्चर्य वाटेल.
कोकणातील एका खेड्यातील ही कथा. नायक किशोर कदम हा एस टी मधे बस कंडक्टर असतो, घरी बायको, चार मुले आणि म्हातारी आई. मुख्य कथा ही की या एका साध्या कुटुंबाला विजेचे बिल एकदम बरेच मोठे येते आणि नायकाला आपले काम सांभाळून वीज मंडळाकडून ते दुरूस्त करून घेताना काय अडचणी येतात आणि त्यावर ते सगळे कसा मार्ग काढतात याचे चित्रण आहे. या प्रयत्नात असताना त्याला गेल्या काही वर्षांत नवीनच लागू झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची माहिती होते. यात नायकाने त्याचा उपयोग करणे आणि त्यायोगे प्रेक्षकांना त्याची माहिती करून देणे हाही आणखी एक उद्देश असावा.
कोकणाचे अतिशय सुंदर चित्रीकरण आहे यात. एस टी तील त्याच्या नेहमीच्या दिनक्रमाचे शूटिंग आणि त्यात दाखवले गेलेले 'डिटेल्स' हे सुद्ध खूप आवडले. असे डिटेल्स सहसा फक्त इंग्रजी चित्रपटात दाखवतात. म्हणजे कंडक्टर्स, बस कंट्रोलर एकत्र उभे राहून कोणी कोणती बस घ्यायची ते ठरवतात, मग हा जाउन रोजची तिकीटे, नाणी वगैरे घेउन ड्यूटीवर जातो ते दाखवणे आणि त्यातील संवादातून नायकाची व्यक्तिरेखा उभी करणे हे ही खूप छान घेतले आहे. मराठी/हिन्दी चित्रपटात हे अपवादानेच दिसत असल्याने मुद्दाम उल्लेख करावासा वाटला. तेथील भाषा किती अस्सल आहे ते मला माहीत नाही पण बहुधा असावी.
कलाकारांमधे सर्वांचेच काम सुंदर झाले आहे. सर्वात चांगले अश्विनी गिरीचे (किशोर कदम च्या बायकोचा रोल), त्यांच्या घरातील वातावरण तिच्यामुळे आहे असेच नेहमी वाटते. किशोर कदम ने ही मस्त रंगवला आहे नायक. आपण भ्रष्टाचार करायचा नाही आणि कोणाला पैसे देउन काम करून घ्यायचे नाही असे ठाम मत असलेला नायक दाखवताना उगाचच "मै अपने आदर्शोंपे..." छाप भाषा नाही, उलट असेच वागणे नैसर्गिक आहे असे दाखवलेले आवडले. त्याचा मित्र मुस्लिम आहे, पण तो ही सामान्य माणूसच. तो चित्रपटभर "मित्र" या रूपातच वावरताना दाखवला आहे, तेथेही उगाचच हिरवे कपडे, अब्बूजान वगैरे प्रकार नाहीत, कारण त्याची येथे काही गरज नाही. किशोर कदमच्या चारही (!) मुलांची कामे मस्त. तो मित्र, म्हातारी आई, सरकारी कर्मचारी, एसटीतील इतर कर्मचारी, "फलाट" आणि कॅन्टीन चे वातावरण सगळे छान घेतले आहे. देविका दफ्तरदार चा ही रोल सुंदर आहे. अगदी दोष काढायचाच झाला तर त्या धाकट्या मुलीचा उत्साह जरा काकणभर जास्त वाटला. त्याचा मोठा मुलगा एक नाटकातील पत्रकाराची भूमिका करण्यासाठी त्याचे संवाद सतत पाठ करत असताना दाखवला आहे - काही शॉट्स मधे त्याचे संवाद आणि कथेतील शॉट यातून काहीतरी सांगायचा प्रयत्न असावा पण नीट कळाला नाही. फक्त एकदा तो घटनेने भारतीय नागरिकाला दिलेले अधिकार सांगताना वीज मंडळात यांची फाईल फिरताना/बंद होताना दाखवलेले आवडले.
वीज मंडळात मात्र काय चाललेले असते ते जरा आणखी खोलात दाखवले असते तर आवडले असते. हजारो लोक ज्यात काम करत असतात अशा ऑफिसेस मधे काही पद्धती/सिस्टीम्स असाव्या लागतात. त्यात काय दोष आहेत (कशामुळे हा प्रश्न सुटायला एवढा वेळ लागतो) वगैरेचे चित्रण जरा जड/कंटाळवाणे झाले असते म्हणून टाळले असेल.
मी हरिश्चन्द्राची फॅक्टरी पाहिला नाही, त्यामुळे तो किती चांगला आहे मला माहीत नाही, पण एका मोठ्या लोकशाहीत एका सामान्य नागरिकाला आपल्या अधिकारांची जाणीव होउन तो त्याचा कसा वापर करतो हे इतक्या मनोरंजक पद्धतीने दाखवणारा चित्रपट हॉलीवूड मधल्या लोकांना नक्कीच आवडला असता असे वाटते. अमिताभने एका ठिकाणी म्हंटल्याप्रमाणे ऑस्कर म्हणजे ऑलिम्पिक सारखी सर्वोच्च स्पर्धा नव्हे, ती केवळ एका वेगळ्या वातावरणातील वेगळ्या चवीच्या लोकांनी घेतलेली स्पर्धा आहे, पण जर आपण दरवर्षी पाठवत आहोत, तर त्यांना आवडू शकणारा असा चित्रपट पाठवायला हरकत नव्हती.
एकूण अतिशय सुंदर आणि हलका फुलका चित्रपट आहे, जरूर बघा!
नंतर एक आठवले - "कंडक्टर" (वीजवाहक या अर्थाने) चा वीज प्रवाह काढून घेणे यात लेखक-दिग्दर्शकांना काही श्लेष दाखवायचा होता की काय कोणास ठाउक 
सध्याचे वाचन - २
प्रेषक बट्ट्याबोळ ( मंगळ, 02/02/2010 - 01:46) .१. कर्णपिशाच्चं:
लेखकः बाळा फोंडके.
लेखन प्रकारः डिटेक्टिव्ह रहस्य कथा.
बाळूने साफ निराशा केली. कथा अतिशय टुच्च्या आहेत. दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत.
पुस्तकाच्या कव्हर वर काळ्या बॅकग्राउंड वर एका कवटीच चित्र आहे. त्याच प्रयोजन आजूनही समजलेल नाही. मला
पुस्तक हातात घेतल्यावर लय भारी वाटल होत. पण मी चू*त निघालो. २५० रुपयांना चूना !!!
२. आवरण:
लेखक: एस. एल. भैरप्पा. (कन्नड- अनुवादित)
प्रकारः कादंबरी-वैचारीक, ऐतिहासीक .
विस्मरणाने सत्य झाकोळलं जातं. त्याला आवरण म्हणातात. या थीम वर भैरप्पांनी सुंदर कादंबरी रचली आहे.
रझिया-पूर्वीची लक्ष्मी. आमिरशी लग्न करते. अधुनिक विचारांचा तिच्यावर पगडा असतो. त्यामुळे हिंदू काय किंवा
मुसलमान काय- काही फरक पडत नाही, तसेच हिंदू धर्मातील भोंगळपणाचा, जातीव्यवस्थेचा, कर्मठपणाचा तिरस्कार
म्हणून लग्नावेळी मुसलमान होते.
दोघांचा व्यवसाय: माहीतीपट, आर्ट मूव्हीज बनवणे.
तिला सतत प्रश्न पडत असतो की हंपी मधील देवळे भग्न का झाली? कोणी केली ? त्यावर एखादी डॉक्यूमेंटरी बनवता येइल का?
"शैव-वैष्णव युध्दामधे एकमेकांनी ती पाडली", "मुसलमानांना बदनाम करण्यासाठी त्याचे खापर मुसलमानांवर फोडले
जाते" अशा विचारांच्या "आवरणा" खाली वावरणा-या इंटलेक्चुअल ग्रूप मधे ती देखील असते.
नक्की सत्य काय आहे? कोणी पाडली ती देवळं ? मूर्ती कोणी फोडल्या ??
पुढे सांगत नाही. तुम्ही कादंबरीच वाचा. बरीच सरप्राईजेस मिळतील.
साहित्यीक द्रुष्ट्या देखील कादंबरी सशक्त आहे. लक्ष्मी च्या कथेमध्येच - वेगळ्या काखंडातल्या आणखी ३ वेगळ्या कथा गुंफून भैरप्पांनी
बाजी मारली आहे !! अशा पध्दतीने लिहिलेली कादंबरी मी तरी पहिल्यांदाच वाचली. त्यामूळे मजा आली.
कन्नथिल मुथ्थुमित्ताल ( २००२) ... राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट
प्रेषक भडकमकर मास्तर ( गुरू, 01/28/2010 - 16:36) .कथा पटकथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम....
हम्म्म....
दहशतवादाच्या आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा मणिरत्नमने यापूर्वी रोजा ( १९९३) , बॊम्बे ( १९९५) आणि दिल से ( १९९८) बनवल्या होत्या. त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड
म्हणून ) आणि दिलसे ठीकठाक वाटला होता... शेवट भलताच गुंडाळल्यासारखा वाटला होता..
बर्याच वर्षांपूर्वी एका मित्राने मला या "कन्नथिल मुथ्थुमित्ताल" सिनेमाबद्दल सांगितल होते, कोणत्यातरी फेस्टिवलमध्ये त्याने पाहिला आणि बघच म्हणाला होता....
मणिरत्नम आणि तामिळ दहशतवाद वगैरे म्हटल्यावर मी तोंडदेखले बरं बरं असे म्हटले होते... आता टेररिस्ट मंडळी , त्यांच्यात अडकलेला सामान्य माणूस किती निराळ्या पद्धतीने दाखवणार असं आपलं मला वाटत होतं.... पण काल चित्रपट पाहिल्यावरती आपली तर बोलतीच बंद झाली... अप्रतिम सिनेमा आहे...
( ... टाईम मासिकात आलेल्या सत्यघटनेवरून या सिनेमाची प्रेरणा घेतली आहे... एका अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या दत्तक मुलीची खरी आई शोधण्यासाठी फिलिपाईन्सपर्यंत प्रवास केला, अशी काहीशी ती कथा होती)
थोडक्यात कथा अशी...
चेन्नईमध्ये राहणार्या एका लेखकाला (आर. माधवन)आणि त्याच्या बायकोला ( सिम्रन) तीन मुले , त्यतली अमुधा ( कीर्तना) ही नऊ वर्षांची.... तिच्या नवव्या वाढदिवसाला तिचे वडील तिला सांगतात की ती त्याची मुलगी नाही, तिला दत्तक घेतले आहे. मुलीचे भावविश्व टोटल गंडते. आपली खरी आई कोण? आपल्या आईने आपल्याला का सोडून दिले असेल असे प्रश्न तिला सतावायला लागतात... आई शोधण्यासाठी मुलगी स्वत:च प्रयत्नाला लागते , ते पाहून मुलीसाठी तिचे दत्तक आईवडील तिची खरी आई शोधायचे मान्य करतात... त्यांना अर्थात खर्या आईचे नाव आणि श्रीलंकेतले एक गाव इतकेच ठाऊक असते. पुढे सुरू होतो, तुटपुंज्या माहितीवरचा श्रीलंकेतला प्रवास.....
हा सिनेमा दहशतवादावर काहीच स्टँड घेत नाही असा काहींचा आक्षेप आहे.. ( मला काही असे वाटले नाही... गोष्ट एका नऊ वर्षे वयाच्या मुलीची आहे, तिच्या आईला शोधण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आणि त्यांची होणारी भेट इतकाच आहे...
२००२ च्या या सिनेमाला ६ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली.
रजत कमळ उत्कृष्ट प्रादेशिक सिनेमा, संगीत ( रहमान) , गीत ( वैरामुथु), बालकलाकार ( कीर्तना) , सिनेमॅटोग्राफी ( रवि के चंद्रन).......

हॅप्पी फ्यामिली



माझी आई कुठाय?


मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन


प्रवास

आई सापडली??
ल्यापटापावर पाहतानाही सिनेमेटोग्राफी भारी वाटत होती, थिएट्रात तर काय होत असेल? बालकलाकार कीर्तना अप्रतिम.... मणिभाऊ पोरांकडून मस्त काम करून घेतात...
आप्ली सिम्रन ( पूर्वी फ़क्त हिच्यावर आम्चा फ़ार जीव ..टायपातली कामं करताना पाहिली होती...इथे ती चक्क उत्तम अभिनय करते)... रहमानचं संगीत नेहमीप्रमाणेच मस्त..... शिवाय या सिनेमात दलपती, रोजा,गुरू सारखं म्हातार्या खेडुत बायांचा नाच नाहीये ते एक बरं आहे....... दोन तीन गाणी अजिबात अनावश्यक... आम्ही पुढे ढकलून पाहिली... जालावर एका पाश्चात्य मानवाचे परीक्षण वाचले... तो म्हणतो ,'सिनेमा आवडला पण मध्ये मध्ये म्यूझिक व्हिडिओसाठी इतका वेळ थांबतात का देव जाणे..." 
हा पिक्चर सोडून आपण ऑस्करसाठी २००२ साली देवदासला पाठवले हे समजल्यावर मन भरून आले.... ( ०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा , असे एक मत वाचले.
मज्जा आली.. )
या सिनेमावर एका दत्तक मुलांसाठी काम करणार्या एन्जीओमधल्या एका ताईंनी प्रचंड शिव्या घातलेल्याही वाचल्या... ( हा सिनेमा पाहून आईवडील मुले दत्तक घ्यायला घाबरतील , यात दत्तक कोणाला घता येते यासंबंधी अपूर्ण माहिती आहे , वगैरेवगैरे त्यांचे आक्षेप होते...... चित्रपट पाहताना काही असे वाटले नाही, हे खरे...
चुकवू नये असा हा सिनमा आहे...
जरूर बघा...
अंत:स्थ
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( मंगळ, 01/05/2010 - 20:14) .एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे. प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथील महाविद्यालयातील मराठी विषय शिकवणारा तरुण प्राध्यापक.
'अंत:स्थ’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहात एकूण पन्नासहून अधिक कविता आहेत. कवितांची विभागणी करायची ठरली तर, पहिल्या काही कविता शेतीशी संबंधीत तर बाकीच्या कविता या सामाजिक विषयांवरच्या आहेत. मराठी ग्रामीण कवितेच्या भाषेवर बराच काथ्याकूट मराठी साहित्यात झालेला आहे. पुर्वी ज्याला जानपद काव्य असे म्हटल्या जायचे. त्या काव्याची भाषा कोणती असावी, भाषेचे स्वरुप कोणते असावे, वगैरे. या कवितासंग्रहात कवीने शेतीशी संबंधीत कवितेसाठी खेडवळाची भुमिका पार पाडली आहे. आणि त्यातूनच तो आपला विचार मांडतो. ’तुव्ह सपन लुटलं’ कविता पाहा-
आरं शेतकरी दादा तुही अजब कहाणी
भूक बांधुनी पोटाले पितो घोटभर पाणी.
...............
अरं शेतकरी दादा धान नेल रं आडती
घेऊन रं मातीमोल तुल्हे मातीत गाडता
अरं शेतकरी दादा तुव्ह आयुष्य घटलं
सुखी पाहता सपन सारं रघट आटलं
अरं शेतकरी दादा तुव्ह नशीब फुटलं
हातपदरीचा घास तुव्ह सपन लुटलं (पृ.क्र.१५)
शेतक-याचं सनातन स्वप्न की, शेतीतून येणा-या उत्पन्नाने भविष्यकाळ सुखाचा होईल. पण मोंढ्यावर धान्य नेल्यानंतर तेथील दलाल धान्यांना मातीमोल भाव मागतात. रक्त आटवून सुखी स्वप्न पाहिलं जातं ते स्वप्न दलालाकडून लुटल्या जाते. या व्यवस्थेकडे कवी निर्देश करतो. एकूण सर्वच शेतकरी हे जमीनीशी निगडित आहे. ती जमीन पावसावर अवलंबुन आहे. पाऊस हेच शेतक-याचं जीवन आहे. सतत आभाळाकडे पाहणारा शेतकरी हे तर वर्तमानपत्राचं आवडतं चित्र आहे. अशाच आभाळाकडे डोळे लावणा-या ’परंपरा’ नावाच्या कवित अशीच आहे. आभाळातील चांदण्याकडं पाहत शेतकरी स्वप्न पाहू लागतो. या वेळेस चांगला पाऊस होईल. पीकपाणी चांगले येईल. मी मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवीन. मुलगा साहेब होईल.मी गावभर फिरुन सांगेन 'मह्या पो-या सायेब झालाय’. पण दोन-चार सरी पडतात आणि शेतक-याचं स्वप्न ढेकळात विरघळून जातं. पाहता पाहता शेतक-याचं पोरगंही शेतकरीच होतो. आता बापाची जागा तो घेतो. पुन्हा सुखी जीवनाचं स्वप्न पाहतो. त्याचंही स्वप्न विरघळून जातं, अशी ती 'परंपरा' पुढेच चालूच राहते. ’मातीशी नातं’ ’कष्टाचं वान’ ’आस’ ’शाप’ ’रान मातीची कहाणी’ ’आसवांचा महापूर’ या अशा कवीतेतून शेती आणि शेतक-याच्या प्रश्नाभोवती त्यांची कविता फिरतांना दिसते. असे असले तरी, शिवारातील शेतकर्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं अशी कविताही या काव्यसंग्रहात आहे. उदा. हिरवा शालू-
राज्या-परधान्या
जुंपली तिफन
दुबार पेरणं-माळरानी
फुटले अंकुर
शेवाळलं रान
पावसाचं गाण-शिवारात
...............
…...........
हिरवा शालू
शेती अंथरला
शब्द मंतरला-तिन्हीसांजा
शालू हिरवा नटली धरती
मनाला भरती-कुणब्याच्या. [पृ.क्र.१८]
शेतीभातीच्या कवीतेनंतर कवीचं मन समाजातील व्यवस्थेकडे वळतांना दिसते.’पुरे झाले आता’ कवीतेत धर्म, संस्कृती, देव, धर्मसुत्र या सर्व गोष्टींनी मानवतेचे लचके तोडले जाते असे कवीला वाटते. दगडाच्या देवाला किती मानपान आहेत. पण माणसाला काय ते दारिद्र्य. नैवेद्य,नवस, पुर्ण करण्यासाठी किती ही माणसांची धावपळ. धर्म, वेद, यांनी माणूस संमोहित झाला आहे. आणि या अस्त्राद्वारे सामान्यांना लुटण्याचे एक कुरण प्रस्थापितांकडे आहे. कवी म्हणतो-
पुरे झाले आता
देव्हारे माजविणे
पाषाण पूजविणे-मंदिरात
माणूस माझा देव
मानवता तो धर्म
माणुसकी ते कर्म-माणसाचे. [पृ.क्र.२८]
हिंदू धर्मातील काही चालीरिती, परंपरा, याची चिकित्सा कवी करु पाहतो. सामाजिक परिवर्तन कवीला अपेक्षीत आहे. माणूसकी धर्म श्रेष्ठ आहे, या वर कवीचा भर आहे. धर्म-कर्माच्या व्यवस्थेमुळेच इथे विषमता निर्माण झाली असे कविला वाटते. इथे कवीची भुमिका ही सुधारकाची दिसते. 'ठेवीले अनंते तैसेचि राहावे' या मानसिकतेला बदलण्याचा विचार कवी व्यक्त करतो. त्यांची ’ 'सत्यधर्म’ नावाची कविता बोलकी आहे. शतकानुशतके खुळचट धर्माच्या कल्पना लादून समाजमनाला पंगु बनवल्या गेलं. दगडांना शेंदूर फासवून त्यांनी भोगस्थाने निर्माण केलीत. आता ही शेंदरी दैवते लाथाडली पाहिजेत. भ्रामक धर्मशाही उलथवली पाहिजेत. आणि तुका, फुल्यांनी, सांगितलेला 'सत्यधर्म' जाणुन घेतला पाहिजे. अशाच पुरोगामी विचाराने भारल्या गेलेल्या कविता या संग्रहात वाचायला मिळतात. 'तुकोबा तुझेही हात सनातनी असायला हवेत’ ' सनातनी पहाटेचं सावट' 'दिवसही वै-याचा आहे’ या कवितांमधून कवी आधुनिक विचारांशी नातं सांगतो. काही कविता राजकारणावरही आहेत.’बाबा हो लोकशाही’ कवीतेत कवी म्हणतो-
सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..
.................
…...........
पाच वर्षानंतर फेरी येते,
ज्या हातानं, आमची मुस्काट दाबली,
भाकरी हिसकावली
तीच हातं
आमच्यासमोर जोडली जातात
झोळी पसरुण भीक मागतात अन
कर्णालाही लाजवेल असे आमुचं औदार्य
दिसून येतं
पुन्हा एकदा जैसे थे
लोकशाही बाबा लोकशाही.[पृ.क्र.५०]
’अदिमाचा हुंकार-शब्द’ ही कविता अधिक सुंदर आहे. शव्द उठवतात रान, शब्द पेटवतात रान, शब्द जीवनगाण कधी, शब्द वरवरचा उमाळा कधी. ही दीर्घ कविता या काव्यसंग्रहाची सर्वांगसुंदर कविता ठरावी. 'लोकशाहीचं गाणं’ 'गुलामीचं हस्तांतर' 'हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतोय' या आणि अशा अनेक कविता व्यवस्थेबरोबर स्वार्थी राजकारणावर भाष्य करतांना दिसतात. तसेच ढोंगी परिवर्तनवाद्यावरही ते आसुड ओढतात. परिवर्तनाच्या नावाखाली परिवर्तनवादी शोषण करीत आहेत. दांभिक लोक, लोकशाहीच्या नावाखाली लोकांची लूट करत आहेत. त्यावरही कवी प्रहार करतो. कवी म्हटला की, आईवर कविता ही आलीच पाहिजे. 'माय माऊली' 'मायमही' 'सकळांची आई' अशा कविताही वाचनीय आहेत. एकूण काय तर वर्तमानाचं भाष्य कवितेत आहे. स्वातंत्र्य आणि त्याच्या सुखाच्या कल्पनांना तडा गेल्यानंतरची वेदना कवितेत आहे तसा विद्रोहही आहे. सामान्य माणसाच्या सुखाचा शोध कवीला घ्यायचा आहे. भावना भडकविणारी वृत्तपत्र, स्त्री देहाचे नागडे दर्शन घडविणारे प्रसारमाध्यमं भारताची प्रतिमा होत आहेत. सामान्य माणसाच्या स्वप्नभंगाची भावना कवितेतून वाचायला मिळते. असे असले तरी काही दोष ज्याकडे लक्ष वेधले पाहिजे असे वाट्ते की, धनदांडगे शेतकरी सोयी-सवलती घेतात त्यावर भाष्य दिसत नाही. मोजक्याच शेतक-यांचं चित्र, तेच-तेच दयनीय अवस्थेतील शेतक-याचं वर्णन असा विचार कविता वाचतांना डोकावतो. तसेच परिवर्तनाची आस आक्रस्ताळपणे येते, असे काही कविता वाचतांना जाणवते. अशी कविता म्हणून मी ’हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतो’ ’आव्हान’ ’परिवर्तनवादी’ अशा काही कवितांचा नामोल्लेख करेन. बहुतांश कविता मुक्तछंद आणि अभंगाच्या आकृतीबंध असलेल्या आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची कवीतेवर भाष्य करणारी प्रस्तावना आहे. कवितेचा संदेश 'माणूसकी' आणि संघर्ष’ आहे. आणि याच भावना अधिक संवेदनशीलतेने, पुढील काव्यसंग्रहात अधिक जबाबदारीने याव्यात या करिता मी कवी मित्राला शुभेच्छा देईन.

'अंत:स्थ'
डॉ.सर्जेराव जिगे
चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
किंमत ८०/- रु.


