समीक्षा

७०० बिलियन डॉलर !

७०० बिलियन का व कश्यासाठी ह्यांची काही उत्तरे !

1. अर्थव्यवस्था बरबाद होण्यापासून वाचवणे

इमरजेंसी इकनॉमिक स्टेबलाइजेशन एक्ट 2008 च्या खाली अमेरिकन वित्तमंत्री ला ७०० अरब डॉलर दिले जातील.
ह्या पैशाचा उपयोग ते कर्ज व संपती विकत घेण्यासाठी करतील ज्यांच्या मुळे अमेरिकन फाइनांशियल इस्टिट्यूशंस ची चांगलीच वाट लागली आहे.. व ज्यामुळे छोट्यामोठ्या उद्योजकांना आपला व्यवसाय चालवण्यात अडचणी येत आहेत.. लोन मिळत नाही आहे , ह्या गोष्टी मुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल.

2. लोकांना बेघर होण्यापासून वाचवणे.

इमरजेंसी इकनॉमिक स्टेबलाइजेशन एक्ट 2008 च्या अंतर्गत जे कर्ज डुबत आहे त्याला मोडीफाई करण्याचा अधिकार देखील आहे, कर्ज देणा-याने हे न पाहताच कर्ज दिले की घेणारा परत करु शकतो की नाही अश्या काही कर्जांची जिम्मेदारी सरकार घेईल.

3. जो सामान्य टॅक्स पेयर आहे त्याची काळजी घेणे.

शेयर मार्केटच्या चुकांची किमत सामान्य टॅक्स पेयर ला चुकवावी लागू नये ह्यासाठी अशी व्यवस्था केली गेली आहे की ज्या कंपन्या बुडाल्या आहेत त्या पुढे कधी फायद्यात आल्या तर त्याचा लाभ सामान्य टॅक्स पेयर ला देखील मिळो !

4. एक्जिक्यूटिव ना ताळ्यावर आणणे

ज्या एक्जिक्यूटिव च्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला त्यांना आपली बँड एसेट सरकार च्या डोक्यावर ठेवण्याची सुट मिळू नये.. व एक्जिक्यूटिव ह्यांची सामान्य पगार देखील सरकार तय करेल.

5. पैसे कसे खर्च केले जातील.

इमरजेंसी इकनॉमिक स्टेबलाइजेशन एक्ट च्या अतंर्गत सगळी रक्कम एक साथ न देता तुकड्या तुकडया मध्ये दिली जाईल.
आधी २५० अरब डॉलर दिले जातील त्या नंतर राष्ट्रपती सांगतील की अजून किती रक्कम हवी व कोठे वापरण्यासाठी हवी तेव्हा १०० अरब डॉलर व नंतर ३५० अरब डॉलर अश्या पध्दतीने दिलेले जातील व ह्यासाठी अमेरिकन कांगेसला विचारावे लागेल त्यांना !

डोक्यात जाणार्‍या जाहिराती

शितलनी मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती हा धागा सुरु केला. त्याचबरोबर अशाही काही जाहिराती असतात ज्या अगदी डोक्यात जातात. समोरचा प्रेक्षक मुर्ख आहे, त्याला काही समजत नाही हे गृहीत धरून केलेल्या जाहिराती. मी मला आठवणार्‍या अशा जाहिराती सांगतो; तुम्ही पण तुमच्या डोक्यात जाणार्‍या जाहिराती सांगा.

१) हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) डोकं फिरवतात. नेमकी ती जाहिरात जेव्हा जेवायला बसलेलो असतो तेव्हाच लागते

२) विसा पॉवर: शंकर-एहेसान-लॉयनी केलेली अतिशय टुकार जाहिरात.

३) बीएसएनएलः प्रीती झिंटाला पहायला मुलाकडचे आलेले असतात. सगळं विचारुन झाल्यावर मुलीकडचे मुलाकडच्यांना फोन नंबर मागतात. तेव्हा मुलाचे वडील मोबाईल नंबर सांगायला सांगतात. तेव्हा प्रिती म्हणते की ते तुम्हाला लॅंडलाईन नंबर मागतायत. आमच्याकडे लॅंडलाईन नाही असं म्हटल्यावर ती उचकते आणि मुलाकडच्यांना ठणकावून सांगते "जिस घर मे बीएसएनएल लॅंडलाईन नही उस घर में मै शादी नही करुंगी"..

४) एमडीएचः ह्या जाहिरातीत त्या कंपनीचा अध्यक्ष चालत येताना दाखवला आहे. म्हातारा, मिशा वाढवलेला असा. त्यांना कोणी दुसरा बरा मॉडेल नाही का मिळाला? त्याच्याकडे पाहून कोण हे मसाले विकत घेणार आहे?

बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]

[प्रस्तावना - या लेखाचा पहिला भाग येथे वाचता येईल. हा (थोडा रुक्ष) भाग, झाडांचा चेतनागुणोक्ती अलंकारात झालेल्या साहित्यातील उपयोगाविषयी आहे, आणि उदाहरणार्थ द.भा. धामणस्कर, रेगे, बोरकर यांच्या काही कविता उद्धृत केल्या आहेत.]

माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रुपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे. पण याचं 'मूळ' काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्‍या, खुरटणार्‍या, बहरणार्‍या आणि उन्मळून पडणार्‍या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली, ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले; तो क्षण 'मा निषाद'च्याच तोडीचा असावा. आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही.

ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला असावा. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं 'रोपण' वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं.

'जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा' म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अशा 'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव' सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनी अवस्थेचे वर्णन 'चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड' अशा शब्दांत करणारे गदिमा; 'प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात 'वेली ऋतुमती झाल्या गं' असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले' अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी; निष्पर्ण तरुंच्या राईत 'झाडांत पुन्हा उगवाया'ची आस लागलेले ग्रेस; 'आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे' अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिर-तंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्‍या राधेला 'जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न' म्हणणारे पु. शि. रेगे; 'ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही' असं लिहून जाणारे महानोर; 'रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल' असे रोखठोक वर्णन करणार्‍या विंदांचे 'उगाचफूल'; काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग लिहिणारे दासू वैद्य; 'नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे' म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, 'कोसला'मध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून - 'खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?' असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला 'गर्भश्रीमंतीचे झाड' म्हणणार्‍या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रुपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील 'आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः' अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या 'तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए' पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.

...

जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्‍या अंकुराला पाहून, 'सोसंल का त्याला, ऊन वारा पानी' म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भि. धामणस्कर त्यांच्या 'बरेच काही उगवून आलेले' मधल्या 'केळीचे पान' या कवितेत म्हणतात तसे -

...तर हिरव्या पाना
अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं
सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं
शैशव उलगडत जाताना मी
किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे
तुला नीट सांगताही येणार नाही आता मला...
सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात
अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा
क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत...
आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा
तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी
बराचसा कृतार्थ तुझा
आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही
पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही -
तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता
कधीही सुरुवात होईल म्हणून...

मला दिसते आहे, प्राणपणाने
जपावे असे काही तुझ्यात - तू
एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;
या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र
माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते
त्यांचेच...

स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत 'गृहिणी सखी सचिवः' च्या जोडीला आईपण शोधणार्‍या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची 'शेवगा' ही छोटेखानी कविता.

दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.

'सा विद्या या विमुक्तये' सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या 'परिपक्व' झाडांसारखेच -

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही...

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...

कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि 'मिड-लाईफ'मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते ('दोन मेणबत्त्या'मधील दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. 'स्वतःला विसरून दुसर्‍यांसाठी जगा' पेक्षा 'स्वतःबरोबरच दुसर्‍यांनाही आनंद देत जगा' असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच 'बाणा कवीचा' दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.

कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी

कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी

पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ

भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे

व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ

उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्‍या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा' समजूतदारपणा. 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर -

कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात

अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते -

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...

[समाप्त]

चतुर- प्रकाशचित्र समीक्षा

मित्रहो,

मी मध्यंतरी कोल्हापुर सोलापुर असा दौरा करुन आलो. त्यावेळी सोलापुरात भरपुर चतुर दिसले होते. त्यांचे फोटो काढणे हे अम्मंळ कठीण काम.
ते एका जागी स्थिर नसतात. पण एक चतुर घराबाहेरच्या जास्वंदीच्या पानावर विश्रांती घेत असल्याचे दिसले. म्हणुन मी हा फोटो काढला.
मला फोकल लेन्थचा फन्डा अजुन कळालेला नाहिये. फोटो काढताना फोकल लेन्थ कशी कळेल???
त्यामुळे हा फोकसिन्गचा त्रास होतोय की मला अजुन माझ्या कॅमेर्‍यातील मॅन्युअल फोकसीन्गची
व्यवस्था कळाली नाही हेच समजत नाही. पण मला स्वःताला अस वाटतय की हा फोटो अजुन चांगल्या प्रकारे फोकस व्हायला हवा होता.
तुमच काय मत आहे???

हा फोटो मी पिकासामध्ये क्रॉप केला आहे. बाकी काही त्यात फेरफार केलेले नाहीत.
पण हा जालावर चढवताना ह्याची मेमरी साइझ कमी व्हावी म्हणुन पेन्ट मध्ये इमेज स्ट्रेच / स्क्यु असा ऑप्शन आहे त्यात जावुन ५० % ५०% कमी केला आहे.
त्यामुळे जरी ह्याची मेमरी साइझ कमी झाली असली तरी प्रत्यक्ष फोटोची देखील साइझ कमी झाली आहे.
म्हणुन परत कॅमेर्‍यात मुळ फोटो पहात होतो पण तो मी डिलीट केला होता.
असो.
ह्या फोटोची एक्जिफ इन्फॉ.

Camera: SONY
Model: DSC-H7
ISO: 400
Exposure: 1/20 sec
Aperture: f/3.2
Focal Length: 14.1mm
Flash Used: No
Latitude: n/a
Longitude: n/a
hand held

बरेच काही उगवून आलेले...[भाग १]

झाडांबद्दल मराठीत शेकडो लेख, कविता आल्या असाव्यात. बोरकरांच्या किंवा अलीकडे द. भा. धामणस्करांच्या कविता वाचताना, घासून गुळगुळीत झालेल्या ह्या रूपकालाही नवीन रूपडं कसं बहाल करता येतं, हे जाणवतं. सगळं आयुष्य शहरात गेल्यामुळे असेल, पण 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे' वगैरे आतून मला कधीच वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांत झाडांची वेगवेगळी रूपं पाहिली. इतकी भिन्न, इतकी वेधक की अगदी अट्टल शहरी माणसालाही त्यांच्यात रस निर्माण व्हावा. त्यांच्याबद्दल लिहून, त्यांना न्याय द्यायचा तर तेवढीच अलौकिक प्रतिभा हवी. तिचा अभाव असला, तरी पूर्वसुरींनी जे काम करून ठेवलंय ते अधूनमधून आठवत होतं. ही कदाचित - लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ सारखी आस्वादाची दुहेरी प्रक्रिया असावी. म्हणजे क्वचित कधी सरत्या संध्याकाळी जसं 'कहीं दूर जब दिन ढल जाये' आठवतं किंवा पावसात 'ओ सजना'/'रिमझिम गिरे सावन' डोक्यात प्ले होऊ लागतं; त्याच्या उलट सारे प्रवासी घडीचे किंवा शंकर पाटलांच्या कथा वाचताना आपला गाव आठवतो किंवा लंपन वाचताना आपणही लहानपणी असाच बर्‍याचदा मॅडसारखा विचार करायचो असं वाटत राहतं. रोजच्या जगण्यात अचानक एखाद्या कलाकृतीची आठवण व्हावी आणि कधी काही वाचताना, ऐकताना 'स्मरणाचा उत्सव जागून' विसरलेलं काही पुन्हा आठवावं - ही जोडी तशी रंजक आहे.

अर्थातच, हे नेहमी होणे नाही. तसं झालं तर त्यातली उत्स्फूर्तता, मजा निघून जाईल. त्यामुळे झाडं पाहून आठवलेल्या त्या एक-दोन कविताच फक्त लिहिण्यापेक्षा एकंदरीतच सापडलेले झाडांचे उल्लेख एका लेखात लिहावेत असं जेव्हा प्रथम डोक्यात आलं; तेव्हा हे कृत्रिम तर होणार नाही ना, ही शंकाही जोडीनेच आली. पण त्या एखाद-दोन क्षणांचा कल्पनाविस्तार केला तर इतरांनाही कदाचित त्यात काही ओळखीचं सापडेल, असंही वाटलं. त्यामुळेच हे - 'बरेच काही उगवून आलेले...'

...

दहिसरचं मुंबईकरण होण्यापूर्वी अनेक वेगवेगळी झाडं पहायला मिळायची. शाळेला जायच्या रस्त्यावर पांगारा आणि अमलताश होते. ग्रीष्मात अनुक्रमे लाल आणि पिवळ्या रंगांत फुलून यायचे. ठिकठिकाणचे गुलमोहर, देवळाकडचं पार असलेलं पिंपळाचं झाड, गुंजाची - बदामाची झाडं, सुबाभूळ, अशोक आणि कितीतरी नाव माहीत नसलेली फुलझाडं - दहिसरचं दहा वस्त्यांचं गाव हे वर्णन सार्थ ठरवत.

शाळेच्या इमारतीतून मैदानापलीकडचं खाचर दिसायचं. गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. पण शाळा म्हटली की, प्राथमिक शाळेच्या जवळचं एक झाड आठवतं. त्याच्या अंगाखांद्यावर 'रम्य बाल्य ते जिथे खेळले' पासून त्या तरूतळी 'तसव्वुर-ए-जानाँ किये हुए' करत बसून राहण्यापर्यंतची सर्वांची प्रगती, तशी त्याच्याच जोडीने झाली. मित्राने एक अतिशय जुना फोटो पाठवल्यावर या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. यंदाच्या फेरीत हे झाड दिसलं नाही, पण त्याच्या नसण्याने काही विशेष वाटलंही नाही. जुनी इमारतच मोडकळीला आल्याने वर्गही नवीन जागेत भरू लागले होते. तेव्हापासून त्याचं प्रयोजनच संपलं असावं.

ग्रँटरोडच्या चिखलवाडीच्या चाळीत मात्र झाडांचं इतकं कौतुक करायला कुणाला सवड नसे. नाही म्हणायला नानाचौकाकडून चौपाटीकडे जाताना मणीभवनच्या गल्लीत हिरवीगच्च झाडे दिसत. त्या रस्त्याचे नावही रसिकतेने लॅबर्नम रोड, म्हणजे बहावा/अमलताश मार्ग ठेवलेलं. मागे जसं फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचं 'मुदण्णा शेट्टी मार्ग'(!) म्हणून नामकरण झालं; तसंच लॅबर्नम हे कुण्या इंग्रजाचं नाव असल्याने (बापूंच्या वास्तव्याने पुनीत इ. झालेल्या) मणीभवनकडच्या त्या रस्त्याचं नावही बदलण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला होता. सुदैवाने तो बेत तेव्हा तडीस गेला नाही.

झाडांबद्दल लिहित असताना कोकणातल्या झाडांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्यच. लेकुरवाळा फणस. काजूची बुटकबैंगण झाडं, करवंदीच्या जाळ्या, रातांबे नि जामाची झाडं. हापूस-पायरी-रायवळ-माणकुराद आंब्यांची कैक झाडं. आंबा पिकून जाळीत पडल्याचा आवाज आल्यावर, भावंडांबरोबर शर्यत लावायची आणि ज्याला प्रथम सापडेल त्याने तो खायचा. 'आठवणींच्या चिंचा गाभुळ' ऐकलं की चिंचांऐवजी, त्या आंब्यांचीच चव आठवते. फुलझाडांची तर गणतीच नाही. पण तळकोकणात काय किंवा गोव्यात काय; ज्याला व्यवच्छेदक म्हणावं असं झाड म्हणजे नारळाचं. हिरवं मोकळं खाचर आणि त्याच्या कडेला असलेली माडाची झाडं काय सुरेख दिसतात. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे, असं ते पाहून वाटत राहतं. मंगेशी-शांतादुर्गेच्या देवळाबाहेरच्या तळ्यांवर हिरवी सावली धरणारे माड मात्र तसे गंभीर. अर्थात, हे झाड खरे पहावे ते किनार्‍याजवळ. माडांशिवाय कुठल्याही किनार्‍याला शोभा नाही, हे पुलंचं मत इकडचे भुंडे किनारे पाहिले की पटतं. रेड्डीच्या महागणपतीकडे जाणारा रस्ता सुंदर आहेच, पण तितकाच देवळापाठचा किनाराही. लाल माती, हिरवी झाडी आणि समोरची निळाई.

Reddy

...

इथल्या प्रवासांत वेगवेगळी झाडं पहायला मिळाली. आधी अनोळखी, अपरिचित वाटणारी. हळूहळू सवयीने मग थोडीफार ओळखीची झालेली. शिकागोला दोन वर्षांपूर्वी भर थँक्सगिव्हिंगच्या (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) गेलो होतो. तपमान शून्याच्या बरंच खाली. नुकताच बर्फ पडून गेलेला. भणाणत्या वार्‍यामुळे आणि अपुरे गरम कपडे आणल्याने गोठलेला मी. अशा वेळी चालताना एक वळण घेतलं, आणि अनपेक्षितपणे दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राई समोर आली.

Sears tower Snow-fall 050

पुढे कधीतरी जेव्हा पु. शि. रेग्यांची 'गंधरेखा' वाचली, तेव्हा - एक आहे झाड माझे, रांठ ज्याच्या जीर्ण शाखा; साठीषण्मासी परंतु लाख ज्या येती शलाका - या ओळीवर अडखळून हीच झाडं पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.

एक आहे झाड माझें रांठ ज्याच्या जीर्ण शाखा;
साठिषण्मासीं परंतु लाख येती ज्या शलाका

झाड माझें लाल ज्याला आग्रहाची लाख पानें;
आणि माझी बंडखोरी घोषतों मी गात गाणें.

झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें.

एक, ज्याला जाणिवेच्या लांच्छनाच्या गंधरेखा;
पाहतों मी ज्यात माझें झाड, माझ्या आणभाका

ग्रेसच्या बर्‍याच कवितांसारखाच या कवितेचा अर्थ बिनचूकपणे सांगणे अशक्य आहे. पण हट्टाने बंड करुन, जगाशी सारे संबंध तोडून आपल्या कोशात राहिलेल्या - वेळोवेळी ती आग्रही लाल पानांची तुसडेपणाकडे झुकणारी बंडखोरी मिरवणार्‍या; एखाद्या वठलेल्या खोडासारख्या माणसाला काही कारणाने, अवचितपणे 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' सारखी पालवी फुटावी (नेणतां ये एक ज्याला शुभ्र काही जीवघेणें) आणि ती हवीहवीशी वाटली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने त्या गंधरेखेबद्दल थोडी शरम वाटावी, असं काहीसं. थोडक्यात 'ऍज गुड ऍज इट गेट्स' मधली जॅक निकल्सनची तुसड्या, विक्षिप्त लेखकाची ऑस्करविजेती भूमिका. झाडांवर झालेल्या मानव्याच्या आरोपाबद्दल (चेतनागुणोक्ती अलंकार) पुढे लिहीनच, पण 'पाहतों मी ज्यात माझें', असं हे रेग्यांचं झाड त्याचं उत्तम उदाहरण ठरावं.

...

शिकागोतल्या या झाडांसारखी इतर अनेक झाडं भटकंतीत सापडत गेली. स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कमधलं वार्‍या-पावसात करकरणारं 'कराल' झाड. सॅन फ्रान्सिस्कोजवळचं प्रसिद्ध 'द लोन सायप्रस' आणि त्याच्या शेजारी दुर्लक्षलेलं 'देहा फुटले वारा फांटे, अंगावरचे पिकले कांटे, आभाळांत खुपसून बोटें' उभं असणारं 'घोस्ट ट्री'. ब्राईस कॅन्यनमध्ये 'खडकावरील अंकुरा'सारखं उगवून आलेलं एकुलतं एक झाड. रेडवूडमधली गाढ हिरवी शांतता, सिकोयामधले प्रचंड घेराचे प्राचीन वृक्ष. 'शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावयां' होण्यापूर्वी बॉस्टनजवळ झाडांवर पाहिलेला रंगांचा उत्सव. स्वप्नात केलेला प्रवास वाटावा, अशा कोलोरॅडोतल्या एका रेल्वेप्रवासात दोन्हीकडे पिवळ्या-लाल रंगांच्या पानांच्या झाडांनी भरून गेलेले डोंगर. पेट्रिफाईड नॅशनल फोरेस्टमधली 'माझ्या मना बन दगड' म्हणून चक्क दगड बनलेली झाडं. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.

पण या सर्वांत विलक्षण असेल तर ते आर्चेस नॅशनल पार्कमध्ये पाहिलेलं एक झाड. यूटाहमधल्या या अप्रतिम राष्ट्रीय उद्यानात 'फिएरी फर्नेस' म्हणून एक रेंजर-गायडेड, अर्थात उद्यान अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालीच होणारा ट्रेक आहे. त्या ट्रेकदरम्यान रेंजरने एक झाड दाखवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या खोडाच्या मध्यावर वीज पडून त्याच्या जळून जवळपास चिरफळ्या उडाल्या होत्या. पण जगण्याची इच्छा इतकी चिवट असते, की मृतप्राय झालेल्या त्या खोडालाही पुन्हा पालवी फुटली.

Day 6 Arches 1 054

एकाच या जन्मी, फिरुनि नवे जन्मलेल्या; पोटात वीज थिजवून उभ्या असलेल्या, जागेपण गिळून उभे असेपर्यंत वाढणार्‍या ह्या गूढ, जायबंदी झाडाला बोरकरांची ही कविताच न्याय देऊ शकते.

झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड

झाड पाताळ फोडिते, झाड आकाश वेढिते
ताळमूळ संसाराचे गाठीगाठीत जोडिते

झाड वाकडे-तिकडे, छेडी फांद्यांची लाकडे
वीज थिजवून पोटी, वारी मेघांचे साकडे

झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जायबंदी
घावाघावातून गाळी, फुले ज्वा़ळांची जास्वंदी

झाड माझे वेडेपिसे, उन्हीं जळताना हसे
रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे

वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते
गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते

...

(अखेरचा भाग या गुरूवारी)
[हाच लेख येथेही वाचता येईल.]

अतिलघुकथास्पर्धा

नमस्कार,

मिसळपावाचे दुसर्‍या वर्षात पदार्पण झाले आहे, त्यानिमित्त ह्या संकेतस्थळावर वैविध्यपूर्ण लेखन होऊन इतर संकेतस्थळांपेक्षा येथे काही तरी वेगळे घडावे, ह्या इच्छेने ह्या स्पर्धेची घोषणा करतो आहे.

स्पर्धा अत्यंत सोपी आहे.

आपल्याला "अतिलघु कथा लिहायची आहे".

स्पर्धेचे नियमः

१. कथा ह्या धाग्याच्या प्रतिसादातच यायला हवी. व्यनिने अथवा खरडीतून पाठवू नये.
२. कथेत जास्तीत जास्त सहा वाक्ये, आणि जास्तीत जास्त ६० शब्द हवेत.
३. कथेचे शीर्षक जास्तीत जास्त ४ शब्दांचे हवे.
४. कथा मराठीतच हवी.
५. आणि सर्वात महत्वाचे, म्हणजे कथेचे शेवटचे वाक्य "देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती." हे हवे.

शनिवार, २० सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे कथा देण्यासाठी.

रामदास, मुक्तसुनीत आणि मी स्वतः, ह्यांना स्पर्धेत भाग घेण्याची अनुमती नाही. कारण हे तिघे स्पर्धेचे परीक्षक आहेत. सोमवार दिनांक २२ सप्टेंबरला स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात येतील.

स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस म्हणून, त्यांच्या खरडवहीत मोठ्या अक्षरांत, ते ह्या स्पर्धेचे विजेते आहेत, अशी खरड माझ्यातर्फे टाकण्यात येईल. तसेच ह्या धाग्यावरही पहिल्या तीन स्पर्धकांची नवे घोषित करण्यात येतील.

येऊ द्या तर मग.

दुर्गा झाली गौरी!

बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मराठी मंडळाने या वर्षी गणेशोत्सवानिमित्ताने एक स्वतःसाठी आव्हान निर्माण केले होते. त्या आव्हानाचे नाव होते, सुमारे ७० हौशी कलाकारांनी भरलेली संगितीका - "दुर्गा झाली गौरी". ही बालसंगितीका माधव साखळदांडे यांनी लिहीलेली आहे आणि मूळ संकल्पना/निर्मिती ही "अविष्कार" नाट्यसंस्था आणि त्यातही अरविंद आणि सुलभा देशपांडे यांची आहे. नृत्यसंकल्पना ही पार्वतीकुमार यांची आहे.

भारतात चारशेहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक बॉस्टनमधे यंदा गणेशोत्सवासाठी करायचे असे एप्रिलमधे मंडळाने जाहीर केले होते. बघता बघता हौशी बाल-प्रौढ कलाकार या नाटकासाठी तयार झाले आणि प्रत्येक विकेन्ड आणि अनेकांना कामाच्या दिवशी संध्याकाळी पण तालीमींसाठी जावे लागले. हे नाटक प्रायोगीक असल्याने त्याची डीव्हीडी वगैरे मिळणे शक्य नव्हते पण अविष्कारने मदत केली, जुने ध्वनीमुद्रण मिळाले आणि ते चांगले करत करत एक वर्षाच्या खालील मुलीपासून ते प्रौढांपर्यंत सहभाग असलेले हे नाटक बसवण्यात आले. बॉस्टन मध्ये ह्या नाटकाचे दिग्दर्शन अदीती टेलरने केले. अदीतीने स्वतः मुंबईत असताना या नाटकात अगदी लहानपणापासून काम केले असल्याने त्या भावनीक गुंतवणूकीचा फायदा दिग्दर्शन करताना झाला.

ह्या बालनाट्याची मूळ कथा थोडक्यात अशी:

दुर्गा ही नावाप्रमाणे तापट असलेली राजकन्या वाटेल ते हट्ट करायची. फुलांनी केलेल्या बिछाना पण टोचतो म्हणून माळ्याला फाशी द्या म्हणे पर्यंत तीची मजल जाते आणि राजाच्या सहनशीलतेचा अंत होतो. ती घर सोडते म्हणते आणि राजा थांबवत नाही... मग ती वादळात अडकते आणि कोळ्यांबरोबर होडीतून जात असताना नाव फुटून एका किनार्‍यावर पडते. तिथे असलेल्या वयोवृद्ध आजीआजोबांना ही स्वतःस विसरलेली गौरी म्हणजे वादळातून सापडलेली आपली गौरी ही नात वाटते. वादळात सापडून आणि घरापासून, ऐश्चर्यापासून लांब जाऊनही पिळ तसाच असल्याने, ही गौरी अर्थात दुर्गा सार्‍या गावाला आज्ञा सोडल्याच्या थाटात सांगते की ही नदी जर नेहमी पूर आणते तर तीला आधी बांध घाला आणि आवरा. तेंव्हा गावकर्‍यांच्या लक्षात येते की आपण काय करायला हवे ते.

इतके जरी असले तरी "गौरीस" झोप येत नसते. तेंव्हा गावतल्या दोन बायका कुत्सितपणे म्हणतात की काम केले तर झोप येते, नुसते बसून झोप कशी येणार! दुर्गा ते ऐकते आणि म्हणते की काम करून पाहूया. मग ती गावकर्‍यांना म्हणते की तुम्ही लहानमुलांना कामावर घेऊन जात त्या ऐवजी माझ्याकडे सोडा मी त्यांना शिकवेन. हे चालू असताना ती कधी उडणारे पक्षी, कधी मधमाश्या, कधी मुंग्या असे बघत जाते आणि कामाचे महत्व तीला त्यांच्याकडून समजत जाते. बघता बघता गौरीमुळे गावावरील दरवर्षीचे पुरामुळे येणारे संकट टळते आणि मुलेपण शिकायला लागतात. परीणामी या लाडक्या आणि नावाप्रमाणे शांत/प्रेमळ असलेल्या गौरीचे कौतूक राजा-राणी कडून ते करायचे ठरवतात. त्या कौतूक समारंभात राजा तीला विचारतो की तुझे नाव गौरी कसे काय? तुझे नाव दुर्गा ना? सर्व गावकरी म्हणतात की हे शक्यच नाही कारण ही तर फार प्रेमळ आहे... अर्थात दुर्गा आणि गौरी ह्या दोघी एकच आहेत आणि तापट "दुर्गा" आता "गौरी" सारखी शांत/प्रेमळ झाली आहे हे सर्वांना समजते...

"दुर्गा झाली गौरी" च्या तालीमी ह्या केवळ तालीमी न रहाता उन्हाळ्याच्या सुट्टीतले एकमेकांना भेटण्यासाठीचे आणि नवीन ओळखी करण्याचे एक निमित्त होऊन गेले. मुलांना अथवा स्वतःच्या तालिमींना केवळ आई-वडील अथवा स्वतः न जाता सर्वजण अगदी उन्हाळ्यात आलेल्या आजी-आजोबांना पण घेऊन येयचे. अंगत-पंगत (पॉटलक) म्हणजे "अक्षयपात्र"च होते! रात्री अकरापर्यंत चाललेल्या या तालीमींमधे सर्वजण मनापासून आनंद उपभोगत होते.

कार्यक्रमाच्या दिवशी, म्हणजे गेल्या शनीवारी, १३ सप्टेंबरला, ६०० च्या वर माणसे आली. गणपतीची पूजा आणि आरती-प्रसाद झाल्यावर कार्यक्रमास सुरवात झाली. त्यात अनेकजण अमराठी आणि अभारतीय वंशाचे - गोरे अमेरीकन्सपण होते. कुणाच्या ऑफिसातील तर आमच्यासारख्यांच्या बाबतीत आमच्या मुलीचे काम आहे म्हणून तीची मैत्रीण आणि तिचे आई-वडील. जरा शंका आली की अडीच तास ह्या कार्यक्रमास भाषा न समजता कसे थांबणार. पण इंग्रजीत "स्टोरीलाईन" दिलेली असल्याने नुसते बसलेच नाहीत तर मनापासून नाटक आवडल्याची त्यावेळेस आणि नंतर पोचपावती दिली. इतके दिवस सातत्याने केलेल्या तालिमींचा फायदा सर्वांना समजला.

१२ सप्टेंबरची स्टेजवरील तालीम आणि नंतरचा कार्यक्रम झाल्यावर अचानक आता सर्व कलाकार-संबंधीतांना पोकळी जाणवू लागली, की आता हे संपले? पण आता न्यूयॉर्कच्या मराठी मंडळाने दुर्गेला पाचारण केले आहे आणि दिवाळीच्या कार्यक्रमा निमित्त १६ नोव्हेंबरला आता न्यूयॉर्क मध्ये दुर्गेची गौरी होणार आहे!

आजची उच्चभ्रू पाककृती: जो जीता वही है बंदर (चित्रपट समीक्षा)

आजवरच्या पाककृतींपेक्षा ही पाककृती जरा वेगळी आहे. कारण ही पाककृती जरी चित्रपट परीक्षणाचही असली, तरी चित्रपट हे फक्त एक निमित्त आहे. कुठलीही भाजी करताना जसे, मोहरी, कांदा, लसूण, टोमॅटो, हळद, तिखट ह्याचे मिश्रण करून मग त्यात कुठल्याही फळभाजी अथवा पालेभाजीचे तुकडे टाकून ढवळले, तर भाजी चांगलीच होते, तसे. चित्रपट परीक्षण असो, कुणा साहित्यिकाला लिहिलेले पत्र असो, किंवा इतर कुणाविषयी काहीही लिहिलेले असो, ह्यात मूळ विषय हा गौण असतो. हे सर्व साहित्य लिहिण्यामागचा उद्देश म्हणजे आपली लेखनशैली कशी उच्च दर्जाची आहे, मनात आले असते, तर गेला बाजार ज्ञानपीठ नक्कीच मिळाले असते, असे इतरांच्या मनात ठसवत रहायचे. विशेषत: कुणालाही कधीच कळलेले नाहीत अशा लेखकांच्या, कुणीही विकत न घेतलेल्या पुस्तकांतील वाक्येच्या वाक्ये उद्धृत केली, की आपली "टेस्ट" कशी वेगळी आहे, हे लोकांना कळते.

एक लक्षात ठेवायचे, की जे साहित्य लोकांना कळते, त्यावर बऱ्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात. पण जे लोकांना कधीच कळलेले नसते, ते उच्च आहे, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे ज्यांनी लिहिलेले कळत नाही, असे आबानाथ गुरुजी, किंवा मजेत झोकील अशा अनवट लेखकांची जी पुस्तके प्रकाशित झाल्यावर दोन दिवसांनी आपण जुन्या बाजारातून घेतली आहेत, त्यातील परिच्छेद खुशाल वापरावेत. मग आपण लिहितोय त्या विषयाशी त्याचा संबंध नसला तरी चालेल.

विशेषत: चित्रपट परीक्षण ह्या पाककृतीत जे चित्रपट खूप लोकांनी पाहिले आहेत, आणि सुपरहिट झालेले आहेत, त्यांची यथेच्छ निंदा करावी. आपण कसे चोखंदळ रसिक आहोत, हे पटवून दिल्याशी कारण. चोखंदळ नसतो, तर वपुंच्या लेखनाचे दाखले दिले नसते का ?

आपण ज्या पुस्तकांची पारायणे करतो, ती कुणीही वाचलेली नसतात, ह्याप्रमाणेच आपण ज्या चित्रपटांची तारीफ करतो, ते देखील कुणीही पाहिलेले नसतात, ह्याची खात्री बाळगावी. कदाचित कुणी ते पहायला तिकीट काढून गेले असतील, तरी टायटल्स संपता संपता ते अजाण बालक गाढ झोपी गेले असतील, आणि त्यामुळे आपण चित्रपटाविषयी खरे लिहिले आहे की खोटे, ह्याची शहानिशा कुणीही करणार नाही, हे नक्की.

एकंदरीत, चित्रपट कुठलाही असो, त्याचे परीक्षण लिहिताना, चित्रपटाऐवजी, आपण आणि आपली अभिरुची कशी उच्च, हेच लिहीत राहावे.

असो, अशी ही सोपी पाककृती.

आता, प्रात्यक्षिक. "जो जीता वही सिकंदर" हा एक सुपर डुपर हिट चित्रपट. ह्याचे परीक्षण लिहायचे, म्हणजे अत्यंत खडूसपणे लिहायला हवे. आबानाथ गुरुजींची पुस्तके माळ्यावरून काढा. त्यात सायकल विषयी कुठली वाक्ये आहेत, ती शोधून काढा. वाटल्यास गरीब विद्यार्थी आणि श्रीमंत विद्यार्थी ह्यांचा उल्लेख व्हायला हवा. डोळ्यासमोर आयेशा जुल्काचा "पहला नशा, पहला खुमार" असला, तरी तिला तद्दन भिकार ठरवण्यासाठी आबानाथांनी स्त्रीद्वेष्टी कुठली वाक्ये लिहिली आहेत, त्याचा शोध घ्या. झाली तयारी ? आता लिहा तर.

भाउबंदकीवर महाभारतात बरेच लिहून झाल्यानंतर, अजूनही लोक तशाच कथा का लिहितात, हे कळणे अवघड आहे. हे कळायला ब्रह्मदेवाचे क्लासेस लावावे लागतील, आणि तरीही उत्तर मिळेलच असे सांगता येत नाही. केन आणि अबेल ही बायबलातील कथा, उटीच्या एका रामलाल (खरबंदा) नावाच्या गुणी माणसाच्या चहाच्या टपरीत आजही घडते, ही बॉलीवूडस्वामी परमेश्वराची कृपा आपल्यावर "जो जीता वही है बंदर" मधून होते.

"ऍम आय माय ब्रदर्स कीपर" असा प्रश्न अबेल सारखा विचारतो आणि केनचा सायकल स्पर्धेत जिंकायचा निर्धार स्वत: अतर्क्यपणे पार पाडतो, ह्या एका वाक्यात ह्या चित्रपटाचे कथानक सांगता येईल. पण हे बॉलीवूड असल्याने य़ेथील बायबलातही दर दोन सामांनतर गाणी असणारच. गाणी तशी बरी आहेत. पण नुस्त्या गाण्यांनी कथानक रंगते थोडेच ? त्यातून, संधी मिळाल्यावर काखा वर करून अंगडाई देणारी आयेशा जुल्का, गोरे रंगपे ना इतना गुमान कर, ह्या गाण्याची आठवण सतत करून देत असते.

जीवनाच्या काळोखी पायवाटेवरचे काटे मधुमेह्यांना रुतत नाहीत, तसेच ह्या चित्रपटातील भावना प्रेक्षकांपर्यंत न पोहोचवण्याची काळजी आयेशाने घेतली आहे. (इतक्या वेळी अंगडाई घेते, पण काखेत कधीही ओले वर्तुळ दिसत नाही. काळजाच्या पाण्यात भावनेचे मीठच नसेल, तर अभिनयाचा घाम कसा येणार? त्यामानाने कबीर बेदीच्या मुलीला खूप घाम येतो.)

आमीर खानने शाळकरी मुलाची भूमिका त्याच्या खुरट्या शारीरिक आणि मानसिक उंचीमुळे सुंदर निभावली आहे. पण अश्वत्थाम्याच्या भाळीचा मणी त्याला मिळाला तो "कयामत से कयामत" ह्या एका टुकार सिनेमातून, आणि तो हिरावून घेतला "जो जीता" तून. ह्या चित्रपटात त्यावर मात करतो तो, बाबूल. बाबूलचे केस, त्याचे दंड, त्याचे ते सायकल चालवणे, ह्यावर आमिर खान कधीच मात करू शकत नाही. अबेल जिंकतो शेवटी, पण केनचा पराभव होणे शक्य नाही.

वंगण नसलेल्या दुचाकीतून येणारे आवाज वापरून गाणी बनवली, म्हणजे स्वत: संगीतकार झालो, अशी जाणीव करू देणारे "बंदर" चे संगीत आहे.

ह्या चित्रपटाची एकच जमेची बाजू, म्हणजे किरण वैराळेची छोटीशी हलकी फुलकी भूमिका. ती मोहवून जाते.

(बस, इथेच संपवा. जास्त लिहिले, तर तुम्ही खरेच चित्रपट परीक्षण लिहिता आहात, आणि अनवट साहित्याकडे दुर्लक्ष होते आहे, हे वाचकांना कळेल.)

'मुंबई मेरी जान' - चुकवू नये असा!!

मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला - 'डोंबिवली फास्ट'. चित्रपट फारच सुरेख जमलाय...मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्‍यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही....फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही.

सुचना/Disclaimer - Spoilers ahead! आणि हे वस्तुनिष्ठ, तटस्थ वगैरे परिक्षण नाही, सिनेमा खूप आवडला, म्हणून लिहिले! Nothing objective about it!

चित्रपट ११ जुलै २००६ ला मुंबई लोकलमधे झालेल्या ७ बॉम्बस्फोटांच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात डोकावून बघतो. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा १००% तुमच्या-आमच्यासारखी माणसे वाटतात आणि तुमच्या-आमच्यासारखीच वागतात. सगळ्याच व्यक्तिरेखा फार सुरेख, तपशीलात लिहिल्यात आणि तितक्याच सशक्तपणे त्या पडद्यावर त्या-त्या कलाकारांनी निभावल्यात - चित्रपटाचे कास्टिंग हे चित्रपटाचे एक महत्वाचे बलस्थान - सगळेच कलाकार त्या-त्या व्यक्तिरेखाच वाटतात. अगदी माधवन पण फार हिरोगिरी न करता प्रामाणिकपणे भुमिकेत शिरतो आणि त्याहून महत्वाचे म्हणजे (नेहमीप्रमाणे चुकार मुलासारखा बाहेर न पडता) बहुतांश वेळ भुमिकेतच राहतो! Wink

ह्यातील पात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या सामाजिक-आर्थिक दर्जाला साजेशी वागत राहतात, आणि त्यातून निर्माण होते ते नाट्य, आणि या सगळ्याच्या पार्श्वभुमीला हादरवून सोडणार्‍या बॉम्बस्फोटांचा अनुभव! चित्रपट सुरुवातीपासून पकड घेतो, आणि अखेरपर्यंत खिळवून ठेवतो! ह्यात वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा आहे - -आणि मुंबई ह्या एका धाग्याने त्यांना सहजपणे बांधून ठेवले आहे. लोकलमधील बाँबस्फोट ह्या एकाच अनुभवाचे त्यांच्या भावविश्वात वेगवेगळे पडसाद उमटलेत.

माधवन हा एक उच्च-मध्यमवर्गीय, पर्यावरण, सार्वजनिक वाह्तूकीचे फायदे ह्यांची जाणीव असलेला, एक कॉर्पोरेट नोकरीपेशा माणूस. योगायोगाने त्या दिवशी सेकंड क्लास मधे बसतो आणि म्हणूनच वाचतो...पण ह्या अनुभवाने पुर्णपणे हादरून जातो...त्याची बायको प्रेग्नंट...तो ऑनसाईट बद्दल विचार करु लागतो...गाडीच्या शोरुम मधे जाऊन गाडी विकत घ्यायचा विचार करू लागतो...लोकलविषयी एक अनामिक भीती मनात बसते...

दुसरा असाच साधा, गरीब केरळी चहावाला - इरफान....त्याच्या जीवनात तसा फारसा फरक पडला नाही, पण पुर्वी एकदा मॉल मधे पत्नी व मुलीबरोबर झालेल्या अपमानाचा बदला घ्ययचा म्हणून फोनवरून मॉलमधे बाँब ठेवल्याच्या खोट्याच बातम्या देतो..आणि ते खाली होणारे मॉल, भयभीत उच्चवर्णीय लोग बघून आसूरी आनंद घेत असतो, आणि असाच एक दिवशी त्याला त्याच्या अफवांचे गांभीर्य कळते.... (नाही, नाही - त्याची मुलगी चिरडत वगैरे नाही....असेच बाळबोध cliché निशिकांतने टाळलेत!)...फारशे संवाद नसले तरी इरफानने ही भुमिका फारच छान केली आहे! केरळी टच ही त्याची आयडीआ होती म्हणे!

तिसरी सोहा-अली-खान, ही 'खोया खोया चांद' पासून अभिनेत्री म्हणून बरीच प्रगल्भ झाली आहे. तर ही (अशाच) एका न्यूज चॅनलची रिपोर्टर...तोच कुप्रसिद्ध प्रश्न 'आप को इस वक्त कैसा लग रहा है?' विचारणारी...तिचा भावी जोडीदार (समीर धर्माधिकारी) ह्या बाँबस्फोटात मरण पावतो आणि तिच्या न्यूज चॅनलवर तिलाच ह्या प्रश्नाला सामोरे जावे लागते...नंतर तिच्यावर 'रुपाली बनी रुदाली' अशी स्टोरी बनवली जाते...ही तिच्या आयुष्यातली उलथापालथ!

चौथा बेकार, मित्रांबरोबर टवाळक्या करणारा, मुस्लिमद्वेष्टा सुरेश; के के मेनन - त्याने ह्याही भुमिकेचे सोने केले आहे....त्याला कुठल्याही भुमिकेत टाकले तरी तो १००% निभावतो....तर हा असाच एक चहाच्या दुकानात टाइमपास करणारा मुलगा... बॉम्बस्फोटांनंतर तर अधिकच कट्टर होतो....शेजारच्या टेबलावर बसणारा युसुफ त्या दिवसानंतर दिसत नाही, तर ह्याचा संशय अजूनच बळावतो...तो मग त्याचा माग काढतो, घर शोधतो...तो सगळाच सिक्वेंस छान घेतलाय...त्याचे छोटे, छोटे संवाद 'ये लोग किशोरकुमार कभी नहीं सुनेंगे', किंवा पटकन ओंकार असलेले लॉकेट लपवणे, नजरेनेच 'बघ मी सांगत नव्हतो तुला?' असे मित्राकडे बघणे...सगळेच दाद देण्यासारखे. के के मेनन ग्रेटच आहे, आणि तितकीच दाद निशिकांत च्या टेकींगला!

आणि शेवटी पाचवा ह्या सगळ्यांना वरताण - हवालदार तुकाराम पाटील; परेश रावल! हा अपेक्षेप्रमाणेच चित्रपटाचा मास्टरस्ट्रोक (याचा अर्थ बाकीचे सूमार आहेत असा अजिबात नाही. खर तर के के मेनन आणि परेश रावल मधे डावे-उजवे करणे अवघड आहे!)...ह्या हवालदाराला रिटायरमेंटला काहिच दिवस राहिलेत...त्यातच ही घटना घडते...तिथे कदम नावचा एक नवीनच हवालदार भरती झाला आहे...ह्या पात्राचेही एक उप-कथानक आहे...त्याची हनीमूनची सुट्टी बॉम्बस्फोटांमुळे कँन्सल होते...त्यामुळे तो चिडलेला....मग त्या अनुषंगाने येणारे पोलिसांचे किस्से, त्यांचा तपास...नागरिकांशी संवाद...त्या हवालदार तुकाराम पाटीलला येणारी क्षुद्रतेची (insignificant असल्याची), वैफल्याची भावना त्यावर त्याचा विनोदाचा उतारा, आणि ह्या सगळ्या पलिकडे दिसणारा त्याचा कनवाळू समजूतदारपणा...ही भुमिका परेश रावलने अफलातून केली आहे. हा माणूस खरच अशक्य आहे....त्याचे पोलीस स्टेशनमधले शेवटचे भाषण, के के मेननला व्हॅन मधे बोलवतो तो प्रसंग...हे सगळेच अफाट....काहिही विशेष प्रयत्न न करता हा माणूस फक्त 'हवालदार तुकाराम पाटील' वाटतो! परेशला फक्त जागेवरूनच सलाम! बॉस, तुम सचमुच मे बहुत बडा आदमी है बे!

ह्या सगळ्यात जाणवणारी निशिकांतची दिग्दर्शक म्हणून प्रगल्भ समज आणि ह्या माध्यमाची अनन्यसाधारण जाण- ह्याचा हा फक्त दुसरा चित्रपट आहे हे सांगूनही खरे वाटत नाही! सगळ्यात महत्वाचे त्याने निवडलेली पटकथेची व्याप्ती आणि त्याची ट्रीटमेंट - फिल्मी होण्यासारखे खूप प्रसंग, उपकथानक असूनही त्याने तो मोह टाळला आहे. तसेच आपल्याला ह्या चित्रपटात अशा घटनांचा तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर होणारा परिणाम एवढेच (आणि फक्त तेवढेच) दाखवायचे आहे हे त्याने पक्के ठरवले आहे - आणि म्हणूनच ते तो तो खूप परिणामकाररित्या दाखवू शकला आहे - मला वाटते हे त्याचे यश खूप मोठे आहे. त्याची प्रतिके, त्याचे भाष्य हे खूप सहजपणे चित्रपटाचा भाग म्हणून येते - ते प्रसंग मुद्दाम घुसवल्यासारखे, किंवा बटबटीतपणे ठिगळासारखे येत नाहीत (बटवटीतपणाच्या बटबटीत उदाहरणासाठी आठवा इंद्रकुमार इराणी साहेबांचा 'बेटा', कुंभाराचे चाक, ओली माती...नुसता वैताग!!!!)...कित्येकवेळा तो हे खूप प्रभावीपणे संवादाशिवायही जाणवून देतो.

एक प्रसंग -- सोहा-अली-खानला तिच्या न्यूज चॅनेलचा बॉस आणि एक सहकारी तिच्यावर स्टोरी करायची आहे हे सांगायला येतात...ते बोलत असतात...कॅमेरा तिचे अतिशय उच्चभ्रू, चकचकीत घर दाखवत असतो....कॅमेरा तिच्या आरशासारख्या लखलखीत, व्हिट्रीफाईड टाईल्सवर ब्लर्‍र्‍ होतो...मग हळूच शार्प फोकस मधे त्या लखलखीत टाईल्सवर तिची विद्ध प्रतिमा दिसते..तिचे डोळे पाणावले आहेत...बॉसचे बोलणे संपते...तो व तिच्या कलीगचे बुटाचे पाय त्या टाईल्सवरुन, तिच्या विद्ध चेहर्‍यावरून टाक-टाक चालत बाहेर जातात....

तर अशा वेगवेगळ्या पात्रांच्या जीवनात बॉम्बस्फोटांमुळे वेगवेगळ्या तर्‍हेने उलथापालथ होते...त्यांचे भावविश्व ढवळून निघते....यथावकाश, आपापल्या परीने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कारणांनी ती पात्रे सावरतात, भानावर येतात...तशीच महानगरी मुंबईही आपल्या रुळांवर चालू लागते....त्यांना आणि त्यांच्यावरोबरच ह्या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार (खर तर भागीदार म्हणावे इतका चित्रपट सुरेख/वास्तवदर्शी झाला आहे) असलेल्या आपल्यालाही जाणवते....की जीवन अपरिहार्यपणे पुढे जातच राहते! आणि ही जाणीव एक बधीर, भावनाशून्य जाणीव नसते, तर ती असते एक सहृदय, समंजस, ओली जाणीव....

(मास्तरांच्या भाषेत सांगायचे तर) चित्रपटाचे प्रिमाईस एका ओळीचे - Life still goes on... आणि कुठेही शब्दबंबाळ, अतिरेक न करता 'मुंबई मेरी जान' हे सहजपणे आपल्याला जाणवून देतो. बॉम्बस्फोटांसारखा हादरवणारा विषय असूनही निघतांना आपण सहजपणे गुणगणतो, 'ऐ दिल, है मुश्किल जीना यहाँ...!'

आख्खे काश्मीर भारतात!!

आज बीबीसी वाल्यांनी आमचा दिवस आनंदी करायला मदत केली बॉ.... चक्क पाक व्याप्त काश्मीर भारताच्या अख्त्यारीत दाखवून. हे पहा...

From Kashmir on BBC

नाहीतर नेहमी ते काश्मीरचा भूभाग हा असा दाखवतात ज्यात पाकव्याप्त काश्मीराला पाकीस्तान कंन्ट्रोल्ड काश्मीर उल्लेखले जाते.

From Kashmir on BBC

आपला,
(अखंड-भारतवादी) भास्कर