टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
धर्म
फोडणे-वाढवणे
प्रेषक अन्या दातार ( गुरू, ०५/२२/२००८ - १७:००) .आपण जेंव्हा देवाला वगैरे जातो व नारळ फोडतो. पण नारळ फोडण्याच्या कृतीस नारळ वाढवणे असे म्हणतात.
जेंव्हा बांगडी फुटते तेंव्हा सुद्धा बांगडी फुटली असे न म्हणता बांगडी वाढली असे म्हणतात. ज्या गोष्टी आपण अक्षरशः फोडतो, त्याला वाढवणे हे गोंडस नाव का द्यावे याचा बोध काही केल्या झालेला नाही.
देवाच्या ठिकाणी फोडलेल्या नारळाला 'नारळ वाढवणे' असं म्हणायचं; तेच निवडणुका लागल्या की वर्तमानपत्रात बातमी येते की 'अमूक अमूक यांच्या हस्ते भागातल्या प्रचाराचा नारळ फुटला.' त्याला मात्र नारळ वाढवला असे म्हणायचं नाही. हे काय गौडबंगाल आहे बरे?????????
कोणी हा गोंधळ निस्तरेल का?
आज बुद्ध पौर्णिमा
प्रेषक मन ( सोम, ०५/१९/२००८ - १३:०८) .त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
जगाला बौद्ध तत्वज्ञ्द्यानाने समृद्ध करणार्या,शुद्ध आचरणाचे महत्व पटवणार्या,
विष्णुचा नववा अवतार म्हणुन मान्यता असलेल्या
तथागत गौतम बुद्धास विनम्र अभिवादन.
आपलाच मनोबा.
काय चाललेय हे?
प्रेषक कैलासराजा ( मंगळ, ०५/०६/२००८ - १२:५०) .नमस्कार मित्रांनो,मी या मिसळपावाच्या गाडीवर आजच आलो आहे.
मला एक विषय तुमच्या पुढे ठेवयचा आहे.मी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहतो. हल्ली लोकांचा अओढा देवाधर्माकदे खुप वाधला आहे.याचे कारण काय असेल?असुरक्षितता की फॅशन?की श्रद्धा?या युगात हे योग्य आहे का?नारायण नागबळी सारखे विधी करण्यासाठी जी झुंबड उडते याचे कारण काय असावे?
ब्रह्मोत्सव
प्रेषक आर्य ( मंगळ, ०४/२९/२००८ - १७:२७) .ब्रह्मोत्सव
रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला.
तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव.
तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.
ब्रह्मदेवाने विष्णुची आराधना केली आणि या उत्सवाची सुरवातही, प्रत्येक विष्णु / कृष्ण मंदिरात रीती-रीवाजा नूसार ९ ते ११ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. याची विषेशता म्हणजे दररोज देवाची वेगळ्या रुपात / वेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली उत्सवमुर्तीची पुजा बांधली जाते, संध्याकाळी काही नृत्य-गायन-भजनादिकार्यक्रम असतात. शेवटच्या रथोत्सवाने सांगता होते.
यामधे गरुड वाहन, कल्पवृक्ष, अनंत शेष, हनूमंतवाहन, पुष्प पालखी ह्या अत्यंत विलोभनीय सेवा आहेत.
या मधे वापली जाणारी फुलं-पानं, वस्त्र, अलंकार-आभूषण, छत्र -चामर, अत्तरांचे सुवास, आणि ईतर सामुग्री लक्षवेघुन धेत असतात. प्रसादांची रेलचेल तर असतेच हे वेगळ्याने सांगायला नको.
मीसळ पावच्या सदस्यांसाठी काही फोटो देता आहे.
स्त्रीमुक्ती आणि 'ते' कुटुंब
प्रेषक अन्या दातार ( शुक्र, ०४/२५/२००८ - २३:१८) .आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत. स्त्रियांनाही त्यांच्या पद्धतीने जगण्याचा, त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे असे मानतो.
मी मानतो या शब्दावर उगीच जोर देत नाहीए. आज मी एक अशी एक अक्षरश: खूप दु:खद आणि मन विषण्ण करणारी एका परिवाराची(!!!!!!!) कथा ऐकली. यातून काही प्रश्न मला येथे मांडावे वाटले ते मी येथे शेवटी मांडेनच. मिपाकर नेहमीप्रमाणेच त्यांची उत्तरे देतील ही रास्त अपेक्षा..............
तर हे कुटुंब मुळचे कोकणातले, पण कोल्हापुरचे राहणारे. घरात माणसे तीन. एक गोड मुलगी, आई, आणि वडील. मुलगी इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षात शिकणारी, आई बँकेत चांगल्या हुद्द्यावर. वडीलांबद्दल नक्की माहिती नाही. घरात बर्यापैकी पैसा आहे.(हा एक निष्कर्ष आहे. कारण त्याशिवाय मोबाईल आणि गाडी मुलीला दिली नसती.) मध्यमवर्गीय असे हे कुटुंब.
माझी आणि त्या मुलीची ओळख एका सामाजिक कार्यक्रमामुळे झाली होती.(तेंव्हा मला हे काहीच माहित नव्हते. आज त्याचे मला आश्चर्य वाटते. तिचा अशा ऍक्टीव्हिटीमधला सहभाग ही किमया तिच्या मैत्रिणींची. हॅट्स ऑफ!!!!!) त्यानिमित्ताने माझे आणि तिचे अनेकदा बोलणे होत असे. असेच काही कामाकरता मला तिच्याशी बोलायचे होते. ती तेंव्हा कॉलेजलाच येत नसल्याचे कळल्याने मी फोन करत असे आणि माझा कॉल ती कट करत असे. मला राग आला. मी फुकटच्या गप्पा मारायला नक्कीच फोन करीत नसे; मग मला टाळायचे कारण काय? याचे कारण उमजून घेण्यासाठी मी तिच्या मैत्रिणीला त्याचे कारण विचारले. तिने जी माहिती पुरवली ती ऐकून मी गारच झालो. आमचे संभाषण खाली देत आहे
मी: 'ती' माझा फोन का कट करते? काही प्रॉब्लेम आहे का?
तीची मैत्रिण: नाही. प्रॉब्लेम काहीच नाही. पण तिच्या घरच्यांना तिने मुलांशी बोललेले आवडत नाही.
मी: काय??????(मी अवाकच!!!!!!!)
तीची मैत्रिण: पण खरंच हेच कारण आहे.
मी: मग वर्गातली मुले वगैरे तिच्याशी बोलतात हे सुद्धा माहित नाही?
तीची मैत्रिण: अगदी मोजून २ मुलांची नावे घरात माहित आहेत.
मी: असं का?
तीची मैत्रिण: असंच ते. तिने स्वत:भोवती एक अनामिक वर्तुळ आखून घेतलंय ज्याच्या बाहेर ती कधी विचारच करत नाही. मी अनेकदा तिला त्यातून बाहेर पाडायचा प्रयत्न केला आहे. पण ती काही बधत नाही.
मी: बोंबला. समजा एखाद्या मुलावर तिचे प्रेम बसले तर???????(माझा एक सहज प्रश्न)
तीची मैत्रिण: शक्यच नाही. तसं होणंच शक्य नाही.
मी: समजा एखाद्या मुलाचे तिच्यावर प्रेम बसले तर?
तीची मैत्रिण: ती नक्कीच नाही म्हणेल. प्रेम, स्वातंत्र्य, मोकळेपणा या गोष्टी तिच्या गावीच नाहीत. समाजात मिळून मिसळून राहणे हे तिला माहितच नाही. वाटलं तर खूप काही बोलत बसेल; नाहीतर अजिबातच बोलणार नाही.
मी: मग तिच्या नवर्याबद्दल तरी काय अपेक्षा आहेत?(माझे फक्त कुतुहल)
तीची मैत्रिण: काही नाही. फक्त तिची काळजी घेणे आणि तिला महत्त्व देणे........
माझं बोलणंच खुंटलं..............
आज २१व्या शतकात मुलींवर अशी बंधने सुशिक्षित समाजाही घालत आहे हे ऐकून मला गलबलून आले. हा एक सामाजिक प्रश्न असू शकतो.
१] खरेच, पालकांनी मुलांवर्/मुलींवर काही प्रमाणात बंधने घालावित वगैरे जरी खरे आणि गरजेचे असले तरी हा मार्ग कितपत अनुसरणीय आहे?
२] या बंधनांमागे पालकांची काय मानसिकता असू शकते? काही तर्कसुसंगत विचार असेल का?/ आहे का?
३] अशा मुली कोणा सोम्यागोम्याच्या भूलथापांना बळी पडून पळून जायची शक्यता नाकारता येईल? कारण अशी मुले/मुली एका स्वप्नवत जगात जाण्याची अपेक्षा धरुन काहीही करायच्या (अ)विचाराप्रत येऊ शकतात.
४] अशा मुला/मुलींना त्या स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे स्वत:च्या वर्तुळातून बाहेर काढण्यासाठी काय करावे? त्यांच्या मित्र्-मैत्रिणींनी याकरता त्यांचे प्रबोधन कसे करावे?
२६००० रु. ची साडी !!!!!
प्रेषक मदनबाण ( सोम, ०४/२१/२००८ - १९:१६) .आत्ताच करवीर नगरी ला भेट देणे झाले.....
महालक्ष्मी मंदीर देवस्थानाच्या ऑफिस मधे मला एका भाविकाने देवीला अर्पण केलेली २६००० रु.किंमतीची साडी पहावयास मिळाली.
ती अशी होती.....

(महालक्ष्मीचा दास)
मदनबाण
आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))
प्रेषक विसोबा खेचर ( बुध, ०४/१६/२००८ - १४:४८) .हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत!
राम राम मंडळी,
नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली! 
तर ते असो...!
मंडळी, आता वास्तविक पाहता 'वैराग्य', 'आध्यात्म', 'आत्म्याचे अमरत्व', 'आत्मज्ञान', 'आत्मानंद' यासारखे शब्ददेखील आम्हाला फारसे कळत नाहीत, शिवाय या शब्दांनी चढणारी आध्यात्मिक नशा ही इतर कुठल्याही नशेपेक्षा भयंकर आहे, तेव्हा त्या वाटेला कधीही जाऊ नकोस अशी शिकवण आम्हाला आमचे गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांजकडून मिळाली आहे!
तर ते असो...
झालं असं, की मध्यंतरी आमचे दोन शिष्य धमाल मुलगा आणि मदनबाण हे आत्मानंदाच्या शोधात भटकत भटकत आम्हाला भेटण्याकरता ठाण्याला आले होते. वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही, तसेच गुरू या नात्याने काही विद्या त्यांना दान करावी असेही आमच्यापाशी काही नाही, तरीही ते आम्हाला गुरू मानतात हा त्यांचा मोठेपणा! 
तर त्या छानश्या संध्याकाळी आम्हा गुरुशिष्यांची ठाण्याच्या एका मालवणी हाटेलात भेट झाली. धमाल मुलगा आणि मदनबाण या आमच्या प्रिय शिष्यांना आम्ही काही मोलाचे मार्गदर्शन केले. आमचा प्रियशिष्य धमाल मुलगा आम्हाला म्हणाला,
"गुरुवर्य संत तात्याबा, बर्याच दिवसांपासून आपल्या तोंडून सिंगल माल्ट आणि सिंगल माल्ट परिवाराची ख्याती ऐकतो आहे, तेव्हा आज मला सिंगलमाल्टबद्दल काही अनुग्रह करून मार्गदर्शन करा आणि सिंगलमल्टची दीक्षा द्या!" 
आम्ही अर्थातच तथास्तु म्हटलं आणि धमालमुलाला सिंगलमाल्ट बद्दल योग्य ते मार्गदर्शन केलं! सिंगलमाल्टच्या तीर्थाचा पहिला घोट घशात जाताच मुळातच आत्मानंदी असलेला धमालमुलगा थोडं अधिक आत्मसंतुष्ट होत आम्हाला म्हणाला,
"वा गुरुवर्य! यापुढे जेव्हा कधी आम्ही सुराप्राश्नन करू तेव्हा सिंगलमाल्टच पिऊ! सिंगलमाल्टमुळे आमचा सैरभैर आत्मा आता स्थिर झाला आहे आणि आम्ही आत्मानंदी झालो आहोत!"
हे ऐकून गुरू म्हणून आम्हालाही खूप समाधान वाटले आणि आम्हालाही नव्यानेच आत्म्याचा शोध लागल्याचे जाणवले! 
आमचे दुसरे प्रितशिष्य मदनबाण गेले काही दिवस विजूभाऊंकरता निरनिराळ्या कैर्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होते. त्यांनाही आम्ही दोन घोट सिंगलमाल्ट पाजून त्यांचाही आत्मा तृप्त केला. सिंगलमाल्टमुळे झालेल्या आत्मानंदाच्या भरातच मदनबाण आम्हाला म्हणाला,
"बाकी तुम्ही काही म्हणा गुरुवर्य संत तात्याबा, आंब्यांच्या जोडीचे, कैर्यांच्या जोडीचे फोटो घ्यायची आणि पाहायची मजाच वेगळी, त्यांचा आस्वादच वेगळा!"
असं म्हणून मदनबाणने आम्हाला डोळा मारला तेव्हा सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो!
तर अशी ही आम्हा गुरुशिष्यांची आत्मानंदी भेट आम्हाला खूप सुखावून गेली, आत्मानंद देऊन गेली!
आता आम्हा काही गुरुशिष्यपरंपरेतल्या मंडळींचे फोटू पाहा! मंडळी, यातल्या प्रत्येकाच्या चेहेर्यावर आपल्याला आत्मानंद दिसेल! अहो आत्म्याचा शोध लागलेलीच ही सगळी मंडळी आहेत! 
१) सर्वप्रथम जगत् गुरू भाईकाकाजी देशपांडे!

२) काकाजी देशपांडेंचे शिष्य आणि मराठी आंतरजालावर संतपदाला पोहोचलेले एक आत्मानंदी, संत तात्याबा महाराज! 'हा संतरुपातला गोसावडा संतबिंत कुणी नसून एक नंबरचा बाईलवेडा आहे!' असं त्यांचे काही हितचिंतक म्हणत असतात. म्हणोत बापडे! अजून त्यांना आत्म्याचा शोध लागला नाही असं आपण म्हणू! 

आता परवाच्या ठाण्याच्या हाटेलातले काही फोटू. संत तात्याबा धमाल मुलाला आणि मदनबाणला आत्मज्ञान आणि आत्म्याचा शोध कसा लावायचा, हे शिकवत आहेत! 
१) आत्मज्ञानी संत तात्याबा महाराज. दुसरा पेग संपत आल्यामुळे चेहेर्यावर आत्मज्ञान जाणवू लागलं आहे! 

२) संत तात्याबा, धमाल मुलगा, मदनबाण - गुरुशिष्य आत्मरंगी रंगले आहेत! 

३) 'यापुढे प्राशन करीन तर सिंगलमल्टच प्राशन करीन!' अशी आत्मानंदी ग्वाही देत धमाल मुलगा गुरूच्या शेजारी बसला आहे! 

असो...
धन्यवाद,
श्रीसंत तात्याबा महाराज प्रतिष्ठान,
मराठी आंतरजाल.
नचिकेत्याचे आख्यान
प्रेषक ठणठणपाळ ( मंगळ, ०४/१५/२००८ - १५:३७) .(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मला माहिती असलेली गोष्ट मी माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला अहे. लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.)
नचिकेत्याचे आख्यान
नचिकेत्याची गोष्ट कठ नामक उपनिषदात आढळते. नचिकेत्याचे वडील उद्दालक ऋषींनी एकदा विश्वजीत यज्ञाची तयारी केली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यज्ञ करणार्या ब्राम्हणांना गायी दान कराव्या लागत. उद्दालक ऋषींनी सगळ्या म्हातार्या झालेल्या आणि दूध आटलेल्या गायी देण्याचा सपाटा लावला. बापाची ही लबाडी नचिकेत्याच्या लक्षात आली. मुळातच धार्मिक वृत्तीचा, सत्त्वगुणी नचिकेता 'अशाने आपल्या वडिलांना पुण्य कसे लाभणार' या विचाराने अस्वस्थ झाला. जर आपल्या वडिलांना पुण्य मिळवायचे असेल तर त्यांनी एखादी खरोखरची मौल्यवान वस्तू दान केली पाहिजे असे त्यास वाटू लागले. विचार करू जाता आपण स्वतःच आपल्या वडिलांची एकप्रकारे संपत्तीच आहोत असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आपलेच दान जर त्यानी केले तर त्यांना पुण्य मिळू शकेल असे त्यास वाटले. अशा रितीने बापाकरता आत्मत्याग करायला नचिकेता तयार झाला.
वडिलांकडे जाऊन नचिकेत्याने त्यांना प्रश्न केला, "बाबा, तुम्ही मला कोणाला दान केले आहे?" मुलाचा हा प्रश्न पोरकट वाटून बापाने त्याकडे प्रथम दुर्लक्ष केले. पण बाप उत्तर देत नाहीसा पाहून नचिकेता पुनःपुन्हा तोच प्रश्न विचारू लागला. शेवटी संतापून जाऊन बाप कडाडला, "जा, मी तुला म्रुत्युला दान दिले आहे." हे ऐकून नचिकेता चमकला. पण बापाचा शब्द खरा करण्यासठी तो खरोखरच आत्मबळावर यमलोकी जाऊन उपस्थित झाला.
तेव्हा दुर्दैवाने यमराज तिथे नव्हते. यमलोकीच्या द्वारपालांच्या विनवण्यांनंतरही नचिकेता यमराजांची वाट बघत दाराशीच तीन दिवस आणि तीन रात्री बसून राहिला. परत आल्यावर नचिकेत्याची सगळी इत्थंभूत हकिगत ऐकून यमराज कळवळले व आतिथ्यात झालेल्या कमतरतेची भरपाई म्हणून प्रत्येक दिवसासाठी एक असे एकूण तीन वर त्यांनी नचिकेत्यास देऊ केले.
तेव्हा नचिकेत्याने 'माझ्या वडिलांचा माझ्यावरचा रोष मावळो आणि त्यांना यज्ञाचे पुण्य प्राप्त होवो' असा पहिला वर मागितला. दुसर्या वराने त्याने अग्निविद्या मागितली. तिसर्या वराच्या वेळेला मात्र त्याने एका गूढ प्रश्नाला हात घातला. तो म्हणाला, "जेव्हा माणूस मरतो तेव्हा काहीजण म्हणतात की तो पूर्णपणे नष्ट होतो तर काही म्हणतात की मृत्युच्या वेळेला फक्त शरीरपात होतो व शरीरातील 'खरा माणूस' तत्वतः जिवंतच राहतो (अस्ति इति एके नास्ति इति च एके). तुम्ही मृत्युदेवता आहात. तुम्ही मला सत्य काय ते सांगा. हेच मी तिसरा वर म्हणुन मागत आहे."
एका बालकाने विचारलेला हा प्रश्न ऐकून यमराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी नचिकेत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते म्हणाले, "मुला, हा प्रश्न तू विचारू नकोस. ह्या प्रश्नाचा उलगड भल्याभल्यांना होत नाही. सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत. तू दुसरे काहीतरी माग." नचिकेता तत्काळ उत्तरला, "तसेच जर असेल तर माझी तुमच्याशीच गाठ पडली हे माझे भाग्यच. देवतांकडूनही जे ज्ञान मिळणार नाही ते मिळवण्याची संधी मी अशी वाया घालवू का?" यमराज यावर निरूत्तर झाले.
मग त्यांनी नचिकेत्याला अनेक आमिषे दाखवायला सुरुवात केली. ते म्हणले, " तू या प्रश्नाऐवजी पृथ्वीवरचे अनेक उत्तमोत्तम उपभोग मागून घे. दिर्घायुष्य माग. निष्कंटक सार्वभौम साम्राज्य माग. पुत्रपौत्र माग. या बघ, या दिव्य रथात बसलेल्या आणि पुरुषांना रमवण्यात कुशल अशा अप्सरा माग. यातले काहीच नको असेल तर ज्याने काहीही विकत घेत येते अशी धनसंपत्ती माग. मी सिद्धसंकल्प आहे. मी तुला कुबेरापेक्षाही अधिक श्रीमंत करू शकतो. सुरलोकातील देवगणांनाही दुर्लभ असे उपभोग तुला देऊ शकतो. तू काय हवे ते माग पण तुझा हा प्रश्न परत घे." नचिकेता म्हाणाला, "यमराज, तुम्ही हे इतके ज्ञानी असून हे काय बोलता? तुम्ही दाखवलेल्या या सगळ्याच वस्तू क्षणभंगुर नाहीत काय? या सगळ्या वस्तू आज कितीही चांगल्या दिसत असल्या तरी त्यांची अंतिम गती ही मृत्यु - तुम्ही स्वतःच - नाही काय? असे असून का माझी अशी परीक्षा घेता?"
पुनःपुन्हा दाखविलेल्या आकर्षणांनतरही नचिकेत जराही चळत नाही हे बघून यमराज संतुष्ट झाले. नचिकेत्याच्या वैराग्याची प्रशंसा करून त्यांनी त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले.
ते ज्ञान घेऊन नचिकेता मृत्युलोकी परत आला आणि आपण केलेली भयानक चूक लक्षात येऊन कष्टी झलेल्या आपल्या वडिलांना भेटला. त्यंना त्याने सगळी हकिगत ऐकवली आणि त्यांना शांत केले. अशा प्रकारे नचिकेता नंतरच्या काळात सगळ्या कुमारवयीन साधकांसठी एक आदर्श बनून राहिला.
याच उपनिषदात यमराज सर्वांनाच आवाहन करतात,
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया
दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति
अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
ठणठणपाळ
आतले आणि बाहेरचे... (२)
प्रेषक नीलकांत ( शनी, ०४/१२/२००८ - १६:३९) .ह्या लेखाचा आधीचा भाग येथे वाचावा...
आतले आणि बाहेरचे... (१)
----------------------------------------------------------------------
आपण शाळेत शिकतो की इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. आपला इतिहास आपल्याला सांगतो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले आणि आपल्या गुलामगिरीची वागणूक दिली. मग काही थोर मंडळी पुढे आली त्यांनी देशाला नेतृत्व दिल , देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला आम्ही स्वतंत्र झालो. वय वर्षे १० ते १६ ला हे एवढं पुरेसं असेलही आणि त्याचमुळे की काय आपल्या शालेय इतिहासात असं रंगतादार इतिहास सांगितलेला असतो. पण जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा लक्षात येतं की जगात असं १००% कृष्ण-धवल (ब्लॅक ऍण्ड व्हाईट) काहीच नसतं. खूप सारे आयाम आपल्या नजरेसमोरच आलेले नसतात. मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं.
पण आपण हे असं मोठं होतच नाही. त्या आधीच आपण कुठल्यातरी विचारसरणीची झूल आपल्यावर ओढतो आणि सुरू होतो आपला प्रवास आपल्या गटातील विचारांचा,विचारवंतांचा प्रभाव वाढवण्याचा सोबतच, त्यांचे जे विरोधक होते किंवा आहेत त्यांना विरोध करण्याचा. आपण काय करतोय हे खरं तर आपल्याला माहितीच नसतं. पण आपण जेथे उभे असतो तेथून मात्र आपण योग्य आणि १००% बरोबर असल्याचं दिसतं - आपल्यालाच भासतं. मग आपला जोष अधिकच वाढतो. यापुढे आपलं सगळं वाचन, मनन एक दिशा ठरवून होतं. येथे एक लक्षात घ्या वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच.
काही लोक मात्र ही अशी झूल पांघरायला नकार देतात, आपला नवा, स्वतंत्र विचार मांडतात. त्यामुळे आधीच्या संथ पसरलेल्या समाज सागरात वादळ उठतं, लोकांच्या विचारांना धक्का बसतो, त्यांच्या स्वप्रतिमेला तडे जाऊ लागतात. मग त्यांचा विरोध होऊ लागतो. ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो.
अश्याच झूल पांघरायला नकार देणार्यांची परंपरा भारतात खूप आहे. मात्र आपल्या सुदैवाने महाराष्ट्राने यात नेहमीच वरचा क्रमांक पटकावला आहे. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. यातील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात वेगळा विचार देऊन गेलेला आहे. किंवा कित्येकदा नव्या विचारांचे प्रवर्तन सुद्धा यांनी केलं आहे. जेव्हा जेव्हा यांनी कुठलाही नवा विचार मांडला तेव्हा तेव्हा प्रस्थापित व्यवस्थेने त्या नव्या विचाराला विरोध केला. हा विरोध तो विचार वाईट आहे किंवा चुकीचा आहे या साठी नव्हता तर तो विचार आताचे जे प्रस्थापित आहेत त्यांचे हितसंबंध धोक्यात आणतो म्हणून होता.
विरोध कशाला झाला?..
मानसाला माणूस मानण्याला झाला. स्त्रियांना बरोबरीने वागणूक देण्याला झाला, विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी झाला, त्यांच्या शिक्षणासाठी झाला, विरोध अस्पृश्यांच्या उथ्थानासाठी मिशन स्थापण्यासाठी झाला, संतती नियमना बद्दल जनजागृती बद्दल झाला, सामाजिक व धार्मिक सुधारणांचा आग्रह 'सुधारक' मधून करण्याला झाला. समाजाचा एक घटक अर्थशास्त्राच्या दृष्टीने पूर्णतः अनुत्पादक आहे असं म्हणण्याला झाला, नैसर्गिक तळ्यावर पाणी पिण्याला झाला, गाईला उपयोगी पशू मानण्याला झाला. हिंदू कोड बिलाला झाला, धर्मांतराला झाला, नामांतराला, मागे राहिलेल्यांना विकासाची संधी मिळावी असं म्हणण्याला सुद्धा झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरचा काळ फार धकाधकीचा होता असं मानतात. भारताला नवीन असलेल्या अनेक गोष्टी या काळात भारताच्या मातीत रुजल्या, उमलल्या आणि भरभरून वाढल्या सुद्धा, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या नव्या मूल्यांची ओळख भारतीय समाजाला झाली. बुल्शेवीक क्रांतीची धग भारतापर्यंत पोहोचली. आमचे मानवेंद्रनाथ रॉय, पंडित नेहरू, स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह आदी लोक या नव्यामुल्यांनी भारावले. यातील प्रत्येकाने परकीय भूमीवर झालेल्या स्वातंत्र्य लढ्यापासून वाढीव प्रेरणा घेतली. विचार घेतले.
त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं?
मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
जरा विस्ताराने सांगतो... त्याकाळी ह्या लोकांना किंवा यांच्या विचारांना किंवा यांच्या वादाला म्हणा हवं तर, विरोध करणार्या लोकांचे काही हितसंबंध धोक्यात आले होते म्हणून त्यांनी विरोध केला असं मान्य करू पण त्याकाळात ह्या नेत्यांनी दाखवलेली वाट योग्य होती, आपल्या समाजाचा एक भाग असा अधू ठेवून आपल्याला प्रगती करता येणार नाही हे खरं होतं आणि आहे, असं मान्य करायला आम्ही आजही तयार नाही.
आज का नाही? कारण आमच्या पूर्वजांना यांनी शिव्या घातल्याहेत. 'हे' लोक यांची लायकी काय? आणि कुठे जाऊन बसलेत हे' असं आणि अधिक खूप काही. पण हे सगळं आज किती योग्य याची दखल कोण घेतंय? इसवी सन. १९२७ ला यांनी असं लिहिलं... असं म्हटलं आदींचे दाखले देत आता वाद घालायचा कारण काय? तर....
अरेरे... चुकलंच ... एकदा झूल पांघरली की असे कारणं विचारायचे नसतात. मग फक्त आपले आणि परके , आतले आणि बाहेरचे...
हे एवढं कमी होतं म्हणून की काय... ह्या लोकांनी ज्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाला, विवेकवादाला प्राधान्य द्या असा संदेश दिलाय त्याचे सुद्धा असेच गट आम्ही बनवलेत. ज्यांनी ग्रंथ किंवा शब्द प्रमाण मानू नका तर त्या मागचा संदर्भ पाहा असे सांगितले त्यांचे अनुयायी (?) सुद्धा आता त्यांचा ग्रंथ प्रमाण माना आणि त्यांनी लिहिलं तेच प्रमाण अशी आग्रहाची भूमिका घ्यायला लागलेत.
मुळात ह्या नवीन विचाराच्या लोकांनी आपला मेंदू कुणाकडेही गहाण टाकायला विरोध केला आहे. आज आम्ही मात्र त्यांच्याच पायाशी आमचा मेंदू गहाण टाकतोय.
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात.
एक छान उदाहरण आठवतंय. अमरावतीला संत गाडगेमहाराजांची समाधी आहे. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त तेथे मोठा कार्यक्रम होतो. मोठी शोभायात्रा निघते. जन्मभर 'देव दगडात नाही, दरिद्री नारायणाच्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे, त्याची सेवा करा असे सांगणारे गाडगे बाबा. लोक त्या दिवशी त्यांनी वापरलेल्या गाडीची पुजा करतांनी मी पाहिलेत.
कुणाचा विचार काय होता याचेशी आम्हाला काही सोयरसुतक नाही. आम्हाला तर बस आपले आणि परके कोण हे पाहून; विरोध किंवा जयजयकार करण्यात जास्त रस दिसतो.
इतरांचं सोडा मात्र आपण ज्यांना आदर्श मानतो किमान त्यांचं तरी चरित्र किंवा त्यांचं लिखाण आपण वाचतो का? ह्या बद्दल धक्कादायक माहिती मला मिळाली तेव्हा, जेव्हा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नावानं रान उठवल्या जात होतं. त्यावेळी भर रस्त्यावर अर्वाच्य शिव्या देणार्या कार्यकर्त्याला जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल ५ प्रश्न विचारले तरी सुद्धा बरोबर उत्तरे देता आली नाहीत.
सावरकरांना मानणार्या लोकांना मी 'एवढं' सोडून सावरकर मान्य असं म्हणताना निदान ऐकलं तरी आहे. बाकी सामान्यतः सर्वत्र आनंदच असतो.
एवढं सांगून नेमकं पोहोचायचं कुठं आहे? तर आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. तुम्ही सांस्कृतिक भारताचा अभिमान बाळगणारे असा किंवा नव्याने अस्तित्वात आलेल्या भारताचे नागरिक असा, या दोन्ही विचारसरणीत आपल्या विरोधी मताबद्दल आदर बाळगण्याची परंपरा आहे नव्यासाठी हे आधुनिक मूल्य आहे असं म्हणूया. तर या आपल्या विरोधी मताचं नेमकं म्हणणं तरी काय आहे किमान तेवढं ऐकातरी !
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित.
नीलकांत
आतले आणि बाहेरचे... (१)
प्रेषक नीलकांत ( शनी, ०४/१२/२००८ - १५:४३) .काल महात्मा फुलेंच्या लेखावर भाई नावाच्या सदस्याची प्रतिक्रिया आली. ही आणि अश्याच काही प्रतिक्रिया मी आधीही ऐकल्या आहेत. वाचल्या आहेत. हे असं काही वाचलं की मनात काही विचार उठतात. आज ते येथे सविस्तर देण्याचा मानस आहे. ही माझी बडबड आहे. हेच तेवढं खरं असा माझा आग्रह नाही.
-------------------------------------------------------------------
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात एक धडा होता,
'आतले आणि बाहेरचे'.
आपण जेव्हा रेल्वेच्या प्लॅटफार्म वर उभे असतो आणि गाडी येते तेव्हा गाडीत गर्दी असली तरीही आपल्याला त्यात जागा दिसते,आपण आत घुसायची धडपड करतो, त्याचवेळी आतील लोक मात्र, 'खूप गर्दी आहे, जागा नाहीये...' असं बोलतात आणि शक्य असेल तर दार सुद्धा लावण्याचा प्रयत्न करतात. आपण कसंबसं आत घुसतो... गाडी चालू लागते आणि आपल्याला जागा होते, आपण सावरून बसतो. एवढ्यात समोरचं स्टेशन येते.. बाहेर उभे असलेल्या लोकांना आत जागा असल्याचं दिसतं, ते आत घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी आतील लोक मात्र, 'खूप गर्दी आहे, जागा नाहीये...' असं बोलतात आता फरक एवढाच असतो की त्या आतून बोलणार्या लोकांत आपण सुद्धा असतो... आता आपण आतले असतो !
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही.
खरं तर प्रत्येकाची लढाई आपले हितसंबंध जपण्याची असते.त्या हितसंबंधांच्या आड येणारा/येणारे आपले शत्रू आहेत असं आपल्याला वाटतं. हे अत्यंत नैसर्गिक आहे. या हितसंबंधाच्या जोपासनेसाठी पुढे संघर्ष घडतात. बलवान तो विजयी होतो पराजित दास होतो.
अत्यंत नैसर्गिक अवस्थेत हा संघर्ष आपल्याला आजही पाहायला मिळतो, तो आपले शिकार क्षेत्र राखण्यासाठी असो की आपल्या कळपांतील माद्यांवर हक्क सांगण्याचा असो... आपले हितसंबंध जपण्यासाठी संघर्ष करणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे.
आम्ही जेव्हा प्रगत होत गेलो, माणूस होत गेलो, तेव्हा आम्ही समाज बनवला आणि त्याच्या नियोजनासाठी काही नियम सुद्धा... पुढे आपला समाज हा घटक सुद्धा आपल्या हितसंबंधात जोडल्या गेला. आधीचा वैयक्तिक पातळीवरचा संघर्ष आता गटाचा/ समाजाचा झाला.
आमचा वाढता मेंदू आम्हाला इतर प्राण्यांपासून वेगळा करायला लागला. आमच्या जाणीवा समृद्ध व्हायला लागल्या... आणि आमच्याच मते आम्हाला संस्कृती प्राप्त झाली.आम्ही आमची वर्तणूक आता निसर्गाच्या नव्हे तर त्याही पुढे जाऊन नैतिकतेच्या पातळीवर जोखायला लागलो. आम्ही सुसंस्कृत झालो.
सुरुवातीच्या काळात बनलेले काही अग्रक्रम आजही कायम आहेत, जसे व्यक्ती पेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्त्व, एकापेक्षा अनेकांना काय योग्य ते बरोबर.आदी.
असाच आमचा भारतीय समाज. ज्ञात इतिहासाच्या आधारे असं सांगता येतं की, संस्कृतीच्या विकासाचा आमचा वेग इतर जगापेक्षा खूप जास्त होता. आमची समाजाची बांधणी घट्ट होती. संस्कार, शिष्टाचार आदींनी आमचं जीवन व्यापलं गेलं होतं. समाजाच्या सुरवातीच्या काळात 'सर्व समाजाच्या हिताचं ते योग्य' असा, नियम म्हणा हवं तर, पण एवढं साधं होतं सर्व. त्यामुळे साहजिकच ते सर्वांना मान्य होतं. त्यानुसार ही व्यवस्था चालली होती. पुढे यात काही कालानुरूप आणि काही हेतूमूलक बदल करण्यात आले. आणि ह्या व्यवस्थेला कीड लागली. ही कीड एवढी भयानक होती की , ही कीड आहे ! हे समजायला सुद्धा काही हजार वर्षे आणि शेकडो पिढ्या जाव्या लागल्या, खरं आणि नेमकं बोलावं तर शेकडो पिढ्या पिचल्या गेल्या.
शतकांचा अंधार पडल्यानंतर अचानक बाहेरून कुणीतरी येतं आणि आमच्या , " हे असंच असतं, आपल्या धर्मात हे असंच सांगितलं आहे " नावाच्या ह्या जोखडाला हात लावतं, आणि आम्हाला सांगतं की,"बघ, हे जे जोखड तू मानेवर घेऊन फिरतो आहेस ना? ते नैसर्गिक नाहीये... ते तुला जन्मतः प्राप्त झालेलं नाही तर येथील भेदभावमूलक समाज व्यवस्थेने कुणाचे तरी हितसंबंध जपले जावेत म्हणून तुझ्या मानेवर ठेवलेलं आहे. आणि हे हालतं बघ ! बघ, जरा जोर लावून तुटतं का ते..." आणि मग आमच्या मनातली नैसर्गिक ऊर्मी उफाळून आली, हे जोखड आम्ही झुगारून दिलं.
कुठल्याही मोठ्या कामासारखी याही गुलामगिरी झुगारण्याची सुरुवात एकट्यानेच झाली. हा 'एक' पुढच्या अनेक पिढ्यांना दिशादर्शक बनला. देशाच्या आणि समाजाच्या सुदैवाने हा 'एक' खरंच विचारवंत होता. याच्या विचाराची बैठक जरी नवी होती तरी त्याने भारतीय विवेक सोडला नव्हता. त्याला समाज तोडायचा नव्हता, तर समाजाचा अधू - पंगू झालेला भाग जागा करून त्याला सक्षम करायचा होता. त्याभागाकडे ज्ञान रुपी रक्त पोहोचवण्यासाठी शिक्षणाच्या रक्तवाहिन्या पसरवणे आवश्यक होते. त्याच वेळी इतर प्रलोभनांपासून स्वतः व आपल्या अनुयायांना दूर ठेवणे आवश्यक होते. शक्य तेवढं समाजाला समजावून सांगावं, जमेल ते करून दाखवावं, आणि वेळ प्रसंगी आई जसं मुलांचं नाक दाबून का होईन पण त्याच्या हिताचं असं औषध त्याच्या गळ्याखाली उतरवते तशी भूमिका घ्यायची.
आपल्या विचारांवर आणि आपल्या कामाच्या दिशेवर तो 'एक' कायम होता. तो विद्रोही होता, तो बंडखोर होता,पण तो केवळ विध्वंसावर लक्ष ठेवून नव्हता तर त्याला सृजन हवं होतं, अत्यंत नैसर्गिक सृजन मानसाला माणूस म्हणून मान्यता द्या आणि त्याला विकासाची संधी द्या एवढंच त्यांचं मागणं होतं.
त्यासाठी त्याने अनेक कष्ट केले, स्वतःच्या पत्नीला शिकवले, तिला मुलींची शाळा काढून दिली. यासाठी समाजाचा प्रखर विरोध तर सहन केलाच पण आपल्या प्रसंगी स्वतःच्या घरातून बाहेर पडण्याची रस्त्यावर येण्याचीही तयारी ठेवली, पुढे तसं घडलंही. अशिक्षितांना शिकवणं हे आज चांगलं काम मानलं जातं मात्र ते चांगलं काम करण्यासाठी त्यांना रोज शेण आणि चिखल अंगावर घ्यावा लागला.
फक्त स्त्रियाच नाही तर अस्पृश्यांना सुद्धा शिकता आलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा शाळा काढल्या, हे सर्व घडत होतं १८४८ च्या काळात तेव्हा जेव्हा महाराष्ट्रात , पुण्यात पेशवाई संपून जेमतेम ३० वर्षे होत होती. 'उत्तर पेशवाई'चा हंगओव्हर येथील जनतेत बाकी होता. लोकहितवादींसारखे लोक पेशवाई का बुडली आदींवर सुद्धा हिरहिरींनी लिहीत होते व (मोजकेच) लोक ते वाचत होते. असा तो काळ.
धर्म आणि प्रथांचा घट्ट पगडा सगळ्या समाजमनावर होता.शेकडो वर्षे अंधारात काढलेल्या लोकांना प्रकाशाची किरणे सहन होत नव्हती. हा देवाचा कोप आहे की काय असं त्यांना वाटे. त्यांच्या खुळचट कल्पना दूर करण्यासाठी ह्या 'एका'ने लेखनी हाती घेतली. त्याकाळी आवश्यक असे जे-जे काही होते ते-ते त्यांनी लिहिले. समाजासाठी आवश्यक ते लिहिले. आवडेल ते लिहिले की नाही यात शंका आहे. मात्र आवश्यक ते नक्की लिहिले.
त्यांचं लिखाण हेतुमुलक कुणाच्याही विरोधात नव्हतं, आणि त्यांचं काम सुद्धा कुणाच्या ही विरोधात नव्हतं. त्यांचं काम होतं समाजाच्या दुर्बल घटकाला सामर्थ्य प्राप्त करून देण्याचं, त्यांच्या पंखात बळ भरण्याचं. त्यांचं काम एका घटकाच्या हिताचं होतं, त्यांच्या विकासाचं होतं. मात्र त्याच मुळे ज्यांचे हितसंबंध ह्या समाज घटकाला अविकसित ठेवण्यात , त्यांना मानसिक गुलामगिरीत पिचत ठेवण्यात गुंतले होते, त्यांच्या विरोधात हे काम आहे असं त्यांना वाटायला लागलं. ते ह्याला 'एक'टा पाहून विरोध करायला लागले. सुदैवाने ह्याने ते व्यक्तीगत अथवा भावनिक पातळीवर न घेता अत्यंत विचाराने त्याचं काम चालू ठेवलं.
फुल्यांचं काम हे त्याकाळच्या शासन यंत्रणेला त्यांचे हितसंबंध जोपासणारं वाटलं त्यामुळे व्यवस्थेने त्यांना मदत करायला सुरुवात केली, ह्या एकाने ती घेतलीही, मात्र समाजाच्या दुर्बल घटकांचे सबलीकरण करायचे हा आपला हेतू दूर होऊ दिला नाही. सरकारने भिक्षुकी साठी दिला जाणारा निधी (दक्षीणाफंड) शिक्षणासाठी देणे सुरू केले, साहजिकच काहींचे हितसंबंध दुखावले गेले. त्यामुळे 'त्याला' विरोध सुरू झाला. 'तो' मात्र आपल्या कार्यात मग्न होता. त्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी 'त्याची' होती. हळू शिक्षण प्रसाराचे काम जोर पकडू लागले. सहकारी जमू लागले. सगळं स्थिरस्थावर झालं आहे. आणि येथे संघर्षाची गरज तेवढी नाही हे लक्षात आल्यावर एका निरपेक्ष संतासारखा 'त्याने' त्या शिक्षण प्रसाराच्या व्यवस्थेतून आपला सहभाग कमी केला आणि आता कार्याचा बिंदू केला शेतकरी.
ज्या सरकारची मदत घेऊन शिक्षण प्रसाराचं काम केलं त्याच सरकार विरुद्ध नगर जिल्ह्यात खरफोडीचं आंदोलन केलं , कारण काय तर सरकारचे काम आहे शेतकऱ्यांचे हित जपणे आणि ते काम सरकार चोखपणे करत नाही. सरकार अडचणीत आणि सरकारचे हितसंबंध धोक्यात.
सरकारने धरणे बांधली पण धरणात अडवलेलं पाणी वापरायला शेतकरी तयार होईनात कारण ते पाणी मेलंय असा समज आणि मेलेल्या पाण्याने पीक कसं येईल? हा प्रश्न. त्या 'एका'ने स्वतः धरणाच्या पाण्याने शेती केली व भरघोस उत्पन्न काढून दाखवलं. शेतकर्याने प्रगतिशील राहावे, नव्या तंत्रज्ञानाची जोपासना करावी हेच त्याला दाखवायचे होते.
स्त्रियांचं शिक्षण, शेतकरी सबलीकरण, आदी नंतर त्यांनी हिंदू धर्मातील वाईट चालींचा विरोध केला. विधवांचं केशवपण करून त्यांना विद्रूप करण्याची वाईट चाल समाजात होती. जे ज्योतीबांवर जातीद्वेषी म्हणून आरोप लावतात त्यांनी(फक्त त्यांनीच) लक्षात घ्यावे की ही चाल प्रामुख्याने समाजाच्या ज्योतीबांना विरोध करणार्याच गटात होती, मात्र ह्या 'एका'ने 'तसा' विचार केला नाही. ही केशवपनाची वाईटचाल दूर व्हावी म्हणून पुण्यात न्हाव्ह्यांचा संप घडवून आणला. लहान वयात वैधव्य आलेल्या विधवांचा गैरफायदा त्याकाळी घेतल्या जायचा. विचार करा, केशवपण करून कुठेही समाजात फिरण्याची बंदी असलेल्या ह्या स्त्रिया जेव्हा अश्या गैरफायदा घेतल्या गेल्याने गर्भार राहायचा तेव्हा त्यांना कुठेच आसरा मिळायचा नाही. ह्या सर्वाला केवळ तिलाच दोषी मानलं जायचं आणि त्यामुळे पुढे असं जन्मलेलं मूल कचर्याच्या कुंडीत फेकलं जायचं .
हे सर्व पाहून तो 'एक' हेलावला. त्याने बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. सोबत एक पत्रक सुद्धा की, 'येथे या, निश्चिंतपणे बाळंत व्हा, हवं असल्यास मूल सोबत न्या, नको असल्यास खुशाल येथे सोडून जा आम्ही त्याचा सांभाळ करू.'
त्याकाळच्या समाजप्रमुखांना हे मान्य नव्हतं, हे म्हणजे धर्म बाह्य वर्तन होतं. त्यावेळेस त्यांच्यावर मारेकरी सुद्धा घालण्यात आले होते. पण त्यांना मारायला गेलेल्या लोकांना हा 'एक' रात्री जागून अनाथ मुलांची काळजी घेताना दिसला. हातातली शस्त्रे गळून पडली, पुढे ह्यातील एक आजन्म त्या 'एकाचा' संरक्षक म्हणून सोबत राहिला.
दीनदुबळ्या लोकांची कैफियत मांडण्यासाठी दिनबंधु सुरू केलं. पुढे जसजसा लोकसंपर्क वाढला विचार पक्का होत गेला, चिंतन गहिरं झालं, मुळात आपल्या समाजाच्या आकलनातच चूक आहे. खरं सत्त्व बाजूला ठेवून आपण कर्मकांडाच्याच मागे आहोत. म्हणून मग या सत्याच्या शोधासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सर्वसाक्षी जगत्पती| त्याला नकोच मध्यस्ती ||
हे त्यांचं साधं सरळ तत्त्वज्ञान , स्त्री पुरूष समानता, शिक्षणाचा हक्क, आधुनिक विचारसरणी आदींचा पुरस्कार त्यांनी केला. हे सर्व त्यांनी आपल्या जीवनात सुद्धा आचरणात आणले.
येथे एक प्रसंग देण्याचा मोह होतोय.
ज्योतीबांना मूल होत नव्हतं. त्यांनी दुसरा विवाह करावा असा त्यांच्या घरच्यांचा आग्रह. मात्र ते ऐकेनात, म्हणून त्यांना समजावण्यासाठी त्यांचे सासरे म्हणजे सावित्रीबाईंचे वडील आले, त्यांचं बोलणं झाल्यावर ज्योतीबां त्यांना म्हणाले की ठी़क आहे तुमच्या म्हणण्या नुसार माझ्या बायकोला मूल होत नाही म्हणून मी दुसरे लग्न करायला तयार आहे. पण त्या आधी मी माझी तपासणी करून घेईल , माझ्यात काही दोष निघाला तर तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न लावून द्याल असं वचन द्या.
सासरे बुवा आल्या पाऊली परत गेले. पुढे ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृहातील एक मूल दत्तक घेतले होते.
ज्योतीबांनीच रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्यावर फुले अर्पण केली. त्यांच्यावर पोवाडा रचला. शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव पुढे बंद पडला, त्या नंतर टिळकांनी तो पुन्हा सुरू केला.
जनसामान्यांना धर्माचं खरं रूप समजावून सांगणे, त्यांच्यासाठी धर्म विधी सोपा करणे, लग्नात मंगलाष्टकं मराठीत म्हणवून घेणे, स्त्रिया व विधवांच्या सबलीकरणासाठी काम करणे, अस्पृश्य समाजाला शिक्षण देणे आदी सगळ्या बाबी एका विशिष्ट गटाच्या हितसंबंधाच्या आड येत होत्या. त्यामुळे साहजिकच फुल्यांच्या विरोधात लिखाण केलं गेलं असेल.
भारतातील सर्वात पहिली कामगार संघटना नारायण मेधाजी लोखंडे यांनी तयार केली. हे ना.मे. लोखंडे फुल्यांचेच शिष्य. समाजातील प्रत्येक पिडीत व शोषित घटकाला न्याय मिळावा म्हणून झटणार हा 'एक' महात्मा ! ज्योतीबा फुले.

