धर्म
मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .
प्रेषक लालसा ( शनी, 03/20/2010 - 11:50) .http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/
प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे ....
तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे .......
धन्यवाद!!
वास्तुशांती व गणेशपूजन : सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
प्रेषक नरेश_ ( सोम, 03/15/2010 - 20:10) .// श्रीगणेशाय नम: //
सप्रेम नमस्कार वि. वि.
आमचे येथे श्रीकृपेकरुन, पनवेल येथील नुतन वास्तुचा गृहप्रवेश व गणेशपूजन विधी, बुधवार दि. २४/३/१० रोजी (रामनवमी )सकाळी ११ वाजल्यापासून पुढे आयोजित केला आहे, तरी आपण सहकुटूंब, सहपरिवार मित्रवर्यांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, व स्नेहभोजनाला उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे ही आग्रहाची विनंती.
स्नेहभोजनाची वेळ : दु.१ ते ३
ठिकाण : ए-१६, साई-पार्क बिल्डिंग्,४था मजला ,छत्रपती संभाजी मैदानामागे,
पनवेल नगरपालिका कार्यालयाजवळ, पनवेल जि. रायगड.
आपले कृपाभिलाषी- डॉ. नरेश सोष्टे , व परिवार.
संपर्क : ९८८१३४३९९८
विंदांकडून काय घ्यावे?
प्रेषक चिंतातुरजंतू ( सोम, 03/15/2010 - 13:54) .वक्रतुंड महाकाय गणपतीच्या
सोंडेकडे पाहून (अश्लील वाङ्मय
चोरून वाचणार्या) एका प्रमदेला
कामेच्छा झाली
तिचे दोन्ही मोदक स्तन
चट्टदिशी घट्ट धरून
वक्रतुंड महाकाय गणपतीने
तिला एकवीस वेळा आकाशात गरगर
फिरवली
आणि जेहेत्तेकालाचेठायी
श्लील नामक घोर नरकामध्ये
फेकून दिली.
दचकलात? संपादित करायला हात शिवशिवू लागले? दुखावण्यास भावना सरसावल्या? थोडे थांबा. ज्यांना श्रध्दांजली वाहायला गेल्या चोवीस तासांत शेकडो धावले असे गूगल सांगते, त्या विंदांच्या लेखणीतून ही विरुपिका उतरली आहे. विरुपाचे रूप दाखवणार्या या विरुपिकेस १९७३ साली प्रसिध्दी मिळाली आणि त्याविषयी वादही झाले. तेव्हा खुद्द विंदांनी त्याविषयी जे निरुपण केले, ते असे (अधोरेखिते आमची):
‘सत्यकथे’च्या ऑगस्ट १९७३च्या अंकात माझ्या पंधरा कविता प्रसिद्ध झाल्या. त्यातल्या काही ‘विरूपिका’ होत्या. त्यातील ‘वक्रतुंड महाकाय’ या शब्दांनी सुरू होणार्या विरूपिकेसंबंधी आपल्या समाजातील काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आढळल्या. प्रथम पुण्याच्या वर्तमानपत्रांत तिच्याविरुद्ध पत्रे व लेख येऊ लागले. नंतर काही जिल्हापत्रांनी तिच्याविरुद्ध अग्रलेख लिहिले. पाठोपाठ सांगली व बार्शीसारख्या शहरांतून कवीचा व संपादकांचा निषेध करणार्या सभा व मोर्चे झाले. एका नगरपालिकेने व काही महिला मंडळांनी निर्भर्त्सना करणारे ठराव पाठवले. भावे-माडगूळकरांनी अध्यक्षस्थानावरून प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वैयक्तिक धमकावण्या आल्या.
माझ्या पुस्तकांची होळी करण्यात आली. हे सर्व इतके जलद व पद्धतशीरपणे होत गेले की, त्या माझ्या दहा ओळींच्या कवितेतील विशिष्ट मजकुरामुळेच हे घडत आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण वाटावे. या सर्व प्रकारांत प्रतिगामी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतलेला आढळला. या संधीचा फायदा उठवून जनतेपासून अलग पडलेल्या प्रतिगाम्यांचा भक्तिभावनेच्या आधाराने पुन्हा एकदा जनतेशी जवळीक साधण्याचा हा एक प्रयत्न तर नव्हे?
काही असले तरी त्या कवितेच्या रूपाविषयी, तिच्यातील आशयाविषयी व तिच्या लेखामागील माझ्या हेतूविषयी काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे किंवा तो करून दिला जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या कवितेसंबंधी माझी भूमिका संबंधित लोकांनी शांतपणे समजून घेतली तर हा सर्व विरोध अनाठायी आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईल.
पहिली गोष्ट म्हणजे ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका आहे; रूढ चाकोरीतील कविता नव्हे. अभिव्यक्तीचा एक नवा प्रकार शोधण्याचा हा प्रयत्न आहे. अर्वाचीन चित्रकलेत प्ररूपीकरण (अॅब्स्ट्रॅक्शन), प्रवाहीकरण (सर्रिअॅलिझम) व प्रकल्प (फँटसी) या प्रक्रिया वेगवेगळय़ा पद्धतीने प्रकट होताना आढळतात. तशाच स्वरूपाच्या बंदिश शब्दांच्या साहाय्याने निर्माण करता आली तर पाहावी, ही त्या अंगातील अनेक विरूपिका लिहिण्यामागील माझी प्रमुख प्रेरणा होती. प्रस्तुत विरूपिका ही अल्प प्रमाणात प्ररूपीकरणावर व मुख्यत: प्रकल्पावर आधारलेली आहे. वास्तवाच्या अंगाने- म्हणजे गणपती प्रत्यक्षात जसा दिसतो तशा अंगाने- तिच्याकडे पाहणे चुकीचे आहे. माझा हेतू गणपती किंवा प्रमदा यांचे यथातथ्य चित्रण करणे हा नसून, विशिष्ट प्रकारच्या प्रकल्पनातून एका व्यापक आशयाला भिडण्याचा, निदान त्या व्यापक आशयाकडे झेपावण्याचा आहे.
तो व्यापक आशय असा : जीवनाचे अंशदर्शन घेऊन त्यात रमणे हीच खरी विकृती आहे. अश्लील आणि श्लील असे द्वैत कल्पिणे म्हणजे जीवनाच्या व्यापक व एकात्म साक्षात्काराला पारखे होणे, शरीराचे अवयव सुटे-सुटे पाहिले की अभद्रता जाणवते, पण एकात्मतेने पाहिले की सौंदर्याचा प्रत्यय येतो; तसेच
जीवनाचे व कलेचेही आहे. जीवनाच्या एकात्म साक्षात्कारात अश्लील व श्लील या सुट्या कल्पनांचा कायाकल्प होतो. ही साकल्यवादी दृष्टी निकोप प्रकृतीच्या माणसामध्ये व पर्यायाने श्रेष्ठ कलाकृतीमध्ये
अभिप्रेत असते. या विरूपिकेतील ‘प्रमदा’ ही ‘अश्लील वाङ्मय चोरून वाचणारी’ आहे; त्यामुळे तिचे मन विकृत झाले आहे आणि तिचे मन विकृत आहे म्हणूनच मंगलाचे दर्शन घेत असताना ती अमंगल वासनेच्या आहारी जाते. अश्लील वाङ्मयाचा चोरटा आस्वाद घेणार्या सर्वच विकृत स्त्री-पुरुषांची ती
प्रतिनिधी आहे. अशा लोकांचे स्थित्यंतर झाले तरी अश्लीलाच्या नरकातून निघून श्लीलाच्या नरकात जाऊन
पोहोचतात : एका प्रकारच्या अंशदर्शनातून दुसर्या प्रकारच्या अंशदर्शनाकडे. फक्त निकोप वृत्तीची माणसेच
जीवनाचा व कलेचा साकल्याने व एकात्मवृत्तीने वेध घेऊ शकतात. मंगलाच्या दर्शनात अमंगल वासनेच्या आहारी जाणार्या त्या प्रमदेला गणपती शिक्षा करतो. तिला श्लीलाच्या नरकात फेकतो. ते करीत असताना त्याच्या मनात तिच्या स्तनांविषयी कोणतीही अमंगल भावना नसते. हे सूचित करण्यासाठीच ‘मोदक’ हा शब्द स्तनांच्या उल्लेखामागे आहे. या मोदकाशी संबंधित असलेली भावनेची छटा पावित्र्याची आहे, नैवेद्याची आहे. हे सूचित व्हावे, यासाठी पुढे वेगळ्या संबंधांत ‘एकवीस’ हा शब्द
मुद्दाम योजलेला आहे. कारण नैवेद्य एकवीस मोदकांचा असतो. ‘जेहेत्तेकालाचेठायी’ या शब्दांनी हे सर्व चित्रण प्रकल्पनाच्या पातळीवरचे आहे, वास्तवाच्या पातळीवरचे नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सूचित केली आहे. कारण हरदासी कथेमध्ये अशक्यप्राय घटनांना त्या शब्दांनी उठाव दिलेला असतो. सारांश, या विरूपिकेचा आशय विकृतीचे खंडन करणारा आहे; विकृतीचे मंडन करणारा नाही व तिच्या लेखनामागील हेतू कोणत्याही प्रकारे गणपतीची (अप्रतिष्ठा करणे नसून - आमचा अंदाज; मूळ शब्द उपलब्ध नाहीत) नेमका उलट आहे : गणपतीचे मंगल स्वरूप गृहीत धरल्यामुळे कवीने त्याला अमंगलाचा निखंदक म्हणून उभा केला आहे.
पण मी गणपतीच का निवडला? गणपतीची बीजकथा (मिथ) ही विरूपिकेतील आशयाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण वाटली म्हणून. या विशिष्ट काव्यप्रकाराला मी विरूपिका म्हणत होतो आणि गणपतीला आपल्या परंपरेत कुठे तरी ‘विरूपांचा विरूप’ म्हटले गेल्याचे स्मरत होते. शिवाय या लिखाणात अर्थाचे उलटसुलट पलटे होते; म्हणून परस्परविरुद्ध अर्थाच्या कक्षा सूचित करील अशी बीजकथा मला हवी होती. गणपतीची बीजकथा त्या अर्थाने संदर्भ-श्रीमंत होती. गणपती हा आर्यांचा होता, तसाच अनार्यांचा होता; वैदिकांचा होता, तसाच व्रात्यांचा होता. ऋग्वेदातील अभ्युदयेच्छू ऋषी त्याला ‘गणनांत्त्र गणपती’ व ‘कवि कवींनां’ म्हणत होते, तर यजुर्वेदातील गमेंच्छु स्त्रिया त्याला ‘आत्वं अजासि गर्भधं’ असे आवाहन करीत होत्या. एका बाजूने तो कुलप्रतिकाशी (टोटम) संबंधित, तर दुस-या बाजूने आदिम साम्यवादी गणराज्याशी, स्मृतिकारांचा गणपती बुद्धिहर्ता व विघ्नकर्ता तर पुराणांचा गणपती बुद्धिदाता व विघ्नहर्ता. तांत्रिकांचा वामाचारी, तर संतांचा मूर्तिमंत मांगल्य. पार्वतीने आपल्या अंगावरील मळातून या मंगलमूर्तीची निर्मिती केली. या एका आख्यायिकेतच जणू काय गणपतीच्या आयुष्यातील सर्व संक्रमणे सूचित होऊन जातात. शिवाय गणपतीची बीजकथा अजून पूर्णपणे गोठलेली नाही; सार्वजनिक गणपती अजूनही वाटल्यास गांधी टोपी घालू शकतो! म्हणूनच या गणपतीच्या आधारे काव्यात्म प्रकल्पनाचे आवश्यक ते स्वातंत्र्य व श्लील-अश्लीलाला छेद देणारे मांगल्याचे तत्त्वसूचन ही दोन्हीही मला साधता आली. शिवाय, अशी गोष्ट मी या कवितेत प्रथमच केली असेही नव्हे. विनोदी अंगाने माझ्या काही बालगीतांत व गंभीर अंगाने
‘हिमयोग’सारख्या माझ्या कवितेत हा गणपती पूर्वीही आलेला आहे. नवकाव्याला समृद्ध करणार्या अनेक मार्गांपैकी प्राचीन बीजकथांचा व प्रतीकांचा सृजनशील उपयोग हा एक प्रभावी मार्ग आहे, असे मी नेहमीच मानीत आलो आहे. या बीजकथांतील शब्दांचा वेध रूढ चाकोरीतून घेतल्यास ज्या गफलती होतात, त्याचेच हे प्रकरण म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
काव्याचा सूक्ष्म विचार करण्याची सवय व सवड नसलेल्या सामान्य नागरिकाला या वेगळ्या रीतीने शब्दवेध घेणे थोडेफार कठीण जात असेल, याची मला कल्पना आहे. त्यामुळेच प्रतिगाम्यांना माझ्याविषयी, संपादकांविषयी व त्या कवितेविषयी गैरसमज पसरविणे शक्य झाले असावे. ते गैरसमज दूर व्हावेत, या हेतूनेच हे सर्व लिहीत आहे. गणपती हा माझ्याही सांस्कृतिक वारशाचा एक अभिन्न भाग आहे; गणपतीच्या परंपराप्राप्त कथा, अष्टविनायकांच्या व इतर शिल्पांमधून त्याचा आढळणारा रूपविलास व त्याच्या वास्तव रूपाशी संबंध असलेली प्रतीकात्मकता, ही सर्व मलाही इतर भारतीयांइतकीच प्रिय आहेत. ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका लिहिताना माझ्या मनात गणपतीची अप्रतिष्ठा करावी किंवा सश्रद्ध माणसांच्या भावना दुखवाव्या, असा पोरकट हेतू बिलकूल नव्हता; माझा हेतू, व्यापक व एकात्म अशा गंभीर जीवनदृष्टीकडे अंगुलिनिर्देश करणारा एक गमतीचा व वेगळा आकृतिबंध निर्माण करावा, एवढाच होता.
विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्यप्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही; ते एक स्फुरण असते. विकसनाच्या व बहुरूपत्वाच्या अनेक शक्यता त्यात सामावलेल्या असतात. हळूहळू त्या प्रगट होत जातात आणि त्यानंतर समीक्षेच्या दृष्टीने सोयीची वाटणारी अशी त्याची व्याख्याही घडविली जाऊ लागते; पण ती व्याख्यासुद्धा कामचलावू, कार्यकारी व्याख्याच असते, हे विसरता कामा नये. ती अपरिवर्तनीय नसते. कोणत्याही काव्यप्रकाराची तर्कशुद्ध व्याख्या ही गोष्ट तर्कदृष्ट्याच असंभवनीय आहे. कारण स्वत:ची ओळख पटविण्याइतपत साकल्याधिष्ठित स्वत्व (आयडेंटिटी) त्याच्याजवळ कमी-जास्त प्रमाणात असले, तरी एखदा प्राणभूत गुणधर्म अथवा सत्त्व (इसेन्स) किंवा फक्त त्याचे असे व्यवच्छेदक लक्षण (डिफट्रिया) त्याच्याजवळ नसते.
(गो. वि. ऊर्फ विंदा करंदीकर यांच्या, ‘परंपरा आणि नवता’ या ग्रंथातून साभार)
आता वाचकांनी यातून काय बोध घ्यावा? अनेक शक्यता आहेत, जसे:
- थोडे आधी सांगायचे; यांनाही कतारला पाठवले असते.
- शेवटी यांचेही पाय (कोंकणांतल्या फोकलिच्यांनी कुले असे वाचावे) मातीचेच निघाले. (कडवे डावे) विचारवंत कडू ते कडूच, ज्ञानपीठात तळा किंवा लोकप्रियतेत घोळवा.
- ते हिंदू आहेत; त्यांना असे म्हणण्याचा हक्क आहे. (नास्तिक असले म्हणून काय झाले?)
- आम्हांस ऋषितुल्य असलेल्या विंदांविषयी ते मेल्यावर असे वाईटसाईट पसरवणार्यासच चोपला पाहिजे. सूचना: आम्ही हे प्रहारमधून उचलले, त्यामुळे आधी नारायण राण्यांस चोपा. आम्हांस आनंदच होईल
- विंदा काय बोलले काही कळत नाही ब्वॉ. जाऊदेत आपण आपले मेलेल्यास नमस्कार करून मोकळे व्हावे, हे बरे.
अगस्त्य जीव नाडी भाग ४...
प्रेषक शशिकांत ओक ( बुध, 03/10/2010 - 19:18) .अगस्त्य जीव नाडी भाग ४...
महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
....
‘महर्षी म्हणतात, इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते!.... पुढे वाचा...
....एक गाडी अशी एकाकी का थांबलेली आहे असे पाहून आन्ध्रप्रदेश राज्य परिवहनमंडळाची बस थांबली. त्या पाठोपाठ एक पोलिसांची गाडी येऊन थडकली. त्यांना सांगितले गेले काय काय झाले ते, ते ऐकून त्यातील पोलिस प्रमुखाला जीवनाडीबद्दल उत्सुकता वाटली. घटनेची पोलिस कंप्लेंट करायला लक्षाधीश लागले. इकडे पोलिस गाडीत बसून जीवनाडी वाचायला दासन यांनी सुरवात केली. ते म्हणाले की तुझा एक भाऊ लहानपणीच हरवला व वारला असा समज आहे. पण तसे नाही. तो जीवंत आहे. काही वाईट लोकाच्या संगतीत राहून तो चोऱायला, डाके घालण्यास लागला व नंतर दहशतवादी कृत्ये करू लागला. नक्षली बनून टोळ्याकरून डाके घालू लागला. त्याने आपले नावही बदलले आहे. तो आता ‘नागी रेड्डी’ म्हणवतो. ते सर्व ऐकून त्या पोलिस अधिकाऱ्याला आपल्या धाकट्या भावाबद्दल फारच आश्चर्य वाटले. त्याची चिंता वाटून ‘आता तो कुठे असेल?’ असे त्याने अगस्त्यांना विचारले. हनुमत दासनी त्याच्या काळजीचे कारण लक्षात घेऊन पट्टी पुढे वाचून सांगितले की ‘महर्षी म्हणतात, आत्ता तुला तुझे लक्ष्य दाखवले आहे. यानंतरचे शोधायचे काम तुला करायचे आहे. मात्र इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
ते वाचन संपले व ताडपट्ट्या गुंडाळता गुंडाळता दासनना वाटले की पूरग्रस्त परिस्थती, नंतर ही नक्षली लोकांची धाड, त्यांच्याकडून पट्ट्या पळवल्या जाण्याची व सर्वकाही लुटले जाण्याची शक्यता, या सारख्या सध्याच्या भीषण परिस्थितीला ते तर जबाबदार नाहीत? माझ्याकडून काही आगळीक तर झाली नाही? त्यांनी आपल्यासाठी पुन्हा पट्ट्या उघडल्या. त्यात त्यांनी वाचले की हे सर्व होण्याला त्या लक्षाधीशाच्या आणखी एका अंबॅसेडरकारमधील एक स्त्री कारणीभूत आहे. तिला धडा शिकवण्यासाठी हे घडले आहे. महर्षी म्हणाले, ‘तिने नजरचुकवून या पट्ट्यांतील दोन ताडपट्ट्याची पाने पळवली आहेत. ती तिने आपल्या साडीत लपवली आहेत. त्यातच तिची मासिक पाळी चालू असल्याचे तिने इतरांपासून लपवून ठेवले आहे. तिचा उद्देश चोरी करण्याचा नाही पण उत्सुकते पोटी तिने ते केले आहे. तिला तिच्या कृत्याचा धसका बसावा व अद्दल घडावी म्हणून नक्षली लोकांच्या धाडीचा उपद्रव वाटेत घडवला गेला.’ ते ऐकून दासन विचारात पडले. त्या पट्ट्या तिच्याकडून परत कशा मिळवायच्या? महर्षींना म्हणाले, ‘आता मी काय कराय़चे? महर्षी म्हणाले, ‘तू काही करु नकोस. त्या बाईकडून मिळवल्या तरी त्या आता काही कामाच्या नाहीत. कारण त्या चोंबाळून दुमडून खराब झाल्या आहेत. त्यात मी नाही आहे.’ ते सर्व ऐकून हनुमत दासन सर्द झाले. त्यांना वाटू लागले की असे वारंवार घडले तर पट्यांची निगराणी व संरक्षण करायचे तरी कसे? त्या वाचनात त्यांना या बाबत सांगण्यात आले. ‘त्याची काळजी करायची तुला गरज नाही. मात्र या घटनेमुळे गंगेच्या किनारी गोमुख नावाचे स्थान आहे. तेथे जाऊन तुला एक पूजा करावी लागेल. त्यापुजेत तुला एका आर्मीतील अधिकाऱ्याची मदत मिळेल. त्याच दरम्यान त्याला मोठ्या कौटुंबिक संकटातून मी सोडवेन. त्यावेळी वाटेत तु जीवनाडीपट्ट्यांना घेऊन प्रत्येक ठिकाणी गंगेच्या पवित्र जलाने पुजा करत करत हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ करत गोमुखला न्यावेस. पुजा करून परतल्यावर त्यानंतर या नाडीपट्ट्यांचे समसमान दोन भाग करायचे. त्यातील तू एक ठेवायची व उरलेली पाने कोणाला द्यायची ते मी ठरवेन. तुझ्य़ाकडील पानातून मी गरजूंच्या समस्यांनाना पौर्णिमा ते अमावास्या या काळात व अश्विनी व रेवती या नक्षत्रांच्या दिवशी उत्तरे व उपाय सांगेन.’
दासन यांच्या मनांत दोन गोष्टींची रुखरुख होती. ‘एक त्या बाईने घेतलेल्या पट्ट्यांची तिला सजा होणार की तिला माफ केले जाणार? व दुसरे असे की या जीवनाडीच्या पट्यांचे असे दोन भाग करायची अगदीच गरज आहे काय? त्या संपुर्ण माझ्याकडेच का नकोत? महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
असे म्हणेपर्यंत करकचून ब्रेक लावून गाडी थांबल्याच्या आवाजाने दासन यांचे भान तुटले. ती गाडी होती ज्यात त्या बाई बसलेल्या होत्या त्या गाडीची! ती गाडी मागून आली होती. ‘त्यातील मागे बसलेल्या एका व्यक्तीचे जोरजोरात विव्हळणे ऐकू येऊ लागले. ते पाहून दासनांच्या सह सर्व तेथे धावले. त्या बाईच्या पोटात अत्यंत जोरात कळा येत होत्या. ती वेदनेने कळवळत होती. तिच्या त्या भयानक पोटदुखीचे कारण दासनांच्या ताबडतोब लक्षात आले. ते त्या लक्षाधीश व्यक्तीच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या बाईला साडीत लपवलेली नाडीग्रंथाची पाने परत करायला सांगितले.
‘ती म्हणाली मला त्या चोरायच्या नव्हत्या. पण आपल्याजवळ असाव्यात असे वाटून मी त्या लपवल्या होत्या. आधीच माझे पोट दुखत होते. ते यापट्ट्या लपवल्या पासून अतिशय तीव्र झाले. आता मला सहन न होण्यापलिकडे गेले आहे.’ असे म्हणून तिने त्या लपवलेल्या पट्ट्या दूर फेकल्या. त्यानंतर तिची व्यथा एकदम कमी झाली. त्यावर त्याकुटुंबाने घडलेल्या घटनेबद्दल माफी मागून दासनांचे व महर्षी अगस्त्यांचे आभार मानले.
पुढला प्रवास दासनांनी त्यांच्या कारमधून न करता पोलिसांच्या गाडीतून करायचे ठरवले. पोलिसांची गाडी रेल्वे स्टेशनचा 20 किमीचा रस्ता कापू लागली. ते चेन्नईचे तिकिट काढून ते पोलिसांसह प्लॅटफॉर्मवर येऊन बसले. पुढची ट्रेन रात्री 1 नंतर येणार असे कळले. त्यामुळे मधे खूप वेळ होता. काही वेळ गेला असेल, तेवढ्यात हातात शस्त्रे परजत कोणी लुटारू लोक आलेले पाहून तिकिटविक्रीची खिडकी व तेथील दिवे घाईने बंद केल्यामुळे अंधारगुडुप्प झाला. रात्रीच्यावेळचा चंद्रप्रकाश व दूरवर मिणमिणते लाईट फक्त होते. त्यांनी लोकांना वेढा घातला. मात्र ते पोलीस असल्याचे लक्षात आल्यावर ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग पोलीस करू लागले. अंधाराचा फायदा घेऊन काही जण पसार झाले. काही वेळाने एकाला पोलिसांनी पकडून आणलेला दासनांनी पाहिला. ज्या पोलिसाला दासनांनी अगस्त्य नाडीचे वाचन पोलिसांच्या लॉरीत केले होते त्याला विचारता कळले की पकडला गेलेला माणूसही त्या आधीच्या नक्षली टोळीपैकी होता. हा पकडला गेला. बाकीचे पसार झाले. ते त्याला घेऊन कारवाई करायला निघुन गेले. नंतर गाडी आली. घडलेल्या घटनेची गाडी थांबल्यावर प्लॅटफॉर्मवर चर्चा झाली. दासननी जनरल डब्यात प्रवेश केला नंतर त्यांना टीटीईने कनफर्म्ड बर्थ दिला. त्यांच्या आपापसातील बोलण्यातून त्यांना कळले की पकडला गेलेल्या माणसाचे नाव ‘नागीरेड्डी’ होते. ते नाव त्यांच्या कानावर पडताच तो त्या पोलिसाचा लहानपणी हरवला भाऊ तर नव्हे? असे वाटून ते महर्षींकडून जाणून घ्यायची उत्सुकता त्यांना लागली. यथावकाश त्यांना वाचनातून नागीरेड्डी तोच होता असे महर्षींनीही सांगून खात्री केली! ... क्रमशः
(अशीच एक जीव नाडी सध्या पुण्यात उपलब्ध आहे. इच्छुकांनी लेखकाशी रात्री ९ ते १०च्या दरम्यान संपर्क करावा)
संकलक – विंग कमांडर शशिकांत ओक . मो - 9881901049,
दहशत वादाला धर्म नसेल पण जिहादला धर्म असतोच
प्रेषक सागरलहरी ( शनी, 03/06/2010 - 11:14) .दहशत वादाला धर्म नसेल पण जिहादला धर्म असतोच , तसे नसते तर जगातला कुठलाही मुस्लिम तरुण अफगाणिस्तान , इराक वा काश्मीर - पॅलेस्टाईन ही कारणे दाखवून घातपातास का पुढे सरसावतो ?
सुशिक्षित उच्चभृ मुस्लिम तरुण ( संगणक अभियंता - १ लाख रुपये महिना पगार ) जिहादी हिंसाचाराकडे का आकर्षित होतात ?
उल्फा , नक्षल, लिट्टे इ. आंदोलने बव्हंशी त्या त्या भागातील समस्यांपुरती त्यांच्या सीमित होती.
हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...
प्रेषक चिंतातुरजंतू ( शुक्र, 02/26/2010 - 18:32) .मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
- परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
- या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते? आम्हांस वाटले होते की ९५ वर्षांच्या वृध्दास कोठडीत डांबून तृतीय रत्न दाखविल्यास नालस्ती होण्याची शक्यता होती.
- 'भारतात अल्पसंख्याकांच्या जिवास धोका आहे' असा अपप्रचार करण्यास इस्लामी आणि मानवतावादी यांचे फावते. - यास इलाज काय? अखेर, हुसेन यांच्यावर हल्ले आपणच केले, १२५०खटले आपणच भरले, त्यांविषयीच्या हलाहलाने आंतरजाल आपणच भरले. मग आता त्याची फळे आपणच भोगायची. यांतले काहीच न होते, तर आपण इतरांस 'तुम्ही कांगावा करता' असे छातीठोकपणे म्हणू शकलो असतो. रणांगणावर गेल्यावर रक्तमांसाचा चिखल अंगावर उडताच गर्भगळित होणारे नेभळट तर आम्ही नव्हेत. आम्ही तर ही अभिमानाने मिरवण्याची बाब मानायला हवी.
- आणि मुळात आम्हांस पडलेला एक 'सनातन' प्रश्नः आमची पुराणे आणि त्यांवर आधारित आमचे अभिजात साहित्य तर देवादिकांच्या आणि ऋषीमुनींच्या चाळ्यांनी आणि त्यांच्या सुटलेल्या चळांच्या रसभरित वर्णनांनी ओतप्रोत भरले आहे. आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते. पुष्ट, मांसल शरीरांच्या स्त्रिया दाखवून याच देवादिकांचे चित्रण करणार्या राजा रविवर्म्याची चित्रे - उदा. ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव! - तर आबालवृध्दांच्या नजरा निवळण्यासाठी अभिमानाने आपापल्या दिवाणखान्यांत एकेकाळी मिरवणारे आपण इतके का बरे त्रासलो? सारखे एवढ्या-तेवढ्यास हात कलम करणे, दगड फेकून मारणे असे रानटी आणि रासवट चाळे करणार्यांच्या रांगेत जाऊन बसण्यास आपण एवढे उतावीळ का बरे झालो?
असो. आता आम्ही आमच्या शंकेखोर मनास आलेला शीण हलका करण्यासाठी या संस्थळाच्या मुखपॄष्ठावरील पुष्ट, कायस्थ स्त्रीचे काही काळ आमच्या लोलुप नेत्रांनी अवलोकन करावे म्हणतो. अहो, त्यातून आमच्या पुणेरी बावन्नखणी संस्कृतीचे रक्षण होते! आता परस्त्री देवी असते, असे या जननी-जन्मभूमीत काही जण मानतात म्हणे. आशा आहे की आमच्या संस्कृतीरक्षक लोलुप अवलोकनाने अशा कायस्थ वा कायस्थेतरांच्या भावना दुखावणार नाहीत!
आपला स्नेह-(आणि बरेच काही) लोलुप,
चिंतातुर जंतू
स्तोत्र
प्रेषक शुचि ( मंगळ, 02/09/2010 - 06:21) .आंतरजाला वर अनेक स्तोत्र अनेक ठीकाणी विखुरलेली आढळतात. त्यामुळे दर वेळेला सर्रास आढळणारं स्तोत्र काही कोणी मिपा वर टाकून उगीच भारूड-भरती करीत नाही. पण काल जालावर एक दुर्मीळ (मी तरी ना वाचलेल) आणि अतिशय सुंदर स्तोत्र सापडलं आणि मी याचीही खातरजमा करून घेतली की ते अन्यत्र बहुधा नसावं.
दुवा पुढे देत आहे. - http://3.bp.blogspot.com/_GaxZxdIo60Y/SlXiC-Q8c5I/AAAAAAAACLs/sxNkUws5RJ...
दुर्गा सप्तशती - द्वितिय अध्याय
प्रेषक शुचि ( रवी, 02/07/2010 - 01:48) ."दुर्गा सप्तशती" मला अत्यंत आवडणारं भलं मोठं ७०० श्लोकांचं स्तोत्र. यामध्येही आपली partiality दुसर्या अध्यायाला. बाकी अध्यायांमध्ये घनघोर युद्ध, देवी-स्तुती वगैरी खूप छान गोष्टी आहेत पण द्वितिय अध्यायात देवीच्या जन्माचे अद्भुत्-रम्य अतिशय मनोहर वर्णन केलेले आढळते. ते वर्णन वाचता वाचता अंग अक्षरक्षः रोमांचीत होऊन जाते.
लहानपणापासून आपण एवढच ऐकलेलं असतं की - महिषासुर माजला आणि देवसभा भरली. या सभेत देवांच्या तेजामधून दुर्गा देवीची उत्पत्ती झाली.
पण "दुर्गा सप्तशती" च्या द्वितिय अध्यायामध्ये कोणत्या प्रकारच्या तेजोरुपापासून देवीचं कोणतं अंग बनलं याचं इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे की ज्याचं नाव ते.
उदाहरणार्थ - देवीचे मुख शंकराच्या तेजापसून बनले तर यमाच्या तेजापासून केस उत्पन्न झाले. विष्णूच्या तेजापासून बाहू बनले तर चंद्राच्या तेजापासून स्तनांची उत्पत्ती झाली. पृथ्वीच्या तेजापासून नितंब तर ब्रम्हाच्या तेजापसून तिचे पाय निर्माण झाले. प्रजापतीच्या तेजापसून दात तर कुबेराच्या तेजापासून नासिका निर्माण झाली, आदि सुरेख वर्णन आढळून येते. भुवया संध्येच्या तेजापसून तर कान वार्याच्या तेजापासून उत्पन्न झाले. आणि हे सगळं अद्भुत रसातील काव्य आपण मन्त्रमुग्ध होऊन वाचत असताना आपल्याला जाणवतं की अरे खरच प्रत्येक अंगाचं एक वैशिष्ट्य आहे एक धर्म आहे आणि तेच वैशिष्ट्य त्या त्या देवतेचेही आहे. हे जेव्हा लक्षात येतं ना खरच अंग पुलकीत होतं.
यानंतर च्या श्लोकांमध्येही कोणत्या देवातेनी कोणते अस्त्र, शस्त्र, आभूषणे देवील बहाल केली ते आहे. उदाहरणार्थ - शंकराने शूल, कृष्णाने चक्र, वरुणाने शन्ख, अग्नीने शक्ती, ब्रम्हाने कमंडलू, सूर्याने प्रकाश, इंद्राने वज्र, विश्वकर्म्याने परशु , कधीही न सुकणार्या कुसुमांची माला वगैरे वगैरे.
वर्णन वाचून आस्वाद भक्तीने नाही तर नाही , रसिकतेने घेण्याजोगा हा अध्याय आहे.
कबीर दोहा
प्रेषक शुचि ( बुध, 02/03/2010 - 06:58) .ज्ञानेश्वरीबद्दल असं म्हटलं जातं की - "एक तरी ओवी अनुभवावी". ज्ञानेश्वरीबद्दल वादातीतच आहे पण मला वाटतं सर्वच धर्मग्रंथांबद्दल असच काहीश्या प्रमाणात म्हणता येइल. कारण आपण जेव्हा एखादा दोहा, ओवी, अभंग वाचत असतो तेव्हा आपली जेवढी कुवत आहे तेवढंच ज्ञान आणि सत्य आपण त्या ओळींमधून घेत असतो. पूर्ण सत्य आपल्या पकडीत येतच असेल याची शाश्वती काय? या संदर्भात वाचनात आलेली २ उदाहरणे पुढे देत आहे -
कबीराचा दोहा घ्या -
गुरु गोबिंद दोनो खडे, काके लागू पांव|
बलिहारी गुरु आपकी गोबिंद दियो बताय||
हा दोहा असा वाचला - गुरु गोबिंद दोनो खडे, काके लागू पांव, "बलिहारी गुरु आपकी" गोबिंद दियो बताय तर अर्थ होतो की - गुरु आणि कृष्ण दोघे माझ्या सामोरे आले आणि मी द्विधा झालो कोणाच्या पाया प्रथम पडू? तेव्हा साक्षात कृष्णाने मला सांगीतले "गुरु पहीला. गुरुचरणी प्रथम वंदन कर."
पण हाच दोहा असा वाचला - गुरु गोबिंद दोनो खडे, काके लागू पांव बलिहारी गुरु आपकी "गोबिंद" दियो बताय तर अर्थ होतो की - गुरु आणि कृष्ण दोघे माझ्या सामोरे आले आणि मी द्विधा झालो कोणाच्या पाया प्रथम पडू? गुरुदेव आपण धन्य आहात ज्यांनी त्वरीत ही द्विधा मनःस्थिती दूर केली हे सांगून की "वत्सा कृष्णचरणी प्रथम वंदन कर"
दुसरं उदहरण आहे बायबल मधील वाक्य आहे "प्राईड गोज बिफोर फॉल." याचा आपण इनट्युइटीवली अर्थ घेतो - "गर्वाचं घर खाली." पण दुसर्या अँगलमधून हे वाक्य पाहीलं असता असाही अर्थं होतो - प्रथम जातो अभिमान आणि मग लागते वाट.
दासबोध : स्वाध्यायाद्वारे अभ्यासाची संधी - २०१० साठी प्रवेश
प्रेषक विटेकर ( मंगळ, 01/05/2010 - 15:21) .आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,अंतरीक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही.
अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे.
दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात.आत्मविश्वास वाढवतात. साधेच औषध पण अत्यंत गुणकारी असा अनेक लोकांचा अनुभव आहे.
दासबोधाच्या वाचनाचे निश्चित फळ आहे- आता श्रवण केलियाचे फळ / क्रीया पालटे तात्काळ - अशी निः संदेह ग्वाही समर्थ स्वःत देतात. दासबोधाचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून आणि अभ्यासाची गोडी लागावी म्हणून, गेल्या अनेक दशकापासून, श्रीमद दासबोध अभ्यासक्रम चालवला जातो. श्री. समर्थ सेवा मंडळाच्या 'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' या उपक्रमामुळे दासबोधाचा अभ्यास आता सहज शक्य झाला आहे.आजपर्यंत १००,०००++ लोकांनी या ज्ञानपाणपोईचा लाभ घेतला आहे.
* हा अभ्यासक्रम आहे, पारायण नाही. समर्थांना पारायण नव्हे, आचरण अपेक्षीत आहे.
*हा स्वा -ध्याय आहे,यासाठी गुरू नाही ( दासबोध ग्रंथ हाच गुरू ), पूजा-अर्चा, भजन-सत्संग अथवा प्रवचनाला जाण्याचे प्रयोजन नाही.
*तासिका नाही, चाचणी नाही, सराव अथवा पाठांतर नाही. स्वाध्याय अशासाठी की त्यामुळे अभ्यासाला शिस्त लागते.
*परीक्षा नाही, गुण/ श्रेणी नाही, आचरण आणि प्रचिती हेच गुणपत्रक! प्रवेश फी नाही. प्रवेश परीक्षा नाही.
*एक स्वाध्याय लिह्ण्यास साधारण ५० मिनिटे लागतात. ६०% प्रश्न हे 'एका वाक्यात उत्तरे ' या स्वरुपात!
*प्रवेश पात्रता- वयाची अट १८ वर्ष पूर्ण , मराठी लिहीता- वाचता येणे, आणि नवीन शिकण्याची आवड.
*दर महीन्याला एक याप्रमाणे पहील्या वर्षी 'प्रवेश' चे १२ स्वाध्याय, दुसऱ्यावर्षी 'परीचय' चे १२ स्वाध्याय आणि तिसऱ्या वर्षी 'प्रबोध’चे १२ स्वाध्याय, असे एकूण ३६ स्वाध्याय घरच्या घरी पुस्तकात बघून सोडवायचे आणि नेमून दिलेल्या 'समिक्षकांकडे' पोस्टाने पाठवायचे ! इतके सोप्पे !
*पुस्तके अत्यल्प किंमतीत उपलब्ध ( एकूण ३ वर्षांकरीता अंदाजे ७५ रुपये + ट.ख़.).अथवा पुस्तके आंतरजालावरून डाऊन लोड करता येईल.
*पुस्तकांचा, लेखन साहीत्य, आणि टपाल खर्च अभ्यासार्थीने करणे अपेक्षित. अथवा अभ्यासक्रम आता इ-मेल द्वारे देखील करता येईल.
प्रवेश प्रक्रिया सुरू - जानेवारी २०१० साठी प्रवेश चालू आहे.
पत्रव्यवहारासाठी आणि अधिक माहितीसाठी, आपल्या पत्त्याच्या पाकीटासह खालील पत्त्यावर संपर्क करावा,
'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' श्रीसमर्थ सोसायटी. धन्वंतरी सभागृहाच्या मागे, पटवर्धन बाग, पुणे -४११००४
अथवा - ई पत्र पाठ्वावे- dasbodh.abhyas@gmail.com
II जय जय रघुवीर समर्थ II


