माध्यमवेध
विंदा
प्रेषक विकास ( रवी, 03/14/2010 - 10:52) .
आत्ताच सकाळ आणि म.टा. मधे वाचले की ज्ञानपिठ पारीतोषिक विजेते ९२ वर्षीय विंदा करंदीकर यांचे मुंबईत भाभा इस्पितळात निधन झाले.
"देणार्याने देत जावे-घेणार्याने घेत जावे" असे म्हणणार्या विद्वान साहीत्यिकाने जसे स्वतःच्या लेखणीने भरभरून दिले तसेच स्वतःला ज्ञानपिठ मिळाल्यावर त्या बक्षिसातील रोख रक्कमही जनकार्यासाठी परत केली होती हे आठवले...
विंदांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.
'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 19:29) .नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
शब्दबंध २०१०
प्रेषक बेसनलाडू ( बुध, 03/10/2010 - 10:21) .२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================
२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.
मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.
शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)
लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.
- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ
साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!
प्रेषक प्रसाद ( मंगळ, 03/09/2010 - 23:36) .८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत.
तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती!
[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे... मिपाकरांच्या संमेलनातल्या ई-सहभागासाठी या बातमीला योग्य ती जागा द्यावी ही विनंती!]
प्रसाद
तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)
प्रेषक JAGOMOHANPYARE ( रवी, 03/07/2010 - 13:56) .आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=529...
अरूणाचल प्रदेश
प्रेषक विकास ( रवी, 03/07/2010 - 10:13) .आत्ताच टाईम्स ऑफ इंडीया आणि इकॉनॉमिक टाईम्स मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे आपल्या तत्पर परराष्ट्रमंत्रालयाने जागतिक बँकेस अरूणाचल प्रदेशसाठी निधी मागणार नाही अशी ग्वाही दिली आहे आणि चीनने हे परराष्ट्रमंत्र्यांचे विधान अधिकृत करण्याची मागणी बँकेकडे केली आहे.
श्री. कृष्णा आता म्हणतात की आम्ही तेथील प्रकल्प स्वखर्चाने पुर्ण करू शकू म्हणून अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता सरकार नक्की कुठले प्रकल्प अरूणाचल प्रदेशात करत आहे आणि त्यासाठी किती पैसे देत आहे हे माहीतीअधिकाराखाली विचारण्याची वेळ आली आहे असे वाटते. मात्र त्याच बरोबर खालील वाक्य देखील पहाण्यासारखे आहे:
What is more surprising is that the oblique acceptance of the Beijing line on Arunachal at the World Bank meeting on February 12, attended by Mr Chatterjee, ED-China Shaolin Yang, and World Bank general counsel (legal) and vice-president, South Asia division, came about without the Union Cabinet’s consent.
ही बातमी टाईम्स मधे आंर्तजालावर प्रमुख पानावर (होमपेजवर) आहे. मात्र हिंदू आणि इतरत्र टेलीग्राफ, डिएनए वगैरेच्या पानावर मात्र लगेच दिसत नाही. मराठी वृत्तपत्रांना तर अजून हे समजायचे असावे...
सूर्याची सावली...
प्रेषक दिनेश५७ ( रवी, 03/07/2010 - 09:51) .राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख :
सूर्याची सावली
गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला.
पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता...
'रमेश, नानाजी गेले'... एवढे तीनच शब्द तो बोलला, आणि दोन्ही बाजूंचं बोलणं जणू खुंटून गेलं. माझी झोप उडाली होती.
'काय?'... मी कसाबसा प्रश्न केला.
'आत्ता, तासाभरापूर्वी... मी आत्ताच चित्रकूटला फोनवर बोललो.' पलीकडून भाऊ म्हणाला, आणि फोन बंद झाला.
बरोब्बर पाच वर्षांपूर्वी, २००४ च्या जानेवारीत भारतात आलो असताना चित्रकूटला गेलो होतो. अमेरिकेत गेल्यापासून नानाजींशी फोनवर खूपदा बोलणं व्हायचं. त्यांचा स्वर, पूर्वीइतकाच टवटवीत वाटायचा... पण त्या प्रत्यक्ष भेटीत नानाजी थोडे थकलेले वाटले. त्याच्या आदल्या वर्षीही मुंबईला आल्यावर मी नानाजींच्या भेटीसाठी चित्रकूट गाठले होते. तेव्हा वयाच्या ८८ व्या वर्षीही ते उत्साही होते. चित्रकूटच्या आसपासच्या खेड्यांमध्ये सुरू असलेलं काम पाहायला मी निघालो, तेव्हा नानाजी दरवाजात उभे होते. वर उन्ह तळपत होतं. मी जीपमध्ये बसलो, आणि नानाजी अचानक म्हणाले, 'थांब, मीपण येतो तुझ्याबरोबर'...
मी काही म्हणेपर्यंत नानाजी गाडीतही बसले होते. चित्रकूटपासून २० किलोमीटरवरच्या एका गावातला प्रकल्प पाहताना नानाजींच्या डोळ्यातलं समाधान मला जाणवत होतं... पण त्याच्याच पुढच्या वर्षीच्या त्या भेटीत, नानाजींचं ८९ वर्षांचं शरीर फारशी साथ देत नसावं, असं मला उगीचच वाटून गेलं.
'नानाजी, तुम्ही थकलात'... मी अस्वस्थपणे बोलून गेलो.
गेल्या ३५ वर्षांतल्या थेट आणि अप्रत्यक्ष सहवासातली सगळी माया आपल्या संथ डोळ्यांनी पुन्हा माझ्यावर उधळली, आणि ते फक्त हसले.
'रमेश, आणखी पाच वर्षं मला काही होणार नाही... अजून दोन प्रकल्प पूर्ण व्हायचेत'... बसल्या जागेवरूनच दूरवर कुठेतरी पाहत नानाजी म्हणाले.
... आज नानाजी गेल्याच बातमी कळली, आणि मला नानाजींचं ते वाक्य स्पष्ट आठवलं.
मी सहज तारखेचा हिशेब केला. ...त्या संवादाला पाच वर्षं पूर्ण झाली होती.
...१९७७ सालच्या सत्तापरिवर्तनाच्या काळात अनपेक्षितपणे माझा नानाजींच्या विश्वात प्रवेश झाला. संगमनेरच्या कॉलेजातून बाहेर पडल्यानंतर मुंबईत दाखल होऊन इंडियन एक्स्प्रेसमध्ये रिपोर्टर म्हणून मी नोकरीला लागलो होतो. एका रात्रपाळीनंतर तिथल्याच टेबलावर झोपलो असताना कानाशेजारचा फोन वाजला, आणि बातमीदाराच्या 'पहिल्या व्रता'ची जाणीव होऊन मी तो उचलला.
'कोई रिपोर्टर है उधर?'... पलीकडून विचारलं गेलं.
मी त्रासलो होतो. पण उत्तर दिलं.
'हां, मै रिपोर्टर हूँ... आप कौन?'...
'मै रामनाथ गोयंका बोल रहा हूँ... उपर आओ. नानाजी देशमुख यहाँपर आये हुए है, उनका इंटरव्ह्यू करो'...
इंडियन एक्स्प्रेसच्या प्रत्यक्ष मालकाचाच आदेश ! पाचदहा मिनिटांतच मी तयार होऊन एक्स्प्रेस टॉवरच्या पेंट हाऊसमध्ये दाखल झालो.
आजपर्यंत केवळ बातमीत वाचलेले, फोटोत पाहिलेले नानाजी समोर बसलेले होते.
पुढच्या काही मिनिटांतच माझा नवखेपणा संपला. मुलाखत झाली, आणि दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्तामध्ये ती प्रसिद्ध झाली.
मी घरी अंक चाळले, तेव्हा उगीचच धडधड वाढली होती.
संध्याकाळी पुन्हा रात्रपाळीला आलो, तेव्हा टेबलावर माझ्यासाठी एक चिठ्ठी होती- 'मुलाखतीबद्दल धन्यवाद, नाना देशमुख'...
नंतर पुन्हा महिनाभरानंतर वीरेन शहा यांचा फोन आला. नानाजी त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते. मी त्यांना भेटायला नरीमन पॉईंटच्या मुकंद आयर्नच्या ऑफिसमध्ये पोहोचलो.
...आणि एक नवं वळण मला नानाजींच्या जवळ घेऊन गेलं.
त्या दिवशी नानाजींनी मला त्यांच्याबरोबर काम करावं असं सुचवलं, आणि मी गडबडलो.
वीरेन शहांकडे पाहिलं. त्यांचे डोळे कौतुकानं भरले होते...
'अभी सोचो मत... नानाजी अगर मुझे ड्राईव्हर बनाकर ले जाते, तो भी मै तैयार हूं'... वीरेन शहा म्हणाले, आणि माझी तयारी झाली.
दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीत, 'दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या भव्य इमारतीत सहाव्या मजल्यावर नानाजींच्या खोलीत भारतीय बैठकीवर त्यांच्यासोबत कामाची आखणी करत होतो.
त्या भेटीत नानाजी मला नीट उमगले. एक कौटुंबिक स्नेहाचा धागा तिथे सापडला, आणि आपण एका 'सूर्याच्या सावली'खाली आलो आहोत, या जाणिवेनं मला धन्य धन्य झालं... मी गोंडा जिल्ह्यातील नानाजींच्या प्रकल्पावर दाखल झालो. माझ्यासारखे आणखीही काही पदवीधर या प्रकल्पावर झोकून देऊन काम करत होते. प्रत्येकाला १५ लहान खेडी वाटून दिली होती. गांधीजींच्या स्वप्नातला स्वयंपूर्ण भारत निर्माण करण्याचा पहिला प्रयोग या खेड्यांमधून सुरू होणार होता.
नंतरच्या दिवसांत नानाजींची असंख्य रूपं मला फार जवळून पाहायला मिळाली.
चौधरी चरणसिंहांना सुनावणारे नानाजी, संस्थेच्या कामातले अडथळे केवळ एका फोनवर सहज दूर करणारे नानाजी, जेआरडी टाटांना आपल्या रचनात्मक कामाचं महत्त्व पटवून देणारे नानाजी, सत्तेतल्या भल्याभल्यांना खडे बोल सुनावून कापरं भरवणारे नानाजी, जयप्रकाशजींची सेवा करणारे नानाजी, राजकारणातले चाणक्य नानाजी, पोलादी पुरुष नानाजी, इंदिरा गांधींच्या नजरेतले खतरनाक नानाजी, संध्याकाळी प्रकल्पावरच्या एखाद्या गावातल्या शेतकऱ्याच्या घरात घोंगडीवर बसून स्नेहानं त्यांच्याशी गप्पा मारणारे नानाजी, आणि रात्री आपल्या खोलीत परतल्यावर जमिनीवरच्या लहानशा गादीवर पहुडताच निरागसतेने झोपी जाणारे नानाजी...
...एकदा नानाजी काही कामानिमित्त आठदहा दिवस बाहेर जाणार होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला बोलावलं.
'रमेश, एक महत्त्वाचं काम आहे. हे पत्र तातडीने रामनरेश यादवांना मिळायला हवं. तू स्वत: ते त्यांना नेऊन दे'... पत्राची घडी पाकिटात बंद करून ते माझ्या हातात देऊन नानाजींनी सांगितलं, आणि मी मान हलवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच नानाजी प्रवासाला निघाले होते.
मी उठलो, आणि लखनऊला जाण्यासाठी रेल्वे तिकीट किंवा विमानाचं बुकिंग मिळतं का याची चौकशी सुरू केली. पण त्या दिवशी रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालंच नाही. विमानाचं तिकीटही मिळालं नाही.
तो दिवस तसाच गेला. नानाजींनी दिलेलं ते पत्र खिशात व्यवस्थित आहे ना, हे मात्र मी वारंवार पाहत होतो. महत्त्वाचं पत्र आहे, असं त्यांनीच सांगितलं होतं.
दोन दिवसांनंतरचं रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालं, आणि मी लखनऊला गेलो. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री रामनरेश यादव भेटलेच नाहीत. ते त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाहेर कुठे होते.
मी पत्र तसंच सांभाळत परतलो.
नानाजींनी परत आल्यानंतर पहिला प्रश्न मला त्या पत्राविषयीच केला, आणि मी जसं घडलं, तसं सांगून टाकलं.
तेव्हाही आपल्या संथ नजरेनं, आणि संयत स्वरांत नानाजींनी मला कामाचं महत्त्व पटवून दिलं होतं.
'आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडताना, पहिल्या वर्गाचा रेल्वे प्रवास किंवा विमानप्रवासाचा विचार करण्याऐवजी रेल्वेत उभ्याने प्रवास करून तू पोहोचला असतास, तर मला बरं वाटलं असतं.' एवढंच ते म्हणाले.
आणि तो प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.
नानाजींच्या चित्रकूट प्रकल्पाची तेव्हा नुकतीच उभारणी सुरू होती.
पाच वर्षांपूर्वी मी तिथे गेलो, तेव्हा साहजिकच माझी नजर विस्फारली होती.
सकाळी चित्रकूटच्या रेल्वेस्थानकावर उतरलो. नानाजी नाश्त्याला माझी वाट पाहत थांबलेच होते.
जुन्या मंदिरालगतच्या एका जुन्याच घरात नानाजींचं कार्यालय आणि घर वसलं होतं. पाठीमागे मंदाकिनी नदीचा घाट आणि समोर गर्द पर्वतरांगा... आसपास मैलोन्मैल पसरलेला चित्रकूटचा हिरवागार चमत्कार... नानाजींच्या कर्तृत्वातून हे नंदनवन उभं राहिलं होतं. वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ठरलेल्या देखण्या इमारती, हिरवाईनं तरारलेले बगीचे, संथ, आश्वस्त तलाव, कारंजी... नानाजींच्या कल्पकतेतून उभ्या राहिलेल्या या नंदनवनात नानाजींचं नाव, फोटो किंवा पुतळा कुठेही नव्हता...
एका बाजूला सुसज्ज असं आयुर्वेदिक आरोग्यधाम, दुसरीकडे विशाल भूभागावर उभं राहिलेलं उद्यमीता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाला, गुरुकुल, दंतचिकित्सा इस्पितळ, ग्रंथालय, मातृसदन, गोशाळा आणि आधुनिक शेतीचे असंख्य प्रयोग अनुभवणारी शेकडो एकर शेतजमीन, उद्याने, नौकाविहार आणि चित्रकुटाचा उद्धार करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं जीवनमूल्यदर्शन घडविणारं राम दर्शन...
शेकडो एकर जमिनीवरची ही निर्मिती सामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे. दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववाद आणि महात्मा गांधींचं अंत्योदयाचं स्वप्न इथे हातात हात घालून एकत्र नांदतं आहे.
३५ वर्षांपूर्वी नानाजींच्या डोळ्यात दिसणारं स्वप्न इथे अवतरलेलं मी अनुभवत होतो...
त्यांच्या अथक आत्मविश्वासातून एक दिव्य काम उभं राहिलं होतं, आणि त्याचा साक्षीदार व्हायचं भाग्य मला मिळालं होतं.
... माझं लग्न ठरलं, तेव्हा नानाजींनी पालकत्वाची जबाबदारी घेतली. निमंत्रणपत्तिकेवर 'आरएसव्हीपी' म्हणून नानाजींनी स्वत:चं नाव घातलं होतं, आणि माझ्या वडिलांच्या बरोबरीने लग्नाला येणाऱ्यांचं ते आतिथ्य करत होते...
नानाजींसारखा एक सूर्य माझ्यावर सावली धरून वावरतोय, याचा मला गेली ३५ वर्षं अभिमान वाटत राहिला..
परवा ती सावली संपली.
-रमेश गुणे
लॉस एन्जलिस, कॅलिफोर्निया.
( http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/ManthanEdi... )
मराठी ब्लॉग
प्रेषक आनंद घारे ( शनी, 03/06/2010 - 11:12) .थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळाच्या उदघाटनाचा (लॉचिंग) कार्यक्रम ५ मार्च २०१०, शुक्रवार, रोजी सायंकाळी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रांत साजरा झाला. श्री. दिनकर गांगल यांनी या संकेतस्थळाची थोडक्यात पण चांगली ओळख करून दिली. श्री.गांगल आणि ग्रंथाली यांच्याबद्दल मनात जे आदराचे स्थान आहे त्याला साजेसे असेच हे संकेतस्थळ असावे असे त्यावरून दिसले.
ह्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून मराठी ब्लॉग्ज व संकेतस्थळांशी संबंधित मान्यवरांचे एक चर्चासत्र झाले. 'ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी' हा त्याचा विषय होता. त्यात वेगळ्या प्रकारे उद्बोधक अशी माहिती मिळाली. "इंग्रजी, चिनी, जर्मन वगैरे भाषांमध्ये कोटीच्या कोटी ब्लॉग्ज आहेत, त्यामानाने मराठीतली दीड दोन हजार ही संख्या अगदी नगण्य आहे. जे आहेत ते देखील अनियमित आहेत, त्यात ओरिजिनल कंटेंट नसतोच, असल्याच तर कविता असतात, मिसळपाववरून उद्या हकालपट्टी झाली तर जालावर कुठे तरी आपले लिखाण असावे म्हणून लोक ब्लॉग या नांवाचे गोडाऊन उघडून ठेवतात" वगैरे मनोरंजक माहिती व्यासपीठावरून दिली गेली. "परदेशातले (आणि अमिताभ बच्चनसारखे भारतीय) सेलिब्रिटीज ब्लॉग्ज लिहितात आणि लक्षावधी लोक ते वाचतात. त्यामुळे ते एक महत्वाचे सामाजिक संपर्कमाध्यम बनले आहे. मराठीभाषिक नेतेमंडळी किंवा सुप्रसिध्द नट, गायक, खेळाडू वगैरे प्रसिध्द लोक ब्लॉग लिहीत नाहीत कारण त्यांना त्यासाठी मोकळा वेळच उपलब्ध नसतो, पण लेखन हाच ज्यांचा व्यवसाय आहे असे कितीसे साहित्यिक ब्लॉग लिहितात? उद्याचा नागरिक म्हणजे आजचा युवावर्ग तर मराठी ब्लॉगबद्दल पूर्णपणे उदासीन आहे" वगैरे सांगितले गेले. "कांही ठिकाणी चांगले साहित्यही लिहिले जात आहे, विशेषेकरून पाककृतीसंबंधी छान माहिती दिली जात आहे" असा एकच हलकासा विसंवादी सूर ऐकायला मिळाला.
पुढची पायरी म्हणजे " संगणक आणि त्याचा कीबोर्ड हेच उद्या लुप्त होणार असून सगळे कम्यूनिकेशन सेलफोनवरून दृकश्राव्य माध्यमातून होणार आहे, अक्षर ही संकल्पनाच बाद होऊन गेल्यानंतर लिपीला अर्थ उरणार नाही आणि उद्याचे ब्लॉग्जसुध्दा व्हीडिओवर असणार आहेत." असे भवितव्य एका महान द्रष्ट्याने दाखवले. थोडक्यात सांगायचे तर मराठी ब्लॉग्जना फारसा भूतकाळ नाहीच, त्याचा वर्तमानकाळ विशेष स्पृहणीय नाही आणि भविष्यकाळ अंधःकारमय आहे असा नैराश्य उत्पन्न करणारा मतितार्थ या चर्चेत दिसून आला.
चर्चेत सांगितले गेले त्याप्रमाणे मराठी ब्लॉग्ज, अनुदिन्या किंवा जालनिशा वगैरे अजून बाल्यावस्थेत आहेत. कदाचित त्याही पलीकडे शैशवावस्थेत असतील. पण तान्हे बाळसुध्दा हातापायाच्या हालचाली करून आणि किंचाळून मोठ्या लोकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि अनेक वेळा आसपास असलेली मोठी मंडळी त्याच्याकडे लक्ष देतात, त्याला अंजारून गोंजारून मायेचा स्पर्श देतात. त्यामुळे ते बाळ तर सुखावतेच, पण मोठ्या माणसालासुध्दा एक प्रकारचा आनंद मिळतो. मराठी ब्लॉगविश्वातली आम्ही अजाण बालकेसुध्दा अशी थोडीशी हालचाल करत आहोत. आजूबाजूची मोठी माणसे आमच्याकडे लक्ष देतील अशी वेडी आशा अजूनही बाळगून आहोत.
मराठी ब्लॉग या प्रकाराबद्दल मिपाकरांची काय मते आहेत आणि त्याच्या भविष्याबद्दल काय वाटते?
(हा चर्चाविषय कोणत्या लेखनविषयात बसेल ते न समजल्यामुळे 'मौजमजा' या नावाखाली टाकला आहे. प्रत्यक्षात हा गंभीर मामला आहे. 'इतर' असा एक पर्याय ठेवला तर त्यात टाकता आला असता. याबद्दलही मार्गदर्शन व्हावे)
हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...
प्रेषक चिंतातुरजंतू ( शुक्र, 02/26/2010 - 18:32) .मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
- परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
- या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते? आम्हांस वाटले होते की ९५ वर्षांच्या वृध्दास कोठडीत डांबून तृतीय रत्न दाखविल्यास नालस्ती होण्याची शक्यता होती.
- 'भारतात अल्पसंख्याकांच्या जिवास धोका आहे' असा अपप्रचार करण्यास इस्लामी आणि मानवतावादी यांचे फावते. - यास इलाज काय? अखेर, हुसेन यांच्यावर हल्ले आपणच केले, १२५०खटले आपणच भरले, त्यांविषयीच्या हलाहलाने आंतरजाल आपणच भरले. मग आता त्याची फळे आपणच भोगायची. यांतले काहीच न होते, तर आपण इतरांस 'तुम्ही कांगावा करता' असे छातीठोकपणे म्हणू शकलो असतो. रणांगणावर गेल्यावर रक्तमांसाचा चिखल अंगावर उडताच गर्भगळित होणारे नेभळट तर आम्ही नव्हेत. आम्ही तर ही अभिमानाने मिरवण्याची बाब मानायला हवी.
- आणि मुळात आम्हांस पडलेला एक 'सनातन' प्रश्नः आमची पुराणे आणि त्यांवर आधारित आमचे अभिजात साहित्य तर देवादिकांच्या आणि ऋषीमुनींच्या चाळ्यांनी आणि त्यांच्या सुटलेल्या चळांच्या रसभरित वर्णनांनी ओतप्रोत भरले आहे. आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते. पुष्ट, मांसल शरीरांच्या स्त्रिया दाखवून याच देवादिकांचे चित्रण करणार्या राजा रविवर्म्याची चित्रे - उदा. ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव! - तर आबालवृध्दांच्या नजरा निवळण्यासाठी अभिमानाने आपापल्या दिवाणखान्यांत एकेकाळी मिरवणारे आपण इतके का बरे त्रासलो? सारखे एवढ्या-तेवढ्यास हात कलम करणे, दगड फेकून मारणे असे रानटी आणि रासवट चाळे करणार्यांच्या रांगेत जाऊन बसण्यास आपण एवढे उतावीळ का बरे झालो?
असो. आता आम्ही आमच्या शंकेखोर मनास आलेला शीण हलका करण्यासाठी या संस्थळाच्या मुखपॄष्ठावरील पुष्ट, कायस्थ स्त्रीचे काही काळ आमच्या लोलुप नेत्रांनी अवलोकन करावे म्हणतो. अहो, त्यातून आमच्या पुणेरी बावन्नखणी संस्कृतीचे रक्षण होते! आता परस्त्री देवी असते, असे या जननी-जन्मभूमीत काही जण मानतात म्हणे. आशा आहे की आमच्या संस्कृतीरक्षक लोलुप अवलोकनाने अशा कायस्थ वा कायस्थेतरांच्या भावना दुखावणार नाहीत!
आपला स्नेह-(आणि बरेच काही) लोलुप,
चिंतातुर जंतू
एम एफ हुसेनांचे कतार नागरिकत्व
प्रेषक भास्कर केन्डे ( शुक्र, 02/26/2010 - 02:34) .एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत. अशातच या वादग्रस्त हुसेनांना कतारने नागरिकत्व देऊ केल्याच्या बातम्या द हिंदू सह टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात झळकत आहेत.
भारतीय नागरिकाने इतर देशांचे वा परदेशी लोकांनी भारताचे नागरिकत्व घेण्याच्या शेकडो घटना दररोज घडत असतात. मात्र एखाद्या इसमावर त्याच्या मायदेशात जर काही खटले चालू असतील तर त्या देशाचा आदर म्हणून इतर देश त्या इसमाला नागरिकत्व न देण्याचा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हणजे दुसर्या देशाला दिलेला एक संदेश समजला जातो.
अरबी देशांत भारतीयांना सहसा नागरिकत्व दिले जात नाही. या समजा बाहेर जाऊन व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलला डावलून कतारने ज्या इसमावर समाजाचा अपमान करणे, दंगल भडकवण्यासदृश साहित्य (चित्रे) प्रसिद्ध करणे, धार्मिक तेढ वाढवणे, सामाजिक तणाव वाढवणे अशा गंभीर अरोपांखाली अनेक खटले सुरु आहेत अशा इसमाला नागरिकत्व का दिले असावे?...
१. भारताला आम्ही जुमानत नाही. तसेच आमच्या अरब लॉबी मुळे भारत आमचे काही वाकडे करु शकत नाही असा माज.
२. भारतीय राज्यकर्त्यांकडे कणा नाही याची पूर्ण जाणीव.
३. आम्ही "सर्वच" भारतीयांना कनिष्ठ मानतो. पण काफिरांचा सर्व पातळीवर आपमान करणार्या भारतीय मुसलमानांना अरब देश भारताच्या कायद्यापासून वाचवतील असा संदेश देण्यासाठी.
४. 'भारतात अल्पसंख्यांकांच्या जीवाला धोका आहे' या पाकिस्तानी तसेच तथाकथित मानवतावाद्यांच्या लॉबींगला आकड्यांची मदत करण्यासाठी.
द हिंदूचे संपादक राम यांनी या घटनेवर टिपण्णी करताना असे म्हटले आहे की या महान चित्रकाराला आयुष्याच्या अंतिम कालखंडात मरण्यासाठी सुद्धा भारतात यायला जमत नसल्याने त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून कतारचे नागरिकत्व घ्यावे. का?
१. संपादक महोदयांना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलची वा त्यायोगे भारताच्या होणार्या नाचक्कीची माहिती नसावी.
२. संपादक महाशयांना भारताच्या इभ्रतीपेक्षा आपल्या स्नेह्यावरील खटल्यांची जास्त काळजी असावी.
वा आणखी काही?
अशा प्रकरणांत आपल्या देशाच्या विदेश मंत्रालयाकडून आपण काही अपेक्षा करु शकतो काय?


