टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
देशांतर
ईश्वर!!!
प्रेषक पिवळा डांबिस ( मंगळ, ०७/०१/२००८ - १२:४८) .मी माझ्या अनंत पसार्यात मी एकटाच बसलोय!
नेहमीप्रमांणे कृतकॄत्य न वाटता आज मन अगदी क्षुब्ध झालंय!!
राहून राहून माझी नजर त्या गोलकावर जात्येय......
तसं मी हे सर्वच विश्व जन्माला घातलं.....
पण मी अतिशय हौसेनं ज्ञन्माला घातलेला तो गोलक........
पाण्याच्या प्रभावाने टचटचीत फुगलेला तो गोलक....
त्याची किती निगराणी केली होती मी.....
किती जोपासना केली.......
वेळोवेळी काळजी घेतली घेतली, आवश्यक ती उपाययोजना केली........
अनेक आजारांतून त्याला वाचवला........
आणि अखेरीस तो अगदी परिपक्व केला....
मलाच केव्हढा अभिमान वाटला होता स्वतःचा त्यावे़ळेस........
रसरशीत आणि टचटचीत.......
सर्व योग्य परिस्थिती मी निर्माण करून ठेवली होती.......
मीच निर्माता त्याचा.....
मीच ईश्वर त्याचा......
सर्वशक्तिमान, सर्वनियंता परमेश्वर.......
आणि एके दिवशी ती जात निर्माण झाली.........
मी कौतुकाने पहात होतो.......
जात हळूहळू वाढली.......
मी पहात होतो......
हळूहळू त्या जातीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली......
मी निर्माण केलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा उपभोग घ्यायला सुरवात केली......
पहाता पहाता त्यांचा हा उपभोग हाताबाहेर गेला.......
हावरटपणापायी त्यांनी ह्या स्त्रोतांची प्रमाणाबाहेर नासाडी करायला सुरुवात केली........
जे अगोदरच हा स्त्रोत वापरत होते त्यांनी वापरात काटकसर करायला नकार दिला.....
जे हा स्त्रोत पूर्वी वापरत नव्हते त्यांनी "हा स्त्रोत काय तुमच्या बापाचा" असं म्हणून तो स्त्रोत नव्या दमाने वापरायला सुरुवात केली.......
काही समझोता घडवून आणण्यात ते अशयस्वी ठरले........
कारण एकच.......
हाव, तृष्णा, सूडबुद्धी...........
त्यांनी त्या स्त्रोतांसाठी आपापसात लढायला सुरुवात केली......
एकमेकांना बेचिराख करायला सुरुवात केली.........
आणि या आपापसातल्या भांडणात त्यांनी मी निर्माण केलेल्या या गोलकाची विल्हेवाट लावायला सुरवात केली.......
सत्यानाश केला त्यांनी त्या स्त्रोतांचा.......
बघा, बघा त्या गोलकाकडे पुन्हा एकदा.....
एकेकाळचा तो रसरशीत परिपक्व गोलक आज कसा झाकोळून, कोमेजून गेलाय.........
तो पूर्वीचा रसरशीतपणा कधीच निघून गेलाय.......
माझीच निवड चुकली! हा गोलक आणि ही जात जगायच्याच लायकीचे नाहीत.......
माझा राग अनावर झालाय......
माझ्या अनंत पसार्यात हा गोलक असला काय आणि नसला काय! काहीच फरक पडत नाहीय.......
माझा राग आता पराकोटीला पोचतो.........
मी रागारागाने तो गोलक उचलतो........
आणि सर्व शक्ती एकवटून त्या आगीच्या लोळात फेकून देतो.......
गोलक आगीत आपटतो, फटकन फुटतो......
लालभडक रस सगळीकडे पसरतो.........
आगीत होरपळून मरणार्या त्या जातीचा दुर्गंध सगळीकडे पसरतो........
मी एका अतीव समाधानाने त्याकडे पहात रहातो........
एक विश्व समाप्त झालंय.......
एक जमात पूर्णपणे नष्ट झालीय......
मी सर्वशक्तीमान परमेश्वर.......
जगन्नियंता, सर्वशक्तिमान.........
एका जगाचा मी पूर्ण नाश घडवून आणलाय.....
पण....
पण तरीही मला समाधान वाटत नाही........
परिपूर्ण शक्तिमानतेची भावना माझ्या मनाला स्पर्शत नाहीय..........
उलट......
उलट एका अनामिक भीतीने मन झाकोळून आलंय........
का? का? का?.......
मी निर्माण केलेला, जोपासलेला हा एक गोलक......
माझ्या बागेतला एक टोमॅटो......
साल्मनेला आणि ई-कोलाय यांनी त्याचा सत्यानाश केला म्हणून रागावून मी तो नष्ट केला........
पण मनात भीती ही साचलीय की........
माझा "ईश्वर" सुद्धा "माझ्या" गोलकाविषयी असेच विचार करत असेल का?............
(निवेदनः काही दिवसांपूर्वी साल्मनेला वा इ-कोलाय या जीवाणूंनी प्रादुर्भाव केला होता म्हणून अमेरिकन फूड आनि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने कॅलिफोर्नियात सर्वत्र टॉमॅटो विकायला बंदी केली होती. लोकांचे आरोग्य बिघडू नये म्हणून लक्षावधी टन फ्रेश टोमॅटो त्यांनी भस्मसात केले. त्या वेळेस सुचलेली ही संकल्पना......)
अ भा म सा सं : आता बे एरियात
प्रेषक सर्किट ( मंगळ, ०६/२४/२००८ - ०७:२५) .मंडळी, माफ करा.
सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा विषय गाजतोय. मी जरा उशीराच सदर संकेतस्थळावर हा विषय वाचला, म्हणून काहीबाही खरडावेसे वाटले. ह्या चर्चेत उशीरा सामील झाल्याबद्दल क्षमस्व. परंतु मी माझ्या इतर कामातूनही, ह्या चर्चेत सामील व्हावे असे वाटले, हे देखील लक्षात घ्यावे.
या आधी मटाच्या संस्थळावर ह्या विषयावर कुणी काहीबाही खरडलेले वाचले. तेथील आणि येथील चर्चांवरून मला महत्वाचहे वाटलेले मुद्दे असे:
१. हे साहित्य संमेलन अखिल भारतीय आहे, आणि अखिल भारतीय मध्ये सॅनफ्रॅनसिस्को बे एरिया बसत नाही.
२. ह्या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना अमेरिकेचे भाडे परवडत नाही.
३. मराठी आणि अमेरिकेत ? मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, आणि म्हणून संमेलन महाराष्ट्रातच हवे.
४. महाराष्ट्र सरकार अशा संमेलनाला २५ लाख देणगी म्हणून कसे काय देऊ शकते ?
मंडळी, ह्या सर्व मुद्द्यांचा परामर्ष आपण येथे घेणार आहोत। भावना बाजूला ठेवा, अत्यंत कोडगेपणाने विचार करा, म्हणजे कदाचित माझी भूमिका कळणे सोपे जाईल. आता माझी भूमिका मांडतो.
१. मराठी ही भाषा कुठल्याही एका भौगोलिक क्षेत्रापुरती मर्यादित नाही, नसावी. दिल्ली, कानपूर, पिलानी, न्यू यॉर्क, इलिनॉय, आणि आता कॅलिफोर्निया, ह्या अमराठी प्रदेशात गेली २० वर्षे काढल्यानंतर, मला लक्षात आलेली गोष्ट अशी, की ह्या क्षेत्रांत मराठी लोकांना जे मराठीविषयी आपलेपण वाटते, ते महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. जिथे मराठीला आपलेपण मिळते, तो मराठीचा प्रदेश.
२. आजवर आम्हाला सदर साहित्य संमेलनात सहभागी व्हावेसे वाटत असूनही, आम्हाला केवळ भाडे परवडत नाही म्हणून आमच्या आडत्या साहित्यिकांपासून दूर राहावे लागले. ह्याचा अनुभव सर्वांना मिळावा, हीच आमची अपेक्षा.
३. मला मध्यंतरी बे एरियातील एका कार्यक्रमात सूत्रधाराची भूमिका मिळाली होती. येथेच जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांनी केलेला नाटकाचा कार्यक्रम. तेथे मी न राहवून म्हटलेले एक वाक्य: "हे संयुक्त महाराष्ट्रवाले लोक उगाच बेळगाव-निप्पाणीच्या मागे लागले आहेत. त्यांना खरेच महाराष्ट्र धर्म वाढवावा असे वाटत असेल, तर संयुक्त महाराष्ट् चळवळीचे लोक सॅन होजे-कुपर्टिनो-सॅंटा क्लॅरा सह महाराष्ट्र झालाच पाहिजे" असे घोषवाक्य स्वीकारतील.
४. संमेलनाचा खर्च कोट्यावधीत. आणि फक्त पंचवीस लाखांसाठी एवढा आवाज ? छ्या !
रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/२१/२००८ - १५:१४) .सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:
या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-
काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः
याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्या या बाजारात बर्याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.
समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.
थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.
या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.
रटरटते चिकनः
लोटी तयार करणार्या थाई महिलेची हातोटी:
फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:
बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:
निद्रिस्थ बुद्धराजः
रात्री सवास !(good night!)
स्वयंपाकी देता का हो कोणी ??
प्रेषक अभिरत भिरभि-या ( गुरू, ०६/१९/२००८ - १२:५५) .स्वयंपाकी देता का हो कोणी ??
।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।।
बंग़ळूर
ज्येष्ठ कृष्ण १
पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही
बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली.
आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो.
नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती.
तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स
अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती. पण आता बंगळुर मधे मराठी
(किमान उत्तर हिन्दुस्तानी) पद्धतीचे जेवण कुठे मिळणार? इथल्या सर्व हाटेलात उ भा. खाणे म्हणजे मैद्याच्या रोट्या हेच समिकरण आहे.(बरे याला पर्याय म्हणुन घरगुती खानावळी सारखी सोय आमच्या भागात तरी उपलब्ध नव्ह्ती. शिवाय आम्हा चौघा रुममेट्सचे पाक कलेतली गती यथायथाच)
यत्र तत्र सर्वत्र पसरलेल्या बिहार्ंयाच्या रुपाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसला. आणि आमच्या घरी जेवणाचा डब्बा येऊ लागला. फ़ुलके, भात, भाजी असे ब-यापैकी घरचे वाटणारे जेवण मिळु लागले. डब्ब्याची कंटाळवाणी गोष्ट म्हणजे त्याच त्याच भाज्या. समस्त मेसवाल्यांना "बटाटा" हा प्रकार इतका प्यारा का आहे याचे गुढ मला अजुनही उमगले नाही.
आणखी लिमिटेड क्वांटिटीमुळे पोट भरले आहे असे वाटायचे च नाही.
हपिसातल्या एका सहका-याच्या डब्ब्यातुन तेव्हा दररोज सुग्रास पदार्थ निघु लागले
आणि या सा-या समस्येवरचा रामबाण तोडगा सापडला .. कुक अर्थात आचारी !!
तुम्हाला हवे ते हवे तितके बनविणारा बल्लवाचार्य म्हणजे देवदुत च जणु !
आणि आचारी शोधण्याची आमची मोहीम सुरु झाली.
उपाय जरी सापडला तरी बेन्गळुरसारख्या दक्षिणी शहरात उ. हि. आचारी सापडणे तितके सोप्पे नव्हते.आता मुम्बई वा दिल्लीत राहणारा कोणी मुत्थुस्वामी सुब्र्हमण्ण्यम अय्यरही हेच उलट्या पद्धतीने म्हणेल हे मी समजु शकतो.
नशिबाने एक पोरगेलासा तरूण आम्हाला मिळाला. या वल्ली चे नाव - चंदन . चंदनच्या हाताला भन्नाट चव होती. शिवाय जेवण बनविण्याचा त्याचा वेग ही लाजवाब होता.
या लाजवाब वेगाचे प्रतिबिम्ब ओट्यावर पोळ्या लाटताना पसरलेल्या पिठीतुन वा हिंदकळलेल्या वरणातुन हि दिसायचे. 'जादा पढाई करके का होगा ? ' या practicle विचारामुळे चंदन शाळा फ़ारशी शिकली नव्हता आणि पैसा कमावायचा म्हणुन
बेंगळुरची वाट धरली होती. आम्ही दिलेले पैसे कमीवाटतात म्हणून की काय किंवा आमचे घर दूर पडते म्हणून की काय चंदनने एका महिन्यानंतर घरी येणे बंद केले आणि आम्ही एका चांगल्या कुकला मुकलो 
पंधरवड्याच्या भटकंती नन्तर एक ओडिसीबाबुंचा शोध लागला व आम्ही पंढरपुरच्या पांडुरंगाला व पुरीच्या जगन्नाथाला एकसाथ thank you म्हटले." होम पंद्रा शालसे खाना बनाता ह्या" असे experince certificate या ओडिसीबाबुंकडे होते.जेवण महत्वाचे असल्याने आम्ही ही पैशांसाठी फ़ारसे ताणुन धरणार नव्हतो. उडियाबाबु जवळ राहणारे असल्याने ते या कामाने खुष वाटले अर्थात आम्ही ही खुष होतो. पहिल्याच दिवशी या महाशयांनी ३ जणांचे साधे जेवण बनविण्यास तीन तास घेतले वर चव यथा यथा. १५ वर्षांचा अनुभव दाखवुन सिस्टिम अनालिस्ट म्हणुन मिरविणारे लोक आय.टी. मधे पाहिले होते. यांचे भाउबंद सर्व क्षेत्रात होते म्हणायचे. 
या नंतरही बरेच दिवस गेले. शेवटी आम्हीही कंटाळुन परत डब्बाच लावला. एक दिवस योगयोगाने अबिदाबाईंचा शोध लागला.कर्नाटकातल्या सत्तरुढ धर्मनिरपेक्ष जनता दलाप्रमाणे आम्ही ही धर्मनिरपेक्ष असल्याने आमच्या रांधाघरावर आता अबिदाबाईंची वर्णी लागली . बाईचा हात घराला लागला म्हणजे सारे रुप पालटते म्हणतात.
अगदी त्याप्रमाणे च आमचे किचनही आता चकाचक राहु लागले. अबिदाबाई सांबार सुन्दर बनवायच्या. अबिदाबाईंची एक गम्मत लौकरच ध्यानी आली. भाजी कुठलीही असो , अबिदाबाईंची बनविण्याची पद्धत एकच होती. तेल गरम करायचे, त्यात चिरलेली भाजी टाकायची, मसाला व पाणी टाकुन वर झाकण ठेवायचे.यामुळे एक लगदा तयार होत असे. शेवटी काय तर पुन:श्च हरिओम
ताजा कलम:
मध्यंतरी राज साहेबांनी आन्दोलन करुन ब-याच बिहा-यांना उत्तरेत पाठवल्याचे कळते.त्यांनी थोडे बिहारी बेन्गळुरी धाडावेत. बहुतांश बिहरी उत्तम कुक असतात. याने आमच्या सारख्या भुकेल्या जनतेचे कल्याण होईल.
धंद्यात पडण्याची (!) इच्छा असणा-यांना एक मौलिक टीप:
बेन्गळुरात मराठी पदार्थांच्या हाटेलास तुफ़ान वाव आहे. (मागेपुढे हाटेल काढण्याचा आमचाही विचार आहे). दरम्यान पाक कलेच्या प्रान्तावर चढाई करण्याचे काही यशस्वी व काही अयशस्वी प्रयत्न आम्ही ही केले आहेत त्याबद्दल सविस्तर पुन्हा केव्हा तरी. पूर्वी ज्याला मी नाके मुरडायचो ती मेथीची भाजी, भाकरी आता कधी गेल्यावर कौतुकाने खातो हे पाहुन मासाहेबांना घरी नवल वाटते.
तुर्तास एका सरदारजीची मेस आम्हास गावली आहे.बटाट्याचे तुकडे आम्ही तिकडे जाऊन तोडत आहोत.तरिही "बचेन्गे तो और लडे.ग़े" बाण्याने आमची "आचारी शोध मोहिम" जारी आहे.
तळटीप:
(अजुनही) हवे आहेत: स्वैपाकी
पदसंख्या: १
अर्हता : .......
भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास
प्रेषक भोचक ( बुध, ०६/११/२००८ - १९:१६) .'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता. स्वतः लेखकही होता. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली. या पुस्तकांचे विषयही अगदी शिल्पशास्त्रापासून ते साहित्यापर्यंत आहेत. भोजाविषयी उत्सुकता खूप दाटली होती. आणि एक दिवस अचानक धारला कूच केले.
धार हे पवारांचे संस्थान. पण ते अगदी अलीकडचे. त्याही आधी ते परमार वंशाच्या राजा भोजची राजधानी होते. या धार नगरीतच एकीकडे जसा दुसर्या बाजीरावाचा जन्म झालेला किल्ला भग्नावस्थेत इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा आहे. त्याचवेळी गावाच्या दुसर्या भागात हिंदू-मुसलमानांमधील रक्तरंजीत संघर्षाचे डाग घेऊन 'भोजशाळा' उभी आहे. भोजशाळा. दोन वर्षांपूर्वी या भोजशाळेवरून हिंदू- मुसलमानांमध्ये झालेला संघर्ष माहिती होताच. त्यामुळे धारमध्ये आल्यानंतर या शाळेला भेट देणे क्रमप्राप्तच होते. गावाच्या एका कडेला भाजीबाजाराच्या पाठिशी ही भोजशाळा आहे.
शाळेला लागूनच मशीद आहे. शिवाय कब्रस्तानही. शाळेच्या आवारात कुंपण घातले आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था अगदी कडक. सगळी तपासणी करून आत सोडतात. आत गेल्यानंतर तर चक्रावलोच. मंदिराच्या भिंतीला अगदी खेटून मशीद. प्रत्यक्ष भोजशाळेत प्रवेश करतानाही कडक तपासणी झाली. आत गेलो. चार बाजूंनी मंडप असलेली मधले आवार मोकळे असलेली इमारत म्हणजे भोजशाळा. जवळपास हजारेक वर्ष जुनी. पुरातत्व खात्याने या शाळेतील खांब पूर्वीसारखे वाटतील असे उभे केलेले आहेत. भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही. उलट तिथल्या वास्तुशिल्पाला छेद देईल असे न शोभणार्या काळ्या संगमरवरी दगडात आयते मात्र कोरलेली आहेत.
या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. विद्यादानासाठी राजा भोजने बांधलेली वास्तु आता धार्मिक वादात अडकली आहे. विद्येचा वारसा जपण्याऐवजी वाद रंगला आहे, याने मन व्यथित झाले.
------------------------
राजा भोजाविषयीच्या माहितीत भोजपूरचा उल्लेख आला होता. हे भोजपूर म्हणजे भोपाळपासून जवळपास १८ किलोमीटरवर आहे. इथे म्हणे त्याने मोठे शिवमंदिर उभारण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय एक मोठा तलाव बांधायला घेतला होता. या तलावाची रचना अशी केली होती की नैसर्गिक पद्धतीने पाणी फिरून येईल. हे मंदिर बघण्याची आस होती. सांची पाहून आल्यानंतर भोपाळमध्ये मुक्काम केलाच होता. दुसर्या दिवशी भोजपूरला निघालो. 'मध्य प्रदेश सडक परिवहन निगम'च्या अनुबंधित ट्रेवल्स बसने प्रवास करण्याचे 'दिव्य' पार पाडत अखेर आम्ही भोजपूरला पोहोचलो. एका टेकडीवर हे मंदिर आहे. मूळ मंदिर तर पार पडून गेले आहे. पण पुरातत्व खात्याने मूळ वाटावे असे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. 'भिंत खचली कलथून खांब गेला'चा अनुभव पहाताना आला. मंदिर पुष्कळच भव्य आहे. त्याचे तुकडे जोडून ते रचण्याचा प्रयत्नही दिसून येतो. वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वांत उंच शिवलिंग या मंदिरात आहे. हे शिवलिंगही तुटले होते. पुरातत्व खात्याने जोडून ते उभारले आहे. मंदिरासमोर छुटपूट मंदिरे आहेत. त्याचे मस्तपैकी व्यावसायिकरण झाले आहे. मुख्य मंदिरात मात्र पुरातत्व खात्याने कोणतीही पूजा करायला बंदी घातलीय ही समाधानाची बाब. आजूबाजूला छान हिरवळ आहे.
त्याकाळी राजा भोजने बांधलेल्या तलावाचा अंदाज येतो. राजा भोज आजारी असताना येथे आला होता. विशिष्ट प्रकारे पडणार्या पाण्याने अंघोळ करावी असा सल्ला त्याला वैद्याने दिला होता. म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारा तलाव बांधला गेला होता. या तलावाचे बांधीव काठ आजही दिसून येतात. भोजपूरला येण्याआधीच त्याच्या संरक्षक भिंती दिसतात. त्यावरून तो किती मोठा असावा याचा अंदाज येतो. पण आता तलाव म्हणून काहीही शिल्लक नाही. इथेही मुस्लिम आक्रमकांनी मोठी भूमिका बजावली. होशंगाबादने हा तलाव मध्ययुगात फोडून टाकला होता. त्यामुळे त्यात पाणी साठणे बंद झाले. आता तर भौगोलिकच बदल भरपूर घडले आहेत.
हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. इंदूरचे संग्रहालय मध्यंतरी पहायला गेलो. त्यावेळी हजार, दोन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्ती सरळ इमारतीच्या बाहेर ठेवलेल्या दिसल्या. पावसात त्या भिजत होत्या. तीच स्थिती धारच्या किल्ल्यातील किमती सामानाची आणि मांडूतल्या मौल्यवान शिल्पांची. लोकांची बेपवाई तर बोलायला नको. इंदूरमध्ये रहाणार्या अनेकांना भोजपूर माहित नाही. आम्ही भोजपूरला जातो, गेलो हे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तिच्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्हांसहित विविध भाव पाहूनही त्रास व्हायचा. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. एकुणात काय हे सगळं पाहिल्यानंतर उगाचच उदास होऊन परतलो.
अरून सवास, सायं सवास! भाग - २
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/०७/२००८ - ००:१५) .अरून सवास वरून पुढे चालू...
सायं सवास - संध्याकाळचे अभिवादन करण्याची थायलंडमध्ये इतकीशी काही पद्धत नाही पण तुम्ही थायलंडमधले नसाल तर हे अभिवादन कानी पडतं. थायलंडमधलं विदेशी पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे 'फ्लोटिंग मार्केट'. नदीच्यालगत काढलेल्या कालव्यांतून इथे लहान मोठे बाजार भरतात. फळं, फुलं , भाज्या, कपडे, टोप्या, छत्र्या, थाई रेशीम, शोभेच्या वस्तू इतकंच काय अगदी नूडल्स पासून केळ्याचं साटंही इथे चाखता येतं! सफर कबाजाराची एक चक्कर मारायला नावेतून जायला माणशी १०० बाह्थ लागतात. (१ बाह्थ - थाई चलन = १.२५ रू).
काही प्रकाशचित्रे -
निघालो बाजारा...
भाऊगर्दी!
आधी पोटोबा
गाँन् - सिप् गाँन् (१० - १२) प्रकार!
खाऊन तर पहा!
जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गली से हमको गुजरना नहीं!
मा फलेषु... ?
सावर रे- ऊंच झुला

कालव्याच्या काठावरच्या घरासमोरचे तुळशी वृंदावन.. आपले बुद्ध - वृंदावन.

नो ट्रॅफिक!

मला बघून विचार करत असावी - नुस्ता फोटूच काढणार की काही विकत पण घेणार

एक धागा सुखाचा ....


साखरेचे खाणार !
फ्लोटिंग मार्केट मधेच एका नावेत हा मस्त गोड पदार्थ विकत घेतला. तांदळाच्या डोश्यासारख्या छोट्या द्रोणांत पपईचा कीस, खवलेल्या नारळाची गोड पेस्ट आणि साखर. जीभेवर ठेवताच विरघळायला लागतो असा हा खाद्यप्रकार!
याचसोबत थायलंडमध्ये अगदी हमखास मिळणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ चाखला - लोती (रोटी) . पण ह्याचा पोळी अथवा रोटीशी फारसा संबंध नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास साध्या डोश्यात "बुढ्ढीके बाल" भरा आणि त्याची गुंडाळी करून खा! खायला मजा येते.
मी हाय कोली
समुद्रमंथनातून काहीका निघालं असेल, मात्र ओहोटीच्यावेळी समुद्रकिनारी मिळणारे जीव आणि सी-वीडस् यांचा हा रूचकर पदार्थ मस्त होता.

आणि मासा! (ह्यापेक्षा त्याचं अधिक वर्नन करणं म्हणजे शब्द वाया घालवण्यासारखं आहे! )

अरेच्चा, आत्ता होता! गेला कुठे?
वरच्या फोटूंतील पदार्थ आणि नदीतला मोठा खेकडा असा बेत तीन माणसांत होता. सगळं फस्त! आणि मस्त!
जपानचे खानपान
थायलंडमध्ये जपानी खाण्यावर प्रेम करणारे बरेच खवय्ये आहेत. मला व्यक्तीशः जपानी खाणं खास वाटलं नाही. पण खाता न येण्याइतकं वाईट तर नक्कीच नाही. ह्या खाण्यातही एक थाटामाटाचा प्रकार आहे. ह्यात हिरव्या कच्च्या भाज्या, मांस, नूडल्स, चटणी , रॉ सी-फुड, तोफू यांची चळत आणून देतात.
टेबलाच्या मध्ये विजेवर चालणारी अगदी निटस हॉटप्लेट असते. यात पाणी गरम करून वरचे पदार्थ घालून खात रहायचे.
सोबत नूडल्स आणि सुशी.सोबत आम्ही खाल्ला तो खाना म्हणजे रोस्टेड डक! दील खुश हो जाता है!
१)
२)
३)
४)
५)
अप्रस्तुत तरी अपरिहार्य
मांसाहार खाणं म्हटलं आणि त्यात बीफ म्हणताच त्रागा करणारे लोक आहेत. त्यामुळे एखादवेळेस बीफ अप्रस्तुत वाटेल पण खाण्याचे लाड असल्याने त्याची आठवण अपरिहार्य आहे.
तसं म्हणावं तर हा प्रकार वातड. त्यातही टी-बोन, न्यूयॉर्क असे प्रकार आहेत. थायलंडमध्ये गाय आणि डुक्कर तेतक्याच चवीने खातात. त्यापेकी जे बीफ खाल्ले ते वर चित्रात आहे. पोर्क त्यामानने बरं लागतं.
अदरक मारके!
आल्याचा गरम तिखट रस त्यात लिंबू आणि साखर आणि त्यात अगदी मुलायम तोफू!

ह्याने घसा सुटला नाही तर नवल. अशी हुकमी खादाडी करायला तुम्हाला थाई मित्र-मैत्रिणींसोबतच फिरावं लागेल.
कावासान - बँकॉकमधली खाऊगल्ली
रस्त्यावरचं चमचमीत खायचं असेल तर कावासानला जावं.

नूडल्स, सूप, भात इथपासून चिकन, पोर्क, मासे ते अक्षरशः तळलेले, भाजलेले चतूर, बीटल्स, साप ह्यातलं काहीही खायला मिळेल इथे! ( हो हो खायला, तुम्ही बरोबर वाचत आहत
)
तरंगते रेस्तराँ
बँकॉक मधल्या नदीच्या काठांवर मोजकी तरंगती रेस्तराँ आहेत. लाकडी पायांवर बांधलेली ही रेस्तराँ नदीच्या पाण्यावर तरंगत असतात. त्यापैकी एकात मासे खायचा योग होता-

चित्रातल्या मध्यभागी चिकन रस्सा. तो सतत गरम रहावा म्हणून ज्योतीने गरम करायला खास पात्र! हा पदार्थ थायलंडमध्ये अगदी आवर्जून मागवतात. डावीकदच्या पुढच्या ताटलीत मासा. मागच्या ताटलीत अननस -भात - बिर्याणी. उजवीकडच्या ताटलीत नारळाच्या पानांमध्ये बांधून शिजवलेली कोलंबी.
थायलंडमध्ये स्टिक्स-कांड्या घेऊन खायला शिकायला मला ३-४ दिवस लागले. पण चमच्याने खाण्यापेक्षा याची सवय करणंच चांगलं. थायलंडपध्ये प्रत्येक ठिकाणी काटा चमचा मिळेलचं असं नाही. थायलंडमध्ये थाई थंड कॉफी प्यावी. मधुमेही व्यक्तींनी मात्र याच्या वाट्याल जाऊ नये. मातीच्या भांड्यात जर केली असेल तर चव न्यारीच. पण भरपूर गोड.
पुढच्या भागात खाओ हाई नॅशनल पार्क आणि काही इतर स्थळांबद्दल लिहीन...
सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल
प्रेषक बेसनलाडू ( शुक्र, ०६/०६/२००८ - २३:०२) .नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली. या सहलीतील काही चित्रे मिपाकर रसिकांसाठी देत आहे.
शामू - द किलर वेल
आणखी एकदा शामू
शामूचे कुटुंब
शामू हा किलर वेल (देवमासा) दिवसाला साधारण सरासरी १५० ते २५० पौंड अन्न (मासे) खातो
सी वर्ल्ड मध्ये दररोज त्याचे विविध खेळ बघायला मिळतात. शामू व त्याचे प्रशिक्षक यांच्यातल्या प्रेमाचे, त्याच्या प्रशिक्षणाचे नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य, अप्रूप वाटत राहते.
सी लायन (समुद्रशार्दुल) आणि त्याचा एक मित्र 
सी लायन, ऑटर आणि वॉलरस यांच्यातला फरक मला बरेचदा चटकन कळत नाही. वॉलरसला हत्तीसारखे (हत्तीएवढे नाही) सुळे असतात, त्यामुळे तो जरा ओळखता तरी येतो. ऑटर हा तुलनेने सगळ्यात लहान असावा. खालच्या चित्रात (बहुदा) ऑटरच आहे 
हे आहेत फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे
मुंबईला शिवडीच्या खाडीवर हे पक्षी दिसतात व त्यांच्यासंबंधीच्या 'मोसमी' बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये वाचावयास मिळतात.
मजेशीर शब्द
प्रेषक आर्य ( शुक्र, ०५/३०/२००८ - १८:४८) .आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे.
शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु.
मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया. पण अट ऐकच वाद नघालता नव नविन आणि गंमतशीर शब्द सांगायचे आपल्या प्रांतातले
( तात्या अशी चर्च्या यापुर्वी झाली असल्यास लीखकाच्या संमती शिवाय विषय काढुन टाका)
सुरवात मी करतो
शासकीय कामानिमीत्य काही महिन्यांपुर्वी विधान-सौधा (बेंगळूरु) येथे जाण्याचा (जेवण्याचाच म्हणाना) योग आला. बरीच वेळ चर्चा झाल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी महोदय आले, तिथेच आमच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आणि त्यांच्या कन्नड भाषणाला सुरवात झाली (त्यांना ईंग्रजी येत नसावे बहुतेक)
काय बोलले राव ! अधी आदर आणि मग हसु यायला लागलं मला. शब्दच कळेनात मला आणि मी ते मराठी शब्दांना जुळवले. अगदी शाळेत करतो ना तसचं जोड्या जुळवा / गाळलेल्या जागा भरा ईत्यादी.
पण आता अर्थ लागलेत त्यांचे ते असे-
गळू - लोकहो / जनहो (आदरार्थी बहूवचनी संबोधन) ऊदा : यलार सल्लागार गळू - सर्व सल्लागार लोक
हागु - आणि / तसेच (ऊभयान्वयी शब्द)
भंगार - सोने
कुंडी - ढुंगण
सोप्पु - पालेभाजी
मेले / मेलगडे - वर , केळे / केळगडे - खाली
केळी - विचारा
हेळी - सांगा
हळ्ळी - गाव, पाळ्या - भाग (देवन हळ्ळी, कद्रेनहळ्ळी, मरीयप्पन पाळ्या, कळासी पाळ्या)
अरून सवास! भाग १
प्रेषक ॐकार ( शुक्र, ०५/३०/२००८ - १२:१२) ."अरून सवास!" - थाई भाषेतलं सकाळचं अभिवादन कानी पडलं आणि कुठेतरी शब्दांची जत्रा लागल्याची चाहूल लागली. थायलंडच्या एका महिन्याच्या वास्तव्यात थाई लोक, काही ठिकाणे, थाई खाणे-पिणे, थाई संस्कृती आणि थाई भाषा यांची थोडीशी ओळख झाली आणि भारताबाहेर पहिल्यांदा घरोब्याचा अनुभव आला. थायलंडला जायच्य आधीच काही नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग शिकलो होतो आणि भाषासाधर्म्याचे कुतूहल जागे झाले. थायलंडच्या विमानतळाचे नाव - सुवर्णभूमी ! पहिले पाऊल जिथे टाकणार त्या अनोळखी प्रदेशाचे नाव इतके ओळखीचे असेल असा अंदाजच नव्हता. थायलंडला उतरल्यावर मात्र कुतूहल आणि अंदाजाची जागा उत्साह आणि आनंदाने घेतली. थायलंड बद्दल माझे काही अनुभव इथे मांडावेत असे कधीपासून मनात होते , आज योग आला.
ग्रँड पॅलेस

थायलंडमधले पर्यटनासाठी विषेश प्रसिद्ध असलेले हे ठिकाण. बँकॉक - राजधानीपासून जवळ आहे. डोळ्यांसाठी वैभवाची मेजवानीच!

सुवर्णकळस

सोनेरी खांब

गरूड

शेषनाग

भिंतीवर चितारलेला रामायणातील एक प्रसंग

भालदार चोपदार (?)
अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या)
बँकॉकपासून गाडीने तासाभराच्या अंतरावर असलेले हे ऐतिहासिक स्थळ. हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते. इथे ठिकाणी बुद्धाचे अनेक सोनेरी कळसाचे स्तूप, प्रार्थना/निवास स्थळे होती. बर्मातील टोळ्यांनी जेव्हा थायलंडवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी इथले सगळे सोने लुटून नेले.




आज केवळ अवषेश उरले आहेत. तरी त्यांच्यावरून गतकाळातील वैभवाची कल्पना करता येते. त्यानंतर चक्री राजघराण्यातील राजा राम (प्रथम) याने राजधानी बँकॉकला हलवली.
जुने थाई लाकडी घर.


हे घर जमिनीपासून थोडे उंचावर बांधले जाते. यामुळे घरात हवा खेळती राहते. घराची रचना सर्वसाधारणपणे अशी - मध्ये मोकळी जागा, चार बाजूंनी स्वयंपाकघर, पाहुण्यांकरता खोल्या, अभ्यासिका, शयनकक्ष. प्रत्येक बाजूंना उतरती छपरे. मध्ये मोठे छप्पर.
थायलंडमध्ये जिथे जिथे फिरलो तिथे आदरातिथ्याने भारावून गेलो. प्रगतीशील अशा या देशात आधुनिकतेबरोबरच लोकांची आपुलकीही तग धरून आहे. सवात्दी खा /क्रब (खा - स्त्री म्हणते तेव्हा, क्रब - पुरूष म्हणतो तेव्हा) असे म्हणत थाई व्यक्ती तुमचं स्वागत करेल. कॉब खुन् खा/क्रब म्हणून तुम्ही धन्यवाद द्याल आणि ह्यापुढे तुम्हाला थाई येत नसेल तर मात्र पंचाईत! थाई भाषेतील पाली-संस्कृत मधून आलेले शब्द जरी ओळखीचे वाटले तरी आज वापरात असलेले थाई शब्द मात्र तितकेसे पटकन कळतीलच असे नाही. त्यासोबतच ख्मेर मधूनही थाई भाषेत शब्द आले आहेत. थायलंडमध्ये सगळ्यांना इंग्रजी येतेच असं नाही आणि येत असली तरी आपली इंग्रजी आणि थाई इंग्रजी यांतून कोण काय बोलतो ते समजणे आपल्याला आणि थाई माणसालाही कठीणच! थाई टोनल भाषा आहे त्यामुळे शब्दांच्या उच्चारांतील बारकावे शिकायला, समजून घ्यायला मेहनत घ्यावी लागते. पण बरेचदा थाई व्यक्ती स्मितहास्यानेच तुम्हाला अर्धेअधिक जिंकून घेतात.
काही ठिकाणांची नावे पहा -
समुत् संख्रोम (समुद्र संग्राम)
रचतापिसेक (रजताभिषेक)
कांचनबुरी (कांचनपूरी)
राचाबुरी (राजापूरी)
सुवर्नापिसेक (सुवर्णाभिषेक)
अयुत्थया (अयोद्ध्या)
काही साधारण नावे -
तलेय (तळे ) थाई भाषेतला सद्ध्याचा अर्थ डबके , गरूड, शेषनाग
असेच काही संदर्भ सण, कालगणना याबाबतही मिळतात -
मकबुचा - (मकपूर्निमाबुचा) - माघी पौर्णिमा (बुचा - पूजा )
विसाखाबुचा - वैशाखपूजा - वैशाख पौर्णिमा - बुद्धपौर्णिमा
भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे काही धागेदोरे जुळतात. पण ह्या फंदात जास्त न पडता तुम्ही जर थायलंडमध्ये लोकांत मिसळलात तर तो आनंद काही निराळाच.
पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच...
कथाकाराची कैफियत!
प्रेषक पिवळा डांबिस ( रवी, ०५/११/२००८ - ००:३१) .अलिकडेच मिपावर 'अब्दुल खान' लिहीलं. चार भागात विखुरलेलं असूनही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक भागाची शेकडो वाचनं झाल्याची नोंद झाली. मिपावरच्या मित्रमैत्रिणींनी अगदी हातचं काही न राखता मनापासून कौतुक केलं. खूप खूप बरं वाटलं. काही वाचकांनी 'क्रमशः' बद्द्ल गोड तक्रारीही केल्या. पण त्या पुढचं वाचायच्या उत्सुकतेपोटी असल्याने त्याचं काही वाटलं नाही. एका नवोदित ललित लेखकाला सुरवातीच्या लिखाणालाच अशी शाबासकीची थाप पाठीवर पडली की त्याला किती हुरूप येतो हे शब्दांत मांडता येण्याजोगं नाही.
एकदा असाच, मला वाटतं तिसरा की चवथा भाग लिहीत होतो. विचारांची लिंक अगदी मस्त लागली होती. झराझरा पुढची वाक्यं सुचत होती. डोक्यातल्या विचारांचा पाठलाग करतांना टाईप करत असलेली बोटं थकत होती....
आणि इतक्यात आमचे चिरंजीव जवळ आले,
"डॅडी, व्हेन कॅन वुई गो फॉर स्विमिंग?"
हे कार्टं अगदी अमेरिकन होत चाललंय. त्याला सगळं मराठीबिराठी येतं, अगदी स्तोत्र आणि श्लोकांसकट! पण आईबापांशी मराठीतून बोलेल तर शपथ!! भारतातून आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक आले, अथवा आम्ही मुंबईला गेलो तर सगळ्यांशी व्यवस्थित मराठी बोलतो, पण आईबापांशी? रामा शिवा गोविंदा!!
"ए गपरे! मी काम करतोय!" आमचा द्वैभाषिक संवाद सुरू झाला...
"बट ऑल यू आर डूईंग इस रायटींग इन मराठी" स्क्रीनकडे नजर टाकत तो म्हणाला.
"तेच! मी मराठी कथा लिहीतोय!"
"कथा मीन्स स्टोरी? व्हाय?"
"मला मिसळ-पावच्या साईटवर द्यायची आहे"
तो थोडा थांबला. काहीतरी डोक्यात चालू होतं. मग पुन्हा विचारतो कसा,
"डॅडी, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन?"
"आता नाही, मग! आता मी लिहीतोय, दिसत नाही का?"
"बट इट इज रिलेटेड टू धिस..."
"बोला.."
"प्रॉमिस मी, यू वोन्ट गेट अँग्री..."
"हं..."
"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"
मी त्याच्याकडे बघतच राहिलो. काय बोलावं तेच मला सुचेना. इतक्यात पाठीमागून आवाज आला...
"हा, हा, हा, हा, हा!!!'
बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...
"वा, वा, क्या बात है!! बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभानल्ला!!" ती आनंदातिशयाने चीत्कारली!!
"नुसत्या मिपावर मिळणार्या शाबासक्यांनी फुशारून जाऊ नकोस! खरा लेखक असशील तर हाही अनुभव मिपावर लिहीशील!!" तिने खिजवलं.
फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे...
सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!!

