*ढिस्क्लेमर*
१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.
२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).
३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल.
४. लेखामधे खंडेरायाचा उल्लेख आहे तो सिर्यलच्या नावाखाली घुसडलेल्या कपोकल्पित गोष्टींचा उद्धार करण्यासाठी. वरिजिनल खंडेरायावर आमचही बानुपेक्षा जास्तं आणि म्हाळसेपेक्षा अंमळ कमी प्रेम आहे. तस्मात कोणाचं काहीही दुखावलं जाणार असेल त्याने लेख पुढे वाचु नये.
५. ह्या सिर्यलींमधुन अनेक नामवंत कलाकारांना चक्क वाया घालवण्यात आलेले आहे. माझा आक्षेप फक्तं कला सादर करायच्या उथळ पद्धतींना आहे. कलाकारांविषयी प्रेम आणि आदर वाटतो आणि वाटत राहिलं.
------
सद्ध्या संध्याकाळी हापिसातुन वेळेवर घरी (स्वतःच्या, मित्रांच्या, शत्रुंच्या आणि नातेवाईकांच्या) जायचं म्हणजे पोटात मोठा गोळा येतो. कारण हापिसातुन कधीमधी वेळेमधे निघता आलेचं तर घरी पोचेपर्यंत ७ वाजलेले असतात. आणि घरी एका फेमस चॅनेलवर खंडोबाच्या नावानं करमणुकीचा "खेळखंडोबा" चाललेला असतो. दोन बायकांच्या तावडीत सापडलेला आमच्या महाराष्ट्राचा खंडोबा पाहिला की त्याची दया येते बॉ. कजाग म्हाळसा आणि पझेसिव्ह बानुच्या वादावादीमधे खंडोबाचे खाण्यापिण्याचे हाल होउन हल्ली "बाडी" कमी व्हायला लागल्याचे आमच्या "फ्रेश आय पर्स्पेक्टिव्हच्या" लक्षात आलेले आहे. ह्या सिर्यल (सिर्यल किलर हा शब्द ओळीने खुन करणारा ह्या अर्थाने आला असावा का असल्या बकवास सिर्यलींचा मारा करुन खुन करणारा असावा ह्याविषयी आमच्या मनामधे अंमळ शंका आहे. अंमळ शंकांचे अभ्यासक श्री.श्री बॅटमॅन ह्यांनी ह्या शंकेचे सिर्यलांचा सखोल अभ्यास करुन निराकरण करावे असे आवाहन (आव्हान पण) आम्ही करतो) दाखवायच्या आधी त्यांच्या डिस्केमर मधे नाट्यमय रुपांतराचा डिस्क्लेमर दाखवलाय. म्हणजे खंडेरायाच्या भक्तांच्या रोषाला तोंड नं द्यायला लागावी ह्याची एक पळवाट. बाकी मला लहानपणापासुन शंकर ह्या भोळ्याभाबड्या आणि त्रिनेत्री देवाबद्दल कायम असणारी एक शंका म्हणजे त्यांची दैत्यवर्गावर असणारी विशेष कृपादृष्टी. ह्या कृपादृष्टीची तुलना हल्ली फक्तं वोटब्यांक सांभाळायसाठीच्या कृपादृष्टीशीचं होउ शकते. आधी दैत्यांना भरमसाठ प्रिव्हीलेजेस देउन ठेवायचे आणि नंतर बहुतांश वेळा आमच्या गरिब भोळ्या भाबड्या विष्णुभगवानांनी ते निस्तरायचे असा सगळा प्रकार हो. असो तो वेगळा विषय आहे. म्हाळसेला आपणचं जगन्माता पार्वती असल्याचं स्मरण ज्यादिवशी होईल त्याचं दिवशी जान्हवीची डिलीव्हरी पार्वतीकृपेने होणार असं काही उडत उडत कामावर आलेलं आहे. खरं खोटं खंडोबा जाणे. बाकी ह्या वेळेमधे मॅचचा नुस्ता स्कोअर पहायसाठी चॅनेल बदलायचा प्रयत्न सदागरिब, हताश, नम्र अश्या गृहपुरुषांनी केला की त्यांच्या घरच्या म्हाळसा त्यांच्यावर करवदायला लागतात हा अण्भव सगळ्यांनी घेतलेला असेलचं. असो. खंडोबा ह्या गृहकलहातुन लवकर सुटो अशी श्रीबालगणेशचरणी प्रार्थना.
हा खेळखंडोबा संपत नाही तोपर्यंत सद्गुणी, दयाळु, जगत्राता, निसर्गप्रेमी, मातृप्रेमी, हापिसकर्मचारीप्रेमी, अतिनम्र, सहनशिलतेचा महामेरु, शामच्या आईच्या बाळानंतरचा एकमेव संस्कारी, मधुमंदा क्रुरकर्मी ह्यांच्या सुडोकुमधुन जन्माला आलेला श्री बाळ "काहीही म्हणजे काहीही" चाळे करायला टीव्हीवर येतो. घरामधल्या पाच-पाच (बेबी, मोठी आई, छोटी आई, अजिजीला आलेली आई अज्जी, लगनाळु मावशी...हा लागली टोटल बरोबर) आयांच्या संस्कारांना बळी पडलेलं हे बाळ घरच्या सुसंवादांना कंटाळुन दाढी वाढवुन हापिसात स्टाफबरोबर गप्पा मारायला जातं. एवढ्या बायकांमधे हा एकटा पुर्षा कशाला म्हणुन अधुन मधुन प्रसाद ओक त्या नुसत्या वयाने आणि वजनाने वाढलेल्या अकलेने अडिच वर्षांच्या सणकी बेबीशी गोग्गोड भांडणं काढताना दाखवलाय. श्री च्या बाबांनी मधे कधीतरी दर्शन देउन एवढ्या बायकांना टॅकल करायचा गुण आपल्यामधे नसल्याचं लक्षात घेउन खुबीने पळ काढलेला आहे हे आमच्या तल्लख मेंदुला लक्षात आलेलं आहे. आठवड्याला एखाद्या कष्टमरच्या माथी गोखले गृहौद्योगामधल्या वाटाण्यांच्या अक्षता लावल्या की हे गुणी बाळ कजाग सासु, लग्नाळु मेव्हणा, गुढगी रोगाने ग्रासलेला (का त्रासलेला) मेकप थापलेला सासरा, मानलेली "मोरॉनिक" मेव्हणी, हापिसमधला शिपाई कम चहावाला कम मॅनेजर कम कौटुंबिक अॅडवायजर कम सांगकाम्या ई.ई. च्या अडचणींमधे नाकं खुपसायला तयार होतो. जान्हवीकडे अता वाढीव प्रेग्नंन्सीच्या वाढीव खर्चामुळे ग्रस्तं असल्याने तिच्याकडे वडलांची गुढग्याची कवटी रिपेर करायला पैसे नाहित. शिवाय पराजया सहकारी ब्यांकेत मठ्ठं पोरीशेजारी बसुन ती जे अंग मोडुन गप्पा मारायचं काम करते ते पाहुन ब्यांका बुडायचं अजुन एक कारण असा एक रिपोर्ट रघुराम राजन सरांना पाठवुन द्यावा असं मनात येतं.
हल्ली ह्या सिरियलचे प्रायोजक बदललेले दिसतात. पुर्वीच्या प्रायोजकांच्या राज्यात जान्हवीचा बाप निमुट खटियापे पडुन कजाग बायकोकडे दुर्लक्ष करत असे. हल्लीचे नवे प्रायोजक उत्तेजक औषधांचे उत्पादक असावेत. कारण जान्हवीचे पिताश्री "नव्या जोमाने/ आर्टिफिशिअल नवशक्तीने/ नौजवान जोशाने" हल्ली कजाग बायकोवर ओरडा-आरडाही करतात म्हणे. त्यांच्या त्या बारावीला किमान ४५ वेळा नापास झालेल्या सद्गुणी चिटुकल्या पिटुकल्या पिंट्याने कुठल्यातरी ओढुन ताणुन आनी-पानी करनार्या प्वॉरीशी लगीण जुळवुन आयशीला स्क्रीनवर थयथयाट करायला वाढिव स्कोप दिलेला आहे तो वेगळाचं. नै तो कुठल्या हापिसात नोकरी करतो त्यांचा पत्त्या म्या शोधु र्हायलोय बरं का. कारण डबल ग्रॅज्युएट पोरंपोरी बेरोजगार फिरत असताना लग्नं करण्याएवढी स्टेबिलीटी ह्या १२ वी फेल नुमुन्याला कुठल्या हापिसात मिळाली तिथं काही वॅकन्सी आहे का बघावी म्हणतो. सहस्त्रबुद्धे असं कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना पाहुन आम्ही याची देही याची डोळी धन्य झालो. ह्या सिर्यलच्या निर्मात्या/ दिग्दर्शक/ लेखिका इत्यादिंनी आता जान्हवीला बळजबरिने हॉस्पिटलमधे नेउन सिझेरियन करुन प्रेक्षकांना लागलेल्या प्रसववेदनांमधुन त्यांची सुटका करावी हि नम्र विनंती. निर्मात्याने हे करुन दाखवल्यास त्यांना आम्ही आमच्या खर्चाने जय-आदिती अविवाहित हापिस हनिमुन पेश्शल टुर्स अँड ट्रॅव्हल्स लिमिटेडच्या स्पेशल पॅकेजने ट्रिपला पाठवु. हवं तर त्या सिरियलमधल्या पिंट्याच्या हनिमुनमधेही (आर्थिक रे बाबांनो किती वाईट विचार कराल?) मदत करु.
वरची दोन गिर्हाईक आम्ही आमच्या रेफरन्सने जय-आदिती अविवाहित हनिमुन पेश्शल टुर्स अँड ट्रॅव्हल्स लिमिटेडच्या हापिसात पाठवत आहोत. तरी त्या हापिसचे एकमेव कार्यक्ष आणि बढती मिळवणारे कर्मचारी श्री. जय ह्यांनी त्यांच्या टुरींची प्रेझेंटेशन्स बनवुन ठेवावीत हि आग्रहाची विनंती. ह्यांचं ऑफिस म्हणजे बॉस पासुन शिपायापर्यंत अगदी सगळे एकेक नमुने. ऑफिसचा बेसिक नियम काय तर म्हणे लग्नं झालेले एंप्लॉयी नकोत. का त्याचं कारण न्युक्लिअर बाँबच्या रेसिपीएवढं गुढं ठेवलयं. आमच्या हनिमुन पॅकेजेसमधे आम्हाला लग्नं झालेली लोकं चालणार नाहित असा पण पुर्वी त्यांच्या बॉसने केलेला असावा त्यामुळे ऑफिसचे बिझनेस प्लान वाया जात असणार. ह्या सिरियलमधे सगळ्यात जास्तं घडणारी गोष्ट म्हणजे योगायोग हि होय. योगायोगाने लग्नं झालेले जय-आदितीला ह्याच्चं हापिसात एकत्र जॉब मिळतो काय. ह्या हापिसात योगायोगानेचं बॅकग्राउंड चेक वगैरे फालतु प्रकार बॉस- एच.आर. वगैरे करत नसतात. योगायोगाने त्यांचा पेइंग गेस्ट मालक हापिसच्या मातोश्री आईसाहेब उर्फ आऊ (शक्ती कपुरच्या आउचा ह्यांच्याशी काही संबंध नाही) ह्यांचा बालसवंगडी निघतो म्हणे. योगायोगाने जयचा अत्यंत महामा...म...महामायाळु सासरा त्याच्याच बॉसचा बिझनेस पार्टनर बनुन त्याची चामडी सोलायला लागतो. अरे बिझनेस पार्टनरशिप म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का? उद्या कोणीहि येईल आणि पार्टनर होईल. काय त्याला नियम, कागदपत्रांची खेकटी, सी.ए./ सी.एस. लोकांची इन्व्हॉल्वमेंट नावाचा प्रकार अस्तित्वात असतो का नाही? ते एक असो.
ऑफिसामधल्या बहुतांश स्त्रीवर्गाला एकचं काम आहे ते म्हणजे जयबाळावर त्याच्या बायकोसमोर लाईन मारणं. ती कोण उद्धट महामाया आहे त्या ऑफिसमधे ती अगदी नेटाने हात धुवुन पाठीमागे लागलेली असते. उरलेल्या बायका स्त्रीधर्माला अनुसरुन एकमेकींची खोटी कौतुकं करणं, रेसिप्या शेअर करणं, दिवाळीचा फराळ घेउन येउन कौतुकं करुन घेणं वगैरे प्रकार करत असतो. त्या ऑफिसमधे एक खत्रुड नवरे मॅनेजर आहे त्याला कोणी हिंग लाउन विचारत नाही. तो येउन तोंड जमेलं तेव्हडं वाकडं करुन कामं करा म्हणुन ओरडायला लागला की त्याला "कोणीही यावं आणि टिचकी मारुन जावे" उक्तीने फाट्यावर मारतात आणि आपापल्या टैमपास कामांमधे गुंततात. ते पु.लंच्या असा मी असामी मधे "आमची बेनसन जानसन कंपनी कोणीही काम नं करता कशी चालते" ह्या वाक्याचा तंतोतंत प्रत्यय येथे येतो. आता हे हापिसातल्या कर्मचार्यांचं कौतुक झालं. आता बॉसकडे वळु या. ह्या ऑफिसमधल्या खत्रुड बॉसची तीन महत्त्वाची कामं म्हणजे आदितीचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करणं. एक दिवसा आड जयला शिव्या घालणं आणि कौतुक करणं. आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे हापिसामधे येणं.
जय आदितीचे पेइंग गेस्ट वाले काका काकु म्हणजे थेट भगवंताचे व्यवहारी अवतार हो. काकांचं महत्त्वाचं काम म्हणजे जय आदितीला टोमणे मारणं, त्यांच्याकडुन महिन्याचं भाडं वसुल करणं आणि काकुंवर डाफरणं. त्याबदल्यात ते जयच्या पिताश्रींचा फुकट सांभाळ करतात म्हणे. जयच्या वहिनीचं वागणं अगदी कधी कधी त्या जान्हवीच्या आईला लाजवेल एवढं अप्पलपोटं असतं. असो.
अजुन पर्यंत तरी सौभाग्यवतीचा एपिसोड पाहिलेला नाही त्यामुळे नो कमेंट्स. एकच अपेक्षा वैभव मांगले ला वाया घालवलेला नसेल.
झी मराठी वरच्या ह्या सगळ्या काळ्या ढगांमधे सोन्याची किनार असावे असे दोन शो नक्की आहेत. ते म्हणजे चला हवा येउ द्या आणि दिल दोस्ती दुनियादारी.
चला हवा येउ द्या ची सगळी टिम अत्रंगी धमाल करत असते सेटवर. काहीवेळा एपिसोड पाणचट असतात. पण किमानपक्षी वरच्या तद्दन भिकार आणि टाकाउ सिरिअल्स पेक्षा बरेचं बरे असतात सगळे एपिसोड. भाउ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, मानसी नाईक, श्रेया बुगडे वगैरे अत्रंग्यांना सांभाळणारा डॉ.निलेश साबळे ह्यांना सगळ्यांना अगदी मनापासुन अभिनंदन.
दिल दोस्ती दुनियादारी पण भन्नाट सिरियल आहे. F.R.I.E.N.D.S. चं मेलोव्ड डाउन वर्जन म्हणुन मी दि.दो.दु. कडे मोठ्या अपेक्षेने पहातोय. फ्रेंड्स मधले एपिसोड्स त्यांच्या कल्पना एज रेटींग आणि कुपमंडुक वृत्तीमुळे जसेच्या तसे भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोचु शकणार नाहित. पण तरीही ही सिरियल नक्की आवडते. जोई, चँडलर, रॉस, मोनिका, रेचल, फिबी ची भारतीयं रुपं पाहुन बरं वाटतं. कधी वेळ मिळाला तर बघायला नक्की आवडते.
झी मराठीने कृपया टुकार मालिका काढणं सोडुन अश्या दोन सिरिअल्स सारख्या सिर्यल्स काढाव्या हि सिर्यस विनंती.
बाकी जान्हवीला डिलिव्हरीच्या शुभेच्छा.
प्रतिक्रिया
14 Nov 2015 - 2:24 pm | आदूबाळ
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.
16 Nov 2015 - 11:38 pm | अन्नू
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो!
पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही,
रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो!
त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात.
अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे
14 Nov 2015 - 2:25 pm | आदूबाळ
डुप्रकाटाआ.
14 Nov 2015 - 2:34 pm | याॅर्कर
अवांतर - चला हवा येऊ द्या आणि दिल दोस्ती दुनयादारी यांचेकडून तुम्हाला चेक मिळत नाही हे सांगावयास विसरलात.
14 Nov 2015 - 2:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
14 Nov 2015 - 2:41 pm | यशोधरा
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.
14 Nov 2015 - 2:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली.
14 Nov 2015 - 2:52 pm | यशोधरा
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.
14 Nov 2015 - 4:03 pm | मितान
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)
14 Nov 2015 - 6:20 pm | यशोधरा
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!
14 Nov 2015 - 2:56 pm | _मनश्री_
नांदा सौख्यभरे
14 Nov 2015 - 7:00 pm | मदनबाण
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली.
तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) }
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले...
आता मालिकां बद्धल...
खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;)
असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे.
{ या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. }
आता काहीही श्री बद्धल !
श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्या मंडळींनाच विचारला आहे. ;) }
जय-अदिती...
ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;)
दिल दोस्ती दुनियादारी...
काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो.
चला हवा येउ द्या...
जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प
बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira
14 Nov 2015 - 2:48 pm | टवाळ कार्टा
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))
14 Nov 2015 - 2:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =))
बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?
14 Nov 2015 - 2:52 pm | टवाळ कार्टा
=))
14 Nov 2015 - 3:17 pm | नाखु
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती.
बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!!
त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो.
जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!
14 Nov 2015 - 4:05 pm | मितान
कसं हो जमतं केवळ २ दिवस शिरेली बघून एवढं छान लिहायला !!! ;)
14 Nov 2015 - 4:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जाता येता कानावर पडत असतं बाकीच्या वेळी.
14 Nov 2015 - 4:11 pm | अद्द्या
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो .
आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं.
मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो .
आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी .
पण असो . चला हवा येउद्या भरिए .
14 Nov 2015 - 4:19 pm | रातराणी
खतरनाक लिवलय :)
हे पेपरात छापून आलं पायजे.
14 Nov 2015 - 4:29 pm | पगला गजोधर
Hats off to your patients ...
Nice article ..
Going to show this to my wife and inlaws.
14 Nov 2015 - 4:45 pm | सस्नेह
जबराट परीक्षण !
बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !
14 Nov 2015 - 5:08 pm | मुक्त विहारि
आणि
सरळ प्रतिसाद लिहायला घेतला.
कॅप्टन तुसी ग्रेट हो.
ह्या अशा सिरियल बघण्यापेक्षा, सिरियल कट्टे करावेत.
14 Nov 2015 - 5:28 pm | सागरकदम
नशीब तुम्ही चित्रपट बघत नाहीत
नाहीतर डोकं दुखून भणभण पायो सारख्या अजरामर समीक्षा माझ्या आधीच लिह्व्ल्या असत्या
14 Nov 2015 - 5:30 pm | पैसा
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!
14 Nov 2015 - 5:43 pm | राही
वरती कोणी म्हटले आहे तसे खरेच पाथवा वर्तमानपत्रात.
14 Nov 2015 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट लिवलयं !
सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =))
वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)
14 Nov 2015 - 6:17 pm | यशोधरा
मटा सोडून बरंका!
14 Nov 2015 - 6:42 pm | विवेकपटाईत
सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का? अर्थात लग्न झाले असेल तर.
अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते).
भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
14 Nov 2015 - 6:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या!!!
सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))
14 Nov 2015 - 7:01 pm | सागरकदम
म्हणून इकडे?
14 Nov 2015 - 7:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपण दुसर्याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.
15 Nov 2015 - 11:28 am | सागरकदम
mi kadhich gelo navto
han adubal kade konitari bhokand pasrun gele ani adubal ne ugi ugi kele
14 Nov 2015 - 7:41 pm | पियुशा
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच
14 Nov 2015 - 8:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!
16 Nov 2015 - 1:30 pm | होबासराव
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!
सेम हिअर, छान लिहिलस.
मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्यापैकि जमलाय.
14 Nov 2015 - 8:11 pm | तुमचा अभिषेक
मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.
14 Nov 2015 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा
खतरि भंडारा उधळालाय चिमणनी! :-D
14 Nov 2015 - 10:34 pm | चांदणे संदीप
शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला!
"अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो!
F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून!
बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले!
धन्यवाद,
Sandy
14 Nov 2015 - 11:26 pm | याॅर्कर
"भाभीजी घर पर है" छान विनोदी आहे.
16 Nov 2015 - 2:08 pm | बॅटमॅन
सही पकडें हैं!
15 Nov 2015 - 11:43 am | तुषार काळभोर
रबिन्द्रनाथ टागौरकी कहानियां(पहिल्याच कहानीत रा.आ. होती) , मिडविकेट टेल्स, राजा रसोई और अन्य कहानियां, एकांत
14 Nov 2015 - 11:21 pm | तुडतुडी
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .
14 Nov 2015 - 11:51 pm | DEADPOOL
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल
करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन ,
म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी
रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ?
सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.
15 Nov 2015 - 3:56 am | शब्दबम्बाळ
आलात? छान...
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या...
हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का?
काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!
15 Nov 2015 - 11:08 am | चांदणे संदीप
शब्दबम्बाळ यांनी "सौम्य शब्दात" असा शब्दप्रयोग वापरणे हे पाहून अंमळ मौज वाटली! :)
15 Nov 2015 - 4:45 pm | शब्दबम्बाळ
अरे बापरे! का हो?? :)
नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो..
तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)
15 Nov 2015 - 7:30 pm | चांदणे संदीप
मालक, "गम्मत" असे म्हणालो की!
तरीही, माफ करा.
मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली.
(स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!)
:(
15 Nov 2015 - 7:48 pm | DEADPOOL
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या
कोणी रचलेल्या म्हणायच्या...
हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे
शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का?
काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर
काही बिघडत नाही!+++++११११
15 Nov 2015 - 3:43 am | एस
ही: ही: ही:
बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)
15 Nov 2015 - 5:56 am | अत्रुप्त आत्मा
जय मल्हार!
15 Nov 2015 - 8:00 am | अजया
भारी लिवलंय!!
सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!
15 Nov 2015 - 8:41 pm | अभिजीत अवलिया
वाक्यावाक्याशी सहमत आहे कॅप्टन !!!
16 Nov 2015 - 7:47 am | रेवती
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं?
श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत.
चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.
16 Nov 2015 - 11:44 am | Sanjay Uwach
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.
16 Nov 2015 - 8:30 pm | तुडतुडी
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .
17 Nov 2015 - 12:10 pm | बॅटमॅन
हे कधी सिद्ध झाले म्हणे?
17 Nov 2015 - 12:25 pm | चांदणे संदीप
Mon, 16/11/2015 - 20:30
21 Nov 2015 - 9:51 am | संदीप डांगे
ख्या ख्या ख्या.... =)) =)) =))
17 Nov 2015 - 2:42 pm | यशोधरा
हे काय नवीन?
21 Nov 2015 - 8:41 pm | DEADPOOL
सॉरी पण तुम्ही मूर्खपणाचा कळस गाठता आहात!
लक्ष्मी विष्णूची आई?
हळू बोला!!!!
16 Nov 2015 - 11:07 pm | श्रीरंग_जोशी
क लिवलय क लिवलय.
कर्मधर्मसंयोगाने या सर्व मालिकांपैकी एकही कधीच पाहिली नसल्याने बरेच संदर्भ कळले नाहीत...
20 Nov 2015 - 2:53 pm | अन्नू
एकही मालिका पाहिली नाही???
पुण्यवान आहात.
17 Nov 2015 - 2:33 pm | कपिलमुनी
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
21 Nov 2015 - 9:51 am | संदीप डांगे
चिमणराव, लेख झक्कास. :-)