टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वाद
माझ्या टोपण नावामागचे कारण
प्रेषक सखाराम_गटणे™ ( मंगळ, ०६/२४/२००८ - २३:०५) .आपण येथे टोपण नावाने वावरतो. ते आपण स्व खुशीने घेतलेले आहे. ते नाव घेण्यापाठीमागे ऐक कारण आहे. ते कदाचीत ऐक प्रकारचे आकर्षण असु शकेल.
म्हणजे, मी लहान पणा पासुन जवळ पास पुस्तकी किडा. लहान पणी रॉबीन हुड, टारझन, अरेबियन नाईटस, रुस्तम आणि सोहराब (ह्या कथेचा शेवट वाचुन मी लहान असताना रड्लोय.), फास्टर फेणे, पुलं आणी खुप सारी पुस्तके वाचली.
रॉबीन हुड पुस्तकासाठी मित्राच्या घरी इतके हेलपाटे मारले की आजुबाजुचे लोक माझ्या हेलपाट्यामागे भलताच संशय घेउ लागले. महाविद्यालयात असताना सुदधा पुस्तकांची आवड कमी झाली नाही. शेवटी पैसे पुरत नाहीत म्हणुन रद्दीच्या दुकानातुन पुस्तके आणुन वाचली. ऐकुन काय तर मला पुस्तकांची भयंकर आवड.
पुलं चे ज्या वेळी मी सखाराम गटणे वाचले त्या वेळी मला त्या व्यक्तीरेखे बद्द्ल ऐक जाणुन घ्यायची ईच्छ्या निर्माण झाली. ऐकदरच ते पुस्तकी बोलणे आणि शेवटचा विवाहाचा प्रसंग आम्ही हसुन हसुन घालवला. आपण ऐक प्रकारे त्याचे व्यक्तीमहत्व आपल्यात किंवा आपले त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे, शिवाजी राजे सगळ्यांना (काही अपवाद सोडुन)आवडतात, पण सगळे शिवाजी राजे होत नाहीत. मग आपण आपल्या घरातल्या कोनाचे तरी नाव शिवाजी म्हणुन ठेवतो.
ह्यामुळे मी 'सखाराम गटण' हे नाव घेतले.
आपण आपले टोपण नाव का घेतले ?
II राजे II,
धमाल मुलगा,
आनंदयात्री,
पिवळा डांबिस,
विसोबा खेचर,
इनोबा म्हणे
इ.
बोला आता.
तुमचे व्यक्तीमहत्व कसे काय त्या टोपण नावाशी संबधित आहे?
**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****
प्रेषक छोटा डॉन ( गुरू, ०६/१२/२००८ - ०२:३१) .ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....
आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत. पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?
यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!
मिपावरच्या मान्यवर व अभ्यासु जनांचे "इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता" याबद्दल काय मत आहे जाणून घ्यायला मला आवडेल ...
(आसपास)
प्रेषक चतुरंग ( शुक्र, ०५/३०/२००८ - ०३:४२) .सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले! 
ओढा खाली, पाडा त्याला, बोलत काही बाही
सूर वेगळे, नवी तुतारी जरी वाजवू पाही
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
सांजसकाळी जाऊ लागल्या कानोसा घेण्यात
मग्नच असती कोणी येथे कुजबुज ती करण्यात
दात विचकुनी, किचकिच करुनी घसे कसे बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नमोगताला शरण जाउनी घाली की साकडे
जालावरचे वैर असे की शेपुट ते वाकडे
विडंबलेले काव्य पाहुनी सोगे का सुटले?
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या,
असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या?
दुज्या सुरांचे, स्वागत येथे, वर्ज नसे कुठले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
जालावरती रंग निराळे, दोन असे तर दोन तसे
पूर्वसुरींचे आळवुनी स्वर काव्य नासले असे कसे
मेंढरातल्या लांडग्यास मग रट्टे की बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
चतुरंग
निर्लज्ज गृहमंत्री
प्रेषक अन्या दातार ( गुरू, ०५/२९/२००८ - ०२:३३) .आपल्या माननीय गृहमंत्र्यांनी काय अकलेचे तारे तोडले आहेत ते बघाच. हा नक्की कुठल्या देशाचा गृहमंत्री आहे तेच कळत नाही. खालील दुवा वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3078229.cms
हे राजनेते सत्तेने इतके लाचार झाले आहेत की ते ज्यांच्यासाठी राबणे अपेक्षित आहे ते काम करतच नाहीएत असे दिसते.
भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ
प्रेषक आजानुकर्ण ( बुध, ०५/२८/२००८ - २२:१८) .भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे.
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले
म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.
या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्यांना, लिहिणार्यांना, वापरणार्यांना संशयदेखील येऊ नये.
पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!
पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा
विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."
अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती.
भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.
भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने
. मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.
डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.
भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "
याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.
पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"
मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला मधुचोष्यक हा शब्द सुचवला
मराठी भाषेचे मूळः
राजाध्यक्षांच्या मतांनंतर 'मराठी भाषेचे मूळ' आणि 'अडगुलं मडगुलं' या थोर पुस्तकांचे लेखक, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांचा मनोगतावर वाचलेला एक प्रतिसाद येथे देतो.
... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...
भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...
प्रेषक ॐकार ( बुध, ०५/२८/२००८ - १४:३७) .शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'
उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.
मॅरेज सर्टिफिकेटचे नूतनीकरण असावे का?
प्रेषक डॉ.प्रसाद दाढे ( रवी, ०५/११/२००८ - १८:२५) .हि॑दू विवाह कायद्याप्रमाणे आपण लग्नसमार॑भ म॑गलकार्यालयात पार पडल्यावर सरकारी कार्यालयातही नो॑द करतो.. विवाह-विच्छेद होताना॑च ही नो॑द रद्द होते..
वाहन परवान्याचे जसे दर प॑धरा-वीस वर्षा॑नी नूतनीकरण करावे लागते व ते॑व्हा चालक वाहन चालविण्यास सक्षम आहे याची खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? मिपाबा॑धवा॑ची काय मते आहेत?
शाकाहार :- काही नवीन पैलु
प्रेषक मन ( शनी, ०५/१०/२००८ - ०५:२५) .मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते.
जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी.
जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी.
माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः-
१.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो.
जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी.
त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे.
दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात.
आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे.
दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत.
काही साम्य दिसलं? दुसर्या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा
तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा.
बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या
आहारात हे साम्य आहे.
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. )
त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा.
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.
येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे.
याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो.
त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते,
त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्या दातात "रगडले" जाते.
नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा.
(जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.)
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त.
("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"
मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.)
माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते.
४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे.
काय असते हे ऍपेंडिक्स?
तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग.
तो हिरव्या वनस्पती खाणार्या प्राण्यात कार्यरत् असतो.
त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे.
मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो.
पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.
५.सहज प्रवृत्ती:-
एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........
तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक
सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु.
नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्.
आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.
ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर.
मग ह्या सगळ्या गोष्टी बर्याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने
शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
तूम्हाला काय वाटतं?
वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?
लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....
प्रेषक कलंत्री ( शुक्र, ०५/०९/२००८ - १९:३४) .(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.)
ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते. अनेक विषयावर चर्चा होत असताना आम्ही लहान मुले अवतींभोवती खेळत होतो आणि अधेमध्ये मोठ्यांच्या गप्पाही ऐकत होतो.
अनेक विषयाच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्यातच मामाच्या मुलीच्या वरसंशोधनाचा विषय निघाला. मामाने सध्या काय अडचणी आहेत आणि तुमचे लग्न कसे लवकर जमले इत्यादी इत्यादी सांगितले. बोलता बोलता मामा म्हटला, की आता मुलाकडचे लोकं पूर्वीसारखे फक्त घरदारच बघत नाही. सध्या मुली बघण्याचे वेड चालू आहेना! आपल्या रंजनाला मी सांगितले आहे की मुलाकडचे काही प्रश्न विचारतात ना, तेव्हा एखादा इंग्रजी शब्द नक्कीच वापरत जा. इंग्रजी शब्द वापरला ना, की मुलगी एकदम शिकल्यासारखी वाटते. ते वाक्य ऐकून सर्व मावश्यांनी आणि आईने मान डोलावली आणि खरेच सांगतो आहे हा असा आविर्भाव व्यक्त केला.मी तर लहानच होतो पण माझे आईकडे लक्ष गेले. आईनेही मान डोलावली आणि माझे लक्ष नकळतच तिच्या डोळ्याकडे गेले त्यात मी एक काहीतरी पराभवाची, न्यूनगंडांची आणि कसल्यातरी भीतीची भावना बघितल्यासारखी जाणीव मला झाली. इतक्या वर्षानतरही मला माझ्या आईचे ते डोळे आठवतात.
आजपर्यंत मला कधी कधी मामाचा राग यायचा पण आज हा लेख लिहिताना मला मामाचे खरेच कौतुक वाटते. मामा खरेच द्रष्टा होता हे निर्विवाद पणे मान्य करावेसे वाटते. कालाच्या ओघात काय बदल होणार आहे आणि त्याचा आपल्या लाभासाठी कसा जास्तीत जास्त फायदा उचलायचा यात वाईट ते काय? शेवटी आपल्या मुलांचे भले व्हावे असे कोणत्या पालकांना वाटणार नाही? लग्न ही खरोखरच आपला स्तर बदलवण्याची सूवर्णसंधीच आहे असे समजा हवे तर.
माझ्या मामाला ३०/३५ वर्षापूर्वी एखाद्याला अल्पभेटीत परकीय भाषेचे साह्य घेऊन कसे प्रभावित करायचे हे समजले होते.
आज मी बघत असतो अनेक मराठी भाषक इंग्रजीमध्ये लग्नपत्रिका घेऊन येतात. अनेक लग्नामध्ये अमुक अमुक वेडस् अमुक अमुक असे फुलांनी सजवलेलेच असते, लग्नाच्या गाडीवर सर्रास बदामाचे चित्र आणि लोव्ह असे लिहिले असते.
भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना?
पुढच्या महिन्यात मी मामाला ( वय ८३) भेटणार आणि त्याच्या द्रष्टत्वाबद्दल कौतुक किंवा काय असेल त्या माझ्या भावनाही सांगणार आहे. शेवटी तो काळाच्या खरेच पुढे होता हे मान्य करायला काय हरकत आहे?
मराठी शिकलेला नवरा नको गं बाई....
प्रेषक कलंत्री ( गुरू, ०५/०८/२००८ - १६:४६) .(या मेच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेलो असताना हा किस्सा घडला. )
आमच्या गावाकडे असणाऱ्या एका मित्राच्या बायकोने तिच्या उपवर आणि सुशिक्षित मुलीसाठी काही मुले पाहण्यासाठी मला सांगितले, त्याप्रमाणे मी तिला तसे आश्वासन दिले आणि ही गोष्ट अश्याच गप्पागोष्टीत माझ्या एका मित्राला सांगितली. माझ्या त्या मित्राने मला विचारले की तुला त्या मुलीबद्दल काय माहीत आहे, यावर मी नकारार्थी उत्तर दिले. त्याने दुसरा प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये अश्या कामासाठी मदत करणारे असतील का नसतील. मी त्यावर उत्तर दिले की अर्थातच आपले गाव छोटे आहे आणि त्यामुळे कोणी मदत करणार नाही असा विचारही माझ्या मनात येत नाही.
मग त्याने एक उसासा घेतला आणि सांगितले," अरे, ती मुलगी फारच अगोचर आहे. तिला आम्ही काही स्थळे दाखविली, परंतु तिने काही चांगल्या स्थळांना तिने सरळ सरळ नकार दिला, कारण माहीत आहे, की मुलगा मराठी माध्यमात शिकलेला आहे. आता मला सांग तिच्या साठी आम्ही काय इंग्लंडहून नवरा शोधायचा का?, मराठी माध्यमाच्या मुलांना काय धाड भरली आहे? दुर्दैवाने तिची आई पण तिला भरीस टाकत असते." मी जास्त न बोलता अल्पोपहार आणि चहा घेऊन गाशा गुंडाळला.
घरी आलो आणि खरेच मी विचारमग्न झालो. लग्नाच्या मुली शक्यतो खेडे टाळतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच, पण आता मराठी शिकलेला नवरा नको असे म्हणणे म्हणजे फारच झाले, बरे इंग्रजीमध्ये शिकलेला नवरा काय आणि मराठीमध्ये शिकलेला नवरा काय? शेवटी संसार करताना तडजोडीची भाषाच शिकावे लागते.
कदाचित त्या मुलीला आणि त्याही पलिकडे तिच्या आईला आयुष्याच्या शाळेत बरेच शिकायचे आहे हेच खरे.

