टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
ज्योतिष
असेही एक पैलतीर (भाग तीन)
प्रेषक अरुण मनोहर ( मंगळ, ०५/२७/२००८ - ०९:०३) .पहिला भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1865
दुसरा भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1868
वाढता वाढता वाढे
सामाजिक सिरीयल्स म्हणजे टी व्ही ऒलटाइमची ब्रेड बटर उत्पादने आहेत. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त एपिसोड्स करुन सिरीयलवर जाहिरातीचे उत्पन्न वाढवता येते.
ह्याचे उत्तम तंत्र टी व्ही ऒलटाइमने साधले आहे. ह्यालाच काही टवाळ लोक पाणी घालून वाढवण्याचे तंत्र असेही म्हणतात. टवाळकीचा भाग सोडला तर हे तंत्र प्रोड्युसरसाठी जीवन (पाणी) आहे ह्यात शंका नाही. ह्या तंत्राचे काही दाखले पुढे दिले आहेत.
- पुर्वी झालेलेच प्रसंग आठवणीच्या नावाखाली पुन्हा पुन्हा दाखवणे. ह्यासाठी सेपिया फ़टॊग्राफ़ी वापरून तपकिरी रंगात तीच ती द्रष्ये रिपीट करावीत.
- काहीही कारण न देता पुर्वीचे प्रसंग दाखवणे. ज्या प्रेक्षकंचे पुर्वीचे एपिसोड्स मिस झाले असतात, त्य़ांना मिस झालेले भाग पुन्हा पहायला मिळतात.
- गाणी टाकून गाण्यांमधे पुर्वीचे प्रसंग दाखवणे. गाणी चित्रीकरणाचा खर्चही वाचतो. सिरीयलचे फ़ुटेज वाढतेच.
- एकदा मारलेली झापड एकामागून एक तीनदा दाखवावी. त्यावेळी पात्राच्या चेहरा फ़ेड इन फ़ेड आउट करावा. किंवा भसाभसा लाइटची उघडझाप किंवा ढणाढण म्युझीक वगैरे तंत्रे वापरली म्हणजे सिरीयल लांबते. शिवाय पात्राला कुशल अभिनय करायची गरज रहात नाही.
- एकच प्रसंग तीनदा दाखवणे. हा तीन पात्रांच्या द्रष्टीतून दाखवला जातो. फ़ुटेज वाढतेच आणखी दिग्दर्शक कसा विविध ऎन्गल्सने सिचुएशन कवर करतोय म्हणून प्रेक्षक खुष होतात.
- तुकड्या तुकड्याने गाणी पेरावीत. वेगळ्या गाण्यांवर खर्च न करता, तेच गाणे पुन्हा पुन्हा वाजवावे. पात्र गात असतांना जुने प्रसंग रिपीट दाखवायला विसरू नये. पहा- "आप कहना क्य़ा चाहते है" मधले तुम्हारी अदा.... हे गाणे. तीनशे एपिसोडम्धे हे गाणे नउशे साठ वेळा वाजवले. म्हणजे गाण्याचा वेळ एकत्रीत केला तर ३०० पैकी ९६ एपिसोड ह्या गाण्यावर धकले. "वाढता वाढता वाढे" तंत्र वापरून केलेला हा एक जागतीक विक्रम आहे.
- दुसरा एपिसोड सुरू होतांना आधीच्या एपिसोड्च्या शेवटाचे तीन मिनीट पुन्हा दाखवायचे. वीस मिनटाच्या एपिसोड मधे १५% फ़ुटेज फ़ुकटात वाढते.
- पात्र विचार करते आहे, आठवण काढते आहे, रागावले आहे, झोपाळले आहे अशा विविध माइलस्टोनच्या बॆकग्राउंडवर काहीही विषेश न होउ देता केवळ म्युझीक व पात्राचे चार पाच क्लोज अप ह्यावर चार पाच मिनटे (२०%) फ़ुटेज वाढवायचे.
- मेलेल्या पात्राचा पुनर्जन्म दाखवला की जुने फ़ुटेज रीपीट करण्याचे खुल्ले लायसंन्स मिळते. नो क्वेश्चन्स आस्कड!
"वाढता वाढता वाढे" तंत्राचा योग्य वापर करून वीस मिनीटे एपिसोडमधे केवळ चार मिनटांचा सॊलीड कोअर भरावा लागतो. निदान येवढीतरी किफ़ायतशीर वाढ अपेक्षीत असते.
उत्कंठा ताणणे.
सिरीयल्स उत्कंठेवर चालत असतात कथेवर नव्हे. पाणीदार एपिसोड पाहून देखील प्रेक्षक कंटाळायला नको. त्यात दर दोन मिनीटांनी येणार्.या कमर्शीयल ब्रेक मधून सिरीयल जगवायचे असेल, तर प्रत्येक एपिसॊडच्या प्रत्येक लेगमधे उत्कंठा घालायलाच हवी. जाहिरातीचा मुख्य कार्यक्रम पाहिल्यावर त्यांच्यापुढे फ़ेकलेला पाणीदार तुकडा उत्कंठा नसेल तर ते कशाला पहातील? आजचा एपिसोड संपल्यावर उद्याचा एपिसोड कोव्हा एकदा पाहू अशी ओढ सर्वांना लागायला हवी. ही ओढ साधली नाही तर प्रेक्षक लगेच दुसरी चॆनेल पकडतात. उत्कंठा तंत्राचे काही यशस्वी नमुने---
- ब्रेकच्या आधी नायीका नायकाला थप्पड मारते. ढणाढण बॆकग्राउंड म्युझीक सोबत ही थप्पड तीनदा दाखवल्यानंतर... ब्रेक.
- धावत्या कारसमोर लहान मूल येते.... ब्रेक.
- बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.)
- रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.)
- खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना....")
समारोप
अशी विविध तंत्रे वापरून सामाजिक सिरीयल्स एफ़िशियन्ट व एफ़ेक्टीव्ह करता येतात. रेफ़रन्स मधे दिलेली सिरीयल्स विद्यार्थ्यांनी जरूर बघावीत.
संदर्भ
ह्या आर्टीकल मधे लक्षात घेतलेल्या काही सिरीयल्स-
प्रेमकहानी एक चक्र, पिया जा मर, दुलहन के मांगमे सिंदूर, कम है पांच, घर घरमे लफ़डा, अब्बा इश्क ना खोजे, सरसर कार, तुम्हारी नशा, घर आना देख लुंगा, तू उसका मै सबकी.
*********************************************************
संपले (एकदाचे)
असेही एक पैलतीर भाग दोन
प्रेषक अरुण मनोहर ( शुक्र, ०५/२३/२००८ - १३:४०) .पहिला भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1865
सिरीयल्स प्रोड्युसिंग कोर्सवेअर डिसेंबर २००८
वेगवेगळ्या चॅनेल्सवर टीव्ही सिरीयल्स उदंड झाल्या आहेत. सिरीयल्स बघून बरेचदा नवीन विद्यार्थ्यांचा गैरसमज होऊ शकतो की हे काय सोपे काम आहे. पुर्वीच्या अनुभवांवरून ह्या सिरीयल्स तयार करण्याचे काही आराखडे आता बनून गेलेले आहेत. सामाजिक सिरीयल्सचे हे आराखडे ह्या लेखात विद्यार्थ्यांना संदर्भ मिळावा म्हणून एकत्रित दिले आहेत.
सिरीयलचा प्लॉट आणि डायनॅमिझम
शक्यतोवर अमुक एक प्लॉट रचून सिरीयल सुरू करणे टाळावे. कारण पुढे कथा कोठे वळेल, वळेल की पळेल, पळेल की पडेल, हे काहीच माहीत नसते. त्यामुळे उगाच कथा लेखनात वेळ घालवू नये. पॉप रेटींग पाहून हवी तशी कथा वळवत कोलांट्या उड्या मारणे सोपे असते. सिरीयलला फ्लेक्सीब्लीटी येते. उदाहरणार्थ, एका मालिकेत पात्राचा मृत्यु दाखवला. अगदी स्मशानात प्रेत जळतांना दखवले. वेलीन्ग म्युझीक्चे सूर दोन मिनटे टाकले. मॅनडेटरी पांढर्या शुभ्र कपड्यात शोकसभा झाल्या. ह्या रडारडीत तीन पूर्ण एपिसोड पाडता आले.
त्यानंतरच्या एपिसोड्मधे, ते पात्र मेल्यावर देखील हजर करता आले. कारण प्रोड्युसरने फ्लेक्सीब्लीटी फॉरम्युला वापरला. एपिसोड्च्या सुअरवातीला पात्राच्या बायकोला झोपेतून उठतांना दाखवले, आणि "काय हे भयानक स्वप्न!" येवढ्या वाक्याने मेलेले पात्र नव्ह्त्याचे होते केले.
आजच्या युगात डायनॅमिझमचे फार महत्व आहे. कथा डायनॅमिक नसेल तर प्रेक्षक स्टॅटीक होऊन थिजतो. वर टीआरपीचे स्टॅट बिघडते. टी व्ही ऑल टाईमची प्रथितयश मेगा प्रोड्युसर कुकी कोपरे हिने डायनॅमिक प्लॉटचे तंत्र चांगले वापरले आहे.
सिरीयल स्टोरी रायटिंगच्या प्रतियोगिता ठेवायच्या. होतकरू रायटर्सला बोलाउन आधिच्या एपिसोडचे रशेश दाखवायचे, व सर्वांना त्यापुढचा एपिसोड लिहायला सांगायचा. सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे स्टोरी अजीबात पुढे सरकायला नको. त्यातील जे लिखाण कथा सर्वात कमी पुढे घेऊन जाईल, ते निवडायचे. त्यानंतरचे एपिसोड असेच निवडायचे. हे लक्षात ठेवायचे कि तोच लेखक पुढच्या पाच एपिसोडला रिपीट होणार नाही. मागच्याने काय लिहीले, ते पुढच्याला कळायला नको. ह्याने क्रीयेटिव्हीटी वाढते. तसेच ह्या तंत्राने, कथा लंगड्या कासवाच्या गतीने स्टॅटिकली पुढे जाते. सात आठशे एपिसोड गॅरंटीड होतात. आणि वेगवेगळे लेखक असल्याने, सिरीयल डायनॅमिक पण होते.
प्रथितयश मेगा प्रोड्युसर कुकी कोपरे हिने लेखनाला मार्क्स कसे द्यायचे ह्याचे स्टॅन्डर्डच आखले आहे. एका एपिसोड मधे कथा १% पुढे गेली, तर दहा पैकी नऊ मार्क्स. १०% पुढे जाणार्या कथेला दहा पैकी दोन मार्क्स. पंखा गरगर फिरवून कथा फ्लॅश फॉरवर्ड केली तर कथा स्पर्धेतून बाद. कथेत नवीन व्हीलन अचानक उगवला, तर चार बोनस गुण. नवीन व्हीलन पुर्वी सद् गुणी असेल, व सडनली वाईट बनला, तर आठ बोनस गुण. अशा पद्धतीने प्रथितयश मेगा प्रोड्युसर कुकी कोपरे लेखकाचे कलागुण जोखते.
बॅक ग्राऊंड मूझीक
सिरीयलमधे वाद्यांचा उपयोग कौशल्याने करुन घ्यायचा. कॅरेक्टरची इमोशन्स ध्वनीत होणे हे इमोशन्स दाखवण्या पेक्षा जास्त महत्वाचे. अभिनेते कुशल असण्याची आता गरज राहिलेली नाही. इमोशन्स ध्वनीत करायचे म्हणजे, वाद्ये प्रसंगानुसार योग्य सुरावटीत वाजवायची. टेन्शन, धमकी, वैफल्य, क्रोध, दु:ख ह्या सगळ्या भावना अभिनयाने दाखवण्याची गरज नसते. सुरंनी ही इमोशन्स मस्त दाखवता येतात.
ह्याचा आणखी एक फायदा मम्हणजे रियुजेब्लीटी मिळते. अभिनयाने भावना दाखवायच्या म्हणजे अभिनेता कुशल हवा. आणि प्रत्येक एपिसोडला तोच कुशल अभिनेता मिळेल ह्याची गॅरंटी काय? त्यापेक्षा तीच ध्वनीफित योग्य ठिकाणी वाजवली म्हणजे हव्या त्या अभिनयाचा इफेक्ट तयार! अभिनेत्याने फक्त कोरा चेहरा ठेवायचा. जी कोणती भावना दाखवायची, ती ढणाढण बॅक ग्राउंड म्युझीक मधून तयार करायची. प्रेक्षकांना वाटते, भावनेचे अत्त्युच्च शिखर गाठल्यामुळे ह्याचा चेहरा असा दिसतो. प्रेक्षकांना हे तंत्र आवडते, कारण स्पेसीफीक म्युझीक पीसेस बरोबर ते फॅमिलीयर होऊन जातात. पात्राबरोबर येणारे म्युझीक ऐकले, कि पुढे काय होणार ह्याचा अंदाज येऊन डोक्याचा त्रास वाचतो.
व्हिलनिश पात्राच्या प्रत्येक एन्ट्रीबरोबर विशीष्ट सिग्नेचर ट्युन्स वाजवायच्या. ह्यासाठी मांजराच्या फिसकारण्याचा, भुताच्या रडण्याचा, हडळीच्या हसण्याचा असे चित्रविचित्र आवाज टाकावेत. हे आवाज इलेक्ट्रॉनिकली डिस्टॉर्ट केले कि उत्तम परिणाम साधतो. असे आवाज एकले कि हे पात्र व्हिलन आहे वा नाही असा संभ्रम प्रेक्षकांना रहात नाही.
समाजसुधारणा
प्रेक्षक आपला ७० ते ८० % रिकामा वेळ सामाजिक सिरीयल्स बघण्यास देतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. हा प्रचंड प्रतिसाद बघता टी व्ही माध्यमाची सामाजिक जबाबदारी नाकारता येणार नाही. समाजात हवा तो बदल घडवून आणण्याची क्षमता टी व्ही माध्यमात आहे. आपल्याला असे दिसून येते कि, समाजात अजुनही काही जुन्या, बुरसट चालिरिती टिकून आहेत. कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय त्यात बदल होणार कसा? हे नमूद करण्यास आनंद वाटतो कि टी व्ही ऑल टाईम वरच्या सामाजिक सिरीयल्स ही जबाबदारी उत्तम रित्या पार पाडत आहेत. उदहरणेच द्यायची झाली, तर सिरीयल्स मधे प्रमोट केलेल्या काही समाजसुधारणा येथे देत आहोत. त्यापैकी काही समाजात प्रस्थापित झाल्या आहेत, तर बाकीच्या लवकरच होतील असे दिसत आहे.
- आपल्या सारख्या गरम हवेच्या देशात हवेशीर असे कमीत कमी कपडे घालून रहाणे.
- नवरेशाही व सासुरवास चालू न देणे आणि ह्या सत्ताकेन्द्रांना हाणून पाडण्यासाठी बायकांनी सासरच्या माणसांविरुद्ध कारस्थाने रचणे. पहा--- "पिया जा मर"
- निटनेटकेपणा जोपासण्यासाठी घरात फूल्ल मेकअप व दागीन्यांसकट सदैव वावरणे.
- जीवन क्षणभंगूर आहे. म्हणून शक्य आहे तोवर जीवनाचा आनंद लुटा आणि प्रेम वाटा. हा प्रेमाचा संदेश घरोघर पोहोचविण्यासाठी मुक्त जीवन दाखवणे. वहिनी-दिर, मामा-भाची, बॉस- सेक्रेटरी, ह्या जोड्या दाखवून झाल्या, आता पुढे काय असा प्रश्न पडला असेल तर पहा----- "एका घरात जास्तीत जास्त लफडी" ह्या स्पर्धेत यशस्वी झालेले सिरीयल- "तुम उसके, मै सबकी".
- हायटेक तंत्रे वापरून दुर्दैवी निपुत्रीकांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरोगेट मदरिझमचा प्रचार. पहा-- "घर आना देख लुंगा", "घर घरमे लफडा", "प्रेमकहानी एक चक्र" इत्यादी.
- कितीही मोठा यशस्वी उद्योगपती असला, तरी त्याने निकटच्या नातेवाइकांनी दिलेल्या कागदपत्रांवर न बघता सही करणे आणि माणसाच्या मुलभूत चांगुलपणावर विश्वास निर्माण करणे.
- पुढे विश्वासघात होऊन एका रात्रीत दिवाळे निघाले तरी, गेलेली सर्व संपत्ती दुसर्या रात्रीत पुन्हा मिळवून कर्तबगारीची मिसाल समाजात उभी करणे.
क्रमशः
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
असेही एक पैलतीर
प्रेषक अरुण मनोहर ( शुक्र, ०५/२३/२००८ - ०८:४६) .असेही एक पैलतीर
काळसागर अथांग आहे. ह्या अथांग सागराच्या दूरच्या किनार्यावरील लोकांना एकदा इकडच्या पैलतीराचे दर्शन घडले ते असे.......
*********************************************
रियल होम ड्रामा ई एडीशन 12 फेबृवारी 2106
"थ्री डी ड्रामा"च्या फ्रेश ईन्टरनेट इशूत हंड्रेड इयर्स ऍगो टीव्ही वर प्रोग्राम कसे होते ह्याचा एक एन्टरटेनींग विडीयोग्राम आला होता. त्याची वीजूअल लीन्क इथे दिली आहे.---> 
*********************************************
दादर 3 जानेवारी 2106
दादर म्युनीसीकॉन्सीलच्या ट्वेन्टीफीफ्थ बर्थडेला दादरचे मेयर भिकाजी खताडे ह्यांनी ओपन केली हंड्रेड
इयर्स ऍगो बरी केलेली टाईम कॅपसुल. त्या टाईम कॅपसुल मधे आर्टीकल होता कॉन्टेम्पोरेरी ईन्डीयातल्या टीव्हीचा. "टीव्ही ऑल टाईम" या चॅनेलवर त्या इरात स्क्रीन करायचे सोशल सोप ऑपेरा. ऑब्वीयसली तेव्हा आजचा रिऍलिटी थ्री डी व्ही टीव्ही नव्ह्ता. पब्लीक पहायची सोशल ड्रामा तेव्हा टॉकीन्ग पिक्चर् मधे फ्लॅट स्क्रीनवर.
"टीव्ही ऑल टाईम" होती ही त्या टाईमची एक फेमस कंपनी. कंपनीच्या ऍन्युअल मॅगेझीनमधे एक आर्टीकल होता. कॉन्टेम्पोरेरी सोशल लाइफ पोर्ट्रे करणार्या सिरीयल विषयी. हा आर्टीकल मिळाला टाइम कॅपसुल मधे. ह्या आर्टीकल मधे फर्स्ट हॅन्ड अकौन्ट हिस्टौरिकल पिरीयड्च्या टीव्ही सोशल ड्रामाचा डिसकव्हर झाला. हे आहे मार्व्हलस रेफरन्स फाउन्ड ड्रामा हिस्टरीच्या स्टुडन्टसाठी.
ओरीजीनल आर्टीकल ओल्ड मराठीत होते. हिस्टरीचा परस्पेक्टीव्ह इन्टॅक्ट रहावा म्हणून ईन्गराठीत ट्रान्स्लेट नाही केले. काही पार्ट ओल्ड मराठी आर्टीकलचा दिला आहे पुढे. रीडरला फील येईल ओल्ड मराठीचा हे रीड केल्यावर. हार्ड असेल जर फॉलो करायला ओल्ड मराठीचे वर्डस तर ईन्गराठी ट्रान्स्लेशन एव्हेलेबल आहे. लीन्क --->
वर क्लीका. जर हवा असेल फुल आर्टीकलचा ईन्गराठी डायरेक्ट ब्रेनकॉन, तर ब्रेन डाउनलोडची ऑर्डर द्या, डायल करून कन्ट्रोल नंबर 56230 तुमच्या पर्सनल ब्रेननॉन कन्सोलवर.
*************************************
क्रमशः
वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश
प्रेषक धोंडोपंत ( मंगळ, ०४/२९/२००८ - ०८:२२) .लोकहो,
वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश असे आहेत:-
१)रवि - दिनांक १४/०५/२००८ रोजी दुपारी ०३ वाजून ३३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे.
२) शुक्र- दिनांक २०/०५/२००८ रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे.
वरील राशीप्रवेशाच्या वेळा या मुंबई अक्षांश-रेखांशानुसार आहेत.
आपला,
(गणकभास्कर) धोंडोपंत
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शनी - समज गैरसमज
प्रेषक धोंडोपंत ( मंगळ, ०४/२९/२००८ - ०६:५०) .शनीग्रहाबद्दलच्या या लेखमालेत या लेखात सप्तमातल्या शनीबद्दल लिहिण्याचा मानस आहे. पंचमातील शनी आणि संततीसौख्य याबद्दल पूर्वी एका लेखात सविस्तर लिहिलेले आहे. जिज्ञासूंना तो लेख आमच्या ब्लॉगावरील Blog Archieves मध्ये सापडेल. शनी संततीसौख्यावर काय परिणाम करतो हे तेथे समजेल.
या लेखात मानवी जीवनातील अत्यंत महत्वाच्या म्हणजे विवाहसौख्याच्या बाबतीत शनी काय फले देतो हा विषय आहे.
सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे. व्यक्तीला लाभणारा वैवाहिक जोडिदार, त्याला मिळणारे विवाहसौख्य, लैंगिक क्षमता, लैंगिक आवडीनिवडी, जोडीदाराचा दर्जा, त्याची/तिची मानसिक व शारीरिक स्थिती, स्वभाववैचित्र्य, हे सर्व सप्तमस्थानावरून पाहिले जाते. तसेच धंद्यातील भागीदार, व्यापारात येणारे यश/अपयश या गोष्टी समजतात. हे दशमाचे दशम स्थान आहे. त्यामुळे दशमेशाला या स्थानात बल प्राप्त होते.
आयुष्यात ज्या ज्या व्यक्तिंशी संबंध येतो, त्या व्यक्ती सप्तमावरून पाहिल्या जातात. प्रथम स्थान म्हणजे स्वत: जातक, तर सप्तम स्थान म्हणजे त्याच्या समोरची व्यक्ती. डॉक्टर- पेशंट, वकील- अशील, निवडणूकीत एकमेकांसमोर उभे असलेले प्रतिस्पर्धी, सावकार- ऋणको, अशा सर्व गोष्टी सप्तमावरून समजतात.
त्याचप्रमाणे दंड, घटस्फोट, कायद्याने आलेला बंधनयोग, माणसाची परदेशातील कीर्ति ही सप्तमावरून पाहतात. सप्तम हे मारक स्थान आहे.
या स्थानातल्या शनीबद्दल अनेक ज्योतिर्विदांनी वाईट फले सांगितली आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे सप्तमातील शनी विवाहाला विलंब करतो. ही गोष्ट निर्विवादपणे खरी आहे.
वैद्यनाथ म्हणतात:-
" भाराध्वश्रमतप्तधीरधनिको मंदे मदस्थानगे।"
हा शनी मनुष्याला सतत प्रवास करायला लावून "तप्त"(?) व निर्धन करतो. तसेच ते पुढे स्त्रियांच्या कुंडलीतील सप्तमस्थ शनीची फले देतांना सांगतात की,
" लंबा पीनपयोधरा।"
म्हणजे सप्तमस्थ शनी असणार्या स्त्रियांचे स्तन लांब (लोंबणारे किंवा खाली उतरलेले) आणि पुष्ट असतात. तसेच, अजून एक फल त्यांनी दिले आहे, ते म्हणजे
"माधवशंकर प्रियसुतस्थानं वधूसंगमे।"
याचा अर्थ शंकराचा प्रिय सुत म्हणजे पुत्र..... म्हणजे गणपती..... त्याच्या स्थानी... म्हणजे गणपतीच्या देवळाच्या आसपास... स्त्रीशी समागम करणारा असा होतो.
लंबा पीनपयोधरा हे फल स्त्री कुंडलीस केवळ अवलोकनाने नेहमी अनुभवास येते. पण वरील गणपतीच्या देवळाच्या आसपास समागम करणार्या पुरूषाबद्दल दिलेले फल आमच्या अनुभवास आलेले नाही.
कदाचित पूर्वीच्या काळी खेड्यात रात्रीच्या सुमारास असे लोक देवळाच्या बाजूला जी पडवी किंवा सामान ठेवण्यासाठी ज्या खोल्या असतात, त्यात एकांत शोधत असावेत. आता शहरातल्या गणपतीच्या देवळात एवढी गर्दी असते की गणपतीलाही तिथे रहायला जागा नाही. त्यामुळे आजच्या काळात हे फळ अनुभवास येणे कदापि शक्य नाही.
पीन पयोधरा या सूत्राबद्दल आम्ही खूप चिंतन केले. ज्योतिषविषयाचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन जिज्ञासूंना मिळावे म्हणून त्याबद्दल लिहित आहोत. कारण या गोष्टी कोणत्याही पुस्तकातून किंवा अभ्यासक्रमातून शिकवल्या जात नाहीत. या प्रत्येकाने स्वत:च्या तपश्चर्येतून आत्मसात करायच्या असतात. आम्ही केलेल्या तपश्चर्येतून गवसलेले नवनीत आम्ही येथे मांडत आहोत.
अभ्यासकाने ज्योतिष शिकत असतांना प्रत्येक सूत्रावर दीर्घ चिंतन करणे आवश्यक आहे. आम्ही शब्दाशब्दावर प्रदीर्घ चिंतन केलेले आहे. एकेक सूत्रावर तासनतास आणि दिवसेंदिवस विचार केला आहे. आजही ही विचारमंथनाची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. आमची विद्यार्थ्याची भूमिका आजही संपलेली नाही. अज्ञाताचा शोध घेण्याची ही ओढ कधीही न संपणारी आहे.
ज्योतिषशास्त्र हा ज्ञानाचा एक महासागर आहे आणि आजपर्यंत जे ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतले आहे ते म्हणजे एखाद्या महासागरातून काही ओंजळी भरून घेण्याइतपत आहे. "आम्ही फार ज्ञानी आहोत" असा आमचा कधीच दावा नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसेल. कारण हे शास्त्र इतके विस्तृत आहे की "आम्ही खूप ज्ञानी आहोत" असा दावा जो कोणी करेल तो महामूर्ख असेल. संपूर्ण आयुष्य या शास्त्रासाठी देऊनही यातील सर्व कळले असे होणार नाही याची आम्हांला कल्पना आहे.
पण आम्ही या शास्त्राचा आमच्यापरीने सखोल अभ्यास करून, त्याचा फायदा समाजाला करून देऊ शकलो ही बाब आमच्यासाठी अवश्यमेव महत्वाची आणि समाधानाची आहे. आजपर्यंत हजारो लोकांना आमच्या मार्गदर्शनाचा जो फायदा झाला त्याचे श्रेय पूर्वाचार्यांचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे,
"व्यासांचा मागोवा घेतु। भाष्यकाराते वाट पुसतुं॥
महाराज म्हणतात आम्ही व्यासमहर्षींचा मागोवा घेत पुढे गेलो. भाष्यकार शंकराचार्य आहेत त्यांना मार्ग विचारत आम्ही मार्गक्रमण केले.
आम्हीही ज्ञानेश्वरमाऊलीचेच अनुकरण करीत आहोत. या शास्त्राच्या पूर्वाचार्यांनी दाखविलेल्या मार्गाने आम्ही जात आहोत. असे ज्ञानी आचार्य लाभणे हे आमचे भाग्य आहे. हे आर्य सनातन वैदिक संस्कृतीचे आमच्यावरील ऋण आहेत.
तर सांगायची गोष्ट म्हणजे,
"पीन पयोधरा" या सूत्रावर जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आम्हाला दोन प्रश्न पडले.
१) आचार्य वैद्यनाथांनी सप्तमातील शनीची फले सांगतांना स्त्रीच्या स्तनांचा उल्लेख कसा केला? कारण सप्तमावरून मानवी शरीरातील ज्या भागाचा बोध होतो तो भाग म्हणजे ओटीपोट, गुह्येंद्रिये, मुत्राशय कंबर हा आहे. तिथे स्तनांचा संबंध काय?
२) शनीचे कारकत्व हे आकुंचित करण्याचे, कोणतीही गोष्ट आक्रसून घेण्याचे आहे. अशा परिस्थितीत स्तनांची पुष्टता ते कशी सांगतात? गुरू प्रसरणशील आहे. शनी आकुंचनशील आहे. पुष्ट स्तन असणे हे शनीच्या कारकत्वाशी विसंगत नाही आहे काय?
बरं, आचार्य वैद्यनाथांसारखा विद्वान माणूस जेव्हा हे सांगतो तेव्हा त्याच्यामागे भक्कम वैचारिक बैठक असणारच. वैद्यनाथ म्हणजे कोणी देवळात पंचांग घेऊन बसणारे कुडमुडे ज्योतिषी नव्हते. ते अत्यंत विद्वान होते. त्यामुळे त्यांनी सांगितले ते शास्त्राच्या कसोट्यांवर घासून पुसून मगच सांगितले असणार.
त्यामुळे या सूत्रांची कारणमीमांसा शोधणे हे आवश्यक आहे.
चिंतन केल्यावर हे लक्षात आले की सप्तमस्थानाचा शनी दशमदृष्टीने चतुर्थस्थानाला पाह्तो. चतुर्थस्थान हे फुफ्फुसे, छाती, स्तन या शरीराच्या भागाचे निदर्शक आहे. त्यामुळे तिथे असलेली शनीची दृष्टी त्या भागावर परिणाम करणार हे उघड आहे. त्यामुळे या फलामध्ये नमूद केलेला स्तनांचा संबंध पटतो.
शनी हा आकुंचन करणारा आहे. त्या आकुंचनामुळे मुळात उन्नत असलेले अवयव आक्रसले जातात आणि कुठल्याही अवयवातील " muscle-tone" कमी झाल्यावर त्यातील घोटीवपणा जाऊन ते लोंबतात.
अभ्यासकांनी तर्कपद्धती कशी वापरावी हे समजण्यासाठी वरील विवेचन केले.
भृगुमहर्षी सांगतात:- शरीरदोषकर:। कृषकलत्र।
या माणसाचे शरीर रोगी असते. याची पत्नी कृश म्हणजे सडसडीत बांध्याची असते.
पाश्चात्य ज्योतिर्विद श्री. ऍलन लिओ म्हणतात:-
This planet tends to delay or hinder the marriage prospects. However, it promises faithful and steady partner one who is just tough rather grave and serious, very industrious, persevering, careful, thrifty and economical. "
सर्वसाधारणपणे बहुतेक आचार्यांनी सप्तमाच्या शनीची फळे नकारात्मक दिली आहेत. हा शनी विवाहास विलंब करतो हे निर्विवाद सत्य आहे. पण शनीच्या राशीकडे लक्ष दिले पाहिजे. मकर, कुंभ आणि तुळेतला शनी सप्तमाची फळे चांगली देतो. मकरेचा शनी जोडिदार आप्पलपोट्या आणि स्वार्थी दाखवतो. कुंभेचा शनी त्यापेक्षा बरा. वायुराशीचा असल्याने जोडीदार बुद्धिमान, व्यासंगी असतो. हा शनी मकरेत कुंभेत असता बायको सावळी असते. मकरेत सप्तमात शुक्र शनी अंशात्मक युतीत असता जोडीदार सावळा आणि जरा जास्त कामुक असतो. लग्न, द्वितीय, अष्टम आणि व्ययात जर मंगळ असेल तर द्विभार्यायोग होतो.
कुंडलीत शुक्र कमजोर असेल आणि सप्तमात शनी असेल तर जोडिदार थंड असतो. या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे शरीरसुख मिळत नाही. द्विस्वभाव राशीतला शनी सप्तमात असता दोन, तीन विवाह होतात.
बलवान शनी सप्तमात वक्री असेल आणि शुक्र जर सप्तमेशाशी षडाष्टकात असेल तर दोन तीन विवाह करूनही शेवटी एकटे रहावे लागते. सुखी वैवाहिक जीवनाची अपेक्षा करता येत नाही.
अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते.
भागिदारी, कोर्टकचेरीची कामे यात हा शनी अपयश देतो. शनी सप्तमेश असून मंगळाच्या अशुभयोगात असेल तर या लोकांनी भागीदारीत व्यवसाय करू नये.
सप्तमात शनी बुध यांची अंशात्मक युती असता तो माणूस नपुंसक असतो. त्यांनी वैद्यकीय चाचण्या आणि उपचार केल्याशिवाय विवाह करण्याच्या भानगडीत पडू नये आणि जोडिदाराचे आयुष्य बरबाद करू नये.
पराशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. या फलाचा अनुभव आम्हांला आलेला नाही. तसे सांगणारे फारसे कोणी आम्हांला भेटले नाहीत. किंबहुना, जे भेटले त्यांना तसे विचारल्यावर त्यांनी कबूल केलेले नाही. फक्त एक जण असा भेटला ज्याने हे कबूल केले. त्याच्या कुंडलीत शनी मंगळ युती सप्तमात आणि त्यावर लग्नातून हर्षलचा प्रतियोग अशी ग्रहस्थिती होती.
शनीबद्दल अधिक माहिती पुढील भागात.
आपला,
(विस्तृत) धोंडोपंत
