लहानपण देगा देवा....
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं. रिझल्टच्या चिंतेपेक्षा गावी गेल्यावर काय काय धम्माल करता येईल याचाच विचार मनात जास्त असायचा.