गाव
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.