गुण्या-गोविंदा
दोन भाऊ होते. एक मोठा होता, आणि दुसरा धाकटा होता. कारण ते जुळे नव्हते. अगोदर जन्माला आलेला भाऊ सुरुवातीला काही दिवस मोठा भाऊ होता. नंतर धाकटा भाऊ म्हणाला, आता मी मोठा भाऊ! मोठा म्हणाला, ठीक आहे. मग या वेळी मी धाकटा!...
अशा रीतीने दोघे भाऊ गुण्यागोविंदाने रहात होते. पुढे काही वर्षे गेली आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करावयास हवे असे दोघांनाही वाटू लागले. पण दोघेही स्वतंत्र विचाराचे आणि स्वाभिमानी बाण्याचे असल्याने, आपला निर्णय आपणच घ्यायचा हे दोघांनीही ठरविले होते. कारण त्याआधी त्यांनी यावर खूप विचारविनिमय करून मगच त्यांचे तसे एकमत झाले होते.