अवघाचि संसार- हिंदळे-२
यथावकाश सरस्वतीचे बाळंतपण होऊन तिला एक गोड मुलगा झाला आणि कावेरीचेही सणवार आटोपून ती हरकूळला परतली. सड्यावरच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने थोडके पैसे मिळाले त्यामुळे सर्व यथासांग पार पडले. बघता बघता वर्ष संपत आले. यावर्षी पीकपाणी ठीकठाक झाले होते.वरुण राजाने कृपा केली होती त्यामुळे सगळीकडे अगदी आबादी आबाद नव्हे पण समाधानकारक परिस्थिती होती. हरभटांची शेती गावातल्याच कुळांना खण्डाने कसायला दिली होती .त्याचे ४-५ पोती भात दसऱ्याला घरपोच आले असल्याने वर्षभराची बेगमी झाली होती. कोकणी माणसाला असे लागतेच काय? दोन वेळच्या जेवणात भात ,कधीतरी भाकरी.