कोसला
उगाच किंचीत धुगधुगलेला
विस्कळीत अन विखुरलेला
अस्ताव्यस्त भरकटलेला
पंचविशीतला पालापाचोळा
मी एक उदाहरणार्थ कोसला
(अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)
उगाच किंचीत धुगधुगलेला
विस्कळीत अन विखुरलेला
अस्ताव्यस्त भरकटलेला
पंचविशीतला पालापाचोळा
मी एक उदाहरणार्थ कोसला
(अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)
तूहि नव्हतीस, मीही नव्हतो
बघ काळ कसा बदलतो
तारे ते जे सदाच असती
आपल्या जागी नभात वरती
आज मोजण्या जागे कोणी
मनात अन् मोगरे माळूनि
फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या
चर्चा साऱ्या गावकुसाच्या
कशी न कळली तू गेलेली
नियती अशी उलटलेली
पुन्हा भेटलीस का वळणावर?
घेऊन कुंकू परके, भांगावर
उभय उरातहि ते काही
आधीसारखे हलले नाही
तूहि नव्हतीस मीही नव्हतो
पुरते आपण अनोळखी होतो
तू आहेस अन आज मीही
समोरासमोर अगदी, तरीही
त्याच्या हाती सर्व आहे
नवे रोज धागे नवा पेच आहे
जगायास कारण ईतकेच आहे!
कुणी एकटा जात नाही प्रवासा
कुणी चालताना कुणा ठेच आहे!
कुणी आरसा काल देवून गेले
मला भेटतो मी नव्यानेच आहे!
कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे
उभे विश्व सारे फुकाचेच आहे!
नको फार त्रागा करु तू उन्हाचा
सखी सावली या उन्हानेच आहे!
—सत्यजित
आयुष्य अर्ध संपलं तरी
जगण्यातला अर्थ संपला नाही
खूप जगले म्हंटल तरी
जगण्यातला मोह संपला नाही
खूप काही बाकी आहे
जगून सारंच घ्यावं ... वाटत
एकटं... दुकटं... सर्वांबरोबर...
आयुष्य वाटून घ्यावं... वाटत!
जवानी मनाची अवस्था आहे
तिला पूर्ण भोगावं वाटत!
समाज... बंधन... झुगारून देऊन
मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!!
मात्र स्वप्नातून जाग येताच
आयुष्याचं वास्तव पुढे असतं
जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं..
विसरून कामाला लागावं लागत!!!
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा...
या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा!
सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची...
तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा!
तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना...
एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा!
चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते?
तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा!
मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी...
वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा!
प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा...
कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा!
—सत्यजित
जा॑भळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले
थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फु॑कर येता
पाण्यावर झु॑बर फुटले
घनदाट शा॑तता तिथली
तोलून थिरकत्या प॑खी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले
नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
झिरझिरित धुके शिरशिरले
चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.
- उदय
निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी
हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी
पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी
अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी
थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी
संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी
अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या
कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या
फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी
नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी
विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती
दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो
तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो!
कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो
कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो!
तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे
तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो!
कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा
तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो!
अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे
अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो!
तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले
हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो!
खास काही आजच्या भेटीत झाले आखरी
कावरी झाली किती झाली किती ती बावरी
भासवे नाजूक काही भावना या ना मनी
सांगते सारे खळी जी लाजते गालावरी
मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी
एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी
ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी
बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी
साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी
... संदीप
मी हरवलो आहे असं ,
माझं मला कळवूनच ,
मी गहाळ झालो आहे.
last seen at 5.45
ही whatsapp वरची अफ़वा आहे .
घरून निघताना निळा शर्ट घातला होता
आणि घरात सगळे वाट बघत आहेत ,
ही पण एक आवईच आहे .
एसटी स्टैंड वर आणि स्टेशनच्या मुतारीत
पोस्टर दिसलेच तर कळवा ,
मलाच कधीतरी.
मी हातचा एक होतो
त्या घरालाच,
मी एक चकवा दिला आहे .
रात्रीच्या खर्जात प्रेम सेवा शरण गाणारं ,
माझंच बेमालूम version 2.0 वगैरे असंच काहीतरी आहे ,
believe me वगैरे कशाला ??
मी हरवलोच आहे .