समास
समासातल्या रेषेला सुद्धा ओढ असते शाईची. तिथल्या मोकळ्या जागेला वाटतं आपल्यावरही उमटावी अक्षरांची काळी-निळी नक्षी. ती वाचतांना फिरावा कुणाचातरी हात आपल्यावरून आणि स्पर्श व्हावा थेट वाचकाच्या मनाला. अनुभवावीत ती भावनांची वादळे नि:शब्द होवून. पण समासाला कुणी सांगावं, तुझं रितेपणच कागदाच्या तुकड्याला त्या शब्दमुद्रा झेलण्यास योग्य बनवतं. ओळींत न सापडणारे अर्थ त्या समासाच्या पटलावरच लिहिले जातील. काही लिहायचे राहून गेले तर लेखकाला समासाचा किती आधार असतो. स्वतः सोबत घालवलेले एकांतातले क्षण म्हणजे आपल्या आयुष्याचा समास! जे राहून गेलं ते भरणारा मोकळा समास!