"तुला जमेल ना?", अरिकूर्म्याने वृष्णीला प्रश्न केला.
"न जमायला काय झालं?", वृष्णीचा सूर दुखावलेला होता.
"तसं नाही, ही पहिलीच मोहीम आहे अज्ञातात. आजवर आपल्यापैकी कोणीही हा किनारा ओलांडून पलीकडे गेलं नाही. तू पहिलाच आहेस, म्हणून.." अरिकूर्म्याने स्पष्टीकरण दिलं.
"तेही खरंच. आजवर आपण कधीही किनारे ओलांडले नाहीत. पण आता ती वेळ आली आहे. बरंय, येतो मी."
वृष्णीने घुमटाची काच बंद केली.
अरिकूर्माचे डोळे भरून आले. आजवरच्या कित्येक पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं हे. अनेकांनी त्यासाठी बलिदान दिलं, कित्येक जण बेपत्ता झाले.