हायटेक चितळे बंधू
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते. संध्याकाळी ५:३० वाजता चितळ्यांच्या दुकानात ताजी बाकरवडी येते अशी ताजी बातमी कानावर पडली आणि दुकाना पर्यंत जायला पाऊले चळवळ करू लागली. अवघ्या ५ मिनिटात मी सपत्नीक चितळे बंधूच्या कोथरूड शाखे समोर येऊन थडकलो. या आधी पण तिथे गेलेलो असल्याने दुकान परिचयाचं होतं. पण त्या दिवशी मात्र बराच फरक/बदल जाणवत होता.
दुकानात शिरण्यासाठी जो दरवाजा होता तिथे बरेच अडथळे ठेवलेले दिसले. किंबहुना फालतू, वेळकाढू किंवा उगीच “चवी पुरत्या” येणाऱ्या गिऱ्हाईकाला मज्जाव करण्यासाठी केलेली ही तरतूद असावी. ते अडथळे पार करून आत शिरणार तितक्यात दुकानाच्या बाजूला असलेल्या बोळकांडी वजा जागेतून आवाज आला ” अहो शुक् शुक्, इकडे या …प्रवेश इथून आहे”. त्यातच दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने आपली तर्जनी जमिनीला समांतर धरून वाटेकडे बोट दाखवले. मग लक्षात आलं पूर्वीचा मार्ग जो येण्या जाण्या साठी वापरला जायचा त्याचा आता एकदिशा मार्ग झाला होता. पुण्यातील शिस्तबद्ध वाहतुकीला अजून शिस्त लागावी म्हणून एखादा मार्ग अचानक पणे एकदिशा मार्ग घोषित करतात तेच सूत्र इथे पण लागू झालेले बघून मला जरा आश्चर्यच वाटले. कदाचित उगीच गिऱ्हाईकांची गर्दी वाढली असावी. मग परत त्या अडथळ्यातून बाहेर पडून त्या प्रवेश करण्याच्या जागे पर्यंत गेलो. “मग आधी नाही सांगता येत? जरा एक पाउल अजून पुढे पडले असते तर झालेला अपमान कुणी सहन केला असता? बाकरवडी विकत घ्यायला आलोय बाहेरून बरणीतले लाडू बघण्या साठी नाही” मी जरा तुसडेपणानेच विचारले. “इथे बरणीत लाडू ठेवत नाहीत. बरणीत सुकामेवा आहे” या त्याच्या थंड प्रतिक्रियेने मी सराईत पुणेकर आहे हे भासवण्याचा निरर्थक प्रयत्न फोल ठरला. आणि त्याच्या सकट सगळ्या दुकानाला कळले मी पुणेकर नसून ३/४ विजार घालून आलेला एक मुंबईकर आहे.
आम्ही त्या प्रवेश दरवाज्यातून आत शिरणार तितक्यात या शुक् शुक् गृहस्थांनी परत थांबवले. मला वाटले इथे येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाची झडती घेत असावेत असं समजून मी त्याच्या जवळ गेलो आणि कवायतीत करतात त्या प्रमाणे खांद्याच्या सरळ रेषेत हात करून उभा राहिलो. ते गृहस्थ तितक्याच थंडपणे म्हणाले “याची काही गरज नाही आणि अजून ही सिस्टीम चालू झालेली नाही” आणि त्याने माझ्या हातात चक्क एक पोस्टकार्डा किंवा शुभेच्छापत्रा पेक्षा थोडं मोठं प्याड वजा आयताकृती प्लायवूडचे फळकुट दिले. त्या वर कसली तरी स्क्रीन होती. तो जेंव्हा हीच अगम्य वस्तू माझ्या पत्नीला द्यायला लागला तेंव्हा मी म्हणालो “एकच पुरे आम्ही एकत्रच आहोत” परत कुणीही प्रतिप्रश्न करायचे धाडस करू नये अश्या ठसक्यात तो गृहस्थ म्हणाला “जो कुणी इथून आत जाईल त्याने हे बरोबर घेऊन जायचे आहे. आणि जाताना काउंटर वर परत द्या. काहीही खरेदी करताना आणि झाल्यावर हे बरोबर लागेल. तुम्हांला काहीही करायचे नाही फक्त मागितल्यावर हे कार्ड द्या”. एका हातात ते फळकुट ज्याला हे कार्ड म्हणतात ते घेऊन आम्ही उभयतांनी चितळे बंधूंच्या दुकानात एकदाचा प्रवेश केला.
आमचा एक हात या फळकुटाने व्यापला होता त्यामुळे उरलेल्या एका हाताने जमेल इतकीच खरेदी करावी लागणार होती. गिऱ्हाईकांना कमीत कमी खरेदी करायला मिळावी, उगाच अनावश्यक वस्तू घेऊन पैश्याचा अपव्यय करू नये असा उदात्त हेतू केवळ पुण्यातच असू शकतो. दुकानात मस्त बाकरवडीचा घमघमाट सुटला होता. आत शिरल्या शिरल्या बाकरवडीच्या काउंटर जवळ गेलो. काउंटर वरचा माणूस एका मोठ्या क्रेट मधील बाकरवड्या पाव पाव किलो मोजून त्याचे हवाबंद पाकीट बनवत होता. मी पाव पाव किलोचे ४ पुडे बनवून देण्यास सांगितले आणि त्याने त्याचं तत्परतेने पुडे भरायला सुरुवात पण केली. मुंबईच्या सवयीने मी त्याला म्हणालो “आत्ता ५:३० ला जी ताजी येते तीच भर” हे वाक्य ऐकताच त्याने हातातले काम थांबवले आणि माझ्याकडे एकच पुणेरी कटाक्ष टाकला. मला वाटलं आता हा मला म्हणणार निघा …बाकरवड्या मिळणार नाहीत आणि वरून काहीतरी उपदेशाचे चार शब्द माझ्यावर फेकणार हे एखाद्या शेंबड्या पुणेकर पोराने देखील सांगितले असते.
सौजन्य सप्ताह चालू आहे, कधी नव्हे ते येणाऱ्या गिऱ्हाईकाचा सन्मान करून त्याला दुर्मुख करू नये असा चेहेऱ्यावर सोज्वळ भाव आणून तो काउंटरवरचा पुणेरी दुकानदार मझी मंजुळवाणीने कानउघाडणी करू लागला “सकाळी आलेली बाकरवडी संध्याकाळी विकत नाही ….कारण ती विकण्यासाठी उरतंच नाही. इथे रोज सकाळ संध्याकाळी ताजा माल येतो. देऊ का? खात्री नसेल तर उद्या संध्याकाळी ५:३० वाजता क्रेट मोजायला या” सकाळच्या का संपतात म्हणजे कमी बनवता की विकल्या जातात असा खोडसाळ प्रश्न विचारण्याचे मुद्दाम टाळले आणि त्याला चार पुडे बांधून देण्याची विनवणी वजा आर्जव केलं. पटापट त्याने ४ पुडे भरले आणि म्हणाला “कार्ड द्या”. प्रवेश करताना दिलेल्या मोठ्या आयताकृती फळकुटाला कार्ड म्हणणं जरा हास्यास्पदच होतं. कार्ड कसलं ते कार्ड बोर्ड होता तो … तुमच्या दरवाज्यावरची पाटी लिहिता येईल इतका मोठा. “तुमच्या हातात आहे तेच कार्ड द्या. त्याच्या वर तुम्ही घेतलेल्या वस्तूंची नोंद होईल आणि पुढे याच कार्डचा उपयोग तुम्ही काय काय वस्तू घेतल्यात त्या प्रमाणे बिल बनवले जाईल. बिला प्रमाणे पैसे द्यावे लागतील.” मी परत एकदा त्या फळकुटाकडे बघितलं आणि ते “कार्ड” त्याला देता देता म्हणालो “अरे वा … एकदम अत्याधुनिक प्रणाली आहे तुमच्या कडे” त्याला बहुदा माझा खोचकपणा देखील कळला नाही किंवा माझं “प्रणाली” वगैरे पण त्याच्या डोक्यावरून गेलं. त्या सद्गृहस्थाने ते कार्ड माझ्याकडून खेचून घेतले आणि त्याच्याकडील मोजणी यंत्रावर ठेवले. त्यावर असलेली काही बटणे दाबून ते कार्ड मला परत दिले.
मी त्या बाकरवडीच्या वासाने इतका अधीर झालो होतो की काउंटर सोडता सोडता मी बाकरवडीची एक पुडी फोडली. आणि त्यातली एक बाकरवडी उचलून तोंडात टाकणार इतक्यात बाकरवडी काउंटरवरचा इसम ओरडला “बिल बनवायच्या आगोदर इथे खाऊ नका.” आणि त्याच्या सुरात माझ्या बायकोने पण सूर मिसळला “तुला काही कळतं की नाही … लहान मुला सारखं इथेच काय पाकीट फोडून खायला सुरुवात केलीस?” दोन बोटांनी पकडलेली बाकरवडी तशीच पुडीत सोडून द्यावी लागली. पुढे लाडू, पेढे, बर्फी यांचा काउंटर होता. काय मस्त मस्त रंगांच्या बर्फ्या ठेवल्या होत्या … अगदी बघता क्षणी एक डिश भर घेऊन तिथेच फस्त कराव्याश्या वाटत होत्या. लाडूंची तर रेलचेल होती. मेथी लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू झालच तर डिंक लाडू … पण या सगळ्या लाडवांमधून “पौष्टिक” लाडूने माझे लक्ष वेधून घेतले. “हा पौष्टिक लाडू काय प्रकार आहे?” असे विचारताच त्या काउंटर वरील माणसाने पौष्टिक लाडू, त्याचे घटक, पौष्टीकतेचे परिमाण सविस्तर सांगितले. पाव किलो पौष्टीक लाडू घेतले आणि सराईतपणे कार्ड पुढे केले. परत ते कार्ड त्या मोजणी-नोंदणी यंत्रावर ठेवले गेले आणि त्या कार्डावर नोंद करून ते मला परत दिले. अजून बाकी काही चकणा आयटम नको ना असं विचारताच भर चितळ्यांच्या दुकानातच कुणाचाही मुलाहिजा नं ठेवता बायको म्हणाली “नको इथून नको. या पेक्षा चांगले आणि स्वस्त चकणे आपल्या डोंबिवलीला मिळतात तुझ्या त्या गुजराथ्याकडे मिळतात”. ती असं म्हणताच मी इकडे तिकडे बघायला लागलो आणि मेन काउंटर वरचा मालक माझ्या हावभावांकडे बघून मिश्किलपणे हसत होता. … अश्या काही प्रसंगावरून मला नेहेमी वाटतं की माझी बायको पूर्व जन्मीची पुणेकर असावी. 
एका हातात सामान आणि दुसऱ्या हातात माझे आणि माझ्या बायकोचे कार्ड घेऊन मी सामानाचे पैसे देण्यासाठी शेवटच्या काउंटरवर आलो. कुठल्याही काउंटर वर गेलं की कार्ड पुढे करायचं हे माहीत झाल्यामुळे मी माझ्या हातातील दोन्ही कार्ड त्याच्या समोर धरली. त्याने त्यातले एक फळकुट घेतले आणि त्याच्या कडील मोजणी यंत्रावर ठेवले. ते बहुतेक बायकोच्या हातातले असल्याने त्या कार्डावर कुठलीही नोंद आढळली नाही. आधी मला वाटले वा …काहीच नोंद नाही म्हणजे काही तरी गल्लत झाली असणार आणि आता हा माल चकटफू मिळणार. “दुसरे कार्ड द्या” या मालकाच्या वाक्याने मी वास्तवात आलो. दुसऱ्या कार्डात सगळ्या नोंदी सापडल्या मालकाच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव बघितले. किती झाले हे विचारायच्या आताच मालकाने त्याची तर्जनी संगणकाच्या पटलावर जिथे मोठ्या अक्षरात किंमत दिसत होती तिथे ठेवली. आणि त्याचं तर्जनीने बिल छापण्यासाठी असलेले बटन दाबले. छापील बिलाप्रमाणे रक्कम दिल्यावर मालक आदबीने म्हणाला “डोंबिवली मधून आलात का? बघा अजून काही नकोय ना?” मी म्हटलं “हो, डोंबिवलीहून आलोय. नको अजून काही नको” (आणि जरी हवं असेल तरी हा माणूस मला परत प्रवेश द्वारावर जाऊन फळकुट घेऊन यायला सांगेल”) “इथे प्लास्टिकच्या पिशव्या मिळणार नाहीत” अशी हुकुमावरून स्वरातील पाटी ठळकपणे दिसत असताना सुद्धा पिशवी आहे का? असे विचारले असते तर कदाचित त्याने बाकरवड्या काढून घेतल्या असत्या आणि मला रिकाम्या हाताने पाठवले असते या भीतीने मी पिशवी बद्दल विचारले नाही. पण काय आश्चर्य मालकांनी माझ्या कडून समान घेतले ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ती पिशवी चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवून मला परत केली. मी परत एकदा ‘पिशवीचे किती झाले?’ हे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण एकच भीती ….ताज्या बाकरवड्या हातून निसटल्या तर???
प्रतिक्रिया
णिषेध
स्पष्ट सांगतो, नाही आवडला लेख...
(मुद्दामच नविन प्रतिक्रिया लिहून ट्यार्पीमधे भर घालून प्रोत्साहित न करता, इथेच संपादित करतोय)
मला काय म्हणायचंय ते मृत्युंजय ह्यांनी नेमक्या शब्दात सांगितलंय आणि 'परा'शीही सहमत, अश्या 'इन्वायटिंग' धाग्यांना असेच प्रतिसाद योग्य वाटतात. अर्थात तुमचे आधीचे लेख आवडलेत आणि म्हणूनच अपेक्षा जास्त आहेत.....
स्पष्ट प्रतिसाद.
स्पष्ट प्रतिसाद आवडला. माझे पुढील लेख देखील आवडतील आणि त्यावर देखील स्पष्ट प्रतिक्रिया द्याल अशी आशा करतो. बाकी आवड/नावड चालू राहिलंच.
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
आता
आता आपल्या डोंबिवलीतल्या काही दुकांना बद्दल लिहा ना.
आम्चा बी सेम अनुभव
ते फळकुट काय दुसरीक पघायला नाई मिळाल कधी!
प्रकाश घाटपांडे
फलज्योतिष चिकित्सा मंडळ
काका हलवाईत पण पाहिल्याचे
काका हलवाईत पण पाहिल्याचे आठवते
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
कित्येक वर्षे आहे अत्याधुनिक प्रणाली
कोथरूडची शाखा "श्रीकृष्ण" - कर्वे यांची आहे आणि बरीच लहान आहे. गेल्या ३-४ वर्षात जरा व्यवसाय वाढला आहे.
ते मोठं कार्ड चितळे बंधू यांच्या मुख्य शाखेत - बाजीराव रस्ता विश्राम बाग वाड्याजवळ माझ्या मते संगणक जेव्हा आले तेव्हा पासून आहे - सुमारे १०-१२ वर्षे तरी झाली असावीत.
काका हलवाई शास्त्री रोड इथेही तशीच कार्ड पद्धती ५-६ वर्षांपासून आहे.
इतक्या व्हॉल्युम (मराठी?) मध्ये - वस्तुंच्या / गिर्हाइकांच्या, चितळ्यांकडे कधीही गोंधळ नसतो हे महत्त्वाचे.
एकीकडे ताजी बाकरवडी हवी - काही आठवडे किमान ८ दिवस तरी सहज उत्तम राहणारी वस्तु तुम्हाला सकाळी बनवलेली नको संध्याकाळी ६-७ वाजता. आणि तरीही बाकरवडी संपली यावर कमी बनते का विकली जाते हा विनोद करणे म्हणजे अगदी पाचकळ आहे.
आता चितळ्यांची बाकरवडी (इतकी ताजी २-४ तासापूर्वीची नक्कीच नाही) हलदीराम सोनपापडी सदृश पॅकिंग मध्ये इतर शहरात आणि महाराष्ट्रा बाहेर सुद्धा मिळते.
असो... पुणेरी पणाचा नुसता आव आणून पुणेरी होता येत नाही..
कोथरूडची शाखा
मी पुण्यात आलो की कोथरूडच्या शाखेतच जातो. शाखा जरी लहान असली तरी श्रीकृष्ण कर्वे हे नेहेमी हसतमुख असतात.
त्यामुळे इतर शाखांमध्ये ही पद्धत किती जुनी आहे याची जाण नाही. पण जर इतकी जुनी पद्धत असेल तर खरंच मानायला हवं. पण या शाखेत ही पद्धत आत्ताच बघितली.
चितळ्यांच्या वस्तूंबद्दल आणि त्यांच्या दर्जा बद्दल कुठेच वाद नाही आणि दुमत देखील नाही.
खरं आहे ..... तिथे पाहिजेत अस्सल पुणेरी. आव वगैरे आणून पुणेरी होता येत नाही.
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
ह्म्म..खर आहे.तळहाताहुन थोडस
ह्म्म..खर आहे.तळहाताहुन थोडस मोठ असत ते कार्ड, दरवाज्याच्या पाटिएवढ मोठ नसत.आणि ते बघुन थोडि हुशारी अंगि असलेल्या माणसाला कळत हे काय आहे ते.
-----------------------------------------------------------------------------------------------
सुखि संसाराची सोपी वाटचाल!
मी १९९८ सालामध्ये चितळे बंधू
मी १९९८ सालामध्ये चितळे बंधू यांच्या मुख्य शाखेततून असे कार्ड वापरुन खरेदि केली आहे.
बहुतेक रेडिओ फ्रिक्वेनस्नी रिडर असावा.
छान......
चितळ्यांची महती जेव्हा कळली तेव्हापासून तिथे जाऊन ताजा ताजा माल घ्यायची खूप इच्छा होती. मात्र वरचेवर पुण्याला जाणे जमले नाही. जेव्हा संधी मिळाली तेव्हा खास चितळ्यांचे दुकान "to be visited" लिस्ट वर ठेऊन गेलो. मात्र त्यावेळी "ते बघ चितळ्यांचे दुकान.... या वेळेस बंद असते. आता संध्याकाळीच उघडेल" हे वाक्य मित्राकडून ऐकावे लागले.
असो.....
चितळ्यांच्या ताज्या बाकरवडीचा आनंद तुम्हाला (दुकानाबाहेर का होईना) घेता आला हे चांगले झाले...
You don't win silver, you only lose gold.
पुण्यामध्ये कुठलीही पुणेरी
पुण्यामध्ये कुठलीही पुणेरी दुकाने दुपारी २-४ या वेळेस बंद असतात.
दिवाळीच्या आदल्या दिवशीही दुकान बन्द होण्याची वेळ चुकत नाही. मला चितळ्यांच्या दुकानात, दिवाळीच्या आदल्या दिवशी दुपारी २:०१ वाजता व रात्री ८:३१ वाजता प्रवेश नाकारला होता.
या धाग्याचे काश्मीर होणार असे
या धाग्याचे काश्मीर होणार असे दिसतेय. "कैच्याकै" अस्मितांना डिवचण्याचा उत्तम प्रयत्न
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
काश्मीर????
मग हा पण धागा युनो कडे घेऊन जाऊ.
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
काही लोकांची अस्मितेची गळवे
काही लोकांची अस्मितेची गळवे सदैव पिकलेली असतात. जरा हात लागला की फुटतात. त्याला कोण काय करणार ?
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
" अस्मितेची गळवे " काय
" अस्मितेची गळवे " काय नेमका, चपखल , बलीवर्दनेत्रभञ्जक शब्दप्रयोग आहे विमे. सूप्पर डूप्पर लाईक, साष्टांग प्रणिपात!!!!!
_/\_
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
बलीवर्दनेत्रभञ्जक
म्हंजे मर्हाट्टीत काय?
__________________________
एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!
म्हंजे बैलाचा डोळा फोडणारे
म्हंजे बैलाचा डोळा फोडणारे म्हंजे वन दॅट हिट द बुल्स आय.
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
हम्म...चालायच हो..आत गळवं
हम्म...चालायच हो..आत गळवं दिसली की चिलटं येतातच..काही इलाज नाही त्याला.
संपादक - ही तरी प्रतिक्रिया सभ्य शब्दात आहे का? का ही पण उडवणार?
---------------
धनंजय बोरगांवकर
तुम्ही तुमचे मत योग्य शब्दात
तुम्ही तुमचे मत योग्य शब्दात व्यक्त करू शकता. दुसर्यांनी जे शब्द वापरले त्याच भाषेत उत्तर द्यायला जाताना बरेचदा घोळ होतो.
हम्म...चालायच हो..आत गळवं
आत ? म्हणजे नक्की कुठे ? काही कळले नाही.
असो, जनरली गळू झाले की चिलटं येण्याची वाट बघू नये. डॉक्टर कडे जावे आणि इलाज करून घ्यावा.
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
कै च्या कै !
तुम्हाला बाकरवड्या आवडतात , तुम्ही विवाहित आहात ...आणि हो तुम्ही बिल दिलेत हे समजले !
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
फक्त एवढेच समजले?
इतका लेख वाचून फक्त एवढेच समजले??
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
कै च्या कै !
तुम्हाला बाकरवड्या आवडतात , तुम्ही विवाहित आहात ...आणि हो तुम्ही बिल दिलेत हे समजले !
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
हम्मम्म...
पण हॅपी कॉलनी ते दुकान, चालत गेले कि गाडीने? (नाही... 'थडकलो' लिहिलंय, म्हणून विचार आला मनात)

थडकलो - धडकलो
नाही नाही .... चालतच गेलो. नाहीतर म्हणालो असतो "धडकलो"
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
रस्ता ओलांडण्याचा मार्ग
अच्छा, चालत का, ब्वॉर्र...मग वाटेत तो 'इंटरनॅशनल' पादचार्यांसाठी रस्ता ओलांडण्याचा मार्ग नाही वापरला का? नाही..तुम्हाला त्या दुकानाचा 'एकेरी' प्रवेश खटकला, पण हे नाही... आश्चर्य आहे!

(आता वात लावलीच आहे, तर आजूबाजूचे लवंगी पण फुटू द्या)
तुमची वाट लागणार आता. धागा
तुमची वाट लागणार आता. धागा मात्र गाजणार. १००+ नक्की.
(दहा रूपयाचे पॉपकॉर्न द्या हो!)
बिपिन कार्यकर्ते
अरे बाप रे
अहो बि.का. .... घाबरवू नका हो. मी नवीनच आहे (मिपा वर जुना आहे पण सक्रीय आत्ताच झालोय)
नाहीतर हा लेख काढून टाका. मला पुण्यात पाय ठेवला जागा उरणार नाही आणि चितळे त्यांची बाकरवडी पण देणार नाहीत.
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
(दहा रूपयाचे पॉपकॉर्न द्या
त्यापेक्षा भाकरवड्या घ्या की वो ..... चितळेंवर धागा आहे ना...
--------------------------------------
सही रे सही!!!
भाकरवड्या?? तो शब्द
भाकरवड्या??
तो शब्द 'बाकरवडीं' असा आहें. दहा वेळा लिहून काढा बरं !!
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
अर्रर्र... चितळे चिडतील आता..
अर्रर्र... चितळे चिडतील आता.. भागो!!
--------------------------------------
सही रे सही!!!
बिका घ्या.
पैसे बिसे नकोत.
बाकी धाग्याबद्दल लिहीण्यासारखे काहिही नाही.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
लेख तुफान आवडला
आनंद,
तुमची लेखनशैली छान आहे आणि लेख तुफान आवडला.
पुलेशु...
वाचकांनी निखळ वाचनानंद घेण्यासाठी ह्या लेखाकडे पहावे ही विनंती. उगाच चितळेंना टारगेट केल्यामुळे तर्क-कुतर्क काढू नयेत.. ( हाही मी एक पुणेकर असल्याचा परिणाम
) एक लेख म्हणून उच्च दर्जाचे लेखन आहे हे नक्की सांगू इच्छितो
मी पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
धाग्याची शंभरी होउदे नाहीतर
धाग्याची शंभरी होउदे नाहीतर नाही, अविचिबावपंसं तर्फे तुम्हाला कायदेशीर नोटीस मात्र नक्की येणार.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
शंभरी????
अविचिबावपंसं???? ह्या कै हाय ब्वा???
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
अखिल विश्व चितळे बाकरवडी xx
अखिल विश्व चितळे बाकरवडी xx संघटना ??
xx म्हणजे गाळलेली जागा.
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
'अखिल विश्व चितळे बाकरवडी
'अखिल विश्व चितळे बाकरवडी पंचायत संघ' असावं
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
विमे आणि सुड दोघांनाही
विमे आणि सुड दोघांनाही धन्यवाद,
एका पोटार्थी पुणेकराच्या भावना समजुन घेतल्याबद्दल,
अदरवाईज, पक्का सोलापुरी - ५० फक्त
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
तुमच्यासारख्यांना असेच अनुभव
तुमच्यासारख्यांना असेच अनुभव यायचे.
तुम्ही विनाकारण खरेतर खिल्ली उडवण्याच्या हेतूने धागा काढला आहे म्हणून तुमच्या माहितीत थोडी भर घालतो.
काही लोकांच्या चेहर्यावरुनच ह्यांना आत जाण्याचा रस्ता कुठला आणि बाहेर जाण्याचा रस्ता कुठला हे समजणे शक्य नाही हे जाणवते. पुश / पुल लिहिलेले काचेचे दरवाजे देखील हे लोक उलट्या क्रियेने उघडायला बघतात. त्यामुळे अशी लोकं दिसली रे दिसली की पुण्यात त्यांना शुक-शुक वैग्रे करुन / हाका मारून पुढचे नुकसान (आणि त्या ग्राहकाची फजीती) दोन्ही टाळतात.
१) गेल्या काही काळापासून ग्राहकांना होणारा गर्दीचा त्रास, एकच दरवाजातून आत बाहेर होण्यासाठी उसळलेली लगबग आणि मुख्य म्हणजे CCTV आणि ग्राहक सुरक्षेचे पोलीसांनी केलेले आवाहन ह्याला प्रतिसाद म्हणून एका बाजूने जाणे आणि एका बाजूने येणे अशी सुविधा सुरु करण्यात आली आहे.
२) 'प्रणाली' वैग्रे शब्द माहिती असणार्यांना ते फळकूट काय आहे हे कळाले नाही ते पाहून अंमळ मौज वाटली. बाकी त्या फळकूटावरती तुम्हाला स्क्रीन दिसलेली पाहून तर आम्हालाच मोती बिंदू झाल्यासारखे वाटायला लागले.
अ) पुण्यातल्या कुठल्याही दुकानात तुम्ही खरेदी करता तेंव्हा ते दुकानदारावरती उपकार नसतात. उलट तुम्हाला तिथे खरेदीची संधी दुकानदाराने उपलब्ध करून दिली हे तुमचे भाग्य असते हे लक्षात ठेवावे.
३) एकत्र येणार्या दोन्ही व्यक्तींना कार्ड देण्याचा हेतू म्हणजे, निदान ठरवून आलेली खरेदी तरी दोघे वेगवेगळ्या काउंटरवरती एकेकट्याने करतील आणि गर्दी कमी होण्यास मदत होईल.
अ) बर्याचदा लोकांना आपण खरेदीला आलो नसून मेहूण म्हणून आलो आहोत असे भास होत असतात. ते तसे नसते. तुमच्यापेक्षा जास्ती महत्वाची लोकं आजूबाजूला उभी असतात.
४) चितळ्यांच्या दुकानात 'ताजा माल आहे ना?' असा प्रश्न पडणे म्हणजे तर कहर आहे. मुळात चितळ्यांची येवढी ख्याती ऐकून आणि आधी देखील तिथल्या मालाचा अनुभव असताना असा प्रश्न पडणे म्हणजे लाज आहे.
५) चितळ्यांचे दुकान आणि शर्मा / अग्रवाल ह्यांचे दुकान ह्यातला फरक तुमच्या लक्षात येणे शक्यच नाही हे तुमच्या लिखाणावरून जाणवत असल्याने तुम्ही तिथेच पुडे वैग्रे फोडून उदरभरण सुरु केलेत ह्याचे आश्चर्य वाटले नाही.
६) मिठाई अथवा तत्सम कुठल्याही दुकानात न आढळणारे 'मदत / चौकशी' सारखे काऊंटर फक्त आणि फक्त चितळेंच्या दुकानात आहे, आणि मुख्य म्हणजे अतिशय प्रशस्त अशा ह्या काऊंटरला सतत कमीत कमी ३ मदतनीस (एक स्त्री) हजर असतात.
७) सरकारने एका विशिष्ठ जाडीच्या पिशव्यांवरती बंदी घातल्याचे आपल्याला माहिती नसेलच, ते माहिती करून घ्या. पाव किलो वैग्रे बाकरवडी घेऊन गावजेवणाचे सामान खरेदी केल्याचा आव आणला तरी पिशवी मिळत नाहीच. मुख्य म्हणजे एका किलोच्या वरील खरेदीवर (कुठलाही पदार्थ) पिशवी न मागता दिली जातेच !
अ) वर्तमानापत्रात आणि न्यूज चॅनेल्सवरती क्रिकेट आणि विद्या बालन सोडून इतर विषयांवरती देखील बातम्या येतात.
सर्वात महत्वाचे :-
चितळे कोणालाही पत्रीका पाठवून 'अगदी सहकुटूंब सहपरिवार खरेदीला यायचे हां!' असे आमंत्रण देत नाहीत. तेंव्हा उगाच 'किती ती यातायात' असल्या टाईपात कुंथू नये. आपण ज्या कुठल्या शहरात राहता तिथेच आपल्या आवडीचे दुकान बघून खरेदी करावी.
सध्या टंकाळा आल्याने येवढेच.
धन्यवाद.
चितळेंच्या माजोरीपणाचा फ्यान
डबल माजोरी परा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
+१
++++१
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!
तसं लेखाहूनही प्रतिसाद बेस्ट
>> सर्वात महत्वाचे :-
चितळे कोणालाही पत्रीका पाठवून 'अगदी सहकुटूंब सहपरिवार खरेदीला यायचे हां!' असे आमंत्रण देत नाहीत. तेंव्हा उगाच 'किती ती यातायात' असल्या टाईपात कुंथू नये. आपण ज्या कुठल्या शहरात राहता तिथेच आपल्या आवडीचे दुकान बघून खरेदी करावी.
+१
पण अरे मित्रा -- तू लेखात 'डोंबिवली' हे नाव वाचलंस ना? तरीही >> आपण ज्या कुठल्या शहरात राहता तिथेच आपल्या आवडीचे दुकान बघून खरेदी करावी.>> असं म्हणतोस? कम्माल आहे ब्वॉ
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
पण अरे मित्रा -- तू लेखात
पण अरे मित्रा -- तू लेखात 'डोंबिवली' हे नाव वाचलंस ना? तरीही >> आपण ज्या कुठल्या शहरात राहता तिथेच आपल्या आवडीचे दुकान बघून खरेदी करावी.>> असं म्हणतोस? कम्माल आहे ब्वॉ
सदर प्रतिसाद न उडवता , त्या खालचा माझा प्रतिसाद मात्र उडवला.. infact दोन्ही उडवले
संतोष जाहला

सदर प्रतिसादाचा अतिशय सौम्य शब्दात निषेध नोंदवत आहे .
मेणबत्त्या दाखवून
आता तरी दाखल घेतली जाईल का?
का नाय?
पुणेकर महान आहेत ..
ती म्हणतात तीच पूर्व दिशा..
३० म्हणजे तर साक्षात अभिमानाच आगार
माफ करा.. धक्का लावल्याबद्दल..
मलमपट्टी करून घ्या..
जास्त दुखवल गेल असेल तर
(सौम्य डोम्बिवलीकर ) स्पा
***************************************
- मन्या फेणे
काही प्रश्न - १. मेणबत्त्या
काही प्रश्न -
१. मेणबत्त्या कुठुन आणल्या ?
२. काय रेट आहे ?
३. ड्झनावर की वजनावर ?
बाकी पेट्ल्यात भारी हो, आमच्याकडच्या ना अंमळशा जाड असतात मग इतर कामालाही उपयोगी पडतात, झुरळं मारायला, खिळे ठोकायला वगैरे
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
धन्यवाद
यानिम्त्ताने तुम्ही मेणबत्त्यांचे इतर वापर करता, व त्यातल्यात्यात मेणबत्ती खलबत्त्यातील बत्त्यासारखी कुटण्यासाठी वा ठोकण्यासाठी वापरता असे लक्षात आले. (हा बत्ता मेणासारखा मऊ असल्याने हलकेच कुटावे लागत असेल, हेवेसांनल)
__________________________
एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!
लेखाहूनही प्रतिसाद बेस्ट
आगदी हेच म्हणायला आलो होतो
अभयं च मे सुखं च मे शयनं च मे
सूषा च मे सुदिनं च मे॥
मिपावरचा कोणीतरी
डिटेक्टीव मघाशी म्हणत होता कि पराला चितळेंचे वकिलपत्र मिळालेय म्हणे.
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
+१११११ पर्याशी सहमत कट्टर
+१११११
पर्याशी सहमत
कट्टर मुंबैकर घाश्या
घ्या.....
पराषेटांना विविध विशेषणे का मिळतात याचं सपष्टीकरण उपरोल्लेखित जबरदस्त लिखाणातच दिसून येतंय नै?
बाकी, मूळ लेख आवडलाय बर्का.....
इत्यलम्
:davie: प्रास :davie:
लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड
चितळ्यांइतकेच चित्त पावन
चितळ्यांइतकेच चित्त पावन माननीय असलेले परा'जी... यांना _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
वरच्या सगळ्या पॉईन्ट्ससाठी +++++१११११११११
आणि यातला सगळ्यांत आवडलेला पॉईन्ट---
परा'जी..आपण इथे "विद्या बालन" टंकले.. की आजकाल "कुटुम्ब"मधल्या वीणा जामकर'ची आठवण येते!!!


कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!
_/\_ बाजार उठवला!
_/\_ पराशेठ
बाजार उठवला!
--------------------------------------
सही रे सही!!!
लेखन आवडले नाही. चितळ्यांवर
लेखन आवडले नाही. चितळ्यांवर लिहिले आहे म्हणून नाही तर एकंदरीतच ते 'नावे ठेवणे' या क्याट्यागरीतले वाटते. तुम्हाला एक ग्राहक म्हणून अगदी (कोणत्याही) दुकानाच्या समोर, बाजूला, मागे, तळघरात वाहन पार्क करण्यापासून ते दुकानात शिरून वस्तू घेऊन बाहेर (दुकानाच्या कायदेशीर हद्दीबाहेर) पडेपर्यंत अनेक 'सेवा' अपेक्षित असतात. त्या न मिळाल्यास खुशाल दुकान बदला. त्यांना पुन्हा हिंग लावून विचारू नका. भारतात सुदैवाने अनेक उत्तम मिठाईवाले आहेत. चितळे हे काही एकमेव नाहीत. तुम्हाला इतक्या खटकणार्या गोष्टी वाटतायत तर स्वत: फिरकू नका म्हणजे असा त्रास पुन्हा होणार नाही.
बाकी त्या फळकुटाबद्दल बोललेले त्या काउंटरवरच्या मनुष्यास समजले नाही म्हणता? पण ते नक्की काय आहे? कुठे आणि कधी बनवले आहे याची कल्पना तुम्हालाही नाही. जर्रा शोध घेतलात तर समजेल.
आज्जे...
यु टू :O
.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...
लेख आवडला
लेख अवडला
पु.ले.शु
----------------------------------------
माझ्या डोळ्या देखत तीच दुसऱ्याशी लग्न लागलेलं पाहून
माझा देवावरचा विश्वासच उडाला.
आणि एक वर्षा नंतर ...............
मी तिच्या नवरयाला पाहिला
तेव्हा माझा देवावर पुन्हा विश्वास बसला
.......
तात्पर्य : माणूसाच
पर्याशी सहमत. एकुणच आम्ही
पर्याशी सहमत.
एकुणच आम्ही पुण्यात पोटे भरायला येऊन असली रडगाणी गाणार्यांना नेहमीच सांगतो
'जा रे बाबा. तुझ्या तुझ्या देखण्या नि वक्तशीर, नेटक्या गावी. आमचे गबाळे नि उद्धट पुणे राहू द्या आमच्यासाठी. आम्हाला प्रगती वगैरे काही करायची नाही. उगाच आमचे डोके उठवू नका. काय दिवे लावायचे ते आपापल्या गावी जाऊन लावा. वर इथल्या बाकीच्यांनाही घेऊन जा नि रोजगार द्या. आम्ही आपले शांतपणे एकवेळ जेवून राहू इथे.'
फक्त सांगलीच्या लोकांना एक विनंती. चितळेंच्या नावे 'पुणेकर' म्हणून इतका शंख झाल्यावर आता ते भिलवडी-वांगीचे आहेत म्हणून त्यांना घेऊन जाऊ नका. आता ते सर्टिफाईड पुणेकर झालेत ना, तसेच राहू द्या.
__________________________________________
Every 'ism' is a euphemism, every religion a contagion
“मग आधी नाही सांगता येत? जरा
सदर प्रसंगातला खरेदीकर्ता धुतल्या तांदळाचा नाही हेच वरील वाक्यातुन जाणवले.
बाकी पराशी बर्याच अंशी सहमत.
- गणा मुंबैकर.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
आनंदा, लेख भारीच रे! पुणेकर
आनंदा,
लेख भारीच रे! पुणेकर आणि मुबैकर ह्या वादाचा चष्मा न लावता लेख वाचला तर मजा आली.
तसं म्हटलं तर पुणे मुबै वाद ह्या लेखाने उद्भवू शकतो खरा!
पण पराशी नाही म्हटले तरी सहमत व्हावे लागते आहे. उगा पराला बरें वाटावे म्हणुन नाही तर मीही एक पुणेकर आहे म्हणून.
)
(पूर्वाश्रमीचा मुबैकर असलो म्हणुन काय झाले
- ( सोयीनुसार मुबैकर किंवा पुणेकर होणारा ) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
मिपावरचे माझे लेखन...
ईथे साफसफाई झाली वाटतं.
ईथे साफसफाई झाली वाटतं.
बाकरवडी
ती बडिशेप घातलेली गोड बाकरवडी आणि पाणी न काढलेल्या चक्क्याचं (चक्का कसला दहीच ते) पातळ श्रीखंड म्हणून विकलं जाणारं दही साखर...
ब्याsssssssक
मजा आली
आनंदराव, लेख खुमासदार आहे. एक वाचक म्हणुन मजा आली.
मजेदार
मजेदार लिखाण म्हणून ठीक आहे. पण मी त्या दुकानात अनेक वेळा गेलेलो आहे. अत्यंत चिंचोळ्या जागेत असूनही या सिस्टीममुळे तेथील व्यवस्था कायम चांगली वाटलेली आहे. प्रवेश समोर रस्त्यावरून्/फुटपाथवरून येणार्या माणसांकरता तेथेच न ठेवता बाजूने ठेवल्याने लोकांची गडबड होते, पण एकदा कळले की त्यात गैरसोय काही नाही.
चार-पाच वेगवेगळे 'आयटेम' घेऊन काउंटरवरच्या ला टोटल करायला लावण्यापेक्षा ती कार्ड सिस्टीम जास्त एफिशियंट वाटली.
आणि मुख्य म्हणजे त्यांच्या दारासमोर जागा असेल तर गाडी लावता येते. इतर 'स्वीट मार्ट्स' प्रमाणे पार्किंगच्या जागेत पाणीपुरीची गाडी लावून आपली गैरसोय करून साईड बिझिनेस केलेला नाही ( अर्थात जेथे तो केलेला आहे तेथे आपले लोकही बिनदिक्कतपणे बाहेर नो पार्किंग मधे गाड्या लावून आतील मूळच्या पार्किंगच्या जागेत उभ्या केलेल्या गाड्यांवरचे पदार्थ हाणत असतात
).
लेख मस्त जमला आहे..
लेख मस्त जमला आहे..
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
मी अजिबात खवैय्या नसल्याने
मी अजिबात खवैय्या नसल्याने गेल्या ४० वर्षात मी चितळेंच्या दुकानात मोजून चार वेळा गेलो असेन . त्यामुळे तेथील व्यवस्थे बदद्द्ल व खवचटपणा ( असला तर ) बद्द्ल अनभिज्ञ म्हणून भाग्यवान !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
चितळे ग्रेट आहेतच आणि त्याहून
चितळे ग्रेट आहेतच आणि त्याहून ग्रेट पराचा पुणेरी प्रतिसाद
____________________________________________________
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
ज्याम आवडलेले सत्यवचन.......
सर्वात महत्वाचे :-
चितळे कोणालाही पत्रीका पाठवून 'अगदी सहकुटूंब सहपरिवार खरेदीला यायचे हां!' असे आमंत्रण देत नाहीत. तेंव्हा उगाच 'किती ती यातायात' असल्या टाईपात कुंथू नये. आपण ज्या कुठल्या शहरात राहता तिथेच आपल्या आवडीचे दुकान बघून खरेदी करावी.
सदाशिव पेठेत राहिलेला ( आणि शाळा शिकलेला).....
सही कशासाठी....
३/४ विजार बाहेर घालणार्या
३/४ विजार बाहेर घालणार्या लोकांबद्दल माझे चांगले मत नाही. माझ्या मताला पुष्टी देणाराच लेख. वाचून डोक्याचे दही झाले.
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
आईशप्पथ सांगतो, गुगळे आणि
आईशप्पथ सांगतो, गुगळे आणि त्यांची जीन्स बद्दलची मते आठवली.
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
जीन्स म्हणजे वस्त्रातले कि
जीन्स म्हणजे वस्त्रातले कि जीवाशात्रातले ?
(उपलब्ध असल्यास माहितीचा दुवा द्या.)
की सोत्रिशास्त्रातले??
की सोत्रिशास्त्रातले??
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
हे हे हे!
हे हे हे!
=))
खि खी खी....
-(शास्त्री) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
मिपावरचे माझे लेखन...
चितळेबंधूंच्या दुकानावर
चितळेबंधूंच्या दुकानावर तुम्ही केलेल्या रोमहर्षक स्वारीचे वर्णन ठिकठाक जमले आहे.
बाकरवडी आवडली की नाही ह्या बद्दल काहीच लिहिलेले नाही. ते लिहिले असते तर आणखी काही स्तुतीपर शब्द लिहिता आले असते.
असो...
चितळे - एक आदरणीय संस्था
मला चितळे या संस्थेविषयी विलक्षण आदर आहे. लोक ज्याची टवाळी करतात तो तर्हेवाईकपणा वा कोणाला वाटत असलेला माज सहन करुनही लोक तिथेच का येतात हे विचार करण्यासारखे आहे. शुद्धता आणि गुणवत्तासातत्य हे चितळ्यांचे वैशिष्ठ्य आहे. नपेक्षा खंडोगणती हलवाई असताना आणि रांगेत उभे राहुन खरेदी करायला लोक इथेच का येतात? बाकरवडी आणि आंबा बर्फी खूप लोक बनवितात पण तरीही चितळ्यांच्या वस्तू त्या चितळ्यांच्या वस्तू. उगाच वजन भरल्यावरसुद्धा एखाद तुकडा पुड्यात टाकुन 'बघा आम्ही किती ग्राहकप्रेमी आणि दानशूर आहोत' असे भाव चेहेर्यावर आणायचे उद्योग चितळ्यांना करावे लागत नाहीत. किंबहुना जर तुमच्या मालाची गुणवत्ता उत्तम असेल तर तुम्हाला किंमत वा नाराजीची पर्वा करायला लागत नाही हे चितळ्यांनी सप्रमाण दाखवुन दिले आहे. त्यांची खरेदी नोंदपत्र पद्धत निदान भारतात व या क्षेत्रात तरी मी प्रथमच पाहिली - चोख व्यवहार. 'आणखी काय घेतलेत ?' असे अपमानकारक व अजागळ प्रश्न ग्राहकाला विचारण्यापेक्षा हे उत्तम. चितळ्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे बासुंदीसारखा द्रवपदार्थ जर ग्राहकाने भांडे वा डबा नेला तरच दिला जातो. प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी नसलेल्या काळातही तो तसा दिला जात नसे. कदाचित यामागे पिशवी अनवधानाने फुटुन अन्न वाया जाऊ नये असा विचार असावा. स्वतःच्या उत्पादनाईतका विश्वास कदाचित प्लास्टिकचे डबे पुरविणार्यांवर नसल्यामुळे असेल पण ते अशा पदार्थासाठी डबे ठेवत नाहीत हे खरे, नपेक्षा त्याचे वेगळे पैसे मोजायला ग्राहकाची ना नसावी. हा एक अपवास सोडता चितळे ग्राहकाभिमुख आहेत हे खरे.
कुणाला 'रोख ठोक बोली पण चविष्ठ आणि चोख माला' पेक्षा 'मिठ्ठास बोली आणि सुमार माल' बरा वाटत असेल तर त्याने चितळ्यांकडे न जाणे बरे.
बाकी लेखाविषयी बोलण्यासारखे काही नाही, अवांतराबद्दल क्षमस्व..
+१
अतिशय टुकार लेख.
चितळे हा आज एक यशस्वी ब्रँड आहे. चितळे म्हणाल्यावर पदार्थाची गुणवत्ता ही बरोबरीने येतेच. पण काय आहे ना, कि मोठ्या लोकांवर चिखलफेक केली की आसुरी आनंद होणारी एक कॅटेगरी असते. त्याला काहीच करु शकत नाही. जाता जाता एक उदाहरण म्हणुन सांगतो, चितळ्यांच्या आम्रखंडासारखी चव दुसरीकडे कुठेही पाहिली नाही. मुंबईत अनेक गुजराथी, मारवाडी आवर्जुन चितळ्यांचेच आम्रखंड घेतात. आज मुंबईतील अनेक दुकानदार चितळ्यांचे प्रॉडक्ट्स भरभरुन विकायला ठेवतात. चितळ्यांइतका टॅक्स किती हलवाई भरतात ? आ़णखीही ब-याच गोष्टी आहेत पण एकदा चितळ्यांवर डोकं बाजुला ठेवुन बिनबुडाचे आरोप करायचे म्हणाल्यावर बाकी सर्व स्पष्टीकरण व्यर्थ ठरते.
प्रतिसाद आवडला
सदर लेखात चितळे किंवा त्यांच्या दर्जावर कुठलेही आरोप केलेले नाहीत.
----------------------------------------------------------------------------
हस्ताक्षर सुवाच्य नसल्याने वाचकांना त्रास देऊ इच्छित नाही.
तूर्तास स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
बाकी चव वगैरे मुद्दे तसे ठीक
बाकी चव वगैरे मुद्दे तसे ठीक पण
हे कुठून आलं मध्येच? की समर्थन करायचं म्हटल्यावर काहीही कैच्याकै मुद्दे उचलून धरायचे? या विधानाच्या पुष्ट्यर्थ काहीतरी विदा आहे की दिलं आपलं बिनबुडाचं ठोकून?
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
+१
+१११११
***************************************
- मन्या फेणे
अतिशय सहमत
मी मुंबईचा असूनही चितळ्याचा आणि इतरही अनेक पुणेकर दुकानदारांचा माज मला आवडतो. कारण असा माज अनेक वर्षे मालाची खात्री असल्याशिवाय करता येत नाही. अनेक गुजराथी आणि मारवाडी दुकानदारांना दर्जाचे सातत्य टिकवता येत नाही हा माझा अनुभव. दुसरा नेहमी उल्लेखाला जाणारा मुद्दा म्हणजे १-४ दुकान बंद. आता दुपारी दुकान उघडे ठेवायला ते काय हॉस्पिटल आहे काय? डॉक्टरदेखील आपला दवाखाना दुपारी बंद ठेवतात. आपापल्या कार्यालयात work-life balance हवा, मग दुकानदाराने ३ तास ते बंद ठेवले तर एवढा काय कहर कोसळतो.
हम्म
आम्ही दरवेळेस पुण्याला आलो की चितळ्यांच्या दुकानात जातो पण बाकरवडी खरेदी करत नाही. मोतीचुराचे अस्सल लाडु व
लाडवाइतके मोठे केशरी पेढे !!! बाकरवडी का घेत नाही असे कधीही चितळ्यांनी आम्हास विचारले नाही.
स्वाक्षरी: लता आणि आशा यांचा आवाज, हा माझ्या जगण्याचा श्वास आहे.
उगाचच इतका मोठ्ठा पकाऊ लेख
उगाचच इतका मोठ्ठा पकाऊ लेख लिहिलाय!! खिल्ली उडवण्याच्या प्रयत्नात स्वतःचीच उडवून घेतलीये (पुणे १ - मुंबई ०)
|| मी फक्त निमित्तमात्र आहे ||
खुनशी प्रतिक्रिया
एखाद्याने आपल्या मित्राची गंमतीत खेचावी इतपतच टीका, चेष्टा मूळ लेखकाने केलेली आहे. त्यात आकस वगैरे आढळला नाही. पण अनाहूतपणे चितळ्यांचा, सदाशिव पेठेचा आणि तमाम पुण्याचा मक्ता घेतलेले पुणेकर इतकी खुन्शी प्रतिक्रिया देताना बघून गंमत वाटली. बहुधा मुठेचे पाणी पिऊन असे आडमुठे लोक बनले असावेत. असो.
सहमत
सहमत
|| मी फक्त निमित्तमात्र आहे ||
सहमत (पुणे १ - मुंबई १ )!!!!
सहमत (पुणे १ - मुंबई १ )!!!!
|| मी फक्त निमित्तमात्र आहे ||
अनाहूतपणे?????????
अनाहूतपणे????????? बॉर्र!!!
चितळे मित्र का लेखकाचे, त्यांची एखाद्या व्यासपीठावर खेचायला? असेल असेल!!
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
हुप्प्या भाऊ, हे नवीन आहे का
हुप्प्या भाऊ, हे नवीन आहे का इथे ? हा धागा आठवतो आहे ना ?
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
सहमत.
@हुप्या,
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. फक्त शेवटचे विधान अनावश्यक आणि भडकाऊ आहे.
बरोबर आहे........
नाही तरी "चितळे" काय मिपा वाचत नाहीत . ( मग द्या ठोकून "कल्पनाविलास " अनुभव) .
आणि अतिशय महत्वाचे दुकानाची वेळ या बाबतचा सुधीर गाडगीळांचा लोकप्रभातला लेख वाचाच.
सही कशासाठी....
दुकानाची वेळ
त्यात काये.
दुपारी गिर्हाईके येत नाहित, तर कशाला दुकान उघडे ठेवा?
बेस्ट चिवडा
पुण्यातील लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा मला फार आवडतो. त्यासंबधी फोनवर चौकशी केल्यावर मालकांनी सांगितले कि हा चिवडा पुण्याबाहेर कुठेही विकला जात नाही आणि कुरिअरने पण पाठविला जात नाही.
तरी चितळे यांचा चिवडा आणि लक्ष्मीनारायण चिवडा यांचा कुणी पुणेकराने तौलनिक अभ्यास केला असल्यास त्या संबंधी माहिती द्यावी. चितळे यांचा चिवडा लक्ष्मीनारायण इतकाच किंवा त्याहून चांगला असण्याची शक्यता आहे आणि चितळे यांचा माल पुण्याबाहेरही बर्याच ठिकाणी मिळतो असे वर वाचनात आले म्हणून हि चोकशी .
लक्ष्मी नारायण
चितळ्यांचा चिवडा साधारण तसाच असतो. पण तरीही लक्ष्मीनारायण ला तोड नाही.
मला वाटतं चितळ्यांचा थोडासा तेलकट असतो. त्यांचाही चांगलाच आहे पण लक्ष्मी नारायण तो लक्ष्मी नारायण!
(आता पुण्याला आल्यावर शोधून लक्ष्मी नारायण चिवडा आणणं आलं! पुण्यातल्या पदार्थांची यादी वाढतेच आहे.)
अवांतरः हा पुणेरी खाद्यसंस्कृती चा लेख मस्त आहे. काही थोड्या उत्तम जागा विसरल्या आहेत पण एकूण आढावा आणि विशेष भाग छान आहेत.)
काँप्रिहेन्सिव्ह लेख आहे.
काँप्रिहेन्सिव्ह लेख आहे. आशिष चांदोरकरांच्या ब्लॉगवरतीदेखील या विषयावर बरेच काही लिहिले गेले आहे.
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
Pages