पहाट
सांज सकाळी
निळ्या आभाळी
कुठून येतो
पंखांना आवेग...
कृष्णसावळ्या
चित्रकथेतून
कसा विहरतो
जडावलेला मेघ!
लज्जाभरल्या
गालावरती
कशी उमटते
गोड गुलाबी लाली...
घरट्यामधल्या
त्या पिल्लांना
कोण सांगतो
उठा, पहाट झाली!
सांज सकाळी
निळ्या आभाळी
कुठून येतो
पंखांना आवेग...
कृष्णसावळ्या
चित्रकथेतून
कसा विहरतो
जडावलेला मेघ!
लज्जाभरल्या
गालावरती
कशी उमटते
गोड गुलाबी लाली...
घरट्यामधल्या
त्या पिल्लांना
कोण सांगतो
उठा, पहाट झाली!
-: पाय सरावले रस्त्याला :-
मी चाललो, चाललो इतका की
रस्ता ओळखीचा झाला
दुसरी वाट धरावी तर
पाय सरावले रस्त्याला ||ध्रू||
खाच खळगे नेहमीचे झाले
नवे नव्हते वाटले
अडथळे तसेच होते
पायात काटे खुपसले
काट्यांनी तरी जावे कोठे
त्यांना कोण सोबती मिळाला?
पाय सरावले रस्त्याला ||१||
अडचणी अनंत आल्या
उभ्या राहील्या समोर
नेट लावून सामोरी गेलो
प्रश्न अनेक पुढे कठोर
जंजाळ पसरले समोर असता
एक पक्षी अचूक उडाला
पाय सरावले रस्त्याला ||२||
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....
शब्द निरर्थाचे भोई
शब्द अर्थभार वाही
शब्द धूसर सावली
शब्द दाहक बिजली
शब्द कोरडा व्यापार
शब्द अस्तित्वाचे सार
शब्द व्योमापार शिडी
शब्द गहनडोही बुडी
शब्द अटळ कुंपण
शब्दापार मुक्तांगण
ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे
सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे
हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही
घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे
सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी
दावू नकोस आता ते घाव ओळखीचे
गावात बांधलेला वाडा उजाड आहे
पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे
सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही
खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे
निलेश देऊळकार
अडगाव बुll
9767888855
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?
चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?
पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?
पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?
कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....
-शिवकन्या
कान्हा !
कुठून रे अक्षरं आणू?
कसे शब्द बांधू?
कश्या भावना गुंफू?
हजार नावं घेऊ?
का शब्दब्रह्म गाऊ?
तुळशींनी सजवू?
मनमखरात बसवू?
का पंचप्राणंच अर्पू?
सगळंच उष्टावलयंस तू ?
कशाचा नैवेद्य दाखवू?
निळाईसंग उत्तुंग आभाळी,
सावळदंग अभंग सावली,
मिस्कीलढंग अनंग माऊली,
मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।।
सावरीत मुग्ध अलगुज,
ऐकवीत गुप्त हितगुज,
खेळवीत मुक्त गाईगुजं,
प्रकटीत तृप्त आत्मगुज ।।
महापूर
वरुणराजाच्या अंतरी आले |
काळे मेघ जमा केले |
अचानक बरसु लागले |
भूमीवरी ||1||
पाऊस पडला मुसळधार |
तंव नद्यांना आला पूर |
बुडाली खेडी आणि शहरं |
तयांमध्ये ||2||
सांगली आणि कोल्हापूर |
तेथे आला महापूर |
कित्येकांचे घर संसार |
वाहून गेले ||3||
पाण्याची पातळी वाढता |
लोकांची वाढली चिंता |
पुढे काय होईल आता |
कळेना काही ||4||
पुराचे पाणीजेंव्हा वाढले |
लोकं घरात अडकुन पडले |
कोणी गच्चीवरती चढले |
भिती पोटी ||5||
भैरव वा भटियार
पहाट फुलवत येती,
स्पर्श जणू कान्ह्याचे
राधेला उठवुन जाती.
ठाऊक तिला सारंग
माध्यान्ही झुलवत येतो,
"गंध" न त्यास स्वत:चा
तरि वृंदावनी घमघमतो.
यमन असा कान्ह्याचा
यमुनेचे श्यामल पाणी.
निनाद गोघंटांचा
सांज करी कल्याणी.
मालकंस वा जोग,
अमृत बरसे गात्री.
कान्ह्याच्या ओठी वेणू
तिच्याचसाठी रात्री.
कणकणात भिनली आहे
मल्हाराची आस,
मेघ पेटवून जातो
मयूरपंखी प्यास.
पण सूर भैरवीचा का
राधेला माहीत नाही?
युगे उलटली, अजुनी
राधा तर वाटच पाही..
।। श्रावणसरी ।।
भिजून गेल्या फांद्यांवरती, बसूनी सहजच गाती पक्षी,
अलगद जाई वाऱ्यावरती, सप्तसुरांची मोहक नक्षी ।
सुईसारख्या चोचींमधुनी, दशदिशांना निरोप जाती
साद घालती कोणा कळेना, दूरदूरची ओवून नाती ।
फुलांफुलांचे श्वास टिपुनी, दूरदूर हे वायू वाहती,
परागमोहित किटक येऊनी, मकरंदाची गाणी गाती ।
वसुंधरा ही नटुनीसजुनी, पशुपक्ष्यांना ठेवी भुलवुनी,
भेट घेण्या तिच्या नायका, सकलसृष्टीला जाई घेऊनी ।
त्यांस मिळाले निरोप नकळत, तरी अजुनी दर्शन नाही,
एका सरीचीच मिठी देऊनी, पुन्हा पुन्हा तो निघून जाई।