'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.'
'बरं पोट निट साफ होते का?'
'नाही ना डॉक्टर.'
'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.'
' डॉक्टर याने काय होईल?'
'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके.
आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करायच्या आहेत.'
_________________________________________
१६ व्या दिवशी....
'डॉक्टर, तुम्ही खरेच ग्रेट आहात.'
'☺'
'चमत्कार झाला असल्यासारखे वाटते आहे. आता मी त्या सर्व टेस्ट करू शकतो का?'
' आता टेस्ट करण्याची काही आवश्यकता नाही.'
'पण डॉक्टर तुम्हीच म्हणाला होतात कि......'
'एक मिनिट मला आता एक प्रश्न विचारू द्या पूर्वी होणारे सर्व त्रास नक्की थांबले आहेत ना?'
'अगदी १००% आता काहीच त्रास नाहीये. पण असे का विचारले?'
'तेच आता सांगणार आहे तर तुम्ही फेसबुक, व्हाटस अप,हाईक वापरता ना?'
'अगदी फेसबुकवर माझे ४९२० फ्रेंड आहेत अजून ८० फ्रेंड्स झाले कि ५,००० फ्रेंड्स होतील. व्हाटस अप वर शालेय मित्रांचा,कॉलेज मित्रांचा,व्यावसायिक मित्रांचा,सासर कडील नातेवाईक,इकडचे नातेवाईक असे खुप गृप आहेत काहींवर तर मी admin आहे. अगदी पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत गपशप चालू असते.'
'म्हणजे सकाळी बेडवर असताना,नाष्टा करताना,जेवण करताना, तसेच दिवसभरात अधेमधे वेळ मिळेल तसे फेसबुक, व्हाटसअप वर जावेच लागत असेल ना?'
'हे काय विचारणे झाले का डॉक्टर? आज सोशल नेटवर्कवर आपण कितीतरी जवळ आलो आहोत कधी भेटणे होईल का? असे वाटणारे आज सोशल नेटवर्कवर भेटतात गप्पा गोष्टी, माहितीची देवाण घेवाण,वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होते. मी तर म्हणेन अन्न,वस्त्र,निवारा आणि इंटरनेट ह्याच माणसाच्या खऱ्या गरजा आहेत.'
'ओके, तर गेली १५ दिवस इंटरनेटसाठी किती वेळ दिला आहे?'
'कसला वेळ दिला? डॉक्टर तुम्ही दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायला सांगितल्या मुळे गेले १५ दिवस मात्र इंटरनेट वापरताच आले नाही.'
'वेल,म्हणजे सकाळी जाग आल्यावर बेडवर असताना गुड मॉर्निंग करणे रात्री मिस झालेले मेसेज चेक करणे,नाष्टा करताना लाईक-कमेंट करणे,जेवण करताना पोस्ट वाचणे, तसेच दिवसभरात अधेमधे वेळ मिळेल तसे फेसबुक, व्हाटसअप वर काहीतरी शेअर करणे असेच ना?'
'डॉक्टर मोकळा वेळ तेंव्हाच मिळतो बाकी पोटापाण्या साठी काम तर करावेच लागेल ना?'
'म्हणजे सकाळी बेडवर असताना,नाष्टा करताना,जेवण करताना, तसेच दिवसभरात अधेमधे वेळ मिळेल तसे फेसबुक, व्हाटसअप वर चक्कर मारायला वेळ मिळतो का?'
'डॉक्टर तेच तेच काय विचारता आहात?'
'हा...हा..हा.. गेल्या १५ दिवसात तुम्हाला शांत झोप आली.जेवण निट झाले.मन प्रसन्न असल्यासारखे वाटले बरोबर ना?'
'डॉक्टर तुम्हाला काय म्हणायचे आहे हेच मला समजत नाहीये.मी टेस्ट करू का?असे विचारले तर तुम्ही वेगळाच विषय बोलत आहात.'
'मी कोठे वेगळे काही बोलत आहे.तुम्हीच जरा गेल्या १५ दिवसांचा आणि १५ दिवसांपूर्वीचा दिनक्रम आठवा आणि त्यावर शांतपणे विचार करा.'
'मी समजलो नाही.'
' तुम्ही १५ पूर्वी सोशल नेटवर्क वापरत होता आणि गेल्या १५ दिवसांत सोशल नेटवर्क वापरताच आलेले नाहीये यात तुम्हाला काही वेगळे वाटत नाहीये का?'
'हां.. हां. तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे हे आत्ता लक्षात येत आहे.'
'अगदी तेच हो अगदी तेच कारण आहे.'
'डॉक्टर जरा सविस्तर सांगा ना.'
'ओके,इंटरनेटचे विश्व आणि आपले प्रत्यक्ष आयुष्य यात एक धूसर अशी सीमारेषा आहे आणि तीच खुप जणांना दिसत नाहीये.जशी दोन देशात कडेकोट बंदोबस्त असलेली LOC असते तशीच एक LOC या दोन विश्वात असणे गरजेचे आहे. आपल्याला वाटते कि आपण सर्वांच्या संपर्कात असावे सर्वांशी कनेक्ट असावे. पण आपल्या मेंदूमध्ये आणि प्रत्यक्ष आयुष्यात काही गोष्टी अनावश्यक असल्या तर दोन्हींना त्याचा काहीच उपयोग नसतो त्याचा त्रासच जास्त असतो. म्हणजे पूर्वी आपण वर्तमान पत्र वाचत असे त्यात आलेल्या बातम्या कधी आनंददायक तर कधी त्रासदायक असत.काही आपल्या आयुष्याशी निगडित असत तर काहींचा काडीमात्र संबंध नसे आणि आपला मेंदू तशी विभागणी करून त्या गोष्टी मेंदूत साठवून ठेवत असे.थोडक्यात आपण या ४ बातम्या पाहूया ..
१)मध्यरात्री नंतर पेट्रोल महाग होणार,
२)सेन्सेक्स गडगडत आहे त्यामुळे सोन्याचे वाढण्याची शक्यता आहे.
३)उद्या ढगांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता.
४)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युरोप दौऱ्यावर.
आता पेट्रोल महाग होणार असेल तर आपण संध्याकाळी घरी येताना पेट्रोल भरून आले पाहिजे हि सूचना साठवली जात असे.
पण सेन्सेक्स गडगडत आहे त्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे असे जरी वाचले तरी आपण संध्याकाळी लगेच सोने खरेदी करावे असे मेंदूत साठवले जात नसे पण सोन्याचा भाव वाढणार आहे एवढेच साठवले जात असे.
उद्या पाऊस होणार मग रेनकोट,छत्री इत्यादी आवश्यक गोष्टी लगेच अमलात आणल्या जाव्यात अशी सूचना मेंदू शरीराला देत असे.
आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर जाणार हि बातमी साठवलीच जात नसे.
कारण आपल्याला काय आवश्यक आहे आणि काय नाही याची मेंदू मध्ये लगेच विभागणी होऊन तसे होत असे.
पण आपण जसे सोशल नेटवर्कवर आलो तसे
१)मध्यरात्री नंतर पेट्रोल महाग होणार,
२)सेन्सेक्स गडगडत आहे त्यामुळे सोन्याचे वाढण्याची शक्यता आहे.
३)उद्या ढगांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता.
४)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युरोप दौऱ्यावर.
या सर्व गोष्टींवर चर्चा,वादविवाद होऊ लागले. सनातनी-पुरोगामी,समर्थक-विरोधक,भक्त-आपटार्ड, पप्पू-फेकू हे शब्द म्हणजे ठिणग्या ठरू लागले आहेत.
आपले दैनंदिन आयुष्य सुद्धा नेमके याच विषयांभोवती फिरू लागले आहे.
एवढेच नव्हे तर मैत्री-नाते-व्यवहार सुद्धा आपल्या मतांशी सहमत असेल तरच होऊ लागले आहेत थोडा जरी विरोध जाणवला कि लगेच ब्लॉक करणे ,संबंध तोडणे हे प्रकार वाढू लागले आहेत.
आता याने होते काय तर ज्या गोष्टी विसरल्या पाहिजेत किंवा ज्यांचा तसा आपल्या आयुष्याशी प्रत्यक्ष संबंध येणार नाहीये अशा गोष्टीच आपल्या मेंदूत साठवल्या जात असल्याने चिडचिड वाढली आहे.सारखे ऑनलाईन राहण्याच्या सवयीने मेंदूला,मनाला,एवढेच काय शरीराला सुद्धा विश्रांती मिळत नसल्याने शारीरिक,मानसिक व्याधी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
म्हणूनच प्रत्येकाने सोशल लाईफ व रिअल लाईफ यात एक LOC नक्की आखावी आणि तिचे पालन दोन देशांसारखे कडेकोट करावे.'
'अरे बापरे खरेच कि अगदी बरोबर बोलला आहात.'
'मग तुम्ही सोशल लाईफ व रिअल लाईफ यात एक LOC नक्की करताय ना?'
'डॉक्टर,
कल करे सो आज कर आज करे सो अब.
यानुसार आतापासूनच एक LOC तयार झाली आहे.'
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 1:36 pm | ब़जरबट्टू
विचार करायला लावणारा लेख आहे तसा.. :)
31 Mar 2016 - 2:38 pm | नाखु
अभासी जगातील आणि प्राचीन्/अर्वाचीन गोष्टींवरून अगदी भुस्काट चर्चेखोर आठवले.
पुलेशु
31 Mar 2016 - 2:07 pm | स्पा
छान लिहिलंय
31 Mar 2016 - 2:21 pm | gogglya
शास्त्रीय आधार आहे का?