कण
नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो.