पार्टी
सुगी संपली आणि ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. सालाबादप्रमाणे गावोगावचे मजूर ऊसतोडीसाठी निघाले. आमच्या गावातील काहीजण दूरदूरपर्यंत जायचे.त्यांच्या नेण्याआणण्याची आणि रोजंदारीची व्यवस्था शेजारच्या गावातील काही जण करायचे. त्यांना मुकादम म्हणतात. आठ दहा टोळ्या त्यांच्या हाताखाली असतात. कामगारांची ने आण करायला तेव्हा ट्रक नव्हते. या टोळ्या रबरी टायरची चाके लावलेल्या बैलगाड्यांमधून उसाची वाहतूक करीत. अशा टोळ्या आमच्या गावावरून निघाल्या कि त्यांची ती भलीमोठी रांग पाहायला भारी मजा यायची. बैलांच्या गळ्यातील घुंघरमाळांची ती कलकल ऐकून कितीतरी वेळा भान हरपून जाई. आजही तिचा आवाज माझ्या कानांमधे घुमतो.