मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाचता वाचता वाढे.....

पुस्तकमित्र ·

आतिवास Mon, 06/30/2014 - 22:21
कल्पना चांगली आहे. पण फक्त 'कादंबरी'पुरतं विश्व मर्यादित करण्याचा उद्देश समजला नाही. महिनाभरात जे काही वाचलं त्यावर लिहायचं असं ठरलं असतं तर जास्त सोपं झालं असतं लिहायला.

In reply to by आतिवास

पुस्तकमित्र Tue, 07/01/2014 - 09:44
ही फक्त सुरुवात आहे. साहित्यप्रकाराच्या विविध प्रकारांना स्पर्श करतच ही मालिका पुढे पुढे सरकत राहणार आहे. अर्थात आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेच.

सुरुवात म्हणून कादंबरीचे नाव - आनंदी गोपाळ लेखक - श्री. ज. जोशी भारताबाहेर जाऊन पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकलेल्या डॉ. आनंदी बाई गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा सुद्धा जेव्हा गुन्हा समजला जात होता, त्या काळात नवऱ्याच्या हट्टामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते पुढे वैद्यकीय पदवी मिळेपर्यंतचा प्रवास यात वाचायला मिळतो. गोपाळरावांच्या विक्षिप्तपणाचा त्यांना झालेला त्रास, तरीही जिद्दीने पूर्ण केलेले शिक्षण आणि दुर्दैवाने या सगळ्याला तोंड देताना ओढवलेला शेवट. पुस्तक वाचून आनंदी बाईंच्या प्रतीचा आदर अधिक दुणावतो. त्या काळातले स्त्रियांचे समाज जीवन, संघर्ष, गोपाळ रावांचे काळाच्या पुढचे विचार आणि तरीही अनेक बाबतीत दिसणारा दुराग्रहीपणा, सगळे काही सुन्न करून टाकते. मला आवडलेल्या पुस्तकांपैकी एक.

In reply to by पैसा

मस्त कलंदर गुरुवार, 07/03/2014 - 11:26
अगदीच काल्पनिक नसली तरी बरेचसे प्रसंग खोटे आहेत. अंजली कीर्तने यांनी त्यांच्या आनंदीबाई: काळ आणि कर्तृत्व या कादंबरीत ससंदर्भ लिहिले आहे.

In reply to by मस्त कलंदर

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 14:33
या कादंबरीविषयी माहिती नव्हती. आनंदीबाईंच्या व्यक्तिरेखेविषयी अजूनही वाचायला आवडेल. त्यामुळे कधी जमल्यास पुन्हा दोन्ही वाचेन. धन्यवाद.

शुचि Mon, 06/30/2014 - 23:23
"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००-१५० पानी, छोटेखानी पण जबरदस्त पुस्तक वाचते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पुस्तक आहे. अर्धे वाचून झाले आहे. डॉक्टर अन त्यांच्या पत्नी मिल्ड्रेड यांनी जंगलमय्/रानटी भागात घर घेतले. दोघांना पक्षी नीरीक्षणाची अतिशय आवड. एके दिवशी पहातात तो काय क्वेल मादी व क्वेल(quail) नर दोघे खुरडत खुरडत, जखमी असल्यासारखे चालले आहे. ताबडतोब त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील पालकांच्या अतिव शौर्याचे उदाहरण ते पहात आहेत. आपल्या पिलांवर लक्ष जाऊ नये म्हणून हे दोघं क्वेल स्वतःकडे लक्ष वेधून घेत होते. मग डॉक्टर व मिल्ड्रेड सुरक्षित अंतरावर गेले अन क्वेल आई तिच्या १२ पिलांना घेऊन गेली. पण गंमत ही झाली की क्वेलच्या चिमुकल्या व व्यवस्थित लपवलेल्या घरट्यात त्यांना एक अंडे सापडले. ते अंडे त्यांनी दिव्याच्या ऊबेत्/प्रकाशात ठेवले असता ते ऊबले, फुटले व इवलसं ओलं बंबलबी च्या आकाराचं पिलू अंडं फोडून बाहेर आलं. १५ मिनीटात ते पटापट सुकलं अन आक्रोडाच्या आकाराचं दिसू लागलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं बॉबी व्हाईट. पण मग अजून भारदस्त नाव हवं म्हणून ते "रॉबर्ट" या नावात बदललं. मग या दांपत्याने रॉबर्ट्पाशी लहान वाटुलीत दाणा-पाणी ठेवले.आता कोणाला वाटेल की पिलाला जबरदस्तीने खायला घातलं असेल पण नाही हे पिलू ८ तासानंतर स्वतःचे स्वतः खाऊ-पीऊ लागले. फक्त एकदाच त्याला मदत लागली ती म्हणजे त्याची चोच पहील्यांदा पाण्यात बुडवायला. मग मात्र ते स्वावलंबी झाले. मग त्या पिलाचे स्वभाववैशिष्ट्य, गुणविशेष सगळे पुस्तकातून उलगडू लागतात अन एका क्वेलला किती अक्कल असते, माया असते, लळा असतो इतकेच काय आवडीनिवडी/ पसंत-नापसंत असते ते वाचून थक्क व्हायला होते. हळूहळू रॉबर्ट्ला सुंदर ठीपक्या ठीपक्यांची पिसे आली, तो वयात आला, वगैरे मोहक्/रोचक वर्णने येतात. पुस्तक अक्षरक्षः खाली ठेववत नाहीये. अ‍ॅमेझोनवर ६६ - ५ चांदण्या मिळालेले हे पुस्तक नशीबाने ग्रंथालयात "चकटफू" विभागात मिळाले. बसमध्ये, घरात, ऑफीसात लंच टाइम मध्ये वाचन सुरु आहे.

In reply to by आतिवास

एस Wed, 07/02/2014 - 19:42
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमॅझॉन दोन्हींवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर महाग आहे. दुवे - http://www.flipkart.com/that-quail-robert/p/itmczyn6bphxd6xu?pid=9780060812461&otracker=from-search&srno=t_1&query=that+quail+robert&ref=ce523a93-e6e0-440c-bf35-4fa5130ff2cb http://www.amazon.in/That-Quail-Robert-Margaret-Stanger/dp/006081246X/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1404310224&sr=8-1&keywords=that+quail+robert

योगविवेक Tue, 07/01/2014 - 00:44
... वाचता वाचता वाढे... मित्रांनो, नुकतीच अंधार छाया कादंबरी वाचली.आवडली. लेखक - मिपाकरांच्या परिचयाचे. शशिकांत ओक. विषय - अर्थात ऑकल्ट सायन्सेस... ही छोटेखानी कादंबरी ईबुक म्हणून उपलब्ध. पाने फक्त ७०-७५. समर्पक मुखपृष्ठ संकल्पना... कादंबरीतील अंधार छायेला रेखाटणारी... कादंबरी सत्य घटनेवर आधारित असा लेखकाचा दावा. त्याला पूरक त्यातील पात्रे व व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कशा आहेत त्यांचे फोटो व सध्याचे जीवनयापन या बाबी कादंबरी वाचकांना नाविन्यपुर्ण आहेत. बलस्थाने- १. बोली भाषेतील घरगुती संवाद, २. आत्मकथन शैलीमुळे व्यक्तीरेखेच्या मनातील संवादातून कथानक पुढे सरकवायची लेखकाची खुबी. ३. विचित्र घटनांचे आवेग, त्यातून फुलणारे नाट्यमय प्रसंग हाताळताना निर्माण भावनांचा कल्लोळ. ४. या अकल्पित घटनांमागील कार्यकारण भाव शोधणारी दादा व्यक्तिरेखा अनेक अंगांनी पुढे येते . ५. जपसाधना करणे ही फावल्या वेळातील म्हातारपणचा विरंगुळा नसून योग्य प्रकारे केल्यास अनाकलनीय शक्तींचा यशस्वी प्रतिकार करता येतो याची प्रचीती देणारे विचार व अनुभव श्रद्धा आणि सबूरीला बळकटी देतात. ६. लेखकाचे मनोगत बरेच काही व्यक्तिगत जीवना बद्दल सांगून जाते. दुर्बल स्थान - सुरवातीला संथपणा व पात्रांची ओळख गोंधळात टाकणारी. यावर तोड म्हणून लेखकाने पात्रांची ओळख मनोगत प्रस्तावनेत करून दिली आहे. रंजक व विचार करायला लावणारी वैशिष्ट्य पूर्ण कादंबरी...

अर्धवटराव Tue, 07/01/2014 - 10:06
गिरीश कुबेरांचं "युद्ध जीवांचे"... तसं बरच काहि सांगता येईल पुस्तकाबद्दल. एका वाक्यात सांगायचं तर बारुदच्या ढिगावर बसुन मक्याची कणसं भाजत बसणार्‍या आजच्या जगाची कहाणी आहे ति. जैवीक अस्त्रांचं संशोधन, गेल्या शतकभरातला त्यांचा वापर, अगदी गल्लीबोळातल्या दादा लोकांपर्यंत त्यांचा वापर, रासायनीक युद्धं व प्रदुषण... सर्वच एकदम खतरनाक.

आतिवास Tue, 07/01/2014 - 16:31
ही छोटेखानी (फक्त ६३ पानं) कादंबरी वाचून झाली. मूळ कादंबरी "नग्न रुख" (ओ.पी. शर्मा 'सारथि') डोगरी भाषेत आहे. इंग्रजी अनुवाद श्री. शिवनाथ यांनी केला आहे. या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत (कादंबरीमधली व्यक्तिरेखा). जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन.. विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही. 'राग दरबारी' या माझ्या अत्यंत आवडत्या हिंदी कादंबरीबद्दल मी यापूर्वी इथं लिहिलं आहे. बाकी अजून सांगण्याजोगं पुष्कळ आहे - नंतर सांगते :-)

प्रचेतस Tue, 07/01/2014 - 16:41
जैत रे जैत.. गोनीदांच्या कर्नाळा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील ही छोटेखानी पण तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर. ठाकरांच्या जीवनशैलीचे मनोज्ञ दर्शन गोनीदांनी आपल्या चित्रदर्शी शैलीत सादर केले आहे. नाग्या, चिंधी हे कथानायक्/नायिका तर अक्षरशः मनावर गारूड करून राहतात. ह्या कादंबरीतला एक सुंदर उतारा देतो. पावसकाळातल्या कर्नाळ्याचे बदललेल्या दर्शनाचे वर्णन करत असताना गोनीदा कसे आपल्या लेखणीचेही सौंदर्य प्रकट करतात ते पहा. हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत. मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो. मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे. मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो. पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

In reply to by प्रचेतस

सागर Mon, 07/07/2014 - 00:19
अतिशय सुंदर प्रकटन वल्ली मित्रा
तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर.
याबद्दल पूर्ण सहमत. आकार छोटा असूनही कादंबरी जे चित्र वाचकांसमोर उभे करते ते खरोखर अफलातून आहे. चित्रपटही सुंदर झाला आहे, पण वाचनानंद जास्त सुंदर आहे.

In reply to by सागर

कवितानागेश Mon, 07/07/2014 - 09:22
चित्रपटात फक्त स्मिता पाटील असल्यानी तो बघवतो, असं माझं टोकाचं मत आहे. ती बरोब्बर 'चिन्धी' दिसते. बाकीचे सगळे 'शहरी' दिसतात. आपण 'ठाकरं' बघतोय असं वाटत नाही. कादंबरी सुंदरच आहे. कधीही हातात घेउन कुठूनही वाचायला सुरुवात करता येते.

Gayatri Muley Wed, 07/02/2014 - 11:10
हर्षदा भुरे यांची अबोल नात ही एक अतिशय सुंदर मनोरमा प्रकाशनाची कादांबरी. 100-150 पानी च असेल, पण मनाला भावून टाकनारी...!!!! मी तर हातात घेतली अन् 5-6 तासात संपवून टाकली होती... तुम्हाला ही मिळाली तर नक्की वाचा....

In reply to by Gayatri Muley

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:33
हं! मराठीतले नवे लेखक-लेखिका फारसे माहिती नसतात आजकाल मला. त्यामुळे हे नाव नवे आहे माझ्यासाठी!

विकास Wed, 07/02/2014 - 19:50
कादंबरी विषय असल्याने गंगाधर गाडगीळांनी लिहीलेली "दुर्दम्य" ही चरीत्रात्मक लोकमान्य टिळकांवरील कादंबरी आठवली. दोन-तिनदा तरी वाचलेली आहे. प्रभावी लेखन आणि संशोधन/अभ्यासावर आधारीत आहे. दोन खंडात आधि मिळायची. मध्यंतरी अमेरीकेत येताना नव्याने एकाच पुस्तकात, ते देखील हार्डकव्हर मधे मिळाल्याने घेऊन आलो. नंतर पाहीले तर मधली काही पाने कोरी! :( दुसरी कादंबरी: "यज्ञ" - भा.द.खेर आणि शैलजा राजे यांनी एकत्रित लिहीलेली सावरकरांवरील चरीत्रात्मक कादंबरी. आठवते त्या प्रमाणे, सावरकरांच्या अखेरच्या काही वर्षांमधे त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावर आधारीत "आत्मकथन" स्टाईल मधे लिहीलेली कादंबरी आहे. दोन्ही वास्तवाला धरून आहेत.

विकास Wed, 07/02/2014 - 20:06
गेल्या काही वर्षात वाचलेली एक कादंबरी म्हणजे, "हंगर गेम्स"! लेकीच्या आग्रह केला म्हणून वाचली. वयात येणार्‍या मुलांना थ्रिलर वाटावी अशी कहाणी ज्यावरचा चित्रपट कदाचीत तुम्ही पाहीला असेल. पण एकंदरीतच हिंसा अंमळ जास्तच आणि अतिरंजीत वाटली. पण विशेष अर्थ न काढता, कल्पनाविष्कार म्हणून चांगली आहे. विज्ञान कादंबरी मालीका म्हणून आयझॅक अ‍ॅसिमोव्हची "फाउंडेशन" पुस्तक सांगेन. सायको हिस्ट्री, रोबोटीक्स अशा संकल्पना मांडत मांडत शेवटी "आपण सगळे एक आहोत" (वसुधैव कुटुंबकम) मानणार्‍या "गया" नामक तत्वज्ञानापर्यंत जाणारी कथा वाचण्यासारखी आहे. या लेखात मिपावरच अधिक लिहीले होते. "violence is the last refuge of the incompetent" हे त्यातले एक रोचक वाक्य. (त्यावर आधारीत नंतर "intellectual violence is the last refuge of the intellectually incompetent" असे म्हणले गेले. ;) आर्थर सी क्लर्कचे २००१ ए स्पेस ओडीसी पण वाचले नसल्यास अवश्य वाचा. स्पेस एक्स्प्लोरेशनच्या आधीचे कल्पनाशक्तीवर केलेले स्पेस एक्स्प्लोरेशन, महासंगणक हॅल ("HAL") आणि शेवटी कुठेतरी जन्म - मृत्यूचे चक्र मानण्याकडे वळलेले तत्वज्ञान वाचताना एकाकीपण येते. चित्रपट पहाताना देखील असेच होते.

In reply to by आदूबाळ

विकास Wed, 07/02/2014 - 20:29
हिचहायकर्स गाईड टू द गॅलेक्सी हे अजून वाचायचे राहीले आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! :) अर्थात त्याची आणि फाउंडेशनची तुलना करू इच्छित नाही.

In reply to by एस

एस गुरुवार, 07/10/2014 - 14:11
'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्'

     अरूंधती रॉय यांची ही एकोणिसशे सत्त्याण्णव सालची मॅन बुकर पारितोषिक विजेती इंग्रजी कादंबरी.

TheGodofSmallThings     कादंबरीतील मुख्य घटना घडतात १९६९ साली. पण जेव्हा कादंबरीतील पात्रांमधील दोन जुळ्या भावंडांपैकी 'राहेल' वयाच्या एकतिसाव्या वर्षी 'अयमेनम हाउस' या तिच्या आजोळच्या घरी परत येते तेव्हा कादंबरीची सुरुवात होते. राहेल आणि तिचा अठरा मिनिटांनी मोठा असलेला जुळा भाऊ 'एस्था' यांच्याभोवती आणि त्यांच्या भावविश्वात घडत राहणार्‍या छोट्यामोठ्या गोष्टींची दोलायमान गुंफण लेखिका तिच्या वाचकांभोवती विणत राहते. त्या दोघांच्या आणि प्रामुख्याने राहेलच्या सात-वर्षे-वयाच्या संवेदनशील नजरेतून आपल्यासमोर कादंबरीचा पट उलगडत जातो.

     पण असे असले तरी या कथानकाचा कर्ता प्रथमपुरुषी नाही. लेखिका एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे फ्लॅशबॅक, लांबलेली उपकथानके, लहान मुलांना असते तेवढी समज आणि त्यातून त्यांना त्यांच्या निरागस नजरेने दिसणारे कठोर जग, त्यातून त्यांनी आपल्या परीने स्वतःच शिकलेले शहाणपण, तथाकथित मोठ्यांचा तितकाच दांभिक व्यवहारीपणा, भारताचा जातिव्यवस्थेच्या, स्पृश्यास्पृश्यतेच्या कठोर सामाजिक वास्तवाची आणि राजकीय-आर्थिक बदलांची सरमिसळ, त्यात होरपळणारे निर्दोष समाजघटक, वसाहतवादी इतिहासातून स्वातंत्र्यात येताना अ‍ॅन्ग्लोफाइल उच्चभ्रू वर्गाला भेडसावणारा त्रिशंकू सिंड्रोम, निसर्गाची मुक्त अर्थव्यवस्थेत येताना झालेली वाताहत आणि कादंबरीतील पात्रांच्या जीवनाच्या अवमूल्यनाशी याचा दिसणारा समांतरपणा या सगळ्या कथाबीजांचा, पात्रांचा, पार्श्वभूमीचा आणि लेखनतंत्राचा वापर करून काळाच्या पटलावर पुढेमागे तिच्या लेखणीचे स्वैर फटकारे मारीत राहते...

     कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ही दोन जुळी भावंडे. त्याबरोबर कादंबरीत येणारी विविध पात्रे त्यांच्या अनावृत्त वृत्ती-प्रवृत्तींसह आणि कथानकातील घटनांच्या त्यांच्यावरील परिणामांसकट वाचकाला पदोपदी भेटतात. एस्था आणि राहेल यांची घटस्फोटीत तरूण आई 'अम्मू', त्यांचे रागीट आजोबा व सहनशील आजी, त्यांचा ऑक्सफर्डवरून शिकून परत आलेला आणि आजीचा व्यवसाय सांभाळणारा मामा 'चाको', त्याची पूर्वाश्रमीची इंग्लिश पत्नी 'मार्गारेट' आणि गोरीपान मुलगी 'सोफी', अविवाहित राहिलेली आणि त्यांच्याशी फणकार्याने वागणारी त्यांच्या आईची आत्या 'बेबी कोचम्मा', पोलिस निरीक्षक आणि मार्क्सिस्ट नेता अशी माणसे आणि सर्वात महत्त्वाचा या सगळ्यात त्यांच्याशी प्रेमळपणे वागणारी एकमेव व्यक्ती अस्पृश्य कामगार 'वेलुथा'.

     दारुड्या नवर्‍याला सोडून परत आलेली अम्मू आपल्या दोन मुलांसकट तिच्या माहेरी रहायला येते. तिच्या रागीट बापाला आणि आत्याला ते आवडलेले नसते. याचा परिणाम म्हणून त्यांचे अयमेनम हाउसमधील स्थान नेहमीच दुय्यम राहणार असते. अम्मूची अविवाहित आत्या बेबी कोचम्मा हिने कधी काळी 'नन' बनण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या निर्णयामागे देवाची भक्ती नसून तिला तेव्हा भेटलेला कुणी फादर मुलिगन आणि तरूण नवोमीचे त्याच्याकडे आकर्षित होणे असते. हा प्रेमभंग नंतर तिचे कठोर व्यक्तिमत्त्व बनण्यास आणि अम्मूच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणार असतो का? की त्यांचा मामा चाको आणि त्याचा विक्षिप्त गर्विष्ठपणा? चाको ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकतानाच एका इंग्लिश वेट्रेसच्या, मार्गारेटच्या प्रेमात पडलेला असतो. पण मार्गारेटच्या पालकांना तिने एका काळ्याशी, भारतीयाशी लग्न करावे हे आवडलेले नसते. पण हे लग्नही जास्त टिकत नाही. चाको आणि मार्गारेटच्या मुलीच्या - सोफीचा जन्मानंतर ते विभक्त होतात. मार्गारेट गरोदर असतानाच दुसर्‍याच्या प्रेमात पडलेली असते. वैवाहिक आणि शैक्षणिक अपयश पदरात घेऊन चाको भारतात परततो ते घरचा लोणची बनवण्याचा व्यवसाय सांभाळायला. आता तो एक श्रीमंत उद्योजक म्हणून आपल्याला भेटतो. इकडे इपे कुटुंबाचा परंपरागत वृद्ध नोकर वेल्ल्या पापेन आणि त्याचा तरूण मुलगा वेलुथा हे त्यांना जातिव्यवस्थेने मिळालेली अस्पृश्यता आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील खालचे स्थान सांभाळत जगत असतात. वेलुथा काहीसा बंडखोर आहे. तो मार्क्सवादी असल्याचा बेबी कोचम्माला आणि इन्स्पेक्टरला संशय आहे. त्यामुळे बेबी कोचम्माला वेलुथाबद्दल अनामिक भीती वाटतेय. तीच भीती जी सामर्थ्यवान घटकाला दुर्बल घटकांबद्दल सतत वाटत राहते, दुर्बल पुढेमागे सबल होऊन त्यांची सत्ता उलटून देतील अशी भीती. हीच भीती पुढे वेलुथाला आणि तो प्रेम करत असलेल्या जुळ्या भावंडांना व त्यांच्या तरूण आईला उद्ध्वस्त करणार असते का?

     त्या रात्री काय घडले? घुसमट आणि अन्याय यांपासून कुठले जीव पळू पाहत होते? कोणाच्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिण्याचे धाडस केले ज्या स्वप्नांना इतिहासाच्या नियमचौकटींची मान्यता नव्हती? कुठले चिमुकले हात त्या रात्री बोट उलटल्यावर अनोळखी पाण्यावर परत आले नव्हते? त्या अंधार्‍या झाडीत कोणाच्या डोळ्यांनी एक गुन्हा पाहिला होता ज्या गुन्ह्याचे साक्षीदार होण्याचे अपील परिस्थितीच्या न्यायव्यवस्थेने त्यांना झिडकारले होते? लहानग्या, शहाण्या एस्थाने उरलेल्या आयुष्यभर अबोलपणे वावरावे असे त्याला काय बोलायला लावले गेले साक्षीदाराच्या कठड्यात?

     गुन्हा काय होता? कोणी केला होता? कोणाला शिक्षा झाली आणि कोण मेले त्या रात्री?

 

     रॉय यांची लेखणी परंपरेने चालत आलेली लेखनाची चौकट नाकारते, उलटून लावते. त्यांची भाषा कधी अल्लड निरागसतेने कर्मठ वाचकांना त्रास देत व्याकरणाचे-शुद्धलेखनाचे नियम तोडते, तर कधी स्थितप्रज्ञाच्या गांभीर्याने इतिहासातून उतरलेले धागे विणत मानवी आयुष्याचा त्यासमोरचा क्षुद्रपणा दाखवत या नाट्यावर भाष्य करते. कादंबरीची पानेही पारंपारिक एकमार्गीपणा नाकारतात. यातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रसंग कालाच्या पटलावर एकसुरीपणे आपापली जागा घेत असला तरी कादंबरीत मात्र सर्व सोबतच येत राहते. मग तो त्र्याण्णव सालचा राहेल परत आल्यावर तिला दिसलेला अबोल एस्था असो वा एकोणसत्तरचा विमानतळावर सोफीमोल आणि मार्गारेटला आणायला जाणारा 'घरातील पुरुष' मुलगा एस्था असो. अभिलाष टॉकीजमध्ये साउंड ऑफ म्युजिक पाहताना ऑरेंजमॅन-लेमनमॅनकडून एस्थाचे होणारे लैंगिक शोषण किंवा वेलुथाला काहीही अपराध नसताना लाथाबुक्क्यांनी होणारी कोठडीतील मारहाण असो. या घटना आणि त्यानंतर येणारी मानवी आयुष्यांची वाताहत, उद्ध्वस्तता रॉय फ्लॅशबॅकमधून मागेपुढे रेखत जातात. त्यांच्या लेखणीत परिणाम आधी येतो आणि मग कारण. आणि जणू काही त्यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत उरणारी अपरिहार्यता वाचकांच्या मनात सांडत जाते - लाइक टी फ्रॉम टीबॅग.

     अनेकांना हे पुस्तक आवडले नाही. कित्येकांना झेपलेही नाही. मलाही बर्‍याचदा वाचल्यानंतर आणि इतकी वर्षे डोक्यात घोळवल्यावर त्यावर चार शब्द लिहिता आलेत. अरूंधती रॉय यांची इतर मते व त्यांची वादग्रस्तता हा वेगळा विषय आहे. पण माझ्यापुरता माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारी ही मला सर्वात जास्त आवडणारी कादंबरी आहे.

In reply to by मितान

एस Fri, 07/11/2014 - 12:21
जितकं मनात होतं त्याच्या एक टक्काही नीट लिहिता आलं नाही! पण इतर कशासाठी नाही तर किमान यातील भाषेसाठीतरी 'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्' नक्की वाचा.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 17:55
"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक मार्गालिट फॉक्स या लेखिकेचे पुस्तक वाचले. लिनिअर बी या लिपीचा उलगडा करणार्‍या संशोधकांपैकी जॉन चॅडविकचे पुस्तक अगोदर वाचले होते, त्यानंतर त्याच विषयावरचे हे पुस्तक वाचले. बेशिक तेच तेच असले तरी अ‍ॅलिस कोबेर या भाषाशास्रज्ञ बाईंबद्दल पहिल्यांदा डीटेल माहिती यात मिळते. महायुद्धाच्या काळात कागद मिळेना म्हणताना लायब्ररीतील पुस्तकांच्या नेआणवाल्या स्लिपा, सिगरेटची पाकिटे, ग्रीटिंग कार्ड आणि वह्यांचे पुठ्ठे, इ.इ. जे काय मिळेल ते वापरून तिने जवळपास १,८०,००० छोटी नोंदकार्डे बनवली आणि लिनिअर बीचा जवळपास फडशाच पाडला. पण जॉन मायर्सची किरकीर, तसेच कॉलेजचा शिकवण्याचा लोड, इ.इ. लडतरींमुळे बिचारीला काही पुढं जाता आलं नाही. पण जे केलं त्याचा मायकेल व्हेंट्रिसला पुढं लै उपयोग झाला. अ‍ॅलिस कोबेरची नव्याने ओळख झाल्याचा लैच मोठा फायदा झाला या पुस्तकामुळे. आता नेक्ष्ट टार्गेट 'द मायसीनिअन वर्ल्ड' बाय जॉन चॅडविक. लिनिअर बीच्या जवळपास ६००० मृत्तिकालेखांतून आपल्याला काय काय माहिती मिळते त्याचा आढावा घेणारं पुस्तक आहे. अपोलो, पोसायडन, इ. देवांची नावे, ट्रॉयहून आणलेल्या गुलाम स्त्रिया, गुलामांना दिलेली अपमानजनक नावे, झालंच तर अकिलीसचे नाव कोरलेले मिळणे, इ.इ. बर्‍याच गंमतीजमती आहेत.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 18:01
"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी बिहाईंड द व्हेल इन सौदी अरेबिया" हे जीन सॅसनचे पुस्तक मध्ये वाचले. सौदी राजघराण्यातल्या एका सुलताना नामक राजकन्येचे (नाव बदलून पण खर्रेखुर्रे) आत्मवृत्त आहे. काळ १९७० पासून पुढचा. नॉट विदौट माय डॉटर, सोन्याच्या धुराचे ठसके, मयादा, इ. पुस्तके वाचलेल्यांना काही नवीन नाही. पण राजघराण्यातील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्त्रियांच्या पशुवत् स्थितीचे वर्णन कधी वाचले नव्हते ते या निमित्ताने वाचायला मिळाले. वर्णनशैली 'व्हिव्हिड" (मराठी?) आहे, खिळवून ठेवणारी आहे. बर्‍याच गोष्टींबद्दल आधी कुठेसे वाचले असले तरी इथे त्या एकदम अंगावर येतात. सौदी राजघराण्याची अगणित संपत्ती आणि शिवाय स्त्रियांवरच्या बंधनांमुळे येणार्‍या कंटाळ्याचे, रितेपणाचे वर्णन यथार्थ आहे. अशी वर्णने कैकदा डिसमिसिवली जातात, सुख टोचतंय इ.इ. म्हणून. पण त्यामुळे त्यांची सत्यता कमी होते असे मला तरी वाटत नाही. असो. सौदीमध्ये अलीकडे झालेले काही बदल त्या तुलनेने बरेच स्वागतार्ह आहेत. बाकी, जीन सॅसनबद्दल फ्रॉडचे आरोपही झालेत, तेव्हा किती खरेखोटे ते तो एक अल्लाच जाणे. पण पुस्तक रोचक आहे हे नक्की.

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 18:36
कदाचित अनेकांनी वाचली असेल तरीही अमृतवेल - वि. स. खांडेकर सगळ्यात पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडली होती पण समजण्या एवढी कुवत नव्हती. पण तेव्हा आवडलेल्या ओळी, परिच्छेद हे एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवले जायचे. परत कधीतरी वहीतून हे संग्रहित साहित्य वाचून आनंद मिळायचा. अशीच एक वही वाचताना ही कादंबरी पुन्हा वाचावीशी वाटली. पुन्हा शोध घेऊन वाचली. तेव्हा ती अधिक समजली. आधी ज्या ओळी केवळ पुस्तकी किंवा आलंकारिक म्हणून जास्त आवडल्या होत्या, त्या नंतर वाचताना अधिक उमगल्या. वयानुसार आणि काळानुसार वेगळ्या दृष्टीने वाचली गेली. अनेक व्याख्या बदलल्या होत्या. पण तरीही आवडीच्या यादीत अजूनच फिट्ट बसली. त्यापैकीच काही निवडक देतेय…(आता ती वही राहिली नाही, ती लिहून ठेवायची सवयही नाही, तेव्हा आंतरजालावरून साभार) "भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदानही लाभले आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला आनंद लुटणे, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळ लेल्या पायानी दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो त्यामुळे." वि.स.

In reply to by मधुरा देशपांडे

सौंदाळा गुरुवार, 07/03/2014 - 18:45
अमृतवेल मधे तुम्ही वर दिल्याप्रमाणे अनेक सुंदर ओळी आहेत पण एक कथानक म्हणुन ती मला अगदीच सामान्य वाटली.

In reply to by मधुरा देशपांडे

यशोधरा गुरुवार, 07/03/2014 - 18:48
लहानपणी वाचली होती तेह्वा मलाही खूप आवडली होती अमृतवेल. आता कथानक वाचूही शकत नाही. पण त्यातील संवाद, भाषा सुरेख होती हे मात्र खरेच. आता अमृतवेल कथानकासाठी वाचवत नाही पण भाषेसाठी संग्रही ठेवली आहे. :)

In reply to by मधुरा देशपांडे

विकास गुरुवार, 07/03/2014 - 19:51
खांडेकर म्हणल्यावर दोन पुस्तके आठवली. एक म्हणजे "ययाती" - लहानपणी वाचले तेंव्हा खूप आवडले. जसे होते तसे एक कादंबरी म्हणून समजून घेतले. नंतर दुर्गाबाई भागवतांची त्यावरील टिका वाचली आणि त्यातील चुका समजल्या. दुसरे पुस्तक म्हणजे, "सोनेरी स्वप्न भंगलेली" - नीट आठवत नाही. पण गांधीवादी पिढीला आलेले स्वातंत्र्योत्तर नैराश्य (फोलपणा) ह्यावर आधारीत कथानक होते.

In reply to by प्रचेतस

विकास गुरुवार, 07/03/2014 - 21:20
मला आठवावे लागेल. मी नंतर पुस्तक शोधून अधिक संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांचा मुद्दा असा होता की पुराणातल्या कथेवर कथानक बसवताना खांडेकरांनी संस्कृतीचे मिश्रण केले होते. काही वेळेस त्यातले काही प्रसंग होते ते तर वास्तवीक ख्रिस्ती परंपरेतले होते, असेच अजूनही काही होते. येथे एक लक्षात ठेवावे बाईंच आक्षेप ख्रिस्ती धर्म वगैरे नव्हता तर सरमिसळ करत योग्य चित्र न उभारण्यात होता.

In reply to by विकास

प्रचेतस गुरुवार, 07/03/2014 - 21:49
धन्यवाद. 'ययाती' वाचण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला होता पण वाचवले गेले नव्हता. महाभारतातील मूळ यायातीचे उपाख्यान कितीतरी सरस आहे त्यापेक्षा. तसेही ऐतिहासिक अथवा पौराणिक कथानकांवर कादंबरी लिहिताना बरेचसे लेखक (मूळ कथानकच नाट्यमय असतानाही) प्रमाणाबाहेर लेखनस्वातंत्र्य घेतात आणि कादंबरीची अक्षरश: वाट लावतात. यात रणजीत देसाई, शिवाजी सावंत आदि मान्यवरही आले.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:19
ययाति केवळ कादंबरी म्हणून वाचताना खूपच सुंदर आहे. अर्थात मूळ कथेपेक्षा अधिक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत हे लक्षात येतं, तरीही मला तरी ती हातातून ठेववत नव्हती. पण सरमिसळ केली तरीही मूळ कथेच्या गाभ्याला धक्का लावलाय असं वाटलं नाही. इतर कादंबर्‍यांबाबत सहमत.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 20:01
आमच्या घरात वाचनाची आवड आई आणि वडील दोघांनाही. आईला रोजच्या वर्तमानपत्रापलीकडे जास्त कांही वाचताना पाहिलं नाही. तिला तेवढा मोकळावेळही नसायचा. वडील कथा कादंबर्‍या वाचायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या बाबतीत आईचा आग्रह असायचा की, 'बाहेर उडाणटप्पूपणा करण्यापेक्षा घरात बसून पुस्तकं वाच.' आमच्या गल्लीत आमचे समाजसेवी फॅमिली डॉक्टर (डॉ. भांडारकर) ह्यांनी एक मोफत वाचनालय चालविले होते. स्वतः पदरमोड करून ते वाचनालय चालवायचे. तिथे लहानपणी परोपकारी गोपाळ, गोट्या, फास्टर फेणे, कर्‍हेचे पाणी वगैरे पुस्तके आणि विज्ञानयुग, अमृत, फुलबाग, विचित्रविश्व वगैरे नियतकालीकं फुकट वाचायला मिळायची. ती तिथेच बसून अट असायची. पुस्तक घरी न्यायचे असेल तर एकदाच ५ रुपये अनामत रक्कम ठेवावी लागे. आईने आम्हा दोन्ही भावंडांच्या नांवे तशी रक्कम भरून पुस्तके घरी आणून वाचायची सुविधा आम्हाला पुरविली. पुढे गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा उघडली आणि अवघे साहित्यिक विश्व आमच्या दारी आले. तिथेही अनेक पुस्तके वाचली. पुढे नोकरीला लागल्यावर पुस्तके विकत घेऊन वाचायचे 'व्यसन' लागले. शाळेतून पुलंची ओळख होतीच. 'खोगीरभरती'तला धडा होता. मासिकांमधून वपुंची ओळख झाली. कॉलेजात 'गारंबीचा बापू' मुळे श्रीनांनी वेड लावले, नाटकांच्या आवडीतून 'गुतता हृदय' मुळे शन्ना आपलेसे वाटू लागले. आयुष्याच्या वाटेवर लहान आणि तरूणपणी अशा अनेक लेखक/लेखिका मला बोट धरून चालवलं. घरी आईवडील, शाळेत शिक्षक आणि पुस्तकरुपाने ह्या सर्व साहित्यिकांनी अनेक चांगले संस्कार घडविले. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही. ह्या साहित्य आकर्षणाच्या वटवृक्षाचं मूळ रोपटं आईने लावलं, आपल्या नजरेखाली वाढविलं. रोजची वर्तमानपत्र, दिवाळी अंक (तोही लोकसत्ता), आणि पुढे पुढे कालनिर्णयची पाठीमागची बाजू ह्याच्या बळावर वाचनाचं महत्त्व जाणून तिने आम्हाला (मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला) वाचनाचं वेड लावलं. ह्या धाग्यावर माझ्याकडून एखाद्या (कदाचित जास्तच) पुस्तकाबद्दल लिहीण्याआधी, ही आवड जिने लावली त्या आईबद्दल आधी लिहीणं मला जास्त उचित वाटलं म्हणून लिहीलं. धाग्याच्या विषयाला सोडून आहे. पण एवढे खपवून घ्या. लवकरच माझ्या वाचनवेडा विषयी लिहीन.

सस्नेह गुरुवार, 07/03/2014 - 22:07
ले. शशी भागवत. कळत्या वयात या कादंबरीने वेड लावले होते अन अजुनी वाचताना मोहवते. प्राचीन काळातील वैभवशाली चित्रण, रहस्य, व्यक्तिवैचिध्य अन नर्म शृंगार यांची चित्तवेधक गुंफण म्हणजे मर्मभेद. शशी भागवतांच्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कादंबर्‍या आहेत. त्यात सर्वात सरस मर्मभेद. अवश्य वाचा.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:47
मर्मभेद वाचले आहे. तुम्ही म्हणता तसे किशोर वयात वाचण्यासारखे आहे. चंद्रलेखा ला जशी प्रसिद्धी मिळाली तशी मर्मभेद ला मिळायला हवी होती.

In reply to by सस्नेह

कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 20:41
मर्मभेद पेक्षा रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा जास्त आवडल्या.. अजून एक कादंबरी अप्रकाशित आहे असे एकून आहे

अजया गुरुवार, 07/03/2014 - 22:12
प्रकाश नारायण संत माझे अत्यंत आवडते लेखक.त्यांची वनवास्,शारदासंगीत पंखा आणि झुंबर अशी चार(च) पुस्तकं आहेत.या चारही पुस्तकातून आपल्याला कथानायक लंपन भेटतो,आई वडिलांपासून दूर आजी आजोबांकडे राहाणारा.पौगंडावस्थेतले अवघड वय्,अतिशय संवेदनाशील स्वभाव असणारा.सुंदर पेटी वाजवणारा,सुमीकडे चोरुन बघणारा! सर्वच पुस्तकांमध्यली भाषा बेळ्गावी मराठी.ती वाचताना अगदी गोड वाटते.लंप्याचे मित्र त्याला काय करायलय लंप्या!असं बोलणारे.त्यांची नावही मस्तच! कणबर्गी गंग्या,सोंडृया,परळ्या,टुकण्या! मी माझ्या मुलाच्या मित्रांना ही नावं बहाल केली आहेत! या सर्वच कथांमध्ये लंपन बरोबरच तो परिसर ,ती भाषा,गुंडीमठ रस्ता,शारदासंगीत विद्यालय्,सुमीची सोनसाखळी,लंप्याचे मित्र्,त्यांची टारझनगीरी! अगदी नकादुचेण्या कपासके(केस कापण्याचे दुकान!!) असे सगळं मिळून या अनोख्या कथा जमून आल्या आहेत. लंपनच्या भाषेत अठ्ठाविसशे तीस वेळा जरी ही पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं हे खरं! या लंपनशी माझं एक छानसं नातं आहे. माझ्या प्रेग्नंन्सीच्या दिवसात वनवास माझ्या हातात पडलं.हे पुस्तक इतकं आवडलं की त्याची पारायणं झाली. त्यातल्या लंपनचेच गर्भसंस्कार झाल्यासरखा माझा मुलगाही तसाच शांत्,डोक्यात चक्र असणारा ,संवेदनशील आहे. इतका या पुस्तकाचा परिणाम!

In reply to by नंदन

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 16:05
+२८३० एक्दम मॅड पुस्तकं! हुंब माणूस पण प्रेमात पडेल अशी.

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 01:53
शालेय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं चिमुकलं मन केंव्हाच व्यापून टाकलं होतं. पुढे एका शिवजयंती कार्यक्रमात श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांचं अफजलखान वधाचं आख्यान ऐकलं आणि तरूण मनावर रोमांच उभं राहिलं बाबासाहेबांची ओघवती भाषा, आवेश, आवाजातील चढ उतार आणि संपूर्ण प्रसंग जस्साच्यातस्सा डोळ्यासमोर उभा करण्याची बाबासाहेबांची हातोटी ह्या सर्वाचा माझ्या तरूण मराठी मनावर सकारात्मक परिणाम झाला. त्या नंतर आले बाबासाहेबांनी लिहीलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक. माझ्या एका मित्राच्या बायकोने ते मला वाचायला दिले. ते दोन दिवसात बाचून संपविले पण शिवचरीत्राने आलेले भारावलेपण संपता संपेना. पुन्हा एकदा बाबासाहेबांची भाषा, ते तारीखवार तपशिल, मराठी तिथी-तारखा आणि प्रसंगातले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. ह्या पुस्तकातील प्रसंगानुरुप काढलेली चित्रं अतिशय नेमकी आहेत. प्रत्येक प्रसंगात आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत असाच भास होतो. मन पूर्णपणे इतिहासात रममाण होते. मोघलांविरुद्ध लढायांचे वर्णन वाचताना आपल्याही चेव येतो आणि मावळ्यांची स्वामीभक्ती पाहून आपल्याही मनांत शिवाजी महाराजांबद्दल आदरभावना निर्माण होते. पावनखिंड प्रसंग अंगावर काटा आणतो. नंतर प्रत्यक्ष पावनखिंडीला भेट दिली तेंव्हा राजा शिवछत्रपती कादंबरीतील बाजीप्रभू देशपांडे ह्याची एकाकी लढत आठवली आणि आदराने नतमस्तक झालो. सर्वच दृष्टीने पुस्तक वाचनिय आणि संग्रहणिय आहे. पुन्हा पुन्हा राजा शिवछत्रपती कादंबरीची अनेक पारायणं होतात. दरवेळी तोच आणि तेव्हढाच आनंद होतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सखी Fri, 07/04/2014 - 03:05
पेठकर काका मलाही हीच पहिली कादंबरी आठवली जी शालेय जीवनात वाचुनही अजुनही भारावुन टाकते. जाणता राजा बघणं हाही एक आनंददायी सोहळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच शिवचरीत कथन जालावर आहे.

In reply to by सखी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 10:27
'जाणता राजा' एक विस्मयकारक कलाकृती आहे. रंगमंचाची भव्यता, २००+ कलाकारांचा उत्साह, प्रकाश योजना, वेशभूषा, आतिशबाजी, घोडेस्वार, बैलगाडी सर्व सर्व अगदी नजरेचे पारणे फेडणारे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण नाटक ध्वनीमुद्रित आहे आणि प्रत्यक्ष बोललेले संवाद नाहीत. त्यामुळे संवाद विसरण्याची, नाटक रेंगाळण्याची शक्यता उरत नाही. शिवचरीत्राचे चित्ररुप धावते आणि अद्भूत समालोचन म्हणता येईल. जाणता राजाच्या कार्यक्रमात, मध्यंतरात, रंगमंचाच्या मागे, बाबासाहेबांना भेटण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ५ दिवस लंडन दर्शन कार्यक्रमात बाबासाहेबांचा सहवास लाभला. ब्यांण्णव्यावर्षीही बाबासाहेबांची स्मरणशक्ती आणि वाचा कणखर आहे. आज दुर्दैवाने ते व्हिल चेअरवर असले तरीही उत्साह पन्नाशीतला आहे. अजूनही ते व्याख्यानाला तयार आहेत. मस्कतला त्यांना बोलावण्याचे घाटत आहे. निदान १ दिवस तरी हल्लीच्या पिढीला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून शिवचरीत्र ऐकवावे ह्या उद्देशाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यांना आमच्याकडून....मानाचा मुजरा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एसमाळी Fri, 07/04/2014 - 17:09
राजा शिवछत्रपती मध्ये काही चुका आहेत.ज्या आजतागायत सुधारल्या गेल्या नाहित.पुस्तक एकदा वाचल्यावर पुन्हा वाचावे असे नाही वाटले.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 17:44
प्रत्यक्ष शिवकालासंबंधी फॅक्च्युअल चुका नसाव्यात असे वाटते, मात्र देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने केलेली स्वारी, त्यानंतरची तथाकथित लूट, इ.इ. अतिरंजित वर्णने जुन्या तवारिखांतून आहेत तश्शीच्या तश्शी उचलली आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. ब्रह्मानंद देशपांडे यांनी 'देवगिरीचे यादव' नामक पुस्तक लिहिले आहे त्यात त्या वर्णनांतील अतिरंजितपणा सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

धन्या Fri, 07/04/2014 - 11:00
डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं हे एक नितांत सुंदर पुस्तक आहे.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
- रंग सुखाचे पुस्तकाची बुकगंगा डॉट कॉम वर दिलेली माहिती.

स्नेहल महेश Fri, 07/04/2014 - 11:52
मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि तशी बरीच पुस्तक वाचली आहेत पण मला सुधा मूर्ती या लेखिकेची पुस्तके खूप आवडतात मी वाचलेली काही पुस्तके Dollar Bahu Gently Falls the Bakula Wise & Otherwise THE DAY I STOPPED DRINKING MILK काही इतर पुस्तके (लेखक -आमिष त्रिपाठी ) मेलुहा चे मृतुंजय नागाचे रहस्य शपथ वयुपुत्राची

मनिष Fri, 07/04/2014 - 12:33
सध्या फारशा कादंबर्‍या किंवा फिक्शन वाचत नाही पण जवळपास २० वर्षे आधी वाचलेली रारंग ढांग आजही आवडते. हिमालयाच्या पार्श्वभुमीवरची, Border Roads Organisation बरोबर हिमालयात रस्ता बनवणार्‍या विस्वनाथची ही कथा. त्याचे ज्ञान, थोडा एककल्ली हेकटपणा, आदर्शवाद आणि त्याच्या जोडिला वैतागलेला नायर आणि जिंदादिल मिनू. सगळे मिळून एक भन्नाट रसायन झालेय. पुढे कधीतरी डॉ. दाढेंशी गप्पांमधे कर्नल आनंदराव (पहिल्या नावाविषयी खात्री नाही, पण बहुदा हेच) जाधव यांनी लिहिलेल्या 'जिंदादिल' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाशी असलेल्या ह्या कादंबरीच्या नात्याबरोबर कळले. खूप शोधुनही हे 'जिंदादिल' अजुनही मिळाले नाहीच. :( ह्याबद्दल अजून काय, काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्‍यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे (अमोल पालेकरांना) परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे!
रारंग ढांग विषयी पुस्तकविश्व्वरील श्रावण मोडक यांचा लेख इथे वाचता येईल - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A5%A7

In reply to by मनिष

एस Fri, 07/04/2014 - 15:39
रारंग ढांगने झपाटून टाकले होते. तेव्हा काय वाटत होते हे तुम्ही आणि श्रामोंच्या पुस्तकविश्वाच्या लेखात त्यांनी छान सांगितले आहे.

In reply to by मनिष

सखी गुरुवार, 07/10/2014 - 15:25
मनिष हा प्रतिसाद रारंगढांगवरचा अतिशय आवडला, श्रामोंचा लेख वाचण्यात आला नव्हता, तोही खूप आवडला, इथे दुवा दिल्याबद्द्ल आभार. तसेच तुमचा व्लॉगवरचा लेखही निरुत्तर करणारा. मिपावरच डॉ. दाढेंचा हालेखही सापडला. यावरती येणारं सिनेमा, नाटक गुलदस्त्यातच राहीलं तरी अभिवाचन स्नॉवेलवर आलयं असं वाटतं. 'पुन्हा रारंग ढांग' कुणी वाचलय का? यावर दिवाळी अंकात कोणीतरी आव्हान दिल्याचे आठवते दुवा सापडला तर टाकते परत येऊन.

In reply to by सखी

सखी Sun, 07/13/2014 - 08:22
पुस्तकाचं नाव 'पुन्हा रारंग ढांग' नाही तर 'रारंग ढांग नंतर … ' असे आहे. श्रीकृष्ण सवदी यांनी लिहलेलं आहे. चंद्रकांत मासिकानं दिलेले हे आव्हान त्यांनी पेललं, असं पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलं आहे, दुवा.

मनिष Fri, 07/04/2014 - 12:36
अरे हो! सांगायचे राहिलेच. उपक्रम खूप आवडला. कादंबरी सोडून नुसत्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहायला सांगितले तर मग माझ्यासाठीच एक नवीन विभाग सुरू करावा लागेल, आणि अर्थातच कोणालातरी माझ्या पोटापाण्याची सोयही करावी लागेल. :P

स्पा Fri, 07/04/2014 - 13:07
मुळ लेखक : कॉरम्याक मकार्थी अनुवाद : अनिल किणीकर एक अचाट पुस्तक , वेगळाच प्लॉट . बेचिराख झालेले जग , कशाने, का माहित नाही कथानकाला भूतकाळ नाही , भविष्य नाही फक्त वर्तमान बेचिराख झालेल्या अमेरिकेतून जगण्याची धडपड करत वाट काढत दक्षिणेकडे समुद्र किनार्यावर जाणारा एक अनामिक बाप आणि त्याचा लहानसा मुलगा. जग बेचिराख झालेले , प्रचंड मनुष्यसंहार झालेला , निसर्गाची अवकृपा कि मानवी युद्ध माहित नाही , जगण्यासाठी उरलेल्या मानव प्राण्याची एकमेकात चालेलेली चढा ओढ . खायला प्यायला काही नाही, मरण निश्चित, फक्त ते किती लांबवता येतंय यावर सगळा खेळ. जवळ सामान म्हणजे स्वरक्षणासाठी असलेले एक छोटे पिस्तोल. अंगावरचे कपडे , इकडून तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक ढकलगाडी , एकमेकांशिवाय कोणी नाही . कादंबरीचा कालखंड , पात्रांची नवे शिवाय इतर विशेष पार्श्वभूमी न कळताहि हे पुस्तक पहिल्या पानापासून खिळवून ठेवते , बाप लेकातले नातेही सुंदर . शेवटी त्याच्न्या प्रवासाचे काय होते , तो कुठे संपतो यासाठी पुस्तक वाचणे आले २००७ सालातला पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. २००९ साली यावर "द रोड" नावाने चित्रपट सुद्धा आलाय

स्पा Fri, 07/04/2014 - 13:08
भैरप्पांचा "पर्व"चा , (उमा कुलकर्णी यांनी केलेला) अनुवाद हातात आला , तेंव्हा महाभारतावरील अजून एक कादंबरी इतकेच त्याचे स्वरूप मनात होते.काहीतरी हटके असणार याची कल्पना आलेली होती. वाचायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच भैरप्पानी पेललेल्या शिव धनुष्याची जाणीव झाली. आयुष्यातली जवळ जवळ १२ वर्ष एका कादंबरीसाठी खर्ची घालणे म्हणजे खरंच ग्रेट गोष्ट आहे.महाभारत घडलेल्या जागांचा शोध काढून तिथल्या निसर्गाचा,लोकांचा,संस्कृतीचा अभ्यास करून, मूळ महाभारतातल्या चमत्कारांचा, दंतकथांचा,शापांचा,वरदानांचा सुसंगत असा वैज्ञानिक, हल्लीच्या मानवी तर्कदृष्टीला पटेल असा निष्कर्ष काढून तो कादंबरीत आखणे.शिवाय त्यातली महाभारत आपल्या निवेदनातून उलगडणारी हटके पात्रनिवड. पर्व वर परीक्षण असे लिहायला घेतले तर कदाचित मूळ कादंबरी सारखाच एक जाडजूड ग्रंथ व्हायचा. इतके दिवस महाभारताबद्दल जे ग्ल्यामर इतक्या साहित्यिकांनी आपल्याभोवती निर्माण केले होतं, त्याचा चक्काचूर करण्याच काम "पर्व" व्यवस्थित पार पाडत, तेही वाचताना कुठेही "छे हे काही पटले नाही बुवा" असे वाटत नाही. अख्या पर्व कादंबरीत लेखक कुणा एकाची बाजू घेत नाही, कोणाला हिरो किंवा कुणाला खलनायक ठरवत नाही. जे घडलं असाव ते तो फक्त आपल्या समोर तर्कसंगत पणे मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या मते हेच या कादंबरीचे यश आहे. कुंतीला पंचतत्वांपासून पांडव झाले.. अशी कथा असताना , भैरप्पा प्राचीन भारतातही नियोग पद्धत (सरोगसी) अस्तित्वात होती हे ठामपणे मांडतात. कृष्णाने कालिया मर्दन केले असे न म्हणता , पूर्वी नाग नावाच्या लोकांची टोळी होती. त्यांना संपवले किंवा द्रौपदीला मिळवण्यासाठी पांडवान्मध्येच सुरु झालेली भांडणं, आणि भांडण मिटव्ण्यासाठी कुंतीनेच द्रौपदीला तुला समाधान द्यायला ५ ५ पुरुष असताना चिंता कसली असा दिलेला सल्ला !! एक ना अनेक , कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर भैरप्पा आपल्या मनावर महाभारताविषयीच्या चढलेल्या चमत्काराचा बुरखा टराटरा फाडतात. आणि मग एकदम हि सगळी पात्र अगदी ( कृष्ण ,कर्णासकट)मानवी पातळीवर वावरायला लागतात. हि सगळी आपल्यासारखीच अनेक विकारांनी बनलेली असतात. त्यांच्यातही लैंगिक वासना, कट -कारस्थान , सत्तेसाठी काहीही करण्याची वृत्ती असते. कौरव वाईट किंवा पांडव सगुणाचे पुतळे हा भेद उरतच नाही. उरते ती फक्त सत्ता मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी गाठलेली मानवी स्वभावाची नीचतम हद्द आणि कदाचित व्यासांना अभिप्रेत असलेल हेच ते "महाभारत". एक अप्रतिम महानाट्य. मानवी स्वभावाचे प्रत्येक पैलू .. किंवा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याची मांडणी केलेलं एक प्राचीन काव्य . शेवटा कडच्या युद्धात तर मानवपातळी वरून हि पात्र पशुपातळीवर येतात. युद्ध संपेपर्यंत प्रचंड मानव संहार होतो.कौरवांचा दारूण पराभव होतो.पण पांडवांना हि जिंकल्याचे समाधान नसतेच , युद्ध काळात झालेली अपरिमित हानी, निर्वंश झालेले पांडव आणि उजाड झालेला परिसर, रिता झालेला खजिना आणि दोन वेळच्या जेवणाची पडलेली भ्रांत हीच त्यांना मिळालेली युद्ध जिंकल्याची भेट. ५००० वर्षा पूर्वीचा सुडाने रंगलेला खेळ या काळातही जुना वाटत नाही . मानवी प्रवृत्तीत काडीचाही फरक पडलेला नाही हेच खरे या कादंबरीवरही अनेक वाद विवाद झडले असतील , झडत राहतील.. पण भैरप्पानी दाखवलेली दिशा नक्कीच नाकारण्याजोगी नाही

In reply to by स्पा

Gayatri Muley Fri, 07/04/2014 - 14:37
महाभारत म्हणल कि फक्त शिवाजी सावंत चे तर्क खरे वाटतात मला... (अर्थातच ते चुकिचे आहे, पण लहानपणीच वाचलेले मृत्युंजय अन् युगांधर मनातून जातच नाहीत..) त्यातून पांडव अन् कौरव यांची बाजू कळली आता "तिसरी" बाजू कळण्यासाठी "पर्व" नक्की वाचेल...

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:37
प्रदीप लोखंडे, पुणे १३- छान पुस्तक आहे. ओसामा बिन लादेन वर एक पुस्तक वाचले होते. एका अमेरीकन लेखिकेने ओसामाच्या मुलाचे आणि पत्नीचे आत्मकथन एकत्र करून पुस्तक लिहीले होते. त्याचा मराठी अनुवाद पण आहे. पण नाव आठवत नाही. पुस्तक मात्र जबर्दस्त आहे.

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:41
शिकवीले ज्यांनी - लेखक अनिल अवचट खूप सुंदर पुस्तक आहे. पुण्यातील काही ज्ञानी व्यक्तींचे अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण व्यक्तिचित्रण अनिल अवचटांनी केले आहे.

आतिवास Mon, 06/30/2014 - 22:21
कल्पना चांगली आहे. पण फक्त 'कादंबरी'पुरतं विश्व मर्यादित करण्याचा उद्देश समजला नाही. महिनाभरात जे काही वाचलं त्यावर लिहायचं असं ठरलं असतं तर जास्त सोपं झालं असतं लिहायला.

In reply to by आतिवास

पुस्तकमित्र Tue, 07/01/2014 - 09:44
ही फक्त सुरुवात आहे. साहित्यप्रकाराच्या विविध प्रकारांना स्पर्श करतच ही मालिका पुढे पुढे सरकत राहणार आहे. अर्थात आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेच.

सुरुवात म्हणून कादंबरीचे नाव - आनंदी गोपाळ लेखक - श्री. ज. जोशी भारताबाहेर जाऊन पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकलेल्या डॉ. आनंदी बाई गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा सुद्धा जेव्हा गुन्हा समजला जात होता, त्या काळात नवऱ्याच्या हट्टामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते पुढे वैद्यकीय पदवी मिळेपर्यंतचा प्रवास यात वाचायला मिळतो. गोपाळरावांच्या विक्षिप्तपणाचा त्यांना झालेला त्रास, तरीही जिद्दीने पूर्ण केलेले शिक्षण आणि दुर्दैवाने या सगळ्याला तोंड देताना ओढवलेला शेवट. पुस्तक वाचून आनंदी बाईंच्या प्रतीचा आदर अधिक दुणावतो. त्या काळातले स्त्रियांचे समाज जीवन, संघर्ष, गोपाळ रावांचे काळाच्या पुढचे विचार आणि तरीही अनेक बाबतीत दिसणारा दुराग्रहीपणा, सगळे काही सुन्न करून टाकते. मला आवडलेल्या पुस्तकांपैकी एक.

In reply to by पैसा

मस्त कलंदर गुरुवार, 07/03/2014 - 11:26
अगदीच काल्पनिक नसली तरी बरेचसे प्रसंग खोटे आहेत. अंजली कीर्तने यांनी त्यांच्या आनंदीबाई: काळ आणि कर्तृत्व या कादंबरीत ससंदर्भ लिहिले आहे.

In reply to by मस्त कलंदर

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 14:33
या कादंबरीविषयी माहिती नव्हती. आनंदीबाईंच्या व्यक्तिरेखेविषयी अजूनही वाचायला आवडेल. त्यामुळे कधी जमल्यास पुन्हा दोन्ही वाचेन. धन्यवाद.

शुचि Mon, 06/30/2014 - 23:23
"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००-१५० पानी, छोटेखानी पण जबरदस्त पुस्तक वाचते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पुस्तक आहे. अर्धे वाचून झाले आहे. डॉक्टर अन त्यांच्या पत्नी मिल्ड्रेड यांनी जंगलमय्/रानटी भागात घर घेतले. दोघांना पक्षी नीरीक्षणाची अतिशय आवड. एके दिवशी पहातात तो काय क्वेल मादी व क्वेल(quail) नर दोघे खुरडत खुरडत, जखमी असल्यासारखे चालले आहे. ताबडतोब त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील पालकांच्या अतिव शौर्याचे उदाहरण ते पहात आहेत. आपल्या पिलांवर लक्ष जाऊ नये म्हणून हे दोघं क्वेल स्वतःकडे लक्ष वेधून घेत होते. मग डॉक्टर व मिल्ड्रेड सुरक्षित अंतरावर गेले अन क्वेल आई तिच्या १२ पिलांना घेऊन गेली. पण गंमत ही झाली की क्वेलच्या चिमुकल्या व व्यवस्थित लपवलेल्या घरट्यात त्यांना एक अंडे सापडले. ते अंडे त्यांनी दिव्याच्या ऊबेत्/प्रकाशात ठेवले असता ते ऊबले, फुटले व इवलसं ओलं बंबलबी च्या आकाराचं पिलू अंडं फोडून बाहेर आलं. १५ मिनीटात ते पटापट सुकलं अन आक्रोडाच्या आकाराचं दिसू लागलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं बॉबी व्हाईट. पण मग अजून भारदस्त नाव हवं म्हणून ते "रॉबर्ट" या नावात बदललं. मग या दांपत्याने रॉबर्ट्पाशी लहान वाटुलीत दाणा-पाणी ठेवले.आता कोणाला वाटेल की पिलाला जबरदस्तीने खायला घातलं असेल पण नाही हे पिलू ८ तासानंतर स्वतःचे स्वतः खाऊ-पीऊ लागले. फक्त एकदाच त्याला मदत लागली ती म्हणजे त्याची चोच पहील्यांदा पाण्यात बुडवायला. मग मात्र ते स्वावलंबी झाले. मग त्या पिलाचे स्वभाववैशिष्ट्य, गुणविशेष सगळे पुस्तकातून उलगडू लागतात अन एका क्वेलला किती अक्कल असते, माया असते, लळा असतो इतकेच काय आवडीनिवडी/ पसंत-नापसंत असते ते वाचून थक्क व्हायला होते. हळूहळू रॉबर्ट्ला सुंदर ठीपक्या ठीपक्यांची पिसे आली, तो वयात आला, वगैरे मोहक्/रोचक वर्णने येतात. पुस्तक अक्षरक्षः खाली ठेववत नाहीये. अ‍ॅमेझोनवर ६६ - ५ चांदण्या मिळालेले हे पुस्तक नशीबाने ग्रंथालयात "चकटफू" विभागात मिळाले. बसमध्ये, घरात, ऑफीसात लंच टाइम मध्ये वाचन सुरु आहे.

In reply to by आतिवास

एस Wed, 07/02/2014 - 19:42
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमॅझॉन दोन्हींवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर महाग आहे. दुवे - http://www.flipkart.com/that-quail-robert/p/itmczyn6bphxd6xu?pid=9780060812461&otracker=from-search&srno=t_1&query=that+quail+robert&ref=ce523a93-e6e0-440c-bf35-4fa5130ff2cb http://www.amazon.in/That-Quail-Robert-Margaret-Stanger/dp/006081246X/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1404310224&sr=8-1&keywords=that+quail+robert

योगविवेक Tue, 07/01/2014 - 00:44
... वाचता वाचता वाढे... मित्रांनो, नुकतीच अंधार छाया कादंबरी वाचली.आवडली. लेखक - मिपाकरांच्या परिचयाचे. शशिकांत ओक. विषय - अर्थात ऑकल्ट सायन्सेस... ही छोटेखानी कादंबरी ईबुक म्हणून उपलब्ध. पाने फक्त ७०-७५. समर्पक मुखपृष्ठ संकल्पना... कादंबरीतील अंधार छायेला रेखाटणारी... कादंबरी सत्य घटनेवर आधारित असा लेखकाचा दावा. त्याला पूरक त्यातील पात्रे व व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कशा आहेत त्यांचे फोटो व सध्याचे जीवनयापन या बाबी कादंबरी वाचकांना नाविन्यपुर्ण आहेत. बलस्थाने- १. बोली भाषेतील घरगुती संवाद, २. आत्मकथन शैलीमुळे व्यक्तीरेखेच्या मनातील संवादातून कथानक पुढे सरकवायची लेखकाची खुबी. ३. विचित्र घटनांचे आवेग, त्यातून फुलणारे नाट्यमय प्रसंग हाताळताना निर्माण भावनांचा कल्लोळ. ४. या अकल्पित घटनांमागील कार्यकारण भाव शोधणारी दादा व्यक्तिरेखा अनेक अंगांनी पुढे येते . ५. जपसाधना करणे ही फावल्या वेळातील म्हातारपणचा विरंगुळा नसून योग्य प्रकारे केल्यास अनाकलनीय शक्तींचा यशस्वी प्रतिकार करता येतो याची प्रचीती देणारे विचार व अनुभव श्रद्धा आणि सबूरीला बळकटी देतात. ६. लेखकाचे मनोगत बरेच काही व्यक्तिगत जीवना बद्दल सांगून जाते. दुर्बल स्थान - सुरवातीला संथपणा व पात्रांची ओळख गोंधळात टाकणारी. यावर तोड म्हणून लेखकाने पात्रांची ओळख मनोगत प्रस्तावनेत करून दिली आहे. रंजक व विचार करायला लावणारी वैशिष्ट्य पूर्ण कादंबरी...

अर्धवटराव Tue, 07/01/2014 - 10:06
गिरीश कुबेरांचं "युद्ध जीवांचे"... तसं बरच काहि सांगता येईल पुस्तकाबद्दल. एका वाक्यात सांगायचं तर बारुदच्या ढिगावर बसुन मक्याची कणसं भाजत बसणार्‍या आजच्या जगाची कहाणी आहे ति. जैवीक अस्त्रांचं संशोधन, गेल्या शतकभरातला त्यांचा वापर, अगदी गल्लीबोळातल्या दादा लोकांपर्यंत त्यांचा वापर, रासायनीक युद्धं व प्रदुषण... सर्वच एकदम खतरनाक.

आतिवास Tue, 07/01/2014 - 16:31
ही छोटेखानी (फक्त ६३ पानं) कादंबरी वाचून झाली. मूळ कादंबरी "नग्न रुख" (ओ.पी. शर्मा 'सारथि') डोगरी भाषेत आहे. इंग्रजी अनुवाद श्री. शिवनाथ यांनी केला आहे. या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत (कादंबरीमधली व्यक्तिरेखा). जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन.. विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही. 'राग दरबारी' या माझ्या अत्यंत आवडत्या हिंदी कादंबरीबद्दल मी यापूर्वी इथं लिहिलं आहे. बाकी अजून सांगण्याजोगं पुष्कळ आहे - नंतर सांगते :-)

प्रचेतस Tue, 07/01/2014 - 16:41
जैत रे जैत.. गोनीदांच्या कर्नाळा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील ही छोटेखानी पण तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर. ठाकरांच्या जीवनशैलीचे मनोज्ञ दर्शन गोनीदांनी आपल्या चित्रदर्शी शैलीत सादर केले आहे. नाग्या, चिंधी हे कथानायक्/नायिका तर अक्षरशः मनावर गारूड करून राहतात. ह्या कादंबरीतला एक सुंदर उतारा देतो. पावसकाळातल्या कर्नाळ्याचे बदललेल्या दर्शनाचे वर्णन करत असताना गोनीदा कसे आपल्या लेखणीचेही सौंदर्य प्रकट करतात ते पहा. हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत. मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो. मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे. मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो. पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

In reply to by प्रचेतस

सागर Mon, 07/07/2014 - 00:19
अतिशय सुंदर प्रकटन वल्ली मित्रा
तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर.
याबद्दल पूर्ण सहमत. आकार छोटा असूनही कादंबरी जे चित्र वाचकांसमोर उभे करते ते खरोखर अफलातून आहे. चित्रपटही सुंदर झाला आहे, पण वाचनानंद जास्त सुंदर आहे.

In reply to by सागर

कवितानागेश Mon, 07/07/2014 - 09:22
चित्रपटात फक्त स्मिता पाटील असल्यानी तो बघवतो, असं माझं टोकाचं मत आहे. ती बरोब्बर 'चिन्धी' दिसते. बाकीचे सगळे 'शहरी' दिसतात. आपण 'ठाकरं' बघतोय असं वाटत नाही. कादंबरी सुंदरच आहे. कधीही हातात घेउन कुठूनही वाचायला सुरुवात करता येते.

Gayatri Muley Wed, 07/02/2014 - 11:10
हर्षदा भुरे यांची अबोल नात ही एक अतिशय सुंदर मनोरमा प्रकाशनाची कादांबरी. 100-150 पानी च असेल, पण मनाला भावून टाकनारी...!!!! मी तर हातात घेतली अन् 5-6 तासात संपवून टाकली होती... तुम्हाला ही मिळाली तर नक्की वाचा....

In reply to by Gayatri Muley

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:33
हं! मराठीतले नवे लेखक-लेखिका फारसे माहिती नसतात आजकाल मला. त्यामुळे हे नाव नवे आहे माझ्यासाठी!

विकास Wed, 07/02/2014 - 19:50
कादंबरी विषय असल्याने गंगाधर गाडगीळांनी लिहीलेली "दुर्दम्य" ही चरीत्रात्मक लोकमान्य टिळकांवरील कादंबरी आठवली. दोन-तिनदा तरी वाचलेली आहे. प्रभावी लेखन आणि संशोधन/अभ्यासावर आधारीत आहे. दोन खंडात आधि मिळायची. मध्यंतरी अमेरीकेत येताना नव्याने एकाच पुस्तकात, ते देखील हार्डकव्हर मधे मिळाल्याने घेऊन आलो. नंतर पाहीले तर मधली काही पाने कोरी! :( दुसरी कादंबरी: "यज्ञ" - भा.द.खेर आणि शैलजा राजे यांनी एकत्रित लिहीलेली सावरकरांवरील चरीत्रात्मक कादंबरी. आठवते त्या प्रमाणे, सावरकरांच्या अखेरच्या काही वर्षांमधे त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावर आधारीत "आत्मकथन" स्टाईल मधे लिहीलेली कादंबरी आहे. दोन्ही वास्तवाला धरून आहेत.

विकास Wed, 07/02/2014 - 20:06
गेल्या काही वर्षात वाचलेली एक कादंबरी म्हणजे, "हंगर गेम्स"! लेकीच्या आग्रह केला म्हणून वाचली. वयात येणार्‍या मुलांना थ्रिलर वाटावी अशी कहाणी ज्यावरचा चित्रपट कदाचीत तुम्ही पाहीला असेल. पण एकंदरीतच हिंसा अंमळ जास्तच आणि अतिरंजीत वाटली. पण विशेष अर्थ न काढता, कल्पनाविष्कार म्हणून चांगली आहे. विज्ञान कादंबरी मालीका म्हणून आयझॅक अ‍ॅसिमोव्हची "फाउंडेशन" पुस्तक सांगेन. सायको हिस्ट्री, रोबोटीक्स अशा संकल्पना मांडत मांडत शेवटी "आपण सगळे एक आहोत" (वसुधैव कुटुंबकम) मानणार्‍या "गया" नामक तत्वज्ञानापर्यंत जाणारी कथा वाचण्यासारखी आहे. या लेखात मिपावरच अधिक लिहीले होते. "violence is the last refuge of the incompetent" हे त्यातले एक रोचक वाक्य. (त्यावर आधारीत नंतर "intellectual violence is the last refuge of the intellectually incompetent" असे म्हणले गेले. ;) आर्थर सी क्लर्कचे २००१ ए स्पेस ओडीसी पण वाचले नसल्यास अवश्य वाचा. स्पेस एक्स्प्लोरेशनच्या आधीचे कल्पनाशक्तीवर केलेले स्पेस एक्स्प्लोरेशन, महासंगणक हॅल ("HAL") आणि शेवटी कुठेतरी जन्म - मृत्यूचे चक्र मानण्याकडे वळलेले तत्वज्ञान वाचताना एकाकीपण येते. चित्रपट पहाताना देखील असेच होते.

In reply to by आदूबाळ

विकास Wed, 07/02/2014 - 20:29
हिचहायकर्स गाईड टू द गॅलेक्सी हे अजून वाचायचे राहीले आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! :) अर्थात त्याची आणि फाउंडेशनची तुलना करू इच्छित नाही.

In reply to by एस

एस गुरुवार, 07/10/2014 - 14:11
'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्'

     अरूंधती रॉय यांची ही एकोणिसशे सत्त्याण्णव सालची मॅन बुकर पारितोषिक विजेती इंग्रजी कादंबरी.

TheGodofSmallThings     कादंबरीतील मुख्य घटना घडतात १९६९ साली. पण जेव्हा कादंबरीतील पात्रांमधील दोन जुळ्या भावंडांपैकी 'राहेल' वयाच्या एकतिसाव्या वर्षी 'अयमेनम हाउस' या तिच्या आजोळच्या घरी परत येते तेव्हा कादंबरीची सुरुवात होते. राहेल आणि तिचा अठरा मिनिटांनी मोठा असलेला जुळा भाऊ 'एस्था' यांच्याभोवती आणि त्यांच्या भावविश्वात घडत राहणार्‍या छोट्यामोठ्या गोष्टींची दोलायमान गुंफण लेखिका तिच्या वाचकांभोवती विणत राहते. त्या दोघांच्या आणि प्रामुख्याने राहेलच्या सात-वर्षे-वयाच्या संवेदनशील नजरेतून आपल्यासमोर कादंबरीचा पट उलगडत जातो.

     पण असे असले तरी या कथानकाचा कर्ता प्रथमपुरुषी नाही. लेखिका एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे फ्लॅशबॅक, लांबलेली उपकथानके, लहान मुलांना असते तेवढी समज आणि त्यातून त्यांना त्यांच्या निरागस नजरेने दिसणारे कठोर जग, त्यातून त्यांनी आपल्या परीने स्वतःच शिकलेले शहाणपण, तथाकथित मोठ्यांचा तितकाच दांभिक व्यवहारीपणा, भारताचा जातिव्यवस्थेच्या, स्पृश्यास्पृश्यतेच्या कठोर सामाजिक वास्तवाची आणि राजकीय-आर्थिक बदलांची सरमिसळ, त्यात होरपळणारे निर्दोष समाजघटक, वसाहतवादी इतिहासातून स्वातंत्र्यात येताना अ‍ॅन्ग्लोफाइल उच्चभ्रू वर्गाला भेडसावणारा त्रिशंकू सिंड्रोम, निसर्गाची मुक्त अर्थव्यवस्थेत येताना झालेली वाताहत आणि कादंबरीतील पात्रांच्या जीवनाच्या अवमूल्यनाशी याचा दिसणारा समांतरपणा या सगळ्या कथाबीजांचा, पात्रांचा, पार्श्वभूमीचा आणि लेखनतंत्राचा वापर करून काळाच्या पटलावर पुढेमागे तिच्या लेखणीचे स्वैर फटकारे मारीत राहते...

     कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ही दोन जुळी भावंडे. त्याबरोबर कादंबरीत येणारी विविध पात्रे त्यांच्या अनावृत्त वृत्ती-प्रवृत्तींसह आणि कथानकातील घटनांच्या त्यांच्यावरील परिणामांसकट वाचकाला पदोपदी भेटतात. एस्था आणि राहेल यांची घटस्फोटीत तरूण आई 'अम्मू', त्यांचे रागीट आजोबा व सहनशील आजी, त्यांचा ऑक्सफर्डवरून शिकून परत आलेला आणि आजीचा व्यवसाय सांभाळणारा मामा 'चाको', त्याची पूर्वाश्रमीची इंग्लिश पत्नी 'मार्गारेट' आणि गोरीपान मुलगी 'सोफी', अविवाहित राहिलेली आणि त्यांच्याशी फणकार्याने वागणारी त्यांच्या आईची आत्या 'बेबी कोचम्मा', पोलिस निरीक्षक आणि मार्क्सिस्ट नेता अशी माणसे आणि सर्वात महत्त्वाचा या सगळ्यात त्यांच्याशी प्रेमळपणे वागणारी एकमेव व्यक्ती अस्पृश्य कामगार 'वेलुथा'.

     दारुड्या नवर्‍याला सोडून परत आलेली अम्मू आपल्या दोन मुलांसकट तिच्या माहेरी रहायला येते. तिच्या रागीट बापाला आणि आत्याला ते आवडलेले नसते. याचा परिणाम म्हणून त्यांचे अयमेनम हाउसमधील स्थान नेहमीच दुय्यम राहणार असते. अम्मूची अविवाहित आत्या बेबी कोचम्मा हिने कधी काळी 'नन' बनण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या निर्णयामागे देवाची भक्ती नसून तिला तेव्हा भेटलेला कुणी फादर मुलिगन आणि तरूण नवोमीचे त्याच्याकडे आकर्षित होणे असते. हा प्रेमभंग नंतर तिचे कठोर व्यक्तिमत्त्व बनण्यास आणि अम्मूच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणार असतो का? की त्यांचा मामा चाको आणि त्याचा विक्षिप्त गर्विष्ठपणा? चाको ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकतानाच एका इंग्लिश वेट्रेसच्या, मार्गारेटच्या प्रेमात पडलेला असतो. पण मार्गारेटच्या पालकांना तिने एका काळ्याशी, भारतीयाशी लग्न करावे हे आवडलेले नसते. पण हे लग्नही जास्त टिकत नाही. चाको आणि मार्गारेटच्या मुलीच्या - सोफीचा जन्मानंतर ते विभक्त होतात. मार्गारेट गरोदर असतानाच दुसर्‍याच्या प्रेमात पडलेली असते. वैवाहिक आणि शैक्षणिक अपयश पदरात घेऊन चाको भारतात परततो ते घरचा लोणची बनवण्याचा व्यवसाय सांभाळायला. आता तो एक श्रीमंत उद्योजक म्हणून आपल्याला भेटतो. इकडे इपे कुटुंबाचा परंपरागत वृद्ध नोकर वेल्ल्या पापेन आणि त्याचा तरूण मुलगा वेलुथा हे त्यांना जातिव्यवस्थेने मिळालेली अस्पृश्यता आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील खालचे स्थान सांभाळत जगत असतात. वेलुथा काहीसा बंडखोर आहे. तो मार्क्सवादी असल्याचा बेबी कोचम्माला आणि इन्स्पेक्टरला संशय आहे. त्यामुळे बेबी कोचम्माला वेलुथाबद्दल अनामिक भीती वाटतेय. तीच भीती जी सामर्थ्यवान घटकाला दुर्बल घटकांबद्दल सतत वाटत राहते, दुर्बल पुढेमागे सबल होऊन त्यांची सत्ता उलटून देतील अशी भीती. हीच भीती पुढे वेलुथाला आणि तो प्रेम करत असलेल्या जुळ्या भावंडांना व त्यांच्या तरूण आईला उद्ध्वस्त करणार असते का?

     त्या रात्री काय घडले? घुसमट आणि अन्याय यांपासून कुठले जीव पळू पाहत होते? कोणाच्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिण्याचे धाडस केले ज्या स्वप्नांना इतिहासाच्या नियमचौकटींची मान्यता नव्हती? कुठले चिमुकले हात त्या रात्री बोट उलटल्यावर अनोळखी पाण्यावर परत आले नव्हते? त्या अंधार्‍या झाडीत कोणाच्या डोळ्यांनी एक गुन्हा पाहिला होता ज्या गुन्ह्याचे साक्षीदार होण्याचे अपील परिस्थितीच्या न्यायव्यवस्थेने त्यांना झिडकारले होते? लहानग्या, शहाण्या एस्थाने उरलेल्या आयुष्यभर अबोलपणे वावरावे असे त्याला काय बोलायला लावले गेले साक्षीदाराच्या कठड्यात?

     गुन्हा काय होता? कोणी केला होता? कोणाला शिक्षा झाली आणि कोण मेले त्या रात्री?

 

     रॉय यांची लेखणी परंपरेने चालत आलेली लेखनाची चौकट नाकारते, उलटून लावते. त्यांची भाषा कधी अल्लड निरागसतेने कर्मठ वाचकांना त्रास देत व्याकरणाचे-शुद्धलेखनाचे नियम तोडते, तर कधी स्थितप्रज्ञाच्या गांभीर्याने इतिहासातून उतरलेले धागे विणत मानवी आयुष्याचा त्यासमोरचा क्षुद्रपणा दाखवत या नाट्यावर भाष्य करते. कादंबरीची पानेही पारंपारिक एकमार्गीपणा नाकारतात. यातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रसंग कालाच्या पटलावर एकसुरीपणे आपापली जागा घेत असला तरी कादंबरीत मात्र सर्व सोबतच येत राहते. मग तो त्र्याण्णव सालचा राहेल परत आल्यावर तिला दिसलेला अबोल एस्था असो वा एकोणसत्तरचा विमानतळावर सोफीमोल आणि मार्गारेटला आणायला जाणारा 'घरातील पुरुष' मुलगा एस्था असो. अभिलाष टॉकीजमध्ये साउंड ऑफ म्युजिक पाहताना ऑरेंजमॅन-लेमनमॅनकडून एस्थाचे होणारे लैंगिक शोषण किंवा वेलुथाला काहीही अपराध नसताना लाथाबुक्क्यांनी होणारी कोठडीतील मारहाण असो. या घटना आणि त्यानंतर येणारी मानवी आयुष्यांची वाताहत, उद्ध्वस्तता रॉय फ्लॅशबॅकमधून मागेपुढे रेखत जातात. त्यांच्या लेखणीत परिणाम आधी येतो आणि मग कारण. आणि जणू काही त्यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत उरणारी अपरिहार्यता वाचकांच्या मनात सांडत जाते - लाइक टी फ्रॉम टीबॅग.

     अनेकांना हे पुस्तक आवडले नाही. कित्येकांना झेपलेही नाही. मलाही बर्‍याचदा वाचल्यानंतर आणि इतकी वर्षे डोक्यात घोळवल्यावर त्यावर चार शब्द लिहिता आलेत. अरूंधती रॉय यांची इतर मते व त्यांची वादग्रस्तता हा वेगळा विषय आहे. पण माझ्यापुरता माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारी ही मला सर्वात जास्त आवडणारी कादंबरी आहे.

In reply to by मितान

एस Fri, 07/11/2014 - 12:21
जितकं मनात होतं त्याच्या एक टक्काही नीट लिहिता आलं नाही! पण इतर कशासाठी नाही तर किमान यातील भाषेसाठीतरी 'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्' नक्की वाचा.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 17:55
"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक मार्गालिट फॉक्स या लेखिकेचे पुस्तक वाचले. लिनिअर बी या लिपीचा उलगडा करणार्‍या संशोधकांपैकी जॉन चॅडविकचे पुस्तक अगोदर वाचले होते, त्यानंतर त्याच विषयावरचे हे पुस्तक वाचले. बेशिक तेच तेच असले तरी अ‍ॅलिस कोबेर या भाषाशास्रज्ञ बाईंबद्दल पहिल्यांदा डीटेल माहिती यात मिळते. महायुद्धाच्या काळात कागद मिळेना म्हणताना लायब्ररीतील पुस्तकांच्या नेआणवाल्या स्लिपा, सिगरेटची पाकिटे, ग्रीटिंग कार्ड आणि वह्यांचे पुठ्ठे, इ.इ. जे काय मिळेल ते वापरून तिने जवळपास १,८०,००० छोटी नोंदकार्डे बनवली आणि लिनिअर बीचा जवळपास फडशाच पाडला. पण जॉन मायर्सची किरकीर, तसेच कॉलेजचा शिकवण्याचा लोड, इ.इ. लडतरींमुळे बिचारीला काही पुढं जाता आलं नाही. पण जे केलं त्याचा मायकेल व्हेंट्रिसला पुढं लै उपयोग झाला. अ‍ॅलिस कोबेरची नव्याने ओळख झाल्याचा लैच मोठा फायदा झाला या पुस्तकामुळे. आता नेक्ष्ट टार्गेट 'द मायसीनिअन वर्ल्ड' बाय जॉन चॅडविक. लिनिअर बीच्या जवळपास ६००० मृत्तिकालेखांतून आपल्याला काय काय माहिती मिळते त्याचा आढावा घेणारं पुस्तक आहे. अपोलो, पोसायडन, इ. देवांची नावे, ट्रॉयहून आणलेल्या गुलाम स्त्रिया, गुलामांना दिलेली अपमानजनक नावे, झालंच तर अकिलीसचे नाव कोरलेले मिळणे, इ.इ. बर्‍याच गंमतीजमती आहेत.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 18:01
"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी बिहाईंड द व्हेल इन सौदी अरेबिया" हे जीन सॅसनचे पुस्तक मध्ये वाचले. सौदी राजघराण्यातल्या एका सुलताना नामक राजकन्येचे (नाव बदलून पण खर्रेखुर्रे) आत्मवृत्त आहे. काळ १९७० पासून पुढचा. नॉट विदौट माय डॉटर, सोन्याच्या धुराचे ठसके, मयादा, इ. पुस्तके वाचलेल्यांना काही नवीन नाही. पण राजघराण्यातील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्त्रियांच्या पशुवत् स्थितीचे वर्णन कधी वाचले नव्हते ते या निमित्ताने वाचायला मिळाले. वर्णनशैली 'व्हिव्हिड" (मराठी?) आहे, खिळवून ठेवणारी आहे. बर्‍याच गोष्टींबद्दल आधी कुठेसे वाचले असले तरी इथे त्या एकदम अंगावर येतात. सौदी राजघराण्याची अगणित संपत्ती आणि शिवाय स्त्रियांवरच्या बंधनांमुळे येणार्‍या कंटाळ्याचे, रितेपणाचे वर्णन यथार्थ आहे. अशी वर्णने कैकदा डिसमिसिवली जातात, सुख टोचतंय इ.इ. म्हणून. पण त्यामुळे त्यांची सत्यता कमी होते असे मला तरी वाटत नाही. असो. सौदीमध्ये अलीकडे झालेले काही बदल त्या तुलनेने बरेच स्वागतार्ह आहेत. बाकी, जीन सॅसनबद्दल फ्रॉडचे आरोपही झालेत, तेव्हा किती खरेखोटे ते तो एक अल्लाच जाणे. पण पुस्तक रोचक आहे हे नक्की.

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 18:36
कदाचित अनेकांनी वाचली असेल तरीही अमृतवेल - वि. स. खांडेकर सगळ्यात पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडली होती पण समजण्या एवढी कुवत नव्हती. पण तेव्हा आवडलेल्या ओळी, परिच्छेद हे एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवले जायचे. परत कधीतरी वहीतून हे संग्रहित साहित्य वाचून आनंद मिळायचा. अशीच एक वही वाचताना ही कादंबरी पुन्हा वाचावीशी वाटली. पुन्हा शोध घेऊन वाचली. तेव्हा ती अधिक समजली. आधी ज्या ओळी केवळ पुस्तकी किंवा आलंकारिक म्हणून जास्त आवडल्या होत्या, त्या नंतर वाचताना अधिक उमगल्या. वयानुसार आणि काळानुसार वेगळ्या दृष्टीने वाचली गेली. अनेक व्याख्या बदलल्या होत्या. पण तरीही आवडीच्या यादीत अजूनच फिट्ट बसली. त्यापैकीच काही निवडक देतेय…(आता ती वही राहिली नाही, ती लिहून ठेवायची सवयही नाही, तेव्हा आंतरजालावरून साभार) "भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदानही लाभले आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला आनंद लुटणे, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळ लेल्या पायानी दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो त्यामुळे." वि.स.

In reply to by मधुरा देशपांडे

सौंदाळा गुरुवार, 07/03/2014 - 18:45
अमृतवेल मधे तुम्ही वर दिल्याप्रमाणे अनेक सुंदर ओळी आहेत पण एक कथानक म्हणुन ती मला अगदीच सामान्य वाटली.

In reply to by मधुरा देशपांडे

यशोधरा गुरुवार, 07/03/2014 - 18:48
लहानपणी वाचली होती तेह्वा मलाही खूप आवडली होती अमृतवेल. आता कथानक वाचूही शकत नाही. पण त्यातील संवाद, भाषा सुरेख होती हे मात्र खरेच. आता अमृतवेल कथानकासाठी वाचवत नाही पण भाषेसाठी संग्रही ठेवली आहे. :)

In reply to by मधुरा देशपांडे

विकास गुरुवार, 07/03/2014 - 19:51
खांडेकर म्हणल्यावर दोन पुस्तके आठवली. एक म्हणजे "ययाती" - लहानपणी वाचले तेंव्हा खूप आवडले. जसे होते तसे एक कादंबरी म्हणून समजून घेतले. नंतर दुर्गाबाई भागवतांची त्यावरील टिका वाचली आणि त्यातील चुका समजल्या. दुसरे पुस्तक म्हणजे, "सोनेरी स्वप्न भंगलेली" - नीट आठवत नाही. पण गांधीवादी पिढीला आलेले स्वातंत्र्योत्तर नैराश्य (फोलपणा) ह्यावर आधारीत कथानक होते.

In reply to by प्रचेतस

विकास गुरुवार, 07/03/2014 - 21:20
मला आठवावे लागेल. मी नंतर पुस्तक शोधून अधिक संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांचा मुद्दा असा होता की पुराणातल्या कथेवर कथानक बसवताना खांडेकरांनी संस्कृतीचे मिश्रण केले होते. काही वेळेस त्यातले काही प्रसंग होते ते तर वास्तवीक ख्रिस्ती परंपरेतले होते, असेच अजूनही काही होते. येथे एक लक्षात ठेवावे बाईंच आक्षेप ख्रिस्ती धर्म वगैरे नव्हता तर सरमिसळ करत योग्य चित्र न उभारण्यात होता.

In reply to by विकास

प्रचेतस गुरुवार, 07/03/2014 - 21:49
धन्यवाद. 'ययाती' वाचण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला होता पण वाचवले गेले नव्हता. महाभारतातील मूळ यायातीचे उपाख्यान कितीतरी सरस आहे त्यापेक्षा. तसेही ऐतिहासिक अथवा पौराणिक कथानकांवर कादंबरी लिहिताना बरेचसे लेखक (मूळ कथानकच नाट्यमय असतानाही) प्रमाणाबाहेर लेखनस्वातंत्र्य घेतात आणि कादंबरीची अक्षरश: वाट लावतात. यात रणजीत देसाई, शिवाजी सावंत आदि मान्यवरही आले.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:19
ययाति केवळ कादंबरी म्हणून वाचताना खूपच सुंदर आहे. अर्थात मूळ कथेपेक्षा अधिक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत हे लक्षात येतं, तरीही मला तरी ती हातातून ठेववत नव्हती. पण सरमिसळ केली तरीही मूळ कथेच्या गाभ्याला धक्का लावलाय असं वाटलं नाही. इतर कादंबर्‍यांबाबत सहमत.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 20:01
आमच्या घरात वाचनाची आवड आई आणि वडील दोघांनाही. आईला रोजच्या वर्तमानपत्रापलीकडे जास्त कांही वाचताना पाहिलं नाही. तिला तेवढा मोकळावेळही नसायचा. वडील कथा कादंबर्‍या वाचायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या बाबतीत आईचा आग्रह असायचा की, 'बाहेर उडाणटप्पूपणा करण्यापेक्षा घरात बसून पुस्तकं वाच.' आमच्या गल्लीत आमचे समाजसेवी फॅमिली डॉक्टर (डॉ. भांडारकर) ह्यांनी एक मोफत वाचनालय चालविले होते. स्वतः पदरमोड करून ते वाचनालय चालवायचे. तिथे लहानपणी परोपकारी गोपाळ, गोट्या, फास्टर फेणे, कर्‍हेचे पाणी वगैरे पुस्तके आणि विज्ञानयुग, अमृत, फुलबाग, विचित्रविश्व वगैरे नियतकालीकं फुकट वाचायला मिळायची. ती तिथेच बसून अट असायची. पुस्तक घरी न्यायचे असेल तर एकदाच ५ रुपये अनामत रक्कम ठेवावी लागे. आईने आम्हा दोन्ही भावंडांच्या नांवे तशी रक्कम भरून पुस्तके घरी आणून वाचायची सुविधा आम्हाला पुरविली. पुढे गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा उघडली आणि अवघे साहित्यिक विश्व आमच्या दारी आले. तिथेही अनेक पुस्तके वाचली. पुढे नोकरीला लागल्यावर पुस्तके विकत घेऊन वाचायचे 'व्यसन' लागले. शाळेतून पुलंची ओळख होतीच. 'खोगीरभरती'तला धडा होता. मासिकांमधून वपुंची ओळख झाली. कॉलेजात 'गारंबीचा बापू' मुळे श्रीनांनी वेड लावले, नाटकांच्या आवडीतून 'गुतता हृदय' मुळे शन्ना आपलेसे वाटू लागले. आयुष्याच्या वाटेवर लहान आणि तरूणपणी अशा अनेक लेखक/लेखिका मला बोट धरून चालवलं. घरी आईवडील, शाळेत शिक्षक आणि पुस्तकरुपाने ह्या सर्व साहित्यिकांनी अनेक चांगले संस्कार घडविले. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही. ह्या साहित्य आकर्षणाच्या वटवृक्षाचं मूळ रोपटं आईने लावलं, आपल्या नजरेखाली वाढविलं. रोजची वर्तमानपत्र, दिवाळी अंक (तोही लोकसत्ता), आणि पुढे पुढे कालनिर्णयची पाठीमागची बाजू ह्याच्या बळावर वाचनाचं महत्त्व जाणून तिने आम्हाला (मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला) वाचनाचं वेड लावलं. ह्या धाग्यावर माझ्याकडून एखाद्या (कदाचित जास्तच) पुस्तकाबद्दल लिहीण्याआधी, ही आवड जिने लावली त्या आईबद्दल आधी लिहीणं मला जास्त उचित वाटलं म्हणून लिहीलं. धाग्याच्या विषयाला सोडून आहे. पण एवढे खपवून घ्या. लवकरच माझ्या वाचनवेडा विषयी लिहीन.

सस्नेह गुरुवार, 07/03/2014 - 22:07
ले. शशी भागवत. कळत्या वयात या कादंबरीने वेड लावले होते अन अजुनी वाचताना मोहवते. प्राचीन काळातील वैभवशाली चित्रण, रहस्य, व्यक्तिवैचिध्य अन नर्म शृंगार यांची चित्तवेधक गुंफण म्हणजे मर्मभेद. शशी भागवतांच्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कादंबर्‍या आहेत. त्यात सर्वात सरस मर्मभेद. अवश्य वाचा.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:47
मर्मभेद वाचले आहे. तुम्ही म्हणता तसे किशोर वयात वाचण्यासारखे आहे. चंद्रलेखा ला जशी प्रसिद्धी मिळाली तशी मर्मभेद ला मिळायला हवी होती.

In reply to by सस्नेह

कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 20:41
मर्मभेद पेक्षा रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा जास्त आवडल्या.. अजून एक कादंबरी अप्रकाशित आहे असे एकून आहे

अजया गुरुवार, 07/03/2014 - 22:12
प्रकाश नारायण संत माझे अत्यंत आवडते लेखक.त्यांची वनवास्,शारदासंगीत पंखा आणि झुंबर अशी चार(च) पुस्तकं आहेत.या चारही पुस्तकातून आपल्याला कथानायक लंपन भेटतो,आई वडिलांपासून दूर आजी आजोबांकडे राहाणारा.पौगंडावस्थेतले अवघड वय्,अतिशय संवेदनाशील स्वभाव असणारा.सुंदर पेटी वाजवणारा,सुमीकडे चोरुन बघणारा! सर्वच पुस्तकांमध्यली भाषा बेळ्गावी मराठी.ती वाचताना अगदी गोड वाटते.लंप्याचे मित्र त्याला काय करायलय लंप्या!असं बोलणारे.त्यांची नावही मस्तच! कणबर्गी गंग्या,सोंडृया,परळ्या,टुकण्या! मी माझ्या मुलाच्या मित्रांना ही नावं बहाल केली आहेत! या सर्वच कथांमध्ये लंपन बरोबरच तो परिसर ,ती भाषा,गुंडीमठ रस्ता,शारदासंगीत विद्यालय्,सुमीची सोनसाखळी,लंप्याचे मित्र्,त्यांची टारझनगीरी! अगदी नकादुचेण्या कपासके(केस कापण्याचे दुकान!!) असे सगळं मिळून या अनोख्या कथा जमून आल्या आहेत. लंपनच्या भाषेत अठ्ठाविसशे तीस वेळा जरी ही पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं हे खरं! या लंपनशी माझं एक छानसं नातं आहे. माझ्या प्रेग्नंन्सीच्या दिवसात वनवास माझ्या हातात पडलं.हे पुस्तक इतकं आवडलं की त्याची पारायणं झाली. त्यातल्या लंपनचेच गर्भसंस्कार झाल्यासरखा माझा मुलगाही तसाच शांत्,डोक्यात चक्र असणारा ,संवेदनशील आहे. इतका या पुस्तकाचा परिणाम!

In reply to by नंदन

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 16:05
+२८३० एक्दम मॅड पुस्तकं! हुंब माणूस पण प्रेमात पडेल अशी.

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 01:53
शालेय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं चिमुकलं मन केंव्हाच व्यापून टाकलं होतं. पुढे एका शिवजयंती कार्यक्रमात श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांचं अफजलखान वधाचं आख्यान ऐकलं आणि तरूण मनावर रोमांच उभं राहिलं बाबासाहेबांची ओघवती भाषा, आवेश, आवाजातील चढ उतार आणि संपूर्ण प्रसंग जस्साच्यातस्सा डोळ्यासमोर उभा करण्याची बाबासाहेबांची हातोटी ह्या सर्वाचा माझ्या तरूण मराठी मनावर सकारात्मक परिणाम झाला. त्या नंतर आले बाबासाहेबांनी लिहीलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक. माझ्या एका मित्राच्या बायकोने ते मला वाचायला दिले. ते दोन दिवसात बाचून संपविले पण शिवचरीत्राने आलेले भारावलेपण संपता संपेना. पुन्हा एकदा बाबासाहेबांची भाषा, ते तारीखवार तपशिल, मराठी तिथी-तारखा आणि प्रसंगातले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. ह्या पुस्तकातील प्रसंगानुरुप काढलेली चित्रं अतिशय नेमकी आहेत. प्रत्येक प्रसंगात आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत असाच भास होतो. मन पूर्णपणे इतिहासात रममाण होते. मोघलांविरुद्ध लढायांचे वर्णन वाचताना आपल्याही चेव येतो आणि मावळ्यांची स्वामीभक्ती पाहून आपल्याही मनांत शिवाजी महाराजांबद्दल आदरभावना निर्माण होते. पावनखिंड प्रसंग अंगावर काटा आणतो. नंतर प्रत्यक्ष पावनखिंडीला भेट दिली तेंव्हा राजा शिवछत्रपती कादंबरीतील बाजीप्रभू देशपांडे ह्याची एकाकी लढत आठवली आणि आदराने नतमस्तक झालो. सर्वच दृष्टीने पुस्तक वाचनिय आणि संग्रहणिय आहे. पुन्हा पुन्हा राजा शिवछत्रपती कादंबरीची अनेक पारायणं होतात. दरवेळी तोच आणि तेव्हढाच आनंद होतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सखी Fri, 07/04/2014 - 03:05
पेठकर काका मलाही हीच पहिली कादंबरी आठवली जी शालेय जीवनात वाचुनही अजुनही भारावुन टाकते. जाणता राजा बघणं हाही एक आनंददायी सोहळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच शिवचरीत कथन जालावर आहे.

In reply to by सखी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 10:27
'जाणता राजा' एक विस्मयकारक कलाकृती आहे. रंगमंचाची भव्यता, २००+ कलाकारांचा उत्साह, प्रकाश योजना, वेशभूषा, आतिशबाजी, घोडेस्वार, बैलगाडी सर्व सर्व अगदी नजरेचे पारणे फेडणारे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण नाटक ध्वनीमुद्रित आहे आणि प्रत्यक्ष बोललेले संवाद नाहीत. त्यामुळे संवाद विसरण्याची, नाटक रेंगाळण्याची शक्यता उरत नाही. शिवचरीत्राचे चित्ररुप धावते आणि अद्भूत समालोचन म्हणता येईल. जाणता राजाच्या कार्यक्रमात, मध्यंतरात, रंगमंचाच्या मागे, बाबासाहेबांना भेटण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ५ दिवस लंडन दर्शन कार्यक्रमात बाबासाहेबांचा सहवास लाभला. ब्यांण्णव्यावर्षीही बाबासाहेबांची स्मरणशक्ती आणि वाचा कणखर आहे. आज दुर्दैवाने ते व्हिल चेअरवर असले तरीही उत्साह पन्नाशीतला आहे. अजूनही ते व्याख्यानाला तयार आहेत. मस्कतला त्यांना बोलावण्याचे घाटत आहे. निदान १ दिवस तरी हल्लीच्या पिढीला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून शिवचरीत्र ऐकवावे ह्या उद्देशाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यांना आमच्याकडून....मानाचा मुजरा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एसमाळी Fri, 07/04/2014 - 17:09
राजा शिवछत्रपती मध्ये काही चुका आहेत.ज्या आजतागायत सुधारल्या गेल्या नाहित.पुस्तक एकदा वाचल्यावर पुन्हा वाचावे असे नाही वाटले.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 17:44
प्रत्यक्ष शिवकालासंबंधी फॅक्च्युअल चुका नसाव्यात असे वाटते, मात्र देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने केलेली स्वारी, त्यानंतरची तथाकथित लूट, इ.इ. अतिरंजित वर्णने जुन्या तवारिखांतून आहेत तश्शीच्या तश्शी उचलली आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. ब्रह्मानंद देशपांडे यांनी 'देवगिरीचे यादव' नामक पुस्तक लिहिले आहे त्यात त्या वर्णनांतील अतिरंजितपणा सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

धन्या Fri, 07/04/2014 - 11:00
डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं हे एक नितांत सुंदर पुस्तक आहे.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
- रंग सुखाचे पुस्तकाची बुकगंगा डॉट कॉम वर दिलेली माहिती.

स्नेहल महेश Fri, 07/04/2014 - 11:52
मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि तशी बरीच पुस्तक वाचली आहेत पण मला सुधा मूर्ती या लेखिकेची पुस्तके खूप आवडतात मी वाचलेली काही पुस्तके Dollar Bahu Gently Falls the Bakula Wise & Otherwise THE DAY I STOPPED DRINKING MILK काही इतर पुस्तके (लेखक -आमिष त्रिपाठी ) मेलुहा चे मृतुंजय नागाचे रहस्य शपथ वयुपुत्राची

मनिष Fri, 07/04/2014 - 12:33
सध्या फारशा कादंबर्‍या किंवा फिक्शन वाचत नाही पण जवळपास २० वर्षे आधी वाचलेली रारंग ढांग आजही आवडते. हिमालयाच्या पार्श्वभुमीवरची, Border Roads Organisation बरोबर हिमालयात रस्ता बनवणार्‍या विस्वनाथची ही कथा. त्याचे ज्ञान, थोडा एककल्ली हेकटपणा, आदर्शवाद आणि त्याच्या जोडिला वैतागलेला नायर आणि जिंदादिल मिनू. सगळे मिळून एक भन्नाट रसायन झालेय. पुढे कधीतरी डॉ. दाढेंशी गप्पांमधे कर्नल आनंदराव (पहिल्या नावाविषयी खात्री नाही, पण बहुदा हेच) जाधव यांनी लिहिलेल्या 'जिंदादिल' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाशी असलेल्या ह्या कादंबरीच्या नात्याबरोबर कळले. खूप शोधुनही हे 'जिंदादिल' अजुनही मिळाले नाहीच. :( ह्याबद्दल अजून काय, काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्‍यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे (अमोल पालेकरांना) परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे!
रारंग ढांग विषयी पुस्तकविश्व्वरील श्रावण मोडक यांचा लेख इथे वाचता येईल - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A5%A7

In reply to by मनिष

एस Fri, 07/04/2014 - 15:39
रारंग ढांगने झपाटून टाकले होते. तेव्हा काय वाटत होते हे तुम्ही आणि श्रामोंच्या पुस्तकविश्वाच्या लेखात त्यांनी छान सांगितले आहे.

In reply to by मनिष

सखी गुरुवार, 07/10/2014 - 15:25
मनिष हा प्रतिसाद रारंगढांगवरचा अतिशय आवडला, श्रामोंचा लेख वाचण्यात आला नव्हता, तोही खूप आवडला, इथे दुवा दिल्याबद्द्ल आभार. तसेच तुमचा व्लॉगवरचा लेखही निरुत्तर करणारा. मिपावरच डॉ. दाढेंचा हालेखही सापडला. यावरती येणारं सिनेमा, नाटक गुलदस्त्यातच राहीलं तरी अभिवाचन स्नॉवेलवर आलयं असं वाटतं. 'पुन्हा रारंग ढांग' कुणी वाचलय का? यावर दिवाळी अंकात कोणीतरी आव्हान दिल्याचे आठवते दुवा सापडला तर टाकते परत येऊन.

In reply to by सखी

सखी Sun, 07/13/2014 - 08:22
पुस्तकाचं नाव 'पुन्हा रारंग ढांग' नाही तर 'रारंग ढांग नंतर … ' असे आहे. श्रीकृष्ण सवदी यांनी लिहलेलं आहे. चंद्रकांत मासिकानं दिलेले हे आव्हान त्यांनी पेललं, असं पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलं आहे, दुवा.

मनिष Fri, 07/04/2014 - 12:36
अरे हो! सांगायचे राहिलेच. उपक्रम खूप आवडला. कादंबरी सोडून नुसत्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहायला सांगितले तर मग माझ्यासाठीच एक नवीन विभाग सुरू करावा लागेल, आणि अर्थातच कोणालातरी माझ्या पोटापाण्याची सोयही करावी लागेल. :P

स्पा Fri, 07/04/2014 - 13:07
मुळ लेखक : कॉरम्याक मकार्थी अनुवाद : अनिल किणीकर एक अचाट पुस्तक , वेगळाच प्लॉट . बेचिराख झालेले जग , कशाने, का माहित नाही कथानकाला भूतकाळ नाही , भविष्य नाही फक्त वर्तमान बेचिराख झालेल्या अमेरिकेतून जगण्याची धडपड करत वाट काढत दक्षिणेकडे समुद्र किनार्यावर जाणारा एक अनामिक बाप आणि त्याचा लहानसा मुलगा. जग बेचिराख झालेले , प्रचंड मनुष्यसंहार झालेला , निसर्गाची अवकृपा कि मानवी युद्ध माहित नाही , जगण्यासाठी उरलेल्या मानव प्राण्याची एकमेकात चालेलेली चढा ओढ . खायला प्यायला काही नाही, मरण निश्चित, फक्त ते किती लांबवता येतंय यावर सगळा खेळ. जवळ सामान म्हणजे स्वरक्षणासाठी असलेले एक छोटे पिस्तोल. अंगावरचे कपडे , इकडून तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक ढकलगाडी , एकमेकांशिवाय कोणी नाही . कादंबरीचा कालखंड , पात्रांची नवे शिवाय इतर विशेष पार्श्वभूमी न कळताहि हे पुस्तक पहिल्या पानापासून खिळवून ठेवते , बाप लेकातले नातेही सुंदर . शेवटी त्याच्न्या प्रवासाचे काय होते , तो कुठे संपतो यासाठी पुस्तक वाचणे आले २००७ सालातला पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. २००९ साली यावर "द रोड" नावाने चित्रपट सुद्धा आलाय

स्पा Fri, 07/04/2014 - 13:08
भैरप्पांचा "पर्व"चा , (उमा कुलकर्णी यांनी केलेला) अनुवाद हातात आला , तेंव्हा महाभारतावरील अजून एक कादंबरी इतकेच त्याचे स्वरूप मनात होते.काहीतरी हटके असणार याची कल्पना आलेली होती. वाचायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच भैरप्पानी पेललेल्या शिव धनुष्याची जाणीव झाली. आयुष्यातली जवळ जवळ १२ वर्ष एका कादंबरीसाठी खर्ची घालणे म्हणजे खरंच ग्रेट गोष्ट आहे.महाभारत घडलेल्या जागांचा शोध काढून तिथल्या निसर्गाचा,लोकांचा,संस्कृतीचा अभ्यास करून, मूळ महाभारतातल्या चमत्कारांचा, दंतकथांचा,शापांचा,वरदानांचा सुसंगत असा वैज्ञानिक, हल्लीच्या मानवी तर्कदृष्टीला पटेल असा निष्कर्ष काढून तो कादंबरीत आखणे.शिवाय त्यातली महाभारत आपल्या निवेदनातून उलगडणारी हटके पात्रनिवड. पर्व वर परीक्षण असे लिहायला घेतले तर कदाचित मूळ कादंबरी सारखाच एक जाडजूड ग्रंथ व्हायचा. इतके दिवस महाभारताबद्दल जे ग्ल्यामर इतक्या साहित्यिकांनी आपल्याभोवती निर्माण केले होतं, त्याचा चक्काचूर करण्याच काम "पर्व" व्यवस्थित पार पाडत, तेही वाचताना कुठेही "छे हे काही पटले नाही बुवा" असे वाटत नाही. अख्या पर्व कादंबरीत लेखक कुणा एकाची बाजू घेत नाही, कोणाला हिरो किंवा कुणाला खलनायक ठरवत नाही. जे घडलं असाव ते तो फक्त आपल्या समोर तर्कसंगत पणे मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या मते हेच या कादंबरीचे यश आहे. कुंतीला पंचतत्वांपासून पांडव झाले.. अशी कथा असताना , भैरप्पा प्राचीन भारतातही नियोग पद्धत (सरोगसी) अस्तित्वात होती हे ठामपणे मांडतात. कृष्णाने कालिया मर्दन केले असे न म्हणता , पूर्वी नाग नावाच्या लोकांची टोळी होती. त्यांना संपवले किंवा द्रौपदीला मिळवण्यासाठी पांडवान्मध्येच सुरु झालेली भांडणं, आणि भांडण मिटव्ण्यासाठी कुंतीनेच द्रौपदीला तुला समाधान द्यायला ५ ५ पुरुष असताना चिंता कसली असा दिलेला सल्ला !! एक ना अनेक , कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर भैरप्पा आपल्या मनावर महाभारताविषयीच्या चढलेल्या चमत्काराचा बुरखा टराटरा फाडतात. आणि मग एकदम हि सगळी पात्र अगदी ( कृष्ण ,कर्णासकट)मानवी पातळीवर वावरायला लागतात. हि सगळी आपल्यासारखीच अनेक विकारांनी बनलेली असतात. त्यांच्यातही लैंगिक वासना, कट -कारस्थान , सत्तेसाठी काहीही करण्याची वृत्ती असते. कौरव वाईट किंवा पांडव सगुणाचे पुतळे हा भेद उरतच नाही. उरते ती फक्त सत्ता मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी गाठलेली मानवी स्वभावाची नीचतम हद्द आणि कदाचित व्यासांना अभिप्रेत असलेल हेच ते "महाभारत". एक अप्रतिम महानाट्य. मानवी स्वभावाचे प्रत्येक पैलू .. किंवा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याची मांडणी केलेलं एक प्राचीन काव्य . शेवटा कडच्या युद्धात तर मानवपातळी वरून हि पात्र पशुपातळीवर येतात. युद्ध संपेपर्यंत प्रचंड मानव संहार होतो.कौरवांचा दारूण पराभव होतो.पण पांडवांना हि जिंकल्याचे समाधान नसतेच , युद्ध काळात झालेली अपरिमित हानी, निर्वंश झालेले पांडव आणि उजाड झालेला परिसर, रिता झालेला खजिना आणि दोन वेळच्या जेवणाची पडलेली भ्रांत हीच त्यांना मिळालेली युद्ध जिंकल्याची भेट. ५००० वर्षा पूर्वीचा सुडाने रंगलेला खेळ या काळातही जुना वाटत नाही . मानवी प्रवृत्तीत काडीचाही फरक पडलेला नाही हेच खरे या कादंबरीवरही अनेक वाद विवाद झडले असतील , झडत राहतील.. पण भैरप्पानी दाखवलेली दिशा नक्कीच नाकारण्याजोगी नाही

In reply to by स्पा

Gayatri Muley Fri, 07/04/2014 - 14:37
महाभारत म्हणल कि फक्त शिवाजी सावंत चे तर्क खरे वाटतात मला... (अर्थातच ते चुकिचे आहे, पण लहानपणीच वाचलेले मृत्युंजय अन् युगांधर मनातून जातच नाहीत..) त्यातून पांडव अन् कौरव यांची बाजू कळली आता "तिसरी" बाजू कळण्यासाठी "पर्व" नक्की वाचेल...

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:37
प्रदीप लोखंडे, पुणे १३- छान पुस्तक आहे. ओसामा बिन लादेन वर एक पुस्तक वाचले होते. एका अमेरीकन लेखिकेने ओसामाच्या मुलाचे आणि पत्नीचे आत्मकथन एकत्र करून पुस्तक लिहीले होते. त्याचा मराठी अनुवाद पण आहे. पण नाव आठवत नाही. पुस्तक मात्र जबर्दस्त आहे.

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:41
शिकवीले ज्यांनी - लेखक अनिल अवचट खूप सुंदर पुस्तक आहे. पुण्यातील काही ज्ञानी व्यक्तींचे अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण व्यक्तिचित्रण अनिल अवचटांनी केले आहे.
लेखनविषय:
a

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

दिवाळी अंक २०१३

संपादक मंडळ ·

यशोधरा Sun, 10/06/2013 - 10:52
मिपाच्या ह्या दुस-या दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा. दर्जेदार दिअं वाचायला मिळेल ह्याबद्दल शंका नाही :)

विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 13:30
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी. तसेच त्या स्पर्धच्या निमित्ताने आलेले फोटो अंकात सहभागी करावेत् ही विनन्ती.

In reply to by विजुभाऊ

अभ्या.. Wed, 10/09/2013 - 14:47
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी.
सहमत. . पण आधी निकष सांगून. किंवा नंतर रसग्रहण तरी, नुसते एकतर्फी नको.

चाफा गुरुवार, 10/10/2013 - 02:27
सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
भयकथा बाद का ?? *DONT_KNOW*

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:38
भयकथा चालतील असे वाटतेय, कारण त्यात कुणाचा मृत्यु होत नाही पण मेलेली व्यक्ती पुन्हा जीवंत होते. :)

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:43
खरतर हे सांगायचे गरज नव्हती कारण पुर्वप्रकाशित साहित्य दिवाळी अंकात पुन्हा प्रकाशित करण्यात काहीच अर्थ नाही. तरीही मुद्दा वर धाग्यात उल्लेखला नाही म्हणुन

दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पुर्वप्रकाशित असु नये. निदान मिपावर या आधी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करता येणार नाही, कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:49
तो त्या कथेचा परिणाम असेल चाफाभाऊ! कथा उत्कंठा वाढवत नेत असेल, मनात भय उत्पन्न करुन वाचायला उद्युक्त करत असेल, तर तो प्रकार किळसवाणा ठरत नाही. ही एक फार पातळ अन नाजुक रेषा ठरु शकते ठरवण्यासाठी, पण बिभस्त नसेल, मन गुंगवुन ठेवणारी असेल तर चालु शकेल. मागच्यावेळी मीच लिहीलेली सवाष्ण शेवटी थोडी ट्रॅजीक होत गेली, पण कथेच्या अनुषंगाने जाणारा मृत्यु वेगळा. एकूण या वेळी सणासमारंभात मन उल्हसित असावा असा काहीसा सूर आहे, तरीही अपवाद असतातच. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या लेखनाला कोणीही नाही म्हणु शकणार नाही.

In reply to by स्पंदना

गवि गुरुवार, 10/10/2013 - 07:31
कॅन्सरची कथा आणि अखेर मरण. शी शू वातनिस्सारण उलटी आदिंची वास्तवपूर्ण वर्णने किंवा त्यावर बेतलेले विनोद. इत्यादि शक्यतो टाळावे. मरणाचा उल्लेखही नको असे नव्हे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन गुरुवार, 10/10/2013 - 18:35
त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट फील येतो त्यामुळे ते वाचूनच निर्वाण पावल्या जाते.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:15
त्यावरून आठवलं, लहानपणी कथा वाचायचो त्यात "अमुक शहरात/ठिकाणी तमुक तमुक वास करून असतो/असते" हे वाक्यही तसेच वाटायचे.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा Fri, 10/11/2013 - 16:02
म्हणजे आट्पाट नगरात उत्तानपाद राज वास करायचा. त्याला २ राण्या होत्या... वगैरे वगैरे असच ना ;)

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके Sat, 10/12/2013 - 11:43
आणि लाइफबॉयच्या मराठी जाहिरातीत देखिल, "लाइफबॉय हे जहां, तंदुरुस्ती है वहां" याचं भाषांतर, 'लाइफबॉय जेथे, आरोग्य वास करते तेथे' असं केलेलं असायचं. :)

In reply to by दादा कोंडके

आदूबाळ Sat, 10/12/2013 - 14:18
नाही नाही लाईफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी असं आहे :))

kalpana joshi गुरुवार, 10/10/2013 - 13:06
दिवाळी अंकासाठी सुभेच्छा . अंध-श्रद्धा ,कर्म कांड , कला ,प्रवास वर्णन ,इत्यादी चालेल का?

In reply to by kalpana joshi

पैसा गुरुवार, 10/10/2013 - 23:11
तुम्हाला जे काही पाठवावंसं वाटेल ते पाठवा. प्रकाशित करण्याबद्दल अंतिम निर्णय दिवाळी अंक संपादकांचा असेल.

हसरी गुरुवार, 10/10/2013 - 15:52
चोप्य पस्ते >>> लेखन आवाहन लिहून झाल्यावर पुन्हा एकदा वाचून पाहिले नाही काय?

सोत्रि गुरुवार, 10/10/2013 - 21:47
पाकॄ नको
त्यांना बहुदा 'जिलबी' नको असे म्ह्णायचे असावे. :) - (जिलबीसारखा गोलगोल) सोकाजी

In reply to by सोत्रि

अर्धवटराव Fri, 10/11/2013 - 01:16
तुमच्याकडे काहि खास दिवाळी कॉकटेल वगैरे असेलच ना... नक्की पाठवा. शिवाय अभ्यंगस्नान आटोपल्यानंतर चावडीवर गप्पा मारायला घारुअण्णा गँग देखील आली पाहिजे यंदा.

In reply to by अर्धवटराव

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:16
लै दिवस झाले ग्यांग सुट्टीवर गेलीये. आणा आता लौकर. अन हो, चहासोबत अजून काहीतरी मागवले तरी चालेल. वाचकांनाही तेवढाच रुचिपालट.

चाफा Sat, 10/12/2013 - 08:17
माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल झाले, मी मारे खून बिन करून मोकळा झालेलो, नियमावली वाचायचे कष्ट घेतले नाहीत हे काही वेगळे सांगायला नको ;) , आता परत हाणामारी करतोय, एखादा खून माफ कराल ना हो संपादक ;)

In reply to by चाफा

स्पंदना Sat, 10/12/2013 - 10:12
अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी, आसा जीवाबीवाच हाल नका करुन घेऊ. निवांत हाना मारा चाफाभाऊ. काय लय लागल बिगल कुनाला तर देउ चिरीमीरी. तुमी सुरु ठेवा.

In reply to by स्पंदना

चला चाफासाहेब आता तुम्हाला सगळे खून माफ... खुद्द मिपासंमंकडून पाठिंबा म्हणजे काय ! लागा तलवारीना धार करायला आणि बंदूका साफ करायला... ठरवल्यापेक्षा दोनचार जास्त आत्मे मुक्त झाले तरी आता नो वरीज आणि नाचणीज ;)

मिपाच्या दिवाळी अंकांचे विशेष म्हणजे सर्व सामन्यांच्या लेखणीतून उतरलेले असामान्य लेखन त्यात उगाच उच्चभ्रू पणाचा लवलेश नाही.

भाते Sun, 10/13/2013 - 13:24
सर्व मिपाकर आगाऊ लेखकांना शुभेच्छा. दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पहात आहे.

भाते Sun, 10/13/2013 - 15:53
कृपया वरील वाक्य "सर्व मिपाकर लेखकांना आगाऊ शुभेच्छा" असे वाचावे. लिहिताना कळफलक गंडला आणि प्रकाशित करायच्या आधी वाक्य वाचलेच नाही. मालक/संमं, कृपया स्वसंपादनाची सोय ऊपलब्ध करून द्यावी ही विनंती.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 12:04
दुर्दैवाने, दिवाळी अंकासाठी लेखन देण्यासाठीची तारीख, व्यवसाय व्यस्ततेत, उलटून गेली. मस्कत लेखमालीकेतील पहिला लेख लिहून तयार आहे. तसेच एखाद दूसरी पाककृतीही देण्याचा मानस आहे. २ दिवस वाढवून मिळतील का?

In reply to by माझीही शॅम्पेन

स्पंदना गुरुवार, 10/24/2013 - 15:12
पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल जरा दोन दिवसांनी दिला तर, पण फक्त जरा व्याकरण व्यवस्थीत करुन अन मग फाईल न पाठवता डायरेक्ट जीमेल मध्ये चोप्य पेस्त करा. काही फोटोज असतील तर प्लिज त्यांच्या लिक्स पण द्या.सगळेच फोटोज जरा त्रास देताहेत. या मुळे लेख ताबडतोब अपलोड करता येइल. धन्यवाद.

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 20:44
सहमत आणि धन्यवाद. व्याकरण तपासून आणि लेखातच छायाचित्रांच्या पुढे जोडण्या (लिंक्स) देतो. आज रात्री लेख पाठवतो. उद्या पाककृती देईन.

यशोधरा Sun, 10/06/2013 - 10:52
मिपाच्या ह्या दुस-या दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा. दर्जेदार दिअं वाचायला मिळेल ह्याबद्दल शंका नाही :)

विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 13:30
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी. तसेच त्या स्पर्धच्या निमित्ताने आलेले फोटो अंकात सहभागी करावेत् ही विनन्ती.

In reply to by विजुभाऊ

अभ्या.. Wed, 10/09/2013 - 14:47
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी.
सहमत. . पण आधी निकष सांगून. किंवा नंतर रसग्रहण तरी, नुसते एकतर्फी नको.

चाफा गुरुवार, 10/10/2013 - 02:27
सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
भयकथा बाद का ?? *DONT_KNOW*

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:38
भयकथा चालतील असे वाटतेय, कारण त्यात कुणाचा मृत्यु होत नाही पण मेलेली व्यक्ती पुन्हा जीवंत होते. :)

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:43
खरतर हे सांगायचे गरज नव्हती कारण पुर्वप्रकाशित साहित्य दिवाळी अंकात पुन्हा प्रकाशित करण्यात काहीच अर्थ नाही. तरीही मुद्दा वर धाग्यात उल्लेखला नाही म्हणुन

दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पुर्वप्रकाशित असु नये. निदान मिपावर या आधी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करता येणार नाही, कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

In reply to by चाफा

स्पंदना गुरुवार, 10/10/2013 - 03:49
तो त्या कथेचा परिणाम असेल चाफाभाऊ! कथा उत्कंठा वाढवत नेत असेल, मनात भय उत्पन्न करुन वाचायला उद्युक्त करत असेल, तर तो प्रकार किळसवाणा ठरत नाही. ही एक फार पातळ अन नाजुक रेषा ठरु शकते ठरवण्यासाठी, पण बिभस्त नसेल, मन गुंगवुन ठेवणारी असेल तर चालु शकेल. मागच्यावेळी मीच लिहीलेली सवाष्ण शेवटी थोडी ट्रॅजीक होत गेली, पण कथेच्या अनुषंगाने जाणारा मृत्यु वेगळा. एकूण या वेळी सणासमारंभात मन उल्हसित असावा असा काहीसा सूर आहे, तरीही अपवाद असतातच. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या लेखनाला कोणीही नाही म्हणु शकणार नाही.

In reply to by स्पंदना

गवि गुरुवार, 10/10/2013 - 07:31
कॅन्सरची कथा आणि अखेर मरण. शी शू वातनिस्सारण उलटी आदिंची वास्तवपूर्ण वर्णने किंवा त्यावर बेतलेले विनोद. इत्यादि शक्यतो टाळावे. मरणाचा उल्लेखही नको असे नव्हे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन गुरुवार, 10/10/2013 - 18:35
त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट फील येतो त्यामुळे ते वाचूनच निर्वाण पावल्या जाते.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:15
त्यावरून आठवलं, लहानपणी कथा वाचायचो त्यात "अमुक शहरात/ठिकाणी तमुक तमुक वास करून असतो/असते" हे वाक्यही तसेच वाटायचे.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा Fri, 10/11/2013 - 16:02
म्हणजे आट्पाट नगरात उत्तानपाद राज वास करायचा. त्याला २ राण्या होत्या... वगैरे वगैरे असच ना ;)

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके Sat, 10/12/2013 - 11:43
आणि लाइफबॉयच्या मराठी जाहिरातीत देखिल, "लाइफबॉय हे जहां, तंदुरुस्ती है वहां" याचं भाषांतर, 'लाइफबॉय जेथे, आरोग्य वास करते तेथे' असं केलेलं असायचं. :)

In reply to by दादा कोंडके

आदूबाळ Sat, 10/12/2013 - 14:18
नाही नाही लाईफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी असं आहे :))

kalpana joshi गुरुवार, 10/10/2013 - 13:06
दिवाळी अंकासाठी सुभेच्छा . अंध-श्रद्धा ,कर्म कांड , कला ,प्रवास वर्णन ,इत्यादी चालेल का?

In reply to by kalpana joshi

पैसा गुरुवार, 10/10/2013 - 23:11
तुम्हाला जे काही पाठवावंसं वाटेल ते पाठवा. प्रकाशित करण्याबद्दल अंतिम निर्णय दिवाळी अंक संपादकांचा असेल.

हसरी गुरुवार, 10/10/2013 - 15:52
चोप्य पस्ते >>> लेखन आवाहन लिहून झाल्यावर पुन्हा एकदा वाचून पाहिले नाही काय?

सोत्रि गुरुवार, 10/10/2013 - 21:47
पाकॄ नको
त्यांना बहुदा 'जिलबी' नको असे म्ह्णायचे असावे. :) - (जिलबीसारखा गोलगोल) सोकाजी

In reply to by सोत्रि

अर्धवटराव Fri, 10/11/2013 - 01:16
तुमच्याकडे काहि खास दिवाळी कॉकटेल वगैरे असेलच ना... नक्की पाठवा. शिवाय अभ्यंगस्नान आटोपल्यानंतर चावडीवर गप्पा मारायला घारुअण्णा गँग देखील आली पाहिजे यंदा.

In reply to by अर्धवटराव

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 12:16
लै दिवस झाले ग्यांग सुट्टीवर गेलीये. आणा आता लौकर. अन हो, चहासोबत अजून काहीतरी मागवले तरी चालेल. वाचकांनाही तेवढाच रुचिपालट.

चाफा Sat, 10/12/2013 - 08:17
माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल झाले, मी मारे खून बिन करून मोकळा झालेलो, नियमावली वाचायचे कष्ट घेतले नाहीत हे काही वेगळे सांगायला नको ;) , आता परत हाणामारी करतोय, एखादा खून माफ कराल ना हो संपादक ;)

In reply to by चाफा

स्पंदना Sat, 10/12/2013 - 10:12
अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी, आसा जीवाबीवाच हाल नका करुन घेऊ. निवांत हाना मारा चाफाभाऊ. काय लय लागल बिगल कुनाला तर देउ चिरीमीरी. तुमी सुरु ठेवा.

In reply to by स्पंदना

चला चाफासाहेब आता तुम्हाला सगळे खून माफ... खुद्द मिपासंमंकडून पाठिंबा म्हणजे काय ! लागा तलवारीना धार करायला आणि बंदूका साफ करायला... ठरवल्यापेक्षा दोनचार जास्त आत्मे मुक्त झाले तरी आता नो वरीज आणि नाचणीज ;)

मिपाच्या दिवाळी अंकांचे विशेष म्हणजे सर्व सामन्यांच्या लेखणीतून उतरलेले असामान्य लेखन त्यात उगाच उच्चभ्रू पणाचा लवलेश नाही.

भाते Sun, 10/13/2013 - 13:24
सर्व मिपाकर आगाऊ लेखकांना शुभेच्छा. दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पहात आहे.

भाते Sun, 10/13/2013 - 15:53
कृपया वरील वाक्य "सर्व मिपाकर लेखकांना आगाऊ शुभेच्छा" असे वाचावे. लिहिताना कळफलक गंडला आणि प्रकाशित करायच्या आधी वाक्य वाचलेच नाही. मालक/संमं, कृपया स्वसंपादनाची सोय ऊपलब्ध करून द्यावी ही विनंती.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 12:04
दुर्दैवाने, दिवाळी अंकासाठी लेखन देण्यासाठीची तारीख, व्यवसाय व्यस्ततेत, उलटून गेली. मस्कत लेखमालीकेतील पहिला लेख लिहून तयार आहे. तसेच एखाद दूसरी पाककृतीही देण्याचा मानस आहे. २ दिवस वाढवून मिळतील का?

In reply to by माझीही शॅम्पेन

स्पंदना गुरुवार, 10/24/2013 - 15:12
पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल जरा दोन दिवसांनी दिला तर, पण फक्त जरा व्याकरण व्यवस्थीत करुन अन मग फाईल न पाठवता डायरेक्ट जीमेल मध्ये चोप्य पेस्त करा. काही फोटोज असतील तर प्लिज त्यांच्या लिक्स पण द्या.सगळेच फोटोज जरा त्रास देताहेत. या मुळे लेख ताबडतोब अपलोड करता येइल. धन्यवाद.

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/24/2013 - 20:44
सहमत आणि धन्यवाद. व्याकरण तपासून आणि लेखातच छायाचित्रांच्या पुढे जोडण्या (लिंक्स) देतो. आज रात्री लेख पाठवतो. उद्या पाककृती देईन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर हो, कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे.

महामानवास अभिवादन!

बिपिन कार्यकर्ते ·

गांधीवादी Mon, 12/06/2010 - 12:38
लोकशाहीचा पाया रचल्याबद्दल बाबासाहेबांना आमचे अभिवादन. !!! बाबासाहेबांच्या आख्यायिका मिपाकरांच्या लेखणीतून येउद्यात.

यकु Mon, 12/06/2010 - 12:59
"बुध्द आणि त्याचा धम्म" या ग्रंथाचे लिखाण चालू होते. बाबासाहेब रात्रीच्या वेळी लिहायला बसत. एकदा रात्रीच्या वेळी ते लेखनात मग्न झाले असताना बाबासाहेबांचे सहायक/मदतनीस नानकचंद रत्तू हे बाबासाहेबांचे जेवणाचे ताट आणि दूध घेऊन आले. रात्र फार झालीय, आता जेवून घ्या असे म्हणाले. बाबासाहेब म्हणाले, "एवढा शेवटचा भाग पूर्ण करतो, आणि जेवून घेतो, तू आता घरी जा...." नानकचंद घरी निघून गेले. दुसरे दिवशी सकाळी ते परतले. अत्यंत तल्लीन होऊन सकाळीदेखील बाबासाहेबांचे लिखाण चालूच होते. आपण आलो आहोत हे जाणवून देण्यासाठी नानकचंद यांनी घसा खाकरला. लिखाणावरची नजर काढून बाबासाहेब फक्त एवढंच म्हणाले, " तू अजून घरी गेला नाहीस का? "

टारझन Mon, 12/06/2010 - 14:13
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण . गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ? बाकी बाबासाहेबांचा लहाणपणापासुन हेवा वाटत आलेला आहे. वक्तृत्वस्पर्धेसाठी त्यांचा विषय निवडल्याने त्यांच्याविषयी भरपुर माहिति मिळाली होती. ज्या संघर्षातुन हा माणुस वर आला त्यानंतर त्याला महामानव ही पदवी सुद्धा छोटी ठरावी. - टारझन महामानवांचे अनुयायीच महामानवाच्या तत्वांचा अपमान करतात.

In reply to by टारझन

पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते. विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही. असो. एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही. म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Mon, 12/06/2010 - 15:39
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते.
तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. .
विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही.
त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही.
'येथे' गैरलागु मुद्द्याशी सहमत. आधीच्या प्रतिसादाप्रमाणे माझे साहेबांन्ना पुनःश्च अभिवादन.
म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.
खुलाश्याबद्दल धन्यवाद. अवांतर : "६० वर्षांनंतर" एखाद्या महामानवामुळे त्याच्या धर्मबांधवांना मान मिळतो किंवा ते मानाने जगु शकतात , रोचक आहे :)

In reply to by टारझन

तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. . त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
म्हणजे आता मूळ प्रतिसादातील वाक्यातले 'असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण ' एवढेच राहिले. आपल्याला अतिशयोक्तिपूर्ण का वाटले ते वाचायला आवडेल. अवांतराबद्दलही वाचायला आवडेल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 13:38
http://www.misalpav.com/node/15719#comment-264146 ह्या प्रतिसादात वाहिदा देवींनी स्वतः माझ्या असहमतीचा पाठपुरावा करत आपल्या वरिल वाक्यात काय अतिशयोक्ती आहे ते दाखवुन दिलेले आहे.

In reply to by टारझन

क्षमा करा, पण माझ्या अल्पमतीला कळलेच नाही काही. नीट समजावून सांगा. माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 15:08
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते
हे आपले वाक्य आहे.
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी. I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night
हे वाहिदा देवींचे वाक्य आहे. ६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलायची आहे , त्यांची बदलली , जे कातडी सोलणार किंवा मैला वाहाणार ते वाहातंच बसलेले आहेत. ह्यानंतरही जर "महामानव जन्मले नसते तर ज्यांची परिस्थिती बदलली आहे ते सुद्धा आज मैला वाहात आणि कातडी सोलत बसले असते " हे निदान काढले तर ते हस्यास्पद ठरते. ह्या पुढे काहीही खुलासा मिळणार नाही (पैशे दिल्या शिवाय)
माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.
ह्या वाक्याला आमची असहमती शोधुन दाखवा , आणि हजार रुपये मिळवा

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन Tue, 12/07/2010 - 15:15
आमच्या महाचर्चेला एका फेरीमानवाने दंगा म्हनावे? कोण आहे रे तिकडे .. ह्या फेरिमानवास पंगाच्या हवाली करावे : ) आणो संस्कृतची शिकवणी घ्यावी.

In reply to by टारझन

६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलली आहे, सुधारली आहे, आधीच चांगली होती आणि आणखी सुधारली आहे त्यांच्यापैकी कोणीही या ढोरांसाठी काहीही केलं नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, महामानव आंबेडकरांना नव्हे, आपल्या सर्वांनाच! या ढोर, महार, मांगांना आपणही माणूसच आहोत, अगदी संस्कृत बोलणार्‍या गुरूजीएवढेच, याची जाणीव करून देणार्‍या डॉक्टरांना अभिवादन. दुर्दैवाने, संस्कृत शिकणारे/शिकवणारे अनेक लोकं मात्र अजूनही असंस्कृत गप्पा करतात.

डावखुरा Tue, 12/07/2010 - 22:17
दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे अविनाशकुलकर्णी यांचा हा प्रतिसाद वाचनीय....

"....पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. ..." ~ हे फार महत्वाचे वाक्य आहे आणि तितकेच दलितांनी आयुष्यभर त्याबाबत आपल्या नेत्याच्या नावाशी कृतज्ञ राहिले पाहिजे. निव्वळ फोटोला हार घालून नव्हे तर त्यांचे समाजसुधारणेचे विचारही तितक्याच प्रखरतेने प्रथम त्यांच्याच भाईबंदानी प्रत्यक्षात आणले पाहिजेत. असो....[श्री.बिपिन म्हणतात त्याप्रमाणे धागा भरकटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.] आठवणी लिहिण्याविषयी परवानगी धागाकर्त्यानी दिली असल्याने या निमित्ताने एकच आठवण लिहित आहे. ती म्हणजे 'राखीव' मतदार संघ निर्माण करण्याबद्दलची त्यांची आग्रहाची भूमिका व त्यासाठी वेळ आल्यावर थेट महात्मा गांधींना विरोध. गांधींची धारणा अशी की विभक्त मतदारसंघ हे अस्पृश्यांना व हिंदूधर्माला घातक ठरतील. त्याबाबत त्यानी (गांधींनी) सर सॅम्युएल होअर या भारतमंत्र्याना ब्रिटीश सरकारने आंबेडकरांच्या प्रस्तावाला देऊ घातलेल्या मंजुरीबाबत फेरविचार करण्याबाबत पत्र लिहिले होते जे पुढे थेट लंडनला पाठविले गेले. पंतप्रधान मॅकडोनाल्ड यानी आंबेडकरांचीच भूमिका न्याय असल्याचे मान्य करून प्रांताप्रांतात दलित समाजाला विभक्त मतदार संघ जाहीर केले....(१७ ऑगस्ट १९३२ या तारखेस). डॉ.बाबासाहेबांच्या या मागणीची फळे आजही दलित घेत असून अगदी ग्रामपंचायत, नगरपालिकेपासून थेट संसद भवनापर्यंत ते आपल्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. इन्द्रा

वाहीदा Mon, 12/06/2010 - 15:46
स्त्रीवादी धर्मचिकित्सा भारतीय समाजातली जातिव्यवस्था, तिच्यात अनुस्यूत असलेली उतरंड, विषमतेला सूत्रबद्ध करणारी मनुस्मृती, जात शुद्ध ठेवण्यासाठी स्त्रियांच्या लंगिकतेचं दमन करणारी कठोर बंधनं; स्त्रियांना मिळालेलं दुय्यम स्थान यांच्यातले परस्परसंबंध यांची आंबेडकराना जाण होती. हिंदू कोड बिलाची आंबेडकरांनी केलेली मांडणी हे त्यांचं एक महत्त्वाचे जीवितकार्य होते. आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाला, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हे त्यात अंतर्भूत असणारे एक महत्त्वाचे सूत्र होते. जातीग्रस्त जीवनाच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडली ती डॉ. आंबेडकरांनीच दलितांप्रमाणेच वर्णव्यवस्थेने अलग ठेवलेल्या आदिवासी भटके विमुक्त या जमातीतूनही विद्रोही साहित्य निर्माण झाले. 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू समाजाला आणखी एक हादरा बसला आणि मुस्लिम विरोधाबरोबरच दलित विरोधाचा उघड आयाम हिंदू जमातवादास प्राप्त झाला. पण र.वा.दिघे, हमीद दलवाई यासारख्या चार दोन साहित्यीकांचा अपवाद वगळता फाळणी, दंगली किंवा जमातवादास नाटक-कादंबरीचा विषय बनवण्याबाबत अनेक साहित्यिक उदासिनच राहिले. 1990 च्या दशकात मात्र जेंव्हा मराठी साहित्य चळवळीचे व्यासपीठ कार्यरत झाले तेंव्हा जावेद कुरेशी, एहत मामू देशमुख, मुबारक शेख, फ.म. शहाजिंदे, डॉ. अझीज नवाब, इलाही जमादार, फक्रूदीन बेन्नूर या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मुस्लिमांच्या एकांगी चित्रणाबाबत आवाज उठवला. भारतात प्लेबीया ऍग्नीस, झोया हसन, रझीया पटेल, लतिका सरकार, तिस्ता सेटलबाड इत्यादींनी विविध धर्मीयांच्या कायद्याच्या अनुषंगाने धर्माचा विचार केला तरी सर्वांगिण मुक्तीदायी धर्मशास्त्र मांडण्याचे प्रयत्न अद्याप सुरु झालेले नाहीत. :-( धर्मग्रस्ततेमुळे निर्माण होणाऱ्या घटस्पोटित विधवा, परित्यकता, बहुपत्नीकत्व आदी प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी विश्वात असली तरी त्याचे फारच थोडे पडसाद मराठी साहित्यात उमटले आहेत. बाबासाहेब या महामानवास विनम्र अभिवादन !! ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

चित्रा Mon, 12/06/2010 - 18:53
वाहीदा यांचा हा प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. तरी तो विस्कळीत आहे असे मला वाटले. यातील एखाद्या मुद्यावर (मराठी साहित्यातील विद्रोही विचार, हिंदूंमधील जातीयता/धार्मिक भावना, साहित्यातून होणारे मुस्लिमांचे गैर-चित्रण, स्त्रियांना धार्मिकतेतून होणारा त्रास) त्यांनी अधिक विस्तृत लिहावे, अशी विनंती करते. आंबेडकरांच्या आधी ज्योतिबा फुलेही अस्पृश्यांच्या प्रश्नांवरून लिहीत होते, विचार मांडत होते, हे मात्र नमूद करावेसे वाटते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांमुळे राजकीय विचारांमध्ये या प्रश्नांचाही समावेश झाला, असे वाटते. स्त्रियांबाबतीत बोलायचे तर स्त्रियांना दुष्ट रूढींमधून मुक्तता ही आंबेडकरांच्या आधीपासून मिळण्याचे प्रयत्न सुरू झाले असावेत असे वाटते. १८१२ पासून राजा राममोहन रॉय यांनीही याआधी हिंदूंमधील विधवांना सती जाण्याच्या प्रथेपासून मुक्तता मिळावी यासाठी लेखन केले होते. मराठीतील धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना १८९३ मध्ये केली असे विकीवर कळते. विद्रोही विचार हे समाजातील दुबळ्या स्तरातून येण्याची सुरूवात मात्र जसे या गटांमध्ये शिक्षित वर्गाचे प्रमाण वाढले तसे सुरू झाले असावे. बाकी, बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. यातील असंख्य जण बदलले असतील याच्याशी सहमत. कसे जगता येते हे अनेकांना आंबेडकरांमुळे समजले असावे. तरीही अजून असे अनेक आहेत जे अजूनही मैला डोक्यावरून नेत असतील ह्या मताशीही सहमत. आंबेडकरांना अभिवादन. मला कायम प्रश्न पडतो - भारतात डोक्यावरून सामान वाहणारे हमाल का असतात? लहान लहान दोन-चार चाकी ओढता येतील अशा गाड्या/ट्रॉल्या घेता येत का नाहीत? त्या ओढणारे हमालही चालतील, डोक्यावरून सामान नेण्यास आता या जमान्यातही हमालांची का तयारी असते? हमालांच्या युनियन असाव्यात, त्या हे प्रश्न का रेटत नाहीत? का युनियन हे प्रश्न रेटतात, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते? तसेच सफाई-कामगार, मैला-वाहू कामगारांच्या बाबतीत. या कामगारांचे आयुष्य अतिशय वाईट, हलाखीचे जात असावे. त्यांच्यासाठी काम करणार्‍या संस्थांची माहिती या निमित्ताने कोणाकडे असली तर ती येथे द्यावी अशी विनंती.

नगरीनिरंजन Mon, 12/06/2010 - 15:47
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील अत्यंत सहमत. अशा अनेक वर्णपीडितांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणार्‍या आणि इतरांनी त्यांच्याकडे माणूस म्हणूनच पाहावे म्हणून झटणार्‍या आंबेडकराना सलाम.

In reply to by नगरीनिरंजन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:01
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील पूर्णतः सहमत !! ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night

In reply to by वाहीदा

टारझन Mon, 12/06/2010 - 16:03
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी
अच्छा , म्हणजे महामानव होऊन गेले तरी परिस्थिती बदलली नाहीये तर :) दुर्दैवी आहे हे !

In reply to by टारझन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:20
yes, that's why people like Mayawati takes advantage of the situation Uttar Pradesh is one of India's most deprived states , with a high crime rate and poor health indicators. Ms. Mayawati projects herself as an icon for India's 160 million Dalit and shamelessly builds statues of herself

चिगो Mon, 12/06/2010 - 16:11
डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन आणि ह्या महामानवाच्या चरणी दंडवत.. जय भीम...

तर्री Mon, 12/06/2010 - 17:24
त्यांचे "पाकिस्थान" निर्मीती / स्थिती बाबत्चे विचार अडवाणी / ठाकरे घराण्याचे वाटावे ईतके स्पष्ट आहेत. नेहरूनी ह्याही नररत्नाची ऊपेक्षा केली . घटनेच्या शिल्प्काराला नमन. बिका : स्तुत्य धागा.

धमाल मुलगा Mon, 12/06/2010 - 17:52
फार मोठा माणूस होऊन गेला. आपल्याच देशवासीयांची (आणि विशेषतः राजकारण्यांची) ह्या महामानवाला समजण्याची कुवत थिटी पडली. एखाद्या देशाची घटना तयार करणं ही साधीसुधी गोष्ट नव्हे. अशी अवघड कामगिरी मोठ्या जबाबदारीनं आणि अंगभूत बुध्दिमत्तेनं सहज पार पाडणार्‍या त्या महामानवाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांचे भाषावार प्रांतरचना, आरक्षण-सवलती ह्यासंबंधीचे विचार वाचले की वाटतं, अरे एव्हढा द्रष्टा माणूस आपल्यामध्ये होऊन गेला, अन त्यामानाने ह्या द्रष्ट्या बुध्दिवंताचे असे निरनिराळे पैलू आपल्याला ठाऊकच नाहीत.

नीलकांत Mon, 12/06/2010 - 19:52
बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कोट्यावधी जनतेला परिवर्तनाचा महामंत्र दिला. ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेबांनी येथील पददलीतांना स्वतंत्र केले. भारतीय समाजातील अन्यायकारक जातीव्यवस्थेवर हल्ला चढवला. अत्यंत महत्वाचे म्हणजे नवीन भारताच्या निर्मीतीच्या पायाशी भक्कम असलेले संविधान हे अत्यंत परिणामकारक आणि सर्वांना समान संधी देणारं, अन्याग्रस्तांवरील अन्याय दूर करणारं असं बनवण्यासाठी कष्ट घेतले. जेव्हा हिंदू धर्मातील प्रस्थापीत समाजरचना आपल्या समाजबांधवांना योग्य न्याय देण्यास असमर्थ आहे असे लक्षात आले तेव्हा याच मातीतील तथागताच्या वाटेवर चालण्याचा आणि धम्माच्या आश्रयास जाण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिला. लेखन, राजकारण, समाजकारण, संविधान, समाजरचना आदी सर्वच क्षेत्रात बाबासाहेब अतुलनीय आहेत. अश्या बाबासाहेबांकडून प्रेरणाघेऊन आज लाखो युवक आपलं आयुष्यं स्वत:च्या हिमतीवर बांधताहेत. बाबासाहेब माझ्यासाठी सतत प्रेरणेचा स्त्रोत आहेत. बाबासाहेबांना शतशः नमन. भवतु सब्ब मंगलम ! - नीलकांत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास Mon, 12/06/2010 - 21:13
डॉ. आंबेडकरांना अभिवादन. डॉ. आंबेडकरांचे विचार, निबंध, इ.इ. संदर्भ पुस्तकांची यादी मिळू शकेल काय? कोलंबिया विद्यापिठ संकेतस्थळ आंबेडकर.ऑर्ग

सुधीर काळे Mon, 12/06/2010 - 21:30
इंद्रा-जी, चित्राताई, नीलकांत आणि वाहीदा यांचे माहितीपूर्ण आणि विषयास धरून लिहिलेले प्रतिसाद आवडले. कांहीं माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या. धागा छान वाढतो आहे. या विषयावरील माझे स्वतःचे (वैयक्तिक) वाचन फारच अपुरे आहे त्यामुळे जास्त लिहिण्याची पात्रता नाहीं. जय भीम!

बहुगुणी Mon, 12/06/2010 - 21:51
चित्रा यांच्या वर विचारणा केलेल्या माहितीसंदर्भातः कचरा कोंडी हा तासाभराचा अनुबोधपट आवर्जून पहाण्यासारखा आहे. जवळपास उपलब्ध नसेल तर बहुतेक अतुल पेठे यांच्याकडूनच इथे निरोप पाठवला तर मिळू शकेल. डॉ. आबेडकरांना मनःपूर्वक अभिवादन.

गुंडोपंत Tue, 12/07/2010 - 04:42
समायोचित लेख बिपीनराव. मला वाटते की आंबेडकरांचे कार्य समजून घेण्यात आणि ते पुढे नेण्यात समाज फारच मागे पडला. वर नीलकांतने म्हंटलेच आहे, ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. तेच म्हणतो.

ढब्बू पैसा Tue, 12/07/2010 - 13:17
स्वतंत्र भारताच्या आधुनिक युगात जन्मल्याने असल्याने अस्पृश्यता ही फक्त शालेय इतिहासाच्या पुस्तकातून ठावूक होती. त्याची तीव्रता कधी तेव्हा कळली नाही. आणि आरक्षणांबद्दल अनेक गैरसमज असल्याने बाबासाहेबांचा थोडा रागच येत असे. पुढे कळत्या वयात दया पवारांचं बलुतं वाचलं आणि अक्षरशः सुन्न होते तीन दिवस. पहिल्यांदा ती दाहकता जाणवली! आणि बाबासाहेबांबद्दल असा हलकट विचार केल्याबद्द्ल स्वतःची खूप लाज वाटली. आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसणार्‍या एका मोठ्या जनसमुहाला बाबासाहेबांनी संघटीत केले, त्याना आपल्या किमान मानवी हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरीत केले! त्त्यांच्या ह्या कार्याबद्दल खरच आपण सगळ्यांनीच त्यांचे ॠणी असायला हवे!

दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे ------------------------------------------------- बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते. यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.

In reply to by अविनाशकुलकर्णी

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता. शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता.

भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. ---- - आचार्य अत्रे

माझे पण अभिवादन. पण शिवाजि पार्कात येणारे लोक एव्द्ढी घाण घालतात कि आजुबाजुचा परिसर पुढिल २-३ दिवस सुध्हा प्र्दुशित अस्तो. माझी बहिण ह्या दिवसात फिरायला बाहेर्गावी निघुन जाते ति आता उद्या रात्री परत येइल.

वेताळ Tue, 12/07/2010 - 17:24
आपण काय घाण करत नाही का? बाकी बाबासाहेब खुप मोठ्ठे द्रष्टे नेते होते.त्यांना शतशःप्रणाम... आज एक आंबेडकरवीदी कुटुंब चैत्यभुमीत बाबासाहेबाना अभिवादन करण्यास कल्याण हुन रेल्वेने जात असता ,एका उत्तरभारतिय युवकाने जागेच्या वादातुन त्या ५ वर्षाच्या मुलीला रेल्वेतुन बाहेर फेकले.त्याबद्दल दु:ख वाटते.

गांधीवादी Mon, 12/06/2010 - 12:38
लोकशाहीचा पाया रचल्याबद्दल बाबासाहेबांना आमचे अभिवादन. !!! बाबासाहेबांच्या आख्यायिका मिपाकरांच्या लेखणीतून येउद्यात.

यकु Mon, 12/06/2010 - 12:59
"बुध्द आणि त्याचा धम्म" या ग्रंथाचे लिखाण चालू होते. बाबासाहेब रात्रीच्या वेळी लिहायला बसत. एकदा रात्रीच्या वेळी ते लेखनात मग्न झाले असताना बाबासाहेबांचे सहायक/मदतनीस नानकचंद रत्तू हे बाबासाहेबांचे जेवणाचे ताट आणि दूध घेऊन आले. रात्र फार झालीय, आता जेवून घ्या असे म्हणाले. बाबासाहेब म्हणाले, "एवढा शेवटचा भाग पूर्ण करतो, आणि जेवून घेतो, तू आता घरी जा...." नानकचंद घरी निघून गेले. दुसरे दिवशी सकाळी ते परतले. अत्यंत तल्लीन होऊन सकाळीदेखील बाबासाहेबांचे लिखाण चालूच होते. आपण आलो आहोत हे जाणवून देण्यासाठी नानकचंद यांनी घसा खाकरला. लिखाणावरची नजर काढून बाबासाहेब फक्त एवढंच म्हणाले, " तू अजून घरी गेला नाहीस का? "

टारझन Mon, 12/06/2010 - 14:13
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण . गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ? बाकी बाबासाहेबांचा लहाणपणापासुन हेवा वाटत आलेला आहे. वक्तृत्वस्पर्धेसाठी त्यांचा विषय निवडल्याने त्यांच्याविषयी भरपुर माहिति मिळाली होती. ज्या संघर्षातुन हा माणुस वर आला त्यानंतर त्याला महामानव ही पदवी सुद्धा छोटी ठरावी. - टारझन महामानवांचे अनुयायीच महामानवाच्या तत्वांचा अपमान करतात.

In reply to by टारझन

पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते. विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही. असो. एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही. म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Mon, 12/06/2010 - 15:39
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते.
तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. .
विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही.
त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही.
'येथे' गैरलागु मुद्द्याशी सहमत. आधीच्या प्रतिसादाप्रमाणे माझे साहेबांन्ना पुनःश्च अभिवादन.
म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.
खुलाश्याबद्दल धन्यवाद. अवांतर : "६० वर्षांनंतर" एखाद्या महामानवामुळे त्याच्या धर्मबांधवांना मान मिळतो किंवा ते मानाने जगु शकतात , रोचक आहे :)

In reply to by टारझन

तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. . त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
म्हणजे आता मूळ प्रतिसादातील वाक्यातले 'असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण ' एवढेच राहिले. आपल्याला अतिशयोक्तिपूर्ण का वाटले ते वाचायला आवडेल. अवांतराबद्दलही वाचायला आवडेल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 13:38
http://www.misalpav.com/node/15719#comment-264146 ह्या प्रतिसादात वाहिदा देवींनी स्वतः माझ्या असहमतीचा पाठपुरावा करत आपल्या वरिल वाक्यात काय अतिशयोक्ती आहे ते दाखवुन दिलेले आहे.

In reply to by टारझन

क्षमा करा, पण माझ्या अल्पमतीला कळलेच नाही काही. नीट समजावून सांगा. माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 15:08
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते
हे आपले वाक्य आहे.
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी. I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night
हे वाहिदा देवींचे वाक्य आहे. ६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलायची आहे , त्यांची बदलली , जे कातडी सोलणार किंवा मैला वाहाणार ते वाहातंच बसलेले आहेत. ह्यानंतरही जर "महामानव जन्मले नसते तर ज्यांची परिस्थिती बदलली आहे ते सुद्धा आज मैला वाहात आणि कातडी सोलत बसले असते " हे निदान काढले तर ते हस्यास्पद ठरते. ह्या पुढे काहीही खुलासा मिळणार नाही (पैशे दिल्या शिवाय)
माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.
ह्या वाक्याला आमची असहमती शोधुन दाखवा , आणि हजार रुपये मिळवा

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन Tue, 12/07/2010 - 15:15
आमच्या महाचर्चेला एका फेरीमानवाने दंगा म्हनावे? कोण आहे रे तिकडे .. ह्या फेरिमानवास पंगाच्या हवाली करावे : ) आणो संस्कृतची शिकवणी घ्यावी.

In reply to by टारझन

६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलली आहे, सुधारली आहे, आधीच चांगली होती आणि आणखी सुधारली आहे त्यांच्यापैकी कोणीही या ढोरांसाठी काहीही केलं नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, महामानव आंबेडकरांना नव्हे, आपल्या सर्वांनाच! या ढोर, महार, मांगांना आपणही माणूसच आहोत, अगदी संस्कृत बोलणार्‍या गुरूजीएवढेच, याची जाणीव करून देणार्‍या डॉक्टरांना अभिवादन. दुर्दैवाने, संस्कृत शिकणारे/शिकवणारे अनेक लोकं मात्र अजूनही असंस्कृत गप्पा करतात.

डावखुरा Tue, 12/07/2010 - 22:17
दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे अविनाशकुलकर्णी यांचा हा प्रतिसाद वाचनीय....

"....पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. ..." ~ हे फार महत्वाचे वाक्य आहे आणि तितकेच दलितांनी आयुष्यभर त्याबाबत आपल्या नेत्याच्या नावाशी कृतज्ञ राहिले पाहिजे. निव्वळ फोटोला हार घालून नव्हे तर त्यांचे समाजसुधारणेचे विचारही तितक्याच प्रखरतेने प्रथम त्यांच्याच भाईबंदानी प्रत्यक्षात आणले पाहिजेत. असो....[श्री.बिपिन म्हणतात त्याप्रमाणे धागा भरकटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.] आठवणी लिहिण्याविषयी परवानगी धागाकर्त्यानी दिली असल्याने या निमित्ताने एकच आठवण लिहित आहे. ती म्हणजे 'राखीव' मतदार संघ निर्माण करण्याबद्दलची त्यांची आग्रहाची भूमिका व त्यासाठी वेळ आल्यावर थेट महात्मा गांधींना विरोध. गांधींची धारणा अशी की विभक्त मतदारसंघ हे अस्पृश्यांना व हिंदूधर्माला घातक ठरतील. त्याबाबत त्यानी (गांधींनी) सर सॅम्युएल होअर या भारतमंत्र्याना ब्रिटीश सरकारने आंबेडकरांच्या प्रस्तावाला देऊ घातलेल्या मंजुरीबाबत फेरविचार करण्याबाबत पत्र लिहिले होते जे पुढे थेट लंडनला पाठविले गेले. पंतप्रधान मॅकडोनाल्ड यानी आंबेडकरांचीच भूमिका न्याय असल्याचे मान्य करून प्रांताप्रांतात दलित समाजाला विभक्त मतदार संघ जाहीर केले....(१७ ऑगस्ट १९३२ या तारखेस). डॉ.बाबासाहेबांच्या या मागणीची फळे आजही दलित घेत असून अगदी ग्रामपंचायत, नगरपालिकेपासून थेट संसद भवनापर्यंत ते आपल्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. इन्द्रा

वाहीदा Mon, 12/06/2010 - 15:46
स्त्रीवादी धर्मचिकित्सा भारतीय समाजातली जातिव्यवस्था, तिच्यात अनुस्यूत असलेली उतरंड, विषमतेला सूत्रबद्ध करणारी मनुस्मृती, जात शुद्ध ठेवण्यासाठी स्त्रियांच्या लंगिकतेचं दमन करणारी कठोर बंधनं; स्त्रियांना मिळालेलं दुय्यम स्थान यांच्यातले परस्परसंबंध यांची आंबेडकराना जाण होती. हिंदू कोड बिलाची आंबेडकरांनी केलेली मांडणी हे त्यांचं एक महत्त्वाचे जीवितकार्य होते. आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाला, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हे त्यात अंतर्भूत असणारे एक महत्त्वाचे सूत्र होते. जातीग्रस्त जीवनाच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडली ती डॉ. आंबेडकरांनीच दलितांप्रमाणेच वर्णव्यवस्थेने अलग ठेवलेल्या आदिवासी भटके विमुक्त या जमातीतूनही विद्रोही साहित्य निर्माण झाले. 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू समाजाला आणखी एक हादरा बसला आणि मुस्लिम विरोधाबरोबरच दलित विरोधाचा उघड आयाम हिंदू जमातवादास प्राप्त झाला. पण र.वा.दिघे, हमीद दलवाई यासारख्या चार दोन साहित्यीकांचा अपवाद वगळता फाळणी, दंगली किंवा जमातवादास नाटक-कादंबरीचा विषय बनवण्याबाबत अनेक साहित्यिक उदासिनच राहिले. 1990 च्या दशकात मात्र जेंव्हा मराठी साहित्य चळवळीचे व्यासपीठ कार्यरत झाले तेंव्हा जावेद कुरेशी, एहत मामू देशमुख, मुबारक शेख, फ.म. शहाजिंदे, डॉ. अझीज नवाब, इलाही जमादार, फक्रूदीन बेन्नूर या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मुस्लिमांच्या एकांगी चित्रणाबाबत आवाज उठवला. भारतात प्लेबीया ऍग्नीस, झोया हसन, रझीया पटेल, लतिका सरकार, तिस्ता सेटलबाड इत्यादींनी विविध धर्मीयांच्या कायद्याच्या अनुषंगाने धर्माचा विचार केला तरी सर्वांगिण मुक्तीदायी धर्मशास्त्र मांडण्याचे प्रयत्न अद्याप सुरु झालेले नाहीत. :-( धर्मग्रस्ततेमुळे निर्माण होणाऱ्या घटस्पोटित विधवा, परित्यकता, बहुपत्नीकत्व आदी प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी विश्वात असली तरी त्याचे फारच थोडे पडसाद मराठी साहित्यात उमटले आहेत. बाबासाहेब या महामानवास विनम्र अभिवादन !! ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

चित्रा Mon, 12/06/2010 - 18:53
वाहीदा यांचा हा प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. तरी तो विस्कळीत आहे असे मला वाटले. यातील एखाद्या मुद्यावर (मराठी साहित्यातील विद्रोही विचार, हिंदूंमधील जातीयता/धार्मिक भावना, साहित्यातून होणारे मुस्लिमांचे गैर-चित्रण, स्त्रियांना धार्मिकतेतून होणारा त्रास) त्यांनी अधिक विस्तृत लिहावे, अशी विनंती करते. आंबेडकरांच्या आधी ज्योतिबा फुलेही अस्पृश्यांच्या प्रश्नांवरून लिहीत होते, विचार मांडत होते, हे मात्र नमूद करावेसे वाटते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांमुळे राजकीय विचारांमध्ये या प्रश्नांचाही समावेश झाला, असे वाटते. स्त्रियांबाबतीत बोलायचे तर स्त्रियांना दुष्ट रूढींमधून मुक्तता ही आंबेडकरांच्या आधीपासून मिळण्याचे प्रयत्न सुरू झाले असावेत असे वाटते. १८१२ पासून राजा राममोहन रॉय यांनीही याआधी हिंदूंमधील विधवांना सती जाण्याच्या प्रथेपासून मुक्तता मिळावी यासाठी लेखन केले होते. मराठीतील धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना १८९३ मध्ये केली असे विकीवर कळते. विद्रोही विचार हे समाजातील दुबळ्या स्तरातून येण्याची सुरूवात मात्र जसे या गटांमध्ये शिक्षित वर्गाचे प्रमाण वाढले तसे सुरू झाले असावे. बाकी, बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. यातील असंख्य जण बदलले असतील याच्याशी सहमत. कसे जगता येते हे अनेकांना आंबेडकरांमुळे समजले असावे. तरीही अजून असे अनेक आहेत जे अजूनही मैला डोक्यावरून नेत असतील ह्या मताशीही सहमत. आंबेडकरांना अभिवादन. मला कायम प्रश्न पडतो - भारतात डोक्यावरून सामान वाहणारे हमाल का असतात? लहान लहान दोन-चार चाकी ओढता येतील अशा गाड्या/ट्रॉल्या घेता येत का नाहीत? त्या ओढणारे हमालही चालतील, डोक्यावरून सामान नेण्यास आता या जमान्यातही हमालांची का तयारी असते? हमालांच्या युनियन असाव्यात, त्या हे प्रश्न का रेटत नाहीत? का युनियन हे प्रश्न रेटतात, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते? तसेच सफाई-कामगार, मैला-वाहू कामगारांच्या बाबतीत. या कामगारांचे आयुष्य अतिशय वाईट, हलाखीचे जात असावे. त्यांच्यासाठी काम करणार्‍या संस्थांची माहिती या निमित्ताने कोणाकडे असली तर ती येथे द्यावी अशी विनंती.

नगरीनिरंजन Mon, 12/06/2010 - 15:47
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील अत्यंत सहमत. अशा अनेक वर्णपीडितांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणार्‍या आणि इतरांनी त्यांच्याकडे माणूस म्हणूनच पाहावे म्हणून झटणार्‍या आंबेडकराना सलाम.

In reply to by नगरीनिरंजन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:01
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील पूर्णतः सहमत !! ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night

In reply to by वाहीदा

टारझन Mon, 12/06/2010 - 16:03
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी
अच्छा , म्हणजे महामानव होऊन गेले तरी परिस्थिती बदलली नाहीये तर :) दुर्दैवी आहे हे !

In reply to by टारझन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:20
yes, that's why people like Mayawati takes advantage of the situation Uttar Pradesh is one of India's most deprived states , with a high crime rate and poor health indicators. Ms. Mayawati projects herself as an icon for India's 160 million Dalit and shamelessly builds statues of herself

चिगो Mon, 12/06/2010 - 16:11
डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन आणि ह्या महामानवाच्या चरणी दंडवत.. जय भीम...

तर्री Mon, 12/06/2010 - 17:24
त्यांचे "पाकिस्थान" निर्मीती / स्थिती बाबत्चे विचार अडवाणी / ठाकरे घराण्याचे वाटावे ईतके स्पष्ट आहेत. नेहरूनी ह्याही नररत्नाची ऊपेक्षा केली . घटनेच्या शिल्प्काराला नमन. बिका : स्तुत्य धागा.

धमाल मुलगा Mon, 12/06/2010 - 17:52
फार मोठा माणूस होऊन गेला. आपल्याच देशवासीयांची (आणि विशेषतः राजकारण्यांची) ह्या महामानवाला समजण्याची कुवत थिटी पडली. एखाद्या देशाची घटना तयार करणं ही साधीसुधी गोष्ट नव्हे. अशी अवघड कामगिरी मोठ्या जबाबदारीनं आणि अंगभूत बुध्दिमत्तेनं सहज पार पाडणार्‍या त्या महामानवाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांचे भाषावार प्रांतरचना, आरक्षण-सवलती ह्यासंबंधीचे विचार वाचले की वाटतं, अरे एव्हढा द्रष्टा माणूस आपल्यामध्ये होऊन गेला, अन त्यामानाने ह्या द्रष्ट्या बुध्दिवंताचे असे निरनिराळे पैलू आपल्याला ठाऊकच नाहीत.

नीलकांत Mon, 12/06/2010 - 19:52
बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कोट्यावधी जनतेला परिवर्तनाचा महामंत्र दिला. ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेबांनी येथील पददलीतांना स्वतंत्र केले. भारतीय समाजातील अन्यायकारक जातीव्यवस्थेवर हल्ला चढवला. अत्यंत महत्वाचे म्हणजे नवीन भारताच्या निर्मीतीच्या पायाशी भक्कम असलेले संविधान हे अत्यंत परिणामकारक आणि सर्वांना समान संधी देणारं, अन्याग्रस्तांवरील अन्याय दूर करणारं असं बनवण्यासाठी कष्ट घेतले. जेव्हा हिंदू धर्मातील प्रस्थापीत समाजरचना आपल्या समाजबांधवांना योग्य न्याय देण्यास असमर्थ आहे असे लक्षात आले तेव्हा याच मातीतील तथागताच्या वाटेवर चालण्याचा आणि धम्माच्या आश्रयास जाण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिला. लेखन, राजकारण, समाजकारण, संविधान, समाजरचना आदी सर्वच क्षेत्रात बाबासाहेब अतुलनीय आहेत. अश्या बाबासाहेबांकडून प्रेरणाघेऊन आज लाखो युवक आपलं आयुष्यं स्वत:च्या हिमतीवर बांधताहेत. बाबासाहेब माझ्यासाठी सतत प्रेरणेचा स्त्रोत आहेत. बाबासाहेबांना शतशः नमन. भवतु सब्ब मंगलम ! - नीलकांत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास Mon, 12/06/2010 - 21:13
डॉ. आंबेडकरांना अभिवादन. डॉ. आंबेडकरांचे विचार, निबंध, इ.इ. संदर्भ पुस्तकांची यादी मिळू शकेल काय? कोलंबिया विद्यापिठ संकेतस्थळ आंबेडकर.ऑर्ग

सुधीर काळे Mon, 12/06/2010 - 21:30
इंद्रा-जी, चित्राताई, नीलकांत आणि वाहीदा यांचे माहितीपूर्ण आणि विषयास धरून लिहिलेले प्रतिसाद आवडले. कांहीं माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या. धागा छान वाढतो आहे. या विषयावरील माझे स्वतःचे (वैयक्तिक) वाचन फारच अपुरे आहे त्यामुळे जास्त लिहिण्याची पात्रता नाहीं. जय भीम!

बहुगुणी Mon, 12/06/2010 - 21:51
चित्रा यांच्या वर विचारणा केलेल्या माहितीसंदर्भातः कचरा कोंडी हा तासाभराचा अनुबोधपट आवर्जून पहाण्यासारखा आहे. जवळपास उपलब्ध नसेल तर बहुतेक अतुल पेठे यांच्याकडूनच इथे निरोप पाठवला तर मिळू शकेल. डॉ. आबेडकरांना मनःपूर्वक अभिवादन.

गुंडोपंत Tue, 12/07/2010 - 04:42
समायोचित लेख बिपीनराव. मला वाटते की आंबेडकरांचे कार्य समजून घेण्यात आणि ते पुढे नेण्यात समाज फारच मागे पडला. वर नीलकांतने म्हंटलेच आहे, ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. तेच म्हणतो.

ढब्बू पैसा Tue, 12/07/2010 - 13:17
स्वतंत्र भारताच्या आधुनिक युगात जन्मल्याने असल्याने अस्पृश्यता ही फक्त शालेय इतिहासाच्या पुस्तकातून ठावूक होती. त्याची तीव्रता कधी तेव्हा कळली नाही. आणि आरक्षणांबद्दल अनेक गैरसमज असल्याने बाबासाहेबांचा थोडा रागच येत असे. पुढे कळत्या वयात दया पवारांचं बलुतं वाचलं आणि अक्षरशः सुन्न होते तीन दिवस. पहिल्यांदा ती दाहकता जाणवली! आणि बाबासाहेबांबद्दल असा हलकट विचार केल्याबद्द्ल स्वतःची खूप लाज वाटली. आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसणार्‍या एका मोठ्या जनसमुहाला बाबासाहेबांनी संघटीत केले, त्याना आपल्या किमान मानवी हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरीत केले! त्त्यांच्या ह्या कार्याबद्दल खरच आपण सगळ्यांनीच त्यांचे ॠणी असायला हवे!

दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे ------------------------------------------------- बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते. यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.

In reply to by अविनाशकुलकर्णी

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता. शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता.

भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. ---- - आचार्य अत्रे

माझे पण अभिवादन. पण शिवाजि पार्कात येणारे लोक एव्द्ढी घाण घालतात कि आजुबाजुचा परिसर पुढिल २-३ दिवस सुध्हा प्र्दुशित अस्तो. माझी बहिण ह्या दिवसात फिरायला बाहेर्गावी निघुन जाते ति आता उद्या रात्री परत येइल.

वेताळ Tue, 12/07/2010 - 17:24
आपण काय घाण करत नाही का? बाकी बाबासाहेब खुप मोठ्ठे द्रष्टे नेते होते.त्यांना शतशःप्रणाम... आज एक आंबेडकरवीदी कुटुंब चैत्यभुमीत बाबासाहेबाना अभिवादन करण्यास कल्याण हुन रेल्वेने जात असता ,एका उत्तरभारतिय युवकाने जागेच्या वादातुन त्या ५ वर्षाच्या मुलीला रेल्वेतुन बाहेर फेकले.त्याबद्दल दु:ख वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ६ डिसेंबर. मुंबईतले यच्चयावत रस्ते दादरच्या दिशेने वाहत असतील. त्यात हौशे, नवशे, गवशे, चोर, संधिसाधू राजकारणी असे सगळेच असतील. तसे ते प्रत्येक उत्सवात असतातच. पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. त्यांच्या मनातील कृतज्ञतेची मी केवळ कल्पनाच करू शकतो.

शेवटचा तुकडा..

गवि ·

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं. आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे. मुन्नाभाई मध्ये लक्की सिंगचा एक डायलॉग आहे. त्याला अधिकारी विचारतो २० मजल्याची परवानगी असताना इमारत २५ मजल्यांची कशी बनवलीस? तो म्हणतो "बनते बनते बन गयी यार!!".

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजचा दिवस उदयपुरच्या बाहेर भटकण्यासाठी ठेवला होता. सर्वप्रथम सज्जनगड म्हणजेच मॉन्सून पॅलेसला जायचं होतं. सज्जनगड म्हटलं कि आपल्या साताऱ्याचा सज्जनगड डोळ्यासमोर येतो. इथला सज्जनगड तसाच शहराबाहेर उंचावर आहे. तिथुन जवळ टेकड्या व्ह्यू पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. तिकडे जाण्याआधीच आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्या ड्रायव्हर कडुन समजलं कि आज सज्जनगड बंद होता. त्याने आणखी २-३ जणांना विचारून खात्री करण्याचा प्रयत्न केला. शहराबाहेर असल्यामुळे तिकडे जाण्या येण्यात वेळ घालवण्याची जोखीम नको म्हणुन आम्ही सुरुवात शहरातल्याच सहेलियोंकी बारी नावाच्या ठिकाणापासुन केली.

राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस

आकाश खोत ·

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते. उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली. मराठी पर्यटक चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या.

राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जयपुरमध्ये ऐतिहासिक स्थळे तर बरीच आहेत, पण जी गेल्या काही वर्षात बांधली गेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली अशीसुद्धा काही ठिकाणे आहेत.. पत्रिका गेट, तोरण गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, मसाला चौक इ. यापैकी वर्ल्ड ट्रेड पार्क तर आपल्याकडच्या कुठल्याही आयटी पार्क सारखं ग्लास फसाड असलेलं मोठं आर्थिक केंद्र आहे. तिथेच मॉल आणि फूडकोर्ट अशाही गोष्टी आहेत. अशा गोष्टी नसलेल्या भागातुन, किंवा निमशहरी आणि ग्रामीण भागातुन आलेल्या पर्यटकांसाठी तेसुद्धा एक जरूर जाऊन यावं असं आकर्षण असेल. आम्हाला फारसं नावीन्य न वाटल्यामुळे आम्ही ते टाळलं.