असो! इथे आमचा पार्ट संपतो. आणि यजमानांकडला आजच्या काळात निरनिराळ्या पद्धतीनी साजरा होणारा मंगळागौर जागविणे हा पार्ट सुरु होतो. पूजा संपते आणि कहाणी वगैरे वाचून या सगळ्या मुलि ,पुन्हा तेथून आपापल्या नोकरी व्यवसायांना पळतात,आणि आंम्ही पुढच्या यजमानदारी मार्गस्थ होतो.
पुढे चालू...
======================================
हा आमचा पार्टच असा आहे पुरोहितांचा. यजमानांचा पार्ट सुरु व्हायच्या आधी संपणारा. आणि संसारात चाललेल्या पार्टांना धंद्यापाठी धावताना दुर्लक्ष करायला लावणारा. मग जे व्हावयाचे ते होतेच. आमची होममिनिष्ट्री चिडते. आणि मग- "बाहेर मारे पैश्यासाठी लोकांची सगळी धार्मिक हौस भागवता,आणि घरात काहि करायचं असलं की तुमची सगळी हौस कंटाळ्यात बदलते!" असे सरळ विनातक्रार तिकडून आलेले लाडू-खावे लागतात. नाही...काय आहे ना, आम्हा पुरोहितांचं आचार्यां सारखं होतं हो. दररोज लोकांकडे जाऊन तो ढिगभर स्वयंपाक कुशलतेनी करायचा. यातच मनाची ताकद इतकी खर्च होते,की घरचा चहा देखिल कधी स्वतः करावासा वाटत नाही. तशीच आमची रोजची देवपूजा सुद्धा अनेकदा होममिनिष्ट्रीकडे सोपविली जाते,तिथे घरच्या खास धार्मिक समारंभांचे काय? त्यातला पूजा करण्याचा पार्ट तर आमचा आंम्हालाच ज्ञात असल्यामुळे त्यातला उत्साह कुठे कमी पडत नाही. पण घरच्या धार्मिक विधींसाठी स्वतःच बाजारहाट आणि तयारी करणारा यजमान आणि पूजा आपलीच आपल्याला सांगुन घेणारा गुर्जी.. अशी डब्बल ड्युटी पार पाडायची वेळ आली,की जीव नकोसा होऊन जातो. घरच्या धार्मिक कार्यातल्या सहभागात जी गत होते,तीच गत अनेकदा जीवनकार्य-धर्मातल्या संसारीक जबाबदार्या ओळखण्यात आणि पेलण्यातंही होते.
मला आठवत...ही जेंव्हा माझ्या बरोबर पुण्याला आली.तेंव्हा लग्नाला चांगली चार वर्ष होत आली होती. आणि आमच्या त्या भाड्याच्या जागेत प्रथम गणपती बसला तेंव्हा हिनी मला , "ह्हूं! कसला भटजी तू!? ती गणपतीची मूर्ती बुक करण्या पलिकडे केवड्याचं पान देखिल हलवलं नाहीस. " हा खास गाणपत्यालंकारीक टोमणा ,पुढे नवरात्रापर्यंत दर दिड दिवसानंतर मारुन माझं विसर्जन करणं चालू ठेवलं होतं. शेवटी त्याच नवरात्राच्या अष्टमीला हिला पुण्याच्या फेमस चतु:शृंगी'ला नेऊन आणलं. आणि देवळात देवीला, मनात बोलायच्या ऐवजी चुकून , "पुढचा जन्मी हीच बायको दे,फक्त-मला भटजी करू नकोस!" असा नवस मी जाहिर बोललो. बाजुची एक/दोन जोडपी मिष्किल हसली . पण ह्याचा परिणाम देवळातून परतताना पायरी पायरीला जाणवू लागला. वैजूची मुद्रा आणि विशेषतः ते नाक दर पायरी गणिक "ह्हूं ह्हूं" असे रागाचे हुंकार काढून,थरथरु लागलं. मला वाटलं, हिला देविनी धरलं..किंवा हिच्या चाणाक्ष स्वभावानुसार 'हिनीच देविला-धरलन की काय?' पण तो हुंकार खाली रस्त्याला येऊन गाडीवर बसलो तरी कमी होइ ना! तिथून निघाल्यावर मी आपला मधून मधून हे शीतंयुद्ध आणखि भडकू नये,म्हणून हिला, "आपण नवरात्रानंतर अगदी दिवाळी पर्यंत, डायरेक तुझ्याच गावाला जायचं का गं!" असं वारं घालून ते नवसाचं-आलेलं वारं काढण्याचा प्रयत्न करायला लागलो. परंतू सुपातलं धान्य वार्याच्याच दिशेनी धरुन पाखडलं,तरं तुसं आपल्याच अंगावर येतात..हा सहज-निसर्ग नियम लक्षात न आल्यानी..मी दर पाच मिनिटानी केलेल्या हिच्या प्रत्येक मनधरणीला, ही मला आभाळच दाखवत होती. "बरं... मग गावाला नको,दुसरीकडेच कुठे तरी जाऊ भटकायला." मी जरा वेगळ्या पद्धतिनी उतारा काढायचा प्रयत्न केला. तर त्यावर "तूच ज्जा एकटा. मी त्या आज्जीबाईं बरोबर राहिन. त्यांनाच कळतं माझ्याकडे लक्ष द्यायला,तुला काहिच कळत नाही!" अशी माझ्या अंगावर उलट तोफ लागली.
नंतर मात्र घरी येईपर्यंत मी तहाचे सगळे प्रयत्न गुंडाळून ठेवले,आणि (पुढील) तीनचार दिवसाच्या शीतयुद्धाची मनात तयारी करु लागलो. पण आमची गाडी गणेश खिंडीतून जशी लॉ कॉलेज रोडला लागली ,तशी ते रुसव्याचे हुंकार चिडचिडीत रुपांतरीत होऊ लागले. आणि मग मधुनच माझ्या पाठीवर हळूच गुद्दा मार..बोटानी टोच असले प्रकार सुरु झाले. मला काहि कश्याचा ठाव लागे ना..आणि खरच काहि म्हणजे काहिच कळे ना! म्हणून मी आपला आमच्या (ह्हो! आमच्याच..) मंडईच्या गणपती सारखा मागेच रेलून बसल्या सारखं करुन्,ते गुद्दे सौम्य करु लागलो. पण शेवटी ती धुसफुस काहि म्हणता काहि केल्या संपत नाहीये, हे लक्षात आल्यावर मी रात्रीच्या साडेदहा आकराच्या सुमारचा अंदाज घेत.. गाडी आमच्या सुप्परसिद्ध सदाशिव पेठेतल्या वाड्याकडे न्यायच्या ऐवजी सारसबागेच्या रात्रजागरणकॉफीपान केंद्रांकडे वळविली. पण तिथेही गेल्यावर हिला मी विचारलेल्या "वैजू..आज तुला कॉफी कोल्ड की साधी?" ह्या प्रश्नाला "काळी!" असं तिच्या चालू रागातलं टोकाचं उत्तर मज पामराकडे फेकण्यात आलं. मग तिथुन निघाल्यावर घरी पोहोचे पर्यंत मी हिला , "अगे माझे चिडलेल्या चतु: शृंगी देवते..त्या आज्जी (म्हणजे आमच्या घरमालकिण बाई) तुझी काय काळजी घेतात? तुझ्याकडे काय लक्ष देतात? ते मला सांग.म्हणजे मी ही घेइन की नै,तशीच काळजी? आणि तू म्हणतेस तसं, मला सांगितल्या शिवाय का हि हि कळत नाही कि नै? मग सांग तू,मंजे कळेल!" असं तहाच्या कलमांच शरणा-गतीत रुपांतर करु लागलो. पण तो दिवस नाही म्हणजे नाहीच संपला त्या चिडचिड आणि अबोल्यातून.
शेवटी दुसर्या दिवशी जेंव्हा मी सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर पडलो,तेंव्हा मला आमच्या घरमालकिण बाईंनी हाक दिली.."अहो गुर्जी..वेळ असेल तर चाहाला येऊन जा..जाता जाता." मग मनात म्हटलं दहा मिनिटं खर्च झाली तरी चालतील,पण मारलीच आहे हाक तर जाऊच..आणि विचारुच सरळ आज्जीबाईंना.. की हिला कशाचा रुसवा आलाय? आपल्या धंद्यामागे धावण्याचा? की संसारापाठी पळत धंदा करण्याचा? मग जिना चढून गेलो.आणि त्यांच्याकडल्या त्या टेबलफॅन जवळच्या श्टुलावर बसलो. मग चहा आला आणि मी चहा पित असे पर्यंत गप्प असलेल्या आज्जीबाई मला एकदम, "हम्म्म..लग्नाला वर्ष किती झाली?" असं विचारत्या झाल्या. मी आपला लहानपणी पाहुणेमंडळिंच्या, 'कितवीत गेलास रे या वर्षी?' या प्रश्नाला जसं उत्तर द्यायचो..तसं आज्जीबाईंना "चार" ..असं निर्विकार्पणे बोललो. आणि तो माझा निर्विकारपणा पाहून त्या एकदम हसतच सुटल्या. आणि मी अचंबीत जाहलो. पुढे म्हणल्या , "वैजू म्हणते ते खरच आहे..काहिच कळत नाही हो तुम्हाला!" शेवटी माझा अचंबीत जाहलेला तो चेहेरा पाहुन हसू आवरत त्या म्हणाल्या.. "आहो गुर्जी.. तिच्या आईला तरी बोलावून घ्या..नाहितर तिला तरी गावी नेऊन सोडा..!" ह्या वाक्यानी मात्र मी अगदी नीट म्हणजे नीट जागेवर आलो.. आणि मला जे काही समजायचं ते समजलं. पण मला नंतर तिथे एक क्षणभरंही बसता येई ना! कसाबसा मी नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला, आणि मग तिथुन बाहेर पडताना माझी उडालेली तारांबळ पाहून त्या मला तश्याच हसत हसत पुन्हा ,"आहो गुर्जी...आता सांभाळा हो जरा नीट..तुम्हाला...तुमच्या तिला...आणि घरी येणार्या गणपती किंवा गौरिला!" असं पाठिवर हात ठेऊन आशिर्वाद दिल्यासारखं करत म्हणाल्या.
मी आपला सकाळ असली तरी आजुबाजुला कुणी ऐकलं तर नाही ना? (हो!!! कशाला उगाच जाहिरात? :-/ ) या विचारात पटकन खाली आलो..आणि आधी बाहेर जाऊन समोरच्या त्या आमच्या टेलिफोन बूथवरुन..माझ्या एका सहकार्याला फोन फिरवला.. त्याला त्या दिवसाच्या कामांची व्यवस्था पाहायला सांगितली..आणि दुसरा फोन घरी लावला. तो सकाळी सकाळी उचलला तो नेमका काकानीच. मग त्याला मी प्रथम हे शुभंवर्तमान सांगितले.. तर मला तो तिकडून "आत्मू..आंम्हाला सांगितलय हो तुझ्या बायकोनीच ..आणि तिच्या घरी देखिल कळवलय. अरे गाढवा... कुठचीही पोरं ही बातमी आपल्या आईला कळवणार नाही का? फक्त तुलाच मी सांगितल्या प्रमाणे परिक्षा मोडमधे टाकलावता हो आंम्ही सगळ्यांनी .. म्हटलं,आपोआप काहि कळतं का बघू...(अजून तरी!) " मी या नॉनस्टॉप फायरींगनी थोडासा चिडलोच सगळ्यांवर आणि काकाला "पण मला का नाही सांगितलं मग वैजू नी? त्या आमच्या मालकिण बाई आज्जी आहेत,त्यांना बोलली..आणि मला.... ??? ज्जा!!! मी ही नाही बोलणार आता तिच्याशी. " असं म्हणत रागात आलो. पण काकानी लग्गेच.."अरे गाढवा आत्म्या... जरा घरात लक्ष असावं हो माणसाचं..नुसतं धंदा एके धंदा करु नाही..धंदा दूणे संसारंही असतो..त्यालाच लग्न म्हणातात .. चल..ठेव तो फोन आता.. आणि घरी जा पहिला.. नाहितर लोकांचे आजचे नवमीचे नवरात्र उठवण्याच्या अक्षता देत बसशील..आणि घरची देवी बसेल पुन्हा..रुसून!"
मी फोन ठेवला..आणि घराकडे येता येता वाटेत, एक विचार मात्र प्रामाणिकपणे मनात आला. काम करणे आयुष्यभरासाठी आहेच,पण आता आपल्यासाठी मात्र , घर.. रोज त्या आधी असलं पाहिजे. आणि त्याची सुरवात ह्या आजच्या दिवसापासून केली पाहिजे. फक्त आजच्या दिवसापासून..कारण तोच आज ठामपणे आपल्या हातात आहे!
===============================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२.. ४३.. ४४..
प्रतिक्रिया
16 May 2015 - 2:54 am | रेवती
छान चाललाय संसार!
16 May 2015 - 8:42 am | टवाळ कार्टा
=))
16 May 2015 - 9:17 am | यशोधरा
मस्त. उगाच ट्रॅजेडी वगैरे करु नका हां पुढे जाऊन.
16 May 2015 - 1:16 pm | प्रचेतस
16 May 2015 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा
नीच हत्ती!!!
16 May 2015 - 5:19 pm | यशोधरा
जा इमोटीकॉन कसला गोड आहे! कुठून घेतला? मला लिंक दे प्लीज. :D
16 May 2015 - 1:33 pm | सतिश गावडे
वाचून गुरुजींची बायको या इटालियन विनोदी चित्रपटाची आठवण झाली.
16 May 2015 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा
हल-कट ढन्या,मारतो फन्या!
16 May 2015 - 3:08 pm | प्रचेतस
हे 'फन्या' म्हणजे काय?
16 May 2015 - 3:57 pm | सतिश गावडे
त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे? यमक जुळले आहे ते महत्वाचे.
16 May 2015 - 4:00 pm | प्रचेतस
म्हणजे उपरोक्त ओळ निरर्थक असली तरी चालेल असे आपणास म्हणावयाचे आहे काय?
16 May 2015 - 4:02 pm | सतिश गावडे
नाही. तो तुमचा समज आहे.
16 May 2015 - 4:04 pm | प्रचेतस
तुम्हाला मुद्दाच कळलेला नाही.
16 May 2015 - 4:06 pm | सतिश गावडे
आपणास मुद्दा कळलेला नाही.
बादवे, कोण म्हणतं मिपावर फँटसी प्रकारातील लेखन येत नाही. :)
16 May 2015 - 4:08 pm | प्रचेतस
तो तुमचा समज आहे.
बाकी असं गिर्जाकाका म्हणत होते ब्वॉ.
16 May 2015 - 4:10 pm | सतिश गावडे
>> तो तुमचा समज आहे.
चालू द्या तुमचे निरर्थक आत्मरंजन.
>> बाकी असं गिर्जाकाका म्हणत होते ब्वॉ.
त्यांनी हा धागा वाचला असेल तर नक्कीच त्यांचे मत बदलेल.
16 May 2015 - 4:13 pm | प्रचेतस
गिर्जाकाकांच्या मताची वाट पाहाणे आले.
बाकी तुमचे चालू द्या.
16 May 2015 - 4:17 pm | सतिश गावडे
>> गिर्जाकाकांच्या मताची वाट पाहाणे आले.
या कथेच्या नायकानेही कधी वयजूची वाट पाहिली असेल त्यावरुन तुम्ही असे म्हणताय का?
>> बाकी तुमचे चालू द्या.
हे लेखकास उद्देशून आहे का? म्हणजे "अजून येऊ द्या" च्या ऐवजी हे लिहिले आहे का?
16 May 2015 - 4:20 pm | प्रचेतस
अजूनतरी कथानायकाचे असे वाट पाहाणे प्रकट झाले नाही.
नाही. हे तुम्हास उद्देशून आहे.
16 May 2015 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
... ................
11 Mar 2016 - 6:27 pm | प्रसाद गोडबोले
ऑफीसात बसुन कंटाळा आल्याने आज वैजु वयनींची आज प्रकर्षाने अठवण झाली .
खुप सुरेख फ्यॅन्टसी आहे ही !!
हे वाक्य वाचताना तर रोमांच्यच उभे राहिले अंगावर !!
अहाहा ... वैजु वैजु ! !
11 Mar 2016 - 7:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खी खी खी खी खी.
कंटाळा डबल इन्वर्टेड कॉमामधे हवा होता असं गुर्जी म्हणतात.
11 Mar 2016 - 9:28 pm | सूड
हे वाचून माताय त्या रोमांचासकट चित्र उभं राह्यलं डोळ्यासमोर =))
16 May 2015 - 1:46 pm | एस
वाह!
नेहमीप्रमाणेच खास शेवट.
16 May 2015 - 4:59 pm | अजया
जमलंय आजचं भावविश्व आणि भक्तगणांची रणिंग कामेंट्रीपण ^_~
17 May 2015 - 11:16 am | पॉइंट ब्लँक
छान लिहिलयं :)