मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
27 Jan 2009 - 9:34 am

हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल.
पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन ....
बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन ....

आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय. गेले उडत साले, मरणाचे शिष्ठ व अतिशहाणे आहेत, आपण आपल्या लोकांशी जुळवुन घेतलेले बरे. बॉससुद्धा मराठी आहे हे बेश्ट झाले, आता जास्त अडचण होणार नाही. आपल्या लोकांबरोबर, आपल्या भाषेत काम करताना कस्सं मोकळंमोकळं वाटतेय.....
शेवटी एकदा आलो बेंगलोरमध्ये, च्यायला ह्या "अंडुगंडु गुडगुडु" च्या भाषेच काम जरा अवघडच दिसतेय, कसं जमणार हे देवाला ठाऊक. आज कंपनीत जॉइन झालो, च्यामारी सगळी कोंगाडी जनता भरली आहे. बॉसही कानडीच आहे, साल्याने बरोबर आपले आपले लोक खेचुनघेतलेत. असो. बाकी "हिंदी भाषीक" ३-४ जण आहेत हे एक चांगले झाले, जरा त्यंच्याबरोबर मिक्स होता येईल. ह्या कन्नडिगांचा ग्रॄप एकदम सॉलीड दिसतोय, खायला-प्यायला-गप्पा मारायला सगळे कसे मिळुन मिसळुन असतात, गेले उडत, कुणाला व्हायचयं त्यांच्यात मिक्स ?
=============================================
आज मिटिंगमध्ये बॉस सगळ्यांना नवे काम समजावुन सांगताना बहुतेक अनावधनाने सलग ५-६ वाक्ये मराठीत बोलला, मला काही प्रॉब्लेम नाही झाला पण हे "भय्ये" लगेच उठुन " हमें समझा नहीं, हिंदी मे या तो अंग्रेजी मे बतावो " असे म्हटले, साले एक नंबरचे हलकट आहेत, गेली १-२ वर्षे पुण्यात आहेत मग २-३ वाक्ये समजायला काय प्रॉब्लेम आहे ? का शक्य तिकडे आपला "उपरेपणा" दाखवायलाच हवा ? आता ह्यांची चांगलीच ताणली पाहिजे. बोस बिचारा सज्जन, त्याने माफी मागुन पुन्हा इंग्लिशमध्ये समजावले ....
आयला हे दाक्षिणात्य लोकं आहेत की भिंताडं, साला मिटिंगमध्ये सुद्धा आपल्याच भाषेत बोलतात, कंपनी काय ह्यांच्या घरची आहे काय ? नाही, भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान वगैरे असायलाच हवा पण कॉर्पोरेट जगतात मात्रॄभाषाच बोलणार म्हणुन कसे चालेल ? आता ह्यांच्यासाठी मी कन्नड शिकायची का ? ते काही, आत्ता लगेच उठुन स्पष्ट बोलले पाहिजे.
च्यामारी, चांगले सज्जनपणे "कन्नड येत नाही" हे सांगितले तर एकेकाच्या चेहर्‍यावरचे भाव कसे बदलले पहा, जळके आणि आत्मकेंद्री साले. ....

==============================================
आज मित्रांबरोबर जंगली महाराज रोडवरच्या मॅक्डी मध्ये जेवायला गेलो. तिथल्या काउंटरवरच्या बाहुलीने डायरेक्ट हिंदीत बोलायला सुरवात केली , एक मित्र जरा सायकीक आहे, त्याने काउंटरवर जाऊन डायरेक्ट मराठी सुरु केले, तिला काही समजेना हा काय बोलतोय ते, हा शहाणा मराठीवरच अडुन बसला, शेवटी बाबापुता करुन त्याला बाहेर आणला. असो. पण महत्वाचा मुद्दा असा की मराठी प्रांतात हॉटेल काढत असताना मराठी भाषा येणारे कर्मचारी भरती करणे हे कंपनीचे कर्तव्य नाही का ? "हिंदी" ही काय महाराष्ट्राची राज्यभाषा अगर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे काय ? ह्यांचे काही तरी करायला हवे ....
आज जेवायला फोरममधल्या "पिझ्झा हट"ला गेलो होतो, च्यायला डायरेक्ट डोक्याला शॉट निघाला. गर्दी होती म्हणुन आधी ऍडव्हान्स बुकिंग करायला एक माणुस बाहेर उभा होता. अहो आश्चर्यम , त्याला "हिंदी" येत नाही. त्या शहाण्याने फक्त "कन्नडमध्येच" बोलेन असा नववर्षाचा प्रण केला असावा. शेवटी जास्त वाद नको म्हणुन "इंग्रजीत" बोलुन विषय संपवला. पण मुद्द्याची गोष्ट अशी की पिझ्झा हट सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने "इंग्रजी अथवा राष्ट्रभाषा" बोलणारे लोक प्राधान्याने नौकरीला ठेवणे जरुरीचे नाही का ? सर्वांनाच कशी स्थानीक भाषा येईल ?
==============================================
च्यायला कंपनीतल्या रुपालीला डोक्याचा भाग नाही, एवढी मराठी पब्लिक असताना ही त्या भैय्या "संजय त्रिवेदी" बरोबर फिरते आहे. आमचं एक सोडा हो पण इतर मराठी पोरं काय मेली काय ? च्यायला फुकट डोक्याला शॉट निघतो असे काही पाहिले की, हे साले भैय्ये कामापुरती जवळ करतील तिला, नंतर मग कोण तु असे विचारायला कमी करणार नाहीत. छे, रुपालीला सांगायलाच हवे ही, पण ती तर कुठे मराठी पब्लिकमध्ये मिसळते, तिला तेच हवे आहेत. मरु देत ...
आयला हापीसातली "सौम्या" भारी आहे राव, आजकाल जरा जास्तच आपल्याबरोबर फिरत आहेत. गप्पा मारायला, टीपी करायला, बरोबर जेवायला एकदम स्सह्ही कंपनी सापडली. पण बाकी कन्नड पब्लिक आमच्याकडे असं मारक्या म्हशीच्या नजरेने का पहात असतं ? जळतात साहे, त्यांना सौम्या काडीइतका भाव देत नाही ना म्हणुन.
तिला आज विचारलं की "बै, बाकीचं कन्नड पब्लिक बोंबलतं का ? " म्हणुन, ती म्हणाली काहीच काळाजी नकोस करु, ती ह्या गोष्टींना किंमत देत नाही. असं पाहिजे राव, माणुस जोडणे महत्वाचे, आपापल्या लोकांबरोबरच रहायचे असा हट्ट म्हणजे कठिणच आहे. सौम्या एकदम "उच्च विचाराची आणि फ्री माईंडेड " आहे बो, आपण मानलं ....

==============================================
राजसाहेब म्हणतात ते करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे स्थानीक भाषेत दुकानांच्या पाट्या असायला. स्थानीक भाषेला प्राधान्य आणि महत्व असायलाच हवे. समजा गावाकडुन एखादा खेडुत आला तर त्याला काय घंटा समजतं आहे हे इंग्लिशमध्ये काय लिहले आहे ते, मराठीच हवे तिथे....
आज एका मित्राकडे जरासे लांब गेलो होतो. च्यामारी, ह्या स्थानीक बसेस आहेत की चेष्टा ? सगळ्या पाट्या, आतले कर्मचारी "फक्त कन्नड" वालेच, आमच्यासारख्यांनी काय करायचे ? पोहचलो कसेबसे. ऍड्रेस आहे व्यवस्थीत पण झोल असा आहे की हे "लँडमार्क्स" शोधायचे कसे ? सगळीकडे जिलब्या पाडल्यासारखे कन्नड लिहले आहे, काडीइतके समजत नाही. नाही, जरी दाक्षिणात्यांचा हिंदी विरोध गॄहीत धरला तरी ह्यांना "इंग्रजीत" लिहायला काय प्रॉब्लेम आहे ? नाहीतरी सगळीकडे हे इंग्रजी झाडत असतातच ना ?
==============================================
आज "नॉन मराठी पब्लिक" आलं होतं फ्लॅटवर, मस्त दंगामस्ती केली सगळ्यांनी मिळुन, आता जेवायला कुठे जायचे म्हटले तर अजुन दंगा सुरु झाला. चांगलं ह्याना "मथुरा" मध्ये चला म्हणतोय, मस्त मराठमोळी भाकरी पिठलं थालपीठं वगैरे खाता येईल. हे म्हणतायतं की पंजाबी खायचं म्हणुन, रोज रोजच पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला म्हणे. जाऊ दे, गाढवाला काय गुळाची चव ?
च्यायला जेवतानाही शांत जेवत नाही, उगाच मोठ्ठ्यामोठ्ठ्या गप्पा मारतात लेकाचे, म्हणे काय तर "आमच्या भागात पराठे, रबडी , दम सब्जी , कचोरी वगैरे वगैरे" भारी मिळती म्हणे. आता इथे आहात ना, मल गपचुप खावा ना इथले, एवढे शिंपल समजत नाही लेकाच्यांना, मरु देत ....
च्यायला आजकाल सकाळ सकाळ सौम्याबरोबर ब्रेकफास्टला जायचे म्हणजे संकटच आहे बॉ, काय खाणार तिथे जाऊन हा प्रश्न दररोज पडतो. आयला रोज सकाळी डोसा / ईडली / वडा सांबार खायचे म्हणजे काय चेष्टा आहे का राव ? काहितरी व्हरायटी हवी का नको ? रोज तिच टेस्ट बोर होत नाही काय ? मी म्हटले सौम्याला "आमच्या पुण्यात ये, मस्त कांदापोहे, वडापाव, भजी खायला घालतो. एकदम झ्याक टेस्ट असते" .....
==============================================

तर असं आहे एकंदरीत, मीच सध्या फार मोठ्ठ्या मानसीक द्वंद्वात आहे की माझी नक्की "विचारसारणी" कशी आहे ?
अजुनतरी मला समर्पक आणि समाधानकारक उत्तर सापडले नाही ह्या प्रश्नाचे ...
पाहु भविष्यात काय काय घडते ते ...
**** डिस्केमर ***
१. लेखाच्या अनुषंगाने आलेली व्यक्तींची नावे ही "काल्पनीक" आहेत अथवा "बदलली "आहेत, त्याचा वास्तवीक जीवनाशी संबंध लावण्याचा प्रयत्न करु नये.
२. कुणावर टिका करायची ह्या हेतुने हे लिखाण केलेले नाही.
३. मनातले विचार आहे तसे मांडत असल्याने काही अपशब्द आले असण्याची शक्यता आहे, त्याला माझा इलाज नाही.
**** डिस्केमर संपले ****

मांडणीवावरराहती जागामुक्तकसमाजजीवनमानराहणीविचारअनुभव

प्रतिक्रिया

दशानन's picture

27 Jan 2009 - 9:41 am | दशानन

:)

सेम टू सेम !

* येथे काही माझे हिंदी भाषीक माझे मित्र माझ्याशी बोलताना "जय महाराष्ट्र"म्हणातात व मी त्यांना " जय हरयाना" ह्याचा एक फायदा झाला त्यामायला जेव्हा चुकुन राजसाहेबांच्या सैनिकांनी हरयणावाल्यांना कुठ मुंबई मध्ये मारलं ..... पण मला येथे मार बसला नाही हे नशीब.

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सहज's picture

27 Jan 2009 - 9:54 am | सहज

खूप रोचक लिहले आहेस.

आपण सारेच अर्जुन!!

छोटा डॉन's picture

27 Jan 2009 - 9:58 am | छोटा डॉन

>>आपण सारेच अर्जुन!!
काय योगायोग आहे पहा, योग्य शिर्षक सापडले नाही म्हणुन २ दिवस मी लिखाण अप्रकाशित ठेवले.
शेवटी वैतागुन आज टाकले, आपण दुसर्‍याच प्रतिसादात एकदम करेक्ट "शिर्षक" मिळवुन दिले.
आभार ...!

आपली परवानगी असेल तर मी हे "शिर्षक" म्हणुन वापरु इच्छितो ...
बोला काय म्हणता ?

------
छोटा डॉन

पिवळा डांबिस's picture

27 Jan 2009 - 9:55 am | पिवळा डांबिस

डानराव आम्हाला आवडलं!
तुमच्यातल्या अर्जुनाला लवकरच श्रीकृष्ण भेटो ही सदिच्छा!!!
:)

मैत्र's picture

27 Jan 2009 - 10:07 am | मैत्र

डॉन्या, सही लिहिलं आहेस!!
लै आवडलं आणि पटलं!

अनामिक's picture

27 Jan 2009 - 10:14 am | अनामिक

मस्तं रे डॉन... लै भारी..

अनामिक

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 10:14 am | नितिन थत्ते

~X( प्रश्नावर नेमके बोट ठेवले आहे पण त्यामुळे उत्तर धूसर झले आहे.
खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

बहुगुणी's picture

27 Jan 2009 - 10:50 am | बहुगुणी

मी माझं किरकोळ (नेहेमीच स्वान्तसुखाय) लिखाण करतांना अनाहुतपणे मराठी, इंग्लिश तसंच हिंदीतून करतो, तेंव्हा कधी तरी एका मित्राने 'इतक्या सहजपणे भाषा बदलायची का गरज वाटते'? असं विचारलं होतं, तेंव्हा मी खालील उत्तर दिलं होतं:

कभी इंग्लिश या मराठी, कभी हिंदी मेरी बोली है
भाषा तो केवल माध्यम है दिल चाहे वो कहने की
कभी मैं सोचूं सावन की, कभी मन में होली है
जरूरत है जो कहो, लोगोंके दिल में रहने की

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jan 2009 - 11:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डानराव, तुमच्याही अगदी सहमत.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. सोयीसाठी आणि संवादासाठी म्हणून दुसरी, दुसर्‍याची भाषा बोलली थोडी तर कुठे काही अडत नाही.

अवांतरः कधी कामाच्या निमित्ताने परदेशात फिरताना लक्षात आलं आपण स्थानिक भाषेत तोडकं मोडकं 'नमस्कार' केलं तरीही लोकं मग इंग्लिशमधून शक्य तेवढी मदत करतात.
कालच वेरूळच्या लेण्यांच्याखाली एका (तिथल्या दृष्टीने) पॉश रेस्तराँमधे जेवत असताना असं लक्षात आलं की गोरी कातडी पाहिली की छान सर्व्हिस मिळते; पण त्यातल्याच एक बाई जेव्हा अस्खलित हिंदी बोलायला लागल्या तेव्हा त्यांनाही आमच्यासारखंच हाका मारून, बोलावून वेटरचं लक्ष वेधून घेऊन मगच खायला मिळालं.
घोडं इथे पेंड खातं!

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मनस्वी's picture

27 Jan 2009 - 11:12 am | मनस्वी

डान,
तू व्यक्त केलेले सगळे विचार अगदी जशाच्या तसे मनात डोकावून गेलेत / जातात.
मनातील द्वंद्व छान उतरवलं आहेस.

ढ's picture

27 Jan 2009 - 11:51 am |

सुंदर लेखन. मुक्तक आहे आपण म्हणालात तसं.

पण बाष्कळ बडबड निश्चितच नाही.

पटलं आणि खूप आवडलं.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2009 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार

डॉन राव सुंदरच लिहिले आहेत. आणी प्रतीसाद बघुन वाटत आहे की तुम्ही तुमच्या प्रमाणेच अजुनही बर्‍याच जणांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहेत.
माझ्या सायबर मध्ये येणार्‍या बर्‍याचशा मुली, मुले हे परप्रांतिय आहेत पण ते खुप प्रयत्न करुन मराठीत बोलायचा प्रयत्न करत आहेत हे बघुन खुप बरे वाटते. मग मी पण कधीतरी बळच पंजाबी नाहितर गुजराथी, बिहारी झाडुन घेतो, मग जेव्हड्या खदखदुन मी त्यांचे मराठी ' एंजॉय करतो तेव्हडेच ते माझे बोलणे एंजॉय करतात ;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

प्रभाकर पेठकर's picture

27 Jan 2009 - 12:20 pm | प्रभाकर पेठकर

मुद्दा चांगला आहे. थोडक्यात मांडता असता तर जास्त प्रभावी वाटला असता. प्रत्येक लाल परिच्छेदा नंतर येणारा नीळा परिच्छेद काय सांगणार आहे ह्याची आगाऊ कल्पना येते. अती पुनरोक्तीमुळे लेखन किंचित प्रभावहीन झाले आहे. असो.

इतके विरुद्ध आचार विचार आपले नसतात. बँगलोर मध्ये जे जे प्रसंग अनुभवास आले त्या त्या प्रसंगांच्या पुणेरी आवृत्तीची आठवण (किंवा उलट) नक्की होत असू शकते. अशी आठवण माणसाला अंतर्मुख करते. आपलं इथे किंवा तिथे काय चुकतय ह्याचं आपण गणित मांडतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो.

ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

अवलिया's picture

27 Jan 2009 - 12:31 pm | अवलिया

ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं.

पूर्णपणे सहमत.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन's picture

27 Jan 2009 - 12:25 pm | छोटा डॉन

सर्वात प्रथम लेख आवडल्याचे आवर्जुन कळवण्यार्‍या सर्व जणांचे आभार ...!

पण मला वाटते की काहितरी गल्लत होते आहे, मी जे मांडायचा प्रयत्न करतो आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत व्यवस्थीत पोहचत नाहीये, दुसराच व थोडासा "संकुचित अर्थ" कदाचित ह्या लेखातुन निघत आहे.
हा लेख "फक्त भाषा" ह्या पुरता मर्यादीत मुळीच नाही, मात्र भाषा ही गोष्ट नक्कीच ह्या लेखात विचारात घेतली आहे.
असो.

तर मी हा लेख एकंदरच विवीध प्रदेशातील संस्कॄती, राहणीमान, सवयी, मानसीकता, खाणेपिणे, आचारविचार, सण ह्यांच्यातील बदल आणि एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची ह्या बदलाला ऍडज्स्ट करुन घेताना होणारी मानसीक घुसमट यांचा वेध घ्यायचा प्रयत्न म्हणुन लिहला आहे. आपण जेव्हा आपल्या स्वःताच्या प्रदेशात असतो तेव्हा आपला "फ्रेम ऑफ रेफरंस" हा अतिशय मर्यादीत असतो, आपण बाहेरचे काही पाहिलेलेच नसते. त्यामुळे अनावधानाने का होईना आपण आपली बाजु "उच्च / श्रेष्ठ " मानायला सुरवात करतो.
जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या "कक्षेत" येते तेव्हा आपण नकळत त्याची तुलना आपल्याबरोबर करायला सुरवात करतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या "फ्रेमशी" विसंगत दिसते तेव्हा ती गोष्ट आपण त्वरित "हलक्या दर्जा"ची ठरवुन मोकळे होतो. शिवाय महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच्या बदल घडवुन आपल्याप्रमाणे आचरण करावे हा आपला "अट्टाहास " असतो / आहे.
काही तुरळक प्रमाणात हे शक्यही आहे जसे की खाणे-पिणे , भाषा, कपडे वगैरे स्थानीक आवडीशी जुळवुन घेऊ शकतो ...
पण जेव्हा प्रश्न हा "संस्कारांचा, विचारांचा व राहणीमानाचा" येतो तेव्हा ह्या गोष्टी जुळवुन घेणे अवघड बनते, मग तेथे सुरवात होते द्वंद्वाला व क्वचितच वादाला सुद्धा ...
पण ह्यावेळी प्रदेश आपला असल्याने आपल्याला आपलीच बाजु बरोबर वाटते व दुसर्‍याने बदलावेच असा एक अनाठायी अट्टाहास बहुतेकांच्या वागण्यात दिसतो ...

नेमके असेच घडते जेव्हा मी "परक्या प्रदेशात" जातो. पण ह्यावेळी "व्हिक्टीम" मात्र मी असतो.
आता मला हे "बदल" माझ्यावर आक्रमण करणारे वाटतात व आतुन कोठेतरी आपल्यावर अन्याय होतो आहे अशी भावना निर्माण होते.
बदल तर करावेच लागतात पण कुठल्या पातळीपर्यंत करावे ह्यासाठी परिमाण वेगवेगळे आहेत, ह्यात एकदम होणे शक्य नाही. मी वर म्हटल्याप्रमाने मी इथली भाषा शिकेन, खाणेपिणे सवय लाऊन घेईल, सण साजरे करीन पण मुळात जे "मराठी संस्कार" आहेत ते विसरुन "कन्नड संस्कार" अंगिकारणे मला निश्चितच जड जाईल व अर्थात मला ते मान्य नसेल.
इथेही मग "द्वंद्व" सुरु होईलच ...!

तर थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकजण आपला स्वतःचा असा संस्कॄती, संस्कार, आचारविचार, राहणीमान ह्यांचा आपल्या सोईनुसार "चष्मे " बनवुन घेतो व त्यातुन दिसणार्‍या गोष्टींविषयी आपल्या सोईचे मत बनवतो. मात्र जेव्हा त्याला हा चष्मा उतरवुन कधीच न पाहिलेल्या एखाद्या प्रदेशात नग्न डोळ्यांनी जावे लागते तेव्हा मात्र तो अडखळतो ...!
ह्यालाच मी त्या व्यक्तीचा "अर्जुन झाला " अशी समर्पक उपमा देईन ...

अजुन बरेच लिहायचे आहे, तुर्तास एवढेच. बाकी सवडीने ...
धन्यवाद ...!

------
छोटा डॉन

डॉनभौ ... एकदम फॉर्मात. तुमच्या सर्वोत्कृष्ट लिखाणापैकी एक..

भास्कर केन्डे's picture

28 Jan 2009 - 3:49 am | भास्कर केन्डे

डॉन भाऊ,

लेख मुक्तक म्हणून एकवेळ छान जमला आहे असे म्हणता येईल. पण त्यातून आपल्याला अपेक्षित नसलेला संदेश गेला आहे व तो बहुतेक करुन भाषेभोवतीच फिरत राहिलेला आहे. मात्र ही पुरवणी फार छान लिहिलीत. ती आवडली.

पेठकर काका म्हणतात ते एकदम बरोब्बर. जिथे जाल तिथली भाषा/संस्कृती यांशी एकरुप होण्यातच शहाणपणा. मी कलकत्त्याच्या वास्तव्यात दोन महिन्यांत चांगला बंगाली बोलू लागलो होतो. आमच्या मिटिंगा बर्‍यापैकी बंगालीतूनच होत. त्यामुळे महाराष्ट्रात येणार्‍या परप्रांतींयाकडून माझी हीच अग्रही अपेक्षा आहे.

मूळ लेखात एक खटकलेली बाब: महाराष्ट्रात बरेचदा पाट्यांवर मराठी नसतेच. केवळ इंग्रजीत पाट्या असतात. राज साहेबांसह सगळ्या मराठी प्रेमींची इच्छा/अपेक्षा येवढीच आहे की बाबांनो, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, ज्या भाषेत लिहायचे आहे ते लिहा पण पाट्यांवरील नावे मराठीत सुद्धा असू द्या. कर्नाटकात पाट्यांवर केवळ कन्नडच असल्याचे आपणच सांगितलेत, बाकी मी कधी बंगरुळूला गेलेलो नाही.... असो. विषयांतरा बद्दल क्षमस्व.

आपला,
(परदेशस्थ मराठी) भास्कर

ऍडीजोशी's picture

27 Jan 2009 - 2:28 pm | ऍडीजोशी (not verified)

डॉन प्रमाणे मी सुद्धा आधी महराष्ट्र आणि आता बँगलोर ला आल्याने हेच अनुभव असेच मलाही आले आहेत (सौम्या वगळून :()

पण एक मुद्दा आपण विसरतोय की मराठी लोकं अजूनही मराठीत बोलण्याबाबत इथल्या लोकांइतकी कट्टर नाहीत. अगदीच अंगाशी आल्यावर मराठीबाणा जागॄत झालाय. आत्ता कुठे मराठी लोकं मराठीचा आग्रह धरू लागली आहेत. राज ठाकरे नी बांबू टाकल्यावर पाट्या मराठीत दिसू लागल्यात. आणि बर्‍याच प्रमाणात दोन मराठी माणसं एकमेकांशी मराठीत बोलू लागलीत.

त्या आधी आओ जाओ घर तुम्हारा, मराठी येत नाही आम्ही हिंदीत बोलू. मुंबईमधे आयुष्य घालवून मराठीत एक वाक्य न बोलणारे भो%#$@#%#% भि%#$#%#@% भु$#%#$#%#@% चे भैय्ये इथे मात्र व्यवस्थीत कन्नड शिकून घेतात. एका भैयानेच मला हे सांगितलं 'इनकी भासा में नही बोलेंगे तो धंदा नही होगा'. कामत यात्री निवास च्या समोर बसतो हा पानवाला.

इथे मात्र हिंदी पण चालत नाही. वाट्टेल ते झालं तरी हिंदी मधे न बोलणारा रिक्षावाला आपण त्याची हिंदीत आई बहीण काढली लगेच म्हणतो 'गाली कायको देता है?' अरे >%#$@#%#% कळतं ना तुला हिंदी मग दोन वाक्य बोलल्याने जीभ झडते का तुझी?

त्यामुळे मी महराष्ट्रात उशीरा जागॄत झालेला मराठीचा अभिमान आणि इथल्या लोकांचा अडेलतट्टूपणा ह्यांना एकाचा मापात मोजणार नाही.

मराठी_माणूस's picture

27 Jan 2009 - 2:32 pm | मराठी_माणूस

सहमत

संदीप चित्रे's picture

27 Jan 2009 - 9:31 pm | संदीप चित्रे

असेच म्हणतो

आनंदयात्री's picture

27 Jan 2009 - 2:50 pm | आनंदयात्री

भो पार्था,

आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कोणी राजकिय नेता म्हणतो किंवा एखादा मुद्दा मांडतो म्हणुन आपण ती विचारपद्धती (वाद) आपली म्हणतो. खरे पाहिले तर त्या मुद्द्याला याआधीच्या आयुष्यात किंवा भावविश्वात काहीही स्थान नसते, आपण उगाचच आपली मानसिक दमवणुन करुन घेतो.

मी माझ्या काही अमेरिकेतल्या हुशार मित्रांकडुन गेंड्याच्या कातडीचे जाकिट आणलेय. ;)
श्रद्धा कुठेच ठेवायची नाही हा मुलमंत्र !!

-
(सुदर्शनधारी)

आंद्या गवळी

आनंदयात्री's picture

27 Jan 2009 - 4:25 pm | आनंदयात्री

>>आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे.

कृपया आपली हा शब्द देखिल त्याच्या बहुवचनाधारित अर्थाने लक्षात घ्यावा. तुमची हा शब्द वापरलेला नाही याची नोंद घ्यावी.
no offence meant !

लेख आणि तुमचीच प्रतिक्रिया दोन्ही छान मांडले आहे...

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2009 - 9:04 pm | ब्रिटिश टिंग्या

आम्ही पहिल्यापासुनच प्रांतीयवादाच्या विरोधात आहोत!

परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये!

- टिंग्याकृष्ण

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jan 2009 - 9:14 pm | llपुण्याचे पेशवेll

>>परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये!
आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये. आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये.

पुण्याचे पेशवे
Since 1984

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2009 - 9:24 pm | ब्रिटिश टिंग्या

>>आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये
एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही!

>>हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये.
सहमत! कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे तर हिंदीभाषिक संख्या जास्त असल्याने सर्वत्र बोलली जाते.

>>तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये.
तुम्ही आयटीत काम करता असे दिसते.
असो

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jan 2009 - 9:30 pm | llपुण्याचे पेशवेll

>>एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही!
साधारणपणे माझ्या आजूबाजूला जितके परप्रांतिय आहेत ते आयटी किंवा बँकांमधले आहेत त्यामुळे त्याना विंग्रजी येते असे गृहीत धरता येते.(आयटी किंवा ब्यांकांमधे असणारे झाडूवाले नव्हे. कारण त्याना विंग्रजी येते का नाही ते मला माहीत नाही.)

>>तुम्ही आयटीत काम करता असे दिसते.
हो त्या गृहीतकावरच आधारीत प्रतिसाद आहे. आणि लेखही बराचसा त्या गृहीतकावर आधारीत आहे. :)

पुण्याचे पेशवे
Since 1984

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 9:08 pm | लिखाळ

स्फुट छान आहे.

स्थानिक रिती-रिवाजांशी जुळवून घेणेच बरोबर आहे. अशी अपेक्षा स्थानिकांची असावीच. भारतभर अथवा जगात इतरत्र शाखा असणार्‍या अस्थापनेत कोणत्या भाषेत व्यवहार चालावा याचे काही संकेत असावेतच आणि पाळलेही जावेत.

स्वत:कडे बारकाईने पाहून आपल्या काही चुका तर होत नाहित ना हे तपासणे केव्हाही चांगलेच, लेख आवडला.
-- लिखाळ.

प्राजु's picture

27 Jan 2009 - 9:18 pm | प्राजु

डॉनभाऊ, लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे. मस्तच.
प्रांत बदलला की, आपल्यालाही काही प्रमाणात बदलावं लागतंच याचं उत्तम स्पष्टीकरण केलं आहेस तुझ्या प्रतिसादात.
यावरून एक किस्सा आठवला,
आमचे एक स्नेही पूर्णपणे शाकाहारी. भारतात असताना कधीही अंड्याला स्पर्शही न केलेले.
जेव्हा चायनामध्ये गेले, तेव्हा मात्र बाकी काही खाण्यापेक्षा अंडे आणि चिकन बरे असे म्हणून खायला तर लागलेच पण नंतर उत्तम बनवायलाही लागले.
स्वतः मध्ये बदल कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे. कोणाची ती मर्यादा अन्न, वस्त्र, निवारा पुरती असते तर कोणाची त्यापेक्षा थोडी वर अथवा खाली असते.
सुंदर स्फुट!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

27 Jan 2009 - 9:38 pm | चतुरंग

आपण जिथे रहात असतो त्यासापेक्ष सगळ्या गोष्टी दिसायला लागतात/असाव्यात असे वाटायला लागते.
परप्रांतात गेल्याने मनाची कवाडे उघडली जाऊन विचारांना मोकळेपणा येतो तो हाच असावा! तुझ्या मनात गोंधळ आहे असे वाटत नाही उलट तू त्रयस्थ राहून दोन्ही गोष्टी पाहू शकतो आहेस म्हणजे गोंधळाची अवस्था मागे पडली आहे असे वाटते.
(ह्यापुढे भारताबाहेर गेल्यावर अजून वेगळेच संवाद मनात येतील हे नक्की. शेवटी आपण रहात असतो ते आपले जग असते हेच खरे.)

चतुरंग

कन्याकुमारी ते हिमाचल आज सर्वांना व्यावहारिक पातळीवर समजणारी ही एकच भाषा आहे.

अनामिक's picture

27 Jan 2009 - 10:11 pm | अनामिक

कन्याकुमारी ते हिमाचल आज सर्वांना व्यावहारिक पातळीवर समजणारी ही एकच भाषा आहे.


तुम्ही नक्की कोणत्या भारतात राहता?
सर्वांना व्यवहारिक पातळीवर समजणारी म्हणताना तुम्ही आय टी आणि इतर उच्चस्तरावरिल नोकरी करणार्‍या समाजा बद्दलच विचार केलेला दिसतोय.

अनामिक

धनंजय's picture

27 Jan 2009 - 10:44 pm | धनंजय

निष्कर्ष काढणार्‍यावर सोडला आहे, डॉन यांनी. हे उत्तमच.

पण लाल निळे अनुभव समांतर योजण्याची खुबी छान जमली आहे.

"केल्याने देशाटन..."

मुक्तसुनीत's picture

27 Jan 2009 - 11:39 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो !

शितल's picture

27 Jan 2009 - 11:28 pm | शितल

डॉन्या,
तुझ्या मनातील व्दंद चांगले व्यक्त केले आहेस. जे आपल्या अंगवळणी पडले आहे तेच आपण जास्त पसंत करतो किंवा मनाचा कौल तिकडे झुकतो, हे स्वाभाविक आहे. :)
पण स्वतःचे ते बाळ आणि दुसर्‍याचे ते कार्ट अशी एकंदरीत तुझ्या मनाची अवस्था होत नाही आहे ना ह्याचा विचार करायला हवा.

मृदुला's picture

28 Jan 2009 - 2:51 am | मृदुला

लेखातल्या परिस्थितीतून जाऊन दहा वर्षे झाली. :-)
मध्यंतरात कानडी जिलब्या वाचता येऊ लागल्या, रिक्षावाल्यांशी भांडतादेखील येऊ लागले.
जिथे असू तिथली भाषा, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती आपलीशी करण्याचा प्रयत्न करावा असे माझे मत आहे.

दाक्षिणात्यांच्या भाषाप्रेमाविषयी बोलले जाते पण उत्तरेतले लोक हिंदीशिवाय दुसरी कोणती भाषा बोलतात?

मराठी माणसाने समाईक भाषा म्हणून हिंदीऐवजी ग्लोबल इंग्रजी वापरावी असे मला वाटते.

जयेश माधव's picture

28 Jan 2009 - 9:03 pm | जयेश माधव

'आपण सारे अर्जुन' हे व.पु.काळे या॑चे पुस्तक वाचा.

जयेश माधव

प्रमोद देव's picture

28 Jan 2009 - 9:28 pm | प्रमोद देव

डॉन्या मस्तच लिहिलंय. पटलंसुद्धा!
म्हणूनच संतश्रेष्ट तुकाराम महाराजांनी दासबोधात एका ठिकाणी असे काहीसे लिहून ठेवलंय.....बी रोमन व्हेन इन रोम! ;)
म्हणजे मग पंचाईत होत नाही. अर्थात ऐकायला हे कितीही मस्त वाटले तरी आचरणात आणायला मात्र कठीणच आहे बरं का!

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2009 - 11:19 pm | भडकमकर मास्तर

डॉन्या, लेख उत्तम, प्रतिक्रियाही उत्तम...
..आणि निष्कर्ष स्वतः काढण्याचा अट्टाहास नाही ते अतिउत्तम..
मजा आली....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/