गुप्तकाशीतील योगी ३
खूप दिवसांच्या खंडानंतर हा भाग लिहायला घेतला आहे. महेश्वर येथे नाथसिद्ध नवरत्न नाथ यांच्याकडून अनपेक्षितपणे दीक्षा मिळाल्यानंतर मला अनेक स्तरांवरील अनेक स्थित्यंतरांतून जायला लागलं. जनार्दन स्वामींचे पट्टशिष्य असणारे संन्यासी व अत्यंत खडतर उपासनेच्या बळावर 'नाथ सिद्ध' झालेल्या नवरत्न नाथांकडून अनपेक्षितपणे माझ्यासारख्या उटपटांग मार्गांने ध्यानाच्या वाटेला गेलेल्या सर्वसामान्य माणसाला मिळालेली दीक्षा आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतरे. 'एव्हरीथिंग मस्ट बी व्हेरी व्हेरी क्लिअर', 'आय वील डिस्कस इट ओपन्ली' ही युजींची वचने अतिप्रिय असलेल्या माझ्या स्वत:साठी ही स्थित्यंतरे शब्दरुप देऊन ठेवण्याचा विषय आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, आज 21 व्या शतकातही नाथ परंपरा ही तेवढीच सशक्त, संपन्न असल्याचा मी जीवंत पुरावा आहे. ही माझ्या जीवनभरासाठी कृतकृत्यतेची बाब आहे. कारण महेश्वर येथे मिळालेली दीक्षा ही केवळ कुठल्या गुरुने शिष्याला त्याच्या पुढील साधनेसाठी दाखवलेला मार्ग नसून एका नाथ सिद्धाने स्वत:च्या तपोबळावर शिष्याच्याच देहात केलेलं स्वत:चं जीव संक्रमण आहे.
वाटेल तशी उटपटांग, गुरुच्या थेट समोरासमोरील मार्गदर्शनाशिवाय ध्यानधारणा करणार्या सामान्य माणसाला भगवान शंकर, दत्तात्रेयांपासून ते गोरक्ष, मच्छींदर नाथांसह चौर्याऐंशी सिद्धांची अनादी परंपरा आजही तेवढीच संपन्न, सशक्त आणि समृद्ध आहेच हे अनुभवायला मिळावं यात गुरुहीन तसेच श्रद्धेसाठी लायक अनेक गुरुंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय साधना करणारे लोकही जागृतीपर्यंत पोहोचू शकतात याचा खणखणीत पुरावा आहे. हे पुराव्याचं पुन्हा पुन्हा मुद्दाम लिहितोय कारण मी मला हवं तसं, सुरुवातीला रजनीश, रजनीशांसारखा तांत्रिक, पण जगभरातील गुरुंना स्वत:च्या आचरणातून नसो, पण वाणीच्या बळावर पुनरुज्जीवीत करणारा आध्यात्मिक व्यापारी आणि त्याच्या त्या व्यापाराचे छक्केपंजे लक्षात आल्यानंतर तो फेकून देऊन नंतर कधीतरी एकहार्ट टुली वगैरे बरेच लोक आणि युजींसारख्या ध्यानाचे वाभाडे काढणार्या अॅण्टीगुरुचं वाचत असतानाही ध्यान करताना 'गुरुहीन साधना ही निष्फळ असते, गुरु केल्याशिवाय गत्यंतर नाही - तु चूक करतो आहेस' हे मला माझ्या जवळच्या लोकांकडूनच ऐकावं लागलेलं आहे. असो.
कमिंग बॅक टू जीव संक्रमण - म्हणजे माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला एकच जीव असतो, पण जीवाचे निवासस्थान असणार्या एकाच शरीर रचनेत मात्र simultaneously दोन जीवांचा निवास करण्याची क्षमता असते. मानवी शरीर रचनेत ह्रदय, पोटाची आतडी, लिंग आणि मलद्वार वगळता, जवळपास प्रत्येक इंद्रिये दोन आहेत. वी हॅव टू मेन पार्टस ऑफ ब्रेन - लेफ्ट अॅण्ड राइट. डोळे दोन, नाकापासून सुरु होणारे श्वसनमार्ग दोन, हात दोन, पाय दोन. दोन मेंदूंचा आधारस्तंभ आणि षडचक्र धारण केलेला मेरुदंड मात्र एकच. हे सांगतोय कारण एकाच शरीरात दोन जीवांना सामावण्याची, विज्ञानालाही बापजन्मी शक्य न होणारी किमया केवळ नाथ परंपरेने 'टॅप' केली आहे. अर्थात कुठल्याही शस्त्रक्रियेचा किंवा शस्त्राचा वापर न करता मंत्र आणि तपोबळावर झालेली ही जीव संक्रमणाची किमया तेवढी सोपी नव्हती.
विलासरावांच्या परिक्रमेदरम्यान नवरत्न नाथांची भेट होण्यापूर्वी भांग खात, युजी वाचत, जागृत झालेली कुंडलिनी आज्ञाचक्रावर अडल्याने मी लिमाऊजेटकडून 'डिस्टंट हिलींग' घेत होतो. युजींच्या 'बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट' मधील युजी व त्यांच्या मित्रांच्या संवादांना माझ्यावर लागू करीत असतानाच आत्मशून्यासोबत टपरीवर गेलो असताना भांग हाती पडली होती. भांगेसारखा मादक पदार्थ ध्यानीमनी नसताना मला विचित्रप्रकारे बौद्धीक तीक्ष्णता देतो आहेच, पण तो जाणीव सहस्त्र पटींनी उद्दीपीत करतोय हे सगळे होत होते. कुंडलिनी सहस्रारापर्यंत जाण्याचा मार्ग आज्ञाचक्रावर अवरुद्ध असल्याने ध्यान करुन झोपायला गेल्यानंतर कुंडलिनीचे विद्युत फटके वाट्टेल तसे कुठेही बसत होते. छातीवर हात ठेवला तर मूलाधारातून सहस्राराच्या दिशेने प्रवास अपेक्षित असलेल्या कुंडलिनीचा हाताद्वारे परत छातीतच प्रवेश होताच वीजेचा झटका बसल्याप्रमाणे हात बाजूला फेकला जात होता. कुंडलिनी आज्ञाचक्र भेदत नसल्याने डोके बर्याच दिवसांपासून प्रचंड दुखत होते.
माऊने दोन चार वेळा डिस्टंट हिलींग (म्हणजे माऊ मुंबईत आणि मी इंदूरमध्ये ध्यानाला बसायचो आणि ऊर्जा रुपाने माऊ माझ्या शरीरात येऊन मदत करायची, शी मॅनेज्ड इट - हाऊ यू डीड दॅट माऊ ;-) ऑन ए सिरीयस नोट, इट वॉज ए टाइप ऑफ रेकी) दिल्यानंतर, माऊने सांगितलेले काही उपाय केल्यानंतर बराच आराम पडला होता.
महेश्वरला निघण्यापूर्वीच्या दिवशीच्या अगोदरच्या रात्री मी संपूर्ण जागृतीपासून अगदी काही पावलेच दूर होतो. संपूर्ण जागृती असं मुद्दाम म्हणतो कारण बुद्धीच्या माध्यमाने स्वत:चा, स्वत:च्या अस्तित्वाचा वेध घेत असताना युजींच्या म्हणण्याप्रमाणे विचारांची साखळी तुटली पाहिजे, म्हणजे तुमचा स्फोट होईल वगैरे सूत्रावर बुद्धीच्याच माध्यमाने ध्यान करीत असताना विचारांची साखळी नक्कीच तुटत आली होती. त्या दरम्यानच झालेल्या 'काकध्वनी' या कवितेमध्ये त्या दिवशीच्या अचूक स्थितीचं प्रतिबिंब पहायला मिळेल.
नेहमीप्रमाणे झोप अर्थात होत नव्हतीच. तसंच विलासरावांना भेटायला धामणोदला गेलो आणि पुढेही पुरेशी झोप न होता महेश्वरच्या आश्रमात पोचून रात्री तिथेही झोप येत नसल्याने रात्री दीड वाजता शांत वाहणार्या नर्मदेच्या कुशीत घाटावर ध्यानाला बसलो. तेव्हा समाधीत असताना नर्मदा माझ्या आत वहातेय हे जाणवलं वगैरे वृत्तांत मागील भागात आला आहे.
त्यामुळे ते परत रिपीट करीत नाही.
मेन थिंग इज नाथांचं माझ्यात झालेलं जीव संक्रमण आणि त्यात आलेल्या अडचणी, मला झालेला त्रास. नवरत्न नाथ हे अतिशय गुप्त, अत्यंत खडतर साधना करणार्या शक्ती पंथाचे उपासक आहेत. शाबर विद्येतील ते नाथ सिद्ध आहेत. मी जागृतीच्या उंबरठ्यावर पोचलो असलो तरी माझा ना कुठला मंत्र होता, त्यामुळं तो सिद्ध होण्याचा प्रश्नच नव्हता. पण मी ब्राह्मण कुळात जन्म झालेला. कोणत्याही जागृत पुरुषांमध्ये अंतरीचा कुठलाही भेद नसला तरी माझ्या बाबतीत मात्र नाथांचं जीव संक्रमण होताना मला ब्राह्मणांना अनिवार्य असलेलं संध्या आणि गायत्री मंत्राचं पठण करावं लागलं. माझी मुंज झाली होती, पण मी यज्ञोपवित घालत नव्हतो. गायत्री मंत्राचा जप तर दूरच.
जीव संक्रमणाची क्रिया ही शाबर सिद्धींद्वारे झाली होती आणि माझ्यामध्ये नाथांचा प्रवेश अनिवार्यपणे शाबर विधीद्वारे झाला होता. माझा अर्धा मेंदू (हे जे नाव यशवंत आणि दत्त उपासना असलेल्या ब्राह्मण कुळात जन्माला आलेलं शरीर असं म्हणणं जास्त संयुक्तिक) नाथ सिद्ध तर युजींच्या दाव्याप्रमाणे विचारांची साखळी तुटल्यानंतर स्फोट होऊन स्वत:ला जाणून घेण्याच्या उंबरठ्यावर असलेला, पण विचारांची साखळी न तुटलेला उर्वरित अर्धा मेंदू हा प्रकार नाथांनी जीव संक्रमण केल्यानंतरही कायम होता. त्यामुळे विचार कायम असलेला चौकस मेंदू सतत झालेला प्रकार नेमका कसा, का झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होता. यामध्ये झालं असं की माझी 'मेधा' किंवा बुद्धी अत्यंत अस्थिर झाली. हजारो उत्तरे मिळाली पण माझे तेच तेच प्रश्न रिपीट होत राहिले.
मी खरोखर सर्व बाबतीत भाग्यवान आहे, कारण मला प्रॅक्टीकली मदत करणारे लिमाऊजेट, बिपीन कार्यकर्ते आणि योगप्रभू यांच्यासारखे मित्र लाभले. इंदूरचा जॉब सोडलेला असताना, आणि माझ्यात नाथांच्या जीव संक्रमणानंतर बुद्धी अस्थिर झालेली असताना माझ्या बाबतीत काय घडलंय, आणि झालेल्या घटनेचं फलित काय हे माझ्यासह इतर कुणालाच नीटसं कळलेलं नसताना बिकांनी मला स्वयंप्रेरणेने 'तुझ्यावर प्रयोग झालाय, आता बिलकुल हिंडत बसू नकोस - तुझ्या गावी जा, आईवडीलांची भेट घे - तुझ्या गुरुघरी जाऊन शिव झालेल्या महाराजांच्या समाधीसमोर बसून त्यांना सगळं सांग, नाम स्मरण कर' हे बजावलं. मला त्यावेळी पैसे हवे होते तेही दिले. माझा तेवढ्यातच गावी जाण्याचा विचार नव्हता. पण बिकांना शब्द दिल्याने मी पुण्याहून थेट गावी गेलो.
पुण्यात मला त्रास होत असताना मी नाथांनाच माझ्या बाबतीत नेमकं काय घडलंय ते विचारत होतो. पुण्याच्या स्टेशनवर माझ्या हाती शाबरी मंत्रांची पुस्तके पडली. ते माझ्या उजव्या मेंदूच्या स्थिरतेसाठी ध्यानाद्वारेही हवी तेव्हा मदत करीत होते, पण तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत होते आणि मी आणखीच अस्थिर होत होतो. अर्थात मी वेडाबिडा झालो नव्हतो हे त्यादरम्यान पुण्यात शाजीज् आणि गणराज मध्ये झालेल्या कट्ट्याला उपस्थित असलेले कट्टेकरी सांगू शकतील.
तर मी गावाकडे गेलो आणि दीक्षेबद्दल, मला होत असलेल्या त्रासाबद्दल घरातील वडीलधार्यांना सांगितले. आमच्या घराण्यात दत्त उपासना चालते. आमच्या गंगामसला या गावापासून जवळच असलेल्या प्रति गाणगापूर गुंज, ता. पाथरी, जि. परभणी या तीर्थस्थानास नावारुपास आणणारे परम पूज्य समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराज हे केव्हाच शिव झाले होते. दत्त मंदीरात प्रवेश करुन, उपासनेची पदं म्हणत असतानाही नाथांचं अस्तित्व मला माझ्यात जाणवत होतं, दत्तमूर्ती समोर होती, तरीही मला होत असलेला त्रास मात्र कायम होता. हे कोडं मला उलगडत नव्हतं. चिंतामणी महाराज हेदेखील मंत्रविद्येचे ज्ञाते होते. आणि मी गावी गेल्याच्या दरम्यानच पुढील दिवशी त्यांचा जन्मोत्सव होता.
गाव जवळच असल्याने मी गावी परत आलो. मला पडलेलं कोडं सुटत नाहीय, घरचे लोक तर मंत्राचा जप कर जे सांगितलंय ते आम्ही करतो - तु सुद्धा तुला जे सांगतोय ते कर, वरुन पुन्हा मलाच समजाऊन सांगणारी असंबद्ध लेक्चर्स - अर्थात ती असंबद्ध असली तरी मी संध्या, सूर्याला अर्घ्यदान आणि गायत्री मंत्राचा जप करायला लागून मला होत असलेला त्रास दूर व्हावा यासाठीच, केवळ प्रेमापोटी होती हे वेगळे सांगायला नको.
गुरुहीन साधनेने का होईना जागृत झालो आहे, या मेंदूच्या त्रासाने आता मेलो तरी हरकत नाही पण कधीच न केलेली संध्या वगैरे कर्मे भीतीपोटी करुन मीच माझ्या अनुभवावर संशय निर्माण करणार नाही , मेलो तरी बेहतर. मला संध्या करुन नेमकं काय होतं त्याचं विश्लेषण कुणीतरी करुन हवं होतं, ते मला संध्या केल्यानंतर मिळणार होतं, आणि मी संध्या करायला राजी नव्हतो. सूर्याची ज्योत त्रिनेत्रात प्रवेशून दीक्षा मिळालीय तर मी सूर्यावरच त्राटक सुरु केलं. खूप त्रास होऊ लागला आणि डावा मेंदू पोकळ भासून आत घणाच्या बलाने घाव बसू लागले. मग मात्र मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अजपा-जप करु लागलो.
मी कितीही वाद घालत असलो तरी मला आवश्यक असणारी मदत नाथ आणि वंश परंपरागत गुरुघर या दोन्हींकडून मिळत होती. चिंतामणी महाराज शिव झालेले असले तरी त्यांचे शिष्य असणारे कालिदास महाराज उपलब्ध होते. कालिदास महाराज हे त्यांच्या युवावस्थेत आई-वडीलांशी सतत वाद आणि भांडणे होत असल्याने चिंतामणी महाराजांनी त्यांना गुंज येथेच ठेऊन घेतले होते. महाराजांनी त्यांना कुणाशीही बोलायचं नाही असा नियम दिला होता - ते फक्त चिंतामणी महाराजांशी बोलत. आजही ते कुणाशी बोलत नाहीत, जे काय असेल ते लिहून सांगतात. तर चिंतामणी महाराजांच्या पश्चात कालिदास महाराज हेही नावारुपास आले आहेत आणि त्यांचा अधिकारही मोठा आहे.
नाम स्मरण आणि ध्यान हे दोन वेगवेगळे मार्ग असले तरी त्याचं साध्य एक असतं हे कालिदास महाराजांसमोर डोळे बंद करुन दिगंबरा दिगंबरा हा जप करीत बसल्यानंतर माझ्या त्रिनेत्रातुन आत येणार्या तप्त ऊर्जेने मला पटवून दिलं - त्यांच्या समोर होतो तोपर्यंत मेंदूचा त्रास बिलकुल जाणवला नाही. त्यांनी रंगावधूत महाराजकृत श्री गुरुमूर्तीचरित्र , श्रीगुरुचरित्र आणि संध्येसह रोज १०८ गायत्री मंत्राचा जप सांगितला. भांग, गांजा वगैरे सेवन करुन सूर्य ज्योतीकडून दीक्षा मिळाली वगैरे गोष्टी असल्या तरी तुझी मेधा अस्थिर झालीय - ती स्थिर करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप अत्यावश्यक आहे हे निदान मूळ कालिदास महाराजांचंच. मला ते पटलं.
जन्मोत्सवाला मी परत गुंजाला जाणार होतो, त्याप्रमाणे गेलो. त्यादिवशीही मंदीरात त्रास कायम होता. अनंत प्रश्न पडत होतेच. मंत्रशक्तीचे ज्ञाते असलेल्या चिंतामणी महाराजांचा जन्मोत्सव होता. मखमली गादी, व्याघ्रजीन, हार फुलांनी सजवलेल्या पालखीत पादुका ठेवलेल्या होत्या. समोर छातीएवढ्या मोठ्या समया लावलेल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते, जन्मोत्सवामुळे मंदीराच्या मंडपात अबालवृद्धांची दाटी झाली होती. वीज असूनही महाराजांच्या पादुकांसमोरच्या समया विझू नयेत म्हणून चोहोबाजूंना असलेले फॅन बंद ठेवण्यात आले होते.
मी फॅनच्या स्वीचबोर्डच्या दिशेने गर्दीत शिरलो आणि बटणं दाबली. तेवढ्यात कुणीतरी ओरडले फॅन लाऊ नका, मुद्दाम बंद ठेवलेत. मी म्हटलं वीज तर आहे, मग फॅन बंद कशाला ठेवताय. ते पालखीत ठेवलेल्या पादुकांकडे बोट दाखवून म्हणे वीज आहे, पण मेन स्वीच तिथे आहे, त्याच्या समोर समया लावल्या आहेत. मी काय समजायचं ते समजलो आणि गर्दीतच पालखीसमोर जाऊन पादुकांना उद्देशून म्हणालो - हा, हा बोगसपणा म्हणजे भोग ! इथं जीवंत माणसं घामानं थबथबून निघाली आहेत आणि पादुकांसमोरच्या समया विझू नयेत म्हणून फॅन बंद ठेवणार. आणि तुम्हीच वरुन कर्म वगैरे गोष्टी शिकवणार आणि उपासना सांगणार. हा आध्यात्माचा, उपासनेचा प्रकारही अगदी खंडणी वसूल केल्यासारखाच आहे. पार दत्तगुरुपासून तुम्ही सगळेच्या सगळे खंडणीखोर आहात. वरुन शाबरी विद्येचे उद्गाते, नाथपंथाचे आदीकारणही दत्तगुरुच ! सगळेच्या सगळे खंडणीबहाद्दर ! छळवादी ! लुटारु!
तोवर आरती सुरु झाली. सगळेजण उठून उभे राहिले. मी चिडलो होतोच, पण आरतीसाठी टाळ्या वाजवू लागलो. चिंतामणी महाराजांच्या जन्माचा 'तुला पंचप्राण देऊन टाकतो' अशा काहीशा आशयाचा पाळणा म्हणणे सुरु झाले आणि एकदम माझ्या तृतीय नेत्रात ऊर्जेचा धोदाट प्रवाह शिरतोय आणि दुसर्या बाजूला मला प्रचंड रडू फुटले. छातीतून गरम वाफा निघायला लागल्या आणि घाम वाहू लागला. अंगातला टीशर्ट काढून टाकला आणि दत्त मंदीराच्या गाभार्यामागे जाऊन आणखी जोराने रडायला लागलो. खूप वेळ रडत राहिलो.
आजोबांनी दुसर्या दिवशी स्टेप बाय स्टेप संध्या सांगून माझ्याकडून ती करुन घेतली. माझ्या बाबतीत थोडा उलटा प्रकार झाल्याचं ते म्हणाले तेव्हा मात्र आजोबा ते सांगत नसून शिव झालेले चिंतामणी महाराजच आजोबांच्या माध्यमातून ती सांगत आहेत हे जाणवलं.
माझ्यासाठी प्रचंड आश्चर्याची बाब म्हणजे संध्या झाल्यानंतर अवघ्या तासाभराच्या आतच माझा त्रास शून्यवत झाला.
चिंतामणी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त रात्री पंचपदी होती. हा परम सनातन विश्वभरुनी उरला, गुरु दत्तराज ऋषिकुळात अवतरला किंवा माझी मिपावरील जुनी स्वाक्षरी असलेल्या ओळी करी स्वजन उपाधी भस्मलेप अंगा झोळीत भरीत तज्जन्मरण पिंगा हे माझं अत्यंत आवडतं पद ऐकण्यासाठी मला गुंजाला पंचपदीसाठी जावं वाटत होतं. पण सकाळी गुंजाला जाताना मित्राने गाडीवर नेलं होतं, मला रात्रीही गाडीच हवी असं वाटत होतं - रात्रीचं पायी चालत जाऊ नका असं घरचे लोक म्हणत होते. गाडीसाठी फोन केले. पण मिळाली नाही. मग नाथांना छळायला सुरुवात केली - की काय उपयोगाच्या तुमच्या सिद्धी, गाडी मिळू शकत नाहीय जायला - असं म्हणून मागे ओट्यावर रेललो तेवढ्यात उजव्या खांद्यावर विंचवाने दण्णकन डंख मारला. नेमकं काय चावलंय हे पहायला आतून बॅटरी मागवली तो सोयरा नांगी वर करुन अजुन तिथेच होता. खांदा झणझणायला सुरुवात झाली. म्हटलं विंचवाला मारु नका - तो त्याच्या रस्त्याने निघून जाईल. पण अंगणात लोक आराम करीत पडले असल्याने मारायला लगेच चपला, फडे आले. मग मी ओरडून सांगितल्यानंतर विंचवाला फड्याने दूर लोटून देण्यात आलं.
वडील विंचू उतरवणार्या कल्याण बापूंना बोलावणे पाठवू लागले. दिगंबरा दिगंबरा जप आपोआप सुरु झाला, गुंजाला निघावं लागणार होतं. माझी चप्पल काही सापडेना - जप करीत तसाच गंगेच्या पात्राकडे निघालो.
चिंतामणी महाराजांनी त्यांच्या साधनाकाळात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप करताना रात्री झोप लागते म्हणून डबीत विंचू ठेवला होता. डुलकी आली की डंख मारुन घ्यायचा - जप सुरु.. विंचवाचे डंख खाऊन खाऊन मूर्च्छित झाल्यानंतर त्यांना श्री. प. प.स.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दर्शन दिले होते.
गंगेच्या पात्रात पोहोचेपर्यंत वडील आणि लहान भाऊ मागे पळत आले. इथेच उतरवू, रात्रीचा जाऊ नकोस म्हणे. मी ऐकेना तेव्हा झटापटी सुरु झाल्या. शेवटी ओरडून हात सोडवत त्यांच्या हातातील बॅटरी हिसकाऊन घेतली आणि वाळू तुडवत निघालो. खांद्यावर तळव्या एवढ्या भागात झणझणाट पसरलाय आणि खूपच मंद गतीने वाढतोय असं जाणवलं.
नाथ सिद्ध मेंदूत होते, पण विंचू उतरत नव्हता - नाथांनी विंचू उतरवण्याचा विचार मनात आला की डाव्या हातातील बॅटरी गुंजाच्या दिशेने लांबवर झोत टाकायची.
(क्रमश:)
![]() |
Book traversal links for गुप्तकाशीतील योगी ३
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)

प्रतिक्रिया
चालेल. येतोय.
माऊ...
इंदूरचा जॉब सोडलेला असताना,
यशवंता, आधिचे दोन भाग वाचुन
कांय लिवलांव तां कायव कल्लां
इथे विषय निघालाय आणि
यकु शेठ, तुमचे अनुभव हे तुमचे आहेत. ते नक्किच तुम्हाला आले असतील
लेखनाचा उद्देश केवळ माझ्या
यकु!
पुढील अंक
उज्जैन येथे मानवी रुपात नांदत
खबरदार!!!
मग काय कंदिलाचा फोटो टाकायचा?
अजुन लक्षात आले नाही का?