(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.)
मित्रांनो,
मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे.मी काही हिटलरची भलावण नाही करत.पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुस-या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते.
दुस-या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पराभव न पत्करता जर्मनी पहिले महायुद्ध हरले होते.हे युद्ध प्रत्यक्ष जर्मनीच्या भूमीवर थोडेसेच लढले गेले होते.कैसर राजाच्या पलायनाने जर्मनीला पराभव पत्करावा लागला.जर्मन जनतेच्या हे लक्षातच येत नव्हते की आपण युद्ध जिंकत असताना कसे हारलो.
जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले.जर्मनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली.
हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा त्याच्यापुढे किती प्रश्न होते ते पहा
- ६० लाख लोकांची बेकारी
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत अगदी हास्यास्पद झाली होती
(जर्मनीचे चलन एवढे पडले होते की एक भाजीची जुडी घेण्यासाठी पोतेभर पैसे घेउन जावे)१ डॉलर= ७,००,००० जर्मन मार्क्स
अवघ्या तीन वर्षात त्याने या प्रश्नांचा निकालदेखील लावला आणि जर्मनीला स्वयंपूर्ण देखील केले
- पहिल्या महायुद्धाची भरपाई म्हणून दोस्त राष्ट्रांना अब्जावधी रुपयांची खंडणी द्यायची होती
- जर्मनीला एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य उभारायची परवानगी नव्हती
असे शेकडो प्रश्न त्याच्यापुढे उभे होते
हे सर्व प्रश्न त्याने ज्या पद्धतीने सोडवले, ते पाहता माणूस आश्चर्यचकीतच होतो कधी नमते, तर कधी धमकी तर कधी शांततेची तान.या सर्वांच्या जोरावर हिटलरने जगातील महाशक्ती समजल्या जाणा-या बड्या नेत्यांना असे झुलवले की त्याच्या मुत्सद्देगिरीची दाद त्याचे शत्रूदेखील देतात. जगाच्या रंगमंचावरचा हा अक्षरश: एकपात्री प्रयोग होता.
हिटलर १९३३ साली सत्तेवर आला तेव्हा त्याला बहुमत नव्हतेच। तरी तो सत्तेवर आला.सत्तेवर येताच त्याने तीन वर्षात जर्मनीला एवढे बलशाली केले की जर्मनीत त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.फक्त ३८% मते असताना तीन वर्षानंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते, यावरुन हे लक्षात यावे
- बेरोजगारी नावालाही शिल्लक उरली नाही
- जर्मनीचे चलन आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरावले
- व्हर्सायच्या तहाच्या चिंध्या केल्या व जाहीरपणे सांगितले की जर्मनी ही नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही
- जर्मनीच्या सैन्याची आरमार विभागासकट पुनर्रचना केली
- युवकांना बलशाली करण्यावर कठोर मेहनत घेतली
(जेव्हा १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा शत्रूसैन्यापुढे जर्मन सैनिक एवढे बलशाली आणि ताकदवान दिसायचे की दोस्त राष्ट्राचे सैन्य जर्मनीला प्रतिकार करण्याच्या योग्यतेचे नव्हते आणि हिटलरला सहज चिरडू या भ्रमात राहण्यापेक्षा दोस्त राष्ट्रांनी सैन्य बांधणीस प्राधान्य द्यावयास होते असे हे बरेच इतिहासकार मान्य करतात)
हिटलरने रक्ताचा एक थेंबही न सांडता ३ भूभाग जर्मनीला जोडले.हे त्याच्या राजकीय ज्ञानाचे आणि आपल्या शत्रूंचे पाणी जोखण्याचे उत्तम उदाहरण आहे.दुसरे म्हणजे हिटलरची विलक्षण मानसिक शक्ती.त्याचे आडाखे इतके अचूक असत की त्याच्या पुढे त्याच्या सेनानींचा विरोध पूर्णपणे थंडावला.युरोपात जबरदस्त चढाई करुन १०-१५ दिवसांत एकेक देश जिंकून हिटलरने आपल्या शत्रूला जबरदस्त धडकी भरवली होती.हिटलरने रशियावर केलेली हिवाळ्यातील स्वारी त्याला खूप घातक ठरली.इतिहासकार हे खुल्या दिलाने मान्य करतात की हिटलरने रशियावर स्वारी केली नसती तर आज आपल्याला दुस-या महायुद्धाचा इतिहास वेगळाच दिसला असता.
तर मित्रांनो, दुसर्या महायुद्धाचा हा अत्भुत इतिहास तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा...
तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल.
धन्यवाद
(दुसर्या महायुद्धाच्या नाट्यपूर्ण घटनांनी स्तिमित झालेला) सागर
प्रतिक्रिया
24 Dec 2007 - 7:49 pm | ऋषिकेश
हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि.
केवळ हिटलरच नाही पण अकबर, टिपू सुलतान अश्या अनेक करंट्या प्रमुखांची भलामण मलातरी अस्वस्थ करून जाते.
-ऋषिकेश
25 Dec 2007 - 9:53 am | क्लिंटन
>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्याचदा >>एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि.
१००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्हाईनलँड वर ताबा मिळवला. र्हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही.
हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले.
हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल.
माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे--
१) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली.
२) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा
३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग
४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का?
इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो?
आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का?
भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार?
हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का?
कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे.
अवांतर-- वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्याकडे दुसर्या महायुध्दावरील चांगल्या माहितीपटांचा संग्रह आहे.मी अमेरिका सोडून लवकरच भारतात (बहुदा मुंबई/ ठाणे किंवा पुणे) स्थायिक होणार आहे.कोणाला जर ते माहितीपट कॉपी करून हवे असतील तर माझाशी व्य.नि वर संपर्क साधावा.
---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)
26 Dec 2007 - 1:02 pm | सागर
क्लिंटन साहेब,
एवढ्या सविस्तर आणि विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.
की तुम्ही जे मुद्दे स्पष्ट केले आहेत, ते अगदी सर्वस्वी खरे आहेत.
हिटलरने छळ छावण्यांतून आणि यातनातळांतून जे प्रयोग केले ते अमानुष या शब्दाचा अपमान करतील इतके क्रूर होते.
जसे लोकांना सोलून काढणे. जिवंत धातूंच्या पेट्यांतून तापवणे, हजारोंना एकाच वेळी गॅस चेंबर्समधून विषारी गॅसने मारणे.
स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी तर माझी लेखणीच पुढे सरत नाही इतके अनन्वित अत्याचार झालेले होते.
दुसर्या महायुद्धावर मी बरेच वाचन केले आहे माहितीपट देखील पाहिले आहेत. हिटलरच्या अत्याचारांतून जगाची सुटका करण्याचे मोठे कार्य दोस्त राष्ट्रांनी केले यात काही संशय नाही. अन्यथा आज जगाचा नकाशा वेगळा असता आणि आपण इंग्रजी ऐवजी जर्मन भाषा शिकत असतो.
येथे मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की लेखाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केले आहे की मला काही हिटलरची भलावण करायची नाहिये. कारण हिटलर हा क्रूरकर्मा आणि वि़कृत मनोवृत्तीचा हुकुमशहा होता हे माझेही मत आहे. या लेखात जे कानिटकरांनी पुस्तकात सांगितले तेच फक्त मी पुस्तक परिक्षण म्हणून लिहिले आहे. मी देखील लोकशाहीचा आणि जगातील सर्वांना जगण्याचा हक्क आहे या भूमिकेचा कट्टर समर्थक आहे.तेव्हा माझ्यावर कोणी रोष धरु नये ही नम्र विनंती.
धन्यवाद,
सागर
29 Jan 2008 - 1:56 pm | अन्या दातार
हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि.
क्लिंटन्साहेब, या वाक्याशी मी असहमत आहे. त्याच्या अनेक कृतिंमध्ये राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली दिसते. उदा. ६०००० बेकार तरुणांच्या फौजेला काम मिळवून देणे, सैन्य बलशाली करणे इ.इ.
25 Dec 2007 - 12:19 am | बिपिन कार्यकर्ते
मला असे वाटते, भलामण वाईटच, पण कानिटकरांचे पुस्तक ही खरोखरच भलामण आहे का? मी हे पुस्तक प्रथम वाचले त्याला आता बहुतेक २२-२३ वर्षे झाली असावित. त्या नंन्तर काही वर्षे बरीच पारयणे झाली, मित्रांबरोबर चर्चा झाली. हिटलरची जी वाईट बाजू आहे ती सुद्धा दाखवली आहे. आणि हे विसरता कामा नये की इतिहास हा नेहमी 'जेते' लिहितात. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना काय घ्यायचे आणि काय विसरायचे ते आपण ठरवायचे.
"हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि."
हे मात्र खरेच.
बिपिन.
25 Dec 2007 - 8:12 pm | सुधीर कांदळकर
हे पुस्तक मी दीड्दोन वर्षांपुर्वी पुन्हा वाचले. वि ग नी या पुस्तकांत कोठेहि कसलेहि भाष्य केलेले नाही. मते ही सर्व वाचकांचीच आहेत. हिटलर हा थोर मुत्सद्दी होता असे ते म्हणत नाहीत. नशिबाने त्याची साथ दिली हे दाखवतांना ते शुशनिग, पेताँ, चेंबर्लेन वगैरे त्याचे विरोधक नेते कसे बावळट होते ते ते दाखवतात. हिटलरच्या त्याला जगातील सर्वश्रेष्ठ शेतीतद्नापैकी एक मिळाला, सतत तीन वर्षे हवामान शेतीला अनुकूल राहिले व विक्रमी पिके येऊन अन्नटन्चाई दूर झाली हे लिहितात. स्टालीनने दूरदृष्टीने कारखाने पूर्वेस हलविले हे संगतात तसेच त्याने ५ टक्के लोकसंख्येचा विध्वंस केला हे सांगतात. फक्त चर्चिलने माइन काम्फ वाचून हिटलरचा अभ्यास केला होता हे सांगतात तसे त्यानेच पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा पाया रोवला हेहि सांगतात.
पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.
26 Dec 2007 - 1:07 pm | सागर
बिपीन आणि सुधीरराव ,
पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.
या मताशी मात्र पूर्ण सहमत. अतिशय वाचनीय पुस्तक आहे हे यात संशय नाही.
- सागर
28 Dec 2007 - 10:06 am | डॉ.प्रसाद दाढे
हिटलर हा एक क्रूरकर्मा होता यात काही दुमत असण्याचे कारण नाही, तथापि, त्याने इन्ग्रजान्चे दुसरया महायुद्धात पेकाट मोडले नसते तर भारताचे स्वातन्त्र्य आणखी काही वर्षे दूर गेले असते हे निश्चीत! दुसरे महायुद्ध ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. भारत अगदी पहिल्या दिवसापासून त्यामध्ये गुन्तला होता, हजारो भारतीय तरूण युरोप,आफ्रीका आणि बर्मा येथील लढायान्मधे धारातीर्थी पडले आहेत. जगातील कुठलेही लष्कर युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बळकट होत नाही, सक्षम होत नाही. अनुभवी ब्रिटीश सेनापतीन्च्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्यदळे दुसर्या महायुद्धात लढली म्हणूनच स्वातन्त्र्य मिळाल्यावर देशरक्षणासाठी आवश्यक असे उत्तम सैन्य भारताला उपलब्ध झाले.
दुसर्या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे.
नाझी भस्मासुराचा उदयास्त हे एक उत्तम पुस्तक आहे परन्तु दुसरी बाजू समजून घेण्यासाठी त्याच लेखकाचे 'विन्स्टन चर्चिल' हे पुस्तक सुद्धा हौशी अभ्यासकानी वाचावे.
सुदैवाने वि.ग.कानिटकर माझे वैयक्तीक स्नेही आहेत आणि त्रेशष्ट साली लिहीलेल्या त्यान्च्या पुस्तकाबद्दल अजुनही तेवढेच औत्सुक्य आणि प्रतिसाद आहे हे मी त्याना सान्गितल्यावर त्याना निश्चित आनन्द होईल.
28 Dec 2007 - 1:50 pm | सागर
डॉक्टरसाहेब,
वि.ग. कानिटकर हे तुमचे स्नेही आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांना कृपया सांगाल का ?
इतके सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मी आत्त्तापर्यंत या पुस्तकाची किमान ८-१० पारायणे केली असतील तरी प्रत्येक वाचनाच्या वेळी हा इतिहास तितकाच चित्तथरारक वाटतो यात संशय नाही. माझी खात्री आहे की कित्येक शतके नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले, अभ्यासले जाईल.
तुमचा प्रतिसाद पाहून खूप खूप आनंद झाला. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल हे पुस्तक अजून मी अभ्यासले नाही. पुढच्या वेळी पुण्याला जाईन तेव्हा नक्की हे पुस्तक घेईन.
दुसर्या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत.
हे मात्र १०० % खरे, कारण दुसर्या महायुद्धानंतरच अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांना आपण जगातील महासत्ता होऊ शकू याचा अंदाज आला होता, त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीच्या स्पर्धेतून कित्येक नवीन शोध बाहेर आले. आणि विशेषतः १९६० नंतरचा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग गेल्या शेकडो शतकांच्या तुलनेत आश्चर्यचकीत करणारा असाच आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
- सागर
28 Dec 2007 - 12:18 pm | विसोबा खेचर
सागरशेठ, परिक्षणाकरता धन्यवाद! मी ते पुस्तक जरूर वाचेन..
तात्या.
28 Dec 2007 - 2:00 pm | सागर
तात्या,
मला सागरच म्हणा...शेठ म्हणजे फार मोठं वगैरे वाटतं
मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे फक्त ३१ वर्षाचा.
तेव्हा मला सागरच राहू द्या... कसे?
तात्या, तुम्ही व्यासंगी आहात, तेव्हा हे पुस्तक नक्की आवडेन तुम्हाला.
(तात्यांचा प्रतिसाद पाहून सुखावलेला) सागर
28 Dec 2007 - 2:31 pm | डॉ.प्रसाद दाढे
जरूर सा॑गेन..मीही ते पुस्तक खूप वेळा वाचले आहे..आणि त्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती काढण्याचा प्रयत्न मी व कानिटकर साहेब करीत आहोत. तुम्हाला दुसर्या महायुद्धाची खरीच रूची असेल तर खालील पुस्तके जरूर वाचा
-Rise & Fall Of Third Reich-William Shirer
-Trail of Fox: Biography of Rommel
-Panzer Leader: Autobiography of Guderian
-Defeat into victory: Autobiography of Slim
-Encyclopedia of Third Reich
28 Dec 2007 - 8:27 pm | सागर
डॉक्टरसाहेब,
तुम्ही सुचविलेल्या पुस्तकांबद्दल आभारी आहे
तुमचा आणि कानिटकरसाहेबांचा स्नेह पाहता मला एक विनंती कराविशी वाटते...
पहा शक्य झाले तर
Rise & Fall Of Third Reich-हे शिरर ने लिहिलेले पुस्तक दुसर्या महायुद्धाच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचे आहे.
शिरर हा हिटलरच्या उदयास्ताचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तेव्हा त्याचे पुस्तक हे दुसर्या महायुद्धाच्या बाबतीत इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त विश्वसनीय ठरते. हा १००० पानांचा अद्वितीय ग्रंथ मराठीत उपलब्ध असावा असे खूप खूप वाटते.
ही केवळ माझीच नाही तर माझ्या अनेक मित्रांनी देखील बोलून दाखवलेली इच्छा (खरे तर खंत) आहे.
एवढे सुंदर पुस्तक मराठीतून उपलब्ध नाही हे कायम मनाला खटकत राहते.
जर तुम्हाला आणि कानिटकर साहेबांना शक्य असेल तर या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. तर माझी खात्री आहे की लाखो वाचकांच्या या पुस्तकावर उड्या पडतील... मला तर आत्ताच या पुस्तकाचे मराठी नाव दिसत आहे....तिसर्या राईशचा उदयास्त किंवा हिटलरच्या साम्राज्याचा उदयास्त
तेव्हा समस्त मराठी वाचकांतर्फे माझी तुम्हाला आणि कानिटकरसाहेबांना विनंती आहे की या अद्वितीय ग्रंथाचे मराठीत भाषांतर तुम्ही करु शकला तर मराठी भाषेची खूप मोठी सेवा होईल. किंवा दुसर्या कोणाही व्यक्तीस तुम्ही हे काम सोपवले तरी चालेल. पण कानिटकरांच्या समृद्ध लेखणीचा अनुभव असल्याने हे काम तुम्ही दोघांनी करावे असे मनापासून वाटते...
तुम्ही हवे तर तुमच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना विचारुन पहा. आणि पहा कसा प्रतिसाद मिळतो ते...
माझ्याकडे हे पुस्तक डिजिटल स्वरुपात आहे. ते तुम्ही येथून डाऊनलोड करु शकाल http://www.esnips.com/web/EnglishPDF
(हे पुस्तक उतरवून घेण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि नोंदणी ही मोफत असल्याने चिंता नको.)
धन्यवाद
सागर
30 Dec 2007 - 9:09 pm | सुधीर कांदळकर
आता राईझ & फॉल वाचावेच लागणार. मजा येईल. धन्यवाद.
3 Jan 2008 - 1:09 pm | सागर
सुधीरकाका ,
राईझ & फॉल वाचताना नक्कीच मजा येईल.
कारण शिरर ने त्यात तपशीलवार त्या काळचे वर्णन केले आहे. आणि तो स्वतः चिकित्सक आणि अभ्यासू असल्याने परिस्थिती हिटलरला कशी अनुकूल होत गेली आणि त्याने युद्धाचे नियंत्रण कसे स्वतःकडे ठेवले याचे सुंदर वर्णन आहे. मी ही सध्या हे पुस्तक वाचत आहे. तेव्हा एक वेगळा आनंद मिळेल हे नक्की... पण मराठीत हे पुस्तक जसे च्या तसे आले तर मोठी बहार होईल.
धन्यवाद
सागर
29 Dec 2007 - 9:42 pm | डॉ.प्रसाद दाढे
तुमची सूचना चा॑गली आहे. दुसरे महायुद्ध ह्या विषयावर इ॑ग्रजीमधे खूप साहित्य उपलब्ध आहे ज्याचे अजुन मराठी भाषा॑तर झाले नाही. वानगी दाखल पाहावयाचे झाले तर चर्चिलने लिहीलेले सात ख॑ड! ते अभ्यासल्याशिवाय पुढेच जाता येत नाही.
मी ते पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात काही प्रश्न उभे राहीले. जसे की हिटलरच्या अनेक सेनापती॑पैकी आज मितीला किती जिव॑त आहेत कि॑वा युद्धान॑तर त्या॑चे काय झाले. ह्या स॑दर्भात मी पुष्कळ धा॑डोळा घेतला व याच विषयी एक परिशिष्ट 'नाझी' ला जोडावे असा आमचा प्रयत्न आहे. तसेच माझ्याकडे दुसर्या महायुद्धाविषयी पुष्कळ दुर्मिळ फोटो आहेत तेही जोडण्याचा विचार आहे. कदाचित जो मला सेनापती॑बद्दल प्रश्न पडला तोच इतरही जिज्ञासू वाचका॑ना पडला असू शकतो, त्या॑चेही श॑कासमाधान होईल. न्यूरे॑बर्ग खटल्यावर एक स्वत॑त्र व विस्तृत प्रकरण लिहीण्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आणि रसिका॑चे आशिर्वाद असतील तर हे काम होईल.
आणखी एकच विन॑ती तुम्हाला करतो..आपल्या दोघा॑च्या वयात फारसा फरक नाही, मी केवळ २८ (अठ्ठाविस) वर्षा॑चाच आहे व व्यवसायाने जबड्याचा सर्जन आहे (स्पेशालीस्ट डे॑टीस्ट्).तेव्हा मला 'अरे प्रसाद' असे एकेरीत स॑बोधले तर मला आवडेल.
3 Jan 2008 - 4:05 pm | सागर
'अरे प्रसाद'
मलाही आनंद वाटला की तुझ्यासारखा तरुण डॉक्टर इतिहासात रस घेत आहे.
कानिटकरसाहेबांचा तुझे स्नेही म्हणून तू उल्लेख केला होतास त्यामुळे मला वाटले की तू त्यांच्याइतकाच ज्येष्ठ असशील.
हरकत नाही. तुझ्यासारख्या तरुण इतिहाससंशोधकाशी मैत्री झाल्याचा मला तरी खूप आनंद आहे.
दुसरे असे की न्युरेंबर्ग वर एका प्रकरणाने भागेल असे वाटत नाही. कारण खूप लोकांच्या साक्षी झाल्या.
त्या सर्वांचा उहापोह होणे गरजेचे आहे. एखादे छोटेसे पुस्तक त्यावर होऊ शकेल असे मला वाटते...
बाकी प्रसाद दाढे हे तुझ्या व्यवसायास अनुरुप असलेल्या नावाचा योगायोग पाहून मन दिलखुश झाले.
तुझे पेशंट आनंदाने म्हणत असतील दाढेंकडे दाढ काढायला चाललो आहे. :)
विलक्षण योगायोग दुसरे काय? (की आडनावावरुन आधीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते? )
धन्यवाद
- सागर
29 Dec 2007 - 10:06 pm | प्रमोद देव
प्रसाद दाढे! वा! म्हणजे तुझ्या नावातच तुझा व्यवसाय लपलाय! :-)
झकास!
हे म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरचे नाव "प्रकाश डोळे" असावे तसे.
30 Dec 2007 - 9:11 am | डॉ.प्रसाद दाढे
माझ्या नावावरील हा श्लेष मी खूप वेळा ऐकला आहे..पण खरोखरच नाव आणि व्यवसाय एकच असण॑ हा विलक्षण योगायोग आहे. मला एक 'कान्-नाक्-घसा' तज्ञ माहित आहेत त्या॑चे नाव आहे डॉ. वाचासु॑दर!!
28 Jan 2008 - 5:34 pm | केशवराव
मला एक अस्थी रोग तज्ञ माहित आहेत , त्यांचे नाव डॉ . मोडखरकर आहे.
3 Jan 2008 - 10:49 am | डॉ.प्रसाद दाढे
मी परवाच वि.ग.कानिटकरा॑शी चर्चा केली. 'नाझी भस्मासुराचा उदयास्तची' विसावी आवृत्ती येत आहे. आणखीनही येत राहतील. मात्र थोडा-बहुत फरक सोडला तर ही सर्व पुनर्मुद्रणे आहेत. खुद्द लेखका॑चीसुद्धा इच्छा आहे की काही नवा मजकूर समाविष्ट करावा. तरी माझी सर्व वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी यास॑दर्भात आपल्या सूचना मला सा॑गाव्यात. हे पुस्तक पुष्कळ लोका॑नी वाचले आहे, अनेका॑नी पारायणे केली आहेत .तेव्हा तुम्हाला जाणवलेल्या त्रुटी, उणीवा कि॑वा एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण अथवा विशिष्ट छायाचित्र उदाहरणार्थ माझ्या मते दुसर्या महायुद्धाशी स॑बधित सर्व ठळक व्यक्ती॑ची स्पष्ट छायाचित्रे देणे आवश्यक आहे. स्कोर्झेनी, ह्यॉस (होएस), बोरमन, काउ॑ट कियानो (सियानो), हायड्रिच, रोझेनबर्ग, पाऊलुस (पोलस), स्टाउफेनबर्ग (स्टुफेनबर्ग), काउ॑ट बर्नाडोट इ. म॑डळी॑ची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे दिली पाहिजेत.
तरी वाचका॑नी आपले मत,सूचना मा॑डाव्या. मी त्या जरूर लेखका॑कडे व प्रकाशका॑कडे पोहोचवीन. (योगायोगाने माझा माजगा॑वकरसाहेबा॑शीसुद्धा चा॑गला परिचय आहे, ते माझे पेश॑ट आहेत) आणि आपल्या सर्वा॑च्या आवडत्या पुस्तकाची अधिक चा॑गली आवृत्ती उपलब्ध होईल.
3 Jan 2008 - 4:11 pm | सागर
नाझी भस्मासुराच्या बाबतीत मला खटकलेली एक गोष्ट सांगतो...
पुस्तकाच्या शेवटी कानिटकर साहेबांनी हिटलरच्या माईन काम्फ चा थोडासा अनुवाद अतिशय सुंदर शब्दांत केला आहे.
खरे तर थोड्याशा प्रकरणांपेक्षा, माईन काम्फचा संक्षिप्त अनुवाद देता आला तर खूप छान होईल. कारण हिटलरची माईन काम्फच्या वेळची मनःस्थिती काय होती , त्याचे त्यावेळचे आडाखे काय होते आणि ते पुढे त्याने कसे प्रत्यक्षात आणले याच्या चिंतनासाठी या संक्षिप्त अनुवादाचा उपयोग वाचकांस होऊ शकेल असे मला वाटते...
खरे तर माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद मराठीत उपलब्ध व्हावा असे मला वाटते. पण हिटलरविषयी असल्याने त्याच्या प्रकाशनास अडचणी येऊ शकतील.. कोण कशावरुन वादळ उठवेल हे काही सांगता यायचे नाही.
असो...
सागर
16 Jan 2008 - 8:26 am | पुष्कर
भेटून आनंद झाला. अहो मी दादांचा शेजारी (आम्ही वि.गं ना दादा म्हणतो). औदुंबर अपार्ट्मेंट- दुसरा मजला! अहो तुम्ही तिथे कधी येऊन गेलात? पुन्हा आलात तर समोरच्या घरीही चक्कर मारा. तुमचा प्रतिसाद वाचून मीही दादांशी ह्या विषयावर बोललो. त्यांनी मला तुमच्याविषयी सांगितलं.
पुन्हा याल तेव्हा अवश्य भेटू.
-
पुष्कर
1 Feb 2025 - 11:53 am | पुष्कर
बर्याच वर्षांनी आज इथे पुन्हा आलो. त्या वेळी दादांना इथल्या साधकबाधक चर्चेविषयी सांगितलं होतं आणि त्यांना ऐकून खूप छान वाटलं होतं. आता दादा नाहीत आणि आम्ही पण तिथे राहत नाही, पण शेजारी म्हणून खूप सुंदर आठवणी मागे राहिल्या आहेत.
16 Jan 2008 - 2:16 am | भडकमकर मास्तर
अत्यंत सुंदर चर्चा....डा`क्टर दाढे यांनी येऊन अजून मजा आणली...
आणि सागर, राईज आणि फोल लिन्क बद्दल धन्यवाद...
17 Jan 2008 - 4:58 pm | अरविन्दनरहरजोशी
अरविन्द
हिटलर अतिउत्तम सेनानी व मुत्सद्दी होता हे नक्कीच. आजचा इतिहास जेत्या लोकानी लिहिला आहे.
हिट्लर पेक्षा जास्त माणसे अमेरिकेने अणु-बॉम्बने मारले आहेत .पराभूता बद्दल कोणीहि चान्गले बोलत नाही.
जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते. असो चर्चा अतिशय मार्मिक झाली आहे.
17 Jan 2008 - 8:35 pm | ऋषिकेश
>> जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते
कबुल पण चांगल्या व्यक्तींमधे नाहि!! हुशारी आणि मुत्सदीपणा काय हो ओसामाकडे पण आहे!
17 Jan 2008 - 7:49 pm | डॉ.प्रसाद दाढे
पुढच्या वेळी मी दादा॑कडे येईन ते॑व्हा नक्की तुम्हाला भेटीन.
तूर्तास माझ्याकडील छायाचित्रे मी माजगा॑वकरा॑कडे देणार आहे. माझ्याकडे दुसर्या महायुद्धाशी स॑दर्भ असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती॑ची छायाचित्रे व व्यक्तीचित्रे आहेत. माझी रसिक वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी मला अशा व्यक्ति सुचवाव्यात ज्या॑ची छायाचित्रे आजवरच्या आवृत्तीमध्ये अस्पष्ट आहेत कि॑वा अजिबात नाहीत. मी ते फोटो जरूर पुरवेन.
जास्तीची माहिती समविष्ट करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे पर॑तु त्यास थोडा वेळ लागेल कारण माझा व्यवसाय व नोकरी.
18 Jan 2008 - 10:31 am | भडकमकर मास्तर
आगे बढो..डाक्टर्साहेब.... :)
6 Dec 2024 - 2:41 pm | अमरेंद्र बाहुबली
नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक काही दिवसाआधी वाचायला
सुरुवात केली. आता पूर्वार्ध वाचून संपवलाय.
थोडक्यात घडामोडी सांगतो. अडॉल्फ हिटलर नावाचा मुलगा जर्मन प्रेमी असतो, ऑस्ट्रिया सह अखंड जर्मन राष्ट्र बनावे अशी त्याची इच्छा असते. व्हेनिस शहरात तो भनंग अवस्थेत फिरत असतो, देशाच्या वाईट अवस्थेला ज्यू जबाबदार आहेत असे त्याचे ठाम मत असते. मग एका दिवशी पहिले महायुद्ध पेटते नी भनंग हिटलर जर्मनीच्या बव्हेरिया राज्यात सैन्यभरतीचा अर्ज करतो. निवडला जातो नी त्याचे दिवस पलटतात, दोन वेळा तो जखमी होतो. ३५०० सैनिकांच्या तुकडीत ५०० परत येतात त्यात हिटलर एक असतो. जर्मनीचा कैसर पळून जातो नी जर्मनी देश युद्ध हरतो, मेलेल्याला अजुन मारावे तसे व्हेनिसच्या तहाच्या अटी जर्मनीवर लादल्या जातात नी जर्मनी भरडला जातो. ह्या रागातून एक अपत्य जन्मत ते म्हणजे हिटलर. सैन्यात सैनिकाना लोकशाही चांगली वाटू नये म्हणून सैनिकाना अधिकारी भाषण देत असतात ह्यात एकदा एक अधिकारी ज्यूंबद्दल चांगलं बोलतो, हिटलर ते थांबवून ज्यूंबद्दल वाईट नी देशाबद्दल चांगले बोलतो, अधिकारी खूश होऊन हिटलर ला असेभाषणं देण्याची जबाबदारी देऊन सैन्याच्या राजकीय विभागात घेतो. हिटलरला राजकीय पक्षांवर नजर ठेवायची जबाबदारी मिळते, एकदा हिटलरला जर्मन वर्कर्स पार्टी ह्या नवीन स्थापन झालेल्या पक्ष बद्दल रिपोर्ट सादर करायची ऑर्डर सुटते, सैन्य कम्युनिस्ट पक्षांना घाबरत असते. हिटलर त्या पक्षाच्या सभेला साध्या वेशात जातो, तिथे फक्त २५ लोक जमलेले असतात, सभेत हिटलरला एक छोटे ४० पाणी पुस्तक मिळते त्या पुस्तकात हिटलरच्या मनातल्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. नंतर हिटलरला त्या पक्षाचे सभासद झाल्याचे पत्र मिळते, नंतर एका नॅशनल सोशॅलिस्ट पार्टी नावाच्या २० -२५ सभासद असलेल्या पक्षाचे आणी जर्मन वर्कर्स पक्षाचे एकत्रीकरण होते व नवीन पक्ष स्थापला जातो “नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” (नाझी) ह्या पक्षाला नेत्याची आवश्यकता आहे हे ओळखून हिटलर सैन्याचा राजीनामा देतो नी पूर्णवेळ पक्षाला वाहून घेतो. हिटलरच्या वक्तृत्व कलेने पक्ष चांगलाच फोफावतो, त्याला चांगले साथीदारही मिळतात. मध्यंतरी पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या सर्वोच्च सैन्याधिकार्याला धरून हिटलर मोर्चा काढतो व पकडला जाऊन जेल मध्ये जातो तिथे तो “माईन काम्फ” आत्मचरित्र लिहितो. अनेक वर्षांच्या संघर्षाने पक्ष निवडणुका लढवत सत्तेत येतो व हिटलर सर्व पक्षांवर बंदी घालून फक्त एकच पक्ष ठेवतो, नाझी नी चिन्ह स्वस्तिक. नंतर पक्ष वाढवणाऱ्या काही मित्रांच्याही हत्या करतो. इंग्लंडकडून सैन्य वाढवायला नी नाविकदल वाढवायला परवानगी मिळवतो.
पुढे चार पाच वर्षातच जर्मनीची तुफ्फान प्रगती होते. नंतर हिटलर बाजूचे ऑस्ट्रिया नी चेकोस्लोवाकीया गिळतो. हे हिटलर नावाचे उधळलेले गाढव पूर्वेकडे सरकतेय त्यामुळे रशियावर आदळेल असे फ्रान्स इंग्लंडला वाटते. पण स्टॅलिन हे पश्चिमेवर उधळायला हीटलरशी हातमीळवणी करतो. सैन्य पोलंड सीमेवर जमा होऊन पाऊणे पाच वाजता पोलंड मध्ये घुसते. पोलंड रशिया नी जर्मनी अर्धा अर्धा वाटून घेतात. स्टॅलिनला फिनलँड ने चांगलेच चोपले आहे, फिनलँड चे २५ हजार तर रशियाचे २ लाख सैनिक मेलेत. हिटलरने नार्वे जिंकलाय. ह्यामुळे बुळा चेंबर्लेन जाऊन हिटलरला ओळखलेला एकमेव माणूस चर्चिल पंतप्रधान झालाय. फ्रान्समध्ये नाझी सैन्य घुसलय. पुढे वाचेन तसा लिहितो…
:)
- दोस्त राष्ट्रांना पाठिंबा असलेला अमरेंद्र बाहुबली
6 Dec 2024 - 8:59 pm | मुक्त विहारि
जेते इतिहास लिहितात....
कृपया खालील पुस्तक पण वाचा...
https://www.flipkart.com/hi/adolf-hitler-ani-dusare-mahayuddha-satya-aan...
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि एकाच घटनेला असंख्य कंगोरे....
6 Dec 2024 - 6:48 pm | कर्नलतपस्वी
करून दिलेली ओळख वाचकांना पुस्तक वाचण्यास उद्युक्त करते.
कुठलाही, विशेषत: बहुचर्चित राज्यकर्ते जे तानाशाह
म्हणून ओळखले जातात. सुरवातीचे देशप्रेम नंतर व्यक्तिगत महत्वाकांक्षेत रुपांतरीत होते आणी
आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्व य्योग्य अयोग्य मार्ग अवलंबीतात.
त्या काळाच्या परिप्रेक्षातून त्यांना जे वाटले त्यांनी केले. पण त्या गोष्टींचा भविष्यात झालेला परिणाम अभ्यासणे महत्वाचा असतो. औरंगजेब सहिष्णू असता तर कदाचित मराठा साम्राज्य उदयाला आले नसते. अर्थात हे माझे मत.
अमरेंन्द्र बाहुबली या तरूण मिपाखराने बरेच प्रयत्न करून हे पुस्तक मिळवले,वाचतोय आणी आपले मत यावर व्यक्त करतो याची प्रशंसा केल्याशिवाय रहावत नाही.
लेखक,प्रतिसादकांचे मनापासून आभार.
6 Dec 2024 - 6:58 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
6 Dec 2024 - 7:29 pm | चौथा कोनाडा
मी हे पुस्तक 1993 साली वाचले तेव्हा माझी जागतिक इतिहासाबद्दलचची समज फारशी नव्हती, त्यामुळे सुरुवातीला हे पुस्तक क्लिष्ट वाटले होते पण हळूहळू पुस्तकांनी प्रभाव दाखवायला सुरुवात केली. जगाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा नेता हिटलर आणि त्याच्या साम्राज्याची भूक, आक्रमणे, यशोगाथा, महायुद्ध हे सगळं वाचण्यात रंगून गेलो. मी त्याचवेळी जगाचा नकाशा आणला आणि हिटलर चे मार्गक्रमण आक्रमण अभ्यासता अभ्यासता नकाशा पहात कोणता देश कुठे आहे, कोणता देश जर्मनीच्या शेजारी आहे याचे हळूहळू आकलन होऊ लागले. या पुस्तकाच्या वाचनाचा कालावधी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. ते भारलेपण मला आजही आठवते. त्यामुळे या पुस्तकाचे माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.
या पाठोपाठ काही वर्षांनी म्हणजे पाच सात वर्षातच मी वीणा गव्हाणकर यांचे कृषी तज्ञ आणि क्रांतिकारक गदर पार्टीचे संस्थापक डॉक्टर खानखोजे यांच्यावरील " डॉ खानखोजे - नाही चिरा नाही पणती" हे पुस्तक वाचले हाही अनुभव अविस्मरणीय होता. ( वाचले नसेल तर अवश्य वाचा) अशी पुस्तके वाचता वाचता जी परिपक्वता अनुभवली ते जीवनात कायम उपयोगी पडले हा भागाव असताना हे सर्व आठवले.
!! धन्यवाद !!
6 Dec 2024 - 7:31 pm | चंद्रसूर्यकुमार
जवळपास १७ वर्षांच्या खंडानंतर प्रतिसाद मिळून वर आलेला हा कदाचित एकमेव धागा असावा :)
6 Dec 2024 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली
खरच की!
14 Dec 2024 - 10:28 pm | अमरेंद्र बाहुबली
मला दुसरे महायुद्ध वाचताना खूप दडपण येतय! काय म्हणावे जर्मन सेनेला आज पर्यंतच्या मानवी इतिहासातील ही सर्वात ताकदवान सेना असावी! रोमेल सारख्या उत्कृष्ट ती भयंकर भारी विजय मिळालेल्या सेनानीला हिटलर रसद पाठवत नाहीये आणी त्यामुळे सुएझ कालवा हिटलरने ताब्यात घेतला नाही कारण त्याला रशियावर हल्ला करायचा आहे. मोलोटोव स्टॅलीन ही जोडगोळी नी हिटलरचा मॉस्कोतील वकील जर्मनी- रशिया युद्ध होऊ नये म्हणून परकोटीचा प्रयत्न करताहेत. हे सगळं वाचून माझ्य मनावर प्रचंड दडपण येतंय पुढे वाचल्या जात नाहीये. :( सुएझ कालवा घेतला तर इंग्लंड संपला हे सोपे गणित असूनही हिटलरने ते का केले नाही? रशियावरील हल्ला १९४१ ऐवजी ४२ मध्येही करता आला असता ना? :(
15 Dec 2024 - 10:58 am | मुक्त विहारि
https://www.amazon.in/-/hi/Parag-Vaidya/dp/B07NVQRTBZ
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात. ह्या पुस्तकात, चर्चिल, रुझवेल्ट आणि स्टॅलिन, यांनी हिटलरची कशी गोची करून ठेवली होती? हे तारखे नुसार आणि पुराव्या सकट सांगितले आहे.
15 Jan 2025 - 12:40 am | अमरेंद्र बाहुबली
हे पुस्तक दोन दिवसा आधी मी वाचून संपवले नी माझी झोप उडालीय नी कशातच मन लागत नाहीये. मला ह्यावर उतारा पाहिजे. मॉस्कोत पोहोचून क्रेमलिनचे मनोरे पाहणारे जर्मन सैन्य हारले ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हिटलर मरो तिकडे पण इथके अद्भुत युद्ध लढणारे जर्मन्स हरायला नको होते असे का माहीत का वाटतेय? कदाचित पुस्तक जर्मनीची बाजू घेऊन लिहिल्या सारखे वाटले असेल म्हणून?
हे युद्ध जर्मनी फक्त नी फक्त मूर्ख जपान्यांमुळे हरले असा माझा आरोप आहे. रशियाला जपानने पाठीत रट्टा घातला असता तर हिटलरने रशीया जिंकला असता नी नंतर झालेली सैन्य हानी टळली असतीनी त्याच सेनेच्या एका टोल्यातच इंग्लंड पडले असते. मूर्ख जपान्यांनी रशिया पाडला तर नाहीच पण वरून अमेरिकेला युद्धात ओढले. जर्मनी युद्ध हरल्यावर जपान्याना वाचवायला अरबातले उंट येणार होते का? मूर्ख बेअक्कल जपानी! :(
15 Jan 2025 - 9:45 am | मुक्त विहारि
थंडी, हा महत्त्वाचा घटक होता.
असो,
तूम्ही आलात ते उत्तम झाले.
15 Jan 2025 - 9:53 am | चंद्रसूर्यकुमार
नुसते तेच एक पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावरील त्याने काही केलेल्या चुकांमुळे तो हरला असे वाटायचा संभव आहे. ते पुस्तक जर्मनीच्या बाजूने लिहिले आहे असे मलाही वाटते. शाळेत असताना ते पुस्तक वाचूनच हिटलरचे गारूड मला पडले होते आणि मी अगदी हिटलरभक्त झालो होतो. वर्तमानपत्रातील एका लेखात आलेला हिटलरचा फोटो कापून मी माझ्या अभ्यासाच्या टेबलवर पण चिकटवला होता.
ते एक कारण झाले. फक्त जपान्यांमुळे हिटलर हरला असे म्हणता येईल असे वाटत नाही. इतरही कारणे आहेत.
१. सुखासीन मुसोलिनी उगीच हुशार्या करत होता पण इटालियन सैन्याचा रणांगणावर उपयोग शून्य होता. आफ्रिकेतून ब्रिटीश सैन्य ग्रीसमार्गे युरोपात येऊन हिटलरला अडचण करू शकले असते म्हणून ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरने मुसोलिनीकडे दिली. ग्रीस जिंकणे सोडाच इटलीने ग्रीसवर हल्ला केल्यावर ग्रीसने असा जबरदस्त तडाखा इटलीच्या सैन्याला दिला की ग्रीसचेच सैन्य इटलीच्या अल्बेनिया या वसाहतीत घुसले. मग परत ग्रीस जिंकायची जबाबदारी हिटलरवरच आली. त्यात कालापव्यय झाला त्यामुळे रशियावर हल्ला करायला उशीर झाला म्हणून ऐन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीवर पोचले. ते जर दीडेक महिना आधी पोचले असते तर कदाचित मॉस्को पडलेही असते.
२. युगोस्लाव्हियात अनपेक्षित तिखट प्रतिकार झाला त्यामुळेही रशियावरील हल्ल्याला विलंब झाला.
३. हिटलरने बेल्जिअममध्ये कोंडीत पकडलेल्या तीन-साडेतीन लाख ब्रिटीश-फ्रेंच सैनिकांना फ्रान्सच्या डंकर्क बंदरापर्यंत जाऊ दिले. समजा तितके ब्रिटिश-फ्रेंच सैनिक हिटलरच्या ताब्यात गेले असते तर ब्रिटिशांचे कंबरडे पुरते मोडले असते. खरं तर डंकर्कला पळून येणे हा ब्रिटिशांचा पराभव होता पण तितके सैनिक वाचले म्हणजे त्या पराभवातही एक विजय होता. चर्चिलनेही तेच म्हटले होते.
४. हिटलरने आफ्रिकन आघाडीवर विशेष लक्ष दिले नाही. जर इजिप्त ही ब्रिटिश वसाहत जिंकून सुएझवर नियंत्रण हिटलरने मिळवले असते तर ब्रिटिशांची बरीच अडचण झाली असती कारण भारत आणि आशियातील इतर वसाहतींमधून येणारी रसद मिळवायला केप ऑफ गुडहोप मार्गे म्हणजे जुन्या मार्गाने बराच वळसा घालून यावे लागले असते.
मुद्दा #३ आणि #४ वरून दिसते की हिटलरला ब्रिटिशांबरोबर युध्द खरं तर नको होते. कारण त्याच्या मते ब्रिटिश उच्च दर्जाच्या रक्ताचे होते. त्याचे खरे लक्ष होते पूर्वेकडे- पोलंड आणि रशियात.
५. रशियन आघाडीवरही स्टालिनग्राडमध्ये आपण जिंकणे शक्य नाही हे जर्मन सेनानी पोलसला आधीच समजले होते. त्याने हिटलरकडे माघारीची परवानगी मागितली होती. पण हिटलरने त्याला म्हटले- तुला कोणाला पाठ दाखवत माघार घ्यायची आहे? हलक्या रक्ताच्या स्लाव्ह लोकांना? त्यामुळे त्याने माघारीची परवानगी नाकारली. मग एकदा रशियन सेनानी झुकॉव्हने पिछाडीकडील फळी कापून जर्मन सैन्याचा माघारीचा रस्ता बंद केला आणि जर्मन सैन्याला कोंडीत पकडले. मग अगदी नामुष्कीकारक पराभव होणे क्रमप्राप्त होते.
इतरही कारणे आहेत/असतीलच. त्या सगळ्याचे विश्लेषण नाझी भस्मासूराचा उदयास्त पुस्तकात अजिबात नाही.
15 Jan 2025 - 1:28 pm | अमरेंद्र बाहुबली
चांसूकू सर, मला नाही वाटत ग्रीस मधल्या उशिरामुळे हिटलरचा रशियात पराभव झाला. एकतर रशियन सैन्य मॉस्कोजवळ जात होते तसतसा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता राशियन नागरिक नी सैनिकांचा, सगळे स्टालिनल ला उबागलेले होते. अनेक ठिकाणी रशियन सैनिकांनी लढायला नकार दिला होता. मूर्ख हिटलरने मॉस्को पासून २०० मैल काही कारण नसताना २ महिने सैन्य उभे करून ठेवले. हा मूर्खपणा कमी की काय म्हणून गरज नसताना लेनिन गड नी स्टॅलिन गड लढत बसायला फौजेला सांगितले. त्याचे सर्व सैन्यप्रमुख सरळ मॉस्कोत घुसावे ह्या मताचे होते. क्रूव की क्रीव्ह (युक्रेनवाले नव्हे) शहर लढवा असा आदेश हिटलरने दिल्यावर त्याचा कुठलातरी जनरल त्याला तोंडावर बोलला की हे शहर नकाशात कुठे आहे कुणाला माहीत तरी आहे का? मग का लढवायचे? १९४१ नंतर मूळचा हुशार असलेला हिटलर विक्षिप्त सारखा वागू लागला होता. त्यातच त्याने अनेक ठिकाणी सैन्य माघारी घेऊन दिले नाही. पुढे जपानला रशियावर हल्ला करा अस कन्वेन्स करता आल नाही. जपानने खरोखर मोठा मूर्खपणा केला. त्यामुळे थंडी हे कारण रशियन आघाडीवर सांगितले गेले असले तरी थंडी आधीच हिटलर ला मॉस्को जिंकायची पुरेपूर संधी होती. हिटलरचा मूर्खपणा नि जपान्यांची बेअकली ह्यामुळे हे जिंकेलेलयुद्ध जर्मनीच्या हातातून गेले.
15 Jan 2025 - 3:50 pm | चंद्रसूर्यकुमार
रशियावर हल्ला व्हायला उशीर झाला त्यात ते एक कारण होते. मुद्दा हा की हिटलरने रशियात जे काही केले ते आणि तसेच केले असते तरी आणखी १५ दिवस त्याच्याकडे असते तरी युध्दाचा निकाल वेगळा लागला असता/ लागू शकला असता ही शक्यता आहे.
हे खुद्द रशियात नाही तर बाल्टिक राज्ये आणि युक्रेनमध्ये झाले होते. पण जर्मन सैन्य रशियात घुसले तेव्हा त्यांनी किएव्हमध्ये काय काय धुमाकूळ घातला होता याच्या बातम्या लपून राहिल्या नव्हत्या त्यामुळे रशियात अधिक कडवा प्रतिकार झाला होता.
स्मोलेन्स्क १० सप्टेंबरला जिंकले. पण त्या लढाईतच पाऊस सुरू झाला होता, रशियातील वातावरणात पाऊस पडल्यानंतर चिखल होत होता त्यामुळे जर्मन रणगाड्यांची हालचाल मंदावली होती. तसेच मॉस्कोकडे पुढे जाताना दक्षिणेकडून हल्ला झाल्यास सैन्य कोंडीत पकडले जाईल ही पण एक शक्यता होती म्हणून दक्षिणेकडे ब्रियान्स्क जिंकायला हिटलरने प्राधान्य दिले. आता ती घटना उलटून गेल्यावर हिटलरने थेट मॉस्कोकडे जायला हवे होते हे पश्चातबुद्धीने म्हणणे सोपे आहे पण त्यावेळी निर्णयप्रक्रीयेत हे इतरही घटक होते. त्याप्रमाणेच मॉस्कोच्या वाटेवर व्याझमामध्ये अपेक्षेपेक्षा बराच जास्त कडवा प्रतिकार झाला आणि पुढील वाटचाल मंदावली. इतके असूनही १२-१३ डिसेंबरच्या सुमारास जर्मन सैन्य मॉस्कोच्या उपनगरापर्यंत पोचले होते.
15 Jan 2025 - 8:54 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद. पण जपानने रशियाच्या पाठीत वार का नाही केला हे समजत नाही, इतके मूर्ख असतील जपानी वाटले नव्हते. हिटलरनेही सैन्य मागे न घेऊन बराच मूर्खपणा केला. हिटलर नी टोजो मला नरकात भेटले की दोघांना चपलेने बडवेन.
28 Jan 2025 - 12:07 am | हेम
जयंत कुलकर्णी यांचं दुसऱ्या महायुद्धाचे वादळ हेदेखील तपशीलवार लिहिलेलं पुस्तक आहे.
20 Feb 2025 - 11:07 am | अमरेंद्र बाहुबली
दुसरे महायुद्ध जर्मनी हरण्यामागे जपानच होते हे चॅट जीपीटीनेही सांगीतले, शेवटची ओळ पहा.
जर जपानने अमेरिका ऐवजी सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचे संपूर्ण गणित बदलले असते. खाली काही संभाव्य परिणाम आहेत:
1. जर्मनी आणि जपान दोन्ही बाजूंनी सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता
• पूर्वेला जपान आणि पश्चिमेला जर्मनी:
• जर जपानने 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन फ्रंटवर लढावे लागले असते.
• जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्राड जिंकणे सोपे झाले असते.
• सोव्हिएत युनियन कदाचित पूर्णपणे कोसळले असते.
2. अमेरिका युद्धात उशिरा उतरली असती
• जर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला नसता, तर अमेरिका लवकर युद्धात उतरली नसती.
• त्यामुळे युरोपमध्ये जर्मनीला जिंकण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता.
3. हिटलरला युरोपमध्ये मोठे यश मिळाले असते
• सोव्हिएत युनियन नष्ट झाल्यास, हिटलर युरोपचा निर्विवाद सम्राट बनला असता.
• ब्रिटन एकटे पडले असते आणि अखेर जर्मनीसमोर शरण गेले असते.
4. जपानला मोठी जमीन मिळाली असती
• जपानला मंगोलिया, सायबेरिया आणि रशियाचा पूर्व भाग मिळाला असता.
• तिथले तेल आणि संसाधने जपानसाठी खूप महत्त्वाचे ठरले असते.
5. अमेरिका शेवटी युद्धात आली असती, पण उशिरा
• जर जपान आणि जर्मनी खूप मजबूत झाले असते, तर अमेरिका आणि ब्रिटनला त्यांना हरवणे अवघड गेले असते.
• कदाचित युद्ध 1950 पर्यंत चालले असते.
➡ निष्कर्ष:
जर जपानने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्णतः वेगळा असता.
• जर्मनी आणि जपान कदाचित जिंकले असते.
• अमेरिका युद्धात उशिरा आली असती.
• सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असते.
• जग आज जर्मन-नाझी आणि जपानी साम्राज्याच्या छायेत असते.
परंतु जपानने अमेरिका निवडली, आणि त्यामुळे युद्धाचा प्रवाह पलटला!
20 Feb 2025 - 2:48 pm | अमरेंद्र बाहुबली
जर १९४१ ला रशियावर जपानने हल्ला केला असता तर?
चॅट जीपीटी
Alternate History: If Japan Attacked Russia in 1941 Instead of the U.S.
Background (Real History):
• 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेसोबत युद्ध सुरू केले.
• दुसरीकडे, जर्मनीने जून 1941 मध्ये “Operation Barbarossa” अंतर्गत सोव्हिएत युनियनवर (रशिया) हल्ला केला.
• स्टालिनच्या सैन्याने जर्मन आक्रमण थांबवले, कारण त्याने जपानकडून पूर्व आघाडीवर कोणताही धोका नव्हता याची खात्री केली होती.
• जर जपानने त्याऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर युद्धाचा संपूर्ण प्रवाह बदलला असता.
Step 1: जपान रशियावर हल्ला करतो (जून-जुलै 1941)
• जर्मनी आधीच पश्चिमेकडून सोव्हिएत युनियनवर आक्रमण करत होता.
• जपानने जर सायबेरियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला दोन आघाड्यांवर युद्ध लढावे लागले असते.
• सोव्हिएत सैन्याला पूर्व भागात मोठे नुकसान झाले असते आणि जर्मनीला मॉस्को आणि स्टालिनग्रॅड जिंकणे सोपे गेले असते.
• रशियन रेड आर्मी कमकुवत झाली असती आणि जर्मनी-मित्र राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनचा पराभव केला असता.
Step 2: स्टालिनचा पराभव (1942-1943)
• जर जर्मनी आणि जपान दोघांनी मिळून रशियावर हल्ला केला असता, तर स्टालिनला युद्ध जिंकणे अशक्य झाले असते.
• मॉस्को जर्मन सैन्याच्या ताब्यात गेले असते.
• स्टालिनशिवाय रशियामध्ये कम्युनिस्ट सरकार कोसळले असते.
• सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले असते (सायबेरिया जपानकडे, पश्चिम भाग जर्मनीकडे).
Step 3: अमेरिका युद्धात उशिरा शिरतो किंवा भाग घेत नाही
• जर जपानने अमेरिका ऐवजी रशियावर हल्ला केला असता, तर पर्ल हार्बरवर हल्ला झाला नसता.
• यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात लवकर सामील झाली नसती.
• अमेरिका युद्धात उशिरा शिरल्यामुळे युरोपमध्ये जर्मनी अजूनही मजबूत राहिला असता.
Step 4: जपान आणि जर्मनी युद्ध जिंकतात (1945 पर्यंत)
• जपानने रशियाच्या पूर्व भागावर ताबा मिळवला असता (सायबेरिया, मंचुरिया, मंगोलिया).
• जर्मनीने पश्चिम युरोप आणि सोव्हिएत युनियनचा मोठा भाग जिंकला असता.
• इंग्लंड आणि अमेरिका एकटे पडले असते, त्यामुळे ते कदाचित जर्मनीविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शांतता करार करण्यास भाग पाडले गेले असते.
• नाझी जर्मनी आणि जपान जगावर राज्य केले असते.
Step 5: भविष्यातील जग (1950 नंतर)
• संपूर्ण युरोप नाझी तत्त्वज्ञानाखाली आला असता.
• जपानने संपूर्ण पॅसिफिक आणि आशिया ताब्यात घेतले असते.
• अमेरिका एकटे पडले असते आणि पुढील युद्धाची तयारी करत राहिले असते.
• शीतयुद्ध (Cold War) अमेरिका विरुद्ध नाझी-जपान असे झाले असते, सोव्हिएत युनियन विरुद्ध नव्हे.
➡ निष्कर्ष:
• जपानने जर 1941 मध्ये सोव्हिएत युनियनवर हल्ला केला असता, तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल पूर्ण बदलला असता.
• सोव्हिएत युनियन लवकर कोसळले असते आणि अमेरिका युद्धात उशिरा किंवा अजिबात शिरली नसती.
• नाझी जर्मनी आणि जपान जगाच्या प्रमुख सत्ता बनल्या असत्या.
परंतु…
• जपानला दीर्घकाळ युद्ध लढण्यासाठी पुरेसे संसाधन नव्हते, त्यामुळे काही वर्षांनी जपानचा पराभव शक्य झाला असता.
• अमेरिका शेवटी नाझी-जपान विरुद्ध अण्वस्त्र वापरून मोठे युद्ध केले असते.
➡ थोडक्यात, जग वेगळे दिसले असते, पण दीर्घकाळ जपान आणि जर्मनी दोघेही टिकले असते की नाही, हे अनिश्चित आहे.
डिपसीक
ही पर्यायी कथा पूर्ण करण्यासाठी, आपण या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेल्या जगाचा विस्तार करू शकतो. या कथेत, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला आणि त्यानंतरच्या घटनांची मालिका वेगळ्या दिशेने वळली. ही कथा पूर्ण करताना, आपण युद्धाचे परिणाम, राजकीय बदल आणि जगभरातील प्रभाव पाहू शकतो.
---
### **१९४१: जपानचा रशियावर हल्ला**
१९४१ मध्ये, जपानने आपल्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेपोटी रशियावर हल्ला केला. त्यांनी पूर्व सायबेरियातील व्लादिवोस्तोक आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला. या हल्ल्यामुळे रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागले: पश्चिमेकडून जर्मनी आणि आताच पूर्वेकडून जपान. स्टॅलिनला आपल्या सैन्याची विभागणी करावी लागली, ज्यामुळे जर्मनीविरुद्धचा प्रतिकार कमकुवत झाला.
---
### **जपानच्या विजयाचा प्रभाव**
जपानच्या यशामुळे आशियातील त्यांचे साम्राज्य आणखी मजबूत झाले. त्यांनी पूर्व सायबेरियातील तेल, कोळसा आणि इतर खनिज संसाधनांचा वापर करून आपली युद्धयंत्रणा सुधारली. याचा परिणाम म्हणून, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर आपले नियंत्रण वाढवले. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांवर जपानचे अधिराज्य वाढले.
---
### **रशियाचा प्रतिकार**
रशियाने जपानविरुद्ध आपला प्रतिकार मजबूत केला. सायबेरियन सैन्याने जपानी सैन्याला अडवण्यासाठी कठोर लढा दिला. या संघर्षात रशियन सैन्याने हिवाळ्याचा फायदा घेऊन जपानी सैन्याला मागे हटवले. या युद्धात दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या पूर्व भागातील लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यावर या संघर्षाचा मोठा परिणाम झाला.
---
### **युद्धाचा शेवट**
१९४५ मध्ये, जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर, जपानने शरणागती पत्करली. या पर्यायी कथेत, जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या पराभवाचे एक मोठे कारण ठरले. रशियाने पूर्व सायबेरियातील प्रदेश परत मिळवले आणि जपानचे साम्राज्यवादी स्वप्न संपुष्टात आले.
---
### **युद्धानंतरचे जग**
या पर्यायी कथेनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग वेगळे दिसले असते:
1. **रशियाची स्थिती**: रशियाला दोन्ही बाजूंनी युद्ध लढावे लागल्यामुळे, त्यांची अर्थव्यवस्था आणि सैन्य दुर्बल झाले असते. यामुळे, स्टॅलिनचे नेतृत्व आणि सोव्हिएत संघाची स्थिती कमकुवत झाली असती.
2. **जपानची स्थिती**: जपानचा रशियाविरुद्धचा हल्ला त्यांच्या संसाधनांचा अपव्यय ठरला असता. यामुळे, त्यांची आशिया-पॅसिफिक प्रदेशातील स्थिती कमकुवत झाली असती आणि त्यांना अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी कमी संसाधने उपलब्ध झाली असती.
3. **अमेरिकेची भूमिका**: अमेरिकेची भूमिका या पर्यायी कथेतही महत्त्वाची राहिली असती. जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर, अमेरिकेने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील आपले नियंत्रण वाढवले असते.
4. **आशियातील राजकीय बदल**: जपानच्या पराभवामुळे, आशियातील इतर राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले असते. चीन, कोरिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांना जपानी अधिराज्यापासून मुक्तता मिळाली असती.
---
### **निष्कर्ष**
या पर्यायी कथेनुसार, जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वेगळ्या दिशेने वळला असता. या काल्पनिक परिस्थितीतून निर्माण झालेले जग आजच्या जगापेक्षा वेगळे दिसले असते. ही कथा केवळ काल्पनिक आहे आणि वास्तविक इतिहासात जपानने १९४१ मध्ये रशियावर हल्ला केला नाही. त्याऐवजी, जपानने आशिया-पॅसिफिक प्रदेशातील इतर राष्ट्रांवर लक्ष केंद्रित केले होते.
---
ही कथा तुमच्या कल्पनेतून निर्माण झाली आहे. जर तुम्हाला या कथेशी संबंधित अधिक माहिती किंवा तपशील हवे असतील, तर कृपया सांगा!
21 Feb 2025 - 5:43 am | मुक्त विहारि
Fuzzy Logics चा अभ्यास करा....
20 Feb 2025 - 4:07 pm | संग्राम
जपानने पर्ल हार्बरवर हल्ला का केला
20 Feb 2025 - 4:41 pm | अमरेंद्र बाहुबली
जपानी निर्बुद्ध होते!
21 Feb 2025 - 5:45 am | मुक्त विहारि
जपानी संस्कृतीचा अभ्यास करा....
23 Feb 2025 - 11:27 am | अमरेंद्र बाहुबली
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस, इंग्रजाना हरवू शकेल अश्या देशांची मदत घेण्याची कल्पना नेताजीना सुचली आणी ती त्यांनी अमलात ही आणली, जीवावर खेळून कलकत्ता - पेशावर- काबुल -ताशकन्द- मॉस्को आणी मग बर्लिन पोहोचणे तिथे थेट हिटलरला भेटणे, त्यानंतर पाणबुडीने जपानला पोहोचून टोजो ह्या जपानी पंतप्रधानाना भेटणे खरोखर अलौकिक होते त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना करून अंदमान निकोबार बेटे ताब्यात घेणे खरोखर अलौकिक आहे. दुसरे महायुद्ध जर्मनी जपान हरल्यामुळे त्यांच्या ह्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले, जर दुसरे महायुद्ध जर्मनी जपान जिंकले असते तर निश्चितच भारताचे पहिले पंतप्रधान/राष्ट्रपती अथवा भारतीय नाझी-इम्पीरियल सरकारचे प्रमुख म्हणून सुभाषचंद्र बोस असते नी जगात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले गेले असते. भारताला जर्मनी नी जपानने महत्वाचे स्थान दिले असते ते सुभाषबाबूंमुळे.
जितके मी वाचलेय त्याप्रमाणे सुभाष बाबूंचा खरोखर तैवान मध्ये मृत्यू झाला कारण त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता नी त्याने हे सर्व पाहिले होते. अथवा सुभाषबाबू रशियाला गेले असावेत नी तिथे स्टॅलिनने काहीतरी दगाफटका केला असावा, अथवा सुभाषबाबू भारतातच असावे नी त्याना ब्रिटिशानी युद्धगुन्हेगार घोषित केल्याने अज्ञातवासात ते गेले असावेत.
23 Feb 2025 - 7:12 pm | मुक्त विहारि
पण,
अजून काही पुस्तके वाचा...
वीर सावरकर , बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल, हे पण उत्तम दूरदृष्टी असलेले नेते.
हा एक भाग झाला.
आणि
आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना परमपूज्य नेहरू यांनी भारतीय सैन्य दलात सामावून घेतले नाही. अशा परिस्थितीत, सुभाष चंद्र बोस यांनी अज्ञातवास पत्करला असण्याची शक्यता जास्त.
हा दुसरा भाग
तिसरा महत्त्वाचा भाग असा की, नशीब ब्रिटिश सरकारच्या बाजूने होते. आसाम मध्ये आझाद हिंद सेनेने एक दिवस आधी शरणागती पत्करली.
चौथा महत्वाचा भाग असा की, सुभाष चंद्र बोस कधीच जपानी किंवा जर्मनीच्या हातातील बाहुले झाले नसते.
पाचवा आणि महत्वाचा भाग असा की...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस...
चक्क तुम्हाला हे उशीरा का होईना पण जाणवलं, हे वाचून आनंद झाला....