शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.
आपण सगळ्यांनीच अश्या मुलांना मॉल मधे, शाळे बाहेर, किराणा च्या दुकानात, ई. असा गदारोळ घालताना बघितलं असेल. तात्पर्य हे, की आज आपल्याला पदोपदी जंक फूड ला सामोरं जावं लागतं- विशेष करून अश्यावेळी जेव्हा आपल्याला खूप भूक लागलेली असते, दिवसभर काम करून दमलेलो असतो, घरी संपूर्ण स्वयंपाक करायला वेळ नसतो किंवा जेव्हा आपण करमणुकीसाठी बाहेर पडतो. तर हे जंक फूड म्हणजे नक्की काय असतं? जंक फूड म्हणजे असे पदार्थ ज्यातून आपल्याला, प्रमाणात कमी खाऊन पण खूप जास्त, एम्प्टी कॅलरी मिळतात. म्हणजे ज्यात बाकी काहीच पोषण नसते- जसं की प्रथिने, जीवन सत्व, खनिज , फायबर ई. अश्या ह्या जंक फूड चे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे त्यात सोडियम, फॅट आणि साखरेचे प्रमाण बरंच जास्त असते. काही संशोधनात आढळून आलंय की प्रत्येक व्यक्ती ची जंक फूड ची भिन्न परिकल्पना असली तरी सगळेच त्यात फ्रेंच फ्राईज, चिप्स, आईस्क्रीम, बर्गर, पिझ्झा, केक/पेस्ट्री, ईन्स्टन्ट पास्ता/ नूडल्स चा समावेश करतात. पण त्या व्यतिरिक्त चॉकलेट/ गोळ्या, चुईंग गम, प्रोसेस्ड रेडी टू ईट पदार्थ जसे सॉसेज, सलामी, चिकन नगेट, फिश कटलेट, पराठे, समोसे आणि शुगर/चॉकलेट कोटेड ब्रेकफास्ट सीरिअल (हो, हे पण!) - जंक फूड असतात.
वारंवार जंक फूड (आठवड्यातून एकदा खाणं पण जास्त असतं) खाल्ल्याने लहान मुलांच्या एकाग्रते वर विपरीत परिणाम होतात. वाढत्या वयात एवढ्या अतिरिक्त कॅलरी पोटात जाऊन त्यांच्या चरबी साठवणारया पेशींची वाढ होते व फक्त लहानपणीच नाही तर प्रौढावस्थेत पण त्यांचा जाड होण्याकडे कल वाढतो. हल्लीच झालेल्या एका अध्ययनात लक्षात आलंय की जंक फूड खाण्याचे पण व्यसन लागू (असू) शकते. अश्या व्यक्तींना जर जंक फूड खायला मिळालं नाही तर ते अस्वस्थ होऊन त्यांना कशातच रुची वाटत नाही. जंक फूड ने लट्ठपणा तर वाढतोच, शिवाय हायपर टेन्शन (हाय ब्लड प्रेशर), मधुमेह, हाय कॉलेस्टेरॉल, मज्जातंतूंचे विकार- ह्याची पण शक्यता वाढते.
सगळ्यांना माहित आहे की जंक फूड खाणं हेल्दी नसतं तरी पण ते पूर्णपणे टाळणं का अवघड होतं?
- आपल्या एवढ्या धकाधकी च्या जीवनात आपल्याला वेळ खूप कमी पडतो. साहजिकच स्वयंपाका मागचा वेळ पण आपण कमी करू बघतो. ऑफिस मधून दमून आल्यावर रेडी टू ईट पराठा मायक्रोवेव्ह मधे गरम करून खाणं त्यावेळी 'घरी' पराठा बनवण्यापेक्षा सोपं असतं.
- सहजतेने घरपोच गरम गरम मिळणारे पंजाबी, चायनीज व पिझ्झा सारखे जेवण.
- जागोजागी आकर्षक पॅकीन्ग मधे दिसणारे चिप्स व स्नॅक्स
- जंक फूड ची लोभाव्णारी चव व किंमत. उ.दा. 'मोठा पिझ्झा वर लहान मोफत', 'मिडीयम पिझ्झा वर पेस्ट्री मोफत'
- टी.व्ही., रेडियो, इन्टर्नेट व इतर माध्यमातून होणारे सतत जंक फूड चे मार्केटिंग.
अश्या कारणांना आपण बळी पडतो.
मग ह्यावर उपाय काय?
-आठवड्या भराचे दोन्ही वेळ चे जेवण व स्नॅक्स प्लॅन करून लिहून ठेवा. म्हणजे रविवारीच किती/काय फळं भाज्या आणायच्या आहेत ह्याचा अंदाज येईल आणि रोज 'आता जेवणाला काय करायचं' हा प्रश्न संकटासारखा समोर येणार नाही.
-घरातल्या 'सर्वांची' मदद घेऊन जास्तीत जास्त घरी स्वयंपाक करून खा.
-लहान मुलांप्रमाणेच आपल्या पण भुकेच्या वेळी लक्षात ठेवून त्यावेळी खायला एखादं फळ, चिवडा (घरी केलेला), चणे दाणे सोबत ठेवा.
- तुमच्या फ्रीज मधे फ्रोझन प्रोसेस्ड फूड, आईस्क्रीम असे पदार्थ आणून ठेवूच नका, म्हणजे आपोआप ते वेळी अवेळी खाण्याचा मोह होणार नाही.
प्रतिक्रिया
30 Apr 2011 - 5:47 pm | नन्दादीप
ए, पण आमच्या सारख्या बॅचलर लोकांच काय?? आम्ही काय करायच ते पण सांग ना...... फार फार उपकार होतील बघा तुमचे.
1 May 2011 - 4:12 pm | प्रकाश घाटपांडे
जंकफूड व ओबेसिटी यांचा फार जवळचा संबंध आहे. खर तर 'खादाड' लोकांना जंकफूड आवडते. ;)
एकूणच खाद्य संस्कृतीने आपल्या जीवनावर फारच पकड घेतली आहे. यातला अपरिहार्यतेचा भाग किती व सोयीचा भाग किती हे जो तोच ठरवू शकतो.
समजा जंकफूड घेउन फक्त राहिले व जेवण केलच नाही तर काय होईल?
30 Apr 2011 - 6:03 pm | नितिन थत्ते
लाडू, चिक्की, भेळ, चिवडा, मिठाई हे जंक फूड आहे का?
1 May 2011 - 5:22 pm | मन१
बराच मोठा होता.
कुणी तो परत कसा आणायचा सांगेल का?
गूगल कॅश मधुन मिळेल का?
--मनोबा.
30 Apr 2011 - 9:55 pm | चतुरंग
बनवलेले लाडू उदा. मुगाचा, रव्याचा, गूळ्-पोळीचा इ. सात्विक असतात. घरी बनवलेली भेळ, चिवडा हेही पोषकच. चिक्की सर्वसामान्यपणे चांगली - लोणावळ्याला हल्ली मिळणारी नव्हे - पुण्यात आलो की मी गणेशपेठेतल्या खडके चिक्कीवाले यांच्याकडून चिक्की घेऊन येतो. मस्तच असते.
बाजारु मिठाई फारशी बरी नव्हे - क्वचित कधी ठीक.
एकूण साखर, तूप्/तेलाचे अतिरिक्त प्रमाण असलेले गोड पदार्थ वाईटच. विकतचे तर आणखीन घातक कारण कुठे आणि कसे बनवलेले असतील सांगता येत नाही.
30 Apr 2011 - 6:22 pm | रेवती
लेखन आवडले.
घरगुती स्नॅक्स म्हणून तिखटमिठाच्या पुर्या, घारगे असे तळण चालेल काय?
फ्रॉस्टेड नसलेली सिरिय्ल्स कितपत बरी असतात?
30 Apr 2011 - 8:10 pm | इंटरनेटस्नेही
चान चान!
30 Apr 2011 - 8:25 pm | मन१
सगळेच लेख वाचतोय. काहिंना खाणं पिणं नीट सांभाळणं कटकट वाटते आहे.
त्यांना माझ्या परीने सुट्सुटित (कदाचित खर्चिक) उपाय सांगतो.
माझ्या रूम मेट्स पैकी मी व अ जुन एक असे बर्यापैकी खाण्याचे शौकिन आहोत. पण पुनः पुनः वडापाव, समोसा खायची आमच्यावर वेळ येत नाही. जाता येता आम्ही सफरचंद, केळी ,चिकु , द्राक्षे आणि
कुठलही सिझनल फळ आणत असतो.
अगदि हपिसातुन घरी येताना, कधी एखादी वस्तु आणायला बाहेर गेल्यावर.
हां, पण एकदा खाद्यपदार्थ घरात आला की तो संपला पाहिजे ह्याची मात्र काळजी घेतो. येता जाता ही फळं आम्ही खातो.
इतर काही खाण्याची मग आवश्यकता वाटत नाही. त्यातही कित्येकदा बाहेर काही खावसं वाटलच्,तर सरळ इथं "समुद्र" नावाचं चांगलं उपाहारगृह आहे. तिथं जातो. वर्षानुवर्षे बाहेर राहिल्यामुळं हाटेलातल्या
पंजाबी खाण्याचा आता सगळ्यांनाच कंटाळा आहे. मग आम्ही काय करतो? मस्त पैकी साधी दाल-खिचडी किंवा कढी-खिचडी ऑर्डर करतो. पोटभर खातो.
आणि अगदि साधी-सरळ चवीची ती खिचडी घरच्या मुगाच्या खिचडीची आठवण करुन देते.
कित्येकदा वीकांताला बाहेर गेलो तरी आमची आवडती ठिकाणं आहेत जे एम रोडावरचं "मथुरा" आणि नळ स्टॉप पेठांमधलं "गिरिजा". ही दोन्ही ठिकाणं "मराठी " चवीसाठी ओळखली जातात.
तिथं जाउन आम्ही यथेच्छ पिठलं-भाकरी, भरित भाकरी असले पदार्थ चापतो.
कधी सोलकढीवर आडवा हात मारतो. जिभेचे चोचले म्हणुन कोथिंबिर वड्याही मागवतो.
कधी केळकर संग्रहालयाच्या खालच्या "बापट उपहार गृहात" शिरतो. तिथलं उपवासाचं अनलिमिटेड ताट मागवुन तुटुन पडतो.
घराबाहेर राहुनही त्यामुळच कदाचित तब्येती ठणठणित आहेत आणि मागच्या चारेक वर्षात एकदाही सिक्-लीव्ह टाकावी लागली नाही.(एकदाच टाकली, पण तेव्हा कारण वेगळं होतं.)
मुळात होतं काय, की एकदा समोर मस्त मस्त फळ्ं दिसताहेत म्हटल्यावर, कुणालाही ती खाविशीच वाटतात. शिवाय सुरुवातीला मीच ती सगळ्यांना दिसतील अशी आणि हाताला लागतिल अशी ठेवली,
त्यामुळं सहजच दोस्तांनाही सवय लागली.आणि मग खाण्याची विशेष आवड!
आता कुणीही जाता येता आणत राहिल्यानं घर कधीच र्कामं नसतं. आणि आपसात उत्तम ताळमेळ असल्यानं आम्हीही दिसेल ते उचलतो, न विचारता.
अगदि, अगदि क्वचित महिन्यां-महिन्यांमधुन एखादेवेळेस मुद्दाम चवीसाठी म्हणुन एखादा समोसा, कचोरी, वडापाव खाल्ला जतो, इतकच. म्याक डी, पिझ्झा ह्या "मॉडर्न " म्हणवल्या जाणार्या गोष्टींची
तशीही विशेष अशी आवड नव्हतीच. मात्र हापिसातल्या पार्ट्यांमध्ये समोर आल्याच तर ह्या गोष्टी बिंधास पूर्णबम्ह म्हणुन सेवन करतो, कां कुं न करता. कधी सँडविचेस खायची वेळ आलीच तर शक्यतो "ब्राउन ब्रेड" पासुन बनवलेली, चॉकलेटी रंगाची सँडविचेसना प्राधान्य देतो.
भरीला भर म्हणजे घरात कुणी ना कुणी सुकामेवा आणुन ठेवलेला असतोच. जाता येता एखादा दाणा काजु-बदामाचा तोंडात टाकणं सुरु असतं. कधी कुणी खजुर आणत, सकाळी उठल्या बरोबर वाटुन टाकतं.
ह्या सगळ्या गोष्टी जरा लांबलचक, कंटाळवाण्या वाटतील, कधी आत्मप्रौढीच्या किंवा विचित्रही वाटु शकतील.
पण निदान त्या समोर आणल्यानं एखाद्याला चांगलं खाद्यान्न पर्याय म्हणुन उपलब्ध होतील असं वाटलं, म्हणुन इथं टंकतोय.
तर मंत्र तोच, पुन्हा सांगतो जाता येता फळ्म आणत रहा, आणलेली फळं खाउन संपतील ह्याची काळजी घ्या.
कधी कणीस भाजुन खा, कधी शहाळं पिउन बघा. दिवस मस्त जाईल. आयुष्यात धमाल कराल.
आता प्रश्न हे आम्हाला(आर्थिकदृष्ट्या) सहज परवडातं का? तर हो. "सहज" नाही. पण परवडतं. मुळात कुणालाच दारु-सिगारेटचं व्यसन नाही, मोठाल्या गाड्यांचा शौक नाही, तर खर्च करायचा तरी कुठे असा प्रश्न पडतो, आणि आम्ही तो असा सोडवतो.
पुन्हा एकदा, तिसर्यांदा सांगतो,
तर मंत्र तोच, पुन्हा सांगतो जाता येता फळ्ं आणत रहा, आणलेली फळं(सालीसकट) खाउन संपतील ह्याची काळजी घ्या.
कणीस भाजुन खा, पापड भाजुन खा, शहाळं पिउन बघा. शहाळं खाउन बघा.
--मनोबा.
30 Apr 2011 - 9:44 pm | सूर्यपुत्र
>>आणलेली फळं(सालीसकट) खाउन संपतील ह्याची काळजी घ्या.
चिक्कू, सफरचंद ठीक आहे. पण संत्री, मोसंबी आणि केळी पण? कठीणच आहे..... ;)
अमिताताई, जंक फूड चे व्यसन कसे घालवावे?
आणि मित्रांबरोबर अश्या (जंक) फूड पार्ट्या नाही केल्या, तर ते वाळीत टाकतील त्याचे काय?
-सूर्यपुत्र.
30 Apr 2011 - 10:25 pm | सुधीर१३७
>> >>>आणलेली फळं(सालीसकट) खाउन संपतील ह्याची काळजी घ्या.
|| >>>>>>>चिक्कू, सफरचंद ठीक आहे. पण संत्री, मोसंबी आणि केळी पण? कठीणच आहे.....
.................................. काय राव, सूर्यपुत्र असूनही हा प्रश्न पडावा? अहो, साधी गोष्ट आहे त्यांची साले वरील
सल्लागाराला पाठवून द्या, ते संपवतील , सवयीने.................... :wink:
1 May 2011 - 1:41 am | chipatakhdumdum
विषय काय चाललाय आणि सूर्यपुत्र काय प्रतिक्रिया देताहेत. यांच्या कोणी संत्री, मोसंबी आणि केळी यांची साल खाल्ली होती असा संशय येतोय. लिखीताचा sense बघा. मिपावर वेडझवे शब्दच्छल करुन स्वतःला शाणे म्हणवणारे हे एक वाढले.
1 May 2011 - 2:21 am | पंगा
मोसंबी आणि केळ्यांबद्दल कल्पना नाही, पण 'मार्मलेड' नावाचा प्रकार हा संत्र्यांच्या सालींपासून बनतो, असे ऐकलेले आहे.
अर्थात, सूर्यपुत्र यांच्या आप्तांपैकी कोणी 'मार्मलेड' खाल्ले होते किंवा नाही, याचा खुलासा खुद्द सूर्यपुत्रच करू शकतील.
अवांतर: गावाकडे 'मार्मलेड' हा प्रकार मिळत नसावा बहुधा. किंवा फारसे कोणी ऐकूनही नसावे.
3 May 2011 - 11:09 am | नरेशकुमार
अहो मि कित्येक वेळेला खाल्लेले आहे. माझी मिसेस करते अधुन मधुन. एक्दम खुप छान लागते. चव अशि जिभेवर रेंगाळते.
एके दिवशि फोटो टाकतो, हवेतर (रेसिपि सुद्धा) , मिसेसला विचारुन.
1 May 2011 - 12:09 am | प्राजु
उत्तम लेख!!
बघुया यातलं काय काय जमेल ते.
1 May 2011 - 12:17 am | पिवळा डांबिस
सद्भावनापूर्ण परंतु मिसळपाव या संकेतस्थळाच्या व्यक्तिमत्वाशी अत्यंत विसंगत असलेला लेख!!!!
तात्याने वाचला तर पुन्हा एकदा स्वतःचा हार घातलेला फोटो इथे छापेल!!!!!
:)
1 May 2011 - 1:41 pm | प्रभाकर पेठकर
आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.
आई-वडिलांना तथाकथित 'चिल्ड्रेन सायकॉलॉजी' जेवढी समजते त्याहून कितीतरी मोठ्या प्रमाणात लहान मुलांना 'आई-वडील सायकॉलॉजी' उपजत समजते. आपल्या रडण्या-ओरडण्याला सहन करण्याची सहनशक्ती आई जवळ किती आहे, केव्हा ती आपल्या बाबतीत हळवी असते, ह्याचे त्यांचे आडाखे पक्के असतात. प्रत्येक प्रसंग स्वतःच्या फायद्यात परावर्तीत करण्यात मुले वाकबगार असतात. आपल्या मनाचा कमकुवतपणा मुलांना हट्टी बनविण्यास कारणीभूत असतो असे मला वाटते.
दिवसभर काम करून दमलेलो असतो, घरी संपूर्ण स्वयंपाक करायला वेळ नसतो
इडली/डोशांचे तयार पिठ मिळते, थालिपिठाची तयार भाजणी मिळते, पोहे, सांजा, उपमा, धिरडी, भजी, व्हेज किंवा चिकन सँडविच, पावाचा उपमा, चिझ तवा सँडविच, ओन्यन सँडविच, सुट्टीच्या दिवशी तयार करून डीप फ्रिज मध्ये ठेवले असतील तर पॅटीस, कटलेट्स (आंतरजालावर पाककृती उपलब्ध आहेत) ओव्हन असेल तर गार्लिक ब्रेड, चिकन ओपन सँडविच इत्यादी अनेक पर्याय १५ मिनिटात घरच्याघरी करता येतात.
घरी करायचे नसेल तर बाहेर बर्गर, फ्रेंच फ्राईज्, पिझ्झा खाण्यापेक्षा दाक्षिणात्य तयार पदार्थ (इडली, डोसा इ),सुरळीच्या वड्या, अळूवड्या, मारी बिस्किटे, क्रॅकर्स आदी पदार्थ खाण्यास हरकत नसावी. ह्यातले कित्येक पदार्थ मुलांना आवडत नाहीत पण त्यांना जंक फुड मिळणार नाही (महिन्यातून एकदा द्यायला हरकत नाही) हा संदेश त्यांच्या पर्यंत यशस्वी पणे पोहोचवला (आणि आपणही पाळला) कि इतर गोष्टींचा तोंड वाकडे करत का होईना स्विकार होऊ लागतो.
सगळ्यांना माहित आहे की जंक फूड खाणं हेल्दी नसतं तरी पण ते पूर्णपणे टाळणं का अवघड होतं?
मनाचा कमकुवतपणा, आळस, खिशात खुळखुळणारा पैसा, (काहींच्या बाबतीत) आधुनिक जगात जगण्याच्या चुकीच्या कल्पना, ठेच लागे पर्यंत शाहणं न होण्याची प्रवृत्ती इ.इ.इ.
मग ह्यावर उपाय काय?
बरेचसे उपाय वर दिले आहेतच. त्या व्यतिरिक्त रोज ५ कि.मी. (४५ मिनिटात) चालावे. घरात पालेभाज्या (रोज संध्याकाळी ) भाकरी, फळं इ.इ.इ.चे सेवन असावे.
(वरील सर्व गोष्टी मला जमतातच असे नाही. पण प्रयत्न करतो ६०% यशस्वीही होतो. पण वजन ११५ किलो आहे हे सहज कळावे.)
2 May 2011 - 6:07 pm | सखी
प्रतिसाद आवडला :)
अमिता लेखही आवडला. काही प्रतिसादात वरती दिलेले आहेत तरी घरी करता येण्यासारखे अजुन कोणते पदार्थ (मधल्या वेळच्या खाण्यासाठी) असु शकतात?
2 May 2011 - 1:21 am | योगप्रभू
आजच्या मुलांमध्ये जंकफूडइतकीच कार्बोनेटेड शीतपेयांची जी क्रेझ आहे ती अधिक घातक आहे. टीव्हीवरील जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे आपलीही लाईफस्टाईल असावी, हा सोस या पिढीला रोगटपणा आणि अल्पायुष्याकडे ढकलत आहे.
ब्रिटनमधील एका विद्यापीठात तरुण पिढीच्या शीतपेय सेवनाबद्दल एक अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसून आले, की या कार्बोनेटेड शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण मानवी शरीराच्या रोजच्या गरजेहून कितीतरी अधिक आहे. बैठे काम, व्यायामाचा अभाव, जंकफूडमुळे वाढणारी चरबी आणि शीतपेयांतून शरीरात जाणारी अतिरिक्त शर्करा यामुळे तरुणांमध्ये प्रथम वजन वाढणे, पोट सुटणे ही लक्षणे दिसतात. लहान वयापासून सवय असेल तर लठ्ठ बालके जागोजागी आढळतात. अमेरिकेला या समस्येने ग्रासले आहे. अशा शीतपेयांच्या सेवनाने तरुणांमध्ये विशी-बावीशीतच मूतखड्याचा विकार वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. भारतात तर काय आनंदीआनंदच आहे. गूळ-पाणी, लिंबू सरबत, नीरा, शहाळ्याचे पाणी, ताजे ताक, कोकम सरबत किंवा फळांचा रस यापेक्षा लोकांना कार्बोनेटेड शीतपेयांचे आकर्षण जास्त आहे.
त्यामुळे जंकफूड + कार्बोनेटेड शीतपेये असे कॉम्बिनेशन आढळले, की आपण अकाली ह्रदयविकार अथवा मधुमेहाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवतोय, इतके लक्षात आले तरी पुरे.
2 May 2011 - 8:28 am | नितिन थत्ते
लिंबू सरबत आणि कोकम सरबतात साखरेचे प्रमाण कार्बोनेटेड शीतपेयापेक्षा कमी असते याविषयी माहिती देता येईल का?
स्थूलतेचे वाढते प्रमाण केवळ जंकफूड आणि शीतपेयांमुळे नसून बैठे काम करणारे लोक आणि कॉम्प्यूटरवर आणि टिव्हीसमोर वेळ घालवण्यामुळे देखील असावे.
मुतखड्याचा विकार शीतपेयांनी होत असू शकेल.
2 May 2011 - 11:11 am | योगप्रभू
<<लिंबू सरबत आणि कोकम सरबतात साखरेचे प्रमाण कार्बोनेटेड शीतपेयापेक्षा कमी असते याविषयी माहिती देता येईल का? >>
सरबते बनवण्याच्या प्रकारांवर त्यातील साखरेचे कमी-अधिक प्रमाण अवलंबून असते. उदाहरणार्थ - एखादी गृहिणी घरी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत बनवते तेव्हा साध्या पद्धतीने थंड पाणी +लिंबू रस/कोकम सीरप + साखर + किंचित मीठ घालते. साखर भरमसाट न घालता ती चमचाभर सरबत जिभेवर ठेऊन गोडसरपणा अजमावते. त्यामुळे गरजेइतकीच साखर सरबतात असते.
बाहेर हातगाडीवर सरबते विकणारे लोक साखरेचे संपृक्त सीरप वापरतात. हे सीरप बनवण्यासाठी पाण्यात साखर विरघळण्याचे थांबेपर्यंत घालत राहतात व ते द्रावण नंतर बाटलीत भरुन ठेवतात. त्यापेक्षाही सोपा उपाय म्हणजे ते सॅक्रिन वापरतात. पण अशा सरबतांतून किती साखर शरीरात जाते आहे, हे पिणार्याला कळत नाही.
कार्बोनेटेड शीतपेयांच्या बाबतीत मी ब्रिटीश संशोधनाचा संदर्भ दिला असला तरी भारतातील आकडेवारी माझ्याकडे नाही कारण बाटलीवर घटकांचा उल्लेख असला तरी त्यांचे प्रमाण नमूद केलेले असते का, हे माहीत नाही. मी स्वतः अशी कर्ब पेये पीत नाही त्यामुळे चिकित्सक अभ्यास केलेला नाही. मागे भारतीय शीतपेयांत तर कीटकनाशकांचे अंश सापडले होते.
(अवांतर - अनेक कार्यक्रमांत मी पाहिले आहे, की परदेशी अधिकारी /पाहुणे भारतात बनवलेले शीतपेय कधीच घेत नाहीत. एखादी कंपनी युरोपात आणि भारतात एकाच ब्रँडखाली पेय बनवत असली तरी ते लोक युरोपात/अमेरिकेत तयार झालेले पेयच पितात. मी एकाला याचे कारण विचारले होते तेव्हा त्याने आपल्याला अमेरिकन शीतपेयाच्या चवीची सवय मोडवत नसल्याचे सांगितले. वरकरणी हे पटण्यासारखे असेलही, पण ते लोक भारतात खाता-पिताना सावध असतात, एवढे मात्र निश्चित.)
2 May 2011 - 10:21 am | प्रभाकर पेठकर
बाहेरील शीतपेयांमध्ये एका डब्यात ८ चमचे साखर असते असे एकदा वाचले होते.म्हनजे एक पेप्सी किंवा कोकचा डबा म्हणजे ५ कप चहा किंवा कॉफी असे समीकरण मानावयास हरकत नाही. ह्या व्यतिरिक्त इतर खाद्यपदर्थतूनही (चहा, कॉफी, मिठाई,आईस्क्रिम, जेली, जॅम्स इ.) थेट (डायरेक्ट) आणि पिष्टमय पदार्थ्,फळं इ. मधून इन्डायरेक्ट साखर शरिरात जात असते.
2 May 2011 - 10:55 am | नितिन थत्ते
डबा = टिन = ३३० मिलि धरले तर डब्याला आठ चमचे साखर असण्याइतकी शीतपेये गोड लागत नाहीत.
2 May 2011 - 1:08 pm | प्रभाकर पेठकर
पेप्सी - कोला मध्ये पांढर्या साखरे बरोबर जाळीव साखर (कॅरमलाईझ्ड) असते. जाळीव साखरेची चव कडवट असल्याने तेवढी गोड लागत नाही. भारतात 'माझा मॅंगो' पिताना आपण साखरेचा पाक पितो आहोत कि काय अशी भावना होते.
2 May 2011 - 1:34 pm | नितिन थत्ते
फंटा, लिम्का वगैरेमध्ये जाळीव साखर नसावी आणि ती पेये सरबतापेक्षा गोड लागत नाहीत त्या अर्थी त्यात साखरेचे प्रमान चालेल एवढे (पक्षी-लिंबूसरबताएवढे) असावे का?
2 May 2011 - 2:24 pm | प्रभाकर पेठकर
ह्यावर माझे कांही संशोधन नाही. जी आहे ती वाचीव माहिती आहे. त्यामुळे ज्याने त्याने आपापली निर्णयक्षमता वापरावी हि विनंती.
2 May 2011 - 2:58 pm | नितिन थत्ते
हे ठीक आहे.
मग विशिष्ट क्याटेगरीला सिंगलऔट केले नाही तर बरे.
(पेठकरकाका, हे तुम्हाला उद्देशून नाही. जनरल शीतपेयांना बोटे मोडणार्यांना उद्देशून आहे).
4 May 2011 - 4:16 pm | योगप्रभू
पेठकरकाका,
तुम्ही चांगला तपशील दिलात. शीतपेये/कार्बोनेटेड शीतपेये यांच्यातील घटकांचा बारीक उहापोह करणारे लेख वाचनात आले. 'ग्राहकहित' मासिकाच्या चालू महिन्याच्या अंकात डॉ. वर्षा जोशी यांचा 'शीतपेये आणि सरबते : किती योग्य, किती अयोग्य?' हा लेख आणि अनुराधा मराठे यांचा ' यही है राईट चॉईस (?)' हे अत्यंत माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील काहीही मी येथे टाकत नाही कारण मिपाच्या धोरणाची जाणीव आहे.
पण दोन्ही लेखिकांची निरीक्षणे थोडक्यात नमूद करतो.
डॉ. जोशी : सर्व गोष्टी लक्षात घेतल्या की कळते की शीतपेय अजिबात न पिणे हीच गोष्ट सर्व दृष्टीने योग्य आहे. कधीतरी मित्रांबरोबर गंमत म्हणून घेतल्यास ठीक, पण तहान शमवण्यासाठी त्याचा वापर करुच नये.
अनुराधा मराठे : या उन्हाळ्यात आपल्या घरातून कृत्रिम शीतपेयांचे पूर्ण उच्चाटन करुया. नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वकरंडक सामन्यात 'निंबूज' पेयाची जाहिरात सतत दाखवली गेली. स्वास्थ्याविषयी जागरुक झालेल्या ग्राहकांनी कोला पेयांकडे फिरवलेली पाठ बलाढ्य कंपन्यांना लिंबू सरबताचे उत्पादन करायला भाग पाडत आहे.
पाणीपुरीवाल्याने मूत्रविसर्जन केलेल्या तांब्यातून ग्राहकांना पाणी प्यायला देणे आणि जाहिरातींचा मारा करुन अनारोग्यकारक पेये प्यायला ग्राहकांना प्रवृत्त करणे, या मानसिकतेत फारसे अंतर नाही.
त्यामुळे 'कृत्रिम शीतपेये पिणे हानीकारकच' या मतावर मी ठाम आहे.
(पेठकरकाका. हा प्रतिसाद तुम्हाला नाही बरं का. ज्यांना आहे ते समजतीलच.)
4 May 2011 - 8:01 pm | नितिन थत्ते
>>त्यामुळे 'कृत्रिम शीतपेये पिणे हानीकारकच' या मतावर मी ठाम आहे.
ठीक आहे.
>>ज्यांना आहे ते समजतीलच
काही माहिती सहित सांगितले तर जरूर समजतील. सदर लेखांचे दुवे मिळतील का?
.
.
.
.
.
(जिज्ञासू)
5 May 2011 - 12:32 am | योगप्रभू
ग्राहकहित हे मासिक केवळ छापील आवृत्तीत उपलब्ध आहे. ते जालावर नोंदले नसल्याने दुवे देता येत नाहीत. माझ्याकडे अंक आहे.
कृत्रिम शीतपेयांचा मुद्दा थोडा बाजूला राहू द्या. मला या लेखांतील काय आवडले, हे सांगतो. त्यात लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, आइस्ड टी यांच्यातील घटक, ते शरीरात गेल्यावर होणारे फायदे याचे बारकाईने वैज्ञानिक विश्लेषण आहे. या चर्चेतील काही प्रश्नांवर मला अभ्यासपूर्ण उत्तरे मिळाली.
पण या धाग्याचा मूळ विषय हा जंकफूड होता. प्रतिसादाच्या ओघात तो नको भरकटायला.
म्हणून मी थांबतो. गैरसमज नसावा.
5 May 2011 - 2:05 am | प्रभाकर पेठकर
शीतपेयातील नुसती साखर नाही तर त्यात वापरण्यात येणारे कृत्रीम रंग आणि इतर, कल्पना नाही काय काय हानिकारक गोष्टी असतात त्या पण, त्यामुळे मी तरी शीतपेयांपासून दूर आहे. त्याच बरोबर कृत्रीम रंग वापरलेले तंदूरी चिकन, मिठाया सुद्धा हानिकारकच.
काय खावे, काय प्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर कोणी अज्ञानाने काही गोष्टी करत असेल तर त्याच्या ज्ञानात भर पडावी आणि जे करायचे ते त्याने जाणतेपणी करावे हाच उद्देश.
5 May 2011 - 8:36 am | नितिन थत्ते
>>काय खावे, काय प्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर कोणी अज्ञानाने काही गोष्टी करत असेल तर त्याच्या ज्ञानात भर पडावी आणि जे करायचे ते त्याने जाणतेपणी करावे हाच उद्देश.
सहमत आहे. माझा पण तोच उद्देश. म्हणूनच सरसकट अमूक कॅटॅगरीतले (पक्षी- आधुनिक काळातले आणि 'तिकडून आलेले') पदार्थ वैट्ट आणि तमुक कॅटॅगरीतले पदार्थ (पक्षी= पारंपरिक आणि 'आपले') डोळे झाकून खा असा अंगठानियम (मराठी= थंबरूल) मांडायला नको
वरच्या उदाहरणांतला कृत्रिम रंगांचा मुद्दा मान्य. पण स्थूलपणा हा जर एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर कोक ऐवजी लिंबू सरबत प्यायल्याने आणि चॉकलेट ऐवजी चिक्की/बर्फी/लाडू खाण्याने स्थूलपणाचा प्रॉब्लेम मुळीच कमी होणार नाही इतकाच या प्रतिसाद मालिकेतला माझा उद्देश.
6 May 2011 - 11:34 am | प्रभाकर पेठकर
सरसकट अमूक कॅटॅगरीतले (पक्षी- आधुनिक काळातले आणि 'तिकडून आलेले') पदार्थ वैट्ट आणि तमुक कॅटॅगरीतले पदार्थ (पक्षी= पारंपरिक आणि 'आपले') डोळे झाकून खा असा अंगठानियम (मराठी= थंबरूल) मांडायला नको
शीत पेयांचे जागतिक स्तरावरचे जे जे ब्रँड आहेत ते त्यांच्या प्रचंड वितरणामुळे आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपापली पेये दिसायला आकर्षक असावित, टिकाऊ असावित, (कृत्रीमरित्या का होईना) स्वादिष्ट असावित, ग्राहकांना आपल्या उत्पादनाची चटक लागावी इत्यादी कारणांसाठी रंग आणि कोणती कोणती ठाऊक नाही पण रसायनं मिसळतात. कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, नारळाचे पाणी आदी पेयांमध्ये लहान आवाका असल्याकारणाने अशा रसायनांची गरज भासत नाही. (अपवाद रसना). 'आपले' डोळे झाकून खा/प्या असे कोणी म्हणत नाहिए. उलट जे खायचे/प्यायचे ते डोळे सताड उघडे ठेऊन खा/प्या. जर कोणाला कोक्/पेप्सी वगैरे तत्सम पेयांमध्ये कांही हानिकारक रसायनं आहेत असे वाटत नसेल त्यांनी अगदी मनमोकळेपणे कोक/पेप्सी प्यावा. पण ज्यांना कांही साशंकता असेल त्यांनी 'स्वतःचे' डोळे उघडे ठेवून वरील गोष्टींचा विचार करावा.
स्थूलपणा हा जर एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर कोक ऐवजी लिंबू सरबत प्यायल्याने आणि चॉकलेट ऐवजी चिक्की/बर्फी/लाडू खाण्याने स्थूलपणाचा प्रॉब्लेम मुळीच कमी होणार नाही.
स्थूलपणाचे कारण अतिरिक्त उष्मांक (कॅलरिज) हे असेल तर साखर नियंत्रण असावे. त्यामुळे 'सर्व' गोड पदार्थ वर्ज्य मानावेत. सहसा, मुलांचे चयापचय (मेटॅबॉलिझम) मोठ्यांपेक्षा जलद असते, शारीरिक हालचाल जास्त असते त्यामुळे उष्मांकांचे ज्वलन सुद्धा जास्त असते. तिथे, साखर हा वादाचा मुद्दा नसून हानिकारक रसायनं हा मुद्दा आहे. त्यामुळे वर सांगितल्या प्रमाणे पेप्सी/कोक ऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, नारळाचे पाणी अशा पर्यायांचा विचार व्हावा. चॉकलेटांमध्ये (कॅड्बरी वरील संशोधन) चॉकलेटचे स्लॅब बनवताना शिसे अर्थात लेड ह्या धातूचा उपयोग करतात. कॅडबरीत हे प्रमाण मानवी शरीराच्या सुरक्षेच्या दृष्टीने जेवढे प्रमाणीत केले आहे त्याच्या कितीतरी पट जास्त प्रमाणात आढळले होते. शरीरात शिसे अतिरिक्त झाल्यास अकाली केस गळणे, दृष्टीदोष (चष्मा) निर्माण होणे असे धोके संभवतात. हे त्या रिपोर्टमध्येच दिले होते. तरीपण आजकाल चष्मा आणि टक्कल 'कॉमन' आहे असे मानणार्यांनी चॉकलेट्स अति प्रमाणात खाण्यास हरकत नाही.
2 May 2011 - 4:38 am | स्वाती२
चांगला लेख!
श्री. पेठकर यांचा प्रतिसाद आवडला.
जंक फूडच्या बाबतीत पालकांनी काहीसे स्नॉबीश धोरण ठेवले तर मुले असे अन्न आपणहून नाकारतात हा माझा अनुभव! फ्राईज बेक केलेल्याच, चिकन नगेट ऐवजी ग्रील्ड चिकन, ज्युस १००% नो शुगर अॅडेड, चॉकलेट ६५% आणि वरचे, पॅन केक सिरप ऐवजी मेपल सिरप वगैरे नखरे आपणच करायचे. ग्रोसरी करताना देखील लेबल वाचायची नाटके करायची. फास्ट फूड खायला गेले की इतर कुठे खायला जायला वेळ नाही तेव्हा आता नाईलाजाने इथे खा असा आव आणायचा. एकदा मूल फूड स्नॉब झाले की आपल्याला फारसे काही करावे लागत नाही. घरी स्वयंपाक करताना मुलांना मदतीला घेतले तर नंतर तयार झालेला पदार्थ मुलं आवडीने खातात. आईसक्रिम, केक, चिप्स वगैरे स्पेशल ट्रीट म्हणूनच वापरावेत. महिन्यातून एकदा रविवारी दुपारी आईसक्रिम खायला किंवा एखादा शनिवार केक्/कुकी तयार करण्यासाठी राखून ठेवावा. अगदी खास रिचुअल सारखे हे करावे. जवळच्या व्यक्तींबरोबर खास करायची गोष्ट असे एकदा या पदार्थांकडे बघणे सुरु झाले की ऊठ सूठ हे पदार्थ मागणे आपोआप कमी होते. अगदी फ्रीजरमधे आईसक्रिम असले तरी त्याला हात लागत नाही.
2 May 2011 - 5:35 am | पंगा
बाकी सर्व ठीक आहे, पण या सर्व प्रकारासाठी 'स्नॉब', 'स्नॉबिश' वगैरे शब्दप्रयोग पटले नाहीत.
('फ्रीक' एक वेळ ठीक आहे. म्हणजे जंक फूडसुद्धा अधूनमधून, क्वचित खायला फारशी हरकत नसावी म्हणून. आणि तसेही 'फ्रीक'मध्ये निगेटिव असे कनोटेशन फारसे नसावे. पण 'स्नॉब'?
मुलांना जंक फूड कमी प्रमाणात खाण्याची, शक्यतो टाळण्याची सवय लावण्यात नेमके वाईट, 'स्नॉबिश' असे काय आहे? तेही आपल्याच मुलांना?)
2 May 2011 - 8:29 am | स्वाती२
जंक फूड न खाणे/ कमी खाणे हे आपल्या दृष्टीने कितीही छान असले तरी असे वागणार्यांकडे इतर फूड स्नॉब म्हणूनच बघतात, निदान मी राहाते तिथे तरी. जेव्हा स्कूल कॅफेटेरियात टीनएजरला ४ टाईपच्या फूड्लाईनमधून जेवणासाठी पदार्थ निवडायचे असतात तेव्हा डेली मीट नको म्हटल्यावर भुवया उंचावतात. आपल्यासाठी विशेष वाटत नसले तरी मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेल्यावर इतर सर्व सॉफ्ट ड्रिंक मागवतात तेव्हा 'जस्ट वॉटर, नो आईस' हे सांगणे १४ वर्षाच्या मुलासाठी खूप अवघड असते. हायस्कूलच्या जंगलात 'फ्रीक' म्हटले तर तुम्ही मेलात, फुड स्नॉब म्हणुन लोकं चालवून घेतात.
2 May 2011 - 6:41 pm | रेवती
'जस्ट वॉटर, नो आईस' हे सांगणे १४ वर्षाच्या मुलासाठी खूप अवघड असते.
अतिषय सहमत.
फक्त एवढेच नाही तर, आपण शाकाहारी आहोत याचीही लाज वाटते मग फार उत्तरे द्यायला लागू नयेत म्हणून मांसाहार करायला सुरुवात करतात.
3 May 2011 - 4:19 am | पंगा
इतर काही का म्हणेनात, पण म्हणून आपणच कशाला म्हणायचे?
हायस्कूलच्या जंगलात नव्हे, तर मिपावर म्हणण्याबद्दल म्हटले आहे.
(अवांतर शंका:
डेली मीटमध्ये नेमके काय वाईट असते? (म्हणजे 'जंक फूड' अशा अर्थी. धार्मिक/पारंपरिक कारणे वेगळी. ती असल्यास समजू शकतो.))
2 May 2011 - 6:33 am | प्रियाली
लेख चांगला आहे. अमेरिकेत ग्रोसरी खरेदी करताना भरलेल्या कार्टस बघून एका कुटुंबाला इतके खाणे का लागते असा प्रश्न पडतो. अर्थातच, असाच प्रश्न मागे भारतातल्या सुपरमार्केटातल्या ट्रॉली बघूनही पडला होता.
माझ्यामते अधूनमधून जंकफूड खायला हरकत नाही. केक, कुकी, चिकन नगेटस वगैरे प्रमाणात खाल्ले आणि जेवणाऐवजी न खाता एखादे दिवशी स्नॅक वगैरे म्हणून खाणे वाईट नाही. मुलांची हालचाल, धावपळ मोठ्यांपेक्षा अधिक असते त्यामुळे कॅलरी बर्नही अधिक होत असाव्या.
2 May 2011 - 2:41 pm | प्रभाकर पेठकर
मुलांची हालचाल, धावपळ मोठ्यांपेक्षा अधिक असते त्यामुळे कॅलरी बर्नही अधिक होत असाव्या
लहान वयात शारीरिक गरजेनुसार चयापचय क्रिया (मेटॅबोलिझम) जलद होत असते. तेंव्हा उष्मांकांचा (कॅलरीज) १०० टक्के वापर उर्जा निर्मिती साठी होतो. पण जसजसे वय वाढते तस तशी (आणि कामाच्या स्वरूपानुसार) तितक्या उर्जेची गरज नसते. पण अधिक उष्मांकांचे पदार्थ खायची सवय लागलेली असते त्या मुळे अतिरिक्त उष्मांकांचे चरबीत रुपांतर होते. वयोमानानुसार आणि गरजेनुसार आहारात बदल करणे सर्वांनाच जमत नाही. जीभ चवीला प्राधान्य देते आणि आपण चवीच्याच मोहात पडतो.
म्हणूनच, लहानपणापासूनच काय जास्त खावं, काय कमी खावं ह्याचे धडे मुलांना द्यावेत (आपल्या कृतीतून) म्हणजे भविष्यात त्यांना त्याचा फायदा होईल.
2 May 2011 - 5:19 pm | प्रियाली
वर स्वाती यांनी उत्तम सांगितले आहे. मुलांना सवय लागेपर्यंत जंकफूड खायला देऊ नये किंबहुना सवय लागेपर्यंत सहसा कोणत्याच गोष्टी खाऊ नयेत परंतु अधूनमधून, ट्रिट म्हणून द्यायला हवे. इतरांना मिळते पण मला कधीच मिळत नाही ही भावना मुलांमध्ये असुरक्षितता आणू शकते.
म्हणूनच जेवणाला पर्याय म्हणून जंकफूड देऊ नये परंतु अधूनमधून प्रमाणात जंकफूड द्यायला हरकत नसावी असे म्हटले आहे. सोबत त्याचे दुष्परिणामही मुलांना पटवता येतातच.
कॅलरी वगैरेचेच म्हणायचे झाले तर शुद्ध तुपातला बेसनाचा लाडू आणि साखरेत घोळवलेले डोनट यांत खूप फरक नसावा.
3 May 2011 - 4:42 am | Nile
जळ्ळ्यां त्या पालेभाज्याच खाउन जगायचं असेल तर जगायचंच कशाला म्हणतो मी? अरे षौक नाय करायचा तर काय भेंडीची भाजी करायची का जलमभर?? आणि वाढलं तुमचं आयुष्य थोडंफार पौष्टिक खाउन तर करणार काय तुम्ही त्या आयुष्यात तर पालेभाज्याच खाणार ना? चार दिसाची जिंदगानी लेको घ्या मजा करून.. कुठं ते कॅलरी फिलरीच्या नादी लागता...
निळू बर्वा
(वार्निंगः आमच्या कॅलर्या जाळायच्या कश्या हा प्रश्न आम्ही आमच्यापुरता सोडवलेला आहे, आमच्या प्रतिसादाचे अनुकरण आपापल्या जबाबदारीने करावे.) ;-)
4 May 2011 - 8:09 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती