काही दिवसापुर्वी मी लोकप्रभात आलेल्या पराग पाटील यांच्या नकारात्मक मतावर भाष्य करणार्या लेखावर माझा प्रतिसाद दिला होता .तोच प्रतिसाद येथे देत आहे.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हाच लेख आज प्रतिसादाच्या रुपाने का होइना लोकप्रभात प्रकाशीत झालेला आहे.आज आलेल्या अंकात तुम्ही तो वाचु शकता.
मुळ लेख-
http://www.loksatta.com/lokprabha/20090501/mind.htm
माझा प्रतिसाद-
http://www.loksatta.com/lokprabha/20090522/vachak.htm
होय, निगेटीव्हच....।
सध्या 'नकारात्मक मत' या विषयावर प्रचंड उहापोह, साधक-बाधक चर्चा सुरू आहे. अनेक मतमतांतरे आहेत. तेंव्हा 1-2 वर्षात मतदानाचा हक्क मिळणार असणारा एक तरूण म्हणून पराग पाटील यांच्या 'नाऊमेदीचं मत' वर तयार झालेली माझी काही मते देणे, हे निवडणूकांचं त्रयस्थ अवलोकन करायचा प्रयत्न करणारा एक तरूण आणि मध्यमवर्गाचा प्रतिनिधी या नात्याने करणे, हे माझे कर्तव्य समजतो.
'मध्यमवर्गीय मतदाराला हल्ली नापसंतीच्या मताचं फारच आकर्षण वाटायला लागलय.' हे मात्र नक्की! पण, हा बागलबुवा निवडणूकीवेळीच वर आला याचे कारण म्हणजे नेहमीप्रमाणे निवडणूकीबाबत सर्वच वर्गात असलेली उदासिनता पण यावेळी,''जागो रे'' ने सारा नूर पालटला. फक्त जाग येण्याला काहीही अर्थ नव्हता. कारण तशी जागृती दर निवडणूकीवेळी होतेच. पण, यावेळी वेगळे घडले ते असे की, लोक विचार करायला लागले. खरंतर, नेहमीप्रमाणे मतदाराना त्याच, त्याच लोकांना मत देण्यात रस नव्हता. मग, लोकांनी पर्याय शोधायला सुरवात केली आणि तेथुनच मग '49-0' बद्दल चर्चेस सुरू झाली. आणि, विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सुशिक्षीत तरूणांचा वावर असणा-या मराठी संकेतस्थळांवर याविषयी सांगोपांग चर्चा झाली. आणि, त्या मुद्दयाचा स्पर्श माझयासारख्या तरूणांना झाला.
पण हे अस का घडलं? नकारात्मक मताला महत्व का आलं? याचं कारण, म्हणजे मीडियात झालेल्या बदलामुळे कधी नव्हे ते पराग म्हणतात तसे 'क्लास अपार्ट' मध्यमवर्गाला मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा झाली. खरे तर ढोबळमानात जर का समाज तीन भागात विभागला तर पेज 3 वर फोटो येणारे काही लोक सोडले, तर बाकी श्रीमंत, अतीश्रीमंत लोक तुच्छ समजत असल्याने मतदान तर करत नाहीच. काही लोक, तर खाजगी उद्योगांना फुकटची सुट्टी म्हणुन चिडचिडच करतात. आणि, मध्यमवर्गीयाचे कोणाला मत द्यायचे ते ठरत नसल्याने मध्यमवर्गीय फक्त गावगप्पातच मन रमवतो. त्यामुळे, विशेष मतदान होते ते तळागाळातल्या समाजाचे आणि, मग अवैध मार्ग चोखाळले जातात. आणि, मग पुन्हा मध्यमवर्गीय, त्यांच सो कोल्ड सुशिक्षित मन या गोष्टी नाकारतं आणि, मग मतदानाबाबत त्याच्या मनाला किळस येते. हे सगळे एक दृष्टचक्र आहे. आणि त्याचा परिणाम अवघ्या४५-५० टक्के लोकांनी देशाचे नेते निवडण्यात होतो. पण यावेळी कधी नव्हे ते लोकांनी पुढाकार घेतला. अहो हे ही नसे थोडके। म्हणूनच, हा रोमॅटिसिझम नाही, याला वास्तवाची जाणीव म्हणणे जास्त योग्य ठरेल.
आता असा युक्तीवाद करता येतो की, नकारात्मक मतच का? ''दगडापेक्षा वीट मऊ'' असे म्हणून एखाद्या उमेदवारास मत का देत नाही. या प्रश्नाचे उत्तर देताना मध्यमवर्गीय मानसिकतेचा विचार करणे गरजेचे आहे. सहसा, पूर्वजांनी केलेल्या चुका टाळयावात. एवढे सामान्यज्ञान त्यांना आलेले असते. त्यामुळे, साहजिकच मतदान करताना ते विचार करतात. आणि, तेंव्हा त्यांच्या डोळयासमोर स्वच्छ चारित्र्याचे उमेदवारच दिसत नाहीत, मग, का म्हणून त्यांनी मतदान करावे? आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या माणसाला त्याने का मतदान करावे? कर्तव्य म्हणून! त्यामुळे, मतदान केले जात नाही. आणि स्वत: उभारायची हिंमत नसल्याने सिस्टिमला बोलण्याशिवाय दुसरे काहीच होत नाही. पण, निगेटिव्हव्हीटीमुळे त्यांना पर्याय मिळाला. पराग पाटील स्पर्धा परिक्षावेळी असणा-या 'यापैकी नाही' या पर्यायाचे उदाहरण देतात. पण लक्षात घ्या, की या पर्यायामुळे एक सर्वमान्य ऑप्शन ओपन राहतो. ज्या माणसाला काहीच येत नाही, अंदाज करायची ताकत नाही. तो सरळसरळ हा पर्याय निवडतो व काही वेळेला तो बरोबरही असतो. (तेच उत्तर असते) इथेही तसेच आहे. यामुळे, पेपर द्यायला घाबरणारी माणसेसुध्दा पेपर सोडवतात तसेच इथे घडणार होते. हा पळपूटेपणा नव्हता. वाईटातले चांगले शोधायला प्रयत्न होता.
या ऑप्शनचे परिणाम मात्र खूप चांगले झाले होते. मते देतात ती सामान्य माणसे आणि, त्यातला मोठा भाग पैसा देऊन विकत घेतला जातो. काळा पैसा पुन्हा समाजात येतो, पण त्याने काळी प्रवृत्ती वाढते. आणि, लोकप्रतिनिधी कामे करत नाहीत. केली, तरी त्यांचा केंद्रबिंदू तळागाळातला समाज हाच असतो. मध्यमवर्गीयांचा ते विचारच करत नाहीत. आणि, इथे मध्यमवर्गीय होरपळतो. कारण, मध्यमवर्गीयांना राजकीय सपोर्ट विकासासाठी आवश्यक असतो. श्रीमंतांना त्याची गरज नसते. पण, नकारात्मक मतदानामुळे मध्यमवर्गीयांकडे शक्ती येते. त्यांनी, समजा नकारात्मक मतदान केले, आणि ते जास्त भरले तर, तेथील सर्व उमेदवार निवडणूक हरणार आणि, याच आशयाची मागणी केली गेली. यामुळे उमेदवारांचा ऍटिटयुड बदलला असता. पैशाच्या जीवावर राजकारण करणे अवघड झाले असते. कारण, सहसा मध्यमवर्गीय हजाराच्या नोटेला भूलत नाही. हा अनुभव आहे. नकारात्मक मतदान असे बदल घडवू शकते. ही त्याची ताकत आहे. आणि काही प्रमाणात या वर्गाने ती ओळखली होती.
आऊटसाईडर असल्यचा ऍटिटयुड होता,हे मान्य . पण तो बदलतोय. परिस्थितीने त्यांना आऊटसाईडर बनवले होते. पण, काही प्रमाणात का होईना, ते ही परिस्थितीच बदलायचा प्रयत्न करत आहेत. नकारात्मक मतदानदेखील त्यांना काही घरी बसुन करता येत नाही. म्हणूनच, त्यांनी घेतलेली पवित्रा योग्यच आहे. आणि हो, नकारात्मक मानसिकता नाहीच नाही. तो पॉझिटिव्ह ऍटिटयुडच आहे. फक्त त्याला नकारात्मकतेचं अंग आहे. यातुन चळवळ उभी राहायची शक्यता आहे वा नाही, तो भाग अलहिदा. कदाचित उभी राहणारी नाही. पण, जसजसे असे मतदान वाढेल, तसा आपोआपच उमेदवारांवर तो परिणाम होईल, त्याला वेगळी चळवळ नकोच आहे. पण, असा बदल होणारच नाही असे घरून बसून आपण प्रयत्नच केला नाही, तर मग लोकशाहीचा अर्थ काय?
राजकीय पक्ष याला भीड घालणार नाहीत, हे म्हणणे पटण्याजोगे नाही. कारण, त्यांचे राजकारण खुर्चीशी निगडीत आहे. आणि, त्याला एकन एक सीट महत्वाची आहे. तेंव्हा, अशी निगेटीव्ह व्होटींगने एकजरी सीट पडली. तरी ते जागे होतील, नाही, त्यांना जागे व्हावेच लागेल. आणि, गरिबांचे सहा महिने जर निवडणूकीत मिळणा-या पैशावर जात असतील. तर त्यांनी तो प्रयोगही करू नये. पण, ज्यांचचं दैनंदीन जगणं त्या पैशावर अवलंबून नाही त्यांनी असं वागायला हरकत काय?
आता उरतो प्रश्न याला चंगळवाद किंवा ऑप्शन म्हणण्याचा. नाही, हा चंगळवाद नाही, ही गरज आहे. लोकांना नवे पाहिजे हे खरं, पण तो ऑप्शन नाही. अहो, या माणसांनी पूर्वी खरेदीच केलेले नाही. मग, हा ऑप्शन कसा. त्यामूळे नकारात्मक मतदान ही आजची सामान्याची आणि परिस्थितीची गरज आहे फक्त!
शेवटी या सगळयाचं सार असं की, नकारात्मक मतदान असावं कारण कितीही चर्चा झाली, तरी समोरचा कोणीही लायक नाही. असं सांगायचा तो लोकशाही हक्क आहे. तेंव्हा हा अधिकार असावा, आणि लोकांनी मतदान केंद्रात येऊनच तसे मत द्यावे आणि जर निवडून आलेल्या मत उमेदवाराला जे मताधिक्य मिळेल, त्यापेक्षा एकजरी नकारात्मक मत जास्त आलं तरं! ती निवडच रद्द ठरवावी. तर त्या नकारात्मक मताला अर्थ राहील. आणि हो, सर्व प्रसारमाध्यमांनीदेखील ही कॅंपेन जोरात राबवावी. एक वेगळा प्रयत्न म्हणून सर्वांनी त्याला सहकार्य केल्यास त्याचा योग्य परिणाम नक्कीच होईल. कारण शेवटी तो मध्यमवर्गाच्या व्हॅल्युएबल कमताचा प्रश्न आहे. निवडणूक आयोग ज्यावर दरडोई 300/- रूपये खर्च करतं ते मध्यमवर्गाचं मत, आणि हो आता तो मतदानाला बाहेर पडतोय, कारण काही का असेना तो बाहेर पडतोय आणि म्हणूनच ते मत आहे, उमेदीचं मत, काहीतरी बदल होईल या उमेदीचं.....
प्रतिक्रिया
15 May 2009 - 12:28 pm | विसोबा खेचर
(प्रतिसाद रुपाने का होइना एवढ्या मोठ्या अखील महाराष्ट्रात जाणार्या साप्ताहिकाने माझी दखल घ्यावी हे ही नसे थोडके,असे मला वाटते.
शाब्बास रे विनायका..
तुझं अभिनंदन.. :)
आता काय बॉ, तू मोठा पत्रलेखक/लेखक झालस. पण माझ्यासारख्या मोडक्यातोडक्या लेखकाला विसरू नकोस हो! :)
बाकी, राजकारण हा माझ्या आवाक्याबाहेरचा, बुद्धीपलिकडचा विषय आहे त्यामुळे त्यावर अधिक काही भाष्य करू शकत नाही..
तात्या.
15 May 2009 - 12:32 pm | अवलिया
हेच म्हणतो :)
तुझं अभिनंदन.. =D>
--अवलिया
15 May 2009 - 12:58 pm | क्लिंटन
विनायका,
हार्दिक अभिनंदन.मी तुझा मूळ प्रतिसाद वाचून प्रतिसाद देतोच पण तुझे आधी अभिनंदन करावे यासाठी लागलीच हे लिहित आहे.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
15 May 2009 - 1:19 pm | सहज
अभिनंदन!
15 May 2009 - 12:38 pm | यशोधरा
अभिनंदन!
15 May 2009 - 12:50 pm | दिपक
अभिनंदन रे विनायका.. पुढील अशाच उत्तम लि़खाणासाठी शुभेच्छा. :)
15 May 2009 - 1:21 pm | वेताळ
परत एकदा अभिनंदन.....तुझ्या लिखाणाची दखल लोकसत्ताने घेतली आहे म्हणजे इथुन पुढे तुला जबाबदारीने लिहायला हवे.देव तुला सुयश देवो.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
15 May 2009 - 4:28 pm | योगी९००
एकदम छान...!!!
तुझा प्रतिसाद सुरेखच...!!! मला खुप आवडला..
तुझ्या लिखाणाची दखल लोकसत्ताने घेतली आहे म्हणजे इथुन पुढे तुला जबाबदारीने लिहायला हवे..
या गोष्टीची आता मला खात्री आहे. तू आता जबाबदारीनेच लिहितोस..
देव तुला उत्तम यश देवो.
खादाडमाऊ
15 May 2009 - 4:47 pm | इनोबा म्हणे
शाब्बास रे कोदा, तुझा प्रतिसादरुपी लेख आवडला.
कुणी कितीही चेष्टा केली तरी तु लिहीते रहावे हीच विनंती.
15 May 2009 - 4:51 pm | छोटा डॉन
विनायका, तुझे कौतुक करावेसे वाटते.
लेख आवडला, विचरही पटले ...
तु बिनधास्त लिहीत रहा, आम्हे आहोत ४ कौतुकाचे शब्द लिहायला.
जबाबदारी वाढली आहे आता, वेळप्रसगी आम्ही आसुड उगारायला कमी करणार नाही, असेच छान छान लिहीत रहा ...
विडंबनाची काळजी नको करुस, ते काय फातर महत्वाचे आणि गंभीर आहे असे माझे मत नाही ...
पुलेशु ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
15 May 2009 - 4:59 pm | धमाल मुलगा
असेच म्हणतो.
सोबतच केलेली टीका फक्त सकारात्मकतेने घेणे इतक्यावरच न थांबता त्यातून आपल्याला काय नविन सुधारणा करता येतील ह्याकडेही जरुर लक्ष दे.
शुभेच्छा!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
21 May 2009 - 3:00 pm | आनंदयात्री
असेच म्हणतो.
16 May 2009 - 4:33 am | धनंजय
हार्दिक अभिनंदन!
विनायक म्हणतात :
आणि अशा रद्द निवडणुकीनंतर सरकार कोणी चालवावे - पूर्वीच्या सत्ताधार्यांनी? पण तेसुद्धा तर निवडणूक हरलेच आहेत. त्यांना राहू दिले तर नकारात्मक मताची काय किंमत राहिली?
की राष्ट्रपती शासन लागू - राष्ट्रपतीला कोणी निवडून दिले आहे? नकार दिलेल्या सरकारनेच ना? राष्ट्रपतीला पंतप्रधानांशिवाय राज्य करू द्यायची पद्धत तरी घटनेत आहे का? (अगदी आणीबाणीतही पंतप्रधानच राष्ट्रपतीच्या नावे सत्ता चालवत असतो.)
की हा पर्याय : जितक्या लोकसभा जागा भरल्या त्यांतल्या त्यांत पंतप्रधान निवडावा. मग महाराष्ट्रातल्या बर्याचशा जागा नकारात्मक निवडीने रिकाम्या राहिल्या तर उरलेल्या राज्यांच्या प्रतिनिधींकडून पंतप्रधान निवडलेला तो चालेल.
की नवीन निवडणूक होईपर्यंत सरकार बरखास्त करावे, आणि सरकारच असू नये? म्हणजे नको असलेल्या उमेदवारांपेक्षा अराजक बरे? ही विचारातली घोडचूक आहे.
स्वतःच्या अनुकूल उमेदवार उभा करून जिंकायची धमक नाही, आणि दुसर्यांनी उभे केलेले उमेदवार चालतही नाहीत... अशा कर्मशून्य आणि विघ्नसंतोषी लोकांना बरे वाटण्यासाठी हा नकारात्मक मताचा उदोउदो चालतो.
अर्थात विनायक हे तडफदार नव्या दमाचे लेखक आहेत. ते कर्मशून्य नाहीत कारण त्यांच्या कार्याची कित्येक दशके त्यांच्या पुढ्यात आहेत. तारुण्यात घातक विचारांशी खेळणे, आक्रसताळेपणा करणे, हे वयास अनुरूपच आहे. अशा ऊहापोहातूनच त्यांचे विचार प्रगल्भ होत आहेत. तरी असल्या लोकशाहीघातक विचारांच्या व्यूहात थोडाच वेळ गुरफटावे. लवकरच विनायक यांनी ते दुष्ट व्यूह फोडून बाहेर यावे. त्यांनी स्वतः आदर्श लोकप्रतिनिधी कसा जिंकू शकतो, त्याचा पायंडा घालावा. त्यांचा आदर्शवाद सकारात्मक वळणाला लागो, ही हार्दिक शुभेच्छा.
16 May 2009 - 2:55 pm | विनायक पाचलग
आपल्या प्रतिसादातेल सर्व मुद्दे मला पटले.
स्पष्टच सांगायचे झाले तर तुम्ही मांडलेल्या मुद्याचा मी विचारच केला नव्हता.
त्यामुळे आता त्याला लवकर उत्तर देणे शक्य नाही.
पण आता जरी नेते निवडले जात असले तरी ते तरी सार्वमताने कोठे निवडले जातात
३५-४० % लोकानी निवडलेले नेते सर्वमान्य कसे?
प्रश्न उरतो तो राज्य कोणी चालवायचे याचा.
खरेतर भारतात नोकरशाही ही जी पद्धत आहे ,ती ही सगळी कामे करण्यास समर्थ आहे.
नाहीतरी बरेचशे निर्णय तेच घेत असतात ना,
मग निदान आता त्याना पुर्ण स्वातंत्र्य तरी मिळेल .
आणि ही चुक जनतेची आहे,पहिल्यांदा मतदानाला बाहेर पडायचे नाही ,दिले तर पैसे घेवुन
या सगळ्यापेक्षा नकारात्मक मत बरे.
आणि मग महाराष्ट्रातले कोण आले नाही त्याला चुक त्यांचीच.
मग जे काही निवडुन येतील त्याना पुर्ण हक्क दिला जावा,त्यामुळे सचीन पायलट सारख्या लोकांचे चांगले होइल.
असो.
(हा प्रतिसाद तात्काळ दिला आहे.धनंजय यानी मांडलेला मुद्दा गंभीर असुन त्यावर अधीक विचार करणे गरजेचे आहे,त्यामुळे या विषयावर योग्य प्रतिसाद नंतर देइल्,आताचा प्रतिसाद हा प्रतिक्षीप्त समजावा.
निकालाबाबत- यावेळचे निकाल मला व्यक्तीशः आवडलेले नाहीत. पण मुंबैत ज्या प्रकारे मतविभाजन झाले ते बर्यापैकी एकविचारी असलेल्या गटांसाठी योग्य नाही असे राहुन राहुन वाटते.
कोल्हापुरात व्यक्तीकेंद्रीत निवडणुकीमुळे आत्ताच्या घडीला मंडलीक आणि रजु शेट्टी यांचा विजय निश्चीत वाटतो.)
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
विनायक पाचलग
16 May 2009 - 6:51 am | सँडी
अभिनंदन! शुभेच्छा!
-संदीप.
काय'द्याच बोला.
21 May 2009 - 2:53 pm | मिहिर
अभिनंदन.
काही मुद्दे खटकले.
१. लोकप्रतिनिधी कामे करत नाहीत. केली, तरी त्यांचा केंद्रबिंदू तळागाळातला समाज हाच असतो. मध्यमवर्गीयांचा ते विचारच करत नाहीत
लोकप्रतिनिधी उलट धनदांडग्यांसाठी काम करतात. तळागाळातील लोकांसाठी खरोखर काम केले आहे अशा राजकारण्यांची नावे सांग पाहू.
२. खरेतर भारतात नोकरशाही ही जी पद्धत आहे ,ती ही सगळी कामे करण्यास समर्थ आहे.
नाहीतरी बरेचशे निर्णय तेच घेत असतात ना,
नोकरशाही पूर्णपणे समर्थ असती तर भारत कुठल्या कुठे पोहोचला असता. निर्णय राजकारण्यांकडून घेतले जातात, नोकरशाहीने त्याची अंमलबजावणी करायची असते.
30 May 2009 - 2:06 pm | विनायक पाचलग
बर्याच दिवसाने मिपावर आल्याने आज प्रतिसाद पाहिले.
या सर्व मुद्यांवर जरुर विचार करीन.आभार
अवांतर्-मध्यंतरी मी मनाच्या कुपितले हे सदर लिहिले होते.या सदराचा बॅकअप येथे उपलब्ध आहे ,एकदा जरुर नजर टाकावी
(सध्या मिपा बंड पडत आहे,हा प्रश्न तात्यानी सोडवलेला आहे,पण चुकुन काही झालेच(अशी शक्यता कमीच्)तर लिखाण शाबुत रहावे म्हणुन हा उपद्व्याप, बाकी काही नाही
विनायक पाचलग
मेकओव्हर