✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)

A
Anand More यांनी
Tue, 02/23/2016 - 22:53  ·  लेख
लेख
भाग १ भाग २ ------------- जुनागढ हे आजच्या गुजरात मधील एक संस्थान. इथल्या नवाबाने १५ ऑगस्ट १९४७ ला माउंटबॅटनच्या भौगोलिक जवळिकीचा सिद्धांत धुडकावून लावत पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. युक्तिवाद होता, समुद्रमार्गे पाकिस्तान जवळ आहे. मंगरूळ आणि बाबरीवाडा हे जुनागढचे दोन अंकित प्रदेश होते. त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या इच्छेप्रमाणे पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. म्हणून नवाबाने या दोन प्रदेशात आपले सैन्य पाठवले. त्यामुळे आजूबाजूची इतर संस्थाने खवळली आणि त्यानी आपापले सैन्य जुनागढच्या सीमेवर नेवून भारतीय सरकारला साकडे घातले. आणि जुनागढ मध्ये एक अस्थायी सरकार देखील स्थापण्यात आले. भौगोलिक जवळीक नसताना पाकिस्तानात जाण्याचा जुनागढचा हट्ट मान्य केला तर ते भारताला त्रासदायक ठरू शकते, हे उमगून भारतीय सरकारने नवाबाचा पाकिस्तानात सामील होण्याचा हक्क नाकारला. ९६% जनता हिंदू आहे याकडे लक्ष वेधत तेथे जनमत घ्यावे अशी मागणी भारतीय सरकारने केली. भारताने जुनागढचा इंधनाचा पुरवठा बंद केला आणि टपाल सेवा ठप्प केली. जुनागढच्या सीमेवर सैन्य नेले. मंगरूळ आणि बाबरीवडा या जुनागढच्या अंकित प्रदेशाला भारतात सामावून घेतले. जनमत घेण्याला पाकिस्तानने होकार दिला पण अट घातली की जुनागढच्या सीमेवरील भारतीय सैन्य मागे घेतले जावे. २६ ऑक्टोबर १९४७ला नवाब कुटुंबासहित पाकिस्तानला निघून गेला. ७ नोव्हेंबर १९४७ला जुनागढ च्या कोर्टाने जुनागढच्या दिवाणामार्फत भारताला व्यवस्था नियंत्रणासाठी बोलावले. पाकिस्तानच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत भारताने ते निमंत्रण स्वीकारले. ९ नोव्हेंबरला पाकिस्तानात झालेले सामीलीकरण धुडकावण्यात आले. १० नोव्हेंबर १९४७ला भारतात विलीनीकरण व्हावे असा निर्णय घेण्यात आला. कुठल्याही आंतरराष्ट्रीय देखरेखीशिवाय २४ फेब्रुवारी १९४८ ला जुनागढमध्ये जनमत घेण्यात आले. आणि २५ फेब्रुवारी १९४८ ला जुनागढ चे भारतात विलीनीकरण अधिकृत झाले. भौगोलिक जवळीकीत सागरी संपर्क महत्वाचा नाही आणि राजमतापेक्षा जनमत महत्वाचे असे दोन सिद्धांत वापरले गेले आणि जुनागढच्या विलीनीकरणाचा प्रश्न सुटला. या सगळ्यात भारतीय नेत्यांची भूमिका तटस्थ होती असे मानायला लागणारे भाबडे मन माझ्याकडे नाही. सैन्य सीमेवर नेणे, इंधन पुरवठा बंद करणे, टपालसेवा खंडित करणे हे तर भारताने घेतलेले दृश्य निर्णय होते. याशिवाय जुनागढ भारतात विलीन व्हावे यासाठी भारताने जनमत तयार करण्यास अजिबात प्रयत्न केला नसेल असे मी मानत नाही. हैदराबादच्या विलीनीकरणाची गोष्टच वेगळी. हे भारतातले सर्वात मोठे, सर्वात श्रीमंत आणि आधुनिक भारताच्या भौगोलिक हृदयस्थानी वसलेले संस्थान होते. त्याची स्वतःची रेल्वे विमान आणि टपाल सेवा होती. स्वतःचे सैन्य देखील होते. संस्थान मुसलमान शासकाचे असले तरी रयत मुखत्वे हिंदू होती. प्रमाण जवळपास एका मुसलमानासमोर आठ हिंदू असे होते. १९३० पासून आर्य समाजाने तिथे हिंदूंच्या सत्ता सहभागासाठी आग्रह धरला होता. त्याला हैदराबाद काँग्रेस आणि हिंदू महासभेचा पाठींबा होता. १९३८ पर्यंत या सर्वांवर निजामाने नियंत्रण मिळवले होते. निजामाने भारतात किंवा पाकिस्तानात कुठेही सामील न होण्याचा निर्णय घेतला. ११ जून १९४७ ला त्याने तसा जाहीरनामा काढला. तर ९ जुलै १९४७ ला त्याने ब्रिटीश राजदूताकरवी हैदराबादला डोमिनीयन स्टेटस (ब्रिटीश राजाशी संलग्न असलेले स्वायत्त राज्य) ची मागणी केली. हैदराबाद भारतात सामील करण्यास सर्व भारतीय नेते उत्सुक होते. निजाम भारत किंवा पाकिस्तान यापैकी कुठेही सामील होण्यास अनुत्सुक होता. हैदराबाद चारही बाजूंनी भारतीय भूभागाने वेढलेला होता. म्हणून या अवघड परिस्थितीत स्वायत्त राज्याच्या मागणीवर कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. याउलट,२९ नोव्हेंबर १९४७ ला निजाम आणि भारत सरकार मध्ये "जैसे-थे करार" झाला. तो एक वर्षासाठी बंधनकारक होता. या करारमध्ये ठरल्याप्रमाणे, कुठलाही तंटा दोन्ही बाजूनी नेमलेल्या लवादांनी आणि त्यांच्या पंचानी सोडवण्याचे मान्य केले गेले. निजामाचे सैन्य तुटपुंजे होते, अवघे २४,००० त्यातही केवळ ६,००० प्रशिक्षित होते. संस्थानातील कुरबुरींना तोंड देण्यासाठी सैन्याच्या धर्तीवर हैदराबादच्या निजामाने रझाकार नावाची संस्था चालू केली होती. रझाकारांनी आणि अफगाणी लढवय्यांच्या दीनदार या फौजेने हैदराबाद मधील, भारतात विलीनीकरणासाठी प्रयत्नशील लोकांवर हल्ला चढवला. अनेकांची घरे, संपत्ती, अब्रू लुटली गेली. घरे सोडून भारतात पळून आलेल्या लोकांनी पुन्हा हैदराबादमध्ये लुटालूट सुरू केली. त्यामुळे प्रकरण चिघळू लागले. रझाकारांची कारवाई मग हैदराबाद सीमेलगतच्या ७० च्या आसपास भारतीय गावातून देखील होऊ लागली. हा भारतीय भूमीवरचा हल्ला होता. २१ ऑगस्ट १९४८ ला हैदराबादच्या सचिवाने युनायटेड नेशन्स च्या सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात या वादात लक्ष घालण्यास सांगितले. ४ सप्टेंबर १९४८ ला हैदराबादच्या पंतप्रधानांनी युनायटेड नेशन्स चे त्याकाळचे मुख्यालय असलेल्या लेक सक्सेस ला आपले प्रतिनिधी मंडळ पाठवीत असल्याची घोषणा केली. निजामाने ब्रिटीश पार्लमेंट आणि ब्रिटीश राजघराण्याकडे जुन्या करारांच्या आणि वचनांच्या पूर्तीची मागणी केली. पण या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. विन्स्टन चर्चिल आणि कंझर्व्हेटिव्ह पक्ष सोडल्यास निजामाबद्दल कुणाला सहानुभूती नव्हती आणि ही सहानुभूतीदेखील काही कामाची नव्हती. १३ सप्टेंबर १९४८ ला सकाळी ४:०० वाजता, भारतीय सैन्याने हैदराबादवर सर्व दिशांनी आक्रमण केले. त्याच दिवशी हैदराबादच्या सचिवाने युनायटेड नेशन्स च्या सुरक्षा परिषदेला तार पाठवली. पण तिची दखल १६ सप्टेंबर १९४८ ला पॅरिसमध्ये घेण्यात आली. सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये हैदराबादच्या प्रतिनिधींनी "जैसे - थे" कराराच्या अटींचा भारताने भंग केला आहे याकडे लक्ष वेधले. पण सुरक्षा परिषदेचा निर्णय व्हायच्या आधी १७ सप्टेंबर १९४८ ला संध्याकाळी ५:०० वाजता निजामाने पांढरे निशाण फडकवले. हैदराबाद भारतात विलीन झाले. हैदराबादच्या हिंदू नागरिकांनी याचे स्वागत केले तर मुस्लिमांना हे विलीनीकरण बेकायदेशीर वाटत होते. अनेक मुस्लिम कुटुंबे तेंव्हा हैदराबाद सोडून पाकिस्तानात जाऊन कराचीला स्थाईक झाली. जुनागढ प्रमाणे इथेही हिंदू प्रजा आणि मुस्लिम राजा होता. राजा स्वतंत्र राहण्याचे स्वप्न बघत होता, तर प्रजा भारतात यायला उत्सुक होती. राजाने स्वतःच्या प्रजेवर, भारतात सामील होण्याची इच्छा धरणे म्हणजे राजद्रोह समजून जुलूम चालू केला होता. त्याच्या रझाकारांची कारवाई भारतीय हद्दीत देखील घडू लागली होती. म्हणून भारतीय सैन्याने चढाई करून त्याचे राज्य जिंकून घेतले होते. कुठल्याही प्रकारे बघितले तरी हे एका लोकशाही देशाने दुसऱ्या राजेशाही देशावर केलेले आक्रमण आणि त्याचा पराभव करून, त्याचा भूभाग बळकवण्याचा प्रकार होता. त्यातील जुलूम आणि बेकायदेशीरपणा झाकला जाण्याचे कारण म्हणजे तेथील बहुसंख्य जनतेने ब्रिटीशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेला होता आणि ब्रिटीश गेल्यानंतर त्याना इतर भारतीय लोकांप्रमाणे स्वतंत्र लोकशाही मध्ये नांदायचे होते. त्यांच्या निजामाच्या राजेशाही मध्ये नांदणे त्यांना नको होते. इथे जनमत वगैरेची गरज नव्हती. भूमी जिंकलेली होती. ज्यांना हे पटलेले नव्हते ते भूमी सोडून निघून गेले होते. पंडित नेहरू या कारवाईला तिच्या बेकायदेशीरपणामुळे आणि पाकिस्तानच्या संभाव्य प्रतिकूल उत्तरामुळे उत्सुक नव्हते. परंतु सरदार वल्लभभाई पटेलांनी भारतचे बाल्कनायझेशन न होऊ देणे हा प्रमुख उद्देश लावून धरल्यामुळे शेवटी भारत सरकारने ही कारवाई केली. तीन पैकी दोन संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सुटला होता. देश नावाचे हार्डवेअर एकसंध होत चालले होते. तर घटनाधारीत राष्ट्राचे सॉफ्टवेअर मनात कसे रुजेल ते अजून स्पष्ट होत नव्हते. आता राहिले काश्मीर. भारताच्या अधिकृत नकाशात जो तुर्रेबाज मुगुटासारखा भाग दिसतो त्यांना आजची नावे वापरायची झाली तर काश्मीरचे खोरे, जम्मू, लडाख, पाकव्याप्त आझाद काश्मीर, गिलगिट, बाल्टीस्तान, अक्साई चीन आणि काराकोरम असा सर्व भूभाग मिळून हे संस्थान बनले होते. आपण त्याला सोयीसाठी काश्मीर संस्थान म्हणूया. याचा राजा होता हरिसिंग. हिंदू राजाच्या या संस्थानात प्रजा होती, ७७% मुस्लिम, २०% हिंदू आणि उरलेले ३% बौद्ध व शीख. त्याशिवाय हे सीमेवरचे संस्थान होते. त्यामुळे त्याला भारत किंवा पाकिस्तान यापैकी कुठल्याही एकाची निवड करण्यास पूर्ण मुभा होती. पण हरिसिंगने काश्मीर स्वतंत्र ठेवायचे ठरवले. त्याने पाकिस्तान बरोबर जैसे थे करार पण केला. भारताबरोबर असा कुठला करार केला नाही. जीनांच्या दृष्टीने याचा अर्थ, काश्मीर झाले तर पाकिस्तानात विलीन होणार होते. पण हरिसिंग पाकिस्तानात येईल अशी चिन्हे दिसेनात. १५ ऑगस्ट उलटून गेला होता. इकडे जुनागढ पाकिस्तानच्या हातातून निसटणार आहे हे स्पष्ट होऊ लागले होते (२६ ऑक्टोबर १९४७ ला जुनागढ चा नवाब कुटुंबासहित पाकिस्तानला निघून गेला होता हे आपण वर पहिलेच आहे. म्हणजे १५ ऑगस्ट तो २६ ऑक्टोबर या काळात पाकिस्तान जुनागढ मध्ये पिछाडीवर पडत चालले होते.) जुनागढ चा नियम, बहुसंख्य प्रजेचा धर्म काश्मीरला लावला तर काश्मीर पाकिस्तानात जाणार हे नक्की होते. पण काश्मीरच्या राजाने आपले संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याची कुठलीही तयारी दाखवली नव्हती. राजमतापेक्षा जनमत मोठे हा नियम लावायला जुनागढ - हैदराबाद सारखे इथले वातावरण तापले देखील नव्हते. त्यामुळे राजाला दमात घेऊन विलीनीकरण करायचे धोरण पाकिस्तान सरकारने स्वीकारले. त्याप्रमाणे, पुंछ विभागात मुस्लिम प्रजेला राजाविरुद्ध बंड करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्याशिवाय उत्तर पश्चिमेच्या सीमेवर लुटालूट सुरु झाली. २२ ऑक्टोबरला काश्मीरच्या पश्चिम भागाचे नियंत्रण मुस्लिम लीग च्या हातात गेले. त्यानी २४ ऑक्टोबरला आझाद काश्मीरची स्थापना केली आणि पठाणांच्या टोळ्या २४ ऑक्टोबर १९४७ ला उत्तर पश्चिम काश्मीर मध्ये घुसवल्या गेल्या. परंतु त्याआधीच म्हणजे मार्च १९४७ ला रावळपिंडी आणि सियालकोट येथील निर्वासित शीख आणि हिंदू कुटुंबे काश्मीर मध्ये येउन पोहोचली होती. आणि येताना त्यांनी आणल्या पाकिस्तानातील अत्याचारांच्या कहाण्या. त्यामुळे जम्मू मध्ये मुस्लिमांविरुद्ध दंगे भडकले. काही तज्ञ असेही मानतात की जम्मू विभाग हिंदू बहुल रहावा म्हणून राजानेच मुस्लिमांविरुद्ध दंगे उग्र होऊ देण्यास मदत केली. अश्या प्रकारे काश्मीर मधील वातावरण पेटले जात असताना पाकिस्तानी सरकारच्या पाठिंब्याने पठाणी टोळ्या काश्मीरमध्ये घुसल्या. याचा परिणाम उलटा झाला आणि हरिसिंग पाकिस्तान कडे झुकण्याऐवजी त्याने भारताकडे मदतीची याचना केली. २६ ऑक्टोबर १९४७ ला त्याने भारतात विलीनीकरणाच्या करारावर सह्या केल्या. २७ ऑक्टोबर १९४७ला सकाळी भारतीय सैन्य श्रीनगर मध्ये उतरले. त्यानंतर सुरु झाले पहिले भारत पाकिस्तान युद्ध जे १९४८ च्या शेवटापर्यंत चालूच राहिले. थोडं मागे वळून पाहूया. हे सगळे चालू असताना, ७ नोव्हेंबर १९४७ ला भारतीय सैन्य जुनागढ मध्ये शिरले होते. १० नोव्हेंबर १९४७ ला जुनागढ भारतात विलीन केले गेले होते. ३० जानेवारी १९४८ ला दिल्ली मध्ये गांधीजींचा खून झाला होता. २४ फेब्रुवारी १९४८ ला जुनागढ मध्ये जनमत घेऊन २५ फेब्रुवारीला ते विलीनीकरण अधिकृत करून घेतले गेले. तर तिथे हैदराबाद मध्ये १३ सप्टेंबर १९४८ ला भारताने सैन्य उतरवून १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद भारतात विलीन करून घेतले होते. देशभर धर्माधारीत दंगे उसळले होते. या सगळ्या घटनाक्रमाकडे नजर टाकली की लक्षात येऊ शकते की आपल्या या देशाच्या प्रसववेणा किती जीवघेण्या होत्या. आणि पंडीत नेहरू हैदराबादमध्ये सैन्य उतरवण्यास अनुत्सुक का होते? जेएनयू च्या प्रकरणात काश्मीरच्या आझादी बद्दल घोषणा होत्या म्हणून काश्मीर च्या विलीनीकरणाच्या वेळी झालेल्या घटनांकडे पुढील भागात थोडे अधिक लक्ष देऊया. क्रमश

Book traversal links for भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)

  • ‹ भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)
  • Up
  • भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
9388 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

आयला ही मजाच आहे!

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 00:10 नवीन
ज्या जवाहरलाल नेहरूंच्या देखरेखीखाली काश्मीरचं भारतात विलीनीकरण झालं त्याच नेहरुंचा पक्ष असलेला काँग्रेस पक्ष, ज्याचे सरचिटणीस त्याच नेहरुंचे पणतू राहुल गांधी आहेत; त्याच काँग्रेस पक्षाचे लोक त्याच जवाहरलाल नेहरूंच्या नावे उभारल्या गेलेल्या विद्यापीठात काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करत आहेत आणि नेहरूंच्या काँग्रेसला विरोध करणारे आणि नेहरूंनी गांधीहत्येनंतर ज्यांच्यावर बंदी घातली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून आलेले भाजपवाले या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याचं समर्थन करताहेत. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी कदाचित ' कुणाचे तरी डोके ठिकाणावर आहे काय ' असा अग्रलेख नक्कीच लिहिला होता. रच्याकने जुनागढ नवाबाच्या विरोधात जे काही उठाव झाले, त्यातला एक चोरवाड नावाच्या खेड्यातही झाला होता. त्या उठावात धीरजलाल अंबानी नावाचा एक तरुण सहभागी झाला होता. (संदर्भ - The Polyester Prince by Hamish McDonald)
  • Log in or register to post comments

दुसर्‍या बाजूने विचार केल्यास

आनन्दा
Wed, 02/24/2016 - 09:54 नवीन
दुसर्‍या बाजूने विचार केल्यास नेहरू नेहमीच शस्त्रे वापरून विलीनीकरण करण्याच्या विरोधात होते आणि पटेल भारताचे बाल्कनायझेशन होण्याच्या विरोधात होते असा देखील होतो. मग राहुल गांधींच्या भूमिकेचे नवल वाटू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नेहरूंची भूमिका..

पगला गजोधर
Wed, 02/24/2016 - 10:06 नवीन
Where Diplomacy Ends, War Starts , अशी असावी. (महाभारतातील लोककथेत सुद्धा, कृष्णशिष्ठाई विफल झाल्यावरच, युद्ध सुरु झाले. असं काहीसं आहे… याचा अर्थ सरळ आहे, प्रथम शिष्ठाई … जी त्यांनी जवळ जवळ ३००+ संस्थानाच्या बाबतीत दाखवली, आणि जिथे शिष्ठाई विफल झाली, तिथे सैन्य. असो पण नाव ठेवायचंच असं एकदा ठरवलं की, की सोयीस्कर रित्या विसरून जायचं, हरीसिंगाने सैनिकी मदत मागितल्यावर, प्रथम सामीलनाम्यावर सही मगच भारतीय सैन्य, अशी अट दुतांकरावी ठेवणारे, नेहरुच होते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

बाकी तुमचे उदाहरण माझ्या

आनन्दा
Wed, 02/24/2016 - 14:26 नवीन
बाकी तुमचे उदाहरण माझ्या वरच्या वाक्यालाच पुष्टी देतय.
हरीसिंगाने सैनिकी मदत मागितल्यावर, प्रथम सामीलनाम्यावर सही मगच भारतीय सैन्य, अशी अट दुतांकरावी ठेवणारे, नेहरुच होते.)
मी काय म्हटले आहे ते परत वाचा. नेहरू सैनिकी कारवाईच्या विरोधात होते, आणि शक्य तिथे त्यांनी ती टाळायचाच प्रयत्न केला असे इतिहास सांगतो. नेहरू मुत्सद्देगिरीत कमी होते असे मी म्हटलेले नाही. पण तुम्ही वत जे उदाहरण दिले आहे, त्यात देखील, आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

_/\_

पगला गजोधर
Wed, 02/24/2016 - 14:57 नवीन
आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

तुम्हाला माझ्या म्हणण्याचा

आनन्दा
Wed, 02/24/2016 - 15:00 नवीन
तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळत नाहीये असे दिसतेय. असो. शेवटी भक्ती अशीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

तुमचे विधान समजण्यात काही

तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 15:05 नवीन
तुमचे विधान समजण्यात काही गडबड होतेय का? असे असेल तर स्पष्ट करा प्लीज. तुमचा रोख लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

आधी सैनिकी कारवाई करून भूभाग

तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 15:04 नवीन
आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले. >> रे भगवान! आनंदाभाऊ, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय आहे, जत्रेत पाल कुठे मांडायची हा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हे हे.. म्हणूनच..

आनन्दा
Wed, 02/24/2016 - 18:31 नवीन
हे हे.. म्हणूनच.. हैद्राबादमध्ये आपण तेच तर केले.. नबाब तयार नव्हता, मग काहीतरी कुसपट काढून सैनिकी कारवाई केलीच ना. तिथे कागदी घोडे नाचवत नाही बसले.. युक्रेनमध्ये रशिया पण साधारण असेच करत आहे. नेहरूंनी आधी सही करा असे सांगितले ही त्यांची चूक होती असे मला म्हणायचे नाही.. परती गजोधरसाहेबांचा तसा समज झाल्याचे दिसले म्हणून मी तसे म्हटले. पण नेहरूंचा ओढा रक्तपाताविना विलीनीकरणाकडे होता, तर पटेलांचा ओढा कोणत्याही मार्गाने विलीनीकरण करण्याकडे होता. एक साधा प्रश्न विचारतो - जर हरिसिंगाने सही करत नाही असे सांगितले असते तर नेहरू आणि पटेल कसे वागले असते? नेहरूंनी तरीही त्याच वेगाने सैनिकी कारवाई करण्यास अनुकूल झाले असते का? पटेल आणि नेहरूंमध्ये तेव्हा मतभेद झाले असते का? इतिहासामध्ये कोणीही बरोबर आणि चूक असे म्हणता येत नाही. नेता उपलब्ध पर्यायांमधून निर्णाय घेतो. काळाच्या कसोटीवर काही निर्णय बरोबर ठरतात, काही चुकतात. भक्त जेव्हा हे समजतील तो सुदीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असो.. कदाचित सतत विरोधाचा

आनन्दा
Wed, 02/24/2016 - 18:34 नवीन
असो.. कदाचित सतत विरोधाचा सामना करून तुम्ही देखील कट्टर होत चालला आहात. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

जर हरिसिंगाने सही करत नाही

तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 18:40 नवीन
जर हरिसिंगाने सही करत नाही असे सांगितले असते तर नेहरू आणि पटेल कसे वागले असते? >> पाकिस्तानी घुसखोरांकडून सुरक्षेचा त्याच्याकडे दुसरा काही उपाय होता का? नेहरूंनी तरीही त्याच वेगाने सैनिकी कारवाई करण्यास अनुकूल झाले असते का? >> ते नेहरूंना माहित. पटेल आणि नेहरूंमध्ये तेव्हा मतभेद झाले असते का? >> ते त्या दोघांना माहित. >> आम्ही भक्त नाही. जो आम्हाला मतदानापुर्वी खंबा देतो त्यालाच निवडून आणणार्‍या प्रामाणिक जनतेचे प्रतिनिधी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

जो आम्हाला मतदानापुर्वी खंबा

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/24/2016 - 18:59 नवीन
जो आम्हाला मतदानापुर्वी खंबा देतो त्यालाच निवडून आणणार्‍या प्रामाणिक जनतेचे प्रतिनिधी आहोत. लोकशाहीत जनता जेव्हा सर्व समाजाचा स्वार्थ न बघता असा तात्कालिक व्यक्तिगत स्वार्थ पाहणारी असते तेव्हा त्या जनतेला समाजाचा नाही तर व्यक्तीगत (स्वतःचा/नेत्यांचा) स्वार्थ पाहणारे नेते मिळतात... हा लोकशाहीचा मूळ गुणधर्म असलेला अभिशाप आहे... आणि यातच भारतिय लोकशाहीचे दुर्दैव लपलेले आहे ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काय करणार, आहे हे असे आहे.

तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 19:24 नवीन
काय करणार, आहे हे असे आहे. कधी खंबा, कधी गप्पा, आम्ही कशानेही भुलवल्या जातो. जे कबूल केले ते मिळाले नाही त्याला पुढच्या टर्मला झोपवतो. काही विचारवंत आम्हाला सुज्ञ म्हणतात काही मूर्ख. आम्हासचि न ठावे आमचे अंतर, लोकशाही आहे फक्त जंतर-मंतर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

TJ :-) :-) :-)

सतीश कुडतरकर
Mon, 02/29/2016 - 14:42 नवीन
TJ :-) :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आणखी एक अग्रलेख

गॅरी ट्रुमन
Wed, 02/24/2016 - 10:22 नवीन
आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी कदाचित ' कुणाचे तरी डोके ठिकाणावर आहे काय ' असा अग्रलेख नक्कीच लिहिला होता.
आणि जे.एन.यु मधील प्राध्यापकांना उद्देशून 'हे आमचे गुरूच नव्हेत' असाही अग्रलेख लोकमान्य टिळकांनी नक्कीच लिहिला असता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लिहिला असता

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 00:11 नवीन
असे वाचावे.
  • Log in or register to post comments

मोरेसर सुंदर लेखं,

पगला गजोधर
Wed, 02/24/2016 - 09:30 नवीन
ज्या जवाहरलाल नेहरूंच्या देखरेखीखाली काश्मीरचं भारतात विलीनीकरण झालं, त्याच नेहरूंना काश्मीरवरून (इतिहास वाचण्याचे श्रम न घेता)आजही २१ व्या शतकात शिव्या घालणारे पाहिलेत, आणि अशी ही लोकं, पुणे महानगर पालिकेतील, उदीर पकडणार्या विभागाचा, काही केल्या विसर पडू देत नाही आपल्याला. असो, मोरेसर सुंदर लेखं, आपल्या सारखे इतिहासाचे शिक्षक आजच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळाले, तर खूप छान होईल हो. नाहीतर, काही कुजबुज इतिहास शिक्षक त्यांना चुकीचा इतिहास शिकावतच राहतील, किंवा आता काय त्यांचच राज्य, इतिहास पाठ्यक्रमही बदलला तरी, आश्चर्य वाटू नये…
  • Log in or register to post comments

उंदीर मारणाऱ्या लोकांना

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 10:11 नवीन
अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं हे ऐकून डोळे पाणावले!आतापर्यंत शिकवला गेलेला इतिहास पूर्ण खरा आहे हे ऐकून तर अजूनच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

;) बोकोबा हळु घ्या हो, बन्धु... असो.

पगला गजोधर
Wed, 02/24/2016 - 10:15 नवीन
जुनागढ चा वझीर, हा दुसरा तिसरा कोणी नसून झुल्फिकार अली भुत्तो चा बाप , बेनझीर चा आजोबा हा होय. जुनागढ मधून राज-सत्ता, राज-सुखं त्यागायला लागून पाकिस्तानात निर्वासित म्हणून जाण्यामागे, नेहरू व तत्कालीन नवभारतिय-राजकीय सत्ता कारणीभूत , अशी अढी मनात ठेवून, भुत्तो बाप-लेक जन्मभर वागले… एक वेळ गवत खावू पण भारताच्या नाशाचे कारण बनण्यास समर्थ अणुबॉम्ब मिळवूच, अशी कटुता झुल्फिकार याने बाळगण्यामागे, हीच मनातील कटुता असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

+१.

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 11:12 नवीन
मला तर अजून एक कारण वाटतं. पाकिस्तानात नेहमीच पंजाबचं वर्चस्व राहिलेलं आहे. भुत्तो हे सिंधमधले. त्यामुळे लष्करावरचा पंजाबी प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी अतिरेकी भारतद्वेष्टेपणा दाखवलेला असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

वाचत आहे.. पुभा प्र.

आनन्दा
Wed, 02/24/2016 - 09:52 नवीन
वाचत आहे.. पुभा प्र.
  • Log in or register to post comments

देशहीत महत्वाचेच

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/24/2016 - 11:43 नवीन
ते सगळं लोकशाही जनमत वगैरे जाऊद्या. राष्ट्राने आपली ताकद वाढवत रहायचं असतं. जोपर्यंत पुरेशी ताकद येत नाही तोवर शांत रहावे आणि ताकद आल्यावर सरळ घाव घालून तुकडा पाडून घ्यायचा. जनमत, जिनोसाईड वगैरे गोष्टी बोलाचा भात या सदरातच येतात. १९७० मधे एकत्रित पाकीस्तानातला लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणूकीचा कल सरळ सरळ मुजिबुर्रहिमन ला मिळाला होता. परंतु त्याच्या विरोधात ह्यायाखानास अमेरीकेने पूर्ण मदत केली. इतकेच नव्हे तर ह्यायाखानाने पूर्व पाकिस्तानात केलेल्या कत्तली अमेरीकेने पद्धतशीर दुर्लक्षिल्या. कारण अमेरीकेला स्वतःच्या राष्ट्राचे हीत साधायचे होते. अधिक माहीतीसाठी ब्लड टेलेग्राम पुस्तक वाचावे. देशहीतासाठी कुठे कठोर व्हावे लागले तर जरूर व्हावे. उद्या गरज पडली तर काश्मीरला द्यावे स्वतंत्र करून आणि काश्मिरला जाणारा सगळा सप्लाय थांबवावा काश्मिरातून येणार्‍या सफरचंदांवर भरमसाठ ड्युटी लावावी. मागे जम्मू ला आंदोलन झाले अमरनाथ यात्रेवरून तेव्हा कसे सगळे लायनीवर आले होते. फक्त जम्मूतून श्रीनगर कडे जाणारा मार्ग बंद पाडून मोठा परिणाम साधला होता. घ्या म्हणावे स्वातंत्र्य आणि चिन आणि पाकीस्तानच्या वळचणीला जाऊन बसा.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख आणि माहिती!

असंका
Wed, 02/24/2016 - 12:57 नवीन
सुरेख लेख आणि माहिती! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा