सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे.
सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली. मात्र हिटलरच्या जर्मनीबरोबर आणि त्याच अंगाने जाणार्या जपानबरोबर त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून जरी मैत्री केली असली तरी, "जर-तर" च्या भाषेत चुकून पण जर्मनी-जपान कोणीही तात्पुरते आशियाच्या बाजूने जिंकत आले असते तर भारताचे पण खरे नव्हते असे वाटते. अर्थात हे देखील समजते की त्यावेळेस (१९४१) जर्मनीची सगळी दुष्कृत्ये बाहेर आली नव्हती...असो.
आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सुभाषबाबूंचे पुतणनातू सुर्या बोस यांच्या जर्मनीत झालेल्या भेटीची बातमी आली आहे. सुर्या बोस यांच्या वडीलांवर देखील त्या काळात पाळत ठेवली गेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर देखील श्री. सुर्या बोस यांचे खालील म्हणणे वाचण्यासारखे आहे...
"I gave the PM a few points in writing, including the issue of surveillance on the family so that the truth comes out," Surya said. He said he impressed on Modi that India as a nation was strong enough to face the truth, even if it was unpalatable.
"The declassified information needn't paint a glorious picture of Netaji. It may say something negative. In all probability, it will. We must not shirk from the truth even if it adversely affects Netaji's image. The family is ready to face it," he said.
या बातमीत श्री बोस यांनी इतिहासाकडे अलिप्तपणे बघण्याची दाखवलेली वृत्ती आणि धैर्य हा या चर्चेचा विषय आहे.
सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते. तसेच नेहरूंच्या नंतरचे पंतप्रधान शास्त्री, नंदा आणि इंदीरा गांधी, त्यांच्या त्या त्या वेळच्या गृहमंत्र्यांसकट सर्वच जबाददार होते. त्यात यशवंतराव चव्हाण देखील आले. तरी देखील अंतिमतः या निर्णयांवर वेळोवेळच्या पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्या शिवाय हे केले गेले असे म्हणत केवळ गृहमंत्र्यांवर जबाबदारी टाकली जाणार असेल तर ती मोठ्ठी दिशाभूल आहे आणि त्यातून केवळ पंतप्रधान हे स्वतः निर्णय घेत नव्हते इतकेच सिद्ध होऊ शकेल, जबाबदारी टळू शकणार नाही. बरं त्यांनी तसे करणे ही कदाचीत त्या काळातील (फॉरवर्ड ब्लॉक आणि तत्सम अतिरेकी डाव्या संघटनांमुळे) गरज देखील असेल आणि ते त्या त्या नेत्यांनी गोपनिय ठेवले असेल तर त्यातही काही चूक नाही. पण ते आता इतक्या वर्षांनी इतिहास म्हणून प्रसिद्ध झाले तर वास्तव जगासमोर येऊ शकेल.
अर्थात या सर्वांचा लसावि असे म्हणता येऊ शकेल तो म्हणजे काँग्रेस....आणि गंमत म्हणजे एकीकडे पाळत ठेवणारे दुसरीकडे त्यांना राष्ट्रभक्त देखील म्हणत होते. याच काळात सावरकरांना (मला वाटते चीन युद्धाच्या वेळेस देखील) अटक/स्थानबध्दता करण्यात आली होती. श्यामाप्रसाद मुखर्जींचा (१९५३) गुढ मृत्यू झाला होता. भगतसिंग बद्दल देखील बोलले गेले आहेच. असे अनेक असेल जे कदाचीत बाहेर येणार नाही अथवा काळाच्या ओघात "गंगार्पण" झाले आहे.
सुभाषबाबूंचे दुसरे पुतणनातू आणि सध्या तॄणमूल कडून खासदार असलेले अमेरीकास्थित सुगाता बोस मात्र नेहरूंना जबाबदार ठरवायला तयार नाहीत तर केवळ पटेलांनाच चूक ठरवत आहेत. गंमत म्हणजे ते इतिहास आणि राजकीय विषयातले तज्ञ आणि हार्वर्ड मधे प्राध्यापक आहेत! अर्थात त्यांना प्रत्यक्षात बोलताना ऐकलेले असल्याने, त्यांच्या असल्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही... दुर्दैवी मात्र नक्की वाटते. दुसरे सन्माननीय प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी अजून यासंदर्भात (एरवी मांडतात तशी) मते मांडलेली नाहीत. कम्युनिस्ट पार्टीकडून देखील या संदर्भात बोलले गेलेले दिसले नाही. बाकीचे डावे विचारवंत देखील "सुभाषबाबूंच्या पहारेकर्यांबद्दल" गप्पच आहेत आणि कागदपत्रे जाहीर करा असे देखील म्हणलेले वाचले तरी नाही. मात्र हे आणि त्यांचे डावे पूर्वज याच काळापासून ते आजतागायत कुठलाही पुरावा नसताना तत्कालीन संघापासून ते आजच्या बालस्वयंसेवकापर्यंत सर्वांना "गांधीचे मारेकरी" म्हणून समाजाची दिशाभूल करत राहीले.
या इतिहासाच्या मारेकर्यांनी आणि पहारेकर्यांनी स्वतःचे विचार रुजावेत म्हणून बुद्धीवादीपणाने हिंदू आणि हिंदूत्वाचा द्वेष पसरवत, त्यांच्याबद्दल खोटे बोलून, त्यावर खोटे संशोधन करून आजपर्यंत या तथाकथीत विचारवंतांनी देशाचे सामाजिक-आर्थिक-राजकीय नुकसान केले आहे. या मारेकर्यांचे आणि पहारेकर्यांचे भांडे फोडणे आणि त्यांच्या असल्या (वि)कृतीशील विचारसरणीस दूर करणे ही काळाची गरज आहे.
प्रतिक्रिया
21 Apr 2015 - 10:42 am | arunjoshi123
भारतीयांचा जपान्यांकडून छळ होऊ नये अशी दूरदृष्टी गांधीजींना असू शकते. पण असं ठामपणे म्हणता न यावं. भगतसिंगाला पण गांधीजींचा विरोध होता आणि त्या केसमधे कोणत्याही देशाकडून भारतीयांचा छळ होणार नव्हता. सबब सशस्त्र म्हटले कि ते सरसकट विरोध करत असेच मानणे सयुक्तिक वाटते.
16 Apr 2015 - 10:54 pm | हुप्प्या
माझ्या परीने उत्तरे. सुभाषचंद्र बोसांचे विचार वा त्यांच्या आयुष्यातील घटना ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत नसाव्यात. एकंदरीतच गांधी नेहरू घराण्याच्या उदात्तीकरणात बाकी सगऴ्या लोकांच्या अस्तित्त्वाला दुय्यम स्थान दिले गेले आहे त्यामुळे सुभाषचंद्रांचा मुस्लिम अनुनय दुर्लक्षिला गेला असेल. आझाद हिंद सेना, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा अशी चमकदार वाक्ये हीच जास्त स्मरणात राहिली असावीत. सामान्य जनमानस इतिहासाचा बारकाईने अभ्यास करण्याकरता प्रसिद्ध नसते. त्यात राज्यकर्त्या लोकांचा ह्याला हातभार लागला तर त्यात भरच पडणार.
असो. तर सुभाषचंद्र बोस जिहादी वा खिलाफतींना डोक्यावर घेत असतील तर साफ चूक होते. अडाणीपणा किंवा मूर्खपणा होता असे माझे वैयक्तिक मत. कदाचित राजकीय स्वार्थापोटीही असे त्यांनी म्हटले असेल आणि तरीही ते चूकच. अमेरिकेने रशियाविरुद्ध लढताना मुजाहदीन लोकांना नको इतके डोक्यावर बसवून भस्मासूर बनवले ते असेच.
परंतु कुणी १०० टक्के आदर्श नसतोच. गांधींचे विचार मला बहुतांश पटत नाहीत पण त्यांचे काटकसर, स्वच्छता, अस्पृश्यमुक्ती ह्याबाबतचे विचार स्वीकारण्यात मला काही अडचण नाही.
21 Apr 2015 - 10:46 am | arunjoshi123
सुभाषबाबू मुस्लिम अनुनय करत मंजे काही चूक करत का? एका पातळीपर्यंत मुस्लिम अनुनय करणे आपल्या देशात योग्य वाटते.
आणि एका पातळीच्या वर अनुनय करत असं म्हणता येत नाही. त्यांच्या सेनेत इस्लामी असं काही नव्हतं म्हणून 'आझाद मुस्लिम सेना' इ इ फूट पडली असं इथंच कोणीतरी म्हटलं आहे.
20 Apr 2015 - 4:31 pm | arunjoshi123
इथे कोट केलेलं सुभाषबाबूंचं भाषण १००% हिंदूत्ववादी आहे असं मला वाटतं. ते सिडोसिक्यूलर नाही म्हणून ते हिंदूत्ववादी नाही असं म्हणणं उचित नसावं.
20 Apr 2015 - 6:39 pm | हाडक्या
याचा अर्थ ते हिंदुत्ववादी आहे असं म्हणणं उचित असावं ? काय म्हणताय त्याचा तुम्हाला तरी अर्थ लागत असावा अशी आशा.
इथे खरंच काय लिहावं कळत नाही, म्हणजे साधे दाखले पण उगी स्वतःच्या मताच्या विरुद्ध जातायत म्हणून काई पण वाक्य टंकायची ? याने हिंदुत्ववादाचेच जास्त नुकसान होतेय असे नै का वाटत.
आणि
ही हुप्प्या यांची मते विचार करण्यायोग्य आहेत असे नमूद करतो.
21 Apr 2015 - 2:59 pm | arunjoshi123
ते विधान दुर्बोध झालं आहे त्याबद्दल क्षमस्व. पण सगळी ओरियंटेशन्स बाजूला ठेऊन वाचले तर त्यात अर्थ दिसू शकतो.
17 Apr 2015 - 12:28 pm | hitesh
महात्मा गांधी यांना देशासह जगभरात अत्यंत आदराचं व मानाचं स्थान आहे. कलात्मक स्वातंत्र्याच्या नावावर त्यांच्याबद्दल वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांची पाठराखण करता येणार नाही,' असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. याप्रकरणी सर्व पक्षकारांची म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठानं आपला निर्णय राखून ठेवला आहे.
मराठी कवी वसंत गुर्जर यांची 'गांधी मला भेटला' ही कविता १९९४मध्ये ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात प्रसिद्ध झाली होती. पुण्यातील 'पतित पावन' संघटनेने द्वैमासिकाच्या प्रकाशकाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीचे खटल्यात रूपांतर होऊन प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत आले. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि प्रफुल्ल पंत यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं आपलं मत व्यक्त केलं. 'विचारांचं स्वातंत्र्य आणि शब्दांचं स्वातंत्र्य यात बरंच अंतर आहे. विचार स्वातंत्र्याच्या नावावर एखाद्याच्या तोंडी काहीही शब्द घालून सनसनाटी निर्माण करणं अयोग्य आहे. राणी व्हिक्टोरियाच्या तोंडी एखाद्यानं असे शब्द घातले असते तर ब्रिटिशांनी काय प्रतिक्रिया दिली असती, असा सवालही खंडपीठानं केला. इथं प्रश्न केवळ भाषेच्या स्वातंत्र्याचा नाही, तर महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरण्याचा आहे, असंही खंडपीठानं स्पष्ट केलं. महात्मा गांधी यांचा सन्मान राखणं ही देशाची सामूहिक जबाबदारी नाही का? आपण एखाद्या आदर्श व्यक्तीचा सन्मान राखू शकत नाही, पण त्याला अश्लील शब्दांत संबोधू शकतो, हा काय प्रकार आहे? असा संतापही न्यायालयानं व्यक्त केला.
तूर्त खंडपीठानं या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या इतिहासपुरुषाबद्दल अश्लील, अभद्र भाषेचा वापर करण्याचे स्वातंत्र्य देता येईल का, यावर न्यायालय निकालाच्या माध्यमातून भाष्य करणार आहे. त्यामुळं या निकालाबद्दल उत्सुकता आहे
17 Apr 2015 - 8:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
खरे आहे.
खरे आहे.मिडियाच्या माध्यमातून कंड्या पिकवणे,थिंक टॅन्कच्या नावाखाली न आवडणार्या लोकांची बदनामी करणे,प्रकरण अगदीच अंगाशी आले की 'नतमस्तक'झाल्याची नाटके करणे.. हे आधी बंद झाले पाहिजे.
17 Apr 2015 - 8:16 pm | आजानुकर्ण
माईशी सहमत आहे.
18 Apr 2015 - 12:16 am | काळा पहाड
हे बंद झालं पाहिजे, ते बंद झालं पाहिजे. माई, काँग्रेसचं राज्य आता गेलेलं आहे. मुस्कटदाबी करायचे दिवस आता गेलेले आहेत. आणिबाणी केव्हाच संपली. आता नवीन प्रकरणं उजेडात येतायत आणि येत जातील. मौनी पंतप्रधानांना समन्स गेलेलं आहे. उगीच कंड्या पिकवणे, बदनामी करणे वगैरे ६० वर्ष घासून पुसून गुळगुळीत झालेले शब्दप्रयोग बंद कर. नेहरूं महाराजांनी बोस यांच्या नातेवाईकांवर पाळत ठेवली होती हे सत्य कागदपत्रांमधून उघडकीस आलेलं आहे. आणि तेवढंच महत्वाचं आहे. हा धागा फक्त त्याच्याशी संबंधित आहे. नेताजींच्या कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा हा भंग आहे आणि असं करणारा माणूस अमर्याद सत्ता हातात असणारा पंतप्रधान होता. नेहरूंनी जे केलं त्याचं काही जस्टीफिकेशन नाही. तेव्हा उगीच दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दाखवण्याचा धंदा बंद केला तर बरं होईल.
18 Apr 2015 - 5:16 pm | ग्रेटथिंकर
हे बंद झालं पाहिजे, ते बंद झालं पाहिजे. माई, काँग्रेसचं राज्य
आता गेलेलं आहे. मुस्कटदाबी करायचे दिवस आता गेलेले आहेत.
आणिबाणी केव्हाच संपली. आता नवीन प्रकरणं उजेडात
येतायत आणि येत जातील. मौनी पंतप्रधानांना समन्स गेलेलं
आहे. उगीच कंड्या पिकवणे, बदनामी करणे वगैरे ६० वर्ष घासून
पुसून गुळगुळीत झालेले शब्दप्रयोग बंद कर. नेहरूं महाराजांनी
बोस यांच्या नातेवाईकांवर पाळत ठेवली होती हे सत्य
कागदपत्रांमधून उघडकीस आलेलं आहे. आणि तेवढंच महत्वाचं
आहे. हा धागा फक्त त्याच्याशी संबंधित आहे. नेताजींच्या
कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा हा भंग आहे आणि असं करणारा
माणूस अमर्याद सत्ता हातात असणारा पंतप्रधान होता.
नेहरूंनी जे केलं त्याचं काही जस्टीफिकेशन नाही. तेव्हा उगीच
दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दाखवण्याचा धंदा बंद केला तर
बरं होईल.>>>>>>>>>>>>>>ऐकलं का माई ,चोउबों™
21 Apr 2015 - 3:03 pm | arunjoshi123
निकाल गांधीजींच्या बाजूनं लागेल अशी आशा करू यात. सयंत राजकीय टिका वेगळी आणि गरळ वेगळी याचं भान असणं आवश्यक आहे.
17 Apr 2015 - 8:24 pm | सुधीर
चर्चा वाचनीय आहे. क्लिंटन यांचे काही प्रतिसाद आवडले. बाकी नेहरू मेंगळट होते असं मला कुरुंदकरांचं जागर मधलं नेहरूंच्या कारकिर्दीवरचं विश्लेषणात्मक टिपण वाचून वाटलं नाही. असो. नेहरूंच्या राजकीय कारकिर्दीचा "तठस्थ" आढावा घेणारी कुठली पुस्तकं/लेख-प्रतिलेख आहेत अधिक वाचनासाठी? (काँग्रेसच्या वा रास्वसं च्या लेखकांची सोडून, काही उल्लेख जागर मध्येही आहेतच म्हणा).
अवांतर, सुब्रमण्यम स्वामींची (केवळ वर त्यांचा उल्लेख आल्यामुळे) बरीचशी मतं मला बिलकूल पटत नाहीत कारण बहुतेकवेळा त्यांचं लिखाण केवळ कम्युनल विचारसरणीचे वाटते. आणि काही अंशी मला स्वतःला सेक्युलर विचारसरणी जास्त योग्य वाटत असल्यामुळेही असेल.
21 Apr 2015 - 2:54 pm | arunjoshi123
तिथे खूप गिचमिड झाली आहे म्हणून प्रतिसाद इथे लिहित आहे.
मला देखिल हेच म्हणायचं आहे. शांतिकालात चीन, रशिया, ब्रिटिश इ इ च्या तुलनेत जपान थंड असतो.
मधल्या काळाला शांतिकाळ म्हणणे तितकेसे सयुक्तिक नसावे. जपान एका महायुद्धाच्या खाईत होता. जिंकलेल्या प्रांताची लूट करणं, साम्राज्य वाढवण्यासाठी, क्रमप्राप्त होतं. होत असणारा विरोध सप्रेस करणं देखिल क्रमप्राप्त होतं.
जपानच्या अंदमान ऑक्यूपेशनचं जपानीज अकाउंट आपण कधी वाचलं आहे काय? हे बर्यापैकी महत्त्वाचं आहे कारण -
१. जेते इतिहास लिहितात.
२. जपान्यांना बदनाम करणे (युद्धानंतर) अलाइड फोर्सेसना गरजेचे होते. लक्षात घ्या कि हिटलरने ज्यूंना मारले हे सांगताना तो जिंकला असता तर त्याने जर्मन सोडून जगातल्या सगळ्या लोकांना मारले असते अशी भिती प्रत्येकाला वाटली पाहिजे असे त्याचे वर्णन केले जाते. वास्तविक त्याने फ्रेंच लोकांना मारले नाही हे लोक विसरतात.
३. जपान्यांना इंग्रजी येत नाही. म्हणून वर्णने सगळी पाश्चात्यांचीच. ती कशाला जपान्यांच्या बाजूने असतील?
----------------------------------------------------------
इथे युद्ध्जन्य परिस्थिती कशी घोळ करते ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.
१. जपानीज सैन्य अंदमानला आले तेव्हा स्थानिक जाम खुष होते.
२. पहिले काही दिवस/वर्षे जपानीज सैन्य स्थानिकांना आवडलेले.
३. जपानी लोक स्थानिकांना अगोदरपेक्षा जास्त किमती देत म्हणून स्थानिक टिंग होते.
-----------------------------------------------------
काही काळाने अलाईड फोर्सेसनी या सैनिकांच्या मदतीला येणारी चक्क चक्क ५००-६०० जहाजे बुडविली. मग हे सैनिक काय करणार? लूटालूट. नंतर? जपान्यांना हे कळेना कि अगदी अंदमानच्या जवळपर्यंत येणारी जहाजे शिकार कशी होताहेत? इतक्या प्रमाणात? युद्धकाळात अशावेळी काय होईल? वर जपान्यांना इंग्रजी यायचे नाही. म्हणून त्यांनी फॉर्म्यूला काढला...
१. ज्याला इंग्रजी येते त्याला संपवा. आपली जहाजे बुडणार नाहीत. पण स्थानिक इतक्या प्रकारचे ट्रायबल्स होते कि त्यांची एकमेकांत संवादाची भाषा 'तोडकीमोडकी', जपान्यांपेक्षा १० पट चांगली 'इंग्रजी(?)' होती. वर बरेच सैन्य म्हणून सामिल केलेले कैदी हे देखिल इंग्रजी जाणून होते. हा फॉर्म्यूला दुर्दैवी आहे खरे, पण उपासमारीत तोच सुचला त्यांना.
२. स्थानिकांना शेती करायला लावणे ज्याची तिकडे परंपरा नव्हती. हे कष्टाचे काम त्यांना अन्याय वाटला आणि त्यांनी प्रचंड विरोध सुरु केला. मग पुन्हा तेच.
३. इंडियन इंडिपेडेन्स लीग पूर्णतः आझाद हिंद सेनेत समाविष्ट झाली असली तरी बोस यांना खाली दाखवू पाहणारी अनेक तत्त्वे तिच्यात शेवटपर्यंत कायम होती.
४. बोस यांच्या सेनेला भारतातून सेनेकडून पाठिंबा मिळू नये म्हणून ब्रिटिश फार काळजी घेत. भारतीय तर जाऊच द्या, ब्रिटिश सैन्य अधिकार्यांना देखिल रंगून मधे काय होत आहे याच्या बातम्या बॅनच होत्या. आझाद हिंद सेनेच्या बातम्या नसलेला पेपर अशी वेगळी आवृत्ती होती. त्यासोबतच अंदमानचे जपानीज ऑक्यूपेशन किती वाईट आहे हे अख्ख्य्या भारताला, तेल मिठ लावून, सांगोपांग सांगायचे होते.
मला ब्रिटिशांचं कौतुक वाटतं. आजही त्यांचा तगडा डिफेन्स होतो. पण याची दूरदृष्टी तेव्हा?
माझं मत आहे कि जपानी जहाजे अंदमानला येत राहिली असती तर आपलं हे मत नसतं.
हे विधान मागे घेतो.
अवघड आहे हे मान्य. पण भारताला नगण्य मानण्याची प्रवृत्ती एका न्यूनगंडाच्या पातळीला जाऊ नये असेही दुसरीकडे वाटते. थर्ड वर्ल्ड देश म्हणता म्हणता भारता आज पुन्हा महत्त्वाचा देश नै का बनला?
21 Apr 2015 - 3:46 pm | क्लिंटन
क्रमप्राप्त? म्हणजे जपान्यांनी भारतीयांना मारणेही क्रमप्राप्त नव्हते का? आणि तरीही अशा जपान्यांची तुम्ही बाजू घेत आहात आणि असे जपानी तुम्हाला आपल्या घरात हवे होते? कमाल आहे.
हिटलरला पश्चिमेकडच्या भागात (फ्रान्स, इंग्लंड इत्यादी) फार रस तसाही नव्हता.जर्मन राईश पूर्वेकडच्या भागात वाढवावे असे त्याला वाटत होते.माईन काम्फ मध्येही त्याने पूर्वेकडे विस्तार करावा असेच म्हटले होते. तसेच तो फ्रान्स आणि इंग्लंडच्या लोकांना वांशिक दृष्ट्या कमी दर्जाचे समजतही नव्हता.या कारणांमुळे इंग्लंड आणि फ्रान्सच्या युध्दबंद्यांबरोबरची नाझींची वागणूक आणि पोलंड आणि रशियाच्या युध्दबंद्यांबरोबरची वागणूक यात खूप फरक होता. आणि बेल्जियमचे राजे लिओपोल्ड यांनी अचानक शरणागती पत्करल्यानंतरही त्याने इंग्लंड-फ्रान्सच्या सैनिकांना डंकर्कपर्यंत त्याने सुखरूप जाऊ दिले. जर ते अडीच-तीन लाख इंग्रज सैनिक त्याच्या हातात पडते तर इंग्लंडचे प्रचंड नुकसान झाले असते.पण त्याला पश्चिमेकडे मुळात विशेष विस्तार करण्यात रस नव्हता आणि असे सुखरूप जाऊ दिल्यामुळे का होईना इंग्लंड युध्द थांबवेल तर बघू हा एक खडा नक्कीच हिटलरने टाकला होता.तसा खडा त्यापूर्वी पोलंडचा पाडाव झाल्यानंतरही शांततेची तयारी दाखवून हिटलरने टाकलाच होता.
म्हणजे हिटलरने फ्रान्समध्ये विशेष कत्तली केल्या नाहीत याचे कारण पश्चिमेकडे मुळात त्याला फार रस नव्हता आणि वांशिक मुद्द्यावरून इंग्लंडचे लोक कमी दर्जाचे आहेत असे तो मानत नव्हता. याचा अर्थ हिटलर सद्गुणी थोडीच होता? इतर जग गेले तेल लावत.हिटलर भारतीयांनाही कमी दर्जाचेच मानत होता.तेव्हा हिटलरने फ्रान्समध्ये कत्तली केल्या नाहीत म्हणून भारतात तो कत्तली करणार नाही असे मानून त्याला घरी बोलावणे हे अत्यंत भाबडेपणाचे आणि अत्यंत घातक होते. तीच गोष्ट जपान्यांविषयी.
असे लोक सगळीकडेच असतात. सुरवातीला युक्रेनमध्ये जर्मन सैन्याचेही स्टॅलीनच्या अत्याचारांना कंटाळलेल्या लोकांनी मुक्तीदाते म्हणून स्वागतच केले होते.पण पुढे किएव्हमध्येही नाझींनी कत्तली केल्यानंतर स्टॅलीन परवडला पण हिटलर नको अशी त्यांच्यावर वेळ आली.पण अशा पश्चात्तापाचा काहीच उपयोग होत नाही. अशीच वेळ अंदमानमध्येही लोकांवर आलीच. आणि तशीच वेळ बंगालमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी यायला हवी होती असे तुमच्यासारखे लोक बोलतात ते बघून खरोखरच आश्चर्य वाटते.
म्हणजे हे जपान्यांनी भारतीयांना मारले याचे समर्थन समजायचे का? असेच कुठलेतरीच समर्थन त्यांना बंगालमध्येही मिळाले असते तर काय? निदान अंदमानात लोकसंख्या तरी फार नव्हती. बंगालमध्ये जपान्यांनी आपल्या लोकांचे हाल कुत्रंही खाणार नाही असे करायची अजिबात शक्यता नव्हती? काय बोलता राव? माझा मुद्दा तोच आहे की जपानी लोकांशी संग म्हणजे असंगाशी संग होता. मोठे विष होते ते. आणि विषाचा पेला पिऊनच त्याची खात्री करणे माझ्यामते तद्दन मूर्खपणाचे आहे.
खुनशी जपान्यांविषयी इतकी सहानुभूती दाखवायची मला तरी गरज वाटत नाही. त्यांनी अंदमानात आपल्या लोकांना मारले. बास. माझ्यासाठी जपान्यांना विरोध करायला इतके कारण पुरेसे आहे.
भारत खरोखरच महत्वाचा देश आहे का याविषयी मतांतरे असू शकतील.पण परत एकदा तुम्ही काळरेषेचा घोळ करत आहात. २०१५ मध्ये भारत समजा महत्वाचा आहे असे मानले तरी १९४५ मध्ये आपला देश फार महत्वाचा होता असे वाटणे म्हणजे खरोखरच अवघड आहे. त्यावेळी जगाच्या दृष्टीने आपल्याला फारसे महत्व नव्हतेच.
21 Apr 2015 - 10:01 pm | विकास
सर्वप्रथम चर्चाप्रस्तावात चर्चा चालू असल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार. मध्यंतरी बाहेरगावी असल्याने आणि नेट अॅक्सेस कमी असल्याने उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व!
चर्चेमधे ज्या काही उपविषयांवर चर्चा झाली त्यातील एक नेताजींनी घेतलेली जपानची मदत हा एक विषय होता. त्या संदर्भात जपान लहान राष्ट्र होते /आहे असा देखील मुद्दा आला. वास्तवीक जपानचे क्षेत्रफळ 145,925 mi² तर ब्रिटनचे 94,058 mi² आहे. १९४१ साली जपानची लोकसंख्या 716000 तर ब्रिटनचे 482200 होते. हे केवळ माहितीकरता. तो मुद्दा दुय्यम आहे. ब्रिटीशांनी लहान राष्ट्र असूनही जगावर राज्य केले. शिवाजीने मोघलांना नाके नऊ आणणे म्हणजे काय हे दाखवून दिले. थोडक्यात केवळ राष्ट्राच्या आकारावर काही ठरत नाही. जपान हे आक्रमक आणि हिंसक राष्ट्र होते हे वास्तव आहे.
आता अशा या जपानचा "शत्रूचा शत्रू" म्हणून सुभाषचंद्रांनी वापर करायचे ठरवले हे समजूयात. आणि शक्यता देखील तीच असेल असे वाटते. पण जर्मन-जपान-इटली या सगळ्या केवळ ब्रिटन - फ्रांन्सचे विरोधक म्हणून असलेल्या राष्ट्रांशी हातमिळवणी करणे हे अव्यवहार्य वाटते.
तरी देखील नक्की सुभाषबाबू काय करत होते हे आजही गुलदस्त्यातच आहे. ३१ फाईल्स या आजही पंतप्रधान कार्यालयात गोपनीय म्हणून ठेवलेल्या आहेत. त्या व्यतिरीक्त अजूनही बरेच गोपनीय इतर मंत्रालयात असेल. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. त्यामुळे आता तरी सरकारने या फाइली प्रकाशीत केल्या तर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. मोदींनी १७ मे ला सुभाषबाबूंच्या जर्मनीतील नातेवाईकांना निमंत्रीत केले आहे. त्यावेळेस सर्व प्रकाशीत केले तर उत्तम होईल.
22 Apr 2015 - 10:59 pm | धर्मराजमुटके
इच्छुकांनी ऐसी अ़क्षरे वरचा हा लेख देखील वाचावा असे सुचवितो.
23 Apr 2015 - 9:55 pm | सुधीर
सदर लेखाचा दुवा दिल्याबद्धल धन्यवाद!
24 Jan 2016 - 10:21 am | मोगा
सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या १०० गोपनीय फायली केंद्राकडून उघड
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फायली गोपनीय ठेवल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर जरी वारंवार निशाणा साधण्यात येत असला, तरी नव्याने खुल्या करण्यात आलेल्या फायलींमधून नेहरूंचे मानवतावादी रुपच समोर आले आहे. बोस यांच्या मृत्यूनंतर व्हिएन्नात राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत करण्यासंदर्भातील सूचना त्यांनी परराष्ट्र व वित्त विभागाला केल्या होत्या.
१२ जानेवारी १९५२ रोजी नेहरू यांनी यासंदर्भात संबंधित विभागाला लिहिले होते. त्यावर कार्यवाही करत वित्त विभागाने नेताजींच्या पत्नी एमिली शेंकेल यांना आर्थिक मदत देण्याची तजवीज केली. तसेच, यासंदर्भात त्यांच्या पुतण्यालाही कळविण्यात आले. त्यानुसार व्हिएन्नातील भारतीय उप कॉन्सुलच्या मार्फत एमिली यांना १०० पौेंड्स देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दुसऱ्या एका पत्रानुसार, नेताजींच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या जपानमधील रेंकोजी मंदिराच्या देखभालीसाठी भारत सरकारने १९६७ ते २००५ या काळात सुमारे ५२ लाख खर्च केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, १९९५मध्ये ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने नेताजींच्या अस्थी भारतात आणू नयेत, असा सल्ला सरकारला दिला होता. जर त्यांच्या अस्थी भारतात आणल्या, तर त्यांच्या मृत्यूबाबतचा सरकारी दावा आपल्यावर थोपविला जात असल्याचा ग्रह पश्चिम बंगालच्या जनतेत निर्माण होईल. तसेच, त्यांच्या अस्थी पुन्हा भारतात आणण्याची मागणीही कुणी केलेली नाही, असे ‘आयबी’चे म्हणणे होते. पन्नाशीच्या दशकातच नेताजींच्या अस्थी टोकियोतील भारतीय दूतावासाकडे सोपविण्यात आल्या होत्या. पण, बोस कुटुंबीय नेताजींचा मृत्यू झाल्याची बाब मान्य करण्याच्या पवित्र्यात नसल्यामुळे त्यांच्या अस्थी परराष्ट्र विभागाने भारतात आणल्या नाही
24 Jan 2016 - 3:21 pm | गामा पैलवान
मोगा,
नेहरूंचे मानवतावादी रुप पाहून ड्वाले पानावले. याच मानवतावादी धोरणानुसार नेताजींच्या वारसांवर स्वातंत्र्योत्तर तब्बल वीस वर्षे पाळत ठेवली होती नाही का नेहरूंनी आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी?
आ.न.,
-गा.पै.
24 Jan 2016 - 2:32 pm | मोगा
फाइली ओपन झाल्या .
वाचा आणि लिहा त्यात काय आहे ते !