प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.
काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.
--------
पीएमटीत हरवली पर्स भाग 6
काही कारणांनी जुनी डायरी हाती आली व अन् शोधता शोधता एका नोंदीने लक्ष वेधले. आज बरोबर 10 वर्षे पूर्ण होतील त्या घटनेला. त्याचे असे झाले की ...
... माझी मिसेस एकदा सिटीबसने प्रवास करताना मागच्या बाकावर बसलेली असताना तिच्या हातून पर्स सटकून पडली. उतरून काही खरेदीला पैसे चुकते करताना तिच्या ते लक्षात आले. पण तो पर्यंत खूप वेळ गेला होता. आता पर्स शोधायसाठी बस कुठली, नंबर कोणता यातून काही हाती येणार नाही असे वाटून ती घरी परतली. घरात चर्चा झाली व मी म्हणालो, 'एकदा प्रयत्न करून पाहू मिळाली तर मिळाली'. असे ठरवून पीएमटीच्या हरवले व सापडले विभागात स्वारगेटपाशी असलेल्या ऑफिसात गेलो. घटनेची कल्पना दिल्यावर तेथील एका रजिस्टरातील सापडलेल्या मालाची माहिती देणाऱ्या नोंदीची माझ्या कथनाशी जुळवणी केली गेली जाऊ लागली. काही वेळातच माझ्या वर्णनाशी जुळणारी एक पर्स आली आहे म्हणून सांगण्यात आले. उद्या या. तोवर त्या फेरीतील वाहकाला बोलावून ठेवतो. म्हणून मला कळवण्यात आले. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा पी एम टीच्या ऑफिसात हजर झालो. तेंव्हा वाहक आर एस जगताप बिल्ला क्रमांक 117 वाट पहात होते. त्यांनी माझ्याशी जुजबी बोलून ती पर्स लॉकर मधून काढली. ती हरवलेलीच होती. खात्री साठी त्यातील काही वस्तू व कागदांची शहानिशा करून ती माझ्या हवाली केली गेली. त्यात साधारण 2 हजारापेक्षा जास्त रोकड व अनेक महत्वाचे कागदपत्र होते. ते ही सुखरूप मिळाले. वाहकांच्या कथनाप्रमाणे ती पर्स शेवटच्या बाकापाशी पडलेली आढऴली. ती त्यांनी या ऑफिसात लगेच जमा केली होती.
त्यांच्या या सचोटीच्याकृत्याचे कथन लोकमत मधे दिले ते नंतर काही दिवसांनी छापून आले होते. असो.
भाग 6 समाप्त
प्रतिक्रिया
21 Jul 2014 - 7:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बरे वाटले रे वाचून शशी.भारतात जगतापांसारखे लोक कमी आहेत पण आहेत. त्यावरच देश चालला आहे.
21 Jul 2014 - 10:54 pm | शशिकांत ओक
माई साहेब, या धाग्याच्या निमित्ताने प्रेमाने कोणी शशी म्हणणारे वाचून आनंद वाटला.
21 Jul 2014 - 11:43 pm | खटपट्या
मस्त अनुभव !!!
22 Jul 2014 - 12:06 am | मुक्त विहारि
आवडला..