सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
5 Feb 2014 - 5:00 pm

"दिल से निकलने वाली रस्ते का शुक्रिया... दिल तक पहुचने वाली हर डगर को सलाम"

लता च्या आवाजातल्या या ओळी , "बाली उमरको सलाम" हे गाणं ऐकलं की मन वेगळ्याच विश्वात जातं. अनेक आध्या-अधू-या प्रेमकथा आठवू लागतातं.
अनेकदा मनात आलं की या कथा एकदा लिहून काढाव्यात पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही. आता ते करावसं वाटतंय. अर्थात कितपत जमेल ते माहीत नाही. पण प्रयत्न करणार आहे.

या सगळ्या मी जवळून पाहिलेल्या गोष्टी आहेत. (काही माझ्याही आहेत). सगळ्या अधू-या प्रेमाच्या. यात माझी कल्पनाशक्ती फक्त नावे बदलण्यापुरतीच वापरणार आहे. जे धागे मला माहीत नव्हते , कधी कळालेच नाही ते मनाने जुळविण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि त्याची गरज ही नाही. सुंबरान मध्ये पार्वतीचे नेमके काय झाले हे शेवटपर्यंत न कळाल्याची रुखरुख सुंबरान ला वेगळ्या पातळीवर नेते.

हे काहीसं विस्कळीत वाटेल. यात साहित्यिक गुणवत्ता फारशी नसेल याची मला जाणीव आहे. पण मी हे का लिहतोय ते थोडं स्पष्ट करतो.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यहवार सांभाळत असताना भावूकता लोप पावते असं मला वाटतं. आपल्यापै़की अनेकांनी तरुणपणी प्रेमातली हुरहुर अनुभवली असेल, किमान मित्र-मैत्रीणींनी त्यांची सुख-दु:ख तुम्हाला ऐकवली असतील. आता व्याहवारिक चिंता अनेक असल्यात तरी अधू-या प्रेमाची ती तडफड, हुरहुर यांचा अनुभव, त्यातुन निर्माण झालेला हळवेपणा या गोष्टी आता आयुष्यात नाहीत. अनेकदा मी ते "मिस" करतो. पण सुंबरान किंवा ईजाजत सारखे चित्रपट, एखादे गाणे पुन्हा मनात चलबिचल निर्माण करतात. जुन्या आठवणी मनात दाटतात. त्यातूनच हे सगळं लिहावसं वाटलं. हे मी तुकड्यांत लिहणार आहे.. आपल्या प्रतिक्रियांच स्वागत आहे.

[हे लिहताना सगळी नावं, संदर्भ बदलले आहेत]

१)
सुरेखा नुकतीच एका मोठ्या उत्पादन कंपनीत नोकरीस लागले होती. ती काहीशी कमी बोलणारी होती. कार्यालयात खूप मोठा कर्मचारी वर्ग होता, पण ४-५ जणच तिचे मित्र-मैत्रीण होते. तिचे लग्न ठरले तेव्हा तिने या मित्रांना साखरपुड्याच्या समारंभाला बोलावले होते. तिथे अश्रफ ला पाहून थोडे आश्चर्य वाटले कारण अश्रफ हा जरी त्याच कार्यालयात कामाला होता तरी तो त्या दोघांत मैत्री आहे हे कुणाला माहीत नव्हते. तोपर्यंत कुणी त्या दोघांना फारसे एकत्र बघितले नव्हते.
पण नंतर ते दोघे कार्यालयात अनेकदा एकत्र दिसू लागले. अनेकदा एकाच ठिकाणी उभे राहून कितीतरी वेळ बोलत असत. एका खोलीचे नुतनीकरण चालू होते, अनेकदा ते त्या खोलीत बोलत उभे असत. एकाच कार्यालयात काम करत असले तरी दोघांचे प्रोजेक्ट निराळे होते, वरिष्ठ ही वेगळे होते. पुढे काही कारणाने अश्रफ च्या प्रोजेक्टची टीम त्याच शहरातील दुस-या एका कार्यालयात बसू लागली. पण अश्रफ काहीतरी निमित्त काढून जुन्या (मुख्य) कार्यालयात जात असे. यावरुन एकदा वरिष्ठांकडून त्याला बोलणी खावी लागलीत. दरम्यान ठरल्याप्रमाणे सुरेखाचे लग्न झाले. काही महिन्यांनी पुन्हा अश्रफ ची टीम मुख्य कार्यालयात बसू लागली. कार्यालयीन वेळात आणि आवारात दोघांचे भेटणे चर्चेचा विषय होऊ लागला. कंपनी जुनी होती आणि कंपनीचे वातावरणही फारसे मोकळेपणाचे नव्हते. या दोघांचे जे मित्र आणि हितचिंतक होते त्यांना वाटू लागले की या दोघांना याबद्दल समजवावे. अर्थात प्रत्यक्ष त्यांच्याशी याबाबत बोलण्यास कुणी तयार होईना. अखेर जयराज आणि शुभांगी या दोघांनी तसा प्रयत्न करायचे ठरवले. जयराज ने अश्रफ शी बोलायचा प्रयत्न केला, पण तो दाद देईना, तो या विषयावर बोलायला तयारच नव्हता. तर सुरेखाकडे शुभांगीने हा विषय काढल्यावर सुरेखाने "आम्ही फक्त मित्र आहोत, बाकी आमच्यात काही नाही" असे तिला ऐकवले. अखेर इतरांनीच तो विषय सोडला. पुढे अश्रफ ने पुढील शिक्षणासाठी ती नोकरी सोडली. आणि सगळ्यांकरिताच ते प्रकरण तिथे बंद झाले. त्या दोघांतले भावबंध नेमके कशा स्वरुपाचे होते , त्यांच्यात फक्त मैत्री होती , की प्रेम की आणि काही , तसेच त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते का हे कधी कळालेच नाही.

कथासाहित्यिकअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Feb 2014 - 5:09 pm | मुक्त विहारि

आवडली....

सुबंरान मारल ग सुबंरान मारल .

किसन शिंदे's picture

5 Feb 2014 - 6:06 pm | किसन शिंदे

दोन जिवलग मित्रांमध्ये वारंवार घडणार्या भेटींना किंवा त्यांच्यातल्या दाट बोलण्याला प्रेम कसं म्हणता येईल?

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2014 - 11:10 am | मराठी कथालेखक

मी काहीच म्हणत नाहीये. काही अर्थ काढायचाही नाहि. पण त्या एका जुन्यापुराण्या उत्पादन कंपनीतले वातावरण मोकळेपणाचे नव्हते. त्यात तिचे लग्न ठरले आणि नंतर झाले होते. आणि रोज बराच वेळ गप्पा मारत थांबणे निश्चितच वेगळे वाटत होते.

सुंबरान मध्ये पार्वतीचे नेमके काय झाले हे शेवटपर्यंत न कळाल्याची रुखरुख सुंबरान ला वेगळ्या पातळीवर नेते.

हा संदर्भ कळला नाही.

कथाबीज छान आहे. अजून फुलवा.

यावरून आठवलं : "प्रेमात पडलेल्यांच्या गोष्टी" असा भा रा भागवतांचा एक कथासंग्रह आहे. विनोदी अंगाने फुलवलेल्या मस्त कथा आहेत.

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2014 - 11:14 am | मराठी कथालेखक

सुंबरान नावाचा मराठी चित्रपट आला होता. फारसा चर्चिला गेला नाही, चॅनेल वर पण येत नाही सहसा.
पण खूप छान होता.
गजेंद्र अहिरेंनी बनविलाय, पण मला अगदी "गुलजार टच" वाटतो त्यात.

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2014 - 11:19 am | मराठी कथालेखक

कथाबीज छान आहे. अजून फुलवा.

माफ करा. मी कथा फुलवत नाहीये. प्रत्यक्ष जवळून पाहिलेल्या, हळूवार, आणि अर्ध्यावर निसटलेल्या नात्यांच्या मनात राहिलेल्या आठवणी मांडतो आहे, किंवा तसा प्रयत्न करत आहे.

मराठी कथालेखक's picture

11 Feb 2014 - 3:24 pm | मराठी कथालेखक

पार्वती नव्हे शकू... खूप दिवसांनंतर मी पात्रांची नावं विसरुन गेलो आणि चुकीचा संदर्भ दिला.

सौंदाळा's picture

5 Feb 2014 - 6:37 pm | सौंदाळा

थोडक्यात आटपलत राव तुम्ही.
३ कंपन्या झाल्या पण प्रत्येक ठिकाणी सुरेखा आणि अश्रफ पाहीलेत.

लोकांना कदाचित समजला नाही किंवा त्या चित्रपटाचे टायमिंग चुकले म्हणा … फार चर्चा झाली नाही त्याची ! खरं तर 'सुंबरान ' हे नाव वाचून त्या चित्रपटा बद्दल काही असेल असे समजूनच हा धागा उघडला .

मराठी कथालेखक's picture

27 Oct 2016 - 4:23 pm | मराठी कथालेखक

ज्या महिन्यात मी हा लेख प्रसिद्ध केला त्याच महिन्यात हा सुंदर चित्रपट YouTube वर प्रसिद्ध केला गेला होता. पण मला आज दिसला !!

सुंबरान चा सर्व कथा वाचल्या .. असंच काहिसं आपलंही असत.. नाही का..कधीच पूर्ण न होउ शकनाय्रा आपल्याही गोष्टी..