✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुप्तकाशीतील योगी 1

य
यकु यांनी
Tue, 05/29/2012 - 15:53  ·  लेख
लेख
शुक्रवारी रात्री मॅनेजरसोबत झंगडपक्कड झाली आणि मी तिथेच नोकरीचा तोंडी राजीनामा सांगून टाकला. म्हणजे हे सगळं सांगितलंच पाहिजे. झालं असं की त्याच्या एकदोन दिवस आधी ऑफिसमध्‍ये माझं काम नेहमीच्या स्पीड ने चालू होतं. इकडे मिपावरही लॉगीन होतोच. यांचा, म्हणजे ऑफिसमधल्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे. यांच्यापैकी कुणाचंच कामात लक्ष नसतं. कामातच कशाला, कुठेच म्हणजे कुठेच लक्ष नसतं. कुठेतरी पहातात, काहीतरी करत असतात - मनात काहीतरी वेगळीच चक्की फिरत असते; आणि यांना नेमकं काय चाललंय हे कळत नाही. काही कळलंच तर तेही ज्याचं त्याचं पर्सनल इंटरप्रिटेशन असल्यानं फारसा काही संवाद होत नाही, वाद होतात. म्हणजे तथाकथित स‍गळे संवाद हे वादांचे जन्मदाते आहेत. नुसतं म्हणायचं अहो तसं काही नाही हो - आणि त्यांनीही म्हणायचं हो, हो मलाही तसं काही वाटलं नव्हतंच आणि मग नेमकं कसं आहे याची दोन्हीकडे इंटरप्रिटेशन्स मात्र आपोआप सुरु होतात. तर हे सगळ्याचं सगळं असंच आणि सगळे ज्याच्यात्याच्या कुवतीप्रमाणे बरोबरच. मी पण असाच. तर असा मी माझ्या पद्धतीनं काम करत होतो. तर ती आमची टीम लीड ! ही पण महाराष्‍ट्रीयनच. कधीतरी इकडे हिंदी इलाख्यात आली आणि इकडचीच होऊन राहिली. कंपनीची जुनी, कमिटेड कर्मचारी वगैरे. म्हणजे हिच्या डोक्यावर जास्त लोड असणारच. म्हणून ही आपली दर अर्ध्‍या एक तासाला तिच्या चेअरवरून उठते आणि कंपनीभर बेल घालत हिंडते. तर ही मला तिच्या खुर्चीत बसून म्हणे 'यशवंत, झालं की नाही - जरा पट पट हात उचल.' च्यामायला ! सीएमएमआय लेव्हल 3 कंपनीतली ही कारभारीण बांधकामावरचे मुकादम जी भाषा वापरतात तीच भाषा वापरत होती - आणि ही पुन्हा भारतातल्या सगळ्यात जुन्या वेब पोर्टल कंपनीचंच एक्स्टेन्शन असलेल्या लँग्वेज लोकलायझेशन मधली लँग्वेज लोकलायझर किंवा शुद्ध मराठीत अनुवादक किंवा भाषांतरकार! आणि बोलायची भाषा ही अशी. बरं, आधीही दोन-तीनवेळा माझ्या मागच्या मुलीशी गप्पा मारुन आणि मला हात उचलण्‍याचा प्रेमळ इशारा देऊन गेली होतीच. आणि माझे हातही चालत होतेच, तिने पाहिलंही होतं. मग मी म्हटलं आता होऊनच जाऊद्या ! मला एक जस्ट माहिती असावी म्हणून तिला विचारलं, 'दिवसाला सरासरी तुमचे किती शब्द होतात?' हे विचारणं म्हणजे की बुवा तुम्ही कंपनीच्या एवढ्या जुन्या कर्मचारी, टीम लीड आहात तर बेसिक नॉर्म्स वगैरे यांनाच विचारले तर वाईट काही नाही. पण बाई एकदम उपसली. म्हणे, 'तु मला विचारु नको मी किती काम करते ते!' मी म्हटलं 'असं कसं? तुम्हाला नाही विचारायचं तर कुणाला विचारायचं? अप्रूव्ह व्हायलाच पाहिजे!' मग ती तापली आणि काहीबाही बोलली. मग मीपण आणखी तापवली. म्हटलं, 'हे असे वाद घालता, आणि तिकडे जाऊन सांगता की हा नेहमी वाद घालतो म्हणून ! हे बरंय.' मग तिनं माझ्याशी बोलणं बंद केलं. म्हटलं सोन्याहून पिवळं. नाहीतरी तिनं सवयीप्रमाणं 'आज यशवंतने फिरसे झगडा किया' वगैरे कानाफूसी केलीच असती. माझं आपलं सगळं कसं मस्त सुरु होतं. इकडे गणामास्तरला लंब्याचौड्या खरडी टाकत होतो. ते झालं की तिकडे काम सुरु होतं. म्हणजे हे माझं बेल घालणंच, पण बसल्या बसल्या. जेवढं काम होतं तेवढं आटोपत आणलं. बाकीचे सगळे निघून गेले. आम्ही उशीरा येणारे म्हणून मग आम्ही सगळ्यात शेवटी जाणार. पण शुक्रवार होता म्हणजे विकेंडचे दोन दिवस सुट्टी. दुसर्‍या एका मॅनेजरचा सगळेजण कामे मस्त करीत असल्याबद्दल सगळ्यांनाच पाठीवर थाप देणारा, आणि लोड भरपूर असल्यानं विकेंडलाही या हे सांगणारा मेल येऊन पडला होता. माझ्याकडे दिलेलं काम तर जवळपास अर्ध्‍या तासाचं राहिलं होतं. म्हणून उठलो आणि मॅनेजरला विचारलं की उद्याचं कसं? यायचंय की नाही? तर ते म्हणे, 'हां, हां, जरुर आना - क्यों नहीं आना है?' म्हटलं मग काम? माझ्याकडचं तर सगळं संपलंय. तर तो म्हणे उस अमुक तमुक से टीम में डिस्कस नहीं किया क्या? मी काय बोलणार? मी आपला आतल्या आत निरर्थक हसलो. मग त्यानं त्या कारभारणीला फोन लावला. तिनं दुपारी झालेला आमचा संवाद सांगितला असणार. पण तो काही बोलला नाही. तो म्हणे, 'तुम कल आ जाना.' म्हटलं ठीक. डेस्कवर येऊन बसलो तर चॅटवर लगेच त्याचा मेसेज. Pl. come. गेलो. तर तो म्हणे, 'तुम्हें पहले भी समझा चुका हूं, लेडीज के साथ डिस्प्युट मत करो.' मी म्हटलं 'आपको किसने बताया? तर तो म्हणे, उसने नहीं बताया - और कोई है जिसने आज तुम्हारी दादागिरी देखी और मुझसे बात की. ऐसा नहीं होना चाहिये. नहीं तो निकाल दूंगा. तुम्हारी सोने-जागने की प्रॉब्लेम थी तो कंपनीने तुम्हारा टाईम चेंज करवा दिया है वगैरे वगैरे. पण यामध्‍ये 'निकाल दूंगा' हे माझ्यासाठी नवीन होतं. म्हणून पुन्हा विचारलं, 'क्या कहा आपने सर?' मग चुकून शब्द निघून गेला, तो जायला नको, पण आता विचारलंच आहे तर पुन्हा बोलावं की न बोलावं अशा गोंधळात पडून तो म्हणे 'निकाल दूंगा.' मी म्हटलं, 'आप मुझे नहीं निकाल सकते. मैं अभी इसी वक्त रेसिग्नेशन दे रहा हूं.' आता संपायला पाहिजे ना? पण कसंच काय. तो म्हणे, 'तुम अपने आप को समझते क्या हो? मुझसे ऐसी बात करते हो तो टीम में कैसे बात करते होगे? धक्के मार के बाहर निकाल दूंगा. अमुत तमुकजी, इसको अभी धक्के मारके बाहर निकालो.' त्याच्या अंगाला थरथराट, त्याच्या आवाजानं कंपनी दणादूण गेली आणि राहिलेसाहिले जेवढे आफिसमध्‍ये खुडबूड करीत होते तेवढे उठून तमाशा पाहू लागले. मी आपला access कार्ड घेण्‍यासाठी डेस्ककडे वळलो. तर त्याचा आवाज अजून चढला आणि तो खुर्चीवरुन उठला. 'उधर किधर जा रहे हो?' तो ओरडला. 'access कार्ड ले रहां हूं'. मी आपला काहीच झालेलं नाही असा शांत. 'access कार्ड कंपनी का है, तुम पहले बाहर हो जाओ. अमुकतमुकजी, मैने कहा ना इसको धक्के मारके बाहर निकालो.' आवाज चढलेला, त्याच्या अंगाचा थरथराट आणखी वाढला. अमुकतमुकजी मला काय धक्के मारणार. माझं पाणी संपलं तर मी स्वत: उठून पाणी आणतो, आणि अमुकतमुकजी मग महापाप झाल्यासारखा चेहरा करुन माझ्यामागे पळत येतात. आणि मी, 'कोई बात नहीं है' म्हणून माझी बाटली भरुन घेतो तेव्हा ते चमत्कार झाल्यासारखं माझ्याकडे पहात रहातात. धक्का मारणार कसा? ते बिचारे आपले घाबरुन सगळं पहात उभे होते आणि मॅनेजर माझ्या दंडाला धरुन ढकलत होता. मी हात सोडवून घेतला. त्याला म्हणालो, 'आप हातापाई पर उतर रहै है सर' आता हातापाई हा शब्द ऐकून सगळं आवरुन घराकडे निघालेली एक हिंदी लोकलायझर मुरक्यामुरक्या हसली. नंतर विचार करताना म्हटलं च्यायला हा शब्द चुकला की काय? हातापाई म्हणजे हाणामार्‍याच ना? काय असेल ते असो. 'मुझे मत समझाओ, अमकुतमुकजी मैने कहा ना इसको बाहर हकालो.' अमुकतमुकजी ढिम्मच. मग मीच पावलं उचलायला लागलो. त्याचा पट्‍टा सुरुच. 'और कल इधर आना भी मत!' 'सर इसमें इतना झल्लाने की क्या बात है? मै जा रहां हूं ना?' 'मुझे मत समझाओ, तुम पहले यहां से निकलो.' मागोमाग प्रचंड राग आणि थरथराट. मी आपला चालण्‍याच्या नेहमीच्या वेगानं काचेच्या दाराबाहेर पडलो. आणि म्हणालो, 'इसे आप ध्‍यान में रखिए सर' 'तुम्हारी दादागिरी बहोत हुयी.. तुम पहले यहां से निकलो.' सगळं सेमच. वीस पंचवीस मिनिटात रुमवर पोचलो. रस्त्यात त्या मघाच्या मॅनेजरला फोन लावला. 'शांत हो गये सरजी?' 'अब क्या है' तो तसाच तापलेला. 'कुछ नहीं, ऐसे ही कुछ बातें बताने के लिये फोन किया है' 'क्यों क्या बताना है?' 'सर, मै इतनी दूर से यहां नोकरी के लिये आया हूं, मैने कभी दादागिरी नहीं की.. मै बेझिझक बात करता हूं, डरता नहीं बस इतनाही है. ये छोटीमोटी बातें तो होती रहती है. वो कुछ बिहेवियरल पैटर्न कहते है ना' 'तुम्हें इतनी बातें पता है तो, तुम ठीक से बात क्यूं नहीं करते?' तो अजून पहिल्यासारखाच तापला. आवाज वाढला. बघा, केला की नाही फोन असं सगळ्यांना कळायला पाहिजे हे त्याच्या फोनवर वाढलेल्या आवाजातून दिसत होतं. 'सर सुनिए, मैने फिरसे आपको टेन्शन देने के लिये फोन नहीं किया है, कुछ बात बतानी है. मुझे निकाल दिया गया है वगैरा बाते ठिक. उसको भूल जाईये.' 'तुम मुझे कुछ मत समझाओ..' 'अब कैसे बताऊं सर.. इसी रवैय्ये की वजह से xxx जी भी तंग आ चुके है. अगले महिने में अपराइजल होने के बावजूद xxxजी रेसीग्नेशन देने की सोच में है..' 'धमकी दे रहे हो?' 'सर, मै अब कैसे बात करुं मेरी समझ में नहीं आ रहा है..' 'हम दस साल से कंपनी चला रहें है.. हमें पता है लोगों से कैसे डील करना है.. तुम मुझे मत समझाओ, तुम अपनी खुद की कंपनी निकालो..' 'वो तो होता ही रहेगा सर, वो बात नहीं है.. मै कुछ अलग कह रहा हूं.. ठिक है..' म्हणून फोन ठेऊन दिला. काही झालेलं नाही असं नेहमीसारखंच घरी आलो. येऊन शांत विचार करीत बसलो. तेवढ्यात विलासरावचा फोन. 'काय? विसरले का? उद्या येताय की नाही?' म्हटलं, 'हो, हो, आत्ताच ऑफिसमधून आलोय. उद्या सकाळी साडेअकरापर्यंत धामणोदला भेटूच.' 'बरं, मला वाटलं विसरले का काय' म्हटलं 'नाही हो, विसरेन कसा, येतोय सकाळी' म्हणून फोन ठेवला. इथून सत्तरेक किलोमीटरवर असलेल्या धामणोद गावी विलासरावांची भेट घ्‍यायचं मागच्या आठवड्यातच ठरलं होतं. ते तिकडे परिक्रमेत होते. आत्मशून्य आणि ते सोबत चालत नव्हते. नेहमीच्या वादावाद्या व्हायला लागल्यावर काय करणार. आत्मशून्य म्हणजे त्याला कोणत्याही गोष्‍टीवरुन कितीही वेळ वाद घालायचा भारी कंड! हे आपले विलासराव म्हणजे संत माणूस. कुठेतरी अति झाल्यावर ते म्हणे, बाबा, तु आपला तुझ्या रस्त्यानं जा, मी माझ्या जातो. मला कशातलं काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा टकुर्‍याला ताण नको. मागच्या वेळी मी त्याच्या परिक्रमेबद्दल मिसळपाववर लिहिल्यानंतर संकल्प मोडून परिक्रमा खंडीत झाली म्हणून नंतर आत्मशून्य विलासरावकडे मुंबईला जाऊन राहिला होता. आत्मशून्यच्या निमित्ताने का होईना विलासराव त्याच्यासोबत परिक्रमेला आले हीच विलासरावांसाठी खूप मोठी गोष्‍ट होती. बाकी तात्विक वादात त्यांना रस नव्हता. विपश्यना करीत चालावं, वाद वगैरे विलासरावांचं काम नाही, 'आपल्याला काय कळतं?' हा त्यांचा गुरुमंत्र - त्याप्रमाणे ते वागले. मला या सगळ्या गोष्‍टी फोनवरुन बोलताना कळल्याच होत्या. मला वाटलं विलासराव आणि आत्मशून्य दोघं मिळून माझी मजा घेत आहेत. मागच्या वेळी आत्मशून्य इथून मुंबईला पोचला तरी, 'आत्मशून्य पोचलाच नाही, काही फोन पण नाही' वगैरे थापा मारुन त्या दोघांनी मिळून माझी फिरकी घेतली होती. मला वाटलं हेही तसंच असणार. पण विलासराव म्हणे खरोखर ते सोबत नाहीत. आत्मशून्य त्यांच्या सोबत नसला तरी ते दोघे दोन-चार किलोमीटर मागेपुढे राहूनच चालत होते. दोघांचीही भेट होईल या विचारानं मी विलासरावला या विकेंडला धामणोदला येतो असं सांगितलं होतं. उलट मॅनेजर विकेंडलाही ये म्हणाला तेव्हा विलासराव नाराज होणार म्हणून मला मॅनेजरशी वाद होण्‍यापूर्वी क्षणभर वाईट वाटलं होतं. आता नोकरीचंही टंपर वाजल्यानं तो विषय राहिला नव्हता. म्हणून मी सॅक भरायला लागलो. आत्मशून्यसाठी परिक्रमेत मागच्यावेळी घेतलेली चटई तो इथेच टाकून गेला होता. तिच्यावरची खंडीभर धूळ आधी झटकली. तिची गुंडाळी करुन वरुन दोरीनं पक्की बांधली. अंथरायला पांघरायला मिळत नाही असं नाही, पण आहेच पडून तर घेऊन टाकलं. रग, एक टी शर्ट, वही-पेन, एक सिगारेट उरलेलं पाकीट-माचिस, कितीतरी दिवस उगाच पडून असलेली आणि काहीच पहाण्‍यासाठी उपयोगी न पडलेली दुर्बिणही बॅगेत टाकली. नेहमीप्रमाणं रात्रभर झोप आलीच नाही. उगी पडून कूस बदलत, उठून बसत, पुन्हा पडून रहात जागा राहिलो. लॅपटॉप गंडला होता त्यामुळं इकडे ऑनलाइन यायची पण बोंब. उगीच टाइमपासमध्‍ये सकाळ झाली. साडेआठ वाजू दिले आणि स्नान करुन चहा प्यायला निघालो. विलासरावला निघतोय म्हणून फोन केला. ते म्हणे, निघा - साडेअकराला भेटल्यावर बोलूच. नाष्‍टा, चहापाणी आवरलं आणि सॅक पाठीवर अडकवुन, गुंडाळी करुन दोरीनं बांधलेली चटई हातात झुलवत अन्नपूर्णा रोडवर गेलो. तिथून व्हॅन पकडून राजेंद्रनगर. तिथे गेलो तर बसचा पत्ता नाही. बसस्‍टॉपवर उभ्या असलेल्या एका भावड्याला विचारलं धामणोदला जाणारी बस याच बाजूला थांबते का? तो म्हणे 'सामने वाली बाजू पर रुकती है' म्हणून तिकडे गेलो. तर एक भिकारी चहा प्यायचा इशारा करीत पैसे मागू लागला. म्हटलं छुट्‍टे नहीं है, म्हणजे नव्हतेच. तो तोंडावर आणखी अजिजी आणून चहा प्यायचा हावभाव करु लागला. 'बस चाय पिनी है..' म्हटलं, चलिये, दोनों साथ में पिते है. हॉटेलवाल्यासाठी तो भिकारी रोजच्या ओळखीतला असावा, कारण त्यानं खरोखर हाकलून न लावण्‍याच्या भाषेत त्याला तिथून जायला सांगितलं. मी म्हटलं दो चाय दिजीए. 'अभी देता हूं सर' त्यानं एक चहा मला दिला. दुसरा त्या भिकार्‍याला दे म्हटल्यावर त्यानं भिकार्‍याकडच्या कटोर्‍यात चहा ओतला. पैसे देऊन हे आटोपलं आणि कुठेतरी बसची वाट पहात थांबलो. सव्वादहा वगैरेला बस आली आणि हलली. थोडावेळ मागे गर्दीत उभं राहिल्यानंतर एका स्‍टॉपवर कुणीतरी बाई उतरून गेल्यानं केबीनमध्‍ये बसण्‍यापुरती जागा रिकामी झाली. बसचा ड्रायव्हर माझ्यासारखाच गप्पिष्‍ट होता. काहीही बोलत होता. दिल्लीकडचे ड्रायव्हरलोक आणि ड्रायव्हरकीचे किस्से, मध्‍येच मागच्या गाडीवरच्या ड्रायव्हरनं ओव्हरटेक करुन गाडी पुढे काढली की त्याला गाठून अगदी समांतर बस ठेऊन 'अबे कबूतर, ठिक से चला जरा, स्वर्ग सिधारना है क्या? साले कैसा भी चलाते है' मग त्या गाडीचा ड्रायव्हर याच्याकडे पाहून हसल्यानंतर याला आणखीच जोर येणे वगैरे. केबिनमधले लोक त्या ड्रायव्हरला दाद देऊन आणखी मजा वसूल करीत होते. त्यानं मलाही एकदा छेडलं. मी आपलं उगीच गोड हसून माझ्यामाझ्या नादात राहिलो. एकतर झोप न झाल्यानं आत कशाचाच कशाला पत्ता राहिला नव्हता. सगळं एक होऊन गेलं होतं. सगळीच्या सगळी माणसं मजेदार वाटत होती - पुन्हा मग आणखी गप्पा करुन काय मजा घ्‍यायची. घाट, घाट संपला की रस्त्याच्या कडेला उलथ्‍यापालथ्‍या, चकणाचूर होऊन पडलेल्या दोन ट्रक, आत्ता दहा मिनिटापूर्वी मागून धडक बसल्याने गाडीची काच फुटलेली कार, त्यात तशीच बसून असलेली बाईमाणसे, उघडेबोडखे डोंगर अशा बर्‍याच गोष्‍टींवर नजर गेली. होता होता धामणोद आलं. खाली उतरून मोबाईल पाहिला तर विलासरावचे दोन कॉल येऊन गेलेले दिसत होते. मला गाडीच्या आवाजात कळलं नव्हतं. त्यांना फोन लावला. ते म्हणे आत्ताच धामणोदमध्‍ये प्रवेश केलाय. बालाजी मंदीरात थांबा. बालाजी मंदीर कुठे ते शोधलं. एका दुकानातून एक टोपी विकत घेतली. बरेच गॉगल उचकले, पण एकही धड नव्हता. बालाजी मंदीरात जाऊन चटईची गुंडाळी, टोपी आणि सॅक एका बाजू टाकून दिली. उगी घ्‍यायचं म्हणून दर्शन वगैरे घेतलं आणि मंदीरातल्या जोडप्याचं निरीक्षण करीत मंदीराच्या ढाळजातच बसून राहिलो. विलासराव दारात आले, त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा एकदम पोटात धस्स झालं. एवढा अंगापिंडानं जबरा माणूस पण अर्धाच शिल्लक राहिला होता. पुन्हा मे मधल्या भाजून काढणार्‍या उन्हानं काळे ठिक्कर, दाढी बोटभर वाढलेली. गळाभेट घेतली. त्यांनी दर्शन घेतलं. थोडावेळ बोलत बसलो. किती खराब झालात, हसणं, एकमेकांना उचकावणं, दाद वगैरे. आमच्या गप्पा चालू असताना त्या बालाजी मंदीराचा पुजारी पोर्‍या मंदीर बंद व्हायची वेळ झाली असं सांगत आला. म्हणजे आता तुम्ही इथून जा. विलासरावांच काम म्हणजे एकदम थेट. त्यांनी त्याला इथे आराम करायचा आहे, पुस्तकात या मंदीराकडून परिक्रमींच्या रहाण्‍याची सोय होते, होत असेल पहा नाहीतर दुसरी काही सोय करावी लागेल असं सांगितलं. मी त्याला नीट समजावून सांगितलं की बुवा हे परिक्रमेत आहेत, आणि मी त्यांना भेटायला आलोय. उन टळेपर्यंत आम्हाला थांबायचं आहे, आम्हाला आराम करायला जागा पाहिजे. मंदीर बंद असताना आत थांबलो तर चालेल ना? मागे बरीच मोठी रिकामी जागा दिसत होती. तो म्हणे 'क्षमा करें, इसके बारे में मै अनुमती नहीं दे सकता. आप पुजारी जी से बात किजीए' म्हणजे मंदीरात येणार्‍या लोकांना नुसताच तीर्थप्रसाद आणि अंगारा वगैरे देणारा, नारळ स्वीकारणारा होतकरु मुलगा होता. याच्या हातात तेवढंच होतं. तेवढ्यात तो पोरगेलासाच, पुजार्‍याचा लालभडक जरीकाठी डगला, कपाळावर कुंकवाने उभा नाम लावलेला मुख्य पुजारी आला. विलासरावांनी त्याला जागेबद्दल विचारलं. पुस्तकात लिहिलंय म्हणून आलोय, इथे व्यवस्‍था होत असेल तर ठिक, नाहीतर कुठल्यातरी दुसर्‍या मंदीराच्या पारावर जाऊन बसावे लागेल. हे म्हणजे एकदम थेट काम. ऐकणार्‍याला काय वाटायचंय ते वाटो, विलासराव बोलून मोकळे होणार. मीही मागे जागा दिसतेय, तिकडेही आम्ही थांबू शकतो असं सांगितलं. त्याने विलासराव आणि माझी पुन्हा एकदा माहिती विचारली. ठिक आहे म्हणे, आहेत रुम मागे - देतो एक उघडून, असे फिरुन मागच्या बाजूने या. मंदीराच्याच शेजारच्या बोळीतून आत गेलो. एक मोठं लोखंडी गेट होतं. आत भलंमोठं पटांगण आणि गेटलाच लागून पाच-सहा खोल्या काढलेल्या होत्या. खोल्यांच्या दोन्ही बाजूला टोलेजंग, हिरवेगार पिंपळ वार्‍यावर सळसळत झुलत होते. मैदानाच्या मागच्या बाजूला दोन-चार हजार माणसे एकावेळी बसू शकतील एवढं मोठं लोखंडी शेड होतं. सध्‍या एकही माणूस न बसलेल्या त्या शेडमधले काही फॅन चालूच होते की वार्‍यानं आपोआप फिरत होते देवजाणे. मंदीराच्या पुजारीगिरीचा युनिफॉर्म उतरवून, बनियन आणि टॉवेल लाऊन आलेल्या त्या पुजार्‍यानं आतून किल्ली आणली आणि आम्हाला खोली उघडून दिली. आत खूप धूळ साचली होती. विलासराव थांबा, थांबा - झाडू आणतो म्हणतोय तोपर्यंत लगेच अंगावरच्या पंच्याने खोली स्वच्छ करु लागले. कशाला लागतोय झाडु, पंच्यानंही स्वच्छ होतंय म्हणून त्यांची ती झाडलोड सुरुच. मी बाहेर पळालो आणि पिंपळाच्या सावलीत बटाटे भाजत बसलेल्या दोन आयाबायांना झाडू आहे का विचारलं. आप कौन, कहां से वगैरे झालं. पुजारीही तिथेच त्यांच्याजवळ उभा होता. त्यानं तिथल्या एका लहान पोराला आतून झाडू आणायला सांगितला. आमच्या त्या आयाबायांबरोबर गप्पा झाल्या. परिक्रमेत असलेल्या माझ्या मित्राला इंदुरहून भेटायला आलोय, वो (म्हणजे विलासराव) मुंबई से है वगैरे सांगितलं. पोरगा आतून झाडू घेऊन आला. घेतला आणि आत जाऊन रुम स्वच्छ झाडून घेतली. स्वच्छ कशाची, कामापुरती स्वच्छ म्हणू. इथेतिथे खंडीभर धूळ साचलेली होती, विलासरावांनी पंच्यानं झटकली होती तरी होतीच, आणि मी झाडून काढलं तरी होतीच. विलासराव म्हणे राहु द्या. लई परेशान होऊ नका, कामापुरतं स्वच्छ झालंय तेवढं बास. विलासरावांनी रात्री लागेल म्हणून रामदासकाकांनी दिलेली बॅटरी मोबाईलचं चार्जर वापरुन चार्जिंगला लावली. रामदास काकांनी विलासरावला परिक्रमेसाठी म्हणून भेट दिलेल्या ह्या बॅटरीवर विलासरावचा फार जीव. एवढी सुंदर, आटोपशीर बॅटरी - मोबाईलच्या चार्जरवर चार्ज होणारी आणि लख्ख उजेट टाकणारी. म्हटलं पहा, तुम्ही ज्या परिक्रमेच्या मार्गावरुन चालणार आहात तिथं तिथल्या अंधाराचा आधीच विचार करुन ही आटोपशीर बॅटरी भेट देणारे रामदास म्हणजे महान माणूस असले पाहिजेत. विलासराव म्हणे हे आवर्जून लिहाच. कचरा दरवाज्यातून बाहेर लोटून दिला आणि झाडू परत द्यायला निघालो तर त्या आयाबाया म्हणे रहने दो वहींपर. त्यांनी आमची जेवणाखाण्याची व्यवस्‍था काय आहे ते विचारलं. त्यांच्याकडून जेवण देण्‍याची त्यांची तयारी दिसली. पण विलासराव किंवा मी त्या विषयावर जास्त बोललो नाहीत. परत आलो आणि विलासरावांनी स्वच्छ केलेल्या फरशीवर सॅकमधून काढलेली एक लहान सतरंजी टाकली. मी माझ्यासोबत गुंडाळी करुन आणलेली चटई अंथरली. ते म्हणे हे कशाला उगाच आणलंत, संतरजी आहे की माझ्याकडे. फार मोठी होत होती म्हणून मधोमध कापून दोन भाग केलेत. म्हटलं कुठे सोय होते न होते, उगी कशाला कुणाला मागा, रुमवर पडून होतीच तर घेऊन आलो. एक छोटी रगसुद्धा आणलीय. ते म्हणे तुमची भलतीच तयारी, चला आता असेच परिक्रमेला. मी म्हटलं तसंही परिक्रमेला निघायला काहीच हरकत नाही, कारण इंदूरच्या नोकरीचं टंपर वाजलंय. पण रुम मालकाला काही सांगितलेलं नाही, इकडे परिक्रमेला तुमच्यासोबत निघालो तर रुमचं लफडं तिकडे तसंच राहिल. लॅपटॉप तसाही सर्व्हीस सेंटरवर टाकलाय म्हणून त्याचं टेन्शन नाही. पण खरं सांगायचं म्हणजे मला कंपनीतले लोक फोन करुन बोलावून घेणार, धक्केबिक्के मारले असले तरी नोकरी काही जाणार नाही वगैरे आशा होतीच. एकतर कामं एवढी पडलेली आणि लोकं कमी आणि हे शहाणे लोकांना हाकलून द्यायला लागले. माझ्‍यासोबतचा महाराष्‍ट्रातून कुटुंब वगैरेसोबत रहाणारा मित्रही तीन-चार वर्षांच्या नोकरीला विटला होता. राजीनाम्याचा फॉर्मेट लिहून द्या म्हणून मागे लागला होता. मीच अडून बसलो होतो की प्रिंट मीडियात काही राम राहिलेला नाही. पुढच्या महिन्यात अपरायझल वगैरे होणार होती, ती झाली तरी तो राजीनामा द्यायचाच म्हणून बसला होता. मी ज्या पेपरमधून आलो तिथेच त्यांना जायचं होतं. त्यांनी आधी प्रयत्न केला होता पण प्रतिसाद चांगला मिळाला नव्हता. मी त्या पेपरच्या स्‍टेट हेडचाच पीए राहिलो होतो, म्हणून काही फोन करुन त्यांचं तिकडे जमवून देता येण्यासारखं होतं. पण विषय निघेल तेव्हा तेव्हा प्रिंट मीडिया कसा बेक्कार, इथंच बरंय, चांगला पगार आहे, आता चार वर्षात सगळं सेट झालंय कशाला उगाच विस्कटता हे मी त्यांच्या मनावर ठसवत होतो. इव्हन त्यांनी राजीनामा दिला की मला कंपनीनं दुप्पट पगार दिला तरी मीही राजीनामा देणार अशी त्यांना खात्री दिली होती. कारण कंपनीत चार वर्षांपासून असलं वाईट विसंवादाचं वातावरण आणि कामं मात्र गाढवासारखी. वरुन पुन्हा लेडीजला कुणी काही बोलायचं नाही अशी ताकीद. च्यायला ह्या लेडीजच्या. लेडीज झाल्या म्हणून काय उरावर बसणार काय. मी बोललो तर हाकलला गेलो. मरो. दुपारचे दोन अडीच वाजले होते. रात्रभरापासून जागा होती तरी झोप काही यायला तयार नव्हती आणि विलासराव रंगात आले होते. मग गगनभेदी गप्पा हाणत बसलो. आत्मशून्य कसा बेक्कार, एकदम आऊट माणूस यावर गप्पा मारत बसलो. विलासराव म्हणालो बाहेर जाऊन काही खायला आणतो. ते म्हणे बाहेर जाऊनच जेऊन घेऊ. ते परिक्रमेत असले तरी त्यांनी उगीच फालतूपणाचे नियम ठेवले नव्हते. मिळालं सहज कुणाकडून तर ठिक, नाहीतर वेळ आली तर हॉटेलमध्‍ये पैसे देऊन जेवत होते. हे आपल्याला पटलं. आत्मशून्यानं मुंबईहून येताना त्यांना काय करायचंय, काय करायचंय - काहीच लागत नाही म्हणून सोबत जास्त पैसे घेऊ दिले नव्हते. मागे सोबत राहिलेल्या एका 62 वर्षांच्या परिक्रमीनं त्याच्या पोराला श्रीखंड, पेढे वगैरे घेऊन मुंबईहून बोलावलं होतं तेव्हा विलासरावनीही त्यांच्या 'मॅनेजर' कडून पैसे मागवले होते. हा असा खणखणीत, जसा शक्य होईल तसा परमार्थ असावा. उगी आपलं कुठलंतरी काहीतरी वाचायचं आणि नसता बोगसपणा करीत परिक्रमा करायची - नर्मदे हर म्हणायचं आणि देणार्‍या लोकांना स्वत:चे फालतू नियम सांगून त्यांच्या दातृवृत्तीचा अपमान करायचा. आणि पोटात आग भडकली असेल तेव्हा कुत्र्यासारखं कशावरही तुटून पडायचं, तेव्हा सगळे नियम आपोआप चुलीत जातात आणि मन आपण कसे सगळ्याच वेळी, नेहमी बरोबरच वागलो त्याची वकीलीही आपोआप करतं. सगळा इथून तिथून सगळ्यांचाच अस्सल बोगसपणा, पण तसं म्हणायचं नाही. काय झाट फरक पडणार आहे अशी परिक्रमा करुन. ह्याच गप्पा खूपवेळ चालल्या. शेवटी आवरलं, आणि रुमचं दार लोटून हॉटेल शोधत निघालो. धामणोद या शहराच्या मेन रोडवर खायचं प्यायचं एकही हॉटेल दिसेना. वर सूर्य तापलेला. शेवटी एकाला विचारलं तर तो म्हणे फाटे पर मिल सकता है. एक किलोमीटर चाललो तेव्हा एक चांगलं हॉटेल दिसलं. आत जाऊन बसलो. भगवा टिशर्ट, जीन्सपँट घातलेला, लोकांना एकदम हायफाय गोराचिट्‍टा दिसणारा मी आणि उन्हानं काळेठिक्कर पडलेले, बोटभर दाढी वाढलेले, खूप खराब दिसणारे विलासराव ही जोडी पाहून हॉटेलमध्‍ये बसलेले इतर लोक उगाच टक लाऊन आमच्याकडे पाहू लागले. वरुन पुन्हा आमच्या अख्‍ख्‍या दुनियेला फाट्यावर मारुन होणार्‍या गगनभेदी गप्पा. तुम्ही मागवा - तुम्ही मागवा झालं. फस्क्लास भेंडी मसाला (हा हॉटेलमध्‍ये बिकासोबत मी आयुष्‍यात पहिल्यांदा खाल्ला होता) मागवला. विलासराव म्हणे पालक पनीर असलं तर बरंय. म्हटलं एवढ्या मरणाच्या उन्हाळ्याचा कसला आलाय पालक. काहीतरी आलू पालक नावाचा पदार्थ होता तो त्यांनी मागवला. मस्त अर्धातास तडस लागेपर्यंत पोटं भरली. गोड काही आहे का विचारलं तर हॉटेलमध्‍ये कोल्ड ड्रिंक सोडलं तर दुसरं काहीच गोड नव्हतं. बील दिलं आणि बाहेर येऊन टपरी शोधली. धूर काढला. विलासरावच्या आडाख्‍याप्रमाणं आत्मशून्यही धामणोदमध्‍येच होता. मी त्याच्याकडे जाणार असं ठरलं होतं. पण एकतर रात्रभर न झालेली झोप, आता मरेपर्यंत पोटात गेलेलं अन्न आणि पाणी, पाणी होत असल्यानं मला काही कुठे जावं वाटेना. शेवटी परत रुमकडे निघालो. एक मिठाईचं दुकान दिसलं तर तिथे गेलो. थंड काही मिळालं तर बरं. पोटात गेलेलं अन्न आणि उन्हानं पाणी पाणी होत होतं. लस्सी होती. दोन फुल सांगितल्या, पिल्या आणि रुमवर येऊन पडलो. रुम चांगलीच तापली होती. समोर पिंपळाचे महावृक्ष उभे राहून वारा सोडत होते तरी काहिली कमी होत नव्हती, मग आत लावलेल्या कुडमुड्या पंख्‍याची काय कथा. थोडावेळ गप्पा केल्या आणि पडून राहिलो. पाणी पाणी होत होतंच. विलासराव म्हणे मंदीरासमोर फ्रिझर लावलंय, त्यातून आणा. कमंडलू घेऊन जा. कमंडलू म्हणजे कडीचा साधा डबा. पण विलासरावांच्या तोंडून त्यासाठी अख्‍ख्‍या दोन दिवसात कमंडलू हाच शब्द बाहेर पडल्याचं आठवतंय. तर त्यांचं ते कमंडलु घेऊन फ्रीझरकडे गेलो, पाणी भरुन घेतलं तर पाण्‍यात सूक्ष्म कचरा ! पाणी फ्रिझरच्या बुडाला लागलं होतं वाटतं. फेकून दिलं आणि शेजारच्या दुकानातून बाटलीबंद पाणी घेतलं. विलासरावांना दिलं, मी ही पिलं आणि पडून राहिलो. आम्ही थांबलेल्या धामणोदपासून 'महेश्वर' 14 कि.मी. होतं. पाच वाजता निघून तीनेक तासात महेश्वर गाठायचं असं ठरलं होतं. माझी एकतर रात्री बिलकुल झोप झाली नव्हती आणि आता एवढं डुकरासारखं खाऊनही झोप येत नव्हती. सारखं सारखं पाणी प्यावं लागत होतं. कशीतरी तासभर झोप लागली. साडेतीन पावणेचारला जागा झालो. विलासरावही लगेच जागे झाले. निघूया म्हटलं. अशीतरी झोप येतच नाहीय, उगी अंधार करण्‍यात अर्थ नाही. मस्त चहा वगैरे मारु आणि निघू. टी शर्ट घातला, चटई गुंडाळून बांधली आणि निघालो. धामणोद ते महेश्वर हे 14 कि.मी. अंतर डांबरी रस्त्यानं कापत जायचंय हे मला माहित नव्हतं. मला वाटलं नर्मदेतून जायचं असेल. मी दुर्बिणही त्याच तयारीनं आणली होती. चहा घेण्यासाठी एक चांगलं हॉटेल दिसलं. विलासराव म्हणे पुढे घेऊ, इथे नको. म्हटलं बरं. चालत राहिलो आणि धामणोद शहराला मागे टाकलं. आता रोडवर तुरळक घरं दिसत होती. गाव संपल्याचं लक्षण. इथे कुठे चहा प्यायला हॉटेल मिळणार. पण विलासरावची नजर एका टपरीवर गेलीच. त्या टपरीवाल्यानं मस्त दूध टाकून अमृतासारखा गोड चहा बनवून दिला. चहा सिगारेट मारली. म्हणजे सिगारेट फक्त मीच. विलासरावला प्रत्यक्ष भगवान शंकरानं जरी चिलीम ऑफर केली तरी ते ती हातात घेणार नाहीत हे मी आता सांगू शकतो. टपरीच्या जवळच ठेवलेल्या रांजणातून पाणी भरुन घेतलं. उन्हाळ्यात गाडीच्या कार्बोरेटरमध्‍ये दहा-दहा लिटर पाणी ओतावं लागतं तसं पोटात दर अर्ध्या-एक तासाला अर्धा लिटर पाणी ओतावं लागत होतं. ते सगळं पाणी तळपता सूर्य घामाच्या धारांतून पिऊन टाकत होता. मी मादरचोद ब्राह्मण असून कधी संध्या करीत नाही, जानवं घालत नाही, सूर्याला अर्घ्य देत नाही. तो मला सोडतो काय? तो कुठल्याही रुपानं वसूल करतोच. झपाझप पावलं टाकत निघालो. गप्पांच्या फैरीवर फैरी सुरुच. स्वत: विपश्यना करीत प्रत्येक पाऊल टाकणारे, 'आपल्याला कशातलं काही कळत नाही' हा गुरुमंत्र असणारे विलासराव रस्ताभर सगळ्या जगाची नालस्ती करीत होते - आणि मी त्यांना दाद देत होतो. अर्थात हे फक्त माझी परिक्षा पाहण्यासाठीच. मला कळतं असा आव मी आणत होतो, मग विलासरावच्या रुपातले साईबाबा मला सोडणार काय? माझा बेकअलीपणा त्या रस्ताभर सांडत होता. परिक्रमा झाल्यानंतर विलासराव त्यांच्या प्रेमाच्या लोकांची साईबाबांच्या रुपात भेट घेतील. म्हणजे मी विलासरावच्या रुपात साईबाबांसोबत फिरत होतो, आणि मला ते कळत नव्हतं, मी त्यांना अक्कल शिकवत होतो, पण साईबाबा विलासराव या मुंबईच्या माणसाच्या रुपात माझ्यासोबत फिरत आहेत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाहीच - ते मला माझ्यावर विनाकारण खूश झालेल्या एका नाथपंथीय योग्यानं दाखवलं. कसं ते पुढे सांगू. रस्ता कापत होतो. मध्‍ये पोलीसांचा चेकपोस्ट लागला. तिथे उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलनं त्याला काहीही न विचारता सांगितलं - 'आपका साथी अभी तीन घंटे पहले आगे निकल गया है.' आत्मशून्य आणि विलासराव मुंबईतून परिक्रमेसाठी निघत असताना विलासरावांनी त्याच्यासाठी आणि स्वत:साठी सारखाच शर्ट, पंचा आणि रुमाल घेतला होता. म्हणजे दोघांचा पेहराव सारखाच. तीन तासांपूर्वी आत्मशून्य त्या पेहरावात रस्त्यावरून जात असताना त्या कॉन्स्‍टेबलने पाहिलं होतं आणि आता तो आत्मशून्यच हे कसं ते मला विलासरावांनी समजून सांगितलं होतं? तुम्हाला, हे वाचणार्‍यांना काय कळलं? हे परब्रह्मच वेगवेगळ्या रुपात फिरतंय आणि वेगवेगळी रुपं दाखवून मरणांत परिक्षा घेतंय. आमच्या घराण्याचे गुरु असलेल्या चिंतामणी महाराजांच्या रुपातही त्या बालाजी मंदीरात त्या परब्रह्मानं दर्शन देऊन ठेवलंय, आणि ते माझ्या मोबाइलमध्‍ये असलेल्या फोटो रुपात कैद आहे. आमच्या घराण्‍यातल्या त्या महाराजांच्या रुपातला हा फोटो माझ्‍या घरातले लोक मला भेटण्यासाठी इंदूरला येत आहेत, त्या सगळ्यांना दाखवण्‍यासाठी आहे. हे लिहिताना मला मी एका बाजूला धयधया रडत आहे, आणि एका बाजूला हे टाईप करीत आहे. हा टाइप करणारा मी नव्हेच. हा आत्ता ऑपरेट होतोय तो, पुढे भेटलेला माझा गुरु. तो माझ्याकडून हे सगळं करुन घेतोय. माझ्‍या ओळखीच्या असलेल्या विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी किती प्रकारे मला इशारे केले असतील, पण मी ते सगळं मातीत घालत होतो. आता, घडून गेलेल्या प्रत्येक गोष्‍टीची संगती मला अचूक लागतेय, ती गुरुने माझ्यावर केलेल्या कृपेमुळं. तुम्हा वाचणार्‍यांना स्वत:च स्वत:च्या बळावर कमावलेली नजर असेल, किंवा तुमच्या मस्तकी कधी कोणा गुरुचा हात राहिला असेल तरच तुम्हाला हे सगळं खरं आहे का याचा अंदाज येईल. नाहीतर तुमच्यालेखी यशवंत कुलकर्णी नावाचा कुणीतरी पोट्‍टा पागल झाला अशी नोंद लागेल. मध्‍येच लागलेल्या एका धाब्यासमोर रांजण भरुन ठेवलेले होते, तिथेही विलासरावांनी पाणी पिलं, मीही पिलं. त्यांनी त्या धाब्यावरच्या लोकांना 'पानी पिना है किंवा पानी पिएं क्या' असं काहीतरी दरडावून विचारलं होतं एवढं आठवतंय. तेवढ्या 14 कि.मी. मध्‍ये विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीतून हजारो दृष्‍टांत दिले असतील, पण मला त्यावेळी नजर कुठे होती? आताही प्रत्येक घटना क्रमवार आठवत नाहीय, म्हणून लिहिण्‍यात थोडासा विस्कळीतपणा आलाय. चालत चालत दहा किलोमीटर अंतर कापलं. आजूबाजूला शुकशुकाट असलेल्या रस्त्याच्या कडेला एक फुलवाला फुलांच्या माळा करीत बसला होता. तिथं माठ भरून ठेवलेला होता. पुन्हा तिथं पाणी पिलं. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याच्याशीही दोन गोष्‍टी केल्या. त्याला काय कळलं असेल देवजाणे. पुन्हा दोनतीन किलोमीटर पुढे पोहोचलो असू. महेश्वरमध्‍ये गेल्यानंतर कुठे जाऊन थांबायचं ते विलासरावच ठरवत होते. रस्त्याच्या कडेला टोपी घालून उभ्या असलेल्या पोराला थांबण्‍याची व्यवस्‍था कुठे होईल हे विचारलं तर त्यानं व्यवस्थित पत्ता दिला. आणि म्हणाला 'जल्द ही मिलते है.' आता तो अनोळखी पोरगा 'जल्द ही मिलते है' का म्हणाला हे मला तेव्हा कळलं नव्हतं. आणि तुम्हाला हे आता लगेच कळणार नाही. हे कथन पुढे गेल्यानंतर तुम्हाला कदाचित यातली संगती सापडेल. शहरात शिरलो तर रस्त्याच्या कडेला रसवंतीचं दुकान दिसलं. विलासरावला म्हणालो, 'घ्‍यायचा का रस?' हो म्हणाले. खुर्चीवर बसलो. एकामागून एक दोन ग्लास रस घेतला. तिथे शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या वृद्धाला विलासरावांनी थांबण्‍याच्या सोईबद्दल विचारलं. तो म्हणे तुमची थांबण्‍याची व्यवस्‍था मागेच असलेल्या लॉजमध्‍ये होऊ शकते. त्यानं दोन-दोनदा विलासरावांना नमस्कार केला. विलासरावांनी कुणालाही काही दरडावून विचारलं की बिनदिक्कत पुढे जात होते, मग मीच माझ्या लाजकाजं त्या उत्तर देणार्‍याला धन्यवाद किंवा थँक्यू म्हणत होतो तेव्हा विलासरावच्या रुपातील साईबाबा मला सांगत होते, कशाचे धन्यवाद? नर्मदे हर, नर्मदे हर म्हणायचं. मी भेटलेल्यांपैकी बर्‍याच लोकांना नर्मदे हरही म्हणालो आणि धन्यवाद थँक्यूही म्हणालो. रस पिऊन पुढे शहरात शिरलो. एका गाड्यावर खरबूजं विकायला ठेवली होती. विलासरावच्या रुपातील साईबाबा म्हणाले 'मला खरबूजं फार आवडतात. आज रात्री खरबूजच खाऊ.' म्हटलं घेऊन टाकू. वीस रुपये देऊन एक खरबूज घेतलं. मध्‍येच त्यांनी त्यांना भेटलेल्या कुठल्यातरी 'प्रति साई'चा किस्सा सांगितला. तो जो कोण माणूस असेल त्यानं स्वत:ला 'प्रति साई' घोषित केलंय आणि तो आश्रम बांधून रहातोय. त्याच्या गावापासून शिर्डीपर्यंत तो उलटा चालत जातो. पेपरमध्‍ये बातम्या वगैरे येतात. प्रति साई आहे तर शिर्डीपर्यंत उलटा कशाला चालत जातो म्हणून मी खूप मोठ्यानं हसलो. विलासरावच्या रुपातील साईबाबा त्यालाही भेटून आले होते - तेव्हा त्याने विलासरावांच्या रुपातील साईबाबांना विपश्यनेबद्दल चार गोष्‍टी विचारल्या आणि विलासरावांनीही त्या त्याला सांगितल्या. मला उन्हातून चालल्यानं उन्हाळी लागली होती. पण मोकळं व्हायला जागा नव्हती. खरबूज घेऊन झाल्यानंतर विलासरावांनी मला जागा दाखवली आणि जाऊन यायला सांगितलं. एक बोळच होती, शेजारी टॉकीज होती. फौलाद की औलाद नावाचा पिक्चर लागल्याचं पोस्टरवरुन दिसत होतं. तिथे त्या बोळात, अनोळखी गावातल्या कोपर्‍यातही लघवी करण्याची मला इच्छा होईना. म्हणून मी इकडेतिकडे पहात होतो. पण तेवढ्यात दोनतीन पोरं आली आणि लघवी करु लागली. मग मी पण इकडे तिकडे पहात आगआग करणारं पाणी बाहेर फेकलं. पुढे गेलो. आठ वगैरे वाजत आले असतील. महेश्वरचे बहुतांश आश्रम आणि बरीचशी प्राचीन मंदीरे अहिल्याबाईंनी बांधलेल्या किल्ल्याच्या आत आहेत. किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत आलो तो अचानक लाईट गेली. तसंच विचारत विचारत पुढे गेलो. महादरवाजातून आत जाताच दोन मराठी आयाबाया महादरवाजाच्या आतल्या बाजूस असलेल्या दगडी चौथर्‍यावर निवांत मराठीत गप्पा करीत बसल्या होत्या. मला एकदम घरीच आल्यासारखं वाटलं. राजराजेश्वर मंदीराच्या दिशेनं निघालो. या मंदीरात जायचं अर्थातच विलासरावच्या रुपातील साई बाबांनी ठरवलं होतं. मंदीराचं गेट ओलांडून आत गेलो. एक वृद्ध ब्राह्मण कद घालून मंदीराच्या पायरीवर बसला होता. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याला इथे थांबण्याची व्यवस्‍था होऊ शकते का हे विचारलं. तो म्हणे, 'कम हियर, व्हेअर डू यू केम फ्रॉम?' मग विलासरावांनी काय सांगायचं ते सांगितलं. कुठले आहात, कुठून येताय वगैरे चारदोन गोष्‍ट झाल्या. तो मंदीराच्या समोरच्या प्रांगणाकडे हात दाखवून म्हणे, 'यहां सो जाओ.' विलासरावांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या इंग्रजी बोलण्‍याची माझ्यासमोर टर उडवली. आम्ही त्या मंदीराच्या प्रांगणात आमच्या सॅक टाकल्या. तिथेच असलेल्या फ्रिझरकडे जाऊन पाणी वगैरे पिऊन आलो. 500 वर्षांपासून चांगल्या तुपाचे 11 नंदादीप सतत तेवत असणार्‍या राजराजेश्वराच्या मंदीराच्या प्रांगणात आम्ही थांबलो होतो. मी दर्शन वगैरे काही घेतलं नाही. म्हणजे आता मला प्रत्येक मंदीरासमोरुन जात असताना झक मारुन दर्शन घ्‍यावं लागतंय ही गोष्‍ट वेगळी, पण मुळात मी कधी देवदेव करणारा माणूस नव्हतो. मला स्वत:ला आतून समजून घेण्याचा जो काही प्रयत्न असेल तो चालू होता, त्यामुळं या बाहेरच्या गोष्‍टींकडे मी लक्ष देत नसे. हां, कुणी देवदेव करणारा आत्मशून्यासारखा मित्र आला तर मी त्याला शक्य तेवढी मदतच केली. हजार वेळा हजारो मंदीरांसमोरुन गेलो असेल, पण थांबून देवाचं दर्शन कधी घेतलं नाही. ते मंदीर, आतली मूर्ती, आणि मी तिला नमस्कार करणं यात काही संबंधच लागत नव्हता - मग मी फुकट दर्शन कसं घेणार. मला पक्कं आठवतंय त्याप्रमाणं विलासरावांनीही दर्शन घेतलं नसावं. (क्रमश:) (पुढे नवरत्न नाथ या नाथपंथीय साधूच्या रुपात परब्रह्माने महेश्वर उर्फ गुप्तकाशी येथे मला दिलेले दृष्‍टांत, त्यानंतर त्यांची आणि माझी झंगड पक्कड आणि त्यांनी घेतलेली माझी परिक्षा, मला त्यांच्याकडून मिळालेली दीक्षा वगैरे घटना जशा झाल्या तशा, जशा मला गुरुमाऊलीच्या कृपेनं दिसल्या तशा रंगवून सांगण्याची गुरुमाऊली मला बुद्धी देवो. मी काहीही करुनही काही होत नाही. या लेखासोबत फोटो पाहिजेतच असं 'माझं' म्हणणं होतं. कुत्र्यासारखा वणवण फिरलो, पण गुरुमाऊलीची या वर्णनाशी सुसंगत असणारे फोटो आज तुम्हाला दाखवण्‍याची इच्छा नाही. बघून घेईल तिचं ती. )
  • गुप्तकाशीतील योगी 2
  • गुप्तकाशीतील योगी ३

Book traversal links for गुप्तकाशीतील योगी 1

  • गुप्तकाशीतील योगी 2 ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
नाट्य
धर्म
समाज
जीवनमान
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिसाद
प्रतिक्रिया
आस्वाद
माध्यमवेध
लेख
अनुभव
माहिती
संदर्भ
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
22202 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

खतरनाक मनस्वी हैस त्वां

बॅटमॅन
Tue, 05/29/2012 - 16:03 नवीन
खतरनाक मनस्वी हैस त्वां यक्कुशेठ!! जियो!!!

तब्बल १५ मिनिटे लागलीयेत

पियुशा
Tue, 05/29/2012 - 16:17 नवीन
तब्बल १५ मिनिटे लागलीयेत वाचायला इतका मोठा भाग आहे ,तरीही खिळ्वुन ठेवले या भागाने :) प्.भा.प्र. :)

वाचतेय

sneharani
Tue, 05/29/2012 - 16:25 नवीन
वाचतेय...येऊ दे पुढचा भाग!!! :)

यक्या डोक्यावर पडलाय. बाकी

प्यारे१
Tue, 05/29/2012 - 16:25 नवीन
यक्या डोक्यावर पडलाय. बाकी काही नाही. :)

मनातलं बोललात !!

अर्धवटराव
Tue, 05/29/2012 - 21:56 नवीन
मलाही अगदी असच वाटतय.. आणि काळजीही वाटतेय... यक्क्याची नाई वो... तो ज्याला ज्याला भेटतोय त्या सर्वांची . अर्धवटराव
↩ प्रतिसाद: प्यारे१

यकु साहेब, अप्रतिम , भावविभोर लेख झाला आहे.

निश
Tue, 05/29/2012 - 16:27 नवीन
यकु साहेब, अप्रतिम , भावविभोर लेख झाला आहे. मस्त पुढला लेख लवकरात लवकर येउ द्यात.

मध्येच एकदम...

स्वानन्द
Tue, 05/29/2012 - 16:49 नवीन
मध्येच एकदम... 'विलासरावांच्या रुपातील साईबाबा' काय चालू केलं? मला कळेच ना.. की माझं मधलं काही वाचायचं राहून गेलं की काय.

मध्येच एकदम...

यकु
Tue, 05/29/2012 - 17:28 नवीन
मध्येच एकदम... 'विलासरावांच्या रुपातील साईबाबा' काय चालू केलं? मला कळेच ना.. की माझं मधलं काही वाचायचं राहून गेलं की काय.
विलासराव परत येतील तेव्हा प्रत्यक्ष भेटून पहा- दिसलेच तुला त्यांच्यात साईबाबा तर बरंच. मलाही ते मुंबईचे परिक्रमेला आलेले आणि एकाच दिवसात मांडो ते महेश्वरपर्यंतचं 40 कि.मी.चं अंतर भुतासारखे चालणारे सर्किट माणूस वाटले होते. म्हणूनच मी त्यांना अक्कल शिकवत होतो. पण माझ्यापेक्षा जास्त पाहू शकणार्‍या नवरत्न नाथांनी विलासरावच्या रुपात असली काय चीज आहे ते मला दाखवलं. तुला खरोखर ‍काही दिसत नसेल, कुठे अडकला असशील तर सुट्टी मिळेल तेव्हा महेश्वरला ये. ते तुलाही सगळं दाखवतील.
↩ प्रतिसाद: स्वानन्द

___/\___ यक्या, अरे काय चालू

प्यारे१
Tue, 05/29/2012 - 17:32 नवीन
___/\___ यक्या, अरे काय चालू आहे तुझं???
↩ प्रतिसाद: यकु

यक्या, अरे काय चालू आहे

यकु
Tue, 05/29/2012 - 18:50 नवीन
यक्या, अरे काय चालू आहे तुझं???
तुच म्हणे ना की जरा खर्‍या माणसांत जात जा, लवकर गुरु शोध.. गुरुबिरु शोधायला गेलो नव्हतो, पण तो जो माणूस आहे तो खरा माणूस होता, मग बसलाय माझ्या बोकांडीवर. आता काय !
↩ प्रतिसाद: प्यारे१

मग आता युजींचं काय होणार ??

अर्धवटराव
Tue, 05/29/2012 - 22:00 नवीन
>>....पण तो जो माणूस आहे तो खरा माणूस होता, मग बसलाय माझ्या बोकांडीवर. आता काय ! -- काहि काळापुरता युजींना टाईमप्लीज का?? मित्रा, तु जे काहि करतो आहेस ते तुझ्यासोबत येऊन एंजोय करायची प्रचंड इच्छा होतेय. तसही मला अवलीया/अर्धवट/डोक्यावर पडलेल्यांची भारी हौस. अर्धवटराव
↩ प्रतिसाद: यकु

+०.५

प्यारे१
Wed, 05/30/2012 - 09:06 नवीन
०.५+ अर्धवटराव = +१ डिट्टो!
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

यक्कु

परिकथेतील राजकुमार
Tue, 05/29/2012 - 17:06 नवीन
लेका तू 'नेमाडे' होणार लवकरच.

भन्नाट रं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/29/2012 - 17:29 नवीन
लेखन असं खिळवून ठेवणारं की पुछो मत. एकदम मस्त. बोले तो भन्नाट. विलासराव आणि आत्मशुन्य यांची नर्मदापरिक्रमा सुरु आहे, ही माहिती या निमित्तानं कळली. बाय द वे, कामाच्या ठिकाणी कशाला लफरं करायचं म्हणतो मी. अर्थात पुढील भागात त्याबद्दल काही साक्षात्कार असतीलच. लेका, लिहितोय लै जबरी. -दिलीप बिरुटे

बाप रे .... काय लिहिलंय!

उदय के'सागर
Tue, 05/29/2012 - 17:58 नवीन
बाप रे .... काय लिहिलंय! वेगळ्याच दुनियेत असल्यासारखं वाटलं...लेख मोठ्ठा आहे पण खिळवुन ठेवणाराय...पण किती 'अ‍ॅबनॉर्मल' आहे हे सगळं. त्या विलासरावांपेक्षा मला तुलाच प्रत्यक्ष भेटायची तिव्र इच्छा होतेय... पुढचा भाग लवकर येऊ दे म्हणजे डोक्यात चाललेले तर्क, उत्सुकता, अधिरता संपेल लवकर...

चक्कर आलीय!

पैसा
Tue, 05/29/2012 - 18:09 नवीन
हे गंभीरपणे लिहिलंय की उपरोध आहे याचाच निर्णय करता येत नाहीये.

असेच

स्मिता.
Tue, 05/29/2012 - 23:44 नवीन
अगदी असेच, गंभीरपणे लिहिलंय की औपरोधीक हेच कळत नाहीये. पण जे लिहिलंय ते खिळवून ठेवणारं आहे. यशवंता, मुंबई-पुण्यात नोकरी शोध रे... भरपूर आपली लोकं असतील आजूबाजूला.
↩ प्रतिसाद: पैसा

खरं की उपरोध कळत नाही.

सूड
Sat, 06/02/2012 - 13:30 नवीन
खरं की उपरोध कळत नाही. पुढल्या भागांत काही कळलं तर ठीक , तोवर वाचतो आहेच !!
↩ प्रतिसाद: पैसा

परिक्रमा म्हन्जे नक्कि काय?

सुजित पवार
Tue, 05/29/2012 - 18:36 नवीन
ज्ञान थोडे कमि अहे म्हनुन क्शमा असावि, पन परिक्रमा म्हन्जे काय? लेखने पकडूण ठेवले.

लेका छोटे भाग करता येत नाहित

नाना चेंगट
Tue, 05/29/2012 - 18:36 नवीन
लेका छोटे भाग करता येत नाहित का? माझ्यासारख्या म्हातार्‍यांना धाप लागते ना एवढं वाचायला.... गचकलो तर नरड्यावर बशील तुझ्या !!

काही धापबिप लागत नाही. दोनच

यकु
Tue, 05/29/2012 - 18:40 नवीन
काही धापबिप लागत नाही. दोनच दिवसाचा हा चित्रपट एका कॅमेर्‍यानं वाट्टेल ते दृश्य कुठेही घेऊन कसाही चित्रीत केलाय, कारण त्या सगळ्यात संगती दिसतेय.
गचकलो तर नरड्यावर बशील तुझ्या !!
एकजण ऑलरेडी माझ्या बोकांडीवर बसलाय.. आता तुम्ही बसा.. म्हणजे कल्याण! ;-)
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

आयला यक्कुशेठ, काय करताय

प्रास
Tue, 05/29/2012 - 19:18 नवीन
आयला यक्कुशेठ, काय करताय हो? दोन दिवसाच्या परिक्रमेची गोष्ट अशी काही सांगताय की जणु आमच्या डोळ्यांपुढेच घडतेय. पण जे काही बुद्धी टिपतेय त्यांची पूर्णच्या पूर्ण संगती लावणं अवघड होऊन बसलंय ना.... मला कल्पना आहे की हे असलं काही अनुभवल्यानंतर ते तसंच्या तसं मांडणं खूपच कठीण होत असावं पण आमचा आपला नेहमीप्रमाणेच यक्कुशेठांच्या लिखाणाला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शक्य तितक्या लवकर पुढले भाग टाका. वाट बघत आहे. विलासरावांबद्दल काळजी वाटतेय पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक.... आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर?

विलासरावांबद्दल काळजी

यकु
Tue, 05/29/2012 - 19:59 नवीन
विलासरावांबद्दल काळजी वाटतेय
काळजी? अहो तो माणूस जिथे जाईल तिथे सांगतोय की द्यायचं असेल खायला तर तयार द्या, सदावर्त वगैरे देऊ नका. हाताने बनवत नाही. कुठल्यातरी मंदीराच्या पुजार्‍यानं नारळ दिलं, त्यावरच गड्याचा दिवस गेला. त्याच्या आधी कुठलंतरी मंदीर त्यांना आवडलं, तिथे बाहेर, ओट्यावरच ते झोपत होते, तर तिथल्या ब्राह्मण पुजार्‍यानं त्यांची जात आणि धर्म विचारला. आणि यांनी सांगितला तेव्हा यांना पडक्या खोलीत पाठवून देण्यात आलं. माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्‍या आणि त्यांची काळजी करु नका.
पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक....
तुम्ही त्यांना आध्‍यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा.
आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर?
मी महेश्वरचे सगळे घाट पालथे घातले, आश्रमांमध्‍ये त्याची विचारपूस केली, पण त्याची भेट व्हायची नव्हतीच.
↩ प्रतिसाद: प्रास

माणूस अहमदनगर जिल्ह्यातून

प्रास
Wed, 05/30/2012 - 11:23 नवीन
माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्‍या आणि त्यांची काळजी करु नका.
अहो यक्कुशेठ, अहमद नगरचा माणूस अहमद नगरच्या माणसाला व्यवस्थित ओळखणारच की! ;-)
तुम्ही त्यांना आध्‍यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा.
विलासरावांना असल्या गोष्टी पुन्हा पुन्हा विचारून त्यांनी दिलेल्या उत्तरांवरूनच काढलेला निष्कर्ष आहे हा... आत्मशून्याचं आत्मशून्यच सांगेल असं मानून चालू ;-) बाकी पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत....
↩ प्रतिसाद: यकु

वाचतोय...

मदनबाण
Tue, 05/29/2012 - 20:04 नवीन
वाचतोय...

यकु, महाराष्ट्रात परत या. बास

रेवती
Tue, 05/29/2012 - 20:07 नवीन
यकु, महाराष्ट्रात परत या. बास झालं तिकडे राहणं. काहीतरी वेगळच वाटायला लागलय.

लेख मस्त !

हारुन शेख
Tue, 05/29/2012 - 20:59 नवीन
खूपच कलंदर वृत्तीचे ब्वा तुम्ही ! बाकी हे अध्यात्माच्या वाटेवर जाणारे सगळेच असे का कोण जाणे. हे मस्त मौलापण त्या प्रकारच्या जीवनशैलीला आवश्यकच असावं असं वाटतं . नर्मदा परिक्रमेच्या चमत्कारीक अनुभवांवर मराठी वाङ्ग्मयात अजून एका पुस्तकाची लवकरच भर पडणार बहुधा. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------

वचतोय

jaypal
Tue, 05/29/2012 - 22:32 नवीन
Image removed.Image removed.

यशवंत, जे काही लिहिलेय ते

कौशी
Tue, 05/29/2012 - 23:17 नवीन
यशवंत, जे काही लिहिलेय ते अप्रतिम लिहिले ..

च्यामारी!

दादा कोंडके
Tue, 05/29/2012 - 23:30 नवीन
यकु अवलिया माणूस आहे खरा! :-)

कोणे एकेकाळी विलासरावांनी

निनाद मुक्काम …
Wed, 05/30/2012 - 00:06 नवीन
कोणे एकेकाळी विलासरावांनी आमच्या लेखनाला चांगले लिहिले आहे असा प्रतिसाद दिला होता ह्याची आज आठवण झाली. गुरु ब्रह्म गुरु विष्णू ,गुरु देवो महेश्ववारा गुरु साक्षात परब्रम्ह ,तैस्मै श्री ,गुरु वे नमः युक्कू सेठ तुम्हाला जर चांगला गुरु सापडला असेल तर ह्याहून अधिक काय हवे आयुष्यात आपल्या संस्कृतीत गुरु चे स्थान हे सर्वत महत्वाचे आहे. तेव्हा आपले अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहे.

तु लिहितोस भारी!! पण हे

शिल्पा ब
Wed, 05/30/2012 - 05:01 नवीन
तु लिहितोस भारी!! पण हे साक्षात्कार वगैरे व्हायला परीक्रमाच करावी लागतीये का? अन तुलाच बरे एकट्याला साक्षात्कार होताएत! खरोखर तुझी काळजी वाटतेय! अन ते विलासराव कम साईबाबा काय मधेच? तु भयानक इमोशनल माणुस आहेस. असो, पुढच्या भागाची वाट पाहतेय.

यकुशेठ, बरे आहात हे दिसतं

राघव
Wed, 05/30/2012 - 08:33 नवीन
यकुशेठ, बरे आहात हे दिसतं आहेच कारण लिखाण तसंच नेहमीसारखं ओघवतं आहे.. पण उगाच शंका वाटली म्हणून विचारावंसं वाटतंय.. बरे आहात ना? :) अरे भल्या गृहस्था, तुझ्या जिवाला काही शांतता वगैरे मानवत नाही का रे? किती ठणाण आदळआपट चाललेली असते तुझी? वर अर्धवटराव म्हणतात तशी काळजी मलाही वाटते आहे.. ;) पण उपरोध आहे की अनुभूती ते काही अजून समजलेले नाही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. राघव

गुंगवून टाकणारं लिहिलंस

प्रचेतस
Wed, 05/30/2012 - 09:01 नवीन
गुंगवून टाकणारं लिहिलंस रे. विलासरावांसारख्या सज्जन माणसाबरोबर भरपूर गप्पा मारत फिरण्याचा योग वसई आणि कान्हेरीच्या भटकंतीत आलाच होता.

यकुविलास आवडला.

नगरीनिरंजन
Wed, 05/30/2012 - 09:29 नवीन
यकुविलास आवडला.

नीट

श्रावण मोडक
Wed, 05/30/2012 - 10:31 नवीन
गुंगवून ठेवतंय हे लेखन हे खरं. पण इतकं वाचून हाती काय लागलं तर एक शून्य. नीट पूर्ण केलं तर कदाचित काही कळेल. एरवी हा ट्रेडमिल वॉक व्हायचा. :-)

बरं. नीट तर नीट.

यकु
Wed, 05/30/2012 - 10:34 नवीन
बरं. नीट तर नीट. :)
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

शून्य

श्रावण मोडक
Wed, 05/30/2012 - 11:22 नवीन
नीट लिहिच. मला वाटलं, तुला शून्य कळेल. पण तू त्याकडं दुर्लक्ष केलंस की तुला ते खरंच कळलं नाही? :-)
↩ प्रतिसाद: यकु

नीट लिहिच. मला वाटलं, तुला

यकु
Wed, 05/30/2012 - 11:32 नवीन
नीट लिहिच. मला वाटलं, तुला शून्य कळेल. पण तू त्याकडं दुर्लक्ष केलंस की तुला ते खरंच कळलं नाही?
मला आताही शून्यच नव्हे तर काहीच कळत नाही. मी जे काही लिहिलंय ते नवरत्न नाथांच्या इच्छेनुसार.
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

यकु

रामदास
Wed, 05/30/2012 - 11:43 नवीन
तुम्हाला उन लागलंय. कानात कांद्याच्या रसाचे चार थेंब घालणे.
↩ प्रतिसाद: यकु

नाही.. उन लागलेलं नाही. शरीर

यकु
Wed, 05/30/2012 - 11:46 नवीन
नाही.. उन लागलेलं नाही. शरीर तापलेलं नाहीय.
↩ प्रतिसाद: रामदास

चांगल लिहिल आहे. पण ते

मृत्युन्जय
Wed, 05/30/2012 - 10:51 नवीन
चांगल लिहिल आहे. पण ते विलासराव आणी साई बाबा प्रकरण नाही कळाले.

येषां लेका.. काय लिहू कळत

स्पा
Wed, 05/30/2012 - 12:23 नवीन
येषां लेका.. काय लिहू कळत नाहीये साईबाबा - विलासराव प्रकरण डोक्यात घुसून राहिलंय.. अर्थात अनेक प्रश्न पडलेत.. पुढच्या भागात उत्तर मिळतीलच तोपर्यंत नर्मदे हर

वाचत आहे. पुढ्च्या लेखात

स्वातीविशु
Wed, 05/30/2012 - 13:23 नवीन
वाचत आहे. :) पुढ्च्या लेखात तुम्हाला नक्की काय साक्षात्कार झाला ते आम्हांला कळेल अशी आशा आहे. :)

तुम्ही सध्या अनील अवचट यांचा

विजुभाऊ
Wed, 05/30/2012 - 14:04 नवीन
तुम्ही सध्या अनील अवचट यांचा सत्संग करताय का हो? लेखनशैली बरीचशी म्याच होतेय.

काहीही कळालेलं नाही, अथवा

५० फक्त
Wed, 05/30/2012 - 14:30 नवीन
काहीही कळालेलं नाही, अथवा क्काही कळु नये म्हणुन लिहिलेलं असावं असं वाटतंय. एकुणच असे भास होणं म्हणजे अवघडच. असो लवकरच या स्थितीतुन बाहेर पडशील अशी अपेक्षा आहे. ज्या परिस्थितीत तुला नोकरी सोडावी लागली असं सांगतो आहेस, त्या परिस्थितीत असं होवु शकतं. अजुनही आपल्याकडे स्त्री बॉस आणि तिच्याकडुन आपल्या कामाबद्द्ल ऐकुन घेणं अवघड / अडचणीचं, होतं ब-याच जणांना, अगदी मला ही. ते काय मेल इगो काय म्हणतात ना ते. त्यात पुन्हा अ‍ॅडेड मिलाक्रा सुद्धा असावा. असो.

अजुनही आपल्याकडे स्त्री बॉस

यकु
Wed, 05/30/2012 - 15:01 नवीन
अजुनही आपल्याकडे स्त्री बॉस आणि तिच्याकडुन आपल्या कामाबद्द्ल ऐकुन घेणं अवघड / अडचणीचं, होतं ब-याच जणांना, अगदी मला ही. ते काय मेल इगो काय म्हणतात ना ते. त्यात पुन्हा अ‍ॅडेड मिलाक्रा सुद्धा असावा.
स्‍त्री असो की पुरुष कुणाकडूनच काही तापदायक ऐकलं की त्रास होतो, कारण ते ऐकवणार्‍याला आधी तो त्रास झालेला असतो, आणि मग तो आपल्याकडे ट्रान्स्फर होतो. हेच ते भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ! जरा नीट बघा - तुमचा मुलगा तुमच्याकडे पाहून हसतो तेव्हा दुसरीकडे कुठे मन गुंतलं नसेल तेव्हा तुम्हीही सहज हसून जाता, ट्राय इट. हा दोन शरीरांमधला संबंध न पहाता, त्याला इगो बिगो नावं दिली की काम खलास ! आणि कसला ** मिलाक्रा हो? मी फक्त 27 वर्षांचा आहे.
↩ प्रतिसाद: ५० फक्त

त्री असो की पुरुष कुणाकडूनच

५० फक्त
गुरुवार, 05/31/2012 - 08:16 नवीन
त्री असो की पुरुष कुणाकडूनच काही तापदायक ऐकलं की त्रास होतो, कारण ते ऐकवणार्‍याला आधी तो त्रास झालेला असतो, आणि मग तो आपल्याकडे ट्रान्स्फर होतो. हेच ते भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ! - नाही, एकाला झालेला त्रास दुस-याला ट्रान्सफर होणे आणि भुता परस्परे पडो मैत्र जीवांचे - या दोन्हीचा संबंध कळला नाही. आणि पहिल्याला झालेला त्रास जर दुस-यामुळेच होत असेल तर काय ? मग ते एक्सेलच्या सर्क्युलर फॉर्म्युला सारखं ना. आणि तु लिहिलं आहेस तर्सं, जर तुला सिनियर असलेल्या एका स्त्रीनं तुला कामाबद्दल / कामाच्या क्वांटिटिबद्दल / क्वालिटिबद्दल विचारलं तर त्यात तापदायक काय आहे, हे कळालं नाही. अर्थात तुझ्याच लिखाणावरुन असे वाद घालणं ही तुझी सवय आहे असं दिसतं आहे. आता चार पैशांसाठी आणि पापी पेट के लिये नोकरी करतोय म्हणलं की ह्या गोष्टी आल्याच, प्रत्येक पे स्लिपच्या मागच्या बाजुला हे सगळं लिहिलेलंच असतं, त्यात नवं काही नाही. जरा नीट बघा - तुमचा मुलगा तुमच्याकडे पाहून हसतो तेव्हा दुसरीकडे कुठे मन गुंतलं नसेल तेव्हा तुम्हीही सहज हसून जाता, - छे अजिबात नाही, अगदी मन दुसरीकडं गुंतलेलं असेल तरी देखील सहजच हसुन जातो, माझ्यासाठी माझा मुलगा, किंवा माझं कुटुंब हेच सर्वात जास्त महत्वाचं. त्यांच्या प्रत्येक हसण्याला हसण्यानं प्रतिसाद देणं हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे नैसर्गिक आहे. यासाठी फुकाची ओढाताणी नाहीये. ट्राय इट. हा दोन शरीरांमधला संबंध न पहाता, त्याला इगो बिगो नावं दिली की काम खलास ! - हा दोन शरीरांमधला संबंध नाही, शरीर हे फक्त व्यक्त होण्याचं माध्यम आहे. आणि कसला ** मिलाक्रा हो? मी फक्त 27 वर्षांचा आहे. - ते शारिरिक वय झालं. मिलाक्राचा शारिरिक वयाशी संबंध नसतो. मिलाक्रा हा शारिरिक रोग किंवा स्थिती नाही, ती मानसिक किंवा बौद्धिक रोग/ स्थिती आहे, आणि तिचा शरीरावर परिणाम होतो.
↩ प्रतिसाद: यकु

त्री असो की पुरुष कुणाकडूनच

यकु
गुरुवार, 05/31/2012 - 08:54 नवीन
त्री असो की पुरुष कुणाकडूनच काही तापदायक ऐकलं की त्रास होतो, कारण ते ऐकवणार्‍याला आधी तो त्रास झालेला असतो, आणि मग तो आपल्याकडे ट्रान्स्फर होतो. हेच ते भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ! - नाही, एकाला झालेला त्रास दुस-याला ट्रान्सफर होणे आणि भुता परस्परे पडो मैत्र जीवांचे - या दोन्हीचा संबंध कळला नाही. आणि पहिल्याला झालेला त्रास जर दुस-यामुळेच होत असेल तर काय ? मग ते एक्सेलच्या सर्क्युलर फॉर्म्युला सारखं ना.
दोन्हीतील संबंध तुम्हाला आत्ताच कळू शकत नाही, जरा निरीक्षण करुन स्वत:चं स्वत: पहावं लागेल, कारण संबंध तुम्हाला कळत नाहीय, मला कळतोय. पहिल्याल्याला झालेला नुसता त्रासच नाही, अगदी या जगात नाव देता येईल तेवढ्या गोष्‍टी दुसर्‍यामुळेच होतात. एक्सेलचा सर्क्युलर फॉर्म्युला 'डेड' आहे, हजारो माणसांनी तो वापरला तरी तो तसाच सर्क्युलर राहिल, तेव्हा जीवंत माणसांतील संबंध समजून घेताना माणसाच्याच बुद्धीचा आविष्कार असलेल्या एक्सेलच्या सर्क्युलर फॉर्म्युल्यासारख्या उपमेचा वापर करु नका. उपमेचा वापरच करायची गरज नाही, इथे सगळं थेट आहे - पुढच्या वेळी तुमचा मुलगा किंवा बायको किंवा आणखी कुणीही तुमच्याकडे पाहून हसलं आणि तुम्हीही हसला नाहीत तर त्यावेळी तुमचं मन कशात गुंतलं ते तरी किमान सांगू शकाल अशी आशा आहे.
आणि तु लिहिलं आहेस तर्सं, जर तुला सिनियर असलेल्या एका स्त्रीनं तुला कामाबद्दल / कामाच्या क्वांटिटिबद्दल / क्वालिटिबद्दल विचारलं तर त्यात तापदायक काय आहे, हे कळालं नाही.
मला त्या कामाच्या क्वांटीटीबद्दल विचारलं म्हणून ते तापदायक झालं असं नाही, ते विचारणार्‍या जीवंत स्‍त्रीला आधी ताप झाला होता, तो तसाच माझ्यावर येऊन आदळला. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे!
अर्थात तुझ्याच लिखाणावरुन असे वाद घालणं ही तुझी सवय आहे असं दिसतं आहे. आता चार पैशांसाठी आणि पापी पेट के लिये नोकरी करतोय म्हणलं की ह्या गोष्टी आल्याच, प्रत्येक पे स्लिपच्या मागच्या बाजुला हे सगळं लिहिलेलंच असतं, त्यात नवं काही नाही.
लिखाणावरुन नाही, असंबद्ध बोललं की मी वादाच्या मूडमध्‍ये जातो. मग माणसं थरथरायला आणि ओरडायला लागतात, मला धक्के मारुन बाहेर काढतात - पण त्याचा माझ्यावर फरक पडत नाही. आता मी इथे कुठलाही वाद घालतोय का? तुम्हीही घालत नसावेत अशी आशा आहे. पहिल्यांदा तर नुसतं पेट पापी नाही, ते पापी असो की पुण्‍यावान पेट बिलकुल भरुच नका, पहा ते पेट अख्खा माणूस पचवून टाकतं की नाही.
हा दोन शरीरांमधला संबंध नाही, शरीर हे फक्त व्यक्त होण्याचं माध्यम आहे.
मग दोन शरीरं व्यक्त होत असताना मध्‍येच इगो कुठून आला?
मिलाक्रा हा शारिरिक रोग किंवा स्थिती नाही, ती मानसिक किंवा बौद्धिक रोग/ स्थिती आहे, आणि तिचा शरीरावर परिणाम होतो.
चिडलात! काय बोलताय हे पण कळत नाहीय तुम्हाला. तुम्ही हे जे वर वाक्य लिहिलंय त्याची सत्यता कुणाच्या बुद्धीनं आणि शरीरानं अनुभवलीत? मी 27 चा असेन तर उगाचच्या उगाच माझं आयुष्‍य 54 वगैरेचं मानावं लागेल, ते नेमकं कितीय हे आपल्याला आत्ता कळू शकत नाही, तर तुमचा मूळ मिडलाईफ क्रायसीस गेला खड्‍ड्यात. अथपासून इतिपर्यंत समजून न घेता मध्‍येच कुठलीतरी स्थिती पाहून तिला काही अतिशहाण्यांनी दिलेलं बोगस नाव म्हणजे मिडलाइफ क्रायसीस. मिलाक्रा असलं काही आहेच हे उगीच कारण नसताना प्रूव्ह करुन काय होणार आहे?
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हम्म... साईबाबांना भेटायला

कवितानागेश
Wed, 05/30/2012 - 14:37 नवीन
हम्म... साईबाबांना भेटायला हवं... :)
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा