ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली.
का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे..
"मी.. ?? म्हातारा ???"
ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे..
........................
मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध..
जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो. मग रवंथ किंवा अॅसिडिटीसारख्या त्या वर येतात.
माझ्या लहानपणच्या ब्रँड्सच्या आठवणी त्या काळातल्या मुलींइतक्याच येतात..
गोल्ड स्पॉट, कॅडबरीज् डबल डेकर , कॅम्पको चॉकलेट, लँब्रेटा स्कूटर..
हो.. किस्मी टॉफी अजून ही आहे..पण आता आमचं इतकं प्रेम राहिलं नाही. तुमच्या आयुष्यातून दूर जाण्यासाठी सर्वानी मरायलाच हवं असं नाही..
आणि मग अचानक मी घाबरतो ... कारण हे ऐकून माझी बायको आनंदाने म्हणणार:"..तू म्हातारा झालायस.."
मी कुठेतरी मधेच लटकलोय.. माझी पिढी..अजूनही सुमारे किंवा जवळजवळ यौवनात असावी. (म्हणायला हरकत नाही.. बायकोची नसेल तर.) कपाट उघडल्यावर एकदम धडाड धूम करत सामान अंगावर कोसळावं तश्या खूप नव्या नव्या "चिजा" आमच्यावर कोसळल्या.. धुळीसकट..
मी एकांतात (बायको नसताना..!!) स्वत:ला खूप पटवत बसतो.. पण विश्वास बसत नाही की माझ्या सुरुवातीच्या खूप वर्षात मला टीव्ही माहीत नव्हता.
नाही.. मी मादागास्कर मधे राहात नाही.. फक्त ३२ वर्षाचा आहे आणि याच जन्मा बद्दल बोलतोय..
लठ्ठ काळा गोल लोखंडी डायल वाला फोन.. प्रत्येक आकडयाला टरर्र टक टक टक टक .... टरर्र टक टक टक टक असा मस्त आवाज करणारा.. ९ डायल करताना तर फारच मस्त..
असा फोन एखाद्याच्या घरात असणं ही प्रतिष्ठेची "नोन अप्पर लिमिट" होती..
मला अशी वाक्यं आठवतात: " त्यांना काय कमी आहे बाबा..तुला माहीत आहे, त्यांच्याकडे फोन आहे.." ..आमच्या कडे नव्हता.. बाय द वे ..
मग माझ्या याच (तरुण..!!) आयुष्यात पेजर्स आले..बघता बघता केरात ही गेले.. मग खूप मोबाइल फोन्स आले. पूर्वी त्याला "सेल" म्हणायचे आता नुसतं "फोन" म्हणजेच सेलफोन.. फोनसाठी "लँडलाईन" असं वेगळं सांगावं लागतं.
आणि आता ?..
थ्रीजी, टेन मेगापिक्सेल, २० जीबी, प्लेस्टेशन, वॉकमन फोन,ब्लॅकबेरी, पुशमेल विथ एमपीथ्री प्लेअर अँड मल्टिबँड रेडिओ अँड ऑल द किंग्ज हॉर्सेस डोंट फिल द डिझायर..
आता मी वाट बघतोय टी.व्ही.वाला सेल फोन लाँच होण्याची..
माझ्या गावात टी. व्ही. चा ट्रान्समीटर नव्हताच.. ऐकण्यातसुद्धा नव्हता आणि त्यामुळे अस्तित्वात सुद्धा..
म्हणूनच टी. व्ही. घेण्यात अर्थ नव्हता. टीव्ही घेऊन त्यावर नुसत्या मुंग्या बघायच्या, तर कोकणात मुंग्या भरपूर होत्याच..
मग आम्ही चक्क खेळायचो वगैरे.. क्रिकेट, विटी दांडू..ओढ्यातले (त्या वेळच्या "पर्ह्या"मधले) बारके बारके मासे पकडून पिशवीत भरणं..सायकल हाणत गावभर बोंबलणं..बदा बदा पडणं..आंबे बोरांच्या झाडांना आणि स्वत: ला खोका पाडून घेणं.. हेच आमचे जगण्याचे (आणि मरण्याचे) उद्योग होते..
एखाद्या दिवशी रानात साप (कोकणात "जनावर" म्हणायचे..) निघाला तर मग सगळा दिवस सत्कारणी लागायचा. ..
आजच्या तारखेला किती अवास्तव वाटतंय हे सगळं.. पण नाही.. मी म्हातारा नाही..
मला आता वर्षाचा (एक वर्ष या अर्थाने..!! ) छोटासा मुलगा आहे.. तो या ३-जी जगाशी खेळत असतो..
मी बघत बसतो.. "व्हॉट्स नेक्स्ट??"
मी कसला म्हातारा .. ए बायको..!! .. मी तर पुन्हा एक वर्षाचा झालोय.. आणि माझ्या बाळाचं बोट धरून त्याच्याच मोठमोठ्या भोकरासारख्या "एंजल आईज" मधून बघत बघत आता मी परत मोठ्ठा होईन..
प्रतिक्रिया
31 Jan 2012 - 4:21 pm | मी-सौरभ
मुक्तक आवडलं....
आमच्याकडे जेव्हा लँडलाईन आणि रंगीत टीव्ही आला होता तेव्हा किती किती आनंद झाला होता. आता दर ६ महिन्याला मोबाईल बदलतो पण त्यात ती मजा नाही.
फोनवर १४१ फिरवायचं आणि रिंग वाजल्यावर ईतरांची फिरकी घ्यायची यातला आनंद आता मिस करतो काका.
31 Jan 2012 - 5:14 pm | कवितानागेश
मला हा नंबर आठवतोय
31 Jan 2012 - 5:19 pm | मी-सौरभ
तुमचच बरोबर असेल...
31 Jan 2012 - 6:42 pm | पिलीयन रायडर
एकदा मी माझ्या एका बहिणीची अशीच फिरकी घेत होते...
मी १६१ फिरवला आणि फोन खाली ठेवला...फोन वाजला... तिला कळेना की मी नक्की काय केलं...
"मला माहीतिये..तु आपलाच नंबर फिरवलास आणि मग खाली ठेवला फोन ची रिंग वाजते.." - बहीण
"ठिके मग तु करुन बघ..." - मी
तिने आमचा नंबर फिरवला आणि फोन खाली ठेवला.. आणि खरच रिंग वाजली... मी १ सेकन्द अवाक.. मग माझ्या लक्षात आलं की ही STD ची रिंग आहे...
तोवर ती खुश की कसली मी हुशार आहे..कसलं भारी शोधुन काढलं...!!
मी तिला "अगं अगं फोन उचलु नकोस. हा खरच फोन आलाय " म्हणे पर्यंत तीने फोन उचलला...आणि फुल्ल शायनिंग मारत.. "हल्ल्लो... हूज देअर???" असं एक्दम इंग्रजाळ्लेल्या स्टाइल मध्ये म्हणल...
तिकडुन मामानी आधी निवांत तिची अक्कल काढ्ली आणि मग आइ कडे फोन दे म्हणुन सांगितलं...
31 Jan 2012 - 4:35 pm | विजुभाऊ
चला गवि.........
चलो मिल बैठेते है ३ यार.......... आप हम और........... हमारी तनहाई
31 Jan 2012 - 4:42 pm | प्रास
काय विजुभौ,
दोघांचीही 'तनहाई' का कोण ती, एकच की काय? ;-)
31 Jan 2012 - 5:12 pm | मी-सौरभ
'तनहाई'
नाव छान आहे. तात्याच्या ओळखीची आहे वाटतं ;)
31 Jan 2012 - 4:37 pm | Maharani
खुपच छान लेख आहे...आपल्या पिढीच्या मनातले लिहीले आहे...पुण्यात रहात असल्या मुळे लहानपणी शेजार्यांचा टी. व्ही. बघण्याचे सुख अनुभवले....छायागीत ई. ....बिल्डींग मधे १/२ जणांकडे फोन असायचा..त्याचे अप्रुप वाटायचे.संगणक तर क्वचित बघायला मिळायचा...तरी पण कधी कंटाळा यायचा नाही...कारण संध्याकाळ बाहेर खेळण्यात निघून जायची...खरच नॉस्टाल्जिया...............
31 Jan 2012 - 4:40 pm | चिरोटा
आवडले. १८० डायल करून लाईटनिंग/ऑर्डिनरी कॉल लावायचा जमाना गेला.
31 Jan 2012 - 4:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आमच्या कडे पहिल्यांना रंगीत टिव्ही आला, तेव्हा आमच्या संपूर्ण वाड्यातला तो पहिलाच.
त्यावेळेस रामायण चालू होते रामानंद सागर चे.
रामायण सुरु झाले कि आमच्या घरात जत्रा असायची :D
3 Feb 2012 - 11:27 pm | किचेन
आपल्या लहानपणी आजकाल असतात तसे रडके कार्यक्रम नव्हते हे बर होत.श्री कृष्ण,रामायण,महाभारत,सुरभी,हम पांच, आय ड्रीम ऑफ जिनी, चंद्रकांता.आणि ते पण कोणीही कोणच्याही घरी जाऊन हक्काने बघायचं.सगळ्यात जास्त सातच्या बातम्या आणि त्यातला त्यांचा पेटंट आवाज मिस करतीये..
31 Jan 2012 - 5:09 pm | यशोधरा
मस्त लिहिलं आहे.
31 Jan 2012 - 5:20 pm | विजुभाऊ
ये तनहाई अब साथ नही निभाती
डर लगता है अपने आप से
31 Jan 2012 - 5:32 pm | प्यारे१
हल्ली एका ठिकाणहून दुसरीकडं जाताना गाडीत बसल्यावर बर्याचदा जाणवतं की गाडी जास्त वेगानं जात आहे. रस्ता भराभर संपतो नी मुकाम लौकर येतो. गुळगुळीत रस्ता, भन्नाट वेगवान गाड्या नी सुसाटपणाची झिंग....!
आयुष्याचं पण असंच झालंय काय हल्ली? प्रचंड गतिमानता, त्यातून येणार्या तथाकथित (कदाचित खरोखरच्या) सोयी हे सगळं बघून 'आमच्या वेळी असं नव्हतं' चं पालुपद माणूस २५-३० व्या वर्षी लावायला सुरुवात करतोय की काय असं वाटायला लागलंय.
खरंचच आसाममध्ये बी एस ए फ मध्ये तेव्हा असलेल्या काकाला फोन लावण्यासाठी बाबा नी दुसरे काका पोस्टात जायचे तेव्हा लागणारा वेळ, ट्रंक कॉल बूकींग, पाच सात वर्षाचे असताना ब्लॅक व्हाईट टीव्हीवर लागणार्या रामायण, बातम्या यांना होणारी गर्दी, २५ पैशाला मिळणारा पेरु, २० पैशाचे चुरमुरे, प्रिया स्कूटर, राजदूत ,येझ्दी मोटरसायकली, पावसाळ्यात घाटात कोसळणार्या दरडी नी अपघात काल काल (९९-२००१/२ ;) ) पर्यंत पाचगणी-मुंबईच्या २६०-२७० किमी प्रवासासाठी रात्री ९.३० ला गाडीला बसून सकाळी ७ ला गाडीतनं उतरणं... अरे किती बदललंय सगळं!
हल्ली म्हातारपण लवकर तरी येत असावं किंवा असलेल्याच वेळेमध्ये, मध्ये बरंच काही घडत असावं नी आपल्या ते लक्षात येत नसावं.
31 Jan 2012 - 5:35 pm | जाई.
छान लिहिलत गवि.
लेखन आवडलं
31 Jan 2012 - 6:48 pm | यकु
आमच्या टीचभर गावात फक्त गावचे दुकानदार बाबूशेठकडे रंगीत टीव्ही होता.
महाभारत, टिपू सुलतान, कृष्णा अशा सगळ्या मालिका पोरांच्या गर्दीला दाखवण्याचं पुण्य बाबुशेठच्या खात्यावर आहे.
हा लेख वाचून पुन्हा एकदा लहान होऊन बाबुशेठच्या ओसरीवर जमलेल्या गर्दीत जाऊन बसलो.
आणि फोन? गावात तुम्ही दाखवलाय तसाच फोन आला तेव्हा त्यांच्या खंब्याच्या तारांमधून एवढ्या लांब आवाज जातोच कसा यावर चावडीवर झालेल्या गप्पा आठवल्या.
31 Jan 2012 - 5:53 pm | रानी १३
आमच्या गावात ग्रामपन्च्यत (??) चा रंगीत टीव्ही होता.
महाभारत, टिपू सुलतान, कृष्णा अशा सगळ्या मालिका चावडीत जाउन बघायचो. आवाज नीट कळायचा नाही, तरिपन जायचो ........:(
31 Jan 2012 - 6:13 pm | मोहनराव
मस्त लेखन!
नातेवाईकांना पत्र लिहीण्यात जी मजा होती, ती मोबाईल फोनच्या जमान्यात हरवुन गेली आहे. पोस्ट्मन आला की आमचे कुठले पत्र आलंय का हो असा आवर्जुन विचारायचो. विविधभारतीवर गाणी ऐकणे, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकणे सारे काळाच्या ओघात विरुन गेले आहे. सध्या टीव्हीवर इतके चॅनल्स आहेत पण दुरदर्शनचे कार्यक्रम पाहण्याची मजा काही औरच होती. गेले ते दिवस, राहील्या फक्त आठ्वणी!!
31 Jan 2012 - 6:39 pm | चिरोटा
गेल्या २० वर्षांत देश खूप बदलला हे कारण आहे. अर्थव्यवस्था,समाज, विचार्,मूल्ये सर्वच ढवळून निघाले.आधीही हे होत होते पण बदलाचा वेग कमी होता.ह्या बदलात 'जुने ते सर्व टाकाऊ' हा विचार माध्यमांनी पद्धतशीररित्या रुजवला. जगभर हे असेच घडत असते असा आभास निर्माण करण्यात आला.मग रस्तारुंदीकरणाला विरोध करणारे, शॉपिंग मॉल नको म्हणणारे हेकेखोर, जुनाट प्रव्रूत्तीचे गणले जावू लागले. तीशीतच लोक नॉस्टॅल्जिक होत आहेत त्याचे हे कारण आहे.
31 Jan 2012 - 7:11 pm | प्रभाकर पेठकर
नॉस्टॅलजिया..स्मृतीरंजन...ह्या विषयावर एक एक प्रतिसाद टाकण्याऐवजी प्रत्येक जण एक एक स्वतंत्र लेख लिहू शकेल.
दारासिंग हिरो आणि मुमताज हिरॉईन (म्हणजे तिचे उमेदवारीचे दिवस) म्हणजे माझे बालपण. उन्हाळ्याच्या सुट्टीत दहिसरात पाच पाच शुटींग चालायच्या. कुठे जायचे आणि कुठे नाही हे ठरवायला लागायचे. हिरॉइन्सच्या मागे धावण्यापेक्षा हिरोमागे, तेही दारासिंग आणि रंधावा, धावयचे दिवस होते ते. बलदंड हिरो ही आदराची स्थानं होती. हिन्दी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण दहिसरात व्हायचे.तेंव्हा गोरेगावची फिल्मसिटी नव्हती. एकदा तर एका इंग्रजी चित्रपटाचे चित्रिकरणही पाहावयास मिळाले. मुंबई बाहेरचे पाव्हणे आले की दुपारी सगळ्यांना घेऊन 'शुटींग' दाखविणे हा एक समारंभ असायचा. चित्रपटाचे चित्रिकरण पाहून त्यांचे डोळे विस्फारायचे. माझ्या बद्दलचा आदर वाढायचा. माझी हडकुळी छाती अभिमानाने भरून वगैरे यायची.
आंबा, पेरू, चिकू इ. झाडे मुबलक होती. झाडावरचे फळ तोडून खाल्ले तरी कोणी ओरडायचे नाही. अगदीच एखादा (त्या काळचा म्हातारा) 'अरे! बाळांनो पडाल रे झाडावरून. उतरा पाहू खाली.' असे छत्री उगारून उगाचच प्रेमभरे दटावायचा.
आता रस्ते चकचकीत झाले. झाडे गेली. संगणक, वाहिन्यांच्या जमान्यात असे झाडावर चढून फळे तोडण्यात काय मजा आहे हेही आताच्या पिढीला माहीत नाही. आणि आपण त्यांना आपल्या बालपणीच्या ह्या तथाकथित 'रम्य' गोष्टी सांगायला लागलं कि, 'गेलं म्हातारं गेल्या जन्मात' असे भाव चेहर्यावर दिसतात.
'म्हातारा झालो का?' प्रश्नामागिल जो हेटाळणीचा भाव आहे तो पाहता मला तरी असे अजिबात वाटत नाही की मी म्हातारा वगैरे झालो आहे. मनाला अजूनही उभारी आहे, हुरूप आहे, शारिरीक ताकदही बरी आहे. हं.. कधी कधी वय वाढल्याचे जाणवते पण त्याला म्हातारपण म्हणता येणार नाही. अजून १५-१७ वर्षे तरी नाही. (हा मधुमेह मात्र आवाक्यात राहिला पाहिजे). पर्वतीही एका दमात धावत चढलो असतो. (ह्या गुडघ्यांनी साथ दिली असती तर), नजर स्वच्छ आहे.(चष्मा असला म्हणून काय झालं?), स्थुलताही नाही. (एकदाच एक उंट मी त्याच्या पाठीवर बसल्यावर खाली बसला होता. मरतुकडाच होता मेला.) हल्ली पुर्वी सारखी कापडं मिळतच नाहीत. (दर तीन महिन्यांना आटतात). नाहीतर अजून तरी माझ्यात नांवे ठेवण्यासारखे काय आहे. काही नाही.
असो. माणसाने कायम, मनाने, तरूण असावं, असं म्हणतात. ते मला तंतोतंत पटतं.
म्हणूनच मी अजूनही तरूण आहे.
1 Feb 2012 - 11:06 am | स्पंदना
स्थुलताही नाही. (एकदाच एक उंट मी त्याच्या पाठीवर बसल्यावर खाली बसला होता. मरतुकडाच होता मेला.)
ह. ह. पु. वा.
31 Jan 2012 - 7:39 pm | पैसा
मला पण आठवतंय, रत्नांग्रीतल्या दोन बापट चाळी आणि एक मामा मराठे चाळ एवढ्या सुमार ४०/५० घरात मिळून शेजारी लेल्यांकडे पहिला फोन आला होता, तो नंबर आम्ही सगळेचजण आपला असल्यासारखे नातेवाईकांना देत असू. आता घरात मोबाईलचे इतके नंबर आहेत की सगळे पाठसुद्धा नाहीत!
तसाच आमच्याकडे पहिला टीव्ही शेजार्यांच्या आधी आणला होता. क्रिकेट मॅच आणि रामायण बघायला सगळी खोलीभरून माणसं बसलेली असायची! आता लक्षात येतंय, गेल्या कित्येक वर्षात अशी काही कारणाशिवाय घरभर माणसं जमलेली आठवतच नाहीत. :(
अजून आयुष्य संपलं नाही हे खरं, पण डोंगरात करवंदं तोरणं कैर्या शोधत दिवसच्या दिवस भटकंती केली होती तशी माझ्या मुलानी केली नाही. ती नशीबवान की मी? आणि आता असं वाटायला लागलंय म्हणजे म्हातारपण दारावर टकटक करायला लागलंय की काय?
31 Jan 2012 - 8:50 pm | रेवती
लेखन आवडलं.
सगळ्यांच्या मनातलं.
आमचं पोरगं एकदम जुनी खडकी, दापोडी ष्टाईल होतं.......मागल्या वर्षीपर्यंत.
यावर्षी मात्र कसल्याश्या गेमा मागतय.
31 Jan 2012 - 8:59 pm | रघु सावंत
मला नक्की आठवतं आमच्या गावी टि.व्ही. आला तेव्हा पहिली न्युज जर आम्ही कोणती पाहिली असेल तर ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झालेली हत्या एवढी कटू आठवण आहे.
31 Jan 2012 - 9:25 pm | किसन शिंदे
भुतकाळातल्या गोड आठवणींमध्ये घेऊन जाणारं लेखन! खुप आवडलं हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.
31 Jan 2012 - 9:53 pm | स्वाती दिनेश
परवा रामदासांचा तुपात भिजलेला साजूक लेख आणि आता हा... किती तरी आठवणी सारख्या मनात फेर धरत आहेत.
लेख आवडला हे वे सां न ल,
स्वाती
31 Jan 2012 - 10:08 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण.
31 Jan 2012 - 10:52 pm | एक
खूपच आवडली..
सुंदर लेख.
31 Jan 2012 - 10:58 pm | सूड
लिखाण आवडलं....बर्याच आठवणी डोळ्यासमोरुन झरझर सरकून गेल्या.
1 Feb 2012 - 12:19 am | जयवी
लेख खूप आवडेश :)
1 Feb 2012 - 12:27 am | खेडूत
मस्त! प्रत्येकाच्या मनातले विचार मांडलेत ..
1 Feb 2012 - 12:53 am | शुचि
सुरेख!! मनाने जोपर्यंत तरुण आहोत आपण म्हातारे होत नाही ;)
_________________________________________________________
काड्यापेटीचा फोन करणे,
चेंडू जमीनीवरून एकमेकांकडे टोलवणे कारण बाहेर ऊन.
काळी मैना हा कोंबडा-ही कोंबडी करीत खाणे.
कॅरम, पत्ते, व्यवहार.....
गोल्ड्स्पॉट, थम्सपचे बिल्ले इतर मुले जमा करायची ते आसुसलेल्या नजरेने पहाणे
जेंट्स सायकल चालविणे
२५ पैशाला तासभर लहान सायकल भाड्याने घेऊन ती पदडणे.
थोड्या गिल्टी आठवणी - काँग्रेस गवताचा झाडोरा घेऊन पिवळ्या फुलपाखरांमागे लागणे :(
कोणाच्या दाराला कडी घालणे :D आणि बेल वाजवून पळून जाणे ..... हे एकदा दोनदाच :(
1 Feb 2012 - 12:59 am | चतुरंग
लँब्रेटाचा फोटू मस्तच. या स्कूटरची एक गंमत व्हायची हँडल वळवलं की फक्त चाकच वळायचं कारण पुढल्या चाकावरचं कवर मेन बॉडीला जोडलेलं असल्यानं ते सरळ रहायचं. बजाजचं तसं नव्हतं कवरही चाकाबरोबर वळायचं. मी पहिल्यांदा बजाजवर बसलो आणि मग कधीतरी लँब्रेटावर त्यामुळे कवर न वळताच गाडी कशी वळतेय असं वाटून धक्का बसला होता मग उतरून बघितल्यावर लक्षात आलं! ;)
फोनही नव्हताच आमच्या घरी. आधी माझ्या मामा आणि मावशीकडे फोन आले. त्यावेळी त्याचं अप्रूप वाटायचं. कर्रर्रर्र..कट..कट्..कट्..कट मस्त वाटायचं ऐकायला. (या फोनचीही एक गंमत होती. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजात असताना हॉस्टेलवर फोन होता तो फक्त इनकमिंग असायचा. बाहेर लोकल कॉलजरी करायचा असला तरी फोनचे लॉक काढून मग करावा लागे. गार्ड बर्याचदा तिथे नसेच. आम्ही एक आयडिया शोधली होती. क्रेडलवरुन रिसीवर उचलायचा. डायलटोन आला की हूकस्विच ठराविक वारंवारितेने दाबायचे - म्हणजे 'एक' आकडा डायल करायचा असेल तर टक, दोनला टक्-टक. दोन नंबरांच्या मधे विशिष्ठ काळाचा पॉज घेऊन स्वीच दाबायचे. अशा रीतीने आम्ही कॉल्स लावत असू. थोड्या वेळा चुकीचे कॉल्स लागत पण आम्ही बर्याचदा बरोब्बर नंबर लावण्यात यशस्वी होत असू! ;) )
यानंतर टचटोन फोन्स, मग पेजर, मग भलेमोठ्ठे धगुरडे मोबाईल्स, मग छोटे सेल्स, मग ट्चस्क्रीन, मग स्मार्टफोन्स, आता ४जी काय विचारायला नको...तंत्रज्ञान पळतंय. आता माझ्या मुलाला फोन हवा असतो माझा तो फक्त गेम्स खेळायला!
तरी बरं मी अजून 'काळीबेरी' किंवा 'सफरचंद' घेतलेलं नाही. मग विचारायलाच नको मला फोन हातात मिळणंच दुरापास्त होईल! ;)
(रोटरीप्रेमी)रंगा
20 Aug 2017 - 1:23 pm | धर्मराजमुटके
"मी.. ?? म्हातारा ???"
नक्कीच गवि. यु आर म्हातारा . मिपावर आताशा लिहित नाही म्हणजे ......... ???