✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पहिले क्रुसेड........... भाग -१

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 05/23/2012 - 19:17  ·  लेख
लेख
या सगळ्या क्रुसेडमधे ख्रिश्चनांनी फक्त एकच जिंकले. सलादीनच्या युद्धाचा अभ्यास करता करता जमा झालेली माहिती थोडक्यात मांडत आहे. पिटर द हर्मिट योध्यांना जेरूसेलेमचा रस्ता दाखवताना,,, क्रुसेडची पार्श्वभूमी. ६२२-१०९० इतिहासातील घटना त्यावेळी अचानक उद्भतवल्या असे वाटले तरी आत्ता त्याचा अभ्यास करताना त्या तशा अचानक उद्भवल्या नाहीत हे आपल्याला कळते. ते कळाल्यावर त्या तशा का घडल्या याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. १०९० साली मुसलमानांविरूद्ध पहिली क्रुसेड झाली त्याची कारणे चारशे वर्षांपासून घडणार्‍या घटनांमधे दडलेली आहेत तेव्हा त्याचा अगोदर शोध घेतला पाहिजे. या चारशे वर्षात मुसलमानांचा उत्कर्ष आणि त्यांनी अवलंबलेला तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार याने ख्रिश्चन धर्म धोक्यात आला होता हे सत्य आहे. मुसलमान धर्माचा विस्तारवाद हा या धर्माचा मुळ पाया असल्यामुळे थोड्याच काळात त्या धर्माने युरोपमधेही आपले पाय रोवायला सुरवात केली होती. जर चार्ल्स मार्टेल याने चार लाख मुस्लीम योध्यांचा पराभव केला नसता तर ख्रिश्चन धर्म युरोपमधे राहिला असता का नाही हा संशोधनाचा विषय आहे. ( हे युद्ध मध्य फ्रान्सच्या उत्तरेला उमय्याद खलिफांच्या विरूद्ध झाले. अल-आंडुलासचा गव्हर्नर अब्दूल रहमान अल-गाफिकी हा मुसलमान सैन्याचा सेनानी होता तर फ्रॅंक्सचा सेनानी होता हा मार्टेल. त्या काळी युरोपमधे मुसलमान उर्वरीत लोकांना फ्रॅंक या नावाने ओळखत. या युद्धात गाफिकी मारला गेला आणि मुस्लीम धर्माचा युरोपमधे प्रसार थांबला.) चार्लस मार्टेल. पूर्वेचे मुसलमान आणि पश्चिमेचे ख्रिश्चन यांच्या दोन धर्मांमधे आणि या दोन अतिशय भिन्न विचारसरणींमधे सतत झगडे चालू होते. ख्रिश्चन सरदारांनी मुसलमानांना स्पेनचा काही भाग सोडल्यास युरोपमधून जवळजवळ हाकलून लावले होते. हा झगडा क्रुसेडमधे अधिक तीव्र झाला. क्रुसेडच्या प्रारंभीच्या काळात भ्रष्ट धर्मवेड हे या झगड्याचे एकमेव कारण नव्हते तर इतरही अनेक कारणे होती. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचाही त्यात महत्वाचा सहभाग होता. सामान्य जनतेचे धर्मवेड जाणून बुजून जोपासले जात होते व काव्य, शास्त्र, कला, राजकारण, मौज मजा या गोष्टी फक्त राज घराण्यातच दिसत होत्या. सामान्यांचे आयुष्य हे धर्मगुरू आणि त्यांचे बागलबच्चे यांच्याच हातात होते. सत्ता यांच्या हातात एकवटल्यामुळे भ्रष्टाचार व अनागोंदी बोकाळली होती व अंधश्रद्धेपायी अनेक जीव जात होते तरीही धर्माचा पगडा अभेद्य होता. धर्म हे जनतेचे वेड होते आणि त्याचे आंधळे अनुकरण करण्यात जनता धन्यता मानत होती. नीच प्रथा पाळल्या जात होत्या आणि अशा वातावरणात लष्करी सत्ता व त्यात राहून गाजावायला मिळणारे शौर्य याचे सर्वसामान्यांमधे सूप्त आकर्षण होते. सर्व सरदारांचे खडे सैन्य असे व ते सतत एकामेकांमधे लढाया करत त्यामुळे शोर्याला एक प्रकारची आदराची किनार युरोपभर होती. या सरदारांना युरोपमधे शांतता का युद्ध हे ठरवायचा पूर्ण अधिकार होता. क्रुसेडही त्या काळातील समाजाचे प्रतिबींब होते असे म्हणायला हरकत नाही. पराक्रम आणि शौर्य याला सरकार दरबारी मान होता व नाईटहूड मिळवण्यासाठी युवक काहीही करावयास तयार होते. राजांना ते मिळे व त्या काळात कुठल्याही लहान मुलाला तुला मोठेपणी काय व्हायचे आहे असे विचारल्यास नाईट हेच उत्तर मिळे. या अशा वातवरणात क्रुसेडमधे दोन परस्पर विरोधी शक्ती एकवटल्या गेल्या. एका बाजूला धर्मामधे सांगितलेली सत्कर्मे आणि दुसर्‍या बाजूला शौर्य गाजवताना कुठल्याही थराला जाणारे क्रौर्य. चर्चमधे नाइटहूड प्रदान करण्याचे समारंभ होऊ लागले आणि या वेळी बिशप आणि योद्धे हजर रहात होते. तरूणांना कॅथॉलिक पंथाशी निष्ठा वाहिल्याशिवाय त्यांच्या ध्येयाच्या जवळपासही जाता येईना. प्रसंगी त्यांना धर्मासाठी रक्त सांडायचीही प्रतिज्ञा घ्यावी लागे आणि ती घेण्यात त्यांना मोठे भुषण वाटे. क्रुसेड चालू व्हायच्या अगोदर वातावरण हे असे रानटी होते आणि तो (रानटीपणा) धर्म आणि शौर्य या कोंदणात चपलखपणे बसवण्यात चर्चला चांगलेच यश आले होते. ख्रिश्चन राष्ट्रात पॅलेस्टाईनच्या तिर्थयात्रेवरची श्रद्धा हे या झगड्यामागचे असेच एक महत्वाचे कारण होते. ही श्रद्धा बर्‍यापैकी अंधश्रद्धेकडे झुकलेली होती आणि ही तिर्थयात्रा एक कर्मठ परंपराच झाली होती. चवथ्या शतकात कॉस्टनटाईन आणि त्याच्या आईने ख्रिश्चन धर्म स्विकारल्या बरोबर चर्चला खूष करण्यासाठी म्हणा किंवा श्रद्धेतून म्हणा जेरूसलेममधील त्यांच्या श्रद्धास्थानाला –जेथे येशूला सुळावर चढवण्यात आले होते, उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा पासून या शहराची वारी करण्याची जी प्रथा पडली ती आजतागायत चालू आहेच. जसा जसा काळाच्या ओघात ख्रिश्चन धर्म भ्रष्ट होऊ लागला तसे ही वारी केल्यावर या पापापासून मुक्ती मिळते या कल्पनेने येथे भाविकांची युरोपमधून रीघ लागू लागली. ही वारी केलेल्याला समाजात मान मिळू लागल्यामुळे त्याचे महत्व अतोनात वाढले व जेव्हा हे पुण्य पदरी पडण्याच्या कामात अडथळा येऊ लागला तेव्हा साहजिकच तो दूर करायचे प्रयत्न केले गेले. हळूहळू ख्रिश्चन धर्माच्या दृष्टीने हे शहर एक पवित्र शहर मानले जाऊ लागले. ज्या ठिकाणी येशू चालला ती जमीन पवीत्र, ज्या ठिकाणी त्याने खाल्ले ती जागा पवित्र, जेथे त्याला पकडले ती जागा पवित्र, जो दरवाजा त्याने उघडला तो पवित्र, ज्या ओढ्यात त्याने स्नान केले त्याचे पाणी पवित्र........ अशा पवित्र ठिकाणांची मोठीच रेलचेल उडाली. एवढेच काय ज्या ठिकाणी येशूने श्वास घेतला ती हवाही पवित्र थोडक्यात ज्याच्या ज्याच्यावर येशूची दृष्टी पडली ते सर्व पवित्र मानले जाऊ लागले व त्याचे दर्शन घेणेही त्यामुळे क्रमप्राप्त होते. या सगळ्यात अजून एका भानगडीची भर पडली. १० व्या शतकात जगबूडी येणार व येशू जेरूसलेममधे परत दर्शन देणार अशी अफवा ऊठली आणि जेरूसलेममधे तोबा गर्दी उडाली. येशूची आराधना करून व पापाची कबूली देऊन हा विनाश वाचवता येईल असा त्यांचा दृढ विश्वास होता. या भावनेने उचंबळून आलेली असंख्य मने जेरुसलेममधे जमा होऊ लागली. एकट्या बल्गेरियामधून असे म्हणतात त्या काळात १२००० स्त्री पुरूषांनी जेरूसलेमच्या दिशेने प्रस्थान ठेवले. हा प्रदेश जेव्हा रोमन साम्राज्याच्या अधिप्त्याखाली होता तेव्हा या यात्रेकरूंना कसल्याच अडचणींना तोंड द्यावे लागत नव्हते. उलट त्यांच्या मार्गावर त्यांची चांगली सरबराई ठेवली जात असे. पण जेव्हा मुसलमानांनी जेरूसलेम ताब्यात घेतले तेव्हा सगळे चित्र पालटले. मुसलमानांच्या राज्यात स्थानिक ख्रिश्चन व या यात्रेकरूंना भयंकर छळाला सामोरे जावे लागले. प्रसंगी क्रौर्याची परिसीमाही गाठली जऊ लागली. अर्थात ख्रिश्चनांनीही ती नंतर ओलांडलीच पण त्याबद्दल पुढे येईलच. जसा जसा हा अत्याचार वाढू लागला तशी तशी जेरूसलेमला भेट देण्यार्‍यांची संख्या वाढू लागली कारण जेरूसलेमचे दर्शन घेऊन जिवंत परत येणे हा एक मोठा चमत्कार मानला जाऊ लागला अर्थात हे येशूच्या कृपेनेच शक्य होते आणि या कृपेच्याच मागे सर्वजण होते. जे हजारो यात्री आशियामधे जात होते दुर्दैवाने त्यातील काहीच परत येत होते. पण ते येताना युरोपमधील राज्यातून येत आणि त्यांनी भोगलेल्या छळांच्या रक्तरंजीत कहाण्या स्थानिकांना ऐकवत. पवित्र जेरूसलेमच्या कहाण्या ऐकायला त्यांना चांगला श्रोतृवर्ग मिळे व छळाच्या या कहाण्या युरोपमधे दूरदूरवर पसरत. त्यांचा खडतर प्रवास, त्यांच्यावर व जेरूसलेममधील त्यांच्या धर्मबांधवावर होणार्‍या अत्याचाराच्या कहाण्या अशा रितीने युरोपभर पसरल्या व सूडाची आग धगधगू लागली. वर्षामागून वर्षे उलटली आणि ही आग भडकतच गेली. एक काळ असा आला की या आगीत काय जळणार हा प्रश्न उभा राहिला. क्रुसेडने त्याचे उत्तर दिले...... मुसलमानांना धडा शिकवायच्या कल्पनेने आता मुळ धरलेलेच होते पण १० व्या शतकाच्या शेवटी शेवटी याला चालना दिली पोप सिल्व्हेस्टर याने लिहिलेल्या एका पत्राने. हे पत्र त्याने युरोपातील सर्व चर्चना लिहिले ज्यात त्याने जेरुसलेमच्या चर्चसाठी मदतीची याचना केली होती. त्याच्या दुर्दैवाने इटलीमधी पिसा या शहरानेच फक्त त्याची हाक ऐकली पण त्यांनी सिरियाच्या किनार्‍यावर थोड्याफार हालचाली केल्या तेवढ्याच. त्यानंतर या याचनेकडे कोणी लक्षही दिले नाही पण १०७३ मधे या कल्पनेने परत एकदा उचल खाल्ली. या वेळी मदतीची याचना केली होती ढासळत्या कॉस्टनटिनोपॉलच्या मान्युएल नावाच्या राजाने. त्याने नववा पोप ग्रेगरी याला मदतीसाठी साद घातली. या पत्रात या पूर्वेच्या राजाची पश्चिमेच्या चर्चच्या प्रती असलेली निष्ठा त्याने स्पष्टपणे मांडली होती. पोप ग्रेगरी अशा संधीची वाटच बघत होता. या पत्राने युरोपमधील सगळी चर्च एकत्र आणता येतील असा त्याला विश्वास वाटला आणि त्याने लगेचच सगळ्या लॅटीन आणि ग्रीक चर्चना पत्रे लिहिली. हे सगळे जर एकत्र झाले तर त्याला पूर्वेच्या मुसलमानांचा पराजय करता येणार होता. त्या पत्रांपैकी एक सम्राट हेन्रीला व एक लिहिले होते सर्व ख्रिश्चन जनतेला. या आवाहनाला रोमन धर्माधिकार्‍याने ताबडतोब मान्यता दिली. या कल्पनेनेच तो इतका उत्साहित झाला की त्याने ५०,०००चे सैन्य उभारून स्वत: त्याचे नेतृत्व स्विकारायचे कबूल केले. पण काहीच काळानंतर त्याचे लक्ष या पूर्वेच्या चर्चवरून उडाले आणि पश्चिमेला ख्रिश्चन धर्माचे बस्तान बसविण्याच्या नादात ही क्रुसेडची मोहीम कालांतराने थंडावली. पण पोप ग्रेगरीच्या पत्रांनी जे अपेक्षित होते त्या कामाची सुरवात तर केली होती. मुसलमानांच्या विरोधात एक संतापाची लाट युरोपमधे पसरली आणि यांना एकदा धडा शिकवायलाच पाहिजे असे उघडपणे बोलले जाऊ लागले. सूडाची व संतापाची धग जी आत धुमसत होती तिला वर यायला वाट मिळाली व पुढच्या संघर्षाची बीजे रोवली गेली. ख्रिश्चन जगातात मुसलमानांच्या विरुद्धच्या या लढाईच्या तयारीचे काम आणि लढाईचे नेतृत्व एका माणसाला देण्यात आले ज्याचे नाव होते पिटर द हर्मिट. पिटर द हर्मिट.- हा फ्रान्समधील अमाईन या गावचा होता आणि तो खरेतर एका श्रीमंत राजघराण्यातील स्त्रीशी लग्न करून चांगले सुखवस्तू आयुष्य जगत होता. हा तरूणपणी एक सैनिक होता पण नंतरच्या आयुष्यात त्याने संन्यास घेऊन धर्माला वाहून घेतले व त्यामुळे त्याला हर्मिट या नावाने ओळखले जाऊ लागले. हा एक बुटका पण रुंद खांद्याचा, समोरच्यावर विशेष छाप न पडणारे व्यक्तिमत्व, असा सामान्य अवतार असलेला प्राणी होता पण एकदा का त्याने तोंड उघडले की त्याचे डोळे एका विलक्षण तेजाने झळकू लागत व तो जे बोले त्याने त्याच्या समोरच्याचे मतपरिवर्तन होऊन त्याचे रक्त उसळू लागे. त्याचे आयुष्य त्याने ख्रिश्चन मठात, एका विचाराने भारून जात, धर्माची स्वप्ने बघत घालवले होते त्यामुळे अशा कडव्या पण अतिरेकी विचारांच्या माणसाकडे या मोहिमेचे नेतृत्व आल्यावर समस्त जनता भारून गेली त्यात नवल ते कसले ! त्या काळातील प्रथेप्रमाणे पिटरनेही जेरुसलेमची यात्रा केली. खडतर ३००० मैलांचा प्रवास करून तो तेथे पोहोचला. पोहोचल्या पोहोचल्या त्याला त्या शहराच्या वेशीवर सोन्याचा एक तुकडा कर म्हणून भरावा लागला. त्याने जेरुसलेममधी सर्व पवित्र ठिकाणे भक्तिभावाने पालथी घातली आणि शेवटी त्याने एका स्थानिक लॅटिन ख्रिश्चन माणसाकडे मुक्काम टाकला. रात्रभर जेरूसेलेमचे गतवैभव आणि आत्ताची हालाखीची परिस्थिती यावर त्याने त्या माणसाशी चर्चा केली. दुसर्‍या दिवशीही त्याने अनेक पवित्र जागांवर प्रार्थाना अर्पण केल्या व तेथे येणार्‍या अनुभवामुळे त्याच्यातील सूडबुद्धी अधिकच प्रज्वलीत झाली. तुर्कांनी इतर धर्माच्या जनतेवर चालवलेले अत्याचार बघून त्याचे मन खवळून उठले आणि त्याने जेरुसेलेमच्या चर्चचा प्रमुख सिमॉन याची गाठ घेतली. सिमॉन व पिटर.. त्या म्हातार्‍या प्रमुखामधे त्याला अपार करूणा दिसली. ग्रीक असल्यामुळे खरे तर तो चर्चच्या दृष्टीकोनातून पाखंडी होता पण पिटरच्या दृष्टीने तो ख्रिश्चन होता हेच खूप होते. सिमॉनने डोळ्यात पाणी आणणार्‍या कहाण्या त्याला सांगितल्यावर पिटर द हर्मिट त्याला म्हणाला “लिही ! हे सर्व तू माझ्या मालकाला म्हणजे पोपला पत्रात लिही. त्याच्या प्रती रोमच्या पोपला, सर्व राजांना आणि त्याच्यावर तुझी मुद्रा उमटावयाला विसरू नकोस. मी स्वत: त्या सगळ्यांना भेटून तुमच्यावर जे अत्याचार होत आहेत ते दूर करण्यासाठी मदत मागेन “. त्या प्रमुखाने तशी पत्रे लिहून पिटर द हर्मिटच्या स्वाधीन केली. हर्मिटला आता तो ख्रिश्चन समुदायाचा दुखहर्ता असल्याचा भ्रम होऊ लागला. गेल्या काही दिवसात आलेल्या अनुभवांमुळे व सिमॉनच्या कहाण्यांमुळे त्याला तीच स्वप्ने पडू लागली. त्याच रात्री त्याच्या स्वप्नात येशू स्वत: आला आणि म्हणाला “ हे पिटर उठ आणि त्वरा कर. तुझ्यावर जी कामगिरी सोपवण्यात आली आहे त्याला न्याय दे. माझ्या अनुयायांची मदत कर.” ही आकाशवाणीच झाली असे समजून पिटरने ताबडतोब निघण्याची तयारी केली. किनार्‍यावरून त्याने एक जहाज पकडले आणि तो इटलीला पोहोचला. पोहोचल्यावर त्याने वेळ न दवडता पोपची गाठ घेतली. त्यावेळी पोप होता “दुसरा अर्बन”. त्याने त्याची आस्थेने विचारपूस केली कारण तो जेरुसेलेमला जाऊन आला होता आणि त्याला सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली व क्रुसेडची कल्पना उचलून धरली. या बैठकीने प्रोत्साहीत होऊन त्याने त्याचा प्रवास चालू केला. इटलीमधून त्याने आल्प्स पर्वत पार केला आणि युरोपमधील सर्व राज्यांना त्याने भेटी दिल्या. प्रत्येक दरबारात, प्रत्येक चर्चमधे, प्रत्येक किल्ल्यात त्याने जेरूसेलेमच्या ख्रिश्चन जनतेच्या हालाचे वर्णन केले व त्यांना मदतीची कशी आवश्यकता आहे हे पटवून दिले व त्यांच्या मनात तुर्कांविरूद्ध सूडाची भावना प्रज्वलित केली. तो एवढेच करून थांबला नाही तर रानोमाळ हिंडत त्याने खेडेगावातील जनतेला तुर्कांची भीती दाखविली व त्यांच्यामधेही जागृती केली. त्याचा वेष त्याच्या नावाला शोभणारा असे. तो एका खेचरावरून प्रवास करी व एक सधा लोकरीचा बिनबाह्याचा अंगरखा घाले. सर्व चर्चचे पाद्री व इतर अधिकार्‍यांपेक्षा लोकांबद्दल त्याच्या मनात अपरंपार करूणा भरलेली असे व तो त्यांच्या खाजगी भानगडींमधेही त्यांना मदत करे. झगमाटापासून दूर राहून तो अत्यंत साधा आहार घेई त्यामुळे लोकांच्या मनात त्याची एक संत म्हणून प्रतिमा तयार झाली होती. तो जाईल तेथे त्याच्या भोवती लोक गोळा होऊन त्याचे भाषण ऐकत असत व त्याला भेटवस्तू देत असत. त्याला हळू हळू देवत्व प्राप्त झाले व त्याच्या खेचराचे केस लोक एक शुभलक्षण म्हनून स्वत:कडे जपून ठेऊ लागले. त्याची प्रवचनांनी ख्रिश्चन समाज ढवळून निघाला. त्याच्या एकेका शब्दांनी सर्व राजे सिंहगर्जना करून तलवारींवर आपल्या मुठी आवळू लागले व ते येणार्‍या युद्धाच्या आमंत्रणाची वाट बघत तयारीला लागले..................... जयंत कुलकर्णी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
संदर्भ
बातमी

प्रतिक्रिया द्या
24694 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

उत्कंठा वाढली आहे. पटापट

अप्पा जोगळेकर
Wed, 05/23/2012 - 20:56 नवीन
उत्कंठा वाढली आहे. पटापट पुढचे भाग येउ द्यात.
  • Log in or register to post comments

असेच

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 05/24/2012 - 15:47 नवीन
म्हणतो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

धन्यवाद. क्रूसेड्स म्हणजे

प्रचेतस
Wed, 05/23/2012 - 21:23 नवीन
धन्यवाद. क्रूसेड्स म्हणजे ख्रिश्चन आणि इस्लाम यामधील संघर्ष इतकेच माहित होते. या लेखामुळे तपशीलवार समजले . पुभाप्र.
  • Log in or register to post comments

क्रूसेड्स् चा इतिहास मुळातून

बॅटमॅन
Wed, 05/23/2012 - 21:40 नवीन
क्रूसेड्स् चा इतिहास मुळातून वाचण्याचे कष्ट तुमच्या या (आणि पुढच्या) लेखामुळे नक्कीच कमी होतील. जबरी लेख.
  • Log in or register to post comments

छान लेख

पैसा
Wed, 05/23/2012 - 21:42 नवीन
अतिशय माहितीपूर्ण असा लेख. लेखमालिका मस्त होणार यात काही शंकाच नाही! शाळेत असताना एक दोन वाक्यात उरकून टाकलेल्या क्रुसेड्सबद्दल कुतुहल होतं. लेखांबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

झक्कास. असे आमच्या भारतातले

llपुण्याचे पेशवेll
Wed, 05/23/2012 - 21:43 नवीन
झक्कास. असे आमच्या भारतातले हिंदू कधी एकत्र येणार कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments

-१

हारुन शेख
Fri, 05/25/2012 - 20:54 नवीन
-१ -----------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

उत्तम. सविस्तर

मन१
Wed, 05/23/2012 - 22:36 नवीन
उत्तम. अत्यंत ओघवत्या भाषेतलं वर्णन. काही गोष्टी सामान्य वाचकांना ठाउक असतीलच असं नाही. उदा:- कोण तुर्क? ते जेरुसलेमात कशाला अत्याचार करित? कुठय अल् अंदालुस्? अधिक काही वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Wed, 05/23/2012 - 22:56 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

क्रूसेड्स् बद्दल काही मुद्दे

चित्रगुप्त
Wed, 05/23/2012 - 22:53 नवीन
सुरुवात छान झालेली आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. या सर्व लढायांमधे आर्थिक घडामोडी काय होत्या, यात कुणा- कुणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले होते, हेही स्पष्ट करावे. पहिल्या क्रूसेड बद्दल वाचनात आलेले काही मुद्दे (हे कितपत बरोबर आहेत, हे लिहावे) १. रोमन कॅथोलिक चर्च आणि ग्रीक चर्च, यातील भांडणे: पहिल्या क्रुसेड युद्धात मुसलमानांखेरीज ग्रीक चर्च ला शरण आणणे हाही हेतु होता. २. नॉर्मन लोकांनी केलेल्या स्वार्‍यांमुळे सर्वत्र उत्पन्न झालेली अस्वस्थता: हे नॉर्मन लोक युरोपात सर्वत्र पसरले, व स्थानिक लोकांची घरेदारे बळकावून त्यांना देशोधडीला लावले. हे असे हजारो बेघर लोक हुल्लड, लुटालूट, युद्ध करण्यासाठी अनायसेच उपलब्ध होते. या बेघर लोकांपासून खरेतर पोपच्या सत्तेलाही धोका होता, त्यामुळे त्यांना पुण्य-लाभाचे प्रलोभन देऊन दूर देशी पाठवणे पोपच्या हिताचेच होते. ३. युरोप व अशियातील व्यापारी स्पर्धा: युरोपच्या व्यापारासाठी जग बिनधोक करणे, हाही एक हेतु क्रुसेड युद्धाबाबत होता. ४. पोप दुसरा अर्बन याची वैयक्तिक महत्वाकांक्षा: आपले आसन भक्कम करण्यासाठी त्याने ही 'धर्मयुद्धा'ची कल्पना उचलून धरली. विधर्मियांना ठार केल्यास प्रभु तुमची सर्व पापांपासून सुटका करेल, अशी ग्वाही त्याने दिली. ५. सुमारे एक लाख लोकांचा तांडा घेऊन पीटर निघाला, वाटेत जिथे जिथे ज्यूंच्या वस्त्या असतील, तिथे सरसहा कत्तल करत तांडा पुढे जात असे. त्यांच्यापैकी पुष्कळ लोक जेरुसेलम पर्यंत गेलेही नाहीत, तर त्यांचे लहान लहान जथ्थे युरोप भर लुटालूट, कत्तली करत फिरत होते. क्रुसेड मधील ज्यूंची कत्तलः Image removed. Image removed. पहिल्या क्रुसेड चा नकाशा: Image removed.
  • Log in or register to post comments

थोडक्यात काय...

अर्धवटराव
Wed, 05/23/2012 - 23:52 नवीन
तर क्रुसेड म्हणा कि कुठलही धर्मयुद्ध म्हणा... त्यामागे माणसाची धन-सत्तेची हाव आणि दुसर्‍या माणसाच्या रक्ताची चटक, हेच सार्वत्रीक गुण (?) आहेत... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

या सगळ्याला अजून वेळ आहे.

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 07:16 नवीन
या सगळ्याला अजून वेळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

जर भांडण मुस्लिम अन ख्रिश्चन

शिल्पा ब
Fri, 05/25/2012 - 08:36 नवीन
जर भांडण मुस्लिम अन ख्रिश्चन यांच्यात होते तर ज्युंना का मारलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

ज्युंना का मारलं?

चित्रगुप्त
Fri, 05/25/2012 - 16:41 नवीन
बिगर ख्रिस्त्यांना (मग ते कुणीही असोत) ठार करण्याने प्रभु तुम्हाला तुमच्या पापातून मुक्ती देइल, असे पोप ने सांगितल्यामुळे. म्हणजे गंमत बघा. आधी पापे करायची, मग त्यातून सुटका व्हावी म्हणून आणखी हत्या करायच्या. फक्त त्या बिगर ख्रिस्त्यांच्या असल्या, म्हणजे झाले. हल्लीच्या दहशत वाद्यांचे 'तत्वज्ञान' असेच आहे. गीतेत श्रीकृष्ण देखील अर्जुनाला तू खुशाल हत्या कर, त्याचे पाप तुला लागणार नाही. ते कर्म तू मला अर्पण कर, असे सांगतो म्हणे. शिवाय तू युद्धात जिंकलास, तर पृथ्वीचे राज्य तुला मिळेल, मृत्युमुखी पडलास, तर स्वर्गाचे राज्य मिळेल, असे घसघशीत आमिष दाखवून "निष्काम कर्म" करायला सांगतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुलना पटली नाही...युद्धात

शिल्पा ब
Fri, 05/25/2012 - 19:41 नवीन
तुलना पटली नाही...युद्धात हत्या करणे हा दहशतवाद नाही. पण केवळ पापातुन मुक्तता व्हावी म्हणुन इतरांची -त्यातही स्वधर्मीय सोडुन इतरांचीच- हत्या करणे अन युद्धातली हत्या यांचा संबंध कसा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

शिल्पा ब

हारुन शेख
Fri, 05/25/2012 - 21:00 नवीन
<<<<जर भांडण मुस्लिम अन ख्रिश्चन यांच्यात होते तर ज्युंना का मारलं?>>> क्रुसेडच जाउद्या पण जास्तीत जास्त मुस्लीम मरावेत अशी तुमची एक विचारसरणी दिसते. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

माझी विचारसरणी काय ते मी

शिल्पा ब
Fri, 05/25/2012 - 22:33 नवीन
माझी विचारसरणी काय ते मी स्पष्ट सांगते...तुम्ही तुमचं डोकं लढवायचे कष्ट घेउ नका अन माझ्या तोंडी तुमचे वाक्य न घालाल तर बरे. राहता राहीले मुस्लिम... आमचं म्हणणं जास्तीत जास्त दहशतवादी मरावेत असं आहे. आता त्यात मुस्लिमांची संख्या जास्त आहे यात आमचा काय दोष. तुम्ही मात्र त्यांची भलतीच बाजु घेउन बोलताय त्यामुळे तुमच्या विचारसरणीविषयी शंका घ्यायला पुष्कळ वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

सर्वांना धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 13:38 नवीन
सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments

धन्यवाद जयंतकाका :)

यकु
गुरुवार, 05/24/2012 - 21:23 नवीन
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Fri, 05/25/2012 - 08:49 नवीन
धन्यवाद ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

झकास

निशदे
गुरुवार, 05/24/2012 - 18:20 नवीन
वाटच बघत होतो...... तुम्ही क्रुसेडसारखा विषय घेतलाय म्हणजे आता जबरदस्तच लिहिणार..... येऊ द्यात अजून
  • Log in or register to post comments

भर्...

मन१
गुरुवार, 05/24/2012 - 19:19 नवीन
वरती मी काही प्रश्न टाकलेत. धाग्यात उल्लेख केलेल्या परिस्थितीत युरोप व मध्य पूर्व कशी पोचली हे काल टंकणार होतो. पण एकाएकी जाल जोडणी गंडली (की मिपा सर्वर गंडला?). तर ही पूर्व पीठिका:- चारशे वर्षात मुसलमानांचा उत्कर्ष आणि तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार ह्याबद्दल अजून लिहावसं वाटलं, पार्श्वभूमी म्हणून. पहिल्या शतकात युरोपचा बहुतांश सर्व नागरीकरण झालेला भाग रोमन सत्तेखाली एकवटला होता. इतकेच नाही,युरोप(स्पेन) , आफ्रिका आणि मध्यपूर्व (आजचे अरब जगत) ह्यांची रचना भूमध्य सागराने जोडलेली आहे. भूमध्य सागराच्या अल्याडला युरोप, पल्याडला आफ्रिका व तिसर्‍या बाजूला मध्यपूर्व अशी रचना. खालच्या आकृतीत ती ढोबळमानाने दाखवायचा प्रयत्न केलाय. - म्हणजे युरोपची भूमी, # म्हणजे समुद्र, * म्हणजे मध्यपूर्व तर . म्हणजे आफ्रिका असं मानलं तर साधारण रचना अशी काहिशी आहे:- ------------------------------------- ------###########**********###************** ###############************************* ..................................*********************** ..................................####******************** ..................................################################## .....................################################## ................################################## तर अशा युरोपच्या बहुतांश भाग हा रोमन सत्तेची मूळ भूमी(heart land) इटाली, ग्रीस्, स्पेन्, पोर्तुगाल्, जर्मनी, फ्रान्स्, ब्रिटन, रशियाचा काही भाग ही मूळ भूमी. त्याचे विस्तारित क्षेत्र हे प्रचंड मोठे. युरोपच्या खाली दक्षिणेला असणार्‍या जवळ जवळ उत्तर आफ्रिकेच्या बहुतांश सर्व भागावर सत्ता.(आजचे मोरोक्को, अल्जिरिया, लिबिया, इजिप्त हे सर्वच देश, नकाशातले डॉटच्या लायनीतले डावीकडून पहिले ह्या क्रमाने). शिवाय युरोपच्या पूर्वेला लागून असलेले तुर्कस्थान्,बाल्टिक राष्ट्रे, इथपासून ते थेट मध्यपूर्वेत्तेल आजचे सिरिया, जॉर्डन्,इस्राइल,इराकच्या पश्चिमेकडील काहि भाग इतका प्रचंड विस्तार असल्याने हे राज्य नव्हे तर साम्राज्य होते. ह्यांच्या पूर्वेच्या सीमा तत्कालीन अजून एका बलाढ्य, मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी रोमनांचे स्पर्धक असणार्‍या सत्तेला पर्शियन(म्हणजेच इराणी, पारशी) भिडत होत्या. कुठल्याही दोन विस्तारवादी बलाढ्य सत्तांचे सीमा वाढण्याच्या प्रय्त्नात होतात तसेच ह्यांचेही सतत संघर्ष होत. चकमकी होत. पण दोन्ही बाजूंच्या काही स्ट्रेंथमुळे किंवा काही वीकनेसमुळे एका मर्यादेपलिकडे ह्या सीमा फार बदलत नसत. युरोपिअन थेट पर्शियाचा नायनाट करुन ऐन इराण मध्ये घुसु शकले नाहित आणी पर्शियन्स काही थेट सिरिया-तुर्कस्थान(टर्की)-बल्गेरिया-इटाली असा प्रवास करत थेट रोमन राज्य जिंकू शकले नाहित. फक्त वर्चस्वासाठी संघर्ष होइ. त्यातही एक status quo राहिल्यासारखा होइ. आजचा पश्चिमेकडे आख्खा इराक्,इराण ही heart land तर पूर्वेकडे थेट आजचे मध्य आशियायी देश(उअझबेकिस्तान,ताजिकिस्तान, अफगाणिस्तानचा काही भाग व काही काळ भारताचा सिंध व बलुचिस्तानातील पस्चिम भाघी ) इथपर्यंत हे वैभवशाली, बलाढ्य इराणी साम्राज्य पसरले होते. मागील हजारेक वर्षात ग्रीक राज्ये आली-गेली, इकडे भारतात काही शतके डौलाने मौर्य साम्राज्य उभे राहिले आणि विरले. पण इ स पू पाचशे ते इ स पाचशे अशी सतत हजारेक वर्षे एकच केंद्रसत्ता घेउन पर्शियन राज्य काही अपवाद(शक,कुशाण,हुणांची स्वारी वगैरे) वगळता अखंडित उभेच होते. आसपासच्या बहगावर ह्यांचे नियंत्रण होते. नौकानयन इतर संस्कृतीतून शिकून सुसज्ज असे नौदल उभे केले होते. दूर दूर्वर व्यापार होत होता.स्थिर नागरी जीवन होते. कला,लेखन ,खाद्य ,पक्व अन्न संस्कृती ह्यांनी स्वतःची अशी बनवली होती. साहित्य बनत होतेच. स्वतः राजे अग्नीपूजक असले तरी एकेश्वरवाद्यांनाही(ज्यू, ख्रिश्चन) फारसा त्रास नव्हता. पूर्वेकडे "हिंद"कडे होणार्‍या व्यापरातून आणि इतर जनसमूहांच्या देवाणघेवाणीतून ज्ञानाचीही आदानप्रदान होत होती. ज्ञात जगातील एक प्रबळ खडे लश्कर, उत्त्मोत्तम घोडे व प्रचंड संख्या ह्यामुळे भूभागात दरारा ठेउन होते. ह्याच्या तोडिचे फारतर चीनी साम्राज्यच म्हणता यावे. आजचे सौदी अरब्,ओमान्,येमेन्,यु ए ई हे भूभाग मुद्दाम फार कष्ट घेउन ह्यापैकी कुणी ताब्यात ठेवायचा प्रयत्न करित नसे. ह्या भागाला उपजतच वाळवंटाचे अभेद्य कवच लाभले होते. ते तोडून त्यावर नियंत्रण थेवत बसणे परवडणारे वाटले नव्हते. ह्या भागाचे फारसे नागरीकरणही झालेले नव्हते. फार मोठी शहरेही नव्हती. बहुतांश भटक्या अरबी टोळ्यांत ह्या भागातले लोक विखुरले होते.(सध्या काही प्रमाणात अफगाणांचे म्हणता येइल तसेच.) रोमन साम्राज्य मजबूत होत चालले तसतशी वाढत चालली. इसवीसनाची पहिली चारेक शतके अशीच गेली. अंतर्गत कारणांनी, विलासी जीवनशैली वाढू लागल्याने मग मात्र मध्यवर्ती केंद्रिय रोमन सत्तेची पकड ढिली होउ लागली. तशात वनवासी जर्मन टोळ्यांचे, बंडखोरांचे हल्ले व एकूणातच भ्रष्टाचाराने रिकामी होत चाललेली तिजोरी ह्याने ते आतून पोखरले जाउ लागले. भरिस भर म्हणजे इ स ४५० च्या आसपास आख्ख्या जगभरातच टिपेला पोचलेला "हूण" ह्या भयंकर क्रूर्,वेगवान, भटक्या टोळ्यांचा उच्छाद रोमन सत्तेस पार खिळखिळे करुन गेला. एकेकाळी पोलादी वाटनारी पकड हळूहळू रबरी शिक्का बनण्याची वाटचाल करु लागली.(इ स १७०७ नंतर मुघलांचे उत्तर भारतात झाले तसेच.) वरती रोमन सत्तेचा जो भूभाग वर्णन केलाय , त्यपडलेसरते शेवटी दोन भाग पडले एक पूर्वेकडचे राज्य व एक पश्चिमेकडचे.पूर्वेची राज्धानी होते तुर्कस्थानमधील इस्तंबूल(तेव्हाचे कॉन्स्टॅटिनोपल ) व पश्चिमेची रोम! तुर्कस्थान आज मुस्लिम देश वाटतो. पण त्याकाळात त्यावर ग्रीको-रोम सत्त होती. फक्त सत्ताच नव्हे तर पूर्ण समाजजीवनावर ग्रीको-रोमन संस्कृतीचा पगडा होता! युरोपमध्ये तेव्हा ख्रिश्च्नन यायचे होते. ख्रिश्चन पूर्व मूर्तीपूजक्,अग्नीपूजक अशा विविध पेगन संस्कृती तिथे नांदत. ह्याच सुमारास पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा उदय झाला होता. क्रुसावर शिक्षा झालेल्या येशूच्या नावाने सेंट पॉलने बर्याच कथा पसरवत लोकांना आकर्षित करायला सुरुवात कझाला. ह्या नवरचित धर्मास आधी इस्राइलच्या आसपासच्या ज्यूंचा व नंतर काही काळ रोमन सत्तेचा बराच विरोध झाला. पण सतत लोकप्रियतेची कमान चढतीच राहिली. इतकी की शेवटी वाढता प्रसार बघून, लोकप्रियता टिकवण्यासाठी सम्राट काँस्टॅटिनोपलने ख्रिश्चन धर्म स्वीकरला. राजाश्रय मिळाल्याबरोबर ह्या धर्मप्रसारास अधिकच गती आली व बघता बघता ख्रिश्चन पूर्व सर्वच संस्कृती पुसल्या जाउ लागल्या. ख्रिस्ती धर्माचा प्रसार बहुतांश भागात १००% व्हायच्या मार्गावर लागला.(आज कुठेही अशा पेगन धर्मीया लोकांचे ठळक अस्तित्व नाही. पार पुसले गेले.) तर झाले असे की जिथे जिथे रोमन सत्ता, तिथे तिथे ख्रिश्चन बहुसंख्या असे होउ लागले. इजिप्त्,तुर्कस्थान्,लिबिया,इस्राइल असे सर्व त्यात आले. रोमन सत्तेबाहेरिलही कित्येक भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालेला होता. खुद्द पर्शियातील काही भागात मिशनरी पोचले. दुर्लक्षित अरबी वाळवंटातही पोचून अनेक अरबी टोळ्या ख्रिश्चन बनल्या. तर, सहाव्या शतकाच्या अखेरिस अशी काहिशी स्थिती होती.(इस ५५० ते ६००). दोन राज्यात विभाजित झालेले, ख्रिश्चन बहुसंख्य होउ लागलेले गत्वैभवी रोम राज्य. त्यांच्याशी सातत्याने संघर्षरत इराणी/पर्शियन/पारशी साम्राज्य. आणि कुठल्याही व्यवस्थेतील नियमाप्रमाणे दोन बाजूंमध्ये सातत्याने होणार्‍या संघर्षात एक तिसरीच बाजू अजेय म्हणून उभी राहते तशीच नव्यानेच उदयाला येउ घातलेली ओसाड वाळवंटातील भटक्या, कफल्लक मानल्या जाणार्‍या अरबांची मुस्लिम सत्ता ............ मानवी इतिहासावर कायमचा प्रभाव टाकणार्‍या काही घटना आता होणार होत्या. भूमध्य समुद्राच्या भूगोलाची थोडिशी माहिती खालील धाग्यावर मिळेलः- http://mimarathi.net/node/5540 http://mimarathi.net/node/5556
  • Log in or register to post comments

मस्त

प्रचेतस
गुरुवार, 05/24/2012 - 21:18 नवीन
आम्ही मनोबांच्या प्रतिसादांचे फ्यान काही उगाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

+1

यकु
गुरुवार, 05/24/2012 - 21:22 नवीन
अस्सेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नकाशा

चित्रगुप्त
गुरुवार, 05/24/2012 - 21:45 नवीन
रोमन साम्राज्याचा नकाशा: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हुण म्हणजे नक्की कोण लोकं?

शिल्पा ब
Fri, 05/25/2012 - 22:37 नवीन
हुण म्हणजे नक्की कोण लोकं? मंगोलियन का? तसे असेल तर इतक्या दुरवर ते पोहोचुनही त्यांचं साम्राज्य का उभारु शकले नाहीत. कारण यासंबंधी काहीही वाचले तरी हुण हे शुर, क्रुर अन ताकदवान होते यात बदल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हुण म्हणजे नक्की कोण

चित्रगुप्त
Sat, 05/26/2012 - 08:49 नवीन
.......हूण त्यांचं साम्राज्य का उभारु शकले नाहीत...... --------------------------------------------------- हूणांचे साम्राज्यः http://en.wikipedia.org/wiki/Hunnic_Empire हूणांविषयी: http://en.wikipedia.org/wiki/Huns http://en.wikipedia.org/wiki/Huna_people --------------------------------------------- 'तोरमाण' या हूणाने इ.स. ५१० मधे भारतावर स्वारी करून 'भानुगुप्त' राजाला पराजित केले. भारतात आलेल्या हूणांचे वंशज अजूनही हरियाणात स्थायिक झालेले असल्याचे ऐकिवात आहे. त्यांचे हल्लीचे प्रचलित नावही ठाउक होते, आता विसरलो. ( जाट, गुज्जर ???) .........महाभारत युद्धानंतर अर्जुन स्त्रियांना घेऊन जात असता त्याचा पराभव करणारे हेच होते, असेही वाचल्याचे आठवते.... गुर्जर - गुज्जरां मधे 'हूण' हे गोत्र असते : http://royalgurjars.blogspot.in/2007/05/gurjar-gotras.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

.........महाभारत युद्धानंतर

प्रचेतस
Sat, 05/26/2012 - 17:48 नवीन
.........महाभारत युद्धानंतर अर्जुन स्त्रियांना घेऊन जात असता त्याचा पराभव करणारे हेच होते, असेही वाचल्याचे आठवते....
ते अभीर होते. भिल्लांची टोळी. हूण हे मंगोलियातून आलेले रानटी टोळीवाले. यांचा कुठलाही धर्म नव्हता. धर्मच नसल्याने हे नेहमीच वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागले जात त्यामुळेच यांचे स्वतंत्र साम्राज्य स्थापन होऊ शकले नाही. महाभारतात हूणांचे उल्लेख खूप वेळा येतात ते सर्व प्रक्षिप्त मानले जातात कारण यांचा काळ इसवी सनानंतरचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

उत्तम

सुनील
गुरुवार, 05/24/2012 - 21:19 नवीन
वाचतोय. बरीच नवी माहिती मिळतेय. मनरावांचा प्रतिसाददेखिल माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments

वाचतोय

तिमा
Fri, 05/25/2012 - 20:39 नवीन
वाट पहातोय पुढच्या भागाची व पुन्हा (खरेखुरे) शिवाजीमहाराज जन्माला येण्याची.
  • Log in or register to post comments

भाग२

मन१
Tue, 05/29/2012 - 14:59 नवीन
वरती जी भर घालायचा प्रयत्न केलाय, त्याचा हा उरलेला भागः- तर सतत युद्धमान अशा दोन बाजू होत्या:- भूमध्यसमुद्राच्या असपासच्या भागाच्या वस्र्चस्वासाठी प्रयत्न्शील दोन बाजू होत्या. पश्चिमेकडून रोमन आणि पूर्वेकडून पर्शिअन्स्. रोमनांना अधून मधून होणार्‍या व्हायकिंग, गॉल्,गोथ, जर्मॅनिक टोळ्या,हूण ह्यासर्वानीच थोडेफार त्रस्त केले होते. इराण्यांणा, पर्शियनांना उत्तर पूर्वेकडे मध्य आशियातील भटक्या जमाती, वाळ्वंटातील टोळ्या(बदायुनी वगैरे) असा काहिसा उपद्रव होता. पूर्वेकडे काही लहान्,फुटिर इस्लामपूर्व मूर्तीपूज (हिंदु/बौद्ध)राज्ये पूर्व सीमेवर कारवाया करीत. बौद्ध ,ख्रिश्चन धर्म मध्यपूर्वेतील(आजच्या अरब जगतातील) काही ठिकाणी पोचले होते. आजच्या यु एस एस आर मधील उझबएक ताजिक इत्यादी जमातीतील कित्येक जण बौद्ध होते. मध्य्पूर्वेत उरलेले कित्येक जण अजूनही मूर्तीपूजक होते. त्याम्चे स्थानिक म्हणता यावेत असे धर्म होते. आज ऐकायला हिणकस वाटतील अशा कित्येक प्रथा ते श्रद्धपूर्वक पाळित. रोमन स्वतःला शासक म्हणवत असल्याने जोवर महसून मिळतोय, तोवर त्यांनी ह्यात काही फार ढवळाधवळ केली नाही. law and order राखायला लागेल, तेवढाच हस्त्क्षेप. असे असले तरी मध्यपूर्वेत एकेश्वर वादाचा डिंडिम फार पूर्वीच फिरवला गेला होता.ज्ञात इतिहासात सर्वप्रथम अब्राहम हाने हे द्वाही फिरवली. आज मध्यपूर्वेत हरेकास हा माणूस आदराचे स्थान आहे, अगदि ज्यू, ख्रिश्चन्,मुस्लिम सगळेच आपण(च) ह्याचेच वंशज आहोत, वैचारिक वारसा चालवतो आहोत असे मानतात. अब्राहमानं देव एकच आहे, मूर्तीपूजा पाप आहे म्हणत मूर्ती फोडण्यास सुरुवात केली. पाठोपाठा त्याच्या वंशातील दाउद्,सुलेमान(डेविड्,सोलोमन) ह्या प्रेषित्/राजांनी एकेश्वरवादाचा हिरिरिने पुरस्कार केला. ह्याम्च्यातीलच मोझेसने पुढे इजिप्तच्या मूर्तीपूजक फेरोज् शी उभा लढा मांडून दैवी साक्षात्कार जनतेला घडवल्य्ताचे मानले जाते. त्याही नंतर काही शतकांनी इसवी सनाच्या प्रथम शतकाच्या आसपास येशू ख्रिस्त नावाची परम प्रभावी व्यक्ती होउन गेली. ह्याचे प्रत्यक्ष सामाजिक जीवन म्हटले तर केवळ दीडेक वर्षच असेल, पण त्या काळात त्याच्यासमोर जो कुणी येइल, तो त्याने प्रभावित होइ. प्रभावित झालेला इतरांस जाउन जो माहिती सांगे, त्याने इतर प्रभावित होत. तर त्यापासून आपल्या मूळ शिकवणूकीस धोका वाटल्याने, ज्यू समाजातील वरिष्ठांनी त्याच्यावर खटला चालवायची मागणी करून रोमन सत्तेस त्याला क्रुसावर चढवायला लावले*. ह्या येशूच्या जादुइ वाणीची माहिती सर्वप्रथम त्याचा (!थेट)शिष्य पॉल आणली.बाहेरच्या जगापुढे हिरिरिने आणली. हळुहळु पुढच्या तीनेक शतकात ख्रिश्चन धम्राचा प्रसार वाढतच चालला. परस्पर प्रेम, एकदा ख्रिश्चन झाल्यवर मग विश्वबंधुभाव ह्या गोष्टींचा सामान्यांवर प्रभाव न पडता तरच नवल. पहिल्या प्रतिसादात राजकिय पार्श्वभूमी साम्गितली आहे, इथे दुसर्‍यात आणि तिसर्यात धार्मिक कारणे सांगावी म्हणतोय. तोवर होमवर्क म्हणून यकुचा धागा:- तर, http://www.misalpav.com/node/19374
  • Log in or register to post comments

भाग३

मन१
Tue, 05/29/2012 - 15:36 नवीन
इस ६१० च्या आसपास प्रेषित मुहम्मद ह्यांनी कुर आन लिहिण्यास सुरुवात केली. ६२२च्या आसपास अनुयाअयांची संख्या प्रचंड वाढली. मानवी बंधुभावाचा संदेश व आक्रमकपणे, ठासून मत मांडाणे ही प्रमुख कारणे असावीत. लवकरच मुहम्मदांच्या नेतृत्वाखाली आख्ख्या अरबस्थानात एकछत्री मुस्लिम राज्य स्थापन झाले. बहुतांश सर्व टोळ्यांनी, अरबांनी, कुरैश टोळ्यांनी व अगदि स्थानिक ज्यूंनी सुद्धा नेतृत्व स्वीकारत राज्य स्थापनेस हातभार लावला. आजच्या सौदी अरब, येमेन, ओमान इतपतच हे मुस्लिम राज्य होते. इस६३२ मध्ये मुहम्मदाच्या मृत्युनंतर मात्र पुन्हा टोळ्ञा फुटुन बाहेर पडू लागल्या. सुमारे वर्षभर चाललेल्या मोहिमेत(रिद्दा मोहिम) अबु बक्र ह्यांच्या नेतृत्वाने ह्या विरोधस कायमचे शांत केले. ..... आता मध्यपूर्वेत च्या पूर्वेस होते पर्शिया, पश्चिमेस रोमन. बहुतांश मध्यपूर्व अजूनही गैर मुस्लिमच होती. उरलेले परत येउन लिहितोय. बूच मारु म्नये.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग केव्हा ?

diggi12
गुरुवार, 08/04/2016 - 17:23 नवीन
पुढचा भाग केव्हा ?
  • Log in or register to post comments

किंगडम ऑफ हेवन

सिरुसेरि
गुरुवार, 08/04/2016 - 18:59 नवीन
छान माहिती . रिडले स्कॉटचा "किंगडम ऑफ हेवन" हा गाजलेला सिनेमा क्रूसेड्सवर आधारीत आहे .
  • Log in or register to post comments

पुढचा भाग केव्हा

diggi12
Fri, 03/29/2019 - 01:07 नवीन
पुढचा भाग केव्हा
  • Log in or register to post comments

पुढील भाग प्रकाशित करा सर...

उदयगिरी
Mon, 03/09/2020 - 19:06 नवीन
पुढील भाग प्रकाशित करा सर...
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा ही मालिका वाचायला घेतली आहे.

चित्रगुप्त
Mon, 07/08/2024 - 07:03 नवीन
मिपावरील जुने उत्तमोत्तम साहित्य पुन्हा वाचायला घेतले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली, आणि सुरुवात म्हणून ही लेखमाला घेतली आहे.
  • Log in or register to post comments

पुढील भाग यायला हवा होता

diggi12
Sat, 08/03/2024 - 23:31 नवीन
पुढील भाग यायला हवा होता
  • Log in or register to post comments

क्रुसेड

जयंत कुलकर्णी
Tue, 08/20/2024 - 09:30 नवीन
मी क्रूसेडवर आता एक पुस्तकच लिहिले आहे. लिहून झाले आहे, फक्त टेंपलार नाईट आणि हॉस्पिटलर्स वर ५० एक पाने लिहायची राहिली आहेत. झाल्यावर येथे कळवेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: diggi12

माझी एक प्रत आताच राखून ठेवा.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 08/20/2024 - 13:16 नवीन
माझी एक प्रत आताच राखून ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अभिनंदन वाट बघतो

diggi12
Wed, 08/21/2024 - 12:38 नवीन
अभिनंदन वाट बघतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा