चपला आणि सत्कार - भाग ११

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
28 Nov 2011 - 10:50 am

प्रशा दुपारी जेवण घेउन आला तेंव्हा नाथा अजुन पण बनियन आणि अंडरवेअर घालुनच खोपटाच्या बाहेर गुणगुणत बसला होता.हणमंता खोपटाच्या आत अर्धा बाहेर अर्धा झोपला होता. प्रशानं आधी आत वाकुन आनंद जिवंत आहे का ते पाहिलं, तो जिवंत होता, त्याच्यापेक्षा प्रशालाच बरं वाटलं. त्याची शंका नाथानं ओळखली. ' प्रशाभौ, घाबरु नका, मारत नाय त्याला ते लंगडं आता तसंच राहिल जिंदगीभर तुम्हाला सांगतो फक्त एक पाच वाजेपर्यंत थांबा, त्याला घेउन जातो इथुन.' या बोलण्यानं प्रशाला थोडं बरं वाटलं पण आनंद अजुनच अस्वस्थ झाला. नाथाचं काम झालंय म्हणजे नक्की काय, बांगरे तर गायब होताच तो याला सापडला का काय, त्यानं मुश्ताकचा पत्ता दिला का काय, उगा त्या बेवड्याला क्लबातच ठेवायला हवं होतं, दुसरा कुणीतरी पाठवायला हवा होता मुश्ताकबरोबर, त्या रात्री नाथाला बोलवायला उगाच धाडस करुन त्याच्या एरियात जायला नको होतं, अशा ब-याच गोष्टी, पण या आधी त्याला एक गोष्ट आठवली ती म्हणाजे, मिरवणुकीच्या रात्री मुश्ताकबरोबर त्यानं स्वताच जायला हवं होतं, माणुस ओळखण्यात झालेली चुक त्याला महाग पडणार आहे याची थोडी कल्पना आलेलीच होती पण ती वेळ चार पाच दिवसातच येईल असं ही वाटलं नव्हतं, कारण विसर्जनाच्या दुस-याच दिवशी तालमीतली सगळी मोठी लोकं अंडरग्राउंड झालेली होती, नाथा सारख्या पैलवानाकडनं अशा हालचालीची अपेक्षा त्याला नव्हती.

माननीयांच्या घरच्या केबिनमध्ये त्यांना घरचाच आहेर मिळाला होता, रागारागात ते उठुन संपर्क कार्यालयात आले. तिथं बाकी बरीच माणसं त्यांची वाट पहात होती. आपल्या चेंबरमध्ये बसुन, म्हणजे कोंडुनच घेतलं होतं स्वताला, त्यांना काही सुचेना. मग तिथुन निघुन ते सरळ हॉटेलवर गेले. तिथं बसुन आपल्या खास माणसांबरोबर त्यांनी काही डाय-या काढुन फोन लावायला सुरुवात केली. पुर्वी हे सोपं होतं, दररोजचा धंदा होता, गावातल्या अन बाहेरच्या सगळ्यांशी दररोजचे संबंध होते पण ही जनसेवेची नाटकं सुरु केल्यापासुन सगळं अवघड होतं. समोरची लोकं मदत करायला सुद्धा घाबरत होती. शेवटी त्यांनी आपले खास राखुन ठेवलेले उपाय वापरायचं ठरवलं. हॉटेलच्या फोनवरुन त्यांनी थेट तालमीचे जुने पैलवान आणि कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष अप्पा महाजनांच्या घरी फोन केला. अप्पा पैलवान घरी नव्हते. अप्पा जरी तालमीशी संबंधित असले तरी अतिशय सज्जन माणुस, तालिम एके तालिम आणि पैलवानकी नि कुस्ती एवढंच त्यांचं क्षेत्र होतं. उमेदवारीच्या काळात माननीय पण त्यांच्या हाताखाली ताबडले गेले होते. त्यांना शरण जाण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. मगाशी मिळालेल्या निरोपानुसार माननीयांनी पुन्हा फोन लावला. अप्पा घरीच होते, त्यांनी भेटीची वेळ दिली, दुपारी चार वाजता. आता सकाळाचे दहा वाजलेले, इतका वेळ थांबणं अवघड होतं पण दुसरा उपाय नव्हता. खालुन दारु आणि चकण्याची ऑर्डर देउन माननीय तिथंच पडुन अजुन काही करता येईल का याचा विचार करायला लागले.

सकाळपासुन सतत चार तास प्रवास करुन जीप थांबली, अन मुश्ताकला ओढुन खाली उतरवलं गेलं. त्याची शुद्ध हरपलेलीच होती. त्याला धरलेल्यांनी सोडलं तसा तो धाडकन जमिनिवर कोसळला. त्याला पुन्हा उचललं तसं त्याला ओरडावसं वाटलं ,त्याचे हात पाय सोडले नाहीत फक्त डोक्यावरचं पोतं थोडं मोकळं केलं डोळे उघडायला जमल्यावर त्याला त्या पोत्यातुन येणा-या उजेडावरुन त्याला समजलं की त्याला थेट उघड्या आकाशाखाली टाकलेलं होतं. त्यानं एका अंगावर वळायचा प्रयत्न केला, दोन तीन वेळा प्रयत्न केल्यावर तो पालथा झाला. त्या पोत्यातुन अ‍ॅडजेस्ट करुन पाहिल्यावर त्याला कळालं की तो एका मातीतच पडुन आहे, बाजुला सगळीकडं दगडंच . त्याला जेवढं दिसत होतं तेवढ्यात काहीही जिवंत दिसत नव्हतं, ना झाडं ना माणसं. अजुन थोडी धडपड करुन तो उठुन नमाजाला बसतात तसं बसला, आता त्याला स्पष्ट दिसत होतं सगळीकडं. अजुनही जिवंत असं काहीच दिसत नव्हतं. त्यानं उभं राहायचा प्रयत्न केला पण दोन्ही पाय पोत्यात घालुन बांधलेले असल्यानं तो पुन्हा एकदा जोरात खाली पडला आणि यावेळी तो थेट तोंडावरच पडला, नाकाला आणि कपाळाला मोठी जखम झाली. कपाळावरुन खाली येणारा रक्ताचा मोठा ओघळ डोळ्यावरुन तोंडात आला, तोंड बांधलं असल्यानं ना त्याला ओरडणं शक्य होतं ना तो ते रक्त तोंडातुन थुंकु शकत नव्हता. जसा दिवस मावळायला लागला त्याच्या कपाळावरच्या जखमेतुन रक्त यायचं थांबलं. यावेळेपर्यंत त्याला ग्लानी आलेली होती, तहान लागलेली होती. कमरेखालचा भाग त्याच्याच मुतानं दुपारी ओला झाला होता आता तो पण वाळला होता.

माननीय चार वाजायची वाट पहात होते, पण त्यांना राहवलं नाही त्यांनी स्वताच स्कॉर्पिओ काढली आणि एका खास माणसाबरोबर अप्पांच्या घरी आले, त्यांच्या अपार्ट्मेंटच्या खाली ते आल्याचं वर अप्पांना कळालंच होतं. त्यांची बसायची जागा हॉलच्या खिडकीतच होती. चार वाजल्याशिवाय अप्पा आत घेणार नाहीत ह्याची त्याला पुर्ण कल्पना होती. वाट पाहणं एवढंच माननीयांच्या हातात होतं. बरोबर चार वाजता ते प्लॅटच्या दरवाज्यासमोर होते, आणि बेल न वाजवताच दरवाजा उघडला गेला. अप्पा समोरच बसलेले होते, पायातले बुट काढुन माननीय आत जाउन बसले. अप्पांनी थेट मुद्द्याला हात घातला. ' कोणी आणली बाहेरची माणसं गावात ? माननीय मान खाली घालुन बसले होते. ' कुणाला उडवायचं होतं अन कोण चुकलं ? माननीय गप्पच. ' आता ह्या चुकीची भरपाई कोण करणार?' ' अप्पासाहेब, पण मी काय म्हणतो,,' माननीयांचं वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच अप्पांचा पुढचा प्रश्न आला, ' आता एकच सांग, कुणाकडुन भरपाई घ्यायची, चुक करणा-याकडुन की चुक करायला लावणा-याकडुन ?' हे ऐकुन माननीय उडालेच. परिस्थिती फार पुढं गेलेली आहे हे कळुन चुकले. ' तुम्हाला काय बरोबर वाटतंय ते करा, आम्ही लेकरं काय तुमच्या बोलण्याच्या बाहेर जाणार का ?' अप्पांनी माननीयांना जवळ बोलावलं, दोन मिनिटं अगदी हळु आवाजात बोलणं झालं. मत अप्पांनी त्यांच्या मोठ्या सुनेला हाक मारली ' वनिताबाई, ओ वनिताबाई, जरा अरगज्याची वाटी आणि अक्षता आणा देवासमोरच्या.' वनिताबाई दोन्ही घेउन आल्यावर, अप्पांनी त्यांच्या वहीतुन एक मंडळाचं कॅलेंडर काढलं, माननीयांच्या कपाळाला अरगजा लावला, कॅलँडरवरच्या गणपतीला पण अरगजा लावला, थोड्या अक्षता त्यावर ठेवल्या. माननीयांच्या हातात कॅलेंडर ठेवलं. वनिताबाईंनी वाटीतली साखर दोघांच्या हातावर ठेवली. ' या आता तुम्ही, काय आणि कसं करायचं ते आम्ही बघुन घेतो. ' माननीय उठले, कॅलेंडरवरच्या अक्षता हातात घेतल्या, अप्पांच्या पायाला हात लावला ' अप्पासाहेब सगळं तुमच्यावर सोडलंय आता, सावरुन घ्या' यावर अप्पा हसुन बोलले ' हे गणपती महाराज आणि ही आमच्या घरातली लक्ष्मी, यांच्यासमोर सांगितलंय, या आता.' माननीय अपार्ट्मेंट मधुन बाहेर पडले ते फोन लावतच. त्याचवेळी वर अप्पांनी समोरच्या टीपॉयवरचा फोन ओढुन घेतला अन.....

बरोबर साडेचार वाजता नाथाचा फोन वाजला, तो पुन्हा खोपटापासुन उठला अन लांब येउन फोन घेताना त्यानं एक हात छातीला लावुन नमस्कार केला. पुढं दोनच मिनिटं तो बोलत होता. तो फोन बंद केला तेवढ्यात दुसरा फोन आला. दोन्ही फोनवरुन त्याचा चेहरा एकदम आनंदी झाला. खोपटाकडं परत येउन त्यानं हणमंताला विचारलं ' या भडव्याला नेउन होटगीला टाकायचं कारखान्याच्या मागं, किती वेळ लागेल तुला? ' इथुन निघायचा जेवढा हणमंताला आनंद झाला त्यापेक्षा जास्त प्रशाला जास्त बरं वाटलं. आनंदला इथुन जिवंत बाहेर नेणार यामुळं त्याला फार बरं वाटलं. हणमंतानं लगेच कपडे घालायला घेतले, नाथा त्याला म्हणाला, अबे कपडे लई घाण होतील ह्या भडव्याच्या घाणीमुळं, आधी ह्याला आत टाकु अन मग कपडे करु. आधी खोपटातला थोडा कडबा गाडीत अंथरुन दोघांनी आनंद्ची जखम पुन्हा पोत्यात बांधली, त्याचे तोंड आणि डोळे पुन्हा बांधले, तसा ही आनंद बेशुद्ध असल्यासारखाच होता, त्याला आपल्याला हलवलं जातंय एवढंच जाणवत होतं. मग दोघांनी त्याला उचलुन गाडीत आणुन टाकलं. मागच्या रांजणातुन पाणी घेउन हात पाय धुतले, नाथानं प्रशाला पाच हजार रुपये दिले आणि ते दोघं तिथुन निघाले.

मुश्ताकनं रात्र व्हायच्या आत इथुन निघायचा शेवटचा प्रयत्न करायचा ठरवलं. पाय दोरीनं बांधुन पोत्यात घातलेले होते ते सोडवायचा प्रयत्न करुन दमल्यावर, त्यानं आपले हात सोडवायचा प्रयत्न केला ते सुद्धा जमेना, मग मात्र त्याला रडणं आवरेना. तोंडातल्या बोळ्यामुळं त्याला ओरडता सुद्धा येत नव्हतं. गेल्या आठ दिवसातल्या सगळ्या घटना त्याला आठवायला लागल्या. त्याच्या डोळ्यासमोर त्या पोराचा, त्याचं नाव सुद्धा त्याला माहित नव्हतं चेहरा येत होता, त्यानंतर मैन्नुदिनचा चेहरा, मग त्याच्या मोठ्या मुलीचा मग आनंद आठवायला लागला. पण हे देखील त्याला जास्त वेळ जमलं नाही. शरीर साथ देत नव्हतं, पुर्ण अंधार झाल्यावर त्यानं डोळे मिटुन घेतले, ग्लानीतर आलेलीच होती. केगाव-बार्शी रोडवरचा तो खड्डा जसा पुर्णपणे अंधारात बुडुन गेला तेंव्हा तिथुनच हाकेच्या अंतरावर असणा-या एका घरात पण अंधार भरला होता, फक्त त्यात दोन जण एक पिशवी घेउन बसले होते, कुणाच्या तरी येण्याची वाट बघत, कुणाच्या तरी जाण्यासाठी.

हणमंतानं गाडी नळदुर्गच्या पुढुन अक्कलकोटकडं घेतली अन मागच्या रोडनं ते रात्री दहाच्या सुमारास होटगी स्टेशनच्या बाजुनं साखर कारखान्याच्या बाजुला पोहोचले. उस गाळपाच्या सिझनला या भागात सगळे ट्रक, बैलगाड्या असतात. तिथं रस्ता असा नव्हताच, सगळ्या मैदानात अजुनही उसाचा वाळलेला पाचोळा पडलेला होता, त्यावरुन गाडी कारखान्याच्या भिंतीजवळ नेउन हणमंतानं थांबवली. लाईट बंद केले. थोडावेळ तिथंच थांबले, कुणी येत जात नाही याचा अंदाज घेतला. कारखान्यच्या आतल्या बाजुला काहीतरी कामं चालु होती. नाथा गाडीतुन उतरला, त्यानं आनंदला सोडण्यासाठी योग्य जागा हुडकायला सुरु केली. सकाळहोईपर्यंत तो जिवंत राहणं भाग होतं, मग कुणीतरी पोलिसांना बोलावलं असतं, त्याला दवाखान्यात नेलं असतं, तो वाचला असता. ज्यानं मदनला मारलं तो सापडल्यानं आता नाथाला आनंद्ला मारायचं नव्हतं. बांगरे फारच कच्चा निघाल्यानं, औरंगाबादच्या उस्मानभाईला दिलेले पैसे वाया गेले होते. पण काम तर झालं होतं, पण आता अडचण एकच होती. होटगीवरुन आता बार्शी रोडला जायचं म्हणजे सिटि क्रॉस करावी लागणार होती. पोलिसांनी सगळीकडं बंदोबस्त लावलेला होता, त्यामुळं त्याला पुन्हा अक्कलकोटमार्गेच बाहेर पडावं लागणार होतं. इथं जास्त वेळ घालवला तर कुणाला तरी शंका आली असती. तो परत गाडीत आला, त्यानं गाडी पुढं घ्यायला लावली, आनंदला दोघांनी बाहेर काढलं. त्याच्या पायाचं पोतं काढलं, बांधलेले हात पाय सोडले, तोंडावर बांधलेला पंचा काढला, त्याला भिंतीला टेकवुन बसवलं, तो अर्धवट जागा झाला होता, त्याच्या तोंडात थोडं पाणी टाकुन नाथा अन हणमंता तिथुन निघाले. अक्कलकोटमार्गे बार्शी म्हणजे जवळजवळ तुळजापुर पर्यंत जावं लागणार होतं, हणमंताचा प्रोब्लेम होता गाडीत तेवढं पेट्रोल नव्हतं. आता रात्री हायवेला पेट्रोल मिळणं अवघड होतं,

अर्थातच क्रमश :

चपला आणि सत्कार - भाग १ - http://misalpav.com/node/19342
चपला आणि सत्कार - भाग २ - http://misalpav.com/node/19352
चपला आणि सत्कार - भाग ३ - http://misalpav.com/node/19614
चपला आणि सत्कार - भाग ४ - http://misalpav.com/node/19642
चपला आणि सत्कार - भाग ५ - http://misalpav.com/node/19672
चपला आणि सत्कार - भाग ६ - http://misalpav.com/node/19700
चपला आणि सत्कार - भाग ७ - http://misalpav.com/node/19723
चपला आणि सत्कार - भाग ८ - http://misalpav.com/node/19751
चपला आणि सत्कार - भाग ९- http://misalpav.com/node/19815
चपला आणि सत्कार - भाग १० - http://misalpav.com/node/19875

समाजजीवनमानराहती जागाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रास's picture

28 Nov 2011 - 12:07 pm | प्रास

___/\___

हे लई म्हणजे लईच ज ह ब रा आहे.

आता पटकथा लेखनाला आरंभ करा बुवा! पाणचट चित्रपटांना कंटाळलोय....

:-)

प्रचेतस's picture

28 Nov 2011 - 12:12 pm | प्रचेतस

अगदी अगदी. सहमत. एकदम भन्नाट कथानक.

मी-सौरभ's picture

28 Nov 2011 - 2:58 pm | मी-सौरभ

मिपा करांना पण घ्या पिक्चरमधे काम करायला..

साबु's picture

28 Nov 2011 - 1:49 pm | साबु

.

क्रान्ति's picture

28 Nov 2011 - 9:32 pm | क्रान्ति

हर्षद, अरे ती पत्रा तालीम, पंजाब तालीम, चौपाड दिसतंय आणि ते टोळीयुद्ध अगदी आत्ता समोर घडतंय, असं वाटावं इतकं जिवंत वर्णन केलंस ! अंगावर काटा येतोय वाचताना. सत्या, वास्तव सारखा एखादा चित्रपट पहावा तसं वाटतंय तुझं लेखन.

साबु's picture

29 Nov 2011 - 1:39 pm | साबु

क्रन्ति तै शी सहमत...
लाजवाब लेखन...

जबरी, भारी, वेगळेच विषय निवडण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही. सुपरलाईक. कथेचा बॅकड्रॉप अस्सल आणि निराळा आहे.

५० फक्त's picture

5 Dec 2011 - 11:12 am | ५० फक्त

पुढचा भाग टाकला आहे - http://misalpav.com/node/20000