गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्ठी) अजून झालेली नसे ना.
खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय.
खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.
तर ही सट म्हणजे काय आणि ती आमच्या गावाकडे कशी साजरी होते त्याचा हा फोटो वृत्तांत.
चंपाशष्ठीपूर्वी आठ दिवसांपासूनच गावातले धनगर गडी खंडोबाच्या देवळात 'वारु' म्हणून बसलेले असत. खंडेराया, माझं हे कामं होऊ दी, म्होरल्या साली तुझा वारु म्हनून सेवा करीन असा नवस खंडोबासमोर बोलला आणि ते विविक्षीत काम झालं की वारु म्हणून बसणं आलंच.
मग वारु म्हणून बसलेल्या लोकांचं सट होईपर्यंत पुजा-अर्चा, खाणं-पिणं, रहाणं सगळं खंडोबाच्याच मंदिरात. बाजाराचा दिवस म्हणजे बुधवार सटीच्या दिवशी येईल अशा बेतानं गावात हे वारु गाड्या ओढतात. या वारुंच्या अंगात आलेल्या खंडोबाकडून श्रद्धाळू धनगर आणि इतरही लोक चाबकाचे फटके खातात.
सटीच्या दिवशी मग आजीकडून मल्हारी मामा नावाच्या एका धनगर आजोबाला बोलावणं जाई. नैवैद्य-वैश्वदेव झाल्यानंतर खंडोबाची तळी उचलायची असे. हे मल्हारी मामा मग त्यांच्यासोबत तळी आणि खंडोबा समोरच्या दिवट्याच्या काजळानं काळा कुळकुळीत झालेला विळा घेऊन घरी येत. तळीसमोर आरती झाली आणि ती विधीपूर्वक ती उचलली की विळ्यावरचं काजळ घरातल्या पोरासोरांच्या आणि गडी माणसांच्या डोळ्यांना लावलं जात असे.
जेवणं उरकली की खंडोबाकडं पळायचं असे. गावभरातल्या बैलगाड्या खंडोबासमोर आणून ओळीनं एकामागे एक लावल्या जात. ओढताना मध्येच सुटु नये म्हणून त्या दोन्हीकडून सोलीनं पक्क्या बांधल्या जात. पार भोईवाडा, आखरापासून (गावचं मैदान) ते खंडोबाच्या पायरीपर्यंत या गाड्या ओढल्या जातात. 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषानं आसमंत दणाणून जाई आणि गाड्यांमध्ये बसायला पोरासोरांची झुंबड उडालेली असे. एरव्ही वर्षभरात कधीही जागा न बदलणारा बाजार सटीच्या दिवशी मात्र खंडोबाकडं भरलेला असे. वारु गाड्या ओढत असताना त्यात बसण्यात, वारुकडून माणसं कोरड्याचे फटके खाताना बघण्यात थरार असे. वर्षभरात चुकून हुकून घडलेलं पाप खंडोबाच्या कोरड्यानं फटके खाल्ले की धुवून निघतं असा समज. गावातले जख्ख म्हातारे झालेले धनगरही बाह्या सरसाऊन सुरकुतलेले हात अंगात आलेल्या आणि कोरडा घेऊन झुलणार्या वारु समोर धरायचे.. हातात धरायच्या ठिकाणी घुंगरं बांधलेला कोरडा रप्पकन त्या हातांवर पडायचा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. जास्तीत जास्त पाच कोरडे हातावर घेतले की माणूस खंडोबा अंगात आलेल्या वारुच्या पायावर लोटांगण घेत असे.. किंवा फारच श्रद्धाळू असला की कोरडे खाणाराच्याच अंगात येऊन तो तसाच गर्दीत झुलत राही.. मग चार-दोन लोक पुढे येऊन रक्ताळलेल्या हातांवर खंडोबाची हळद भरीत..
नगरप्रदक्षिणा व देवदर्शनासाठी निघालेले वारु
प्रत्येक वारुला गाडी ओढावी लागते, प्रत्येक वेळी खंडोबाची आरती होते
From
खंडोबा अंगात आलेले वारु कोरड्यानं स्वतःलाही झोडपून काढतात आणि इच्छुकांनाही
प्रतिक्रिया
6 Dec 2011 - 12:32 am | अन्या दातार
भयानक आहे हा प्रकार.
6 Dec 2011 - 1:51 am | शिल्पा ब
मस्त फोटो. पण त्या गाड्या अशा माणसांनीच भरलेल्या असल्या पाहीजेत का?
अन्या, तुला भयानक काय वाटलं? गाड्या ओढणं का चाबकाचे फटके? माझ्या मते चाबकाचे फटके मरीआईचे लोकं ओढतात तसे असावेत, अर्थात थोडंफार लागत असणारंच पण ज्याची त्याची श्रद्धा.
6 Dec 2011 - 1:56 am | जागु
मस्तच.
6 Dec 2011 - 8:46 am | प्रचेतस
एका परंपरेची सुरेख शब्दांत फोटोंसकट ओळख करून दिलीत.
6 Dec 2011 - 9:52 am | निवेदिता-ताई
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवठे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्ठी) अजून झालेली नसे ना.
खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा.
-------------------------------------------------------------------
आमची आईही हा रिवाज पाळायची,कांदा, लसुण, वांगे खायची नाही..............
6 Dec 2011 - 10:00 am | गवि
प्रथेचं अतिशय सुंदर दर्शन घडवलंयस यशवंता..
भंडार्याने पिवळी झालेली मिरवणूक पाहताना अवचटांच्या अशाच एका लेखाची आठवण झाली.. आता नाव आठवत नाही, पण याच प्रसंगाविषयी होता. खदखदता पिवळा समुद्र अशा शब्दात त्या गर्दीचं वर्णन केलं आहे.
6 Dec 2011 - 11:02 am | jaypal
छायाचित्रांपेक्षा लेख जास्त आवडला."सटाची" मस्त ओळख करुन दिलीत. लेख वाचताना लहानपणी किती तरी वर्षे कानावर पडलेल्या धनगरी ओव्या ढोलासकट परत निनादत आहेत.
धनगरांचा देव बिरोबा सुध्दा आहे. शिदोबा, बिरोबा, खंडोबा ई. हे सगळे "बा" म्हणजे माझ्या माहीती प्रमाणे संभुमहादेवाचे"रिजनल मेनेजर" ;-)
गवि हे घ्या ....

6 Dec 2011 - 4:30 pm | गवि
आहा.. चपखल...
धन्यवाद....
6 Dec 2011 - 10:50 am | तर्री
कोरडे ओढण्याचा प्रकार भयानकच. अर्थात अश्या खूप चालीरीती धर्मात आहेत. कालांतराने जातीलच तोपर्यन्त ह्या परंपरेची चांगली बाजुच पाहुया .
मल्हारी मर्तंड जय मल्हारी ....
6 Dec 2011 - 11:01 am | पैसा
फोटो पहाताना जरा भीती वाटते खरी, पण मी लहान असताना आमच्या गावात अशी एक बगाडाची जत्रा भरायची त्याची आठवण झाली. त्यात लोक पाठीला हुक टोचून उंचावर लटकत फिरायचे. मोठी माणसं आम्हाला ते कधी बघायला द्यायचे नाहीत.
काल रा. चिं ढेरे यांचं 'लज्जागौरी' पुस्तक वाचत होते. त्यात एक प्रकरण खंडोबा बद्दल आहे. त्यांच्या मते खंडोबा हा क्षेत्रपाल देव. दक्षिण भारतातला स्कंद तोच खंडोबा, आणि स्कंदाची पत्नी षष्ठी, म्हणून खंडोबाला षष्ठीचं महत्त्व.
6 Dec 2011 - 11:07 am | स्पा
लेख आवडला, पण फारच त्रोटक वाटला
6 Dec 2011 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त रे भाऊ, फोटू आवडले.
-दिलीप बिरुटे
6 Dec 2011 - 11:24 am | सुहास झेले
स्पा म्हणतोय तसचं, एका परंपरेची सुंदर ओळख झाली, पण कुठे तरी ती अर्धवट वाटली :( :(
6 Dec 2011 - 11:31 am | मन१
मस्त दस्तऐवजीकरण रे. लेख सध्या नुसता चाळलाय.
बादवे, गाव कुठलं म्हटलास तुझं?
6 Dec 2011 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा
---^---
6 Dec 2011 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार
छायाचित्रे सुरेखच, मात्र शब्दांची कमतरता जाणवली.
एका अनोळखी परंपरेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
6 Dec 2011 - 3:24 pm | गणपा
आजवर केवळ वरवर ऐकुनच होतो या प्रकारा बद्दल.
सुरवातीचा लेख आणि त्याखालची चित्रं एका वेगळ्या विश्वात घेउन गेलं.
6 Dec 2011 - 5:23 pm | प्रभाकर पेठकर
वर्णन आणि छायाचित्रे फारच छान आहेत. अभिनंदन.
हळदीसारख्या औषधी मसाल्याचे उधळणे, पायदळी तुडवणे, नाश करणे मनाला पटत नाही.
श्रद्धेच्या नांवाखाली दूध, दही, तूप, हळद ह्यांची नासाडी करण्यापेक्षा गरजवंतांना ह्या गोष्टी वाटून जास्त पुण्य पदरी पडेल असे वाटते.
6 Dec 2011 - 6:57 pm | यकु
धन्यवाद दोस्तहो. आपण सर्वांनी फोटो आणि त्यासोबतच्या चार ओळी गोड मानून घेतल्या हे पाहून भरुन पावलो. सर्वांचे आभार.
फेसबुकवर मित्रानं हे फोटो अपलोड केले होते; ते पाहून लहानपणी पाहिलेली सट आठवली, ती तशीच लिहून काढली, त्यामुळं ते त्रोटक आहे.
7 Dec 2011 - 7:56 pm | कान्होबा
येळ्कोट येळ्कोट जय मल्हार
8 Dec 2011 - 5:08 am | इंटरनेटस्नेही
माहितीपुर्ण लेखन.
8 Dec 2011 - 1:00 pm | इरसाल
छान वृतांत.
असाच बारागाडे ओढायचा प्रकार आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी होतो (सध्या मानव अधिकारामुळे बंदी) अंगात आलेला भगत कोणाचीही मदत न घेता माणसांनी दाबून भरलेल्या १२ बैलगाड्या(बिन्बैल आणि एकमेकांना बांधलेल्या) एकटा ओढून ७/८ किमी खंडोबाच्या मंदिराजवळ नेत असे.मग त्या धांदलीत गाडीवरून पडून कोणाचा हात मोडणे, कोणाच्या पायावरून गाड्या जाणे इत्यादी प्रकाराने बंदी आली.
8 Dec 2011 - 1:29 pm | प्रभाकर पेठकर
एका बैलगाडीत १२ माणसे जरी बसवली तरी १२ बैलगाड्यात १४४ माणसे होतात म्हणजेच सरासरी ७० वजन हिशोबात धरले तरी १००८० किलो वजन होते. एवढे वजन सात ते आठ किलोमीटर (किंवा सात अष्टमांश किलोमीटर) ओडून न्यायचे म्हणजे माणसाकडे अचाट शक्ती असणार. ही अचाट शक्ती कुठल्या विधायक कामात वापरता आली तर??
8 Dec 2011 - 2:31 pm | मराठी_माणूस
ही अचाट शक्ती कुठल्या विधायक कामात वापरता आली तर??
हाच विचार असंख्य साई भक्त जेंव्हा पाई पाई शिर्डीला जातात तेंव्हा मनात येतो . किति वेळ आणि शक्ती खर्च होते. रहदारीला अडथळा हा वेगळाच त्रास
10 Dec 2011 - 9:24 pm | इरसाल
काका अहो त्यावेळी वयामुळे समजत नव्हते, तिथे कोणाला विचारणार किंवा सांगणार. पण आता नक्की वाटतेय कि असे काही(अचाट शक्ती) दिसल्यास नक्की विधायक कामासाठी वापरायला प्रवृत्त करू शकेन.
11 Dec 2011 - 2:16 am | प्रभाकर पेठकर
>>>>>>असे काही(अचाट शक्ती) दिसल्यास नक्की विधायक कामासाठी वापरायला प्रवृत्त करू शकेन.
आपण त्यांना सुधरवायचे कार्य करावे असे माझे म्हणणे नाही. श्रद्धेच्या नांवाखाली अंधश्रद्धेचा अंतःप्रवाह वाहतो आहे त्यास रोखणे आता आपल्या हाती नाही पण अशा गोष्टींना प्रसिद्धी देऊन त्यास हातभार आपण लावू नये असे वाटते. पुढच्या पिढीचे प्रबोधन करून ती शक्ती काही विधायक कार्याकडे आपण नक्कीच वळवू शकू.
शुभेच्छा..!
8 Dec 2011 - 2:38 pm | दादा कोंडके
छान वृतांत असच म्हणतो.
आणखी एक प्रसिद्ध मिरवणुक म्हणजे पाठीत हुक अडकवून रथ ओढतात. हे नुसतं टिव्हीवर बघुनच भोवळ येते, प्रत्यक्षात बघितलं तर काय होइल! नवस पूर्ण झाला की हे असले अघोरी प्रकार का करत असतील?
असाच पण थोडासा कमी अघोरी प्रकार म्हणजे लोळत प्रदक्षिणा घालणे. एकदा तुळजापुरात पावसाळ्याच्या दिवसात एक बाई मंदीराला लोळत प्रदक्षिणा घालत होती. तिच्या बरोबर असलेल्या स्त्रीच्या (बहुदा आई किंवा सासू) कडेवर तीचं तान्ह मूल होतं. खाली चिखल, खडबडीत जमीन आणि वरून पाउस. तीची साडी सगळी लोळा-गोळा होउन वर गेलेली आणि आजुबाजूला दर्शनासाठी आलेले भाविक थांबून, डोळे भरून हे दृष्य बघत होते. :(
10 Dec 2011 - 5:36 pm | स्वाती२
छान फोटो अणि वर्णन!
10 Dec 2011 - 5:36 pm | स्वाती२
छान फोटो अणि वर्णन!
10 Dec 2011 - 6:57 pm | प्रभाकर पेठकर
'स्वाती२' म्हणून दोनदा प्रतिसाद का?
बापरे! मग, प्रकाश१११ ह्यांनी काय करावे?
10 Dec 2011 - 8:25 pm | सोत्रि
यशवंता,
मस्त फोटो आणि वर्णन!
- (एकदा जेजुरीला पिवळाधम्मक झालेला) सोकाजी
12 Dec 2011 - 8:31 am | धनंजय
वृत्तांत आणि फोटो छानच आहेत.
अशा सणांत गावांत खूपच चैतन्य असते.
12 Dec 2011 - 8:47 am | पाषाणभेद
बोला यळकोट यळकोट जय मल्हार!!
खंडेराव म्हाराज की जय!!!